Tuesday, April 30, 2013

नाचावं पावसात ओलं चिंब होऊनी



"कसली वाट बघता? जा आणि नाचा"
हे सुधाताईचे शब्द आज मला आठवले.
मे महिना उजाडत आहे.लवकरच पावसाळा चालू होईल.तो मागच्या पावसाळ्यातला तो

एक दिवस मला आठवला.हवामान खात्याने त्या दिवशी संध्याकाळी जोराचा पाऊस

येणार आहे असं भाकीत केलं होतं.मी ऑफिसात जाताना न विसरता सकाळीच छत्री

घेऊन गेलो होतो.

संध्याकाळी खरोखरच जोराचा पाऊस येणार असं वातावरण झालं होतं.अंधेरी स्टेशनवर

उतरून सातबंगल्याच्या बसच्या रांगेत मी उभा राहाण्यासाठी तयारी करीत होतं.ती

लांबच लांब रांग पाहून चालत गेल्यास लवकर पोहोचूं असं मनात आलं.घरी पोहोचेपर्यंत

पाऊस नक्कीच पडणार नाही असं वाटून पायीच चालायला लागलो.नवरंग सिनेमापर्यंत

पोहचेन न पोहचेन तो पर्यंत जो काही पाऊस चालू झाला त्याची कल्पनाच करवेना.

नवरंगच्या पुढे पाठारे वाडीत सुधा पाठारे रहायची. तिच्या घरी जाऊन थोडा वेळ काढावा

म्हणून तिच्या वाडीत वळलो.तोपर्यंत जोरदार पावसाला सुरवात झाली होती.

आडवा-तिडवा वारा आणि पावसाची झोड यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं.
मी तर भिजलो होतोच आणि माझी छत्री ओली चिंब झाली होती.सुधाने दरवाजा उघडून

माझी छत्री माझ्या हातातून काढून घेऊन बाथरूममधे गळत ठेवली आणि मला हातात

टॉवेल देऊन अंग पुसून घायला सांगीतलं.गरम गरम चहा करते तोवर बाहेरच्या

हॉलमधे बसा असं सांगून ती चहा करायला आत गेली.
तिच्या फ्लॅटमधल्या बाल्कनीत जाऊन जोरदार पावसात भिजण्यापासून मी कसा वाचलो

त्या पावसाच्या सरीकडे पहात बसलो होतो.
स्टुलावर एक उघडी वही पाहिली. सुधा काहीतरी त्यात लिहित असावी.

"येणारं तुफान निवळून जाण्याची वाट पहाण्यासाठी जीवन नसतं.पावसात चिंब होऊन

नाचण्यासाठीच जीवन असतं."
ह्या एव्हड्याच ओळी तिने नुकत्याच लिहिलेल्या असाव्या असं मला वाटलं.
पण दुसर्‍या पानावर तिने लिहलं होतं,

"भल्या मोठ्या खिडकीच्या गजामधून बाहेर निरखीत रहावं,निरखून पहात असताना,

नुकत्याच येणार्‍या पावसाच्या सरीमुळे सर्व परिसरात पाणीच पाणी होऊन आजुबाजूला

डबकी तयार होऊन त्यात डुंबावं,अशा तर्‍हेच्या आठवणीनीं माझ्या जीवनातले उत्तम

क्षण जागृत झाल्यावर, मला कसंसच होतं."
माझ्या हातात चहाचा कप देत मला म्हणाली,
"बाळपणातल्या आठवणी यायला लागल्या, म्हटलं काहीतरी वहित उतरून काढावं

म्हणून लिहित बसले होते.तुमची बेल ऐकून  दरवाजा उघडण्यासाठी उठले."

"अरेरे! मी तुला व्यत्यय केला ना?"
मी सुधाला म्हणालो.

सुधाची दोन्ही मुलं आणि नातवंडं परदेशात असतात.ती ह्या जागेत एकटीच रहाते.दोन

वर्षापूर्वी सुधाचा नवरा अचानक वारला.एका मुलाकडे जाऊन रहावं अशा विचाराने ती

त्यांच्या होकाराची वाट बघत होती.
इकडचं सगळं सोडून जायला तिला जीवावर आलं होतं.पण तिची मुलं, तिने इकडे एकटं

रहावं हा विचार पसंत करीत नव्हती.

मला सुधा म्हणाली,
"सतत येणार्‍या ह्या विचाराने मन बरेच वेळा उदास होत असतं.पण मुलांकडे जाऊन

रहाणं अपरिहार्य होतं.आता इथं रहाणं ठीक आहे पण पुढे जास्त वय झाल्यावर एकट्या

मी नातेवाईकांना आणि शेजार्‍यांना किती कष्ट द्यावेत.त्यापेक्षा आपल्या मुलांकडेच

जाऊन रहाणं बरं असं माझं मन मला सांगत रहातं."

निलेशने म्हणजे सुधाच्या नवर्‍याने आपल्या पश्चात एकटी राहून नयेस असं तिला

निक्षून सांगीतलं होतं.त्याचीही तिला आठवण व्हायची.
एकटी बसली असताना सतत येणार्‍या ह्या विचारांना पावसाच्या जोरदार सरीने

पावसाबद्दल विचार करण्याची तिला चालना दिली.

मला सुधाताई म्हणाली,
"काहींना वाटत असतं की,पावसाच्या आगमनाने सर्व दिवसाचं वातावरण उदास होऊन

जातं. किंवा काहींना वाटतं आजचा दिवस खरोखरच वाईट दिवस आहे.तर काहींना वाटतं
आज घरात स्वस्थ पडून रहावं आणि काहीच करू नये.

खरंच, पावसाचे दिवस म्हणजे नुसतं ढगाळ आकाश आणि उदास वाटणारं वातावरण

असण्य़ाचा प्रकार नव्हे. याऊलट जसे, सूर्याचं लख्ख उन पडलं असतानाचे, दिवस

असतात तसे चक्क  घराबाहेर पडून कल्पनाशक्तिला आनंददायक प्रवृत्तित आणण्याचा

प्रयत्न केल्याचं सूख असतं.घरात बसून नकोत्या गोष्टींचा विचार करून स्वतःच्याच

मनाला यातना देण्यापेक्षा त्या वातावरणाचा उपयोग हा एक उत्तम दिवस आहे असं

समजून रहायला काय हरकत आहे.?"

सुधाचा हा विचार ऐकून मला पण माझ्या लहानपणाची आठवण आली.
मी सुधाला म्हणालो,
"लहानपणी आम्ही असं पावसाळी वातावरण पाहून घराबाहेर पडून पावसात चक्क

नाचायला जायचो.माझी बरोबरीची सर्व मित्र मंडळी मला साथ द्यायची.
मला नेहमीच वाटायचं की,पावसात नाचल्याने,उदास,दुःखी तापदायक दिवसाना विसरून

जाऊन,मजेदार,उत्तेजित आनंदायी दिवस बनवण्य़ाचे प्रयत्न होतात.असे उदास

यातनादायक दिवस उगवल्यास आणि बाहेर पाऊस पडत असल्यास, सरळ पावसात

जाऊन नाचावं,ओलं चिंब व्हावं.कसल्याच गोष्टी मनाला शिवणार नाहीत. सर्व काही

पावसाने धुऊन गेल्यासारखं होतं. असं वाटायचं."

"आत्ता तर तुम्ही येण्यापूर्वी माझ्या मनात पावसाबद्दल असाच काहीसा विचार आला.
बाहेर पाऊस पडतोय त्याचा आवाज ऐकून मनाला आराम मिळतो.एखादी उबदार गोधडी

अंगाभोवती लपेटून खिडकीतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघत बसावं.मनात काही

कमतरता आल्यास पावासाच्या वातावरणात त्या आपोआप कमी केल्या जातात.मनात

असलेल्या सर्व समस्या मनातून धुऊन गटारतल्या पाण्यासारख्या वाहून नेल्या जातात.

मन एव्हडं प्रफुल्लीत होतं की मनोदशा एकदम आनंदीत होते.
पाऊस म्हणजे विस्मयकार, पाऊस म्हणजे दिलासा,पाऊस म्हणजे मज्जा."
सुधाने आपला विचार सांगीतला.

पाऊस जरा काढल्यावर मी सुधाचा निरोप घेऊन घरी गेलो.जेवून झाल्यावर त्या

पावसाळी वातावरणात पांघरूण घेऊन कधी झोपायला जातो असं झालं.सुधाताईचे

पावसाबद्दलचे विचार मनात घोळत होते.झोप केव्हा आली ते कळलंच नाही.पहाटेच्या

स्वपनात सुधाताई मला सांगत होती,
"जेव्हा पावसात जाऊन नाचावं असं वाटतं तेव्हा सरळ पावसात जाऊन नाचावं.
माझ्या मनाचा खास विश्वास आहे की जर का जीवनात समस्या उध्भवल्या तर थेट

पावसात जाऊन नाचावं.असं कधी नाचलोच नाही असं नाचावं.मी खात्रीपूर्वक सांगते

तुम्हाला वाटणार्‍या सर्व चिंता दूर होतील आणि खूप बरं वाटेल.कोणी काही म्हणो,

लाजकरून घेऊ नका,नको होय म्हणू नका.मनाचा धीर करा,सहास केल्यासारखं मनात

आणा,सहजच नाचल्यासारखं वाटून घ्या.कसली वाट बघता?जा आणि नाचा."

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 17, 2013

सुर्व्या आला, तळपून गेला




"मी नेहमी सूर्याच्या बाजूने असतो.माझी बहीण मात्र देवाची बाजू घेते.पण देवाच्या अस्तित्वाची मला काही खात्री नाही."
प्रो.देसायांचा नातू त्यांना समजावून सांगत होता.
"फेसबूक-गुगलच्या जमान्यामधे, सायन्सची आणि टेक्नॉलॉजीची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून, नवीन डोळ्यानी जगाकडे पहाण्याची वृत्ती वाढत आहे."
प्रो.देसायानीं आपला स्वतःचा विचार माझ्या समोर मांडला.
मी प्रो.देसायाना म्हणालो,
"भाऊसाहेब,हल्लीची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत.सायन्समधे होणार्‍या प्रगतीमुळे
ही मुलं,
"बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल"
असं म्हणायला कचरत नाहीत.पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हणणार्‍यांना मूर्ख समजलं गेलं.कारण आकाशात पाहिल्यावर आपल्या जागेवरून सूर्याचं स्थान हललेलं दिसतं. प्रत्यक्ष परिस्थिती सायन्समुळेच सिद्ध करता आली.आणि ते समजून घ्यायला बराच अवधी जावा लागला.आता सायन्स समजून घ्यायला फार वेळ लागत नाही.नव्हेतर ते समजून न घेता आपलंच खरं आहे आणि तसं नसेल तर ते खोटं आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा असा अट्टाहास करणार्‍यांचा हट्ट पुरवायला ह्या फेसबूक-गुगल वापरणार्‍यांना
वेळही नाही आणि गरजही भासत नाही.
तुमच्या नातवाच्या म्हणण्यात मला जास्त स्वारस्य वाटतं.सांगा तर पुढे तो काय म्हणाला."

प्रो.देसाई आपल्या नातवांचा विचार सांगू लागले
 "माझा नातू म्हणतो,सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे. माझी एक खात्री आहे की,उद्या सूर्य उगवणार आहे आणि ह्या धरतीवर आपल्या उन्हाची धग,आणि प्रकाश देणार आहे जो ते तो गेली अब्जानी वर्ष करीत आला आहे.
आपल्या अस्तित्वाचं श्रेय माझी बहीण मात्र देवाला देते.एखादी अदभूत बुद्धिमान शक्ती ह्या पृथ्वीतलावर असून तीच काही करून माझ्या अस्तित्वाला जबाबदार आहे हे तीचं म्हणणं मला काही पटत नाही.एक मात्र मला सहजच दिसून येतं की,माझं सर्वकाही, खाणं-पिणं श्वास घेणं ह्याला सूर्य जबाबदार आहे.

ह्या जगात मला ज्या ज्या गोष्टींची जरूरी आहे त्या सर्व तापमान,प्रकाश आणि उर्जा ह्या मधून सूर्याकडून पुरवल्या जातात.दुसर्‍या दिवशी पहाटे उठल्यावर,खात्रीने पूर्वेला उगवणार्‍या सूर्याचं दर्शन मला होणार ह्या कल्पनेने मी भारावून जातो.उद्याच्या माझ्या आशा-आकांक्षा आणि ह्या धरतीचं भवितव्य ह्याला सूर्यच कारण आहे हे मी जाणून असतो.ज्या पृथ्वीतलावर मी उभा आहे त्याचं श्रेय मी सहजा़सहजी सूर्याला देत नसलो तरी भूगर्भशास्त्र सारख्या गोष्टी सूर्यामुळेच आहेत हे अगदी उघड आहे.पृथ्वीच्या भूगर्भामधला, ज्वालामुखी नैसर्गीक प्रक्रियेमुळे व्युत्पन्न होत असला तरी पृथ्वीच्या बाह्यांगावर जे डोंगर-कडे आहेत ते पृथ्वीवर होणार्‍या,हवामान,पाऊस आणि तापमान ह्यांच्या कालचक्रामुळेच झीजून गेले आहेत.
पृथ्वीतलावरची जमीन,वनस्पति आणि प्राणी ह्यांचं अस्तित्व,वाढ आणि प्रकाश-संश्लेषण
व्ह्यायला सूर्यच कारण आहे.तसंच त्यांचं जनन,मरण ही प्रकियापण सूर्यामुळेच आहे हे निश्चित आहे.

माणसाला मृत्युनंतर पुनर्जीवन मिळतं ह्या सारखे दिलासा देणारे शब्द, शेकडो वर्षापासून अफवांचा अविरत बनाव करून त्याची पुनरावृत्ति करून वापरात आणले गेले आहेत.ह्या घटनेचं अगदी प्राथमीक स्पष्टीकरण अगदी अधुरं आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाय असा चमत्कार इतिहासात घडलेला आहे ह्या बद्दलचा उत्तम आणि खास असा पुरावा आढळत नाही.

मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दुःख आणि वेदना सोसत असतानाही नवीन दिवस उजाडणार हे नक्की आहे आणि हे सदैव होत रहाणार आहे.एखाद्या दिवसाचा प्रसंग कितीही कठीण असला तरी तो आपल्याला धैर्याने सोसला पाहिजे.सूर्य रोज उगवून आपल्याला धग,प्रकाश आणि जीवन देतो.रोज गाडीत टाकलेले पेट्रोल जे आपण जाळतो ते सुद्धा हजारो वर्षापासून असलेल्या सूर्याच्या उन्हाने वनस्पती उगवून, मरून,कुजून तेलाचं इंधन करायला उपयोगात आलं आहे.

घर तयार करायला लागणारं लाकूड,अंगावर वापरायला लागणारे कपडे, निर्माण करायला सूर्यच कारणीभूत आहे.जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे अन्न,पाणी आणि आश्रय शेवटी सूर्यामुळेच पुरवल्या जातात.मी सूर्याची पूजा करतो अशातला प्रकार नाही मात्र मी त्याची कदर करतो.प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मला त्याचा फायदा होतो कारण सूर्याकडूनच पृथ्वीवर प्रभाव होतो. माझ्या दृष्टीने देवाचं अस्तित्व हे परिस्तितिजन्य असायला आणि जाणीव व्हायला इतकं सोपं नाही.आणि म्हणूनच मी शक्की आहे.

ह्या सर्वांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हा असा आहे.काही कारणाने शोध घेऊन जर का आपण सिद्ध करू शकलो की देवाचं अस्तित्वच नाही तरी त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात कोणता फरक पडणार आहे?.खास फरक पडणार नाही.पण समजा सूर्याचं अस्तित्वच एकाएकी लोप पावलं, तर मात्र जीवनासकट सगळंच संपलं.माझ्यासाठी देवाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाची निर्णायक समिती अजून विचार करीत राहिल.पण सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे.तो नेहमी दिसणार ह्याची मला खात्री आहे.सूर्य मला जीवन देतो आणि भविष्य देतो आणि म्हणून मी सूर्याला मानतो."

एव्हडं सांगून झाल्यावर देसाई माझ्याकडे बघून माझी प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घ्यायच्या प्रयत्नात होते.ते मी ओळखून त्यांना एव्हडंच म्हणालो.
"मानलं,बुवा"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 11, 2013

ते निलगिरीचं झाड.







त्याचं काय झालं,काल झाड कापण्यासाठी म्हणून,मग ते झाड कितीही उंच असो वा
कापायला कठीण असो,सर्व अवजारानी आणि उपकरणानी परिपूर्ण असलेला असा एक
टुक आमच्या समोरच्या घरासमोर येऊन थांबला होता.
रस्त्याच्या पलीकडे एक ऊंच निलगिरीचं झाड आहे ते कापणार आहेत हे समजल्यावर
मला खूपच दुःख झालं.आमच्या समोरच ते झाड गेली पंधरा वर्ष मी पहात आहे.अंदाजे
शंभर वर्षापूर्वीचं ते झाड असावं असा माझा समज आहे.

मोठमोठे जुने वृक्ष जगातून भराभर नामशेष होत आहेत. जैव-विविधतेवर आणि
पर्यावरणावर ह्याचा नक्कीच दुष्परिणाम होत आहे हे निश्चित आहे.जुने वृक्ष नामशेष
झाल्याने पर्यावरणाला जबर धक्का बसणार आहे. अशा तर्‍हेचे वृक्ष, पक्षांना त्यांच्या
घरट्यांसाठी किंवा अन्य आश्रयासाठी पर्यावरणाची मौलिक भुमिका पार पाडत असतात.
शिवाय ही झाडं अन्नाचा पुरवठा करण्याचं काम करतात,परागकण वहनाचं काम,
करतात,कार्बनचा भरपूर साठा करतात तसंच स्थानीक जलविज्ञानासाठी महत्वाची
भुमिका साकारतात.नैसर्गिकरीत्या मेलेल्या वृक्षाचा, लाकुडफाट्यासाठी, उपयोगात
आणता येतो.

हा एव्हडा मोठा निलगिरीचा वृक्ष फक्त दोन माणसानी अर्ध्या तासात तोडून भुईसपाट
केला.एव्हडंच नाही तर ह्या ट्रकाला जोडून असलेल्या एका मशीनमधे ह्या झाडाचे
तोडलेले तुकडे टाकून भुगा करून दुसर्‍या एका मोठ्या बोगीमधे जमा करून ते लोक
चालते झाले. त्या जागी एव्हडा मोठा वृक्ष होता, शेकडो वर्ष तो ह्या जागी होता असं
कुणाला सांगीतल्यास विश्वास बसणार नाही.

आता वसंत ऋतुत ह्या झाडावर येणारे,गोड गाणी म्हणणारे असंख्य पक्षी त्या झाडाच्या
शोधात असणार.निलगिरीचा सुवास देणारी,झाडाखाली पडलेली फुलं आणि पानं,
मिळणार नाहीत.झाडाखाली पडणारी सावली भोवतालचा परिसर थंड ठेवीत असे ते आता
होणार नाही.ह्या सर्व गोष्टींचा विचार मनात येऊन मन उदास झालं.पहाटे एक कविता
सुचली.

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

सावलीत झाडाच्या बसलो असता
मान उंचावून वरती पहाता
पर्णपत्री फुले आणि शाखा
आनंद देती डोळे विस्फारता

नव्या दिवशी थंड पहाटे
आठव आली वसंत ऋतूची
चाहुल लागली त्या पाहुण्यांची
दूर दूरचा प्रवास करूनी
शोधीती जागा घालण्या घरटे

उगवला दिनकर दिवस उजाडे
कळ्या उमलूनी होती फुले
मकरंद शोषण्या भ्रमर फिरे
कुठला वृक्ष अन कुठली फुले

संध्याछाया पसरू लागली
गगन होई लाल तांबडे
विहंग,भ्रमर अन फुलपाखरे
उसंत घेण्या जाती अन्य वृक्षाकडे

सावलीत झाडाच्या बसलो असता
धगी पासूनी अवसर मिळे
कसली सावली अन कसली धग
बदल जाहला त्या वातावरणे

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

वार्धक्य आणि पोप बेनेडिक्ट





जीवन फार सुंदर आहे.खरंच,जीवन सुंदर आहे का?

त्याचं असं झालं,इकडे वसंत ऋतु यायला अजून थोडा अवसर असला तरी,आजचा
हवामान खात्याच्या अंदाज ऐकून तळ्यावर जाऊन फेर फटका मारावा थोडावेळ तिथेच
बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघावी,इतपत हवामान आल्हादायक आहे हे निश्चीत
आहे असं समजून मी भाऊसाहेबांना सकाळीच फोन करून संध्याकाळी तळ्यावर
भेटण्याचं नक्की केलं.

सुरवातीली ते थोडे कुरकूरले.मला म्हणाले,
“माझ्यासाठी सध्या इथली हवा थोडी थंडच आहे म्हणा.
“Age became” (वय झालं)”
बोलून झाल्यावर थोडे मिष्कील हसले सुद्धा.

प्रो.देसायांचा हा जोक मला त्यांनी पूर्वी सांगीतला होता.
नानु शहा,भाऊसाहेबांचा कॉलेजमधे असतानाचा सहकारी, इंग्रजी बोलताना त्याच्या
मातृभाषेतलं,गुजराथीतलं,बोलणं इंग्रजीत भाषांतर करून बोलायचा.
तो ज्यावेळी शाळेत होता त्यावेळी सकारने सर्व शाळातून इंग्रजी शिक्षणाला “चलेजाव”
केलं होतं.त्या कमनशीबी बॅचमधे हा सापडला होता.
परंतु “बॅंक”ला “बेंक” म्हणायचं, “हॉल”ला “होल” म्हणायचं “सजेशन”ला “सजेसन”
म्हणायचं “कॉफी”ला “कोफी” आणि “स्नॅक”ला “स्नेक” म्हणायचं,हे काही इंग्रजीत
शिकण्याच्या संबंधाने नव्हतं.त्या भाषेत तशा उच्चाराचे अक्षरच नाही.
हे मला प्रो.देसायानी समाजावून सांगीतलं होतं
त्यामुळे नानु शहा,
“चला कॉफी आणि स्नॅक खायाला जाऊया हे सांगताना
“चला कोफी आणि स्नेक खायाला जाऊया” असं म्हणून हसं निर्माण करायचा.
एकदा तर एका मित्राला,
“आपली मेहुणी तरूण आहे आणि घरी रिकामीच असते काही काम वगैरे करीत
नाही.तिच्यासाठी नवरा शोध”असं सांगण्यासाठी,
“माय सिस्टर-इन-लो इज यंग ऍन्ड एमटी” असं म्हणून त्या मित्राला बुचकाळ्यात
टाकून गेला.त्याच्या मित्रानेच आम्हाला हा जोक सांगीतला असं प्रोफेसर आम्हाला
म्हणाले होते.इंग्रजीचं अज्ञान आणि मातृभाषेतले उच्चार ह्या दोन गोष्टींची गफलत
झाल्याने त्याचं असं होत होतं,असं सांगून प्रो.देसाई स्पष्टीकरण करीत असत.

मी तळ्यावर गेल्यावर बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघत असताना हे सर्व आठवून
मी माझा वेळ घालवीत होतो.एकदाचे भाऊसाहेब येताना दिसले.जवळ येऊन बाकावर
माझ्या शेजारी बसले.
प्रो.देसाई काही बोलत नाहीत हे पाहून मीच गप्पा मारण्यासाठी विषय काढला.
“जीवन सुंदर आहे असं म्हणतात.खरंतर,आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात जीवन सूंदर
असावं असं मला वाटतं.भाऊसाहेब तुम्हाला कसं वाटतं.?”

माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून प्रो.देसाई मला म्हणाले,
“तुम्ही म्हणत आहात ते मला पटतं.अगदी कुकुल्या वयात,भुक लागली की
रडायचं,कुठंतरी दुखलं-मुखलं की रडायचं,आई जवळ हवी असल्यास रडायचं,सु:सु:
झाल्यावर रडायचं असं ह्या आयुष्याच्या टप्प्यात रडूनच सर्व काही सांगीतलं जातं.हसणं
क्वचितच होतं.आयुष्याच्या ह्या टप्प्यातलं ते जीवन सुंदर आहे असं कोण म्हणेल.?
नंतर जवळ जवळ अठराएक वर्षापर्यंत वय वाढत असताना,
“अजून तू लहान आहेस”
असं सारखं मोठ्यांकडून ऐकून घेत घेत हा आयुष्याचा टप्पा निघून जातो.जीवन सूंदर
आहे का? असं वाटण्याचा प्रश्नच मनात येत नाही.”

एव्हडं बोलून भाऊसाहेब थोडे गप्प झाले.ती संधी साधून त्यांच्याच विचाराचा धागा पुढे
ओढत मी म्हणालो,
“मला वाटतं अठरा वर्षानंतर जवळ जवळ पस्तीस,छत्तीस वयापर्य़ंत,आयुष्य हिरवं गार
असतं.टवटवीत असतं.कोपर मारीन तिथे पाणी काढीन अशी अंगात जीद्द असते.करू ती
पूर्व दिशा असा समज असतो.एव्हरेस्ट चढून जाईन तो थीटा वाटतो,महासागराचा तळ
पाहिन तो उथळ वाटतो.आकाशात झेप घेईन अशी धमक असते.निळ्या आकाशात
विहंगाचं मुक्त विहार पाहून त्याचा हेवा वाटतो.प्रणयराधनेत रस घ्यावासा वाटतो,
त्यातूनच विश्वाचं रहस्य उलघडलं जातं.मागचा पुढचा विचार करायला वेळ नसतो
नव्हेतर असला विचार करायाला मनातच येत नाही.”

प्रो.देसायांचा चेहरा, माझं हे म्हणणं ऐकून,आनंदी झालेला दिसला.
मला म्हणाले,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.हा आयुष्याचा टप्पा ओलांडून पुढे
जाताना,जीवनाचा मार्ग उताराला लागतो.ह्या उताराचा कल कुणाचा जास्त असेल तर
कुणाचा कल कमी असेल.त्यामुळे मनाचं सौन्दर्य जरी टिकून राहिलं तरी शरीराचं
सौन्दर्य उतरणीला लागतं.
डोळ्यावर चाळीशी येते.केस पिकू लागतात.त्वचेतला तजेलदारपणा कमी होऊ
लागतो.दाढा दुखू लागतात.एक ना हजार गोष्टी होत रहातात.कामाधामात काही कमतरता
दिसल्यास,नानु शहा म्हणतो तसं,
“Age became”चा आधार घ्यावा लागतो.

पण एक मात्र निश्चित ह्या उताराचा कल कमी करायचा झाल्यास, किंवा दुसर्‍या शब्दात
सांगायचं झाल्यास,आयुर्मर्‍यादा वाढवायची झाल्यास,जरूर तेव्हडा नियमीत
व्यायाम,बेताचा आहार,व्यसनापासून दोन हात लांब,सकारात्मक विचार,ह्या गोष्टींचा
पाठपुरावा केल्यास म्हणजेच,पचेल ते खाणं,सुचेल ते सांगणं,रुचेल ते बोलणं,आणि
सर्वांना आवडेल असं आचारण ठेवणं,हे करावं लागतं.”

हे सांगून झाल्यावर प्रो.देसाई मी ह्यावर काहीतरी बोलणार अशी अपेक्षा करीत होते.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, अशा वागण्याने वयोमर्यादा वाढते,त्यामुळे वार्धक्य कुणालाही चुकवीता
येणार नाही.हा आयुष्यातला टप्पा खरोखरच तापदायक असतो.
वार्धक्यातल्या असहनीय वेदना औषधं घेऊनही सहन होत नाहीत.परावलंबी व्हायला
होतं.डॉक्टर नव्हेच तर कुणी मित्र किंवा तत्सम कुणी मदत करून ह्या वेदनातून
सोडवील अशी अपेक्षाही फोल ठरते.आणि शेवटी मृत्यु हाच अगदी जवळचा मित्र
वाटतो.तो निश्चितच ह्या वेदनातून सुटका करायला कारणीभूत होतो.खरं आहे ना?”

“अगदी खरं आहे.अर्थात ह्याला अपवाद हे असतातच.तुम्हाला आमचे शेजारी प्रो.
सुखटणकर मला काय म्हणाले ते मी सांगतो.

“मला निवृत्त होऊन आता दहा वर्षं झाली.ख्रि़श्चनांचा धर्मगुरू पोप बेनेडिक्ट निवृत्त
होणार म्हणून त्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच.
चाळीसाव्या वयावरची शरीर शक्ती अजून माझ्यात आहे. पण बटाट्याची पाच पौंडाची
पिशवी उचलताना माझ्या लक्षात येतं की माझ्यात काहीतरी बदल झाला आहे.अगदी
अलीकडे नातवंडांबरोबर क्रिकेट खेळायचो,आता खेळण्यासाठी माझ्यापेक्षा वयाने मोठे
असलेल्यांच्या मी शोधात असतो.
प्रोफेसर असताना कॉलेजमधे लेक्चर देताना एकाच वेळी अनेक विचार करायची
माझ्यात पात्रता होती पण हल्ली एक गोष्ट घेऊन विचार करायला आव्हान वाटतं.माझ्या
जीवनात क्षमतेला विशेष स्थान होतं,आता आयुर्वृद्धि होत असताना क्षमता लोप
पावायला लागलेली दिसते.माझं मन आणि शरीर तणाव-मुक्त व्हायला लागलं आहे.
माझ्या लक्षात यायला लागलं आहे की माझा मृत्यु दूर क्षितिजावर आहे हे खरं
नाही.उलट त्याची नियोजीत भेट होणार आहे असं वाटतं.

आपली स्वतःची ओळख ही आपण स्वतःकडे कसं पहातो यावर अवलंबून आहे.आपली
क्षमता,भूमिका,मान्यता,आवश्यकता आणि दृढविश्वास यावर हे अवलंबून आहे मग तो
धर्मगुरू पोप असो वा मी असो.जरी आम्हा दोघां मधल्या ओळखीच्या घटकात
जमीन-अस्मानाचा फरक असला तरी दोघांची द्विधा परिस्थिती सारखीच आहे.
आम्हा दोघांहीमधे जरी एकाही अर्थपूर्ण गोष्टीत बदल झाला तरी त्यामधे असलेली
झलक नक्कीच बदलते. जसं डाळीच्या आमटीमधे लागणार्‍या चीजवस्तुत विशेष बदल
झाला तर त्याचं आंबट वरण व्हायला वेळ लागणार नाही.

माझ्यात काय किंवा धर्मगुरू पोप याच्यामधे काय, दोघांच्याही अर्थपूर्ण क्षमतेमधे
कमतरता आल्यास आम्हा दोघांच्या व्यक्तीमत्वात फरक होणं उघड आहे.
“कोणत्याही व्यक्तीच्या मौलिक गुणात फरक पडणं शक्य नाही.”
असं जरी मोठ्या पंडीतानी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतलं तरी त्यात फरक पडणं
अपेक्षीत आहे.जीवन खरोखरच इतकं साधसुधं असू शकतं का?
मी म्हणेन, आपण जे असतो ते आपल्या करणीवर आणि मानण्यावर असतो.

धर्मगुरू पोप यांच्या निवृत्तीवरून मी काय शिकायचं ही अगदी साधी गोष्ट आहे.
जी व्यक्ती अतिशय शक्तिशाली स्वेच्छाचारी पदावर आरूढ असूनही केवळ वार्धक्यामुळे
त्या पदावर कार्यशील राहू शकत नाही,मग माझ्यासारख्याला एखाद्या व्यक्तीने,
आपणहून उठून मला बसायला बसमधे जागा करून दिली तर ती शालीनतापूर्वक मी
स्वीकारायला हवी.”

प्रो.सुखटणकरांकडून हे सर्व ऐकून मलाही माझ्या वयाचा विचार करणं क्रमप्राप्त झालं.
म्हणूनच मी तुम्हाला थंडी सोसवत नाही असं सकाळी फोनवर म्हणालो होतो. पण एक
मात्र नक्की,माणूस खूपच पराधीन आहे.”

एव्हडं बोलून,
झाल्यावर घरी जाण्यासाठी आम्ही उठलो.काळोखही बराच झाला होता.
बाकावरून उठताना भाऊसाहेबांनी माझ्या हाताचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न केला.
माझे थॅन्क्स मानुन वर पुटपुटले
“आलिया भोगासी”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

लेकीची मिठी





लेकीची मिठी
माझ्या पत्नीचा आज शहात्तरावा जन्मदिन.गेल्या वर्षी ह्याच महिन्यात ती आजारी होऊन हॉस्पिटलात होती आणि नंतर दोन महिने नर्सिंग-होममधे होती.
वर्ष कधी निघून गेलं हे कळलंच नाही.तिच्या ह्या आजारामुळे आयुष्यातले बरेच नवे अनुभव पहायला मिळाले.
आज दिवस उजाडताच तिच्या लेकीने तिला कडकडून मिठी दिली आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ते दृश्य पाहून माझे डोळे ओलावले.माझ्या पत्नीच्या मनात काय आले असावे ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली.

आईचा सांगावा,

(पाहूनी तुझी ती प्रमेळ मिठी)

त्वरेने भरले माझे ऊर भारी
विचार आला माझ्या अंतरी
असावी तुजसम मुलगी एकतरी

केलीस सेवा अखंड दिवसभरी
कर्तव्याला जागलीस तू सत्वरी
कुठली आई अन कुठली मुलगी
विस्मित झाले मी क्षणभरी

पुन्हा वि़चार आला माझ्या अंतरी
आता तुच माझी आई खरी
शुभेच्छा ज्यांनी दिल्या मला
आहे मी त्यांची सदैव आभारी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 14, 2012

पुढील कार्यक्रम थोड्या विश्रांती नंतर




मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी.डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 6, 2012

समस्या,समस्या आणि समस्या





"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं आणि वरदान केव्हा ठरतं."


"हे काय चाललं आहे?"
वृद्धांची ससेहोलपट व्हायला काय काय कारणं असावीत? असा विचार येऊन माझं मन खुपच चलबिचल व्हायला लागलं.
आणि मग मनात येईल ते लिहीत गेलो.

वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असणं स्वाभाविक आहे.
काहीना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं तर काहीना ते  शाप वाटतं.
ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.

ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.
ह्याचं मुख्य कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

पण हळू हळू वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत सर्व गोष्टीत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.

काहीना तर,
"इतक्या लवकर घरी कसे परत आला?"
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना कसा दोष देता येईल?
घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.


तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.हे खरं आहे.

कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात  याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्या व्यक्तीना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
जेष्टानी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.

त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
"कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या."
"घरात शांततेने रहा"
अशा वृद्धाना,
"तोंड बांधून बुक्याचा मार "
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
"परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?" असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?


"तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?"
असा प्रश्न विचारल्यावर कळतं की,काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडीलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.

आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडीलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.

म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडील अडचणीचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडीलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडीलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.
त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.


काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात  हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वप्नं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडीलांशी तुटकपणे वागतात. याचं मरण:प्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर  काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून  वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.


पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.
अशावेळी मनात येतं,
 "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."


एका अविवाहीत व्यक्तीने आपला विचार सांगीतला,
"व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर या बाबतीत तरी मी सुखी आहे! लग्न न करून मुलंबाळं विचारतील की नाही, मान देतील की नाही ही भानगडच आपण ठेवली नाही! आम्हाला आमच्या वृद्धापकाळात  त्या मुलासुनांचं प्रेमही नको आणि त्यांचा तिरस्कार -हेटाळणीही नको!  दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुष्य असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!

आमचा बुढापा हा एकट्याचाच असेल, अकेला असेल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु निदान मुलानातवंडांचे पाश तर नसतील! मुलं विचारतील की नाही? सूनबाई आदर ठेवेल की नाही? नातवंड खिल्ली तर उडवणार नाहीत ना? असल्या नसत्या चिंता मागे लागणार नाहीत! नकोच ते सांसरिक पाश!
एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन!
उद्या हातपाय थकले तर एखाद्या स्टार-वृद्धाश्रमात जाऊन नक्कीच राहीन. तिथे पैसा फेको तमाशा देखो असा सिंपल मामला असतो!
स्वत:च्याच घरी वृद्धाश्रमात ठेवल्यागत रहायचं किंवा मुलाबाळांनी उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं!"


प्रो.देसायाना ज्यावेळी ह्या विषयाबद्दल मी बोललो तेव्हा ते मला म्हणाले,
"ह्याच विषयावर माझ्या एका मित्राशी माझी चर्चा झाली.त्याने चिंतन करून,खोल विचार करून अतिशय मार्मिकतेने जे मला सांगीतलं ते मी तुम्हाला

थोडक्यात सांगतो.
वृद्धापकाळातील सुख दु:खाची मुळं तारुण्यात असतात. मुलांवर विसंबून राहायचे दिवस कधीच संपले. बाहेरील जगातील वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढती आत्मकेंद्रित वृत्ती पाहता प्रत्येकाने वृद्धापकाळातील आर्थिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार आणि तजविज तरूणपणातच करायला सुरुवात केली पाहीजे.


आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. ह्या वानप्रस्थाश्रमात संसारात राहून संसारातून मन काढून घेण्यास सांगितले आहे. हे वाचायला सोपे वाटले तरी आचरणात आणणे कठीण असते. ह्याला कारण जसे स्त्री लग्न झाल्या पासून स्वयंपाकघर हाताळत असते. संपूर्ण घरात तिचा वावर आणि हुकुमत असते. हेच म्हातारी झाल्यावर सुन आल्यामुळे तीच्या हाती सर्व ताबा द्यावा लागतो आणि स्वतःला दुय्यम स्थानावर उतरावे लागते. हे 'डाऊन साईझींग' स्वीकारणं कठीण जातं. जिथे हुकूम सोडायची (चांगल्या अर्थाने), मार्गदर्शन करण्याची सवय लागलेली असते तिथे हुकूम ऐकण्याची (चांगल्या अर्थाने) आणि मार्गदर्शन स्विकारण्याची वेळ येते. इथे सासू सूनेत खटके उडायला सुरूवात होते. म्हातारपणात सुख कमी आणि दु:ख जास्त अशी परिस्थिती येते. गमतीने असे म्हणतात की 'सासू' म्हनजे 'सारख्या सूचना' आणि 'सुन' म्हणजे 'सुचना नकोत'.


जी स्थिती स्त्रीयांची तिच स्थिती पुरुषांची. आजवरच्या आयुष्यात संपूर्ण घर त्यांच्या भोवती नाचत असतं. घरात काय हवं, काय नको, घर कसं सजवावे वगैरे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार होत असतात.स्वतः कमवत असल्याने 'स्वेच्छेने' खर्च करण्याची मुभा असते. निवृत्ती नंतर मुलगा नोकरीत स्थिरावलेला असतो. हळूहळू तो 'कर्ता' पुरूष होत असतो. नव्या जमान्याच्या नव्या कल्पना त्याला सत्यात उतरवायच्या असतात. हाती पैसा असतो.

(कित्येकदा मागिल पिढीच्या तुलनेत कितीतरी अधिक). नविन काळाची गरज अणि भरपूर पैसा हाताशी असल्यामुळे लॉ ऑफ मार्जिनल युटीलीटीच्या नियमानुसार तो मुक्त हस्ते खर्च करीत असतो. जे मागील पिढीला उधळणे वाटते. आपण इतक्या काटकसरीत संसार केला पण मुलांवर त्याचा व्हावा तसा परिणाम, संस्कार झाला नाही अशी वैफल्यपूर्ण भावना ज्येष्ठांच्या मनात घर करू लागते. तसेच आता घरात आपले काही चालत नाही. सगळे निर्णय मुलगा घेतो. (आणि त्याची आई त्याला साथ देतेय, हे दुसरे दु:ख) आपली पत्नीही आपल्या सोबत नाही, तिलाही आपल्याबाबतीत सहानुभूती वाटत नाही असे एकांगी विचार मनात घोळायला लागतात. एकेकाळचा कर्ता, कर्तबगार माणूस दुखावतो, कोषात जातो, विक्षिप्त वागायला लागतो.

लहान मुलं जशी स्वतःकडे मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात, हट्ट करतात, मस्ती करतात त्या प्रमाणे ती ज्येष्ठ व्यक्ती लहान सहान निर्णयात दखल देऊ लागते, न विचारता सल्ले देऊ लागते, स्वतःचे ज्येष्ठत्व इतरांवर ठसवू पाहते. ते इतरांना जाचक होते. संघर्ष, वादावादी सुरू होते. ज्येष्ठ दुखावतात एकटे पडू लागतात.


हे सर्व पूर्ण नाही तरी अंशतः टाळणे शक्य असते. आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी. ज्यातून स्थायी स्वरूपात काही मिळकत होत राहील अशी गुंतवणूक करावी. भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी. कारण वडीलांची आर्थिक गुंतवणूक माहित असेल तर कधी कधी मुले ती त्यांच्या किंवा घराच्या वाढत्या गरजांसाठी भावनिक दडपण आणून (आम्ही तुम्हाला सांभाळत नाही का? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?) मोडायला लावतात. सर्वच मुले असे वागतात असे नाही. पण अनेक दु:खी ज्येष्ठांची ही शोकांतिका आहे. तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.

दुसरी गोष्ट आहे मानसिक. इतकी वर्षे घर चालविल्या नंतर म्हातारपणी स्वखुषीने सुत्रे मुलांच्या हाती सुपूर्त करावीत. त्याना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ द्यावा. त्यांना त्यांचा 'संसार ' उभा करण्याचा आनंद मिळवू द्यावा. त्यांच्या चांगल्या निर्णयांचे तोंड भरून कौतुक करावे. त्यांनी विचारला तरच सल्ला द्यावा. चूका फार सौम्य करून दाखवून द्याव्यात. आता ते 'कर्ते' आहेत हे मनाने स्विकारावे. आपण एक
पाऊल मागे घ्यावे.

भावनिक पातळीवर, 'प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते' (मिळतेच असे नाही) हे तत्व अंगीकारावे. मुलांशी, नातवांशी प्रेमाने वागावे. म्हणजे आम्ही काय क्रुरतेने वागतो की काय? असे कोणी म्हणेल. पण प्रेम जे त्यांना समजेल, दिसेल, रुचेल ते असावे असे मला म्हणायचे आहे. पुरुष निवृत्त होतात पण बायकांना सहजासहजी निवृत्ती मिळत नाही. त्यांना ती मिळावी असा विचारही आपल्या मनात येत नाही आणि कित्येक केसेस मध्ये त्यांनाही ती नको असते. पण वयोमानानुसार त्यांचेही हातपाय थकतात. रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठीसूळपणा वाढीस लागतो. घरातील माणसे संखेने वाढलेली असतात. शारिरीक काम वाढलेले असते. म्हणजे एकीकडे ताकद कमी झालेली असते तर दूसरीकडे श्रम वाढत असतात. पत्नी आता आपले न ऐकता मुलाचे ऐकते ही भावना पतीच्या खुळ्या मनात घर करत असते त्यामुळे एकीकडे कुरकुरणारा पती आणि दूसरीकडे 'डिमांडींग' तरून पिढी ह्या चरकात ती बिचारी पिळून निघते. अश वेळी पुरुषाने तिला घरकामात शारिरीक मदत करावी. तिने आपल्याशी कसे वागावे ह्याच्या अपेक्षा न ठेवता आपण तिच्याशी चांगलेच वागावे, बोलावे. तिच्या कामाचा भार कमी करावा. वाटून घ्यावा. कमी कमी होऊ पाहणारा 'संवाद' चालू ठेवावा. तिची होणारी ससेहोलपट समजून घ्यावी. ती कमी करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तिला, मुलांना भावनिक आधार द्यावा तुम्हाला तो आपोआप मिळत जातो.

मोकळा वेळ कसा वापरावा, हा एक मोठा प्रश्न असतो. मानसोपचार तज्ञांशी, फॅमिली डॉक्टरांची विचारविनिमय करून शारिरीक व्यायामासाठी पोषक अशा हालचाली होतील असे पाहावे. समविचारी (रडणारे, कुढणारे नाही) मित्र जमवावेत. वाचन करावे, थोडेफार आध्यात्मिक वाचन करण्यासही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. आयुष्यभर नोकरीच्या/व्यवसयाच्या धबडक्यात न जमलेल्या हौशी (वयानुरुप) भागवाव्यात. निसर्गाला वाचावे, जाणून घ्यावे. म्हातारपणी बागकाम 'निर्मिती आनंद' मिळवून देतो. नातवंडांमध्ये आपले बालपण शोधावे. आपल्या मनःस्वास्थासाठीही हे चांगले असते. दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती 'दुसर्‍यांची' मुलं आहेत हे विसरू नये. 'त्यांच्या' इच्छेचा मान राखून नातवंडांवर संस्कार करावेत. नातवंडांसमोर आपल्या मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे दुर्गुण उगाळू नये.

मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये. त्यांच्या मानसिक अवस्था जाणून घेऊन निर्माण होणारे गुंते अतिशय हळूवार हाताने सोडवावे. थोडेफार त्यांच्या कलाने घ्यावे, थोडेफार आपले घोडे दामटावे. म्हातारपणी आई-वडीलांच्या अपेक्षा असतात मुलांनी त्यांना 'वेळ' द्यावा. वेळ द्यावा म्हणजे नुसता तास आणि मिनिटात मोजता येईल असा नाही. एकत्रित कुटुंबाचा आनंद मिळवून देईल असा वेळ द्यावा. त्या वेळात आई-वडीलांच्या इच्छा आग्रहपुर्वक पूर्ण कराव्यात. त्यांच्या इच्छेनुसार कार्यक्रम आखावेत. त्यांना अतिश्रम होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. त्यांची शारीरिक, भावनिक सेवा करावी. हे कायम करावे लागत नाही पण महिन्यातून एकदा किंवा दोन तिन महिन्यातून एकदा जमवून आणले तरी चालते. ज्येष्ठांना आपल्याला अडगळीत टाकलेले नाही, आपल्याला स्वयंपाकीण बाई किवा मुलांना साभाळणारी आया म्हणून वागविले जात नाही तर आपले ही ह्या कुटुंबात काही स्थान आहे. मुलं आपल्याला प्रेमाने वागवताहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यांना जगायला नवा हुरूप मिळतो. दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे 'शब्द' हे शस्त्र आहे.

सांभाळून वापरावे. संतापाच्या भरात तत्क्षणी प्रतिक्रिया व्यक्त करण्या ऐवजी शांत झाल्यावर हळू शब्दात, शब्दांची चांगली निवड करून आपली भूमिका संमजावून सांगावी.

अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 31, 2012

"मी ही अशी"




"गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?"


दादर पश्चिमेला भवानी शंकर रोडवर इंदारा निवास ह्या बिल्डींगमधे आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो.तळमजल्यावर म्हणजे आमच्या खालीच देसाई कुटूंब रहायचं.देसायाना पाच मुलगे आणि एक मुलगी होती.मुलगी शेवटचीच म्हणून तिचं नाव सरला ठवलं होतं.
सरला शेंडेफळ असल्याने फारच लाडात वाढली होती.तिचे आईबाबा तिचे भरपूर लाड करायचेच त्याशिवाय पाच भावांना एकुलती बहिण म्हणून तेही तिचे लाड करायचे.त्यामुळे सरला खूपच लाडावून गेली होती.



पण भावंडात कधीतरी खटके उडायचे.मग क्वचित सरलावरपण राग काढला जायचा.सरला खूप बापुर्वाणी व्हायची.आमच्या सारख्या बाहेरून आलेल्याने चौकशी केली की म्हणायची,
"मी ही अशी"
आणि मग आपल्यावर कसा अन्याय होत आहे ते सांगायची.
म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा असायचा की,ह्या पाच भावांबरोबर राहून दिवस काढणं तितकं सोपं नाही.एखादा भाऊ म्हणायचा,
"तुझे खूपच लाड केले जात आहेत म्हणून तू अशी झाली आहेस"
कुणी म्हणायचा,
"तुझ्या जिभेला हाड नाही.वाट्टेलते बोलतेस"
वगैरे वगैरे.


मला तिच्या भावांचीपण कीव यायची.एकटी लाडावलेली बहिण असणं ही त्यांची एक व्यथाच झाली होती.
तिचं हे सगळं वागणं आणि अबलता बघून,आणि तिच्या भावांची व्यथा लक्षात येऊन, मला बत्तीस दातामधली एक जिभ आठवली.आणि कविता सुचली ती अशी,



दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांना
मी अशी (बिचारी) एकटी असून  
बत्तीस भावांमधे कशी राहू रुसून


मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले इकडे तिकडे
दात करतात माझा चोळामोळा
कुणी विचारले काय झाले
तर सांगतात सर्व जीभ चावून


ऐकून हे जिभलीचे संभाषण
दात म्हणती लगेचच तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला


बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
धमकी देती लोक वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Wednesday, July 25, 2012

एकदां काय जहालें!




स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:


तो रविवारचा दिवस होता.प्रमोद,त्याची पत्नी आणि मुलं माझ्याकडे जेवायला आली होती.माझ्या पत्नीने सुकं मटण,वडे ताज्या सोलांची कडी आणि भात असा जेवणाचा बेत केला होता.जेऊन झाल्यावर दुपारी थोडी डुलकी काढून झाल्यावर जुहू चौपाटीवर जायचा विचार केला.माझी पत्नी काही आली 
नाही.
"मी आवराआवर करीन तुम्हीच जाऊन या"
असं मला म्हणाली.


इतर आम्ही चौपाटीवर गेलो.सुर्यास्त बघून झाल्यावर प्रमोद आणि मंडळी घरी जायला निघाली.मी बराच वेळ वाळूत पडून होतो.सुर्यास्त झाल्यानंतर आणखी थोडावेळ बसायला मला आवडतं.
विशेषतः सूर्य पुरा समुद्रात डुबून गेल्यावर आकाशात दि़सणारे ते पिवळे-लाल रंग बघायला मला मजा येते.
वाळूवर थोडा लेटून हा प्रसंग मी पहात होतो.तासाच बसून होतो.काळोख केव्हा झाला ते कळलंच नाही.सूर्यास्ताकडे पाहून मनात विचार आला,
"हे काय चाललं आहे?"


सूर्य,पृथ्वी,पहाट,सकाळ,दुपार,दिवस,संध्याकाळ,रात्र,काळोख वगैरे अखिंडीतपणे चालू आहे.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची बाकी ही सर्व मुलं आहेत आणि ह्या कुटूंबाचा संसार असाच अखंडितपणे चालू आहे अशीही कल्पना मनात आली.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची पाच मुली आणि दोन मुलगे,दिवस आणि काळोख,अशी कल्पना मनात येऊ लागली.


घरी गेल्यावर तसाच कागद पेन्सिल घेऊन कविता उतरून काढली.दुपारी यथेच्छ जेवल्यावर आम्ही रात्री जेवत नाही.एक एक कप कॉफी पिऊन आम्ही झोपायला गेलो.
सकाळी उठल्यावर चहा घेताना मी माझी कविता पत्नीला वाचून दाखवली.


"कसं हे तुम्हाला सुचतं?"
नेहमी प्रमाणे माझ्या पत्नीने मला प्रश्न केला.
ह्यावेळी मी तिचा प्रश्न ऐकून फक्त हसलो.
माझ्या हसण्याचा अर्थ तिला समजला असावा.
दोन्ही चहाचे रिकामे झालेले कप उचलून ती उठून गेली.
मी मात्र माझ्या मनात नेहमीचं उत्तर बोललो.
"अग! विचाराच्या प्रांगणात अक्कलेने केलेला शब्दांचा हा खेळ आहे दुसरं काय?"

कविता अशी होती.


कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबूजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहूनी सूर्याला


ऐ्कूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
नेम असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्त दिवसाचा


ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
श्रेय नको देऊं तू सूर्याला
नेम असे हा पण पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना


पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे "दिवस" संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना


स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 20, 2012

झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद.





"म्हणून म्हणतो नका घालूं वाद"


निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला अक्कल दिली आहे.प्रत्येक प्राणी आपल्या अक्कलेनुसार वागत असतो.आणि ते स्वाभाविक आहे.कदाचीत दुसर्‍याचं शिकून तो प्राणी आपल्या अक्कलेत भर घालील आणि मग ती घातलेली भर चांगली असेल किंवा वाईट.पण त्यानुसार तो आपल्या वागणूकीत फरक करील हे निश्चीत आहे.


माणूस ह्या प्राण्याला निसर्गाने जरा जास्तच अक्कल दिली आहे ह्यात शंका नाही.ह्या अक्कलेच्या देणगीमुळेच अनेक गोष्टी करता करता माणूस वाद घालायलाही शिकला.अर्थात प्रत्येकजण तो वाद आपल्या अक्कलेप्रमाणेच घालत असणार.ह्यावेळी मला प्रो.देसायांचे ते शब्द आठवतात.


ते म्हणायचे,
"अहो,सगळ्यांना सारखीच अक्कल असती तर सारेच ज्ञानेश्वर,शिवाजीमहाराज आणि स्वामी विवेकानंद झाले असते.ह्यावरून मला एक कविता सुचली.


म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना सोळाव्या वर्षी
तोरणा जिंकणे


संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
ऐकूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद


जसे वाढे एखाद्याचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला


म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 15, 2012

नियतीचा निर्णय





"योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती"

"ह्या धरतीवर बर्‍याच गोष्टींना दोन बाजू असतात.अगदी पृथ्वीपासून सुरवात केली तरी तिला उत्तर आणि दक्षीण धृव आहे.झाडांना शेंडा आणि मुळ आहे, काठीला दोन टोकं असतात अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.शेवटी,चांगलं प्रचलीत म्हणणं सांगायचं झाल्यास, वादालाही दोन बाजू असतात हे सांगता येईल."
शरद मला आपला मुद्दा समजावून सांगण्य़ाचा प्रयत्न करीत होता.
पुढे म्हणाला,
"कुणाही मध्यस्थ्याकडे जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडलीत आणि त्याचा निर्णय विचारलात तर तो पटकन सांगेल की दुसरी बाजू मला ऐकली पाहिजे."
मी शरदला म्हणालो,
"तुझं म्हणणं मला पटतं.एखाद्याने डोळ्यासमोर एखाद्याचा खून केला आणि न्यायाधीशाला सांगीतलं तरी न्यायाधीशपण म्हणतो तरीपण मला दुसरी बाजू ऐकली पाहिजे."

नंतर काही दिवसानी का कुणास ठाऊक शरदचं ते वाक्य दुसरी बाजू ऐकली पाहिजे माझ्या सारखं मनात घोळायला लागलं आणि मग कविता सुचली.ती अशी,

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीतोस मात्र नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, July 10, 2012

सत्तेची ही कसली खूमखूमी




मालती मला नेहमी म्हणायची की तिच्या नवर्‍याचं आणि तिच्या मोठ्या मुलाचं कधीच पटलं नाही.दुसरे दोन मुलगे त्यामानाने वडीलांशी पटवून घ्यायचे.न पटणार्‍या त्या दोघांमधे मालतीने कधीही हस्तक्षेप केला की तिच कुणा एकाला वाकडी व्हायची.
"बरोबर तू त्यांचीच बाजू घेणार.तुझा नवरा पडले ते."
असं उद्धव,तिचा मोठा मुलगा तिला म्हणायचा.
आणि मुलाची बाजू घेतली की
 "बरोबर आहे तो तुझ्या पोटचा गोळा. तू त्याचीच बाजू घेणार"
 असं मालतीचा नवरा तिला म्हणायचा.
"माझी मात्र कात्रीत सापडल्यासारखी परिस्थिती व्हायची"
मालती मला म्हणायची.


मी मालतीला समजुत घालण्यासाठी म्हणायचो,
"अग,दोन व्यक्तिमधली ते पिढीचं अंतर आहे ना? मग ते तसंच व्ह्यायचं.एकमेकाने एकमेकाला समजून घेतलं नाही की हा वाद व्हायचाच.आईची स्थिती निराळी असते.तिला तडजोड करून घ्यायची निसर्गाचीच देणगी असते.अपवाद सोडल्यास आता जे काय तू म्हणालीस तशा प्रकारच्या बर्‍याच  घरातल्या तक्रारी असतात."


ह्या गोष्टीला आता खूप दिवस होऊन गेले.ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा मला कुणीतरी सांगीतलं की मालती आणि तिचा नवरा कायमचे कोकणात रहायला आले आहेत.मालतीच्या नवर्‍याला परॅलिसीसचा आजार झाल्याने त्याला सतत कुणाचीतरी मदत लागायची.शहरात रहाण्यापेक्षा कोकणात कुणालातरी कामाला ठेवायला माणसं मिळतात.खर्चही कमी येतो.मुलांच्या आधाराने रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं कमी तापदायक आहे.असा विचार करून ती दोघं कोकणात येऊन राहिली. 


त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो.
मालती आपल्या उतार वयातल्या कर्मकथा सांगत होती.
मला म्हणाली,
"काय सांगू आमचे भोग आणि आमची कर्मदशा असं म्ह्टलं पाहिजे आणखी काय? उद्धवाकडून मानहानी शिवाय काहीच मिळत नव्हतं."


त्यांचा निरोप घेऊन घरी जाताना मी माझ्या मनात म्हणालो नवं सरकार येतं आणि सत्ता बदलते."
त्यातूनच मला एक कविता सुचली,

उद्धवा! अजब तुझे सरकार

उजाडूनी दिवस होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
वाटते त्याही पेक्षा ती रात्र बरी


उजळणी दिवसाची होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची


उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच असे तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 5, 2012

बघ उडुनी चालली रात




वामन मला म्हणाला,
"खरंच, जर का माणसाला उद्या काय होणार ते निश्चीतपणे कळलं असतं तर फारच हलकल्लोळ माजला असता.नीट विचार केला तर, निसर्गाने ही उद्याचं नकळण्याची कमतरता माणसाला दिली आहे, ती एक देणगीच म्हणावी लागेल."


"तुझ्याशी मी ह्यापेक्षा आणखी सहमत होऊच शकत नाही"
असं मी वामनला म्हणाल्यावर वामनला बरं वाटलं.


"आपण सगळे, जास्तकरून, दुःखीच झालो असतो असं मला वाटतं.कारण अख्या जीवनात दुःखच जास्त असतं.मग ते राजाचं जीवन असो वा रंकाचं असो.शिवाय अनर्थ घडले असते."
वामन मला असं म्हणाला.


आणि पुढे म्हणाला,
"आपलं भविष्य आपण हमखास बदलु शकलो असतो.नव्हे तर भविष्य ह्या शब्दाला अर्थच राहिला नसता.
"लग्नं स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर होतात"
 ह्या म्हणण्याला अर्थच राहिला नसता.
"ह्या जन्मी पुण्य केलंस तर पुढचा जन्म चांगला मिळेल"
 ह्याही म्हणण्याला अर्थ राहिला नसता.कारण पुण्यावर आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे पाप करण्यापासून दूर राहिले असते.त्यामुळे कदाचीत पापं कमी झाली असती.
"उद्याचं काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक?"
 असं कुणी म्हटलंच नसतं.कारण उद्याचं, परवाचं आणि सर्व पुढचं अगोदरच माहित असतं."
हे वामनचं म्हणणं ऐकल्यावर आज,काल आणि उद्या हे शब्द माझ्या मनात काहूर करू लागले.आणि शेवटी ही कविता सुचली.


कशाला उद्याची बात?

आज, कालचा उद्या असतो
आणि
आज, उद्याचा काल होतो
मग
उद्या जेव्हा आज होईल
आणि
आज त्याचा काल होईल
तेव्हा
त्या उद्याच्या उद्याला
आजचा उद्याच म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्या म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार आहे

म्हणून
"आता कशाला उद्याची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात"
ही कविता तिथल्या तिथे लिहून मी वामनला वाचून दाखवली.वामनला मतीतार्थ कळायला वेळ लागला नाही.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Friday, June 29, 2012

आई! थोर तुझे उपकार.





एकदा श्रीधर पानसरे आपल्या आईच्या वर्ष-श्राद्धासाठी अमेरिकेहून आला होता. मला आठवतं ज्यावेळी श्रीधर तरूण होता, त्या दिवसात अमेरिकेत जाण्याची तरूण मुलांत खूपच चूरस लागली होती.श्रीधरचे चुलत भाऊ बहिणी अमेरिकेत स्थाईक झाल्या होत्या.चार्टर्ड अंकौन्टची परिक्षा देऊन झाल्यावर अमेरिकेत जाऊन वॉलस्ट्रीटवर चांगला जॉब करण्याची श्रीधरची तीव्र इच्छा होती.कधी माझ्या घरी गप्पा मारायला आल्यावर बरेच वेळा मला हे तो बोलून दाखवायचा.मी म्हणायचो,
"जाशील रे तू कधी तरी.होप्स मात्र सोडू नकोस."
मला श्रीधर म्हणायचा,
"माझ्या बाबांचा मला अमेरिकेत जायला विरोध आहे.पण आई मात्र मला प्रोत्साहन देते.तिने आपले  सगळे दागिने विकून मला मदत करायचं एकदा बोलूनपण दाखवलं होतं."



श्रीधरच्या आईचं आणि बाबांचं कधी पटत नव्हतं.तसं पाहिलंत तर त्यांचा त्यावेळच्या युगातला प्रेमविवाह होता.
श्रीधर हा त्यांचा एकूलता मुलगा.त्याच्या जन्मानंतर त्यांचा संबंध विकोपाला गेला.श्रीधर आपल्या आजी-आजोबांकडे वाढला.तो वयात आल्यावर आपल्या आईवडीलांमधले बखेडे त्याला उघड दिसायचे.कंटाळला होता.अधुनमधून मला भेटल्यावर त्यांच्या कंपलेन्ट्स करायचा.



मी एकदा श्रीधरच्या आईकडे विषय काढला होता.तिचं श्रीधरवर खूपच प्रेम होतं.कुणा आईचं आपल्या मुलावर प्रेम नसणार?तिला वाटायचं इकडच्या कटकटीतून सुटून तो परदेशी गेल्यावर सुखी होईल.मला एकदा म्हणाली,
"श्रीधरसाठी मी खूप खस्ता काढला आहे.श्रीधरचं संगोपन नीट व्हावं म्हणून मला खूप दुःखं सोसावी लागली.मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूतीतून त्याची सुटका व्हावी म्हणून मी त्याच्याबद्दल नेहमीच विचारात असायची."



त्या भेटीनंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.श्रीधर अमेरिकेत स्थाईक झाला.एका श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटूंबातल्या मुलीशी त्याचं लग्न होऊन एक मुलगीपण झाली होती.त्याची सासू त्याच्या आईची मैत्रीण होती. श्रीधर एकदा आईला अमेरिकेत घेऊनही गेला होता.जास्त दिवस ती राहिली नाही. 

श्रीधरच्या बाबांच्या आजाराची बातमी ऐकून ती परत आली होती.काही दिवस सोडल्यानंतर श्रीधरचे आणि त्याच्या आईचे संबंध कमी झाले होते.
अधुनमधून तो आपल्या आईला फोन करायचा.बाबांशी त्याचा संवाद तुटला होता.नंतर बाबा गेल्याच्या वार्तेनंतर एकदा तो आपल्या आईला भेटून गेला होता.त्याच्या आईची आर्थीक परिस्थिती बरी होती.तिला पेन्शन मिळायची आणि त्यात तिचं भागायचं.



नंतर तिची प्रक्रुती बरीच खालावली.मी तिला कधीतरी घरी भेटून यायचो.मला म्हणाली होती,
"श्रीधरने माझ्यासाठी एक बाई ठेवली आहे.घरीच रहा म्हणून सांगतो.वृद्धाश्रमात जाऊ नये असं त्याला वाटतं.आठवड्यातून एकदा फोन करून माझी जाग घेतो."



मी कधीही तिला भेटायला गेलो की श्रीधरच्या लहानपणापासूनच्या गोष्टी रंगवून मला सांगायची.श्रीधरची आई एका विख्यात शिक्षण तज्ञाची मुलगी. आणि स्वतः एका शाळेतून व्हाईस प्रिन्सिपल होऊन निवृत्त झाली.तिचा स्वभाव गोष्टीवेल्हाळ असल्याने ती गोष्टी वर्णनकरून सांगायची ते ऐकायला मला मजा यायची.मी घरी गेल्यावर तिने सांगीतलेलं सर्व काही एका वहित लिहून ठेवायचो.हे संदर्भ वापरून एखादी कविता लिहायला मजा येईल असं वाटून मी हे करायचो.कविता लिहिण्याचा प्रयत्नही करायचो.



ती गेली त्यानंतर मी ती सर्व कडवी त्याच वहित एकत्र करून लिहिली.आणि तशीच ती वही माझ्या पुस्तकाच्या संग्रहात मी ठेवून दिली होती.आई गेल्यानंतर बरीच वर्ष श्रीधर काही इकडे आला नाही.अलीकडेच तो आपल्या मुलीला आणि पत्नीला घेऊन परत थोड्या दिवसाठी आला होता.श्रीधरची मुलगी आता सोळा वर्षाची झाली होती.मला तरी ती तिच्या आजीसारखी झालेली वाटली.



परत जाण्यापू्र्वी श्रीधर मला भेटायला आला होता.त्याच्या आईच्या आठवणी निघाल्या होत्या.चटकन मला त्या वहीची आठवण आली.मी ती वही श्रीधरकडे वाचायला म्हणून दिली.घरी गेल्यावर वाचीन असं सांगून ती वही श्रीधर घरी घेऊन गेला.
कविता अशी होती.


पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली

मातेने व्यथा कौतुके सांगीतली
ऐकून ती मी कविता लिहिली


तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी


वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी


शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी


गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले


शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला


मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला


शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी


सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने


म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”


नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी


एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली


परत जाण्यापूर्वी श्रीधर ती वही आपण घेऊन जाऊ का? म्हणून विचारायला आला होता.मी त्याला ती वही दिली.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, June 25, 2012

प्रीति कशी करावी एकमेकावरी




"स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ति
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली"


आज मस्तच हवा पडली आहे.मस्त म्हणण्य़ाचं कारण काल तोबा उकडत होतं.ह्या दिवसातलं हे हवेचं लहरी वागणं माझ्यासारख्यालाही लहरी बनवतं.बाहेर फिरायला जाण्याची मलाही लहर आली.आणि ती माझी लहर फायद्याची ठरली.


त्याचं असं झालं,मी नेहमीप्रमाणे तळ्यावर फिरायला जायचं सोडून द्राक्षाच्या मळ्यात हिंडावं असं ठरवून तिकडे जाण्यासाठी गाडी काढली.आमच्या घरापासून मळा तसा बराच लांब आहे.पण ह्या दिवसात द्राक्षांच्या वेलीवरून सुटून लोंबत रहाणारे द्राक्षाचे घोस बघायला मजा येते.तरी अजून चार ते पाच महिने लागतील ज्यावेळी द्राक्षं पूर्ण पिकून मळेवाले ते घोस खुडायला देतील आणि जमवू तेव्हडे द्राक्षाचे घोस अगदी कमी किंमतीत घरी घेऊन जायला मिळतील.


वाटेत मात्र माझा विचार बदलला.मळा येण्यापूर्वी एका गडद रानातून रस्ता जातो.अजून संध्याकाळ व्हायला वेळ होता.ह्या दिवसात सूर्य जरा वेळानेच अस्ताला जातो. पण पक्षांना मात्र संध्याकाळ होत येत आहे हे कळतं.
रानात एका मोठ्या निलगीरीच्या झाडाखाली मी माझी गाडी पार्क करून पक्षांचा होत असलेला किलीबीलाट ऐकत होतो.मधून एखादा पक्षी आपल्या प्रेयसीला साद घालतोय असं त्याच्या गाण्यावरून वाटायचं.निरनीराळ्या पक्षांची गाणी ऐकायला मजा येत होती.


गम्मत पहा,कवी गीत लिहितो मग संगीतकार त्यावर चाल लावतो आणि त्यानंतर एखादी गायिका किंवा एखादा गायक ते गाणं आपल्या गोड आवाजातून गातात.किती कष्ट पडत असतील हे सर्व करायला?.


कवन,म्हणजे सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना आणि काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे.


कोकीळेसारखा एखादा पक्षी गुंजन  - कर्णमधुर आवाज करण्याची क्रिया- करीत असतो.त्यालाही किती कष्ट होत असतील असं हे गुंजन करायला?

आणि आता तर हे अनेक पक्षी आपआपल्या लहरीनुसार गुंजन करीत आहेत. हा काय चत्मकार आहे?ही समस्या माझ्या मनात सदैव येत असते. आणि गम्मत म्हणजे त्या पक्षांचं शब्दावीना निर्मीलेलं गीत कोण लिहीत असेल बरं.?असाही एक विचार मनात आला.मला कविता सुचली आणि तिथेच गाडीच्या मागच्या ट्रंकवर बसून ती कागदावर लिहून काढावी असं वाटू लागलं.मी काही पंक्ति लिहिण्याचा प्रयत्न केला.नंतर द्राक्षाच्या मळ्याला भेट देऊन घरी आलो.जेवण वगैरे झाल्यावर बिछान्यावर पहूडलो.आणि गीताच्या शेवटच्या पंक्ति झोपण्यापूर्वी आठवल्या त्या तशाच लिहून काढल्या.




गुंजन करण्या कष्ट का विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण असे विहंगाचा कवी
सूर जुळवूनी कोण त्या गाण्या लावी
अपुले कवन सहजपणे विहंग गाई


प्रीति कशी करावी एकमेकावरी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजपणे व्हावी
हीच कल्पना कवनातूनी मिळावी



विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे निघालो होतो द्राक्षाच्या मळयात जायला आणि वेळ घालवला रानात.का तर त्या चार ओळीच्या कवितेची निर्मिती माझ्याकडून व्हायची होती.
एकदा मला प्रो.देसाई म्हणाल्याचं आठवतं.
"कविता लिहावी म्हणून लिहिली जात नाही.कविता होते"
आता पुन्हा तळ्यावर भेटलो की भाऊसाहेबांना ही कविता वाचून दाखवणार.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 20, 2012

स्त्रीचा अवमान टाळणार नाही.




सध्या ऊन्हाळ्याला जोर आला आहे.फारच गरम होतं.नव्वद आणि वरचं फॅरेनेट तपमान जीवाची कालवाकालव करतं.पण सूर्य एकदाचा खाली गेला की मग मात्र मस्तच वाटतं.तशात एखादी गार वार्‍याची झुळूक येऊन गेली तर विचारूच नका.


प्रो.देसाय़ाना सकाळीच फोन करून विचारलं याल का तळ्यावर?.कबूल झाले आणि आम्ही संध्याकाळी तळ्यावर भेटलो.
"माझा एक जवळचा स्नेही गेला.सुटला बिचारा वय खूप झालं होतं."
भेटल्याभेटल्या भाऊसाहेब मला म्हणाले.
"गुणाजी पवार.एका फार्मसीत कामाला होता.नाकासमोर बघून चालणारा माणूस.कुणाच्या आ्ध्यात ना मध्यात पण भारीच तत्वनीष्ट होता.पाच मुलं होती.दोन मुलगे तीन मुली.पण बायको धरून कुणाशीच घरी पटायचं नाही."
मला भाऊसाहेबांनी पुढे सांगून टाकलं.
"नाव गुणाजी पण अंगात चांगले गुण नव्हते असं म्हणायला हरकत नाही."
मी म्हणालो.


"अहो काय सांगू?मोठा मुलगा जेव्हा अमेरिकीत जायला निघाला त्यावेळी तो मला भेटायला आला होता.मला म्हणाला,
"बाबांची कसली नुकसानी होणार आहे मी जाऊन?महिन्याचा माझा पगार त्यांच्या हातात पडणार नाही एव्हडंच.नाहिपेक्षा माझ्याबद्दल त्यांना तेव्हडंच वाटतं."


मला त्या मुलाची कीव आली.मी त्याला म्हणालो,
"हे ही दिवस जातील. तू काळजी करू नकोस."
बिचार्‍याला तेव्हडाच माझ्याकडून दिलासा मिळाला असं वाटलं.
प्रो.देसाई खजील चेहरा करून मला म्हणाले.


"गुणाजीचे रोज घरात वाद व्हायचे.कुणाचीही बाजू ऐकायला ते तयार नसायचे.आपलं तेच खरं.हळू हळू मुलं स्वतःच्या पायावर जगायला शिकल्याबरोबर काही तरी निमित्त काढून त्यांच्या पासून दूर जायला लागली. मोठी मुलगी भावाची मद्त घेऊन अमेरिकेत गेली.तिकडेच तिने आपलं लग्न केलं.भावानेही आपलंही तसंच तिकडे लग्न केलं.एका मुलीने गुजराथ्याशी लग्न करून बडोद्याला रहायला गेली.गुणाजीने धाकट्या मुलीचं लग्न आपल्या पसंतीने एका व्यापार्‍याच्या मुलाशी करून दिलं. ती पण ऑस्ट्रेलियात नवर्‍याबरोबर रहायला गेली.आणखी सगळ्यात धाकटा मुलगा बहिणीच्या मदतीने ऑस्ट्रेलियात स्थाईक झाला.
शेवटी गुणाजी आणि त्याची बायको होत्या त्या जागेत स्थाईक झाली."


हा सगळा गुणाजी पवारांचा इतिहास भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकून मला दिलीप प्रभावळकरांची "श्री.गंगाधर टिपरे" ह्या टीव्ही सिर्यलची आठवण आली.त्यात एक प्रसंग असा होता की टिपरे आजोबा आपल्या मुलासह आणि नातवासह एका वयोवृद्ध गृहास्थाच्या अंतीम यात्रेला त्याच्या घरी गेले असताना त्या गृहस्थाच्या नातवासमोर टिपरे औपचारीक होऊन त्याच्या आजोबांचे गुण गात होते.पण त्या गृहस्थाचा नातुच त्यांना म्हणाला,
"आमचे अजोबा गेल्याने घरात कुणालाही वाईट वाटलं नाही.शेवट पर्यंत सर्वांना भांडावून सोडलं होतं.हट्टीपणा मुळीच गेला नव्हता."
मी हे भाऊसाहेबांना सांगीतल्यावर त्यांना अचंबा वाटला.


"म्हणजे, आपलं तत्व न सोडणारे असे बरेच लोक जगात असतात तर"
घरी जाण्यासाठी उठता उठता प्रो.देसाई मला म्हणाले.

मीसुद्धा घरी जाताना "तत्व माझे सोडणार नाही" ही ओळ माझ्या मनात गुणगुणायला लागलो.आणि झालं एक कविता सुचली.घरी गेल्यावर ती एका कागदावर लिहून काढली आणि नंतर जेवायला बसलो.



तत्व माझे सोडणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 दारु पिऊनही झिंगणार नाही
 झोप घेऊनही पेंगणार नाही
 कसल्या कोणत्या आल्या भावना
 शिस्ती शिवाय मला रहावेना


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 दुःखाची नाही कसली खंत
 परिणामाची नाही मुळीच भ्रांत
 पुरूषगीरी सोडणार नाही
 स्त्रीचा अवमान टाळणार नाही


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 करून करून भागले
 देवपूजेला लागले
 नैवेद्या शिवाय पूजा होणार नाही
 पुजेपूर्वी प्रसाद मागुनही देणार नाही


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 वय झाले तरी आढ्य रहाणार
 आपले तेच खरे म्हणणार
 लाकडे स्मशानात गेली तरी
 वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही


दुसर्‍या दिवशी प्रो.देसायांच्या हातात हा कवितेचा कागद मी दिला.कविता वाचून झाल्यावर ते मला म्हणाले,
"गेलेल्या माणसाच्या मागे त्याच्याबद्दल वाईट काही बोलू नये असं म्हणतात.कारण त्याला आपली बाजू मांडता येत नाही.पण कवितेतून भावना तरी प्रकट करता येतात."




  श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
 shrikrishnas@gmail.com

Saturday, June 16, 2012

अविच्या बाबांची खंत



अरगेड्यांचा छोटा अविनाश,त्याच्या बाल्कनीत उभा होता.खाली रस्त्यावरून त्याने त्याच्या बाबांना येताना पाहिलं.चटकन त्याच्या लक्षात आलं की आज फादर्स डे आहे.आपल्या बाबांना फुलं देऊन त्यांना हॅपी फादर्स डे म्हणावं असं मनात आणून तो मागच्या बागेतून फुलं काढून त्या फुलांचा गुच्छ बनवून बाबांना सरप्राईझ करावं असं मनात आणून खाली जायला निघाला.
नंतर काय रामायण झालं ते मला एकदा अरगडे सांगत होते.मला म्हणाले,
"आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही."
असं सांगून फादर्स डे दिवशी आपल्या मुलाबरोबर झालेला प्रकार त्यांनी मला वर्णन करून सांगीतला.ते आठवून मला कविता सुचली.आज फादर्स डे असल्याने ती कविता आज आठवली,

वाटेत एका अनोळख्याला
 जवळ जवळ आपटलो
 “माफ करा”असे म्हणून मी
 त्याच्या पासून सटकलो


“करा माफ”मला पण
 म्हणत थांबला तो क्षणभर
 औचित्याच्या वागण्याने
 सुखावलो आम्ही दोघे वरवर


आपल्या घरी
 स्थिती  असते निराळी
 लहान थोरासी चटकन
 आपण वागतो फटकून


झाली त्यादिवशी एक गम्मत
 होतो कामात मी दंग
 चिमुकल्या माझ्या मुलाने
 केला माझ्या एकाग्रतेचा भंग


“हो बाजूला”
 म्हणालो मी वैतागून
 गेला तो निघून
 हिरमुसला होऊन
 रात्री पडलो
 असता बिछान्यात
 आला विचार
 माझ्या मनात
 औचित्याच्या भारा खाली
 अमुची रदबदली झाली
 वागलो चांगले अनोळख्याशी
 अशी समजूत करून
 मी घेतली मनाशी


पाहता फुलांच्या पाकळ्या
 पडल्या होत्या दाराशी
 लाल, पिवळी अन निळी
 खुडली होती
 फूले त्याने सकाळी
 आला होता घेऊन ती हातात
 टाकण्या मला आश्चर्यात
 आठवून तो प्रसंग पून्हा
 वाटे मजकडून झाला गून्हा
 जाऊन त्याच्या बिछान्याशी
 जवळ घेतले मी त्या उराशी


पुसता  फुलांच्या पाकळ्या विषयी
 हसला तो मला बिलगूनी
 बोले तो मज भारावूनी
 “घेऊनी ती सर्व फूले
 आलो होतो मी तुमच्याकडे
 कारण आजच आहे “फादर्स डे”


मागूनी त्याची माफी
 पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
 चूक केली मी सकाळी तुझ्याशी


पुसून अश्रू माझे त्याने
 हसून बोलला तो पून्हा एकदा
 करतो प्रेम मी
 तुमच्यावर सदासर्वदा


रहावे ना मला ते ऐकून
 म्हणालो मी ही भारावून


आवडशी तू मला अन
 मुकलो मी तुझ्या
 आश्चर्याच्या आनंदाला
 दिसलास सुंदर तू फुलांमुळे
 होते सुंदर तुझे ते फूल निळे



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 12, 2012

मागे वळून मी पाहिले





"माझेच मरण मला पाहून हंसले."


त्या दिवशी एक गम्मतच झाली.जवळकरांच्या जीममधे मी गेलो होतो.बरीच तरूण मंडळी एकाग्र चित्ताने व्यायाम करताना दिसली.
जवळकरानी मला मुद्दामच त्यांच्या जीममधे बोलावलं होतं.
मागे मी जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा सुधृढ प्रकृती विषयी आमची चर्चा चालली होती.ते मला म्हणाले की,अलीकडे तरूणाना आपल्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल बरीच दिलचस्पी वाढली आहे.हवं तर तुम्ही माझ्या जीममधे येऊन बघा.किती तन्मयतेने लोक व्यायाम करीत असताना तुम्हाला दिसतील.
जवळकरांचे ते शब्द मला जास्त परिणामकारक वाटले,
ते म्हणाले होते,
"जगणं आणि मरणं हे निसर्गाच्या नियमात बसत असतं.पण आयुमर्यादा वाढवायची असेल तर मात्र आपल्या जीवनाची आपणच काळजी घ्यायला हवी.
खरोखरच ते दृश्य बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.आमच्या शाळेत मल्लखांबावर व्यायाम घेण्याची सोय होती.ह्या आधूनीक जीममधली बरीचशी उपकरणं पाहिल्यानंतर एका मल्लखांबामधे किती गोष्टी सामवल्या आहेत ते माझ्या लक्षात आलं.
त्यानंतर मला एक कविता सुचली,

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय  कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता


असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून त्याला गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील


खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम


जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य



 श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 5, 2012

देवबाप्पाचा चिमुकला तलाव.



"हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल"


एखादा, कोणत्या विषायवर अथवा कोणत्या गोष्टीवर भावनाप्रधान होईल हे सांगणं जरा कठीणच आहे.हेमंत माहात्म्याच्या नातवाबद्दल असंच काहिसं झालं.

त्याचं असं झालं,हेमंत माहात्मे काल मला बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
"डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरीरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्‍यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते दुखः प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं."
असं सद्गदीत होऊन हेमंत आपल्या नातवाला वाटणार्‍या चिंतेबद्दल मला सांगत होता.


"रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी निकामी किंवा कुचकामी पिशवी असून ती फेकून देण्यालायक असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.अर्थात पेशंटला वाचवण्यासाठी तो निर्णय त्या डॉक्टरना घ्यावा लागतो हे उघडच आहे म्हणा.
पण ज्या माऊलीचा तो अवयव, ज्यातून तिने निसर्ग उत्पति केलेली असते त्या अवयवाबद्दलच्या तिच्या भावना तिलाच ठाऊक असणार."
असं नातू त्याच्या आजोबांना म्हणाला.


आणि नंतर आपल्या आजोबांना पुढे म्हणाला,
"मी सुद्धा आईच्या शरीराचा एक हिस्सा होतो.आईच्या उदरात नऊ महिने राहून,तिच्या कष्टाला जो मी कारण झालो,त्याबद्दल मलाही अशावेळी विशेष वाटणं स्वाभाविक आहे.पण काय करणार? निसर्गाचे नियम पाळावेच लागतात ना? एखादी गोष्ट कुचकामी झाली,निकामी झाली,हानीदायक झाली,की निसर्गच तिची विल्हेवाट लावतो.पण हे आईला समजावून कसं सांगायचं.?"
डोळ्यातून ओघळणार अश्रू पुशीत तो आपल्या आजोबांना सांगत होता.


"माझा नातू मला नेहमीच लहान वाटाणार.पण ह्या वयातही तो पोक्त विचाराचा आहे.आणि त्याच्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम आहे."
असं म्हणत,
"डॉक्टरांची चूक नाही म्हणा.त्यांच्या संवयीचा परिणाम."
असं आपलं मत देणार्‍या हेमूकडून हे ऐकून त्यांच्या नातवाच्या मनात आलेली भावना कवितेतून जास्त परिणामकारक प्रकट करता येईल असा विचार करून मला ही कविता सुचली होती.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरीर
अमुच्या चिमुकल्या गादीवर
पोषण केलेस अमुचे किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे
सांगू कसे मी तुला ते

रीत असे निसर्गाचीही
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावे तो झडकर
म्हणूनच,
द्या टाकून झाला वापर
असेच म्हणत असेल तो डॉक्टर.


माझी ही कविता मी हेमंतला त्याच्या नातवासमोर वाचून दाखवली तेव्हा दोघानीही मला मिठीत घेतलं.
"माझ्या आईची सर्जरी यशस्वी झाल्यानंतर आणि ती पुर्ण बरी झाल्यावर मी तिला ही तुमची कविता वाचून दाखवणार असं मी म्हणतो."
असं त्याने म्हटल्यावर,माझ्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही की,पुढे येणारी प्रत्येक पिढी किती प्रगल्भ विचाराची होत असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 1, 2012

होकाल( नवरी)




मला वाटतं विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असावी. कोकणातून मुंबईला नोकरीसाठी जाणार्‍या व्यक्तिबद्दल कोकणातल्या इतराना त्यावेळी थोडा कमीपणाच वाटायचा.
स्वतःची शेती असून,त्यात चांगली कमाई होत असताना मुंबईत जाऊन गिरणीत चाकरमान्याचं काम करण्यात काय विशेष आहे? उलट ह्याला दळभद्रीपणाच म्हणावा लागेल अशी समजुतकरून घेऊन कोकणी माणूस त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणे अवहेलनाच करायचा.
जग बदलत चाललं आहे.बदल होत रहावा.त्यातून उर्जितावस्था होत असते हे मानायला त्यावेळचे ते लोक तयार नसायचे.

"सावंताचो बाबलो म्हुम्हंयेक जातासा म्हणे.मेल्याक कसली अवदसा सुचली.हंय़ वाडवडीलांची एव्हडी मिळकत आसा.थंय म्हुम्ह्यंत जावून कबुतरांच्या घुराड्यासारख्या चाळी्तल्या खोलीत दिवस काढतलो.फाट-फाआटे चपाती-भाजीचो डबो घेवून गिरणीत चाकरमानी म्हणून कामावर जातलो.काय म्हणे तर महिन्या अखेर नकद पैसो हातात मिळता.
ह्याका अवलक्षण म्हणुचा नाय तर काय?"

अशी सावंताच्या बाबल्याबद्दल चर्चा, इतर लोक,पूर्वसाच्या किंवा रामेश्वराच्या, देवळाच्या आवारात किंवा वडाच्या चौथुर्‍यावर बसून, शिळोपाच्या गप्पातला विषय म्हणून चर्वीचरण करण्यात मश्गुल व्ह्यायचे.

त्यातलाच एक विषय म्हणून कधी कधी,
"कामतांच्या इंदूक मुंबईत दिला म्हणे.नाबरांचो झील दादरच्या पोस्टात कामाक आसा.हल्लीच तो इंदूक बघून गेलो.पसंत केल्यान.येत्या मे महिन्यात इंदू बोटीन मुंबईक जाताला."
अशीही इंदूची चर्चा व्ह्यायची.


पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
बाई गं!,पडावातून आगबोटीत चढताना जरा जपून चढ.आणि त्यानंतर तिचा बाप तिला मुंबईची तिच्या दृष्टीने लागणारी आवश्यक ती माहिती-उपदेश-द्यायचा.

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन
घो तुझो र्‍हवतां शिमीटाच्या चाळीत
तेका गो कसला घोपान?
असं एक मालवणीत गीत लिहिलं गेलं.
म्हणजेच,
बाळे,पडावातून आगबोटीत बसताना जरा जपून बस.तुझा नवरा वरळीला सिमेंटच्या चाळीत रहातो.वगैरे,वगैरे..)
पण आता वीसाव्या शकताच्या उत्तरार्धात आणि एकवीसाव्या शतकात हीच होकाल मुंबईहून अमेरिकेत जायला निघते.कारण जग सुधारत चाललं आहे.बदल होत राहिला आहे.आणि तो झालाच पाहिजे.

तेव्हा मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल बोटीने प्रवास करण्याऐवजी, पडावातून आगबोटीत बसण्याऐवजी, मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर नव्या परिस्थिती काय म्हणेल,ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला "घो" पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


घो गेलो सकाळी की येतोलो रातच्यान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com