Sunday, October 11, 2009

विसरशील मला अखेर का रे?

उंच उंच गगनात नेऊनी मजला
पुन्हा धरतीवर फेकणार का रे?

विराजूनी तुझ्या हृदयामधे
विसरशील मला अखेर का रे?

आजच्या रात्री ह्याच समयी
गगनात चमकती चांदण्या हजारो

एक एक चांदणी उचकून गगानातून
उधळीन सार्‍या कुणाच्या नजरेवर

ही रंगीत स्वप्ने अपुली असता
रंगवूनी ती भंगणार का रे?

संगतीत तुझ्या राहून सखया
जाऊ अपुल्या लक्षाकडे

जर साथ तू देशील मजला
लक्ष चालून येईल अपुल्याकडे

निश्चिंत माझे मन असता सखया
धोका तू मजला देणार का रे?

ही रंगीत स्वप्ने अपुली असता
रंगवूनी ती भंगणार का रे?




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 9, 2009

“सखी शेजारणी तू हंसत रहा”

शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत. त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्‍या मजल्यावर राहत असल्याने आणिहे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं. ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायला मिळायचे.बरं वाटायचं. ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं. गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्‍या टोकाची व्यक्ती होती.

सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती. बरीच बोलकी पण होती.लग्न होऊन आता ती दुसरीकडे राहायला गेली.तिलाही तिन मुलं होती. नवरा पुन्हा अमेरिकेला काही दिवस कामासाठी गेल्याने ती थोडे दिवस माहेरी राहायला आली होती.मी त्यांच्याकडे गप्पा मारायला गेलो होतो.
हंसत हंसत माझं सगळ्यानी स्वागत केलं.अर्थात ते स्वाभाविक होतं.

गप्पा मारताना कसलातरी विषय निघाला.मी सुमनला म्हणालो,
“धंद्यात आणि राजकारणात एक उक्ति आहे, आणि त्यात सुचना आहे की पैसा कमवायचा असेल तर समजून घ्या की लोक जसे वागतात ते तसे का वागतात?.”
सुमन म्हणाली,
“हे असं म्हटलं तरी मला वाटतं,जीवनात आणखी अनेक महत्वाच्या वयक्तिक पसंती- जशा, मैत्री,प्रेम,लग्न,पेशा असल्या तरी हंसतमूख असण्यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट नसावी.”
“हे तू मला सांगू नको सुमन.दिवसाची सुरवात आणि शेवट तुमच्या घरी ह्याच गोष्टीनी होते हे काय मला माहित नाही काय?”
असं मी तिला म्हणाल्यावर हंसत हंस्त सुमन म्हणाली,

“गप्पा,गोष्टी,गजाली आणि हंसणं-खिदळणं भरपूर असलेल्या कुटूंबात मी वाढले. रात्रीचं जेवण नेहमीच लांबलेलं असायचं,बडबडीचं असायचं आणि योग्य वेळी आदेशाचे हस्तक्षेप यायचे बाबांकडून,
“जेवा रे! आता”
माझा एक भाऊ रमेश,कुणाच्याही नकला करण्यात निपुण होता तर दुसरा शरद “गजाली” सांगण्यात श्रेष्टत्व दाखवायचा.मी मात्र त्यामानाने भोळीभाळी होते, त्यामुळे आनंदी आनंद वाढायचा.”
“पण लग्न झाल्यावर तुझं हेच वातावरण तुला नवर्‍याच्या घरी न्यायला मिळालं काय?” मी तिला विचारलं
“सांगते ऐका” असं म्हणून सुमन म्हणाली,
”अजीब गोष्ट अशी की काही काळ मी हंसण्या-खिदळण्याचा नाद थोडासा हरवून बसले.माझं लग्न एका गृहस्था बरोबर ठरलं होतं. त्यामुळे माझ्या वातावरणात थोडा बदल झाला.ते स्वाभावीक होतं.एकदा तो मला म्हणाला,
“ते हंसण्याचे दिवस आता गेले. परत येणं कठीण”
हे सांगितल्यावर मला ऐकून आश्चर्य वाटलं,मी म्हणालो,
“असं कसं तो म्हणाला?”

“खरं म्हणजे असं म्हणून तो त्या दिवसांची कदर करीत होता.पण माझ्या डोक्यात काय आलं की हे हंसणं खेळण्याचं वातावरण यापुढे वाढण्या ऐवजी कमीच होत जाणार.मी मनात म्हणाले की ह्याची ही हेव्यामुळे नवी अटकळ असेल.नंतर त्याच्याशी आणखी काही कारणामुळे लग्न ठरलं नाही हा वेगळा भाग झाला.”
असं सुमन माझ्या प्रश्नाला उत्तर देत बोलली.

मी म्हणालो,
“सुमन मग तुझ्या मनासारखा जोडीदार तू कसा काय मिळवलास?
तो पुर्वा अमेरिकेत राहायचा ना?असं मी ऐकलं होतं”
सुमन म्हणाली,
“होय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
“त्या नंतर,
”हा माझा जोडीदार व्हायला काहीच हरकत नाही”
असं म्हणून मी ज्याला पसंत केलं त्याची माझी पहिली भेट तो ज्यावेळी भारतात आला होता त्यावेळी माझ्या एका मैत्रीणीच्या घरी झाली.आणि ती सुद्धा आम्ही सर्व जेवत असताना.त्याने एक गमतीदार गोष्ट सांगितली.तो म्हणाला,

“मी अमेरिकेत असताना एकदा आमच्या मित्र मंडळी बरोबर आम्ही सहलीला गेलो होतो.ती सुद्धा समुद्राची सहल होती.ज्या होडीत आम्ही बसलो होतो आणि बरंच अंतर काटल्यावर आमच्या होडीच्या निशाणाचा वरचा भाग वार्‍याने अडकला गेला.कुणी तरी वर चढून तो गुरफटलेला भाग सोडवायला हवा होता. आम्ही होडीत अडकले गेलो. आम्हां चोघां पैकी माझ्या मित्राचा हात दुखावल्यामूळे त्याचा हात प्लास्टर मधे बांधला होता.त्याची बायको गरोदर होती.आणि दुसरा मित्र मुळातच लंगडा होता.राहाता राहिलो मी. पण मला उंचीवरचढण्याची मुळातच भिती होती.”
पुढे त्याची पुर्ण गोष्ट ऐकण्यापूर्वीच मनात मी त्याला माझा जोडीदार ठरवून गेले. जेवताना गंमतीदार गोष्ट सांगणारा मला हा नवरा म्हणून पसंत होता.ती नुसतीच गंमतीदार गोष्ट नव्हती तर त्यामधे तो स्वतःच्या त्रुटी,कमीपणा सांगायला आणि स्वतःचं हंसं करून घ्यायला सुद्धा कचरत नव्हता.
आता पंधरा वर्षा नंतर मी माझ्या नवर्‍याला गर्दी मधे सुद्धा त्याच्या सात मजली हंसण्याच्या स्टाईलवरून हूडकून काढू शकते. आमची मुलं सुद्धा जेवणाच्या टेबलावर जमल्यावर गंमतीदार गोष्टी सांगतात.आणि त्यातला माझा एक मुलगा नकला करण्यात निपुण आहे.एव्हडं नक्की की हे हंसणं- खिदळणं नुसतंच प्रेम जारी ठेवत नाही तर मैत्री आणि कुटूंब पण,आणि हा विपत्तीत सुद्धा मार्ग काढण्याचा नक्की आणि सोयीस्कर उपाय आहे.हसणं हे एक कामावरच्या सदाचाराचं निर्देशक आहे.कदाचीत ह्यामुळेच कामाचा बोजा सहजगत्या उतरता येत असावा.ज्या ठिकाणी हंसण्यात वाटेकरी होतात त्या ठिकाणी सख्य, ईमानदारी,प्रामाणिकपणा,आणि आत्म बोध-ह्या सर्व चांगल्या गोष्टी जीवन उभारायला उपयोगी पडतात.म्हणून मी माझ्या मुलांना नेहमी म्हणते,
“तुमच्या आणि इतरांच्या हंसण्या-खिदळण्यात भाग घ्या आणि ऐका.ज्यावर तुम्ही प्रेम करता-लोक,स्थान आणि तुमचा पेशा ह्या गोष्टींच्या जवळ तुम्हाला नेण्याच्या प्रयत्नात ही संवय उपयोगी होईल.”
“म्हणूनच मी तुमच्या घरी वरचेवर येत असतो.मी असं म्हटलं म्हणून हंसू मात्र नकोस” असं मी सुमनला म्हणाल्यावर,
“ते कसं शक्य आहे?” असं म्हणत सुमन जोरात हंसली.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 6, 2009

आज दिसेना द्रव ही नयनी

(अनुवादीत… खाली हाथ श्याम आयी है)

अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसे ना कुणी एखादा
अशीच परतूनी जाईल बहूदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

आज दिसले नाही अश्रु
आज दिसेना द्रव ही नयनी
आज ही अशीच रिक्त रजनी
अशीच रिक्त जाईल बहुदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

अंधारलेली ही रात्र कुणी
प्राप्त होऊनी दूर करेना
आज दूरावा न झाल्याने
उद्या फिरूनी ती येईल ना
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikishnas@gmail.com

Sunday, October 4, 2009

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

“फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला.”

मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे.
तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.माझे वडील त्यावेळी नौसैन्यात असल्याने प्रत्येक वेळी बंदराजवळ आलेल्या लहान सहान जहाजावर अथवा बोटीवर जाण्याची मला संधी मिळायची.पश्चिमेकडून रेडीचा किनारा आणि दक्षिणेकडून गोव्याला जाण्याच्या क्षितीजाची सीमा मी बंदराजवळ असलेल्या लाईट- हाऊसमधून पहात आलो आहे. किनार्‍यावरच्या लहान लहान होड्यामधे बसून, येणार्‍या मोठ्या लाटांवर हेलकावे घेण्याचा नाद मी मनमुराद उपभोगला आहे.कधी कधी माझ्या इतर मित्रांबरोबर फेसाळलेल्या लाटांवर आरूढ होऊन किनार्‍यावर सरपटत येण्याचा खेळ मी अनेक वेळा खेळलो आहे.बरेच वेळा माझ्या त्या वयात मला भासणारी मोठाली लाट माझ्या होडी सकट मला वर ऊचलून गरगर फिरवून पाण्याच्या फेसात फेकून देताना येणारी मजा मला कधीच विसरता येणार नाही.आणि त्या फेसाळलेल्या पाण्याच्या वेगात किनार्‍याकडे जायला आतूरलेलं ते लाटेचं पाणी मला एखाद्या बंदूकीतून सुटलेल्या गोळी सारखं वाळूत फेकून द्यायचं.आज माझ्या ह्या वयावरही ते दृष्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय.मला कधी कधी वाटतं,माझ्या मनातले जेव्हा हे असले अविस्मरणीय क्षण विसरण्यात गेले तर तो एक माझ्या आयुष्यातला
दुःखद टर्नींग-पॉइंट होईल.
लहानपणी माझ्या पायावर आलेल्या एक्झीम्याला समुद्राचं खारंट पाणी आणि किनार्‍यावरचा भरपूर सूर्यप्रकाश बरं करण्यात उपयुक्त ठरला.
तुम्ही जर समुद्राला भेट दिलीत तर कदाचीत समुद्र तुमचे गुढघे कधीच ओले करणार नाही.वाळुतून चालणं आणि पाऊलभर फेसाळलेल्या पाण्यातून पाणी उडवत चालणं ह्यातच तुमचा सहभाग मजेशीर होऊ शकतो.ज्याचा त्याचा सहभाग ज्याला जसं वाटेल तसा असावा.जीवनात प्रत्येकाला निदान एकदातरी समुद्राला भेट देण्याची जरूरी आहे असं मला वाटतं.
मला आठवतं माझा एक मित्र होता.आम्ही त्याला बबन म्हणायचो.तो समुद्राच्या इतका जवळ रहायचा तरीपण त्याने एकदाही समुद्रावर येऊन वाळूत चालून आणि पाण्यात पाय देऊन मजा करण्याचा प्रयत्न केला नाही ह्याचं मला राहून राहून नवल वाटायचं.आणि एकदा त्याने प्रयत्न केला तो पहाताना मला ते दृष्य रोमांचकारी वाटलं.
नेहमी प्रमाणे मी एकदा कुंद सकाळी पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात बुचकळून पुढे जाण्यासाठी तयार होतो न होतो तो मी बबनला पाहिलं.एक रंगीत शॉर्ट घालून दोन हाताची क्रॉस घडी करून हाताचे तळवे खांद्यावर टाकून फुटलेल्या लाटेचे तुषार अंगावर उडाल्यानंतर अंगावर शहारे येणार्‍या गंमतीचा तो अनुभव घेत होता.मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो,
“आपण दोघं पोहूया,तू चल माझ्या बरोबर”
गावातल्या विहीरीत पोहायची संवय असल्याने बबनला समुद्रात पोहायला तितकसं कठीण जात नव्हतं.आम्ही समुद्राची लाट फुटण्यापूर्वी लाटेपर्यंत पोहत जात होतो.आणि लाट फुटता फुटता तिच्यावर आमच्या पोटावर (उपडी) झोपून त्या धमाकेदार लाटेवरच्या भ्रमणाची मजा लुटीत होतो.अशा एक दोन अनेक लाटांवर आरूढ होत होतो. हंसता हंसता कधी कधी बबनची शॉर्ट त्याच्या गुडघ्यापर्यंत खाली उतरायची,आणि किनार्‍यावर पोहचल्यावर ओली वाळू काना, नाका, तोंडात आणि डोळ्यात जायची.पहिल्याच खेपेला मला आठवतं,असं झाल्यावर त्याने खार्‍या पाण्यात लघुशंकाच केली.जणू तो आपल्या जीवनातल्या वर्जित निग्रहापासून-समुद्रावर न येण्याच्या निग्रहापासून-मनमोकळा झाला होता.
मला वाटतं बबनला समुद्र आता आशेचे किरण दाखवीत होता. त्यानंतर काही दिवसानी त्याचा नी माझा संपर्क तुटला.तो डॉक्टर झाला की इंजिनीयर हे मला ठाऊक नाही.फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 2, 2009

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली.
मी वैद्यांना म्हणालो,
“प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं स्वतःला खास समजतात. ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?”
माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले,

“कोणी काही खास नसतो.उदाहरण म्हणून, रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.एखादा स्वतःला अगदी आदर्श समजणारा सुद्धा काही खास नसतो.पण कृपाकरून माझ्या म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नका.कुणीही दोषहीन नसतो,किंवा कुणाला स्वतःची खास शैली नसते किंवा कुणाला काही प्रतिभा नसते अशातला भाग नाही. अशा म्हणण्यावर माझा मुळीच विश्वास नाही.मला जरा विस्ताराने सांगू द्या.हा माझा प्रतिसाद त्या लोकांना उद्देशून आहे की जे,
“तुम्हाला काही कळत नाही”
असं म्हणून स्वतःला अलिप्त ठेवत असतात. कदाचीत असं म्हणणार्‍यापैकी तुम्ही ही असाल कबुल करा.कबूल करतो, मीही पण असेन.पण खरं सांगायचं तर प्रत्येकाला हे सगळं कळत असतं.”
हे ऐकून मी वैद्यांना म्हणालो,
“जरा विस्ताराने सांगितलंत तर बरं होईल.”
मला म्हणाले,
“असं बघा,एका स्थरावर प्रत्येकाला मृत्यु येणार,कुणाचं प्रेमभंग होणार,कुणाला जीवनात अपयश येणार हे माहित असतं कळतही असतं.प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला येत असणार,कुणी कधी चकित होऊन आनंदी होत असणार, अचानक जवळच्याची भेट होऊन कधी कुणी प्रसन्नही होत असणार. पण ह्या बाबी सामान्यपणे प्रस्थापित झालेल्या असतात.”
पुढे जाऊन मी म्हणालो,
“प्रत्येकाला कर्ज म्हणजे काय,भयभीती होणं म्हणजे काय आणि आजार म्हणजे काय असतो हे माहित असतं कळत असतं. व्यसनी कुणाला म्हणावं,कुरकुर करणारी सासू कशी असते हे पण प्रत्येकाला माहित असतं”
पण प्रश्न असा आहे वैद्य साहेब मग पुढे काय?”

वैद्य म्हणाले,
“समस्या अशी आहे की जे कोणी स्वतःला खास समजत असतात ते प्रत्येकातल्या ह्या सर्वसामान्य गोष्टी समजून घ्यायला अपयशी होतात.”
एव्हड्यात आम्ही तळ्यावर केव्हा आलो ते कळलंच नाही.एक चांगला बाक बघून त्यावर बसलो.आणि प्रि.वैद्य पुढे सांगू लागले,
“बसमधे तुमच्या समोर बसलेला तो अस्थव्यस्थ कपडे घातलेला माणूस कदाचीत प्रेमभंग झाल्याने काळजीत असेल.तुमच्या समोरच्या घरातलं चारजणांचं वरवर अगदी पर्फेक्ट आहे असं तुम्हाला वाटणारं कुटूंब, पण त्या कुटूंबातले आईवडील मुलांचं संगोपन करण्यात ह्या सदा बदलणार्‍या समाजात मेटाकुटीला येत असतील.तुम्हाला ही कदाचीत अशाच प्रकारच्या चिंता असण्याचा संभव आहे”
अजून माझ्या प्रश्नाला उत्तर न मिळाल्याने मी वैद्यांना परत विचारलं,
“मग पुढे काय”?
“सागतो,सांगतो तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आहे.”
असं म्हणत वैद्य पुढे म्हणाले,
ह्यातून एकमेकाची सहायता करण्याची वृत्ती आपण आणूं शकतो. या विविधतापूर्ण समाजातल्या उणीवां ज्या समानतेचा वाटेकरी होण्यास आणि भेदभावांना सामावून घेण्यात अडथळे आणतात त्या उणीवामधून निर्माण झालेली पोकळी भरायला आपण सुरवात करू शकतो..ह्यावरून एकमेकाशी संबंध प्रस्थापित कसे करायचे हे तुम्हाला माहित होऊ शकतं.”
हे ऐकून माझ्या मनात एक विचार आला.मी वैद्यांना म्हणालो,
“वैद्यसाहेब,हे तुमचं सर्व ऐकून माझ्या मनात एक प्रस्ताव सुचवावा असं आलं आहे.”
उठता उठता वैद्य म्हणाले,
“सांगा तुमचा प्रस्ताव.काळोख झाला आहे.घरी जाता जाता एकूया.”

“मला वाटतं,आकांक्षा ठेवून जीवन जगावं,लक्ष देऊन ऐकावं,उद्देश ठेवून शिकावं आणि हृदयात दयाळूपण विकसित करावा. पूर्वानुमान करून आणि संपर्क न ठेवून हे साध्य होणार नाही.बसमधल्या किंवा दुकानातल्या एखाद्या अनोळख्याशी बोलायला आपण संकोच करू नये.” असं मी सांगितल्यावर प्रि.वैद्य म्हणाले,

“तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगितलं.तुमच्या म्हणण्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि प्रयत्न करण्याची हिम्मत करावी.”



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 30, 2009

जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र

(अनुवादीत. दो नैनों में आंसू भरे है..)

अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र

स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी
अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र

मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत
जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र

कशी सामावू नीज माझ्या नयनी
दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी


श्रीकृषण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 27, 2009

आसमंत भिजले कसे पेटले हे रान

(रिम-झिम गीरे सावन … मंझील)

ती….
बरसतो श्रावण रिम-झिम रिम-झिम
आनंदे उल्हासित होते माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन



बरसत होता घन हा असाच जेव्हा
भिजला होता पदर हा असाच तेव्हा
सांगशील सजणा का होते असे अजून
होते आनंदे उल्हासित माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान



अशाचवेळी श्रावण देई दाह निराळा
अशाचवेळी आसमंत दिसे फार वेगळा
तृप्त वारा वाहे मदमस्ती पिऊन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन



तो….
थेंबामधूनी वाजती तुझे घुंघरू जेव्हा
आशा मनातल्या न जावो विरूनी तेव्हा
कसे झाले स्वप्नाळू माझे दोन्ही नयन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन



मैफिलीमधे सांगू ते कसे कुणाला
हृदय आमुचे दिले कुणा अनोळखीला
हाय आता काय करावे जतन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com