Saturday, November 14, 2009

जर,तर,पण,परंतु.

“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”

आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी म्हणालो,
भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं.
ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं आहे?.आशावाद्याची बाजू घेतल्यास, “काहीही होणं शक्य आहे” ह्या म्हणण्याला चिकटून रहावं लागणार.”

“तुमचं म्हणणं “काहीही होणं शक्य आहे” ह्याबद्दल विचार केल्यास, एक दिवस समजा असं समजून घेतलं की,उंदीर पण अकाशात उडू शकतो. तर तसं आशावादी रहायला हरकत नाही.ते तुमच्या दृष्टीने ठीक आहे.कारण विकासाच्या किंवा उन्नतिच्या तत्वानुसार हे ही कधी तरी शक्य आहे.ते तत्व तुमच्या विचाराशी सहमत आहे.”
एव्हडं म्हणून भाऊसाहेब आवंढा गिळत पुढे म्हणाले,
“परंतु,समजा जर का जगातल्या सर्व संशोधकानी समज करून घेतली असती की काही गोष्टी अशक्य आहेत तर मात्र हे विश्व आपण हरवून बसलो असतो.आणि मनुष्याची प्रगती कधीच झाली नसती. माझं हे शक्यतेबद्दलचं तत्व, कुणीसं म्हटलंय त्यातून अभिव्यक्त होतं.

“ऐक कुणी म्हणे हे अनिवार्य आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे करू नये
ऐक कुणी म्हणे हे अशक्य,असंभव आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे होणे नलगे
ऐकशील का माझं बाळा!
काही ही अघडीत नाही
घडणे क्रमप्राप्त आहे.
क्रमप्राप्त आहे. बाळा!”

हे ऐकून मी म्हणालो,
“मनुष्याला कल्पनाशक्ती असते.हे त्याला मिळालेलं उत्तम साधन आहे.
त्यामुळे जीवनातल्या वास्तविकतेतल्या परिसीमेचं हे साधन उन्मूलन करून टाकतं. ह्या कल्पनाशक्तीच्या स्वप्नलोकात संभावनेला पुरेपुर अस्तित्व असतं. आणि तिथे संदेह लुप्त झालेला असतो. ही जादूनगरी सोडली तर मात्र वास्तविकतेची सीमा ह्या स्वप्नलोकात शिरकाव करते आणि ती सीमा स्वप्न-भरारीला अवरोध करते. तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो भाऊसाहेब?”

माझ्या प्रश्नाला उत्तर देताना विचार करून प्रो.देसाई म्हणाले,
“मला वाटतं वास्तविकतेला उगाच किंमत दिली जाते.जर सर्व गोष्टी प्रतिभाशाली व्यक्तीना सीमित असत्या तर e=mc2 हे आपल्याला कधी कळलंच नसतं.स्वतःचे उद्देश साध्य करताना दुसर्‍याच्या परिसीमा पाहून चालत नाही.स्वतःवर स्वतःचा विश्वास हवा. परिसीमा मिथ्या आहेत.आभाळ पण अनंत असतं.”

“म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की ग्लास अर्ध भरलेलं असत्तं?”
मी त्यांना उलट पश्न केला.

“नव्हे,नव्हे,माझ्या ह्या विचारवरून कुणाला वाटेल की माझी समजूत आहे की ग्लास अर्ध भरलेलं आहे.खरं तर प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात.मस्तक असतं तिथे शेपूट असतं,”इन फॉर यान्ग” असं चीनी भाषेत म्हणतात तसं.”
असं उत्तर त्यांनी मला दिलं.

“मग भाऊसाहेब,मला असं वाटतं काही ही शक्य आहे.आणि ते होण्यासाठी एखाद्याने आपले सर्व परिश्रम सर्व काळ वापरलायला हवेत.ढिलाईला वाव नसावा. अवसर घेऊन चालणार नाही.माझं हे म्हणणं कुणाला भयभीत केल्यासारखं दिसेल. पण माझं भाकित आहे की सरतेशेवटी परिश्रम आणि मिळणारं फळ यात संतुलन होत असतंच.” मी म्हणालो.

“मला वाटतं,आपल्या करणीचं आपल्याकडेच उत्तरदायित्व असावं, आणि दोषारोपण करणं म्हणजे आपल्याच अयोग्यतेचं लटकं कारण दाखवणं.”
असं म्हणून झाल्यावर प्रो.देसायानी एक छान उदाहरण दिलं.
ते म्हणाले,
“माझं ग्लासाबद्दलचं उदाहरण हे वयक्तिक दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
मुंगी होऊन मी जर ह्या बदनाम ग्लासाजवळून जाताना वर दृष्टीकरून पाहिलं तर मला ग्लास अर्ध भरलेलं दिसणार.पण मी जर का एखादा तहानेलेला दैत्य होऊन वरून ग्लासाकडे पाहिल्यास नक्कीच ग्लास अर्ध रिकामं दिसणार.”

ह्या विषयावर आणखी बोलण्यासारखं काही राहिलं नाही हे माझ्या लक्षात येताच मी समारोप करताना प्रो.देसायांना म्हणालो,
“ह्या प्रश्नाला माझ्या कडून उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 12, 2009

अज्ञात असण्यातली क्षमता.

“एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”

मी आमच्या बिल्डींग मधून खाली उतरत जात होतो.आणि अरूण-आमचा शेजारी-वर येत होता.मी घाईत असल्याने त्याच्याशी फक्त हंसलो.का कुणास ठाऊक दोन पायर्‍या वर जाऊन मागे वळून अरूण मला म्हणाला,
“काका,तुमचं काम झाल्यावर घरी परत येताना माझ्या घरी या.मी तुम्हाला गरम गरम कॉफी करून ठेवतो.तुमच्याशी काही चर्चा करायची आज मला हूक्की आली आहे.”
इतकं काय माझ्याशी हा बोलणार आहे असा मी विचार करीत खाली उतरताना त्याला म्हणालो,
“माझं बॅन्केत काम आहे.अर्धा तास लागेल.त्यानंतर मी येतो.”
“नक्की वाट बघतो”
असं म्हणून अरूण वर गेला.

मी त्याच्या घरी गेल्यावर माझ्या हातात कॉफीचा कप देत अरूण मला म्हणाला,
“तुम्ही मघाशी माझ्याशी नुसते हंसला,त्या हंसण्याने मला माझ्या जुन्या आठवणी भरकन डोक्यात आल्या.तेव्हा तुम्हाला लागलीच सांगून टाकलं की आपण चर्चा करूंया”

विषयाची प्रस्तावना करीत अरूण सांगू लागला,
“जे मला माहित नाही,म्हणजेच जे मला ज्ञात नाही त्याच्या क्षमतेवर माझा दृढविश्वास आहे.
माझं उभं जीवन मी प्रकाशाच्या वेगाच्या उपयोगतेबद्दल ज्ञात न रहाता काढलं आहे. माझ्या विज्ञानाच्या प्राध्यापकाने त्याशिवाय आणखी काही शिकवलं असेलही त्याच्या उपयोगतेशिवाय मी जगलो आहे.
अर्थात त्यांच्या वर्गात मला मिळत गेलेले गुण हीच त्यांनी शिकवलेलं मला ज्ञात नसल्याची स्पष्ट साक्ष आहे.
ज्या गोष्टी मनुष्याला तत्वतः अज्ञात असतात त्या गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.”

हे ऐकून मी अरूणला म्हणालो,
“अशा अनेक मोठ्या अज्ञात गोष्टी आहेत जशा,
ईश्वराचं अस्तित्व असणं किंवा नसणं,
मनुष्याच्या अस्तित्वाची अर्थ न समजणं,
जीवनात दुःखाची भुमिका काय?,
असल्या गोष्टीबद्दल तुला काही तरी म्हणायचं आहे काय?”
असा मी सरळ प्रश्न अरूणला केला.

“नाही मुळीच नाही.अगदी लहान लहान अज्ञात गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.
एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”
असं म्हणाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग हे आजच का तुला आठवलं.? आणि ते सुद्धा आत्ताच?”

“त्याचं काय झालं,”
अरूण सांगू लागला,
“मघाशी जिन्यात तुम्ही माझ्याशी फक्त हंसला.त्याने मला एक जूनी आठवण आली.
एकदा सकाळी भाजी बाजारात गेलो असताना भाजी विकणार्‍या बाईशी मी हंसलो आणि तीपण माझ्याकडे बघून हंसली. त्या हंसण्याचा तिच्यावर दिवसाच्या शेवटी काय परिणाम झाला हे मला माहित नाही.मला आशा होती काही तरी व्हावं.मला आशा होती की ते आमचं हंसणं तिने दुसर्‍या गिर्‍हाईकाला पारित केलं असावं, पासऑन केलं असावं.आणि कदाचीत त्याने ते एखाद्या वयस्कर माणसाला रस्ता ओलांडून जाण्यात मदत करणार्‍या तिसर्‍याला, ती मदत करताना पाहून त्याच्याशी हंसून पारित केलं असावं. आणि बिल्डींगचा जिना वर चढून जाताना त्या वयस्कर माणसाने आपल्या शेजार्‍याला पाहून त्याच्याशी हंसून सांगितलं असावं,
” ये कधी तरी कॉफी प्यायला.”
आणि नंतर कधीतरी कॉफीच्या कपावर जीवनातल्या सुखदुःखावर त्यांचं बोलणंही झालं असावं.हंसण्याच्या दूरवरच्या परिणामा विषयी मी त्यावेळी एव्हडा ज्ञात नव्हतो.”

मी म्हणालो,
“अरूण, तुझ्या कल्पना-शक्तीची ही उंच भरारी असावी काय?की कदाचीत तुला शक्तिशाली होण्याची तीव्र अभिलाषा तर नसावी?.मला काहीच कळत नाही.की कदाचीत ज्ञात नसल्याच्या क्षमतेतलं हे रहस्य तर नसावं.तुझ्या अंगात जी काही दयाशीलता आहे ती नकळत पारित करण्याची हळहळ तर नसेल ना?”

अरूण म्हणाला,
“हे असं व्हायला मला बराच काळ घालवावा लागला.ज्ञात नसलेल्या गोष्टीतली क्षमता कळायला मला बरीच वर्ष घालवावी लागली.तत्पुर्वी आरामातलं आयुष्य घालवणं,रोज जेवणाची थाळी माझ्या पुढ्यात येणं,कधी ही कसल्याही गोष्टीपासून वंचीत न होणं,खरोखरचं उपाशी न रहाणं,किंवा कधीही कष्टप्रद न होणं.अशी माझी परिस्थिती होती.

जसं वय होत गेलं तसं जीवन मला कळलं.हे असं सर्वांना होत असावं.मित्र दुरावले जावे,कुटूंबात हानी व्हावी,मला आणि माझ्या प्रियजनाना कठीण प्रसंग यावेत आणि जावेत.
प्रौढ वयात असताना सर्वसाधारण माणूस भोगतो तसे आनंदाचे आणि विपत्तीचे दिवस मी भोगले आहेत.आणि त्यानंतरच ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेचा मी विचार करू लागलो.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे,मला मुल झालं.ह्या जगात मुलाला जन्म देण्याने जीवनात सर्व तर्‍हेचा बदलाव आणला जातो. हे प्रत्येक पालकाला माहितआहे.
परंतु,ज्यावर मी अंतःकरणापासून आणि परिपूर्ण प्रेम करतो त्याच्यासाठी आशावादी राहून आणि प्रयत्न करून कसं झालं तरी माझ्या मुलासाठी हे जग अधिकांश चांगलं ठेवताना ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेने माझे डोळे उघडले.”

मी म्हणालो,
“ज्ञात नसणं हे काही इतकं महत्वाचं नाही.ज्ञात नसतानाही अगदी अल्पशी दयाशिलता पारित करण्यात,अगदी छोटीशी खूशी पारित करण्यात त्याच्यात असलेल्या क्षमतेचं अस्तित्व पाहून मला गंमत वाटते.”
“अगदी बरोबर”
अरूण एकदम खूश होऊन म्हणाला,
“म्हणूनच मी तुमच्याशी लगेचच चर्चा करायचं ठरवलं.
आता मला असं वाटायला लागलं आहे की,आशा ठेवण्यात असलेली जादू आणि त्याचं रहस्य,आणि जी आशा मला पूर्ण ज्ञात नसतानाही ती बाळगण्यात मी नेहमी प्रवृत्त असल्याने हे जीवन आज तरी थोडसं चांगलं वाटायला लागलं आहे.”

कॉफीचा रिकामा कप त्याच्या हातात देत मी हंसत हंसत अरूणला म्हणालो,
“हरएक दिवशी एक गोड स्मित,एक दयेचा शब्द,एक हात हलवून केलेला प्रेमाचा इशारा त्यात भर घालत असतो.आणि ह्या लहानश्या गोष्टीचे परिणाम ज्ञात नसतानाही तुझ्या नकळत हे जग तुझ्यासाठी सुंदर करण्यात तू कारणीभूत होत आहेस.”

अरूणचा चेहरा प्रफुल्लीत व्हायला मी एक अज्ञात गोष्ट करण्यात कारणीभूत झालो हे त्याला कळायला वेळ लागला नाही.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 10, 2009

आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो

“सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”



सुरेशची आणि माझी फार जूनी दोस्ती आहे.अलिकडे तो निवृत्त होऊन ठाण्या जवळच्या एका खेड्यात रहायला गेला आहे.मी मात्र मुंबईलाच चिकटून आहे.मला तो आपला पत्ता देऊन गेला होता.ह्या आठवड्यात मला तसा विरंगुळा होता,म्हणून त्याला भेटायला त्याच्याकडे जायचं ठरवलं.त्याला फोन करून कळवलं.तो मला न्यायला बसस्टॅन्डवर आला होता.संध्याकाळी बाहेर अंगणात ज्यावेळी आम्ही गप्पा करायला बसलो त्यावेळी असाच काही तरी विषय निघाला.

“अलीकडे सूर्य लौकर मावळतो.त्यामुळे अंधार लवकर पडतो.”असं मी सुरेशला म्हणालो.

“अगदी ज्यावेळी मनुष्य आंकडे मोजायला शिकला अगदी त्यावेळे पासून पृथ्वीवरच्या सर्वांना शिकवलं जात होतं की दिवस २४ तासाचा असतो.हे काही खरं नाही.प्रत्येक दिवस २३.९३४ तासाचा असतो आणि दिवसाचे २४ तास धरल्याने जो जास्त वेळ धरला जातो तो लिप इयरमधे जुळवला जातो.आणि म्हणून फेब्रुवारीचा एक दिवस-म्हणजेच २४ तास फरक केला जातो.”
मला सुरेश माहिती देत होता.

“मला माहित आहे की मी चवथी पाचवीत असताने हे शिकलो होतो.”
असं म्हणून, सुरेशलाच आणखी माहिती द्यावी म्हणून मी त्याला पुढे सांगितलं.
“आपल्याला सांगितलं जातं प्रत्येक १२ तासात-अर्थात दीड तासाचा जास्त कमीचा फेरफार धरून- सूर्य उगवतो आणि मावळतो.हे पण जरा स्तोम आहे.सूर्य कधीच वर किंवा खाली जात नाही.पृथ्वीच्या गरगर फिरण्याने हा भ्रम निर्माण होतो.अगदी सेकंदाच्या अंशाच्या भागामधे सूर्य कुठे तरी ह्या पृथ्वीवर उगवत असतो किंवा मावळत असतो.”

“हो अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.रात्रीच्या काळोखात मी बसलो असताना मला शांत बसून विचार येतो की कुठेतरी पृथ्वीच्या पाठीवर काही लोक स्वच्छ सूर्यप्रकाशात असतील तर मी इकडे झोप येण्याच्या प्रतिक्षीत असतो.आणि हे पाहून मी थोडा उद्विग्नही होतो.”
सुरेश अगदी वैतागून सांगत होता.
आणि पुढे म्हणाला,
“मी ज्या खेड्यात सध्या राहत आहे ते आत्ता काळ्या पडद्याखाली पहूडलं जाणार आहे तर ह्याच वेळी चीनमधे लोक खेळात कुदत आहेत. अमेरिकेतल्या कुठल्यातरी शहरात गाडीच्या अपघातात एखादी कमनशिबी स्त्री मृत्यु पावली आहे तर तिचा आत्मा दुसर्‍या कुणाच्या शरिरात शिरून कुणाला तरी जन्माला आणीत आहे.मला फार पूर्वी ऐकल्याचं आठवतं की वाईट गोष्ट होत असताना सरतेशेवटी त्यातून चांगली गोष्ट बाहेर येते.”

सुरेश असले विचार सांगण्यात पहिल्यापासून वाकबगार होता.त्याचाअसल्या तत्वज्ञानावर दृढविश्वास होता.
आपल्या म्हणण्याला दुजारा देण्यासाठी सुरेश मला म्हणाला,
“तू मला हंसशील,पण खरं सांगू माझा ह्यावर पूर्ण विश्वास आहे.वानगी दाखल तुला सांगतो,
माझी आई सांगायची की ती लहान असताना तिचा एक काका लांबलेल्या आजाराने निर्वतला.तिला त्यावेळी खूपच वाईट वाटलं होतं.
पण त्यातून एक चांगलं झालं की तिची कॉलेज शिक्षण घेण्याची जी प्रबळ इच्छा होती ती पूरी झाली.तिच्या काकाने तिच्या नावावर पैसे ठेवले होते ते त्यांच्या मृत्यु नंतर तिला मिळाले.आणि तिचे काका गेले नसते तर आईला शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्या नोकरीवर काम मिळालं तिथे माझ्या बाबांची भेट झाली नसती.मी पण शिक्षणासाठी मुंबईत आलो नसतो आणि आता ह्या खेड्यात निवृत्तीत दिवस घालवू शकलो नसतो.”
सुरेशची विचारसरणी अगदीच काही चुकीची नव्हती.
मी म्हणालो,
“मला माहित आहे की आपल्या कुटूंबात ही स्थित्यंतरं झाली नसती तर आपलं जीवन आता आहे तसं झालं नसतं.सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”

बाहेर खूपच काळोख झाला होता.लहान लहान मुर्कुटं अंगाला चावत होती.सुरेशच मला म्हणाला,
“चल आपण आत घरात जाऊया.पण हा माझा विचार संपवण्यासाठी जाता जाता मी तुला एक सांगतो.
अगदी शेवटची गोष्ट मी आठवणीत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो ती ही की दिवसाच्या २३.९३४ तासाच्या प्रत्येक मिनीटाच्या प्रत्येक सेकंदाला सूर्य मावळत असतो आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.”
घरात येता येता मी माझ्याच मनात म्हणालो,
“चला आज मस्त जेऊन झोपूया.उद्या आपल्यासाठी सूर्य नक्कीच उगवणार आहे.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 8, 2009

“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.

“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.”



वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे.
मी वासंतीला म्हणालो,
“तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.”
“अगदी बरोबर” वासंती म्हणाली.
“मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत आहे.आजीकडून शिकण्याचे आता आमचे दिवस संपले.कारण आता ती अगदीच थकली आहे.त्या मानाने माझी पणजी सुदृढ आहे.माझ्या आजीला मनोभ्रम झाला आहे.मनोभ्रम ही अशी व्याधी आहे की अशा रोग्याशी संबंध ठेवताना डोळ्यातून पाणी येतं.”

मी वासंतीला म्हणालो,
“कोकणात ह्या रोगाला “बाळं लागलं ” असं म्हणतात.ह्या रोगाचा अगदी परिपूर्ण अर्थ त्यात आहे.तरूणपण वगळल्यास बाळपण आणि म्हातारपण एकमेकाला पुरक आहेत.शारिरीक तुलना तर अगदीच सारखी आहे.दोन्ही वेळी कुणाचा तरी त्यांना आधार लागतो. अन्नपाण्याच्या गरजा पण तशाच सीमित असतात.”

“आणखी किती साम्य सांगावं.एकाचा मेंदु अपरिपक्व असतो तर दुसर्‍याचा अपरिपक्व होतो.एकूण परिणाम एकच.”
असं म्हणून वासंती खूप उदास झाली.
आणि पुढे म्हणाली,
“लहान बाळाबद्दल निदान आपल्याला माहित असतं की हळू हळू त्याला विचार शक्ति येत रहाणार.पण आजीच्या वयात तिचे विचार ऐकून खूप दुःख होतं.अगदी लहान बाळाला समजूत घालावी तशी तिला समजूत घालावी लागते.”
“केव्हा पासून हे तुझ्या आजीला असं व्हायला लागलं?”
मी वासंतीला विचारलं.

“मला वाटतं मी त्यावेळी पंचवीसएक वर्षाची होते.माझ्या आजीला मनोभ्रंश झाला होता.तिला आम्ही एका सुश्रुषा आश्रमात ठेवलं होतं.आम्ही आळीपाळीने जाऊन तिची दखल घ्यायचो.कधी कधी आम्ही तिला घरून जेवण घेऊन जायचो.तिला आवडणारे पदार्थ आश्रमात मिळतीलच असं नव्हतं.घरी ते पदार्थ केल्यावर तिला वगळून खायला आम्हाला जीवावरच यायचं.असे बरेच दिवस होऊन गेले.
तुम्हाला एकदाची गंमत सांगते,
एकदा दुपारचं जेवण देऊन ती जेवत असताना मी तिच्याच सोबत रहाणार्‍या दुसर्‍या एका आजीशी हंसले.तिचं प्रफुल्लित आणि मोहक हंसू चमकून दिसलं तिला पण माझ्या आजी सारखाच व्याधी होता.
मी त्या आजीला विचारलं की तिला तिथे रहायला आवडतं का?.
आणि ती म्हणाली,
“हो,मला राणीच्या बागेत रहायला आवडतं.ही फारच सुंदर जागा आहे.”
नंतर त्या आजीनेच मला प्रश्न केले,
“माझं लग्न झालं आहे का?”
“मला किती मुलं आहेत?”
“माझ्याकडे पाळीव मांजर आहे का?”
“मी कधी कॉलेजला गेली का?”
“मी ताजमहाल पाहिला का?”
ह्या सर्व प्रश्नाना मी,
”नाही”
असंच उत्तर दिलं.
नंतर मला तिने जो प्रश्न विचारला तो जास्त अर्थ धरून होता.
“मी अजून उडी मारू शकते का?” असं तिने मला विचारलं.
मी उत्तरले,
“अर्थात मी उडी मारू शकते”
“मग अशीच उडी मारीत रहा.कारण एक दिवस तू ते करू शकणार नाहीस.”
असं तिने मला उत्तर दिलं.

तो त्या आजीचा पोरकट प्रश्न मला बरंच काही सांगून गेला.कारण त्या प्रश्नात शारिरीक उडी मारण्या व्यतिरिक्त गंभीर अर्थ होता.
उडी मारण्याच्या प्रश्नाशी जी संदिग्धता होती ती जीवन,ताकद,धैर्य, लवचिकता, स्वप्न, प्रेम,आरोग्य,आशा,भविष्य आणि स्वतंत्रतेशी संबंधीत होती असावी.उडी ह्या शब्दाचा संकेतार्थ शारिरीक आणि मानसिक आरोग्याशी वैधता ठेवून होता.”

मी वासंतीला म्हणालो,
“आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे आणि मला वाटतं आपल्या उड्या आपण चालू ठेवायला हव्यात.विज्ञानात दाखवलं जातं की जे कुणी व्यायाम घेतात आणि दीर्घायुष्यी असतात त्यांना मनोभ्रम होण्याची शक्यता कमी असते.व्यायामामूळे “इंडॉर्फीन” नावाचा जो द्रव निर्माण होतो तो आपल्याला संतुष्ट ठेवीत असतो.आता हे झालं शारिरीक उड्याबद्दल.
आनंदी प्रवृती ठेवल्याने सकारात्मक दृष्टीकोन राहतो.आणि असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने भविष्य उज्वल होतं. ह्या विश्वात जर का कुणी सकारात्मक कार्य-शक्ती ठेवील तर त्याची प्रतीफळं परिपूर्ण मिळतील.
एकूण काय,कसल्याही उड्यांशिवाय जीवन निराशजनक दिसतं.”
माझं हे विश्लेषण ऐकून वासंतीने त्याचा संदर्भ आपल्या आजीशी लावला.

ती म्हणाली,
”माझी आजी भौतिक-भोगी होती.तिच्याजवळ किंमतीचे दागिने, कपडे,आणि अवधानं होती.कुठीचीच गोष्ट ती त्याज्य करीत नव्हती. तिच्या जवळ शेकडो लोकरीच्या लड्या होत्या,काचेची बरीच तोरणं होती,चांदीच्या फोटो फ्रेम्स होत्या,हे सर्व विकत घेतलेल्याच्या पावत्या होत्या.आणि हे सर्व धूळ खात पडलेलं होतं. आजीने कधी उड्या मारण्याचा प्रयत्नच केला नसावा. बैठक मारून ह्या वस्तु-संग्रहाचं ती कौतूक करण्यात घालवायची.आणि आता मात्र तिला अशा उड्या मारायला बराच उशिर झाला होता.”

प्रत्येकाच्या लाईफ-स्टाईलबद्दल मी प्रथम म्हणालो होतो त्याचा संदर्भ देऊन वासंती म्हणाली,
“माझी पणजीचं मात्र तसं नव्हतं.तिने मोठा दुर्दैवी समझोता आपल्या आयुष्याशी केला होता.तिच्या लहान वयातच माझे पणजोबा निर्वतले. तिला एक अधू मुलगा होता.पण ती आयुष्यात सकारात्मक राहिली. वेळ आल्यास धोका पत्करला.आणि उड्या ही घेतल्या. परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तिला तसं करावं लागलं. चांगल्या परिस्थितीसाठी तिने येणार्‍या संधीला उडी मारून आत्मसाथ केलं.आणि आता ९७ वर्षावर तिची बुद्धि इतरांपेक्षाही तल्लख आहे.त्यावेळी तिने डोळे मिटून उड्या मारल्या आणि आता डोळे उघडे ठेवूनही आशेने भरभरून उड्या मारते.”

“तुझी पणजी अप्रत्यक्षपणे काय सांगते माहित आहे काय?”
असा प्रश्न करून तिच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता मीच म्हणालो,
ती म्हणते,
“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी,रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन, विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.परत सुरवात करताना ही उड्या मारा.उड्या हे तारूण्याचं गौप्य आहे.उडी जीवनाची सुधा आहे,आणि भावी आयुष्याची आशा आहे. मला वाटतं आपण सर्वानी उड्या मारीत असावं मग त्या शारिरीक असो किंवा मानसिक असो.”
वासंतीला हे ऐकून खूपच बरं वाटलं.तिचा चेहराच सांगत होता.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 6, 2009

आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

(अनुवाद. आज तुमसे दूर हो कर…)

मला वाटतं माणूस हताश परिस्थितीत निर्जीव गोष्टीना सजीव समजून त्यांची स्वतःशी न्यायसंगत सिद्ध करायला प्रवृत्त होतो.
देव,दैवावर दुषणे टाकतो.
गायक मुकेशने हे गाणं छान गायलं आहे.



जशी झालीस तू दूर दूर माझ्यापासून
तशीच रडली प्रीत माझी मुसमुसून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

काही तुझे प्रतिबंध काही माझ्या सीमा
वैरी झाले जर दैव कुणा काय आहे तमा
देवा,कुणा काय आहे तमा
ह्या दैवावर अधिकार कुणी का बसले घेऊन
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

अभिलाषा विलग ठेवी सौख्य ठेवी दूर
जीवित रहाण्या इतुकेच जीवन करी मजबूर
देवा,जीवन करी मजबूर
मुष्किल झाले प्रतीक्षेमुळे जीवन देण्या सोडून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 4, 2009

तांब्याचा पैसा.

“आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही.कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.”

आज बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर आले होते.त्यांना मध्यंतरी बरं नव्हतं. त्यांची गैरहजेरी मला जाणवायची.प्रि.वैद्य मधून मधून तळ्यावर भेटल्यावर त्यांची जागा ते भरून काढायचे.
मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“बरेच दिवस माझ्या मनात राहून गेलं होतं,आणि तुम्हाला तुमचं त्याबद्दलचं मत विचारायचं राहिलं होतं, ते म्हणजे नशिब अजमावण्याच्या माणसाच्या निरनीरळ्या तर्‍हांबद्दल.

आपण इकडे नेहमीच पाहतो जेव्हा लोक पार्कमधे येतात किंवा काही रम्य ठिकाणी फिरायला जातात,तेव्हा त्यांना जर का कुठे पाण्याच्या फवार्‍याचं कुंड दिसलं तर ते खिशातलं नाणं काढून-बहुदा तांब्याचं नाणं-मनात काही बडबडून त्या कुंडात टाकतात. का तर म्हणे,नशिब जागृत होतं.तुम्ही असं कधी आयुष्यात केलं आहे का भाऊसाहेब?”

प्रो.देसाई थोडे मिष्कील हंसून मला म्हणाले,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळतो त्यवेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.असा तांब्याचा पैसा दिसला तर मी तो कुठनही उचलतो. त्याच्यावर चिखल असला,त्याच्यावर कसला चिकट पदार्थ टाकलेला असला किंवा त्याच्यावर रात्री दारू पिऊन कुणीतरी टाकलेल्या बाटलीतल्या सांडलेल्या दारूचा वास असला तरी मला चालतो.मला त्याबद्दल काहीही वाटत नाही.मी त्यात कुणाची चोरी करतो असं समजत नाही. शिवाय मी स्वतः खेदजनक होऊनही तो पैसा उचलत नाही उलटपक्षी मी स्वतःला असं करण्यात धीट समजतो.”

“म्हणजे याचा अर्थ पूर्वी तुम्ही असं करीत नव्हता.कदाचीत त्यावेळी तुमचा त्यावर विश्वास नव्हता असं मी समजूं का?”
असा मी त्यांना प्रश्न केला.

“तसं म्हटलंत तरी चालेल.” प्रो.देसाई सांगू लागले.
“मी लहान असताना असं काही करीत नव्हतो.ज्यावेळी मी वीस वर्षाचा तरूण होतो त्यावेळी नक्कीच नाही.त्यावेळी मी ऐटबाज सूट चढवून दक्षिण मुंबईतल्या फोर्ट विभागात मोठया दिमाखाने रस्त्यावरून जाताना इतक्या खालच्या पातळीवर येऊन आणि ते सुद्धा इतकं खाली वाकून एखादा पैसा दिसला म्हणून उचलायचं लांछन मुळीच करीत नव्हतो. तेव्हा मला दुनिया मोत्याच्या तोलाची वाटायची.
एका तांब्याच्या पैशाची कुणाला त्या वयात कदर असावी.?ज्या वयात अवतीभोवतीची हवाच अशी असायची की तिच्यात कला आणि प्रसिद्धीचे मनसूबे, नशिब उजाडल्याचे झरोके,आणि मदमस्त सुगंधाने भरभरून आसमंतात फैलावलेली कुंद हवेची दरवळ यायची.”

मी म्हणालो,
“म्हणजे तरूणपणात असल्या गोष्टी करणं हास्यास्पद दिसतं असंच तुम्हाला म्हणायचं आहे असं वाटतं.”
“अगदी बरोबर,मला पुढे तेच सांगायचं होतं.
कुणी सर्वकाळ तरूण राहत नाही.अर्थात तरूण असताना कुणी हास्यास्पद आणि मामूली गोष्टी करतोच म्हणा जशा,चतुर्भुज होणं,मुलं होणं,उपनगरात एखादा फ्लॅट घेणं वगैरे.
एके काळी कुणीतरी तरूण वयात भडकदार कुंचल्याने रेखाटलेलं जसं एखादं रेखाचित्र दिसावं तसं दिसणारं ते तुमचे व्यक्तिचित्र नंतर हळूहळू तुम्ही जूळवून जळवून शिवलेल्या रंगीबेरंगी गोधडी सारखं दिसणारं, कुठे भडक रंगाचं तर कुठे विरलेल्या कपड्याचं जणू चित्रसंग्रह असलेलं तुमचं व्यक्तिचित्र दिसायला लागतं.”
भाऊसाहेबांनी आपल्या खुमासदार शैलीत वर्णन करून सांगितलं.

“म्हणजे उघड उघड तुम्हाला म्हणायचं आहे की वय होता होता व्यक्तिचित्रं बदललं की एखादा आपला दृढनिश्चयही बदलतो की काय?”
मी भाऊसाहेबांकडून जास्त स्पष्टीकरण मिळण्यासाठी त्यांना प्रश्न केला.
मला म्हणाले,
“जीवनातल्या एका टप्प्यात आकाशात पहाण्यासाठी तुम्ही तुमचं शीर उंचावता आणि तारे पाहून त्याकडे बोट दाखवून तुमच्या चिल्लापिल्लाना सुधारलेला माणूस बनवण्याच्या प्रयत्नात असता.
आणि तुम्हाला आवडो वा न आवडो तुमच्या त्या वयात तुमचा काही वेळ तुम्ही खाली जमिनीकडे पहाण्यात पण घालवता.आणि गंमत् म्हणजे ह्या ह्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटत नाहीत.

कुणी सांडलेलं दुध,कुणाची वांती,नेल पॉलीश,डोक्यातल्या पिना,फाटलेलं एखादं वर्तमानपत्र वगैरे वगैरे.”

“त्याचा अर्थ ह्या वयातही तांब्याचं नाणं तुमच्या नजरेतून सुटतं.किंवा दिसलं तरी ते उचलून घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही नसतां.असं मी समजूं का?”
असा सरळ सरळ प्रश्न मी केला.

थोडासा विचार केल्यासारखं करून देसाई म्हणाले,
“ही पण आयुष्यातली पायरी चढून गेल्यानंतर हळू हळू तुमच्या विचारसरणीत फरक पडतो.
सरते शेवटी जेव्हा तुमचं शरिरच अंथरूणातून उठायला मज्जाव करतं.तुम्ही तरूण किंवा वयस्कर नोकर ठेवण्याच्या प्रयत्नात असता. पटत नाही म्हणून तुमचा जूना डॉक्टर बदलता,ज्योतिषाकडेही जाऊन येता आणि एकदिवशी काही कारण नसताना सकाळी उठून बाहेर रस्त्यावर येता.

रस्त्यावरून चालताना पाला पाचोळा आणि त्यावर पडलेला कचरा दिसत असतो. आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही. कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.

त्यानंतर मात्र तुम्हाला विचारांची गणना करण्यासारखं विशेष काही नसतं.एखाद दिवशी तुम्ही मोठ्या उत्साहाने अंथरूणातून उठता,एखाद दिवस तुमचा पाळलेला पपी ओरडून ओरडून बाहेर नेण्याचा इशारा करतो.
अजूनही तुम्ही आकाशाकडे बघून मदतीची आकांक्षा ठेवता,आणि खाली जमिनीकडेही बारकाईने बघून जीवनात,आशा,आणि प्रेमाच्या अपेक्षेत असता. अपेक्षीत असलेल्या घटनांचक्राबद्दल सांत्वन करून घेण्याच्या मनस्थितीबद्दल तुम्ही शिकत असता,तसंच, अनपेक्षीत ठिकाणी गेल्याने त्यातून मिळणार्‍या आनंदाशीही उत्सुक्त असता. मिळेल तेव्हडं नशिब उजळून यावं ह्याची तुम्हाला जरूरी भासते. आणि म्हणून एखादा तांब्याचा पैसा दिसला की तुम्ही तो उचलता.तुमच्या खिशात ठेवता.आणि मनात एखादी प्रार्थनाही करता. म्हणून मी तुम्हाला सुरवातीला म्हणालो की,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळातो त्यावेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.”
उठतां,उठतां मी प्रो.देसायाना म्हणालो,
“आज वेळ खूप मजेत गेला.भाऊसाहेब आपण बरेच दिवसानी तळ्यावर फिरायला आला.पण पहिल्याच दिवशी आपल्याकडून “तांब्याच्या पैशाबद्दल” माझी शंका दूर केलीत.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 2, 2009

केला मी तर प्रारंभ पिण्या

(अनुवाद. मैने पिना सिख लिया….)

माझा मित्र वसंत फार पुर्वी पासून पितोय.वहिनीचं खूप प्रेशर आलं की मग काही दिवस प्यायचं सोडून देतो.आणि त्याचं हे असंच चालंय.परत कधीतरी प्यायला सुरवात करतो.बिचारी वहिनी मात्र ही त्याची संवय पाहून हिरमुसली होते.मला तिची किंव येते.त्या पलिकडे मी तरी काय करणार?अलीकडे त्याला कंटाळून वहिनी माहेरी जाऊन राहिली आहे.
योगायोग म्हणजे काल,
”मैने पिना सिख लिया…”
हे गाणं मी रेडियोवर ऐकलं.ताबडतोब त्याचा अनुवाद करून वसंताकडे गेलो.त्याला ही कविता वाचून दाखवली.आणि म्हणालो,
“तुम्हा लोकांचं हे असं चालतं.आणि दोष मात्र दुसर्‍याला देता.”

“शुद्धीवर नसल्यावर हे लोक खरं तेच सांगतात”
असं मी कुठेतरी वाचलं होतं.
कविता ऐकून झाल्यावर वसंता फक्त हंसला.मी समजायचं ते समजलो.



पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

लाखो मधली एक छबी
नयनी माझ्या येऊनी बसली
एक कळी जशी सहज फुलली
भ्रमराला ती कशी घाबरली

फुलले एक फुल प्रीतिचे
मिळाले सूर एक गीताचे
दैव आणीते रंग नवे
सूर सुटता गीत सरे

मध्य भोवरा तूच सोडीला
मम प्रीतिचा अनुबंध तोडीला
प्रेमावरी कुणी प्रहार केला
देवा,देवा
कठीण झाले आम्हा जगायला

मदिरे कडूनी साथ मिळवूनी
शिकलो आम्ही तुजविण जगण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

म्हणती इतर का पितोस बरे
म्हणते मन का जगतोस बरे
जगण्यात नसे मला अभिलाषा
मरण्यात दिसेना एकही दिशा

जीवन झाले व्यथा इथे
सांग तयाला उपाय कुठे
प्रीत आठवूनी पिणे धरीले
शुद्ध हरपूनी दुखणे कसले

लक्ष आमुचे आम्ही शो्धिले
दैव आम्हावरी का बरे रुसले
सजणी मजला गेली सोडूनी
हृदय तुटले ठोकर खाऊनी

अशाच नशेच्या ह्या धाग्याने
शिकलो आता हृदय शिवण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com