Monday, May 17, 2010

मसालेदार जीवन.

आज माझी आणि प्रो.देसायांची एका नवीनच विषयावर चर्चा झाली.
मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मला वाटतं,जीवनात आपत्ति आल्याने जीवन थोडं मसालेदार होतं.
मला वाटतं, जर तुम्ही पूरा दिवस मौज-मजेत घालवलात आणि तुम्ही कोणतंही आवहान स्वीकारताना तुम्हाला कसल्याच अडचणी आल्या नाहीत, तुमचं रक्त सळसळलं नाही किंवा तुमची पिसं पिंजारली गेली नाहीत तर जीवन संतोषजनक होणार नाही.
भाऊसाहेब,तुमचं काय म्हणणं आहे?”

प्रो.देसाई म्हणाले,
“आपल्या वयक्तिक जीवनातली आतली आणि बाहेरची आवहानं आपल्या आत्म्याला उभारी आणण्यात आणि वयक्तिक अनुभवाची सीमा वृद्धिंगत करायला मदत करतात.”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो.तो ऐकून मग त्यावर तुमचं मत द्या.ही माझ्या लहनपणातली गोष्ट आहे.
मी ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा माझा एक जवळचा मित्र जयदेव कुस्तिच्या आखाड्यात कुस्ति खेळत असताना एकाएकी हृदय बंद पडून गेला.माझ्या जीवनातला हा एक मोठा दुर्दैवी प्रसंग होता.मी अगदी उदास झालो होतो, आणि मनोमनी समजू लागलो होतो की जीवनात काही खरं नाही.तसंच हे जीवन निर्णायक राहून स्वतःला नष्ट करायला तप्तर असतं असा माझा पक्का समज झाला होता.
माझ्या मित्राच्या निधनानंतर माझ्या मनावर आघात करणार्‍या त्या अनुभवाकडे पहाताना माझ्या मनात जो दृष्टीकोन परिपक्व झाला तो माझ्या जीवनातच बदल करीत असल्याचं मला दिसून आलं.माझ्या जीवनातला रोजचा दिवस जो मी जगत होतो, तो यापुढे जशाचा तसा मी स्वीकृत करायला तयार नव्हतो.कारण मला माहित होतं की जीवन कायमचं नसतं आणि प्रत्येक दिवसाला दाद दिलीच पाहिजे असं नाही.माझा मित्र गेल्यानंतर माझ्या इतर मित्रांशी असलेल्या माझ्या संबंधाचं मी मुल्यांकन करायला लागलो.इतरांशी असलेले माझे दुवे मजबूत व्हायला लागले.आणि त्यामुळे गेलेल्या मित्राचा दुरावा कमी वाटायला लागला.”

भाऊसाहेब म्हणाले,
मित्राच्या नुकसानीच्या राखेतून नव्या मित्रत्वाची मुळं आणि खोडं उगवायला लागतात.आणि ती खोडं नंतर मोठे बुंधे होतात.मित्र असावा ही कल्पना तुम्हाला स्वीकृत करायला वास्तवीकतेने दिलेल्या हादर्‍यातून शिकायला मिळत असते. जीवनाची क्षणभंगूरता पाहून प्रत्येक दिवसाकडे आशाळभूत होऊन रहावं लागतं.जीवन वावटळी सारखं असतं अगदी अनिश्चित असतं.
जीवन एक नदी आहे.अनुभवाच्या पाण्याने दुथडी भरून वहात असली तरी आपल्या लहरीपणे ती मार्ग बदलीत असते.”

मला प्रो.देसायांचं हे बोलणं एकदम पटलं.आणि मी त्यांना म्हणालो,
“जीवन हा असा मार्ग पत्करीत असताना,कोणती आपत्ति कोणता खुमासदार मसाला जीवनात छिडकवून चव आणील हे सांगता येणार नाही.तरीपण एखादवेळी एखादी आपत्ति कधी कधी खूपच उग्र अथवा सौम्य मसाला छिडकवून जीवनात स्वाद निर्माण करून तोंडाला खरी चटक आणू शकते.
म्हणून म्हणावं लागतं की जीवनात आपत्ति आल्याने जीवन मसालेदार होतं.”
हे ऐकून प्रो.देसाई नुसते हंसले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 15, 2010

बगीच्याची क्षमता.

“दुःखाची भरपाई करण्याच्या बगीच्यातल्या क्षमतेमुळे आपल्या जवळचं माणूस आपल्या हृदयात सामावून ठेवता येतं हे मला विशेष जाणवतं.”

“माझे आजोबा सत्तर वर्षाचे असताना जेव्हा एकाएकी गेल्याचं मी ऐकलं,तेव्हा,माझ्या मनाला एव्हडा धक्का बसला की ती परिस्थिति स्वीकारायला माझं मन तयारच होईना.आणखी त्यात भर म्हणजे गेले कित्येक महिने मी त्यांना भेटू शकलो नव्हतो.”

प्रमोद मला आपल्या आजोबांच्या जाण्याने त्याची झालेली हानी आणि त्यांची भेट घेऊ शकला नाही ह्याचा त्याला होणारा पश्चाताप समजावून सांगत होता.
हे सगळं बोलणं, मी जेव्हा त्याच्या नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात कोकणात गेलो होतो त्यावेळी मला ऐकायला मिळालं.

त्याचं असं झालं,प्रमोदचं लहानपण,त्याचं शिक्षण सर्वकाही त्याच्या आजोळी झालं.नंतर लग्न झाल्यावर तो शहरात नोकरीसाठी आला.आणि अधुनमधून आजोळी जायचा.नंतर नंतर कामाच्या व्यापामुळे त्याला त्याच्या आजोबांना नियमीतपणे भेटायला जमेना.
पण अजोबांनी बांधलं तसं एक घर कोकणात बांधायचं आणि निवृत्त झाल्यावर त्या घरात जाऊन रहायचं हे त्याचं स्वपनं होतं.ते त्याने आता प्रत्यक्षात आणून त्या घराची वास्तुशांती करत होता.

मी त्याचं घर आणि आजुबाजूचा परिसर फिरून पाहिला.घराच्या मागे आणि सभोवती त्याने खूपच सुंदर फुलांचा बगीचा केला होता.त्या बगीच्याबद्दल मी त्याला विचारलं.

मला म्हणाला,
“दम्याच्या आजाराने आजोबांची प्रकृति इतकी क्षीण झाली होती की त्यांच्या अंगावर मांसच कुठे दिसत नव्हतं. त्यांचं जाणं इतकं अनिवार्य होतं जीतकं उन्हाळा,पावसाळा वाटावा तसं. परंतु,माझ्या मनाला चांगलाच धक्का बसला होता.

त्यांनी आणि माझ्या आजीने मिळून घराच्या सभोवताली इतकी सुंदर बाग विकसित केली होती की येणारे जाणारे थोडावेळ थांबून रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलं बघून वाः! म्हटल्या शिवाय पुढे जात नव्हते.
नाना तर्‍हेची फुलझाडं होती.गुलाब-निरनीराळ्या जातीचे आणि रंगाचे,मोगरा,चाफा-अनेक जातीचा,साईलीचे वेल,केवड्याची झुडपं किती सांगावं?.
पडवीत खूर्ची टाकून बसल्यावर संध्याकाळच्या वार्‍याच्या झुळकीबरोबर एकनाएक फुलांच्या सुगंधाची दरवळ नाकावर आल्याशिवाय चुकायची नाही.

गळून पडलेल्या फुलांच्या पाकळ्या वेचताना,झुडपांची काटछाट केल्यावर पडलेल्या फांद्या उचलताना,गवताची तृणं उचकून काढताना,आणि अनेक प्रकारे,मी लहान असताना माझ्या आजोबांना,मदत करताना,
“या आमच्या नातवाला मदत करा.मी तुम्हाला थोडा व्यायाम करायला देईन”
असं म्हणून आजोबा बाग-बघ्यांची छेडखानी करीत असत.ते पाहून मी थोडा लाजायचो.त्याची मला अजून आठवण आहे.”

“तुझ्या आजोबांवर तुझं किती प्रेम होतं हे तुझ्या ह्या बारीकसारीक गोष्टी तू लक्षात ठेवल्या आहेस ते बघून लक्षात येतं.”
मी प्रमोदला म्हणालो.

“माझे आजोबा बागेत उभे असतानाची त्यांची प्रतिमा माझ्या हृदयात मी ठेव म्हणून जोपासली आहे.ते त्यांच्या वरखाली असलेल्या दातांच्या रांगेतून केलेलं मिष्किल हास्य,त्यांच्या जाड चष्म्याच्या भिंगातून दिसणारी ती त्यांची बेरकी नजर, पानवेलीवरून काढलेल्या ताज्या पानात काथ घालून केलेला विडा खाल्याने झालेलं लाल तोंड मधनूच हलवून करतानाचं ते चरबटणं, खादी-ग्रामोद्यकातून आणलेला जास्तित जास्त जाड्भजरी असलेला आणि एखाद दुसरी गुंडी काजातून बळेच सुटलेला तो त्यांचा नेहरूशर्ट,कोकणातल्या तांबड्या मातीमुळे धुऊन धुऊन स्वच्छ केला तरी तांबडट दिसणारा कमरेवरचा तो त्यांचा पंचा,ही हुबेहूब छबी मी कशी विसरेन.”
प्रमोद अगदी तल्लिन होऊन मला सांगत होता.

“त्यांच्या जाण्याने आणि त्यानंतरच्या तुझ्यावर झालेल्या त्यांच्या जाण्याच्या (दुःखी)परिणामाने,तुझी बागेवरची श्रद्धा आणि मानसिक जखमेची भरपाई करण्याची त्या श्रद्धेची क्षमता तुझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसवायला मदत झालेली मला दिसत आहे.”
प्रमोदने तेव्हड्याच तत्परतेने त्याच्या नव्या घराचा परिसर सुशोभित केलेला पाहून प्रमोदची शिफारस करावी म्हणून मी असं म्हणालो.

मला प्रमोद म्हणाला,
“पैशाच्या रूपाने फारसा नसलेला,पण त्यांच्या जीवनातल्या प्रचंड त्यागाच्या रूपाने मिळालेला वारसा माझे आजोबा मला मागे ठेवून गेले. ही वारश्याची ठेव आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी बॅन्केत ठेवणं जरा चुकीचं वाटायाला लागलं. त्यापेक्षा त्यांना कदाचीत जिथे हवं होतं त्या बागेत झाडं रुजवायचं आम्ही ठरवलं.आम्ही नव्याने बांधलेल्या घराच्या मागच्या परड्यात ढोपरभर उंच रानटी गवत वाढलेलं होतं.आणि त्या परड्याच्या मागे उंचच उंच पिंपळाची आणि चिंचेची झाडं होती.त्या परड्यात ही ठेव रूजवायचं आम्ही ठरवलं.”

“हे सर्व करायला तुला खूप मेहनत घ्यावी लागली असेल.”
मी प्रमोद्ला म्हणालो.

“खूप दिवसांची नव्हेतर खूप महिन्यांची मेहनत करावी लागली. अजूनही काम पुरं झालेलं नाही.मी शहरातून बरेच वेळा इकडे येत असतो.आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना पण घेऊन येतो. उन्हाळ्याच्या मोसमात एखाद्या संध्याकाळी, जाईचा सुगंध वार्‍यात दरवळतो.माझी लहान मुलं फुलझाडांच्या गर्दीतून वाट काढून बोवाळत असतात.एखादं नवीन रोपटं शोधून काढतात.फुलांचा नवीन बहर पाहून आनंदी होतात.
“बाबा,या इकडे बघा,आम्हाला काय दिसलं ते!”
असं म्हणून माझा हात ओढत ओढत त्या ठिकाणी घेउन जातात.”
प्रमोद मला सांगत होता.आणि मधेच जरा थांबून आणखी काहीतरी आजोबांबद्दल सांगावसं त्याला वाटलं असावं.

“हे सांगत असताना परत मला आजोबांची आठवण आली.”
असं म्हणून मला सांगायला लागला.
“माझे आजोबा करायचे तसं मी मुलांना त्यांचे डोळे मिटायला सांगून केवड्याच्या झुडपाकडे नेऊन त्या केवड्याच्या पिवळ्या फुलांचा सुगंध घ्यायला सांगतो.ही केवड्याची फुलं मला त्यांची आठवण प्रकर्षाने करून देतात.”

“तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतो”
प्रमोद पुढे सांगू लागला,
“एकदा,घाणेरीच्या फुलांच्या झुडपाखाली असलेला आणि रुतून बसला असल्याने उचकून वर घ्यायला किंचीत परिश्रम देणारा एक काळा दगड त्यानीच वर काढल्यावर,
“हे! हे बघा काय मिळालं! ह्या दगडाच्या सर्व बाजूनी भू-छत्र्या (अळमी) उगवली आहेत.रात्री भाजी करूंया! छान! छान!”
असं ओरडून सांगणारे माझे आजोबा मला बागेत दिसतात.
कुड्याच्या विडीचं थोटूक नाम मात्र ओठात धरून नव्याने आकार घेणार्‍या बागेत धुडगूस घालून कुदणार्‍या माझ्या बरोबरीच्या मुलांकडे पाहून एका कोपर्‍यात उभे असलेले माझे आजोबा बागेला संबोधून म्हणायचे,
“बघा,बघा माझी बेबी हळू हळू मोठी होत आहे!”

“किती रे,प्रेम करतोस तुझ्या आजोबावर.तू विकसीत केलेली ही बाग बघायला तुझे आजोबा जीवंत असते तर त्यानी नक्कीच तुला आपल्या छातीजवळ कवटाळून घेतलं असतं.”
माझं हे बोलणं ऐकून प्रमोद बराच भाऊक झाला.

“माझ्या आजोबांमुळे,आजोबांवरच्या प्रेमामुळे विकसीत झालेल्या ह्या बागेत मी वावरत असताना माझं जीवन त्यातून प्रतिबिंबीत होतं.प्रत्येक नव्याने येणार्‍या मोसमाचा मी कृतज्ञ असतो.माझ्या आजोबांचे ते विचित्र विनोद, खसखसून हंसणं आणि त्यांच्या डोळ्यातली चमक ह्या पासून होणारं दुरावलेपण मला जाणवत असतं.दुःखाची भरपाई करण्याच्या बगीच्यातल्या क्षमतेमुळे आपल्या जवळचं माणूस आपल्या हृदयात सामावून ठेवता येतं हे मला विशेष जाणवतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 13, 2010

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ!”

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
कर तुही निर्मिती कवितेची
दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची

“मला तिसावं लागेपर्यंत कळलं नाही की बर्‍याच अडचणीत असलेला तो माझा मामाच असण्याची शक्यता होती.
कारण मला एक फोन आला की बर्‍याच वर्षांच्या दारूच्या व्यसनाने बरबाद झालेली त्याची लिव्हर फुटली आणि त्यातच त्याचा अंत झाला आणि खरं म्हणजे तो माझा मामाच होता.
त्याचे ते शब्द मात्र मागे राहिले.पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्या शब्दांनी माझी व्याख्या करण्याची आता कुणालाही जरूरी भासणार नाही.”
अगदी काकूळतेला येऊन मालती मला सांगत होती.

मालती आईवडीलांची एकुलती एक मुलगी.तिच्या वयाच्या आठव्या वर्षीच तिचे बाबा दम्याच्या पीडेच्या आहारी गेले.त्यांनी खूप त्रास काढला.मी त्यांना मोठमोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो आहे.पण त्यांची फुफ्फुसं जन्मतःच कमजोर होती.त्यामुळे दम्याचा ऍटेक आल्यावर एकतर प्राणवायुचा सिलिंडर वापरून सावरून घ्यायचं किंवा औषधावर भरवंसा ठेवून रहायचं.शेवटी शेवटी त्यांना सिलिंडर वापरण्याविना गत्यंतरच नव्हतं.बिचारे कंटाळून
जायचे.
“आयुष्यात रहाण्याची इच्छाशक्तिच गेली”
असं मला एकदा वैतागून म्हणाले होते.मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करायचो.पण शेवटी,
“जावे त्याच्या वंशी त्यालाच कळे “
हेच खरं ठरलं.त्यांची अन्नावरची इच्छाच गेली.आणि नंतर व्हायचं तेच झालं.

मालती आणि तिची आई मालतीच्या आजोळी कोकणात गेली.
मालतीचे आजी आजोबा पण बरेच वृद्ध झाले होते.पण ह्या दोघांना दुसरा आधार नसल्याने त्यांना आपल्या घरी ठेऊन घेण्याविना त्यांना पर्याय नव्हता.मालतीला एक मामा होता.
मामा जरा सरफिरा आणि गरम डोक्याचा होता.आपल्या आईला घालून-पाडून बोललेलं मालतीला आवडत नव्हतं. आपली आई रडायची हे पाहून मालतीला दुःख व्हायचं.आजीआजोबांचं काही चालायचं नाही.

जून्या आठवणी काढून मालती मला सांगत होती.
“माझ्या मामाच्या अश्लाघ्य शब्दांशी मी नेहमीच सामना करीत आले.आणि ते सुद्धा माझ्या शब्दांनी.माझ्याच खोलीत थोडावेळ निपचित पडून झाल्यावर,माझ्या जाडजूड बोटांनी,माझ्या आठव्या वयातसुद्धा मी काही गोष्टी किंवा कविता खरडून काढायची.माझे लिहिले गेलेले शब्द रात्रभर माझ्या आजुबजूला,माझ्या बिछान्यावर पडून असायचे.जणू ते शब्द माझ्यासाठी ढाली सारखे असायचे. माझं संरक्षण करण्यासाठी.त्या रात्रीतून माझी सुटका
करण्यासाठी.”

“मला आठवतं मी एकदा कोकणात आलो होतो तेव्हा तुझ्या घरी आलो होतो.तू त्यावेळी घरी नव्हतीस.मी विसरणार नाही, मी तुझ्या खोलीत एका भिंतीवर पाटी लटकवलेली वाचली होती.
“हे ही दिवस जातील”
मी मालतीला आठवण देत म्हणालो.

“हो मी त्यावेळी सोळएक वर्षांची होती असेन.”
असं म्हणत मालती आपल्या लहानपणाच्या आठवणी काढून काढून मला सांगत होती.
“पण दुसर्‍या दिवशीच्या सकाळाच्या पारीला माझ्या मामाचे शब्द मला पुन्हा हलवून हलवून जागं करायचे.ते शब्द म्हणजे,
“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ “
हे शब्द त्यावेळी झोपेतच माझ्या डोक्यात प्रतिध्वनी सारखेचे वाजायचे. आणि ज्यावेळी मी माझे डोळे उघडायची आणि मला त्यातली अश्लाघ्यता पटायची, त्यावेळी लगेचच उठून मी ते आदल्या रात्री खरडलेले शब्द नष्ठ करून टाकायची.”

“हे असं तुझा मामा कुठपर्यंत करायचा?”
मी मालतेला कुतूहलाने प्रश्न केला.

मला म्हणाली,
“मी वयात येईतोपर्यंत ह्या अश्लाघ्य शब्दांचा भडिमार माझ्यावर रोजच झाला आहे.आणि मी मोठी बाई झाले तरी तो टिकून राहिला.त्या शब्दांनी माझ्या मनाला,माझ्या आत्म्याला आणि माझ्या द्रष्टेपणाला घडवलं गेलं.मी जेव्हा आरशात पहायची तेव्हा का कुणास ठाऊक,खरीच मी माझा मामा म्हणायचा तशी

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ”
मलाच भासायची.”
मला मालती कडून हे ऐकून खूपच वाईट वाटत होतं.पण तिच्या मनाचा ओघ जाण्यासाठी मी ती सांगत होती ते निमूट ऐकत होतो.

“आणि असं असून सुद्धा दिवसभरात ते शब्द त्याच्या तोंडून ऐकल्यावर प्रत्येक रात्री,मी काहीतरी खरडत रहायची.मी अशा अविर्भावात लिहायची की जणू त्या लिहिलेल्या शब्दांवर माझं जीवन निर्भर होतं.मी माझं ते लेखन,ते शब्द वाचायची आणि मला ते सर्व ठीक आहे असं वाटायचं.आणि जेव्हा हे शब्द माझ्या डोक्यात घुसायचे तेव्हा माझ्या मामाने उच्चारलेले आणि माझ्या डोक्यात बसलेले ते अश्लाघ्य शब्द त्यांना हुसकावून काढायचे.”
मालती मला सांगत होती.

“ज्यावेळी माणसाला मनस्वी दुःख होतं तेव्हा त्याला आपलं दुःख कुणाकडेतरी उघडं करावं असं खूपच वाटत असतं. काही दुसर्‍यांना सांगून आपल्या तोंडच्या शब्दानी ते उघड करतात. तर काही कागदावर लिहून आपलं मन हातातून येणार्‍या शब्दातून -लेखातून -उघड करतात.पण एक मात्र नक्की, दुःखानेच प्रतिभा उभारून येते.
साहित्यातल्या अनेक विषयामधे दुःखाने जर्जर होऊन लिहिलेले विषय वाचकाला भावत असतात.असं मला तरी वाटतं.सुरेश भटांच्या कविता वाचून मी काय म्हणतो ते तुला नक्कीच कळेल.बिचारे सुरेश भट पोलिओ मुळे एका पायाने अधू होते.आणि ते त्यांना नेहमीच खटकायचं.एका कवितेतत्यांनी लिहिलंय की,
देवा मला दुसरा जन्म दिलास तर अधू करू नकोस “
मी मालतीच्या प्रयत्नांची स्तुतीच करीत होतो.

माझं हे बोलणं ऐकून मालतीला आनंद झालाही आणि आनंद झाला नाहीही.
मला म्हणाली,
“आणि असं असून सुद्धा रोज रात्री नव्याने खरडलेल्या त्या माझ्या शब्दात मला गम्य वाटायचं.जणू माझ्या लेखणीच्या फटकार्‍याने माझी भावस्पर्शी स्थिति निपटूनच जायची.माझा आत्मसंदेह एखाद्या अतीप्रिय रजईसारखं मला गुरफटून ठेवीत असायचा.
कुणी नवीन मैत्रीण मला मिळाली किंवा एखादी संधी माझ्या जवळ चालून आली की मी ह्या रजईचा मला गुरफटून घेण्यात उपयोग करायची.
असं असूनसुद्धा त्यानंतर मी माझं लेखन नष्टच करायची.कदाचीत त्यामुळे मला वाटायचं की मला कुणीही मी किती विक्षिप्त दिसते हे सांगणार नाही.पण असं करणं कायम टिकलं नाही.”

मालती हे म्हणाली ते ऐकून मला अचंब्यातच तिने टाकलं.
“कायम टिकलं नाही म्हणजे काय झालं?”
मी तिला सरळ सरळच प्रश्न केला.

मला म्हणाली,
“त्यानंतर, मी आतापर्यंत अनेक रात्री माझ्या अंथरूणात बसून काहीतरी लिहून काढायची.मी रकानेच्यारकाने भरून लिहलं आहे. त्यात माझा मामा, माझं जीवन आणि माझी श्रद्धा ह्याबद्दल खरडंत गेलेलं आहे.
आणि असंच एकदा सकाळी उठून मी ते वाचायला घेतलं.आणि नंतर मी माझ्या मनात निश्चीत केलं की माझे लिहिलेले शब्द असे फेकून देणं,नष्ट करणं हे शुद्ध मुर्खपणाचं आणि लज्जास्पद होईल,म्हणून ते लेखन नष्ट करायचं नाही.”

“तू मला एकदा तुझं कवितांचं पुस्तक वाचायला आणून दिलेलं आठवतं.आणि तुझ्या कविता वाचून मी तुला म्हणाल्याचंही आठवतं की तुझ्या कविता दुःखी वाटतात.ते ऐकून तू फक्त हंसली होतीस. आणि मी ही त्यावेळी जास्त ताणून धरलं नव्हतं.”
मी मालतीला म्हणालो.

“जसे दिवस निघून गेले तसं मला माझंच वाटायला लागलं की मी किती सफल लेखिका आहे ते.
मी मग निर्णय घेतला की मी माझ्या कविता छापायच्या. आणि ते फक्त एव्हड्याच कारणासाठी की माझा मामा मला म्हणायचा तशी मी नाही हे दाखवायला.आणि असं करीत असताना माझ्या वयक्तिक भावना कागदावर लिहून त्या कुणालाही वाचायला मोकळ्या झाल्या तरी चालेल.
माझ्या मनात आलं, की जरी लोकाना ते लेखन आवडलं नाही तरी चालेल.मी लिहितंच राहिन.त्यातलंच एक कवितेचं पुस्तक मी तुम्हाला दिलं होतं.”
मालतीने अगदी अभिमानाने मला सांगून टाकलं.

आता मला भरंवसा वाटायला लागलाय की तुझ्या मामाचं तुझ्याबद्दलचं अश्लाघ्य बोलणं नष्ट होऊन, त्या,
“गबदूल,आळशी,ऐतखाऊ”
मुलीला स्वतःला,
“बुद्धि,धैर्य,आणि सौंदर्य आहे”
हे उघड झालं आहे.
मी तुझ्या अनेक पुस्तकांची वाचनं करायला उत्सुक आहे.आणि त्यातला तुझ्या कविता दुःखी असल्यातरी चालतील. नव्हे तर त्या दुःखीच हव्यात. सुखात असतीस तर एव्हडं लेखन आणि कविता तुझ्या हातून कदाचीत झाल्या नसत्या.माझीच कविता मला आठवते.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वां उल्हासित करावे
गुलाब, जाई,जुई अन मोगरा
घाणेरी, लाजेरी,कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
कर तुही निर्मिती कवितेची
दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 10, 2010

वंदनाची यमूताई.

वंदना,काल माझ्या घरी आली होती.तिची मोठी बहीण यमूताई,बरीच आजारी आहे हे सांगायला आली होती.मला ते ऐकून धक्काच बसला.यमूचं तेव्हडं काही वय झालं नव्हतं.

वंदना मला म्हणाली,
“अलीकडेच ताईने मला बोलावून घेतलं.मला म्हणाली,
“किमोथेरपी करायचं मी सोडून दिलं आहे”.
आणि पुढे माझी ताई मला हंसत हंसत म्हणाली,
“मी नेहमीच म्हणत होते की मला आईचा विसरभोळेपणा येईल.पण त्या ऐवजी हा कर्क रोग कसा झाला कळेना.”

श्रीयुत आणि श्रीमति वालावलकरांना चार मुलं आहेत.मोठी यमुना.
वालावलकर निवृत्त होऊन लगेचच गेले.यमुची आई त्यानंतर बरेच दिवस राहिली.पण बिचारीला उतारवयात विसरभोळेपणाचा व्याधी झाला होता.

मुलांनी तिची खूप सेवा केली.पण त्यातच ती गेली.
माझा आणि वालावलकर कुटूंबाचा चांगलाच स्नेह होता.काही झालं की, त्यांच्याकडून कोण ना कोण मला सांगायला यायची.

मी वंदनाला म्हणालो,
“मला वाटतं,बहीणी,बहीणीमधे खास दुवा असतो.तुझ्या नशीबाने तुला दोन बहीणी आणि एक भाऊ आहे.तुम्हाला तुमची माती माहित आहे.आणि तुमची मुळंही समान आहेत.वाटलं तर,चांगलं किंवा वाईट म्हण, उन्हाळा असो वा पावसाळा तुम्ही भावंडं एकमेकाला समजून उमजून असतां.”

माझं हे ऐकून,आपल्या मोठ्या बहीणीची, यमूनेची, आठवण येऊन वंदना मला म्हणाली,
“माझी मोठी बहीण यमूताई सोळा वर्षांची होती जेव्हा माझा जन्म झाला.मी ऐकलं की माझी आई माझ्या वेळी गरोदर आहे हे ऐकून त्यावेळी ती थोडीशी नाखूष होती.आणि त्यावेळी तिची खात्री नव्हती की ती माझ्या बरोबर प्रत्येक वेळी माझ्यात सहभाग घेईल.पण जशी माझी यमूताई दिसते आहे तशी पाहिल्यावर तिने माझ्या बरोबर सहभाग न घेण्याचं सोडूनच द्या,माझ्यावर केलं तितकं तिने कुणावरही प्रेम केलं नसेल.मी म्हणेन असं प्रेम फक्त मोठीच बहीण करूं शकते.”

पूर्वीच्या आठवणी येऊन मी वंदनाला म्हणालो,
“मला आठवतं,तुझ्या ताईचं लग्न झाल्यावर ती तुमच्यापासून फार दूर रहायला गेली.तू त्यावेळी जेमतेम बारा वर्षांची असशील.तरीपण तुमच्या आणि तिच्या घरामधल्या “डोंगर-दर्‍या” ओलांडून तुम्ही एकमेकाला वर्षातून एकदा तरी भेटत असायचा हे मी पाहिलं आहे.”

वंदनाला त्यांच्या भेटी आठवून आणखी सांगावं असं वाटलं,
” आमच्या वार्षीक भेटी पहाटे,पहाटे पर्यंत गप्पा मारण्यात,भाजेलेल्या भूईमुगाच्या शेंगा सोलून खाण्यात गेल्या आहेत. कुटूंबात येणार्‍या कटकटी आम्ही एकमेकात कुजबुजत असताना,एकमेकाच्या संपत आलेल्या वाक्याची नकळत पुनरूक्ती करण्यात गेली आहे.”

“तुझी आई आजारी झाल्यानंतर तुझी यमूताई तुम्हा भावंडांना आईसारखीच वाटत असावी”
मी वंदनाला म्हणालो.

“माझ्या यमूताईकडे परत परत कतीदा तरी मी माझ्या जीवनातल्या अडचणी,माझे विचार आणि माझे आनंदाचे क्षण घेऊन जायची.”
वंदना म्हणाली.आणि सांगू लागली,
“माझं लग्न होण्याच्या बेतात असताना,माझं कुणावर प्रेम होतं,आणि नंतर मी कुणाशी लग्न करायला तयार झाले आहे ते पण मी तिला सांगीतलं आहे.माझ्या मुलांना घ्यावे लागणारे परिश्रम आणि त्यांच्या जीवनातल्या कटकटीत मी माझ्या ताईला सहभागी करून घेतलं आहे.आमचे बाबा गेल्यावर पाच एक वर्षांनतंर आमच्या आईला उतार वयात आलेला विसरभोळेपणा आणि त्यासाठी आम्हाला काढाव्या लागणार्‍या मानसिक प्रयासाबद्दल तिला चिंता वाटायची.
आमच्या दोघांतलं हंसणं बरेच वेळा आमच्या नवर्‍यांना गोंधळात टाकायचं.आम्ही दोघं घरासमोरच्या अंगणात बसून तासन-तास गप्पा मारताना वेलची मिश्रीत दुधाची कॉफी पीत पीत म्हणायचो रोज असं करायला शक्य होईल तर किती आनंद होईल.”

“तुझी यमूताई खरोखरच प्रेमळ आहे.माझ्याशी बोलताना तिच्या प्रेमळ स्वभावाची मला प्रचिती यायची.आपला संसार संभाळून तुम्हा भावंडांबद्दल ती नेहमीच आस्था दाखवायची.आईच्या प्रकृतिबद्दल काळजी करीत बसायची.”
मी यमुनेबद्दलचं माझं मत वंदनाला सांगत होतो.

“झाडापेडात फिरायला,राजकारणावर बोलायला,आणि आमच्या आईच्या हातून केलेल्या निरनीराळ्या पदार्थाबद्दल,विशेष करून आईने केलेल्या डाळीच्याआमटीबद्दल आम्ही एकमताने सहभागी व्हायचो.आमची आई विसरभोळेपणाच्या आजाराशी दोनहात करून शेवटी गेली.”
आईची आठवण येऊन वंदना थोडी भाऊक झाली.

मी म्हणालो,
“मला आठवतं मी तुझे बाबा हयात असताना तुझ्या घरी केव्हाही आलो तरी तुझी ताई तुझ्या आईला आराम करायला सांगून आपण काम करायची. मला वाटतं यमुनेला तुझ्या आईच्या आजाराची अंधूक अशी कल्पना येत असावी.पण ती कुणाला बोलून दाखवत नसायची.”

वंदना म्हणाली,
“माझ्या यमूताईबरोबर मी आमच्या आईच्या व्याधीवर खूप चर्चा केली होती.त्यापासून होणारे क्लेश आणि त्यातून होणारा अंत ह्यावरही चर्चा केली.
काही झालं तरी हीच व्याधी आपल्यातल्या कुणाला झाल्यास आपण एकमेकाची काळजी घेऊच,असं एकमेकात पक्क ठरवलं होतं.कारण आम्हाला खात्री होती त्या व्याधीपासून आमची सुटका नव्हती.
यमूताई माझी जीवश्च-कंटश्च मैत्रीणही आहे आणि बहीणही आहे. तिने मला कांटा न लागता कर्ली हा मासा कसा खायचा,कच्च्या फणसाची-कुयर्‍याची-भाजी कशी करायची पासून अपराध करणार्‍या कुणालाही माफ कसं करायचं हे शिकवलं आहे.ति्ची ज्यावर श्रद्धा आहे त्याला ती चिकटून असते.आणि तसं करताना न डगमगता, सहजसुंदरतेने आणि आपल्या ढंगात करते.तिच्या जीवनात ती आवेशपूर्वक राहून आणि अनुभव घेत घेत जगत आहे.
आता तिला गर्भाशयाचा कर्क रोग झाला आहे.रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात तिच्या हाडात पसरला आहे.”

“तुम्ही सर्व तुमच्या ताईला वरचेवर भेट देत असाल.कारण हा रोग वाढायला लागला की झपाट्याने वाढतो.मला तू सांगीतलंस ते बरं झालं.मी लवकरात लवकर तिला भेटतो.”
मी वंदनाला म्हणालो.

“माझ्या भावंडांबरोबर तिच्या घरी आम्ही खूपदा जात असतो.जे काही तिने आपल्या जीवनात मिळवलं त्यात तिला आपल्या मुलांबद्दल जास्त अभिमान आहे.मी तिचा हात हातात घेतला आहे. चमच्याचमच्याने आईस्क्रीम घेऊन तिला भरवून तिला झोप आलेली पाहिली आहे.जून्या आठवणी काढून हंसलो आणि रडलोही आहोत.ती शरपंजरी होत असतानाही तिच्या अंगातली ताकद पाहून मला अचंबा वाटतो.”
वंदना सांगत होती.

“आता जे होणार आहे ते चूकणार नाही.आधूनीक औषोधोपचाराने चमत्कार घडवले आहेत.आपल्याला नेहमीच सांगीतलं जातं की योग्य अशा सकस आणि पौष्टीक आहाराने आणि नियमीत व्यायामाने दीर्घायुष्य मिळतं आणि निरोगी स्वास्थ्य मिळतं.”
मी वंदनाला धीर येण्यासाठी म्हणालो.

वंदना म्हणाली,
“पण आमची यमूताई हे सांगायला साक्ष झाली आहे की,
“होणारे न चुके.”
म्हणजेच आपल्या हातात काहीच नाही.
अनेक वर्षं उचित खाणं खाऊन,रोज चालण्याचा व्यायाम घेऊन, योगासनं करूनही ती जाण्याच्या पंथाला लागली आहे.
ती आमची मोठी बहीण आहे.आम्हा सर्वांना तिने एकत्रीत ठेवलं.
आम्हाला वयात येताना तिने पाहिलंय.आणि ह्या निष्ठूर जीवनप्रवासात वाटचाल करतानाही ती आमच्याकडे पहात राहिली,आम्हाला मार्ग दाखवीत राहिली.आम्ही तिला नेहमीच आमच्या जवळ येताना पाहून सर्व काही ठीक होणार याची खात्री बाळगून असायचो. ती आमची ताई आहे.तिच्याशिवाय जीवन अशक्य आहे.”

मी वंदनाला म्हणालो,
“तुझ्या आईच्या व्याधीवर आता बरंच संशोधन झालं आहे.जरी ती व्याधी आनुवंशीक असली तरी त्यावर औषधं आली आहेत.त्याशिवाय शारीरिक व्यायामाबरोबर मानसीक व्यायाम घेत राहिल्यास हा विसरभोळेपणाचा रोग बराच दुरावला जातो असं माझ्या वाचनात आलं आहे.”

“रोज वाचन करून, कोडी सोडवून, थोडं फार लिहूनही निश्चीतच,कधी काळी,आईचा तो व्याधी, माझ्या डोंबल्यावर येऊन बसणार आहे हे मला जाणवत आहे.
सतत गोंधळात टाकणार्‍या त्या व्याधीने माझी आई कशी जर्जर झाली होती ते आठवून माझं मन भित्रं होतं.
मला माहित आहे मी वेळोवळी अडखळणार आहे,शेजार्‍यांचं नाव काय ते माझ्या लक्षात रहाणार नाही,किंवा चहाचा कप कुठे ठेवला आहे ते विसरणार आहे.
पण तुम्हाला खरं सांगू का,माझा कुटूंबव्यवस्थेवर,त्या समान मुळांवर,जीथे आनुवंशिकता आहे,त्यावर विश्वास आहे.तसंच माझ्या आईच्या डाळीच्या आमटीवरपण विश्वास आहे.
माझी ताई जाण्याच्या पंथावर आहे पण तिचा आत्मा,जो तिचं व्यक्तिवैशिष्ट्य आहे, ते जीवंत रहाणार.आणि कदाचीत मी माझ्या गोष्टीसाठी विसरभोळी राहीन पण तिचं व्यक्तिवैशिष्ट्य विसरणार नाही.मी माझ्या यमूताईला,माझ्या मोठ्या बहीणीच्या प्रेमला विसरणार नाही.”

यमुताईला निश्चितच भेटायला येण्याचं आश्वासन मी वंदनाला दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 7, 2010

“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती.”

आयुष्यात वेळोवेळी असे प्रसंग येतात की,काहीना काही निर्णय घेण्याची पाळी येते.पण एखादा प्रसंग खरोखरच आपलीच सत्वपरिक्षा घेण्यासाठी निर्माण होतो आणि त्यावर निर्णय घ्यायला आपल्याला विवश करून टाकतो.

मायाचं असंच झालं.तिच्या आईवडीलांचं घर कोकणात होतं.वडील अलीकडेच वार्धक्याने गेले.तिची आईपण बरीच थकली होती.ती जवळ जवळ बॅण्णव वर्षाची झाली होती आणि एकटीच होती.माया एकूलती एक मुलगी होती.माया तिला वरचेवर भेटून जायची.आईच्या सुशृषेसाठी मायाने बराच खर्च करून योजना आखल्या होत्या.तिला रोज स्पंजींग करायला आणि तिच्या औषध पाण्याची नीगा ठेवायला एका नर्सला कायमची ठेवली होती.हे सगळं मायाने स्थाईक डॉक्टरच्या सुचनेवरून केलं होतं.

अलीकडे माया आपल्या आईला भेटायला आली असताना डॉक्टर तिला म्हणाले,
“माया,तुझी आई जास्त दिवस काढील असं दिसत नाही.तरीपण कुणाचा मृत्यू केव्हा येईल हे सांगणं फारच कठीण असतं. माझ्या सांगण्यावरून तू पैशाच्या मदतीने तुझ्या आईची अत्यंत उत्तम सेवा करण्यात कर्तव्य बजावलंस.पण जे पैशाने होणार नाही ते तू तुझ्या आईजवळ जातीने हजर राहून होईल.त्यासाठी तुझा काय तो निर्णय तू घे.”

आईला सोडून आपल्या घरी परत येत असताना मायाला गाडीत सतत डॉक्टरांचे उद्गार डोक्यात येऊन अस्वस्थ व्हायला होत होतं.
विशेषकरून ते डॉक्टरांचं वाक्य.
“आईजवळ जातीने हजर राहून होईल.”

माया एक दोन वर्षात निवृत्त होणारच होती.ते आईसाठी अगोदरच करावं की काय हा विचार ह्यावेळी तिने आपल्या नवर्‍याला विचारायचं ठरवलं होतं.
माया अलीकडेच दोनतीन दिवसासाठी आईला सोडून आपल्या नवर्‍याकडे आली होती.त्यावेळी आपलं मनोगत मला सांगत होती.
माया मला म्हणाली,
“माझा नवरा खरंच देवमाणूस आहे.मी त्याला विचारल्यावर मला म्हणाला,”
“माया तू तुझ्या नावासारखीच मायाळू आहेसच,पण आपल्या आईच्या अखेरच्या दिवसात अशा परिस्थितित कुणालाही तुला वाटतं तसंच वाटणार.तू खुशाल राजिनामा दे.नोकरी परत करता येते.त्याच्यासाठी तुझं आयुष्य पडलेलं आहे.पण तुझी आई तुला परत मिळणार नाही.”

“मग तू काय निर्णय घेतलास?”
मी मायाला विचारलं.

“मी आई हयात असे पर्यंत तिची सेवा करायचं ठरवलं.मी लवकर निवृत्त झाले.आणि नवर्‍याला आणि मुलांना सोडून आईच्या घरी रहायला आले.”
माया मला सांगू लागली.
“सुरवातीला फारच कठीण जायचं.एकदाचे रात्रीचे दिवे काढल्यावर आणि कंटाळवाण्या सबंध दिवसाच्या समाप्ति नंतर एक मोठा उसासा टाकून मी माझ्या मलाच विचारायची,
” हे सर्व कशासाठी चाललं आहे?”माझं वयक्तिक आणि व्यवसाईक जीवन मधेच सोडून माझी आई जी आता बॅण्णव वर्षाची आहे तिच्या बरोबर का रहायला आले आहे?”

मला मायाची कींव आली.मी तिला म्हणालो,
“खरंच विवश करणारा हा निर्णय आहे.तुला तुझ्या आईच्या प्रेमापोटी असं करणं स्वाभाविक आहे.पण तुझ्या नवर्‍याने आणि मुलांनी दिलेलं सहकार्य वाखाणण्यासारखं आहे.
पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली का?

मी उलट प्रश्न करताच माया मला म्हणाली,
“माझ्या मनात मी प्रश्न आणल्यावर माझंच मन मला लगेचच उत्तर द्यायचं.
“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”
नंतर ही जातीने हजर रहाण्याची कारणं काय असावीत हे हुडकून काढायला मला जोर यायचा.”

“मला तुझ्या मनातली कारणं ऐकायला नक्कीच आनंद होईल.”
असं मी म्हणताच,मायाने एका मागून एक कारणं द्यायला सुरवात केली.ते ऐकून मी थक्कच झालो.
मला म्हणाली,
“माझ्या आईला औषधाच्या दुकानातून रोजचंच जे काय लागतं ते आणण्यासाठी,जातीने हजर रहायला.
सतत चालणार्‍या मोठ्या आवाजातल्या टीव्हीचा सहन न होणारा आवाज ऐकायला,जातीने हजर रहायला.
जेव्हा माझी आई ती बसलेल्या खुर्चीवरून उठण्याचा प्रयास करताना, तिची धडपड चालली असताना,जमिनीवर तिचे पाय ती घट्ट ठेवताना आणि अशावेळी ती पडू नये म्हणून मी तिला आधार देताना,आलेले जणू असे क्षण की काळ क्षणभर थांबला असावा की काय हे भासवून घेण्यासाठी, जातीने हजर रहायला.
माझ्या आईच्या मनात घर केलेल्या भितीमुळे तयार झालेल्या नकारार्थी आवरणाला दूर करण्यासाठी काहीतरी तिच्या कानावर पडावं म्हणून ज्ञानेश्वरीतून आणि गीतेमधून वाचून दाखवण्यासाठी, जातीने हजर रहायला.
माझ्या भावनाना मृत्यूच्या मार्गाने जाण्यात येणारा आनंद आणि चमत्कार समजावून देण्यासाठी,जातीने हजर रहायला.
माझ्या बालपणातल्या आठवणी उजळण्यासाठी,गेल्या तीस वर्षातल्या जीवनाची उजळणी करण्यासाठी,जातीने हजर रहायला.
अशी एकामागून एक कारणं मी शोधून काढायची.”

“ग्रेट”
मी मायाला म्हणालो.

“माझ्या आईच्या घरात एक सुंदर गणपतिची तस्वीर आहे.मला लहानपणापासून चित्र काढण्याचा नाद होता. जे.जे.स्कूलमधे जाऊन चित्रकलेवर मी डिप्लोमा पण घेतला.पण हे चित्र मी वयाच्या चौदाव्या वर्षावर काढलं होतं. आता माझं वय सत्तावन्न आहे.”
माया मला मन मोकळं करून सांगायला लागली.

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती. किचनपासून माझ्या आईच्या बेडरूमकडे आणि परत किचनकडे जाण्याच्या मार्गात ही तस्वीर दिवसातून पाच-दहावेळेला माझ्या नजरेसमोरून जायची. आईला पाणी आणून दे,तिला औषधाच्या गोळ्या आणून दे,तिला हवी असलेली पण ती आणायला विसरलेली एखादी वस्तू तिला आणून दे असे फेरफटके व्हायचे.आईने हे सगळं आणायचं ठरवलं तर तिला तिच्या वेगात चालण्यात अर्धा दिवस जायचा.आणि ते करताना सुद्धा वाटेत काही कागदाचा कपटा पडला आहे म्हणून किंवा अशीच काहीतरी बारिक सारिक गोष्ट उचलून घेण्यात तिचा वेळ गेल्याने सरतेशेवटी कोणत्या वस्तूसाठी ती उठून आली होती तेच ती विसरून जायची.

“माया ग,मी काय आणायला आले होते?”
ती ओरडून विचारायची.मी तिला उत्तर मुळीच देत नसायची.पण तिला काय हवं होतं ते लक्षात घेऊन तिला मुळीच न सांगता,तिनेच हुडकून काढावं आणि अशा तर्‍हेने कदाचीत तिच्या पुस्सट होत जाणार्‍या स्मृतिची बचत करायला मी तिला मदत करायची.”

मी मायाला म्हणालो,
“जातीने हजर रहाणं” ही एक तुझ्याकडे उक्ति किंवा वचन झालं असेल नाही काय?.एखादा उच्च कार्यविधि झाला कसं झालं असावं.पण तू ते आचरीत आहेस.
तुला एव्हांना ठाऊक झालं असेल की तुझी आई आता तुझीच शिक्षीका झाली आहे आणि तू तिची आई झाली आहेस.”

माझं हे ऐकून माया खरोखरंच भावनाप्रधान झाली.
मला म्हणाली,
“आमच्या घरातल्या,त्या हॉलमधल्या भिंतीवरच्या गणपतिबाप्पाच्या असंदिग्ध अस्तित्वामधून, मी माझ्या आईचा हात धरला असताना माझा कोपर धरल्याचा भास होण्यात,माझा तोल जाऊ नये म्हणून सज्ज राहून,त्या क्षणाच्या वजनाखाली पडून उठण्याच्या धडपडीत उठवण्यासाठी प्रयत्न होण्यात,पाय घसरल्यावर तोल संभाळण्यासाठी मदत होण्यात,मी आणि माझी स्वपनं ह्या मृत्युमार्गाकडच्या वाटचालीच्या प्रक्रियेत हरवून न जाण्यात ते अस्तित्व माझ्या मागे सज्ज आहे असं मला वाटायला लागलं आहे.”

मला मायाचं हे ऐकून, खरोखरंच माझा तिच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहून ती हंसली.आणि मला म्हणाली,
“माझी गति माझ्या आईच्या गति एव्हडी हळुवार झाल्याने,माझ्या जीवनाच्या सीमेभोवती असलेली प्रेमाची झुळूक मला भासू लागली आहे. मृत्यूला दारातच उभा ठाकायचा इशारा देण्याची ही वेळ असताना,त्याच्याच डोळ्यात डोळा घालून आणि एखादा मार्ग काढून,उघड्या मनाने मी आणि माझी आई बसले आहे त्या बैठकीकडे त्याचं स्वागत करावसं वाटत असताना,हवेतला हलकासा आनंदाचा सुगंध मी घेत आहे.”

मायाचं हे सर्व ऐकून मी खिशातून रुमाल काढून माझे डोळे पुसले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 4, 2010

“आईआज्जी तू पण!”…(काळजी घे).

“ज्यावेळी बाहेर जाण्यासाठी मी तिच्याकडे पाठमोरी होऊन बाहेर पडायला लागले त्यावेळी मी माझ्या कानात अस्पष्ट शबद ऐकले,
“काळजी घे”

“लहान वयातच मला समजायला लागलं होतं की माझ्या आईआज्जीकडून तसं प्रेम मला मिळणार नाही जसं माझी आई मला जवळ कवटाळून माझा मुका घेऊन रोजच द्यायची.
शोभना मला आपल्या मनातली, आपल्या आजीची तक्रार-वजा चिंता वर्णन करून सांगत होती.

“माझ्या आजीने मला जवळ घेऊन कधीच कवटाळलं नाही.अगदी गरज लागली तरच,नाहीपेक्षां ती क्वचितच माझ्याशी बोलली असेल..मी वयात येत असताना मला वाटायचं की,आजीकडून ऐकली जाणारी- श्रावणबाळाची, धृवबाळाची, गोकूळातल्या कृष्णाची- अशा प्रकारच्या गोष्टीपासून मी वंचित झाले आहे.

जेव्हा दुसरी मुलं आपल्या आजीबद्दल बोलायची,

“आमच्या आजीने नेहरू,गांधीची भाषणं ऐकली आहेत,बेचाळीसचा लढा पाहिला आहे,सुखदेवला फांसावर लटकवल्याची बातमी पेपरात वाचली आहे,”

की माझ्या लक्षात यायचं की, मी आजीजवळ बसल्यानंतर मनातल्या मनात ईच्छा करायची माझी आजीसुद्धा एका रात्रीत बदलून अशाच काहीश्या गोष्टी मला सांगील.मी माझ्या आजीला प्रेमाने “आईआज्जी” म्हणायचे.”

मला शोभनाकडून हे सर्व ऐकून गंमत वाटलीमी तिला म्हणालो,

“अग,तू आजीला आईआज्जी म्हणायचीस.म्हणजे एका प्रेमळ नावात आणखी एक प्रेमळ नाव घालून तू तुझ्या आजीवर किती प्रेम करायचीस हेमाझ्या लक्षांत येतं.पण आजीचं राहूंदे.तुझ्याकडून तुझ्या आजीवर किती प्रेम व्हायचं?”

“मी जर कधी,
” माझी आईआज्जी”
असं तिच्या जवळ जाऊन, तिला मिठी मारून म्हणाले तर मग तिच्या ओठावरून,
“माझी ती बाय “
असे शब्द निसटून यायचे.”
आपल्याकडून होणार्‍या प्रेमाची बाजू शोभना पटकन सांगून गेली.

आणि पुढे म्हणाली,
“माझ्या मनात यायचं की आजीच्या खोलीत गेल्यावर मला ती जवळ कवटाळून घेईल आणि म्हणेल,
“घराच्या पाष्ट्यावर मणीयार जातीची सर्पटोळी दिसली,किंवा हे कपिलेचं चौथं पाडस आहे,किंवा ह्या पिढीतल्या तुम्ही मुली नशिबवान आहात कारण तुम्हाला बिनदास शिक्षण घेता येतं वगैरे”
असं काहीतरी एखाद्या विषयावर घोटून घोटून सांगील.पण अशी कधीच वेळ आली नाही की आजी माझ्याजवळ बसून आमची चर्चा झाली,आणि अशी कधीच वेळ आली नाही की आजीने आपणहून मला जवळ घेऊन,
“माझी ती बाय”
असं म्ह्टलं असेल.”

मला शोभनेची दया आली.मी तिला म्हणालो,
“जे कोण आहे ते तसेच असणार”
हे कसं स्वीकारायचं ते त्या वयात तुला न कळणं स्वाभाविक आहे.
जोपर्यंत प्रेम आपल्या जीवनात अनुपस्थित रहात नाही तोपर्यंत प्रेमाचं मुल्य आपल्याला कळत नाही.”
मी शोभनाची समजूत घालीत म्हणालो.
आणि तिच्याकडून आणखी काढून घेण्यासाठी मी शोभनाला म्हणालो,
“मग तू तुझ्या आईला आजीबद्दलचं कारण विचारलंस का?”

“हो तर!”
अगदी खणकून मला शोभना सांगू लागली.
“एक दिवशी निव्वळ कुतूहल म्हणून आणि नैराश्यापोटी मी माझ्या आईला विचारलं की,
“मला इतर प्रेम दाखवतात तसं माझी आईआज्जी मला का दाखवत नाही? “
माझी आई मला सांगायला लागली,
“आजीला सात भावंडं होती,अगदी लहान असताना तिला तिच्या मामाने दत्तक म्हणून घेतली होती.तिच्या मामाला लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी मुल होत नव्हतं.तिची मामी चागली होती.
पण मामा काहीसा व्यसनी होता.त्यामुळे तिला खर्‍या प्रेमाची चुणूकसुद्धा दाखवायला त्याला संधी मिळाली नाही. अखेर ती प्रेमाने परिपूर्ण असून सुद्धा ते प्रेम प्रकट करायला अपूर्ण राहिली.”
माझ्या आईआज्जीची पूर्वपिठिका ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की मी तिला मिठी देताना तिचे दोन्ही हात अनिच्छापूर्वक का वर यायचे.मला जवळ घेऊन इतर आज्यांसारखी तासनतास गंमतीच्या गोष्टी का सांगत नसायची.”

“तिच्या बालपणी संगोपनाचं नातं काय असतं ते तिने अनुभवलं नसल्याने प्रेम कसं द्यायचं ते तिला ठाऊक झालं नसावं.”
मी शोभनेच्या आजीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.

शोभनेला आपल्या आजीची कींव आली असावी.आंवढा गिळत मला म्हणाली,
“मला एक घटना चांगलीच आठवते.मी त्यावेळी सतरा वर्षाची होती.आईआज्जीला बरं वाटत नव्हतं.तिला दवाखान्यात ठेवलं होतं.माझी आई आणि मी तिच्याबरोबर तीनएक तास तिच्या बिछान्याजवळ बसून होतो.आई निघून गेली आणि आणखी थोडावेळ मी आईआज्जीजवळ बसून होते,ते थंडीचे दिवस होते.दिवस लहान होऊन काळोख लवकर पडायचा.मी पण आता घरी जाण्यासाठी तयारी करीत होते.बाहेरच्या गर्दीच्या यातायातीची तिला
कल्पना असायची.ज्यावेळी जाण्यासाठी मी तिच्याकडे पाठमोरी होऊन बाहेर पडायला लागले त्यावेळी मी माझ्या कानात अस्पष्ट शबद ऐकले
“काळजी घे”
मला आठवतं जणू मला कुणी तरी शीवी दिली की काय अशा विस्मयात मी त्यावेळी पडले.मी फिरून तिच्याकडे पहायला लागले. अवघडल्यासारखा चेहरा करून पुढे काय करायचं अशा अविर्भावात तिला पाहून,

मी तिला म्हणाले,
“तू पण.” …..(काळजी घे)
तिची अवघड कमी करण्याच्या प्रयत्नात मी होते.

त्यानंतर तिचे ते,
“काळजी घे”
हे शब्द कायमचे माझ्या मनात रेंगाळत राहिले.एकदाच प्रथम माझ्या आईआज्जीला वाटलं असावं की कुणाला प्रेम दाखवून जगबुडती होणार नाही.
आणि त्यानंतर नेहमीच ती जाणीवपूर्वक प्रयत्न करून तिला प्रकट करता येईल असं प्रेम मला दाखवायला लागली.पण अजून ती प्रेमाच्या संकल्पनेशी धडपडत असते.आणि कष्टप्राय होऊन ते दाखवीत असते.
पण एक नक्की की ते दाखवताना त्यावर तिचा ताबा आहे हे तिला जाणवतं.
आईआज्जी दवाखान्यातून घरी आल्यानंतर,मी बाहेर जाताना माझा एकही दिवस गेला नाही की मला म्हटले जाणारे ते दोन शब्द मी आजीच्या तोंडून ऐकले नाहीत.
“काळजी घे”

आणि मग मी म्हणायचे,
“तू पण”
आम्हा दोघांना त्या दोन शब्दानी मौल्यवान धडा शिकवला.
हे शब्द आता आमच्या घरात एक परिभाषा झाली आहे.जीवनातलं एक वळण झालं आहे.जगण्याचं आयुध मिळालं आहे.आणि अंतरात असं भिनलं आहे की, हे शब्द आम्ही कधीही त्यागणार नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनेया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 2, 2010

लयीसम भासे मजला जीवनगती

अनुवाद. (संसार है इक नदिया…….)

नदी सम भासे मजला हा संसार
अन सुख-दुःखाचे दोन किनारे
न जाणे कुठे चाललो आपण
प्रवाहाला देती जन्म हे वारे

लयीसम भासे मजला जीवनगती
अन राग-सूराचे दोन बिछाने
सप्त सूरांच्या मधले भ्रमण
सूरमय संगीताला देई जन्म

अंबराच्या नयनातून बरसे श्रावण
पडत्या थेंबातून फिरूनी होती घन
बनण्या बिघडण्याच्या परंपरेने
गुरफटती संसारात सारे जन

कुणी कुणासाठी नसे अपुला वा पराया
नात्या रिश्त्याच्या प्रकाशामधे
हरएक जण असे छाया
नियतीच्या खेळामधला हा न्याय पुराणा

आहे का जगती कुणी पाप केल्याविणा
खुडले का बागेतूनी फुल कुणी कांट्याविणा
निष्कलंक कुणीही नसती या संसारी
लयीसम भासे मजला जीवनगती

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com