Wednesday, August 18, 2010

फुलांना पाहूनी उद्याना येई बहार

अनुवादीत (दर्पण को देखा…..)

दर्पणात पाहूनी करीशी तुझा शृंगार
फुलांना पाहूनी उद्याना येई बहार
आहे मीच कमनशीबी
नजर फिरेना माझ्यावरी एकवार

आळसून पहाशी कोवळी सूर्यकिरणे
तारका पाहूनी रात्री स्वप्नात हरवणे
असाच बहाणा करूनी
न्याहाळीलास तू पुरा संसार

दर्पणात पाहूनी करीशी तुझा शृंगार
फुलांना पाहूनी उद्याना येई बहार

काय सांगू नशीब काजळाचे
लोचनी तुझ्याच ते शोभते
काय सांगू नशीब पदराचे
घट्ट चिपकतो तव शरीराते
तमन्ना माझ्या अंतरीची
बनविशी तुझ्या गळ्यातला हार.

आहे मीच कमनशीबी
नजर फिरेना माझ्यावरी एकवार

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, August 15, 2010

गोड पक्वान्न खाण्याची परिसीमा

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो,
“मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल.
आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.”

“कधी संपूच नये असं गोड पक्वान्न मला भारी आवडतं.एखाद्या मोठ्या वाडग्यात-मोठ्या वाटीत- चॉकलेट-चीपचं आईसक्रिम मला दिलं,आणि त्यातलं अर्ध जरी मी खाल्लं तरी माझ्या संवेदनाची पूर्ती करण्यासाठी,माझी गोड गोड खाण्याची अविरत इच्छा आणखी आणखी खाण्यासाठी आर्जव करायला राहूनच जाते.”
श्रीधर बडोदेकर मला पोटतिडकीने सांगत होते.

त्याचं असं झालं,मला माझ्या एका गुजराथी मित्राच्या मुलाच्या लग्नाला अहमदाबादला जावं लागलं होतं.लग्नात जबदस्त गोड-धोड जेवण असणार याची मला खात्री होती.मला गोड पक्वान्न आवडतात पण आज मी श्रीधर बडोदेकरना गोड खाताना पाहून अचंबीत झालो.पहिल्या पंगतीत माझ्या शेजारीच श्रीधर बसले होते.
गुलाब जांब घेऊन जेव्हा वाढपी आला तेव्हा श्रीधरने त्याचं हातातलं भांडच काढून घेतलं.आणि माझ्याकडे बघायला लागले. मी त्यांच्याकडे कुतूहलाने बघतोय असं बघून मला म्हणाले,
“माझ्या रोज गोड खाण्याला चटावलेली माझी जीभ,लोभी होऊन माझ्या कानात जेव्हा फुसफूस करते तेव्हा सरतेशेवटी मी आणखी एक जेवणाचा हाप्ता घ्यायला प्रवृत होतो.”

श्रीधर तसे प्रकृतिने बारीकच होते.
“एव्हडं गोड खाणारा माणूस एव्हडा बारीक कसा?”

असा प्रश्न माझ्या मनात येण्यापूर्वीच मला म्हणाले,
“माझं हे ऐकून तुमच्या मनात माझ्याबद्दल लठ्ठ व्यक्तिची छबी तयार होणार हे नक्कीच पण माझी आश्चर्यजनक पचनक्रिया माझ्या शरीरयष्टीवर ताबा ठेवते,निदान मी मध्यवयावर येई तोपर्यंत तरी.
त्यामुळे मी त्या अनिवार्य दिवसाचा विचारच करत नाही,की ज्या दिवशी माझी पचनक्रिया मंद होत जाईल आणि माझ्या खाण्याच्या यादीतून गोड पक्वान्न अन्यायपूर्ण ढंगाने जबरदस्तीने काढलं जाईल.”

जेवण झाल्यावर आम्ही दोघे उठून आमच्या खोलीत गप्पा मारायला गेलो.
मी त्यांना बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“मला नेहमीच वाटतं की गोड पक्वान्न हा एक जगातला सर्वात महत्वाचा खाण्याचा प्रकार आहे.”

हंसत,हंसत श्रीधर मला म्हणाले,
“माझ्या बाबतीत विचाराल तर गोड पक्वान्न म्हणजे
“थाळीतला हृदय-झटका”
म्हटलं तरी चालेल.
रेफ्रिजरेटर मधून काढलेलं चमच्या भोवती थलथलणारं चॉकलेटचं आईसक्रिम पासून डब्यात ठेवलेले निरनीराळ्या प्रकारचे गोड लाडवाचे प्रकार-कडक बुंदीचे,मऊ बुंदीचे,रव्याचे,बेसनचे लाडू किंवा राघवदास,किंवा खास बाळंतीणीसाठी डिंक घालून केलेले लाडू पाहिल्यावर मला अपरिमीत आनंद होत असतो. माझ्या जीभेचा गोड चवीचा भाग प्रत्येक चाखण्याच्या क्रियेबरोबर एव्हडा चकीत होत असताना जो माझी ह्या गोडखाऊ शौकाशी एकमत होत नाही त्याला समजावून सांगणंच मला कठीण जातं.

दुसरं काहीच नाही,एव्हडंच काय,धो,धो पावसात बिछान्यावर बसून शरीराभोवती उबदार पांघरूण लपेटून गरम गरम भज्याची चव घेण्यातसुद्धा,मला जास्त सुखदायी वाटणार नाही, जेव्हडं गोड खाण्यात वाटतं.”

मी श्रीधरला जरा धीर करून विचारलं,
“माझ्या सारखा विशेष गोड न आवडणारा माणूस तुमच्या शेजारी पंगतीत बसतो.तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?”

“लाज-भीड न ठेवता ज्यावेळी मी क्षणार्धात गोड पक्वान्नाचा फडश्या उडवतो,ज्याकडे लोक पहिली आणि शेवटची थाळी आहे असं समजतात, त्यावेळी त्यांना माझ्या गोड खाण्याच्या भुकेच्या मापाचं पूर्णपणे आकलन होत नसावं. ब्रम्हांडातल्या ब्लॅक-होलला आजुबाजूचं चक्रदार तारांकुंज गीळंकृत करून त्याचं होतं नव्हतं करून,रितंच राहिल्यासारखं वाटावं तसंच काहीसं गोड पक्वान्न खाल्यावर मला वाटतं.गंमत म्हणजे हे माझं विशिष्ट लक्षण मला तर्कदृष्ट्या निष्कर्शाला आणतं की मला आणखी खायची जरूरी आहे.”
मला श्रीधरने सांगून टाकलं.

मी श्रीधरना म्हणालो,
“खूप गोड खाऊन मला जेवणच नकोसं होतं.तुमचं असं कधी होत नाही काय?”

“काय सांगू तुम्हाला?”
असं म्हणत श्रीधरने गोड पानाचा विडा आपल्या तोंडात कोंबला आणि मला पण दिला.पान चघळत,चघळत मला म्हणाले,
“माझी गोडखाऊ जीभ कधीच तृप्त नसते. अगदी मनोमनी सांगायचं झालं तर गोड खाऊन माझं पोट भरल्यासारखं मला कदापीही वाटणार नाही.
जेव्हा एखादा,अशा व्यापक संतुष्ट करणार्‍या गोष्टीत आनंद घेतो,तेव्हा तो वेळकाळाचं ध्यान,माझं-तुझं,असल्या भौतीक जगाशी आणि जीवनाशी संबंधीत असलेल्या समस्या विसरून जातो.
पण जर का एखाद्याला अशावेळी खरंच दुःखी आणि उदास वाटलं तर नक्कीच त्याला मदतीची जरूरी असावी असं मला वाटतं.माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही पण जगातलं उष्णतामान वाढतंय,स्टॉक मार्केट पडतंय,सांपत्तिक परिस्थिती डबगायला आली आहे वगैरेवर एकच उपाय-गोड पक्वान्न.”

“कठीण आहे बुवा!”
मी पान खाऊन झाल्यावर,बेसीनमधे तोंड साफ करून आल्यावर त्यांना म्हणालो.

“काही कठीण नाही”
श्रीधरनी मला सांगून टाकलं.तोंडात पान ठेवूनच मला सांगू लागले.
“फ्रिझमधलं थंडगार चॉकलेट-आईसक्रिम,डब्यात ठेवलेले सर्व प्रकारचे लाडू,साखरेच्या थंड पाण्यात मुरलेले गुलाबजाम,केशर घातलेली श्रीखंड-बासुंदी, खसखस पेरलेले कुरकूरीत आनारसे,दुपदरी लाटलेल्या साखर पेरलेल्या चिरोट्या हे माझं चौथ्या हाप्त्यातलं जेवण.हे खाऊन मी अनिश्चित काळ, कसल्याही प्रकारच्या आहाराच्या सहाय्याविना माझं अस्तित्व टिकवून ठेवीन.”

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो,
“मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल.
आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.”

माझ्या ह्या वाक्यावर श्रीधरना हंसू आवरेना.पान घशात अडकेल म्हणून बेसीनकडे थुंकायला जात जात मला म्हणाले.
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगीतलं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, August 13, 2010

नग्नावस्थेतलं सूख.

“मला तुमच्याकडून ह्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती.”

गेल्या गणपतीच्या दिवसात माझ्या घरी माझी मुलगी आणि नात अमेरिकेहून आली होती.
कॉलेजच्या पहिल्या वर्षात माझी नात शिकत असल्याने तिला खास रजा काढून यावं लागलं होतं.तिच्या बरोबर तिची मैत्रीण पण आली होती.त्यांना भारतात गणपतीचा सण कसा साजरा करतात ह्याचं खूप कुतूहल होतं.

माझ्याबरोबर माझी नात एकटी असली की आम्ही निरनीराळ्या विषयावर मनसोक्त चर्चा करतो. ती लहान असल्यापासून बारीक सारीक विषय काढून मला उद्युक्त करायची.आणि तो तिचा विषय घेऊन मी एखादा लेख तरी लिहायचो किंवा एखादी कविता लिहायचो.

निर्जीव वस्तुला सजीव समजून ती त्या वस्तुबरोबर बोलायची.आणि नकळत कीव आल्यासारखं त्या वस्तूचा उल्लेख करून त्या वस्तुशी बोललेले आपले मनातले विचार मला सांगून टाकायची.
ती लहान असताना एकदा, शुन्य ते नऊ आकड्यांबद्दल माझ्याशी बोलत होती.एक ते नऊ आकड्यांना त्या त्या परीने किंमत आहे.पण शुन्य मात्र “बिचारा” काहीच किंमतीचा नाही.असंच सहज मला एकदा म्हणून गेली.मी ह्या आकड्यावरून तिच्यासाठी एक कविता लिहिली.
“शुन्याचं महत्व”

मी तिला म्हणालो होतो, दोन एका पेक्षा मोठा, तीन दोना पेक्षा मोठा असं करत करत नऊ सगळ्यांपेक्षा मोठा मग शून्याचं काय?
तिला शून्याचं खूप वाईट वाटलं.ते मला तिच्या चेहर्‍यावरून दिसलं.ती म्हणालीच,
“पुअर झीरो”

मी म्हणालो,
झीरोच खरा हिरो असतो.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर झीरोवर एक कविता करतो.ती वाचल्यावर तुला कळेल शून्याची महती.
कविता अशी होती.

“शुन्याची महती”
एकदां दोन म्हणे एकाला
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे तिनाला
माहीत नाही का एक आणि दोनाला
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला

दोन शिंगी चार होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकलं का रे एक दोन आणि तिना?
पांच सहा सात आठ आणि मीना
कबूल झालो आहो नऊना
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

शून्य बिचारा कोपर्‍यात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वतःशीच म्हणाला,
ठाऊक नाही त्यांना घेऊन
मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
वृद्धि होईल त्याची तुरन्त

सूर्य,चन्द्र,तार्‍यांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधिकार

नको स्वतःची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

एकाने केली तक्रार शून्याकडे
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
शून्य म्हणाला त्याला
करशील तूं वृद्धि बेरीज करताना
नंतर
शून्य विचारतो एकाला
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे शून्य इतर आकड्यांना
कमी लेखूं नका कुणा
वेळ आली असताना
शून्यसम आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना

मी ज्यावेळी माझ्या नातीला ह्या कवितेची आठवण करून दिली तेव्हा ती मला म्हणाली,
“तुम्ही बर्‍याच कविता लिहिल्या आहेत.मला आठवतात त्या,
“दातांची व्यथा”, इश्वराचे कोडे” ,”कालाय तस्मै नमः”, कॉर्नींगचे भांडे” वगैरे,
मीच तुम्हाला काहीना काही कारणाने कविता लिहायला उद्युक्त केलं होतं.”

“हो,आणि बरेच लेख लिहायला पण.”
मी म्हणालो.

“पाश्चात्य देशात सगळे खेळ चेन्डूचे. बास्केट-बॉल,व्हाली-बॉल,फुट-बॉल(सॉकर),टेबल-टेनीस,टेनीस, गॉल्फ, क्रिकेट,बोलिन्ग वगैरे,वगैरे.”
माझी नात सांगू लागली.

आणि पुढे म्हणाली,
“ह्या सर्व खेळात मला फुट-बॉल मधल्या बॉलची कीव आली होती.त्यालाच फक्त खेळात लाथेने तुडवतात.बाकी सर्व हातात झेलेले जातात.
“पुअर फुट-बॉल”
असं मी म्हणाल्यावर तुम्ही त्यावर एक लेख लिहाला होता.तो मला अजून आठवतो.”

आमचे हे संवाद चालले असताना माझ्या नातीची मैत्रीण अगदी कुतूहल वाटून ऐकत होती.मला उद्देशून म्हणाली,
“सुखाबद्दलचं माझं मत मी तुम्हाला सांगते.तुमची प्रतिक्रिया मला ऐकायची आहे.”
माझ्या नातीकडे डोळे करून पहात होती.कदाचीत तिच्या होकाराची वाट पहात होती.तिने मान हलवून होकार दिल्यावर, मैत्रीण सांगू लागली,
“सकाळीच न्हाणीघरातून आंघोळ झाल्यावर आपण काय करतो? कदाचीत कुणी दात ब्रश करतात,कुणी केस विंचरतात,केसावर ब्रश फिरवतात,हे नक्कीच.
कुणी चेहर्‍यावर पावडर लावतात,कुणी पर्फ्युम लावतात,अशी आशा करायला हरकत नाही.
लोक,ह्या अगदी विशिष्ट गोष्टी करण्याचा विचार बाथरूम मधून न्हाऊन आल्यावर करतात.मी काय करते तुम्हाला ठाऊक आहे का? पैजेने सांगते तुम्ही तर्कसुद्धा करू शकणार नाही.माझ्या खोलीत चक्क नग्न होऊन थोडावेळ मी नाचते.
आपल्याच खोलीत नग्नावस्थेत नाचण्यात मला विशेष वाटतं.
आंघोळ करून आल्यावरचे माझे रिवाज इतर लोकांच्या रिवाजा पेक्षा काहीसे जरा दुसर्‍या टोकाचे वाटतील.मी स्वतःच जरा वेडी आहे किंवा जरा सनकी आहे असं म्हटलंत तरी चालेल.
मुळीच नाही. मी पूर्ण समझदार आहे.आणि माझी खात्री आहे की लोकं माझ्या सारखं करतील तर जग नक्कीच उत्तम होईल.
मला खात्री आहे,तुम्ही म्हणाल की माझं हे म्हणणं थोडं निडर असल्यासारखं आहे.ह्या दुश्चरित्र जगात रहाताना त्यात थोडा बदल आणण्यासाठी एव्हड्या साध्या आणि बिनडोक गोष्टीवर,नग्नावस्थेत नाचण्यावर,विश्वास ठेवणं तुम्हाला जरा कठीण जात असावं.
तुमच्या रोजच्या दिनचर्येचा विचार करा.सकाळी उठता,कामावर जाता,किंवा शाळेत जाता,मुलांना घरी घेऊन येता,घरी आणखी कामं करता,जेवता,कुटूंबीयात थोडा वेळ घालवता आणि नंतर झोपी जाता.
नंतर दुसर्‍या दिवशी उठता आणि हे सगळं पुन्हा तसंच करता. त्यावर माझा एक प्रस्ताव आहे.
थांबा.
तुमच्याच दिवसातली पाच मिनीटं तुमच्यासाठीच काढा.मग ती पाच मिनीटं, नग्नावस्थेत नाचण्यात जावो,पुस्तक वाचण्यात जावो, एखादं गाणं वाजवण्यात जावो किंवा नुसतं समोरच्या भिंतवर एक टक पहाण्यात जावो.मी तुमच्याशी वादा करते की तुम्ही नक्कीच जास्त प्रसन्न व्हाल.
तुमचं काय म्हणणं आहे?”

मला नातीच्या मैत्रीणीचा विचार खूपच क्रान्तीकारी वाटला. सुखाच्या मागे धडपडण्याचा तिचा प्रयत्न ऐकून मी पण आवांक झालो.आणि तो प्रयत्न सुद्धा ती मला बिनदास उघडपणे सांगत होती ह्याचं जास्त नवल वाटलं.

मी दोघीनाही उद्देशून म्हणालो,
“तुमच्या सारखी नव्या पिढीतलं मुलं मनात आलं की सर्व स्पष्ट करायला भिडभाड ठेवीत नाहीत.”
मी दिलेल्या शेर्‍याचा दोघींच्याही चेहर्‍यावर तसूभरही परिणाम झाला नाही.पण तिचा मुद्दा मला पटला होता. म्हणून माझा प्रतिसाद देण्यासाठी मी म्हणालो,
“जग कसं सुखी होईल हा जरी इतका तर्क-वितर्क करण्या सारखा विषय नसला,कॅन्सर पासून पुर्ण सुटकार कसा मिळेल,हाःहाःकार होतो तिथे मदत कशी पुरवली जाईल हे आणि असले विषय त्या त्या जागी महत्वाचे आहेतच. आणि मला वाटतं बरेच लोक त्याचं महत्व विसरतातही.
उदासिनता, उत्सुकता,आत्मघात,मृत्यु हे शब्द आपल्याला कसे वाटतात?अगदीच कष्टप्रद?
मला अगदी तसंच वाटतं.
यश,संपत्ती,अधिकार ह्या गोष्टी आजच्या जगात लाखो लोकांच्या आकांक्षेमुळे आहेत.ह्या तिन गोष्टीसाठी जे प्रयास करतात ते खरोखर निरर्थक आहे.
ते जीवनात हास्य आणणार नाहीत,बदल आणणार नाहीत, सुखही आणणार नाहीत.आणि म्हणून आपल्या खोलीत नग्नावस्थेत नाचण्याबद्दलचं तुझं म्हणणं आणि त्यापासून तुला सुख कसं मिळतं ह्याबद्दलचं तुझं स्पष्टीकरण मला विशेष वाटतं. देशातली गरीबी सुधारण्यात त्यामुळे उपाय होणार नाही पण माझी खात्री आहे की ती किंमती पाच मिनटं एखाद्याच्या जीवनात आनंदाचे क्षण जरूर आणतील.”

“मला तुमच्याकडून ह्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती.”
असं म्हणून माझ्या नातीने आमच्या गप्पात विराम आणला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 10, 2010

खूपच मोठी रात्र आहे ना!

अनुवाद. (जाने क्या बात है…..)

कळे ना, कळे ना
निद्रा मजला येई ना
खूपच मोठी रात्र आहे ना!

रात्र रात्र मला जागविले याने
जणू पडछायेने वा स्वप्नाने
नसे कुणीही माझा आता
कुणी साथ देईना
खूपच मोठी रात्र आहे ना!

धड धड होते माझ्या अंतरी
घाबरून मी पदर सावरी
अजून जवळी प्रीतम नाही
खूपच मोठी रात्र आहे ना!

ज्या ज्या क्षणी दिसती
अंबरी चंद्र अन तारे
का भासते मजला
लज्जेचे हे खेळ सारे
लग्नाची ही वरात नाही ना?
खूपच मोठी रात्र आहे ना!

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 7, 2010

दृढविश्वास

“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.”

मी खालसा कॉलेजमधे गणीताचा विषय शिकायला जायचो.बरेच असे माझे प्रोफेसर सरदारजी होते.प्रो.वर्यामसींग तर माझे खास होते.त्यांची स्टॅटिस्टीकवरची लेक्चर्स मी कधीच सोडली नाहीत.
सॉलीड जॉमेट्री आणि कॅलक्युलस हे ही माझे प्रिय विषय असायचे.
आज मी बरेच दिवसानी खालसा कॉलेजला भेट दिली.प्रो.वर्यामसींग आता प्रिन्सिपॉल झाले म्हणून मी ऐकलं होतं. त्यांना भेटायची मला खास इच्छा वाटत होती.मी टिचर्सरूममधे डोकावून पाहिलं.एक सरदारजी प्रोफेसर माझ्याकडे बघून हंसले.मी पण हंसलो.त्यांच्या हंसण्यात चेहर्‍यावर मला प्रो.वर्यामसींगची झांक दिसली.कुतूहल म्हणून मी त्यांन विचारलं,
“आपण प्रो.वर्यामसींगचे कुणी लागता का?”
“मी त्यांचा मुलगा प्रो.मोहनसींग”
असं मला ते म्हणाले.
मी सिनीयरला असताना हे मोहनसींग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होते.त्यानीही गणीतात पीएचडी करून थोडे दिवस टीआयएफआरमधे गणीताच्या फॅकल्टीमधे संशोधन केलं होतं.ऍडव्हन्स इंटिग्रेशन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.त्यांच्या वडीलांनीच त्यांना खालसा कॉलेजमधे शिकवायची विनंती केली होती.

ही सर्व माहिती मला सांगताना त्यांना आनंद होत होता कारण मी पण त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी होतो.
पिढ्यानपिढ्या मुंबईत राहिल्याने बर्‍याच सरदारजीना मराठी अस्खलीत बोलता यायचं.माझे काही सरदारजी मित्र मराठीतच बोलायचे.
प्रो.मोहनसींग पण माझ्याशी मराठीतच बोलत होते.
एक पिर्यड संपेपर्यंत मला त्यांनी बसायला सांगीतलं.नंतर आम्ही कॅन्टीनमधे गप्पा मारायला गेलो.
इकडच्या तिकडच्या बर्‍याच गप्पा झाल्यावर,बालपणातल्या आठवणी काढून आम्ही बोलत होतो.
दृढवि़श्वास म्हणजे काय?ह्यावर आमची चर्चा चालली होती.

प्रो.मोहनसींग मला म्हणाले,
“मला आठवतं,आमच्या शाळेतले शिक्षक आम्हाला भरवंसा असणं किंवा दृढवि़श्वास असणं म्हणजे काय ते असं विस्ताराने सांगायचे.
“दृढवि़श्वास असणं म्हणजेच एखाद्या विचाराने तुमच्या मनाला त्याबाबत जखडून ठेवणं,बंदिस्त करणं.”

रंगात येऊन पुढे म्हणाले,
“माझा एक मित्र, बोलता आणि ऐकता न येणार्‍या, मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून होता.मला आठवतं एकदा मी सहजच त्याला दृढविश्वास हा शब्द तू तुझ्या वर्गातल्या मुलांना त्यांच्या भाषेत कसा समजावून सांगशील? असं कुतूहलाने विचारलं.
“अगदी सोपं आहे”
मला मित्र म्हणाला.
“उजव्या हाताचं दर्शनीय बोट,आपल्या कपाळाकडे दर्शवून झाल्यावर तोच हात उघडून,तळवा खाली दिसेल असा घेऊन डाव्या बंद मुठीच्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूला नेऊन चटकन टेकवायचा,जणू माशी पकडल्या सारखं वाटावं”
त्याचा अर्थ दृढविश्वास असं होईल.”

“तुमच्या मित्राने दृढविश्वासाची ती साईन लॅन्गवेज दाखवून केलेली व्याख्या,जरी यथातथ्य असली तरी,मला ती बरीच बुद्धिपुर:सर वाटते”.
मी प्रो.मोहनसींगना माझं मत दिलं.

“खरं आहे तुमचं म्हणणं”
प्रोफेसर मला म्हणाले.पुढे सांगू लागले,
“आता इतक्या वर्षांनी विचार केल्यावर वाटायला लागलं की, दृढविश्वासाचा माझ्या मित्राने दाखवलेल्या साईन लॅंग्वेजचा विचार केल्यावर त्या शब्दाच्या सत्यते ऐवजी, दाखवण्याच्या ढंगाचा त्यावेळी माझ्यावर जास्त प्रभाव झाला होता.”

“अगदी बरोबर मला हेच सांगायचं होतं.”
असं सांगून मी म्हणालो,
“ही सत्यता काय? तर दृढवि़श्वास म्हणजेच तुमच्या मनाला जखडून ठेवणारा विचार,जो तुम्ही काहीही केलंत तरी तुम्हाला त्याला त्याज्य करता येणार नाही. बरोबर ना?”

“प्रश्नच नाही”
असं म्हणून प्रोफेसर सांगू लागले,
“अगदी माझ्या बालपणापासून अजून पर्यंत,ह्याच कल्पनेने माझा ताबा घेतला आहे,जणू मला दाव्याने बांधून ठेवलं आहे.मला जबरद्स्त दृढविश्वास आहे की,प्रत्येक साध्या साध्या बाबतीत सुंदरतेचा आणि संगीताचा अर्थपूर्ण अंश असतो.
मग मी जरी गर्दीत चालत असलो,कॉलेजच्या टिचर्सरूम मधे बसलेला असलो,किंवा घरात वावरत असलो तरी, लहान मुलांत प्रत्येक परिस्थितित जसं औत्स्युक्य असतं,जे अनेक लोकात रोजच्या झकाझकीत लोप पावलेलं असतं,ते माझ्यात परिपूर्ण वास्तव्य करून असतं.

अगदी आत्ता जरी मी माझ्या वर्गामधे बसून खिडकीतून बाहेर पहात असताना एका फांदीवरचं लहानसं पान,येणार्‍या वार्‍याच्या झोतीशी संघर्ष करता करता फांदीचा त्याग करून वार्‍याला कसं शरण गेलं ते पहात असलो तरी.
ह्या असल्या साध्या बाबी इतराना भेट म्हणून द्याव्यात किंवा माझ्या जबरदस्त उत्साहाचा अंश म्हणून त्यांच्याकडे विवरण कराव्यात असं मला वाटत असतं.”

हे ऐकून मी म्हणालो,
“कदाचीत हे खरंही असेल की तुमच्या अशा प्रकारच्या दृढविश्वासातून त्याचा हेतू बराच अस्पष्टपणे दिसला जात असेल.पण तसं असलं तरी तुमच्यातच तुम्ही त्याच्यात असलेल्या विस्मयाचा अर्थ विकसीत करण्याच्या प्रयत्नात असता असं मला दिसून येतं.”

जणू मी त्यांच्या मनातलं बोललो असं वाटून प्रोफेसर मला म्हणाले,
“साधं उदाहरण म्हणून सांगतो,
त्या कोवळ्या सुंदर सूर्यकिरणानी तुमचा चेहरा किती उजळ दिसतो किंवा समुद्राचं पाणी किती नीळंभोर दिसतं हा माझ्या मनात आलेला साधा विचार पण माझ्या मित्रांशी, कुटूंबीयांशी,सहकार्‍यांशी आणि ओळखदेख असलेल्याशी मी वाटण्याच्या प्रयत्नात असतो.

मी आशा करतो की एकवेळ अशीही येईल की रोजच माझ्या मुलांना अशा लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंद आणि त्यावर असलेला त्यांचा दृढविश्वास ती मलाही वाटतील.
मला आठवतं माझ्या सृजनशील आईवडीलांनी आणि उत्तेजन देणार्‍या शिक्षकानी माझ्या मनात भरवून दिलं की हे जग विस्मयकारी आहे आणि हीच कल्पना मी इतरांच्यात मनात भरवून देईन अशी आशा करतो.

माझ्या भविष्याकडे पाहिलं तर,शिक्षक होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला नकळत इंधन मिळालं ते मी प्रोफेसर आहे म्हणून त्यामुळे विद्यार्थ्यांची मनं जाळ्यात अडकवण्याची शक्यता एक व्याख्येने का होईना,सफल होत आहे.
माझ्यात शब्दबंबाळपणा जरी असला तरी मी जर का एकच व्याख्या निवडली तरी माझे शब्द अगदी सहजसाध्य असतील.”

गणीतासारख्या क्लिष्ट विषयावर पिएचडी घेणारा हा प्रोफेसर जीवनातल्या साध्या साध्या बाबतीत किती स्वारस्य घेऊन असतो हे बघून त्याचं कौतूक करावं असं माझ्या मनात आलं.

माझ्या चेहर्‍यावरचा भाव पाहून प्रो.मोहनसींग म्हणाले,
“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, August 4, 2010

ते अजून मजला आठवते

अनुवादीत (वो जमाना याद है…..)

रात्रंदिवशी आंसवे हळूच वहाणे
ते अजूनी मला आठवते
तो जमाना अन प्रणयराधना
ती अजूनी मजला आठवते

पकडून माझा सदरा हिसका देणे
सुंदर मुखकमल पदरामागे दडवीणे
ते अजूनी मजला आठवते

पाहून माझी पराधीनता चेहरा लपवीणे
हातातल्या रंगीत कंगणांनी किणकिणणे
ते अजूनी मजला आठवते

करून मौजमजा अलविदा म्हणणे
सुकल्या ओठावरचे थरथरणे
ते अजूनी मजला आठवते

युगे युगे भेटलो ज्या ठिकाणी
लपत छ्पत येऊनी मिळणे
ते अजूनी मजला आठवते

दुपारच्या प्रहरी भेटलो गच्चीवरी
आलीस तू पळत अनवाणी
ते अजूनी मजला आठवते

पाहून मला लाजत न्याहाळणे
घालून दातांमधे नखे कुरतडणे
ते अजून मजला आठवते

सन्मान करूनी ठेवूनी अभिलाषा
बोलत्या लोचनानी मनातले सुचवीणे
ते अजून मजला आठवते

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co

Sunday, August 1, 2010

स्वयंपाक कला.

“खाद्यपदार्थावरचं माझं प्रेम आणि स्वयंपाक कलेचं उच्चतम रूप लक्षात आणून,आणखी पदार्थांचा शोध घेण्यात, स्वयंपाक करण्यात आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यात मी मला कधीच अटकाव आणणार नाही.”
बबन कॉफी संपवीत म्हणाला.

त्यादिवशी कंपनीच्या कामाला म्हणून मी राजकोटला गेलो होतो.एक दिवस तिथे रहाण्याची गरज भासली होती.कंपनीच्या शिफारीशीतल्या एका होटेलमधे रात्र काढण्याची पाळी आली होती.
रात्रीचं तिथेच जेवायचं मी ठरवलं.कंपनीमधल्या बरोबरच्या सहकार्‍याबरोबर रात्री होटेलच्या मुख्य डायनींग हॉलमधे आम्ही गेलो.
जेवण फार चवदार होतं.आणखी काही चवी परिचयाच्या वाटल्या.चौकशी केल्यावर कळलं की होटेलचा मुख्य शेफ, स्वयंपाकी,मराठी होता.पुरणपोळ्या राजकोटमधे खायाला मिळणं हे एक कुतूहल होतं.म्हणूनच मी कोणी बनवल्या ह्याची चौकशी केली.
बबन कोचरेकर,हे नाव परिचयाचं वाटलं.म्हणून त्याची भेट घेण्याचं ठरवलं.
बबन दादरच्या कॅटरिंग स्कूल मधे शिकत होता हे मला माहित होतं.तोच की काय हे कुतूहल खरं ठरलं.मलाही त्याने ओळखलं.
खूप दिवसानी भेटल्यावर गप्पा मारायला उत येणं स्वाभाविक होतं.जेवण आटोपल्यावर रात्री एक एक कॉफीच्या कपावर गप्पा मारायचं ठरलं.माझ्याच रूममधे मी त्याला बोलावलं.

कॅटरिंगमधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर मुंबईत अनेक होटेलमधे बबन नोकरी करायचा.कधी कधी माझी त्याची एखाद्या होटेलमधे भेट व्हायची.तो राजकोटमधे ह्या होटेलात आल्यामुळे मुंबईत हल्ली त्याची माझी भेट झाली नव्हती.मला कळलं की मुंबईला कंटाळून नंतर तो दिल्ली,कलकत्यालाही थोडे दिवस काम करायचा.आणि आता राजकोटला त्याच्याच एका मित्राच्या मालकीच्या होटेलमधे मित्राच्या आग्रहामुळे येऊन काम करीत होता.

मित्राच्या होटेलचं बस्तान बसल्यावर मग तो कायमच्या विश्रांतीसाठी कोकणात जाऊन रहाणार होता.
कॅटरिंगचा अभ्यास करणं केवळ त्या कलेचा हव्यास म्हणून त्याने पत्करलं होतं.त्याचा एक भाऊ इंजीनयर होता, एकाचं कपड्याचं दुकान होतं.
बबनच्या आजोबाची कोकणात खानावळ होती.मला वाटतं त्याचं लहानपण आजोळी गेल्याने खानावळीच्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर झाले असावेत.
मी त्याला हाच प्रश्न केला.
“तुझ्या आजोबाचे संस्कार तुझ्यावर झाले असावेत ना?”

मला बबन म्हणाला,
“तुमचं अगदी बरोबर आहे.माझ्या आजोबांनी त्यांची खानावळ, जेव्हा त्यांना वय झाल्यावर झेपेना, तेव्हा बंद केली. आजोबांच्या खानावळीत सुधारणा करून आपण चालवावी हे माझं स्वप्नं होतं.पण प्राप्त परिस्थितीत ते काही जमलं नाही. म्हणून मी मुंबईत नोकरी पत्करली.”

बबनने पाकशास्त्राचा नुसता स्वयंपाक करण्याच्या दृष्टीने व्यवसाय पत्करला नव्हता.त्याच्याशी गप्पा मारीत असताना माझ्या नजरेतून हे निसटून गेलं नाही.बबन जात्याच हुशार होता.तो कविता करायचा.त्याने एक दोन कविता संग्रह छापले पण आहेत.मी जाण्यापूर्वी मला तो त्याचं एक पुस्तक देणार होता.

“जगात ना ना तर्‍हेच्या कला आहेत.तू म्हणतोस तू ही कला म्हणून शिकायचं ठरवलंस.तू जरा आणखी विस्ताराने बोलशील का?”

माझं बोलणं त्याला आवडलं.अगदी खूशीत येऊन बबन मला म्हणाला,
“रंगचित्रकारी आणि रेखाचित्रकारी ही डोळ्यांना उत्तेजक असते.
आपल्या शरीराची ही एक ज्ञानशक्ति किंवा संवेदना आहे.तसंच संगीत, श्रवणशक्ति कानाला उत्तेजीत करते.अंगाला मालिश केल्याने त्वचा उत्तेजीत होते.जवळ जवळ प्रत्येक कारीगरी कुठल्यातरी संवेदनेकडे केंद्रीत असते.

चित्रकार, आपण कसला आवाज काढतोय ह्याबद्दल चिंतीत नसतो.वाद्य वाजवणार्‍याला, आपलं वाद्य कसं दिसतं, ह्याची गाणं वाजवीताना चिंता करावी लागत नाही.ही सर्व मंडळी फक्त एकाच, संबंधीत ज्ञानशक्तिच्या चिंतेत असतात.
ह्या सर्व कला तशा कठीण आहेत.पण मला जी कला प्रिय आहे ती नक्कीच कठीण कला आहे.मला म्हणायचं आहे पाककला.ह्या कलेला सर्व ज्ञानशक्तिना आकर्षित करावं लागतं.ह्यामुळेच ही कला जरा जास्त प्रभावशाली असावी असं मला वाटतं.”

मला पाकशास्त्राबद्दल विशेष वाटतं.पाककलेत खाद्यपदार्थाना योग्य उष्णता देण्याइतकं सोपं आणि योग्य अशी रासायनीक क्रिया करून घेण्याइतकं कठीण असं जे काही असतं, त्याबद्दल मला विशेष वाटतं.स्वयंपाक्याला मुख्यतःखाद्यपदार्थ योग्य प्रकारे चवदार होईल ह्याबद्दल खात्री करून घ्यावी लागते. दुसरं म्हणजे तो पदार्थ दिसायला डोळ्यांना आकर्षक वाटला पाहिजे.नंतर पदार्थाचा सुगंध योग्य असला पाहिजे आणि नंतर त्या पदार्थाची बनावट पण तितकीच आकर्षित असायला हवी.
तसं पाहिलंत तर ह्यामुळे पाचापैकी चार ज्ञानशक्ति ह्या कलेत संमिलित होतात.”
मला बबनचं हे स्पष्टीकरण आवडलं.

मी म्हणालो,
“जरा विचार केला तर रंगचित्रकाराला नीळेची जास्त मिलावट करून त्याच्या चित्रावर कसा असर होईल ह्याची चिंता करावी लागेल.तर स्वयंपाक्याला,नारळाचं चून,उदाहरण म्हणून, घालून पदार्थाची चव कशी प्रभावित होईल याचा विचार,आणि बनावट,प्रतिकृति, आणि सुगंधाबद्दलचा विचार करावा लागेल.प्रत्येक सामुग्री सामाविष्ट केल्यावर पाककलेमधल्या समस्या लक्षात येतात हे तुझं म्हणणं मला पटतं.”
बबनला हे माझं स्पष्टीकरण आवडलं.

मला म्हणाला,
मी स्वयंपाक कलेचं आव्हान आनंदाने स्विकारलं. चुलीजवळची उष्णता,आणि गर्दीच्या वेळी घड्याळाबरोबरची चुरस मी आनंदाने झेलतो.थाळीत लागणारा प्रत्येक पदार्थ सामाविष्ट झाला आहे की नाही हे निक्षून पहाण्यात मला आनंद होतो. ठरावीक पदार्थ योग्य उष्णता देऊन तयार झाले की नाही ह्याकडे लक्ष देण्यातही मला हुरूप येतो. अशा तर्‍हेचं मला मग्न करणारं दुसरं कुठचंही काम विशेष वाटत नाही.
शिवाय,कुठच्याही स्वयंपाक कलेच्या जगतात काम करणं थोड्या थोड्या फरकाने प्रतीत होतं.ताजमहाल होटेल मधला स्वयंपाकी आणि मामा काण्यांच्या होटेलमधले स्वयंपाकी ह्यात नक्कीच फरक असतो.हा फरक केवळ खाणा‍र्‍याच्या चवीमुळे असतो.कुठचंच होटेल उच्च किंवा नीच असं मानण्याची गरज नाही.अगदी पदार्थांच्या सामुग्रीपासून ते पदार्थाला दिलेल्या उष्णतेपर्यंत लागणार्‍या कलेच्या आणि अनुभवाच्या क्रमबद्धतेत स्वयंपाक्याला तत्पर असावं लागतं.हे आणखी एक कारण पाककलेला वरचं रूप द्यायला कारणीभूत होतं.”

मी बबनला म्हणालो,
“तुझ्याकडून हे सर्व ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला की,पाककलेच्या अपरिमित कार्यक्षेत्रामुळे ही कला उच्चतम होऊन सर्वात आकर्षित राहिली आहे.हजारो वर्षापासून पाहिलंत तर खाद्यपदार्थाच्या स्वादाची आणि बनावटीची इतकी असंख्य मिश्रणं आहेत की कुणीही त्या कलेत पूर्णपणे प्रभावित झालेला दिसणार नाही.कुणीही आपल्याला सराव असलेले पदार्थ आठवून पाहिलं,आणि जगात मिळणार्‍या आणखी अनेक पदार्थांचा त्यात सामावेश करून पाहिलं तर खरीच मजा येईल.”

“खाद्यपदार्थावरचं माझं प्रेम आणि स्वयंपाककलेचं उच्चतम रूप लक्षात आणून,आणखी पदार्थांचा शोध घेण्यात, स्वयंपाक करण्यात आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यात मी मला कधीच अटकाव आणणार नाही.”
बबन कॉफी संपवीत म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com