Sunday, October 10, 2010

असाच एक खवैय्या आचारी.

“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.”

मला आठवतं,त्या माझ्या कोकणच्या ट्रिपमधे एकदा मी एका रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो होतो.माझ्या एका मित्राने मला इथे जेवण्याची शिफारस केली होती.मी जेवत असताना कॅशरच्या टेबलाजवळ एक व्यक्ति कॅशरबरोबर बोलताना माझ्याकडे बघून बोलत होती.जेवण झाल्यावर बिल देताना मी कॅशर जवळ त्या व्यक्तिची चौकशी केली.
“आमचा तो मुख्य आचारी आहे”
असं तो म्हणाला.नांव विचारल्यावर,
“मकरंद कुळकर्णी” असं म्हणाला.
मी माझं डोकं खाजवीत राहिलो.आणि कॅशर म्हणाला,
“तो तुम्हाला ओळखतो”
“असं आहे,तर मग मला त्याच्याशी बोलायला आवडेल”
असं मी म्हणताच,त्याने त्याला बाहेर बोलावलं.
“मला तुम्ही ओळखणार नाही कारण अगदी लहान असताना तुम्ही मला पाहिलंय.”
असं मला मकरंद म्हणाला.
“मग तू मला कसं ओळखलंस?”
सहाजीकच मी त्याला उलट प्रश्न केला.

“मघाशी तुम्ही वेटरला ऑर्डर देताना, त्याच्याबरोबर बोलत होता,तेव्हा मी स्वयंपाक घरातून ऐकल्यावर तुमचा आवाज परिचयाचा वाटला म्हणून डोकावून तुमच्याकडे पहात होतो.मालवणी हेल काढून तुमची बोलण्याची पद्धत, आणि त्या वेटरबरोबर हंसला तेव्हा तुमच्या उजव्या गालावरची खळी मला प्रकर्शाने जाणवली. मला तुम्ही ओळखाल न ओळखाल म्हणून मी पुढे आलो नाही.”
मला हे सांगताना मकरंद लाजून बोलत होता.
“तू मला अजून आठवत नाहीस.जरा विस्ताराने सांगशील का?”

असं मी म्हणाल्यावर मकरंद मला भूतकाळात घेऊन गेला.आणि त्याने माझी स्मृति जागृत केली.
“माझी आजी गेली.पण मी आणि माझी आई रहातो.तुम्हाला वेळ असेल तर माझ्या घरी तुम्ही अवश्य या.माझ्या आईला तुम्हाला इतक्या वर्षानी बघून खूप आनंद होईल.”
मकरंद मला म्हणाला.

मी त्याचा पत्ता घेतला आणि दुसर्‍याच दिवशी त्याच्या घरी गेलो.
मला त्याची आई म्हणाली,
“मकरंद बीए झाला.ते माझ्या जबरदस्तीमुळे.त्याचं ह्या कॉलेजच्या शिक्षणात विशेष लक्ष नसायचं.त्याला लहानपणापासून पाककला आवडायची.मला म्हणायचा मी बीए होऊन कुठेही कारकून म्हणून नोकरी करणार नाही.मला शेफ व्हायला आवडेल.शेफ व्ह्यायचं त्याच्या डोक्यात खूळ होतं.आणि त्याने ते पुरं केलं.आता एका रेस्टॉरंटमधे आचार्‍याचं काम करतो.पण लवकरच तो त्याच रेस्टॉरंटचा पार्टनर होणार आहे.”

मी मकरंदच्या आईला म्हणालो,
“कोण केव्हा काय होईल हे आपल्याला अगोदरपासून माहित नसतं.होऊन झाल्यावर आपण म्हणतो जे विधिलिखीत आहे ते झालं.खरंतर असं म्हणण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?.ज्याला जे हवं ते झाल्यावर तो सुखी झाला म्हणजे जीवनात आणखी काय हवंय.?”

मी येणार आहे म्हणून मकरंदाने आज सुट्टी घेतली होती. मला ही त्याच्याशी चर्चा करायला हवं होतं.
मी त्याला विचारलं,
“हा तुझा शेफ होण्याचा विचार कसा काय तुझ्या डोक्यात आला? त्यात वाईट काहीच नाही.आपल्याला जे आवडतं त्यावर आपण प्रेम करतो.फक्त कुतूहल म्हणून मी विचारतो.”
मला मकरंद म्हणाला,
माझ्या आईला नेहमीच विचारलं जातं की,तिचा मुलगा पाककलेत कसा काय स्वारस्य घ्यायला लागला?.आणि माझ्या आईकडून तिच्या नेहमीच्या अभिमानरहित,नम्रतेने दावा केला जातो की तिचाच आळशीपणा त्याला कारण आहे.
मला आठवतं,मी अगदी पाच वर्षाचा भुकेलेला मुलगा अंथरुणातून उठलो आणि आरडाओरडा करून सकाळचा नास्ता मागायला लागलो तरी माझी आई निवांतपणे आपला वेळ घेत घेत तिच्या अंथरूणातून उठून स्वयंपाक घरात यायची.

पण मला काही तेव्हडा धीर नसायचा.मग मी तिच्या शिवाय सुरवात करायचो.पहिल्यांदा अगदी साध्या गोष्टी असायच्या. गरम दुधाचा प्याला,आणि काहीतरी खायला,लाडू वगैरे घ्यायचो.नंतर अंड्याचा पोळा करायला शिकलो.त्यातही हळू हळू पोळ्याचे दोन,चार प्रकार शिकलो.तरीपण माझी आईच मला ह्या पाककलेच्या खूशी्साठी सुरवात करायला कारणीभूत झाली नाही,तर सदभिरूची असणारी माझी आजीही कारणीभूत होती.तिच्याबद्दल आणखी काही सांगण्यापूर्वी मी एक सांगेन की ती खरी खवैय्या होती.कुणीही जेवायला बोलवल्यावर त्यांच्या घरी मला नचुकता घेऊन जायची.किंवा आम्ही प्रवासात असलो तर ती चांगल्या रेस्टॉरंटमधे मला घेऊन जायची.आणि मला तिच्याबरोबर काहीही खायला भयभीती नसायची.माझ्या अगदी लहानपणातल्या दिल्यागेलेल्या ह्या स्वातंत्र्यामुळे माझ्यात ही खाण्याविषयी बेदरकार प्रवृत्ति निर्माण झाली.सरतेशेवटी,अतीशय असाधारण,कल्पनीय
स्वादांची छानबीन करण्याची स्वाधीनता मला घेता आली.ह्या अनेक रेस्टॉरंटमधे जाऊनच मला जेवण करायची स्फुर्ती मिळाली एव्हडंच नाही तर माझी आई आणि आजी ह्या दोघांनी मला त्यांना जे काही माहित होतं ते शिकवलं आणि मी ते शिकण्याचा ध्यास घेतला.”

मकरंद किती सहजपणे आपल्यात तयार होणारा आचारी, आपल्या पोथीबंद, विचाराच्या सीमा उलटून जाऊ शकतो हे सांगत असताना माझ्याही डोक्यात विचार आला.त्याच्या व्यवसायाचं समर्थन करण्याच्या दृष्टीने मी त्याला म्हणालो,
“कला,संगीत,करमणूकी सारखं,आहारसुद्धा संस्कृतीचा एक मुलभाग आहे.आहाराचं हे क्षणभराचं अस्तित्व असतं.कारण नंतर तो खाल्ला जातो,संपवला जातो. तरीपण त्या आहारात गतकालाचा इतिहास असतो,प्रथा असते.आचारी आणि त्याचा सभोवताल ह्यामुळेच घडला जातो.विविध समानान्तर लोकांत आहार दुवा जोडतो. एखादं भोजन,कुटूंबियात,मित्रमंडळीत घेतलं गेल्याने,एकमेकातलं बंधन आणि जाणीवा समक्रमिक बनवून,आणखी मजबूत करतं.त्याचप्रमाणे आचारी आपल्या निर्मितीमधून जगाशी दुवा साधून,आहाराचा उपयोग त्याच्या वयक्तिक शैलीचं आणि तत्वविचाराचं विवरण करण्यात करतो.आहारामुळेच आपण ह्या धरतीचं आणि त्यावरच्या प्राणीमात्रांची कदर करायला शिकतो.
जर का आपण आहाराला आपल्याशी बोलू दिलं तर,नेहमी धरतीमातेचा आवाजातून,आपल्याला जीवंत ठेवण्याच्या अवलंबनाची भेट दिली असल्याचं एकायला येईल.”

माझं हे ऐकून मकरंदला आनंद झाला. मला म्हणाला,
“विस्तवाच्या,धारदार चाकूच्या,चमच्याच्या आणि हाताच्या क्षमतेबद्दल मला विशेष वाटतं.आहार घेणार्‍या जगाला हाताचं कसब वापरून,समाजाला लागणार्‍या,महत्वपूर्ण बुद्धिजीवी विशिष्टता,लक्षात घेऊन त्या मधून मनात असलेला प्रत्येक समझ प्रेरित करून,संस्कृतीचं खरं सार काय आहे,खरं स्वरूप काय आहे हे स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात ही क्षमता मला उपयोगात आणता येते याचं मला विशेष वाटतं.
मला आहार म्हणजे नुसतं जीवंत रहाण्यासाठीच एक मुलभूत साधन आहे एव्हडच वाटत नाही.तर आहार हा एक आत्म-अभिव्यक्तिचं एक महत्वाचं द्वार आहे,मार्ग आहे असं वाटतं.पाकशास्त्राच्या कलेवरचं माझं प्रेम हे एक छंद असण्याच्या पलीकडचं आहे.माझ्यातला तो एक उत्कट आवेश आहे.जरी टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या आचार्‍याची पाककृतीची प्रत्येक हालचाल मी अभ्यासीत असलो,तासनतास,अगदी नवं पाककलेचं पुस्तक घेऊन नाक खुपसून वाचत असलो किंवा माझ्या स्वयंपाक खोलीतली स्वतःचीच चालाखी वापरीत असलो,तरी शेवटी त्या दिवसाचा तोच महत्वाचा भाग होऊन जातो.”

“अन्न म्हणजे स्वाधीनता आहे.अधुनमधूनची अन्नबाधा सोडल्यास अन्नावर अटकाव कधीच आणला जात नाही.अन्न हे एक स्वतंत्र प्रकार असून,ते सदैव विकसित होत असतं. पाककला ही अशी एकच कला आहे की तिच्याकडे जैविक आवश्यकता म्हणून बघीतलं जातं.”
मी मकरंदला म्हणालो.

“प्रत्येक प्रांतात ख्यातिप्राप्त व्यक्ति असतात.परंतु,कुठचाही जगनमान्य आचारीसुद्धा ह्या पाककलीची सुरवात आपल्या घरापासून करतो.आपल्या आईकडून किंवा आजीकडून शिकतो.ते शिक्षणसुद्धा एखाद्या चालू शेगडीवर आणि चालू स्वयंपाक घरात शिकतो.अन्य प्रांतातल्या एखाद्या कलेतल्या ख्यातिप्राप्त व्यक्तिबद्दल असं म्हणता येणार नाही.
माझ्या ह्या तेजीने विस्तारणार्‍या रंगपेटीमुळे मला माझ्या सभोवती असलेल्या आहाराच्या संपन्न जगात जाण्याची वाट सापडली,त्यामुळे मी जो आहेतो घडला गेलो.
अलीकडेच माझी आजी गेली.परंतु,तिने माझ्यावर केलेले संस्कार कधीच क्षीण होणार नाहीत.ती आणखी काही जरी असली तरी मला ती,मी जसा आहे तसा आचारी म्हणूनच होती.”
मकरंद मला म्हणाला.

मला रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.
अशी कला जी आपल्या भोवती आणि आपल्या अंतरात जीवीत असते,प्रकट होत असते.”

आमच्या चर्चेत खंड आला जेव्हा मकरंदची आई मला म्हणाली,
“मकरंदच्या रेस्टॉरंटमधे जाऊन तुम्ही केव्हाही मकरंदच्या हातचं जेवू शकाल.पण आजचं हे जेवण मी शिजवलंय. मकरंदपण खूप दिवसानी तुमच्याबरोबर मी केलेलं जेवील.नाहीतर तो नेहमीच त्याच्या रेस्टॉरंटमधून जेऊन येतो. चला,जेवायला चला.”
आपल्या आईचं हे बोलणं ऐकून मकरंदच्या चेहर्‍यावरचा आनंद मला जास्त बोलका वाटला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 7, 2010

सुगंधाची धुंद.

.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍याला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग…..

हरवलेले फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना

सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी

क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 4, 2010

आप्पा आणि गालावरची खळी.

“रांव रे! आप्पा येतां साईट दी.”
(गप्प बस! आप्पा येतोय.(आप्पाची बस येतेय) त्याला जाऊदे.साईड दे)

असले उद्गार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगाव किंवा वेगुर्ले-बेळगाव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.
त्याचं असं झालं आप्पाकाकांना धंद्यामधे-बिझीनेसमधे-जास्त दिलचस्पी होती.नाना आजोबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.
आणि आण्णा म्हणाले मुंबईहून मी त्याच्यासाठी(आप्पासाठी) एक नवीन बस (पॅसिंजर व्हेईकल)विकत घेतो.साधारण २०० रुपयांना (म्हणजे आताचे २० लाख रुपये होतील,आणि त्यावेळी गाड्या इंपोर्ट व्हायच्या.)बस विकत घेतली.
अण्णांचं लग्न झालं तेव्हा आप्पा एक वर्षाचे होते.आणि त्यांच्या आईचं (म्हणजे आमच्या आजीचं)निधन झालं होतं.माझ्या आईनेच त्यांना वाढवलं. अण्णांना आप्पा मुलासारखेच होते.

ही बस-सर्व्हिस आप्पा चालवीत असत.सुरवातीला आठवड्यातून २,३ वेळेला,आणि नंतर रोज आणि नंतर दिवसातून दोन वेळां वाडी-बेळगांव ट्रिप करीत असत.त्याशिवाय आणखी बर्‍याच लोकांच्या असल्या सर्व्हिसीस होत्या.पण आप्पांची एक खासियत होती. नियमीतपणा,सर्वांच्या अगोदर पोहोचायचं,कुणालाही नाखूश करायचं नाही,आणि हंसत,हंसत सर्वांचं स्वागत करायचं.

गोरा रंग,सफेद लांब बाह्यांचा शर्ट,डोक्यावर काळी टोपी,ती पण अर्धी मागे सरकलेली,कोट बरोबर घ्यायचा पण अंगावर कधीच घालायचा नाही तर तो डाव्या खांद्यावर लटकलेला असायचा,तोंडात पानाचा ठेचा,रंगदार पानाचा लाल-तांबडा रंग,दातां-ओठावर ठाम बसलेला,ओळखीचा माणूस दिसला की मधूर हास्य करीत उजव्या गालावरची खळी उठावदार दिसल्याने,समोरच्या माणसाला त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलावंसं वाटायचं.आप्पांच्या
सावंतवाडी-बेळगाव आणि परत, अशा सकाळ संध्याकाळच्या दोन फेर्‍या झाल्यावर घरी आल्यावर आप्पा खांद्यावरचा कोट काकूकडे द्यायचे.मग काकू कोटाचे सर्व खिसे चाचपून चुरलेल्या नोटा आणि पोसाभरून चिल्लर-खूर्दा मिळून दिवसाची कमाई मोजून ठेवायची.

आप्पांच्या २५,३० वर्षाच्या वयावर त्यांच्यात तारूण्यातली बेदरकारी होती.मग नवी करकरीत इंपोर्टेड गाडी चालवताना वेगावर लक्ष कसं रहायचं.त्यात भर म्हणजे धुळीने माखलेले कोकणातले लाल रस्ते,प्रवाशाना वेळेवर पोहोचवीण्याची अंगातली चूरस,त्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांना आणि आप्पांच्या पुढे धांवत असलेल्या इतर गाड्यांना ओव्हेरटेक करून आप्पांची बस भरधांव वेगाने जायची आप्पांच्या अंगातली धमक त्यांना रोखता कशी यायची?.आप्पांची बस निघून गेल्यावर मागे प्रचंड धुळीचा लोट यायचा.धुळीचा लोट पातळ झाल्यावर समोर पाहिल्यावर लांब गेलीली आप्पांची बस एक ठिपका कसा दिसायची.

गांवातले आणि गांवाबाहेरचे पोलिस आप्पांच्या खिशात होते.आप्पांकडून मिळणारी अधुनमधूनची चिरीमिरी, आणि पोलिस खात्यात वरच्या हुद्यावर असलेले त्यांचेच भाऊ अण्णा, ह्या सर्व गोष्टीकडे बघून आप्पांना ही बेदरकारी करायला एक प्रकारे रान मोकळं असल्यास नवल ते काय?.
पुढल्या गाडीतले पॅसिंजर मागे वळून पाहिल्यावर आप्पांची बस येताना दिसली तर,
“रांव रे! आप्पा येतां,वाईंच साईट दी.”
किंवा आप्पांची बस धुळ उडवीत पुढे गेलेली पाहून,
“आप्पा गेलोसां दिसतां”
असे उद्बार काढायचे.
पण आप्पा त्याबद्दल कधीही शेखी मिरवीत नसत.एखाद्या पोलिसाने नानांच्या कानावर, आप्पानी केलेली अलीकडची बेदरकारी सांगून झाल्यावर,जेव्हा अण्णांना कळायची तेव्हा अण्णांकडून आप्पांची जराशी कान उघडणी व्हायची.

आम्ही त्यावेळी अगदीच लहान होतो.पण आमच्यापेक्षा मोठ्या सख्ख्या किंवा चुलत भावात ह्याची चर्चा व्हायची.
त्यांचे मित्र आप्पांच्या वेगवान बस चालवण्याच्या संवयीबद्दल कौतूकाने चर्चा करायचे,आणि आमचे भाऊ आपल्या मित्रांना सांगायचे
“आमचे काका आहेत ते”
ते ऐकून आप्पांची धडाधडी पाहून आमची छाती फुगायची.
पण आप्पांनी कधी अपघात केले नाहीत.कदाचीत ह्यामुळेच इतरांच्या बस सर्व्हिसपेक्षा आप्पांची बस जास्त पॉप्युलर होती.कारण त्यांच्या बसची तिकीटं आदल्यादिवशीच खपून जायची.
“नानानुं,बेळगांवचा एक तिकीट होयां.”
असं कोणी घरी सांगायला आल्यावर,
“तिकीटां संपली.उद्याच्या तिकीटासाठी काल येत जा”
म्हणून नाना लोकांना सांगताना आम्ही ऐकायचो.नाना आप्पांचं ऑफीस संभाळायचे.ऑफीस कसलं? घरंच ऑफीस होतं.

पण आता त्या गोष्टीला जाऊन ६०,७० वर्षं झाली.आप्पांच्या क्षीण प्रकृतिकडे बघून ते दिवस प्रकर्षाने आठवतात. अलीकडे गोरेगांव स्टेशनवर गाडीची वाट पहात असताना गाडी जवळ केव्हा आली ते आप्पांना मुळीच कळलं नाही.लोकांनी ओरडा करे पर्यंत आप्पा,गाडीबरोबर थोडे फरफटत जाऊन, बाजूला पडले.आप्पाना अलीकडे कमी ऐकायला यायचं.त्याचाच,ही घटना व्हायला, परिणाम असणार.
मी त्यांना गोरेगांवच्या एका खासगी हॉस्पिटलात भेटायला गेलो होतो.तोंडाला मार लागून आप्पांची मान वाकडी झाली होती.

बरं वाटल्यावर आप्पा घरी आल्यावर मी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो.आप्पा जरी अपघातातून खणखणीत बरे झाले होते तरी तोंडाला लागलेल्या मारामुळे ते बोलताना जरा अस्पष्ट बोलायचे.त्याना हंसतांना पाहून मला खूपच वाईट वाटलं.ते त्यांचं मधूर हास्य आणि त्यांच्या उजव्या गालावर दिसणारी ती खळी त्यांचा चेहरा उठावदार करायला दिसतच नव्हती. “फेस रीकंस्ट्रकशनमुळे” जरी त्यांचा चेहरा सुधारला गेला असला तरी ती खळी डॉक्टर “रीकंस्ट्रक” करू शकले नव्हते.

मला पूर्वीची गोष्ट सांगताना विनोद करून जेव्हा अप्पा हंसायला लागले तेव्हा मी लागलीच माझा चेहरा दोन हातांनी झाकून घेतला.आता आप्पांना हंसताना पाहून मला येणारं रडूं माझ्या चेहर्‍यावरून मला लपवायचं होतं.आप्पांचा निरोप घेऊन झाल्यावर जिन्यावरून खाली उतरून जाताना माझ्या तोंडून सहजच बोललं गेलं,
“रांव रे! आप्पा येतां.वाईंच साईेट दी”
कुठे गेले ते दिवस?

आदल्या आठवडयात मला आप्पा गेल्याचा निरोप आला.ते पावसाळ्याचे दिवस होते.आकाश ढगांनी व्यापलेलं होतं.आणि मोसमी वार्‍याच्या जोराने ढगांचा आकाशातला प्रवाह धुळी सारखाच दिसायचा.त्यांच्या अंत्ययात्रेला जात असताना वर आकाशाकडे पाहून माझ्या मनात आलं आणि मी मनात पुटपुटलो,
“आप्पा गेलोसां दिसतां” नव्हे तर
“आप्पा गेलोच”
पण ह्यावेळेला जाताना धुळी ऐवजी, ढगांचा लोट मागे सोडत ते वर चालले आहेत.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 1, 2010

“भोजन”, खरा अर्थ हरवलेला शब्द.

“आमच्या कुटूंबात,आमच्या विश्वाचा मध्यभाग म्हणजे आमचं स्वयंपाकघर आणि मध्यभागी ठेवलेलं जेवणाचं टेबल, असं म्हटलं तरी चालेल.मी ज्या वयात शेगडी जवळ उभी राहून चहा करायला शिकले,तिथपासून आतापर्यंत मी माझा जेवणाबद्दचा जोश विकसीत करायला शिकले.”
माझी भाची पुष्पा मला आवर्जून सांगत होती.

त्याचं असं झालं,आम्ही सर्व टेबलावर बसून जेवण करीत होतो.त्यादिवशी कोजागीरी-पौर्णिमा होती.पुष्पा सातबंगल्याला राहायची.वरसोवाचा समुद्र तिच्या घरापासून अगदी जवळ.
मला तसंच तिच्या इतर मित्र मंडळीना बोलावून जेवणं झाल्यावर आम्ही पौर्णिमेच्या पिठूळ चांदण्यात मजा करायला जाणार होतो.बरोबर गरम दुधाची कॉफी घेतली होती.आणि फरसाणही घेतली होती.
जेवताना “भोजन” ह्या शब्दावर चर्चा चालली होती.

मला काहीतरी सांगावसं वाटलं म्हणून मी म्हणालो,
“जेवणातून आपण आपलं एकमेकाबद्दलचं प्रेम आणि जीवनातला आनंद वाटायला शिकतो असं मला वाटतं.माझ्या म्रुत्युशय्येवर मला जर का कुणी प्रश्न केला की माझ्या आयुष्यातल्या सर्वात उत्तम दहा घटना कोणत्या,तर मी नक्कीच सांगेन की, त्यातल्या निदान आठ घटना जेवणाच्या टेबलाभोवतीच्या असाव्यात.मस्त जेवण वाढलेलं असावं आणि माझे प्रेमळ कुटूंबिय सभोवताली बसलेले असावेत अशा घटना.बरेच वेळा,पण नेहमीच नाही,अशा घटना सणावारालाच घडत असतात.”

माझं बोलणं संपता संपता पुष्पा म्हणाली,
“सणावारावरून तुम्ही म्हणता ते मला पटतं.कारण जरी गणपतिचा सण बर्‍याच लोकांचा-इतर पंथांचा आणि धर्मांचा-जरी झालेला असला,तरी त्या उत्सवामागच्या धार्मिक भावना कमी झालेल्या नाहीत.माझे कुटूंबीय अगदी कडक प्रथा पाळून तो सण साजरा करतात.आणि हे सर्व जेवणाभोवती परिभ्रमण होत असतं.

गणपति उत्सव हा काही एकच सण नाही.दसरा सणा दिवशी माझी आई घरगुती श्रीखंड केल्या शिवाय रहात नाही. बरेच दिवस अगोदर भरपूर साय येईल असं दुध आणून,त्याचं दही मुरवून,मग दह्यातलं पाणी काढून घट्ट चक्का करून,त्यात केशर,वेलची,चारोळ्या-पिस्ता टाकून घोटून घोटून चवदार श्रीखंड तयार करते.बाजारातल्या श्रीखंडावर तिचा मुळीच विश्वास नाही.मेहनत पडली तरी चालेल पण तिचा श्रीखंड घरी बनवण्याचा हट्ट ती सोडत नाही. श्रीखंडाबरोबर खांडवा गव्हाच्या पिठाच्या पुर्‍या हव्याच.”

पुष्पाच्या नवर्‍याने आपला विचार सांगितला.तो म्हणाला,
“दिवाळी सण असाच साजरा होतो.त्यादिवशी जरी देवळात जाऊन देवा समोर नारळ फोडून तो देवा जवळ ठेवून उरलेल्या नारळाचा प्रसाद घरात आणून सर्वांना वाटल्यावर मग फराळाची चव घ्यायला सुरवात केली जात असली तरी,सकाळी उठून सुगंधी उटणं लावून आंघोळ करण्यापूर्वी पायाखाली कडू कारीट फोडून “शंभो,शंभो,शंभो असं त्रीवार ओरडून,संकासूराचा वध केल्याचं समाधान झाल्यावर त्या कारटाची कडू चव घेतल्यावरच गरम गरम पाण्याचा तांब्या अंगावर ओतला जातो.ह्या प्रथा न चुकता सांभाळल्या जातात.

दिवाळीचा सण येण्यापूर्वी आठ-पंधरा दिवस अगोदरपासून अनेक गोड पदार्थाच्या फराळाची तयारी मनावर कुठचाही ताण न आणता केली जाते.सर्वच तर्‍हेचे फराळ झाले पाहिजेत याची आवश्यकता न बाळगता त्याचा अनेक तर्‍हांचा संग्रह असला तरी चालतो.अर्थात जितक्या जास्त तर्‍हा तेव्हडं बरंच म्हणा.”

पुष्पा म्हणाली,
“तसे वर्षभरात बरेच सण येतात म्हणा.होळीच्या दिवशी पूरणपोळी,मकरसंक्रांतीला तीळगूळ आणि तिळाचे लाडू, कोजागीरी पौर्णिमेला मसाले दुध, नारळी पौर्णिमेला नारळी भात. एकनादोन असे अनेक सण कोकणात साजरे केले जातात.”

पुष्पा आणि तिचा नवरा आपलं म्हणणं केव्हा संपवतात याची मी वाट पहात होतो.कारण मला “भोजन” ह्या विषयावर जास्त बोलायचं होतं.चान्स मिळताच मी म्हणालो,
“अशा ह्या वेगवेगळ्या सणात कुटूंबीयाबरोबर भोजनकरण्याचा मनातला जोश म्हणजेच मानवी मनातली जडं असून ती खोलवर रुतलेली असावीत. आणि हे जेवणाचं टेबल किंवा पंगत बसण्याची खालची जमीन ही जागा म्हणजे एक पोषण करण्याचं,निर्भयत्वाचं,आणि शांती समाधानीचं स्थान आहे असं म्हणावं लागेल.आणि हा जोश आपल्या भाषेतल्या शब्द्वव्युत्पत्तित एव्हडा खोलवर रुतला आहे की “भोजन” म्हणजेच “साहचर्य” असं म्हणावं लागेल.”

माझं म्हणणं पुष्पाला इतकं पटलं की,ती मला म्हणाली,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.कारण सतत वापरून वापरून “भोजन” हा शब्द अर्थ हरवलेला झाला आहे. यात सत्य आहे.कारण तुम्ही जे जेवता ते तुम्ही आहात. म्हणून कोण कसं आहे हे समजण्यासाठी,त्यांच्या अंतरात आणि आत्म्यात काय आहे हे समजण्यासाठी, जितकं त्यांच्याबरोबर मैलभर चालून समजणार नाही तितकं त्यांच्या बरोबर जेवणाच्या टेबलावर बसून भोजन केल्यावर समजेल.”

पुष्पाच्या नवर्‍याला समुद्रावर जायची घाई झालेली दिसली.
“चला आपण उठूया.हीच चर्चा गरम कॉफी आणि फरसाणाची चव घेता घेता समुद्वावर जाऊनच बोलूया.”
कल्पना सर्वांनाच आवडली आणि आम्ही सर्व जेवण आटोपून समुद्रावर जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 29, 2010

अस्तित्व.. असाही एक विचार.

“माझं तर म्हणणं आहे की सरळ आणि साधेपणाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.”

“एक दिवस आपण सर्व ईहलोकाला जाणार आहोत.हे एक सत्य आहे शिवाय कुणीतरी जन्माला येणार आहे, हे ही एक सत्य आहे.एखादा दिवस आपल्याला अस्तित्वात आणतो आणि तसाच एखादा दिवस कसलाही विचार न होता, आपल्याला जीवनातून मिटवतो.”
प्रो.देसाई मला असं म्हणाले.

मी आज त्यांच्या घरी गेलो होतो.गेले कित्येक दिवस त्यांना सर्दी-खोकल्याने बेजार केलं होतं.त्यामुळे तळ्यावर यायचं त्यांनी तुर्तास बंद केलं होतं.मी मात्र नियमीत तळ्यावर फिरायला जात होतो.कुणी तळ्यावर भेटलं तर त्यांच्याकडून भाऊसाहेबांची प्रकृती कशी आहे ते कळायचं.आज स्वतःच जाऊन त्यांची विचारपूस करावी म्हणून त्यांच्या घरी जाण्याचा विचार केला.

“ह्या जीवनात,एकट्याने किंवा बरोबरीने,सुखाने जगण्याची जबाबदारी,नियतीने आपल्यावरच सोडून दिली आहे.
ह्यासाठीच आपली धडपड, आपल्या सुखासाठी झाली पाहिजे,उपलब्धिसाठी किंवा दुसर्‍याकडून प्रशंसेसाठी किंवा समाज विकसीत करण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवून घेण्यासाठी नव्हे.अशी माझी धारणा आहे.”
असं पुढे म्हणून माझ्याकडून काय प्रतिसाद येतो त्याची ते वाट पहात होते.

मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,हा आज आपल्या मनात विचार का आला?
आपल्याला बरं नाही म्हणून मी पाहायला आलो.”
माझ्या समोर पेपरातल्या एका बातमीचं काटण देत मला म्हणाले,
“मी आता चांगलाच बरा झालो आहे.हे वाचा अमेरिकेकडे दहा हजार न्युक्लिअर बॉम्ब आहेत.रशियाकडे सात हजार आहेत. इस्राईलकडे अमेरिकेने दिलेले शंभर बॉम्ब आहेत.भारत,पाकिस्तान,चीनकडे शेकडोंनी बॉम्ब आहेत.पण इराणने एकही बॉम्ब बनवूं नये म्हणून सर्व त्या देशाच्या मागे लागले आहेत.कुणाचं बरोबर किती आणि चूक किती ह्या वादात न जाता मला एव्हडंच वाटतंय हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या जगण्याच्या विचाराच्या पलीकडचं झालं आहे.आपलाच आपण सर्व नाश करायला तयार झालो आहो.जग फारच स्वार्थी होत चाललं आहे.

जेव्हा फैसला करण्याची पाळी येते तेव्हा,बल्बचा शोध कुणी लावला,बॉम्बचा शोध कुणी लावला,कोण युद्ध जिंकला ह्याचा विचार करायची गरज भासत नाही.गरज भासते ती ही दूरची यात्रा कुणी आनंदाने भोगली याची.
हे जग एकाकी आणि मतलबी आहे ह्या वास्तविकतेवर मात केली गेली पाहिजे.एका कुत्र्याची दुसर्‍या कुत्र्यावर मात करणारं हे जग आहे.आणि प्रत्येकाला मोठा कुत्रा व्हायचं असतं.पण उत्तम कोण आहे हे कळण्याची खरीच जरूरी आहे का?.मी जे आज जगात बघतोय,पेपरात वाचतोय त्यावरून माझ्या लक्षांत आलं की जगात काय ही चूरस चालली आहे.?शेवटी आपण सर्वनाशाकडे झेप घेत आहो.तुमचं काय मत आहे?”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचंच कुत्र्याचं उदाहरण घेऊन माझ्या मनात काय विचार आला ते सांगतो.
मला तर केवळ,सुखाने आणि शांतीने जगण्यासाठीचं अस्तित्व बाळगणारा,व्यवस्थीत पोसलेला,उत्तम अनुभव घेतलेला,बाहेर भटकंती करायला मिळणारा जसा हवा तसा जीवनातला अनुभव घेणारा कुत्रा व्हायला आवडेल.
सगळ्यात बलवान,उत्तम प्रशिक्षित झालेला,आणि कुठच्याही चूरशीला तुडवून टाकणारा कुत्रा व्हायला मी कबूल होणार नाही.”

“मला खरंच काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो.”
असं म्हणत प्रो.देसाई म्हणाले,
“आता पूर्वी सारखं शिक्षण राहिलं नाही.हल्लीचा नवसमाज, मुलांना गुलाम होण्यासाठी, प्रशिक्षण द्यायला रूपांतरीत झाला आहे.शाळेत जाण्यापूर्वी मुलांना काहीच माहित नसतं. नवसमाजाचा पुढे होणारा गुलाम म्हणून त्यांच्या दूरवरच्या शिक्षणास प्रारंभ केला जातो.त्यातले बरेचसे, एक दिवस डॉक्टर,वकिल,किंवा एखाद्या धंद्याचे प्रबंधक होणार हे अपेक्षिलं जातं.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.
आपणा सर्वांकडून हीच समजूत करून घेतली आहे की ह्यातलं एखादं काहीतरी होणं म्हणजे मोठी उपलब्धि झाल्यासारखं आहे.आणि हा एक मोठा संकल्प पूरा केल्या सारखं आणि मोठी जबाबदारी पार केल्यासारखी आहे.
खरं तर,आपलं जबरदस्तीने मत-परिवर्तन केलं गेलंय की,कागदमोड करणं,तासनतास टेलिफोनवर बोलत रहाणं, आणि पैसे कमवणं म्हणजे सुखाकडे जाण्याचा संकेत आहे.”

“मला तुम्ही स्वार्थी म्हटलंत तरी चालेल.”
असं म्हणून भाऊसाहेब सांगू लागले.
“माझं तर म्हणणं आहे की सरळ आणि साधेपणाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.कदाचीत एक दिवस समुद्राच्या किनार्‍यावर भटकत जावं,किंवा एखाद्या दुपारी एखादं वाद्य वाजवीत बसावं.

ज्यात रस नाही ज्यात कसला ढंग नाही, पण दुर्दैवाने, पैसे आवश्यक आहेत असं वाटणारी इर्षा बाळगून,केवळ जन्मापासून अंगात सर्व तर्‍हेची हांव योजनाबद्द झाल्याने तशी अभिलाषा बाळगून आवश्यक नसलेल्या महागड्या वस्तू विकत घ्याव्या असं वाटावं असा विचार न येता, साध्या सुखाचा विचार यायला हवा. शाळेत जाण्यापूर्वी आपल्याला वस्तूंचे आकार कसे असतात, निरनीराळे प्राणी कसे दि्सतात हे घरी शिकवलं जातं. नंतर शाळेत
लिहण्या-वाचायला शिकवून हायस्कूलमधे जाण्यासाठी तयार केलं जातं.चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी चांगले गुण मिळवण्यासाठी लक्ष केंद्रीत केलं जातं.पुढे आयुष्यभर काम मिळण्यासाठी कॉलेजात शिक्षण दिलं जातं.शेवटी आपण डॉक्टर,किंवा वकील होतो.कारण त्यांना भरपूर पैशाची कमाई करता येते.पैसा कमवणं चालू झालं की संसारात लागणार्‍या दुनियादारीसाठी पैशांचा व्यय होत रहातो.मुलांचं शिक्षण आणि पुढे त्यानीही आपल्या पावलावर पाऊल ठेवावं म्हणून हा प्रयत्न असतो.निवृत्तिसाठी मग बचत करावी लागते.”

मी प्रो.देसायांना मधेच थांबवीत हंसत हंसत म्हणालो,
“आणि पिकलं पान होण्यापूर्वी आपण निवृत्त होतो.आणि काहीही करायला मोकळे होतो.सर्व जग आपलंच आहे अशी मनोधारणा होते.मिळणार्‍या स्वातंत्र्याचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडतो, सुख उपभोगायला सुरवात होते आणि एक दिवस हृदयाला झटका येतो.आणि घराच्या दारातच प्राण सोडतो.”

प्रोफेसर म्हणाले,
“ह्या जीवनाच्या मार्गावर कसेही तुम्ही चालला तरी,तुमच्या कहाणीचा शेवट,दुसर्‍या कुणाच्या काहाणीचा जसा होतो तसा होतो. तुम्हाला उदास होण्यासाठी मी हे म्हणत नाही.मला फक्त एव्हडंच दाखवून द्यायचं आहे की,जीवन हे काही तुम्हाला, खूप परिश्रम घेऊन, हवंय तिथं नेण्यासाठी,नाही.
कारण प्रत्येक व्यक्ती त्याच ठिकाणी जाते. जीवन अशासाठी असावं की जिथे आत्ता आहात आणि आत्ता जो वेळ तुमच्यासाठी आहे त्यासाठी खर्ची करायला आहे. तुम्ही ज्यात आनंद घ्याल त्यासाठी जीवन आहे .तुम्हाला आर्थीक फायदा किती झाला आणि राजकारणातला फायदा किती झाला त्यासाठी नाही.
प्रत्येक दिवसा गणीक आपण आपल्याला आठवण ठेवून विचारलं पाहिजे की,आपण आपलं जीवन मजेत घालवतो? कां नाही?जीवनातला प्रत्येक क्षण आपण कसलीतरी मजा करण्यात घालवला पाहिजे.त्यामुळे,त्या क्षणी केलेला मजेचाच अनुभव नव्हे तर जो वेळ आपण आठवणी साठवण्यात, नाती-गोती साधण्यात,आणि अनुभव मिळवण्यात घालवतो त्या आनंदाचा अनुभव मिळवण्यात घातला पाहिजे.”

“तुम्ही बरे व्हा नंतर आपण ह्या विषयावर चर्चा करू “
असं म्हणत मीच जायला निघालो.कारण लेक्चर द्यायला प्रोफेसरांचा हात कोण धरणार?मीच विषय आवरता घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 26, 2010

तोडीले हृदय एका धनहीनाचे

अनुवादीत (चांदीकी दिवार न तोडी…..)

स्थंभ चांदीचा नसेल तोडीला
तोडीले हृदय प्रीतिने ओथंबलेले
एका धनवन्ताच्या कन्येने
तोडीले हृदय एका धनहीनाचे

देण्या साथ दुःखामद्धे घेतली
शपथ जिने काल परवा
सुखाकरिता अपुल्या आज
झाली कुणा अनभिज्ञाची
शहनाईच्या गुंजे खाली
दबली हाय एका बावळ्याची
धनवन्तानी जुळविले नाते
त्या बावळ्याच्या दुःखाचे
एका धनवन्ताच्या कन्येने
तोडीले ह्रुदय एका धनहीनाचे

कसे समजावे प्रीतिला ज्यांना
चांदी सोने हे सर्वस्व त्यांना
धनवन्ताना वाटे जगती
हृदय म्हणजे एक खेळणे
दुःख सोसावे अनादीकाल
हृदयाने केवळ रडत रहाणे
मना वाटे करावे खेळणे ह्रुदयाचे
मना वाटे तोडावे नाते हृदयाचे
एका धनवन्ताच्या कन्येने
तोडीले हृदय एका धनहीनाचे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 23, 2010

शरीर जसं उपेक्षित तसंच कौतुकास्पद.

“ज्यावर तुमचं अतोनात प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ शांत आणि निःशब्द होऊन पडून रहाण्यातल्या शरीराच्या कौशल्याबद्दल मला कौतूक वाटतं.”

ह्यावेळी मी थंडीच्या दिवसात कोकणात गेलो होतो.तो डिसेंबरचा महिना होता.दिवाळीही यायची होती.माझ्या भावाकडे माझा मुक्काम होता.माझ्या दोन पुतण्या कॉलेजात शिकतात.मागच्या पुढच्या वर्गात आहेत.
संध्याकाळच्या वेळी बाहेर खूप छान थंड पडलं होतं.जेवणं झाल्यावर आम्ही सर्व बाहेर अंगणात खूर्च्या टाकून बसलो होतो. वर आकाशाकडे पाहिल्यावर मात्र ढगाळ दिसत होतं.कधी कधी दिवाळीच्या मोसमात पावसाच्या सरी येऊन जातात.वळवाचा पाऊस म्हणतात.तसंच काहीसं वातावरण होतं.

कॉलेज कसं काय चालंय, ह्याची विचारपूस झाल्यावर,माझ्या डोक्यात एक चर्चेचा विषय आला.मी दोन्ही पुतणींना म्हटलं,
“आपण आपल्या शरीराशी बरेच वेळा “टेकन फॉर ग्रॅन्टेड” असं समजून वागतो.तसं पाहिलंत तर शरीर हे खरोखरच खिचकट बाब आहे.बरेच वेळा शरीराच्या काही भागांची उपेक्षा झालेली असते तर कधी कधी आपण काही भागांचं कौतूकही करतो.जे नकळत उपेक्षित होतं त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला तुमच्या दोघांकडून तुमचे विचार ऐकायचे आहेत.”

“तुमचं पण मत आम्हाला ऐकायचं आहे.”
अचल, मला म्हणाली.आणि आपला विचार तिने सांगीतला.
“एखाद्या हिरव्या पानांनी खच्चून भरलेल्या झाडाच्या फांद्यातून सकाळचा सूर्य जेव्हा डोकावून पहात असतो,ते दृश्य मान वर करून पहात असताना सूर्याच्या किरणाच्या प्रखर प्रकाशामुळे नकळत माझ्या नाकाच्या शेंड्याला गुदगुदल्या होऊन मला शिंका येतात त्याची मला फार गंमत वाटते.”

मी म्हणालो,
“सकाळच्या उन्हात, अंगणात कुत्र्याची लहान लहान पिल्लं एकमेकाशी मस्तीखोरपणे अंगावर धाऊन जाऊन पडापडी करतात तेव्हा माझ्या ह्या गालापासून ते त्या गालापर्यंत उत्पन्न होणार हंसू मला भावतं.”
माझी दुसरी पुतणी -लता- ती संगीतात विशेष ध्यान देत असते.ती अलीकडे शास्त्रीय संगीताच्या क्लासात पण जाते.

लता म्हणाली,
“नुकतीच पावसाची सर पडून गेली आहे.असंच एखाद्या चांद्ण्या रात्री अंगणात थंडगार हवेची झुळूक अंगावरून जात असताना रेडिओच्या दिल्ली स्टेशनवरून नॅशनल कार्यक्रम चालला असताना शास्त्रोक्त संगीताची तान ऐकायला मला मजा येते.अशावेळी गोड दुधामधे वेलची टाकून केलेल्या गरम गरम कॉफीचा दरवळणारा सुगंध नाकात गेल्यावर खूपच बरं वाटतं.कॉफीचा झुरका घेताना कप जवळ आणून ओठातर्फे कॉफीचं तापमान अजमावयाला निराळीच लज्जत येते.”

माझं मत मी दिलं,
“थंडीच्या दिवसात, भर दुपारच्या उन्हात,अमुकच ठिकाणी जाण्याच न ठरवता, फिरायला जायला मला बरं वाटतं. एखाद्या ओढ्याच्या कडेने जाताना लाजाळूच्या झुडपाना नकळत स्पर्श झाल्याने पानं आपोआप मिटताना पाहून खूप आनंद होतो. निसर्गाने त्या लाजाळूच्या झाडाला दिलेली ती स्पर्शाची स्वाभाविकता पाहून माझ्या अंगात एक आनंदाची उर्मी येते.
लहानश्या गोष्टीतली मोठी सुखसमाधानी,आणि मोठ्या गोष्टीतली लहानशी सुखसमाधानी पाहून माझं मन प्रसन्न होतं.”

अचल मराठीत विषय घेऊन शिकत असल्याने,तिच्या मनात साहित्याविषयी-प्रेमाविषयी- विचार आला नसता तर नवलच होतं,ती म्हणाली,
“ज्यावर तुमचं अतोनात प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ शांत आणि निःशब्द होऊन पडून रहाण्यातल्या शरीराच्या कौशल्याबद्दल मला कौतूक वाटतं. मग ते लहान मुल असो किंवा एखादा बापया असो.मला कसं वाटत असतं ते कुणालातरी ओरडून सांगावसं वाटतं.प्रत्येक क्षणाचा शांत श्वास ती व्यक्ती घेत असताना,ते अनुभवून माझ्या शरीरात आणखी,आणखी जान भरून येते.त्या जवळ असलेल्या व्यक्तीमुळे माझं अस्तीत्व आहे याची मला जाण येते.
आणि म्हणूनच मला माणसाच्या शरीराचा प्रभाव,आणि त्यात असलेली क्षमता ह्याचं विशेष वाटतं”.

मी वयस्कर असल्याने सहाजीकच अलीकडे माझे शरीराचे काही अवयव खालावत जात असल्याने माझं लक्ष माझ्या कातडीकडे जास्त केंद्रीत होतं.त्याचा विचार येऊन मी म्हणालो,
“शरीराच्या कातडीचं मला विशेष वाटतं. सूर्याच्या उन्हात बसल्यावर उन्हाच्या उबेने कातडीला थोडासा काळसरपणा येतो आणि थंडीत हळूवारपणे मेलेली कातडी पडून जाते आणि कातडीवरच्या सुरकुत्या कमी कमी होत जातात.हे पाहिल्यावर निसर्गाचं कौतूक करावं तेव्हडं थोडंच असं म्हणावसं वाटतं.कातडीला कंप येऊन सुख ज्या तर्‍हेने कातडीतून वाहून जात असतं,जसं नसा-नसातून रक्त वाहत असतं,अगदी तसं कातडीचं सुखाच्या संबंधाने
आहे.”

आमच्याकडून होणार्‍या ह्या एकामागून एक,शरीराच्या भागांच्या उपयुक्ततेबाबतच्या विचाराच्या चर्चेमुळे ,एरव्ही उपेक्षीत राहिलेली, माहिती कौतूकाच्या रुपाने स्पष्ट होत आहे हे पाहून लताला हंसू आलं.ती खाली पायाकडे बघून हंसत होती हे पाहून मी अंदाज केला की ही काहीतरी पायांबद्दल आपला विचार सांगण्याच्या तयारीत आहे.आणि माझा अंदाज खरा ठरला.

लता म्हणाली,
“पायाच्या बोटांबाबत मला तसंच विशेष वाटतं. पायांच्या बोटांना जेव्हडी संवेदना असते तेव्हडी आपल्या शरीराच्या इतर भागाना त्याचा अनुभव नसतो.आपण कुठेही जात असताना,तोल सांभाळता,सांभाळता,पायाखाली आलेली जमीन आणि त्या जमीनीची संरचना अनुभवताना पायाची बोटं कार्यभार संभाळून मागे काय होतं आणि पुढे काय होणार आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात असतात.”

हे लताचं ऐकून अचलला प्रेम ह्या विषयाला धरून आणखी सांगावसं वाटलं.ती म्हणाली,
“मला हातांच्या बोटांचं पण फार कौतूक करावसं वाटतं.एखाद्या कोड्याची अनेक तुकड्यातून जुळवाजूळव करून कोडं जसं रूपांतरीत करता येतं अगदी तशीच ही हाताची बोटं असतात.
आपल्या प्रेमळ माणसाला मिठीत घेतल्यावर त्याच्या पाठीच्या कण्यावरच्या मणक्यांवर ही हातांची बोटं अगदी फिट्ट बसतात. ही मिठीतली संवेदना ज्याला इंग्रजीत “स्पाईन-चिलींग- म्हणतात तशीच काहीशी असते.”

आपल्या तोंडाविषयी काहीतरी बोलावं असं मला वाटलं.मी म्हणालो,
“माणसाच्या तोंडाबाबत मला विशेष वाटतं.शरीराच्या अनेक भागा पैकी हा भाग माझा सगळ्यात पसंतीचा आहे. ओठाच्या हालचालीवरून एकमेकाचा आजचा दिवस कसा गेला ते कळायला सोपं होतं.
जीभेचं काय विचारता? समुद्रात असलेली एखादी होडी वलव्हताना वल्ह्याचं सततचं काम म्हणजे पाण्याला ढकलणं. अगदी तसंच हे जीभेचं वल्हं, शब्दांना बलपूर्वक ओठाच्या बाहेर जाऊ देण्याचं,किंवा दातांच्या मागे अधांतरी तरंगत ठेवण्याचं काम करतं.”

ओठाविषयी बोलण्याचा मक्ता नक्कीच अचलचा.तिने सांगून टाकलं,
“ओठांचं काय सांगावं? ओठाचं हवादार चुंबकत्व मला खूपच पसंत आहे.हे ओठ जेव्हा आपल्या प्रेमातल्या व्यक्तीच्या ओठाशी परिचीत होतात,आणि एकमेकाचं संवरण निर्माण करतात,त्यावेळी जवळीकेच्या सीमेचं प्रतीक काय आहे ते दाखवतात.”

दिसायला सुंदर आणि सरल नासिकेची,चाफेकळी सारखं आपलं नाक उडवीत लता म्हणाली,
“मला माहित आहे की सर्वात खास असं शरीराचं वैशिष्ट म्हणजे नाक.नाकाला वासाबद्दलची संवेदना असल्याने प्रत्येक वेळेला नाकाचा उपयोग झाल्यावर माझ्या मेंदुला,सुस्पष्ट जुन्या आठवणी आणि हृदयविदारक विचार,तो वास सांगत असतो.”

दोघी बहिणीत अचलचे डोळे जरा मोठे. हरिणाक्षी म्हटलं तरी चालेल.आम्ही तिच्या डोळ्यांची नेहमीच स्तुती करीत असतो. आणि आपल्या टपोर्‍या डोळ्यांचा तिला अभिमानही आहे.तिने लगेच चान्स घेतला.लताकडे आणि माझ्याकडे बघत अचल म्हणाली,
“पण डोळे मात्र, आपल्याला आपण कशावर विश्वास ठेवावा,हे स्वीकार करायला लावतात.ते जणू दुर्बीणीसारखे, द्रुतमार्गाच्या -म्हणजेच आपल्या मनाच्या-कडेवर बसल्यासारखे असून सतत आपल्याला आठवण करून देत असतात की,आपण एकटेच नसून, आपल्या बरोबर आजुबाजूला आणखीन काही अस्तीत्वात आहेत.आणि आपण आपले डोळे बंद केल्यावर आपल्याच कल्पना शक्तीच्या कक्षेत ते आपल्याला सोडून देतात.
डोळ्यांकडून मला,झाडांमधून वर आकाशाकडे नजर लावून सुर्याकडे पहाण्याची, देणगी मिळाली आहे.

माझ्या डोळ्यांकडून मला काय पहायला मिळतं आणि मिळत नाही हे शक्य झाल्याने, ह्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.मी जे पहाते,त्याचा मी शोध घेते.आणि ज्याचा मी शोध घेते,त्यापासून मी शिकते.आणि जे मी शिकते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”

हे अचलचं सुंदर वाक्य संपता संपता वार्‍याची अशी जोरदार वावटळ आली आणि वाटलं की नक्कीच पाऊस पडणार. पावसाने आम्हाला वारनींग दिली.आणि पडायला लागला.खुर्च्या उचलून नेत आम्ही सर्वानी घरात पळ काढला. आणि आमची चर्चा तुर्तास संपली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com