Sunday, April 3, 2011

शांततेतून सुसंयोग.


“अश्या रात्रीच्या वेळी दरवाजाच्या आड कुणीतरी उभं आहे असे काल्पनीक सांगाडे डोळ्यासमोर येऊ शकतात.”

आज हवा फारच छान होती.तशी थोडी थंडी होती पण उन्हात बसल्यावर थंडी जाणवायची नाही.तळ्यावर जाऊन शांत बसून विचार करायला उत्तम चान्स आहे असं मनात आणून घरातून निघण्यापूर्वी प्रो.देसायाना फोन करून पहावं असं मला वाटलं.

फोनवर त्यांची पत्नी आली आणि म्हणाली,
“आत्ताच ते फिरायला म्हणून बाहेर पडले आहेत.बहुतेक तळ्यावरच जातील.”

मी तसाच निघालो.तळ्याजवळ आल्यावर आमच्या नेहमीच्या बाकावर भाऊसाहेब काहीतरी वाचत असल्याचं दिसलं.किशोर कदमच्या कविता वाचत होते.मला पण किशोरच्या कविता आवडतात.विशेषकरून त्यांनी पावसावर लिहिलेल्या कविता परत परत वाचाव्या असं वाटतं. आईवरही त्यांची सुंदर कविता आहे.

“तुमचं वाचून झाल्यावर मला वाचायला द्या”
मी प्रोफेसरना म्हणालो.
“तुमच्यासाठीच हे पुस्तक आणलं आहे.तुम्ही येईपर्यंत वाचत होतो.”
असं मला ते म्हणाले.

“किती शांत आहे सगळीकडे.मला अशी शांतता खूप आवडते”
असं मी माझ्या मनातलं त्यांना सांगीतलं.कुणास ठाऊक, माझं असं बोलून झाल्यावर, भाऊसाहेब विचारात पडल्यासारखे वाटले.

“मला पण शांतता आवडते.पण माझ्या मनातली शांतता वेगळीच आहे.मला त्या शांततेबद्दल विशेष वाटतं.पण ती क्लेशकारी,चिन्ताजनक,अनुपयुक्त शांतता नव्हे.कुठचंही भाषण ऐकण्यासाठी केलेली,आज्ञाकारी, शांतता तर नव्हेच नव्हे.निसर्गात निर्माण झालेली शांतता, जेव्हा पाळ्या-पाचोळाची कुरकर ऐकू येते,रात्रकिड्यांचा आवाज ऐकू येतो तीही शांतता अजिबात नाही.

शांतता जी निर्मळ शांतिप्रिय असते,ज्यावेळी सुनसान खामोशी असते आणि त्याबरोबर सुटकार येतो,चिंतन करता येतं,ज्यात श्रद्धा असते अशी शांतता मला भावते.

जेव्हा अशी निखालस शांतता असते,तेव्हा “आतला आवाज” अंततः आणि उपहासपूर्ण श्राव्य असतो.आणि त्यापुढेही जाऊन म्हणावसं वाटतं की हे चिंतन जे आपल्या मस्तकात भरलं जातं ते प्रत्यक्ष आपलं स्वतःचच असतं.हा विचार मनात येऊन हायसं वाटतं.”

प्रोफेसर देसाई मला काहीतरी शांततेबद्दल सुनावणार आहेत हे मी त्यावेळीच जाणलं.आपल्या हातातलं किशोर कदमचं पुस्तक माझ्याकडे देत म्हणाले,
“माझ्या लहानपणातल्या आठवणी मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो.
खरं म्हणजे आमच्या कुटूंबात मी अगदी शेवटाला झोपी जाणारा असायचो.अगदी पहाटेला कोंबडा आरवेपर्यंत जागा राहून शांततेची परिसीमा असलेली, म्हणजेच ज्याला रात्र म्हणावी, तिचा पूरंपूर आनंद उपभोगायचो.शांततेने घेरला गेल्यामुळे माझ्या चिंतनाच्या प्रक्रियेसोबत, मग ती कोणताही आडवा-तिडवा मार्ग घेत असली तरी,राहिल्याने तिचा माझ्यावर दबाव यायचा.

बिछान्यावर अंग टेकल्याटेकल्या, दिसव उगवल्यानंतर प्रथमच उद्भवलेल्या घटनांच्या आठवणींची जंत्री सामोरी यायची.शाळासोबत्यांबरोबर झालेली चर्चा,बाचाबाची आणि त्यातून उद्भवलेले विचार,मी गणीतात आणि पदार्थविज्ञानात प्राविण्य मिळवल्याबद्दल माझ्या आईकडून झालेली माझी प्रशंसा.नंतर कदाचीत,माझ्या भवितव्याबद्दल होऊ घातलेली माझी सुरवात,उद्याबद्दल,कदाचीत लवकरच येणारी माझी कॉलेजातली वर्षं,जीवनातल्या मध्य भागात येऊ घातलेला संकटकाळ,किंवा माझा निवृत्तीचा विचार की मी कोकणातल्या आमच्या घरात राहून घालवायचा,का प्रवासी होऊन देशभर प्रवास करून काळ बितवायचा.असे विचार यायचे.

अश्या ह्या चिंतनात रात्रीचे एक दोन तास निघून गेल्यावर माझ्याच जीवनाबद्दल सर्वसाधारण विचार यायचे-जीवनाचं जास्त सुलभीकरण करण्यापासून काळजी घेत असतानाही डोळ्यासमोर उद्भवणार्‍या त्याच जीवनाच्या प्रतिमेबद्दलचं कुतूहल वाढायचं.

ह्या शांततेच्या काळात मी जीवनाचा खरा अर्थ काय असावा हे समजण्यासाठी माझ्याच विचारांशी सामना देत असायचो. तरीसुद्धा असल्या विचाराने माझ्या “आतल्या आवाजाचा” थरकाप व्ह्यायचा.मी चकरावून जायचो.
पण असं होण्यात खरी गोम अशी की माझ्या ह्या सतत बदलणार्‍या शांततेबरोबरच्या नात्याचा,सतत बदलणार्‍या विचारांच्या नात्यातून उगम व्हायचा.”

हे ऐकून मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“विचाराबद्दल म्हणता म्हणून माझ्या डोक्यात काय विचार आला ते सांगतो.
विचार करणं हे शक्तिशाली असतं.पण जर का काळजी घेतली नाही तर,सहजच आपण स्वतःचाच घबराट करून घेऊ शकतो. निष्कारण काळजी लागते,मन विचार करण्यापासून अलग होऊ शकतं.अश्या रात्रीच्या वेळी दरवाजाच्या आड कुणीतरी उभं आहे असे काल्पनीक सांगाडे डोळ्यासमोर येऊ शकतात. पण असं झालं तरी हे गंमतीदायक आहे असं निश्चीतच वाटतं. म्हणूनच,गुढ आणि भयानक रितीने कुणालाही अचंबीत व्हायला वेळ लागणार नाही. कुणाला कसं वाटावं, हे केवळ विचार केल्याने प्रभावित होत असावं.केवळ सक्रियतेने विचार केल्यामुळे एखाद्याच्या विचाराना स्पष्ट आणि निश्चित पूरावा मिळण्याचा संभव आहे”.

“वाः! तुमचा विचार मला आवडला.”
असं म्हणून प्रोफेसर मला म्हणाले,
“मला विचाराल तर,जास्त करून ह्या शांततेचा विचार हा एक उपचार आहे असं मी समजतो- त्या वयात माझ्या चंचल मनाला,माझा जीवनाबद्दलचा जो समज होता त्याला स्पष्टीकरण देऊ केलं जायचं.ही शांतता एक आव्हान आहे असं मला वाटायचं.हे आव्हान,माझ्या विचारावर, मी दुर्लक्ष करू नये म्हणून, दबाव आणायचं.मी माघार घेऊ नये म्हणून मला त्याचा सामना करायला दबाव आणत असावं असं मला वाटायचं.

जरी त्या काळात मी एकाकी असलो,अवती-भवती काही नसलं तरी त्या शांततेला मला घाबरून चाललं नसतं.उलटपक्षी,त्या शांततेकडे मी विचार करण्यासाठी मिळालेली संधी असं समजायचो-विचारासाठी आणि चिंतनासाठी.
असं करत असताना ही शांती आनंददायक वाटायची. निश्चितच,मी माझं मन गुंतवायला बघायचो. त्यातच मला शांती मिळायची.आणि असं होता होता शांत झोपून जायची वेळ आलेली असायची.”

“माझंही असं कित्येकदा झालं असणार.अनेक रात्री मी पहाटेची झोप येईपर्यंत विचार करीत असणार. पण तुम्ही ज्या पद्धतिने रात्रीच्या त्या तुमच्या शांततेचा विचार करायचा हे वाखाणण्या सारखं आहे.”
असं मी प्रो.देसायाना म्हणालो.

“कसचं कसचं”
असं म्हणत रात्र होत आली आपण आता निघूया असं बाकावरून उठून मला प्रोफसरानी दर्शवलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 31, 2011

वाचन ज्ञानेंद्रियाद्वारे.



“इतक्या वर्षानी आता सुद्धा पुस्तकाचा वास मला विशिष्ट आनंदाचा प्रत्यय आणून देतो.”

बरेच दिवसानी रमेश माझ्या घरी आला होता.कॉलनीत आजुबाजूच्या परिसरात काय काय सुधारणा होत राहिल्या आहेत ह्याची चर्चा होत असताना मला रमेशने एक चांगली बातमी सांगीतली.
मला म्हणाला,
“कॉर्नरवरच्या नव्या बिल्डिंगमधे दुसर्‍या मजल्यावर एक नवीन लाइब्रेरी येणार आहे.त्याचं पुढल्या रविवारी उद्घाटन आहे.”
रमेशला वाचनाचं लहानपणापासून खूपच वेड आहे.त्याच्या घरात एक खोली तर पुस्तकानी भरून गेलेली आहे.नवीन दिसलेलं आणि त्यात स्वारस्य असलेलं पुस्तक दिसलं तर तो लागलीच विकत घेतो.आणि वेळ मिळेल तसा वाचूनही टाकतो.रमेश कुठेही दिसला तरी त्याच्या हातात एखादं पुस्तक असतंच.
लाइब्रेरीच्या उद्घाटना दिवशी आम्ही त्याठिकाणी गेलो होतो.तिथल्यातिथे वाचनासाठी ऐसपैस जागा होती.सर्व रॅक्स नीट रांगेत लावल्या होत्या.आईलमधे भरपूर जागा होती.निरनीराळ्या विषयावर पुस्तकं होती.हे सर्व बघून रमेश खूपच खूश दिसला.
मला म्हणाला,
“माझी सोय झाली.”

घरी आल्यावर आमची पुस्तकाच्या वाचनाविषयी चर्चा झाली मला रमेश म्हणाला,
“पुस्तकाच्या वासाबद्दल मला विशेष वाटतं.एखाद्या पुस्तकाची स्वच्छ,करकरीत पानं,त्यावर येत असलेला शाईचा वास,किंवा एखादा,वाचावा वाचावा वाटणारा,बाहेरून आकर्षक दिसणारा जिज्ञासा वाढवणारा,भरपूर ज्ञान देणारा जूना गौरव ग्रंथ ज्याची पानं वाचून वाचून पिवळट झालेली आहेत,अश्या पुस्तकाचा वास मला आवडतो.”
मला हे रमेशचं जगावेगळं पुस्तकाच्या वासाबद्दलचं सांगणं ऐकून गंमत वाटली.

मी म्हणालो,
“तू सतत पुस्तकं वाचत असल्याने तुझ्या डोक्यात हा पुस्तकाचा वास भरलेला दिसतोय.मी असा विचार करतोय ह्याचं कारण कोकणात आंब्याचे दिवस आले की प्रत्येकाच्या घरात आंब्याची “आडी” घातलेली असते.सुरवातीला आंबे कच्चे असतात.आंबे पिकायला लागले की “आडीतून” घमघमाट यायला सुरवात होते.लाइब्रेरीत गेल्यावर तुला असाच पुस्तकाचा घमघमाट येतो की काय?”

माझं हे ऐकून रमेश हसला.
मला म्हणाला,
“त्याला एक इतिहास आहे.त्यासाठी माझ्या लहानपणी तुम्हाला घेऊन जावं लागेल.
पुस्तकाच्या वासाबद्दल तोपर्यंत विचार केला नव्हता.जेव्हा लहानपणी मी माझ्या एका मित्राबरोबर एका लायब्ररीत काही पुस्तकं वाचायला घरी न्यावीत म्हणून बरीच पुस्तक चाळत बसलो होतो.वाचण्यासारखी बरीचशी पुस्तकं जवळच्या टेबलावर ठेवून माझा मित्र ज्या आईलमधे गेला होता तिकडे जाऊन कुतूहलाने मी त्याच्याकडे पहात होतो.

माझ्या मित्राला इतिहास हा विषय जास्त आवडत असल्याने त्या पुस्तकाच्या सेक्शनमधे तो पुस्तकं चाळत बसला होता.त्याने सुद्धा बरीचशी वाचायला आवडणारी पुस्तकं बाजूला करून माझ्याच टेबलावर जमाकरून ठेवली होती.तो प्रत्येक पूस्तक बाहेरून न्याहाळून झाल्यावर नंतर पहिलं पान उघडून त्यातली समरी वाचून आवडल्यास ते पुस्तक निवडत होता.पुस्तकाचा ढिग करून झाल्यावर मी आणि तो टेबलाजवळ येऊन बसलो होतो.मी त्याच्याकडे लक्ष देऊन पहात होतो.प्रत्येक पुस्तक मधेच उघडून तो ते त्याच्या नाकाकडे नेऊन दीर्घ श्वास घेतल्यावर त्याचा वास घेत होता.
नंतर संध्याकाळी आम्ही दोघे घरी आणलेल्या पुस्तकातून वाचायला कुठचं पुस्तक प्रथम घ्यावं ह्याचा विचार करीत बसलो असताना मला माझ्या मित्राला विचारल्याशिवाय रहावलं नाही.
कधी कधी वाचायला पुस्तकं चाळत असताना,मी त्या पुस्तकाचं डिझाईन,अक्षरांचा आकार आणि पुस्तकाचं कव्हर ह्या बाबत थोडा चोखंदळ असतो.पण पुस्तकाचा वास? त्याचा वास कसा येतो ह्याबद्दल कुणाला पर्वा असावी?
मी म्हणालो,
“तू प्रत्येक पुस्तकाचा वास का घेत होतास?”
तो मला म्हणाला,
“पुस्तक हे एखाद्या ग्लासातल्या वाईन सारखं असतं.पाचही इन्दीय-शक्तीचा वापर करण्याची त्यात प्रक्रिया असते.वाईनने भरलेलं ग्लास नाकाजवळ आणल्यावर येणारा तो कोरडा सुगंध, दिसणारा बरगंडी रंग,फेसातून येणारा कूरकूरा आवाज,थंडगार स्पर्श,जीभेवरून अलगद, टाळ्यापर्यंत जाताना लागणारी चव कशी वाटते,अगदी तसंच.”
पण त्याने मला एक मात्र निक्षून सांगीतलं की पुस्तकाची चव मात्र त्याने कधीही घेतलेली नाही.

एक एक पुस्तक घेऊन त्याने मला तसं करायला सांगीतलं.
मी डोळे मिटून घेतले आणि प्रत्येक पुस्तक उचलून दीर्घ श्वास घेऊन पाहिला.माझ्या जे लक्षात आलं त्याने माझी कुतूहलता वाढली.
प्रथम एका पुस्तकाला उघड उघड जुनकट वास आला.एका पुस्तकाला ताज्या हवेचा वास आला. आणि एकाला एखाद्या खर्चीक पेपराचा वास आला.प्रत्येक पुस्तकाला निरनीराळा वास असला तरी,त्यात लिहिलेलं ज्ञान समजून घेण्यासाठी माझी आतुरता वाढत होती.काहीतरी नवीन ज्ञान मिळेल याची आठवण येऊन भावना उद्दीत्प झाल्या होत्या,स्वच्छ हवेचा झरोका येऊन गेला होता. वाचनाची प्रचंड आतुरता असलेल्या मला पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे जाणारा दरवाजा होता.आणि तो त्या पुस्तकाचा वास त्या मार्गातला एक भाग होता.”

हे सर्व ऐकून मी रमेशला विचारलं,
“अजूनही तू तेच करीत असतोस काय?”
“हो मला ते केल्याशिवाय रहावंत नाही.”
असं सांगून रमेश म्हणाला,
“इतक्या वर्षानी आता सुद्धा पुस्तकाचा वास मला विशिष्ट आनंदाचा प्रत्यय आणून देतो.प्रत्येक वेळी मी वाचलेल्या पुस्तकाचा पुढचा चॅप्टर वाचायला बसलो,एखाद्या बूकडेपोमधून नवीन पुस्तक विकत घ्यायला गेलो,किंवा एखाद्या लाइब्रेरीतून पुस्तक आणायला गेलो की त्या साध्याच पण महत्वाच्या प्रबोधनाची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

आताशा मी पुस्तकाचं नुसतं बाहेरचं कव्हर आणि त्याचं डिझाईन बघत नाही,पानांचा गुळगूळीत स्पर्श घेत नाही,शाईचा वास घेत नाही,पानावरून पोहत जाणार्‍या शब्दांचं बोलणं ऐकत नाही, तर माझ्या नाकात आता पानापानावरचा ज्ञानाचा सुगंध पण शिरल्याशिवाय रहात नाही.”
मला हा रमेशचा ज्ञानेंद्रिया द्वारे वाचन करण्याचा प्रकार ऐकून खूपच गंमत वाटली.

मी त्याला शेवटी म्हणालो,
“तुझं हे सर्व ऐकल्यावर मला जो विचार सुचला तो तुला सांगतो.
पुस्तक नुसतं त्यात लिहिलेल्या आतल्या ज्ञानाची वाचकाबरोबर भागीदारी करीत नाही तर पुस्तक त्या वाचकांना वाचनाच्या प्रवासात असताना त्यांच्या ज्ञानेंद्रियातूनही मार्ग दाखवतं.खरं ना?”

चेहरा अगदी खुलवून मला रमेश म्हणाला,
“वा! ज्ञानेश्वरांना गीता एका वाक्यात कळली असं म्हणतात तसंच काहीसं तुम्ही माझा अनुभव एका वाक्यात मलाच सांगीतला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 28, 2011

पावसा़चा खेळ आणि पावसातला खेळ.

“मला पावसात खेळायला आवडतं,नाचायला आवडतं.” इति सुनंदा.

मी सुनंदाच्या घरी तिला भेटायला गेलो होतो.बाहेर खूप पाऊस पडत होता.
“अशावेळी गरम गरम भजी आणि मस्त गरम चहा घ्यायला मजा येते.”
मी सुनंदाला माझ्या मनातलं भीडभाड न ठेवता सांगीतलं.
ती उठून आत जायला लागली असं पाहून मी म्हणालो,
“अगं,मी तुझी गंमत केली.”

मला अडवीत म्हणाली.
“हाततिच्च्या,त्यात काय विशेष.मी आत्ता तयारीला लागते.”
असं म्हणत,
“तोपर्यंत हा पेपर चाळा”
असं म्हणून पेपर माझ्या हातात देत देत सुनंदा चहा ठेवायला आत गेली.

“मला पावसात खेळायला आवडतं,नाचायला आवडतं.”
असं तिच्याच हस्ताक्षरातलं,एक वाक्य एका कोर्‍या कागदावर लिहिलेलं पेपराच्या आतल्या घडीत राहून गेलेलं मी वाचलं.
ती बाहेर आल्यावर मी सुनंदाला विचारलं,
“काय पावसावर काही आठवणी लिहिते आहेस की काय?”

“तुम्हाला कसं कळलं?” इति सुनंदा.
“ह्या कागदावर मी वाचलं.”
तिचाच कागद तिला दाखवत मी म्हणालो.

“बाहेर पाऊस पडत होता.लहानपणीच्या आठवणी येऊ लागल्या काहीतरी खरडावं म्हणून सुरवात केली होती. तेव्हड्यात तुमची बेल वाजली.”
मला सुनंदा म्हणाली.
“अरेरे,माझ्यामुळे तुझ्या विचारात खंड आला.सुचलेले विचार लिहित असताना लिंक तुटली की मग तेच वि़चार येतील असं सांगता येत नाही.निदान माझं तर असं होतं.”
मी तिला म्हणालो.

“तुम्हाला कोकणातला पाऊस आवडतो तुम्ही मला खूपदा सांगीतलं आहे.तुमच्याशी पावसावर बोलून मला आणखी विचार सुचतील हे निश्चित.आपण दोघं बोलतोच आहो तर तुमचा अनुभव सांगा.तरच गरम भजी मिळतील.”
सुनंदाने अट घातली.

बरं बुवा!”
असं म्हणून मी सुनंदाला सांगायला लागलो,
“मला कोकणातला पाऊस आवडतो असं मी बरेचदा म्हटलं आहे.ज्यानी त्या पावसाचा अनुभव घेतला आहे त्यांना माझं म्हणणं नक्कीच पटणार.
कोकणातल्या पावसाच्या किती अवस्था असतील म्हणून सांगू.

आपल्या आगमनाची चुणूक देणारा पाऊस,
मे महिन्यातला खूप उकाडा सहन करून लोक आकाशाकाकडे पाहून हवालदिल होतात होतात तोच अचानक वळवाचे वारे वाहून,कोकणातल्या तांबड्या मातीला (आता तांबडी माती औषधालाही मिळणार नाही) सर्व आसमंतात भिरकावून देऊन,
“मी येतोय”
असा संकेत देणारा पाऊस थोडासा पडून जातो.आणि नंतर तो कुठे दडी मारून बसतो कोण जाणे?
कोकणातल्या शेतकर्‍याला माहित असतं की तो वळवाचा पाऊस आहे. खरा पाऊस अजून सुरू व्हायचा आहे.आता शेतीच्या कामाला सुरवात करायला हवी असं शेतकरी मनात म्हणतो.
कदाचीत
“मी येत आहे”
शेतकर्‍यालाच तो पाऊस असं सांगून जात असावा.

हल्ली तर पाऊस गेला असं समजून, शेतीचं ज्ञान नसलेले आमच्या सारखे,पाऊस केव्हा चालू होणार असा विचार करीत,
“ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम!”
असं अनमान काढून आपलं समाधान करून घेत असतात.
मी म्हणतो त्या पूर्वीच्या दिवसात कॅलेंडर उघडून पाहिलं गेलं असतं तर,सात जून यायला किती दिवस आहेत ते मोजून पहावेत. अगदी सात जूनला पाऊस नक्कीच कोसळायचा.

आलोच म्हणून सांगणारा पाऊस,
सहा जूनच्या रात्री,किंवा सात जूनच्या पुर्‍या दिवसात कधीतरी,गार,गार हवा वाहायला लागली की समजावं,
आकाशाकडे मान वर करून पाहिल्यावर, सूर्यनारायणाचं दर्शन होत नसेल तर समजावं,
काळ्याकूट्ट ढगांची, समुद्राकडून येत असल्याची, रीघ दिसली की ती पाहून समजावं,
आणि अचानक,
“कडाड-कुडूंब”
होऊन वीजा चमकायला लागल्या की नक्की खात्रीने समजावं,
“मी आलो”
म्हणून माळरानापासून ते नांगरलेल्या शेतीच्या कुणग्यापर्यंत,समुद्राच्या चौपाटीपासून ते डोंगरावरच्या उंचच उंच झाडापर्यंत बोंब मारत येणारा पर्जन्य,
“मी आलोच “
म्हणून सांगत आहे.
“इलो रे! इलो आतां बघूंक नको”
असं कोकणी माणूस मनात काही न ठेवता जगाला ओरडून सांगतो.
“कोण इलो,केव्हा इलो”
हे ज्याला त्याला माहित असतं.

इतक्या वर्षाचा कोकणी माणसाचा अनुभव आहे तो जाणार कुठे?
पावसाला सुरवात होणार आहे ह्या कल्पनेने आनंदाने तूडूंब भरून गेलेलं त्याचं काळीज त्याला गप्प बसू देत नाही.
मंगळोरी कौलांची आणि नळ्यांच्या कौलांची घरावरची छप्परं,मे महिन्यातच “छप्पर साफसफाई आणि परतवणी” झाल्याने, तयारीत असल्याने वरून कोसळणार्‍या पावसाचं पाणी पावळ्यातून जमीनीवर सोडून द्यायला उत्सुक्त असतात.पन्हळी दुथडी भरून वाहत असतात. तांबड्या मातीचं तांबडं पाणी रस्त्याच्या कडेने खोदलेल्या गटारातून भरून भरून वाहत असतं.
मुंबईच्या इराण्याच्या दुकानातला,
“दुध-कम (तांबडा) चाय और एक मस्का ब्रुन”
ऑर्डर करणारा मुंबईकर ह्या दिवसात कोकणात येत असायचा तेव्हा इराण्याच्या कपातला तांबडा चहा मनात आणून हेच म्हणत असावा की,
“इराण्याचं चहाचं दुकान फुटून गटारातून तांबडा चहाच वहात आहे”
पण आता हे दिवस राहिले नाहीत.कोकणात सगळीकडे डांबरी रस्ते झाल्याने,इराण्याची दुकानं जशी मुंबईत बंद झाली तसं पावसाचं तांबडं पाणी कोकणात बंद झालं.

“भट (पाऊस) हात पाय पसरी”
अश्या परिस्थितीला आलेला पाऊस,
जूनचा शेवटचा अर्धा महिना आणि सुरवातीचा जुलैचा अर्धा महिना पाऊस पडत नाही असा एकही दिवस जात नाही.काही वेळा अपवादाने होत असेल ते विरळं.
शेतकरी एकदम खूश असतो.पेरणी झालेली असते.मधेच कधी उघडीप यावी असं वाटत असतं. पण सूर्याचं दर्शन कमीच.भाताची रोपं डोकं वर काढून बघत असतात.कोकणी शेतकरी आनंदाने मश्गूल असतो.कुणग्यात पाणी तुंबायला सुरवात होते.भात शेतीला त्याचीच जरूरी असते.
जुलै ओसरत जात असताना पाऊस पण तसाच ओसरत जातो.निसर्गाचीच ती योजना असावी.

चिरी-चिरी पडत रहाणारा पाऊस,
ऑगस्टमधे मात्र पाऊस चिरी-चिरी पडत रहातो.शेती नकरणारा माणूस म्हणतो,
“खूप झालं आता जा बाबा”
असं म्हणवून घेणारा पाऊसही खरंच पुढे पुढे कमी होत जातो.
कोकणात ह्या अडीच-तीन महिन्याच्या पावसाने सगळं वातावरण कसं थंडगार झालेलं असतं. मुंबईकराच्या भाषेत,
“कूल,जस्ट लाईक एसी”

ऑगस्ट-सप्टेंबर येता येता कोकणात बाप्पाच्या येण्याच्या तयारीला लागलेला कोकणी माणूस समजून जातो.हे वर्षाराजे आता जाण्याच्या मार्गावर आहेत.
अधून मधून सरी पडत असतात.गणपतीबाप्पाना कधी कधी भिजत यावं लागतं.
आणि शेवटी कधी कधी बाप्पा जाण्यापूर्वी किंवा बाप्पाबरोबर तर कधी कधी बाप्पा गेल्यानंतर,
“चाललो,परत पुढच्यावर्षी नक्कीच”
असं सांगणारा पाऊस खरोखरच बरेच वेळा वीजा चमकवून गडगडाट करून,
“बरं चाललो”
म्हणून नोटीस देऊन जातो.
कोकणातल्या पावसाच्या अशा ढोबळ अवस्था दिसून यायच्या.
असं हे पूर्वी थोड्या फरकात इकडे तिकडे होऊन पाऊस यायचा आणि जायचा.
पावसाचे खेळ मी तुला सांगीतले.आता तू पावसातले खेळ काय ते सांग.”

असं मी म्हणाल्यावर सुनंदा म्हणाली,
“थांबा,मी सांगत असताना तुम्ही चहा आणि भजी खा”
असं म्हणून आत जाऊन दोन प्लेट भरून गरम भजी घेऊन आली.सुनंदाची बाई भजी तळत होती.

नंतर सुनंदा मला म्हणाली,
“मी माझ्या लहानपणी आमच्या घराच्या पडवीत झोपाळ्यावर बसून सहजसुंदरतेने पडणार्‍या पावसाकडे टक लावून पहात असायची.अशावेळी पावसात धावत जाऊन चपळतेने नृत्य करण्यार्‍या नर्तकीसारखं मोकळे हात करून चक्राकार नाचून,मधेच वरती आकाशाकडे पहात पर्जन्यवृष्टीची कमाल पाहून आनंदात डुबून जावं असं मला वाटायचं.
मी कसल्याही कामात गर्क झाले असले तरी माझ्यासाठी पाऊस योग्य वेळीच पडायचा.मला पावसात खेळायला आवडत असल्याने बहुदा पाऊस मी बाहेर असताना पडला तर बरं वाटायचं.

काही लोकाना पाऊस आकाशातून कोसळणं म्हणजे त्यांच्या मार्गात आलेली अडचण किंवा कटकट वाटत असते. त्यांच्या दृष्टीने तो पाऊस म्हणजे अयोग्य वेळी आलेली बला वाटत असते. आणि त्यांना काळे कभिन्न ढग आकाशात जमलेले पाहून धसकी वाटत असते.माझ्या जीवनात मी पावसाकडे पहाते ते त्या पावसामागे छपलेल्या ह्या धरतीच्या संबंधाने असलेला त्याचा मतलबाकडे.
पाऊस पडत असताना सर्व काही जादूमय वाटतं.स्वर्गातून पाऊस कोसळत असताना एखादं इंद्रधन्युष्य दिसल्यास मुलाना तसंच मोठ्यानासुद्धा विस्मयकारक वाटतं.
पावसात खेळणं हे थोडसं सांकेतिक वाटतं.आपल्या मनात आलेल्या भावना जशा- मर्मभेदी दुःख, एकाकीपणा, प्रेम,वेदना आणि स्वातंत्र्य.

कल्पना करा की तुम्ही एका फुलांच्या बगीच्यात आहात.हवेतला गारवा आणि त्यात असलेले थोडेसे तुषार तुम्हाला जाणवतात,बरोबरीनी तुमच्या चेहर्‍यावर त्यांचा शिडकावा होतो.एकदम थोडा पाऊस आल्यावर आकाशाकडे पहाता,तिथे उभे असताना सूर्य धुसर होऊन काळे ढग नजरेला दिसतात.

अशावेळी काय जाणवतं?कदाचीत मोकळं झाल्यासारखं वाटतं,कदाचीत निस्सहाय वाटतं.
दुसर्‍या सीनमधे समजा तुम्ही रात्रीची गाडी चालवत आहात,गाडीत एकटेच आहात आणि प्रचंड गडगडाट होऊन वीजा चमकायला लागतात.पावसाची लक्षणं उघड होतात.जमीन सरकत असल्याचं वाटून तुम्ही गाडी काळजीपूर्वक चालवता.वीजांचा झगमगाट वाढायला लागतो.हे असलं वातावरण डोळ्यासमोर दुःख-वेदना आणि भीती उभी करते.
ह्या उदाहरणावरून दिसून येतं की, पावसात गेल्याने भावना उज्वलित होतात किंवा पावसात खेळल्याने निराळंच वाटू लागतं.आनंदात डुबून गेल्या सारखं वाटतं.”
मला सुनंदाचे, तिच्या डोक्यातून आलेले, पावसात खेळण्याचे विचार ऐकून खूपच मजा आली.

तेव्हड्यात तिची बाई दोन कप गरम चहा घेऊन आली.
“आणखी भजी हवीत का?”
असं सुनंदाने विचारताच चहाचा कप ओठाला लावित हाताने नको म्हणून खूणवीत मी सुनंदाला म्हणालो,
कुणीतरी म्हटलंय,
“जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा मला एकटेपणाचं काहीच वाटत नाही.मी आकाशाबरोबर रडत असतो.”

पावसाचं आणि माणसाच्या भावनांचं नातं किती जुळलंय ते दिसतं.
पावसाने तुमच्या जीवनात जान आल्यासारखं वाटतं तसंच पावसाने ह्या विलक्षण जगातल्या त्रुटिंची वास्तवता दाखवली जाते.
हा पाऊस कुणाला समस्या निर्माण करील तर कुणाच्या समस्या सोडवील.कोणत्याही परिस्थितीत पाऊस माणसाचा आणि धरतीचा दुवा सांधतो.आणि हेच कारण तुला पावसात खेळायला आणि मला पावसाचे खेळ पहायला उद्युक्त करतं.
पुढच्या खेपेला येईन तेव्हा, तुझ्या त्या एक वाक्य लिहून झालेल्या उरलेल्या कोर्‍या कागदावर,तू पावसाबद्दल आणखी लिहिलेलं मला वाचायला आवडेल .”
असं म्हणून मी सुनंदाचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, March 25, 2011

आळसावलेला रविवार.

“रविवार हा दिवस पूर्‍या आठवड्याचा जमलेला गंज खरवडून काढणारा दिवस असतो”

प्रमिलेच्या वडीलांचा मला फोन आला होता,
“प्रमिला एक आठवड्यासाठी माझ्याकडे कोकणात येणार आहे.तिच्या बरोबर गो.नि.दांडेकरांची “शितू” ही कादंबरी वाचण्यासाठी पाठवून द्या.”

ह्या कादंबरीत गोनीदानी कोकणाचं नयनरम्य दृष्य डोळासमोर उभं केलेलं आहे.मी ही कादंबरी पूर्वीच वाचली होती आणि ती कादंबरी माझ्याजवळ आहे असं मी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना बोललो होतो ते आठवून मला त्यांनी असा निरोप दिला होता.

प्रमिला अलीकडेच एका सॉफ्ट्वेअर कंपनीत कामाला लागली होती.चर्चगेटच्या वुमेन्स-हास्टेलमधे ती रहायला होती.ती सोमवारी कोकणात जाणार असल्याने मला तिच्याकडे रविवारी जाणं भाग होतं.रविवारी ती नक्कीच घरी असणार असा विचार मनात आणून मी तिच्याकडे सकाळीच दहाच्या दरम्यान ती कादंबरी घेऊन गेलो होतो.

हास्टेलच्या तळमजल्यावर असलेल्या वेटिंग-रूममधे मी तिची वाट बघत बसलो होतो. रखवालदारला मी आल्याचा तिला निरोप द्यायला सांगीतलं.तिची रूम-मेट खाली येऊन मला म्हणाली,
“प्रमिला दुपारचे बारा,साडेबारा वाजल्याशिवाय उठेल असं वाटत नाही.तुम्ही दुपारी एकच्या दरम्यान या.ती उठल्यावर मी तिला तुम्ही आल्याचं सांगीन.”

इतक्या उशिरापर्यंत काहीना झोप कशी लागते असा मी मनात विचार करत बाहेर पडलो.मरीन-ड्राइव्हच्या चौपाटीवर एका बाकावर बसून समुद्राची हवा खावी असा विचार करून तिकडेच गेलो.
एकच्या दरम्यान परत आल्यावर मला पाहून रखवालदाराने प्रमिलेला फोन केला.तशीच ती लगबगीने खाली आली.

“सॉरी,सॉरी तुम्ही आज येणार ते मी विसरूनच गेले.तुमची तत्परता माहित असूनही माझ्याकडून असं का झालं ते मी तुम्हाला थोडा वेळ असेल तर सांगते”
असं म्हणून मला म्हणाली,
“रविवारचा पहाटेचा एक वाजला होता. हसून, हसून पोट दुखायला लागलं होतं.आणि मी अंग टेकावं म्हणून माझ्या बिछान्यावर येऊन लेटली. गाढ झोपी गेल्यानंतर केवळ दोन मिनीटांची झोप लागली असावी असं वाटता वाटता माझ्या खिडकीतून सूर्याची चमकदार किरणं माझ्या डोळ्यावर पडून मला जाग आली.मस्त झोप झाली असं मी माझ्या मनात म्हणत असताना वाटत होतं की,आणखी थोडावेळ झोपावं.
अहो आश्चर्य!.घड्याळात रविवारच्या दुपारचे साडेबारा वाजले होते.
महमूदचा पडोसन सिनेमा पाहून “आळसावलेल्या रविवारच्या” दुपारी मी उठले होते.हा रविवार मला अगदी आरामात काढायचा होता.एकदा का “आळसावलेला रविवार” नीट गेला की माझा पुढचा पुरा कामाचा आठवडा सुख-शांतीत जातो,असं मला वाटत असतं.आणि तुम्ही येणार ते विसरूनच गेले.”

मी प्रमिलेला म्हणालो,
“कोकणातलं मला माहित आहे.एरव्ही तुम्ही घरातले एकमेकाना न भेटणारे आपआपल्या कामात दंग असलेले असताना रविवारी मात्र पूर्ण आराम घ्यायचे.तुझे बाबा मला तुमच्या घरातलं रविवारचं महत्व अगदी चघळून चघळून सांगायचे.”

मला प्रमिला म्हणाली,
“मला माझं लहानपण आठवतं.आमच्या चार भावंडात मी मोठी.त्यामुळे नेहमीच समजलं जायचं की सगळी जबाबदारी माझीच असते.मला जबाबदारीचं पद दिलं तरी हरकत नसायची. पण मला कधीच अवसर मिळायचा नाही हे नक्कीच.
शाळेतले वर्ग चालू असताना शिकण्यात वेळ जायचाच,आणि मधल्यावेळात आमच्या वर्ग शिक्षीकेला मदत करण्यात,निबंधाच्या सर्व वह्यात बाईनी दिलेल्या मार्कांची बेरीज करण्यात, “आजचा सुविचार” फळ्यावर लिहिण्यात वेळ जायचाच त्याशिवाय आजीचा बिछाना सारखा कर,तिला काही वाचून दाखव हे नित्य-नियमात असायचं.

बर्‍याच जणाना घरी गेल्यावर “माझा वेळ” म्हणून असतो.पण माझ्या जीवनात तसं काहीच नसायचं.घरी आल्यावर माझा बराचसा वेळ भावंडांची देखभाल कर,घराची साफसफाई कर, आणि कधी कधी जेवण करायलाही हातभार लाव असं असायचं.आठवड्याच्या अखेरीला रेस मधला घोडा धावून आल्यावर जसा दमतो तसं माझं व्हायचं.

खरं तर आमच्या कुटूंबात सर्वांचं तेच व्हायचं.माझी भावंडंपण माझ्या सारखीच कामात व्यस्त असायची आणि माझे आईबाबा आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असायचे.त्यामुळे रविवार हा आमचा सर्वांचा विश्रांतीचा दिवस मानला जायचा.मग मी आणि माझे बाबा जुन्या फिल्म्स
आणून त्या बघायचो,आई आणि इतर भावंडं त्याना आवडेल तशी करमणूक करून घ्यायचे. जेवण मात्र जरा विशेष व्हायचं.एकत्र बसून आम्ही जेवायचो.अगदी अजून पर्यंत ती रुढी कायम आहे.”

आता शहरात आल्यानंतरही माझ्यासाठी काही विशेष फरक झाला नाही.रविवार म्हणजे आराम हे अजूनही माझ्या समजुतीत आहे.माझा मात्र रविवारचा दिवस इकडे जास्त करून बिछान्यात लोळण्यात जातो.टाप-टीपपणा असणं,नेसलेल्या कपड्यांबद्दल जागृती असणं, असल्या गोष्टींना फाटा देऊन कोण काय म्हणेल ह्याची परवा नकरण्याचा माझा शिरस्ता असतो. आठवतो तेव्हडा आमच्या लहानपणापासूनच्या रुढीचा पुरंपूरा मी फायदा घेत असते.”

“तू ज्या कपड्यात खाली मला भेटायला आलीस त्यावरून तुझा शिरस्ता लक्षात यायला मला वेळ लागला नाही.”
मी हसत हसत प्रमिलेला म्हणालो.

प्रमिलापण माझ्या बरोबर हसली.पण त्या शिरस्त्याची सफाई सांगताना मला म्हणाली,
“पूर्वी आमच्या घरी,रविवार म्हणजे कुटूंबातल्या सगळ्यांचं एकत्रीत येणं असायचं.हे असं आठवड्याच्या इतर दिवशी कधीच व्ह्यायचं नाही.आता मला शहरात आल्यापासून रविवार म्हणजे “माझा वेळ” असं समजण्यात रुपांतर झालं आहे.रविवारी जर का मला आराम करायला मिळाला नाही तर पुढच्या आठवड्याचा माझा व्यस्त कार्यक्रम माझ्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन माझ्यावर मात करील.

मी जर नुसती कल्पना केली की मी ह्या “आळसावलेल्या रविवार” शिवाय असेन तर, मला दिसून येईल की झोपेचं खोबरं झालेली,मनावर प्रचंड तणाव असलेली, चीडचीडी, करवातलेली मुलगी होईन.”

उठता उठता मी प्रमिलेला म्हणालो,
“कुणीतरी म्हटलंय,
“रविवार हा दिवस पूर्‍या आठवड्याचा जमलेला गंज खरवडून काढणारा दिवस असतो”
रविवारी दुपारी साडेबाराला उठण्याने डोळ्यावर चढलेला पापुद्रा दूर करायला तुला मदत होत असावी.”

“वरील उक्तिशी मी जास्त सहमत न होऊन कसं चालेल?”
असं म्हणून प्रमिलेने मी दिलेलं पुस्तक आपल्या जवळ घेऊन मला निरोप दिला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 22, 2011

तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून



  • अनुवाद

    जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामिल
    जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल

    हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा
    हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा
    काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी
    जीवन भासे यात्रा अन देवी तू मंदिरातील
    जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल

    हर एक फुल महकते आठव तुझी देऊन
    तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून
    हे तुळशी वृंदावन की प्रीतिचे ठिकाण
    तू जवळ अथवा दूर असूनी आहेस काबिल
    जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामिल

    हर एक शय्या झगमगे प्रीतिच्या किरणानी
    ही झगमग पाहूनी नको आशा अधूरी जीवनी
    जीवन यात्रेत असते सहयात्रीची जरूरी
    यात्रा एकाकी करील माझे जीवन मुष्कील
    जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com


Saturday, March 19, 2011

(कटकटीला) जाऊ देणे


संजयचं वय पस्तीसएक असेल.एका मल्टी-नॅशनल कंपनीत एका जबाबदारीच्या जागेवर तो काम करीत असतो.
मला त्या दिवशी म्हणाला,
“हे मल्टी-नॅशनल कंपनी प्रकरण माझा एकदा जीव घेणार आहे.पगार भरपूर देतात पण घाण्याच्या बैलासारखं काम करून घेतात.दिवस नाही,रात्र नाही,घर नाही दार नाही,सेल फोन कानावर आणि लॅपटॉप मांडीवर घेऊन बसावं लागतं.कधी कधी लॅपटॉपवर घरी काम करीत असताना माझा दोन वर्षाचा मुलगा माझ्या मांडीवर बसायला मागतो पण मला त्याची समजूत घालावी लागते.बिचारा नाराज होऊन गेल्यावर माझ्या काळजात कळ येते.”

मला संजयची खूपच कीव आली.
मी म्हणालो,
“तुझं म्हणणं मला एकदम पटतं.अशावेळे कुठेतरी दूर जाऊन काही दिवस रहावं असं वाटत असतं.”

“पण कुठे म्हणून जाणार?.जावं तिथे ही गर्दी.तेच वातावारण,त्याच कामाच्या चर्चा.”
अगदी वैतागून संजय मला म्हणाला.

“मला वाटतं जीवनात कटकटी जास्त वाढायला लागल्या की कुणालाही वाटत असतं की अशा ठिकाणी जाऊन बसावं की सर्व कटकटी जाऊ द्याव्यात.
अशावेळी आयुष्यात थोडी मंदगती आली तरी येऊ द्यावी.”
मी संजयला सहानुभूती देत म्हणालो.
“अगदी,हुबेहूब तुझ्या कामासारखं माझं काम नव्हतं.कदाचीत त्यावेळी मल्टी-नॅशनल नव्हत्या.पण माझं काम संशोधनाचं होतं.अमुकच झालं पाहिजे असा कुणाचा माझ्यावर ताण नव्हता.पण स्वतःचा स्वतःवर कामाचा ताण होता.”

“मग अशावेळी तुम्ही काय करायचा?”
संजयने लागलीच मला प्रश्न केला.
मी म्हणालो,
“अशावेळी निवांत जाऊन रहाण्याची माझी जागा म्हणजे माझ्या आजोबांच्या कोकणातल्या शेतीवरच्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ बांधलेला मांगर.”
“सांगा,सांगा निदान तुमचं ऐकून माझा कामाचा ताण कमी होईल.”
उतावीळ होऊन संजय मला म्हणाला.

मी म्हणालो,
“ऐकतर,ह्या मांगराच्या जवळच एक छोटसं तळं होतं.तळ्याच्या सभोवती मोठमोठी जंगली झाडं होती.लांबच लांब पारंब्या लोम्बत असलेलं एक वडाचं झाड होतं.माझ्या आजोबांनी लावलेली नवीन आंब्यांची कलमं आणि माडाचे कवाथे होते.उंचच उंच पोफळीची आणि माडाची झाडं होती.वारा आला की ह्या झाडांची पानं हलायची.जास्त करून पिंपळाच्या पानांचा सळसळाट जाणवायचा.तळ्याच्या जवळ आजोबांनी एक सिमेंटचा बाक बसायला म्हणून ठेवला होता.त्या बाकावर बसून तळ्यातल्या पाण्याकडे बघत असताना सर्व कसं शांत वाटायचं.मोटार-गाड्यांचा आवाज नाही,टीव्हीचे मोठे आवाज
नाहीत,फोनच्या घंटीचा खणखणाट नाही.

निरनीराळ्या पक्षांचे आवाज,मधूनच कोकिळेची कुहू,कुहू,लांबून येणारा मधूनच घुबडाचा आवाज,हेलिकॉप्टर सारखे दिसणारे लहान लहान भिरमुटे आजुबाजूला उडताना दिसायचे, कधीतरी एखादा रंगीत सरडा सुक्या पाचोळ्यातून झरकन पळत जाऊन जवळच्या झाडाच्या बुंद्यावर चढून बसायचा आणि तळ्यातल्या पाण्यात जरा निरखून पाहिल्यावर एखादा मासा हवेसाठी पाण्यावर उंच उडी घेऊन नंतर त्याने पाण्यात डुबकी मारल्यावर त्याच्याकडून केला जाणारा आवाज हे सर्व पाहून,ऐकून आणि अनुभवून मला त्या वातावरणात चिंब भिजल्या सारखं वाटायचं.

कधीकधी इतकं शांत वातावरण असायचं की तळ्यातल्या पाण्यात डोकावून पाहिल्यावर माझं प्रतिबिंब दिसायचं.सभोवतालच्या झाडांचं प्रतिबिंब दिसायचं.मात्र मधेच एखादं वार्‍यावर तरंगत येणारं सुकलेलं पान पाण्यात पडून शांततेचा भंग करायचं.शांत पाण्यात इवल्याश्या पानाने तरंग उत्पन्न होऊन हे असं व्ह्यायचं हे उघडच आहे.”

“मग अशा जागी तुम्ही सुट्टी घेऊन जात असाल”
अगदी कुतूहलाने संजयने प्रश्न केला.

“अलबत, पंधरा दिवसाची चक्क व्हेकेशन घेऊन मी जायचो.”
असं सांगून पुढे संजयला म्हणालो,
“मला तरी त्यावेळी त्याजागी माझं आयुष्य क्षणभर स्तब्ध झाल्यासारखं भासायचं.त्या शेतावर मला कसलीच कटकट वाटत नसायची.
माझं जीवन क्षणभर स्तब्ध झाल्याचं भासून मला बरं वाटायचं.त्या शेतावर मला कुणाचाही उपद्रव होण्याचा संभव नव्हता. मेंदू शांत असायचा.
माझं ब्लड-प्रेशर खाली जायचं आणि माझ्या मनावरचा ताण नाहीसा व्ह्यायचा.वास्तवापासून दूर राहिल्याने मस्त वाटायचं.हे ठिकाण सहजासहजी सोडून जायला आता मला वेळ नाही असं मी माझं मन वळविण्याच्या प्रयत्नात असायचो. माझ्या आजोबांच्या शेतावर माझा कायाकल्प झाल्यासारखं मला वाटायचं.जीवनात नेहमीच व्यस्त रहाण्यापलीकडे आणखी काहीतरी आहे असं वाटायचं.”

संजय मला म्हणाला,
“मी अनेकाना त्यांच्या मनावर इतका तणाव असलेले पाहिलेत की कशात काही अर्थ नाही अशा अवस्थेला ते आलेले असातात.कधी कधी इतपर्यंत कळायला लागतं की,काही लोकाना वाटत असतं की,ह्यातून दूर जाऊन एखादी अशी जागा पहावी की सर्व काही जाऊ दे असं वाटायला लागावं.”

मी म्हणालो,
“बरेच वेळा संशोधनाचं काम करीत असताना मी बांधला-जखडला गेलेलो आहे असं मला वाटत रहायचं.माझा तणाव मला कधीच सोडून जाणार नाही असं मला वाटत असायचं.इतरांसारखा स्वपनांच्या मागे मी लागलेला असायचो.आणि मी त्यात विलंब केला तर इतर मला टाकून पुढे जातील ह्याची भीती मला वाटत असायची.पण मग माझ्या मलाच आठवण करून द्यावी लागायची की,आजोबांच्या शेतावर जावं.”

संजयला हे ऐकून डोक्यात कल्पना आली. मला म्हणाला,
“मला वाटतं की,बर्‍याच लोकाना, शब्दांत सांगता न येण्यासारखं, सूख कुठे मिळेल ती जागा ठाऊक असते.पहिलं पाऊल टाकून त्या जागी जायला त्यांना जरा कठीण होत असावं,पण एकदा त्याजागी गेल्यावर सूखच तुमची वाट पहात असतं.हवी हवी असलेली विश्रांती शरीराला मिळण्यासाठी तुम्ही पात्र झालेले असता.मलासुद्धा तुम्ही पाहिलेल्या जागेसारखी एखादी जागा शोधून काढावी लागेल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, March 16, 2011

सुखासाठी घरगुती उपाय


Posted: Thu, 17 Mar 2011 02:28:24 +0000

“माझ्या लक्षात आलं की तुम्ही कुठच्याही भाषेत बोलत असाल,तुम्ही कुठच्याही प्रांततले असाल पण हास्याचं भाषांतर सहजपणे होत असतं.”

मला आठवतं एकदा बाळ्या डोंगरे वर्गात हसतो म्हणून आमच्या संस्कृतच्या गुरूजीनी त्याला त्यांचा तास संपेपर्यंत बाकावर उभं रहायची शिक्षा दिली होती.
“मी तुम्हाला नळ-दमयंतीची कथा संस्कृतमधून मराठीत भाषांतर करून सांगत असताना,तू माझ्या वर्गात सतत हसत असतोस त्यामुळे माझं लक्ष केंद्रीत होत नाही.”
असं सागून त्याला एकदा वर्गाच्या बाहेर जा म्हणून सांगीतलं होतं.
ह्यावेळेला त्याला बाकावर उभं रहाण्याची शिक्षा दिली होती.
आमचे संस्कृतचे गुरूजी आमच्या शाळेत नवीन आले होते.त्यामुळे बाळ्याची संवय त्यांना नवीनच होती.
बाळ्या बाकावर उभारून शिक्षा भोगत असताना सुद्धा हसतो म्हणून गुरूजीना त्याचा आणखी राग येत होता.त्याला ते खूप बोलले होते.
“तुला स्वतःची लाज कशी नाही.?इतका कोडगा कसा तू?
असंही बाळ्याला त्यांनी विचारलं होतं.पण बाळ्या हसतच होता.तो गुरूजीना कसलीच प्रतिक्रिया देत नव्हता.

खरं म्हणजे बाळ्याचा चेहराच हसरा होता.आणि त्याचं मुख्य कारण त्याचे वरचे समोरचे दात जरा पुढे होते. त्यामुळे दात दिसून तो हसल्या सारखा वाटायचा.बाळ्या स्वभावाने अगदीच गरीब होता.बिचार्‍याने आमच्या संस्कृत गुरूजींचं एव्हडं बोलणं खाऊन मनाला लावून घेतलं नाही.
नंतर एकदा गुरूजीनी त्याची माफी मागीतली.
“तू हे मला सांगायचं नाही काय?”
असं सांगून गुरूजीने त्याच्यावरच जबाबदारी टाकली.
नंतर कळलं आमच्या गणीताच्या शिक्षकानी बाळ्याची खरी हकीकत संस्कृत शिक्षकाना सांगीतली होती.

हे सगळं सांगण्याचं कारण,त्यादिवशी माझी आणि संजयची हसण्याच्या सवयीवर चर्चा झाली.संजय मात्र खरंच वाक्या- गणीक,शब्दा-गणीक हसत असतो.ती त्याची स्टाईल आहे.
म्हणून मी बाळ्या डोंगर्‍याची गोष्ट संजयला सांगीतली.
मला संजय म्हणाला,
“हास्याला काय म्हणून समजावं? ह्याची अनुभूती वर्णनाच्या पलीकडची आहे.हास्यामुळे पोटात दुखायला लागतं,डोळे पाण्याने भरतात,आणि बरेच वेळा काहीसं डोकंसुद्धा दुखायला लागतं.गालातल्या गालात हसणं, खदखदा हसणं, खीदीखीदी हसणं,फिदीफिदी हसणं आणखी असे अनेक हसण्याचे प्रकार असतील.
ह्या हसण्याच्या प्रकारामुळे होणारे अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे,बघ्यानी,नव्या मित्रानी दिलेली विचीत्र नजरफेक.मला वाटतं हास्य व्यसनकारी आहे.त्याने व्यसनी झालेल्याचं जीवन प्रचंडप्रमाणात बदलण्याचा संभव असतो,असं माझं मत झालं आहे.

मी दुःखी असो,आनंदात असो,उदास असो वा वेडपट झालो असलो तरी त्याची अंतिम परिणीती हास्यात होते. कदाचीत माझ्या भावना अती झाल्याने त्यांचं हास्यात विमोचन होत असावं.किंवा कदाचीत ओल्या जखमेला मलम-पट्टी लावण्य़ाची माझी ही स्वतःची पद्धत असेल.
तुम्हाला, माझ्या हास्याशी परिचय करून द्यायचा झाल्यास मला मी पहिलीत शिकत होतो त्या काळात तुम्हाला घेऊन जावं लागेल.

आमच्या बाई आम्हाला शिकवण्यात गुंग झाल्या असताना मधेच मला एकदम सूं सूं करण्याची तीव्र इच्छा झाली.तसा मी जरा लाजवटच होतो.माझा हात वर करून बाईंचं लक्ष माझ्याकडे वेधण्याचा मी प्रयत्न केला.बाईंचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही.किंवा त्या कदाचीत गोष्ट सांगण्यात इतक्या मग्न झाल्या असाव्यात की तात्पुर्त त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं असावं.पण व्हायचं ते होऊन गेलं.पुढच्याच बाकावर बसलो असल्याने माझ्या डोळ्यातल्या आसवांचा झरा आणि जमिनीवर आलेल्या पाण्याच्या पुराला पाहून त्या माझ्याकडे आकर्षित झाल्या.सहाजीकच माझे कपडे ओले झाले. अपमानीत झालेल्या मला शाळेच्या ऑफीसमधे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला.माझ्या आईला बोलावून घेण्यात आलं. माझ्या आईचं लक्ष जेव्हा माझ्यावर गेलं तेव्हा तिलापण हसूं आवरेना.त्याचवेळेला मला तिने सहजच विचारलं,
“कसा गेला तुझा वर्गात वेळ? तुझ्या कपड्यात तुला पाहून सगळ्यांना तू आवडला असशील नाही काय?”
माझ्या आईचे हे शब्द ऐकून मी ओक्साबोक्सी रडण्यापेक्षा हसायलाच लागलो.माझं “ढोपर खरचटलं” होतं त्यावरची ही मलमपट्टीच होती.रडून दुःखी होण्यापेक्षा मी हसून माझा उरलेला दिवस उज्वलीत केला.

असाच दुसरा प्रसंग माझ्या आठवणीत पक्का राहिला आहे तो म्हणजे जेव्हा मी माझ्या पहिल्याच जॉबला सुरवात करतानाचा.ह्याही वेळी माझ्या हसण्याच्या सवयीने मला माझी शोभा होण्यापासून वाचवलं.सकाळपासून मान वर नकरता काम करीत होतो.
ज्या दुकानात मी काम करीत होतो त्यात गिर्‍हाकाची बरीच वर्दळ असायची.संध्याकाळ झाली होती आणि एक बाई दुकानाच्या मालकाकडे काहीतरी चौकशी करीत होती.मालकाला तिची भाषा समजत नव्हती.मालकाला कुणीतरी सांगीतलं की तिची भाषा मला समजते.मी काम करीत होतो तिथून मला बोलवण्यात आलं.मला मालक म्हणाला,
“ही बाई काय बोलते ते भाषांतर करून मला सांग.”
मला कानडी भाषा अर्धवट येत होती.मी तिला कानडीत विचारायचा प्रयत्न केला.त्या बाईने आपल्या कपाळावर आलेली केसाची बट बोटाने गरगर फिरवून मागे सारली.नंतर आपली मान जराशी तिरपी करून मला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.ती तेलगू भाषेत बोलत होती असं मला वाटलं.आम्ही दोघंही काही क्षण गोंधळलेलो होतो हे निश्चीत.लगेचच आमच्यासकट मालक आणि दुकानतले सर्व जण हसायला लागले.त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की तुम्ही कुठच्याही भाषेत बोलत असाल,तुम्ही कुठच्याही प्रांततले असाल पण हास्याचं भाषांतर सहजपणे होत असतं.

मला वाटतं हसू संसर्गजन्य असतं,उपचारात्मक असतं,आणि सूचक असतं.मला वाटतं हसण्यामुळे लोक जवळ येतात. दुकानातल्या त्या तेलगू बोलण्यार्‍या बाईचं उदाहरण आहे.हास्याने समस्या सुटायला मदत होते.निदान जीवनातले ताण कमी होतात.मला वाटतं हास्यातून तुम्ही थोडक्या शब्दात बोलता.आपण चालण्यापूर्वी,बोलण्यापूर्वी प्रथम हसायला शिकतो.म्हणून हसण्यावर माझा भरवसा आहे.जखमेवरची ती एक मलमपट्टी आहे.संघर्ष होत असताना हास्य मित्राची भुमिका घेते.सरतेशेवटी सुखासाठी हास्य एक घरगुती उपाय आहे.”

मी संजयला म्हणालो,
“मला हे जर माहित असतं तर मी माझ्या संस्कृत गुरूजीशी बाळ्याची खरी माहिती सांगण्यासाठी अर्धमागाधीत किंवा पाली भाषेत बोललो असतो.तुझ्या कानडी आणि तेलगू घटने सारखं झालं असतं आणि वर्गात तरी मी सर्वांना हसवलं असतं.”
माझं हे ऐकून संजय मात्र त्याच्या स्टाईलमधे हसला.हे काही कमी नव्हतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com