Saturday, December 3, 2011

जीवनातलं परिवर्तन.


“जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं.परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.”

पद्मजा,गिरीजा आणि तनुजा ह्या पटवर्धनांच्या तीन मुली.
पटवर्धनानी त्यांना उत्तम शिक्षण दिलं.मोठ्या दोन मुलींची लग्नपण करून दिली.आणि एकाएकी ऐन उमेदीत असताना पटवर्धनाना मोठा हृदयाचा धक्का येऊन त्यातच त्यांचं निधन झालं.

पटवर्धनांच्या पत्नीला हा धक्का सहन झाला नाही.तिने अंथरूण धरलं.तनुजाने आपल्या लग्नाचा विचार सोडून दिला.आईची सेवा करण्यासाठी तिने आपलं उर्वरित आयुष्य खर्ची घालायचा पक्का निर्णय घेतला.

मी पटवर्धनांकडे अधुनमधून जातयेत असायचो.तनुजाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी तिला बरेच वेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

“आईची सेवा दुसर्‍या कुणाकडून करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.जिने आपल्याला या जगात आणलं,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना माझ्या जीवनात दुसरी कसलीही मजा मला आनंद देऊ शकणार नाही.”
असं मला तनुजाने एकदा सांगीतलं होतं.मी पण तिच्या ह्या म्हणण्यावर खूप विचार केला होता.

मी तनुजाला एकदा म्हटल्याचं आठवतं,
“जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.”

सेवा करीत असताना जेव्हा जीवनात परिवर्तन येत असतं त्याचा अनुभव कसा वाटतो ते मला सांगावं असं मनात आल्याने ह्यावेळेला मी तिला भेटायला गेलो होतो त्यावेळेला तनुजा मला सांगत होती.

“येत रहाणार्‍या परिवर्तनाचा स्विकार करणं आणि ते अंगीकारणं ह्याची आपल्या अंगात क्षमता असणं हा एक आपल्या जवळ असलेला खजिना आहे असं मला वाटतं.

गाडी काढून गावोगाव फिरायला जाणं,पालक बनणं,जॉब बदलणं,घर बदलणं त्यापुढे जाऊन जीवनाचा दृष्टीकोन बदलणं,जीवन आरामदायी आहे आणि सुरक्षीत आहे मग धडपड कशाला हवी?,आहे त्यात स्थिर होऊन रहाणं ह्या असल्या गोष्टी काहींना सुखकर वाटतात.

माझ्या लहानपणी मला व्यवस्थितपणे रहाण्याची आणि कुठच्याही गोष्टीची ठोस माहिती असावी ह्या गोष्टींची तीव्र इच्छा असायची.बर्‍याच मुलांना ती असते.माझ्या तीन बहिणींनी आणि मी जीवन कधीच कंटाळवाणी करून घेतलं नाही.असं करण्याचा एक भाग म्हणजे माझी आई.ती सतत बिछान्यावर झोपून असते.आश्चर्य म्हणजे माझी आई मला प्रेरणा आहे.वातावरण आनंदाचं असो वा दुःखाचं, माझ्या आईचं कोलाहलाचं जीवन असल्याने तिचं ते जीवन कोणत्याही परिवर्तनाभोवती फिरायला अक्षम आहे.तिच्या आजारावर दिलं जाणारं औषधच मात्र तिच्या प्रखर किंवा निम्न विचाराना परावृत्त करणारं ठरतंय.ह्या औषधापायी तिला,खूपच शांत रहायला,खूपच बेचैन व्ह्यायला,खूपच थकून जायला,खूपच जागरूत रहायला,खूपच भावुक व्हायला, खूपच संयमशील रहायला अटकाव येतोय. खरोखरंच,औषधामुळे तिचं अस्तित्वच नाकारलं जात आहे.

माझ्या पूर्‍या जीवनात माझ्या आईला मी संघर्ष करताना पाहिलं आहे.आत्ता तिच्या सहासष्ट वर्षावरच्या उतार वयात तिच्या डोळ्यात रिक्तता आणि खिन्नता दिसून येते.ती मला सांगते की तिच्या अतिमहत्वपूर्ण भावना म्हणजे,रटाळ जीवनाशी चिकटून रहाणं,कुणाशीही मैत्री करण्यात पुढाकार न घेण्याची वृत्ती ठेवणं नवीन काही शिकायलापण हिरीरी नसणं.तिला आठवतं,उत्साहपूर्ण रहाण्याचं,धुंदफुंद रहाण्याचं तरूण वयातलं आत्यंतिक धडपडणं,ती औषधं घेत राहिल्याने संपूष्टात आलं.तिचं आयुष्य आता स्थिर झालं आहे आणि अंगातली ठिणगी विझून गेली आहे.तिच्या जीवनात परिवर्तन असावं अशी जरी तिची तीव्र इच्छा असली तरी तिच तिची मोठी भीती झाली आहे.

ज्या खडतर परिस्थितीतून माझी आई जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात मी हतबल होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार. जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्‍या परिवर्तनाने जो भरदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुरभाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.

हे तितकच खरं आहे की,परिवर्तनातून मिळणारे धडे शिकायला जरा कठीण असतात.जीवनात पुढे पुढे सरकण्यासाठी तो धोका पत्करायला माझी तयारी आहे.कारण त्याच्या बदल्यात मिळणारं इनाम विस्मयकारक असतं.ह्या परिवर्तनामुळेच माझं काही चुकलं असेल तर ते मान्य करायला मला धीर येतो.कुणाला मी दुखवलं असेन किंवा कोण, कोणत्या दृष्टीकोनातून बोलत असेल ते समजून घेण्यात मी असफल झाली असेन अशावेळीही माझी चुक कबुल करायला मला धीर येतो.जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं. परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.

परिवर्तनातल्या गोष्टी अज्ञात असल्याने काही प्रमाणात परिवर्तनाची भीती वाटते. पूर्वानुमान काढण्याच्या क्रियेला हे परिवर्तन बाधा आणते.पण माझ्या आईच्या नीरसता आणि निश्चलता ह्या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या आईच्या परिस्थितीची मला आठवण येते.

आईला लागणार्‍या कष्टांची आठवण येते.त्यामुळे मी परिवर्तनातल्या अज्ञात गोष्टींना जास्त संमत्ती देते.कारण परिवर्तनातल्या अज्ञात परिस्थितीत चाणाक्ष राहिल्यास उपचार,आशा आणि नवजीवन मिळण्यासाठी येणार्‍या संधीच्या गुंत्याला उकलता येतं.माझ्या आईने मला हेच शिकवलं आहे.”

तनुजाने तिच्या आईची इतकी वर्षं सेवा करीत असताना घेतलेल्या अनेक अनुभवातून जीवनातलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातली अज्ञानता ह्याची तुलना आणि जीवन जगत असताना पूर्वानुमान काढून जगण्यात वाटणारी मजा ह्या मधला फरक फारच सुंदर शब्दात सांगीतला.मी तिची पाठ
थोपटली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 30, 2011

साक्षात्कार दिलीपचा.


“मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

दिलीप गव्हाणकर दिल्लीलाच जन्मला.त्याचे वडील वसंत गव्हाणकर सुप्रिमकोर्टात वकिली करायचे.दिलीपही त्यांच्या मागोमाग वकिली करायला लागला.दिल्लीची प्रतिष्टीत मंडळी रहायची त्या वसंत विहारमधे गव्हाणकरांचा बंगला होता.

मी ऑफिसच्या कामाला दिल्लीला गेलो की गव्हाणकरांच्या घरी भेट देऊन यायचो.मुंबईला येण्यासाठी रात्री दहाची फ्लाईट असायची तेव्हा संध्याकाळचाच गव्हाणकरांकडे येऊन गप्पा मारीत बसायचो.

दिलीप अतीशय देवभोळा,इश्वरभक्त होता.घरात सर्व सणवार आणि धार्मिक कार्यक्रम केले जायचे. एव्हडं की दिलीप आपलं जानवं दरवर्षी बदलायचा.
भटजीना आणून धार्मिक सोपास्कार करून आपलं जानवं बदलायचा.मी त्याला एकदा म्हणालो होतो,
“माझं जानवं कुठच्या खुंटीला मी गुंडाळून ठेवलंय ते आठवत पण नाही”
हसला आणि मला म्हणाला होता,
“माझ्या लहानपणी माझ्या आजोबांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.दर शनिवारी मी शनिमाहात्म्यसुद्धा वाचतो.त्यांना दिलेलं वचन आहे.मला त्यामुळे मनःशांती मिळते.”

मला आठवतं त्यानंतर एकदा माझी आणि दिलीपची ह्याच विषयावर थोडी चर्चा झाली होती. आपला अनुभव तो मला समजावून सांगत होता.

मला म्हणाला होता,
“मी नेहमी मानतो की निसर्गच आपला दुवा विधात्याशी सांधत असावा.प्रत्येकाला त्या अचाट शक्तीशी दुवा सांधायला मोका मिळत असतो असंही मला वाटत असतं.

आम्ही पहिल्यापासून दिल्लीलाच रहायचो.मला माझी एक जूनी गोष्ट आठवते.मी सोळाएक वर्षांचा असेन.प्रथमच माझ्या वडीलानी मला आजीआजोबांकडे गोव्याला जाण्यासाठी विमानात बसवून दिलं होतं.त्यापूर्वी मी बरेच वेळा माझ्या आईबाबांबरोबर आजीआजोबांकडे गोव्याला गेलो
होतो.ह्यावेळी दोन आठवडे मी आजीआजोबांबरोबर राहिलो.प्रत्येक दिवस मजेत गेला.रोज आम्ही समुद्र चौपाटीवर जायचो.

ह्यावेळेला समुद्र पाहून मी अचंबीत झालो.समुद्र मी कधीच पाहिला नव्हता असं नाही. क्षीतिजापलीकडे पाणी पसरलं होतं.मोठमोठ्या लाटावरून सूर्याचं प्रतिबिंब परावर्तीत होत होतं. अवतिभवती सर्वच प्रसन्न वातावरण होतं.समुद्राला ओहटी आली असल्याने,दूरवर उंचच उंच खडकं दिसत होती.

एकेठिकाणी ती खडकांची रांग जणू आकाशाला भिडते की काय असं वाटत होतं.पायाखालची वाळू बरीच गरम झाली होती.फुटलेल्या लाटेच्या थंड फेसाळ पाण्यात अशावेळी पाय बुडवून पहायला मजा यायची.थंड वार्‍याच्या झुळकीबरोबर सर्व अंगात शिरशीरी यायची.

त्याच मुक्कामात एक दिवस मी माझ्या आजोबांबरोबर चौपाटीवर आलो होतो.मला आठवतं,त्या संध्याकाळी मी एव्हडा उत्तेजीत झालो नव्हतो.किंवा त्या संध्याकाळी मला एव्हडं रोमांचक वाटत नव्हतं.पण काही कारणास्तव मला विशेष शक्ती आल्यासारखं,अगदी मोकळं मोकळं वाटत होतं.

विधात्याशी दुवा सांधल्यासारखं वाटत होतं.अंगात नम्रपणा आला होता आणि त्याचबरोबर तिथे असल्याचं महत्वही वाटत होतं.काहीतरी विस्मयकारक वाटण्यासाठी आणि निसर्गाच्या शक्तीनेच हे विश्व निर्माण झाल्याची प्रचिती मिळत होती.

मी कुठच्या धर्माचा आहे किंवा मी कुठच्या देवाला मानतो हे विचारण्यासाठी ती वेळ नव्हती. मलाच स्वतःला त्याबद्दलची खात्री नव्हती.ती खात्री नसण्यात मला आनंद होत होता.त्या निसर्ग रम्य वातावरणात माझ्या अंगात एव्हडी शक्ती कशी आली,एव्हडा निश्चिंत मी कसा झालो होतो, खर्‍या जगापासून मी एव्हडा अलिप्त कसा झालो होतो हे अनुभवूनच तो विस्मय प्रेरणापद वाटत होता.

मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

ही दिलीपची माझ्याशी झालेली चर्चा आणि त्या चर्चेची आठवण मला आज आली कारण मला कुणीतरी सांगीतलं की दिलीप गेला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 27, 2011

श्रद्धा आणि चंगळ



"मनात दुसर्‍याबद्दल चिंता करणं म्हणजेच स्वतःला शांती मिळवण्याचा उत्तम मार्ग शोधणं"

काल प्रो.देसाई माझ्या घरी आले होते.बाहेर थंडी खूपच होती.ह्या वयात प्रकृती सांभाळणं आवश्यक असतं.कडक उन्हात थंडी तेव्हडी भासत नाही. म्हणून ते लवकरच आले होते.एकदा संध्याकाळ झाली की मग बाहेर जाववंत नाही.
भाऊसाहेब थोडावेळ बसल्यावर,चहाचा कप त्यांना देत मीच त्यानां म्हणालो,
"श्रद्धा असणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हे नेहमीच काही लोकांच्या मनात गोंधळ आणित रहातं. निश्चितता आणि तितकाच तीव्र संशयवाद ह्यामधे

त्या लोकांचं जीवन जास्तीत जास्त विदीर्ण होत जात असतं."


माझं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"काहीवेळा त्यांच्या त्यांनाच सिद्ध न होणार्‍या संकल्पना पटवून घेण्याच्या त्यांच्यात असलेल्या क्षमतेमुळे त्यांना काहीशी शांती मिळाल्यासारखं

वाटतं हे मात्र खरं असतं.
परंतु,ही सहायता तूटपुंजी असते.


नैराश्य आणि वाटतं ते सर्वकाही खोटं आहे, ह्या दोघामधला दूवा अगदीच तकलादू असतो.त्यांच्या बाहेरच्या जगात ह्या मतभिन्नतेचं प्रतीबिंब त्यांना दिसून येतं.विशेष करून ते जेव्हा एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जात असतात तेव्हा.एक टोक म्हणजे गूढवादी जगाचा विचार करण्याचा आणि कधीकधी फक्त चंगळ करण्याचा हव्यास हे दुसरं टोक."


मी त्यांना म्हणालो,
"भाउसाहेब,काही लोक,त्यांच्या मनात जी श्रद्धा असते ती विकसीत करण्याच्या प्रयत्नात असतात.कुणीतरी म्हटलंय ना,
"श्रद्धेवर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करणं"
तसं काहीसं त्यांचं होतं.खरी श्रद्धा त्यांना भ्रांतिजनक असते.
त्यांच्या मनात श्रद्धेमधून निघणार्‍या सुंदर,प्रेरणात्मक अर्थाची अल्प झलक,हळुहळु कंटाळा करण्यात किंवा खेद करण्यात क्षीण होत जाते.ते अगदी

निराश झालेले दिसतात."


थोडासा विचार करून रिकामा चहाचा कप समोरच्या स्टुलावर ठेवून गंभिर चेहरा करीत भाऊसाहेब म्हणाले,
"काहींच्या खर्‍या आत्मविषयक समस्या भोवतालच्या जगामुळे नसतात तर त्या त्यांच्याच आत्मकेन्द्रिततेमुळे असतात आणि हे पाहून खरोखरच

धक्का बसतो.स्वतःला तृप्ती वाटली म्हणजे झालं अशा तर्‍हेची वृत्ती उराशी बाळगून जवळच्या लोकांना दुखावलं जातं हे त्यांना कळत नाही.

अनुभवासारखा गुरू नाही ह्या रुढोक्तिने काही लोक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात शिकून जातात.काही लोकाना तर अनुभव हाच गुरू असतो.आणि काही

लोक ते मार खाऊन शिकतात."


"भाऊसाहेब,माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतो."
असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई हसले आणि मला म्हणाले,
"विचारा.संध्याकाळ होण्यापूर्वी चर्चा संपवूया.एकदा थंडी वाजायला लागली की विचार-शक्ति खुंटते."


मी म्हणालो,
"चंगळ करण्याच्या वृत्तीतून काही लोक जीवनातली काही वर्ष हरवून बसतात.व्यसनाधीन होतात.प्रथम त्यात ते मजा म्हणून मश्गुल होतात. हे

करणं म्हणजे पश्चातापाची पूर्वखूण हे वेळीच न ओळखल्याने, नैराश्य आणि एकटेपण येतं.पहिलं कारण असतं आणि दुसरा त्याचा परिणाम असतो. जणू ते दुष्ट चक्रच असतं.काही लोकांची एव्हडी मजल जाते की एकतर त्यांनी त्यातून बाहेर पडावं नाहीतर मरण पत्करावं असं त्यांच्या मनात सारखं येत रहातं."


"श्रद्धा आणि अनुभव ह्याच्या कात्रीत ही मंडळी सापडलेली असतात."
असं सांगून प्रो.देसाई म्हणाले,
"परंतु,लोकांत शिकण्याची क्षमता असते.त्यांचा स्वतःचा विवेक त्यांच्यात नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर शेवटी ज्यांना असा विवेक आहे

त्यांच्याकडून शिकण्यासाठी ते आपले दरवाजे उघडे ठेवतात.काही लोक दुसर्‍या मोक्याची वाट पहातात.हे फाल्तु उघड सत्य आहे असं मानणारे नंतर

लक्षात आणतात की खरंतर त्यात तथ्य आहे.
कुणीतरी म्हटलंय खरं,
"घेण्यापेक्षा कुणालातरी देणं बरं"
श्रद्धेपेक्षा काही लोक हे अनुभवाने शिकतात.


हे सुंदर,विरोधाभासयुक्त सत्य म्हणजेच दुसर्‍याचं कुशल मनात आणल्याने त्यांचाच खर्‍या समाधानीचा मार्ग खुला होतो हे शेवटी त्यांच्या ध्यानात

येतं.
अशा तर्‍हेने आदर्श रहाणं जरी सातत्याने त्यांना जमलं नसलं तरी माझी खात्री आहे की,

"सगळ्या जगात आनंद समाविष्ट झालेला असतो तो केवळ
इतरांचं भलं इच्छिल्याने झालेला असतो
तसंच,
सगळ्या जगातले क्लेश हे फक्त स्वतःलाच आनंद मिळण्याच्या प्रयत्नाने झालेले असतात."
ह्या श्रद्धेवर त्यांचा विश्वास नक्कीच असेल."

प्रो.देसायाना आणखी एखादा प्रश्न विचारण्याचं मनात आलं होतं.तेव्हड्यात त्यांचा नातु आलेला पाहिला.
"आजोबा,आई म्हणाली तुम्ही संध्याकाळी चालत घरी यायला निघाला तर तुम्हाला थंडी नक्कीच वाजणार.म्हणून मला तिने गाडी घेऊन जाऊन

तुम्हाला घेऊन यायला सांगीतलं.माझ्या मागेच लागली.सॉरी,तुमच्या चर्चेत मी खंड आणला."


"नाही रे,आमची चर्चा संपली होती तू अगदी वेळेवर आलास"
असं मी त्याला सांगीतल्यावर आजोबा आणि नातू दोघेही घरी जायला निघाले.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 24, 2011

माझ्याच स्वप्नांचा सन्मान.


“विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

ए.एम.चौगुले माझ्याबरोबरच माझ्या ऑफिसात कामाला होता.तो सिव्हिल इंजिनीयर होता.पण त्याला कागदावर नकाशे काढायला खूपच आवडायचं.
तो आमच्या ड्राफ्टिंग खात्यात वरच्या पातळीवर काम करायचा.मला नेहमीच म्हणायचा “तू आमच्या घरी ये”. डोंगरीला तो रहायाचा. डोंगरीला मी पूर्वी एकदा काही कामाला गेलो होतो.
खूपच झोपड्यानी भरलेला हा भाग आहे.पण अधून मधून पांढरपेशांची स्वच्छ घरं पण आहेत. चौगुलेला आमच्या ऑफिसने कुलाब्याला जागा देऊ केली होती.पण त्याला आपल्याच गोतावळ्यात रहायला आवडायचं.म्हणून त्याने ती ऑफर नाकारली.त्याचं कारण त्याने मला सांगीतलं होतं.
तो मला म्हणाला होता,
“मी कुलाब्याच्या जागेत सुखी होईन पण माझ्या कुटूंबातल्या मंडळीना डोंगरीची जागा सोडून जाववत नाही.”

चौगुल्याचा मुलगा चांगला शिकला होता.आणि तो संधी मिळताच युरोपमधे रहायला गेला. चौगुल्याने एक दोन वेळा मुलाकडे जाण्यासाठी ट्रीप्स काढल्या होत्या.त्याची एकूलती एक नात युरोपात शिकून थोड्या दिवसासाठी ह्यावेळेला तिच्या आजोबाकडे रहायला आली होती.तिला त्याने एक पार्टी द्यायचं ठरवलं होतं.त्यासाठी मला त्याने घरी बोलावलं होतं.माझं इंप्रेशन होतं ते चूकीचं ठरलं.चौगुल्याचं घर फारच सुंदर होतं.आजूबाजूला स्वच्छ परिसर होता.आणि ह्याच्या घरात चांगली टापटीप होती.

अबदूल महंमद चौगुले माझ्या कोकणातला.धर्माने मुस्लिम असला तरी त्याच्या घरचे नेहमीचे संस्कार सगळेच कोकण्यातल्या स्थानिक संस्काराप्रमाणेच होते.मुख्य म्हणजे तो अस्खलित मराठी बोलायचा.घरातली सगळीच मंडळी मराठीतच बोलायची.जरूरी वाटल्यास उर्दूत बोलायची पण ती कोकणी मिश्रीत उर्दू असायची.ऐकायला मजा यायची.

आपल्या नातीला माझी ओळख करून देताना कोकणी मिश्रीत उर्दूतच बोलला.ती जन्मापासून युरोपमधे राहिली असली तरी संस्कार इकडचेच होते.
माझ्याशी ती मराठीतच बोलत होती.

इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगल्या होत्या.मुस्लिम असून सुद्धा आपण आपले संस्कार तिकडे कसे जोपासून असते हे सांगण्यासाठी मला म्हणाली,
“स्वप्नं पहाणं मला आवडतं.जास्त करून, पडलेलं स्वप्नं खरं करण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायला मला आवडतं.मनाने धीट असल्यावर चुका केल्या गेल्या तरी काही हरकत नाही अशी समजूत करून घ्यायला मला विशेष वाटतं.स्वप्नांशिवाय आणि खुळ्या चुका केल्याशिवाय काही साध्य होत नसतं आणि काही शिकलंही जात नसतं असं मला नेहमीच वाटत असतं.

अगदी माझ्या लहानपणापासून माझ्याबद्दल आणि सभोवतालच्या विश्वाबद्दल माझी मोठी मोठी स्वप्नं असायची. मला ज्यात आनंद होईल त्या गोष्टी मी करणार आणि त्या केल्याने मी काहीतरी साधलं ह्याबद्दल मला आनंदही होणार हे मला माहित असायचं.ही स्वप्नं कधीकधी अगदी मामुली असायची आणि कधीकधी खिचकट असायची.

सनातनी मुस्लीम घराण्यात माझा जन्म झाल्याने मी नेहमीच विचारात असायची की ह्यातली काही स्वप्नं खरोखरच मी साध्य कशी करून शकेन?
आणि अलीकडेच मला जाणीव व्ह्यायला लागली की ह्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत.

मला आठवतं त्यावेळी आमच्या कॉलेजची ट्रीप आल्प्स पर्वतावर गेली होती.माझ्या अंगावर बुरखा होता.पण त्यामुळे मला त्या वातावरणातला मस्त अनुभव मिळायला त्याची काही आडकाठी आली नाही.आणि आजुबाजूचे कुणीही मी माझ्या अंगावर काय घेतलं आहे ह्याची पर्वाही करीत नव्हते.त्या बुरख्यावर जोपर्यंत मी माझ्या रक्षणासाठी लागणारा पोषाक वापरत असायची तोपर्यंत त्यात कसलीच बाधा येत नव्हती.

एकदा मी बन्जी-जंपिंगसाठी टर्की ह्या देशात गेली होती.जमीनीपासून पंचावन्न मिटर उंचावर असलेल्या एका धातूच्या कमानीवर उभी राहून,ती कमान वार्‍याच्या प्रत्येक झोतीबरोबर डुलत असताना आणि माझ्या पायाला बांधलेला साखळीदंड मला ओढून धरत असताना,खाली पाहिल्यावर माझी ही उडी म्हणजे माझ्याकडून होणारा महामूर्खपणा होत तर नाही ना असा विचार सारखा माझ्या मनात येत होता.

त्या थंड धातूच्या कमानीवर माझे अनवाणी पाय जोराने दाबून ठेवून भरपूर क्षमता माझ्या स्नायुत आणण्याचा माझा प्रयत्न म्हणजे माझ्या उडी घेण्याच्या सहासापासून मी दूर रहावं असं वाटून घ्यावं,असा हा माझा समज हा माझा आणखी महामूर्खपणा होता.परंतु,शेवटी मी उडी घेतली.ते सहास फारच आनंदीत करणारं,मग्न करणारं होतं.

असलं हे साहस मी पुन्हा करण्यासाठी माझ्यात तेव्हडं धैर्य मी आणू शकेन का कुणास ठाऊक. पण माझ्यातलं एक लहानसं खुळं स्वप्न मी परिपूर्ण करू शकले हे मात्र खरं.असली स्वप्न माझ्या अंगामासात असल्याने त्यासाठी मी नक्कीच खुश आहे.

माझ्या वयक्तिक जीवनात मी असल्या खूप चुका केल्या आहेत.पण प्रत्येक चुकीतून मी माझ्याचबद्दल शिकले.आणि माणूस म्हणून मी असं शिकत शिकत वाढत आहे.सर्वात महत्वाचं असं मी शिकले ते म्हणजे कुणाबद्दल मत बनवु नये.कुणीही परिपूर्ण नसतो.किंवा मी असं म्हणेन विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

आपल्या नातीचं चिंतन ऐकून चौगुले आनंदून गेला होता.
मला म्हणाला,
“मला माझ्या नातीचा अभिमान वाटतो.”

मलाही रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“मी ह्याबद्दल तुझ्याशी जास्त सहमत होऊच शकत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 20, 2011

हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.


“आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही.कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.”

मागच्या आठवड्यात विकएन्डला मेरी आणि तिचा नवरा पास्कल माझ्या घरी आला होता.खरं पाहिलंत तर ती दोघं वेसाव्याला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेली होती.पास्कलचं वेसाव्याला त्याच्या वाडवडीलांचं एक टुमदार घर होतं.वेसाव्या गावात बरीच सुधारणा होत असताना ह्यांचंघर आड येत असल्याने प्लानमधे ते पाडून टाकण्याची गरज भासली होती.त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळणार होती.पास्कलच्या इतर भावंडात ती रक्कम वाटून घेऊन त्याच्या वाट्याला आलेल्या पैशातून त्याने वसईला एक टुमदार घर घेतलं होतं.आणि त्याला बरेच दिवस होऊन गेले होते.मला पास्कल आणि मेरी वसईला एकदिवस तरी येऊन जा म्हणून आमंत्रण द्यायला आले होते.

मेरी वेसाव्याला असताना नोकरी करायची.मुळात ती हुशार असल्याने बरीच शिकली आहे.कधी कधी कविता करते.काही मासिकात लहान मुलांवर लेख लिहिते.माझी तिची त्यामुळेच एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी भेट झाली होती.
वसईहून नोकरी करण्यासाठी मुंबई शहरात येणं कठीण होणार आहे हे तिला वेसाव्याहून सोडून जातानाच माहित होतं.म्हणून तिने नोकरी सोडून देण्याचा विचार अगोदरच करून ठेवला होता.

एकट्या नवर्‍याच्या जीवावर घर संसार चालवावा लागणार त्यामुळे प्राप्त परिस्थितीत काटकसरीत रहाणं आवश्यक होणार आहे हे ती जाणून होती.काही मंडळी आपलं ज्ञान,आपलं शिक्षण आणि आपले संस्कार हीच आपली संपत्ती आहे. जीवन जगण्यासाठी कमीतकमी आवश्यक गोष्टी मिळाल्यावर त्यात समाधान मानून रहाणं आपल्याच हिताचं आहे असं मानतात.मेरी त्यातलीच होती.

मला ही तिची वृत्ति अगोदर पासूनच माहित होती.तशात पास्कल सारखा गुणी नवरा मिळाल्याने मेरी जास्तच सुखी होती.
“वेळातवेळ काढून मी वसईला नक्कीच येईन.पण सध्या तुमचं कसं काय चाललं आहे?तुझं होमवर्कर म्हणून कसं काय चाललं आहे?”
असं मी मेरीला विचारलं.

मला ती म्हणाली,
“आपलं जीवन सामान्य असावं असं मला नेहमी वाटत असतं.नशिबाने,माझं कुटूंब आणि माझी मित्रमंडळी मला जेव्हडा आनंद व्हावा तेव्हडा देत आहेत.मी खरंच नशिबवान आहे की,माझ्या नवर्‍याची मिळकत एव्हडीच आहे की आमच्या कुटूंबाला पुरते.वसईजवळ आमचं एक घर आहे. माझ्या दोन मुलांच्या स्वतंत्र खोल्या आहेत.आमच्या घराच्या मागून दिसणारा देखावा मन लोभण्यासारखा आहे.
मागच्या परसात उंच झाडं आहेत.आमच्या घराच्या छप्परावर त्यांची सावली पडून घर नेहमीच थंड रहातं. आवाढव्य निसर्गात मला रहायला आवडतं.

घरी जेवणखाण भरपूर असतं.आमचं सर्व जेवण आम्ही घरीच करतो.कारण तसं करणं आम्हाला परवडतं.शिवाय बाहेरून आणलेला शेकडो रुपयांचा पिझा किंबा तत्सम खायच्या गोष्टी माझ्या मुलांना खायला जरूरीचं आहे असं मला वाटत नाही.त्यातून खूपच अन्न खाल्लं जातं आणि खूपच पैसे लागतात.

जेव्हडं जमेल तेव्हडं कपड्याची खरेदी करताना मी, सेल लागला असेल तरच करते.प्रसिद्ध ब्रॅन्डचे कपडे खरदी करून नाहक पैसे घालवून बसायला मला आवडत नाही आणि परवडतही नाही.आमच्यासारखीच मिळकत असलेले आमचे शेजारीसुद्धा नाहक खरेदी करण्यात पैसे उडवीत नाहीत.मोठ्या मुलाचे कपडे नीट असतील आणि विरलेले नसतील तर ते धाकट्या मुलाला वापरतात.असं करणं व्यवहारिक आहे असं मला वाटतं.

माझ्या जवळ आहे ते वापरायला मला आवडतं.टीव्हीवरच्या आणि अन्य ठिकाणाहून, जाहिरातीतून येणार्‍या उपदेशावर मी भुलून जात नाही.एका स्थानिक फर्निचर बनवणार्‍याकडून आम्ही आम्हाला जरूरीचे सोफे बनवून घेतले.आमच्या मुलांना त्यावर उड्या मारून खेळण्या इतके ते मजबूत आहेत.
आमच्याकडे एक लहानसा टीव्ही आहे.त्याच्यासाठी एक पेटी बनवून त्यात तो पेटी बंद करून ठेवला आहे.त्यातून येणारा कलकलाट जो आम्हाला जरूरीचा वाटतो तेव्हडाच ऐकून घेण्यासाठी ही योजना आहे.

आमच्या जवळ एक जुनी गाडी आहे.मुलांच्या शाळेतल्या सुट्टीत ती गाडी आम्ही गावोगावी जाण्यास वापरली आहे.आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही. कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.
शिवाय आणखी खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत.आम्ही घरात प्रत्येकाचा जन्म-दिवस साजरा करतो.केक घरातच बनवतो.स्वतःच्या हाताने बनवलेली ग्रिटींग्स लोकाना देतो.मुलाना बरोबर घेऊन प्राणी दाखवण्यासाठी झूमधे घेऊन जातो.म्युझीयम्सपण त्यांना दाखवतो.नातेवाईकांकडे भेटीला जातो.अशावेळी बाहेर गावच्या दिखाव्याच्या होटेलमधे आम्ही रहात नाही.ह्यातच आम्हाला मजा येते.

आमच्या बाहेरच्या जगात डोकावून पाहिल्यावर,माझ्या नजरेतून अनेक गोष्टी सुटलेल्या नाहीत. आकाराच्या बाहेर प्रत्येक गोष्ट फुग्यासारखी फुगलेली दिसते.गाड्या जरूरी पेक्षा मोठ्या मिळतात.जरूरीपेक्षा जास्त खोल्यांची घरं बांधली जात आहेत.शॉपिंग-मॉल्स प्रचंड राजवाड्यासारखे बांधले जात आहेत.
जरूरीपेक्षा जास्त पाण्याचा विजेचा,गॅसचा,पेट्रोलचा,अन्नाचा वापर करणं म्हणजे एक प्रकारचा हावरटपणा दिसून येतो.
मला वाटतं,जरूरीपेक्षा मोठं करणं म्हणजेच अतिरेक करणं.आणि सर्वच काही मोठं व्हायला लागल्यास,खरं सृष्टीसौंदर्यच बिघडवून टाकलं जात आहे.

प्रत्येकानी जर का हात रोखून जीवन जगलं तर मला वाटतं,कदाचीत ज्यांच्या जवळ खरंच काही कमी आहे त्यांना जास्त मिळू शकेल.
आमची दोन जूनी कपाटं आहेत.मधूनच ती कधी उघडून पाहिली तर खूपच कोंबून ठेवलेल्या गोष्टी त्यात दिसतात. ते पाहून मला नेहमीच वाटतं की,निरूपयोगी गोष्टींचा दुरूपयोग होत आहे. जीवन तृप्त आहे असं मानल्यावर अशा गोष्टी पाहून त्या अनावश्यक आहेत असं असताना माझ्या मला मी अशिष्ट आहे असं वाटतं.एखाद्या शर्यतीत भाग घेऊन ती अनुचित मार्गाने जिंकल्यासारखं वाटतं.भरपूर पैसे असल्यानंतर थोडं विक्षित्प वागणं चालून जातं.पण मुळात जे जवळ आहे त्याने प्रत्येकजण तृप्त असेलच असं नाही.

सुखकर जीवन जगण्यासाठी माझ्या जवळ अगदी हवं तेव्हडंच आहे.आणि मला वाटतं,हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.
हे सर्व मी तुम्हाला सांगीतलं तरी तुम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी येऊन तळलेलं पापलेट आणि पापलेटाची तिखट आमटी गरम गरम भाताबरोबर जेवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. त्यासाठी आम्ही दोघं मधेच उतरून खास तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहो.”

“तुझ्याबद्दल मला खूप आदर आहे.तुझ्या शिक्षणाचं आणि तुझ्या संस्काराचं तू उत्तम चीज केल्याशिवाय रहाणार नाही हा तुझ्यावर माझा विश्वास आहे.तुझं घर आणि तुझा संसार बघून मला निश्चितच आनंद होईल.मी नक्कीच तुझ्याकडे येतो.”
असं मी मेरीला सांगीतल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद लक्षणीय होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 17, 2011

आणखी आणखी मिळवण्याची आशा.


“हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे. अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.”

रमाकांतचं पूरं आयुष्य कोकणात गेलं आणि तेसुद्धा आपल्या आजोळच्या घरात गेलं.रमाकांत प्रथमच मुंबईला आला होता.यायची पाळी आली नसती तर तो मुळीच आला नसता.
“ज्यांना आणखी आणखी मिळवण्याची हौस असेल त्यानी जावं वाटलं तर मुंबईला.”
मी ज्या ज्या वेळी कोकणात रमाकांतला भेटायला जायचो त्या त्या वेळी हे त्याचे उद्गार माझ्या कानावर आले आहेत.

“काय रे बाबा?आणखी आणखी मिळवण्याचे तुझे दिवस आता राहिले नाहीत मग तू का बरं मुंबईला आलास?”
असं मी रमाकांतला विचारण्यापूर्वीच उमेशने,त्याच्या मुलाने,सर्व हकीकत सांगायला सुरवात केली.

“बाबांचं आता वय झालं आहे.त्यांना मुंबईचा प्रवास जमत नाही.पण काय करणार उपाय करण्यासाठी इकडे यावंच लागलं.”
मी उमेशच्या घरी रमाकांतला भेटायला गेलो होतो तेव्हा मला उमेश असं म्हणाला.

उतार वयात प्रकृती केव्हा ढांसळेल ते सांगता येत नाही.जीवन प्रवासात आयुष्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे साधरण वय वर्ष अठरा ते अठ्ठावीस.
अठरा वर्षाच्या अगोदरच्या काळात अन-अनुभवी म्हणून ऐकून घ्यावा लागतो तो काळ आणि अठ्ठावीस नंतर तेव्हडा दांडगटपणा करता येत नाही तो काळ.तीशी,चाळीशी,पन्नाशी आणि पुढे आयुष्याचा आलेख हळू हळू उतरणीला लागलेला असतो.
रमाकांत आता सत्तरीला आलेला होता.

“एकाएकी सकाळी उठल्यावर बाबांना लघवीच होईना.ओटीपोटात कळा यायला लागल्या.लगेचच गावातल्या पंडीत डॉक्टरना बोलवलं.”
उमेश मला सांगत होता.
पुढे म्हणाला,
“पंडीतानी काही गोळ्या दिल्या आणि बेळगावला ताबडतोब घेऊन जा म्हणून सल्ला दिला.टॅक्सी करून बाबांना बेळगावला घेऊन गेलो.तिकडच्या डॉक्टरानी बाबांच्या ब्लॅडर मधे कॅथीटर घालून ब्लॅडर रिकामा केला.त्यांना खूप बरं वाटलं पण म्हणाले आता त्यांना मुबईला घेऊन जा.प्रोस्ट्रेट ग्लॅन्डला सुज आली आहे.तिकडे उपाय होतील. म्हणून तसेच आम्ही त्यांना घेऊन मुंबईला आलो.”

“मग इकडे काय निदान निघालं?”
मी उमेशला कुतूहलाने विचारलं.

“ग्लॅन्डला सूज आल्याने तसं झालं.ह्या वयात तसं होतं.ग्लॅन्डचे फोटो काढून कदाचीत बायप्सी करून निर्णयाला आलं पाहिजे.कॅन्सरपण असू शकतो.”
असं इकडचे डॉक्टर म्हणाले.”

चेहर्‍यावर समाधानीची छटा आणून उमेश सांगत होता.
“कोकणात आयुष्य गेल्याने रमाकांतची विल-पॉवर जबरी असणार.”
मी उमेशला म्हणालो.

“अगदी बरोबर. सर्व टेस्ट्स झाल्यावर,तसं काही नाही असं डॉक्टरनी सांगीतलं.फक्त रेस्ट घ्यायाला सांगून औषधं घेण्याची लिस्ट दिली आहे.औषधानी सूज कमी झाल्यावर बरं वाटणार असं डॉक्टर पुढे म्हणाले.बाबा परत कोकणात जातो म्हणून माझ्या मागे लागले आहेत.त्यांना इथे करमत नाही.”
आपल्या बाबांच्या चेहर्‍याकडे बघत उमेशने सांगून टाकलं.

उमेश आणि माझ्यामधे चाललेला हा संवाद ऐकून रमाकांत काहीतरी सांगायला उत्सुक्त झालेला दिसला.
मला म्हणाला,
“मी हा पहिल्यांदाच मुंबईला येतोय.कोकणातलं आयुष्य तुला माहित आहे.इथे मला अवघडल्यासारखं होतं.आमचे आजी आजोबा अशा वयात कुठे मुंबईला येऊन उपचार करायचे?
हरी हरी म्हणत दिवस काढण्याचं हे वय.आहे ते सहन करून दिवस काढण्याचं हे वय.एव्हडा उपाय करण्यासाठी पैसा कुणाकडे होता.आणि उपायही त्यावेळी नव्हते.निवांत अंथरूण धरून रहायचे.आणि त्यातच अंत व्हायचा.
माझे लहानपणातले दिवस मला आठवतात.”

असं म्हणून रमाकांत खुशीत येऊन मला सांगायला लागला,
“पैसे सतत जवळ असण्यात किती फायदेमन्द असतं हे मला माहित होतं.हवेत त्यावेळी मला पैसे मिळायचे. एव्हडंच की मला मागावे लागायचे.पण बरेच वेळा या न त्या कारणाने मी पैसे कमवित असायचो.मी माझ्या आजोळी वाढलो.गावात मला हवं हवं ते मिळायचं.

माझ्या आजोबांच्या घराजवळून गावातला मुख्य रस्ता जायचा.रस्त्याच्या एका दिशेने वाटलं तर मला डोंगरावर चढून घनदाट झाडांच्या रानातून वर पर्यंत जाता यायचं, तसंच वाटलं तर रस्त्याच्या दुसर्‍या मार्गाने समुद्र-चौपाटीवरपण जायला यायचं.संध्याकाळच्या वेळी डोंगरावर चढून गेल्यावर एका विशिष्ट जागेवरून खाली वसलेलं गाव दिसायचं.काळोख होण्यापूर्वी घराघरातून छपरामधून नीळसर धुराचे लोट दिसायचे आणि काळोख झाल्यावर मिणमिणत्या दिव्यातून घरं आढळून यायची.मंगळोरी कौलाच्या घराच्या छपरातून विशिष्ट तर्‍हेच्या कौलामधून धुराचा लोट एखाद्या बोटीच्या नळकांड्यातून येणार्‍या धुरासारखा भास व्हायचा.

घराच्या मागच्या बाजूला आजोबांचं जवळ जवळ चारपाच एकराचं शेत होतं.घराच्या मागच्याच बाजूला मोठा मांगर होता.चारपाच गाई,चारपाच म्हशी, रेडे,शेताचे बैल मांगरात बांधून ठेवलेले असायचे.आम्ही त्याला गाई-गुरांचा गोठा म्हणायचो.गुरांचं शेण आणि मुत जमाकरून दोनतीन मोठ्या खड्यात साचवलं जायचं.त्याला आम्ही गायर्‍या म्हणायचो.शेताला ह्याचा खत म्हणून वापर व्हायचा.

मी पाचएक वर्षांच्या असेन.सर्वांबरोबर अगदी पहाटे उठून आजीबरोबर गोठ्यात जायचो. गड्यांच्या मदतीने आजी दोन चार चरव्या दूध काढून झाल्यावर सर्व गुरांना शेतात सोडून देण्यासाठी गुराख्यांच्या ताब्यात द्यायची. आजोबा बैलांची गाडी जुंपवून त्यात गवताच्या जुड्या भरून शेतात घेऊन जायचे.मी बैलगाडीत माझ्या आजोबांच्या जवळ त्यांच्या मांडीवर बसून बैलांना हाकायचो.गवताचा आणि सरकीच्या पेन्डीचा वास गाडीत बसल्याबरोबर माझ्या नाकात भरायचा.सकाळच्यापारी थंडगार पण झोंबणारा वारा माझ्या अंगावरून गेल्यावर अंगात शिरशीरी यायची.

शेताच्या जवळ शेणाने सारवलेल्या एका ओसरीजवळ आजोबा बैलगाडी थांबवून ठेवायचे.बैलांना इतर गुरांबरोबर जायला सोडून द्यायचे.ओसरीत गवताच्या जुड्या आणि पेन्ड रचून ठेवायचे.हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे.अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.
गाई-गुरांबरोबर आणि शेतीच्या वातावरणाबरोबर मिळत राहिलेला अनुभव मी नेहमीच माझ्या उराशी बाळगून होतो.इतक्या वर्षाच्या माझ्या आजोळच्या वास्तव्यात माझ्या सर्व नातेवाईकांच्या सहवासात मी असायचो.

माझे आईबाबा,बहिणी,आजीआजोबा,पंजी पंजोबा,मामा, मावश्या,चुलत भावंडं शिवाय माझ्यासारखेच माझे खुळे मित्र ते पण तोपर्यंत नातेवाईक म्हणून जमा झाले होते. गावात एकमेकाला सहाय्य होण्याची व्यवस्था स्थापन झाली होती.उन्हाळ्याच्या दिवसात एक आठवड्यासाठी सर्व गोतावळा आमच्या आजीआजोबांच्या घरात एकत्र जमून, धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी, मजा करायचो.साध्या जीवनशैलीची शिकवणूक मी ह्यातूनच शिकलो.

सर्व परिसर शांत असायचा.टीव्ही नाही,रेडिओ नाही.रात्रीचे दिवे म्हणजे घासलेटवर चालणारे कंदील.संध्याकाळ झाली की पडवीत सर्व दिवे आणून साफ पुसून ठेवून,नसल्यास घासलेट भरून मंद पेटवून ठेवले जायचे.नंतर पुर्ण काळोख झाल्यावर एक एक कंदील वेगवेगळ्या खोलीत नेऊन वात मोठी करून ठेवले जायचे.

सर्व वयस्कर मंडळी घरात झोपायची.आम्ही सर्व बाहेर उघड्या पडवीत अंथरूणं घालून झोपायचो. पौर्णिमेदिवशी लख्ख चांदण्यात झोपायला मजा यायची.चंद्रप्रकाश पाहून दिवस उजाडला असं समजून मधूनच एखादा कावळा काव काव करायचा.एखाद दुसर्‍या घुबडाचा ओरडण्याचा आवाज ऐकायला यायचा.बाहेरच्या वातावरणात एव्हडी शांत झोप लागायची की सकाळ कधी झाली हे कळायचंच नाही.

बाहेर मोठ्या फणसाच्या झाडाखाली एका मोठ्या हंड्यात गरम पाणी तापवलं जायचं.शेजारीच असलेल्या, नारळाच्या झापानी बांधलेल्या,आडोशाच्या खोलीत बायका आंघोळ करायच्या.आम्ही सर्व विहीरीत कळशी टाकून रहाटाच्या सहाय्याने पाणी काढून माडाच्या झाडाखाली ठेवलेल्या पाथरीवर आंघोळ करायचो.सर्वांचे धुवायचे कपडे एका मोठ्या ढोणीमधे साचवून धुतले जायचे. विहीरी जवळच ही ढोणी असायची.दोन मोठ्या पिंपळाच्या झाडामधे सूंभाची दोरी बांधून त्यावर धुऊन आलेले कपडे सुकण्यासाठी टांगले जायचे.

मला वाटतं,अगदी साधेपण हे उत्तम असतं.कॉन्क्रीटच्या जंगलात राहून जिथे शेकडो दुकानं असतात,हात पुढे करून बोटाला लागेल ती वस्तु निवडून खरेदी करता येते,तिथे जीवनातल्या लहान लहान गोष्टींचा विसर पडून सुखी जीवनाला गमावून बसलं जातं.मोठमोठाले शॉपिंग मॉल आणि तत्सम सुविधा न मिळाल्याने जीवन कसं जगायचं ह्याचा विसर पडला जातो.

एकंदरीत काय?आताचं आमचं हे वय म्हणजेच व्याधीना तोंड देत जगणं.कोकणात संध्याकाळच्या वेळी समुद्र-चौपाटीवर गेलं असताना सूर्यास्ताचा समय आनंद देऊन जातो.सूर्य अस्ताला जातानाचा देखावा अवर्णनीय असतो.सूर्यास्तावरून मला एक आठवलं,कुणीतरी म्हटलंय,
“सूर्याकडून एक शिकावं.संध्याकाळ झाली की निमुट अस्ताला जावं.”
अगदी तसंच मला वाटायला लागलं आहे.आता आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे.पण अस्ताला जाणं आपल्या हातात थोडंच आहे?”

रमाकांत जे काही सांगत होता ते मी निमुट ऐकून घेत होतो.गत जीवनाच्या जुन्या आठवणी काढून तो रममाण होत असताना डॉक्टरांच्या औषधाला पुष्टी म्हणून,आपल्या बालपणाच्या आठवणी काढून,त्या मला सांगून,तो सुखी होत असेल आणि हा उपाय रमाकांतला बरं होण्यात मदत होत असेल तर ऐकायला काय हरकत असावी असं मी माझ्या मनात म्हणत होतो.?

शेवटी मी त्याल एव्हडंच म्हणालो,
“थोडक्यात मी म्हणेन जे काही आहे त्यात समाधानी मानून न रहाता आणखी आणखी मिळवण्याच्या आशेने कुठेतरी निराशा पदरी आणून रहाणं कितपत योग्य होईल.?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 14, 2011

रोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.

“ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”

अनीलची आणि माझी अलीकडेच ओळख झाली होती.त्यासाठी त्याची माझी ओळख दुसर्‍याकुणी करून दिली नव्हती.अनीलेने स्वतःच मला रस्त्यात गाठून माझ्याशी ओळख करून घेतली होती.त्यानंतर कधीही तो मला भेटला की माझ्या नावा-गावानीशी आठवण लक्षात ठेवून बोलायचा.त्याच्याबरोबर रस्त्यावरून चालायचं म्हणजे दर पल्ल्यामागे त्याला कोणतरी ओळखीचा भेटायचा.

“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा? कुतूहल म्हणून मी तुला विचारतो”
असं मी अनीलला एकदा म्हणालो.
मला अनीलने मजेदार माहिती दिली.
तो म्हणाला,
“रोज नेहमी एखाद्या नव्या व्यक्तिशी माझी भेट व्हावी असं मला वाटत असतं.जर का लोक वेळ काढून रोज कुणातरी एका नव्या व्यक्तिला हलो म्हणतील तर मला वाटतं, मनात असलेल्या प्रतिकूल भावना नष्ट होतील. खरं म्हणजे हा धडा माझा मीच शिकलो आहे.

पूर्वी एकदा मी असाच माझ्या इतर मित्रांबरोबर शहरात येऊन गेलो होतो.शहरात आतंकवाद्यांचा हल्ला होण्यापूर्वी,शहरातले लोक, वस्ताद,दादागिरी करणारे,शिष्ट आणि उद्धट वृत्तिचे असतात असा समज दिला जात असायचा.तेव्हा थांबून कुणाशी गपशप करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीपण ह्यावेळेला मी आणि माझा मित्र मनात थोडा धीर आणून फुटपाथवर चालणार्‍या एका दोघाना एखादी गोष्ट कुठे मिळेल म्हणून सहज विचारण्याचा प्रयत्न करून पाहिला.

दोन चार लोक आपसूप येऊन सांगू पहात होते.आम्ही शहरात नवखे दिसल्याने,स्नेहपूर्ण वागणूक आम्हाला मिळत होती.माझ्या लगेचच लक्षात आलं की,आपला वेळ काढून गर्दीत दिसणार्‍या कुणाशीही बोलणं म्हणजेच विश्व पाहिल्यासारखं वाटणं.

मला आठवतं, माझ्या लहानपणी शाळेत हा प्रयोग मी करून पाहिला होता.माझ्या मनातली योजना अशी होती की,रोज एका अनोळख्याशी संवाद साधायचाच,हे शक्य होईल ह्याबद्दल मी थोडा साशंकच होतो.मी अनुमान काढलं होतं की लोक संवाद साधण्यासाठी अंमळ व्यस्तच असतात.माझं अनुमान खरं ठरलं.माझा प्रयोग असफल झाला.

पण ज्यावेळी मी कॉलेजमधे शिकायला शहरात आलो होतो त्यावेळी ही माझी भन्नाड कल्पना आचरणात आणण्याचं ठरवलं.ज्या परिसरात मी रहात होतो तिथे हा प्रयोग करून पहाण्याचं मी ठरवलं.फार फार तर काय होणार होतं की मी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना एखाद्याकडून मी उपेक्षित झालो असतो. परंतु,तसं झालं नाही.कारण ते लोक पूर्वीसारखे गर्दीतला एक चेहरा असं वागत नव्हते.

माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात रोज मी एका नव्या व्यक्तिशी संवाद साधत होतो.त्याचं नाव विचारत होतो, तो शहरात कुठल्या गावाहून आला म्हणून विचारत होतो शिवाय त्याच्याबद्दल कमीतकमी दोन निरुद्देश वास्तव विचारत होतो.ही सर्व माहिती मी माझ्या मनाच्या कप्प्यात आठवण म्हणून ठेवीत होतो.पुन्हा कधी जर का त्याची भेट झाली तर मैत्रीपूर्ण ओळख राखून ठेवण्याचा तो प्रयत्न होता.

कॉलेजमधले माझ्या बरोबरीचे मित्र हा माझा प्रयत्न,ही माझी धारणा, म्हणजे एक विनोद आहे असं समजत होते.पण मला तसं वाटत नव्हतं.ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”
हे त्यांच्या मनात आणण्यासाठीचा तो मार्ग होता.

कुणी म्हणू शकलं असतं की माझा हा प्रयत्न अगदीच असंगत होता,त्यातून काहीही मिळत नव्हतं, परंतु, मला मात्र त्यापलीकडे जाऊन वाटत होतं.माझ्याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून,नुसता संवाद साधण्यात, मी पुढाकार घेत आहे असं दिसलं जात होतं.हे आणखी वाढवून घेऊन आणि त्याच व्यक्तिची पुन्हा ओळख ठेवून मी आदर दाखवीत आहे असं दिसत होतं.दुसर्‍याला आदर दाखवून मी त्या व्यक्तिबरोबर सहिष्णुता दाखवतो असं दिसत होतं.”

अनीलचं हे सर्व ऐकून मला त्याचं खूपच कौतूक करावसं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा?”
हा एक साधा प्रश्न मी तुला विचारला खरा.पण त्या ओळखी होण्यामागे तुझी भन्नाड कल्पना आणि त्यानंतर तू घेत गेलेली भन्नाड मेहनत ह्याचंच हे फळ आहे हे तू मला सवित्सर समाजावून सांगीतलंस म्हणूनच कळलं.

मला ह्यातून एक लक्षात आलं की,तुझ्या ह्या प्रयत्नामुळे,
पुढाकार दाखवून,आदर प्रदर्शित करून,सहिष्णुता बाळगून हे विश्व शांतीने रहाण्याजोगं आहे असं दाखवता येतं.आपण जरका रोज एका नव्या माणसाला भेटलो आणि त्याची ओळख ठेवून राहिलो तर आपण आपल्यातच वेगळेपणा करीत नसून ह्या जगातही तसा एक चेहरा एकावेळी पहाण्याचा वेगळेपणा होत नाही हेही सिद्ध होतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com