Monday, January 9, 2012

ती पण मुलंच आहेत.




"माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते."


कोदेवकीलांच्या घरी सर्वच वकीलीपेशात लागले होते.कोदे स्वतः,त्यांची दोन मुलगे,एक मुलगी आणि आता त्यांची मोठी सून सर्वच वकील होती.
कोद्यांची मोठी सून म्हणजेच मुणाल माझ्या परिचयाची होती.तिच्यामुळेच माझी कोदे कुटूंबाशी ओळख झाली.
मृणालचं लग्न होऊन झाली असतील पाचएक वर्षं.तिला आता दोन मुलं आहेत.लहान मुलगा असेल एक वर्षाचा.मी शहरात गेल्यावर मृणालची किंवा तिच्या नवर्‍याची आणि माझी कोर्टापाशी बरेच वेळा भेट व्हायची.कधी कधी दोघंही एकाच वेळेला भेटायची. रस्त्यावरून चालतानासुद्धा त्यांच्या कायद्याच्या गप्पा चालायच्या.
ह्यावेळेला मला मृणालचा नवरा एकटाच दिसला.चौकशी केल्यावर कळलं की मृणाल आता सबर्बनमधे जुवनाईल कोर्टात केसीस घेते.लहान मुलांवर झालेल्या आरोपातून पब्लिक डिफेन्डर म्हणून तिला काम करण्याची संधी मिळाल्याने ती फारच स्वारस्य घेऊन काम करते.


"मुणाल तुमची आठवण काढते.बरेच दिवस तुम्ही आमच्या घरी आला नाही.तेव्हा वेळ काढून कधीतरी या"
असं मृणालचा नवरा मला त्यावेळी म्हणाला होता म्हणून मी आज त्यांच्या घरी गेलो होतो.


"तुझा नवीन जॉब कसा काय आहे? जुवनाईल कोर्टात कसं चालतं ह्याचं मला कुतूहल आहे म्हणून विचारतो."
असं मी मृणालला म्हणाल्यावर,ती मला म्हणाली,
"अगदी नव्यानेच मी हा जॉब करीत आहे.त्यामुळे रोजचं काम हा माझा ह्या विषयातला नवीन अनुभव म्हणून जमा होत आहे.
असं म्हणून,मांडीवर घेतलेला आपला मुलगा मृणालने पाळण्यात ठेवला आणि त्याच मुलाचा विषय काढून माझ्या जवळ येऊन मला म्हणाली,
"कालचीच घटना मी तुम्हाला सांगते.
काल रात्री माझा मुलगा माझ्या हाताच्या घडीवर जणू पाळण्यात झोपावं तसा झोपला होता.माझ्या खांद्यावर त्याचं ते इवलूसं डोकं,माझ्या छातीवर त्याचा इवलूसा हात आणि त्याचे दोन्ही पाय माझ्या कंबरेवरच्या निर्‍यात खोचले गेलेले अशी त्याची पोझ होती.


माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते.त्याचं झोपेतलं खिदखिदणं पाहून,एक वर्ष वयावर काय मजा येत असेल ह्याचा मी विचार करीत होते.त्याला वाटत असावं की,आईच्या सानिध्यात आपण किती सुरक्षीत आहो.त्याचं शरीर  आईच्या अंगावर आराम घेत आहे, त्याचं श्वसन हळुवार झालेलं आहे पण सावध झालेलं आहे ते मला भासत होतं.
त्याच्या सभोवतालचं वातावरण शांत असल्याचा त्याला वाटणारा भास सूदंर असावा.माझी तीन वर्षाची मुलगी बाजुच्याच कॉटवर शांत झोपली होती.
दिवसभराच्या घाईगर्दीच्या जीवनातून ती थकलेली होती.माझं तिच्याकडेही लक्ष होतं.कदाचीत ती जागी झाल्यास सर्व काही आलबेल आहे हे तिला चटकन कळावं हा माझा उद्देश होता.एव्हड्याश्या तिच्या जीवनात ती बरीचशी स्वावलंबी झाली होती.


हे माझं माझ्या घरातलं वातावरण होतं.रोज सकाळी मला माझ्या कामावर गेल्यावर जे वातावरण माझं स्वागत करतं ते ह्या माझ्या घरच्या वातावरणाशी पूर्णपणे असादृश्य आहे.पब्लिक डिफेन्डर म्हणून कोर्टात वकीली करण्याचा माझा जॉब असल्याने,मला कोर्टात मुलांचे असे नमुने दिसायचे की समाजाने त्याच्यावर "गुंड","चोर," "बलात्कारी" "छेड काढणार" असली लेबलं लावली होती.आणि ही लेबलांची यादी मोठी होती.पण ती लेबलं दूर केल्यास ती पण मुलंच होती.


ह्या मुलांच्या सानिध्यात राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यावर आणि त्यांच्याशी त्यांच्या जीवनाविषयी,त्यांच्या घराविषयी,त्यांच्या स्वप्नाविषयी चर्चा करायला मला संधी मिळते.त्यांच्या जवळ बसून डोळे पाणावतात,माझ्या मनात समाजाचा राग आणला जातो,समाजातील विषमतेचा उद्वेग येतो पण जास्त करून माझं मन दुःखीच होतं.त्या मुलांच्या मनातलं खोल दुःख त्यांच्या नजरेतून चमक देऊन जातं.
त्यांना हरवले गेल्याचं,त्यागल्याचं,यातना दिल्याचं,लेबल लावल्याचं,फेकून दिल्याचं,भिरकावून टाकल्याचं दुःख मला सलतं.
समाजातल्या विषमतेतून निर्माण झालेल्या समस्येतून,गरीबीतून, जमेल तेव्हडी जोपासना करणार्‍या कुटूंबातून ही मुलं आलेली असतात.त्यांची अजीबात गय केली गेली नाही अशा कुटूंबातून ही मुलं आलेली असतात.


बर्‍याच जणांचे आईबाप,पण जास्त करून आयाच,कोर्टाच्या लॉबीमधे दिवसा मागून दिवस येऊन बसलेल्या मी पाहिल्या आहेत.त्या मुलांवर कसलेही दारुण आरोप लावून,कसलीही लेबलं लावून त्यांना तिथे आणली गेली असताना,त्या निन्दनीय रस्त्यावर पोरकी झालेल्या त्या मुलांची सोडवणूक करण्यासाठी ती मंडळी आलेली असते.
काहीवेळा त्या मुलांचे असेही आईबाप मी पाहिलेले आहेत की,ते त्यांच्या मुलांचा तिकडेच कायमचा त्याग करून जाण्याच्या तयारीने आलेले असतात.दरदिवशी मी कोर्टात माझ्या कामावर गेल्यावर माझ्या आशेचा भंग झालेला पाहिला आहे.


प्रत्येक वेळेला एखाद्या मुलाची संस्थेत भरती होते,किशोर वयाच्या मुलांची बंदीखान्यात रवानगी होते,एखाद्या मुलाला प्रौढांच्या कोर्टात नेऊन निकाल मिळाल्यावर आयुष्यभर बंदीखान्यात रवानगी होते.ह्या मुलांच्या भावी स्वप्नांचा त्याग केला जातो.
मला नेहमीच वाटतं की,ही मुलं हे समाजाचं भवितव्य आहे.जरी आपल्याला हे कबूल करायचं नसेल,जरी आपल्याला ती उपद्रवी वाटत असलं तरी.


ती मुलंसुद्धा आपल्या आईच्या खांद्यावर झोपी गेलेली असतील किंवा झोपी जावं अशी त्यानी इच्छाही केली असेल,त्यांनाही स्वप्न असतील,उमेद असेल,कल्पना असतील.तीही त्यांच्या लहान वयात झोपेत खिदखीदली असतील.
पण नंतर काहीतरी घडलं असेल,काहीतरी शोकजनक,काहीतरी उदध्वस्त झालं असेल की ज्यामुळे त्यांचं तारूण्य़,त्यांच्या आशा-आकांक्षा,त्यांचा आनंद धुळीला मिळाला असेल.
माझ्या मनात नेहमी येत असतं की एकनाएक दिवस हे नष्ट झालेलं बालपण,ही त्यागलेली स्वप्नं आणि धुळीला मिळालेली जीवनं परत मार्गावर आणता येतील.


दरदिवशी जेव्हा मी घरी पोहोचते तेव्हा माझ्या मुलांना मी छातीशी कवटाळते आणि त्यांच्या कानात परत परत पुटपूटते,
" तुम्ही माझे प्राण आहात"
आणि मी जेव्हा अशी आशा करीत असते तेव्हा कामावर सोडून आलेल्या त्या मुलांचा मला विसर पडत नाही. मी दोन विश्वात वास्तव्य करते.एक वचनबद्ध विश्व आणि एक शोकांन्तिकेचं विश्व.
मी ह्या गोष्टीचा विसरही पडूं देत नाही की ही माझ्या कामावर भेटणारी मुलं,त्यांच्यावर कसलेही आरोप असोत,समाज त्यांच्या विषयी काहीही म्हणत असो,त्यांच्यावर कसलीही लेबल्स लागलेली असोत,ती मुलंच आहेत,आपलीच मुलं आहेत आणि आपलंच भवितव्य आहे.आणि मी हे पक्कं जाणलेलं आहे."

मृणालकडून हे सर्व ऐकून मला सर्रर्र झालं.ह्या जगात असंही चालतं हे पाहून माझं मन उदास झालं.मी मृणालला म्हणालो,
"तू नुसती वकीली करीत नाहीस तर एक समाजकार्य करीत आहेस असं मी म्हणेन.चांगल्या मार्गाला लागलेल्या त्या प्रत्येक मुलाकडून तुला दुवा मिळत रहाणार.अप्रत्यक्षपणे तुझ्या मुलांचं भलं होणार."
माझं हे ऐकून सहाजीकच मृणालचा चेहरा आनंदला.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Friday, January 6, 2012

अनवाणी चाल.



"अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळतं ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात  येऊन मला मिळतं."

दत्तू बांदेकराची नातवंडं अमेरिकेत असतात. त्यांना सुट्टी पडली की ती कधी कधी कोकणात आपल्या आजोबाकडे रहायला येतात.भारतात आल्यावर कुठल्याही शहरात जायला त्यांना कंटाळा येतो.जे अमेरिकेत नेहमीच दिसतं तेच तेच भारतातल्या शहरात दिसतं.ते पहाण्यात त्यांना गम्य वाटत नाही.कोकण आणि गोवा परिसर त्यांना खूपच आवडतो.कोकणात आपल्या आजोबांच्या घरी असताना सकाळचा नास्ता झाला की कोकणातल्या डोंगर दर्‍यात फिरायला जातात.काही डोंगरात त्यांनी स्वतःच्या पायावाटा काढल्या आहेत.


दोन्ही नातवंडं वनस्पतिशास्त्रात दिलचस्पी घेत असल्याने कोकणातल्या डोंगरावरच्या आणि रानातल्या निरनीराळ्या वनस्पती बघून त्यांना खूप आनंद होतो.भारताचा बराचसा भाग विषुववृत्तावर असल्याने कोकणातल्या डोंगरावरच्या वनस्पतीत त्यांना नाविन्य सापडतं.


डोंगरावर सापडणारी लाजाळुची झुडपं,निवडूंगातले प्रकार,अमाप जातीची फळांची झाडं,अनेक प्रकारची फुलं,वेली ह्या गोष्टी त्यांना तिकडे मुळीच पहायला मिळत नाहीत.त्याशिवाय कडूलिंबाच्या झाडाच्या पानाची औषधी गुण,तुळशीच्या पानांतली जंतुविरहित करण्याची द्र्व्य,अशा बर्‍याच विषयावर त्यांना खूप स्वारस्य आहे.


मागल्या खेपेला मी जेव्हा दत्तूला भेटायला कोकणात गेलो होतो तेव्हा तो आपल्या नातवंडांबद्दल सांगत होता.आणि हे सर्व सांगताना एक सांगायला विसरला नाही म्हणजे ती मुलं पायात वापरत असणार्‍या पायतानाबद्दल.त्यांचे ते निरनीराळ्या कारणासाठी वापरले जाणारे शुज पाहून दत्तू खुपच अचंबीत होतो.जॉगींगसाठी निराळे शुज,हायकींग आणि ट्रेकींगसाठी निराळे शुज,कुणाच्या घरी जायचं झाल्यास निराळी शुजची जोडी.


नातवंडांच्या शुज वापरण्याच्या सवयीवर माहिती देत असताना, दतू मला आपल्या लहानपणातल्या सवयी सांगत होता ते आठवलं.
मला द्तू म्हणाला होता,
"अनवाणी चालायला मला बरं वाटतं.मला आठवतं,कोकणात आमच्या गावी माझ्यासारखी आम्ही पाच-सहा मुलं होतो कुठेही गेलो तर अनवाणी जायचो.काही लोक आमच्या त्या वागण्याला पाहून म्हणायचे ही भंपकगीरी आहे.काही सांगायचे आम्हाला की तुमचे पाय खरचटून खराब होतील.पण आम्ही कुणाच्याच म्हणण्याची पर्वा केली नाही.


मला आठवतं की खूप उन्हाळा असला की आम्ही फक्त आमच्या घराच्या आजुबाजूलाच अनवाणी फिरायचो.मात्र थंडी आणि पावसाळा आला की आम्ही अनवाणीच फिरायचो.बाहेर खेळायला मैदानात गेल्यावर आमच्या उघड्या नागड्या पायानी चिखलात,गवतावर,सुकल्या पाचोळ्यावर आम्ही  चालत असायचो.
माझ्या काही मित्रांचे आईबाबा म्हणायचे की हे आम्ही करतो तो शुद्ध वेडेपणा आहे आणि एकनाएक दिवस आम्ही दुखापत होऊन आजारी पडणार. पण असं कधीच झालं नाही.उलटपक्षी आमच्यासारखी निरोगी मुलं आमच्या आम्हीच होतो.


फक्त उन्हाळ्यात अनवाणी चालण्याने थोडा त्रास व्हायचा.पण उन्हाळा संपता संपता आमच्या पायांचं रुपांतर पायताण होण्यात व्हायचं.पायचे तळवे एव्हडे दमदार मजबूत व्हायचे की आम्ही कशावरही चालायचो. रानातून चालत जाताना पाण्यात बुडलेल्या गवतावरून,पायवाटेवर येणार्‍या उंचवट्यावरून,जमिनीवर आलेल्या झाडांच्या मुळावरून सहजपणे चालायचो.


कधीकधी एकमेकात धावण्याची चुरस लावून खडबडीत रस्त्यावरून धावताना,रस्त्याच्या कडेला जमलेल्या चिखलमिश्रीत पाण्याच्या डबक्यात पाय बुडवून पायाचे तळवे थंड करून घ्यायचो.बाजारात जायचं झाल्यास गरम पायवाटेवरून धावत जायचो,मे महिन्याच्या कडक उन्हाळात,अगदी गरम झालेल्या फरशीवर चालताना पाय चुरचुरून यायचे.कुठेही गेलो तरी अनवाणीच फिरायचो.
कधी कधी घरी आल्यावर पायाकडे पाहिल्यावर खरचटलेली पायाची बोटं आणि चर आलेले पायाचे तळवे पाहायला मिळायचे.पण त्यामुळे आम्ही खच खाल्ली नाही.कारण अनवाणी चालणार्‍याचा आमचाच कंपू होता.


आमच्यापैकी कुणीही आपल्या बाबांबरोबर बाजारात खरेदीसाठी गेलो असताना मधेच जरका बाबांनी आम्हाला अनवाणी चालताना पाहिलं तर घरी परतून जायला सांगायचे.घरी जाऊन पायताण घालून यायला सांगायचे.आम्ही परत जायचंच टाळायचो.भर बाजारात आम्ही अनवाणी आहोत असं त्यांच्या लक्षात आल्यास,
"अनवाणी पायानी आत येण्यास मनाई आहे"
असा बोर्ड असलेल्या हॉटेलात आम्हाला आवडीची भजी आणि बटाटेवडे खायला मिळायचे नाहीत.


आता ह्या वयातही मला चप्पल,बूट पायात वापरायला कंटाळा येतो.कुठेही अनवाणी जाण्याचा आमचा लहानपणाचा शिरस्ता मी कधीही विसरणार नाही.माझी मुलं जरा मोठी झाली की तीही माझं अनुकरण करतील अशा आशेवर मी असायचो.अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळतं ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात येऊन मला मिळतं.
अनवाणी चालण्यावर माझा भरवसा आहे."


हे सर्व दतूचं पादत्राणांवरचं लेक्चर ऐकून मी त्याला म्हणाल्याचं आठवतं,
"बाबारे दत्तू,मुलं तुझी आहेत ती कदाचीत तुझं अनुकरण करतील हा तुझा विचार ठीक होता. पण नातवंडं तुझ्या मुलांची मुलं आहेत आणि अमेरिकेत असल्यावर तुझं अनुकरण सोडाच आपल्या बाबांचही अनुकरण करणार नाहीत कारण जमाना बदललेला आहे आणि तिकडचा जमाना व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेला आहे."




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com



Tuesday, January 3, 2012

"ते शक्य आहे आणि ते करीनच"




"हा काही माझा पहिला किंवा माझा पन्नासावा नकार मिळण्याचा अनुभव नव्हता."


तो रविवार होता.पेपर वाचून झाल्यावर,टीव्हीवरची सकाळची न्युझ बघून झाल्यावर कंटाळा घालवण्यासाठी शेजारच्या वामनच्या घरी सहज गप्पा मारायला गेलो होतो.वामन पास टाईम म्हणून त्याच्या लॅपटॉपवर इमेल वाचत बसला होता.मला पाहून ते काम बंद करून माझ्याशी गप्पा मारायला बसला.


तेव्हड्यात त्याची मुलगी सुनंदा आली आणि त्याला म्हणाली,
"आम्ही जीवश्च-कंटश्च तीन मैत्रिणी पण आमच्या पैकी एकीला आम्हाला मिळाला त्या कॉलेजात तिला प्रवेश नाकारला.ती खूपच नर्व्हस झाली आहे.त्या कॉलेजच्या प्रिन्सिपालची आणि तुमची ओळख आहे.काही करून पहाल का?"


वामनने त्याच्या मुलीला प्रयत्न करून पहातो पण आश्वासन देत नाही.असं उत्तर दिलं.ती निघून गेल्यावर मला म्हणाला,
"नकार मिळणं,अस्वीकार होणं,नापसंती दाखवली जाणं ह्या गोष्टींचा जीवनात जो अनुभव मिळतो त्याबद्दल मला नेहमीच विशेष वाटत असतं.शाळेत असताना,शेवटचा नंबर मिळणं,अस्वीकार होणं,शाळेतल्या खेळातल्या टीममधे निवड न होणं ह्याबद्दलही मला त्यावेळेला विशेष वाटायचं.
तसंच माझ्या स्वतःच्या जीवनात किंवा माझ्या व्यावसाईक जीवनात काहीतरी अगदी आवश्यक आहे असं वाटत असताना ते मिळणं अशक्य आहे असं मला सांगीतलं जावं ह्याबद्दलही मला विशेष वाटतं.


मला मनोमनी वाटतं की,हा एकच अनुभव आहे त्यातून आपल्याला अप्रत्यक्षपणे समजतं की आपण जीवनात अग्रगति येण्यासाठी, भरपूर कष्ट घेण्याच्या प्रयत्नात आहो,जीवनात भरपूर धोका पत्करण्याच्या प्रयत्नात आहो.जर का आपल्याला नकार मिळण्याचा अनुभव मिळत नसेल तर समजावं आपण कोणताही नवा किंवा कठीण प्रयत्न करीत नाही.हे असं होणं खरोखरच जास्त यातनादायक,आणि तथ्य असलेली बाब आहे.
"जोखिम नाही तर लाभ नाही"
ह्या उक्ति पेक्षाही.


मी जेव्हा अगदी लहान होतो,किशोर वयात होतो तेव्हाही,प्रत्येक नकार मला खूप यातना देऊन जायचा.कधी कधी हा नकार स्वीकारताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं, निष्टूर आलोचना व्हायची.तसा माझा स्वभाव खूपच भावनाप्रधान आहे.मी आवडला जावा असं मला वाटायचं, तसंच इतराना खुशीत ठेवायला मला आवडायचं.


अलीकडेच माझ्या जीवनात एक घटना घडली.त्यामुळे माझ्या लहानपणी झालेल्या निष्टूर आलोचना आणि माझ्या किशोर वयात मला मिळालेल्या सर्व नकारांचा मी ऋणी झालो आहे.


हा काही माझा पहिला किंवा माझा पन्नासावा नकार मिळण्याचा अनुभव नव्हता,पण काही कारणास्तव ह्या घटनेचा मला झालेला दंश पूर्वीच्या झालेल्या घटनांच्या दंशापेक्षा कित्येक पटीने जहरी होता.


मी एका योजनेत भाग घेण्यासाठी अर्ज केला होता.मला तेव्हा वाटलं होतं की मला जे काही आयुष्यात करीअर म्हणून मिळवायचं होतं ते साध्य व्हायला हा चांगला मोका मिळत आहे.पण जे नकारात्मक पत्र मला आलं ते विनम्र किंवा साभार परत अशा पद्धतीचं नव्हतं.परंतु,ते काहीसं हानिकारक आणि खालच्या दर्जाची प्रत्यालोचना करण्यासारखं होतं.
"तुम्ही ह्यासाठी लायक नाही आणि कधीही नसणार"
असा तो मजकूर होता.


तरीसुद्धा सुरवातीला मला मिळालेला धक्का सहन केल्यानंतर -मी अभिमानाने म्हणेन माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही.-उलट माझ्यातला पक्का इरादा वाढू पहात होता की माघार न घेता आपल्या मनातला उद्देश साध्य करायला झटावं.माझ्या मनातलं साध्य करण्याचा इरादा,नकार मिळाल्याच्या यातनाना,पार करून जात होता.ह्यातून माझ्या एक लक्षात आलं की,नकार मिळण्याच्या अनुभवातून माणूस आपली प्रगति कशी करू शकतो ते.

माझा आता भरवसा बसला आहे की,खेळपट्टीवर होणार्‍या अवमानाने आणि शाळेत होणार्‍या अशाभंगाने,तरल किंवा तितकीसे तरल नसलेले अवमान आपल्या प्रौढ वयात सहन करायाला आपण तयारीत असतो. नकार मिळाल्याने आपल्याला खरंच काय हवंय,किती हवंय आणि त्यासाठी किती
जोखिम घ्यावी हे समजायला मदत होते."


वामनचं हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला उठता उठता म्हणालो,
"मला वाटतं अवमानातून आपल्यात क्षमता येते. मला वाटतं,ते क्षण जेव्हा दुसरा कोणही तुम्हाला म्हणतो,
"तुम्हाला ते शक्य नाही आणि तुम्ही ते करू नका"
तेव्हा आपल्या अंतर मनातला आवाज सांगतो
"ते शक्य आहे आणि ते करीनच"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com    

Friday, December 30, 2011

व्यसनमुक्ती.





"मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात. अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात."

अनंत नाडकर्ण्याला माझ्या दारात बेल वाजवून उभा ठाकलेला पाहून मी खरंच अचंबीत झालो.ही गॉन केस असं मी तत्पूर्वी समजत होतो.


त्याचं असं झालं,एका नावाजलेल्या बॅन्केत चांगल्या वरच्या पोझीशनवर असलेल्या अनंताला एका एकी अवदसा सुचली.
वडील दारूच्या व्यसनाने जर्जर होऊन सर्व नाशाला कारणीभूत झाले असल्याने,चार बहिणीत एकटा भाऊ असलेल्या अनंताने दारूला कदापी शिवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.मग हे कसं काय झालं? असा माझ्या मनात नेहमीच विचार यायचा.


एकदा मी अंधेरी स्टेशनजवळच्या सातबंगल्यासाठी जाणार्‍या बसस्टॉपवर रांगेत उभा होतो.अचानक एक भिकारी दिसणारा माणूस माझ्याजवळ येऊन पैसे मागायला लागला.हात पुढे करून माझ्या नावाने मला संबोधून त्याने हात पुढे केला.तो अनंत नाडकर्णी आहे ह्यावर माझा विश्वासच बसेना.
रांगेतून बाहेर येऊन मी त्या व्यक्तिला समोरच्या इराण्याच्या हॉटेलात घेऊन गेलो.


"अरे अनंता! काय ही तुझी दशा झाली आहे?मी स्वप्नातसुद्धा तुला असा दिसशील असा विचार केला नसता."
अनंताला मी माझा चेहरा टाकून विचारलं.


"काय सांगू?माझे भोग.प्रमोशनवर, लोन सॅन्कशन डिपार्टमेंटमधे, गेलो.प्रथम लोन सॅन्कशन झाल्यावर लोक मला मर्जीने चिरीमिरी द्यायचे.मग बाटली देऊ लागले.अतोनात पैसा आणि बाटली ह्यामुळे मला अवदसा सुचली."
अनंता दोन समोसे तोंडात बोकून आणि गटागट चहा पिऊन झाल्यावर मला सांगू लागला.त्याला भुकेलेला पाहून मी त्याच्यासाठी एक ब्रुनमस्का पाव आणि एक कप चहा मागवला.


तृत्प झाल्याचा चेहरा करून अनंता मला पुढे सांगू लागला,
"एक दिवस मला रंगे हात पकडलं.आणि माझी नोकरी गेली.काही वर्षानी माझी बायकोपण मला सोडचिठ्ठी देऊन गेली.तिची काहीच चूक नसावी.
कारण तोपर्यंत मी दारुच्या आधीन झालो होतो.माझी रहाती जागा गेली.माझ्या बहिणींकडे मी जाऊन रहाण्याचा प्रयत्न केला पण मायेपोटी बहिणी कबूल झाल्या तरी त्यांच नवरे आधार देईनात.त्यांचीही काही चूक नाही.थोडे दिवस कोकणात जाऊन राहिलो.पण मिळकत शुन्य झाल्याने भीक मागून तरी राहूया म्हणून शहरात आलो."


मी खरोखरच सद्गदित झालो.एका दानशूर फॉऊंडेशनमधे माझा एक मित्र काम करीत होता.अनंतातर्फे त्याला एक चिठ्ठी लिहून त्याच्याकडे अनंताला जायला सांगीतलं.दुर्धर व्यसनी लोकाना चांगल्या मार्गावर येण्यासाठी हे फॉऊंडेशन मदत करतं असं माझा मित्र मला म्हणाल्याचं आठवलं.
अनंताजवळ थोडे पैसे दिले आणि निरोप घेताना मी त्याला म्हणालो,
"ही चिठ्ठी फेकून देऊन पैसे पुन्हा दारू पिण्यात खर्च करावे की, मी म्हणतो तसं करावं ह्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे.तेव्हा तू काय ते ठरव."

अनंताने आपलं भवितव्य काय ठरवलं ह पाच वर्षानंतर माझ्या घरी अनंता बेल दाबून आला त्या दिवशी मला कळलं.


मला अनंता सांगत होता,
"मला दारूचं व्यसन होतं.पण मी एक नशिबवान आहे की ज्याला ह्या व्यसनातून निवृत्ति मिळाली.आता पाचएक वर्षं झाली असतील पण ते मी विसरलेलो नाही.मला आठवतंय की त्या निराशजनक मनस्थितीत आणि विद्वेषपूर्ण व्यथेत राहून माझं मला कळत नव्हतं की मला काय झालंय.
हताश होऊन मदतीची याचना करण्याचे ते दिवस मला आठवतात.मदतीची शक्यता नाही असं पाहून माझ्या मनातच्या आतला विषाद आणि बाहेरून केली जाणारी अवज्ञा मला आठवते.


माझ्या भयानक छुप्या आशंका,जगायचं आणि मरायचं भय मनात असतानाही, ज्याला समजून घेता येत नाही त्या बाह्य जगाच्या मेदाला आणि अहंकाराला मी सामोरा गेलो.काहीवेळा जगण्यात एव्हडं भय वाटायचं की दोनदा मी मरण पत्करण्याचं ठरवलं होतं. त्रस्त मन आणि मनातल्या यातना सहन करण्यापेक्षा आत्मबलिदानातून सुटकारा बरा असं वाटायचं.


त्यात मी अयशस्वी झालो ह्याचं आता बरं वाटतं.पण त्यावेळेला माझा कशातही विश्वास नव्हता.माझ्या स्वतःत नव्हता तसाच माझ्या बाहेरच्या जगात नव्हता.मला स्वतःलाच मी यातनेच्या चार भिंतीत कोंडून ठेवलं होतं आणि माझंच मला वाटायचं की मी पूर्णतया परित्यक्त झालो आहे.


पण मी तेव्हडाकाही परित्यक्त नव्हतो तसं पाहिलं तर खरंतर कोणही तसा नसतो.मला दिसायचं की माझ्या मीच दुःख भोगत होतो.पण आता आता मला वाटायला लागलंय की मी एकटा कधीच नव्हतो,कोणही तसा नसावा.मला असंही वाटायचं की,मी जेव्हडं सहन करीन तेव्हडं मला पेलूं दिलं

नाही.पण त्या यातनांची मला जरूरी होती असं वाटतं. माझ्या बाबतीत एव्हड्या यातना मी सहन केल्या असाव्या की त्यामुळे माझ्या भोवतीच्या भिंती तुटून पडल्या,माझा मेद,माझा अहंकार गाडण्यासाठी,जी काही मदत मला मिळत होती ती स्वीकारण्यासाठी हे सर्व होत होतं असं मला वाटतं.


माझ्या यातना एव्हड्या खोलवर पोहचल्या होत्या की माझा विश्वास बसायला लागला.त्यावर विश्वास बसायला लागला की एखादी मोठी शक्ती मला मदत करू शकेल.ह्यावर विश्वास बसत गेल्याने मला मदत होईल याची माझ्या मनात आशा बळायला लागली.


डॉक्टरातर्फे मला मदत मिळायला लागली.माझ्या सारख्याला आणि इतर माझ्या सारख्याना मदत करण्याच्या त्यांचा व्यवसायच होता.माझ्या गहिर्‍या विवरातून बर्‍याच व्यक्तिकडून मला मदत,दया आणि समजून घेण्यात आलं.लोक दयाशील असतात हे मी शिकलो.लोकं आणि त्यांच्यातला चांगुलपणा कसा असतो ते मी शिकलो.


मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात.अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात.बरेच असे लापरवा्ईचे,खोचक शब्द आणि प्रत्यक्ष वागणं ह्यामुळे जीवन खूपच खडतर होतं.माझ्या लक्षात आलं की हे सर्व मी समजून घेतलं तर चिडण्यातून आणि मनाला दुःख होण्यातून मी एव्हडी प्रतिक्रिया द्यायला अनुकूल होणार नाही.आणि मी जर का कठिण वागणुक मिळाल्याने त्याची प्रतिक्रिया देताना समजून घेऊन आणि आस्था बाळगून रहाण्याचा प्रयत्न केला तर कदाचीत मिळणार्‍या वागणुकीत बदल आणण्यात सहाय्य मिळवीन.माझ्याच यातनानी हे समजायला मदत केली.


मी म्हणत नाही की,प्रत्येकाला अशा यातना व्हाव्यात.एक मात्र मला नक्की वाटतं की,यातना होणं बरं आणि कदाचीत त्या येणं आवश्यकही आहे. जर आणि फक्त जर का त्या यातना स्वीकार करण्याने समजून घेण्याची आवश्यक प्रक्रिया होत असेल तर.आणि तिचा उपयोग स्वतःसाठी आणि त्यातून जाणार्‍या इतरांसाठी होत असेल तर.


आपण सर्व काहीनाकाही यातनातून जात असतोच नाही काय? हे तथ्य माझ्यात एक प्रकारचं आपलेपण निर्माण करतं आणि त्यातून इतरानाही मला जमेल तशी मदत करायला प्रोत्साहन देतं.

ह्या विश्वासातूनच मी ह्यात असलेल्या इतर व्यसनाधीन लोकांत वावरून ते व्यसन विरहीत व्हावेत म्हणून काम करण्यात माझ्याच अनुभवातून मी अनुरूप झालो आहे असं समजतो.त्यासाठी कुणाला सुंदर असलं पाहिजे,प्रतिभावान असलं पाहिजे,शक्तिमान असलं पाहिजे अशातला भाग नाही.
तसंच मला हेही वाटतं की हे असं करून त्या मोठ्या शक्तिबरोबर चालण्याचा मला लाभ होत आहे.त्याच फॉऊंडेशन मधे मी नोकरीला असतो.आता माझं अगदी बरं चाललं आहे."


असं म्हणून अनंताने खाली झोपून मला अगदी साष्टांग नमस्कार घातला.त्याने ते इतक्या पटकन केलं की मी त्याला अडवू शकलो नाही.

अनंता उठून उभा राहिल्यावर मी त्याला म्हणालो,
"जे झालं ते गंगेला मिळालं.जे होतं ते नेहमी बर्‍यासाठीच होत असतं असं बुजूर्ग म्हणतात.कारण आयुष्यात उनपाऊस येतच असतो."



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, December 27, 2011

पुष्टावलेला तो उंच ऊस




माझ्या त्या (अजून आणखी एक इडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.
 मुळ कवितेतल्या पहिल्या ओळीत
 "कोसळणारा तो धुंद पाऊस"
 ह्यातला "पाऊस" ह्या शब्दावरून "ऊस"हा शब्द आठवला. आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं,चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा

रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या मनात ओघा ओघाने आलं.आणि कविता लिहिली गेली.


ऊसाच्या रानात काम करणार्‍या शेतकर्‍याच्या परिचयाचे वरील बरेचसे शब्द कवितेत मी वापरले आहेत. माझ्या मामीचं माहेर घाटावर आहे.माझ्या लहानपणी मी तिच्याबरोबर तिच्या माहेरी जायचो.कोल्हापूर जवळ गडहिंग्लज हे ते गांव.मामीचे ऊसाचे मळेच्या मळे आहेत.मामीची आई मुद्दाम एखाद्या गड्याबरोबर आम्हाला पाठवून शेतातला उच्चतम ऊस उपटून आम्हाला त्याचे करवे काढून खायाला देण्याची त्या गड्याला ताकीद-कम-आज्ञा करायची.कविततले बरेचसे शब्द त्या गड्याच्या तोंडचेच आहेत.आणि ते शब्द ऊसाचं पिक काढणार्‍या सर्वसाधारण शेतकर्‍याच्या तोंडचेच आहेत.


ऊस जरी रसाने भरलेला असला तरी त्याचा गोडवा त्याला उपटण्यापूर्वी-उचकण्यापूर्वी - जागीच चीर काढून रस चाखला जाऊन कळायचा. त्या ऊसाला चीर काढणार्‍या आयुधाला "आर" म्हणायचे.रस जर गोड वाटला तर तो ऊस पुष्टावला आहे असं म्हणतात.ऊसाच्या रसात साखर असल्याने साखरेचा चिकटपणा त्याला येतो.चिकट झालेले हात नंतर आम्ही थंड पाण्याने धुवायचो.ऊस उपटताना तो हळूवार उपटावा लागायचा कारण जवळ जवळ अंतरावर पेरणी झाल्याने बाजूच्या ऊसाला बाधा होता नये ह्याची काळजी घ्यावी लागायची. आरीच्या आघाताबरोबर रस थेंब थेंब थेंब थेंब पडायचा.मुळ कवितेतल्या बर्‍याचश्या ओळी मला ऊसाच्या संबंधाने कविता करण्यात उपयोगी वाटल्या.


पुष्टावलेला तो उंच ऊस
 मला म्हणतो आता नको खाऊस
 ओली चिंब झाली झाडे
 कपडे ही ओले चिंब झाले
 तुझं ते हळुवार खेचणं
 माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
 आणि हळुच चीर काढणं
 आणि माझा रस थेंब थेंब पडणं
 नेहमीच हात चिकट चिकट होणं
 प्रत्येक उसाला टक लावून बघणं
 आणि एकाला ऊचकणं
 तुझं उचकणं आणि आमचं पडणं
 झालय आता संवयीचं शेताला
 कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com

Saturday, December 24, 2011

कट्ट्या-बट्टुया.




"तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच."
मी माझ्या पत्नीला म्हणालो.


केशव, माझा मित्र,वांद्रा स्टेशन जवळच असलेल्या एका चाळीत रहातो.मी कधी कामाला वांद्र्याला उतरलो की हटकून केशवला भेटून येतो.
असाच काल मी केशवकडे गेलो  होतो.आमच्या राजकारणावर,महागाईवर,हवामानावर गप्पा चालल्या होत्या,तेव्हड्यात केशवचा सहा वर्षाचा मुलगा

रडत रडत केशवजवळ येऊन म्हणाला,
"शेजारचा बंटी माझ्याशी बोलत नाही.तुम्ही त्याला तसं नको करू म्हणून सांगा.


केशव लागलीच त्याला म्हणाला,
"त्याला सॉरी म्हणून सांग"
"ते मी केव्हाच सांगीतलं,पण तो ऐकायला तयार नाही."
मुलाने उत्तर दिलं.
"मग थोडावेळ त्याच्याकडे जाऊ नकोस.इथेच बस तो सर्व विसरून गेल्यावर तुझ्याशी तो बोलायला येईल."
केशवने मुलाची समजूत घातली.
आणि माझ्याकडे बघून केशव  हसला.


मी केशवला म्हणालो,
"अरे लहान मुलांत हे नेहमीच होतं.त्यांची कट्टी-बट्टी असते.मला माझं लहानपण आठवतं.आम्ही आते,मामे,चुलत भावंड नेहमी भांडायचो आणि मग

कट्टी घ्यायचो.वेळ निघून गेल्यावर सर्वकाही विसरून बट्टी म्हणून परत खेळायला सुरवात करायचो."


"कट्टी-बट्टी वरून मला एक गोष्ट आठवली"
केशव मला म्हणाला.
माझा किस्सा सांगतो असं म्हणून मला सांगू लागला,
"मोठी मंडळी पण अशीच कट्टी-बट्टी करतात.पण त्यांची बट्टी व्हायला फारच कष्ट पडतात.मोठ्यांची मनं लहानांसारखी मऊ नसतात.
त्याचं काय झालं एकदा मी ऑफिसात काम करत बसलो होतो.बरेच फोन येत होते.त्यात एक फोन माझ्या पत्नीकडून आला.मला ती फोनवर हुंदके

देत रडत सांगत होती.


तिचा मनस्ताप सुस्पष्ट होता.तिची सख्खी बहिण काही केल्या तिच्याशी बोलायला तयार नव्हती.माझ्या पत्नीने तिला पाठवलेल्या माफीच्या पत्रांची

तिच्या बहिणीने ती न उघडताच तिला ती परत केली होती.वाटेत कुठे जवळपास एकमेकाच्या नजरेला नजरा झाल्या तर तिची बहिण मान खाली

घालून पुढे जायची.


माझ्या स्वतःच्या बहिणीबरोबर असंच काहीसं झालं.माझे भावोजी-माझ्या बहिणीचा नवरा-जाऊन सहा वर्षं झाली.तिचा स्वतःचा मुलगा तिथपासून

आपल्या आईबरोबर एक चकार शब्द बोललेला नाही.नव्हेतर आम्हा कुणाही नातेवाईकांशी एक शब्द बोलला नाही.


तात्पर्य: माझी पत्नी काय किंवा माझी बहिण काय दोघंही ह्या दुखदायी समस्येचं मुळ कारण समजूच शकल्या नाहीत. गैरसमज निर्माण झाले.राईचा

पर्वत केला गेला.एकमेकात दरी निर्माण झाली.कित्येक वर्षाच्या प्रेमावर आणि विश्वासावर अविस्मरणीय आठवणीवर आणि नाजुक परिस्थितीत

घेतल्या गेलेल्या काळजीवर पाणी पडलं.


मी फोनवरच माझ्या पत्नीला विचारलं,
"एकदा तरी तिला कट्टीची बट्टी असं म्हणालीस का?"
"कसली कट्टी आणि बट्टी?"
रागानेच मला माझ्या पत्नीने उलट प्रश्न केला.


"तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच."
मी माझ्या पत्नीला म्हणालो.


तिला ह्यातलं काही माहितच नव्हतं.मी माझ्या पत्नीला त्यामागचं मूलतत्व काय असतं ते समजावून सांगत होतो.
"कुणी कुणाचं मन मोडलं,कुणी पहात नाही असं वाटून एकाने दुसर्‍याच्या ताटातला आवडीचा पदार्थ पटकन खाल्ला आणि लक्षात आल्यावर जर कुणी कट्टी घेतली,म्हणजेच बोलणं बंद केलं तर माझी चूक झाली,मला माफ कर,मी असं करायला नको होतं, असं म्हणताना माझी तुझी बट्टी असं म्हणायचं.असं हे लहान मुलं करतात.
असं किती वेळा कट्टीची बट्टी करायची ही दोघांमधे ठरलेली संख्या असायची.त्यानंतर मात्र नंतर करायचं ते म्हणजे जशास-तसं.


हे जशास-तसं म्हणजे,लहानपणी आपण जमीनीवर चौकोन काढून दगडाची खापरी टाकून एका पायावर लंगडत उडी मारून खेळ खेळायचो ते

करताना चुकलं तर पुन्हा खेळण्यासाठी जशास-तसं खेळायचो ते जशास-तसं नव्हे.
हे जशास-तसं म्हणजे,ज्याची खोड काढली गेली त्याला खोडकाढणार्‍यांने तसाच आवडीचा पदार्थ आपल्या ताटातून मुद्दामून खायला द्यायचा किंवा

काहीतरी लागट बोलून घ्यायचं.


माझी पत्नी मला म्हणाली,
"हे कट्टीबट्टी आणि जशासतसं माझ्या बहिणीबरोबर चालेल असं वाटत नाही."


पण मी माझ्या पत्नीशी सहमत नव्हतो.माझी खात्री आहे की,जरी कुणाची कळ न काढायचं प्रयत्न केला गेला तरी आपण हाडामासाची माणसं

काहीतरी चुका करतोच.आपण दुसर्‍याला,आपण ज्यांच्यावर अतीशय प्रेम करतो त्यांना,लागट असं बोलतो,आपण खोटं बोलतो,फसवतो आणि

कसलातरी घातही आपणाकडून होतो.
असं झाल्यावर कुणीही चिडून ओरडावं.उलट लागट बोलावं.पण कुणी माफी मागितली तर अस्वीकार करू नये.
कुणाशीही समझोता करणार नाही असं समज करून घेऊ नये.झिडकारू नये,टाळाटाळ करू नये,परित्याग करू नये.


सर्व कट्ट्या-बट्ट्यांचा आणि जशासतशाचा स्वीकार करून एकमेकासमोर बसून, कष्ट घेऊन, मोडलेलं दुरूस्त करावं.
अहमपणा गिळून टाकावा,दोन्ही हात दोन्ही बाजूला फैलावावेत आणि मनात जरा मऊपणा आणून,फारच लांबलं न जाण्याची खबरदारी घ्यावी.
कुणी जर का चुकलं माझं असं म्हणाल्यास माझंही चुकलं म्हणायला वेळ लावू नये.लाथा झाडाव्यात,श्वास कोंडून धरावा,मोठा गळा काढून ओरडून

घ्यावं,असं हे दुसर्‍याला समजेतोवर करावं पण शेवटी माफ करावं.


मला वाटतं,माफ करण्याची क्रिया माणसाकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.जेव्हा कुणी दुसर्‍याची माफी स्वीकारतं,वास्तवीक तुमच्यावर अन्याय

होऊनसुद्धा, तेव्हा उत्तमता आणि सभ्यता जी माणसाच्या मनात घर करून असते ती शांतीला आणि सद्भावनेला प्रोत्साहित करते.ज्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो.


तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगीतलं की,
"तू सर्वार्थाने झालेल्या गैरकृत्याच्या कट्ट्या-बट्ट्या मागे घेण्याची तयारी दाखवावी.आणि असं करूनही जर का तुझी बहिण तुझी माफी स्वीकारीत

नसेल तर तिने तुझ्याशी सर्व तर्‍हेनं जशास तसं करावं. पण हा निर्थक हट्ट सोडून द्यावा.
मोठ्या मुष्किल काळानंतर शेवटी त्या दोघांचा समझोता झाला एकदाचा."


तेव्हड्यात बंटी आणि केशवचा मुलगा हातात हात घालून आमच्या दोघां जवळ येऊन उभे राहिले.
मला हसू आवरेना,मी केशवला म्हणालो,
"लहान मुलांना कट्टी-बट्टी माहित आहे पण जशास-तसं माहित नाही हे बरं झालं नाहीतर तुझ्या पत्नीला पुन्हा एकदा फोनवर हे प्रकरण आणावं

लागलं असतं."




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 21, 2011

केल्यावीणा होणे नाही.




"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं,म्हणजे इतर निदान जगतील तरी."


अरूण मुळ कोकणातला.त्याच्या वडीलांची आणि माझी चांगलीच ओळख होती.कोकणातल्या एका खेडेगावात गरीब परिस्थितीत राहून हे कुटूंब आपली गुजराण करायचं.सुरवातीला अरूणचे वडील एका किराण्या व्यापार्‍याकडे कारकूनाचं काम करायचे.पेढीत बसून खरडे घाशी झाल्यानंतर त्यांना बाहेरची कामं पण करावी लागायची.ही कामं करायला त्यांना एक जुनी सायकल दिली होती.



अरूणला भावंडं बरीच होती.त्यामुळे एकटे कमवणारे अरूणचे वडील संसार सांभाळायला मेटाकुटीला यायचे.हे सर्व मला आठवलं जेव्हा माझी आणि अरूणची अलीकडे अर्नाळ्याजवळच्या एका गावात अचानक गाठ पडली.


त्याचं असं झालं,मी अर्नाळ्याजवळच्या एका गावात माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो.त्याच्या घरी गाण्याचा कार्यक्रम होता.दुसर्‍या दिवशी मी त्याच्याकडेच रहायला होतो.सकाळीच उठून आम्ही गावात जरा फेरफटका मारायला म्हणून निघालो होतो.
जाताना एक घर पाहिलं.घराच्या बाहेर अंगणात सुंदर फुलझाडांची बाग दिसली.निरनीराळी फुलं जरा जवळून पहावी म्हणून बागेच्या जवळ गेलो. घराच्या आत पडवीत बसलेले एक गृहस्थ आमच्याशी बोलायला म्हणून आमच्या जवळ आले.कसं कुणास ठाऊक मला त्यांनी ओळखलं.


मला म्हणाले,
"तुम्ही हसला त्यावेळी तुमच्या उजव्या गालावरच्या खळीकडे पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.
तुमच्यासारखे एक गृहस्थ आमच्या घरी यायचे.माझ्या बाबांची आणि त्यांची चांगलीच ओळख होती.
दुसरं कारण म्हणजे तुम्ही आता माझ्याशी चार शब्द बोलत होता तेव्हा तुमच्या बोललेल्या वाक्यात एक हेल येते. कोकणात त्याला हेळे काढून बोलणं म्हणातात तसं भासलं.तुम्ही कोकणातले आहात हे मी पक्क जाणलं.मी पण कोकणातलाच."


माझ्याही लक्षात आलं जेव्हा त्याने आपण अरूण म्हणून ओळख करून दिली.दुसर्‍या दिवशी मी त्याच्या घरी गेलो होतो.
जुन्या आठवणी निघाल्या.त्याचे आईबाबा केव्हाच गेले.अरूण एका नातेवाईकाच्या ओळखीने मुंबईत आला.दादरच्या किर्तीकर मार्केटमधे अरूणने एक दुकानाचा गाळा घेऊन, कोकणातले निरनीराळे मसाले,कुळथाची पीठी,थालीपीठाचं पीठ,आमसोलं,चिंचेचे गोळे,रातांब्याच्या बियांची मुठली असे जिन्नस प्रथम विकायचा.नंतर धंद्यात जम बसल्यावर आणखी गोष्टी दुकानात ठेवून विकायला लागला.
त्यातून थोडे पैसे कमवून लोन घेऊन त्याने अर्नाळ्याजवळच्या गावात हे घर घेतलं.
मला त्याची ही प्रगती बघून त्याचं खरोखरच कौतूक करावं असं वाटलं.
जुन्या आठवणी काढून डोळे ओले करून मला सांगत होता.


मला म्हणाला,
"अगदी साधं जीवन जगण्याच्या माझ्या प्रयत्नात मला ते जगणं सोपं जातं.आमच्या कुटूंबा्ची ती परंपरा आहे.माझ्या लहानपणी माझ्या आईवडीलांनी काढलेले ते गरिबीतले दिवस,जगायला आवश्यक लागणार्‍या गोष्टीही हिरावून घेतल्या जाव्या,ती परिस्थिती त्यांनी सहन करावी आणि कुटूंबातल्या सर्वांनी त्यागीवृत्तिने जीवन कंठावं अशा ह्या घटनांची चर्चा त्यांच्या तोंडून मी माझ्या लहानपणी ऐकल्या आहेत.


माझ्या वडीलांना नशिबाने एक काम मिळालं होतं.तिथे जाण्यासाठी चार मैल चालून जावं लागायचं.एस.टीचे पैसे वाचवण्यासाठी चालून जावं लागायचं.माझी आई तिच्या चहाच्या पेल्यात साखर घालायची नाही. उकळत्या पाण्यात चहा न घालता नुसती चमचाभर साखर घालून ते साखर पाणी चहा समजून आम्हाला प्यायला द्यायची.मासे मटण कधीतरी आणायचो.ठिगळ लावून शिवलेले कपडे माझी बहिण शाळेत जाताना घालायची. आणि मी ऐकलंय की माझी आजी रोज शेगडीत कोळसे मोजून घालायची.
तो काळ असा होता की जास्त करून घरीच रहायचं.जे काय आहे त्यावर जगायला शिकायचं आणि जे आहे ते असण्याबद्दल उपकृत रहायचं.



थोडे फार दिवस सुधारत आहेत असं वाटता वाटता वाढत्या महागाईला जेरीला येऊन पुन्हा कष्टाचे दिवस यायचे.आणखी त्याग करायची वेळ यायची. माझ्या वडीलानी एकच धोतर आणि एकच शर्ट कामावर जाताना वापरायचा.रात्री वरून उघडं आणि खाली पंचा नेसून झोपायचं.रात्री धोतर आणि शर्ट धुवून काढायचे.सकाळी सुकल्यावर ते घालायचे.त्यांच्याकडे एकच कोट होता.अशी बरीच वर्ष त्यांनी काढली.आई अजूनही तिच्या चहाच्या कपात साखर घालायची नाही.हळुहळु आम्ही सर्व शाकाहारी झालो.बहिणीच्या शाळेतल्या मैत्रीणीने जुने झालेले तिचे कपडे तिला दिल्याने ती ते कपडे घालून शाळेत जायची.माझंही तसंच व्हायचं.घरात एक सायकल होती पण तिचे टायर्स खराब झाले होते.त्यामुळे मी कुठेही बाहेर न जाता घरीच रहायचो.
ह्या गरिबीच्या दिवसानी आम्हाला खूप शिकवलं.आणि अद्यापपावेतो ते मला शिकवीत आहेत.



माझ्या आईने सफेद जाजमावर लिहून त्याचे फलक करून आमच्या बाहेरच्या खोलीत टांगले होते.जीवन जगण्यासाठी ते तिचं चिंतन होतं.

आहे त्याचा वापर करावा.

जमे तोपर्यंत वापर करावा.

केल्यावीणा होणे नाही

नाहीतर

नसल्यास काम चालवून घ्यावे.

असे आम्ही जगत होतो.आज मी एक लहानसं घर घेतलं आहे.मागे छोटसं अंगण आहे.त्यात थोडा भाजीपाला तयार करतो.कुठेही चालत जाण्याचाच प्रयत्न करतो.नाहीतर बस घेतो.बर्‍याचश्या गोष्टी जमतील तेव्हड्या परत परत वापरतो.


ह्या देशात असे अनेक लोक आहेत की जे पैशाच्या विवंचना करीत बसत नाहीत.अर्थात सगळेच काही नाहीत.
ह्या देशात गरिबी आणि नैराश्य दावणीला धरून आहे.माझ्या घरात आमचं ब्रीदवाक्य म्हणजे,
"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं म्हणजे इतर निदान जगतील तरी."
माझ्या आईची शिकवणूक अजून माझ्या निवडीला मार्ग दाखवते.


मला वाटतं माझ्या ह्या प्रयत्नाने दुर्लभ गोष्टी इतराना तरी मिळतील.जे माझ्या जवळ नशिबाने आहे त्यातून इतराना नक्कीच फरक पडेल.मी करीत असलेले लहानसे प्रयत्न दुसर्‍या कुणात मोठा फरक पाडील."


मला हे सर्व ऐकून अरूणबद्दल खूप आदर वाटला.सच्चाईने जगण्यातली मजा औरच असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com