Thursday, December 20, 2007

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं


नांव "सागर" ,पण खरंच सागरा सारखा विशाल होता.मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता.आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला.
म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा आवडला होता का?.मग ह्या नावडत्या दुनियेत त्याला त्याने मुळात पाठवलंच कशाला?.कां त्याच्या आईला अगोदरच कमी का दुःखं होती?.
बिच्याऱ्याचे वडील तो खूपच लहान असताना त्याला सोडून गेले.एक त्याला धाकटी बहिण मागे ठेवून गेले. प्रकृती अस्वाथ्यामुळे त्याच्या आईला अगोदर पासून झटपट हालचालीची मुभा कमी होती.तशातही तिने आपल्या दोन मुलांना अगदी कष्ट काढून वर आणलं. आणि दोन्ही मुलांना चांगलं शिकवून त्यांची लग्नं करून देवून नुकतेच कुठं स्वतःच्या असहकार्य करणाऱ्या प्रकृतीला, उतार वयांत दोन हात करून राहाण्याचं आयुष्य हंसतमुखाने जगत होती.
म्हणतात ना "दुःख पर्वता एव्हडे,सुख जवा पाडे" तेच खरं.
"१५७ क्यांप बेळगांव" ह्या याहूच्या ग्रुपईमेलवर जसा तो होता तसा मी पण सभासद होतो.त्या एकट्याने हा ग्रुप जीवंत ठेवला होता.मला त्याची बरेच वेळा ईमेल यायची.अनेकदां "सूर्य,चंद्र,तारे आणी चांदण्या" वर त्याच्या ईमेल असायच्या.मग ती एखादी कविता असेल किंवा एखादी सनसनाटी बातमी असेल.वाचून खूप आनंद व्हायचा.तसंच कधीतरी त्याची ईमेल बरेच दिवस आली नाही तर मी त्याला आठवण करण्यासाठी लिहीत असे अन त्या ईमेलच्या sub मधे मुद्दाम "सागरा प्राण तळमळला" असे लिहायचो,लगेचच तो कळवायचा "काका सॉरी, मी थोडा बिझी होतो" आणि पुढच्या वाक्यात "I know you will write to me next time 'that's ok' " .मनात येतं एव्हडे त्याला सूर्य,चंद्र, तारे आवडत होते म्हणून का त्यांच्यात सामील व्हायला एव्हडी घाई करून गेला.अन मग मान उचलून आकाशाकडे पहायला मन होत नाही.खरंच तो जर दिसला तर ओरडून जरी त्याला सांगितल "सागरा प्राण तळमळला" तर त्याला कळायचं कसं?.
कधी कधी वाटतं,आपल्या जवळच्याला थोडीशी पैशाची जरूरी आहे हे पाहून आपण खिशात हात घालून असतील तेव्हडे पैसे त्याच्या हातात ठेवतो, तसंच खिशात हात घालून आपल्याकडचं आयुष्य देता आलं असतं तर? हे "हिरवं पान " गळून पडूं न देता,आमच्या सारखं " पिकलं पान " गळून पडलं असतं तर काय हरकत असती?"
ईश्वर ईच्छा बली असे" हेच खरं
"ईश्वर आत्म्याला शांती देवो" असं मला त्याला म्हणायची पाळी यावी हे माझं केवढं दुर्भाग्य?

श्रीक्रृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

नियत जनांची खरी नसे

नियत जनांची खरी नसे


ह्या चंचल चंगळ दुनियेमधे
नजर जनांची सरळ नसे
करून नखरे निघू नकोस
ईमान तयांचे खरे नसे

खुळे असे हे मन मोठे
छेडुनी होईल ते खोटे
करून तुझ्याशी छेडाछेडी
नियत तयाची खरी नसे

लज्जे मधुनी पदर सावरी
ही प्रेमगीते नसती खरी
लाटातून सावर नाव तुझी
नियत तुफानी खरी नसे

निरोप तुझा मी घेऊ कसा
कुणवर विश्वास ठेऊ कसा
लपून जा माझ्या नयनी
नियत जनांची खरी नसे
ह्या चंचल चंगळ दुनियेमधे
नजर जनांची सरळ नसे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

असे ही अपुली एक कहाणी

असे ही अपुली फक्त कहाणी


हे गीत प्रीतीचे
ही खैरात लाटांची
नसे हे जीवन अन्य काही
असे ही अपुली फक्त कहाणी

काही मिळवून गमवावे
काही गमवून मिळवावे
असे अर्थ जीवनाचा
येवून जाण्याचा
दोन घडीच्या जीवनातून
आयुष्य प्राप्त करण्याचा

तू प्रवाह नदीचा
मी किनारा तुझा
मी सहारा तुझा
तू सहारा माझा
असे नयनात सागर
पाणावलेल्या आशेचा

हवा वादळी येणार
येऊन ती जाणार
ढग येई क्षणभर
कोसळून जाई नंतर
सावल्या आडोसा घेती
निशाणी ठेवून जाती

जे देई मना शांती
असावी जवळ ती कृती
श्वास कोंडण्या आदी
आवाजा मिळो संधी
होवो आनंदाची बरसात
अन अश्रुंची खैरात
नसे हे जीवन अन्य काही
असे ही अपुली फक्त कहाणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 18, 2007

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीशी नुसता बहाणा
ऐकून हे
मकर्ट म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Thursday, December 13, 2007

नेती नाव जेवनाची तुफानाकडे

नेती नाव जीवनाची तुफानाकडे

भेटती जीवनी अनेक भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे
होती परवाने प्रभावी
ज्योतीमुळे
म्हणती ते भोळे मनात
गुजरेल आयुष्य या ईथेच

परी पाहुणे
वाटे परवान्याला जाऊनी
प्रभावी ज्योतीच्या
गुजरेल आयुष्य ईथे
वाटे त्या भोळ्याला
पाहुणे असती फक्त
एकच रात्रीचे
भेटती जीवनी अनेक भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे

सर्वच सोहळ्यामधे प्रीती
होत नसे जणू ज्योती
सर्वच सुंदरीचे नयन
न करीती ईतरां घायाळ
असती जे दैववान
होती तेच कुर्बान
भेटती जीवनी अनेक हे भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे

बुडुनी दूर सागरात
करीती ईशारा किनाऱ्याला
लाऊनी गुपचुप आग
तमाशा दाविती पहाणाऱ्याला
करूनी स्वतःचा तमाशा
का धरिता राग
भेटती जीवनी अनेक हे भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

सबनीसाचा वसंता

सबनीसांचा वसंताआम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणून हांक ऐकण्याची संवय झाली होती.हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत.सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.ग्रॅन्टरोड परीसरात कुडाळदेशकर निवासातल्या एका चाळीत वडीलांच्या ओळीखीने त्याची सोय झाली होती.सोय कसली त्यांच्या खोलीच्या समोरच्या व्हरांड्यात एक माणूस झोपेल एव्हडी जागा त्याला झोपायला मिळाली होती.पहाट झाल्यावर लोकांची व्हरांड्यात जाययायची वर्दळ चालू झाल्यावर सबसनीसला झक्कत उठावं लागायचं.बिछान्याची वळकटी करून घरातल्या आतल्या खोलीतल्या पोटमाळयावर ठेवून द्दयावी लागायची.बिछाना कसला एका मोठ्या गोणपाटाच्या कपडयावर एक सोलापुरची चादर पसरून उशाला अशीच एक गुंडाळलेली जुन्या चादरीची वळकटी आणि पांघरायला एक पातळशी चादर हाच बिछाना असायचा.उठल्यावर लगेचच खाली जायच्या जिन्याच्या लगत असणाऱ्या सामुदायीक संडास बाथरूमच्या जागेकडे धांव घ्यावी लागायची. कारण सकाळच्या घाईत तिकडे कोण गर्दी असायची,लाईन लावण्याला पर्याय नसायचा.न विसरता तंबाखूची "मशेरी" डाव्या हातावर घेऊन उजव्या हाताचं निर्देशक बोट त्यावर लावून दांतावर चोळता चोळता उरलेल्या उजव्या हातांच्या बोटांच्या आधाराचा उपयोग करून "टंबलेर" उचलून, बगलेत चटयापटयाची अंडरवेअर घेऊन रांगेत उभं राहाण्याच्या सहजगत्या होणाऱ्या त्याच्या क्रियेत कधीच खंड पडला नाही. आंघोळीसकट सर्व नैसर्गिक क्रिया संपल्यावर खोलीकडे धांव घेऊन खाटेखालची ट्रंक ओढून त्यातला परीटघडीचा शर्ट आणी प्यॅन्ट काढून केसावर सुगंधी तेल चोपडून केसाचा कोंबडा काढून, झाल्यावर कांता सेंट मानेवर फासून,इंन्स्युरन्स एजंट घेतो तशी ब्रीफकेस उजव्या हातात घेउन (असल्या ब्यॅगेला तो "डुक्कर " म्हणायचा) स्वारी ग्रॅन्टरोड,चर्नीरोडच्या नाक्यावरच्या ईराण्याच्या हॉटेलात जाऊन "ब्रुनमस्का पाव आणि पाणी कम चहा" ढोसून खाडिलकर रोड वरच्या मधेच उभ्या असलेल्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरच्या "बहिऱ्या मुक्याच्या" शाळेत चालत जायचा.ही शाळा मेढेकर नावाच्या सदगृह्स्थानी स्थापन केलेली होती.ते स्वतः असल्या मुलांना खुणेच्या भाषेत शिक्षण देत असत.जवळपासच्या लोकांची मुलं ह्या शाळेत येत असत.मधू सामंताच्या ओळखीने सबनीसला ह्या शाळेत कारकून-वजा पैसे कलेक्ट करण्याची नोकरी मिळाली होती.शाळेला मुलांच्या आईवडीलांकडून मासीक फी मिळायचीच पण त्याशिवाय सबनीसला श्रीमंताकडून देणगी आणण्याचं काम दिलं होतं.वार्षीक देणग्या वसूल करण्याचं काम होतंच,त्याशिवाय नविन देणग्याची पण वाढ करण्याचं काम सबनीसला करावं लागायचं.ह्या असल्या कामामुळे पुढे सबसनीसला " व्हेनीशन ब्लाइंडसची " ऑर्डर घेऊन विकण्याचा आणखी एक धंदा करण्याचं काम माझ्या ओळखीच्या माणसाकडून मी त्याला दिलं होतं,त्याचा उपयोग पुढं संसार सांभाळताना त्याला झाला. फोर्टविभागात हिंडून फिरून शाळेचं काम करीत असताना मोठमोठया कंपनींच्या ऑफिसच्या खिडक्यांना व्हेनीशन ब्लाइंडस (त्याला सबनीस "पडदे" म्हणायचा) विकण्याच्या ऑर्डरी घ्यायचाच पण दुपारची जेवणाची वेळ झाल्यावर, कुठेही असला तरी खोताच्या वाडीतल्या "अनंताश्रमात " जेवायला यायला चुकत नसे.रात्रीच्या वेळी सुद्धा तिथंच जेवायला जायचा "बाबारे,दोन वेळच्या अन्नात चालढकल करणं योग्य नाही आधी प्रकृती मग सगळी सोंग"असं मला म्हणायचा.खाणावळीत जेवताना सुद्धा त्याची जेवणात काटकसर नसायची.चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या आणि लाल भडक कोकमाचं सार ( तो सोल कढी म्हणायचा) हा त्याचा सकाळचा आहार आणि रात्री परत माशाच्या डीश, फक्त फरक मग तिसऱ्याची आमटी पापलेटची तळलेली कापं , किंवा कुर्ल्याचे सुकं त्याला चालायचं.
दिवस निघून गेले. सडेफटींग रहाणं किती दिवस चालणार.नाडकर्ण्याच्या मुलीची लग्नाची ऑफर आली तेव्हां कसलेच चोचले न करता सबनीस लग्नाला तयार झाला.आता जागेची पंचाईत आली."सद्दयाच्या जागेत दिवस असला तरी बत्ती लावावी लागायची एव्हडा घरात काळोख,लाईट गेल्यावर दिवसा सुद्धा माणसाला माणूस दिसत नाही, चुकून हात उचलला तर कुणाच्या थोबाडात बसायची. तरूणपणात एव्हडा आजार येत नाही पण आता जरा "नज" आलं तर कुठे लेटणार ? " म्हणून सबनीस आता गोरेगावात जागा शोधायला दर शनवारी आणि रविवारी तिकडे जायचा. एव्हडी पगडी द्दयाला कोणाकडे पैसे आहेत.शाळे कडून कितीसे लोन मिळणार ह्या विचारात त्याने तीन महिन्याच्या डिपॉझीटवर एका भय्याच्या चाळीत जागा घेण्याचे अगदी नक्की केलं आणि मला दाखवायला एकदा घेऊन गेला." सबनीस आपण पांढरपेशे लोक उद्दया तुम्ही नाडकर्ण्याच्या मुलीशी लग्न करणार,दिवसभर तुम्ही कामासाठी सकाळी निघून रात्री घरी येणार,पड्द्दयाच्या ऑरडरी घेता घेता घरी आल्यावर बायको तुम्हाला म्हणणार"पडदेमे रहने दोपडदा न उठावोपडदा जो उठजायेगातो वंसता मेरी तोबावंसता मेरी तोबा "ह्यावर सबसनीस एव्हडा हंसला की विचारू नका.खरं तर सबनीसचं हंसणं अगदी सात मजली असायचं."हो,हो,हो " म्हणून सुरवात झाल्यावर शेवटी " खो, खो ,खो " करून खोकला संपल्यावर त्यांच हंसणं बंद झालं अस समजायचं.माझ्या वरील विनोदी उक्तीचा अर्थ न कळण्या इतका सबनीस बुद्दु नव्हता.नंतर गोरेगावातच पांडुरंगवाडीत त्याना एका पांढरपेशे रहात असलेल्या बिल्डींग मधे थोडे जास्त पैसे देऊन दोन खोल्यांची जागा मिळाली. सबनीसाने तिथं आपला संसार थाटला.त्याना एक मुलगी पण झाली.रोजची आठ बाराची गोरेगाव लोकल पकडून जाणं आणि संध्याकाळी पाच दहाची गोरेगाव स्पेशल पकडून घरी येणं हा नियमीत कार्यक्रम झाला.बायकोने त्याला सिगरेट ओढण्याची संवय बंद करायला लावली.ह्यापुढं सात मजली फक्त हंसणं, नंतरचे खोकणं नाही. अलिकडे बरीच वर्षे झाली.इकडे आल्यावर सबनीसची खबर नाही. "सबनीसच्या मुलीचं लग्न झालं सबनीस आता आजोबापण झाला.आता सबनीस "डुक्कर" हातात घेऊन लोकल पकडायला जात नाही.त्याच्या मुलीनेच त्याला निवृत्त व्हायला लावलं."असं कुणीतरी मला सांगितलं.हल्लीच माझी एका कॉमन मित्राची आणि माझी भेट झाली.तो म्हणाला "सबनीस आता खूप थकला आहे.ही वामन मुर्ती हातात काठी घेऊन, डोक्यावर कानटोपी घालून, अंगात एक मिलट्रीचा खाकी स्वेटर,दांत सर्व काढलेले पण तोंडात कवळी न घालता, संध्याकाळच्या थंड हवेचा अविर्भाव आणून आल्या गेल्याकडे रसत्यात उभं राहून बोलण्यात वेळ घालवत असतो.माझी भेट झाल्यावर मला म्हणाला "सामंताना कधीतरी इकडे या म्हणावं डोळे भरून बघीन असं झालं आहे"हे ऐकून मला पण खूप गहिवरून आलं.पण खरं सांगू का,ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला पाहिलेल्या मला आता आयाळ विरहीत आणि दात पडलेल्या सिंव्हाला पाहायला कसंसंच वाटतं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Saturday, December 8, 2007

कोचऱ्याची लिलू

कोचऱ्याची लिलू
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्यादिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली."अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर"असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळखपटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकली कॉलर,हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो "अगं तू वकील केव्हां झालीस ?" "असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते"कोचऱ्याला माझ्या वहिनीच्या माहेरचे कोचरेकर त्यांची ही शेजारीण होती. लहानपणी मी वहिनीबरोबर तिच्या माहेरी जात असे.तिथून माझी ह्या कोचरेकर मंडळीशी ओळख होती."ये रे माझ्या घरी कधीतरी week end ला" लिलू म्हणाली. "पुढच्याच week end ला ये,Father's day आहे नाही का? " मी हो म्हटलं आणि मी तिला"बरंय" म्हणून पुढच्या कामाला गेलो.ती गिरगांवात राहात होती.तिने मला तिचा पत्ता पण दिला.त्या दिवशी मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा घरी तिची मुलगी होती.नवरा फिरतीवर दिल्लीला गेला होता.लिलूने अनंताश्रमातून दुपारच्या जेवणाची order दिली होती.मला काय आवडतं ते तिला माहित होतं.तिसऱ्याचं सुकं,बांगड्याचं तिखलं, पापलेटची आमटी, तळलेलीसरंग्याची कापं, आणि लाल सोलाची सोलकढी एव्ह्यडे जिन्नस होते.भात मात्र घरीच केला होता,मला मास्यांचे जेवण असताना भात खूप लागतो हे पण तिच्या लक्षात होतं."सगळं जेवण तयार आहे ,दोन वाजता जेवूया" ती म्हणाली.आणि कप,कप चहावर आमच्या जुन्या आठवणी काढून गजाली (गोष्टी) चालू झाल्या."आईवडील कसे आहेत ?" हया माझ्या प्रश्नावर तिनेच सुरवात केली ती संपेपर्यंत जेवण केव्हा झालं आणि बाहेर अंधार केव्हां झाला हे आंम्हाला कळलंच नाही.माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना ती बोलत होती, आणि मी फक्त ऐकत होतो.Father's day असल्याने तिने वडिलांचाच विषय चालू केला."माझ्या पन्नांसाव्या जन्मदिवशी माझ्या वडिलानी मला एक अजोड किंमतीची भेट देउन गेले.ते त्याच दिवशी वारले रे""त्यांच्या मरणशैयेवरून मला त्यानी माझ्या आयुष्याचा एक अनमोल धडा शिकवून गेले.त्यांच्या ८६ व्या जन्मदिवसाच्या तीन आठवडे आधी त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे डॉक्टरनी आम्हाला सांगितलं.तीन आठवड्यानंतर ते गेले.आता पर्यंतच्या आयुष्याच्या वागण्याच्या त्यांच्यापद्धतीनुसार, ह्याही गोष्टीचा जणू ताबा घेउन त्यांच्या ईच्छेप्रमाणे ते गेले.उरलेल्या आम्हा सर्वांच्या ईच्छेप्रमाणे ते घरीच गेले.त्याच प्रसंगी मी माझ्या आईवडीलांच्या खोलीत बसले असता त्यांच्या उभ्या आयुष्याचा मागोवा मी घेत असल्याचे जाणवून किती कणखर आणि किती यशस्वी त्यांचं आयुष्य होते, हे मी त्यांचं मुल म्हणून माझ्या लक्षांत आलं. माझ्या वडिलानी आपल्या बायको आणि आम्हा तीन मुलांची काळजी घेण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करीत असताना, ईतर सगळ्या जवळच्याना दुखवले होते. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या खोलीत दुखावलेल्या जवळच्यांची लागलेली रीघ बघून, जणू विमान अपघात होवून खाली पडलेल्या सांगाड्याकडे पहात असलेल्या, वाचलेल्या प्रवाशासारखी माझी दैना झाली होती.
माझे वडील एक नामांकीत लेखक,असून माझे डोळे दिपून जातील एव्हडे चातुर्यवान,अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान असून सुद्धा त्यांच्यात एक खोट होती, हे मला कित्येक वर्षापासून माहीत होतं.त्यानी त्यांच्या नेहमीच्या हताश मनस्थीतून निर्माण होण्याऱ्या उद्वेगावर (रागावर),कसलीच डॉक्टरी मदत घेतली नाही.त्याना असे निक्षून सांगण्याचे कुणालाही धारीष्ट झालं नाही कीे,"वेळीच मदत घ्या अथवा कुटुंबाला मुकाल"
त्यांच्या मृत्युशय्येवरून त्यांनी मला जी गोष्ट शिकवली ती ते वडीलधारक असूनही शिकू शकले नाहीत.कुटुंबियांशी प्रेमळपणे राहायचं असेल तर स्वतःच्या तृटीशी अणि स्वतःच्या चुकांशी दोन हात केल्याविना गत्यंतर नाही."
हे सर्व ऐकत असता चवदार मासे केव्हा फस्त झाले हे कळलंच नाही.जेवण संपल्यावर हात धूउन उठल्यावर लिलूने सर्व आवरून घेउन मसालेदार पान माझ्या हातात आणून दिलं.मासे खाल्यावर मला पान लागतं ते पण तिला आठवलं. "मी माझ्या वडिलावर अत्यंत प्रेम केलं.मी सहा वर्षाची असताना पहिली गोष्ट लिहीली कारण ते माझे गुरू होते म्हणून.मी भावंडात शेंडेफळ असल्याने बरेच वेळा मला त्यानी फुरसद दिली,विनोदी वृत्तीने राहीले आणि बुद्धिपुरस्सर धडे दिले, हे सर्व ते माझ्या मोठ्या भावंडाना देउ शकले नाहीत.
आमच्या घराल्या ह्या पद्धतीला "कोकणी वृती "असं गमंतीने म्हटलं जाई.माझ्या वडीलांच्या रागाचे वादळ शांत झाल्यावर, आमची आई आश्वासन देउन म्हणायची "मी खात्रीने सांगते ते रागाबरोबर बोलले जरी, तरी त्यांचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे"एकदा त्यांचा आरडाओरडीचा ओघ कमी कमी झाल्यावरते मंद्र्सप्तकात आवाज आणून हळू हळू पश्चातापाने दिलासा देत देत पुन्हा असं न होण्याचा जणू आश्वासानच देत असत.खूप वर्षानंतर मला समज येउन खरं वाटू लागलं की, माझे वडील एक उपचार न झालेले रागीष्टविकारी असून, त्यांचा अविचारी राग आणि चांगली मनसथिती ह्याचं दोलायमान आमच्या आईच्या आणि आम्हा तीन मुलांच्या मनाची स्थितीची, चलबिचलते मुळे चाळण व्हायची,आणि त्यांच्या अनिश्चीत रागीटपणामुळे ती स्थिती मनासिक धक्क्यात परिवर्तीत व्हायची."
दुपारचे चार वाजले.लिलूने आपली कथा जरा आवरती घेउन मला म्हणाली "तू खरोखरच बोर झाला असणार,मी थोडा चहा करते" असे म्हणून ती चहा करायला गेली,आणि मला पण बाथरूममधे जाउन fresh व्हायची संधी मिळाली.चहाचा कप पुढे करीत ती म्हणाली "मी कुठे थांबली होते?हां,हां लक्षात आलं "असं म्हणून मी उत्तर देण्यापुर्वीच तिने पुढे सुरवात केली" रागीष्टविकारी" असे मी त्याना मघाशी म्हणाले त्याचा अर्थ ते जसा एखादा, रागाच्याभारात violent होवून खिडक्यांच्या कांचा फोडतो तसे काहिही करीत नव्हते.एखादी माझ्या वडीलांसारखी व्यक्ति जिच्या वागण्याची परिणीती रोजच्या अडचणी आणि हताश परिस्थिती पाहून, उद्बेग करण्यात आणि माथेफीरू होण्यात आपोआप होते,तेव्हा अशा व्यक्तिला मनोवैज्ञानीक "dry drunks" अशा सज्ञेत वर्णन करतात.पुष्कळदा बाहेरच्या जगात असे लोक आपला राग आणि चीडखोरपणा आवरून घेतात,परंतु घरच्या चार भिंतीत मात्र ते उचंबळून येतात.उलट अर्थी माझे वडील खऱ्या संकटकाळीक्वचीतच तोंडाळपणा करीत.पण ते केव्हा फिरतील हे आम्हा घरच्या मंडळीना सांगणं कठीण व्हायचं.अगदी जसंएखाद्दया दारू पिणाऱ्याच्या घरच्या मंडळीना, सामोरे केव्हा जावं लागेल हे समजत नाही तसं.आणि म्हणून घरचे आम्ही सतत नवीन संकटाचे तुफान न येण्यासाठी सतर्क राहून त्यांना उददिपन होईल असे कारण देत नसू.
आमच्या घरात आम्ही चलबीचल स्थितित असणे हे आम्ही ओघानेच शिकलो होतो.जस जशी मी वयाने वाढत गेले तस तशी ह्या संवयीतून, सुटका करण्यासाठी मी माझ्या असल्या स्वभावाच्या वडीलांबद्दल ठार प्रामाणिक असायची.त्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटका झाली तरी, त्यांच्या रागीष्टपणामुळे संकटाला तोंड द्दयायला मी असमर्थ झाली. आणि हे सगळं त्या तीन आठवडे त्यांच्यामृत्युशैयेवर असताना माझ्या त्यांच्या सहवासात राहीलेल्या अनुभवाच्या सत्यतेची जाणीव होई तोपर्यंत असम्रर्थ होते.माझ्या थोड्याश्याच जवळच्यानी त्यांच्या डोळ्यानी टीपलेले त्या प्रसंगाचे सत्य जणू, मला सांगत होते की उपचार न झालेला ह्या माझ्या वडीलांचा रागीष्ट विकाराने, घरातल्या ईतर सर्वांवर भावनीक आघात नव्हे तर शारिरीक आघात सुद्धा होऊन, त्या सर्वांच्या मनाला लूळं करून टाकलं आहे.आमची आई, माझ्या वडीलांची विश्वासू पत्नी,मानसिक आघाताच्या ओझ्याखाली झालेल्या मूळ कारणानी, आतापावेतो अगणित शारिरीक विकृत्यानी अंथरूणाला खिळली होती.तिच्या जवळ जवळ पुऱ्या तरूण वयातलं जीवन तिने त्यांचा सततचा चीडचीडेपणा आणि बोंबाटूनटाकलेल्या, आवाजाची ओरड आणि टिका झेलीत घालवलं होतं.हे दृश्य अचल असायचं.मानहानीची तिच्यावर खैरातकरून झाल्यावर,आपल्या कमकुवतेची ते तिला कबुली देत,दयेचा आणि भेटींचा जणू पाऊस पाडीत,आई त्यांनाचुचकारून समजावी आणि मोठया मनाने समजून घेई.हिच त्यांची एकमेकावर प्रेम करण्याची रीत असायची."
लिलूच्या लक्षात आलं की sweet dish म्हणून तिने ताजे बेसनचे लाडू माझ्यासाठी केले होते मला हे लाडू आवडतात हे पण तिच्या आठवणीत होतं."अरे मी माझी ही कर्मकथा सांगता सांगता बेसनचे ताजे लाडू तुझ्यासाठी केलेत ते द्दयायला विसरले बघ.कप कप चहापण करते"असे म्हणून ती आत गेली,माझी स्थिती "आंधळा मागतो....." अशी झाली.जरा पाय मोकळे करण्यासाठी तोवर उठून गॅलरीत fresh हवा घेण्यासाठी म्हणून गेलो.
गरम गरम चहा आणि पिवळे जर्द बेसनचे चार लाडू घेऊन लिलू बाहेर आली.आणि पुढ्चे कथानक तिने चालू केलं." वय वाढत जाता जाता माझ्या आईचे स्नायू आणि पोट जणू गाठावले होते.डॉक्टर म्हणाले, stess मुळे तिने हळू हळू मृत्युची वाट धरली आहे.माझा भाऊपण मधुमेयाने आणि parkinson disease मुळे अपंगावस्तेत होता.परंतु,मला जे आठवतं त्यानुसार तो भावनिक अपंग होता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास गमवल्यामुळे पंगु झाला होता.जर का जीवन हे एक lottery आहे असं समजल्यास, माझ्या भावाजवळ बक्षिस न मिळणारं तिकीट होतं.माझा भाऊ माझ्या वडीलांची स्वप्नपुर्ती करायला असम्रर्थठरला.त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.पण प्रेमाचा त्यांचाअर्थ सतत एखाद्दयाच्या मागे लागणं!आणि त्यामुळे त्याचा शेवट स्वतःला कमी लेखण्यात झाला.त्याच कधीलग्न झालं नाही, नाही तो आयुष्यात काही बनू शकला,आणि शेवटी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, एक अपंग म्हणून एका नर्सिंग होममधे जीवन कंठीत होता.
माझ्या भावाच्या तुलनेत माझी मोठी बहिण त्यामानाने एक सुखी जीवन जगत होती.पण त्याचं कारण ती माझ्या वडीलांपासून दूर होती. जवळ जवळ तिचे त्यांच्याशी संबंधच तुटले होते.त्यामुळे त्यांच्या शेवटच्यादिवसात तिन मुलांपैकी एकच मुल (मी) त्यांच्या जवळहजर होतं.
जसजसं माझे वडील अगणित मानसिक आणि शारिरीकवेदनेतून मृत्युच्या दिशेने प्रवासास लागले होते,तसतसं माझ्या मनात वरचेवर डोकावणारा एक विचार उचल खात होता.तो म्हणजे हा त्यांचा दुःखित अंत, स्वतःच्या आणि ईतरांच्या जीविताला निष्फळ करून आणि हानी देऊन, जात असताना माझ्या वडीलाना वेळीच उपचार मिळाले असते, तर हे स्रर्व टाळता आलं असतं.
अगदी अलिकडे अलिकडे समाजाने दारू पिणाऱ्या व्यसनी व्यक्तिंची जोरात पसरणारी समस्या असल्याचे स्विकारून, ती त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबियाना पण खाईत लोटू शकते, असे मत केले आहे.आणि त्या व्यक्तीला उपचार करून बरं करता येतं हे पण मानलं आहे. त्याशिवाय संस्था पण अस्तितवात आहेत, की ज्या ह्या समस्येचा अभ्यास करून कुटुंबे दोन हात करून कसं सईसलामत सोडवणूक करून घ्यायचं हे पण शिकली आहेत,परंतु रागीष्टपणाच्या विकारावर असले काही उपाय अजून प्राप्त झालेले नाहीत.उलट हा रागीष्टपणा म्हणजे एक व्यक्तिगत स्वाभाविक दर्गूण आहे, असं समजून उघड पणे बाजूला सारून, त्याची परिणीती अन्यायात होत असावी, अशा निष्कर्षाला आणलं आहे.
खूप उशीर झाल्याने मी लिलूची रजा घेतली,पण" उरलेली तुझी कथा ऐकण्यास पुढच्या आठवड्यात नक्की येतो" असे आश्वासन देऊन मी तिला हिरमुसली करून जात आहे हे लक्षात आल्यावर "तुझ्या कथेचा शेवट कसा झाला आणि यातून काही तरी चांगलं नक्कीच ऐकायला मिळणार" असा आशावाद ठेवून मी घरी परतलो.
पुढच्या weekend ला मी तिला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी चहाच्यावेळी येईन.आणि त्याप्रमाणे मी तिला भेटलो.मला पाहून तिचा चेहरा खूपच आनंदी दिसला.कदाचित माझ्या येण्याने तिला मी आनंदी करू शकलो ह्याने मला फार बरं वाटलं.
ईकड्च्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,ती मुळ पदावर आली.मला म्हणाली" शाब्दिक मार जखमेच्या खूणा दाखवित नाही.झालेले नुकसान अद्रुश्य असतं.जर का शारिरीक नुकसान झालं नसेल तर डॉक्टरपण मुद्दाम म्हणून लक्ष घालीत नाहीत,जोपर्यंत रुग्ण त्याची मदत मागत नाही तोपर्यंत.खूपदा मी आणि माझी आई माझ्यावडीलाना तपासून घ्या म्हणून मागे लागत असू,पण त्यानी कधीही त्या म्हणण्याला भिक घातली नाही.
एकदा आमच्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की आमच्या आईची प्रकृती दिवसे दिवस खालावत जाण्याचे कारण मुख्यतः आमच्या वडीलांचा तिच्यावर होणारा शाब्दिक अत्याचार हा आहे.आणि जेव्हा आम्ही त्यांना, वडीलाना उपचार देण्याची विनंती केली,त्यावर त्यानी हाउतार वयातला प्रॉब्लेम असून ते स्वतः त्यांच्याकडे तपासायला आल्याशिवाय उपचार करणे शक्य होणार नाही असं म्हणाले.गेल्या वर्षभरात मी मनोवैदज्ञानीक तज्ञाना भेटून वडीलानाउपचार देण्याचा प्रयत्न केला.हा काही असंभवनीय विकार नाही असं बऱ्याच तज्ञाचं मत होतं.शब्दिक अत्याचार हा शारिरीक अत्याचारापेक्षा गंभीर असून त्याचे दूरवर परिणाम होतात."
परत एकदा चहा करण्याच्या कारणानी लिलू उठली आणि तो घेउन, आल्यावर पुढे म्हणाली ते मला खूपच धक्कादायक वाटलं."माझे वडील निर्वतल्या नंतर तीन महिन्यानी माझी आई गेली.मी ईच्छित होते की निदान ते गेल्यानंतर तरी शाब्दिक अत्याचाराविना ती उरलेले आयुष्य आनंदात घालविल, हे माझे फक्त मनोरथच ठरले."" ६३ वर्षांचं त्या दोघांचं आयुष्य एकमेकाशी कमालीचं गुंतलेलं होतं.अगदी तसंच माझ्या भावाचं भविष्य पण.माझ्या वडीलांच्या पहिल्या डेथ ऍनिव्हर्सरी नंतर अवघ्या पांच दिवसानी माझा भाऊ गेला.माझ्या वडीलानी त्यांच्या पश्चात एक संपन्न पायंडा मलाठेऊन गेले.धड्यांचे भांडार की जे माझ्या अर्ध्या उरलेल्याआयुष्यासाठी उपयोगी पडावं.
वर्षापूर्वी मी आईवडीलांच्या खोलीत बसले असताना एक संपल्क ठरवून ठेवला. काही लागेल ते लागो ह्या पुढे असा प्रकार माझ्या पिढीत किंवा माझ्या नंतरच्या पिढीत तरी रीपीट होऊ नये.गेलं अख्खं वर्ष मी आमच्या या कुटुंबात आलेल्या ह्या चमत्कारीत पर्वा बद्दल खूप विचार करून मी अशा निर्णयाला आली, की असल्या पर्वाने जर सर्वांना त्रास होत असेल तर ताबडतोब उपचार केल्याशिवाय तरणोपाय नाही.एकदा एका मनोवैज्ञानीकाला माझ्या आई,वडिल आणि भावाचे फोटो दाखवले ते पाहून तो पटकन म्हणाला ह्यांच्या कुणाच्याच तोंडावर हंसं नाही. ते सर्व दिसतात depressed,depressed आणि depressed.आता पर्यंत तिची ही सर्व कथा निपूटपणे एकून घेत असता कुठेही तिला अटकळ केली नाही,हे लक्षात आल्यावर लिलू मला म्हणाली" हे सर्व ऐकून तुझ्या मनात एखादा प्रश्न आला असेलच अशी मी अपेक्षा करते."त्यावर मी म्हणालो हो "मला एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे झालं ते झालं आता पुढे काय? "हे ऐकून तिला खूपच गहिवरून आलं.
डोळ्यात पाणी आणून म्हणाली " मी मेल्यावर माझ्या कुटुंबाचा आलबम पाहून निराळीच गोष्ट लक्षात आली पाहीजे, ती अशी की माझी मुलगी त्या आलबमची पाने परतताना त्यातून, हे लक्षात यायला हवं की माझ्या मुलीने एक खंबीर आणि आनंदायी जीवन भोगलं आणि फोटोत आमच्या स्रर्वांच्या चेहऱ्यावर हंसं,हंसं अणि हंसंच दिसावं"
हे तिचे शेवटचे उद्गार ऐकून झाल्यावर मी उठलो आणि विषष्ण न होता आनंदी मनाने तिचा निरोप घेतला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com