Wednesday, July 29, 2009

अन सारखा जीव माझा धडधडतो

रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो
त्याच्या कोमल किरणामधे तुला मी पहातो
अन सारखा जीव माझा धडधडतो
रात्रीचा तळहातावरी चंद्रमा झगमगतो

आलीस तू कोणीकडूनी जातीस तू कुणीकडे
विचार करीतो मी व्याकुळतेने
तू जणूं चंद्रमुखी अन कचपाश जणूं रजनी
जागवीले मला तुझ्या अभिलाषेने
नेत्रावर माझ्या नशेचा असर होतो
रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो

एकान्ती माझ्या अन उदास मी असतां
दाखवीसी दिखावट तुझी
चिंता करितो आहेस तू खरोखरी
का फक्त असे परछाई तुझी
तुटलेल्या स्वप्नात जसा मी जातो
रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 27, 2009

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.

“जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते.”

अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती. मला त्यांच्या कविता फारच आवडतात.आशा,लता आणि हृदयनाथानी गायिलेली गाणी तर अप्रतिम आहेत.त्यांच्या कवितेच पुस्तक प्रो.देसायानी त्यांच्याकडे आहे असं मला कधीतरी सांगितल्याचं आठवलं.मी त्यांना फोन करून त्यांच्या नांतवाबरोबर कधीतरी पाठावून द्या म्हणून सांगितलं होतं.
तेच पुस्तक घेऊन त्यांचा नातू आज माझ्या घरी आला होता.तो अलीकडे औषधं बनविण्याच्या कंपनीत रिसर्च असिसटन्ट म्हणून जॉब करीत आहे.
“आजा-नातवाच्या” गोष्टी मला सांगण्यात तो नेहमीच दिलचस्पी घेतो.कारण मला ही तो त्याच्या आजोबासारखाच मानतो.

हल्ली त्याच्या आजोबांना बरं नसतं.त्यांच्या जुन्या आठवणी काढून काही ना काही तरी मला प्रत्येक भेटीत सांगत असतो.मी पण कधी कधी त्याला त्याच्या अजोबाबद्दल सांगायला आवडतं हे ध्यानात घेऊन एखाद्या विषयाची ट्रिगर देत असतो.त्याला ही बोलायला आवडतं.
आज मी तो भेटल्यावर त्याच्या नव्या जॉबबद्दल विचारणा केली.
भाउसाहेबांच्या नातवाला त्यांच्यासारखीच मुळ विषयाला हात घालण्यापूर्वी अवांतर सांगून नकळत विषयाकडे झेप घेण्याची हातोटी आहे.
मला म्हणाला,
“काका,मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा माझे आजोबा मला नेहमीच म्हणाल्याचं आठवतं.
“विश्वास ठेवीत जाऊ नकोस”
हो,ते म्हणत की मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवित जाऊ नये कारण केवळ एक, ते छापलेलं होतं.
दोन,रेडिओवर किंवा टी.व्हीवर ऐकलं होतं.
तिन,कुणा विशेष व्यक्तिच्या संबंधात होतं.
म्हणून विश्वासपात्र आहे असं समजूं नको.
मी म्हणालो,
“हे तुझ्या आजोबांचं म्हणणं त्यांच्या अनुभवातून ते सांगत असावेत.कारण सगळ्याच गोष्टी अलीकडे विश्वासनीय नसतात.काही बातम्या सनसनाटी म्हणून विशेष करून टी.व्ही.वर सांगितल्या जातात,आणि कधी नंतर ते खरं नव्हतं म्हणून सांगून नंतर कधी तरी दिलगीरी प्रदर्शीत करतात.आणि बातमी ऐकणार्‍याने जर का त्यांची दिलगीरी ऐकली नाही तर तो पहिल्या बातमीवर विश्वास ठेवून जातो.त्यामुळे तुझ्या आजोबाना हा पूर्वीपासूनचा अनुभव असणार.”

अगदी बरोबर.त्यामुळेच माझे आजोबा मला म्हणायचे,
“प्रथम तुला ठरवायला हवं की जी माहिती तुला मिळत आहे ती तुला कितपत महत्वाची आहे,किंवा तिचं तुला किती प्रयोजन आहे.जर तसं काही नसेल तर सोडून दे.ज्या गोष्टीची आपल्याला किंमत नाही तिच्या मागे लागून समय आणि प्रयत्न बरबाद का करावा?.”
एव्हडंच नाही तर ते पुढे सांगायचे,
“तसंच अशी गोष्ट दुसर्‍याशी आदान-प्रदानसुद्धा करूं नये.त्यांचा समय व्यर्थ जातोच शिवाय कदाचीत चुकीची माहिती दिली जाते.ती गोष्ट जर का तुला महत्वाची असेल तर मात्र त्यात समय आणि प्रयत्न गुंतवणं ही एक गंभीर बाब होईल. खरं की खोटं हे तुला ठरवावं लागेल.परंतु,जर का त्यात तथ्य असेल तर मग त्यात विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाही.-जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते.”
मी आजोबांना म्हणालो,
“पण आजोबा,एव्हडा मोठा निर्णय मी कसा घेऊं?”
त्यावर अगदी दिलखूश होऊन हंसत हंसत मला म्हणाल्याचं आठवतं,
“अरे माझ्या लाडक्या नातवा,म्हणूनच तुला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे.”

माझे आजोबा आता जरी थकले असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरच्या हास्याची ती लकब अजून मी विसरलो नाही.मी त्यांचा उपदेश आता पर्यंत पाळीत आलो आहे.आणि म्हणून मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.”
“पण हे तुला सगळीकडेच जमणार नाही.काही लोक तुला फारच चिकीत्सक आहेस असं नाही का म्हणणार?”
असं मी त्याला विचारलं.
“एक मला कबूल करावं लागेल की मी कधी कधी ह्यामुळे पेचात आलो आहे.मला आठवतं ध्रुव्व बाळाच्या गोष्टीबद्दल माझं स्पष्टीकरण माझ्या लहानपणी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यांच्या आईवडीलांबरोबर सुरळीतपणे जाऊ शकलं नाही.
पण सरतेशेवटी मोठेपणी मी शास्त्रज्ञ झालो.त्याचं श्रेय मी माझ्या आजोबांना आणि माझ्या जिज्ञासेला देतो.
आता मला कुठच्याही गोष्टीवर विश्वास ठेवायची गरज वाटत नाही.मला जर का शंका आली तर मी त्यातलं तथ्य पडताळून कसं पहावं ह्याची माहिती मला कळली आहे. एक तर्फी विचारकरून नव्हे तर चारही बाजूनी विचार करून माझा मी निर्णय घेतो.”

मी त्याला म्हणालो,
“जगात खूप माहिती उपलब्ध आहे.तुझ्या आजोबांसारखे अनेकांना आजोबा असतील ही.पण कुणालाही तथ्य कसं शोधून काढायचं आणि जास्त महत्वाचं म्हणजे उघड्या मनाने चारही बाजूनी समस्येबद्दल विचार करीत असतां कसलाही मनांत शंका न ठेवता निर्णयाला कसं आलं पाहिजे हे समजायला हवं.”
माझा हा पॉईन्ट त्याला पटला.लागलीच मला म्हणाला,
“जर का तथ्य सहजासहजी कळण्यासारखं नसेल तर प्रयोग करून तथ्य शोधून काढणं मला जमतं.
एक खरं आहे की काही प्रयोग माझ्या आवाक्याबाहेरचे असतात.आणि काही बाबीवर आपल्याला प्रयोगही करता येत नाही.”
आणि भाऊसाहेबांचा नातू त्यांच्या सारखाच मुळ विषयाकडे जाताना माझ्या प्रश्नाकडे नकळत वळला.मी त्याला म्हणालो होतो की तुझा नवीन जॉब कसा चालला आहे.

मला म्हणतो कसा,
“काका,सुरवातीला तुम्ही माझ्या जॉबबद्दल चौकशी केलीत ना,त्याच जॉबमधे मी माझ्या आजोबांचा उपदेश कसा वापरू लागलो आहे ते सांगतो.आम्ही नवीन नवीन औषधाचा शोध लावीत असतो.हे शोध लावून झाल्यावर त्या औषधाचा उपायाचा पडताळा करून पाहायचं असतं.अनेक उदाहरणं देता येतील.
उदाहरण म्हणून माणसाच्या मननोदशेचं घ्या. नवीन औषधांच्या उपायांचं परीक्षीण करताना ज्या लोकांवर त्याचे प्रयोग चालतात त्यांना प्रत्यक्ष नवीन औषध किंवा नकली गोळी देऊन औषध खरोखर उपयोगी होत आहे की नाही हे पडताळलं जातं.ही सर्व माहिती ज्यांच्यावर प्रयोग होत आहे त्यांना किंवा जे प्रयोग करीत आहेत त्यांच्यापासून निर्णयाला येईपर्यंत गुप्त ठेवली जाते.ज्या लोकाना ती नकली गोळी दिली जाते ते लोक जणू आपल्यावर खर्‍याच औषधाचा प्रयोग होत आहे अशी समजूत करून घेऊन वागतात.ह्याला placebo effect असं म्हणतात.हा effect बरेच वेळा सूचक असतो.कधी कधी अगदी शंभर टक्के असतो.
हा प्रयोग काय सिद्ध करतो?ज्यांना खर्‍याच औषधाची गोळी आपल्याला दिली आहे असं वाटत असतं आणि प्रत्यक्षात गोळी दिलेली नसते ते सुधारले जातात. माणसाची मनोदशा खूपच प्रभावशाली असते.”
मी त्याला म्हणालो,
“परंतु,असं असेल तर मग साखर मिश्रीत गोळी देऊन, हे औषध आहे असं वर लिहून त्याचा placebo effect त्या रोग्याची काळजी घेईल काय?
असं जर आपण करू शकलो तर मग प्रकृतीस्वास्थ्य अगदीच सोपं झालं असतं.”
मला म्हणाला,
“पण त्याचं उत्तर नाही असंच आहे.आणि ते तसं देणं हे पण बेकायदा आहे.पण समजा हेच प्रयोग लहान मुलांवर केले.ह्या मुलांना काय चाललं आहे याची मुळीच माहिती नसते. मी नक्कीच सांगतो त्यांच्यावर placebo effect होणारच नाही.जणूं उंदीर,सश्यावर प्रयोग केल्या सारखं होईल.”
मी त्याला म्हणालो,
“ह्याचा अर्थ असा होतो की जस जसं आपण प्रौढ होत जातो तस तसं आपण हा placebo effect शिकत जातो.हे चांगलं आहे की वाईट आहे?”
माझी शंका त्याला आवडली.
“तुमचा प्रश्न मला आवडला.मी तुम्हाला प्रांजाळपणे असं सांगेन की मी जर का खरंच आजारी असेन तर मी स्वतःसाठी खरीच गोळी मागेन.
काका,मी माझ्या आजोबांशी सहमत आहे.विश्वास ठेवणं ही जरी प्रभावशाली शक्ति असली तरी ती दोन्ही तर्‍हेने कामात येते.असं जर आहे तर मग चान्स कशाला घ्यावा?
म्हणूनच मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.”
“आजोबाचा नातू शोभतोस रे बाबा!”
असं म्हणून मी त्याची पाठ थोपटली.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 25, 2009

आज मला असे का भासले?

आज असे मला भासले
अघडीत घडण्या सरसावले
आज असे ही मला भासले
मन माझे कुठेतरी हरवले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?


चेहरा करी कुणाच्या नजरेची छाननी
कुणी आता रोजच येई स्वप्नी
नव्या ऋतूमधे लालसा येई मनी
भ्रमर गुंजन करी फुला भोवती फिरूनी
आज असे मला भासले
मन माझे नशेमधे डुबले
आज असे ही मला भासले
शुद्धितूनी मी कुठेतरी विसावले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?


धुंद मंद भोंवताल कुस वळुनी घेई
नीळ्या काळ्या ढगांची पडे सावली
थंड थंड वार्‍याची झुळूक तृप्ती देई
गूंज गूंज शहनाई मालकंस आळवी
आज असे मला भासले
कुणीतरी माझेच जहाले
आज असे ही मला भासले
दोघांमधेले अंतर कायमचे मिटले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 23, 2009

“बट-शेवंतीची फुलझाडं.”

दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे, आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची.
मी कर्णिकांना म्हणालो,
“हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?”
मला दादा कर्णिक म्हणाले,
“गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-realityला- तोंड देताना मन कुठच्याही विचारापासून मुक्त ठेवायचो. मी बेदरकारपणे रोजच्या आव्हांनांबद्दल,तसंच जीवनात स्थित्यंतरं आणणार्‍या घटनां घडण्याच्या संभवाबद्दल अपेक्षीत राहून, आलेल्या परिस्थितीला काबूत पण आणायचो.
अशा तर्‍हेने वागण्याची माझी ही पद्धत ज्याला मी माझी वयक्तिक विचारधारा असं समजू लागलो ती माझ्या पूर्ण जीवनकालात उदयाला आली. तिने मला प्रत्येक नव्या अनुभवाची त्याच्या विशेषताप्रमाणे अनुभवण्याला उद्युक्त केलं.
मात्र ह्या मार्गाचा माझ्या आयुष्यात मी अवलंब केला फक्त चांगल्या आणि वाईट परिस्थितीत सहारा घेण्यासाठीच.”
मी दादानां म्हणालो,
“हे असले विचार अगदी लहानपणापासून तयार झाले असतील नाही काय?”
“खरं सांगायचं तर मी कॉलेजमधे असताना माझे महत्वपूर्वक अंतरदृष्टीपूर्ण विचार तयार झाले.काही शिक्षक कडं प्रेम करायचे. विज्ञान शिकवणारे शिक्षक नेहमी फक्त प्रायोगीक कौशल्याचाच प्रयोगशाळेत तकादा लावित नव्हते तर निर्दोष इंग्रजीमधे लिहिण्याच्या सरावावर भर देत असत.त्यामुळे जे उचित असेल त्याला आपोआप ईनाम मिळणार हे शिकवलं गेलं.
गणिताच्या शिक्षकानी मला एका परिक्षेत अनुत्तीर्ण केलं.आणि त्यामुळे दृढतेची किंमत मला कळली.”

मी दादांना पुढला प्रश्न विचारण्यापूर्वीच मला म्हणाले,
“हे झालं शिक्षण घेण्याच्या वंयात.पण नंतर मला पुस्तक वाचनांचा भरपूर नाद लागला.
पुस्तकात लिहिलेल्या शब्दातून बोलणार्‍या पुस्तकाच्या लेखकानी माझ्या वयक्तिक विचारधारेला सुक्ष्म रूपाने सुधरवण्याचा प्रयास केला. अनेक लेखकांनी, विचार-तत्वज्ञान, धर्म,कायदे-कानू,राजकारण आणि अर्थशास्त्र वगैरे विषय पुस्तकात स्पष्ट करून सांगितले असले जरी तरी नीट विचारकरून पाहिल्यास त्यांच्याशी खरा संपर्क सीमितच राहतो. कारण खर्‍या वास्तविकतेशी त्यांचे ते विषय तुलना करू शकत नव्हते. म्हणून शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या जाणार्‍या पद्धतींचा मी आदर करायला शिकलो.कारण ही पद्धत नेहमीच सुंदर स्पष्टीकरण करते. उगाच मनात गोंधळ करून देत नाही. जी क्षेत्रं वास्तविकतेला-reality ला- शोधण्याच्या प्रयत्नात असतात त्यावर मन केंद्रित करायला मी शिकलो होतो.”

“मला आठवतं,कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही थोडे दिवस आजारी होता.मी एकदा तुम्हाला भेटायला आलो होतो, त्यावेळी होमसिकनेस आल्याने मी थोडे दिवस गांवला जातो असं सांगून बरेच दिवस तिथेच होता.नंतर तुमचं लग्नाचं आमंत्रण मला मिळालं आणि आपली पुन्हा भेट झाली.”
अशी मी दादांना आठवण करून दिल्यावर मला म्हणाले,
”कॉलेज सोडल्यानंतर एक महत्वपूर्ण अंतरदृष्टी मला मिळाली. माझी मनस्थिती अगदी खालच्या थराला आली होती.माझ्या मनातली उदासिनता वृद्धिंगत होत गेली.
माझ्या आईवडीलांपासून आणि इतर जवळच्या नातेवाईकांपासून दूर राहिल्याने आत्मदयेत मला मी लोटून दिलं होतं.मला मिळालेल्या दुर्भाग्याचं दुषण मी माझ्या आईवडीलांवर टाकलं होतं.असंच एक दिवशी दुपारी विचार करता करता माझ्या डोक्यात आलं की माझ्या प्रेमळ आईवडीलांनी मला प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवलं होतं.आणि त्यांच्या कठीण परिस्थितही जे त्यांना जमलं ते त्यानी केलं.आणि मग त्या क्षणांनंतर माझ्या वयक्तिक विचार-धारेत अचानक फरक झाला आणि मी त्यानंतर माझ्या नशिबाचा स्वामी मीच आहे अशी मनात धारणा ठेवली.आणि कुणालाही माझ्या अपयशाबद्दल दोष देण्याचं सोडून दिलं. आणि लग्न करायचं ठरवलं.”
मी म्हणालो,
“लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट असतो. तुम्हाला ही तसाच अनुभव आला असेल.”

“माझं लग्न झाल्यावर मी पूर्णतया एक नवा धडा शिकलो.खरी वचनबद्धता,विनम्रता आणि समझोता असल्यावर जीवनातलं असं हे सर्वांत महत्वपूर्ण नातं सफल होत असतं अशी माझी खात्री झाली.
एका सडाफटींग ब्रम्हचार्‍याचा एकाएकी सदगृहस्थ झाल्याचं माझ्यातलं परिवर्तन पाहून मला अचंबाच वाटला.आता माझ्या ह्या वयक्तिक विचारधारेची रोजचीच कसोटी पाहिली जायची आणि ती सुद्धा वास्तविकेतून.ह्या माझ्या विचारधारेत कालपरत्वे बदलाव होत गेला. बहुतांशी मी शिकलो की एकमेकाचा आदर केल्यामुळे आणि स्वतः कष्ट केल्यामुळे आपल्याला त्याचा मोबदला मिळतोच मिळतो.

दुर्दैवाने माझ्या पत्नीला अकाली आजार झाला.माझं आणि माझ्या मुलांचं जीवन खोल दरीत पडल्यासारखं वाटायला लागलं. माझ्या वयक्तिक विचारधारेकडून सुरवातीला काही ही समर्थन मिळालं नाही.फक्त समय जात गेला तशी जखम भरत गेली. वेदनांच रुपांतर चांगल्या आठवणींच्या यादीत झालं.आणि ह्या आठवणीच नंतर नंतर कठीण प्रसंगात माझ्याशी संवाद करू लागल्या.”
हे ऐकून मी दादाना म्हणालो,
“परंतु,तुम्ही तुमच्या विचारधारेचा पाठपूरावा काही सोडला नाही.आता निवृत्त झाला,ऑडीटरचं काम बंद झाल्याने तुमचा वेळ आता कसा जातो?”

“हळू हळू ह्या जीवनाच्या घाईगर्दीच्या पद्धतितून मी निवृत्त झालो आहे.लहान लहान गोष्टीतून आता मला समाधान मिळत जातंय. जोपर्यंत मी हयात आहे तो पर्यंत मला काम करावं लागणार आहे हे मला ठाऊक आहे.पण ह्यामुळे निराळ्याच प्रकारची मुक्ति मला मिळाली आहे. आता माझं मन खंबीर झालं आहे, तात्पर्य एव्हडंच की इतक्या वर्षाच्या विकसित झालेल्या माझ्या वयक्तिक विचारधारेने मला संकट पार करून जायला तयार केलं आहे. बरंय.”
असं म्हणून दादा कर्णिक माझा निरोप घेता घेता मला म्हणाले,
” आनुवंशिकता आणि नशिब ह्यांचा माझ्या जीवनात हिस्सा होताच होता. बट-शेवंतीच्या फुलझाडांकडे पहात मला फावला वेळ घालवायला मजा येते. “



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 20, 2009

सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.

गेली तीस-पस्तिस वर्षं भाई नेरूरकर एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत.रोज पहाटे पांचला ऊठून दिवसाची सुरवात करायचे ते रात्री सर्व कामं आटपून झोपायला त्यांना अकरा वाजायचे.आणि परत दुसरा दिवस उजाडल्यावर परत तेच.
समाजातले सर्वच जण असंच करतात म्हणा.

भाई नेरूरकाराना मी म्हणालो,
“मला नेहमीच वाटतं की सकाळी सूर्योदय झाला की उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपी जावं.ह्या माझ्या म्हणण्याचा खरा अर्थ काय असावा असं तुम्हाला वाटतं?”
“मला वाटतं, ते समजायला अगदी साधं आहे.रेखून दिलेला दिवसभरचा स्थापित केलेला कार्यक्रम जो आपल्या समाजावर लादला जातो त्या कार्यक्रमाला खंड आणण्याचा कुणीतरी प्रयत्न करायला हवाय असं मला वाटतं.असं मनात येऊन सुद्धा गेली तीस-पस्तिस वर्षं मी हेच करीत आलोय.आणि मी काही जगावेगळं करीत नाही.”
असं भाईनी मला लागलीच उत्तर दिलं.
आणि पुढे म्हणाले,
“आता माझं पंचावन्न वय होत आलंय,आणि दिवसभरच्या समय-सारणी-schedule- शिवाय राहण्याच्या स्वातंत्र्याचा मला लाभ उठवावा असं वाटतं किंवा दुसर्‍या अर्थी सांगायचं झाल्यास निदान मी माझ्यासाठी तजवीज केलेली समय-सारणी वापरून रहावं असं वाटतं. माझ्या सारख्या पहाटे पांचला उठून कामाला लागणार्‍या शिक्षकाचे हे मनातले नुसते मांडेच होवू नये एव्हडंच.वर्षभरात जवळ जवळ नऊ महिने मी ह्या पहाटे उठण्याच्या बंधनात असतो. त्याचा आता मला पण कंटाळ येऊं लागलाय.”
हे भाईंचं आरग्युमेंट ऐकून,ह्या वयावर भाईं सारख्या अनेक व्यक्ति असाच विचार करीत असावेत हे माझ्या केव्हाच लक्षात आलं.


मी भाई नेरूरकराना म्हणालो,
“आपला समाज समयामधे गुंतलेला असतो आणि त्यातच त्याचा व्यय झालेला असतो. आणि त्यामुळे लोक वर्तमानकाळात खर्‍या मजेत न राहता भविष्यात समय कसा जाईल ह्याच्या सततच्या विवंचनेत असतात.त्यांचं वर्तमान आरामात आणि निश्चिंत जाण्याऐवजी ते भविष्यात काय होणार आहे ह्या विचार्‍याच्या दबावाच्या दलदलीत रूतलेले असतात.”

“माझ्या अगदी मनातलं बोललात.”
असं म्हणत भाई मला म्हणाले,
“मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. दोन तिन मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो असताना आणि जुन्या बालपणाच्या आठवणी काढून आनंदात मश्गूल झालेलो असताना मधेच, राहून गेलेला घराचा हाप्ता पुढच्या आठवड्यात कधी भरूं? ह्या विवंचनेने मनावर दबाव आलेला होता, आराम मिळण्याऐवजी विवंचना वाढते.बॅन्केत तेव्हडे पैसे नाहित ह्या बद्दल काळजी वाढते.कारण पुढच्याच हापत्यात पैसे भरण्याचं समयाचं बंधन असतं ना!.”
मी म्हणालो,
हा समय ज्यावेळी विस्मयाच्या वातावरणाने भरून गेला पाहिजे त्याचवेळी विवंचनेच्या भाराखाली डुबून जातो. आणि म्हणून काहीवेळां हा समाजाचा समय- सारणीचा कसूर कुणीतरी झुगारून देण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. असं तुम्हाला नाही का वाटत?”

भाई ह्याबाबतीत आपला निर्धार काय असावा ह्याचं विवेचन करताना मला म्हणाले,
“ही वेळ दाखवणार्‍या घड्याळाची बेडी मला नको होत आहे.मी मनगटात घड्याळ पण वापरत नाही.मी माझा सेल फोन पण बंद करून ठेवतो.ह्या सेल किंवा मोबाईल फोनचा अलीकडे होणारा उपयोग पाहून त्याला “सीन फोन” म्हणणं योग्य होईल असं मला वाटतं. कालातीत क्षेत्रात आता मी माझं अस्तित्व संभाळण्याच्या प्रयत्नात आहे,समय-सारणीचा विचार करीत नाही, कदाचीत माझ्या ह्या असं रहाणाच्या क्रियेला स्वेच्छेने राहणं असं म्हणता येईल.असं करायला खूप बरं वाटतं.खरंतर खूप मग्न झाल्यासारखं, खूप आनंदी झाल्यासारखं वाटतं.त्या त्या क्षणांना माझा तो निकृष्ट अहंभाव नाहिसा होतो आणि मी वर्तमानात असलेल्या क्षणात एकरूप होऊन जात आहे असं वाटतं.जीविताच्या,श्वसनाच्या आणि अस्तित्वाच्या चक्राकार गतीत आध्यात्मिक रूपाने ह्या सर्वांचा एकच हिस्सा झाल्यासारखं होतं, आणि समयाचा अंशच राहत नाही असं वाटतं.”

किती गंभीरपणे भाईंनी विचार करून असा निर्धार केला आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकून मला पण अंमळ बरं वाटलं.
मी जाता जाता भाईना म्हणालो,
“म्हणूनच ह्या समाजातल्या सर्व संरचीत प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्या समय-सारणीच्या दुर्गंधीचा निष्प्रभाव करून सूर्योदयाबरोबर उठणं आणि सूर्यास्ताबरोबर झोपी जाणं ही क्रिया मला ज्या सुगंधाचा वास हवा आहे त्याचं स्वातंत्र्य मिळवून देईल असं वाटल्यामुळे तुमचं काय मत पडतं हे मला पाहायचं होतं.”


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 18, 2009

माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

“माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो.”

आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो,
“भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन होई ना!.तरूणपणात भर उन्हात आमच्या गांवाला एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर चढून जाण्याची आमच्यात शर्यत लागायची.दोन तीन बाटल्या पाणी ढोसल्यावर जीव शांत व्ह्यायचा.पण एव्ह्डी कोलाहल होत नसायची.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब आता “age became” हेच त्याचं कारण आहे.”
“ते राहू दे,पण तुम्हाला आज कशावर चर्चा करायची आहे ते सांगा.” इती प्रोफेसर.

” मानवजात अन्नशृंखलेच्या सर्वांत वरच्या पातळीवर असल्याने,तसंच “सर्वोच्य” बुद्धिमत्तेचं मानवजातीला रूप मिळाल्याने कुणालाही नेहमी असंच वाटतं की हे ज्ञानाचं ओझं आपलंच आहे.कुणाला वाटतं की जगाला ज्ञान देणं हे त्याचंच जणू कर्तव्य आहे, आणखी असं वाटत असतं जेव्हडं म्हणून कुणाला ज्ञान मिळवता येईल तेव्हडं ह्या- पृथ्वीगोलाचा नाश होई तो पर्यंत- मिळवलं पाहिजे.त्यामुळे कुणी बर्‍याच गोष्टींचा पाठपूरावा करीत असतो.पण त्यालाही मर्यादा आहेत. तुम्हाला कसं वाटतं?”
असा मी प्रोफेसरांना सरळ सरळ प्रश्न केला.

“पूर्वी माझा समज होता की मला सर्वच काही माहित आहे. हा माझा भ्रम आहे हे समजायला माझा तोडा वेळ गेला. आणि हे पण समजलं की वाळुतल्या कणा एव्हडं पण प्राप्त होऊं शकणारं ज्ञान सुद्धा मी मिळवू शकणार नाही. आणि हे मी आता मनापासून मानायला लागलो आहे.”

असं बोलून झाल्यावर भाऊसाहेबांनी थंड पाण्याची बाटली उघडून जवळ जवळ अर्धी बाटली पिऊन टाकली.
“भाऊसाहेब, आज माझ्या मुलीने बटरस्कॉच आइस्क्रिम आणलं आहे.ते खाण्यासाठी थोडी जागा पोटात ठेवा म्हणजे झालं.”
हे माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा फुलला.त्यांना बटरस्कॉच आइस्क्रिम विशेष आवडतं, असं मला त्यांच्या मुलीने एकदा सांगितलं होतं.म्हणून माझ्या मुलीला मी ते मुद्दाम आणायला सांगितलं होतं.

चर्चेचा मुद्दा पुढे सरकवीत मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“काही गोष्टी अगदी उघड उघड आपल्या नियंत्रणाच्या पलिकडच्या असतात. काही गोष्टी जीवविज्ञानाच्या आज्ञेत असतात.आणि आपण काही ही करूं शकत नाही.सर्वच गोष्टींचं ज्ञान असणं कठीण आहे,मग ते बौद्धिक असेल,किंवा व्यावहारीक असेल किंवा आध्यात्मिक असेल.वाटेत खूपच अडथळे येत असल्याने प्राप्त होण्यायोग्य ज्ञान प्राप्त करणं जड जातं. “

थोडा विचार करून प्रोफेसर म्हणाले,
“मी तुम्हाला रोज चालवत असलेल्या आपल्या गाडीचं उदाहरण देतो.
जशी कुणाची गाडी साठ,सत्तर मैलांच्या वेगाने जात आहे,आणि अधून मधून आपल्या समोर असलेली गाडी ब्रेक लावित राहते.त्यामुळे कुणाला आपली स्पिड कमी करावी लागते, वा जबरदस्तीने थांबवावी लागते,किंवा मग ट्रॅफिक जाम झाल्याने अडकून बसावं लागतं. कुणी तिथेच विचार करीत राहतात.कदाचीत असंच कुणीतरी आपल्या जीवनाची गाडी अशाच रफ्ताराने नेत असावे.निस्सन्देह इतर उत्तरदायित्वपूर्ण वाहक ज्या ठिकाणाला जात असावेत त्यांच्या सोबत हे ही जात असावेत.आणि अडथळे येत असावेत.त्यामुळे तुम्ही म्हणतां तसं वाटेत खूपच अडथळे येत असल्याने प्राप्त होण्यायोग्य ज्ञान प्राप्त करणं जड जातं. “

हे भाऊसाहेबांचं उदाहरण मला माझ्या चर्चेच्या विषयाला फिट्ट वाटलं.आणि मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमच्याकडून मला अशा समर्पक उदाहरणाची अपेक्षा होती.
परत त्या तुमच्या गाडीचं उदाहरण पाहिल्यास समोरच्या वाहकाला जसं कुणी टाळू शकत नाही.त्याने परतपरत ब्रेक लावावेत हे कुणाच्या हातात नाही.पण त्या वाहकाने तुमच्या वेगावर नियंत्रण आणलं असतं हे मात्र नक्की.
आणि तुम्हाला त्याप्रमाणे प्रतिक्रिया देणं भाग पडतं.शिवाय,त्याला टाळून पुढे जाता येत नाही कारण जवळच्या सर्व लेन्स गाड्यांनी भरलेल्या असतात. अगदी असंच जीवनाच्या गाडीचं आहे.”

“वाः! तुम्ही माझ्या उदाहरणाचा चांगलाच अर्थ काढलात.”असं खूशीने म्हणत,प्रोफेसर म्हणाले,
” सत्य समजून घ्यायला हवं असेल तर आपण चौकस राहिलं पाहिजे.निदान एव्हडं समजायला पाहिजे की आपल्याला त्याची माहिती आपल्या मित्रांकडून, आईवडीलांकडून, आणि इतरांकडून ज्या सर्वांना आपल्या मार्गात भेटतो त्यांच्याकडून घ्यायला शिकलं पाहिजे.

ज्या ह्या ग्रहाला आपण धरती म्हणतो त्या धरतीचे आपण निवासी आहोत.माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो.बरं ते राहूंदे बटरस्कॉच आइस्क्रिम कुठे आहे ते आणा पाहूं”
मी समजलो चर्चा इथेच थांबवून आइस्क्रिमवर तांव मारण्याची वेळ आली होती.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 16, 2009

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला
दे हातात हात अलगद तुझा जरा
मिळेल आधार अपुल्या प्रीतिला खरा



हा चंद्रमा हे तारे छपतील ढगाआड
नाही ना तू छपणार माझ्या नजरेआड
बदलो दुनिया ना बदले अपुली प्रीती
राहू वचनबद्ध करूनी प्रीतिची स्वीकृति



दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला



रमणीय छायेत घेऊया हिंदोळे
विस्मरूनी दुःख जीवनातले सगळे
दुनियेतल्या दुःखाची काळजी कसली
करूनी प्राप्त तुला तृप्ती मनाची झाली



दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com