Friday, November 27, 2009

पदकमली आपल्या लागेल रहावे

अनुवाद.(शर्म आती है मगर....)


लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे


रोष करूनी जगले ते जीवन कसले
दोष अनेक घेतले अन दोष दिले
यापुढे मात्र नसेल काहीही सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे


प्रीतिची साथ आहे अमुच्या मनी
दुःखाची व्यथा आहे अमुच्या जीवनी
यापुढे आपणा न लागो दुःख सहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 25, 2009

अजून स्वीट-डीश यायची आहे

“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”



अलीकडे तळ्य़ावर लवकर काळोख पडतो.आणि त्यासाठी लवकर निघालं की चमचमीत उन्ह्यात निघावं लागतं.म्हणून मी जरा उशीराच निघालो.मला वाटलं होतं की प्रो.देसाई माझ्या अगोदर येऊन बसले असतील.पण कसलं काय.?
काळोख व्हायला लागल्यावर उठून जायला निघालो.चार पावलं गेल्यावर,
“काका,काका”
अशी हांक ऐकायला आली.मागे वळून पाहिल्यावर तो प्रो.देसायांचा नातू विजय, नक्कीच असणार ह्याची खात्री झाली.आणि त्याच्याबरोबर एकजण होता.जरा थांबलो.
“कुठे चालला काका? जरा बसा”
असं म्हणत त्याने आपल्या मित्राची ओळख करून देत म्हटलं,
“हा माझा मित्र,संजय पोतदार.तो त्याच्या आजोबांची गोष्ट सांगत होता.मी त्याला म्हटलं तुम्हाला पण ऐकायला आवडेल.”
“हो मला ऐकायला नक्कीच आवडेल.बसूया पाहिजे तर “
मी असं म्हटलं आणि आम्ही परत त्या बाकावर येऊन बसलो.
संजय मला म्हणाला,
“काका माझी गोष्ट नक्कीच तुम्हाला स्वारस्यमय वाटेल.कारण ती नुसतीच गोष्ट नसून त्यात माझ्या मनातली व्यथा पण आहे”



प्रो.देसायांचा नातु बरेच वेळां आपल्या आजोबाबद्दल मला सांगत असतो.तक्रार म्हणून नव्हे तर दोघांच्या विचारसरणीत असलेला फरक दाखवण्यासाठी चर्चा करण्यासाठी सांगत असतो.तसाच काही तरी संजयचा सांगण्याचा प्रकार असेल असं गृहीत धरून मी संजयाला म्हणालो,
“बाबारे,प्रो,देसायांना मी चांगलाच ओळखतो.तुझ्या आजोबांशी माझा काही परिचय नाही.त्यामुळे तू जे काय सांगशील ते एकतर्फी होईल.म्हणजेच मी काही माझं मत देऊ शकणार नाही.बरोबर ना?”



“काका,तुम्ही मला मत देण्यासाठी किंवा माझ्यात आणि माझ्या आजोबात असलेल्या विचारसरणीत फरक वगैरे आहे हे सांगण्यासाठी हे मी सांगत नाही.”
असं संजय मला म्हणाला.
“उलट माझे आजोबा मला आपल्या मित्रासारखे वागवतात.जसा जमाना बदलतो तसं माणसाने बदललं पाहिजे अशा विचाराचे माझे आजोबा आहेत.”
असं त्याने मला पुढे जावून सांगीतलं.
“असं असेल तर मला तुझी गोष्ट आणि व्यथा ऐकाला जरूर स्वारस्य आहे”
असं मी संजयला प्रोत्साहन देत सांगीतलं.विजयच्या चेहर्‍यावर मला छुपं स्मित दिसलं.



“माझी आई आणि माझे आजोबा एकमेकाशी पत्रव्यवहार करण्यात खूप उत्सुक्त असायचे.अलीकडे मी आजोबांच्या कपाटात त्या पत्रांची थप्पी पाहिली होती. आजोबांची परवानगी घेऊनच मी त्यांच्या कडून पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता दाखवली होती.माझ्या आजोबानी मला हंसत हंसत मान्यता दिली.”
संजय सांगू लागला.
“ह्या अनेक पत्रातून एक पत्र मी जरा वेगळं करून ठेवलं होतं.ते मला नीट वाचावं असं वाटलं.
गावातल्या एका म्हातार्‍या आजीची गोष्ट त्यात होती.आजोबा आईला लिहीतात.
“आपल्या इथे गावात एक पार्वतीआजी म्हणून बाई होती ते तुला ठाऊक असेलेच. होती म्हणण्याचं माझं कारण आता ती नाही.दोन दिवसापूर्वी ती निर्वतली.तिची खासियत अशी की तीला गावात कुणीही कुणाच्याही घरात कसला समारंभ असला की जेवायला बोलवायचे.आणि ती आजी पण अगदी आनंदाने जायची.तीची एक जगावेगळी संवय होती की तीच्याबरोबर एक चांदीचा चमचा न विसरता ती घेऊन जायची.सहाजीकच जेवण संपल्यावर एखादी स्विट- डीश असायची.तीचा आस्वाद घ्यायला आजीला खूप आवडायचं.आणि ते सुद्धा तिच्याच चांदीच्या चमच्यातून.
“जेवण पूर्ण संपलं नाही.अजून स्वीट-डीश यायची आहे.”
असं यजमानानी म्हटल्यावर आजी आपला चमचा सर्सावून बाहेर काढून ठेवायची.सुग्रास जेवण झाल्यावर काहीतरी आणखी चांगली गोष्ट चाखायची आहे हा त्याचा अर्थ असायचा.”
पुढे आजोबा आईला लिहीतात,
“त्या आजीने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांना आणि नातवंडाना सांगून ठेवली होती.ती ही की,
“माझ्या बरोबर हा माझा चांदीचा चमचा माझ्या अंतीमकार्याला न्या.माझ्याबरोबर त्याला जावूदे.”
पत्र वाचून झाल्यावर त्यावेळी माझ्या मनात विचार आला की प्रत्येकाने अशा कल्पनेला चिकटून राहिलं पाहिजे की शेवटी काही तरी चांगलं होत असतं.जसं जेवणार नंतर स्वीट-डीश.”



संजयचं एव्हडं ऐकून झाल्यावर मी मनात म्हटलं खरंच स्वारस्य घेण्यासारखं हा काही तरी सांगत आहे.थोडा काळोख झाला तरी हरकत नाही. ह्या दोघाना माझ्या घरापर्यंत सोबत घेऊन जाईन.



पुढे संजय म्हणाला,
“नेहमी मी मला स्वतःला निराश किंवा असा-तसाच आहे असं समजतो. सकाळी उठल्यावर मी नेहमीच आशा करीत असतो की ज्या काही अडचणी, रुकावटी मी माझ्या मार्गात पेरल्या आहेत त्यातून मुक्त होईन.तसं माझं जीवन छान आहे.मी एका प्रेमळ कुटूंबातला आहे. मला चांगली नोकरी आहे. तसंच माझं भवितव्य पण उज्वल आहे.”



“मग तू कशाबद्दल एव्हडं दुःख करतो्स?”
मी थोडा उतावीळ होऊन संजयला विचारलं.
“मी माझ्या पायावर आहे.पण माझी विशिष्ठता जरा विशेष आहे.हे, मी म्हणत नाही किंवा मी ठरवलेलं नाही.मला तसं सांगीतलं गेलंय. शिवाय मला सांगीतलं गेलंय की बर्‍याचश्या माझ्या आयुष्यात पाहिलं तर ते खरं आहे.पण माझ्या ह्या विशिष्ठतेमुळे मला मित्र जोडता येत नाहीत.जास्तकरून मी माझ्या जीवनात एकटाच असतो.आणि सगळ्यांत घृणा करण्यासारखी गोष्ट म्हणजे मला एकलकोंडं रहायला मुळीच आवडत नाही.
माणसाला परस्पर संबंध ठेवायला नेहमीच आवडत असतं.आपण कुणाला तरी हवं हवं असं वाटलं पाहिजे.कुणी तरी आपल्याशी प्रेमळ असायला हवं असं त्याला वाटत असतं.आपण कुणाच्यातरी जरूरीत असलेलं असावं असं वाटत असतं. मला सुद्धा तसंच वाटतं.”



विजयला रहावेना तो म्हणाला,
“अरे संजय पण त्या स्वीट-डीशचं आणि चांदीच्या चमच्याचा संबध कुठे येतो.?”
माझ्याही मनात तोच प्रश्न आला होता.
तेव्हा संजय म्हणाला,
“जरा ऐकायला विक्षिप्त वाटेल पण माझ्या आयुष्यात ती स्वीट-डीश आणि चांदीचा चमचा अंतर्भूत झाला आहे.त्याचं कारण माझं व्यक्तीमत्व तसं वजनदार आहे. खरंतर मला स्पष्ट शबदात सांगायचं झालं तर मी शरीराने स्थुल आहे,लठ्ठ आहे. आणि हे तुम्ही पहाताच आहां.पण त्या शब्दांची मी घृणा करतो.ते शब्द उच्चारल्यावर किंवा कानावर पडल्यावर मला कसंसच होतं.आणि त्याहूनही जास्त जेव्हा मला कुणी तसं संबोधून हांक मारतं तेव्हा तर नक्कीच कसंस वाटतं.”
मला संजयची किंव आली मी त्याला म्हणालो,
“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”



“मी लठ्ठ आहे ही कल्पना माझ्या मनाच्या आड येत नाही.पण ज्यावेळी इतर जेव्हा माझ्या लठ्ठपणाची काळजी दाखवण्याचा अविर्भाव करतात ते मला नको असतं.जसा आहे तसाच त्या माझ्या शरीराचा मी स्विकार करीत असतो.पण एक मला नक्की वाटतं की इतरानी पण मी जसा आहे तसा मला स्विकारलं पाहिजे.”
संजय सद्गदीत होऊन म्हणाला.



“लठ्ठ आणि सुखी” ह्या वाकप्रचाराचा अविष्कार कुणीच माझ्या वयातल्यानी स्विकारला नव्हता.कारण माझ्या ह्या जगात मला असं दिसून येतं की सुखी असणं आणि स्विकारलं जाणं हे त्या लोकानी बनविलेल्या सांचात फिट्ट बसलं गेलं पाहिजे.त्या सांच्यातली मी अचूक व्यक्ती असं समजलं गेलं पाहिजे.पण मी मात्र त्या सांच्यात फिट बसत नाही.हे असं, आपल्या हृदयापासून किंवा मनापासून सांगून काय उपयोग नाही,काही खरं नाही.दुसर्‍या कशाचाच विचार न करता फक्त तुमच्याच बद्दल तुम्ही विचार करणं हे जरा कमी लेखलं जातं.”



संजयची समजूत घालण्याच्या विचाराने मी त्याला म्हणालो,
“हे बघ संजय,ज्या गोष्टीवर आपला दृढविश्वास आहे त्यावर विचार करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.आपल्यासाठी जर का दुसरे विचार करीत असतील तर मग ते त्यांना करू देत. तसं करणं हे त्यांना सोपं नाही काय?
तुझ्यात दोष आहे माझ्यात दोष आहे,ज्या जगात आपण रहातो त्या जगात दोष आहे.”



तळ्यावर कळोख खूपच झाला होता.उठता उठता संजय जे म्हणाला ते ऐकून मी खूपच सद्गदीत झालो.
” काका,तरी पण मी तो चांदीचा चमचा हातात घट्ट धरून आहे.पार्वतीआजी जशी स्वीट-डीशची वाट बघत असायची,तशीच माझ्या हातात ती चांदीची धातु पकडून मी एव्हडीच वाट बघत आहे की त्यानंतर काहीतरी चांगलं घडेल.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 23, 2009

काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अनुवाद. (आँखें खुली थीँ आये थे वो भी नज़र मुझे…)

डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

स्मृती हृदयामधे अन ओळख निजरेमधे
दिपकाचा प्रकाश असे स्मृतीच्या मार्गामधे
सोडून गेला तो ह्याच वळणावर मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अंधकाराशी आता माझी प्रीति जडली
नजरेला आता प्रतीक्षेची संवय जडली
न्याहाळू दे वाट तुझी जीवनभर मला

डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 21, 2009

माझी दोन मतीमंद भावंडं.

“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे उघडपणे आणि निडर होऊन.”

आमच्या बिल्डींगच्या मागे जी बिल्डींग होती त्याच्या दुसर्‍या मजल्यावर भांगले कुटूंब रहात होतं.श्री.भांगले दक्षिण मुंबईतल्या एका कॉलेजात प्रोफेसर होते.गणीत विषय शिकवायचे.
त्यांना तीन मुलं होती.मोठा उमेश लहानपणापासूनच वडलांसारखा फार हुशार होता. मात्र भांगल्यांचं एक दुःख होतं की त्यांची नंतरची दोन्ही मुलं एक मुलगा आणि एक मुलगी जन्मताच मतीमंद होती.
जशी मुलं मोठी होऊ लागली तशी भांगल्यांना घरात जास्त वेळ देण्याची आवशक्यता भासू लागली.म्हणून त्यांनी कॉलेजमधला आपला जॉब सोडून घरीच शाळकरी मुलांना शिकवायला क्लासीस काढले होते.गणीत आणि विज्ञान ते शिकवायचे.

नंतर नंतर शिकणार्‍या मुलांची संख्या वाढू लागली ते पाहून जवळच्या एका बिल्डींगचा एक मजलाच भाड्याने घेऊन ते तिकडे शिकवायला लागले. परत तिथे ही त्यांनी आणखी शिक्षक ठेवून निरनीराळे विषय शिकवायचे वर्ग काढले. भांगल्यांचं जोरात चाललं होतं.नंतर माझा आणि त्यांचा बरीच वर्ष संपर्क कमी झाला होता.
अलीकडे त्या बिल्डींगच्या खालून जाताना वर मान करून पाहिल्यावर भांगले क्लासीस ऐवजी दुसराच बोर्ड मी पाहिला.वर जाऊन चौकशी केल्यावर कळलं भांगले आता लोखंडवाला कॉप्लेक्स मधे राहायला गेले होते आणि त्यांनी क्लासीस दुसर्‍यांना चालवायला दिले होते.

मी एक दिवस त्यांचा पत्ता काढीत लोखंडवाला कॉप्लेक्स मधे गेलो होतो.बेल दाबल्यावर त्यांचा मोठा मुलगा उमेशच दार उघडायला आला.त्याने मला ओळखलं, मी मात्र तो उमेश असेल असा अंदाज केला.बहुतेक त्याचं एव्हाना लग्न झालं असावं. दोन लहान मुलं आत खेळताना दिसली.मला उमेशने आत बसायला सांगितलं. चौकशी केल्यावर मला कळलं की त्याचे आईवडील निर्वतले होते.त्याची बहिण आणि भाऊ गुजराथ जवळ एका गावात राहात् होते.ते तिकडे मतीमंद मुलांच्या एका संस्थेत कामाला असतात.त्या दोघानी तिकडेच धंदे शिक्षण घेऊन तिकडेच रहात होते.उमेश मधून मधून त्याच्याकडे जाऊन येऊन त्यांच्या चौकशीत असतो.

गप्पा मारताना मी उमेशला म्हणालो,
“जरी प्रत्येक माणसाचा अनुभव निरनीराळा असला तरी मला वाटतं प्रत्येक माणसाच्या अनुभवाचा आशय जास्त करून एक सारखाच असतो. जीवनात प्रत्येकजण रोज कष्ट काढीत असतो,संघर्ष करीत असतो.आणि जीवनात सर्वजण एकलेपणाच्या वेदना कधी ना कधी सहन करीत असतात. तसं पाहिलं तर प्रत्येकजण जर का मोका मिळाला तर आपला चांगुलपणा दाखवायला उत्सुक्त असतो.”

भांगले कुटूंबाला मी बरीच वर्ष ओळखत असल्याने त्याची कहाणी ऐकून मी माझा प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने असं म्हणालो.

हे ऐकून उमेश म्हणाला,
“परंतु, माझा समज आहे की माणूस जेव्हा दुसर्‍याला दयाळु्पणा दाखवतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या मनाला लागलेले घाव भरून काढण्याच्या तो प्रयत्नात असतो.”

उमेशच्या आईवडीलांची झालेली हानी आणि दोन भावंडांची त्याच्यावर पडलेली जबाबदारी ह्याच्या संदर्भाने त्याने असं म्हटलं असावं असं मी गृहित धरलं.

उमेश मला पुढे म्हणाला,
“आम्ही तीन भावडं आहो.पण दुर्दैवाने माझी बहिण आणि भाऊ दोघंही मतीमंद होऊन जन्माला आली.ही एक आमच्या कुटूंबातली आनुवंशीक कमतरता आहे.ती त्यांच्या नशिबी आली असावी. जीवनातल्या प्रत्येक विकासात्मक पातळीवर त्यांचा विकास होण्यात त्यांना विलंब लागायचा.आणि म्हणूनच रोजच्या शारिरीक गरजा भागवण्यासाठी त्यांना कुणाची ना कुणाची गरज भासायची.त्या दोघानीही आपल्या आपणच आश्चर्यजनक सामाजीक कुशलता आणि वयक्तिक पसंती स्वतःसाठी म्हणून विकसीत केली.चटका लावण्यासारख्या विनोदी वृत्तीत राहून मलाच त्यांनी जीवनातल्या माणूसकीबद्दल दुसर्‍या कुठल्याही सूत्राकडून मिळण्याअगोदर उदाहरणं घालून दिली. त्यांची ती उदाहरणं अपरिपक्व आणि छाननी न केलेली असली तरी जास्त माणूसकीला धरून होती.
मला वाटतं आपल्यातले बरेच जण रोजच्याच वयक्तीत बेबनावामूळे स्वतःच स्वतःला इतरापासून विलग करतात..माझ्या ह्या दोन्ही भावंडानी मला दाखवून दिलं की, आपलं कुटूंब स्पष्टरुपाने इतरांपेक्षा जरा भिन्न आहे.आम्ही निर्णय घ्यायला कमजोर आहोत.आणि त्यांना वाटायचं की मी एकदम कुणाची हजेरी घेऊ नये.उद्धट दिसेल असं बोलूं नये.”

उमेश किती विचारी झाला आहे हे बघून मला त्याच्या परिस्थितीची किंव आली. वडलांच्या सतत छायेत राहिलेला मी त्याला लहानपणी पाहिलं होतं. त्याच्या अपंग भावंडाविषयी त्याचे आदराचे उद्गार ऐकून मला त्याच्या वडलांची आठवण आली. त्यानी आपली कॉलेजातली करियर सोडून मुलांसाठी कष्टप्रय जीवन काढलं हे त्यांचे संस्कार ह्या मुलात उतरल्याचं मला जाणवलं.
मी त्याला म्हणालो,
“कष्ट करून जीवन जगणं हा मनुष्याच्या जीवनाच्या अनुभवातला एक मुख्य मुद्दा आहे.आणि काही प्रमाणात आपणा सर्वांना हा मुद्दा जाणवतही असावा.ही सर्वसाधारण व्यथा आपण सर्व समजू शकतो.
हे जर माझं म्हणणं खरं असेल -आणि मला ते खरं असावं असं ही वाटतं-मग त्याचा अर्थ असा होईल की मी सर्वांशी चांगली वागणूक ठेवून राहिलं पाहिजे कारण एकमेकाकडून आपण त्या चांगल्या वागणूकीचीच अपेक्षा करीत असतो.”
“हे आपलं म्हणणं एक मौल्यवान नियम म्हणून उचित दिसेल.”
असा शेरा मारून उमेश म्हणाला,
“म्हणजेच मला म्हणायचं आहे की, एकमेकाचं मन जर दुखावलं जात असेल-अर्थात मला ठाऊक आहे की मी दुखवला गेलो की मला कसं वाटतं ते- तर मग चांगली वागणूक ठेवणं हेच जास्त स्वाभाविक आहे.आपल्याच वयक्तिक व्यथा आपल्याला जगात पुढे येण्यापासून दूर ठेवतात.त्यामुळेच आपण आपल्यालाच सगळ्या जगापासून लांब ठेल्यासारखं राहून स्वतःला बंदिस्त करून ठेवतो.

माझ्या दोन्ही भावंडाकडे मात्र लोकांना आकृष्ट करून घेण्याचं कौशल्य होतं.माझा भाऊ आणि बहिण अनोळख्याच्या प्रतिरोधाचा पडदाफाश करताना अगदी भोळेपणा आणून त्या अनोळख्याच्या कष्टी दिसत असलेल्या मनाशी बोलण्याच्या प्रयत्नात असतात.हंसून,खरंच स्वारस्य आहे असं दाखवून, स्वतःचीच ओळख करून देऊन,निडर राहून त्यांच्याशी दोस्ती करण्याच्या प्रयत्नात असताना मी त्यांना पाहिलं आहे.त्यांनी मला दाखवून दिलं आहे की अगदी मुलतः आपण सर्व दयाळूपणाच्या मुल्यालाच प्रतिसाद देत असतो.”

“किती रे मोठ्या विद्वान अनुभवी माणसासरखा बोलतोस.मला हे तुझं बोलणं ऐकून एक विचार सुचतो”
असं म्हणत मी त्याला पुढे म्हणालो,
“एकदा मला असं वाटतं की दुसर्‍याशी संबंध ठेवायला जेव्हा आपण मागेपुढे करतो तेव्हा त्याचं मुख्य कारण कदाचीत दुसर्‍याने जर का आपल्याला अव्हेरलं तर आपण मूर्ख भासले जावू ह्या भितीपोटी असावं.पण मला कधी कधी असंही वाटतं की आपण सर्वांशी स्नेहशील राहाण्याची संधी मिळण्याची वाट पहात असतो कारण आपल्याला वाटत असतं की त्यामुळे आपला चांगुलपणा दिसून येईल.”
आपल्या भावंडांची आठवण काढून उमेश मला म्हणाला,
”कुणाला आवडणार नाहीत असं त्यांच्याच मनात येऊन ते कष्टी झाल्याचे मी माझ्या दोन्ही भावंडाना कधीही पाहिलं नाही.काही तरी आनंदाचं घडेल अशी मनोवृत्ती ठेवून ते वागतात.आणि त्यांचा हा यत्न क्वचीतच असफल झालेला मी पाहिला आहे.

जे लोक त्यांच्याशी बोलूं इच्छीत नसण्याच्या प्रयत्नात असावेत अशा लोकांकडून दयाळुपणाची परतफेड व्हावी पण ती परतफेड उपहास होण्यात किंवा अस्विकरण होण्यात येणारी जोखिम न घेता व्हावी अशा प्रयत्नात माझी भावंडं असायची.आणि ती सुद्धा अशा माणूसकी असलेल्या जगात जिथे दयाळुपणाच्या लेन-देनबद्दलच्या उपयुक्ततेला जोर दिला जात नसायचा.तसं पाहिलंत तर लोक पण प्रतिसाद द्यायचे.एखादी अनोळखी व्यक्ती त्यांच्या मैत्रीत असा्वी असं समजणं हे योग्य आहे असं त्यांना नेहमीच वाटतं.”

मी उमेशला म्हणालो,
”मला वाटतं स्वतःला वाटणार्‍या वास्तविकतेबद्दल निर्धारक रहाणं आणि निष्कर्षाला येणं ही एक प्रकिया आहे.अशी प्रकिया की रोजच्या रोज तिचा बोध होण्यासाठी आपली धडपड असते,कधी कधी ही प्रक्रिया दाह दायी असते,कधी कधी ही प्रक्रिया एकमेकाशी संबन्धीत असताना कसं सहानुभूतिपूर्वक असावं हे शिकवून जाते.
अवतीभवती असलेल्या एव्हड्या क्लेषदायी लोकांच्या गराड्यात,आणि ह्या कोलाहल असलेल्या जगात दयाशिलतेला आणि स्नेहभावाला महत्व असणं अस्थायी नाही. खरं तर आजुबाजुच्या लोकांपासून दूर रहाणं म्हणजे आपण नुकसानीत जाणं असं म्हणावं लागेल.”

आपल्या भावंडांची आठवण येऊन उमेश डोळ्यात पाणी आणून म्हणाला,
“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम असण्याचा संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे, उघडपणे आणि निडर होऊन..”

“तुमच्या आईवडीलांचे चांगले संस्कार तुम्हा भावंडावर झाले आहेत हे उघडच आहे”
असं म्हणून मी उमेशला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटली.







श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 18, 2009

मला निस्तब्धता का आवडते.

“माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.”

माझ्या अनुभवानुसार मला गोव्याचे लोक बरेचसे देवभोळे वाटतात.इकडे असलेल्या चर्चाच्या आणि मंदिरांच्या संख्येवरून त्याची कल्पना येते.
मग किरीस्तांव लोकांची निरनीराळी चर्च असोत,किंवा हिंदू लोकांची देवळं असोत. वर्षभरात बरेच उत्सव असतात.देवांच्या मंदिराबरोबर देवींची पण बरीच मंदिरं आहेत. किरीस्तांवांचा नाताळ हा मोठा सण.शिवाय लहान मोठे उत्सव असतातच. मुंबईत वांद्र्याला जसा मथमाऊलीचा उत्सव असतो तसा इथे गोव्यालापण मेरीचा उत्सव असतो.
गणपतीच्या,दत्ताच्या,शंकराच्या,पुर्वसाच्या मंदिराबरोबर शांतादुर्गाच्या, मंगेशी, म्हाळसादेवीच्या मंदिरापर्यंत अनेक मंदिराना भेट द्यायला अनेक लोक उत्सुक्त असतात.
मी गोव्याला आल्यावर ह्या सर्व मंदिराना भेट दिल्याशिवाय रहात नाही.त्या शिवाय मी चर्चाना पण भेट देतो.विशेषकरून खेडेगावातली चर्चं खूपच शांत वातावरणात भासतात.

ह्यावेळी माझा एक मित्र गिरीश बोरकर ह्याला भेटायला त्याच्या घरी खूप दिवसानी गेलो होतो. पेडण्याजवळ एका छोट्या खेड्यात तो रहात आहे.पूर्वी पेडण्याहून ह्या खेड्यात पायी चालत जावं लागायचं. पण आता रस्ते झाल्याने रिक्षेने पण जाता येतं.एकदा ह्या गावात पोहोचल्यावर गजबजाट,गोंगाट म्हणजे काय असतो ते विसरायला होतं.पायवाटेवरून चालत जाताना पायाखालची सुकलेली पानं चिरडली गेल्यामुळे होणारा आवाज पण कधी कधी गोंगाट वाटावा एव्ह्डी शांतता इथे भासते.
गिरीशच्या घरी दोन दिवस राहिल्यानंतर ह्या शांततेविषयी बोलल्याशिवाय मला रहावलं नाही. मी गिरीशला गप्पा मारताना म्हणालो,
“इकडची शांताता बघून माझी खात्री झाली आहे की इकडचे लोक बहिरे नक्कीच नसणार.कारण शहरात राहून गोंगाट कानावर पडून बरेच लोक काही प्रमाणात बहिरे झाल्याचं माझ्या एका कान-नाक-गळा स्पेशालीस्ट डॉक्टर मित्राने मला आंकडेवारी देऊन दाखवलं आहे.
त्यामुळे तू इथे रहातोस,म्हणून सुखी आहेस.कारण त्या गोंगाटातून सुटलास बाबा!”

गिरीशला माझ्या बोलण्याचा अर्थ कळला.पण त्याच्या डोक्यात काही निराळाच विचार आला असावा.मी म्हणतो त्या शांततेच्या पलिकडे जाऊन त्याला काही तरी सांगायचं मनात आलं.
मला म्हणाला,
“मला निस्तब्धता आवडते.
याचा अर्थ जिथे मुळीच कसलाच आवाज नाही ती निस्तब्धता नव्हे.
ती निस्तब्धता की जी मला माझ्या आजुबाजूच्या जगावर लक्ष न ठेवता मी माझ्या आतल्या आवाजाकडे जास्त ध्यान देऊ शकतो.”
मी ह्यावर त्याला म्हणालो,
“तुझं काय?,तुझा इथे पूरा जन्मच गेला आहे.त्यामुळे तुझ्या ह्याबाबतीत अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.मी तुला त्याबद्दल दोष देत नाही.शहरातलेआम्ही इथल्या ह्या शांततेच तृप्त असणार.”

गिरीश अगदी मनापासून हंसला आणि म्हणाला,
“मी अगदी लहान असताना माझी खेळायची जागा म्हणजे आमच्या गणपतीच्या मंदिराचं बाहेरचं पटांगण. रस्त्याच्या पलीकडे आमच्या गावातली मोठी शाळा होती. त्या गणपती मंदिरात माझे वडिल पुजारी होते.आणि आम्ही देवळाच्या आवारातच रहात होतो.
मला अजून आठवतं माझी लहानशी तिनचाकी सायकल होती.आणि मी मंदिराच्या पटांगणाबाहेर जाणार्‍या डांबरी रस्त्यावर चालवीत असायचो.तेव्हारस्त्यावर गाड्यांची तेवढी वरदळ नसायची.
माझी लपायची जागा मला अजून आठवते.गणपतीच्या गाभार्‍याच्या मागे एक लहानशी अडगळीची खोली होती. त्या खोलीवर एक माळा होता.कोळयाची जाळी आणि सरपटणार्‍या पाली शिवाय त्यावर काहीच नसायचं. माळ्यावर एक छोटीशी खिडकी होती.खिडकीला नक्षीकाम केलेले लाकडाचे लहानसेच गज होते.सकाळीच सूर्योदयानंतर कोवळी किरणं त्यातून आत यायची त्यावेळीच काय तो प्रकाश यायचा.कोळ्याची जाळी चमकूनदिसायची. मी ह्या खोलीत एकांतात बसून असायचो. त्या खोलीतली ती थंड निस्तब्धता मला अजून आठवते.त्या खोलीत बसल्यावर जीवन जगत आहे असं वाटायचं.”

मी म्हणालो,
“माझ्या अनुभवानुसार आपलं जग अगदी कर्णकटू झालं आहे असं मला वाटतं.हे जग पूर्ण गोंगाटाने भरलं आहे.समाजातून येणारा गोंगाट आहे, गाड्यांचा, बस्सीचा, टीव्हीचा,लाऊड स्पिकर्सचा,इकडे तिकडे खेळणार्‍या लहान मुलांचा,धर्माच्या नावाखाली केलेल्या आरडा-ओरडीचा मग त्यात तो मशीदीतून असेल किंवा मंदिरातून येणारा घंटानादाचा असेल.मी जिथे वाढलो त्या वातावरणातल्या समाजातून येणारा हा गोंगाट मला एकवेळी मी जीवन कसं जगायचं ह्याचा आदेश द्यायचा. त्यानेच नियम निर्माण केले होते.ह्या समाजाच्या ताबेदार लोकांच्या आवाजात मी वाढलो होतो.म्हणून इकडे आल्यावर इथल्या शांततेचं महत्व चांगलंच माझ्या लक्षात आलं.तुझी गोष्ट मात्र निराळी आहे.पण ह्या निस्तब्धतेबद्दल तू जे काय म्हणतोस ते तुझ्याकडून ऐकावं असं वाटतं.”

“मला आठवतं त्यावेळी मी पंचवीसएक वर्षाचा असेन.माझे बाबा म्रुत्युपंथाला लागले होते.त्या दिवसात मला त्या अडगळीच्या खोलीतल्या निस्तब्धते मधली क्षमता पुन्हा लक्षात आली.मी त्यांच्या बिछान्याजवळ बसून अगणीत रात्री काढल्या होत्या.त्यांच्या तोंडून येणारा आवाज निर्मळ होता,.मला जीवनात खंबीर राहायला त्यांनी शिकवलं,लहान मोठा गोंगाट कसा ओळखायचा ते दाखवलं त्यामुळे त्याकडे कसं दुर्लक्ष करायचा ते त्यांच्याकडून शिकलो.त्यांच्या मृत्युमुळे गोंगाट हा प्रकारच माझ्यापासून दूर केला गेला.आणि असा परिसर निर्माण झाला की निस्तब्धता फुलली आणि फोफावली.”
एव्हडं सांगून झाल्यावर गिरीश जरा गंभिर होऊन मला म्हणाला,
“माझ्यावर तुझा विश्वास बसणार नाही.कदाचीत तू मला हे ऐकून मनात हंसशील.
माझ्या वडलांची गैरहजेरी मला खूप जाणवायला लागली.आणि त्या निस्तब्धतेत- कदाचीत मी पाच वयाच्या असल्यानंतर पहिल्याच वेळी- मी माझा आतला आवाज ऐकला. माझी मुल्यं काय असावीत ते त्या आतल्या आवाजाने मला सांगितलं. माझ्या कमतरता दाखवून माझं अंगातलं बळ त्या आतल्या आवाजाने प्रज्वलीत केलं.मी कोण आहे ते माझ्या आतल्या आवाजाने मला दाखवून दिलं.मी जीवन कसं जगायचं ह्याची स्पष्ट कल्पना दिली.त्या निस्तब्धतेत मी माझा खरा आवाज ओळखू शकलो.आणि असं झाल्यावर गोंगाट हा प्रकारच नाहिसा झाला.”
गिरीशच्या मनातलं हे चिंतन ऐकून मला कुठेतरी वाचल्याचं आठवलं.
मी त्याला म्हणालो,
“मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं,आपल्या प्रत्येकाच्या देहात एक “व्यक्ती” असावी. त्या व्यक्तीचा आतला आवाज ऐकण्याची प्रत्येकाला जरूरी भासत असावी.हा विश्वातला गोंगाट मनुष्याची हत्या करीत आहे.मनुष्याच्या आतल्या आवाजाची दमछाक करीत आहे.आणि मानवतेच्या सामर्थ्याला सीमित करीत आहे.ज्या विपत्ति विरुद्ध मनुष्य प्रयास करीत आहे त्या प्रयासाला हा गोंगाट अविरत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.”
“अगदी माझ्या मनातलं तू सांगितलंस.”
असं म्हणून गिरीश सांगू लागला,
“माझ्या बाबांच्या मृत्युनंतर कित्येक वर्षं रोज मी ह्या,निस्तब्धतेकडे ध्यान देण्याच्या प्रयत्नात असतो.
आमच्या घराच्या मागे माडा-पोफळीच्या बनात मी माझ्या मुलीचा हात हातात घेऊन फेरफकटा मारीत असताना ही निस्तब्धता मला गवसते.माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.माझं जीवन त्यानी कसं सुधारलं ते मी तिला सांगतो.
तू जर इथे कायम राहायला आलास तर ही निस्तब्धता काय आहे ते तुलाही कळेल.”
मी गिरीशला एव्हडंच म्हणालो,
“शहरातल्या गोंगाटापेक्षा इकडची शांतता मला नक्कीच आवडेल.”



श्रीकृष्ण सामंत.

Monday, November 16, 2009

हा तर आहे तराना प्रीतिचा

(अनुवादीत. एक प्यार का नगमा है…..)



खरंतर प्रत्येकाचं जीवन हे एक कथाच असते.सागरातून येणार्‍या लाटेसारखा जीवन एक प्रवाह असतो.दोन पळ जीवनातून थोडं आयुष्य चोरी केल्यासारखं असतं.येणं आणि नंतर जाणं हा जीवनाचा आशय असतो.



हा तर आहे तराना प्रीतिचा
अन प्रवाह चंचल लहरीचा
काय म्हणू मी जीवनाला
आलेख तर हा अपुल्या कथेचा

मिळवूनी हरवते हरवूनी मिळते
जीवनाचा आशय येण जाणे असते
दोन पळ जीवनाची एक चोरी वाटते
नेत्रात सिंधु वसते आशेचे पाणी दिसते

तू प्रवाह नदीचा मी तुझा किनारा
सहारा तू माझा अन मी तुझा सहारा
नेत्रात सिंधु वसते आशेचे पाणी दिसते
दोन पळ जीवनाची तर एक चोरी वाटते

तूफान येईल आणि येऊन ही जाईल
मेघ येईल क्षणभर आच्छादून जाईल
सांवट येऊन जाते निशाणी कायम रहाते
दोन पळ जीवनाची तर एक चोरी वाटते

जो देई मनाला दिलासा तो आयुध हाती घेई
प्राण जाण्यापूर्वी तो आक्रंद करीत राही
खुशीची अभिलाषा रहाते अश्रूंची धार वाहते
सांवट येऊन जाते निशानी कायम रहाते





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 14, 2009

जर,तर,पण,परंतु.

“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”

आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी म्हणालो,
भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं.
ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं आहे?.आशावाद्याची बाजू घेतल्यास, “काहीही होणं शक्य आहे” ह्या म्हणण्याला चिकटून रहावं लागणार.”

“तुमचं म्हणणं “काहीही होणं शक्य आहे” ह्याबद्दल विचार केल्यास, एक दिवस समजा असं समजून घेतलं की,उंदीर पण अकाशात उडू शकतो. तर तसं आशावादी रहायला हरकत नाही.ते तुमच्या दृष्टीने ठीक आहे.कारण विकासाच्या किंवा उन्नतिच्या तत्वानुसार हे ही कधी तरी शक्य आहे.ते तत्व तुमच्या विचाराशी सहमत आहे.”
एव्हडं म्हणून भाऊसाहेब आवंढा गिळत पुढे म्हणाले,
“परंतु,समजा जर का जगातल्या सर्व संशोधकानी समज करून घेतली असती की काही गोष्टी अशक्य आहेत तर मात्र हे विश्व आपण हरवून बसलो असतो.आणि मनुष्याची प्रगती कधीच झाली नसती. माझं हे शक्यतेबद्दलचं तत्व, कुणीसं म्हटलंय त्यातून अभिव्यक्त होतं.

“ऐक कुणी म्हणे हे अनिवार्य आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे करू नये
ऐक कुणी म्हणे हे अशक्य,असंभव आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे होणे नलगे
ऐकशील का माझं बाळा!
काही ही अघडीत नाही
घडणे क्रमप्राप्त आहे.
क्रमप्राप्त आहे. बाळा!”

हे ऐकून मी म्हणालो,
“मनुष्याला कल्पनाशक्ती असते.हे त्याला मिळालेलं उत्तम साधन आहे.
त्यामुळे जीवनातल्या वास्तविकतेतल्या परिसीमेचं हे साधन उन्मूलन करून टाकतं. ह्या कल्पनाशक्तीच्या स्वप्नलोकात संभावनेला पुरेपुर अस्तित्व असतं. आणि तिथे संदेह लुप्त झालेला असतो. ही जादूनगरी सोडली तर मात्र वास्तविकतेची सीमा ह्या स्वप्नलोकात शिरकाव करते आणि ती सीमा स्वप्न-भरारीला अवरोध करते. तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो भाऊसाहेब?”

माझ्या प्रश्नाला उत्तर देताना विचार करून प्रो.देसाई म्हणाले,
“मला वाटतं वास्तविकतेला उगाच किंमत दिली जाते.जर सर्व गोष्टी प्रतिभाशाली व्यक्तीना सीमित असत्या तर e=mc2 हे आपल्याला कधी कळलंच नसतं.स्वतःचे उद्देश साध्य करताना दुसर्‍याच्या परिसीमा पाहून चालत नाही.स्वतःवर स्वतःचा विश्वास हवा. परिसीमा मिथ्या आहेत.आभाळ पण अनंत असतं.”

“म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की ग्लास अर्ध भरलेलं असत्तं?”
मी त्यांना उलट पश्न केला.

“नव्हे,नव्हे,माझ्या ह्या विचारवरून कुणाला वाटेल की माझी समजूत आहे की ग्लास अर्ध भरलेलं आहे.खरं तर प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात.मस्तक असतं तिथे शेपूट असतं,”इन फॉर यान्ग” असं चीनी भाषेत म्हणतात तसं.”
असं उत्तर त्यांनी मला दिलं.

“मग भाऊसाहेब,मला असं वाटतं काही ही शक्य आहे.आणि ते होण्यासाठी एखाद्याने आपले सर्व परिश्रम सर्व काळ वापरलायला हवेत.ढिलाईला वाव नसावा. अवसर घेऊन चालणार नाही.माझं हे म्हणणं कुणाला भयभीत केल्यासारखं दिसेल. पण माझं भाकित आहे की सरतेशेवटी परिश्रम आणि मिळणारं फळ यात संतुलन होत असतंच.” मी म्हणालो.

“मला वाटतं,आपल्या करणीचं आपल्याकडेच उत्तरदायित्व असावं, आणि दोषारोपण करणं म्हणजे आपल्याच अयोग्यतेचं लटकं कारण दाखवणं.”
असं म्हणून झाल्यावर प्रो.देसायानी एक छान उदाहरण दिलं.
ते म्हणाले,
“माझं ग्लासाबद्दलचं उदाहरण हे वयक्तिक दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
मुंगी होऊन मी जर ह्या बदनाम ग्लासाजवळून जाताना वर दृष्टीकरून पाहिलं तर मला ग्लास अर्ध भरलेलं दिसणार.पण मी जर का एखादा तहानेलेला दैत्य होऊन वरून ग्लासाकडे पाहिल्यास नक्कीच ग्लास अर्ध रिकामं दिसणार.”

ह्या विषयावर आणखी बोलण्यासारखं काही राहिलं नाही हे माझ्या लक्षात येताच मी समारोप करताना प्रो.देसायांना म्हणालो,
“ह्या प्रश्नाला माझ्या कडून उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com