Sunday, August 29, 2010

लेखन करण्यात मला विशेष वाटतं.

“मला वाटतं माझं लेखन,मला जे हवंय, ते देऊ शकतं आणि माझ्या लेखनातून,मला जे हवंय,ते होऊ शकतं.”

एका सेमिनारमधे माझी आणि महेंद्र नाडकर्णीची भेट झाली.महेंद्र उत्तम लेखक आहेत हे मला पूर्वीच माहित होतं. पण ह्या सेमिनारमधे मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं.पन्नाशीत आलेले,सहाजीकच स्थुलतेकडे थोडे झुकलेले,डोक्यावरचे केस विरळ होण्याच्या मार्गाला लागलेले,छुटकुल्या उंचीचे,चेहर्‍यावर मिस्कील हास्याची लकीर भासवणारे महेंद्र नाडकर्णी मला माझ्या मनावर छाप पाडणार्‍या व्यक्तीमत्वाचे वाटले.

सेमिनारमधे ज्या विषयावर आम्हा दोघांना विशेष स्वारस्य नव्हतं त्या तासाला आम्ही गरम गरम कॉफीच्या पेल्यावर कॅन्टीनमधे गप्पा मारण्यात वेळ घालवायचं ठरवलं.
महेंद्रांची आणि माझी आमच्या एका सामाईक मित्राने ओळख करून दिली.तो मात्र कॅन्टीनमधे आमच्या बरोबर नव्हता.

“तुम्ही लेखन करायला कसे प्रवृत्त झाला?”
असा सरळ प्रश्न मी नाडकर्ण्यांना केला.मला माहित होतं की ते मनात येईल ते मला बिनदास सांगतील.त्यांचे अनेक लेख मी वाचले होते त्यावरून अनुमान मी काढलं होतं.

“दुसर्‍या कुठल्यातरी विश्वाच्या प्रवेशदाराशी मी ऊभा आहे अशी मी कल्पना करतो.त्या विश्वातलं अंत नसलेलं लांबच लांब मैदान बघून माझे डोळे दिपून जातात.त्या जगातल्या अतीशय खोल गहराईचा मी शोध घेत आहे अशी कल्पना करतो.जशी मी कल्पना करीन तसं ह्या जगात होत राहिलंय.

अनेक तर्‍हेचे जीव आणि इतर गोष्टी माझ्या अवतिभोवती निर्माण होत आहेत आणि त्यांचा लोपही होत आहे.मला भासतं की ह्या जगात मी माझ्या मनानेच यात्रा करीत आहे. ह्या साहसी विचारामुळे लेखन करण्यावर आणि लेखनावर विश्वास ठेवण्यावर मी प्रवृत्त झालो आहे.”
मला अपेक्षीत होतं तसं, महेंद्रानी मला बिनदास सांगून टाकलं.
असं म्हणून झाल्यावर मलाच त्यांनी विचारलं,
“तुम्ही केव्हां पासून लेखन करायला लागला.?”

“मला आठवतं,माझ्या शालेय जीवनात लेखन करीत असताना,मी स्वतःला शास्त्रज्ञ समजून फुलांचा सुगंध येणार्‍या सुगंधी सुपारीचा शोध लावला आहे आणि माझ्या वर्गातली सर्व मुलं तसली सुपारी तोंडात ठेवून चघळत आहेत,त्या आमच्या कोंदट वातावरणातल्या वर्गात फुलांचा सुगंध दरवळत आहे असं चित्र मनात आणून ,शब्द कानात ऐकून कागदावर लिहिण्याचा पहिला प्रयत्न मी केला होता.”
मी लागलीच त्यांना सांगून टाकलं.

माझं हे ऐकून महेंद्र मला म्हणाले,
“मी लेखनाला विशेष मानतो कारण मला माझं लेखन एका मोठ्या प्रवासाला नेत रहातं.कसलही लेखन, माझ्या आतून, माझ्या विचाराना,माझ्या भावनाना आणि माझ्या प्रतिभासाना,खेचून बाहेर काढतं.जे काही मी लिहितो त्यांने मी आनंदीत होतो.
मनातल्या मनात साहस करून, नंतर अंतर्धान पावून जाण्यात मिळणार्‍या क्षणात मी मौजमजा करू शकतो.”

“तुम्ही कविता पण लिहिता.मी तुमच्या कविता वाचल्या आहेत.तुम्ही कुठं तरी म्हटल्याचं मी वाचलंय,की तुम्ही अगदी लहानपणापासून कविता लिहित होता.तुमची पहिली कविता तुम्हाला आठवते का?”
मी महेंद्राना विचारलं.

“माझ्या आजीवर मी पहिली कविता लिहिल्याचं मला आठवतं.”
कोणती कविता हे आठवणीत आणण्यासाठी जरा नजर तिरकी वर करून थोडा विराम घेऊन मला म्हणाले.

“मग आठवत असेल तुम्ही ती कविता लिहायला कसे उद्युक्त झाला?”
मी कुतूहलाने त्यांना विचारलं.

“माझ्या आजीला स्मृतीभ्रम झाला होता.त्या रोगाशी तिने दोन हात केले.तिच्या निधनानंतर मी ही कविता लिहिली होती.ती लिहायला मला जास्त प्रयास पडला नाही.अगदी सहजपणे माझ्यातून माझं दुःख आणि मनातला उजाडपणा मी कागदावर लिहिला.माझी आजी स्वतंत्र वृत्तीची आणि खंबीर मनाची होती.माझी कविता ही माझ्यातर्फे तिला दिलेली श्रद्धांजलि होती.मी माझ्या मनात तिला कसं आठवून ठेवावं,असं तिला जे वाटत होतं ते
माझ्या आठवणीत रहाण्यासारखी ती कविता होती.
माझं हे लिखाण माझ्या दुःखावरचा उपाय होता.
“मी तुला आठवत रा्हीन,तुझं बलस्थान आठवत राहीन आणि त्याचबरोबर तुला झालेल्या वेदना विसरून जाईन” असाच काहीसा आशय त्या कवितेत होता.

लेखनाबद्दल मला विशेष वाटत असतं.लेखन करणं ही एक जादू आहे असं मला वाटतं.लेखन म्हणजे आत्म्याला उपचारात्मक दिलासा दिल्यासारखा आहे.माझ्या भावनाना बदल देण्याची लेखनात क्षमता आहे.माझं मन जेव्हा सैरभैर असतं तेव्हा मनात असणार्‍या भावना शब्दात उतरवून माझ्या शीरावरचं जड दडपण कमी केलं जातं असं मला वाटतं.कविता लिहूनही हे साध्य होतं.यशाबद्दल आणि सुखाबद्दल लिहूनही माझं मन आशेने आणि प्रेरणेने ओथंबून जातं.
लेखन सहज करता येतं असं काहीना वाटत असतं,माझे वर्ग मित्र मात्र लेखन करायला घाबरायचे.मी मात्र आशा करीत असतो की मी लेखन करून काहीतरी निर्मिती करावी.
इतर लेखक,जी काही निर्मिती करतात ती पाहून माझं मन उत्तेजीत होतं.”

मी त्यांना म्हणालो,
“मी ज्यावेळी लेखन करतो त्यावेळी मी मला स्वतःला जरा कमजोर झाल्यासारखा समजतो.जणूं एखादं अदृश्य, करणारं कवच माझ्यावरून काढून टाकलंय, मी अनादर आणि समालोचनासाठी उघडा पडलोय असं वाटतं.हे शब्द काहीसे वेदनादायक वाटतील.”

“मलाही तसंच वाटत असतं.”
महेंद्र मला म्हणाले.नंतर म्हणाले,
“जे स्वतःचे सुझाव दुसर्‍यासाठी पुढे आणतील, काळजीपूर्वक लेखाची छाननी करतील आणि अनुमान काढतील अशा लोकांच्या प्रतिक्षेत मी असतो.ते पण स्वतः लेखक असतात आणि मला त्यांच्याबद्दल मनस्वी आदर आहे. तसंच त्यांच्या हिम्मतीबद्दल आणि झळाळीबद्दल सुद्धा आदर आहे.”

माझ्या हातातलं पुस्तक पाहून मला महेंद्र म्हणाले,
“ही कादंबरी मी वाचली आहे.अप्रतीम लेखन आहे.तुमचं काय मत?”

“अलीकडेच मी ह्या लेखिकेची कादंबरी वाचायला घेतली आहे.तिने आपल्या लेखनात सुंदर आणि परिणामकारक शब्द वापरले आहेत.ही कादंबरी वाचत असताना मी माझ्याच वास्तविकतेच्या खोलात शिरण्याच्या प्रयत्नात राहिलो.प्रत्येक शब्द इतका खोलवर भिनतो की मला त्या शब्दांतून दुःखाची तीव्रता झोंबते.”
मी माझं मत दिलं.

ते म्हणाले,
“लेखन हेच माझं सर्व काही आहे, असं मला वाटतं.मला वाटतं लिखाण करणं ही एक सफर आहे,जादूची शक्ती आहे आणि संमिश्रीत साहसाचा प्रयत्न आहे.मला वाटतं माझं लेखन,मला जे हवंय,ते देऊ शकतं आणि माझ्या लेखनातून, मला जे हवंय, ते होऊ शकतं.”

एव्हडं म्हणून महेंद्र नाडकर्णी आणि मी उठलो.पुढच्या तासाचा विषय ऐकायला हजर रहाण्यासाठी आमचा सामाईक मित्र आम्हाला बोलवायला आला होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, August 27, 2010

गतकालातल्या एखाद्या घटनेची आठवण.

“आम्ही आमच्या बागेतला,मोठ्यात मोठा फणस, कोकणातून कसा आणला होता हे सर्व चित्रातून, एक शब्द न बोलता, स्पष्ट करता येतं.”

मी मागच्या पावसाळ्यात गोव्याला सुट्टी घेऊन गेलो होतो,त्यावेळी करमकर कुटूंबाची आणि आमची बीचवर वरचेवर भेट व्हायची.करमरकरांची कुसूम हातात सतत कॅमेरा बाळगून असायची.दिसेल ते ती कॅमेर्‍यात टिपत असायची.त्याबद्दल कुतूहल वाटून मी तिला विचारल्यावर ती मला हंसून म्हणाल्याचं आठवतं,
“मी फोटॉग्राफीकडे नेहमीच उत्कटतेने पहात असते.”

हे तिचं वाक्य आज लक्षात का आलं,याचं कारण कुसूमला मी आज एका लग्नात पाहिलं.लग्नाच्या सोहळ्यात ती हातात कॅमेरा घेऊन तसंच करीत होती.पटापट चित्र शूट करीत होती.
आज मात्र मी ठरवलं होतं की ह्या तिच्या उद्दोगाचं वेड काय आहे ते समजून घ्यावं.
लग्नातलं दुपारचं जेवण झाल्यावर संध्याकाळी स्वागत समारंभ होता,त्यासाठी घरी न जाता हॉलवरच वेळ काढायचा मी ठरवलं होतं.कुसूम पण तेच करणार होती.त्यामुळे तिच्याशी गप्पा करायला उत्तम समय मिळाला होता.

“मागे एकदा आपण गोव्याला भेटलो होतो तेव्हा मी तुला तुझ्या फोटो टिपत जाण्याच्या संवयी बद्दल विचारलं होतं. तुला आठवत असेल.”
मी कुसूमला म्हणालो.

कुसूम मला म्हणाली,
“हो मला आठवतं.आणि मी तुम्हाला उत्तर दिलेलंही आठवतंय.”

“मग सांग बघू तुझ्या फोटॉग्राफीच्या उत्कटतेबद्दल.आपल्याला आता बोलायला भरपूर वेळ आहे.”
मी म्हणालो.

कुसूम मला सांगू लागली,
“आपण कोण आहोत,ते आपल्या मनातल्या स्मृती आपल्याला कल्पना करून देतात.आपला गतकाल काय होता ते आपल्या स्मृती सांगतात. आणि भविष्यात जे काही घडणार आहे,ते घडून गेल्यावर,आपल्या स्मृतीतून कळणार आहे हे आपल्याला माहित असतं.
ज्या घटनेमुळे स्मृती निर्माण होते,चांगली असो वा वाईट,ती घटना अक्षरशः जीवनातला एकवेळच्या अनुभवामुळे असते. त्या घटनेची जशासतशी पुनरावृत्ती केली जाणं अशक्य आहे.आणि त्यासाठीच आपल्या मनावर आपण अवलंबून असतो कारण त्यामुळेच आपल्या जीवनातली महत्वपूर्ण घटना लक्षात रहाते.अगदी काही फार मोठं घडण्याची जरूरी नसते.कुणाबरोबर देवळात गेल्याची आठवण किंवा आपल्या आईबरोबर बराच वेळ घालवल्याची
एखादी आठवण पुरे होते.

आपण ज्या प्रसंगातून जातो ते सर्व स्मृतीत असलं तरी वास्तविकता म्हणून आपल्या जवळ नसतं.पण एक गोष्ट आहे.चित्राच्या रूपाने किंवा तस्वीरीच्या रूपाने ते आपल्या जवळ ठेवता येतं.आणि यासाठीच मी फोटॉग्राफीकडे उत्कटतेने पहात असते.एक बटन दाबून मला,क्षणातली एकच एक घटना काबीज करून ठेवता येते. अशीच एखादी घटना की तिला पाहून मला माझा गतकाल या क्षणाला आठवला जाईल.
ह्या अशा चित्रांमुळे,लोकांना पूर्णपणे जे काही घडलं त्याचं स्मरण करून ठेवण्याची जरूरी भासत नसावी.खरंच,किती विस्मयजनक आहे की अगदी साधा गुळगुळीत,चमकणारा हा कागदाचा तुकडा आपली स्मृती शाबूत ठेवायला मदत करतो.
माझी डायरी चित्रांनी भरलेली असते.बरेच लोक डायरी किंवा वार्तापत्र ठेवण्यासाठी कागद आणि पेनची मदत मिळण्याच्या खटपटीत असतात.मी कॅमेर्‍याची मदत घेते. पुढे कधीतरी माझ्या आठवणीत रहाण्यासाठी अगदी बारीकसारीक गोष्टी टिपून ठेवायाला मला ही वस्तू शक्य करते.

काल पाहिलेला रमणीय सूर्यास्त मी कसा वर्णन करू ह्याची चिंता मला लागत नाही. समुद्रात कोळ्याने दाखवलेला तो मासा किती मोठा होता किंवा सूर्यास्त होत असताना पाहिलेले विविध रंग किती विस्मयकारक होते हे चित्रात जसेच्यातसे काबीज करून ठेवता येतात.

भविष्य काळात माझी स्मृती पुस्सट व्हायला लागली तरी मला त्या चित्राकडे बघून गतकालाचा अनुभव पुन्हा घ्यायला सोपं जाणार.”

मधेच मी कुसूमला अडवीत म्हणालो,
“मला कुणीतरी म्हटल्याचं आठवतंय,
प्रत्येक चित्रात हजार शब्द बोलके असतात.मी ह्या म्हणण्याशी पूर्ण सहमत आहे.”

“अगदी माझ्या मनातलं बोललात”
असं म्हणून कुसूम पुढे सांगू लागली,
“भर पावसात मी आणि माझे बाबा एकाच छत्रीतून कसे भिजून आलो होतो,माझा हायस्कूल मधला सोहळा कसा झाला होता,आम्ही आमच्या बागेतला,मोठ्यात मोठा फणस, कोकणातून कसा आणला होता हे सर्व चित्रातून, एक शब्द न बोलता, स्पष्ट करता येतं. त्या चित्रात आम्ही होतो ह्याची साक्ष विनासायास,टिपली गेली आहे.”

“अनेक लोक फोटो शूट करताना मी पाहिले आहेत.पण तुझ्या सारखी एखादीच व्यक्ती,इतक्या तन्मयतेने,आणि इतका विचार करून, तू म्हणतेस तशी, “उत्कट” होऊन काम करताना मी पहिल्यांदाच पहात आहे.”
असं मी सांगेपर्यंत दुपारचा चहा घेऊन एक माणूस आला आणि त्याने मला कुणीतरी बोलवतंय म्हणून निरोप दिला त्यामुळे आमचा विषय तिथेच संपला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 24, 2010

आईस्क्रीम कोन खाण्याची कला.

“माझी जीभ,ह्या शंकूच्या टेंभ्यावर चक्राकार फिरवून,खाली-वर करून,नाचत रहाते.असं करताना,समतोल राखून,साफसूफ करून आकार देत देत,एक ठिसूळ,कलात्मक वास्तु तयार होते.”

जूनमधे पाऊस येण्यापूर्वी मे महिन्याचा उष्मा पराकोटीचा असतो.आज जास्तीत जास्त पारा वाढणार आहे म्हणून हवामान खात्याने भाकीत केलं होतं.

माझा पुतण्या माझ्याकडे आला होता.संध्याकाळीही एव्हडा उष्मा होतो हे पाहून त्याने मला गोड सुचना केली. आपण जुहू चौपाटीवर जाऊन बास्कीन-रॉबीनचं आईसक्रीम खाऊ या.मी लागलीच कबूल झालो.आईसक्रीमच्या दुकानात गेल्यावर माझ्या पुतण्याने एक भन्नाड कल्पना सुचवली.येताना त्याने आईस कन्टेनर बरोबर घेतला होता. मी तेव्हडं लक्ष दिलं नव्हतं.

मला म्हणाला,
“दुकानात बसून आईसक्रीम खाण्यापेक्षा आपण आईसक्रीम कोन घेऊया आणि बीचवर समुद्राच्या पाण्यातून पाणी तुडवीत जाता जाता कोन खात खात चालूया”
मला काहीच प्रॉबलेम नव्हता.जवळ जवळ एक डझन निरनीराळ्या आईसक्रीमचे कोन घेऊन आम्ही निघालो.
“खाऊन उरले तर घरी घेऊन जाऊया”
मला पुतण्या म्हणाला.

आज समुद्रावर भरती होती.चौपाटीवर पाणी किनार्‍यावर भरपूर आलं होतं.भरतीमुळे समुद्रावरून हवा किनार्‍यावर येत होती. त्यामुळे घरी होणारा उष्मा मुळीच जाणवत नव्हता.एक एक कोन खाऊन झाल्यावर,
“जरा वाळूवर बसुया”
म्हणून माझा पुतण्या मला म्हणाला.
सन -ऍन्ड -सॅन्डच्या किनार्‍यावरच्या भिंती जवळ आम्ही जाऊन बसलो.
“पाण्यात चालत चालत जाता जाता कोन खाऊंया असं तू म्हणालास आणि एकच कोन खाऊन बसायचं का ठरवलंस?”
मी कुतूहल म्हणून माझ्या पुतण्याला विचारलं.

मला म्हणाला,
“माझ्या मनात एक विचार आला आणि तुम्हाला सांगून टाकावा असं वाटल्याने मी लगेचच माझा तो विचार बदलला.”
आणि पुढे सांगू लागला,
“मघाशी तुमच्याबरोबर चालत असताना मला माझ्या लहानपणाची आठवण आल्याशिवाय राहावलं नाही.माझे बाबा, तुम्ही आणि मी बरेच वेळा आईसक्रीम खायला जायचो.मला आईसक्रीम आवडतं हे माझ्या बाबांना चांगलच माहित होतं.बरंचसं आईसक्रीम, माझ्या तोंडात जाण्याऐवजी, चेहर्‍यावर चोपाडलं जायचं.माझे हात चिकट होऊन, माझी बोटं बुळबूळीत होऊन जायची,आईसक्रीममुळे कोन दलदलीत व्हायचा आणि ते रुचकर मिष्ठान्नं पूरं संपवू शकत नसायचो.त्या दिवसांची मला आठवण आली.आता वाटतं काय तो कोन व्यर्थ फुकट जायचा.”

मला त्याचं लहानपण आठवलं.मी म्हणालो,
“लहान वय असताना भला मोठा आईसक्रीमचा कोन खायला दिल्यावर तू म्हणतोस तसंच होणार.पण खरं सांगू, आईस्क्रीम कोन चाटणं ही एक कला आहे असं मला वाटतं.
ऐकून जरा चमत्कारीक वाटेल,पण ही अगदी साधी आणि मस्त आनंद देणारी क्रिया बरीचशी दुर्लक्षीत झाली आहे.”

माझं हे बोलणं ऐकून पुतण्या मला म्हणाला,
“आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की,आईस्क्रीम कोन हे काही नुसतं हातात धरून खायचं गोड मिष्ठान्नं नाही. उलट मला वाटतं,तो एक छोटासा मलाईदार बर्फाचा,कुरकूरीत पिठाच्या शंकूच्या बैठकीवर बसवीलेला, पुतळा आहे असं मी समजतो.”

“मला वाटतं तू शिल्पकार झाल्यानंतर असले विचार तुझ्या मनात येत असावेत.कारण तू पुतळा वगैरे म्हणतोस म्हणून माझ्या मनात तो विचार आला.”
मी म्हणालो.

“माझी जीभ,ह्या शंकूच्या टेंभ्यावर चक्राकार फिरवून,खाली वर करून,नाचत रहाते.असं करताना,समतोल राखून, करून आकार देत देत,एक ठिसूळ,कलात्मक वास्तु तयार होते.”
असं म्हणून माझ्याकडे माझा पुतण्या,मी काहीतरी बोलेन,याची अपेक्षा करीत बघत राहिला.

मी त्याला हंसून इशारा केला,
“बोल,आणखी बोल मला तुझं शिल्पकार पुराण ऐकायचं आहे”

जरा खाकरून गळा साफ करीत म्हणाला,
“तुम्ही असं म्हणताच तर नेहमीच मला आईसक्रीम कोन खाताना काय वाटतं,माझ्या मनात काय विचार येतात, ते तुम्हाला सांगतो.
जसं चांभाराचं लक्ष चप्पलाकडे,स्वयंपाक्याचं लक्ष मोठ्या झार्‍याकडे,गाणार्‍याचं लक्ष पेटी-तबल्याकडे,तसंच माझं लक्ष वास्तु बनवण्याकडे जात असतं.

आईसक्रीम कोन खाताना माझ्या ह्या उत्तम कृतीत क्षणभर मी मुग्ध झालो असताना,आणि स्वर्गीय सुखाची चव घेत असताना, पिक्यॅसो,विन्सी,राजा रवीवर्मा, आणि आताचे एम.एच.हुसेन ह्यांच्या सारखं माझ्याच कला-कृतीबद्दल मी मुल्यमापन करीत असतो.कॅनव्हासवर रंग घेऊन ब्रशचे फटकारे मारल्यासारखं मी माझ्या जीभेने आईस्क्रीमवर फटकारे मारतो.अशावेळी माझ्या कलाकृतीची बनावट पहाण्यात मी दंग रहातो.”

मी म्हणालो,
“आता संध्याकाळ आहे म्हणून ठीक.पण जर का उन्हात आईसक्रीम खायला लागलास तर ते वितळून जाणार.आणि तुझा पुतळा दिसणार नाही.”

“त्याचंही माझ्याकडे स्पष्टीकरण आहे.”
मला सहजच सांगू लागला,
“सूर्यप्रकाश जरा तीव्र झाल्याने माझं आईसक्रीम वितळायला सुरवात झाली की अशावेळी व्यग्रतेने मी माझा आईसक्रीम कोन चाटत असताना, एखाद्या आर्किटेक सारखं युक्तिपूर्वक विचार करून मी सत्वर माझ्या डोक्यात एखाद्या नकाशाची रूपरेखा तयार करतो. तितकी प्रवीणता दाखवून,मी माझ्या आईसक्रीम कोनला अशा प्रकारे आकार देण्याच्या प्रयत्नात रहातो की,त्या कुरकूरीत शंकूच्या बाहेरच्या भागावर ते आईसक्रीम ओघळून जावू
नये म्हणून,आणि बरोबरीने आईसक्रीमचा थेंब अन थेंब वाचवावा म्हणून प्रयत्नात असतो.”
पुन्हा थोडासा थांबून,चेहरा थोडा गंभीर करून मला म्हणाला,
“नंतर नंतर माझे बाबा मला आईसक्रीमचे लाड पूरवीत नसत.आईसक्रीम देण्यापूर्वी सौदा व्हायचा.”
मला माझ्या भावाची आठवण आली.तो बराच व्यवहारी होता.आपल्या वडीलांची काय आठवण करून सांगतो ते ऐकायला मला कुतूहल निर्माण झालं.

मी म्हणालो,
“मी तुझ्या बाबाला चांगलाच ओळखतो.माझा भाऊच पडला की रे. पण तु कसा ओळखतोस ते ऐकायला मला आवडेल.”

मला पुतण्या सांगू लागला,
“मला आठवतं माझ्या किशोर वयात वरचेवर आईसक्रीम खायला मला मिळत नसायचं.,मला चांगले मार्क्स मिळाले तर, कुठच्यातरी सोहळ्याला जायचं असलं तर किंवा माझ्याकडून अतीशय चांगलं आचरण झाल्याचं दिसून आलं तरच आईसक्रीमच्या दुकानात जायला मिळायचं. व्हेनीला आईसक्रीमची ती सुंदर कृती,त्यावर शिंपडलेले ते रंगीबेरंगी चॉकलेटचे कण असलेला तो आईसक्रीमचा कोन माझ्या हातात पडल्यावर माझ्याकडून निमीषात तो माझ्या तोंडात कोंबला जायचा, आणि असं करताना मी काहीसा असफल होऊन माझा मेंदू सुन्न होण्याची पाळी यायची.”

मी माझ्या पुतण्याचं सान्तवन करण्याच्या विचाराने त्याला म्हणालो,
“आता तर ह्या वयात तुझ्या अनुभवात खूपच सुधारणा झाली आहे.आता तर तू आईसक्रीमच्या कोनाकडे एक रुचकर कलाकृती असं पाहून,तो खाताना प्रत्येक क्षण उराशी बाळगून घालवत आहेस.तू मनमुराद त्याचा स्वाद घेत आहेस.
नाहीतरी,आईसक्रीम सारख्या मिष्ठान्नाची मजा लुटताना जीवनात जल्दबाजी करून काय फायदा?”

आता समुद्रावर काळोख झाला होता.उरलेले आईसक्रीम कोन वितळून जाऊ नयेत म्हणून आम्ही घरी चालत न जाता,रिक्षा करून गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, August 22, 2010

कसे कळावे विधात्याला

अनुवादीत

नका विचारू त्या बावळ्याला
काय बेतले त्या बिचार्‍यावर
विचारा त्याच्या अंतराला
काय बेतले मनोकामनेवर

पाजतो तो इतरां
अन तहानलेला स्वतः
कसे कळावे पिणार्‍याला
काय बेतले मधूपात्रावर

नका विचारू त्या बावळ्याला
काय बेतले त्या बिचार्‍यावर

घडविले विधात्याने मानवां
अन प्रीति करी तो स्वतः
कसे कळावे विधात्याला
काय बेतले त्या मानवावर

नका विचारू त्या बावळ्याला
काय बेतले त्या बिचार्‍यावर

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 21, 2010

फास्कूचं प्रेम.

“इतक्या वर्षांनंतर अजून पर्यंत तू त्या जोषाचा आनंद घेत असतोस. समुद्राच्या इतकं जवळ राहून,पडावातून भर समुद्रात जाऊन मासेमारी करण्याच्या व्यवसायामुळे तू तुला नशीबवान समजत असावास”.

दर पावसाळ्यात मी कोकणात जातो.मला कोकणातला पावसाळा खूप आवडतो.मे महिन्याच्या उष्म्याने हैराण झालेले लोक पावसाची वाट पहात असतात.मृग नक्षत्र लागलं की कोकणी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असतो.पूर्वी घडाळाच्या काटयासारखा पाऊस सात जूनला कोकणात कोसळायचा.पाउस येण्यापुर्वी एखादा आठवडा वावटळी वार्‍यांना जोर यायचा.मे महिन्याच्या शेवटी शेवटी असं व्हायचं.पावसाच्या आगमनाची ते संकेत असायचे.

कडाम कुडूम असा आवाज काढून वीजा चमकायला लागल्या की समजावं साहेब येत आहेत.
“इलो रे इलो” असं जोरात रस्त्यावरून कुणीतरी ओरडत जायचं.”इलो” म्हणजे कोण “इलो” हे ज्याने त्याने समजायचं.पावसाला एखादा पाहूणा समजून त्याला उद्देशून बोलायचे.

पहिल्या आठ दिवसात पाऊस कोसळून कोसळून गार गार झाल्यावर कोकणातलं वातावरण कॅलिफोरनीया सारखं वाटायचं.
मग बाजारात ना ना तर्‍हेची फुलं यायची.चाफ्याच्या फुलाचे किती प्रकार? नागचाफा,सोनचाफा,कवटीचाफा,देवचाफा,हिरवाचाफा.ओवळीची फुलं,आबोलीची फुलं,सुरंगीची फुलं, कमळं, कृष्ण कमळं किती फुलांची नावं घ्यावीत.
आणि लवकरच गणपतीबाप्पाचं आगमन होणार ह्याची चाहूल लागायची.

ह्यावेळी मात्र पावसाळ्यातल्या पहिल्या आठवड्यात मी कोळी वाड्यात माझ्या मित्राला- पास्कला -भेटायचं ठरवलं होतं.त्याच्याशी गप्पा मारत एक दिवस काढायचं ठरवलं होतं.पास्कल माझा शाळकरी मित्र.आम्ही त्याला फास्कूच म्हणायचो.ताजे मासे हवे असल्यास माझी आई फास्कूकडे जाऊन घेऊन यायची.फास्कूचे मासे-मारीचे पडाव होते.

पावसाळ्यात पडाव, मासे-मारीसाठी जात नाहीत हे मला माहित होतं.म्हणूनच पास्कल घरी नक्कीच भेटणार ह्या उद्देशाने मी त्याच्या घरी गेलो.
कोळीवाड्यातली घरं सारखीच दिसायची.पास्कलचं त्यामानाने जरा हटके होतं.अलीकडेच त्याने चिरेबंदी घर बांधून छप्पर मंगळोरी कौलांनी शाखारलं होतं.त्यामुळे घर ओळखून काढायला सोपं होतं.
फास्कू मला पाहून खूश झाला.आणि म्हणाला,
“ये बामणा ये.खूप दिवसानी इलंस.वाट चूकलंस नाय मां?”
शाळेत असल्यापासून फास्कू मला बामण म्हणूनच संबोधायचा.कदाचीत हे त्याने आपल्या आजीकडून उचलं असावं. लहानपणी त्याच्या घरी गेल्यावर माझं नाव घेण्याऐवजी मला बामण म्हणायला तिला सोपं जायचं.
“पावसाळ्यात पडाव समुद्रात जात नसल्याने तुम्हा लोकांचं वेळ घालवणं मोठं कठीण जात असेल नाही काय?”
मी फास्कूला प्रश्न केला.

मला म्हणाला,
“आम्हा कोळ्याना पडावात बसून समुद्रात मासे मारायला जाणं म्हणजे एक प्रकारचं कुटूंबीयानी एकत्र आणण्यासारखं आहे.पडावात असणं म्हणजे एक प्रकारचा आराम वाटतो,नव्हेतर काहीतरी शिकल्यासारखं वाटतं,एक प्रकारची जोखीम घेऊन पुढचा मार्ग काटण्याच्या प्रयत्नात असल्यासारखं वाटतं.
पावसाळा सोडलातर वर्षाच्या इतर दिवसात समुद्रावर रहायला मोकळीक असते.समुद्र अक्षुब्ध असताना वातावरणातली शांतता,आणि सहज बदलणार्‍या,नाजूक हेलकावे देणार्‍या लाटा हळू हळू पडावाला क्षितीजाकडे नेत असतात.”

“सांग रे पास्कल तुझा लहानपणापासूनचा अनुभव.मला ऐकायला बरं वाटेल”
मी लागलीच त्याला म्हणालो.
पास्कल सांगू लागला,
“आईवडीलांबरोबर मी वयाच्या तिन वर्षापासून पडावात बसून समुद्राचं वातावरण उपभोगलं आहे.माझ्या म्हातार्‍या आजीकडे माझी आई माझ्या सुरवातीच्या वयात मला ठेवून जायची.आणि त्यानंतर आईवडीलांबरोबर जायला मला चटक लागली होती.अगदी ते जाणं नैसर्गिक होतं.”
फेणीची बाटली ग्लासात रिकामी करीत करीत,
“तू सोवळो बामण तुका ह्या जमांचां नाय.पाणी-कम-दुधाची कॉफी माझी बाईल तुझ्यासाठी करताहां.वाय़ंच धीर धर.”
असं म्हणून फास्कू घोट घेण्यासाठी ग्लास तोंडाजवळ नेत रंगात येऊन म्हणाला,
“मी जसा मोठा होत गेलो,तसा माझे बाबा मला पडावाविषयी आणि समुद्राविषयी जास्त माहिती देऊं लागले. पाण्यात होडी कशी ढकलायची,व्हल्लं कशी हलवायची,शीडं कशी उघडायची आणि वार्‍याला सामोरं जाऊन शीडांची दिशा कशी पकडून धरायची.रापणीसाठी जाळं कसं समुद्रात पेरायचं,जाळ्याला ओढ लागल्यावर भरपूर मासे लागल्याने जाळी खेचून पडावात कशी डाळून ठेवायची,एक ना अनेक कामं मला समजावली होती.मी सतरा वर्षाचा होई पर्यंत ही सगळी कामं आत्मसात केली होती.कधी कधी मी शाळेला बुट्टी मारायचो.त्याचं कारण हेच.”

“का रे? तुला शिक्षणात गम्य नव्हतं का? नंबर तर तुझा चांगला वरचा असायचा”
पास्कला आमचे गुरूजी हुशार मुलगा आहे असं समजायचे ते आठवून मी त्याला म्हणालो.

मला म्हणाला,
“वडील म्हणायचे शिकून तरी काय करणार.शेवटी समुद्रातच आयुष्य घालवायचं आहे.मला माझ्या बाबांचं हे म्हणणं पटायचं नाही.पण त्यांचं मन मोडवत नव्हतं.त्यामुळे कधी कधी शाळेत गैरहजर रहायचो.”
आणि पुढे सांगू लागला,
“ही मासे-मारीची सर्व कामं मला शिकून अंगवळणी करायला जास्त वेळ लागला नाही.
आता माझ्या आईबाबांच वय झालं आहे.तेव्हा मीच ही सर्व कामं करतो.फरक एव्हडाच की आता माझ्याबरोबर माझी बायको आणि मुलगा असतो.
पण मुलाला मी शाळेत गैरहजर होऊ देत नाही.शाळेच्या सुट्टी दिवशी मी त्याला निक्षून घेऊन जातो.माझा मुलगा पण ह्या कामात स्वारस्य घेतो.
माझ्या कुटूंबीयाना पडावातून घेऊन जायला मला खूप आनंद होतो.”

“मग तू काय करतोस पडावात?
आता तुझा मुलगा मोठा झाला आहे.”
मी कुतूहलाने फास्कूला प्रश्न केला.

मला म्हणाला,
“बरेच वेळा मी शीडाच्या काठीला टेकून स्थीतप्रज्ञ झाल्यासारखा होऊन बसतो.माझा मुलगा बायको बाकी कामं करीत असतात.समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठ भागावरून येणारा थंड थंड वारा त्याच्याबरोबर खार्‍या चवीने मिश्रीत झालेली वाफ घेऊन सतत चेहर्‍याला चाटून जातो तेव्हा किनार्‍यावरचा सर्व प्रकारचा तणाव आनंदात विरून जातो.हे अनुभवायला तुला प्रत्यक्ष माझ्याबरोबर एकदा मासे-रापणीलाच यावं लागेल.
भर समुद्रात पडावात बसून वेळ घालवण्याच्या रोमांचकारी कल्पना आणि पडाव उलथून जाऊन समुद्रात बुडून जाण्याच्या भीतिवरच्या कल्पनेची उगाचच वाटणारी मनोरंजकता हे नुसतं सांगून कळणार नाही.त्यासाठी अनुभव येणं अगदीच विरळं म्हटलं पाहिजे.”

“पडावातून समुद्रात जाणं आणि समुद्राच्या पाण्यावर वेळ दवडणं म्हणजेच तुझ्या कुटूंबीयाना आणि कधी कधी माझ्यासारख्या मित्राना एकत्र आणून दिवस आनंदात घालवल्याचं श्रेय तुला मिळत असेल.”

“अगदी बरोबर”
असं म्हणत फास्कू म्हणाला,
“मी तुला गंमत आठवते ते सांगतो
लहानपणीचं मला आठवतं,माझी आई अगदी पहाटे उठून जोंधळ्याच्या भाकर्‍या भाजायची.आदल्यादिवशी पकडलेल्या ताज्या मास्यांचं,मडक्यात -मातीच्या भांड्यात-शिजवलेलं कालवण,आणि काही तेलात तळलेले मास्यांचे तुकडे हे सर्व एका मोठ्या परातीत बांधून घ्यायची.कधी कधी भाकर्‍या ऐवजी उकड्या तांदळाचा भात घ्यायची.ही शिदोरी बरोबर घेऊन आम्ही पडावावर जायचो.सूर्योदय होण्यापूर्वी आम्ही किनार्‍यावर यायचो.पहाटेच्यावेळी समुद्रावरून येणारी थंड वार्‍याची झुळूक अंगावर काटा आणायची.सगळे मिळून पडाव, वाळूवरून समुद्रात ढकलत न्यायचो.एकदा पडावाच्या बुडाला पाणी लागलं की सगळेजण उड्या मारून पडावात जाऊन बसायचो.माझ्या बाबांकडे ट्रान्झीसटर असायचा.भर समुद्रात जपानहून स्मगल करून आलेल्या इलेक्ट्रॉनक्सच्या मालातून कुणीतरी त्यांना हा ट्रान्झीस्टर दिला होता.
मुंबईहून ऐकायला येणारं सकाळचं भक्तिसंगीत ऐकायला मला खूप मजा यायची.आम्ही सर्व त्या वातावरणातला आनंद लुटायचो.माझे आईबाबा, मी,माझी धाकटी बहिण आणि तुझ्यासारखे बरोबर येणारे काही मित्र असे आम्ही सर्व मिळून त्या उत्कट जोषात भागीदार व्हायचो.”

“इतक्या वर्षांनंतर अजून पर्यंत तू त्या जोषाचा आनंद घेत असतोस. समुद्राच्या इतकं जवळ राहून,पडावातून भर समुद्रात जाऊन मासेमारी करण्याच्या व्यवसायामुळे तू तुला नशीबवान समजत असावास”.
मी फास्कूला म्हणालो.

“अगदी माझ्या मनातला बोललंस बामणां.”
असं म्हणत पास्कल पुढे म्हणाला,
“हा माझा जीवनभरचा आनंद आणि जोष जो मी मनमुराद उपभोगतो आहे,शिवाय माझं समुद्रावरचं प्रेम आणि थंडगार हवेमुळे तणावमुक्त मिळणारा आराम मी जीवंत असे पर्यंत माझ्या बरोबर रहावा अशी मी देवाकडे प्रार्थना करीन.मला पडावावरचं जीवन विशेष वाटतं.”

रीप रीप पडणारा पाऊस बराचसा कमी झाला होता.निघताना पास्कलला आलिंगन देत निरोप घेण्यापुर्वी मी म्हणालो,
“फास्कू नारळी पौर्णिमेदिवशी नारळ समुद्रात भिरकावल्यावर समुद्र शांत होतो आणि तुमचे पडाव समुद्रात मासे-मारीसाठी जातात त्यावेळी मी नक्कीच तुझ्याबरोबर येईन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, August 18, 2010

फुलांना पाहूनी उद्याना येई बहार

अनुवादीत (दर्पण को देखा…..)

दर्पणात पाहूनी करीशी तुझा शृंगार
फुलांना पाहूनी उद्याना येई बहार
आहे मीच कमनशीबी
नजर फिरेना माझ्यावरी एकवार

आळसून पहाशी कोवळी सूर्यकिरणे
तारका पाहूनी रात्री स्वप्नात हरवणे
असाच बहाणा करूनी
न्याहाळीलास तू पुरा संसार

दर्पणात पाहूनी करीशी तुझा शृंगार
फुलांना पाहूनी उद्याना येई बहार

काय सांगू नशीब काजळाचे
लोचनी तुझ्याच ते शोभते
काय सांगू नशीब पदराचे
घट्ट चिपकतो तव शरीराते
तमन्ना माझ्या अंतरीची
बनविशी तुझ्या गळ्यातला हार.

आहे मीच कमनशीबी
नजर फिरेना माझ्यावरी एकवार

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, August 15, 2010

गोड पक्वान्न खाण्याची परिसीमा

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो,
“मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल.
आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.”

“कधी संपूच नये असं गोड पक्वान्न मला भारी आवडतं.एखाद्या मोठ्या वाडग्यात-मोठ्या वाटीत- चॉकलेट-चीपचं आईसक्रिम मला दिलं,आणि त्यातलं अर्ध जरी मी खाल्लं तरी माझ्या संवेदनाची पूर्ती करण्यासाठी,माझी गोड गोड खाण्याची अविरत इच्छा आणखी आणखी खाण्यासाठी आर्जव करायला राहूनच जाते.”
श्रीधर बडोदेकर मला पोटतिडकीने सांगत होते.

त्याचं असं झालं,मला माझ्या एका गुजराथी मित्राच्या मुलाच्या लग्नाला अहमदाबादला जावं लागलं होतं.लग्नात जबदस्त गोड-धोड जेवण असणार याची मला खात्री होती.मला गोड पक्वान्न आवडतात पण आज मी श्रीधर बडोदेकरना गोड खाताना पाहून अचंबीत झालो.पहिल्या पंगतीत माझ्या शेजारीच श्रीधर बसले होते.
गुलाब जांब घेऊन जेव्हा वाढपी आला तेव्हा श्रीधरने त्याचं हातातलं भांडच काढून घेतलं.आणि माझ्याकडे बघायला लागले. मी त्यांच्याकडे कुतूहलाने बघतोय असं बघून मला म्हणाले,
“माझ्या रोज गोड खाण्याला चटावलेली माझी जीभ,लोभी होऊन माझ्या कानात जेव्हा फुसफूस करते तेव्हा सरतेशेवटी मी आणखी एक जेवणाचा हाप्ता घ्यायला प्रवृत होतो.”

श्रीधर तसे प्रकृतिने बारीकच होते.
“एव्हडं गोड खाणारा माणूस एव्हडा बारीक कसा?”

असा प्रश्न माझ्या मनात येण्यापूर्वीच मला म्हणाले,
“माझं हे ऐकून तुमच्या मनात माझ्याबद्दल लठ्ठ व्यक्तिची छबी तयार होणार हे नक्कीच पण माझी आश्चर्यजनक पचनक्रिया माझ्या शरीरयष्टीवर ताबा ठेवते,निदान मी मध्यवयावर येई तोपर्यंत तरी.
त्यामुळे मी त्या अनिवार्य दिवसाचा विचारच करत नाही,की ज्या दिवशी माझी पचनक्रिया मंद होत जाईल आणि माझ्या खाण्याच्या यादीतून गोड पक्वान्न अन्यायपूर्ण ढंगाने जबरदस्तीने काढलं जाईल.”

जेवण झाल्यावर आम्ही दोघे उठून आमच्या खोलीत गप्पा मारायला गेलो.
मी त्यांना बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“मला नेहमीच वाटतं की गोड पक्वान्न हा एक जगातला सर्वात महत्वाचा खाण्याचा प्रकार आहे.”

हंसत,हंसत श्रीधर मला म्हणाले,
“माझ्या बाबतीत विचाराल तर गोड पक्वान्न म्हणजे
“थाळीतला हृदय-झटका”
म्हटलं तरी चालेल.
रेफ्रिजरेटर मधून काढलेलं चमच्या भोवती थलथलणारं चॉकलेटचं आईसक्रिम पासून डब्यात ठेवलेले निरनीराळ्या प्रकारचे गोड लाडवाचे प्रकार-कडक बुंदीचे,मऊ बुंदीचे,रव्याचे,बेसनचे लाडू किंवा राघवदास,किंवा खास बाळंतीणीसाठी डिंक घालून केलेले लाडू पाहिल्यावर मला अपरिमीत आनंद होत असतो. माझ्या जीभेचा गोड चवीचा भाग प्रत्येक चाखण्याच्या क्रियेबरोबर एव्हडा चकीत होत असताना जो माझी ह्या गोडखाऊ शौकाशी एकमत होत नाही त्याला समजावून सांगणंच मला कठीण जातं.

दुसरं काहीच नाही,एव्हडंच काय,धो,धो पावसात बिछान्यावर बसून शरीराभोवती उबदार पांघरूण लपेटून गरम गरम भज्याची चव घेण्यातसुद्धा,मला जास्त सुखदायी वाटणार नाही, जेव्हडं गोड खाण्यात वाटतं.”

मी श्रीधरला जरा धीर करून विचारलं,
“माझ्या सारखा विशेष गोड न आवडणारा माणूस तुमच्या शेजारी पंगतीत बसतो.तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?”

“लाज-भीड न ठेवता ज्यावेळी मी क्षणार्धात गोड पक्वान्नाचा फडश्या उडवतो,ज्याकडे लोक पहिली आणि शेवटची थाळी आहे असं समजतात, त्यावेळी त्यांना माझ्या गोड खाण्याच्या भुकेच्या मापाचं पूर्णपणे आकलन होत नसावं. ब्रम्हांडातल्या ब्लॅक-होलला आजुबाजूचं चक्रदार तारांकुंज गीळंकृत करून त्याचं होतं नव्हतं करून,रितंच राहिल्यासारखं वाटावं तसंच काहीसं गोड पक्वान्न खाल्यावर मला वाटतं.गंमत म्हणजे हे माझं विशिष्ट लक्षण मला तर्कदृष्ट्या निष्कर्शाला आणतं की मला आणखी खायची जरूरी आहे.”
मला श्रीधरने सांगून टाकलं.

मी श्रीधरना म्हणालो,
“खूप गोड खाऊन मला जेवणच नकोसं होतं.तुमचं असं कधी होत नाही काय?”

“काय सांगू तुम्हाला?”
असं म्हणत श्रीधरने गोड पानाचा विडा आपल्या तोंडात कोंबला आणि मला पण दिला.पान चघळत,चघळत मला म्हणाले,
“माझी गोडखाऊ जीभ कधीच तृप्त नसते. अगदी मनोमनी सांगायचं झालं तर गोड खाऊन माझं पोट भरल्यासारखं मला कदापीही वाटणार नाही.
जेव्हा एखादा,अशा व्यापक संतुष्ट करणार्‍या गोष्टीत आनंद घेतो,तेव्हा तो वेळकाळाचं ध्यान,माझं-तुझं,असल्या भौतीक जगाशी आणि जीवनाशी संबंधीत असलेल्या समस्या विसरून जातो.
पण जर का एखाद्याला अशावेळी खरंच दुःखी आणि उदास वाटलं तर नक्कीच त्याला मदतीची जरूरी असावी असं मला वाटतं.माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही पण जगातलं उष्णतामान वाढतंय,स्टॉक मार्केट पडतंय,सांपत्तिक परिस्थिती डबगायला आली आहे वगैरेवर एकच उपाय-गोड पक्वान्न.”

“कठीण आहे बुवा!”
मी पान खाऊन झाल्यावर,बेसीनमधे तोंड साफ करून आल्यावर त्यांना म्हणालो.

“काही कठीण नाही”
श्रीधरनी मला सांगून टाकलं.तोंडात पान ठेवूनच मला सांगू लागले.
“फ्रिझमधलं थंडगार चॉकलेट-आईसक्रिम,डब्यात ठेवलेले सर्व प्रकारचे लाडू,साखरेच्या थंड पाण्यात मुरलेले गुलाबजाम,केशर घातलेली श्रीखंड-बासुंदी, खसखस पेरलेले कुरकूरीत आनारसे,दुपदरी लाटलेल्या साखर पेरलेल्या चिरोट्या हे माझं चौथ्या हाप्त्यातलं जेवण.हे खाऊन मी अनिश्चित काळ, कसल्याही प्रकारच्या आहाराच्या सहाय्याविना माझं अस्तित्व टिकवून ठेवीन.”

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो,
“मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल.
आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.”

माझ्या ह्या वाक्यावर श्रीधरना हंसू आवरेना.पान घशात अडकेल म्हणून बेसीनकडे थुंकायला जात जात मला म्हणाले.
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगीतलं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com