Monday, May 30, 2011

एकांत.


“माझ्या आजीला इंग्रजी बोलायला येत नव्हतं नाहीतर तिने इंग्रजीत नक्कीच सांगीतलं असतं,

“Please leave me alone”

“मला आठवतं,माझी आजी जेव्हा अगदी थकली होती तेव्हा तिला स्वतःहून उठून इकडे तिकडे जाण्याचा त्राण नव्हता.अशावेळी ती आम्हा कुणालातरी तिला उचलून घेऊन बाहेरच्या पडवीत नेऊन ठेवायला सांगायची.खाणं-पिणं अगदीच बेताचं झाल्याने,ती वजनाने अगदीच हलकी होती.पडवीत जमिनीवर तिला ठेवल्यावर,भिंतीला पाठ लावून ती बसायची.दोन्ही पाय गुडघ्यात मोडून गुडघे छाती जवळ घेऊन अधून मधून डोकं दोन्ही गुडघ्यात घालून झोपून जायची.झोपायची कसली,ग्लानीत असायची.कुणी तिला काही विचारल्यास वैतागून जायची.माझ्या आजीला इंग्रजी बोलायला येत नव्हतं नाहीतर तिने इंग्रजीत नक्कीच सांगीतलं असतं,
“Please leave me alone”

मालतीला मी एकांत काय असतो ते माझ्या आजीचं उदाहरण देऊन सांगत होतो.
मला मालती म्हणाली,
मला तर माझ्या ह्या वयात एकांत आवडतो.
एकांतात रहाण्यात मला विशेष आनंद होतो. त्यामुळे एकांतात राहून मी आनंदात असते एव्हडंच नाही तर अगदी हृदयाच्या कोपर्‍यातून तो एकांत मी अंगीकारते.ह्याचा अर्थ मी विरक्त झाले आहे असं नाही.माझ्या मित्र-मैत्रीणी बरोबर मी “सोशल क्रिचर” असते.आणि त्यांच्या बरोबर अगदी मन मोकळेपणाने बोलते.

काही लोक अगदी छातीठोकपणे सांगतात की,
“आम्हाला आजुबाजूला कोणतरी हवंच”
हे ऐकून मी संभ्रमात पडते.तसं पाहिलं तर रोजच कुणाशी नाहीतर कुणाशी संबंधात रहाणं ठिक आहे.मात्र दिवसाच्या शेवटी शेवटी अशी वेळ येते की,
“चला,आता खूप झालं.”

कामावरच्या आठ तासात बोलबोल बोलून,डोळ्याना डोळे भिडवून,आणि इकडे तिकडे थोडी थट्टा-मस्करी करून मी अगदी थकून जाते.आणि ह्यासाठीच मी दिवसातला काही वेळ “माझ्यात मी” होऊन रहाते. ह्याचा अर्थ मी एका कोपर्‍यात बसून ध्यान करीत चंदनाचा धूर माझ्या अवतीभवती असतो अशातलाही प्रकार नाही.उलटपक्षी मी टीव्हीचे फाल्तू कार्यक्रम बघत असेन,एखादा कविता संग्रह वाचीत असेन किंवा जे काही अर्ध कच्च मला जेवण शिजवता येतं ते शिजवीत तरी असेन.फोनची घंटी वाजली तर मी सरळ सरळ त्याकडे दुर्लक्ष करीन.पीसीकडे जाण्याचंही दुर्लक्ष करीन कारण इमेल वगैरे सारखे बोलचालीचे प्रकार टाळायला तोच मार्ग आहे.

इतर लोकांशी वागत असताना मला कसलाही कटूअनुभव आला आहे अशातला प्रकार नाही.मी थोडीशी लाजाळू आहे हे नक्कीच पण गर्दीला अगदीच बुजून जाणार्‍या एखाद्या व्यक्तीपेक्षा मी थोडं कमी बुजणारी आहे.मात्र मी माणूसघाणी आहे असं मी मला मुळीच म्हणून घेणार नाही.मी तशी नाहीच. अगदी खरोखरच मनापासून मला एकटं रहावसं वाटत असतं.एखादी वि.स.खांडेकरांची कांदबरी वाचण्यात जी मजा मला येते ती एखाद्या मैत्रीणीबरोबर जेवायला जाण्यात येत नाही.जर का तुम्हाला दिसून आलं की मित्र-मैत्रीणीची किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची मी सहजपणे टाळाटाळ करते तर तसं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे पण ते काही खरं नाही.

नीट समजावून सांगीतल्यावर किंवा “माझी मी” हा वाक प्रकार वापरल्यावर सगळं काही सोपं जातं.आणि ह्यातूनही मार्ग काढायचा झाल्यास उत्तम चलाखी म्हणजे मला जबरी सर्दी झाली आहे असं सांगीतल्यावर काम होऊन जातं.सरळ सरळ चौविस तास जर का कुणाशीही संबंध आला नाही तर मला अंगात बळ आल्यासारखं,ताजंतवानं झाल्यासारखं आणि निश्चिंत असल्यासारखं वाटतं. त्यानंतर मात्र जेव्हा मी माणसात मिसळून जाते तेव्हा त्यांना भेटायला बरं वाटतं. आणि बरोबरीने त्यांनासुद्धा मला पाहून -बहुदा- आनंद होत असावा.

मला वाटतं अलीकडे लोक फारच उत्तेजित झालेले दि़सतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शब्दांचा आणि चित्रांचा त्यांच्यावर सतत मारा चालू असतो. आकर्षून घेणार्‍या दिखाऊ करमणूकीचा आणि असेल नसेल त्या विवेकाचा अंत करणारं हे चक्र कुठेतरी खंडित करण्याची जरूरी आहे असं मला भासतं.हप्त्याच्या शेवटाला कुणी जरका लोकापासून दूर जात असतील तर अशाना मला ते करायला उत्तेजन द्यावसं वाटतं.वाटलं तर एखादी भीषण दृश्याची मुव्ही आणून पहावी,भरपूर तूप मिश्रीत चवदार वाटणारं जेवण जेवावं आणि एकांताच्या सत्यतेत मशगूल होऊन जावं असा मी त्यांना सल्ला देईन.”

मालतीचं बोलून झाल्यावर मी उठता उठता तिला म्हणालो,
“बरं तर,मला तुझी रजा घेण्याची वेळ आली आहे.तेव्हडाच तुला एकांत मिळेल.”

“टोमणा मला कळतो बरं का”
मालती मला निरोप देताना हसत हसत म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 27, 2011

नवे शुझ.



“काका! आय लव्ह यू”

असं मला म्हणत मुलाने आईकडे जाण्यासाठी धुम ठोकलील
आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीत आपआपसात कसला तरी वाद निर्माण झाला होता.आणि त्याचं परिवर्तन शेवटी कोर्ट-कचेरीत जाण्याइतपत पाळी आली होती.माझा एक मित्र मुकूंद सराफ वकिली करायचा.त्याच्याकडून ह्याबाबतीत चार शहाणपणाच्या गोष्टी ऐकण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो.
बरेच कायद्याचे मुद्दे मला तो समजावून सांगत होता.आमचं बोलणं चालू असताना त्याचा सहाएक वर्षाचा मुलगा आमच्या जवळपास येऊन घुटमळत होता.बोलत असताना बाबांना त्रास द्यायचा नाही हे तो समजून होता.मला तो चलबिचल झालेला पाहून बरं वाटत नव्हतं.मीच मुकूंदाला मधेच थांबवून म्हणालो,
“अरे,त्याला काहीतरी सांगायचं आहे ते ऐकून घ्यावस.”

“काही नाही रे,त्याला मी नवीन शुझ घेणार म्हणून बोललो होतो.तो आजच विकत घेऊया म्हणून सकाळपासून माझ्या मागे लागला आहे. म्हटल्याप्रमाणे कुठचीही गोष्ट मिळायला लागल्यावर मुलं अशी हट्टाला पेटतात.”
मला मुकूंद म्हणाला.

माझंही मुकूंदाशी बोलणं संपलं होतं.मला त्याच्या मुलाची कीव आली.एव्हडंच नाही तर त्याचा चेहरा पाहून मलाही माझ्या लहानपणाची आठवण आली. मी माझ्या आईकडे नव्या शुझसाठी असाच मागे लागायचो.माझी आई खूप शिस्तीची होती.कामाच्या प्राधान्याप्रमाणे ती निर्णय घ्यायची.

मुकूंदाच्या मुलाला माझ्या जवळ ओढून घेत मी मुकूंदाला म्हणालो,
“मला ह्याचा चेहरा पाहून माझं बालपण मला आठवलं रे.”

“मला कळलंय, मी त्याचा बाप, वकिल असूनही, त्याला शुझ घेण्यासाठी तू त्याची वकिली करणार आहेस.”
मुकूंद मला हसत हसत म्हणाला.

“मी काय सांगतो ते ऐक आणि मग तुझा निर्णय घे.”
असं म्हणून मी मुकूंदाला म्हणालो,
“मला आठवतं मी अगदी लहान होतो.होतो असेन पाचएक वर्षाचा.शुझ खरेदी करायला मला नेहमीच आवडायचं.माझ्या आईकडून मी वर्षाला एक शुझचा जोड विकत घ्यायचो.आणि त्या वर्षी मी खूपच उत्तेजीत असायचो.अशावेळी मला प्रभावित करणार्‍या अनेक गोष्टी असायच्या-शुझचा ब्रॅन्ड,त्याचा रंग,त्याचा वापर वगैरे.
एकदा मी ते शुझ घरी आणले की दुसर्‍या दिवशी शाळेत केव्हा जातो याची वाट पहायचो.नवे शुझ घालून शाळेत जायला खूप आतूर व्ह्यायला व्हायचं. नव्या शुझबद्दल काहीतरी विशेष वाटायचं.जणू मलाच मी विशेष समजायचो.जणू मीच मला नवीन समजायचो.कदाचीत त्यांचा वास किंवा ते वापरताना जे वाटायचं ते वाटणंच विशेष वाटायचं.काहीतरी विचित्र वाटायचं.

सुरवातीचा आठवडा मी माझे शुझ स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असायचो.पण नंतर हळू हळू ते स्वच्छ ठेवण्याचा विसर पडायचा. कदाचीत त्याची कदरही करीत नसायचो. नव्या शुझमूळे मला मी नवीन वाटायचोच, त्याशिवाय इतरही माझ्या नव्या शुझकडे बघत रहायचे.जे लोक मला म्हणायचे की माझे नवे शुझ मस्त आहेत म्हणून, ते ऐकून मला आनंद व्ह्यायचाच त्याशिवाय माझी कुणीतरी प्रशंसा करतंय असं वाटायचं.नवीन शुझ घेतल्यानंतर मिळणार्‍या आनंदाची अशी काहीशी कारणं देण्यासाठी मी माझ्या मनात सफाई देण्याच्या प्रयत्नात असयाचो.

मला नेहमी वाटायचं की पायातले शुझ म्हणजे सर्वकाही.कुणी तरी म्हटल्याचं आठवतं की,एखाद्याचे शुझ पाहून तुम्ही ती व्यक्ती कशा प्रकारची आहे हे सांगू शकता.ती व्यक्ती कुठून आली आहे,कुठे जाणार आहे असं काहीतरी.

शुझ एखाद्याचं व्यक्तिमत्व दाखवून देतं.तुम्ही खेळाडू आहात का,किंवा फॅशनेबल आहात का,तुम्ही अगदी टापटीप असलेले कपडे नेसले आहत का असं काहीतरी.म्हणूनच मला नेहमी वाटत असतं की नवी शुझची जोडी महत्वाची असते.

माझ्या प्रमाणे मी इतराना अशीच काहीशी कारणं देऊन त्यांच्या नव्या शुझशी अनुरक्त रहाताना पाहिलंय.त्या नव्या शुझना ते चिखल आणि घाणीपासून सुरक्षित ठेवून पॉलिश वगैर करून ठेवायचे.खरं म्हणजे शुझचा उपयोग तुमचे पाय सुरक्षित ठेवण्यासाठी असतो.काही का असेना नव्या शुझने मी उत्तेजीत व्ह्यायचोच शिवाय दुसरी दिवाळी आल्यासारखी मला वाटायची. मला जोश यायचा.

मी एक पाहिलंय की, नव्या शुझमुळे तुम्हाला तुमच्या विशिष्ट्तेचा बोध होत असतो.तसंच तुमच्याकडे असलेल्या खास शुझ सारखे आणि कुणाकडे नसतील तर तुम्हाला तुम्ही नक्कीच विशेष वाटून घेता.असं काही की जे खास तुमचंच आहे असं वाटण्यासारखं.लहानपणी मला हे असं तर निक्षून वाटायचं.”

माझं हे सांगणं मुकूंदाचा मुलगा निमूट ऐकत होता.मुकूंद मी सांगत असताना मधून मधून आपल्या मुलाच्या चेहर्‍याकडे बघत होता.मी पण मुकूंदला सांगत असताना बापा-मुलातली नेत्रपल्लवी ध्यान देऊन बघत होतो.माझं सांगून झाल्यावर मुकूंदाच्या मुलाने मला घट्ट मिठी मारली.माझ्याही डोळ्यात पाणी आलं.
“चल,आईकडून कपडे घालून घे.आपण तिघेही तुझ्यासाठी शुझ घ्यायला जाऊंया”
असं मुकूंदाने आपल्या मुलाला सांगीतलं.

“काका! आय लव्ह यू”
असं मला म्हणत मुलाने आईकडे जाण्यासाठी धूम ठोकली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 24, 2011

सूर्योदय,सूर्यास्त आणि समुद्रचौपाटी



“परत कधीतरी गोव्याच्या समुद्रचौपाटीवर भेटू”
असं म्हणून मी पवारांचा निरोप घेतला.

अलीकडेच मी माझ्या एका मित्राकडे गेलो असताना माझी चंद्रकांत पवार यांच्याशी भेट झाली.पवाराना मागे मी एकदा गोव्याच्या बिचवर भेटलो होतो.पवार सैन्यात कामाला असतात.देशातल्या निरनीराळ्या शहरात त्यांची बदली होत असते. सध्या मुंबईला आले आहेत असं ते मला म्हणाले.
गोवा चौपाटीवरच्या आमच्या भेटीची आठवण काढून आम्ही बोलत होतो.

मी त्यांना म्हणालो,
“मला समुद्रचौपाटीबद्दल विशेष वाटतं.मात्र कुठचीही समुद्रचौपाटी नव्हे.ती चौपाटी जी मला,त्या चौपाटीवर आल्यावर, मी माझ्या मागे सोडून आलेलं सर्व काही विसरायला लावते.त्या चौपाटीबद्दल मला विशेष वाटतं जी,दिवसामागून दिवस काहीनाकाही कार्यक्रम ठेवणार्‍या माझ्यासारख्याला, संपूर्ण निराळीच व्यक्ती व्ह्यायला भाग पाडते अशा चौपाटीबद्दल.”

मला पवार म्हणाले,
माझंही अगदी तुमच्यासारखंच आहे.
“मला समय-सारणीचा अजिबात कंटाळा येतो,उपेक्षा करावीशी वाटते,कुठेतरी प्रवासकरून जायला लागणार आहे याचा विसर पडावा असं वाटावं,कुठेतरी उपस्थित व्हायला हवं याचा विसर पडावा असं वाटावं, अशा चौपाटीवर, माझ्या बायको-मुलांना बरोबर घेऊन, आनंदाचा आस्वाद घ्यावासारखा मला वाटतो.”

मला सकाळीच चौपाटीवर जावसं वाटतं.मी चौपाटीवर हजर रहाण्यापूर्वी कुणाही महाभागाच्या पावलांची खूण दिसू नये असं वाटतं.खाली अर्धी चड्डी, वरती टी-शर्ट,पाय पूरे मोकळे,जमलंच तर छोट्याश्या थर्मासात गरम गरम कॉफी घेऊन,अगदी एकटं, एकटं पाणी तुडवीत,तुडवीत चौपाटीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत चालत जावसं वाटतं.

सूर्य अजून क्षितिजावर दिसायचा आहे,आकाश अजून पिवळसर,लालसर दिसत आहे अशावेळी समुद्रावर जावसं वाटतं.सूर्य नंतर थोड्यावेळाने पाण्याच्या बाहेर स्वतःला रेटत येत असताना,नारंगी,पिवळ्या गोळ्यासारखा होऊन,सभोवतालचं आकाश वेगवेगळ्या चमकदार रंगानी रंगवलं गेलं आहे आणि पाण्याचे तुषार अजून पाण्याची धार सोडत नाहीत अशावेळी चौपाटीवर असावं असं वाटतं.पण हे सर्व सूर्योदयाची वेळ असल्याने पूर्वेच्या समुद्रावर शक्य होतं.म्हणजे कलकत्ता, मद्रास इथे चौपाटीवर गेल्यावर.”

मी पवाराना म्हणालो,
“चौपाटीवर आणि चौपाटीवर सापडणार्‍या खजिन्यावर मी फारच प्रेम करतो.समुद्राच्या लाटेबरोबर किनार्‍यावर येऊन सांडल्या जाणार्‍या रंगीबेरंगी गोट्या,सुंदर रंग असलेले चित्रविचित्र आकाराचे ओले शंख शोधून काढून वेचायला मला खूपच आवडतं.ते सापडल्यावर मी अगदी मोहित होऊन जातो.
पांढरे-सफेद,हिरवे आणि तांबसरभुरे दगड मला मिळाले आहेत पण अगदी क्वचित वेळेला मला निळे दगड सापडले आहेत.पण ज्यावेळेला ते मला सापडतात त्यावेळेला मला जरा विशेष वाटत असतं.ते मी सापडू शकतो हे मला माहित असतं,शिवाय आणखी सापडण्याच्या आशेत मी नेहमीच असतो.माझा काही तुमच्यासारखा प्रवास होत नाही.मुंबईच्या चौपाटीवर असा खजिना सापडणं आता दुरापास्त झालं आहे.
पण कोकणात आजगावला जाताना मी जेव्हा रेडीच्या चौपाटीवर जातो तेव्हा शंख आणि त्यासारख्या कवड्या नक्कीच मिळतात.शंख आणि कवड्यात बारीक प्राणी असतात.किंबहूना शंख किंवा कवड्या हे त्यांचं बाह्य आच्छादन असतं.ते अंगावर घेऊनच फिरत असतात.वेंगुर्ल्याच्या आणि खानोलीच्या चौपाटीवरून पण फार पूर्वी मी निरनीराळ्या कवड्या आणि शंख गोळा केले आहेत.वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या कवड्या घेऊन आम्ही पटावरचे खेळ खेळायचो.”

पवारांना पण काही सांगावसं वाटलं.ते म्हणाले,
“जेव्हा माझी मुलं माझ्याबरोबर चौपाटीवर येतात, आणि पाण्यात शिरत असताना लहान लहान लाटावर जोराजोरात पाय आपटून सर्व प्रथम होणारा थंड पाण्याचा स्पर्श टाळण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा ते दृश्य पहायला मला मजा येते. त्याच्याहीपेक्षा जरा मोठ्या लाटांत आत शिरून ती तरंगण्याचा बहाणाकरून पटकन डोकं वर काढून पाणी वर उडवीत माझ्याकडे पाहून आरडा-ओरडा करताना दिसतात,
“बाबा माझ्याकडे लवकर या.पाणी मस्त आहे”
असं ज्यावेळी सांगतात,त्यावेळी मीही त्यांना सामील होतो. नंतर पाणी एकमेकावर उडवून मनात येतील ते खेळ खेळतो.
ओठ नीळे व्ह्यायला लागतात,हाता-पायावरची चामडी सुरकुतायला लागते,लोंबायला लागते तेव्हा आम्ही पाण्याच्या बाहेर येतो.तोपर्यंत पाण्यात खेळण्य़ाचा आनंद लुटत असतो.

पाण्यातून झटदिशी बाहेर येऊन,वाळुतून धावत जाऊन सुक्या वाळूत ठेवलेले आमचे रंगीत टुवाल अंगाभोवती गूंडाळून गरम उन्हात थोडावेळ शांत पडून असतो.बरोबर आणलेलं कोल्ड-ड्रींक आणि चुरमुरीत खाणं खाऊन त्याचा फस्ता करतो.आनंद उपभोगायचे हेच तर क्षण असतात.सूर्याची किरणं अंगात शिरल्याने ज्यावेळी उबारा येतो,त्यावेळेला वाळूत तसंच पडून राहून लाटांचं संगीत ऐकायला पण मजा येते.थोड्यावेळाने उठून झाल्यावर परत सर्व करावं असं वाटायला लागतं.
सूर्याच्या किरणातून मिळणार्‍या उबेची भरपूर भरपाई होई तोपर्यंत सर्व जगापासून दूर रहावसं वाटतं.थंडी वाजायला लागल्यावर अर्धी चड्डी आणि टीशर्ट अंगात चढवावासा वाटतो.
सूर्य अस्ताला जाताना मला ते दृश्य पहायला खूप आवडतं.क्षितिजाच्या कडेला जाऊन सूर्य जेव्हा खाली खाली जात रहातो, त्यावेळेला पुन्हा एकदा आकाश रंगवायला सुरवात होते.हे सर्व पाहून झाल्यावर, निसर्गाच्या सौन्दर्यीकरणाच्या कामगीरीबद्दल, मी घरी जाताना माझ्या मुलांबरोबर, वाखाणण्या करीत वेळ दवडतो.पण हे सर्व सूर्यास्त होत असताना पश्चिमेच्या समुद्रावर गेल्यावर शक्य होतं.म्हणजे जास्त करून गोव्याच्या चौपाटीवर गेल्यावर.पण हे सर्व म्हणजे समुद्र्चौपाटीवर जाणं, सूर्योदय आणि सूर्यास्त पहाणं मला शक्य झालं आहे कारण मी देशाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला माझ्या सैन्यातल्या नोकरीच्या निमीत्ताने जात असल्यामुळे.
म्हणून मला सूर्योदय,सूर्यास्त आणि समुद्रचौपाटीबद्दल तसंच मला आणि माझ्या कुटूंबियाना त्यापासून जो लाभ होतो त्याबद्दल विशेष वाटतं.”

“परत कधीतरी गोव्याच्या समुद्रचौपाटीवर भेटू”
असं म्हणून मी पवारांचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 21, 2011

उघड दार हेमा आता, उघड दार हेमा.



"अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा"


असं म्हणतात की,लग्न स्वर्गात ठरवली जातात.खरं पाहिलं तर श्रीधरचं आणि हेमाचं लग्न शाळेतच ठरलं.त्याचं असं झालं, श्रीधर आणि हेमा एकाच शाळेत एकाच वर्गात होती.त्यांची मैत्री,ती वयात आल्यावर,प्रेमात परिवर्तित झाली.
वैकुंठ-रखुमाईच्या मंदिरात जाऊन लग्न करण्याच्या आणा-भाका पण घेऊन झाल्या.गावात सगळीकडे आवई पसरली होती.दोघांनीही कॉलेजात जाऊन बीए डिग्री घेतली.पण हेमा पुढे बि.एड होऊन एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करीत होती.श्रीधरने बीए झाल्यावर वडीलांच्या धंद्यात लक्ष घातलं.
खिडक्यांतून,उन येऊ नये म्हणून, लावले जाणारे पडदे-व्हेनिशिन ब्लाईन्डस-बनवण्याचा त्यांचा धंदा होता. श्रीधरच्या आईबाबांना हेमा पसंत होती. तसंच हेमाच्या बाबांना श्रीधर पसंत होता.पण हेमाच्या आईने नाक मुरडलं होतं.तिला फॉरेनचा-अमेरिकेतला- जावई हवा होता.हेमाला श्रीधरशीच लग्न
करायचं होतच.शिवाय आपल्या आईला तिने सांगीतलं होतं,की तिला अमेरिकेत जाऊन स्वतः ग्रोसरी आणायची,मुलांना डे-केअरमधे न्यायचं, घरातली लॉन्ड्री करायची,जास्त वेळेला घरातच स्वयंपाक करायचा, असली कामं स्वतःच करायाची मुळीच हौस नव्हती.हीच काम इकडे राहून घरी नोकरा-चाकराकडून करता येतात आणि स्वतःला आराम मिळतो. असं म्हणणं होतं.


बरीच चर्चा-वाद झाल्यावर हेमाचा आईशी समझोता झाला.आणि श्रीधर-हेमाचं लग्न पार पडलं.पण पुलाखालून पाणी खूपच वाहून गेलं होतं.कुणालाही सुखासुखी राहू देण्यात, स्वतःला हितचिंतक म्हणवर्‍यांना,असल्या बाबतीत जास्त गम्य नसतं.श्रीधर-हेमाला असाच त्रास झाला.हेमा समजूतदार होती.
आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल ती नेहमीच म्हणायची,
"इट इज पार्ट ऑफ द गेम"

आज श्रीधर-हेमाच्या लग्नाची पन्नासावी वर्षगाठ होती.मलाही त्यानी अगत्याने बोलावलं होतं.
त्यावेळी हे जोडपं आमच्याच बिल्डिंगमधे आमच्या समोरच्या फ्लॅटमधे रहायचं.
गप्पाकरताना मी हेमाला म्हणालो,
"अजून श्रीधर कामावरून घरी आल्यावर बेल न वाजवता,
"हेमा दार उघड"
असं ओरडून सांगतो का.?"
माझं हे ऐकून हेमा आणि श्रीधर दोघंही हसली.
"हो अखंड चालू आहे"
हेमा मला म्हणाली.

हेमाने दार न उघडल्यास घरात शिरण्यापूर्वीच हेमा कुठे आहे ह्याची श्रीधर चौकशी करायचा.कारण हेमा घरात असल्यावर श्रीधरसाठी तिच जाऊन दार उघडायची.हे मी चांगलंच मार्क केलं होतं,त्याचं त्या दोघानाही कौतूक वाटलं.हा त्यांचा शिरस्ता मी चांगलाच लक्षात ठेवला होता.
मी त्या दोघानाही म्हणालो,
"आज मी तुमच्या दोघांसाठी तुमच्या पन्नासाव्या वर्षगाठीला माझी एक कविता सादर करतो.तुमची काही हरकत नाही ना?"
हेमा लगेचच म्हणाली,
"नेकी और पुछ,पुछ?"
"त्यावर एक माझी अट आहे.कविता वाचून झाल्यावर तुझ्या हातची मसालेदार दुधाची कॉफी मला तू द्यावीस."
मी हेमाला म्हणालो.

"नो प्रॉब्लेम"
असं हेमाने सांगताच मी कवितेची प्रस्थावना करताना त्यांना म्हणालो,
"मराठी सिनेमातल्या एका गाण्याचं ते एक "विम्बल्डन" आहे.
तुमच्या शिरस्त्याची आठवण ठेऊन आणि तुमच्या लग्नकाळात तुम्हाला झालेल्या त्रासाची आठवण ठेऊन मला ही कविता सुचली आहे."
कविता अशी आहे.


प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


येते डोळे उघडूनी, जात माणसाची
मनी द्वेषट्याना का गं भिती प्रेमाची
सरावल्या लोकानाही अचंबा का वाटावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


उजेडात होते भेट,अंधारात प्रेम
ज्याचे त्याचे हाती आहे सुरळीत काम
दुष्ट दुर्जानांचा कैसा वाढतो हेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


तुझ्या हातून सखये आवई फुटावी
शांतपणे युक्ति तुझी तुच संभाळावी
मार्ग तुझा सुटण्याचा मला तो कळावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


साधेपणासाठी कुणी मुर्खपणा केला
बंधनात असुनी जगी बभ्राच झाला
आपुल्या सौख्यात घेऊ जरा विसावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


हेमा लागलीच उठली आणि कॉफी करायला आत गेली.श्रीधर माझी कविता ऐकून मला म्हणाला,
"खरंच,दोन चार कडव्याच्या कवितेतून आपल्या भावना जेव्हड्या उघड करता येतात तेव्हड्या त्या भावना दहा पानी लेख लिहून उघड करणं कठीण आहे।हे मला तुमच्या कवितेतून प्रकर्षाने जाणवलं."


मी श्रीधरला उत्तर देण्यापूर्वीच हेमा कॉफी घेऊन आली.एक कप माझ्या हातात देत मला म्हणाली,
"तुमची कविता संपल्यानंतर मी लगेच उठून गेली नसते तर मला रडू आवरलं नसतं.यापुढे जेव्हा जेव्हा,
" देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता,उघड दार देवा"
हे बाबुजींच्या आवाजातलं,
"आम्ही जातो अमुच्या गावा"
ह्या सिनेमातलं गाणं रेडीयोवर किंवा टीव्हीवर लागलं की तुमची आठवण येणार.होय ना रे! श्रीधर?"
श्रीधरने डोळे पुशीत मान खालीवर करीत होकार दिला.

मी दोघानाही जवळ घेत म्हणालो,
"तुमच्या पन्नासाव्या वर्षगाठी दिवशी,मला तुमच्या डोळ्यातून पाणी पहायचं नव्हतं."
"नव्हे,नव्हे हे तर आमचे आनंदाश्रू होते"
हेमा हसत हसत मला म्हणाली.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Wednesday, May 18, 2011

कुणीतरी सांगेल का मला


अनुवाद.

अंतरातल्या नजरेतून, नजरेतल्या अंतरातून
हे गुपित काय असावे,हे रहस्य काय असावे
कुणीतरी सांगेल का मला

हळूच उठून ओठावर आले
ते गीत काय असावे,ते रहस्य काय असावे
कुणीतरी सांगेल का मला

का अजाणतेने मी मोहित झाले
कोणत्या बंधनाने मी बंदिस्त झाले
काही हरवत आहे,काही गवसत आहे
ते गुपित काय असावे,ते रहस्य काय असावे
कुणीतरी सांगेल का मला

हा चंद्रमा का कुणी जादूगर आहे
नजरेतील उन्मादाचा असर आहे
जे माझे ते तुझेच होत आहे
ते गुपित काय असावे,ते रहस्य काय असावे
कुणीतरी सांगेल का मला

होत आहेत गगनातून इशारे
खूश कसे हे सर्व चंद्र तारे
अनभिज्ञ असूनही अंतरी भरे
ते गुपित काय असावे,ते रहस्य काय असावे
कुणीतरी सांगेल का मला
अंतरातल्या नजरेतून, नजरेतल्या अंतरातून

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 15, 2011

झोपेची मजा.

“मेलेल्याला निवांत झोप लागते”
हे म्हणणं मी माझ्या जीवाला लावून घेतलं होतं.”

रमेशचा निवृत्तिचा पहिला दिवस.एरव्ही नेहमी निरनीराळ्या शिफ्टवर तो काम करीत असल्याने,अचूक अशी त्याची भेट घेता यायची नाही.आज नक्कीच रमेश घरी भेटणार म्हणून त्याच्या घरी निवृत्तिच्या शुभेच्छा द्यायला म्हणून गेलो होतो.

“आज बेधडक तुला न विचारता तुला भेटायला आलो.तू घरी भेटणार याची खात्री होती.बरेच वेळा निवृत्ति मिळाल्यावर लोकांना मिक्स फिलींग असतं. इकडे तर आराम मिळेल म्हणून आनंद होतो, आणि इकडे तर वेळ कसा जाईल म्हणून वाईट वाटतं.तू मात्र बराच खूश दिसतोस.”
मी रमेशला म्हणालो.

“तुमचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाही.पण मी खूश जादा आहे.आणि माझं त्याबद्दल कारण ऐकून तुम्हाला गंमत वाटेल”
असं म्हणून रमेश मला सांगू लागला,
“झोपेबद्दल मला विशेष वाटतं.खरोखरच झोप खुप विस्मयकारी आहे.झोपेच्या विशिष्टतेचा एक भाग म्हणजे झोप लागण्याच्या खर्‍या कारणाचं रहस्य काय असावं?.माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून माझ्या ध्यानात आलंय की झोप आपल्याला ताजंतवानं नक्कीच करते,रिचार्ज करून नव्या दिवसासाठी ती आपल्याला तयार करते.पण मी ही झोप का बरं घ्यावी? सात-आठ तासाच्या कल्पना शक्तिच्या विश्वात पडून रहायला मला काय कारण असावं?
सगळ्या मानवजातीला त्याचं रहस्य आहे तसंच मलाही आहे”.

“झोपेच्या विषयावर तुझा रिसर्च भरपूर असणार कारण शिफ्टचा तुझा जॉब असल्याने झोपेपेक्षा झोपमोड काय असते हे तू जास्त अनुभवलं असणार.”
मी रमेशला म्हणालो.

“एकदम बरोबर”
असं म्हणत रमेश मला सांगू लागला,
“झोपेमधे उपचारात्मक उपाय योजना असते.झोप उपचार करू शकते ह्याचा मी कधीच विचार केला नाही. म्हणतात ना,
“मेलेल्याला निवांत झोप लागते”
हे म्हणणं मी माझ्या जीवाला लावून घेतलं होतं.मी झोपायचं टाळायचो.रात्र जागवायचो.टीव्हीवर चित्रपट पहाण्यात वेळ घालवायचो. किंवा वाचन करीत वेळ काढायचो.इकडे तिकडे वेळ घालवायचो.
हे सगळं मी करायचो आजारी पडण्यापूर्वी.एकदा मी माझ्या पोटात कृमी होऊन आजारी झालो.मला आठवतं मी नव्वीत होतो. दिवाळीची सुट्टी पडणार होती.वर्गात एकाएकी,जादूटोणा झाल्यासारखं होऊन,मी डुलक्या काढायला लागलो.सुरवातीचे दोन दिवस, जरा हास्यास्पद वाटायचं.जणू मी गांजा पिऊन बसलोय असं वाटायचं.
घरी गेल्यावर मी नेहमीच्या सवयीपेक्षा अगोदर झोपायला जायचो.नंतर नंतर मी माझ्या वर्गात गेल्या गेल्या डुलक्या काढायला लागलो.
मला आठवतं,माझे इतिहासाचे गुरूजी मला माझ्या झोपेतून उठवायचे.शाळेच्या इमारतीला एक चक्कर मारून येऊन एक ग्लास पाणी पिऊन मग वर्गात यायला सांगायचे.कारण त्यांच्या विषयात मला नेहमीच कमी गुण मिळायचे.

नंतर एक दिवशी मला माझ्या इंग्रजी शिकवणार्‍या गुरूजीनी वर्गाच्या बाहेर काढलं.मला त्यांनी मुख्याधपाना भेटायला सांगीतलं.मी गेलो.पण ते जागेवर नव्हते.म्हणून मी त्यांच्या कचेरीच्या बाजूच्या खोलीत एका कोचावर जाऊन त्यांची वाट पहात बसलो होतो. करतां,करतां तिथेही मी झोपी गेलो.जाग आल्यावर भिंतीवरच्या घड्याळात साडे पाच वाजले होते.माझा इंग्रजीचा वर्ग मी साडे नऊला सोडला होता.आठ तास आणि पंधरा मिनटं मी झोपेतच होतो.म्हणजे एक दोन विषयाचे तास चुकले नाहीत तर अख्खा दिवस वाया गेला.माझे तास चुकले,माझी लंच चुकली आणि नाटकाची प्रॅक्टिसपण चुकली.

तेव्हाच कुठे मी ठरवलं की मी मला डॉक्टरला दाखवावं. डॉकटरानी अनमान काढलं की मला सायनस इन्फेकशन झालं आहे.ते ऐकून मला बरं वाटलं. मला काय होतंय ते मला कळलं.मी औषध घ्यायला सुरवात केली.दोन एक आठवड्यानी माझ्या लक्षात आलं की काही खरं नाही कारण मी अजून वर्गात डुलक्या काढत होतो.
माझी आई मला रक्त तापासून घेऊया असं म्हणाली.रक्त दिल्यानंतर तीन एक दिवसानी तपासणीचा निर्णय आला की मला, माझ्या पोटात कृमी वाढल्यामुळे, झोप येत असते.
रोज एक छोटीसी गोळी घेऊन नंतरचे दोन आठवडे घरी भरपूर झोपून काढले.

ह्या दोन आठवड्याच्या काळात मी झोपेतल्या अदभूत गोष्टीचा सुगावा लावला.त्या काळात माझ्यात सुधार होत असताना,माझे मित्र शाळेत जायचे.वर्गात शिकायचे,टेस्टस द्यायचे आणि मी जवळजवळ झोपेत असायचो आणि झोपेतल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचो. माझ्या लक्षात आलं की माझा कल ऐदी होण्याकडे झुकत आहे.जीवनातला हा सर्वांत मस्त काळ आहे.झोपत रहायचं आणि आळशीपणा करायचा असं मला वाटायला लागलं.

पण ह्या वयात असं करून कसं चालेल? फक्त निवृत्तिच्या वयात आल्यावर त्या जीवनात असं करणं संभवनीय आहे.
अशा तर्‍हेचा झोपेचा अनुभव घेतल्यामुळेच निवृत्त जीवनाचा उद्देश गाठण्याकडे माझं मन झुकायला लागलं.

कर्म-धर्म-संयोगाने माझा असा जॉब होता की मला शिप्ट्स असायच्या.रात्रपाळी असल्यावर रात्र जागून काढावी लागायची आणि दुसर्‍या दिवशी झोप पूरी व्ह्यायची नाही.एकूण झोपेचं खोबरं व्हायचं.पण माझा जॉब मला खूप आवडायचा.त्यामुळे शिफ्टकडे मी दुर्लक्ष केलं.

आज निवृत्त होताना मला खूप बरं वाटतंय.एकतर शिफ्टचा जॉब संपूष्टात आला आणि दुसरं म्हणजे यापुढे मला भरपूर झोप घ्यायला मुभा मिळणार आहे.माझा लहानपणातला झोपेचा अनुभव आणि झोपेबद्दलचं माझं स्वप्न आता पूर्ततेला येणार आहे.म्हणून मी खूश आहे.”

“व्यक्ती तशा वल्ली”
असं म्हणत मी रमेशची रजा घेतली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 13, 2011

स्व-प्रेरित सुख

"पण सरतेशेवटी सुखी होण्यासाठी तुमच्यावरच तुमची मदार असायला हवी."

संध्याकाळच्या वेळी आज बाहेर मस्त हवा होती.थंडी मुळीच वाजत नव्हती.स्वेटरची तर मुळीच गरज भासत नव्हती.लोकं बाजारातून रंगीबेरंगी फुलांचे रोप आणून कुंडीत लावत होते.घरून निघून तळ्यावर पोहोचेपर्यंत प्रत्येकाच्या घरासमोर फुलांच्या कुंड्या पाहून मस्त वाटत होतं.आता यापूढे सहाएक महिने हे असंच वातावण असणार ह्याची नुसती कल्पना करून मन आनंदी होत होतं,मन सुखावत होतं.

बारामहिने तेरा काळ असंच वातावरण असतं तर त्याची कसलीच किंमत वाटली नसती.दोन तीन महिने कड्याकाची थंडी सहन करून झाल्यावर हा बदल जास्त जाणवतो.आज प्रो.देसाई तळ्यावर भेटल्यावर ह्या अशा सुखाविषयी चर्चा करावी अशी मनात लहर आली.आणि भाऊसाहेब नक्कीच तळ्यावर भेटणार ह्याची खात्री होती.प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन बसले होते.माझीच वाट बघत बसले होते.ते तसं मला म्हणाले.
मी हसत होतो ते पाहून मला म्हणाले,
"तुमहाला काहीतरी सांगायचं आहे असं दिसतं.काय विशेष.?

मी म्हणालो,
"तुमच्याही लक्षात आलं असेल.तुमच्या घरून तळ्यावर येताना तुम्ही नव्या बहरलेल्या फुलांच्या कुंड्या जागोजागी पाहिल्या असतील.माझ्या मनात आलं की हे डोळ्यांना मिळणारं सुख,आपलं मन किती आनंदी करतं.अशी काय जादू ह्या फुलात आहे.?वसंत ऋतुच्या ह्या मोसमात रंगीबेरंगी फुलं लावून जो तो प्रसन्नता आणण्याच्या लहरीत असतो.स्वतःला सुखी करून जो तो दुसर्‍यालाही सुखी करतो.हे घेण्यासारखं आहे. आणि ते सुद्धा फुलांच्या माध्यमातून."

माझ्या म्हणण्याचा थोडावेळ विचार करून भाऊसाहेब मला म्हणाले,
"मला नेहमीच वाटतं की,कुणीही स्वतःला सुखी ठेवायला स्वतःच जबाबदार असतो.मला सुखी करण्यासाठी ह्या जगात दुसरा कुणीही जन्माला आलेला नसावा असं मला वाटतं.लोकाना वाटत असतं कधीकधी ते दुःखी असतात याचं कारण त्यांना कुणीतरी दुखावलेलं असतं.खरं तर तुम्हीच दुःखाचा स्वीकार केल्याने दुःखी होता.

कुणी जर का तुम्हाला दुखावलं,तर ती अवस्था स्वीकारायची तुमची जबाबदारी आहे,नाहीतर आशावेळी स्वतः प्रसन्न रहाण्यासाठी जे काय हवं ते तुम्ही केलं पाहिजे.मला वाटतं,काही लोकाना वाटत असतं त्यांना कुणी दुसर्‍याने सुखी करायला हवं.फुलांबद्दल तुम्ही म्हणालात त्यावरून माझ्या डोक्यात असा विचार आला.

कुणी तुमच्या जीवनात आलं.आणि तुम्हाला आनंदी केलं.त्याला ते कारण नसतात.परंतु,तुम्हाला त्यांच्या सहवासात राहिल्याने तसं वाटत असतं.जर का तुमचा कुणी पाणउतारा केला तर झालं हे काही खरं नाही असं तुम्हाला वाटत असतं.पण तुम्ही एक विसरता की,सुखावर तुमचा काबु पाहिजे.आणि हेच तुम्ही तुमच्या जीवनात अखेर पर्यंत विसरता.

मला मुळीच म्हणायचं नाही की दुसरे तुम्हाला सुखी करू शकत नाहीत.कारण दुसरे तुम्हाला सुखी करू शकतातही.मला एव्हडंच म्हणायचं आहे की,जर सदैव तुम्हाला सुखी रहायचं असेल,तर तुमच्यावर तुम्ही भरवसा ठेवा.दुसर्‍यावर ठेवू नका.

तसंच,एखाद्या दिवशी सर्वच काही मनावेगळं होत असेल,आणि तुम्हाला वाटत असेल की ह्यात काही सुधारणा होणार नसेल तर काही तरी करून आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा असं मी सांगेन.किंवा तुम्हाला जे काही आवडतं त्याचा विचार मनात आणा.उदा.तुम्हाला आवडणारं गाण शांत जागी जाऊन ऐका,
वाटलं तर चांगली झोप घ्या.अशीच रंगीबेरंगी फुलं पाहून तुमचं मन रिझवा.

सुख कुठेतरी तुमच्यात तुम्हाला सापडेल.फक्त तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे.मला तरी व्यक्तिशः गाणं गायला किंवा ऐकायला आवडतं.मी ज्यावेळी असं करतो त्यावेळी दुसर्‍याच जगात जातो आणि सुखी होतो.प्रत्येकाची अशीच एक जागा असते आणि तिकडे गेल्यावर कल्पनेच्याबाहेर ते त्यांच्या लहरीत येतात.
आता तुम्ही ही फुलं पाहून सुखी झाला.असे कैक लोक असतील की त्यांना ही फुलं दिसत असूनही विशेष काही वाटणार नाही.त्यांच्या सुखाची जागा निराळी असू शकते.

म्हणून मला वाटतं की खरं सुख तुमच्यातच तुम्हाला सापडेल.कुणा दुसर्‍यात सापडणार नाही.मला वाटतं सुखी व्हायला दुसर्‍याची तुम्हाला मदत होईल पण सरतेशेवटी सुखी होण्यासाठी तुमच्यावरच तुमची मदार असायला हवी."

मी प्रो.देसायाना म्हणालो,
"भाऊसाहेब,ह्यासाठीच तुमच्याशी चर्चा करायला मला बरं वाटतं.ह्यापुढे बारिक-सारिक कारणावरून वाईट वाटून घेण्याचं मी निश्चितच टाळीन.सुखावर काबू ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. निदान पुढले सहामहिने फॉल सुरू होईपर्यंत ही फुलंच मला आठवण देत राहतील हे मात्र नक्की."
सूर्यास्त झाल्या झाल्या थंडी वाजायला लागली.आम्ही दोघेही चर्चा संपवून निमूट उठलो.


श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com