Monday, August 29, 2011

गुण- वैगुण्य़.


“माझं मन मला सांगतं की,तुझ्यात असलेल्या कमतरतेला तू नाकारलंस किंवा त्याकडे दुर्लक्ष केलंस,तर तुझ्यात असलेल्या उत्तम गुणांचं महत्व कमी होऊ देण्यात तू प्रवृत्त होशील”.

प्रो.देसायांची वाट बघत आज मी बराच वेळ तळ्यावर बसलो होतो.आणि मी माझा वेळ ,मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचत, मजेत घालवत होतो.
आपण तळ्यावर येणार म्हणून भाऊसाहेबांनी मला सकाळी फोन करून सांगीतलं होतं.मी थोडा काळजीत होतो.पण तेव्हड्यात समोरून,मकरंद- प्रोफेसरांचा नातू- आणि बहुदा त्याचा एक मित्र ,असे ते दोघे लगबगीने येताना मला दिसले.काहीतरी खास काम आल्याने भाऊसाहेब आज येऊ शकत नाहीत असा निरोप त्यांचा नातू घेऊन येत असणार हे मी तेव्हाच ताडलं.

“आज तुमच्याबरोबर चर्चा करायला आजोबांनी मला आणि माझ्या ह्या मित्राला तुमच्याकडे पाठवलं आहे. मा्झा हा मित्र-सुनील तावडे-आजोबांशी एका विषयावर मघापासून चर्चा करीत होता.तेव्हड्यात माझ्या मामाने आजोबांना लगेच बोलावलं म्हणून ते त्याच्या घरी गेले आहेत.”
प्रो.देसायांचा मुक्काम-पोस्ट मुलीच्या घरी असतो.मधुनच ते आपल्या मुलाकडे जातात.

“चर्चेचा विषय काय होता.?मी विचारू शकतो का?”
म्हणून मी सुनीलला विचारलं.
“एकाच व्यक्तीत गुण-वैगुण्य असलं तर त्याचे फायदे-तोटे काय?”
हा मी प्रश्न मकरंदच्या आजोबाना विचारून त्यांचे विचार जाणून घेत होतो.”
असं सांगून नंतर सुनीलने मलाच प्रश्न केला,
“सिगरेट ओढणं,बिअर पिणं ह्या बाबतीत तुमचं म्हणणं काय आहे?”

मी म्हणालो,
“ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.मी फक्त एव्हडंच म्हणेन की,संयम राखून कुठचीही गोष्ट केल्यास तसं करायला काही हरकत नसावी.मात्र आपल्या सुदृढ शरीराला भविष्य काळात प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने त्याचा काय उपद्र्व होईल ह्याची पूर्ण जाणीव असणं बरं.”

मला सुनील म्हणाला,
“अधुनमधुन कधीतरी मला आमच्या घराच्या बाल्कनीत जाऊन उघड्यावर एखादी सिगरेट ओढायला आवडतं,आनंद होतो.असंच अधुनमधून कधीतरी मित्रांबरोबर एखाद्या गरमीच्या दिवसात मी एक दोन ग्लासीस थंडगार बिअर पितो.आणि कधी कधी जास्तही पितो.अर्थात हे मी मुद्दाम करतो.
वरचेवर मी भरपूर तूप घालून मखमखीत सांजा खातो.तसंच मला कामावर जायचं नसल्यास दुपार होई पर्यंत,आणि कधी कधी त्याहून नंतर मी घरी अंथरूणात लोळत असतो.

असं असलं तरी मी माझ्या शरीरावर प्रेम करतो.आठवड्यातून तीन वेळा मी योगाभ्यास करतो.फिल्टर करून पाणी पितो.कसलंही खत घालून केमिकल्स टाकून उगवलेल्या भाज्या मी खात नाही.मी ऑरग्यानीक भाज्या खातो.मी भरपूर काम करतो.फावल्या वेळात समाज कार्य करतो.माझं कॉलेजचं शिक्षण पूरं झालं तरी अजूनही मी काहीनाकाहीतरी शिकत असतो.चाकोरीच्या बाहेर जाऊन मी अनोळख्यालाही मदतीचा हात पुढे करतो.
लहान मुलं आणि पाळीव प्राण्याशी मी नेहमीच दयाशील असतो.
मी अतिशय काटकसरीत रहातो.एका मित्राबरोबर रहात्या जागेत भागीदारीने रहातो.पहिले कपडे फाटल्याशिवाय दुसरे नवीन कपडे घेत नाही.माझ्या खोलीत जुनं फर्निचर आहे.आणि माझ्याकडे टीव्ही नाही.

रोजच्या जीवनातल्या ह्या माझ्या खास वागण्याच्या तर्‍हा माझे पाय शक्यतोवर जमीनीवरच रोवून ठेवतात. माझी अशी इच्छा आहे की एखाद दिवशी प्रत्येकाने थोडा वेळ काढून “थोडीशी” घेऊन पहावी,दुपारची वामकुक्षी घेऊन पहावी,भरपूर पुरण घातलेली,जाड पूरणपोळी वाटीभर साजुक तुपात किंवा घोळवलेल्या वाटीभर दुधात बुडवून खाऊन पहावी.”

“तू ज्या काही चांगल्या गोष्टी करतोस,त्याचा अर्थ मुळीच नाही की वाईट गोष्टी करायला तू मुखत्यार होतोस”
मी सुनीलाला, माझं मत देत देत त्याच्याकडून आणखी विचार ऐकून घेण्याच्या इराद्याने, असं म्हणालो.

“हा विचार त्याहीपेक्षा खिचकट आहे”
असं सांगून सुनील मला म्हणाला,
“माझ्यात असलेल्या दोन्ही बाजू मी मिळवून-जुळवून ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.मी कबूल करतो की मी काहीसा चमत्कारीक वागतो आणि काहीसा आत्मसंयमी रहातो.सकाळीच थोडा आळशी असतो पण नंतर मी खूप कष्ट घेतो.मी शिस्तीत असतो पण मी थोडा चंचलवृत्तीचाही आहे.माझ्या शरीर स्वास्थ्याबद्दल आणि मानसिक संतुलनाबद्दल मी कदर करतो,तरीपण अधुनमधून,माझ्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या करायला मी प्रवृत्त होतो.”

मी सुनीलला म्हणालो,
“माझी अशी समजूत झाली आहे की तुझ्यात असलेल्या ह्या द्विविधताचा,छिन्नमनस्कतेचा तू आदर केल्याने तुला तू प्रबल,सुखी आणि सरतेशेवटी पूर्णपणे सशक्त बनवत आहेस असं तुला वाटत असावं.तुझं मानसिक संतुलन रहातं,तुझ्या मित्रमंडळी बाबत,तुझ्या कुटूंबियाबाबत,किंवा अनोळख्याबाबत तू समजुतीने घेत असावास.
नाहीपेक्षा तू त्यांच्याबाबतीत चक्रावून गेला असतास.”

“तुम्ही माझ्या अगदी मनातलं सांगीतलंत”
खुशीत येऊन सुनील मला म्हणाला.
त्यानंतर मला म्हणाला,
“बिछान्यावर झोपून रहाण्यात,लोळत रहाण्यात काय वाटत असतं हे मला माझ्या अनुभवाने माहित असल्याने,दुसरा एखादा भावनांच्या आहारी जाऊन त्याचा तोच, मनाने पंगू झाल्याने त्याच्या बिछान्यातून उठायला त्याला बळ येत नसलं तर त्याचं हे वागणं मी जाणू शकतो.

अधुनमधून दिखावा म्हणून मी थोडे फॅशनेबल शुझ खरेदी करण्यात पैसे उडवीत असतो,माझं हे पाहून, एखाद्या पैसे खर्च करण्यात विशेष विचारकरणार्‍याने, अशावेळी असल्या गोष्टीवर विशेष दाद देऊन अवलोकन केलं तर ते मी समजू शकतो. मला अधुनमधून बिअर पिण्यात चैतन्य येत असल्याने मजा येते,त्यामुळे व्यसनाधीन व्हायला एखादा कसा प्रवृत्त होत असेल याची मला कल्पना येते.ह्या सर्व गोष्टीची मला जाण आहे.पण मी त्यात गुंतून रहात नाही.

माझ्याच वैगुण्याबद्दल मला विशेष वाटत असल्याने त्याचं खंडण करणार्‍यांचा आदर करायला मला शक्य होतं.आपली ही अजब दुनिया ज्यात भरपूर चांगलं आणि भरपूर वाईट भरलेलं आहे तिला समजून घ्यायला मला तात्विक वादाचा किंवा मुल्यांकनाचा सहारा घेण्याची जरूरी भासत नाही.संदिग्धता आणि गुंतागुत ह्या दोन्ही गोष्टी मी अंगिकारतो.”

सुनीलचे हे मुद्दे मला कौतुकास्पद वाटले.
मी त्याला म्हणालो,
“तुझ्यात असलेल्या वैगुण्याने तुला हतबल करून टाकण्यापूर्वी,वैगुण्याची मनोरंजकता तू हाताळल्यामुळे, त्याचं पर्यव्यसान, सोशिकतेत,संतुलनात, आनंदात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समानुभूतित होत असावं.
माझं मन मला सांगतं की,तुझ्यात असलेल्या कमतरतेला तू नाकारलंस किंवा त्याकडे दुर्लक्ष केलंस,तर तुझ्यात असलेल्या उत्तम गुणांचं महत्व कमी होऊ देण्यात तू प्रवृत्त होशील.

माझं म्हणणं सुनीला आवडलेलं दिसलं.तो मकरंदकडे पहात होता. मकरंद काहीतरी बोलेल ह्या अपेक्षेत होता.तेव्हड्यात मकरंद मला म्हणाला,
“तुमच्याशी चर्चा करून सुनीलचं समाधान झालेलं दिसतं.गुण-वैगुण्याबाबत माझ्या आजोबांचं मत नक्कीच वेगळं होतं.ते स्वतः त्यांचं मत तुम्हाला पुढल्या खेपेला सांगतील.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, August 25, 2011

जादूगिरी


“जोपर्यंत ती लहान मुलगी मी माझ्यातून हरवून बसत नाही तो पर्यंत मी जादूवरचा विश्वास हरवून बसणार नाही.”

“लहानपणी मला नेहमीच वाटायचं की,जादू करतात ती खरी असते.त्यावेळी मी जिकडे तिकडे जादूचे प्रयोग पहायची.टीव्हीवर जादूचे प्रयोग व्हायचे.
शहरात जादूचे प्रयोग करणारी कंपनी यायची. दाखवली गेलेली चलाखी,समजून घ्यायला माझी किशोर वयातली बुद्धी त्यावेळी विवरण करू शकत नव्हती.”
सविता मला सांगत होती.

त्याचं असं झालं,एक दिवशी,सविता आपल्या दोन लहान मुलांना घेऊन जुहूच्या चंदन थियेटरात जादूचे प्रयोग होणार आहेत ते दाखवण्यासाठी बिल्डिंगमधून खाली उतरून रिक्षाची वाट बघत रस्त्यावर उभी होती.ती संध्याकाळची वेळ होती.सविताला रिक्षा मिळत नव्हती असं वाटतं.मी ज्या रिक्षेतून आलो आणि उतरत होतो तिच रिक्षा मी तिला दिली.मुलांना लगबगीने बसवून माझे थॅन्क्स मानीत ती रिक्षात शिरताना मला,
“पुढल्या खेपेला आपण भेटूं तेव्हा बोलूं”
असं घाईघाईत सांगून निघून गेली.

त्यानंतर एक दिवशी,आपल्या बाल्कनीतून मला पाहून टाळी मारून माझं लक्ष गेल्यावर वर या म्हणून मला खुणावत होती.वर तिच्या घरी गेल्यावर मीच तिला, त्यादिवशी कुठे एव्हड्या लगबगीने जात होतीस म्हणून प्रश्न केला.

मला म्हणाली,
एखाद्या सुंदर तरूण मुलीला पेटीत झोपवून करवतीने तिचं अर्ध शरीर कापून पुन्हा तिला एकसांधी करणं, किंवा एखादा गुबगूबीत पांढरासफेद ससा डोक्यावर ठेवलेल्या हॅटमधून काढून दाखवणं हे फक्त जादू केली गेली एव्हडं म्हणण्या पलीकडे मला त्यावेळी समजत नव्हतं.

असे बरेच जादूचे प्रयोग मी पाहिले होते.अल्लाउद्दीन आपल्या जादूच्या चटईवर बसून शहरावरून उडत जायचा.
सिन्ड्रेलाचं रूप परिवर्तन करून तिला राजाच्या राजवाड्यात घेऊन जाणं,वगैरे.
जादूचे बरेचसे प्रयोग स्पष्ट न झाल्यासारखे आणि काल्पनीक वाटतात.असं असलं तरी मी जशी मोठी होत गेले तशी माझ्या बालपणात माझ्या आजुबाजूला होणारी जादू मी पहायची ती खरोखरीची असायची.”

असं म्हणून झाल्यावर, सविता माझ्याकडे कुतूहलाने पहात होती.माझ्याकडून प्रश्न विचारण्याची अपेक्षा करीत असावी.तिच्या चेहर्‍यावरून तसं मला भासलं.मला प्रश्न विचारायला उशीर होत आहे असं पाहून आपणच मला म्हणाली,
“तुमच्या शास्त्रीय दृष्ट्या विचार करणार्‍या मनाला मी काही तरी आव्हान करते आहे असं वाटणं सहाजीक आहे”.

माझ्या प्रश्नाची वाट न पहाताच मला सविता पुढे म्हणाली,
“माझी आई, दिवाळी आली की किंवा गणपतीचे दिवस आले की, अस्तव्यस्त दिसणारं घर सुंदर सजवून रहाण्यालायक दिसेल अशी जादू करायची.माझी आजी तिच्या स्वयंपाकखोलीत जादू करायची,दिवाळीसाठी निरनीराळे जिन्नस बनवायची.
वेळेवर् पाऊस पडणं,सूर्योदय आणि सूर्यास्त होणं, हे पण जादूचेच प्रयोग आहेत.पौर्णिमेचा चंद्र आणि लुकलूकणारे तारे ही पण जादू्च आहे.

आता मी वयाने मोठी झाल्यावर माझे जादूबद्दलचे विचार जरा पोक्त झाले आहेत.जरी मला माहित झालंय की कुणी अल्लाऊद्दीन नसतो,कुणी सांताक्लॉझ नसतो,सिन्ड्रेलाही नसते तरी खरी जादू आपल्याच अवतिभोवती असते.नवीन बालक जन्माला येण्यात,एखाद्या उपवर मुलीला तिचा सुंदर राजकूमार मिळण्यात, आकाशातून तारा निखळण्यात खरी जादू होत असते.

मला वाटतं जादूवर विश्वास ठेवण्यासाठी तुमचं हृदयही तरूण असायला हवं.माझ्यातला काहीभाग अजून सात वर्षाच्या मुलीचा आहे.त्या वयात, आवासून बघत असताना, जादूगाराने जादूची कांडी फिरवून रिकाम्या टोपलीतून दोन सुंदर पारवे फडफडत बाहेर काढणं किंवा कोंबडीचं फुल बनवणं, असले जादूचे प्रयोग पहाण्यात मला आश्चर्य वाटायचं.

जोपर्यंत ती लहान मुलगी मी माझ्यातून हरवून बसत नाही तो पर्यंत मी जादूवरचा विश्वास हरवून बसणार नाही.”

“तेव्हाच माझ्या लक्षात आलं.त्यादिवशी ज्यावेळी मी सोडून दिलेली रिक्षा तू पकडून लबगीने जायला निघाली होतीस त्यावेळी तुझ्या चेहर्‍याकडे पाहून तुझ्या मुलांपेक्षा, तूच लहान आहेस असं मला भासलं.”
सविताला मी म्हणालो.तिचा हसरा चेहरा पहाण्यालायक होता.तिचं तेही हसणं लहान मुलीचं हसणं असल्यासारखं मला भासलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 22, 2011

चविष्ट जेवण.


“चवीपासून उत्पन्न झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे, जीवनाचा उगम प्रकट होतो,नवजीवनाच्या निर्मितीची पवित्रता जाणवते,जीवन जगण्यातला आनंद जाणवतो.”

सुमित्रा माझी चुलत बहीण.सुमित्रा चविष्ट जेवण करण्यात एकदम तरबेज आहे अशी माझी खात्री झाली आहे.मस्त मसालेदार जिन्नस करावेत ते सुमित्रानेच.तिच्या घरी कसलाही घरगुती कार्यक्रम असला की मला ती जेवायला हटकून बोलावते.मला ती पर्वणीच वाटते.
बरेच दिवस चविष्ट जेवण झालं नाही असं मनात आल्यावर मी सुमित्राकडे फोनवर कळवून तिच्याकडे जेवायला जातो.मात्र मीहून असा गेलो की सरंगा,पापलेट किंवा मटण मी सकाळीच तिला आणून देतो. तिला मी असं करणं पसंत नसतं ही गोष्ट वेगळी म्हणा.ती म्हणते तुला काय हवं आहे ते सांगून फक्त जेवायला ये.

ह्यावेळी मला सुमित्राने जेवायला बोलवलं होतं त्यावेळी जेवणं झाल्यावर गप्पा मारायच्यावेळी,सुमित्राला मुद्दाम विषय काढून तिच्या मस्त पदार्थ करण्याच्या हातोटीबद्दल विचारायचं मी ठरवलं होतं.

तिच्या घरात शिरताच शिजत असलेल्या जिन्नसांचे मसालेदार वास दरवळताना पाहून मीच तिला म्हणालो,
“निसर्गाने आपल्याला ज्ञानेंद्रिय दिली आहेत त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला वाटतं,ही ज्ञानेंद्रिय घेऊन आपण जन्माला येतो त्यामुळे आजुबाजूच्या जगाचं हजारो प्रकारे ज्ञान मिळू शकतं.ते प्रत्येक प्रकारचं ज्ञान हे एक, सुखसमाधानीसाठी,आनंदासाठी आणि स्वास्थ्यासाठी,प्रवेशद्वारच आहे असं मला वाटतं.”
ह्या माझ्या बोलण्यावर ती काही बोलणार असं दिसल्यावर मीच तिला म्हणालो,
“सगळी जेवणं झाल्यावर मला तुला ह्या विषयी काही विचारायचं आहे.प्रथम मस्त जेवूया.”

सुमित्राचा नवरा आणि त्याचा एक मित्र बाहेर बाल्कनीत बसून “घुटूं” घेत होते.
“आज काय विशेष?”
असा मी त्यांना प्रश्न केला.
“सुमित्राने तुम्हाला सांगीतलं नाही?.आज गटार अमावास्या.प्रथम घुटूं आणि नंतर मटण हे ओघाने आलंच.घुटूं बाबतीत जरी तुम्ही सोवळे ब्राम्हण असला तरी मटण मात्र तुम्हाला वर्ज नसतं.विशेषकरून सुमित्राने केलेलं.”
शरदला-सुमित्राच्या नवर्‍याला-माझं गुपित माहित होतं.बोलून झाल्यावर तो सातमजली हसला.ती त्यांची हसण्याची स्टाईल होती.
सुमित्राने सुकं मटण,रस्सा असलेलं मटण,कलेजी आणि वडे केले होते.सोलकढी आणि भात होताच.

सुमित्राकडून “जेवायला चला” म्हणून हाक ऐकण्याची वाटच पहात होतो.प्रत्येक डीश एका पेक्षा एक होती. जेवून मन तृप्त झालं.बाकी आम्ही बाहेर गप्पा मारीत होतो.सर्व आटोपून सुमित्रा येऊन माझ्या जवळ बसली.आपण दुसरीकडे बसूया म्हणून माझ्या कानात पुटपूट्ली.नंतर मला म्हणाली,
“सकाळी तुम्ही आल्याआल्या ज्ञानेंद्रियाबद्दल काहीतरी बोलत होता.डोळे, कान, नाक, जीभ,त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत.पण त्यातल्यात्यात मला चवीच्या ज्ञानाबद्दल विशेष वाटतं. मी ज्यावेळेला लहान मुलगी होते त्यावेळी, अंड्याचं आमलेट,तिखट शिरा,तेलात तळलेल्या तिखट पुर्‍या मला आवडायच्या.माझी आई रोज रात्रींचं जेवण काय करायचं ते ती एका पाटीवर लिहून ठेवायची.निरनीराळ्या चटण्या आणि त्याबरोबर मुख्य जिन्नस काय आहे ते आम्ही वाचायचो.पाटीवर लिहिण्याचा तिचा मुख्य उद्देश मन बदलल्यास तिला ते सहज पुसून दुसरं काहीतरी लिहून ठेवायला सुलभ व्हायचं.

जशी मी मोठी होत गेले तशी मी ब्रेकफास्ट तयार करण्यात मुरब्बी होत गेले.स्वादिष्ट आमलेटस,गोड पोळे,ब्रेडचं पुडींग,केशर घालून घोटवलेलं दुध असे पदार्थ असायचे.माझा आवडता ब्रेकफास्ट म्हणजे, कोथिंबीर घालून केलेले तिखट पोहे आणि त्यावर पेरलेलं ताजं किसलेलं खोबरं(चुन) किंवा भरपूर तूप घालून केलेला मखमखीत गोड शिरा,गरम गरम तिखट थालीपिठ आणि त्यावर लोण्याचा गोळा.”

“जेवण करणार्‍याला स्वतःला चवीचं ज्ञान जास्त आवश्यक आहे असं मला तरी तुझ्या बोलण्यावरून वाटतं. म्हणूनच तुझे जेवणाचे जिन्नस असे मस्त होतात नाही काय?
मी सुमित्राला प्रश्न करून मला विचारायचं होतं ते विचारलं.

“आता ह्या वयावर, शाळेतून निवृत्त झाल्यावर, मी निरनीराळ्या रेसिपीझ वाचून,प्रत्येक डीश आणखी चवदार करण्याची कल्पना करून,गोडा मसाला, मटणाचा मसाला,कुर्ल्याचं, तीसर्‍याचं भाजाण्याचं करण्यासाठी केलेला ताजा मसाला असावा असा विचार करून जिन्नस बनविते.ताज्या मसाल्याचा वापर हे पदार्थ जास्त चवदार व्ह्यायचं एक कारण आहे.पदार्थ शिजवला जात असताना योग्य तपमानाचा खालून दिला जाणारा जाळ हाही तेव्हडाच महत्वाचा आहे. मंद जाळाखाली जिन्नस पण शिजून चवदार लागतो.
बाहेर जेवायला जाते तेव्हा जिन्नस ऑर्डर करण्यापूर्वी तो कसा बनवला आहे त्याची चिकित्सा करून जमल्यास मला त्यावर आणखी काय हवं आहे याची सुचना देऊन तसा करून घेते.”
सुमित्रा माझ्या प्रश्नाचं उत्तर देत होती.

पुढे म्हणाली,
“घरी जिन्नस बनवून झाल्यावर त्याची चव पहाते.माझ्या मेंदुच्या मध्य भागातून, खरपूस तूपाची चव, खमंग मसाल्याची चव,सुक्या मटणाच्या फोडीची चव,तिरफळं घातलेल्या बांगड्याच्या तिखल्याची चव,कशी असते ते आठवूं शकते.ह्या आठवणी एव्हड्या जबर्‍या असतात की माझ्या जीभेवरपण त्या आठवणी आणता येतात.

माझ्या आजीच्या स्वयंपाक खोलीतल्या,निरनीराळ्या जिन्नसांच्या निरनीराळ्या वासांच्या आठवणी माझ्या मेंदूत अजून आहेत.जास्तकरून लसणीची फोडणी देऊन लोण्यासारखी शिजवलेल्या अळूच्या भाजीचा वास, कांद्याच्या चुरचूरीत भज्यांचा तळलेला वास,तिनेच तयार केलेल्या ताज्या मसाल्याचा वापर करून केलेल्या सुक्या मटणाचा शिजतानाचा वास.

चवदार पदार्थांच्या मिळणार्‍या चवीमुळे मी आनंदी होत असते.चव आणि चवीच्या आठवणी आणून शुद्ध आल्हाददायक वातावरणात चंगळ करणारी मी एक ज्ञानसंपन्न व्यक्ती झाली आहे आणि तशी असल्याबद्दल मला बरं वाटतं.हे विचार आता आता मला यायला लागले आहेत.शिक्षिकेची नोकरी असताना असले विचार डोक्यात आणायला वेळ कुणाला होता म्हणा.

चव आणि चवीची संरचना ह्यात मिळणार्‍या आल्हाददायक वातावरणामुळे माझ्या ध्यानात आलं आहे की, निसर्गाने त्यासाठीच आपलं शरीर आणि मन-आत्मा म्हणा वाटलं तर-बनवलं आहे.
ज्ञानेंद्रियाकडून मिळणारी माहिती माझ्या शरीरात जान आणते.मला वाटतं,चवीचं ज्ञान शरीराला आणि मनाला आनंद देतं,त्यांचं पोषण करतं.

चवीपासून उत्पन्न झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे, जीवनाचा उगम प्रकट होतो,नवजीवनाच्या निर्मितीची पवित्रता जाणवते,जीवन जगण्यातला आनंद जाणवतो.
नीट धुऊन साल काढून ताज्या ऊसाचा करवा दातामधे चावताना जेव्हा मी त्याचा स्वाद घेते, तेव्हा ज्या मातीत तो रुजला आणि उगवला त्या मातीचा मला स्वाद कळतो,आणि तो ऊस वाढत असताना ज्या साखरेने तो परिपूर्ण झाला त्या साखरेचा स्वाद कळतो.

मक्याची कणसं,उकडून मग खाताना त्याचे दाणे जीभेवर खरखरीत लागतात.पण ती कणसं शेतात वाढत असताना वार्‍यावर डुलताना,पावसात भिजताना दाण्या दाण्यात साखर जमा करीत असतात.प्रत्येक दाण्यातलं साखर मिश्रीत दुध जीभेवर वेगळाच स्वाद देतं.

कोकणात मिळणारे उंच झाडावरचे लहान लहान पिवळे जर्द आंबे,ज्यांना कोकणात घोटं म्हणतात,त्यांचा मिरमुटा स्वाद जीभेवर कसा लागतो ते अवर्णनीय आहे.ह्या घोटांचा रस खूप पातळ असतो आणि अतिशय गोड असतो,त्यासाठी तो चोखूनच खावा लागतो.एक एक आंबा चोखून खाताना जेव्हा त्याचा रस हनुवटीवरून हातावर आणि हातावरून मनगटावर झिरपत येतो तेव्हा पृथ्वीवरच स्वर्गाच्या दारात असल्यासारखं वाटतं.”

सुमित्रा,माझ्या प्रश्नाचं अशाप्रकारे सवित्सरपणे माहिती देऊन उत्तर देणार होती हे मला महित होतं.एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेत प्रिन्सिपालच्या पदावर जाऊन नंतर निवृत्त झालेली सुमित्रा किती सक्षम होती हे मी जाणून होतो.

मी तिला म्हणालो,
“आपली आई,आजीसुद्धा असेच चविष्ट जिन्नस बनवायची.पण तू त्याचं जे काय विश्लेषण करून सांगीतलंस त्याला तोड नाही.”

“मला चण्याच्या झाडावर चढवू नकोस.ही गटारी अमावास्या झाल्यावर श्रावण चालू होतो.एका मागून एक सण येणार आहेत.श्रावणात आम्ही सोवळे ब्राम्हण असतो.म्हणून तुला गोड चविष्ट जिन्नस करून घालीन. हे तुला स्थायी निमंत्रण आहे असं समज.”
सुमित्राने मला सांगून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, August 19, 2011

एक चॉकलेटची गोळी.


“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.”

त्या दिवशी मी जे.पी.रोडवरून चार बंगल्याच्या दिशेने चाललो होतो.दुपारची वेळ होती.बाहेर प्रचंड उन आणि त्याबरोबर उष्मा होत होता.उन्हापासून सावरायला छत्री उघडून चालत होतो.अंधेरी स्पोर्ट्स कॉप्लेक्सच्या फुटपाथवर लांबून प्रमिलेला येताना पाहिलं.
“छत्री थोर तुझे उपकार”ह्या शिर्षकाखाली कुणीतरी छत्रीचे अनेक फायदे आणि उपकार मोठ्या कल्पकतेने लिहिल्याचं आठवलं.
पावसापासून,उन्हापासून वाचवायला,हातकाठी म्हणून वापरायला,कुणी अंगावर धावून आल्यास छत्रीची टोकदार बाजू वापरून संरक्षण करायला उपयोग होतो.तसंच कुणालातरी सामोरून येताना टाळायलापण छत्रीचा उपयोग करता येतो हा बेरकी विचार माझ्या मनात पटकन येऊन गेला.
पण त्याच क्षणी प्रमिलेवर हा उपाय करणं ठीक नाही असं माझं दुसरं मन मला सांगायला लागलं.

प्रमिलेसारखी साधीभोळी,नावासारखीच प्रेमळ,आदर करणारी,मोकळ्या मनाच्या मुलीने मला अशातर्‍हेने तिला टाळताना पाहिलं तर तिला खूपच वाईट वाटेल असं माझ्या त्या दुसर्‍या मनाला वाटलं.बरेच दिवस मी तिच्या घरी गेलो नव्हतो.ती बोलवायची पण मला ते जमलं नाही.तिचे आजोबा माझी खूप आठवण काढतात असं ती म्हणायची.त्यांचं वय झालंय.नंतर वाईट वाटायला नको वेळात वेळ काढून त्यांना भेटून आलं पाहिजे असं मला नेहमीच वाटायचं.पण गंमत काय आहे,घरी गेल्यावर प्रमिलेच्या तावडीत सापडल्यावर चार गोष्टी सांगीतल्याशिवाय ती मला सोडायचीच नाही.

शेवटी व्हायचं तेच झालं.
“मी तुम्हाला लांबून पाहिलं होतं.आज माझ्या आजोबांचा जन्म दिवस आहे.तुम्ही भेटला म्हणून त्यांना सांगीतलं आणि तुम्ही घरी त्यांना भेटायला आला नाहीत तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल.”
मला प्रमिला लागलीच म्हणाली.
“चल तू पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो.”
असं मी तिला सांगीतलं.

प्रमिलेला लहानपणापासून चॉकलेट खाण्याची आवड.आजोबांबरोबर बाजारात गेली की त्यांच्याकडे हटकून चॉकलेट मागायची.आजोबा तिच्याबरोबर आपणही चॉकलेट खायचे आणि तिलाही द्यायचे.आता एव्हडी मोठी झाली तरी तिच्या घरात एक मोठा गोल टिनचा चॉकलेटचा डबा असतो.त्यात ती विभिन्न प्रकारच्या चॉकलेटच्या गोळ्या भरून ठेवीत असते.कुणी लहान मुल घरी आलं की ती त्यातल्या एक दोन गोळ्या त्याला ती देतेच शिवाय माझ्या सारखा वयाने मोठा आला तरी त्याला ती डबा उघडून समोर ठेवते.
“निवडून तुमच्या आवडीची गोळी घ्या” असं सांगते.
प्रमिलेला आणि तिच्या आजोबांना चॉकलेट फार आवडतं हे मला माहित होतं.आजोबांच्या चॉकलेट आवडीची सवय प्रमिलेनेच त्यांना लावली होती.
त्यांच्या जन्मदिवशी कॅडबरी चॉकलेट त्यांना द्यावं म्हणून मी तिला पुढे जा असं सांगीतलं.कारण मला त्या दोघांसाठी चॉकलेट पॅकेट्स विकत घ्यायची कल्पना सुचली.

तिच्या घरी गेल्यावर तिच्या हातात एक पॅकेट आणि आजोबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातात एक कॅडबरीचं पॅकेट दिलं.
आज मला चॉकलेटवर चारगोष्टी सांगायचं प्रमिलेने ठरवलं होतं असं वाटलं.आपल्या गोल टीन डब्यातली चॉकलेट गोळी घ्यायला माझ्या समोर डबा उघडला.मी रावळगावचं एक चॉकलेट घेतलं.आणि तोंडात टाकलं.माझ्याबरोबर हसली.थोडसं मला खटकलं.म्हणून मी तिला विचारलं,
“काय ग? लहान मुलासासारखा गोळी ताबडतोब तोंडात मी टाकली म्हणून हसलीस का?”

मला प्रमिला म्हणाली,
“अजीबात नाही.इतकी वर्ष मी चॉकलेट खात आली आहे,ह्या चॉकलेटच्या गोळीबद्दल मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगते.”
डबा बंद करून माझ्या जवळ येऊन बसली.तिचे आजोबाही आमच्या बाजूला बसले होते.
मला पुढे म्हणाली,
“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.ती चॉकलेटची गोळी, लहान असो वा मोठी असो,नेहमीच उदास वातावरणाचं आनंदात रुपांतरीत करू शकते.वय झालं म्हणून काय झालं?एखाद्याने चॉकलेट तुमच्या हातावर ठेवलं तर तुम्हाला थोडं वेडंखुळं व्हायला काहीच हरकत नाही.

मला नेहमीच वाटत असतं की,प्रत्येकाच्या तोंडात छोटासा गोड-खाऊ दात कुठेतरी असतोच.शिवाय जीभेवर निरनीराळी चव समजण्यासाठी निरनीराळी जागा असते त्यात गोडचव ओळखण्याची जागा कुठच्याही वयावर संवेदनशील असतेच.
त्यामुळे चॉकलेटची गोळी तोंडात टाकल्यावर ती चाखण्याची तीव्र इच्छा जागृत होऊन नक्कीच बरं वाटतं.

हे पण शक्य आहे की प्रत्येकाने आपल्या आवडीची चॉकलेटची गोळी निवडून चाखली तर आजुबाजूच्या जगात नक्कीच गुण्यागोविंदाने जगावं कसं वाटेल.माझी खात्री आहे की एक चॉकलेटची गोळी कुणाच्याही चेहर्‍यावर हास्य आणल्याशिवाय रहाणार नाही.आणि ते हसूं दुसर्‍याला हसायला लावून हा हास्याचा प्रवास चालू राहून सर्वच सुखी झाल्यासारखे होतील.
मग त्या गोळ्या चॉकलेटच्या असोत,मिंटच्या असोत,रावळगावच्या गुळाच्या गोळ्या असोत नाहीतर कॅडबरीच्या किंवा साठेंच्या टॉफी असोत,त्यात जो चॉकलेटी प्रकार असतो त्याने मनाची तृप्तीच होते.

एखाद दिवस बराच कटकटीचा गेला असेल,दिवस संपता संपता कटकट वाढत गेली असेल पण जेव्हा मी घरी येते आणि हा माझा चॉकलेटचा गोल टिनचा डबा उघडते आणि पहिली गोळी तोंडात टाकते त्यावेळी जणू दिवस जागच्या जागी थांबल्यासारखा वाटतो.माझ्या सर्व कटकटी विरघळून गेल्या सारख्या वाटतात. आरामात पडून माझी आवडती गोळी चोखत रहाते.
गंमत म्हणून तुम्हाला सांगते.
मुलाकडीची मंडळी पाहून गेल्यावर मुलगी नापसंत असल्याचा निर्णय कळवल्यावर त्या मुलीला दुःखी रहाण्यात थोडा वेळ जातो,वाईट वाटण्यात थोडा वेळ जातो पण म्हणून काही सर्वच वेळ असा घालवण्यात हाशील नसतं अशावेळी मला वाटतं एक चॉकलेटची गोळी चघळल्यावर सर्व शीण निघून जाईल.
माझी एक मैत्रीण दिसायला अशी तशीच होती.नापसंती झाल्याचं समजल्यावर पिशवी भरून चॉकलेटच्या गोळ्या आणून त्यात ती तिची सर्व दुःख बुडवून टाकायची.जरी तिचं मन पूर्ण सावरलं गेलं नसलं तरी जे काय घडलं त्याचा विचार विसरून जाऊन आपल्या आवडत्या गोळ्या निवडून चघळण्यात तिला त्या वेळेचं नक्कीच चांगलं वाटण्यात रुपांतर करता यायचं.

म्हणजे ह्याचा अर्थ अस नव्हे की घरातलं कुणी गेल्याने दुःखाचा होणारा तणाव एका चॉकलेटच्या गोळीने कमी होईल.पण एक मात्र मला नक्कीच कबूल करावं लागेल की,मला आवडणारी एक गोळी माझ्या तोंडात चाखण्यासाठी टाकल्यावर त्यातून विरघळून निघणारा साखरी चांगूलपणा माझ्यात थोडीशी सुखाची भावना आणतो.

काही माझ्याशी सहमत होणार नाहीत.तुम्ही कधी जाणवून घेतलंय काय?कुणीतरी आपली आवडती गोळी तोंडात टाकल्यावर त्याचा चेहरा कसा दिसतो?मी पैजेने सांगीन की,त्याच्या चेहर्‍यावर सातमजली हसू दिसेल.सगळं आजुबाजूचं विसरून जाऊन तो मुळात उदास का झाला ह्याचाही विचार करायचा विसरून जाईल.

पुढच्या खेपेला तुम्ही मनातून कोसळला तर बाहेर जाऊन तुम्हाला आवडणार्‍या चॉकलेटच्या गोळ्या घेऊन या.तुमच्या जीभेवर ठेवा आणि काय होतं ते पहा.माझी खात्री आहे की येणार्‍या सर्व समस्यांचा उलगडा होईल.गोळी जीभेवर पडल्यावर साखर भरधाव वेगाने अंगात शिरून, उदास वाटण्याचं रुपांतर आनंदात करून दिवस चांगला जाईल.आनंदाचं एखादं मिनीट का होईना,तसं होत असल्याने, मला चॉकलेटच्या गोळीबद्दल विशेष वाटतं.”

प्रमिला हे मला सर्व सांगत असताना मी मधून मधून आजोबांच्या चेहर्‍याकडे बघत होतो.आजोबांना तिचं म्हणणं पूर्ण पटल्यासारखं मला दिसत होतं.
त्यांना मी दिलेलं कॅडबरी चॉकलेटचं पॅकेट त्यानी उघडून त्यातला एक तुकडा माझ्या हातात देत मला म्हणाले,
“माझ्या जन्मदिवशी मुद्दाम येऊन मला शुभेच्छा दिल्याबद्दल थॅन्क्स.”
आणि दुसरा तुकडा आपल्या तोंडात टाकून मला म्हणाले,
“प्रमिलेचा मी आजोबाच नव्हे काय?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 16, 2011

आणू कुठून ती खुशी सांग एकदा


अनुवाद

अंगीकारीलेस जे तुझे तुला
आणू कुठून मी ते सदा सर्वदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

तेच फुल मी ज्या सर्वांनी तुडवीले
तेच जीवन जे आंसवानी वाहिले
श्रावण वर्षा होऊन बरसणारा
आणू कुठून तो मेघ सांग एकदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

लालसा असे तुला इतरांची
अभिलाषा करिते मी मात्र तुझी
अंतरात तुझ्या दुःख अन दुःख
अंतरात मात्र माझ्या तू अन तू
चैन देईल तुझ्या अंतराला
आणू कठून तो उपाय सांग एकदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

प्रकट झाली माझी विवशता
निषप्रभावी माझी उदासीनता
वांछिले असता कधी निर्वाणाला
मिळे ना मज पाहूनी अनुपाताला
स्थिरचीत्त करण्या तुझ्या मनाला
आणू कुठून तो आशीष सांग एकदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 13, 2011

ज्यावेळचं त्यावेळी.


“दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?”

मी नवा फ्लॅट मागेच बुक केला होता.आणि आता तो तयार झाला होता.त्याचे उरलेले सर्व पैसे दोन दिवसात भरायची मला बिल्डरकडून नोटीस आली होती.
माझं देना बॅन्केत खातं होतं.बरीच अशी माझी डिपॉझीट्स मला कॅश करून घ्यायची होती.पण त्या बॅन्केच्या मॅनजेरने हे सर्व व्हायला आठ दिवस लागतील असं सांगीतलं.

मला चटकन मालतीची आठवण आली.ती देना बॅन्कच्या हेड ऑफिसमधे वरच्या हुद्यावर काम करीत होती.मालती हौस म्हणून गाण्याचे कार्यक्रम करायची.तिचा आवाज छान होता.लहानपणापासून तिचा हा छंद होता.अशाच एका गाण्याच्या कार्यक्रमात तिची आणि माझी ओळख झाली होती.

रविवारचा दिवस होता तिलाच भेटायला मी तिच्या घरी गेलो.मालती मला म्हणाली,
“तुम्ही काही काळजी करू नका.सोमवारी साधारण एक वाजता तुम्ही माझ्या ऑफिसात तुमचे सर्व डिपॉझीट्सचे पेपर्स घेऊन या.”
मी तिला म्हणालो,
“हे बघ,ते सर्व पेपर्स आता आणले आहेत.तुच ते तुझ्याबरोवर घेऊन जा.”

दुसर्‍या दिवशी सोमवारी मी मालतीच्या ऑफिसमधे गेलो.
गेल्या गेल्या माझ्या हातात हव्या असलेल्या रक्कमेचा चेक देत मालती मला म्हणाली,
“ह्या ह्या कागदावर सही करा.झालं, तुमचं काम संपलं आहे.
ज्यावेळचं त्यावेळी काम करायची मला सवय झाली आहे.
हे असं व्हायला त्याच्या मागे थोडी पार्श्वभूमीका आहे.
आपण चहा घ्यायला कॅन्टीनमधे जाऊया.तिकडे मी तुम्हाला माझे विचार सांगते.”

मी मालतीचे थॅन्क्स मानले आणि चेक नीट बॅगमधे ठेवून तिच्या बरोबर कॅन्टीनमधे गेलो.चहाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर मालती मला म्हणाली,
“जीवनातून मार्ग काढायचा झाल्यास सोप्यात सोपा मार्ग म्हणजे ज्यावेळचं त्यावेळी करणं.न केल्यास खेद होण्यापलीकडे दुसरं मनाला दुःख होण्यासारखं कारण नसावं.आणि नंतर आलेली संधी त्याच क्षणी घ्यायला हवी होती पण बोटातून निसटली असं वाटायला लागावं.

मला आठवतं मी हायस्कूलमधे आठवीत असताना मला एक संधी आली होती.एका कार्यक्रमात स्टेजवर गाणं म्हणायची.मी ती संधी घेतली नाही.
कारण मी घाबरली होती.मला ते काम जमणार नाही असं वाटत होतं.नंतर काही महिने गाणं न म्हणण्याच्या माझ्या निर्णयाचा माझ्या मलाच मी दोष देत राहिले.
संशय आणि गोंधळ ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात दुसरं काहीही आणायला मला वेळच मिळत नव्हता.

अगदी प्रामाणिकपणे मलाच मी विचारलं असतं,
“ज्यावेळचं त्यावेळी मी केलं असतं तर असं काय झालं असतं.?”
कुणास ठाऊक?मी दुसरी लता मंगेशकर झाली असती.
कदाचीत नसतेही.पण निदान खात्री करून घ्यायला माझ्या अंगाला काही झोंबलं नसतं.

जेव्हा मी माझ्या भवितव्याचा विचार करायची त्यावेळेला मला दिसून यायचं की मला अगदी साधी जीवन-शैली जगावी लागणार आहे. परंतु,काहीवेळा मला दिसून यायचं की वाटणार्‍या नव्या भीतीवर मी मात करीत आहे.किंवा एका नव्या साहसाचा मी पाठपुरावा करीत आहे.
अशा जीवनाचा विचार येऊन माझ्या मलाच हसू यायचं.

दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?
अर्थात,मला तसं वाटणार नाही कारण मी त्या दोनही गोष्टी कधीही केलेल्या नाहीत.

पण केलं असतं तर नंतर, काहीतरी तडीस नेल्याची,आणि पुढे कधीतरी ह्याहीपेक्षा काहीतरी सनसनाटी गोष्ट करण्याची उत्सुकता असल्याची कल्पना मला करता आली असती.जरी मला माऊंट एव्हरेस्ट चढून जाण्याची चुरस करता आली नाही तरी,अनुभवातून मला सांगता येईल की,ज्यावेळचं त्यावेळी करणं फायद्याचं असतं.

मला आठवतं, माझ्या हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात,मला एका नाटकात गाणं म्हणायला संधी मिळाली होती.त्यासाठी मला शहरात जाण्याची जरूरी होती. शहरातल्या नाटकाच्या मंचावर गाऊन दाखवणं, म्हणजे एव्हड्या गर्दी असलेल्या श्रोत्यांत,ज्यात अनेक दर्दी गायक बसलेले आहेत,मला जरा कठीण वाटलं होतं.पण मला हे ही माहित होतं की,माझ्यात गाऊन दाखवायचं थोडंफार कौशल्य आहे. शिवाय अशी आलेली मोठी संधी निसटून जायला मला नको होतं.

शहरातला भयंकर उष्मा,आणि त्यात गाण्याच्या चुरसीचा ताण हे असून सुद्धा मी माझ्यात असलेलं सर्व काही दिलं आणि त्याबद्द्ल मला अभिमानही वाटला. मला माहित होतं की माझ्याकडून इतकं काही चांगलं गायलं गेलं नव्हतं.पण मला त्यामुळे नाराज व्ह्यायला जरूरीचं वाटलं नाही.

दुसर्‍या कुठल्याही स्पर्धेत पुन्हा भाग घेऊन माझ्या मलाच आव्हान द्यायला माझी तयारी झाली होती.मी काहीही करू शकते हे माहित झाल्यावर, जीवनात,भरपूर धाडस करणं आणि मनाला समाधानी वाटून घेणं यासाठी,जगायला मी तयार होते.प्रश्न होता फक्त ज्यावेळचं त्यावेळी करणं.
जीवनात खेद वाटून रहाणं,ज्यात मला गम्य आहे ते इतर करीत आहेत ते मी पहात रहाणं आणि ते करायला मला धाडस न होणं हे काही योग्य नाही.

माझा सर्व वेळ खर्ची करून जीवनात काय काय सफल करून घ्यायचं आहे याची एका मागून एक यादी करण्यात माझा काही फायदा होणार नाही असं मला वाटतं.त्यापेक्षा मी माझ्या जीवनाकडे, ज्यावेळचं त्यावेळी साध्य करून घेण्यात,लक्ष देते.त्यामुळे जगात असलेला सर्व वेळ, मला नवी यादी करायला, प्राप्त होतो.

माझ्या लक्षात आलं आहे की,आठवीत असताना आलेली संधी मी घेतली नाही म्हणून काही ह्या शतकातली मोठ्यात मोठी घोडचूक झाली अशातला भाग नाही.पण अजूनही मला त्यानंतर झालेला खेद लक्षात आल्यावर दुःख होतं.
मला अजूनही वाटतं की,हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शहरात जाऊन मोठ्या समुहात गायल्या नंतर त्याबद्दल वाटणं आणि आठवीत गाणं म्हणण्याची संधी आल्यावर माझ्या हातून ती संधी सुटली त्याबद्दल वाटणं,ह्या दोन्ही भावना वेगवेगळ्या होत्या.
मी ठरवलंय़ की,परत मागे वळून आठवीतल्या हुकलेल्या संधीच्या खेदाची भावना चुकूनसुद्धा मनात आणणार नाही.

म्हणून मी जाहिरपणे हेच म्हणेन,
“एखाद्या जॉबसाठी अर्ज करायचा झाल्यास आणि त्या जॉबला तुमच्याकडे असलेल्या अनुभवापेक्षा जास्त अनुभवाची गरज आहे असं वाटत जरी असलं तरी,ज्यावेळचं त्यावेळीच करावं.”

मालती जे काही मला सांगत होती ते मला पूर्णपणे पटलं होतं.
नव्हेतर मी पण मालती सारखाच विचार करीत आलो आहे.
उठता उठता मी तिला म्हणालो,
“तुझ्या सारखंच माझं आचरण आहे.ज्यावेळच्या त्यावेळीच मी हा फ्लॅट बुक केला होता.आणि तुझ्या सहकाराने मला त्या फ्लॅटचं पझेशन ज्यावेळचं त्यावेळी घेता येईल.आपल्या दोघांची विचाराची फ्रिक्वेन्सी जुळली हा मात्र योगायोग म्हटलं पाहिजे.”
माझं हे ऐकून मालती खूश झाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, August 10, 2011

आजीचं सूर्यकिरण.


“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्या सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!”

अंधेरीला जाणार्‍या बस स्टॉपवर मी बसची वाट पहात एकदा उभा होतो.समोरच्या कॉलनीतून अशोकला येताना पाहिलं.तो पण बसने जाण्यासाठी बस स्टॉपवर आला.मला पाहून, मला हलो म्हणाला.

“रोज मी मनात म्हणत असतो,एकदातरी सवडीने तुला विचारावं.पण संधीच मिळाली नाही.तेव्हा आज तुला नक्कीच विचारतो,नचुकता दर रविवारी तू सातबंगल्यावरच्या वृद्धाश्रमात थोडावेळ जाऊन येतोस.असं मला कुणीतरी सांगीतलं.तिकडे तुझं कुणी नातेवाईक रहायला आलंय का?”
मी अशोकला सरळ सरळ प्रश्न केला.

तेव्हड्यात धाके-कॉलनीची स्पेशल बस आली.रिकामीच असल्याने आम्ही एकाच बेंचवर जवळ जवळ बसलो होतो.दोघेही आम्ही दादरला जात होतो.
त्यामुळे गप्पा मारायला चांगला वेळ मिळाला.तिकीटं काढून झाल्यावर अशोक मला म्हणाला,
“मला तुम्ही हे कधीना कधी विचारणार हे माहित होतं.
मला आत्ता खरोखरच आठवत नाही ते कसं घडलं ते.कदाचीत माझ्या आजी आजोबांवरच्या माझ्या प्रेमामुळे असावं.तसं पाहिलंत तर वयस्कर लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.जेव्हा मी त्यांच्या खोलीत जातो,ते मला ओळखतही नसले तरी,त्यांच्या चेहर्‍यावर जेव्हा आनंदाची छटा उमलते तेव्हा मला खूपच बरं वाटतं.

सातबंगल्याला आमच्या शेजारी एक वृद्धाश्रम आहे.अलिकडेच मी दर रविवारी त्या वृद्धाश्रमाला भेट देतो. त्यांचं भजन चाललेलं असेल किंवा कसलही प्रवचन चाललेलं असेल त्यावेळी मी त्यांच्यात जाऊन बसतो. अशाच एका रविवारी मला नेहमीच भेटणार्‍या,चेहर्‍यावर बर्‍याच सुरकूत्या असलेल्या,आजीला मी सामोरा गेलो.तिने माझा हात गच्च ओढून धरला.मला वाटलं भजन ऐकताना मी तिच्या जवळ बसावं म्हणून तिने असं केलं असेल.
उलट,ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली.तिच्या खोलीतल्या भिंतीवर बरेच फोटो लटकवलेले होते ते मला दिसले.तिच्या नातवंडांच्या-पंतवंडाच्या फोटोपासून ते तिच्याच आईवडीलांच्या फोटो पर्यंत बरेच फोटो होते.

मला ती ते फोटो का दाखवत आहे हे माझ्या लक्षात येईपर्यंत,
ती मला म्हणाली,
“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्यां सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!.मला ह्या वृद्धाश्रमात यायचं नव्हतं.
आणि जर मला शक्य झालं तर मी लागलीच सोडूनही जाईन.
“माझ्या नातवा,”तू माझी सहनशीलता वाढवलीस.
दर रविवारची मी तुझ्या येण्याची वाट बघत असते.माझ्या उदास वादळी जीवनात तू मला सूर्यकिरणासारखा वाटतोस.तू मला खास आणि महत्वाचा वाटतोस.तुझा पण एक फोटो मला ह्या भिंतीवर लावायचा आहे.”

माझी त्या आजीवर इतकी छाप पडलेली पाहून माझाच मला अचंबा वाटला.मला ती सूर्यकिरण म्हणाली हे ऐकून मला आवडलं.माझ्याच आयुष्यात अशीच सूर्यकिरणं आलेल्या घटनांची मी आठवण काढू लागलो.
एकदा खोलीत अगदी गडद काळोख होता.मी निपचित पडून होतो.त्या काळोखातून सूर्याचं एक किरण माझ्यावर पडलं.माझं जगच प्रकाशमान झालं.मला आशा निर्माण झाली.सूर्याच्या किरणाबद्दल मला विशेष वाटतं.

ह्या सूर्याच्या किरणांबद्दल विशेष गंमत म्हणजे ती नेहमीच येत असतात.विशेषकरून भयंकर वादळ येऊन गेल्यावर ती येतात.
सदानकदा निरभ्र आकाशाकडे पाहून ते आकाश किती विस्मयकारक असतं हे मी जाणलं होतं.पण त्या निरभ्र आकाशातल्या सौंदर्याकडे आवासून पाहायला वादळाचा अनुभव घेतला नसता तर कळलं नसतं.

ह्या सूर्यकिरणावर माझा विश्वास आहे.मला हवं त्यावेळी आणि हवं तसं हे सूर्यकिरण येईलच असं नाही.पण ती किरणं निरनीराळ्या प्रकारची असावीत.माझ्यासाठी, ती सुरकूतल्या चेहर्‍याची माझी आजी जी मला दर रविवारी वृद्धाश्रामात गेल्यावर भेटते,जी माझं नाव नेहमीच विसरून मला,
“रे, नातवा”
अशी हाक मारतेच आणि त्याचवेळी मला एक गोड हसू देऊन माझ्यावरचं प्रेम दाखवते, तसंच माझी धाकटी बहिण मला घरात येताना पाहून,
“दादा आला,दादा आला”
असं ओरडून जाहीर करते,ती किरणंच आहेत.

आनंद मिळण्यासाठी,ही किरणं माझ्या अंगावर पडतात.जीवनातल्या कठीण प्रसंगात,अंधाराच्या जागेत मार्ग काढण्यासाठी ही किरणं मला प्रकाश दाखवतात.मला माहित आहे की ही किरणं माझ्या अंतरात आहेत,वादळाच्यावेळी वादळ येऊन गेल्यावर ती दिसावीत म्हणून मी वाट पहात असतो.तसंच मी पण किरण बनुन दुसर्‍याच्या जीवनात फरक पाडीन अशा संधीच्या प्रतिक्षेत असतो.म्हणूनच मला कुणाचं तरी सूर्यकिरण व्हावं असं वाटत असतं.”

अशोकचं हे बोलणं ऐकून मला खरोखरच त्याच्याबद्दलचा आदर द्विगूणीत झाला.मी त्याला म्हणालो,
“अशोक,तू ग्रेट आहेस.नुकताच तू कॉलेजात जायला लागलास.वयस्कर लोकांत राहून त्यांच्या चेहर्‍यावरच्या आनंदी छटा पाहून तुला आनंद होतो हे तुझं अवलोकनच ग्रेट आहे.तुला चांगलं भवितव्य आहे.एकतर तू चांगला कवी होशील किंवा चांगला लेखक होशील असं मला वाटायला लागलं आहे.
माझ्या तुला शुभेच्छा आहेत.तुला विचारावं म्हणून आज मी संधीचा फायदा घेतला ते बरं झालं असं मला वाटतं.”

माझा हात आपल्या हातात घेऊन आवंढा गिळत अशोक मला म्हणाला,
“तुमच्या शुभेच्छाच मला बस आहेत”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com