Friday, December 30, 2011

व्यसनमुक्ती.





"मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात. अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात."

अनंत नाडकर्ण्याला माझ्या दारात बेल वाजवून उभा ठाकलेला पाहून मी खरंच अचंबीत झालो.ही गॉन केस असं मी तत्पूर्वी समजत होतो.


त्याचं असं झालं,एका नावाजलेल्या बॅन्केत चांगल्या वरच्या पोझीशनवर असलेल्या अनंताला एका एकी अवदसा सुचली.
वडील दारूच्या व्यसनाने जर्जर होऊन सर्व नाशाला कारणीभूत झाले असल्याने,चार बहिणीत एकटा भाऊ असलेल्या अनंताने दारूला कदापी शिवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.मग हे कसं काय झालं? असा माझ्या मनात नेहमीच विचार यायचा.


एकदा मी अंधेरी स्टेशनजवळच्या सातबंगल्यासाठी जाणार्‍या बसस्टॉपवर रांगेत उभा होतो.अचानक एक भिकारी दिसणारा माणूस माझ्याजवळ येऊन पैसे मागायला लागला.हात पुढे करून माझ्या नावाने मला संबोधून त्याने हात पुढे केला.तो अनंत नाडकर्णी आहे ह्यावर माझा विश्वासच बसेना.
रांगेतून बाहेर येऊन मी त्या व्यक्तिला समोरच्या इराण्याच्या हॉटेलात घेऊन गेलो.


"अरे अनंता! काय ही तुझी दशा झाली आहे?मी स्वप्नातसुद्धा तुला असा दिसशील असा विचार केला नसता."
अनंताला मी माझा चेहरा टाकून विचारलं.


"काय सांगू?माझे भोग.प्रमोशनवर, लोन सॅन्कशन डिपार्टमेंटमधे, गेलो.प्रथम लोन सॅन्कशन झाल्यावर लोक मला मर्जीने चिरीमिरी द्यायचे.मग बाटली देऊ लागले.अतोनात पैसा आणि बाटली ह्यामुळे मला अवदसा सुचली."
अनंता दोन समोसे तोंडात बोकून आणि गटागट चहा पिऊन झाल्यावर मला सांगू लागला.त्याला भुकेलेला पाहून मी त्याच्यासाठी एक ब्रुनमस्का पाव आणि एक कप चहा मागवला.


तृत्प झाल्याचा चेहरा करून अनंता मला पुढे सांगू लागला,
"एक दिवस मला रंगे हात पकडलं.आणि माझी नोकरी गेली.काही वर्षानी माझी बायकोपण मला सोडचिठ्ठी देऊन गेली.तिची काहीच चूक नसावी.
कारण तोपर्यंत मी दारुच्या आधीन झालो होतो.माझी रहाती जागा गेली.माझ्या बहिणींकडे मी जाऊन रहाण्याचा प्रयत्न केला पण मायेपोटी बहिणी कबूल झाल्या तरी त्यांच नवरे आधार देईनात.त्यांचीही काही चूक नाही.थोडे दिवस कोकणात जाऊन राहिलो.पण मिळकत शुन्य झाल्याने भीक मागून तरी राहूया म्हणून शहरात आलो."


मी खरोखरच सद्गदित झालो.एका दानशूर फॉऊंडेशनमधे माझा एक मित्र काम करीत होता.अनंतातर्फे त्याला एक चिठ्ठी लिहून त्याच्याकडे अनंताला जायला सांगीतलं.दुर्धर व्यसनी लोकाना चांगल्या मार्गावर येण्यासाठी हे फॉऊंडेशन मदत करतं असं माझा मित्र मला म्हणाल्याचं आठवलं.
अनंताजवळ थोडे पैसे दिले आणि निरोप घेताना मी त्याला म्हणालो,
"ही चिठ्ठी फेकून देऊन पैसे पुन्हा दारू पिण्यात खर्च करावे की, मी म्हणतो तसं करावं ह्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे.तेव्हा तू काय ते ठरव."

अनंताने आपलं भवितव्य काय ठरवलं ह पाच वर्षानंतर माझ्या घरी अनंता बेल दाबून आला त्या दिवशी मला कळलं.


मला अनंता सांगत होता,
"मला दारूचं व्यसन होतं.पण मी एक नशिबवान आहे की ज्याला ह्या व्यसनातून निवृत्ति मिळाली.आता पाचएक वर्षं झाली असतील पण ते मी विसरलेलो नाही.मला आठवतंय की त्या निराशजनक मनस्थितीत आणि विद्वेषपूर्ण व्यथेत राहून माझं मला कळत नव्हतं की मला काय झालंय.
हताश होऊन मदतीची याचना करण्याचे ते दिवस मला आठवतात.मदतीची शक्यता नाही असं पाहून माझ्या मनातच्या आतला विषाद आणि बाहेरून केली जाणारी अवज्ञा मला आठवते.


माझ्या भयानक छुप्या आशंका,जगायचं आणि मरायचं भय मनात असतानाही, ज्याला समजून घेता येत नाही त्या बाह्य जगाच्या मेदाला आणि अहंकाराला मी सामोरा गेलो.काहीवेळा जगण्यात एव्हडं भय वाटायचं की दोनदा मी मरण पत्करण्याचं ठरवलं होतं. त्रस्त मन आणि मनातल्या यातना सहन करण्यापेक्षा आत्मबलिदानातून सुटकारा बरा असं वाटायचं.


त्यात मी अयशस्वी झालो ह्याचं आता बरं वाटतं.पण त्यावेळेला माझा कशातही विश्वास नव्हता.माझ्या स्वतःत नव्हता तसाच माझ्या बाहेरच्या जगात नव्हता.मला स्वतःलाच मी यातनेच्या चार भिंतीत कोंडून ठेवलं होतं आणि माझंच मला वाटायचं की मी पूर्णतया परित्यक्त झालो आहे.


पण मी तेव्हडाकाही परित्यक्त नव्हतो तसं पाहिलं तर खरंतर कोणही तसा नसतो.मला दिसायचं की माझ्या मीच दुःख भोगत होतो.पण आता आता मला वाटायला लागलंय की मी एकटा कधीच नव्हतो,कोणही तसा नसावा.मला असंही वाटायचं की,मी जेव्हडं सहन करीन तेव्हडं मला पेलूं दिलं

नाही.पण त्या यातनांची मला जरूरी होती असं वाटतं. माझ्या बाबतीत एव्हड्या यातना मी सहन केल्या असाव्या की त्यामुळे माझ्या भोवतीच्या भिंती तुटून पडल्या,माझा मेद,माझा अहंकार गाडण्यासाठी,जी काही मदत मला मिळत होती ती स्वीकारण्यासाठी हे सर्व होत होतं असं मला वाटतं.


माझ्या यातना एव्हड्या खोलवर पोहचल्या होत्या की माझा विश्वास बसायला लागला.त्यावर विश्वास बसायला लागला की एखादी मोठी शक्ती मला मदत करू शकेल.ह्यावर विश्वास बसत गेल्याने मला मदत होईल याची माझ्या मनात आशा बळायला लागली.


डॉक्टरातर्फे मला मदत मिळायला लागली.माझ्या सारख्याला आणि इतर माझ्या सारख्याना मदत करण्याच्या त्यांचा व्यवसायच होता.माझ्या गहिर्‍या विवरातून बर्‍याच व्यक्तिकडून मला मदत,दया आणि समजून घेण्यात आलं.लोक दयाशील असतात हे मी शिकलो.लोकं आणि त्यांच्यातला चांगुलपणा कसा असतो ते मी शिकलो.


मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात.अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात.बरेच असे लापरवा्ईचे,खोचक शब्द आणि प्रत्यक्ष वागणं ह्यामुळे जीवन खूपच खडतर होतं.माझ्या लक्षात आलं की हे सर्व मी समजून घेतलं तर चिडण्यातून आणि मनाला दुःख होण्यातून मी एव्हडी प्रतिक्रिया द्यायला अनुकूल होणार नाही.आणि मी जर का कठिण वागणुक मिळाल्याने त्याची प्रतिक्रिया देताना समजून घेऊन आणि आस्था बाळगून रहाण्याचा प्रयत्न केला तर कदाचीत मिळणार्‍या वागणुकीत बदल आणण्यात सहाय्य मिळवीन.माझ्याच यातनानी हे समजायला मदत केली.


मी म्हणत नाही की,प्रत्येकाला अशा यातना व्हाव्यात.एक मात्र मला नक्की वाटतं की,यातना होणं बरं आणि कदाचीत त्या येणं आवश्यकही आहे. जर आणि फक्त जर का त्या यातना स्वीकार करण्याने समजून घेण्याची आवश्यक प्रक्रिया होत असेल तर.आणि तिचा उपयोग स्वतःसाठी आणि त्यातून जाणार्‍या इतरांसाठी होत असेल तर.


आपण सर्व काहीनाकाही यातनातून जात असतोच नाही काय? हे तथ्य माझ्यात एक प्रकारचं आपलेपण निर्माण करतं आणि त्यातून इतरानाही मला जमेल तशी मदत करायला प्रोत्साहन देतं.

ह्या विश्वासातूनच मी ह्यात असलेल्या इतर व्यसनाधीन लोकांत वावरून ते व्यसन विरहीत व्हावेत म्हणून काम करण्यात माझ्याच अनुभवातून मी अनुरूप झालो आहे असं समजतो.त्यासाठी कुणाला सुंदर असलं पाहिजे,प्रतिभावान असलं पाहिजे,शक्तिमान असलं पाहिजे अशातला भाग नाही.
तसंच मला हेही वाटतं की हे असं करून त्या मोठ्या शक्तिबरोबर चालण्याचा मला लाभ होत आहे.त्याच फॉऊंडेशन मधे मी नोकरीला असतो.आता माझं अगदी बरं चाललं आहे."


असं म्हणून अनंताने खाली झोपून मला अगदी साष्टांग नमस्कार घातला.त्याने ते इतक्या पटकन केलं की मी त्याला अडवू शकलो नाही.

अनंता उठून उभा राहिल्यावर मी त्याला म्हणालो,
"जे झालं ते गंगेला मिळालं.जे होतं ते नेहमी बर्‍यासाठीच होत असतं असं बुजूर्ग म्हणतात.कारण आयुष्यात उनपाऊस येतच असतो."



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, December 27, 2011

पुष्टावलेला तो उंच ऊस




माझ्या त्या (अजून आणखी एक इडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.
 मुळ कवितेतल्या पहिल्या ओळीत
 "कोसळणारा तो धुंद पाऊस"
 ह्यातला "पाऊस" ह्या शब्दावरून "ऊस"हा शब्द आठवला. आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं,चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा

रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या मनात ओघा ओघाने आलं.आणि कविता लिहिली गेली.


ऊसाच्या रानात काम करणार्‍या शेतकर्‍याच्या परिचयाचे वरील बरेचसे शब्द कवितेत मी वापरले आहेत. माझ्या मामीचं माहेर घाटावर आहे.माझ्या लहानपणी मी तिच्याबरोबर तिच्या माहेरी जायचो.कोल्हापूर जवळ गडहिंग्लज हे ते गांव.मामीचे ऊसाचे मळेच्या मळे आहेत.मामीची आई मुद्दाम एखाद्या गड्याबरोबर आम्हाला पाठवून शेतातला उच्चतम ऊस उपटून आम्हाला त्याचे करवे काढून खायाला देण्याची त्या गड्याला ताकीद-कम-आज्ञा करायची.कविततले बरेचसे शब्द त्या गड्याच्या तोंडचेच आहेत.आणि ते शब्द ऊसाचं पिक काढणार्‍या सर्वसाधारण शेतकर्‍याच्या तोंडचेच आहेत.


ऊस जरी रसाने भरलेला असला तरी त्याचा गोडवा त्याला उपटण्यापूर्वी-उचकण्यापूर्वी - जागीच चीर काढून रस चाखला जाऊन कळायचा. त्या ऊसाला चीर काढणार्‍या आयुधाला "आर" म्हणायचे.रस जर गोड वाटला तर तो ऊस पुष्टावला आहे असं म्हणतात.ऊसाच्या रसात साखर असल्याने साखरेचा चिकटपणा त्याला येतो.चिकट झालेले हात नंतर आम्ही थंड पाण्याने धुवायचो.ऊस उपटताना तो हळूवार उपटावा लागायचा कारण जवळ जवळ अंतरावर पेरणी झाल्याने बाजूच्या ऊसाला बाधा होता नये ह्याची काळजी घ्यावी लागायची. आरीच्या आघाताबरोबर रस थेंब थेंब थेंब थेंब पडायचा.मुळ कवितेतल्या बर्‍याचश्या ओळी मला ऊसाच्या संबंधाने कविता करण्यात उपयोगी वाटल्या.


पुष्टावलेला तो उंच ऊस
 मला म्हणतो आता नको खाऊस
 ओली चिंब झाली झाडे
 कपडे ही ओले चिंब झाले
 तुझं ते हळुवार खेचणं
 माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
 आणि हळुच चीर काढणं
 आणि माझा रस थेंब थेंब पडणं
 नेहमीच हात चिकट चिकट होणं
 प्रत्येक उसाला टक लावून बघणं
 आणि एकाला ऊचकणं
 तुझं उचकणं आणि आमचं पडणं
 झालय आता संवयीचं शेताला
 कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com

Saturday, December 24, 2011

कट्ट्या-बट्टुया.




"तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच."
मी माझ्या पत्नीला म्हणालो.


केशव, माझा मित्र,वांद्रा स्टेशन जवळच असलेल्या एका चाळीत रहातो.मी कधी कामाला वांद्र्याला उतरलो की हटकून केशवला भेटून येतो.
असाच काल मी केशवकडे गेलो  होतो.आमच्या राजकारणावर,महागाईवर,हवामानावर गप्पा चालल्या होत्या,तेव्हड्यात केशवचा सहा वर्षाचा मुलगा

रडत रडत केशवजवळ येऊन म्हणाला,
"शेजारचा बंटी माझ्याशी बोलत नाही.तुम्ही त्याला तसं नको करू म्हणून सांगा.


केशव लागलीच त्याला म्हणाला,
"त्याला सॉरी म्हणून सांग"
"ते मी केव्हाच सांगीतलं,पण तो ऐकायला तयार नाही."
मुलाने उत्तर दिलं.
"मग थोडावेळ त्याच्याकडे जाऊ नकोस.इथेच बस तो सर्व विसरून गेल्यावर तुझ्याशी तो बोलायला येईल."
केशवने मुलाची समजूत घातली.
आणि माझ्याकडे बघून केशव  हसला.


मी केशवला म्हणालो,
"अरे लहान मुलांत हे नेहमीच होतं.त्यांची कट्टी-बट्टी असते.मला माझं लहानपण आठवतं.आम्ही आते,मामे,चुलत भावंड नेहमी भांडायचो आणि मग

कट्टी घ्यायचो.वेळ निघून गेल्यावर सर्वकाही विसरून बट्टी म्हणून परत खेळायला सुरवात करायचो."


"कट्टी-बट्टी वरून मला एक गोष्ट आठवली"
केशव मला म्हणाला.
माझा किस्सा सांगतो असं म्हणून मला सांगू लागला,
"मोठी मंडळी पण अशीच कट्टी-बट्टी करतात.पण त्यांची बट्टी व्हायला फारच कष्ट पडतात.मोठ्यांची मनं लहानांसारखी मऊ नसतात.
त्याचं काय झालं एकदा मी ऑफिसात काम करत बसलो होतो.बरेच फोन येत होते.त्यात एक फोन माझ्या पत्नीकडून आला.मला ती फोनवर हुंदके

देत रडत सांगत होती.


तिचा मनस्ताप सुस्पष्ट होता.तिची सख्खी बहिण काही केल्या तिच्याशी बोलायला तयार नव्हती.माझ्या पत्नीने तिला पाठवलेल्या माफीच्या पत्रांची

तिच्या बहिणीने ती न उघडताच तिला ती परत केली होती.वाटेत कुठे जवळपास एकमेकाच्या नजरेला नजरा झाल्या तर तिची बहिण मान खाली

घालून पुढे जायची.


माझ्या स्वतःच्या बहिणीबरोबर असंच काहीसं झालं.माझे भावोजी-माझ्या बहिणीचा नवरा-जाऊन सहा वर्षं झाली.तिचा स्वतःचा मुलगा तिथपासून

आपल्या आईबरोबर एक चकार शब्द बोललेला नाही.नव्हेतर आम्हा कुणाही नातेवाईकांशी एक शब्द बोलला नाही.


तात्पर्य: माझी पत्नी काय किंवा माझी बहिण काय दोघंही ह्या दुखदायी समस्येचं मुळ कारण समजूच शकल्या नाहीत. गैरसमज निर्माण झाले.राईचा

पर्वत केला गेला.एकमेकात दरी निर्माण झाली.कित्येक वर्षाच्या प्रेमावर आणि विश्वासावर अविस्मरणीय आठवणीवर आणि नाजुक परिस्थितीत

घेतल्या गेलेल्या काळजीवर पाणी पडलं.


मी फोनवरच माझ्या पत्नीला विचारलं,
"एकदा तरी तिला कट्टीची बट्टी असं म्हणालीस का?"
"कसली कट्टी आणि बट्टी?"
रागानेच मला माझ्या पत्नीने उलट प्रश्न केला.


"तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच."
मी माझ्या पत्नीला म्हणालो.


तिला ह्यातलं काही माहितच नव्हतं.मी माझ्या पत्नीला त्यामागचं मूलतत्व काय असतं ते समजावून सांगत होतो.
"कुणी कुणाचं मन मोडलं,कुणी पहात नाही असं वाटून एकाने दुसर्‍याच्या ताटातला आवडीचा पदार्थ पटकन खाल्ला आणि लक्षात आल्यावर जर कुणी कट्टी घेतली,म्हणजेच बोलणं बंद केलं तर माझी चूक झाली,मला माफ कर,मी असं करायला नको होतं, असं म्हणताना माझी तुझी बट्टी असं म्हणायचं.असं हे लहान मुलं करतात.
असं किती वेळा कट्टीची बट्टी करायची ही दोघांमधे ठरलेली संख्या असायची.त्यानंतर मात्र नंतर करायचं ते म्हणजे जशास-तसं.


हे जशास-तसं म्हणजे,लहानपणी आपण जमीनीवर चौकोन काढून दगडाची खापरी टाकून एका पायावर लंगडत उडी मारून खेळ खेळायचो ते

करताना चुकलं तर पुन्हा खेळण्यासाठी जशास-तसं खेळायचो ते जशास-तसं नव्हे.
हे जशास-तसं म्हणजे,ज्याची खोड काढली गेली त्याला खोडकाढणार्‍यांने तसाच आवडीचा पदार्थ आपल्या ताटातून मुद्दामून खायला द्यायचा किंवा

काहीतरी लागट बोलून घ्यायचं.


माझी पत्नी मला म्हणाली,
"हे कट्टीबट्टी आणि जशासतसं माझ्या बहिणीबरोबर चालेल असं वाटत नाही."


पण मी माझ्या पत्नीशी सहमत नव्हतो.माझी खात्री आहे की,जरी कुणाची कळ न काढायचं प्रयत्न केला गेला तरी आपण हाडामासाची माणसं

काहीतरी चुका करतोच.आपण दुसर्‍याला,आपण ज्यांच्यावर अतीशय प्रेम करतो त्यांना,लागट असं बोलतो,आपण खोटं बोलतो,फसवतो आणि

कसलातरी घातही आपणाकडून होतो.
असं झाल्यावर कुणीही चिडून ओरडावं.उलट लागट बोलावं.पण कुणी माफी मागितली तर अस्वीकार करू नये.
कुणाशीही समझोता करणार नाही असं समज करून घेऊ नये.झिडकारू नये,टाळाटाळ करू नये,परित्याग करू नये.


सर्व कट्ट्या-बट्ट्यांचा आणि जशासतशाचा स्वीकार करून एकमेकासमोर बसून, कष्ट घेऊन, मोडलेलं दुरूस्त करावं.
अहमपणा गिळून टाकावा,दोन्ही हात दोन्ही बाजूला फैलावावेत आणि मनात जरा मऊपणा आणून,फारच लांबलं न जाण्याची खबरदारी घ्यावी.
कुणी जर का चुकलं माझं असं म्हणाल्यास माझंही चुकलं म्हणायला वेळ लावू नये.लाथा झाडाव्यात,श्वास कोंडून धरावा,मोठा गळा काढून ओरडून

घ्यावं,असं हे दुसर्‍याला समजेतोवर करावं पण शेवटी माफ करावं.


मला वाटतं,माफ करण्याची क्रिया माणसाकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.जेव्हा कुणी दुसर्‍याची माफी स्वीकारतं,वास्तवीक तुमच्यावर अन्याय

होऊनसुद्धा, तेव्हा उत्तमता आणि सभ्यता जी माणसाच्या मनात घर करून असते ती शांतीला आणि सद्भावनेला प्रोत्साहित करते.ज्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो.


तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगीतलं की,
"तू सर्वार्थाने झालेल्या गैरकृत्याच्या कट्ट्या-बट्ट्या मागे घेण्याची तयारी दाखवावी.आणि असं करूनही जर का तुझी बहिण तुझी माफी स्वीकारीत

नसेल तर तिने तुझ्याशी सर्व तर्‍हेनं जशास तसं करावं. पण हा निर्थक हट्ट सोडून द्यावा.
मोठ्या मुष्किल काळानंतर शेवटी त्या दोघांचा समझोता झाला एकदाचा."


तेव्हड्यात बंटी आणि केशवचा मुलगा हातात हात घालून आमच्या दोघां जवळ येऊन उभे राहिले.
मला हसू आवरेना,मी केशवला म्हणालो,
"लहान मुलांना कट्टी-बट्टी माहित आहे पण जशास-तसं माहित नाही हे बरं झालं नाहीतर तुझ्या पत्नीला पुन्हा एकदा फोनवर हे प्रकरण आणावं

लागलं असतं."




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 21, 2011

केल्यावीणा होणे नाही.




"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं,म्हणजे इतर निदान जगतील तरी."


अरूण मुळ कोकणातला.त्याच्या वडीलांची आणि माझी चांगलीच ओळख होती.कोकणातल्या एका खेडेगावात गरीब परिस्थितीत राहून हे कुटूंब आपली गुजराण करायचं.सुरवातीला अरूणचे वडील एका किराण्या व्यापार्‍याकडे कारकूनाचं काम करायचे.पेढीत बसून खरडे घाशी झाल्यानंतर त्यांना बाहेरची कामं पण करावी लागायची.ही कामं करायला त्यांना एक जुनी सायकल दिली होती.



अरूणला भावंडं बरीच होती.त्यामुळे एकटे कमवणारे अरूणचे वडील संसार सांभाळायला मेटाकुटीला यायचे.हे सर्व मला आठवलं जेव्हा माझी आणि अरूणची अलीकडे अर्नाळ्याजवळच्या एका गावात अचानक गाठ पडली.


त्याचं असं झालं,मी अर्नाळ्याजवळच्या एका गावात माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो.त्याच्या घरी गाण्याचा कार्यक्रम होता.दुसर्‍या दिवशी मी त्याच्याकडेच रहायला होतो.सकाळीच उठून आम्ही गावात जरा फेरफटका मारायला म्हणून निघालो होतो.
जाताना एक घर पाहिलं.घराच्या बाहेर अंगणात सुंदर फुलझाडांची बाग दिसली.निरनीराळी फुलं जरा जवळून पहावी म्हणून बागेच्या जवळ गेलो. घराच्या आत पडवीत बसलेले एक गृहस्थ आमच्याशी बोलायला म्हणून आमच्या जवळ आले.कसं कुणास ठाऊक मला त्यांनी ओळखलं.


मला म्हणाले,
"तुम्ही हसला त्यावेळी तुमच्या उजव्या गालावरच्या खळीकडे पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.
तुमच्यासारखे एक गृहस्थ आमच्या घरी यायचे.माझ्या बाबांची आणि त्यांची चांगलीच ओळख होती.
दुसरं कारण म्हणजे तुम्ही आता माझ्याशी चार शब्द बोलत होता तेव्हा तुमच्या बोललेल्या वाक्यात एक हेल येते. कोकणात त्याला हेळे काढून बोलणं म्हणातात तसं भासलं.तुम्ही कोकणातले आहात हे मी पक्क जाणलं.मी पण कोकणातलाच."


माझ्याही लक्षात आलं जेव्हा त्याने आपण अरूण म्हणून ओळख करून दिली.दुसर्‍या दिवशी मी त्याच्या घरी गेलो होतो.
जुन्या आठवणी निघाल्या.त्याचे आईबाबा केव्हाच गेले.अरूण एका नातेवाईकाच्या ओळखीने मुंबईत आला.दादरच्या किर्तीकर मार्केटमधे अरूणने एक दुकानाचा गाळा घेऊन, कोकणातले निरनीराळे मसाले,कुळथाची पीठी,थालीपीठाचं पीठ,आमसोलं,चिंचेचे गोळे,रातांब्याच्या बियांची मुठली असे जिन्नस प्रथम विकायचा.नंतर धंद्यात जम बसल्यावर आणखी गोष्टी दुकानात ठेवून विकायला लागला.
त्यातून थोडे पैसे कमवून लोन घेऊन त्याने अर्नाळ्याजवळच्या गावात हे घर घेतलं.
मला त्याची ही प्रगती बघून त्याचं खरोखरच कौतूक करावं असं वाटलं.
जुन्या आठवणी काढून डोळे ओले करून मला सांगत होता.


मला म्हणाला,
"अगदी साधं जीवन जगण्याच्या माझ्या प्रयत्नात मला ते जगणं सोपं जातं.आमच्या कुटूंबा्ची ती परंपरा आहे.माझ्या लहानपणी माझ्या आईवडीलांनी काढलेले ते गरिबीतले दिवस,जगायला आवश्यक लागणार्‍या गोष्टीही हिरावून घेतल्या जाव्या,ती परिस्थिती त्यांनी सहन करावी आणि कुटूंबातल्या सर्वांनी त्यागीवृत्तिने जीवन कंठावं अशा ह्या घटनांची चर्चा त्यांच्या तोंडून मी माझ्या लहानपणी ऐकल्या आहेत.


माझ्या वडीलांना नशिबाने एक काम मिळालं होतं.तिथे जाण्यासाठी चार मैल चालून जावं लागायचं.एस.टीचे पैसे वाचवण्यासाठी चालून जावं लागायचं.माझी आई तिच्या चहाच्या पेल्यात साखर घालायची नाही. उकळत्या पाण्यात चहा न घालता नुसती चमचाभर साखर घालून ते साखर पाणी चहा समजून आम्हाला प्यायला द्यायची.मासे मटण कधीतरी आणायचो.ठिगळ लावून शिवलेले कपडे माझी बहिण शाळेत जाताना घालायची. आणि मी ऐकलंय की माझी आजी रोज शेगडीत कोळसे मोजून घालायची.
तो काळ असा होता की जास्त करून घरीच रहायचं.जे काय आहे त्यावर जगायला शिकायचं आणि जे आहे ते असण्याबद्दल उपकृत रहायचं.



थोडे फार दिवस सुधारत आहेत असं वाटता वाटता वाढत्या महागाईला जेरीला येऊन पुन्हा कष्टाचे दिवस यायचे.आणखी त्याग करायची वेळ यायची. माझ्या वडीलानी एकच धोतर आणि एकच शर्ट कामावर जाताना वापरायचा.रात्री वरून उघडं आणि खाली पंचा नेसून झोपायचं.रात्री धोतर आणि शर्ट धुवून काढायचे.सकाळी सुकल्यावर ते घालायचे.त्यांच्याकडे एकच कोट होता.अशी बरीच वर्ष त्यांनी काढली.आई अजूनही तिच्या चहाच्या कपात साखर घालायची नाही.हळुहळु आम्ही सर्व शाकाहारी झालो.बहिणीच्या शाळेतल्या मैत्रीणीने जुने झालेले तिचे कपडे तिला दिल्याने ती ते कपडे घालून शाळेत जायची.माझंही तसंच व्हायचं.घरात एक सायकल होती पण तिचे टायर्स खराब झाले होते.त्यामुळे मी कुठेही बाहेर न जाता घरीच रहायचो.
ह्या गरिबीच्या दिवसानी आम्हाला खूप शिकवलं.आणि अद्यापपावेतो ते मला शिकवीत आहेत.



माझ्या आईने सफेद जाजमावर लिहून त्याचे फलक करून आमच्या बाहेरच्या खोलीत टांगले होते.जीवन जगण्यासाठी ते तिचं चिंतन होतं.

आहे त्याचा वापर करावा.

जमे तोपर्यंत वापर करावा.

केल्यावीणा होणे नाही

नाहीतर

नसल्यास काम चालवून घ्यावे.

असे आम्ही जगत होतो.आज मी एक लहानसं घर घेतलं आहे.मागे छोटसं अंगण आहे.त्यात थोडा भाजीपाला तयार करतो.कुठेही चालत जाण्याचाच प्रयत्न करतो.नाहीतर बस घेतो.बर्‍याचश्या गोष्टी जमतील तेव्हड्या परत परत वापरतो.


ह्या देशात असे अनेक लोक आहेत की जे पैशाच्या विवंचना करीत बसत नाहीत.अर्थात सगळेच काही नाहीत.
ह्या देशात गरिबी आणि नैराश्य दावणीला धरून आहे.माझ्या घरात आमचं ब्रीदवाक्य म्हणजे,
"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं म्हणजे इतर निदान जगतील तरी."
माझ्या आईची शिकवणूक अजून माझ्या निवडीला मार्ग दाखवते.


मला वाटतं माझ्या ह्या प्रयत्नाने दुर्लभ गोष्टी इतराना तरी मिळतील.जे माझ्या जवळ नशिबाने आहे त्यातून इतराना नक्कीच फरक पडेल.मी करीत असलेले लहानसे प्रयत्न दुसर्‍या कुणात मोठा फरक पाडील."


मला हे सर्व ऐकून अरूणबद्दल खूप आदर वाटला.सच्चाईने जगण्यातली मजा औरच असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

   

Sunday, December 18, 2011

"का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?"



"माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती."


मला आठवतं,मी वासंतीची भरपूर समजूत घालण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता.
"मलाच असं का व्हावं?जगात एव्हड्या स्त्रीया आहेत कितीतरी आपल्या प्रकृतिकडे नीट लक्ष देत नसाव्या.तरीपण त्या असल्या दुर्दैवी घटनातून सुटतात.त्यांना असं व्हावं असं मी म्हणत नाही.पण मीच एकटी अभागी का व्हावी?"
एक ना दोन असे अनेक प्रश्न मला वासंतीने त्यावेळी केले होते.
"पराधिन आहे पूत्र मानवाचा" पासून
"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" पर्यंत आणि
"या प्रश्नला उत्तर नव्हते राणी केविलवाणी"
इथपर्यंत काही गीतातल्या ओळी मी वासंतीला उदाहरण म्हणून सांगीतल्या होत्या.


शेवटी व्ह्यायचं तेच झालं.वासंतीच्या उजव्याबाजूला शस्त्रक्रिया करावी लागली.त्यावर आता बरीच वर्ष होऊन गेली.वासंती आता थोडी सावरली.जुन्या गोष्टी काढून आम्ही गप्पा मारीत होतो.
मला वासंती म्हणाली,
"जेव्हा मी तेराएक वर्षाची होते तेव्हा मार्लिन मन्रो ही एक जगातली प्रसिद्ध नटी होती.स्वेटर-गर्ल म्हणून ती ओळखेली जायची.नव्हेतर तो एक प्रकोप म्हटला तरी अतिशयोक्ती होणार नाही.विशाल उरोजाची स्त्री म्हणजे पुरषांच्या डोळ्यात भरणारी गोष्ट होती.निदान मी जेव्हा मोठी होत होते तेव्हा असा समज होता.स्त्रीयांचा त्यावेळी समज होता की त्यांचा उरोज हा एक हुकमतीचा भाग होता,त्याशिवाय तो एक सौन्दर्याचा मानदंड होता.

अशा गोष्टीने प्रभावित होणार्‍या माझ्यासारख्या एका तरूण मुलीला कुणीही असं सांगण्याची पर्वाही केली नाही की,सौन्दर्‍याचं माप चोळीच्या आकारावर मापता येत नाही.


मला झालेल्या स्तनाच्या कर्क रोगाने ते शिकवलं आणि आणखी काही शिकवलं.हा रोग प्रत्येक स्त्रीच्या हृदयाचा एव्हडा भावनिक विध्वंस करतो की,एखाद्या करामती स्त्रीचं हातातलं सोन्याचं कांकण जसं तिला प्रिय असतं तसंच हे प्रत्येक स्त्रीला प्रिय असतं.माझ्या एका बाजूच्या उरोजाच्या हानिशी मला समझोता करून घ्यावा लागला होता. प्रतिवर्तनाचा विचार केल्यास,माझ्या तरूण वयात सिनेमातल्या नट्यांवर जेव्हा माझं मन ग्रस्त झालं होतं तेव्हा स्त्रीच्या भुषणाचं प्रधानलक्ष नेहमीच माझा समोर हजर होतं असं मला त्यावेळी नेहमीच वाटायचं.

माझे आजोबा माझ्या आजीच्या पस्तिसाव्या वर्षीच गेले.जाताना सहा मुलांच्या जोपासनेची जबाबदारी तिच्यावर ते ठेवून गेले.तिने खूप कष्ट काढले.
जेवणाचे डबे पोहचविण्यापासून,कपडे शिवण्यापासून ते मानाने पैसे मिळतील असं कसलही काम करून उदर्निवाह केला.तिचं जीवन कष्टाचं आणि कधीकधी भयावह असायचं.परंतु,गरीब परिस्थितीवर तिने काबू आणला आणि हे केवळ तिच्या दृढ संकल्पनामुळे होऊ शकलं.


माझी आणि माझ्या धाकट्या बहिणीचीसुद्धा तिने काळजी घेतली.घरातली कामं करीत असताना मला तिने बर्‍याच कलाकुसरी शिकवल्या.अगदी आजतागायत मी तिची ऋणी आहे.माझी आजी सकाळी उठल्यानंतर तिच्या अनेक कामाच्या शिरस्त्यात आंघोळ करून झाल्यावर प्रथम कपडे चढवताना तिच्या छोट्याशा कपाटातून चोळी काढून ती अंगावर चढवण्याचं अवघड काम असायचं.तिच्या उरोजाचा कसलाच दिखावा होत नव्हता.
तिच्या बुटूकल्या आणि काहीशा गुबगुबीत शरीरावर त्या वक्राकार आकारामुळे स्त्रीसुलभता उठून दिसायची.


एक्याऐशी वर्षावर माझी आजी गेली.माझं आयुष्य भकास झालं.ही रिक्तता सुस्पष्ट व्ह्यायला मला जरा कठीण होत होतं.अगदीच अलीकडे जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या आजीचं आचरण तिला खास बनवू शकलं तेव्हा स्पष्टता जाणवली.


सहजसुंदरतेने माझी आजी जगली.कुणा विषयी वाईट उद्गार तिने कधीही काढले नाहीत.कधी कुणाच्या कुटाळक्या केल्या नाहीत.अनावश्यक असं काहीही बोलली नाही.तिच्या सभोवतालची हवा सुगंधाने दरवळायची.माझ्या नकळत मला ते भासायचं.लोकांवर असाधारण वजन आणायला अमुकच कारण तिला लागायचं नाही.उरोजही कारण नसायचं आणि सोन्याचं कांकणही नसायचं.ते सर्व काही सारं काही असायचं.


मला पन्नासावं वर्षं लागलं त्यावेळी माझ्या स्त्री भूषणाची कसोटी मला कळली.मला स्तनाचा कॅन्सर झाल्याचं कळलं.
मी धीटपणाचा आवा आणू शकले.धैर्‍याच्या शब्दांचा बुरखा मी परिधान केला.पण मनोमनी खोलात जाऊन मी आश्चर्य करू लागले की करामती करणारी स्त्री सोन्याच्या कांकणाशिवाय गुजारा कशी करू शकणार.?


सरतेशेवटी माझ्यात आलेल्या क्षमतेचा मी शोध लावला.माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती.


जी कोणी ह्या सारखा मानसिक आघात सोसत होती ती सर्व मला मिळणार्‍या स्वास्थलाभातून शिकून पुढे जात होती.मागे वळून पाहिलं तर बर्‍याच दृष्टीने तो एक अपूर्व अनुभव होता.माझ्या लक्षात आलं की स्त्रीत सोन्याच्या कांकणापेक्षा आणखी काही असतं.माझं स्त्रीत्व माझ्या स्त्री संबंधी पूर्वजांचं आणि जिने मला शिकवलं,वाढवलं आणि प्रेम केलं ह्यांच्या संम्मिश्रणाचं आहे.जीवनात मिळालेल्या अनुभवाला शब्दातून आणि प्रत्यक्ष क्रियेतून इतराना भरभरून वाटण्याच्या सम्मतितून स्त्रीमधे क्षमता अंतर्भूत झालेली असते.आणि ह्यावर माझा विश्वास आहे.माझ्या आजीने मला असं सांगीतलं आहे."


मला हे वासंतीचं ऐकून तिची किव आली.वेळ-काळामधे उपचारात्मक क्षमता असते हे अगदी खरं.वासंतीने आता स्वतःला सावरलं आहे.मी तिची जमेल तेव्हडी स्तुति केली.त्याने तिला खूप समाधान झालं.
मी मनात म्हणालो,
"पण राणीला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?"



श्रकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 15, 2011

निचे मुंडी नाणी धुंडी



निचे मुंडी नाणी धुंडी.

"मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?"


विनयला रस्त्यातून चालताना पाहिलं की तो नेहमीच मान खाली घालून चालताना दिसतो.अर्थात अधून मधून लांबवर पहाण्यासाठी मान उंचावून पहात असतो.कुणी ओळखीचा येताना दिसला की वेळीच मान वर करून त्याच्याशी संपर्क साधतो.
रस्त्यातून चालत जाताना प्रत्येकाची स्टाईल असते म्हणा.
कोण ताठ मानेने चालतो,कोण सारखा इकडे तिकडे बघत चालतो,कोण चेहरा हसरा ठेवून चालत असतो तर कोण दूर्मुखलेला चेहरा ठेवून चालत असतो.
विजय बरोबर चालत असताना तो मान खाली घालून चालत असतो आणि मी सरळ मान ठेवून चालत असतो.बरेच वेळा विजयबरोबर चालत असताना मी पाहिलंय, एखाद वेळी तो मधेच थांबून मातीतली एखादी चकचकीत दिसणारी वस्तू उचलून निरखून पहातो.तसंच वाटलं तर तोंडाने त्यावर फुंकून किंवा  हाताने साफ करून पहातो ते एखादं नाणं असेल तर सरळ खिशात ठेवून देतो.


एकदा असाच मी त्याच्याबरोबर जात होतो.रस्यात पार्क केलेल्या मोटारीला पास करून चालताना विनय गाडीच्या बंद दरवाज्याजवळ थांबला आणि एक पन्नास पैशाचं नाणं उचलून खिशात टाकून माझ्याकडे बघून हसला.
मला म्हणाला,
"बहुतेक मोटर मालकाचं चावीचा घोस काढताना त्याच खिशातल्या सुट्ट्या पैशातलं हे नाणं पडलं असावं."


माझ्या चेहर्‍याकडे बघून त्याला काय वाटलं देव जाणे.मला लागलीच सुदेश हॉटेलकडे बोट दाखवून म्हणाला, 
"चला आपण एक एक कप चहा मारूया"
मला उगाचच वाटलं की आताच मिळालेल्या पन्नास पैशात भर टाकून मला विनय चहा पाजायच्या विचार आहे की काय? पण त्याच्या मनात काही निराळच होतं.


मला म्हणाला,
"तुमच्या चेहर्‍याकडे बघून मला वाटलं की तुम्ही मला नक्कीच त्या पन्नास पैशाच्या नाण्याबद्दल विचारणार.तुमच्याशी निवांत बसून माझ्या ह्या सवयीची पार्श्वभुमी लगेचच सांगावी म्हणून म्हटलं चहाच्या कपावर बोलावं." 


चहा बशीत ओतून फुंकर मारून सुर्र आवाज काढून प्याल्यानंतर मला म्हणाला,
"एखाद्या दुकानाच्या दारात उभं राहून समोरच भरलेल्या आठवड्याच्या बाजाराच्या दिशेने पाहू लागल्यास ठिकठिकाणी एकच वयस्कर व्यक्ति मान खाली वाकवून काहीतरी हरवलंय ते शोधतोय असं वाटेल.हातात एक खाकी रंगाची पिशवी,पायात जुन्या वहाणा घालून पाय घासत घासत जाण्याची चाल,अधूनमधून थांबल्यासारखं करून काहीतरी मिळालं या आशाने ती व्यक्ती जमिनीकडे नीट न्याहाळून पहाताना दिसते.माझं नातं सांगायचं झाल्यास तो माझा दूरचा मामा म्हटलं तरी चालेल.सर्व त्याला मामाच म्हणायचे."


विनयने आपली जुनी आठवण मला सांगायला सुरवात केली.पुढे म्हणाला,
"इतक्या लांबून ह्या व्यक्तीकडे पाहिल्यावर,ह्या विचित्र दिसणार्‍या म्हातार्‍याने,माझा वयक्तिक विश्वास प्रेरित केला आहे अशी कल्पना करणही कठीण आहे. 
मी स्वतः त्याला मामाआजोबा म्हणतो.बाकी लोक काहीही म्हणोत.आमच्या गावात आठवड्याचा बाजार भरतो.आजुबाजूच्या गावातली मंडळी ह्या बाजाराला येतात तसंच विक्रेकरही आपला माल घेऊन या बाजाराला येतात.ऐन दुपारी तर फारच गर्दी ह्या बाजारात असते.


एकदा झालेल्या घटनेची मला आठवण आली.मी माझ्या ह्या मामाआजोबाला माझ्या स्कुटरच्या मागे बसवून ह्या बाजाराला आलो होतो.माझ्या स्कुटरचं मागचं चाक म्हणजे त्या चाकाचा टायर अलीकडे कमी हवा आहे असा दिसायचा.म्हणून बाजारातल्या एका टायरच्या दुकानात स्कुटर दुरस्त करायला म्हणून दिली.दुकानदाराने स्कुटर ठाकठीक व्ह्यायला एक तास तरी लागेल म्हणून सांगीतलं.


मी मामाआजोबाकडे पाहिलं.
"काही हरकत नाही."
असं सांगून नुकताच भरत असलेल्या बाजाराकडे बोट दाखवून आपण तिकडे जाऊया असं तो मला म्हणाला.मी त्याच्या बरोबर रस्ता ओलांडून तो म्हणाला तिकडे जायला निघालो.


शनिवारची सकाळची वेळ होती.अजून बाजारात विशेष गर्दी झाली नव्हती.समोरच एका चहाच्या दुकानात आम्ही दोघे गेलो आणि मी मामाला म्हणालो,
"आत जाऊन मी दोन प्लेट बाटाटेवडे आणि दोन चहाची ऑर्डर देतो."
दुकानात प्रवेश करून मी मागे वळून पाहिल्यावर माझा मामाआजोबा मला दिसेना.बाजार भरला होता त्या जागी भरभर जाऊन काही हरवलंय ते शोधत आहे अशा पोझमधे मला दिसला.
मी भरभर त्याच्या जवळ गेलो तेव्हा मला म्हणाला,
"सकाळ सकाळचा पहिला लाभ"
मातीत मळलेली गुळगुळीत झालेली पावली,म्हणजेच पंचवीस पैश्याचं नाणं मला दाखवत होता.पुढचा एक तास स्कुटर तयार होईपर्यंत आपण नाणी शोधूया असं मला म्हणाला.


"घाई घाईत काही लोकांच्या खिशातून अशी ही नाणी खाली पडतात.काही लोक पडलेलं नाणं उचलून घ्यायची मेहनतपण घेत नाहीत.एकाच खिशात नाणी आणि चाव्याचा घोस ठेवल्यावर चाव्या काढताना एखादं नाणं पडतं, असं हटकून घडतं.कसं का असेना त्यांची नुकसानी म्हणजे आपला फायदाच म्हणावा लागेल."
असं मला समजावून सांगत होता.


मी मामाआजोबाचा तर्काआधार घेऊन त्याच्या म्हणण्याशी सहमत झालो नसलो तरी असा एक तास घालवण्यासाठी राजी नव्हतोच.दोन चार नाणी मिळण्यासाठी मी त्याच्याशी,त्याचं मन राखण्यासाठी काहीसा कबुल झालो होतो.आणि ह्यातूनच आमच्या ह्या प्रथेला सुरवात झाली हे नक्कीच.
त्यानंतर आम्ही दोघे बरोबर असताना कुठेही गर्दीच्या ठिकाणी काही वेळासाठी अडकलो गेलो असलो की अशी खाली पडलेली नाणी शोधून काढण्यासाठी वेळ घालवत असायचो. 


त्यानंतर केव्हातरी मी आमच्या ह्या रिवाजाचं मोठं चित्र डोळ्यासमोर आणून पहात होतो.माझा मामाआजोबा जरी अगदीच श्रीमंत नसला तरी एरव्ही तो करत असलेल्या कष्टातून एव्हडी मिळकत कमवायचा की त्याच्या कुटूंबाला तो सुखात ठेवायचा.त्याला रस्त्यातली ही पडलेली नाणी जमा करायाची जरूरी भासत नसायची.
मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?त्यासाठी मी माझ्या मुल-सिद्धांतासाठी माझं तत्व-ज्ञान विचारात आणून मला त्याचं उत्तर मिळतं का पहात होतो आणि ते मिळालं.


एक म्हणजे,
सतत कार्यरत रहावं.फाल्तु वेळ दवडण्यापेक्षा उठावं आणि फिरावं.आमच्या घराण्यात हृदय विकाराची उदाहरणं आहेत.जितकं म्हणून मी कमी बसून राहिन तितकं माझ्या टिक-टिकणार्‍या घड्याळाला बरं आहे. 

दुसरं म्हणजे,
संधी सापडण्यासाठी डोळे उघडून शोधात असावं.एका पावलीने मी गरीब रहाण्यापेक्षा एका पावलीने मी श्रीमंत राहिन.पण तसं करायला मी जर लक्ष दिलं नाही तर ते श्रीमंत होणे नलगे.

तिसरं म्हणजे,
काहीतरी उद्देश ठेवून रहावं.मग तो उद्देश कितीही साधा असू द्यात.आपलं मन त्यात व्यग्र करावं.वचनबद्ध असल्याशिवाय यश प्राप्ती कशी व्हायची?

आणि शेवटी,
अनुमान काढायला घाई करू नये.
हे म्हणायला एक कारण झालं.खरंच,तो इतराना अनोळखी दिसणारा बाजारात मान खाली घालून फिरणारा म्हातारा, दिसला जरी विचित्र तरी त्याच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे त्यानेच ती शंभर रुपयाची नोट दुसर्‍या जागेतून हुडकून काढली जी मी खात्रीपूर्वक सांगत होतो की माझ्या जीनमधल्या पुढच्या खिशात सापडणार म्हणून.मी असं सांगून वाद घालत होतो.पण माझं अनुमान चुकलं होतं.


मला वाटतं अशी ही बरीचशी हरवलेली नाणी इतस्तः पडलेली असणार.आपल्या प्रत्येक जणाची त्यावर मालकी असावी,पण ती नाणी आपली होण्यासाठी आपण त्यांच्या शोधात असलं पाहिजे."

विनयचं  हे सगळं ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"तुझे हे विचार मी आज जर ऐकले नसते तर तुझ्या ह्या सवयीचा मी भलताच अर्थ काढून बसलो असतो.
निचे मुंडी पाताळ धुंडी असं म्हणण्या ऐवजी
तुझ्या बाबतीत,
निचे मुंडी नाणी धुंडी असं म्हटलं तर गैर होणार नाही."

वेटरला बिल घेऊन येताना पाहून विनयने चहाचं बिल देऊन झाल्यावर ते गाडीजवळ मिळालेले पन्नास पैसे त्या वेटरला टीप म्हणून दिले.आणि कुतूहलाने माझ्या चेहर्‍याजवळ टक लावून पहात होता. 




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com 
   

Monday, December 12, 2011

त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.


त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.

"एकदा मी आजीला विचारलं होतं,
"एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?"

माझे पाय वळू नयेत म्हणून आम्ही दोघे एका प्रंचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसलो.बसलो असतानाही प्रवीण आपल्या आजोबांच्या आठवणी
काढून काढून सांगत होता.
मला म्हणाला,
"पहाटेच माझ्या आजोबाबरोबर रानात फिरायला जायला मला आवडायचं.आम्ही जायचो ते रान म्हणजे काहीतरी अलौकिक शाश्वत अशी ही जागा आहे असं वाटायचं.उन्हाळ्याच्या दिवसात माझे आजोबा ह्या ठिकाणी असलेल्या तळ्यातून गोडे मासे गळाला लावून पकडायचे.जांभळीच्या झाडावरून जून टपोरी जांभळं,झाडावर गड्याला चढवून त्याच्याकडे सुंभाने बांधलेली टोपली देऊन त्या टोपलीत जमवलेली ती फळं टोपली भरल्यावर फांदीवरून घरंगळत टोपली खाली आल्यावर एका गोणपाटाच्या पिशवीत रसबाळ जांभळं निवडून घरी आणायचे आणि त्या जांभळांचा रस काढून आम्हा सर्वाना तो ताजा रस प्यायला द्यायचे.
"हा रस जो पितो त्याला मधुमेह होणार नाही."
असं नविसरता सांगून टाकायचे.आणि स्वतः पेलाभर रस प्यायचे.आजीलापण एक कप रस प्यायला द्यायचे.हा रस पिल्यामुळे असेल किंवा कसं पण माझ्या आजी आजोबांना शेवटपर्यंत मधुमेह झाला नाही.आजोबाना गोड आवडायचं नाही.पण रोज दुपारी चहात दोन चमचे साखर टाकून चहा प्यायचे मात्र.
 
मॅट्रिकची परिक्षा पास झाल्यावर मी गावातल्या शाळेत थोडे दिवस शिक्षक म्हणून काम करायचो.माझ्या आजोबांबरोबर ह्या रानात आल्यावर मात्र ह्या दिवसात मी शाळेच्या वेळापत्रकाला नजुमानता रहायचो.
माझ्या ह्या शिक्षकाच्या व्यवसायात आता मी जेव्हडा विचार करीत नसेन त्यापेक्षा कितीतरी जास्त त्या पहाटेच्या वेळी आजोबांबरोबर असताना मी विचार केला असेन.

अलीकडे मी जेव्हा ह्या रानात फिरायला येतो तेव्हा माझ्या मनात विचार येतात,
मी जो काही आता झालो आहे ते पाहून माझ्या आजोबानी माझ्याबद्दल अभिमान वाटून घेतला असता का?
त्यांना जे दुःख झालं ते दुःख त्यांना होणार होतं हे माहित होतं का? जेव्हा माझी आजी ह्या पावसाळ्यात त्यांची वर भेट घ्यायला गेली.
मरण येईतोपर्यंत आपण रहात्या घरातच रहाणार असं वचन आजोबांना दिलेल्या आजीला ते शक्य झालं नाही,ते शक्य होणार नाही हे त्यांना माहित होतं का?

आता जे राहिलं आहे ते रान त्यांचीच आठवण आहे.रानात नव्या पायवाटा काढणं,पक्षांची घरटी शाबूत आहेत ते पहाणं,नसल्यास त्याची जुजबी डागडूजी करणं,तळ्यात मास्यांची पैदास वाढवणं,जांभळांचा वापर करणं हा सगळा माझ्या आजोबांचा वारसा होता.आजीचा घर संभाळण्याचा वारसा होता.त्यात घराची साफसफाई,न्हाणीघरं,संडास स्वच्छ करून घेणं,आल्यागेल्या पाहूण्य़ांची बडदास्त ठेवणं अशी सर्व कामं असायची.

रानातल्या माडाच्या झाडावरून गड्यांकडून  नारळ उतरवून घेऊन त्या नारळांची रास पडवी जवळच्या एका खोलीत जमा करून दुसर्‍या आठवड्याला गण्या आणि बारक्याला निरोप देऊन त्यांच्याकडून सुळक्यावर नारळ सोलून घेऊन नारळ निराळे आणि सोडणं निराळी करून सोडणांची रास पडवी समोरच्या अंगणात सुकायला ठेवून वर्षभर ही सुकी सोडणं इंधन म्हणून वापरायची हाही वारसा माझ्या आजोबांकडूनच आला.

तुरीचं पिक आल्यावर भागेली गोणपाटाच्या गोण्यातून तु्र आणून आजी़च्या हवाली करायचे.गोण्यातल्या तूरी पडवीत ओतून घेऊन पायलीच्या मापाने तूरी ्भा भागेल्यासमोरच मापून घ्यायची. पहिल्या पायलीच्या मापाला "लाभ" असं संभोदायची.नंतरचा मापाचा आकडा दोन तीन वगैरे,

एकदा मी आजीला विचारलं होतं,
"एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?"
आजीला कारण माहित नव्हतं.पण नंतर आजोबांकडून कळलं की शेतातून आलेलं पीक हे आपला लाभ करून देतं.त्याची सुरवात एक आकड्या ऐवजी लाभ ह्या शब्दाने करावी असा रिवाज आहे.

रानातल्या पडक्या विहिरीची गोष्ट मला आजोबांनी,मी मोठा आणि समजदार झाल्यावर सांगीतली.त्यापूर्वी मी कधीही त्यांना विचारलं,
"ह्या तुडंब भरलेल्या विहिरचं पाणी आपण पिण्यासाठी का वापरत नाही.?"
तेव्हा ते म्हणायचे,
"त्या विहिरीतलं पाणी अशुद्ध आहे.ते पिण्यालायक नाही."
"पण मग आपण गाईगुराना ते पाणी प्यायला कसं देतो?"
ह्या माझ्या दुसर्‍या प्रश्नाला ते नेहमीच म्हणायचे,
"तू मोठा झाल्यावर तुला कळेल"
आणि एक दिवस त्यांनी त्या विहीरीचा विषय काढून मला सांगून टाकलं.
"मुणगेकरांच्या शालूने जीवाल कंटाळून ह्या विहिरीत जीव दिला होता.तिला तिचा नवरा चांगलं वागवत नव्हता.दोन दिवसानी तिचं प्रेत मिळालं.ते सुद्धा वर तरंगत होतं ते एका वाटाड्याने पाहिलं.त्यानंतर ह्या विहिरीचं पाणी कुणी पियीनात."

नंतर मला कळलं की शालूचा नवरा काही दिवसानी गुप्तरोगाच्या व्याधीने मेला.

आता जांभळांचा रस मी माझ्या नातवंडाना देतो.पण जेव्हा ती शहरातून सुट्टीत घरी येतात तेव्हा.त्यांना रानात फिरायला नेतो.माझ्या आजोबांच्या गोष्टी मी त्यांना सांगतो.
मला वाटतं,कोकणातले हे बदलणारे ऋतू निरनीराळ्या फळांना उत्पन्न करण्यात जे प्रतिवर्तन दाखवतात तेच माझ्या आजीआजोबांच्या जीवनात मला दिसून आलं आहे.
माझ्या आजीची सेवा करण्यात माझ्या आईने दाखवलेल्या 
संवेदना आणि तिच्या मनातली दया हे जणू त्या रानातून उन्हाळ्याच्या दिवसात दुपारचं उन झाडांच्या फांद्यातून खाली जमिनीवर झिरपतं आणि रानाची जोपासना करतं तसंच काहीसं होतं.

माझा मामा ऐन तारुण्यात प्रेमभंगाच्या धक्क्याने जेव्हा कालवश झाला ते जणू रानाला कडक उन्हाळ्यात जागोजागी लागणार्‍या आगी सारखंच होतं.आता जेव्हा भर पावसात मी रानात येऊन जातो तेव्हा तेव्हा रानातला शुकशूकाट जणू माझी आजी गेल्यानंतर घरातली सर्व मजाच निघून गेली त्यावेळी जसं वाटावं तसं हे वातावरण भासतं.पहाट संपता संपता सकाळच्या वेळी इथे आल्यावर तसं भासतं मात्र.तळ्यातले मासे बघून माझ्या आजोबांची आठवण आल्याशिवय रहात नाही.

मला वाटतं ह्या रानातलं माझं माझ्या आजोबांबरोबर पहाटेचं फिरणं मला जीवनात परिपूर्ण करूं शकलं.
माझ्या आजोबांनीच मला,शहरातलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.कामं करीत असताना विचार येत रहातात,पहाटे 
माझ्या आजोबाबरोबर रानात पहाटे फिरताना यायचे अगदी तसे."

संध्याकाळ बरीच झाली होती.घरी जाईपर्यंत कीर्र काळोख होणार म्हणून प्रवीण चार सेलचा टॉर्च घेऊन आला होता.
रानातून पायवाटेवरून चालताना मी पुढे आणि प्रवीण माझ्या मागे राहून प्रकाशाची झोत टाकत मला मार्ग दाखवत होता.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com