Tuesday, August 14, 2012

पुढील कार्यक्रम थोड्या विश्रांती नंतर




मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी.डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 6, 2012

समस्या,समस्या आणि समस्या





"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं आणि वरदान केव्हा ठरतं."


"हे काय चाललं आहे?"
वृद्धांची ससेहोलपट व्हायला काय काय कारणं असावीत? असा विचार येऊन माझं मन खुपच चलबिचल व्हायला लागलं.
आणि मग मनात येईल ते लिहीत गेलो.

वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असणं स्वाभाविक आहे.
काहीना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं तर काहीना ते  शाप वाटतं.
ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.

ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.
ह्याचं मुख्य कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

पण हळू हळू वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत सर्व गोष्टीत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.

काहीना तर,
"इतक्या लवकर घरी कसे परत आला?"
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना कसा दोष देता येईल?
घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.


तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.हे खरं आहे.

कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात  याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्या व्यक्तीना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
जेष्टानी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.

त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
"कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या."
"घरात शांततेने रहा"
अशा वृद्धाना,
"तोंड बांधून बुक्याचा मार "
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
"परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?" असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?


"तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?"
असा प्रश्न विचारल्यावर कळतं की,काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडीलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.

आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडीलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.

म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडील अडचणीचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडीलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडीलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.
त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.


काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात  हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वप्नं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडीलांशी तुटकपणे वागतात. याचं मरण:प्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर  काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून  वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.


पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.
अशावेळी मनात येतं,
 "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."


एका अविवाहीत व्यक्तीने आपला विचार सांगीतला,
"व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर या बाबतीत तरी मी सुखी आहे! लग्न न करून मुलंबाळं विचारतील की नाही, मान देतील की नाही ही भानगडच आपण ठेवली नाही! आम्हाला आमच्या वृद्धापकाळात  त्या मुलासुनांचं प्रेमही नको आणि त्यांचा तिरस्कार -हेटाळणीही नको!  दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुष्य असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!

आमचा बुढापा हा एकट्याचाच असेल, अकेला असेल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु निदान मुलानातवंडांचे पाश तर नसतील! मुलं विचारतील की नाही? सूनबाई आदर ठेवेल की नाही? नातवंड खिल्ली तर उडवणार नाहीत ना? असल्या नसत्या चिंता मागे लागणार नाहीत! नकोच ते सांसरिक पाश!
एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन!
उद्या हातपाय थकले तर एखाद्या स्टार-वृद्धाश्रमात जाऊन नक्कीच राहीन. तिथे पैसा फेको तमाशा देखो असा सिंपल मामला असतो!
स्वत:च्याच घरी वृद्धाश्रमात ठेवल्यागत रहायचं किंवा मुलाबाळांनी उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं!"


प्रो.देसायाना ज्यावेळी ह्या विषयाबद्दल मी बोललो तेव्हा ते मला म्हणाले,
"ह्याच विषयावर माझ्या एका मित्राशी माझी चर्चा झाली.त्याने चिंतन करून,खोल विचार करून अतिशय मार्मिकतेने जे मला सांगीतलं ते मी तुम्हाला

थोडक्यात सांगतो.
वृद्धापकाळातील सुख दु:खाची मुळं तारुण्यात असतात. मुलांवर विसंबून राहायचे दिवस कधीच संपले. बाहेरील जगातील वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढती आत्मकेंद्रित वृत्ती पाहता प्रत्येकाने वृद्धापकाळातील आर्थिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार आणि तजविज तरूणपणातच करायला सुरुवात केली पाहीजे.


आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. ह्या वानप्रस्थाश्रमात संसारात राहून संसारातून मन काढून घेण्यास सांगितले आहे. हे वाचायला सोपे वाटले तरी आचरणात आणणे कठीण असते. ह्याला कारण जसे स्त्री लग्न झाल्या पासून स्वयंपाकघर हाताळत असते. संपूर्ण घरात तिचा वावर आणि हुकुमत असते. हेच म्हातारी झाल्यावर सुन आल्यामुळे तीच्या हाती सर्व ताबा द्यावा लागतो आणि स्वतःला दुय्यम स्थानावर उतरावे लागते. हे 'डाऊन साईझींग' स्वीकारणं कठीण जातं. जिथे हुकूम सोडायची (चांगल्या अर्थाने), मार्गदर्शन करण्याची सवय लागलेली असते तिथे हुकूम ऐकण्याची (चांगल्या अर्थाने) आणि मार्गदर्शन स्विकारण्याची वेळ येते. इथे सासू सूनेत खटके उडायला सुरूवात होते. म्हातारपणात सुख कमी आणि दु:ख जास्त अशी परिस्थिती येते. गमतीने असे म्हणतात की 'सासू' म्हनजे 'सारख्या सूचना' आणि 'सुन' म्हणजे 'सुचना नकोत'.


जी स्थिती स्त्रीयांची तिच स्थिती पुरुषांची. आजवरच्या आयुष्यात संपूर्ण घर त्यांच्या भोवती नाचत असतं. घरात काय हवं, काय नको, घर कसं सजवावे वगैरे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार होत असतात.स्वतः कमवत असल्याने 'स्वेच्छेने' खर्च करण्याची मुभा असते. निवृत्ती नंतर मुलगा नोकरीत स्थिरावलेला असतो. हळूहळू तो 'कर्ता' पुरूष होत असतो. नव्या जमान्याच्या नव्या कल्पना त्याला सत्यात उतरवायच्या असतात. हाती पैसा असतो.

(कित्येकदा मागिल पिढीच्या तुलनेत कितीतरी अधिक). नविन काळाची गरज अणि भरपूर पैसा हाताशी असल्यामुळे लॉ ऑफ मार्जिनल युटीलीटीच्या नियमानुसार तो मुक्त हस्ते खर्च करीत असतो. जे मागील पिढीला उधळणे वाटते. आपण इतक्या काटकसरीत संसार केला पण मुलांवर त्याचा व्हावा तसा परिणाम, संस्कार झाला नाही अशी वैफल्यपूर्ण भावना ज्येष्ठांच्या मनात घर करू लागते. तसेच आता घरात आपले काही चालत नाही. सगळे निर्णय मुलगा घेतो. (आणि त्याची आई त्याला साथ देतेय, हे दुसरे दु:ख) आपली पत्नीही आपल्या सोबत नाही, तिलाही आपल्याबाबतीत सहानुभूती वाटत नाही असे एकांगी विचार मनात घोळायला लागतात. एकेकाळचा कर्ता, कर्तबगार माणूस दुखावतो, कोषात जातो, विक्षिप्त वागायला लागतो.

लहान मुलं जशी स्वतःकडे मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात, हट्ट करतात, मस्ती करतात त्या प्रमाणे ती ज्येष्ठ व्यक्ती लहान सहान निर्णयात दखल देऊ लागते, न विचारता सल्ले देऊ लागते, स्वतःचे ज्येष्ठत्व इतरांवर ठसवू पाहते. ते इतरांना जाचक होते. संघर्ष, वादावादी सुरू होते. ज्येष्ठ दुखावतात एकटे पडू लागतात.


हे सर्व पूर्ण नाही तरी अंशतः टाळणे शक्य असते. आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी. ज्यातून स्थायी स्वरूपात काही मिळकत होत राहील अशी गुंतवणूक करावी. भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी. कारण वडीलांची आर्थिक गुंतवणूक माहित असेल तर कधी कधी मुले ती त्यांच्या किंवा घराच्या वाढत्या गरजांसाठी भावनिक दडपण आणून (आम्ही तुम्हाला सांभाळत नाही का? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?) मोडायला लावतात. सर्वच मुले असे वागतात असे नाही. पण अनेक दु:खी ज्येष्ठांची ही शोकांतिका आहे. तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.

दुसरी गोष्ट आहे मानसिक. इतकी वर्षे घर चालविल्या नंतर म्हातारपणी स्वखुषीने सुत्रे मुलांच्या हाती सुपूर्त करावीत. त्याना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ द्यावा. त्यांना त्यांचा 'संसार ' उभा करण्याचा आनंद मिळवू द्यावा. त्यांच्या चांगल्या निर्णयांचे तोंड भरून कौतुक करावे. त्यांनी विचारला तरच सल्ला द्यावा. चूका फार सौम्य करून दाखवून द्याव्यात. आता ते 'कर्ते' आहेत हे मनाने स्विकारावे. आपण एक
पाऊल मागे घ्यावे.

भावनिक पातळीवर, 'प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते' (मिळतेच असे नाही) हे तत्व अंगीकारावे. मुलांशी, नातवांशी प्रेमाने वागावे. म्हणजे आम्ही काय क्रुरतेने वागतो की काय? असे कोणी म्हणेल. पण प्रेम जे त्यांना समजेल, दिसेल, रुचेल ते असावे असे मला म्हणायचे आहे. पुरुष निवृत्त होतात पण बायकांना सहजासहजी निवृत्ती मिळत नाही. त्यांना ती मिळावी असा विचारही आपल्या मनात येत नाही आणि कित्येक केसेस मध्ये त्यांनाही ती नको असते. पण वयोमानानुसार त्यांचेही हातपाय थकतात. रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठीसूळपणा वाढीस लागतो. घरातील माणसे संखेने वाढलेली असतात. शारिरीक काम वाढलेले असते. म्हणजे एकीकडे ताकद कमी झालेली असते तर दूसरीकडे श्रम वाढत असतात. पत्नी आता आपले न ऐकता मुलाचे ऐकते ही भावना पतीच्या खुळ्या मनात घर करत असते त्यामुळे एकीकडे कुरकुरणारा पती आणि दूसरीकडे 'डिमांडींग' तरून पिढी ह्या चरकात ती बिचारी पिळून निघते. अश वेळी पुरुषाने तिला घरकामात शारिरीक मदत करावी. तिने आपल्याशी कसे वागावे ह्याच्या अपेक्षा न ठेवता आपण तिच्याशी चांगलेच वागावे, बोलावे. तिच्या कामाचा भार कमी करावा. वाटून घ्यावा. कमी कमी होऊ पाहणारा 'संवाद' चालू ठेवावा. तिची होणारी ससेहोलपट समजून घ्यावी. ती कमी करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तिला, मुलांना भावनिक आधार द्यावा तुम्हाला तो आपोआप मिळत जातो.

मोकळा वेळ कसा वापरावा, हा एक मोठा प्रश्न असतो. मानसोपचार तज्ञांशी, फॅमिली डॉक्टरांची विचारविनिमय करून शारिरीक व्यायामासाठी पोषक अशा हालचाली होतील असे पाहावे. समविचारी (रडणारे, कुढणारे नाही) मित्र जमवावेत. वाचन करावे, थोडेफार आध्यात्मिक वाचन करण्यासही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. आयुष्यभर नोकरीच्या/व्यवसयाच्या धबडक्यात न जमलेल्या हौशी (वयानुरुप) भागवाव्यात. निसर्गाला वाचावे, जाणून घ्यावे. म्हातारपणी बागकाम 'निर्मिती आनंद' मिळवून देतो. नातवंडांमध्ये आपले बालपण शोधावे. आपल्या मनःस्वास्थासाठीही हे चांगले असते. दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती 'दुसर्‍यांची' मुलं आहेत हे विसरू नये. 'त्यांच्या' इच्छेचा मान राखून नातवंडांवर संस्कार करावेत. नातवंडांसमोर आपल्या मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे दुर्गुण उगाळू नये.

मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये. त्यांच्या मानसिक अवस्था जाणून घेऊन निर्माण होणारे गुंते अतिशय हळूवार हाताने सोडवावे. थोडेफार त्यांच्या कलाने घ्यावे, थोडेफार आपले घोडे दामटावे. म्हातारपणी आई-वडीलांच्या अपेक्षा असतात मुलांनी त्यांना 'वेळ' द्यावा. वेळ द्यावा म्हणजे नुसता तास आणि मिनिटात मोजता येईल असा नाही. एकत्रित कुटुंबाचा आनंद मिळवून देईल असा वेळ द्यावा. त्या वेळात आई-वडीलांच्या इच्छा आग्रहपुर्वक पूर्ण कराव्यात. त्यांच्या इच्छेनुसार कार्यक्रम आखावेत. त्यांना अतिश्रम होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. त्यांची शारीरिक, भावनिक सेवा करावी. हे कायम करावे लागत नाही पण महिन्यातून एकदा किंवा दोन तिन महिन्यातून एकदा जमवून आणले तरी चालते. ज्येष्ठांना आपल्याला अडगळीत टाकलेले नाही, आपल्याला स्वयंपाकीण बाई किवा मुलांना साभाळणारी आया म्हणून वागविले जात नाही तर आपले ही ह्या कुटुंबात काही स्थान आहे. मुलं आपल्याला प्रेमाने वागवताहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यांना जगायला नवा हुरूप मिळतो. दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे 'शब्द' हे शस्त्र आहे.

सांभाळून वापरावे. संतापाच्या भरात तत्क्षणी प्रतिक्रिया व्यक्त करण्या ऐवजी शांत झाल्यावर हळू शब्दात, शब्दांची चांगली निवड करून आपली भूमिका संमजावून सांगावी.

अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 31, 2012

"मी ही अशी"




"गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?"


दादर पश्चिमेला भवानी शंकर रोडवर इंदारा निवास ह्या बिल्डींगमधे आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो.तळमजल्यावर म्हणजे आमच्या खालीच देसाई कुटूंब रहायचं.देसायाना पाच मुलगे आणि एक मुलगी होती.मुलगी शेवटचीच म्हणून तिचं नाव सरला ठवलं होतं.
सरला शेंडेफळ असल्याने फारच लाडात वाढली होती.तिचे आईबाबा तिचे भरपूर लाड करायचेच त्याशिवाय पाच भावांना एकुलती बहिण म्हणून तेही तिचे लाड करायचे.त्यामुळे सरला खूपच लाडावून गेली होती.



पण भावंडात कधीतरी खटके उडायचे.मग क्वचित सरलावरपण राग काढला जायचा.सरला खूप बापुर्वाणी व्हायची.आमच्या सारख्या बाहेरून आलेल्याने चौकशी केली की म्हणायची,
"मी ही अशी"
आणि मग आपल्यावर कसा अन्याय होत आहे ते सांगायची.
म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा असायचा की,ह्या पाच भावांबरोबर राहून दिवस काढणं तितकं सोपं नाही.एखादा भाऊ म्हणायचा,
"तुझे खूपच लाड केले जात आहेत म्हणून तू अशी झाली आहेस"
कुणी म्हणायचा,
"तुझ्या जिभेला हाड नाही.वाट्टेलते बोलतेस"
वगैरे वगैरे.


मला तिच्या भावांचीपण कीव यायची.एकटी लाडावलेली बहिण असणं ही त्यांची एक व्यथाच झाली होती.
तिचं हे सगळं वागणं आणि अबलता बघून,आणि तिच्या भावांची व्यथा लक्षात येऊन, मला बत्तीस दातामधली एक जिभ आठवली.आणि कविता सुचली ती अशी,



दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांना
मी अशी (बिचारी) एकटी असून  
बत्तीस भावांमधे कशी राहू रुसून


मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले इकडे तिकडे
दात करतात माझा चोळामोळा
कुणी विचारले काय झाले
तर सांगतात सर्व जीभ चावून


ऐकून हे जिभलीचे संभाषण
दात म्हणती लगेचच तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला


बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
धमकी देती लोक वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Wednesday, July 25, 2012

एकदां काय जहालें!




स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:


तो रविवारचा दिवस होता.प्रमोद,त्याची पत्नी आणि मुलं माझ्याकडे जेवायला आली होती.माझ्या पत्नीने सुकं मटण,वडे ताज्या सोलांची कडी आणि भात असा जेवणाचा बेत केला होता.जेऊन झाल्यावर दुपारी थोडी डुलकी काढून झाल्यावर जुहू चौपाटीवर जायचा विचार केला.माझी पत्नी काही आली 
नाही.
"मी आवराआवर करीन तुम्हीच जाऊन या"
असं मला म्हणाली.


इतर आम्ही चौपाटीवर गेलो.सुर्यास्त बघून झाल्यावर प्रमोद आणि मंडळी घरी जायला निघाली.मी बराच वेळ वाळूत पडून होतो.सुर्यास्त झाल्यानंतर आणखी थोडावेळ बसायला मला आवडतं.
विशेषतः सूर्य पुरा समुद्रात डुबून गेल्यावर आकाशात दि़सणारे ते पिवळे-लाल रंग बघायला मला मजा येते.
वाळूवर थोडा लेटून हा प्रसंग मी पहात होतो.तासाच बसून होतो.काळोख केव्हा झाला ते कळलंच नाही.सूर्यास्ताकडे पाहून मनात विचार आला,
"हे काय चाललं आहे?"


सूर्य,पृथ्वी,पहाट,सकाळ,दुपार,दिवस,संध्याकाळ,रात्र,काळोख वगैरे अखिंडीतपणे चालू आहे.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची बाकी ही सर्व मुलं आहेत आणि ह्या कुटूंबाचा संसार असाच अखंडितपणे चालू आहे अशीही कल्पना मनात आली.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची पाच मुली आणि दोन मुलगे,दिवस आणि काळोख,अशी कल्पना मनात येऊ लागली.


घरी गेल्यावर तसाच कागद पेन्सिल घेऊन कविता उतरून काढली.दुपारी यथेच्छ जेवल्यावर आम्ही रात्री जेवत नाही.एक एक कप कॉफी पिऊन आम्ही झोपायला गेलो.
सकाळी उठल्यावर चहा घेताना मी माझी कविता पत्नीला वाचून दाखवली.


"कसं हे तुम्हाला सुचतं?"
नेहमी प्रमाणे माझ्या पत्नीने मला प्रश्न केला.
ह्यावेळी मी तिचा प्रश्न ऐकून फक्त हसलो.
माझ्या हसण्याचा अर्थ तिला समजला असावा.
दोन्ही चहाचे रिकामे झालेले कप उचलून ती उठून गेली.
मी मात्र माझ्या मनात नेहमीचं उत्तर बोललो.
"अग! विचाराच्या प्रांगणात अक्कलेने केलेला शब्दांचा हा खेळ आहे दुसरं काय?"

कविता अशी होती.


कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबूजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहूनी सूर्याला


ऐ्कूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
नेम असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्त दिवसाचा


ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
श्रेय नको देऊं तू सूर्याला
नेम असे हा पण पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना


पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे "दिवस" संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना


स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 20, 2012

झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद.





"म्हणून म्हणतो नका घालूं वाद"


निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला अक्कल दिली आहे.प्रत्येक प्राणी आपल्या अक्कलेनुसार वागत असतो.आणि ते स्वाभाविक आहे.कदाचीत दुसर्‍याचं शिकून तो प्राणी आपल्या अक्कलेत भर घालील आणि मग ती घातलेली भर चांगली असेल किंवा वाईट.पण त्यानुसार तो आपल्या वागणूकीत फरक करील हे निश्चीत आहे.


माणूस ह्या प्राण्याला निसर्गाने जरा जास्तच अक्कल दिली आहे ह्यात शंका नाही.ह्या अक्कलेच्या देणगीमुळेच अनेक गोष्टी करता करता माणूस वाद घालायलाही शिकला.अर्थात प्रत्येकजण तो वाद आपल्या अक्कलेप्रमाणेच घालत असणार.ह्यावेळी मला प्रो.देसायांचे ते शब्द आठवतात.


ते म्हणायचे,
"अहो,सगळ्यांना सारखीच अक्कल असती तर सारेच ज्ञानेश्वर,शिवाजीमहाराज आणि स्वामी विवेकानंद झाले असते.ह्यावरून मला एक कविता सुचली.


म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना सोळाव्या वर्षी
तोरणा जिंकणे


संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
ऐकूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद


जसे वाढे एखाद्याचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला


म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 15, 2012

नियतीचा निर्णय





"योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती"

"ह्या धरतीवर बर्‍याच गोष्टींना दोन बाजू असतात.अगदी पृथ्वीपासून सुरवात केली तरी तिला उत्तर आणि दक्षीण धृव आहे.झाडांना शेंडा आणि मुळ आहे, काठीला दोन टोकं असतात अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.शेवटी,चांगलं प्रचलीत म्हणणं सांगायचं झाल्यास, वादालाही दोन बाजू असतात हे सांगता येईल."
शरद मला आपला मुद्दा समजावून सांगण्य़ाचा प्रयत्न करीत होता.
पुढे म्हणाला,
"कुणाही मध्यस्थ्याकडे जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडलीत आणि त्याचा निर्णय विचारलात तर तो पटकन सांगेल की दुसरी बाजू मला ऐकली पाहिजे."
मी शरदला म्हणालो,
"तुझं म्हणणं मला पटतं.एखाद्याने डोळ्यासमोर एखाद्याचा खून केला आणि न्यायाधीशाला सांगीतलं तरी न्यायाधीशपण म्हणतो तरीपण मला दुसरी बाजू ऐकली पाहिजे."

नंतर काही दिवसानी का कुणास ठाऊक शरदचं ते वाक्य दुसरी बाजू ऐकली पाहिजे माझ्या सारखं मनात घोळायला लागलं आणि मग कविता सुचली.ती अशी,

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीतोस मात्र नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, July 10, 2012

सत्तेची ही कसली खूमखूमी




मालती मला नेहमी म्हणायची की तिच्या नवर्‍याचं आणि तिच्या मोठ्या मुलाचं कधीच पटलं नाही.दुसरे दोन मुलगे त्यामानाने वडीलांशी पटवून घ्यायचे.न पटणार्‍या त्या दोघांमधे मालतीने कधीही हस्तक्षेप केला की तिच कुणा एकाला वाकडी व्हायची.
"बरोबर तू त्यांचीच बाजू घेणार.तुझा नवरा पडले ते."
असं उद्धव,तिचा मोठा मुलगा तिला म्हणायचा.
आणि मुलाची बाजू घेतली की
 "बरोबर आहे तो तुझ्या पोटचा गोळा. तू त्याचीच बाजू घेणार"
 असं मालतीचा नवरा तिला म्हणायचा.
"माझी मात्र कात्रीत सापडल्यासारखी परिस्थिती व्हायची"
मालती मला म्हणायची.


मी मालतीला समजुत घालण्यासाठी म्हणायचो,
"अग,दोन व्यक्तिमधली ते पिढीचं अंतर आहे ना? मग ते तसंच व्ह्यायचं.एकमेकाने एकमेकाला समजून घेतलं नाही की हा वाद व्हायचाच.आईची स्थिती निराळी असते.तिला तडजोड करून घ्यायची निसर्गाचीच देणगी असते.अपवाद सोडल्यास आता जे काय तू म्हणालीस तशा प्रकारच्या बर्‍याच  घरातल्या तक्रारी असतात."


ह्या गोष्टीला आता खूप दिवस होऊन गेले.ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा मला कुणीतरी सांगीतलं की मालती आणि तिचा नवरा कायमचे कोकणात रहायला आले आहेत.मालतीच्या नवर्‍याला परॅलिसीसचा आजार झाल्याने त्याला सतत कुणाचीतरी मदत लागायची.शहरात रहाण्यापेक्षा कोकणात कुणालातरी कामाला ठेवायला माणसं मिळतात.खर्चही कमी येतो.मुलांच्या आधाराने रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं कमी तापदायक आहे.असा विचार करून ती दोघं कोकणात येऊन राहिली. 


त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो.
मालती आपल्या उतार वयातल्या कर्मकथा सांगत होती.
मला म्हणाली,
"काय सांगू आमचे भोग आणि आमची कर्मदशा असं म्ह्टलं पाहिजे आणखी काय? उद्धवाकडून मानहानी शिवाय काहीच मिळत नव्हतं."


त्यांचा निरोप घेऊन घरी जाताना मी माझ्या मनात म्हणालो नवं सरकार येतं आणि सत्ता बदलते."
त्यातूनच मला एक कविता सुचली,

उद्धवा! अजब तुझे सरकार

उजाडूनी दिवस होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
वाटते त्याही पेक्षा ती रात्र बरी


उजळणी दिवसाची होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची


उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच असे तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com