Tuesday, February 10, 2009

असंच एक स्वप्न.

मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती.सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.काही डबक्यात अगदी लहान मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.हिरवी गार बेडकांची डोकी आजूबाजूला प्रकट होत होती.काही सूर्यस्नान घ्यायला डोकं वरकरून राहायची तर काही कुणाची चाहूल लागल्याचा भास होऊन झटकन डबक्यात डुबकी मारीत होती.
एक तरतरीत आणि अक्कलमंद बेडूक काळसर खडकाचा आधार घेऊन वर बसून रात्रीचं जागरण विसरून पेंगत बसला होता.
मी त्या बेडकाच्या अंमळ जवळ बसून कुतहलाने त्याच्याकडून शिकायला बघत होतो.हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत.हा बेडूक आणि ह्याचे भाऊबंद बरेच वर्षात एकत्रीत मी पाहिले.आम्ही दोघे एकमेकाशी काही न बोलता निळ्या आकाशाच्या क्षीताजाकडे बघत असता मधूनच डबक्यातल्या माशांची पाण्यातली धक्काबूक्की बघत होतो.शेवटी तो चाणाक्ष्य बेडूक माझ्याशी बोलायला लागला,
“माणसं ह्या ओढ्याकडे येत जात असतात.”
पुन्हा एक बगळ्यांची रांग आवाज करीत आमच्या डोक्यावरून निळ्या क्षितीजाकडे झुकली.
सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत ह्याचा विचार येऊन आम्ही दोघे दुःखी आणि हताश झालो.
“प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे.काहीना त्यांची वाट अजून ध्यान्यात आहे.”
असं मी बेडकाला म्हणालो.
“मी जिथे जिथे जातो तेव्हा ह्या लोकाना हूडकून काढायाला प्रयत्न करतो.”असं मी म्हणालो.
त्याने मान हलवून संमत्ती दिली.
दिवस उतरंडीला जात होता.परत भेटायचं ठरवून आम्ही वेगळे झालो.एकमेकाचे आभार मानले.मी मागे वळून पाहिल्यावर तो अजून त्या खडकावर होता.मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.आणि तो बेडूक ते पहात होता.
पण हे असंच एक स्वप्न होतं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: