Saturday, January 30, 2010

असंभव स्वपनाचं सामर्थ्य.

“मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.”

कुसुम कर्णिक मला नेहमी म्हणायची,
“काका तुम्हाला मी एक दिवस आमच्या कोकणातल्या वाड्यात घेऊन जाणार आहे.माझे मामा आणि मामी त्या वाड्यात रहातात.त्या वाड्याला इतिहास आहे.माझ्या मामीच्याच तोंडून तो ऐकायला हवा.”
आज तो दिवस उजाडला.कुसुम बरोबर मी कोकणातल्या तीच्या गावाला गेलो होतो.वेंगुर्ल्याच्या जवळ तुळस नावाचं एक गांव आहे ते गांव पार करून पुढे गेल्यावर एक छोटसं खेडं आहे.त्या खेड्यात बर्‍याच वाड्या आहेत.तीथे मी कुसुम बरोबर गेलो होतो.

कुसुमच्या मामा-मामीने आमचं यथासांग स्वागत केलं.दोन दिवसाच्या मुक्कामात मजा आली.एका रात्री कुसुमची मामी आम्हाला आठवून आठवून सर्व हकीकत सांगत होती.
कुसुम मामीला म्हणाली,
“मामाने जीद्द करून हा सुंदर वाडा बांधला.अगदी पडक्या स्थितीत त्यावेळी असला तरी तो पडका वाडा आणि मामाचे वाडवडील ह्यांच्या बद्दल त्याला मनात भावना होत्या.”

मामी म्हणाली,
“त्याचं असं झालं,एक हरवलेला फोटो गवसला.एका जुन्या पुस्तकात तो मिळाला.जूनी पुस्तकं झाडून साफ करण्याच्या माझ्या नादात तो फोटो त्या पुस्तकातून खाली पडला.त्या फोटो मधे तुझा मामा एका कोसळून पडलेल्या जुन्या औदूंबराच्या झाडाच्या बुंध्यावर बसून त्या झाडाच्याच बाजूला पडलेल्या मोठ्या फांदीला टेकलेला अशा पोझ मधे होता.त्याच्या शर्टाच्या बाह्या दोन्ही खांद्यातून खाली उतरल्या होत्या आणि त्याची एक-टक नजर नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यानंतर हिरवं गार झालेलं आसमंत पहाण्यात गुंतली आहे असं दृष्य होतं.”

मी म्हणालो,
“हा इतका सुंदर फोटो कुणी काढला?”
मामी कुसुमला उद्देशून म्हणाली,
“मला आठवतं माझं नुकतच लग्न तुझ्या मामाबरोबर झालं होतं. माझ्या पूर्वी पासूनच्या आठवण ठेवण्यासारख्या दृश्यांचा फोटो घेण्याच्या उत्कंठेमुळे हा फोटो ही त्यातला एक होता. हार कधीही मानायची नाही ह्या वृत्तीच्या तुझ्या मामाच्या संवयीचा तो एक पुरावा म्हणून मी फोटो काढला होता.मला अजून आठवतं ज्यावेळी मी माझ्या कॅमेर्‍याची कळ दाबली त्यावेळी माझ्या मनात तुझा मामा आणि त्याची असंभव स्वप्नं मला आठव्ण करून देत होती. अनेपेक्षीतपणे आलेल्या वादळात हे दोनशे वर्षापूरवीचं औदुंबराचं झाड वार्‍यापावसाला टक्कर देत देत बिचारं कोसळून खाली पडलं होतं. जीवंत रहाण्याची त्या झाडाची खोल गेलेल्या मुळांवरची पकड ढिली झाली होती.”

कुसुमने मामीला विचारलं,
“तू असंभव स्वप्नं का म्हणतेस?”
“असंभव स्वप्नं मी एवढ्यासाठीच म्हणते कारण हे औदुबराचं झाड ज्या आवारात होतं तो सर्व परिसर आमच्या घराण्यातल्या जुन्या वाड्याचा एक भाग होता.मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.ह्या घराच्या चिरेबंदी भिंतींचा आधार घेऊन तात्पुरत्या बांधलेल्या घरात गेली कित्येक वर्षं आमचेच काही जवळचे वारसदार रहात होते.जूने कागद पत्र शोधत असताना तुझ्या मामाला आणि मला जूने फोटे पाहायला मिळाले.त्या फोटोत हे त्यावेळचं भक्कम घर आणि घराच्या मागे बांधलेला मांगर दिसत होता.”
मामीने आपला विचार सांगीतला.

ती पुढे म्हणाली,
“एका फोटोत तुझ्या मामाचे पुर्वज-बायका, पुरूष आणि मुलं-दिसत होती.मुलं मोठ्यांच्या पायाजवळ बसलेली होती.मोठी माणसं नक्षीदार लाकडी खुर्च्यांवर विराजमान झालेली दिसत होती.एका फोटोत नोकरांसाठी बांधलेला मांगर आणि त्या मांगराच्या बाजूला गाई म्हशींचा विस्तारलेला गोठा दिसत होता.
मोठ्या मंडळीत वयस्कर लोक फेटा किंवा पगडी डोक्यावर घेऊन अंगात लांब मोठ्या बटणांचा कोट आणि त्यावर उपरणं घेतलेली दिसत होती. साधारण तरूण मंडळी काळ्या टोप्या,कोट आणि पाटलोण नेसलेली दिसत होती.बायका नऊवारी साड्या, लांब हाताचे ब्लाऊझ नेसून,त्यांचे पाय अनवहाणी होते.खाली बसलेली मुलं अर्ध्या पाटलोणी वर तोटका कोट आणि डोक्यात जरीच्या टोप्या घातलेली दिसत होती.बोडकं डोकं कुणाचही नव्हतं.फोटोत बोडकं दिसणं अशूभ असावं.
हा फोटो घराच्या समोरच्या अंगणात बसून घेतलेला असावा.घराच्या भिंती चिरेबंदी असल्या तरी त्याला सफेद चून्याचा रंग दिला होता.
अगदी अलीकडच्या फोटोत एक माणूस कच्च्या सिमेंटचा गिलावा केलेल्या भिंती समोर उभा राहिलेला दिसत होता. आमचे शेजारी सांगतात की, हे सर्वांत शेवटचं कुटूंब इथे रहात होतं.”

मी म्हणालो,
“एकदा का घराच्या डागडूजीकडे दुर्लक्ष झालं की एवढ्या मोठ्या घराला कोसळून पडायला वेळ लागत नाही.”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला”
असं म्हणत मामी पुढे म्हणाली,
“त्या औदुंबराच्या झाडाप्रमाणे ह्या घरानेही धीर सोडलेला दिसत होता. घराच्या वरचं छप्पर कुठे कुठे कोसळून अर्धवट खाली सरकलं होतं. प्लास्टर दिलेल्या भिंतीना चांगल्याच भेगा आलेल्या दिसत होत्या. आणि शेवटी एकदा कधीतरी आग लागून जे काही आपल्या पायावर उभारून राहिलं होतं ते त्या आगीच्या भक्षस्थानी गेलं.आणि राहिलं ते फक्त लोखंडी कांबी आणि चिरेबंदी भिंती.”

कुसुम थोडी भावनावश होऊन मामीला म्हणाली,
“हे बघून मामा खरोखरच दुःखी झाला असेल ना?”
“तुझा मामा चेहर्‍यावर कधीच दुःख दाखवीत नाही.कारण सांगते”
मामी पुढे म्हणाली,
“हे सगळं बघून तुझा मामा मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं,
“पाया मजबूत दिसतो.”
असं म्हणून, सिमेंटची थापी आणि घमेलं भरून सिमेंट घेऊन आणि त्याच्याबरोबर त्याची स्वप्नं घेऊन तो कामाला पण लागला होता. माझा तुझ्या मामावर विश्वास होता.त्याच्या स्वप्नावरही विश्वास होता.कारण अशी स्वप्नं करताना माझ्या वडीलाना मी जवळून पाहिलं आहे.”

“तुमचे वडील गणपतीच्या मुर्त्या बनवायचे असं मला कुसुम बरेच वेळां म्हणाल्याचं आठवतं “
मी मामीला म्हणालो.

“माझे वडील गणपतीच्या मुर्त्या बनवायचे.त्या मुर्त्या गणपतीच्या सणात शेकडोनी विकल्या जायच्या.मी लहान होते तेव्हा त्यांच्या गणपतीच्या कारखान्यात दिवसभर असायची.कधी कधी तिकडेच झोपी जायची.ती गणपती बनवायची गणपतीची चिकण माती,मुर्ती बनत असताना चिकण मातीला गणपतीचा आकार आणताना लागणारी आयुधं,ते निरनीराळ्या रंगाचे डबे,सोनेरी वर्ख आणण्यासाठी लागणारे ब्रश ही सर्व साधनं मी मोठी होईतो पहात आली होती.माझे वडील दरवर्षी गणपतीच्या मुर्त्या तयार करण्याच्या स्वपनात असायचे मग मला पण स्वप्न काय ते कळायला कठीण
गेलं नाही.”
मामीने आपल्या जून्या आठवणी उजळण्याचा प्रयत्न केला.
यावर कुसुम मामीला म्हणाली,
“मला तुझ्याकडून हे मामाबद्दल ऐकून त्याच्या बद्दल आदर वाटतो.”

“तुझ्या मामाच्या स्वपनांना पण कळायला मला कठीण गेलं नाही.
ती सहा वर्ष चिर्‍यावर चिरा ठेवण्याचा, विटेवर विट ठेवण्याचा धीर बाळगून शेवटी आम्ही हा वाडा आम्हाला रहाण्याजोगा केला.हा वाडा आणि तुझ्या मामाची तो पुन्हा बांधण्याची स्वप्नं माझ्यात असंभव स्वपनातलं सामर्थ्य दाखवयला कारणीभूत झाली आहेत.”
असं म्हणताना मामीचे डोळे पाण्याने भरले होते.पण त्यात अभिमानाची आणि तृप्तीची चमक दिसत होती.

शेवटी मी मामाली म्हणालो,
“कुसुम इकडे येण्यासाठी माझ्या मागे का लागली होती ते आता मला कळलं.कारण ह्या वाड्याचा इतिहास तुमच्याच तोंडून ऐकण्यात जी मला मजा आली ती एरव्ही आली नसती.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 28, 2010

भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

अनुवादीत. (ठंडी हवाएं……)

थंड थंड हवा आली लहरत लहरत
बोलावू कसे सजणां आला ऋतु बहरत

चंद्रमा अन तारे हंसवे दृश्य सारे
मिळूनी सगळे हृदयी जादू जागविणारे

सांगवे ना मला रहावे ना मला
भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

कथा अंतरातल्या जाणवे अंतराला
ओढ अंतराची सजणा सांगू कशी तुला

भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 25, 2010

माझी दाभोलीची भेट.

“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.”

आज बरेच दिवसानी मी कोकणातल्या दाभोली गावाला गेलो होतो.माझ्या चुलत भावाची ह्या गावात बरीच शेतीवाडी आहे.भातशेती तो तर करतोच त्याशिवाय ऑफसिझनमधे भाजीची पण लागवड करतो.त्याशिवाय त्याच्या कडे गाईगुरं आहेत,शेळ्या-मेंढ्या आहेत,कोंबड्यांची खुराडं ही आहेत.
अलीकडे तो बराच थकला आहे असं मी ऐकलं होतं. शिवाय थोड्या दिवसापूर्वी त्याच्या पत्नीचं-म्हणजेच माझ्या वहिनीचं- एकाएकी निधन झालं होतं. म्हणूनच त्याची भेट घेण्यासाठी मी दाभोलीला आलो होतो.त्याचा मुलगा अलीकडे माझ्या भावाला कामाचा जास्त व्याप न देता स्वतःच सर्व कारभारात लक्ष घालीत होता.

मी घरात शिरताच माझी पहिली भेट झाली ती माझ्या भावाच्या नातवाशी.मुंबईला इन्जीनीअरींग कॉलेजमधे तो तिसर्‍या वर्षात शिकत होता.त्याला मला बघून आनंद झाला.त्याच्या मागोमाग माझा पुतण्या बाहेर आला.निपचीत पडलेल्या माझ्या भावाच्या खोलीत मला घेऊन गेला.तो शांत झोपलेला पाहून मी खूणेनेच पुतण्याला सुचवलं की आपण नंतर तो जागा झाल्यावर येऊंया.
माझा पुतण्या आणि त्याचा मुलगा आम्ही बाहेरच्या पडवीत गप्पा मारायला बसलो होतो.घरातलं दुःखी वातावरण पाहून,समजूत घालण्याच्या उद्देशाने विषय काढावा म्हणून मी त्यांना म्हणालो,
“जसं आपल्याला हवं तसंच आपलं जीवन असेलच असं होत नाही.”
आणि पूढे म्हणालो,
“असं म्हटलं जातं की,
“सुख शोधायचं असेल तर जे आपल्याला मिळतं तेच आपल्याला हवं असतं असा समज आपल्यात असायला हवा.”

माझा पुतण्या मला म्हणाला,
“अशी गुढावस्था प्राप्त करून घेणं सोपं नसतं. माझ्या आजुबाजूच्या लोकांचे चेहरे न्याहाळल्यावर,ही गुढावस्था प्रात्प न व्हायला मी काही एकटाच नाही असं मला दिसून येतं.”
आणि मला पुढे म्हणाला,
“आता पर्यंतच्या आयुष्यात अनेक धक्के खावे लागले.मी ज्यावेळी तरूण होतो तेव्हा मी माझ्या पडेल त्या कामात व्यग्र असायचो. शारिरीक आपत्यांना तोंड द्यावं लागायाचं.रात्री रात्री पर्यंत कामं करावी लागायची.दुसर्‍या कामाचा शोध घ्यावा लागायचा.विचार करायला वेळच गवसत नव्हता.”

आपल्या वडीलांची री ओढत त्याचा मुलगा म्हणाला,
“अलीकडे माझ्या आयुष्यात मला भासलं त्याप्रमाणे माझ्या आजीच्या निधनाने उलटापूलटी आली आहे.वयाने ती एव्हडी वृद्ध झाली नव्हती. तरी एकाएकी ती निघून गेली.आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं.ती एकाएकी निघून गेल्याने मला अपरिमित दुःख झालं आहे. दुःखी माणसाचा चेहरा मला मी प्रात्प करून घेतला आहे.
लहानपणाच्या संवयी प्रमाणे कुणी जरी विचारलं,
“कसं चालंय?”
तर ओघाने
“ठिक ठाक”
असं उत्तर यायचं.पण आता तसं होत नव्हतं.”

मी त्याला म्हणालो,
“आपण हंसलो तर जग आपल्या बरोबर हंसणार नाही काय?
आणि रडायला मात्र एकट्यालाच लागतं.
मात्र अतिउत्तेजीत क्रियाशीलतेत चटकन निसटून जाता येत नाही हे अगदी खरं आहे.”
माझा भाऊ उठल्यावर त्याची भेट घेऊन रात्री त्याच्या बरोबरच जेवण करून आम्ही सर्व झोपलो.
सकाळी उठल्यावर चहापाणी होण्यापूर्वी गाईंच्या गोठ्यात एक फेरी टाकावी म्हणून गेलो.तिकडे नातू गाईचं दूध काढताना दिसला. इन्जीनीयरींग शिकत असला तरी घरी आल्यावर शेतकर्‍याची कामं किती उत्साहाने करतो ते पाहून मला त्याचं कौतूक वाटलं.मी त्याच्या जवळ एक लहान स्टूल ओढून घेऊन बसलो.सूर सूर आवाज करीत गाईच्या आंचळातून येणार्‍या दुधाचा त्या पितळेच्या चरवीत पिचकार्‍यांचा आवाज ऐकून मला जरा मजाच वाटली.

मी नातवाला म्हणालो,
“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.”
माझा हा विचार त्याला इतका आवडला की,भरलेल्या चरवीवरचा दुधाचा फेस फुंकून हाताने बाजूला करीत असताना मला म्हणाला,
“कालचीच गंमत मी तुम्हाला सांगतो.चला आपण त्या बाकावर जाऊन बसूया.”

दुधाची भरलेली चरवी नोकराकडे देत मला पुढे सांगू लागला.
“काल सकाळीच मी नेहमी प्रमाणे आमच्या कपिलेची आंचळं धूऊन असाच दोन पायात पितळेची चरवी धरून दूध काढीत बसलो होतो.ते सफेद अमृत मला सोन्याच्या मोलाचं वाटतं.माझ्या आजीचा मोत्या माझ्या मागे घुटमळत होता.कपिलेचं दूध काढीत असताना मोत्या नेहमीच गोठ्यात येऊन त्याला आवडणार्‍या कोपर्‍यात जाऊन बसतो. माझं लक्ष मोत्याकडे गेलं. तो त्या कोपर्‍यात जाण्यापूर्वी एकदम थांबला.जरा चकीत झाल्या सारखा दिसला आणि तो कोपरा सोडून दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बसला.मी दुधाची चरवी भरल्यानंतर बाजूला ठेऊन त्याला तिथे काय दिसलं ते पहायला म्हणून त्या जागी गेलो.
सफेद-काळ्या केसांचा पुंजका तिकडे पडला होता.काल मी आमच्या तानुलीच्या-शेळीच्या- शेपटीवरचे केस भादरले होते.ती आता दोन महिन्याचं पोट घेऊन फिरत असते.लवकरच तीला छबकडं होईल. केसाचा तीला उपद्रव होऊं नये म्हणून मी तीची नीगा ठेवीत होतो.तो केसांचा पुंजका उचलून मोत्या जवळ गेलो आणि त्याच्या नाका जवळ नेऊन पाहिलं.त्याने तात्पूरतं हुंगल्यासारखं करून शेपटी हलवली.जणू त्याला सांगायचं होतं की,
“मला ठाउक आहे.”

हे ऐकून त्याला मधेच थांबवीत मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
“एखादी केवळ गोष्ट,एखादा केसाचा पुंजका,एखादी जमिनीला आलेली खांच,एखादा कागदाचा तुकडा सुद्धा आकस्मिक भय ह्या प्राण्यांत आणू शकतो.
कारण त्या क्षणाला त्यांना तेव्हडंच दिसतं.हे प्राणी ती एकच एक दिसलेली गोष्ट आजुबाजूला असलेल्या गोष्टींच्या संदर्भात पाहू शकत नाहीत.”
“अगदी बरोबर आहे तुमचं.कसं ते सांगतो.माझ्या पण मनात तसाच विचार आला.”
आणि मला तो पुढे म्हणाला,
“त्या मोत्याला भासलेल्या भितीतून माझ्या लक्षात आलं की मी पण असाच माझ्या आजीच्या निधनाकडे बघीतलं तर?.त्या केसाच्या पुंजक्यासारखी मला ती घट्ना वाटून घेतली तर?.”
असं म्हणून माझ्याकडे तो उत्तराची अपेक्षा करतो आहे असं वाटलं.

हे ऐकून मला त्याचं कौतूक वाटलं.इन्जिनीयरींगच्या तीसर्‍या वर्षात शिकत असल्याने किती पोक्तपणा त्याला आला आहे हे पाहून मी मनात म्हटलं ह्याला आताच विचारावं की होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल खंत करीत बसणं किती संयुक्तीत राहील?.
मी म्हणालो,
“तुला हवं तसं हे जीवन नसेलही.पण कसंतरी करून जर एखाद्याच वेळेला त्या कपिलेच्या पांढर्‍या अमृताकडे तू सोन्याच्या मोलाने पाहू शकतोस,सुखद स्मृतिना आठवू शकतो्स,तर कदाचीत असंच एखादं कारण धुंडाळून तू जीवनाचा मार्ग काटू शकशील.”
म्हणे पर्यंत नोकर,
“चहा तयार आहे सर्व वाट बघतायत.”
असा निरोप घेऊन आल्यामुळी आम्ही तो विषय तीथेच सोडून आत चहाला गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 22, 2010

आशावादी अनिल.

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.”

अनिल-अरूण हे भाऊ भाऊ मागे पुढे जरी जन्माला आले तरी जणू जूळेच भाऊ कसे वाटतात.दोघांत दोनएक वर्षाचं अंतर असावं.आता त्यांची लग्न वगैरे झाली आहेत आणि एकाच बिल्डिंगमधे जवळ जवळ फ्लॅट घेऊन रहातात.आज का कुणास ठाऊक बरेच वर्षानी त्यांची आठवण आली म्हणून सहजच अनिलच्या घरी गेलो होतो.अनिल मला पूर्वी एकदा भेटला होता आणि तो म्हणाल्याचं आठवतं,
“मला त्या अपघाताचं काही आठवत नाही.लोकं सांगतात त्यामुळे मला माहित होतं.मेंदूवर इतका गंभीर आघात होता का?”

अलीकडेच मी माझ्या एका मित्राबरोबर एका चर्चा सत्राला गेलो होतो.त्याचा विषय होता,
“How memory functions”
त्यातलीच लक्षात असलेली माहिती अनिलला ऐकून उपयोगी होईल ह्याच उद्देशाने मी त्याला भेटायला गेलो होतो.
रविवारचा दिवस असल्याने अनिल घरी भेटेल याची खात्री होती.मला पाहून त्याला आनंद झाला.
माझा पुतण्या आणि अनिल-अरूण एकाच शाळेत जायचे.त्यांची शाळा चालत जायला लांब होती पण रिक्षेने जायला सोयस्कीर असल्याने,हे तीघेही बरेच वेळा एकाच रिक्षेने शाळेला जात येत असत.

नशिबाचा भाग आहे,का कुणास ठाऊक त्यांच्या रिक्षेला एकदा अपघात झाला त्यादिवशी माझा पुतण्या त्या रिक्षेत नव्हता.त्याला बरं नव्हतं म्हणून त्यांच्याबरोबर शाळेत गेला नव्हता.मला वाटतं त्यावेळी ही मुलं जवळ जवळ पंधराएक वर्षाची होती.मी अनिलला त्या अपघाताची आठवण काढून म्हणालो,
“तो दिवस आठवला की अंगावर कांटा येतो.त्यातून तुम्ही दोघे भाऊ बचावला हाच त्यातला सर्वांत आनंदाचा क्षण आहे.”
अनिल त्या दिवसांची आठवण काढून म्हणाला,
“आमच्या लहानपणी झालेल्या त्या गंभीर अपघातातून आम्ही सहीसलामत बचावलो हे आमचं नशीब समजलं पाहिजे. मला वाटतं मी पंधराएक वर्षाचा असेन.बरा होऊन मी माझ्या अंथरूणातून जो उठलो तो त्या क्षणापासून त्या पूर्वीची सर्व स्मृति मी विसरूनच गेलो होतो.खरं सांगायचं तर मी बरा झालो हे कुणी मला सांगीतलं,त्यातून उठलो हे पण माझ्या स्मृतित नव्हतं.”

मी अनिलला म्हणालो,
“स्मरणशक्ति ही एक संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.माहिती आणि विचार जसे एखाद्दया एन्सायक्लोपिडीयामधे असतात त्याच्यापेक्षाही लाखोपटीने जास्त माहिती ह्या तिन पौंडाच्या गोळ्यामधे भरलेली असते.
स्वतःची डिसीझन घेणं,विचार करणं,आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करणं, हालचाल करणं ही सर्व कामं मेंदु करतो.”
अनिल म्हणाला,
“मी आणि माझा भाऊ अरूण आम्ही दोघे शाळेत जाण्यासाठी रिक्षा केली होती.तुमचा नितीन त्याच दिवशी आमच्या बरोबर नव्हता. रिक्षावाल्याने समोर येणार्‍या ट्र्कशी टक्कर टाळण्यासाठी एकदम डाव्या बाजूला रिक्षा फिरवली आणि आम्ही दोघे भाऊ रिक्षेच्या बाहेर फेकले गेलो.मी ताबडतोब बेशुद्ध झालो.जवळ जवळ चार दिवस मी कोमात होतो.हे पण सर्व मला आठवत नाही लोक म्हणतात ते मी तुम्हाला सांगीतलं.”

मी अनिलला म्हणालो,
“हीच तर आपल्या मेंदूतली गंमत आहे.तुला मी त्यातली मेंदूची प्रकिया सांगतो त्यामुळे तू म्हणतोस की तुला सर्व काही आठवत नाही त्याचं कारण समजेल.
त्याचं काय आहे,शॉर्टटर्म,लॉन्गटर्म,आणि ऍनसेसटरल असे मेमरीचे तिन प्रकार आहेत.माहिती लिहून ठेवणं, राखून ठेवणं(store करणं) आणि काढून त्याचा उपयोग करणं ही एक मेमरीची प्रोसेस आहे. काही वेळेला ही माहिती कायमची राखून ठेवणं आणि नंतर कधी तरी उपयोगात आणण्यासाठी काढून घेणं हे त्या त्या जरुरी प्रमाणे ठरवलं जातं.ही माहिती किती वेळ राखून ठेवणं हे पण प्रोसेस ठरवते.”

“मला हॉस्पिटलमधे भेटायला येणारा प्रत्येक जण मी लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करीत असे असं मला लोकांनी सांगीतलं.ह्या प्रार्थनेमुळे जरी मला बरं होता आलं तरी कूठल्याही शारिरीक क्षतिनंतर स्वास्थ्यलाभ व्हायला म्हणजेच recovery व्हायला बराच वेळ लागतो.माझंही तसंच झालं.कधी कधी मला वाटतं मी अजून बरा व्हायचा आहे.”
माझं मेमरीबद्दलचं स्पष्टीकरण ऐकून अनिल आपली recovery कशी होत गेली ते आठवून आठवून सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

मी अनिलला मेमरीची आणखी माहिती देत म्हणालो,
“रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’असे चार प्रकार मेमरी प्रोसेसचे आहेत.
रिकॉल म्हणजे भूतकाळातली माहिती आठवणं.
रिकलेक्शन म्हणजे माहितीची ’रिकन्स्ट्रकशन करून मग आठवण करणं.
रिकगनिशन म्हणजे पुर्वीची झालेली घटना आठवणीत ठेवून नंतर तिची उजळणी करून लक्षात आणणं.
रिलर्नींग म्हणजे घटना परत परत आठवणं.म्हणजेच त्याच, त्याच घटनेची पुनावृत्ती करणं.”

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.
मला वाटतं स्वास्थ्यलाभ ही एक निरंतर प्रकिया आहे.म्हणजेच ती प्रक्रिया कधीही अंत पावणारी नाही.ह्या बाबतीत मला सकारात्मक म्हणजेच आशावादी रहावंसं वाटतं.कारण निराशावादी रहाणं म्हणजेच स्वास्थ्यलाभण्यापासून वंचीत असणं.”
अनिलचं ही आशावादी प्रवृत्ती मला आवडली.

मेमरी विषयी अनिलला अधीक सांगण्याचं सोडून देऊन मी त्याला म्हणालो,
“आशावादी असण्याचा अर्थच असा आहे की,
“जे काही घडत आहे ते नेहमी चांगल्यासाठीच घडत असतं असं भर देऊन सांगीतलेलं मत.”
पण त्याचा संबंध श्रद्धा,अपेक्षा,पूर्वानुमान, विश्वास,प्रत्याशा, आत्मविश्वास,आकांक्षा ह्या शब्दांशी पण जोडला जातो. आणि ह्या सर्व शब्दांवर आशावादी व्यक्ति भरवंसा ठेवते. कारण त्या सर्व शब्दात त्यांच्या अर्थाचं मूर्तरूप सामावलेलं असतं.”

“एखादा डॉक्टर म्हणो वा नाम्हणो की,
“तुम्ही अपेक्षेपेक्षा सुधारलात किंवा कुदारलात”
तरी डॉक्टरचं ते म्हणणं ऐकूनही मला तुम्ही आशावादी म्हणा किंवा त्याचा संबंध असलेले इतर शब्दाप्रमाणे म्हणा त्या सर्व शब्दातलं बळ मी स्विकारतो.”
अनिल माझ्याशी जणू सहमत होऊनच म्हणाला.

त्यावर मी त्याला म्हणालो,
“बिकट झालेल्या परिस्थितीतून स्वास्थ्यलाभ झाला तर त्याकडे नुसत्या शारिरीक दृष्टीकोनातून झालेली प्रगती असं समजून चालणार नाही.किंवा ही प्रगति एखाद्या आलेखावर नोंदण्यासारखी नसते.
मला विचारशील तर मी म्हणेन स्वास्थ्यलाभ होत रहाणं हा एक प्रवास आहे.आणि ह्या प्रक्रियेच्या जरूरीचा तीव्रतेने बोध झाल्यावर त्यानंतरचा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रवास आपल्यात सामिल करून घेतो.”
आणखी पुढे जाऊन मी त्याला सांगीतलं,
“मला वाटतं,स्वास्थ्यलाभ हा सहजासहजी आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही.किंवा तो त्या प्रक्रियेतला काही रिवाज होऊ शकत नाही.
उलट स्वास्थ्यलाभ हा आपल्याकडून होणार्‍या प्रकटनाचा प्रकार आहे. ते तुमचं मनोबळ आणि व्यक्तित्व त्यातून विकसीत करतं.आणि ह्या प्रक्रियेपासून तुम्ही दूर राहून काहीही साध्य केलंत तरी ह्या गोष्टी इतकं ते अर्थपूर्ण होणार नाही.श्रद्धा,अपेक्षा,पूर्वानुमान वगैरे महत्वपूर्ण शब्द ह्या प्रक्रियेत अंतर्भूत असतात.”

“काका,बरेच दिवसानी आपण भेटलो हे बरं झालं.मला राहून राहून वाटायचं की मी आशावादी रहाण्यात जरा अतीच करतोय.पण तुमच्याचकडून आशावादी असण्याचा अर्थ कळला.ते बरं झालं. कारण सर्व तर्‍हेच्या नाडी/नस वगैरेच्या मोजमापानुसार माझी स्वास्थ्यलाभाची प्रक्रिया पूर्णत्वाला आल्याचं मला सांगीतलं गेलं. आणि मी आता इतरांप्रमाणे पूर्ण सामान्य झालो आहे.
पण खरं पाहिलं तर मी जो पूर्वी होतो तसा आता नाही.माझा स्वास्थ्यलाभ पूर्णत्वाला येणं शक्य नाही हे मला नक्कीच माहित आहे.”

शेवटी हंसत हंसत मी अनिलला म्हणालो,
मला वाटतं तुला आशावादी रहाण्यापासून थांबवलं जाणं हे ही शक्य नाही.हे मात्र मला नक्कीच माहित आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Wednesday, January 20, 2010

तांब्याचं कडं.

“प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.”

मागे एकदा मी मामा काण्य़ांच्या हॉटेलमधे चहा आणि बटाटावडा खाण्याच्या उद्देशाने गेलो होतो.मला वाटेत कर्णीकांची शोभा भेटली, तीला पण मी माझ्या बरोबर कंपनी म्हणून बोलावलं.आम्ही एका टेबलावर जाऊन बसलो आणि दोन कप चहा आणि दोन प्लेट वडे आणि त्याच्या बरोबर मामा काण्यांची खास चवदार लाल रंगाची सुकी चटणी मागावली. कांद्याच्या भजांच्या भांड्यात उरलेला चूरा मिरचीच्या तिखटाबरोबर मिक्स करून नंतर तीचा भूगा करून ती चटणी ते बनवतात म्हणून मी ऐकलं होतं.भज्याच्या चूर्‍याचा अश्यातर्‍हेने चांगलाच उपयोग होतो.

मला कुणीतरी सांगीतलं होतं की मिसळ -पाव मामा काण्यांकडे फ़ार पूर्वी पासुन मिळायची.मामा काण्यांच्या हॉटेलला ह्या २०१० च्या फेब्रुवारीला शंभर वर्ष पूर्ण होणार.बापूसाहेब काणे स्वतःच मला त्यादिवशी फोनवर म्हणाले. उसळ गरम करून त्यात कच्चा बारीक कांदा,बारीक शेव आणि थोडाच उसळीचा रस्सा घालून ती पावाबरोबर मिसळ-पाव प्लेट म्हणून विकली जायची.शंभर वर्षापूर्वी ती डीश फारच लोकप्रीय होती.
बापूसाहेब काणे हे मामासाहेबांचे थोरले चिरंजीव.म्हणजे मामासाहेबांची दुसरी पिढी.

माझी आणि बापूसाहेबांची ओळख tifrमधली. मला आठवतं त्याप्रमाणे बापूसाहेब काही वर्ष स्विडनला कंप्युटर सॉफ्ट्वेअर शिकायला गेले होते. tifr मधल्या CDC 3600 नावाच्या कंप्युटरवर इतरांबरोबर आम्ही दोघे काम करायचो. हा कंप्युटर डॉ.भाभा यानी अमेरिकेतल्या CDC corporation ह्या कंपनीतून मिनियापोलीसमधून आयात केला होता.बापूसाहेब सिनियर प्रोग्रामवर होते आणि मी हार्ड्वेअर इंजिनीयर होतो.फोरट्रॉन,कोबोल,पास्कल वगैरे कंप्युटरच्या भाषा-languages-मधे बापूसाहेबांचा हातखंडा.त्यातल्या त्यात फोरट्रॉनवर बापूसाहेब काण्यानी
पुस्तकंही लिहिली होती.

tifr मधे काम करून ड्युटी संपल्यावर म्हणजे संध्याकाळचे पाच वाजल्यानंतर बापूसाहेब तडक हॉटेलात काम करायला यायचे.
कधी गल्ल्यावर बसलेले दिसायचे तर कधी भटारखान्यांत स्वयंपाक्याना सल्ला द्यायला जायचे.अजूनही ते बरेच वेळा हॉटेलात फेरफटका मारतात.
त्यावेळी मिसळपाव म्हणून मामाकाण्यांची डीश प्रसिद्ध होती आता मिसळपाव म्हणून तात्या अभ्यंकरांचं संकेतस्थळ प्रसिद्ध आहे.
आणि काही वर्षानी भारताने पाठवलेल्या चंद्रावरच्या रॉकेटचं नाव सुद्धा मिसळपाव असलं तर मला नवल वाटणार नाही.

तर त्याचं असं झालं, मी आणि शोभा बसलेल्या टेबलावर बाजूला एक बाई येऊन बसली.
शोभाच्या उजव्या हातातल्या तांब्याच्या कड्याकडे ती निरखून पहात असताना मी पाहिलं होतं.ती बाई शोभाला असा गहन प्रश्न विचारील हे माझ्या मनातही नव्हतं.अगदी तीच्या मर्मावर घाव घातल्या सारखं मला वाटलं.
तीने शोभाला विचारलं,
“तुम्ही तुमच्या उजव्या मनगटावर तांब्याचं कडं का वापारता?”
शोभाने जरा त्या बाईकडे निरखून पाहून तीची खात्री केली की खरंच ही बाई गंभीर होऊन प्रश्न विचारतेय ना.
मध्यंतरी हे फॅड आलं होतं आणि आता निघूनही गेलं.
“तुम्ही फॅशन म्हणून नक्कीच वापरत नसाल.वापरण्याच्या मागे काहीतरी कारण असणार”
तीने दुसरं वक्तव्यं थोडं हसंत हसंत केलं.आणि ती कारण विचारू लागली.

शोभा तीला म्हणाली,
“माझे आजोबा अलीकडेच गेले.त्या दिवशी मी एकदा हे कडं मनगटावरून काढलं होतं.तसंच जेव्हा माझी आजी गेली होती तेव्हा तीच्या सन्मानासाठी मी असंच ते मनगटावेगळं केलं होतं.”
क्षणभर थांबून आवंढा गिळून शोभा पुढे म्हणाली,
“हे कडं भरवश्याचं आणि त्यागाचं चिन्ह आहे असं मला वाटतं.माझी आजी कॅन्सरने गेली.हा रोग आजार्‍याला आणि सुदृढ असलेल्याला सुद्धा जेरीला आणतो.हा रोग कुणाचं तरी जीवन घेऊन जातोच पण बरोबरीने कुणाचे आजी,आजोबा वडील,आई,बायको/नवरा,भावंड,मुलही घेऊन जातो.
मला वाटतं हे कडं कुटूंब,मित्रमंडळी,जीवित असणं किंवा मृत्युपावणं ह्याचं प्रतिनिधित्व करीत असतं असं मी मानते.मी ते माझ्या मनगटावर ऐक्य दाखवण्यासाठी वापरते.जे अजून जीवंत आहेत,जे असल्या दुर्धर रोगाचा सामना करीत आहेत त्यांच्यासाठी वापरते.”

मी म्हणालो,
“ह्या रोगा बाबतीत आपण किती सुशिक्षीत व्हायला हवं हे आपल्यावर अवलंबून आहे.अगदी सुरवात दिसताच ह्यावर उपाय योजना व्ह्ययला हवी.आणि सरकारने आणि सामाजिक संस्थांनी ह्या रोगावर हिरीरीने संशोधन करायला हवं.”

माझ्याशी सहमत होत शोभा म्हणाली,
“हे कडं मी धैर्य़ाने आणि मी स्वतः कदाचीत ब्रेस्ट कॅन्सरची मोठी जोखीम असलेली असं समजून मनगटावर वापरते. माझी मुलगी सुद्धा ह्या रोगाला बळी पडण्याचा संभव आहे अशा विचाराने वापरते.आणि कधी कधी मी माझ्या नवर्‍याची आठवण काढून मनात म्हणते माझ्या जाण्याने तो आपली पत्नी घालवून बसणार आहे.”

मी म्हणालो,
“सर्व तर्‍हेच्या कॅन्सर रोगावर नक्कीच एक दिवस उपाय निघेल.जे बिचारे त्या रोगाला बळी पडले त्यांच्या लढतीच्या समर्थनासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या ह्या लढाईमधून इतरांचं जीवीत सुरक्षीत व्ह्यायला मदत होईल.”
माझ्या आणि शोभाच्या विचारामुळे त्या बाईच्या एका प्रश्नाला आमच्या अनेक उत्तराने तीला कंटाळा आणला असावा.पण तीच्याकडून मोठं गमतीदार स्पष्टीकरण मिळालं.
ती म्हणाली,
“माझी आई ब्रेस्ट कॅन्सरने गेल्या नंतर मला असंच कुणी तरी कडं दिलं होतं.मी वापरत नसले तरी जे वापरताना दिसतात त्यांना मी निक्षून त्यांच्या वापरण्याचं कारण मात्र विचारते.
प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.”

उठता उठता शोभा म्हणाली,
“मला आशा आहे की ह्या कड्यातर्फे ह्या रोगाच्या लागणीची इतरांना आठवण दिली जाईल.आणि एक दिवस ह्या रोगातून वाचलेले लोक इतराना, त्यांच्या कुटूंबियाकडून त्यांच्याबद्दल कहाणी ऐकवण्या ऐवजी त्यांचाकडून त्यांची कहाणी ऐकवतील.”
चहाचा शेवटचा घोट घेत मी ही उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 18, 2010

गोरेगांवचे सामंतगुरुजी गेले.

” मधुदादा, अखेर तुम्ही आम्हाला सोडून गेला.”

त्या दिवसात अण्णा आई वेंगुर्ल्याला होते.अर्थात अण्णा अंथरूणात आजारी असल्याने ती दोघं येऊ शकली नाहीत. सुधाकर पण त्यांच्या बरोबर होता.
मी अक्काच्या लग्नाच्या वेळेची आठवण येऊन म्हणतोय.

मला वाट्तं ते १९५१ साल होतं.सुधाकर १५ वर्षाचा होता.मी १८ वर्षाचा होतो.मी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात शिकत होतो. अंधेरीच्या आराम नगर मधे मी एकटाच रहात होतो.पण माझ्या बरोबर माझा मावस भाऊ रमाकांत-आता तो नाही- रहायचा. अंधेरीच्या भवन्स कॉलेज मधे मी जात होतो.

रमाकांत तुमचा मित्र होता.तुमचं अक्काशी लग्न करून द्यायचा त्याचा विचार झाला.अक्का चांगले मार्क्स घेऊन मॅट्रिक पास झाली होती.त्यावेळी ती खूपच सुंदर दिसायची.प्रसिद्ध मराठी नट चंद्रकात याने तीला शारदा नाटकात शारदेची भुमीका दिली होती.चंद्रकांतने नाटकाचं डायरेक्षन केलं होतं.

“मुर्तिमंत भिती उभी मज समोर राहिली”

ह्या शारदा नाटकातल्या गाण्याला तीला बरेचवेळा “वन्स मोअर” मिळायचे. एक दोन वर्ष तीने वेंगुर्ल्याला नोकरी केली.रॅशनींग ऑफीस मधे.

अक्काच्या लग्नाला अण्णा आईने संमत्ती दिली आणि तीने तुम्हाला होकार दिला.
मी,माझा मोठा भाऊ भाई/माई, त्याची मुलं-मंगला ६ वर्षाची,सतीश ४ वर्षाचा आणि निमा(निर्मला) नुकतीच झाली होती. आणि रमाकांत एव्हडीच मंडळी मुलीच्या बाजूची होती.
तुमचे दोन भाऊ-वसंत,प्रभाकर आणि तुमच्या दोन बहिणी आणि तुमचे आई वडील होते.

लग्न गिरगावांत हॉल घेऊन केलं.खूप नातेवाईक मंडळी आली होती.
म्हणजे १९५१ पासून माझी आणि तुमची ओळख.आज २०१० म्हणजे जवळ जवळ गेल्या ५८/५९ वर्षांचा माझा तुमचा परिचय होता.कार्यबाहुल्यामुळे मला जरी दूर रहावं लागलं तरी आठवणी येतच रहायच्या.दोन वर्षापूर्वी अक्काचं निधन झालं.तीच्या जाण्याने तुम्हाला धक्का बसला होता.पण संगीतात वेळ खर्ची करून तुम्ही तुमचा एकटेपणा निभावून नेत होता.

तुमच्या घरात संगीताची सर्वानाच गोडी होती.तुमचे मोठे भाऊ वसंत हे व्ही.शांताराम यांच्या राजकमल कला मंदिरात त्यावेळी म्युझीशियन होते.ते प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई याचे असिस्टंट होते.प्रभाकर पण संगीतात स्वारस्य घ्यायचे.आणि तुम्ही तर उभी हयात संगीताची सेवा करण्यात खर्ची केली. अख्या गोरेगावात सामंत गुरुजी म्हणजेच आमचे मधुदादा.तुमचा आवाजही गोड होता.ऑल इंडिया रेडीओवर तुमचे त्यावेळी संगीताचे कार्यक्रम व्हायचे.तुम्ही गाण्याना चाली पण द्यायचा.मी तुमची गाणी ऐकली आहेत.
किर्तनात तुम्ही पेटी वाजवायचा.मेढेकरबाईंच्या गिरगावातल्या क्लासात तुम्ही संगीताचे गुरूजी होता.तुमचा संगीताचा वारसा विरेनने घेतला.आणि विरेन नक्कीच तुमचा वारसा चालवील.
गेल्या ३०/४० वर्षात तुम्ही गोरेगावांत तुमचा शिष्यगण एव्हडा निर्माण केलेला आहे की बरेचसे तुमचे शिष्य आजोबा होऊन त्यांची नातवंडं पण तुमच्या कडून शिकून गेली असतील. दरवर्षी गुरूपोर्णिमेला तुमचे गोरेगांवात संगीताचे कार्यक्रम व्हायचे.तुमचे शिष्य/शिष्या त्यात भाग घ्यायचे.

तुम्ही गोव्याचे असल्याने तुम्हाला पोर्तुगीझ आणि गोव्याची भाषा यायची.तुम्ही स्वभावाने अतीशय प्रेमळ आणि विनोदी वृत्तीचे होता.तुमचा खास मित्र वसंत सबनीस.तुमच्या विनोदावर सबनीसांच हंसणं हा आमचा खूप पास टाईम व्हायचा.
आज तुम्ही आम्हाला सोडून गेल्याचं ऐकून खुपच दुःख झालं.पण एकच मनाची समाधानी करून घ्यावीशी वाट्ते की वर गेल्यावर तुम्ही अक्काला तरी भेटाल.

विरेन आणि वर्षाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.
(मधूकर सामंत म्हणजेच सामंतगुरूजी ३ जानेवारी २०१० या दिवशी कालवश झाले.ते ८६ वर्षाचे होते.आमचे मधुदादा, माझे मेव्हणे होते.माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान.त्यांच्या मागे त्यांचा मुलगा विरेन आणि त्याची मुलगी स्नेहा आणि त्यांची मुलगी वर्षा आणि तीचा मुलगा मयुरेश अशी दोन नातवंडं आहेत.)

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 16, 2010

नका एव्हडे सतावू.

अनुवाद (भूली हुई यादों…..)

विस्मरलेल्या स्मृतिनो
नका एव्हडे सतावू
घेऊ का मी जरा विश्राम
कसे दूर तुम्हा मी ठेवू

ओंजळीत माझ्या मी जमविले तारे
सहारा घेऊनी स्वपनांचा कसे मी जगावे
विक्षिप्त मी असे मुळचा
नका विक्षिप्त आणखी करू
विस्मरलेल्या स्मृतिनो
नका एव्हडे सतावू

नका लटू मला घालूनी कसला वाद
दाखवण्या नवा मार्ग नका घालू साद
सांभाळले मला मी पडता पडता
नका आणखी पाडवू
घेऊ का मी जरा विश्राम
कसे दूर तुम्हा मी ठेवू

विस्मरलेल्या स्मृतिनो
नका एव्हडे सतावू

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 14, 2010

इतिहासातून शिकण्याजोगं.

“इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता असते”

आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.आम्ही दोघे मिळून तळ्यावर फिरायला जाणार होतो.प्रो.देसाई सध्या आपल्या मुलाच्या घरी थोडे दिवस राहायला गेल्याने त्यांची कंपनी थोडे दिवस आम्हाला मिळणार नव्हती.
पण झालं असं की मला कळलं वैद्य पण काही आवश्यक काम आलं म्हणून त्यांच्या पत्नीबरोबर बाहेर गेले होते.वैद्यांचा मुलगा- गिरीश- घरी भेटला.

मला म्हणाला,
“काका, मी आज तुमच्याबरोबर तळ्यावर येतो.आज मला काही कामानिमीत्त सुट्टी घ्यावी लागली होती.काम काही झालं नाही आणि घरी राहून मी पूर्ण बोअर झालो आहे.”
मी त्याला म्हणालो,
“अलभ्य लाभ.नाहीतरी रोज तू एव्हडा कामात गुंतलेला असतोस,माझ्या वाट्याला कसा येणार.?चल जाऊया.”

चालता चालता मी त्याला म्हणालो,
“हल्ली होत असलेल्या हाणामारी,सुयीसाईड बॉम्बर्स,आतंकवादी आणि जास्त करून एका धर्मात काही लोकात उसळून निघालेली जीहादची घोषणा आणि त्यानुसार मनुष्यहानी करून तथा-कथित क्रान्ति आणण्याचे त्यांचे विचार पाहिल्यावर वाटतं हे लोक इतिहासातून काही शिकलेले दिसत नाहीत.
“जे लोक इतिहास शिकत नाहीत ते नक्कीच इतिहासाची पुनरावृती करायला अभिशापित होतात.”
असं कुणी तरी म्हटलं आहे.तुला कसं वाटतं.?”

गिरीश मला म्हणाला,
“रोज पेपरात आपण वाचतो त्या घटना अगदी सारख्याच नसल्या तरी जवळ जवळ सारख्याच अर्थाच्या असतात.मग त्या काल ऐकलेल्या असो वा परवा ऐकलेल्या असो वा एक आठावड्यापूर्वी ऐकलेल्या असोत.इतिहासाकडून शिकायची संवय मला वाटतं लोक विसरून गेले आहेत.”
आज प्रि.वैद्य नसले तरी त्यांचा गिरीश मला चर्चा करायला चांगलाच सापडला हे पाहून मी मनात खूश झालो होतो.
मी त्याला म्हणालो,
“काय रे गिरीश,तुला शाळेत इतिहासाचा विषय शिकावा लागला असेलच.काही आठवतं का तुला एखादा किस्सा?”

“मला लहानपणी माझ्या वर्गातली गोष्ट आठवते.माझ्या मनावर तीचा चांगलाच परिणाम झाला आहे.”
गिरीशने विषयाला हात घातला.
मधेच त्याला अडवीत मी म्हणालो,
“एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण ज्यावेळी परिणामकारक बदलाव आणण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा रचनात्मकता ही नक्कीच हिंसा करण्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरते.
पण ते जाऊदे तू काही तरी वर्गातल्या गोष्टीबद्दल सांगत होतास.”

“हो,वर्गातल्या गोष्टीबद्दल मी म्हणालो,”
गिरीश सांगू लागला,
“त्याचं असं झालं,एकदा आमचे इतिहासाचे शिक्षक जगाच्या इतिहासाबद्दल बोलत होते.आम्हाला त्यानी आतापर्यंत जगात झालेल्या अनेक क्रान्तिबद्दल यादी तयार करून प्रत्येक घटनेबद्दल चार ओळीत टीप लिहायला सांगीतली होती.
त्या यादीचा विचार केल्यावर एक ठरावीक चित्र दिसलं ते आमच्या शिक्षकांनी आमच्या लक्षात आणलं.जेव्हड्या म्हणून क्रान्ति झाल्या होत्या त्या सर्वांमधे रक्तरंजीकता जास्त होती.त्या हिंसेने परिपूर्ण झालेल्या क्रान्ति असायच्या.त्यातली एकही क्रान्ति रक्त न सांडता झालेली नव्हती.जेव्हा क्रान्ति विषयी विचार केला जाई तेव्हा त्यात आपल्या उद्देशासाठी जीवीताची प्रचंड हानी करायला लोक उद्युक्त झालेले दिसले.त्यावेळी,तुम्ही म्हणता तसं, आमच्या पैकी कुणाच्याही असं लक्षात आलं नाही की क्रान्ति अहिंसक पण होऊ शकते.
आमच्या शिक्षाकानी ह्य विषयावर चर्चा करायला चालना दिल्यानंतरच आमच्या लक्षात आलं की अहिंसक क्रान्ति झाल्याची इतिहासात नोंद आहे.
त्यामधे वैज्ञानिक क्रान्ति, औद्योगिक क्रान्ति,ज्ञानोदय आणि नवजागरण ह्या गोष्टी प्रकर्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत.ह्या प्रकारच्या सर्व क्रान्तिमधे रचनात्मक विचार,आणि कार्यकुशलतेचा अंतर्भाव होता आणि हिंसा बिलकूल नव्हती.वर्गात क्रान्तिबद्दल आम्ही सुरवातीला विचार करीत होतो तेव्हा आमच्या मनात ह्या गोष्टी लक्षात अजिबात आल्या नाहीत उलट हिंसा आणि रक्त सांडण्याचे प्रकार लक्षात आले.
कल्पकता किंवा रचनात्मकता विषयी विचारच सुचला नाही.हे सुचल्यानंतर मात्र माझा विचार बदलला आणि वृद्धिंगत झाला.”
मला गिरीशचे विचार सकारात्मक वाटले.

मी म्हणालो,
“हिंसा होऊन झालेली क्रान्ति नेहमीच परिणामकारक होत नाही.एकदा का हिंसा होऊन क्रान्ति झाली की नंतर शांती मिळेलच ह्याची खात्री नाही.आणि त्या क्रान्तितून उपलब्ध झालेली ध्येयं साध्य होतीलच याची खात्री नाही.उलट हिंसात्मक क्रान्तितून आणखी हिंसा होण्याचा संभव बळावतो.”
“काका,तुमचं म्हणणं मला एकदम पटतं.मी पुढे जाऊन म्हणेन,
अहिंसात्मक क्रान्तिमधून समाजावर जास्त परिणामकारक आणि कायमचा ठसा बसतो.असंच मलाही वाटतं.”
गिरीश माझ्याशी सहमत झाला हे मला जरा बरं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तू मघाशी उल्लेख केलेल्या अहिंसात्मक क्रान्तिंचे परिणाम शेकडो वर्षं होऊन गेली तरी आजही प्रत्यक्षात दिसतात. त्यातून मिळालेली उदाहरणं आणि त्याची उपयुक्तता नंतरच्या पीढीशी पायाभूत राहून अजूनही व्यवहारात आहे. इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता आहे.”

“काही वेळा हिंसेची जरूरी नसते उलट हिंसाच समाजात आणायच्या नव्या बदलावाला पायओढ करायला कारणीभूत ठरते.आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता काय चाललं आहे ते. आतंकवाद्यांच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या धर्मात सांगीतलेल्या काही गोष्टींचा त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावून घेतला आहे.पण असं करणं जास्त वेळ टिकणार नाही.”
गिरीशचं हे म्हणणं ऐकून मी त्याला म्हणालो,

“म्हणून बदलाव आणायचा असल्यास रचनात्मकतेचं समर्थन जास्त झालं पाहिजे.हे इतिहासातून शिकून असा इतिहास घडवला गेला पाहिजे.पण तू मघाशी म्हणालास तसं लोक इतिहासाकडून शिकायला विसरून गेले आहेत,ही चूक त्यांच्या ज्यावेळी लक्षात येईल,तो पर्यंत हे सगळं आपल्या सारख्याला सहन करावं लागणार आहे,असं मला वाटतं.”

दोघेही आम्ही एकमेकाशी एव्हडे सहमत झालो होतो की मी सुरवात केलेल्या ह्या विषयावर पुढे चर्चा करण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 12, 2010

प्रदीप गावड्याची वेगळीच भूक

“परंतु,एक गोष्ट मला नक्कीच माहित आहे की भूक असणं चांगलं ठरतं जेव्हा पोटात प्रभावशाली आवेश येण्याचं ईन्धन ती भूक पेटवते.आणि जीवनात प्रगति आणते.”

ती शनिवारची दुपार होती.अंधेरी लोकल पहिल्या प्लॅट्फॉर्मवर येणार असं चर्चगेटचा इंडीकेटर दाखवत होता.अंधेरी आल्यावर पटकन उतरून ब्रिजवर चढता यावं म्हणून मी प्लॅटफॉर्मच्या बाहेरच्या टोकाला जाऊन एका बाकावर बसलो होतो.दुपारचा पेपर वाचत होतो.तेव्हड्यात माझ्या बाजूला एक सदगृहस्थ येऊन बसले.गाडी यार्डातून आल्याने रिकामीच होती.चटकन चढून खिडकीच्या जवळ बसलो.समोरच्याच बाकावर ते गृहस्थ बसले.गाडी सुटायला अजून पाच मिनटं होती.शनिवारची दुपारची वेळ असल्याने तशी गाडी रिकामीच होती.आम्ही एकमेकाशी हंसलो.आणि नंतर बोलता बोलता कळलं की तो प्रदीप गावडे होता. आणि त्याचा मोठा भाऊ मला ओळखतो.

त्याचा मोठा भाऊ शंकर गावडे लहानपणी माझ्या वर्गात होता.ह्या गावड्यांचं घर आमच्या शाळेच्या बाजूला होतं.शंकर धरून हे पाच भाऊ आणि एक बहिण.आमच्या लहानपणी त्या जनरेशनमधे पाचसहा मुलांचं कुटूंब सर्रास असयाचं.”हम दो हमारे दो” ही घोषणा तोपर्य़ंत झाली नव्हती.आणि छोटा परिवार ठेवल्याने परिस्थिती सुधारता येते वगैर वगैरेचा प्रचार करणं त्यावेळी जरा अप्रशस्त भासायचं.
मुळात घरची परिस्थिती चांगली असेल तर मुलांचं जीवन निभावून जायचं.पण त्या व्यतिरिक्त घरचा कमवता माणूस मुलं वाढत असताना दुर्दैवाने आजारी झाला आणि कमाईवर गदा आली तर मग सर्वांचेच हाल व्हायचे.
गावडे कुटूंबाचं असंच काहीसं होतं.
प्रदीपची आणि माझी ह्याच विषयावर गाडीत चर्चा झाली.

मला तो म्हणाला,
“मी लिहायला वाचायला शिकायला लागल्या नंतरच माझ्या लक्षात आलं की बाकी इतर कुटूंबातली मुलं मी जसं जीवन जगतो तशी ती जगत नव्हती.
आमच्या गावातल्या लायब्ररीमधे माझी अधून मधून खेप व्ह्ययची. हावरटासारखी मी हाताला लागतील तेव्हडी आणि वेळ असे पर्यंत पुस्तकं वाचायचो.मला माहित नसलेल्या जगातल्या निरनीराळ्या ख्याली-खुशालीचं जीवन जगणार्‍या मुलांच्या जीवनाबद्दल माहिती काढण्याचं साहस करण्याच्या प्रयत्नात असायचो.
ही मुलं भुकेलेली कधीच नसायची आणि असलेल्या त्यांच्या गरजा सहज पुर्ततेला यायच्या.
बरेचदां मी स्वतः एका अलिशान बंगल्यात रहात असल्याचं दिवास्वप्न करायचो.बंगल्याच्या बाहेर सुंदर दिसणारं पांढर्‍या रंगाचं कुंपण,घरासमोर रंगीत फुलांची बाग,मोठाले कुत्रे,आणि नोकरमाणसांची धावपळ असलेलं त्या बंगल्यातलं वातावरण स्वप्नात पहायचो. “
दिवास्वप्नातून बाहेर आल्यावर मला खर्‍या जीवनाला सामोरं जावं लागायचं.माझ्या पाच भावंडांबरोबर जगण्याचं ते प्रात्यक्षीक असायचं.दम्या सारख्या दुर्दैवी रोगाने पछाडलेल्या माझ्या बाबांची सेवा करण्यात आमचा वेळ जायचा.ते स्वतःच अपंग असल्याने घरातली आवक सहाजीकच तुटपूंजी असायची.”
प्रदीप गावडे हे मला सांगत होता ते ऐकून मला खूपच गहिवरून आलं.

मी म्हणालो,
“तुझा थोरला भाऊ शंकर शाळेत खूपच हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचा.शिक्षक त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे.मला ते अजून आठवतं.मॅट्रिकला तो आमच्या शाळेतून पहिला आला होता.”
आपल्या थोरल्या भावाची माझ्या तोंडून स्तुती ऐकून प्रदीपला सहाजीकच बरं वाटलं.

मला म्हणाला,
“आमच्या घरी वीज नसायची.त्यावेळी मिणमिणत्या दिव्यात आम्ही रात्रीचा अभ्यास करायचो. माझे वर्गसोबती ह्या बद्दल माझ्याकडे पृच्छा करायचे. मला वाटतं वेळ मारून नेण्यासाठी मी त्यांना खोटी खोटी उत्तरं द्यायचो.आमची शिक्षणांत जशी प्रगती होत राहिली तशी घरची परिस्थिती पण सुधारूं लागली.”
आमची गाडी कुठपर्यंत आली ते मी खिडकीच्या बाहेर बघायला लागलो.ते पाहून प्रदीप मला म्हणाला,
“मी तुम्हाला बोअर तर करीत नाही ना?”
हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.
मी म्हणालो,
“आपण अजून दादरला पण आलेलो नाही.तुझी जीवनकथा ऐकायला मला कसं बोअर होईल? तुमच्या विषयी ऐकून मला नक्कीच तुम्हा सर्वांचा अभिमान वाटेल.”

प्रदीप पुढे सांगू लागला,
“अगदी लहानपणापासून माझ्या भावंडांबरोबर मिळेल ती कामं पत्करून,नवे करकरीत कपडे सोडाच पण वापरलेले कपडे मिळाले तरी त्यात समाधान राहून निदान रोजचं थाळीत जेवण पडलं तरी भले अश्या परिस्थितीत आम्ही दिवसांची गुजराण करायचो.अशावेळी इतर मुलं आपला वेळ संगीत शिकण्यात,सायकली घेऊन सहलीला जाण्यात,नवीन नवीन खेळणी विकत घेण्यात आपलं जीवन जगायची.
आमची आई काबड-कष्ट करायची.आमच्या घरी आम्ही दोन चार कोंबड्या पाळल्या होत्या.त्यांची अंडी विकून थोडे पैसे यायचे. त्याशिवाय आमची आई कुणाच्या घरी मदतीला जाऊन त्यांच्याकडून काय मिळेल ते घेऊन यायची.त्यामुळे आमची उपासमार क्वचीतच व्हायची.”
मी प्रदीपला म्हणालो,
“आणि आपल्या त्या वाढत्या वयात राक्षसी भूक लागते.तुमच्या त्या परिस्थितीत आणि एव्हड्या मुलांना उपासमार न होईल ह्यासाठी काबाडकष्ट करणारी तुझी आई खरीच “धन्य ती माऊली” असं माझ्या मनात आलं.”

“पण खरं सांगायचं तर माझी खरी भूक दुसरीच असायची.”
भूकेचा विषय निघाल्यावर प्रदीप आपल्या मनातलं खरं ते सांगू लागला,
“माझे आईवडील जे जीवन जगले त्यापेक्षा जरा चांगलं जीवन जगण्याची माझी भूक होती.आमच्या कामचालावू अस्तित्वापलिकडच्या अस्तित्वाच्या ज्ञानाविषयीची ती भूक होती.माझ्या बाबांना वाटायचं की आमचं असंच चालणार ती त्यांची समजूत खोटी करून दाखवण्याची माझी भूक होती.
माझीच नाही तर ही भूक माझ्या भावंडांची प्रभावकारी शक्ती होती ज्यामुळे ते प्रेरित होऊन आईवडीलांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सफल करण्यात यशस्वी झाले.मिळेल त्या शाळेत जाऊन शिकण्याचं आम्ही सर्वानी हौशीने पत्करलं.कारण शिक्षणच आमचं भावी आयुष्य उज्वल करण्याची पहिली पायरी होती.”
हे ऐकून मला प्रदीपच्या ह्या विचारसरणीचा खूप आदर वाटू लागला.
मी म्हणालो,
“कोण कोण काय काय शिकले ते ऐकून मला खरंच आनंद होईल.”

“माझी भावंडं निरनीराळ्या व्यवसायात आपआपली कार्यसिद्धि करून परिपूर्णतेला आली आहेत.माझा मोठा भाऊ शंकर आर्ट प्रोफेसर आहे.एक भाऊ फार्मासिस्ट आहे.एक व्हेट डॉक्टर आहे.एकाचा कपड्याचा धंदा आहे. मी के.सी.कॉलेजमधे क्लार्क आहे आणि माझी एकुलती एक धाकटी बहिण मुलींच्या शाळेत शिक्षीका आहे.”
प्रदीप सांगत होता.

मला राहवलं नाही.मी प्रदीपला पटकन म्हणालो,
“ह्या भुकेच्या तीव्रतेबद्दल जर का तुम्हाला एव्हडी चिंता नसती,किंवा प्रतिभेचं अगोदरच वरदान असतं,किंवा तुमचं जीवन छानछोकीचं असतं तर मला वाटतं तू कधीच जाणू शकला नसतास की तुला आणि तुझ्या भावंडांना हे यश संचित करता आलं असतं.”
माझं हे ऐकून प्रदिप खरोखर सद्गदीत झाला.आणि त्याला माझं म्हणणंही पटलं.आणि आम्ही अंधेरीला उतरण्यापूर्वी डोळ्यात पाणी आणून शेवटचं सांगून गेला.

“परंतु,एक गोष्ट मला नक्कीच माहित आहे की भूक असणं चांगलं ठरतं जेव्हा पोटात प्रभावशाली आवेश येण्याचं ईन्धन ती भूक पेटवते.आणि जीवनात प्रगति आणते.”
प्रदीप गावडे आणि त्याच्या कुटूंबाची चर्चगेट-अंधेरीच्या प्रवासात ही कहाणी ऐकून माझा वेळ सत्कारणी गेला असं मला वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 10, 2010

शब्दांच्या ओळी शिवायला स्मृतिची सूई.

“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.”

त्या दिवशी माझी प्रो.देसायांबरोबर चर्चा चालली होती.विषय होता लेखनाबद्दल.
मी त्यांना म्हणालो,
“मला वाटत होतं की मी कंप्युटर जवळ बसलो की मला आपोआप शब्द सुचंत जाणार.मला वाटत होतं की लेखन करणं म्हणजे पेटी शिकणं,सायकल दुरुस्त करणं,चित्र काढणं यासारखं संवयीने होत असावं.कुठचीही कला कार्यान्वित करावी लागते.तसंच कार्य करायला गेलं की कल्पना सुचत जातात, विचार सुचत जातात.लेखनाबाबत असाच माझा समझ होता.”

भाऊसाहेब म्हणाले,
“मला जी माहिती आहे त्याप्रमाणे लेखन करायला स्मरणशक्ति उभारून यायला हवी.”
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
प्रो.देसायांना दुजोरा देत मी म्हणालो.
“मला माझ्या लहानपणाची एक गोष्ट आठवली.आमच्या शेजारी एक पानपट्टीची गादी होती.असाच एक माणूस त्या दुकानात पान खायला आला की पन्नास पैशांचं नाणं द्यायचा. पंचवीस पैशाचं उरलेलं नाणं तो कानाला अडकवून जायचा. हे असं करताना मी त्याला बरेच वेळा पाहिलं होतं.”
माझ्या एका लेखाच्या संदर्भाची आठवण येऊन मी त्यांना पुढे म्हणालो,
“माझ्या लेखनातल्या गोष्टीतला हा संदर्भ लक्षात ठेवून मी आणखी अवांतर माहिती त्यात लिहू लागलो.दुपार पर्यंत हजारएक शब्दाची गोष्ट लिहिली गेली आणि त्या गोष्टीची सुरवात त्या पानपट्टीच्या गादी पासून झाली. असंच मी आणखी दोन तीन दिवस लिहीत लिहीत माझ्या मनाला पूर्ण आनंद होईतो लिहीत राहिलो.आता माझ्याजवळ गोष्टीची सुरवात,गोष्टीचा अर्धा राहिलेला शेवट आणि गोष्टीचा मध्य भाग लिहीला गेला होता.”
“म्हणजे तुम्ही अर्ध्यावर गोष्ट सोडून दिलीत का?”
भाऊसाहेब मला आवर्जून विचारू लागले.

“हे झाल्यावर मी पुढचं लेखन थांबवलं.मी काय लिहीलंय याचा मागोवा घ्यायला लागलो पण यापुढे काय लिहायचं ह्याची कल्पना येत नव्हती.मला वाटायचं की सगळं चुकीचं लिहलं गेलं आहे.आणि नंतर एक विराम आला.अशा विरामाला आतापावेतो मी चांगलाच परिचीत झालो होतो.कदाचीत गोष्टीला पुन्हा पहिल्यापासून सुरवात करणं जास्त सोपं वाटायला लागलं.किंवा सर्व विसरून जायचं असंही वाटायला लागलं.”
प्रो.देसायांच्या प्रश्नाचं कुतूहल मी जास्त वाढवीत त्यांना असं सांगीतलं.

माझं म्हणणं ऐकून त्यांना एक तुलना सुचली.ते मला म्हणाले,
“मला वाटतं प्रेरणा ही प्रेमासारखीच चंचल बाब आहे.प्रेमाच्या निर्मितीची उपस्थिती जशी लग्नजीवनात असते अगदी तसंच लेखनाच्या प्रेरणेचं आहे.ज्याप्रमाणे काही झालं तरी तुम्हाला लग्नजीवनात रोजचंच उपस्थित राहून समर्पित व्हावं लागतं.पण जर का तुम्ही म्हणाल,
“मला जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी घरी असेन”
तर असं म्हणून लग्नजीवन चालेल का? काहीतरी भलताच घोटाळा व्हायचा.वरवर पृष्टभाग सांचपल्यास, खोलवरच्या गुढतेकडे डोळेझाक केल्यासारखं होईल.तुमचं काय मत?”

मी माझ्याकडून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.मी म्हणालो,
“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.
लिहीत असताना जेव्हा विराम येतो तेव्हा समजावं की अजून खरं लेखन व्ह्यायचं राहिलं आहे.जे सुरवातीला मी घाई करून लिहीत होतो ते परिपूर्ण झालं नाही असं वाटायला लागतं,लेखन जास्तच झालं असंही वाटायला लागतं,कुठेतरी जरा ढील आली आहे आणि थोडी दुरूस्ती हवी असंही वाटायला लागतं.गेले दोन दिवस जे मी लिहीत आलो ते फुकट जाणार असं ही मनात येतं.पण त्यातली खरं समजायची गोम अशी आहे की ही सर्व आपली हार आहे असं मानता कामा नये.”

भाऊसाहेबाना पुन्हा तुलना करून सांगण्याची हुक्की आली.
ते म्हणाले,
“विरामाचा उपयोग गोष्टीचं पुनःमुल्यांकन करण्यात करावा.काही काटछाट करावी.अगदी सुरवातीला काहीच नव्हतं आता निदान थोडं फार आहे.थोडातरी ढांचा आहे,सुंदर तुळा तयार आहे,पाया मजबूत आहे,आता फक्त घराची मजबूत बनावट कशी होईल ते शोधून पहायचं राहिलं आहे असं समजावं.”

मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“खरं सांगू का,माझा प्रामाणिक विचार असा आहे की कधीकधी असं वाटतं लेखन करणं हे काही येर्‍यागबाळ्याचं काम नाही. कदाचीत मला लेखनाची पुन्हा सुरवात करावी लागणार आहे,पण अगदी सुरवातीपासून नाही.कुठेतरी मधेच चालू करावं लागेल,की जीथे खरा अर्थ प्रकट होईल.सगळं जुळून आल्यासारखं वाटायला लागेल. सरतेशेवाटी अखेरच्या हस्तलेखात दिसावेत तेव्हड्याच शब्दांची काटछाट झालेली असणार.”

“लेखन करण्यासारखं असं दुसरं कुठलं काम असावं?”
अ्सा प्रश्न मी प्रो.देसायांना केला.
ते लागलीच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मलाच प्रश्न विचारून देऊं लागले.
“एखाद्या पेटीवादकाकडून गाण्यातले एखाददुसरे स्वर गाळून पुर्ण गाण्याची अपेक्षा करता येईल काय?
एखाद्या सुताराकडून कुंडा-कचर्‍याच्या टोपल्या न भरता घर बांधून घेता येईल काय.?
झगडा-बखेडा न होता एखादं लग्न निरंतर सुखात राहिल असं म्हणता येईल का?”
पंचवीस पैशाचं नाणं कानात अडकवलेल्या त्या गोष्टीतल्या माणसाच्या भुमिकेला आठवून तुमची स्मरणशक्ती उभारून आली त्या स्मरणशक्तीवर तुम्ही भरवंसा ठेवला.मला वाटतं जशी गोष्टीला सुरवात झाली तसाच तीचा शेवट होणार.”

“गोष्ट पूर्ण झाल्यावर तुमचं मत मला द्या “
असं म्हणून आम्ही चर्चा थांबवली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 7, 2010

हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला

“आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.”

एकदा माझ्या पुतण्याची सहा वर्षाची मुलगी खेळता खेळता चक्कर येऊन पडली.त्यातून थोडीशी सावध झालेली पाहून त्याने तीला जवळच्या क्लिनीकमधे डॉक्टरच्या देखरेखीखाली ठेवली होती.तीला पहाण्यासाठी मी पुतण्याबरोबर त्या क्लिनीकमधे गेलो होतो.
तीला तपासत असलेला डॉक्टर माझ्या ओळखीचा निघाला.डॉ.अशोक गोखले.गोखले क्लिनीकचं उदघाटन त्याच्या वडीलांनी केलं होतं.त्याचे वडील माझ्या ओळखीचे होते.

मला पाहून त्याला आनंद झाला.नंतर तो मला त्याच्या कॅबिनमधे घेऊन गेला.त्याच्या बैठकीच्या खूर्चीच्या मागे भिंतीवर एक सुंदर हस्तचित्र टांगलेलं होतं.चित्र मला आवडलं.निरखून पाहिल्यावर चित्राच्या खाली डॉक्टर अशोक अशी सही होती.
अशोक नुसता डॉक्टर नव्हता,चांगला चित्रकारही होता हे पाहून मला त्याचं कौतूक वाटलं.
चित्रात एक मुलगी दाखवली होती.तीने डाळींबी रंगाचा झगा घातला होता.वय असेल तेरा-चवदा वर्षाचं.समुद्रकिनार्‍यावर पाण्यात असलेल्या एका होडीत ती एक पाय टाकतेय आणि दुसरा पाय पाण्यात होता. तीच्या हातात वल्हं होतं.आणि होडीचं पांढरं शीड वार्‍यावर फडफडत होतं.खरं तीचं वय वीस-पंचवीस होतं हे नंतर मला डॉक्टरकडून कळलं.चित्रात दिसायला लहान दिसत होती.

मी कुतूहल म्हणून अशोकला म्हणालो,
“तू चित्र फारच सुंदर काढलं आहेस.पण ही मुलगी कोण आणि त्याला काही पार्श्वकथा आहे काय?”
“हे चित्र पाहून मला सगळेच असं विचारतात.”
अशोक म्हणाला.
“सर्वांनाच मी त्या मुलीची कथा सांगत नाही.पण तुम्हाला सांगेन.पण एका अटीवर तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे.माझ्या बाबांनापण तुम्हाला बघून आनंद होईल.तुम्ही क्लिनीकमधे येऊन गेला असं सांगीतल्यावर ते मला नक्कीच तुम्हाला घरी बोलावलं का नाही म्हणून विचारणार. त्याशिवाय ह्या चित्राला जी कथा आहे ती दोन ओळीत सांगता येण्यासारखी नाही.”
माझं कुतूहल जास्त वाढवीत अशोक मला म्हणाल्याचं पाहून मी त्याला म्हणालो,
“तू डॉक्टर आहेस,चित्रकार आहेस,आणि मला वाटतं कथाकार पण आहेस.मी एक दिवस नक्कीच तुझ्या घरी येईन.पण ह्या चित्राची कथा मला सांगायला विसरू नकोस”

आणि एक दिवस मी त्याच्याकडे गेलो.मला पाहून त्याच्या वडलांना खूपच आनंद झाला.
विषय निघाल्यावर मला अशोक म्हणाला,
“मला वाटतं गोष्टी ऐकणं हे मनाला चांगलं औषध आहे.
मी माझ्या मुलांना रात्री झोपण्याच्यावेळी नियमीत एखादी गोष्ट सांगतो.आणि कधी कधी माझी नेहमीचीच आवडणारी गोष्ट पण सांगतो.गोष्टीचं नाव आहे,
“हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला”.
अशोकच्या घरात गेल्यावर भिंतीवर टांगलेली बरीच चित्र माझ्या नजरेतून सुटली नाहीत.बैठकीच्या खोलीत एक भलं मोठं चित्र मी पाहिलं.अशोक सांगत असलेली गोष्ट त्या चित्रात दृश्य म्हणून मला दिसली.

अशोक पुढे सांगू लागला,
“गोष्ट अशी आही की हरी हा एक अगदी विरळ केसाचं डोकं असलेला मुलगा एका मोठया कागदावर चित्र काढीत होता आणि कुंचल्याने ते चित्र रंगवीत होता.अशी त्या गोष्टीची सुरवात आहे.आणि नंतर सर्व साधारण त्याच्या वयाची मुलं चित्र काढतात तसंच हरी चित्र काढायला लागतो. त्या चित्राच्या आधारे तो आपल्या जीवनाची गोष्ट तयार करतो . पहिल्यांदा तो एक मोठी रेषा काढतो. मग एक मोठं क्षीतीज काढतो.नंतर काढतो,एक चंद्र काळ्याभोर आकाशात.आणि मग एक जमीनीवर वळणावळणाची पायवाट काढतो जणू ती पायवाट म्हणजे त्याचा जीवनमार्गच आहे. ह्या मार्गावर तो
आपल्या जीवनात होणार्‍या सहासाच्या घटना दाखवण्याच्या प्रयत्नात असतो.नंतर तो एक मोठं अरण्य दाखवतो.आणि त्या अरण्यात इतर झाडांबरोबर एकच मोठं आंब्याचं झाड काढतो.
त्या आंब्याच्या झाडाच्या मुळा़शी एका मोठ्या सापाचं वारूळ काढतो.त्या वारूळात रहाणारा साप त्या झाडावर लागलेल्या रसबाळ आंब्यांचं संरक्षण करण्यासाठी असतो.पण एव्हडं काढून झाल्यावर हरीला स्वतःलाच त्या सापाबद्दल अचंबा वाटतो.तो स्वतःच त्या सापापासून एव्हडा भयभीत होतो की तो पुढे सापाबद्दलची गोष्ट लिहिण्यापासून माघार घेतो.त्याचा त्या थरथरणार्‍या हातामुळे जांभळ्या रंगाची ती कागदावरची रेष वाकडी-तीकडी काढली जाते.

आणि हे त्याला कळण्यापूर्वीच त्याचं ते जीवनाचं कथानक एका संकट-स्थितिला पोहचलेलं असतं असं त्याला भासतं.तो एकाएकी पुढे समुद्र दाखवून स्वतः त्या समुद्रात बुडत्या स्थितित आहे अशी कल्पना करतो.पुढे हरीची गोष्ट पुन्हा त्याला विस्मयीत करते.त्याला त्यावेळी हवं तेच त्याच्या डोक्यात येतं.स्वतःला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी एक सुंदरशी होडी काढून ती घेऊन तो किनार्‍याला जाण्याच्या मार्गाला लागतो.
ही गोष्ट ऐकायला माझ्या मुलांना आवडतं.म्हणून नंतर मी त्याचं एक चित्रच काढून लावलं आहे.चला तुम्हाला दाखवतो.”
असं म्हणून अशोक मला आतल्या बैठीकीच्या खोलीत घेऊन गेला.

अशोक पुढे म्हणाला,
हरीची ही गोष्ट मला संपदाची आठवण करून देते.”
“ही कोण संपदा?”
मी अशोकला विचारलं.
“तुम्ही माझ्या क्लिनीकमधे त्या चित्रात पाहिली ती संपदा.”
असं सांगून अशोक पुढे म्हणाला,
“त्याचं असं झालं की मी माझ्या क्लिनीकचं नुकतंच उध्गाटन केलं होतं.एक दिवशी रस्त्यावरच्या एका कचर्‍याच्या पेटीजवळ एका सफेद कपड्यात गुंडाळून टाकून दिलेलं मुल आमच्या क्लिनीकची आया माझ्या जवळ आणून देते.ती मुलगी असते.ते निष्पाप मुल पाहून मला त्याची दया येते.मी त्या मुलीला ठेवून घेतो.एक संपत्तिच सापडली असं समजून मी त्या मुलीचं नाव संपदा ठेवतो.

संपदा नंतर वयाने जरी मोठी झाली होती तरी दिसायला ती एखाद्या पोरकट मुली सारखी दिसायची.ती हळू हळू शाळेत ही जाऊ लागली. ती वाढत असताना माझ्या लक्षात आलं की तीला जन्मतःच एक रोग झाला होता.त्या रोगामुळे तीची वाढच खुंटली होती.त्यामुळे ती सदासर्वकाळ खुरटलेलीच दिसायची.पण संपदा तीचं हे जीवनाचं भावनेने भरलेलं सामान पाठीवर ठेऊन कधीच फिरत नव्हती.तीचा गोड आवाज आणि तीच्या बडबड करण्याच्या संवयीचा वापर करून स्वतःबद्दल तीने असं चित्र रेखाटलं होतं की तीच्या जीत्याजागत्या जगाला कशाची सीमाच नव्हती.कुणी जरी तीचं
बडबडणं ऐकायला कबूल झालं तर ती सर्व बोलून टाकून ऐकणार्‍याला प्रसन्न करायची. त्या बडबडीत तीची भावि-स्वप्न असायची.
कॉलेजबद्दल,करीयरबद्दल,लग्न आणि नंतर मुलांबद्दलची तीची स्वप्न असायची.”

मला अशोकच्या संपदाबद्दलच्या माहितीचा आणि चित्रातली संपदा आणि होडीचा काय संबंध असावा ह्याचं कोडं पडलं.
मी म्हणालो,
“तीला कोणा कोळ्याने कचर्‍याच्या डब्याजवळ टाकून तो निघून गेला का?”
माझ्या प्रश्नाचं अशोकला हसूं आलं.
मला म्हणाला,
“असंच एक दिवशी,मी माझा स्टेथॅस्कोप माझ्या कानावरून दूर करून खरंच तीच्याकडून ऐकायला सुरवात केली. संपदाला तपासण्यासाठी, किंवा तीच्या प्रकृतीचं निदान करण्यासाठी नव्हे तर नुसतं तीच्याजवळ बसण्यासाठी, तीच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी.
तीचं जीवन बघून मला हरीच्या गोष्टीची आठवण येऊ लागली.
हरीने काढलेल्या गोष्टीतल्या सापासारख्या नित्यनियमाने भयंकर, अतिक्रुर सापांशी संपदा सामना करीत होती. आजाराशी,दुःखाशी,भेदभावाशी ती सामना करीत होती.

तीला माहित होतं की एक दिवस तीचा अंत होणार आहे.तो दिवस फार दूर नव्हता.परंतु,ह्याशिवाय आणखी काहीतरी तीला माहित होतं.आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.
ते अरण्य आणि त्यातलं ते एकच एक आंब्याचं झाड असलेल्या कहाणी पुरतं आयुष्य मर्यादीत नसतं.नव्हेतर,अशी जीवनाची कहाणी की ज्यात तीच्या जीवनाचा अनुभव ऐकण्यासाठी अन्य कुणीही भाग घेत असताना तीला होत असलेल्या यातनांची साक्ष म्हणून ते आयुष्य हजर असतं.
तीची जीवन कहाणी डॉक्टरना,शिक्षकाना,मित्राना संपदा सांगत असताना ती नुसती त्या रोगाने जर्जरलेली व्यक्ती, अशी दृष्टोप्तीत न येता उलट ती अशी व्यक्ती दिसायची की जीला अपेक्षा आहेत, स्वप्नं आहेत आणि इच्छाही आहेत.
आपली कहाणी सांगण्याची तीची क्षमता ही त्या समुद्रातल्या होडी सारखी होती त्या होडीच्या सहाय्याने ती निराशेच्या समुद्रात न डुबता किनार्‍याला येऊ शकली.

ती गेल्याचं मला कळल्यानंतर मी खूपच दुःखी झालो.तीलाच माझ्या कल्पनेत आणून ते चित्र मी तयार केलं.त्या होडीत ती चढली आहे आणि त्या होडीचं वल्हं म्हणजे तीची आशा आणि त्या होडीचं शीड म्हणजे तीचं स्वप्न असं मी त्यात रेखाटलं आहे.”

संपदाबद्दल ऐकून मला खूपच गहिवरून आलं.मी अशोकला म्हणालो,
“रात्री झोपताना सांगीतल्या जाणार्‍या गोष्टी सारख्या ह्या जीवनाच्या गोष्टी साध्या आणि दिलासा देणार्‍या असू शकतील किंवा कदाचीत खिचकट,भ्रामक आणि भयभीत करणार्‍या पण असू शकतील.पण मला वाटतं असल्या कसल्याही प्रकारच्या कहाण्या ऐकण्याची क्रियाच व्याधी मधून बरं होण्याचा महत्वाचा उपाय असू शकतो.”

माझ्याशी सहमत होत,अशोक मला म्हणाला,
“तसंच “हरी आणि त्याचा कुंचला” ह्या कहाणीशी तुलना करताना मला वाटतं त्या कहाणीतल्या क्षीतीजा प्रमाणे औषधाचं नवीन क्षीतज तयार करून त्या क्षीताजा पर्यंत शीतल चंद्राच्या चांदण्याखालून चालत जाण्यासाठी चित्रातल्या रेषेसारखा दोघानी मिळून तयार केलेल्या जीवनाचा मार्गाचा उपयोग डॉक्टर आणि आजारीमाणूस करतील.”
एका सर्वपल्ली माणसाबरोबर माझा वेळ मजेत गेला.आणि मी त्रुप्त झालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 5, 2010

ती सुखद स्वप्नें बालपणाची

अनुवाद.(गुजरा जमाना बचपन का….)

आठव आली फिरूनी मला
लोपलेल्या आततायी बालपणाची
हाय! एकली मला सोडूनी गेली
ती वेळ निक्षूनी परतण्याची

ते खेळ ते संवगडी अन झुले
पळत जाऊनी म्हणती ते शीवले
विसर पडेना त्या दिवसांची
ती सुखद स्वप्नें बालपणाची

सर्वां नसे जाण त्या बालपणाची
नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची
नसे तेव्हडी सुलभ असे महाकठीण
बालपणाच्या प्रीतिला विसरण्याची

मिळूनी रडावे अन फिरूनी आठवावे
लोपलेल्या त्या दिवसाना
भेटेल् का वाटेत कुणी ओळखीचा
तो मित्र जुना माझ्या बालपणाचा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 3, 2010

मोटरबाईक

“तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, आणि इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.”

मोटरबाईक चालवणं मोठं धाडसाचं असतं.छातीवर हात ठेऊन कुणी सांगेल का की आतापर्यंत मला लहान किंवा मोठा अपघात झालाच नाही.कदाचीत शंभरात एखादा असं सांगणारा असेलही.पण सांगण्याचा मतीतार्थ असा की दोन चाकावर तोल सांभाळून चालवण्याचं हे वहान असल्याने अपघात होण्याची जास्त प्रवृत्ती असते हे अगदी उघडच आहे. आणि भर रस्त्यावर आणखी वहानं धावत असल्याने आपली चुकी नसतानाही दुसर्‍याच्या चुकीमुळे ह्या वहानाची जास्त नुकसानी होण्याचा संभव असतो हे नक्कीच.आणि ह्या वहानाच्या चालकाला तसं कसलंच संरक्षण नसतं.
तरूण वयात हे वाहन चालवण्याचा नुसता विचार जरी मनात आला तरी बरेच वेळा घरातून आक्षेप येतो तो आईचा.
“काय हवं ते कर पण हे वहान नको चालवूस बाबा!”
असं जनात नसलं तरी मनात म्हणणारी हमखास व्यक्ती म्हणजे आईच.
त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी.नवर्‍याच्या प्रेमाव्यतिरीक्त तीला तीच्या भवितव्याची सुद्धा काळजी असणं स्वाभाविक आहे.

मला आठवतं,अनंत करंदीकर अगदी तरूण वयापासून मोटरबाईक चालवायचा.कसं तरी त्याने आपल्या आईला पटवून दिलं होतं की तू एव्हडी काळजी करू नकोस.मी संभाळून हे वहान चालवीन.एव्हडे लोक मोटरबाईक चालवतात असं घाबरून कसं चालेल.?वगैरे वगैरे.
नंतर अनंताचं लग्न झालं.त्याच्या पत्नीने पण आईचा सल्ला पुढे सारला.तीला ही त्याने समजूतीने सांगीतलं.आणि पटवलं.
पण “होणारे न चुके” म्हणतात ना तशातला प्रकार झाला.एकदा अनंता कुर्ला-अंधेरी रस्त्यावरून येत असताना त्याला अपघात झाला.आणि त्यात तो दगावला.त्याचा मुलगा अविनाश त्यावेळी दोन वर्षाचा होता.

हल्लीच मी एका बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा असताना अविनाशने आपली गाडी थांबवून मला गाडीत बसायला सांगीतलं.मला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा त्याचा विचार होता,पण मी नंतर येईन म्हणून त्याला सांगीतलं.आणि मला त्याने स्टेशनजवळ सोडलं.
नंतर खूप दिवस निघून गेले.एके दिवशी अविनाश माझ्या घरी येऊन त्याच्या मुलीच्या सोळाव्या वाढदिवशी मला आमंत्रण द्यायला आला होता.
मी त्यादिवशी त्याच्या घरी गेलो होतो.रात्री त्याच्याबरोबर गप्पा करीत बसलो होतो.त्याच्या वडीलांचा विषय निघाला.
मला म्हणाला,
“खरं म्हणजे हा अपघात, अपघात म्हणून वर्गीकृत होऊंच नये.
एक माणूस दारू पिऊन जाणून बुजून गाडी चालवायला जातो आणि दारूच्या नशेत असल्याने रस्त्यावरची आपली बाजू सांभाळू शकत नाही आणि सरळ सरळ माझ्या बाबांवर -जेव्हा ते मोटरसायकल चालवीत होते तेव्हा- त्यांच्या अंगावर गाडी घालतो.गाडीची आणि मोटरसायकलची बरोबरी कशी व्हायची?तीचा चक्काचूर होऊन माझे बाबा जागच्या जागी प्राण सोडतात.”

मी अविनाशला म्हणालो,
“मला सर्व आठवतं.तू त्यावेळी अवघ्या दोन वर्षाचा होतास.तुझ्या आईवर आणि आजीवर काय गुजरलं होतं ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे.”
मला म्हणाला,
“त्या रात्री झालेली ही घटना समजून घेण्याच्या वयात जेव्हा मी आलो त्यानंतर ज्या माणसाने मि.अनंत करंदीकर यांचा जीव घेतला त्या माणसाचा मी द्वेष करूं लागलो. ते वडील होते, पती होते आणि मुलगा होते त्याशिवाय बर्‍याच लोकांचे ते विशेष होते.
द्वेष,तीटकार हे जरा जास्त तिखट शब्द आहेत.पण हेच शब्द माझ्या मनात येतात जेव्हा, त्याने जे माझ्या बाबाना केलं त्याची आठवण येऊन माझं मन उद्विग्न होतं तेव्हा.
तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.”

“खरं आहे तुझं.ज्याला लागतं त्याला कळतं.पण तरीही मी म्हणेन त्याचा आता विसर पाडून घेतलं पाहिजे.मला सांगायला सोपं आहे.पण अशा माणसाला क्षमा करण्य़ापलिकडे आपण काय करू शकणार?”
असं मी त्याला सांगून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होतो.

मला अविनाश म्हणाला,
“क्षमेवर माझा विश्वास आहे,पण एक साधा प्रश्न माझ्या मनात येतो.मी ज्याला ओळखतच नाही त्या माणसाचा मी तीटकार तरी कसा करू? आणि अशा माणसाला मी क्षमा तरी कशी करू की ज्याला मी ओळखतच नाही.वेळो वेळी हा प्रश्न मी मलाच विचारत असतो.
खरं म्हणजे हे दिवस आनंदाचे मानले पाहिजेत परंतु ते आनंदाचे क्षण अप्रिय काळ्याकुट्ट ढगानी विभूषित केले जात होते.ह्या सार्‍या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या मनाला एव्हडं दुःख होतं की माझ्या बाबांच्या गोष्टी आणि त्यांच्या चित्रांची माहिती मला माझ्या नातेवाईकांकडून ऐकावी लागते.
माझ्या झालेल्या नुकसानीचा विचार येऊन बेचैन होऊन त्या माणसाबद्दल विचार करायला बसल्यावर असं वाटतं काय होत असेल त्याला?”

“कुणा दुसर्‍याचं जीवन उध्वस्त करणं हा विचार सुद्धा मला भयंकर वाटतो. त्याच्या उरलेल्या आयुष्यात तो भोगत असलेली सजा ही तुझ्या त्याच्या विषयीच्या तीटकार्‍या पेक्षा दामदुप्पटीने जास्तच असणार. एका अर्थी असा विचार केल्याने हा विचार मला एक आशेचा किरण दाखवतो.अशी आशा की ज्या माणसाला तू केव्हाही पाहिलेलं नाही असं असून सुद्धा तुझ्याकडून त्या माणसाला क्षमा केली जावी. असा माणूस की ज्याने तुझ्या आठवणी ज्या तू जमवून ठेवल्या असत्यास त्या आठवणीच तुझ्याकडून त्याने चोराव्या.”
अविनाशला शांत करण्यासाठी मी त्याला समजावून सांगण्याचा एक प्रयत्न केला.

“काका,तुमचं म्हणणं मला पटतं.कधी तरी एक दिवस ह्या माणसाला क्षमा करून मी एव्हडे दिवस माझ्या खांद्यावर वाहिलेलं त्याच्याबद्दलच्या तीरस्काराचं ओझं उतरून ठेवीन.त्यामुळे आता मला असा विश्वास करायला हरकत नाही की वेळ आली की सर्व विचार सोडून देऊन त्या माणसाला फक्त क्षमा करावी.म्हणूनच मी क्षमा करण्यावर विश्वास ठेवायला लागलो आहे.जरी अजून ती वेळ आली नाही तरी ती लवकरच येईल असा माझा दृढविश्वास आहे.”
अविनाश सद्नदीत होऊन मला म्हणाला.
अविनाशचा हा दृढविश्वास पाहून मला ही बरं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 1, 2010

रात्र संभ्रमात पडली

अनुवाद. (आज तुमसे दूर हो कर….)

दूर जाऊनी तुझ्यापासूनी
प्रितीने आंसवे ढाळली
चंद्र रडला साथ देऊनी
रात्र संभ्रमात पडली

तुलाच तू घातलीस बंधने
अन मलाच माझी अटकळ
जर वैर साधले नशिबाने
तर साथ देईल कशी वेळ

दूर राहूनी खूशीपासूनी
मनोकामना अंतरली
अर्थच नसे ह्या जीवनी
जगण्याची उमेद संपली

भाग्यावरती ठेवूनी विश्वास
करीतो जगण्याची अपेक्षा
कधी वाटे घेईन शेवटचा श्वास
तसे करू देईना तुझी प्रतिक्षा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com