Tuesday, August 14, 2012

पुढील कार्यक्रम थोड्या विश्रांती नंतर




मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी.डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 6, 2012

समस्या,समस्या आणि समस्या





"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं आणि वरदान केव्हा ठरतं."


"हे काय चाललं आहे?"
वृद्धांची ससेहोलपट व्हायला काय काय कारणं असावीत? असा विचार येऊन माझं मन खुपच चलबिचल व्हायला लागलं.
आणि मग मनात येईल ते लिहीत गेलो.

वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असणं स्वाभाविक आहे.
काहीना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं तर काहीना ते  शाप वाटतं.
ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.

ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.
ह्याचं मुख्य कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

पण हळू हळू वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत सर्व गोष्टीत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.

काहीना तर,
"इतक्या लवकर घरी कसे परत आला?"
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना कसा दोष देता येईल?
घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.


तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.हे खरं आहे.

कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात  याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्या व्यक्तीना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
जेष्टानी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.

त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
"कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या."
"घरात शांततेने रहा"
अशा वृद्धाना,
"तोंड बांधून बुक्याचा मार "
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
"परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?" असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?


"तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?"
असा प्रश्न विचारल्यावर कळतं की,काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडीलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.

आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडीलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.

म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडील अडचणीचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडीलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडीलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.
त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.


काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात  हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वप्नं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडीलांशी तुटकपणे वागतात. याचं मरण:प्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर  काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून  वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.


पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.
अशावेळी मनात येतं,
 "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."


एका अविवाहीत व्यक्तीने आपला विचार सांगीतला,
"व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर या बाबतीत तरी मी सुखी आहे! लग्न न करून मुलंबाळं विचारतील की नाही, मान देतील की नाही ही भानगडच आपण ठेवली नाही! आम्हाला आमच्या वृद्धापकाळात  त्या मुलासुनांचं प्रेमही नको आणि त्यांचा तिरस्कार -हेटाळणीही नको!  दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुष्य असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!

आमचा बुढापा हा एकट्याचाच असेल, अकेला असेल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु निदान मुलानातवंडांचे पाश तर नसतील! मुलं विचारतील की नाही? सूनबाई आदर ठेवेल की नाही? नातवंड खिल्ली तर उडवणार नाहीत ना? असल्या नसत्या चिंता मागे लागणार नाहीत! नकोच ते सांसरिक पाश!
एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन!
उद्या हातपाय थकले तर एखाद्या स्टार-वृद्धाश्रमात जाऊन नक्कीच राहीन. तिथे पैसा फेको तमाशा देखो असा सिंपल मामला असतो!
स्वत:च्याच घरी वृद्धाश्रमात ठेवल्यागत रहायचं किंवा मुलाबाळांनी उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं!"


प्रो.देसायाना ज्यावेळी ह्या विषयाबद्दल मी बोललो तेव्हा ते मला म्हणाले,
"ह्याच विषयावर माझ्या एका मित्राशी माझी चर्चा झाली.त्याने चिंतन करून,खोल विचार करून अतिशय मार्मिकतेने जे मला सांगीतलं ते मी तुम्हाला

थोडक्यात सांगतो.
वृद्धापकाळातील सुख दु:खाची मुळं तारुण्यात असतात. मुलांवर विसंबून राहायचे दिवस कधीच संपले. बाहेरील जगातील वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढती आत्मकेंद्रित वृत्ती पाहता प्रत्येकाने वृद्धापकाळातील आर्थिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार आणि तजविज तरूणपणातच करायला सुरुवात केली पाहीजे.


आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. ह्या वानप्रस्थाश्रमात संसारात राहून संसारातून मन काढून घेण्यास सांगितले आहे. हे वाचायला सोपे वाटले तरी आचरणात आणणे कठीण असते. ह्याला कारण जसे स्त्री लग्न झाल्या पासून स्वयंपाकघर हाताळत असते. संपूर्ण घरात तिचा वावर आणि हुकुमत असते. हेच म्हातारी झाल्यावर सुन आल्यामुळे तीच्या हाती सर्व ताबा द्यावा लागतो आणि स्वतःला दुय्यम स्थानावर उतरावे लागते. हे 'डाऊन साईझींग' स्वीकारणं कठीण जातं. जिथे हुकूम सोडायची (चांगल्या अर्थाने), मार्गदर्शन करण्याची सवय लागलेली असते तिथे हुकूम ऐकण्याची (चांगल्या अर्थाने) आणि मार्गदर्शन स्विकारण्याची वेळ येते. इथे सासू सूनेत खटके उडायला सुरूवात होते. म्हातारपणात सुख कमी आणि दु:ख जास्त अशी परिस्थिती येते. गमतीने असे म्हणतात की 'सासू' म्हनजे 'सारख्या सूचना' आणि 'सुन' म्हणजे 'सुचना नकोत'.


जी स्थिती स्त्रीयांची तिच स्थिती पुरुषांची. आजवरच्या आयुष्यात संपूर्ण घर त्यांच्या भोवती नाचत असतं. घरात काय हवं, काय नको, घर कसं सजवावे वगैरे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार होत असतात.स्वतः कमवत असल्याने 'स्वेच्छेने' खर्च करण्याची मुभा असते. निवृत्ती नंतर मुलगा नोकरीत स्थिरावलेला असतो. हळूहळू तो 'कर्ता' पुरूष होत असतो. नव्या जमान्याच्या नव्या कल्पना त्याला सत्यात उतरवायच्या असतात. हाती पैसा असतो.

(कित्येकदा मागिल पिढीच्या तुलनेत कितीतरी अधिक). नविन काळाची गरज अणि भरपूर पैसा हाताशी असल्यामुळे लॉ ऑफ मार्जिनल युटीलीटीच्या नियमानुसार तो मुक्त हस्ते खर्च करीत असतो. जे मागील पिढीला उधळणे वाटते. आपण इतक्या काटकसरीत संसार केला पण मुलांवर त्याचा व्हावा तसा परिणाम, संस्कार झाला नाही अशी वैफल्यपूर्ण भावना ज्येष्ठांच्या मनात घर करू लागते. तसेच आता घरात आपले काही चालत नाही. सगळे निर्णय मुलगा घेतो. (आणि त्याची आई त्याला साथ देतेय, हे दुसरे दु:ख) आपली पत्नीही आपल्या सोबत नाही, तिलाही आपल्याबाबतीत सहानुभूती वाटत नाही असे एकांगी विचार मनात घोळायला लागतात. एकेकाळचा कर्ता, कर्तबगार माणूस दुखावतो, कोषात जातो, विक्षिप्त वागायला लागतो.

लहान मुलं जशी स्वतःकडे मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात, हट्ट करतात, मस्ती करतात त्या प्रमाणे ती ज्येष्ठ व्यक्ती लहान सहान निर्णयात दखल देऊ लागते, न विचारता सल्ले देऊ लागते, स्वतःचे ज्येष्ठत्व इतरांवर ठसवू पाहते. ते इतरांना जाचक होते. संघर्ष, वादावादी सुरू होते. ज्येष्ठ दुखावतात एकटे पडू लागतात.


हे सर्व पूर्ण नाही तरी अंशतः टाळणे शक्य असते. आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी. ज्यातून स्थायी स्वरूपात काही मिळकत होत राहील अशी गुंतवणूक करावी. भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी. कारण वडीलांची आर्थिक गुंतवणूक माहित असेल तर कधी कधी मुले ती त्यांच्या किंवा घराच्या वाढत्या गरजांसाठी भावनिक दडपण आणून (आम्ही तुम्हाला सांभाळत नाही का? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?) मोडायला लावतात. सर्वच मुले असे वागतात असे नाही. पण अनेक दु:खी ज्येष्ठांची ही शोकांतिका आहे. तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.

दुसरी गोष्ट आहे मानसिक. इतकी वर्षे घर चालविल्या नंतर म्हातारपणी स्वखुषीने सुत्रे मुलांच्या हाती सुपूर्त करावीत. त्याना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ द्यावा. त्यांना त्यांचा 'संसार ' उभा करण्याचा आनंद मिळवू द्यावा. त्यांच्या चांगल्या निर्णयांचे तोंड भरून कौतुक करावे. त्यांनी विचारला तरच सल्ला द्यावा. चूका फार सौम्य करून दाखवून द्याव्यात. आता ते 'कर्ते' आहेत हे मनाने स्विकारावे. आपण एक
पाऊल मागे घ्यावे.

भावनिक पातळीवर, 'प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते' (मिळतेच असे नाही) हे तत्व अंगीकारावे. मुलांशी, नातवांशी प्रेमाने वागावे. म्हणजे आम्ही काय क्रुरतेने वागतो की काय? असे कोणी म्हणेल. पण प्रेम जे त्यांना समजेल, दिसेल, रुचेल ते असावे असे मला म्हणायचे आहे. पुरुष निवृत्त होतात पण बायकांना सहजासहजी निवृत्ती मिळत नाही. त्यांना ती मिळावी असा विचारही आपल्या मनात येत नाही आणि कित्येक केसेस मध्ये त्यांनाही ती नको असते. पण वयोमानानुसार त्यांचेही हातपाय थकतात. रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठीसूळपणा वाढीस लागतो. घरातील माणसे संखेने वाढलेली असतात. शारिरीक काम वाढलेले असते. म्हणजे एकीकडे ताकद कमी झालेली असते तर दूसरीकडे श्रम वाढत असतात. पत्नी आता आपले न ऐकता मुलाचे ऐकते ही भावना पतीच्या खुळ्या मनात घर करत असते त्यामुळे एकीकडे कुरकुरणारा पती आणि दूसरीकडे 'डिमांडींग' तरून पिढी ह्या चरकात ती बिचारी पिळून निघते. अश वेळी पुरुषाने तिला घरकामात शारिरीक मदत करावी. तिने आपल्याशी कसे वागावे ह्याच्या अपेक्षा न ठेवता आपण तिच्याशी चांगलेच वागावे, बोलावे. तिच्या कामाचा भार कमी करावा. वाटून घ्यावा. कमी कमी होऊ पाहणारा 'संवाद' चालू ठेवावा. तिची होणारी ससेहोलपट समजून घ्यावी. ती कमी करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तिला, मुलांना भावनिक आधार द्यावा तुम्हाला तो आपोआप मिळत जातो.

मोकळा वेळ कसा वापरावा, हा एक मोठा प्रश्न असतो. मानसोपचार तज्ञांशी, फॅमिली डॉक्टरांची विचारविनिमय करून शारिरीक व्यायामासाठी पोषक अशा हालचाली होतील असे पाहावे. समविचारी (रडणारे, कुढणारे नाही) मित्र जमवावेत. वाचन करावे, थोडेफार आध्यात्मिक वाचन करण्यासही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. आयुष्यभर नोकरीच्या/व्यवसयाच्या धबडक्यात न जमलेल्या हौशी (वयानुरुप) भागवाव्यात. निसर्गाला वाचावे, जाणून घ्यावे. म्हातारपणी बागकाम 'निर्मिती आनंद' मिळवून देतो. नातवंडांमध्ये आपले बालपण शोधावे. आपल्या मनःस्वास्थासाठीही हे चांगले असते. दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती 'दुसर्‍यांची' मुलं आहेत हे विसरू नये. 'त्यांच्या' इच्छेचा मान राखून नातवंडांवर संस्कार करावेत. नातवंडांसमोर आपल्या मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे दुर्गुण उगाळू नये.

मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये. त्यांच्या मानसिक अवस्था जाणून घेऊन निर्माण होणारे गुंते अतिशय हळूवार हाताने सोडवावे. थोडेफार त्यांच्या कलाने घ्यावे, थोडेफार आपले घोडे दामटावे. म्हातारपणी आई-वडीलांच्या अपेक्षा असतात मुलांनी त्यांना 'वेळ' द्यावा. वेळ द्यावा म्हणजे नुसता तास आणि मिनिटात मोजता येईल असा नाही. एकत्रित कुटुंबाचा आनंद मिळवून देईल असा वेळ द्यावा. त्या वेळात आई-वडीलांच्या इच्छा आग्रहपुर्वक पूर्ण कराव्यात. त्यांच्या इच्छेनुसार कार्यक्रम आखावेत. त्यांना अतिश्रम होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. त्यांची शारीरिक, भावनिक सेवा करावी. हे कायम करावे लागत नाही पण महिन्यातून एकदा किंवा दोन तिन महिन्यातून एकदा जमवून आणले तरी चालते. ज्येष्ठांना आपल्याला अडगळीत टाकलेले नाही, आपल्याला स्वयंपाकीण बाई किवा मुलांना साभाळणारी आया म्हणून वागविले जात नाही तर आपले ही ह्या कुटुंबात काही स्थान आहे. मुलं आपल्याला प्रेमाने वागवताहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यांना जगायला नवा हुरूप मिळतो. दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे 'शब्द' हे शस्त्र आहे.

सांभाळून वापरावे. संतापाच्या भरात तत्क्षणी प्रतिक्रिया व्यक्त करण्या ऐवजी शांत झाल्यावर हळू शब्दात, शब्दांची चांगली निवड करून आपली भूमिका संमजावून सांगावी.

अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 31, 2012

"मी ही अशी"




"गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?"


दादर पश्चिमेला भवानी शंकर रोडवर इंदारा निवास ह्या बिल्डींगमधे आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो.तळमजल्यावर म्हणजे आमच्या खालीच देसाई कुटूंब रहायचं.देसायाना पाच मुलगे आणि एक मुलगी होती.मुलगी शेवटचीच म्हणून तिचं नाव सरला ठवलं होतं.
सरला शेंडेफळ असल्याने फारच लाडात वाढली होती.तिचे आईबाबा तिचे भरपूर लाड करायचेच त्याशिवाय पाच भावांना एकुलती बहिण म्हणून तेही तिचे लाड करायचे.त्यामुळे सरला खूपच लाडावून गेली होती.



पण भावंडात कधीतरी खटके उडायचे.मग क्वचित सरलावरपण राग काढला जायचा.सरला खूप बापुर्वाणी व्हायची.आमच्या सारख्या बाहेरून आलेल्याने चौकशी केली की म्हणायची,
"मी ही अशी"
आणि मग आपल्यावर कसा अन्याय होत आहे ते सांगायची.
म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा असायचा की,ह्या पाच भावांबरोबर राहून दिवस काढणं तितकं सोपं नाही.एखादा भाऊ म्हणायचा,
"तुझे खूपच लाड केले जात आहेत म्हणून तू अशी झाली आहेस"
कुणी म्हणायचा,
"तुझ्या जिभेला हाड नाही.वाट्टेलते बोलतेस"
वगैरे वगैरे.


मला तिच्या भावांचीपण कीव यायची.एकटी लाडावलेली बहिण असणं ही त्यांची एक व्यथाच झाली होती.
तिचं हे सगळं वागणं आणि अबलता बघून,आणि तिच्या भावांची व्यथा लक्षात येऊन, मला बत्तीस दातामधली एक जिभ आठवली.आणि कविता सुचली ती अशी,



दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांना
मी अशी (बिचारी) एकटी असून  
बत्तीस भावांमधे कशी राहू रुसून


मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले इकडे तिकडे
दात करतात माझा चोळामोळा
कुणी विचारले काय झाले
तर सांगतात सर्व जीभ चावून


ऐकून हे जिभलीचे संभाषण
दात म्हणती लगेचच तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला


बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
धमकी देती लोक वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Wednesday, July 25, 2012

एकदां काय जहालें!




स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:


तो रविवारचा दिवस होता.प्रमोद,त्याची पत्नी आणि मुलं माझ्याकडे जेवायला आली होती.माझ्या पत्नीने सुकं मटण,वडे ताज्या सोलांची कडी आणि भात असा जेवणाचा बेत केला होता.जेऊन झाल्यावर दुपारी थोडी डुलकी काढून झाल्यावर जुहू चौपाटीवर जायचा विचार केला.माझी पत्नी काही आली 
नाही.
"मी आवराआवर करीन तुम्हीच जाऊन या"
असं मला म्हणाली.


इतर आम्ही चौपाटीवर गेलो.सुर्यास्त बघून झाल्यावर प्रमोद आणि मंडळी घरी जायला निघाली.मी बराच वेळ वाळूत पडून होतो.सुर्यास्त झाल्यानंतर आणखी थोडावेळ बसायला मला आवडतं.
विशेषतः सूर्य पुरा समुद्रात डुबून गेल्यावर आकाशात दि़सणारे ते पिवळे-लाल रंग बघायला मला मजा येते.
वाळूवर थोडा लेटून हा प्रसंग मी पहात होतो.तासाच बसून होतो.काळोख केव्हा झाला ते कळलंच नाही.सूर्यास्ताकडे पाहून मनात विचार आला,
"हे काय चाललं आहे?"


सूर्य,पृथ्वी,पहाट,सकाळ,दुपार,दिवस,संध्याकाळ,रात्र,काळोख वगैरे अखिंडीतपणे चालू आहे.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची बाकी ही सर्व मुलं आहेत आणि ह्या कुटूंबाचा संसार असाच अखंडितपणे चालू आहे अशीही कल्पना मनात आली.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची पाच मुली आणि दोन मुलगे,दिवस आणि काळोख,अशी कल्पना मनात येऊ लागली.


घरी गेल्यावर तसाच कागद पेन्सिल घेऊन कविता उतरून काढली.दुपारी यथेच्छ जेवल्यावर आम्ही रात्री जेवत नाही.एक एक कप कॉफी पिऊन आम्ही झोपायला गेलो.
सकाळी उठल्यावर चहा घेताना मी माझी कविता पत्नीला वाचून दाखवली.


"कसं हे तुम्हाला सुचतं?"
नेहमी प्रमाणे माझ्या पत्नीने मला प्रश्न केला.
ह्यावेळी मी तिचा प्रश्न ऐकून फक्त हसलो.
माझ्या हसण्याचा अर्थ तिला समजला असावा.
दोन्ही चहाचे रिकामे झालेले कप उचलून ती उठून गेली.
मी मात्र माझ्या मनात नेहमीचं उत्तर बोललो.
"अग! विचाराच्या प्रांगणात अक्कलेने केलेला शब्दांचा हा खेळ आहे दुसरं काय?"

कविता अशी होती.


कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबूजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहूनी सूर्याला


ऐ्कूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
नेम असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्त दिवसाचा


ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
श्रेय नको देऊं तू सूर्याला
नेम असे हा पण पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना


पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे "दिवस" संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना


स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 20, 2012

झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद.





"म्हणून म्हणतो नका घालूं वाद"


निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला अक्कल दिली आहे.प्रत्येक प्राणी आपल्या अक्कलेनुसार वागत असतो.आणि ते स्वाभाविक आहे.कदाचीत दुसर्‍याचं शिकून तो प्राणी आपल्या अक्कलेत भर घालील आणि मग ती घातलेली भर चांगली असेल किंवा वाईट.पण त्यानुसार तो आपल्या वागणूकीत फरक करील हे निश्चीत आहे.


माणूस ह्या प्राण्याला निसर्गाने जरा जास्तच अक्कल दिली आहे ह्यात शंका नाही.ह्या अक्कलेच्या देणगीमुळेच अनेक गोष्टी करता करता माणूस वाद घालायलाही शिकला.अर्थात प्रत्येकजण तो वाद आपल्या अक्कलेप्रमाणेच घालत असणार.ह्यावेळी मला प्रो.देसायांचे ते शब्द आठवतात.


ते म्हणायचे,
"अहो,सगळ्यांना सारखीच अक्कल असती तर सारेच ज्ञानेश्वर,शिवाजीमहाराज आणि स्वामी विवेकानंद झाले असते.ह्यावरून मला एक कविता सुचली.


म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना सोळाव्या वर्षी
तोरणा जिंकणे


संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
ऐकूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद


जसे वाढे एखाद्याचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला


म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 15, 2012

नियतीचा निर्णय





"योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती"

"ह्या धरतीवर बर्‍याच गोष्टींना दोन बाजू असतात.अगदी पृथ्वीपासून सुरवात केली तरी तिला उत्तर आणि दक्षीण धृव आहे.झाडांना शेंडा आणि मुळ आहे, काठीला दोन टोकं असतात अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.शेवटी,चांगलं प्रचलीत म्हणणं सांगायचं झाल्यास, वादालाही दोन बाजू असतात हे सांगता येईल."
शरद मला आपला मुद्दा समजावून सांगण्य़ाचा प्रयत्न करीत होता.
पुढे म्हणाला,
"कुणाही मध्यस्थ्याकडे जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडलीत आणि त्याचा निर्णय विचारलात तर तो पटकन सांगेल की दुसरी बाजू मला ऐकली पाहिजे."
मी शरदला म्हणालो,
"तुझं म्हणणं मला पटतं.एखाद्याने डोळ्यासमोर एखाद्याचा खून केला आणि न्यायाधीशाला सांगीतलं तरी न्यायाधीशपण म्हणतो तरीपण मला दुसरी बाजू ऐकली पाहिजे."

नंतर काही दिवसानी का कुणास ठाऊक शरदचं ते वाक्य दुसरी बाजू ऐकली पाहिजे माझ्या सारखं मनात घोळायला लागलं आणि मग कविता सुचली.ती अशी,

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीतोस मात्र नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, July 10, 2012

सत्तेची ही कसली खूमखूमी




मालती मला नेहमी म्हणायची की तिच्या नवर्‍याचं आणि तिच्या मोठ्या मुलाचं कधीच पटलं नाही.दुसरे दोन मुलगे त्यामानाने वडीलांशी पटवून घ्यायचे.न पटणार्‍या त्या दोघांमधे मालतीने कधीही हस्तक्षेप केला की तिच कुणा एकाला वाकडी व्हायची.
"बरोबर तू त्यांचीच बाजू घेणार.तुझा नवरा पडले ते."
असं उद्धव,तिचा मोठा मुलगा तिला म्हणायचा.
आणि मुलाची बाजू घेतली की
 "बरोबर आहे तो तुझ्या पोटचा गोळा. तू त्याचीच बाजू घेणार"
 असं मालतीचा नवरा तिला म्हणायचा.
"माझी मात्र कात्रीत सापडल्यासारखी परिस्थिती व्हायची"
मालती मला म्हणायची.


मी मालतीला समजुत घालण्यासाठी म्हणायचो,
"अग,दोन व्यक्तिमधली ते पिढीचं अंतर आहे ना? मग ते तसंच व्ह्यायचं.एकमेकाने एकमेकाला समजून घेतलं नाही की हा वाद व्हायचाच.आईची स्थिती निराळी असते.तिला तडजोड करून घ्यायची निसर्गाचीच देणगी असते.अपवाद सोडल्यास आता जे काय तू म्हणालीस तशा प्रकारच्या बर्‍याच  घरातल्या तक्रारी असतात."


ह्या गोष्टीला आता खूप दिवस होऊन गेले.ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा मला कुणीतरी सांगीतलं की मालती आणि तिचा नवरा कायमचे कोकणात रहायला आले आहेत.मालतीच्या नवर्‍याला परॅलिसीसचा आजार झाल्याने त्याला सतत कुणाचीतरी मदत लागायची.शहरात रहाण्यापेक्षा कोकणात कुणालातरी कामाला ठेवायला माणसं मिळतात.खर्चही कमी येतो.मुलांच्या आधाराने रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं कमी तापदायक आहे.असा विचार करून ती दोघं कोकणात येऊन राहिली. 


त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो.
मालती आपल्या उतार वयातल्या कर्मकथा सांगत होती.
मला म्हणाली,
"काय सांगू आमचे भोग आणि आमची कर्मदशा असं म्ह्टलं पाहिजे आणखी काय? उद्धवाकडून मानहानी शिवाय काहीच मिळत नव्हतं."


त्यांचा निरोप घेऊन घरी जाताना मी माझ्या मनात म्हणालो नवं सरकार येतं आणि सत्ता बदलते."
त्यातूनच मला एक कविता सुचली,

उद्धवा! अजब तुझे सरकार

उजाडूनी दिवस होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
वाटते त्याही पेक्षा ती रात्र बरी


उजळणी दिवसाची होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची


उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच असे तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 5, 2012

बघ उडुनी चालली रात




वामन मला म्हणाला,
"खरंच, जर का माणसाला उद्या काय होणार ते निश्चीतपणे कळलं असतं तर फारच हलकल्लोळ माजला असता.नीट विचार केला तर, निसर्गाने ही उद्याचं नकळण्याची कमतरता माणसाला दिली आहे, ती एक देणगीच म्हणावी लागेल."


"तुझ्याशी मी ह्यापेक्षा आणखी सहमत होऊच शकत नाही"
असं मी वामनला म्हणाल्यावर वामनला बरं वाटलं.


"आपण सगळे, जास्तकरून, दुःखीच झालो असतो असं मला वाटतं.कारण अख्या जीवनात दुःखच जास्त असतं.मग ते राजाचं जीवन असो वा रंकाचं असो.शिवाय अनर्थ घडले असते."
वामन मला असं म्हणाला.


आणि पुढे म्हणाला,
"आपलं भविष्य आपण हमखास बदलु शकलो असतो.नव्हे तर भविष्य ह्या शब्दाला अर्थच राहिला नसता.
"लग्नं स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर होतात"
 ह्या म्हणण्याला अर्थच राहिला नसता.
"ह्या जन्मी पुण्य केलंस तर पुढचा जन्म चांगला मिळेल"
 ह्याही म्हणण्याला अर्थ राहिला नसता.कारण पुण्यावर आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे पाप करण्यापासून दूर राहिले असते.त्यामुळे कदाचीत पापं कमी झाली असती.
"उद्याचं काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक?"
 असं कुणी म्हटलंच नसतं.कारण उद्याचं, परवाचं आणि सर्व पुढचं अगोदरच माहित असतं."
हे वामनचं म्हणणं ऐकल्यावर आज,काल आणि उद्या हे शब्द माझ्या मनात काहूर करू लागले.आणि शेवटी ही कविता सुचली.


कशाला उद्याची बात?

आज, कालचा उद्या असतो
आणि
आज, उद्याचा काल होतो
मग
उद्या जेव्हा आज होईल
आणि
आज त्याचा काल होईल
तेव्हा
त्या उद्याच्या उद्याला
आजचा उद्याच म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्या म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार आहे

म्हणून
"आता कशाला उद्याची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात"
ही कविता तिथल्या तिथे लिहून मी वामनला वाचून दाखवली.वामनला मतीतार्थ कळायला वेळ लागला नाही.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Friday, June 29, 2012

आई! थोर तुझे उपकार.





एकदा श्रीधर पानसरे आपल्या आईच्या वर्ष-श्राद्धासाठी अमेरिकेहून आला होता. मला आठवतं ज्यावेळी श्रीधर तरूण होता, त्या दिवसात अमेरिकेत जाण्याची तरूण मुलांत खूपच चूरस लागली होती.श्रीधरचे चुलत भाऊ बहिणी अमेरिकेत स्थाईक झाल्या होत्या.चार्टर्ड अंकौन्टची परिक्षा देऊन झाल्यावर अमेरिकेत जाऊन वॉलस्ट्रीटवर चांगला जॉब करण्याची श्रीधरची तीव्र इच्छा होती.कधी माझ्या घरी गप्पा मारायला आल्यावर बरेच वेळा मला हे तो बोलून दाखवायचा.मी म्हणायचो,
"जाशील रे तू कधी तरी.होप्स मात्र सोडू नकोस."
मला श्रीधर म्हणायचा,
"माझ्या बाबांचा मला अमेरिकेत जायला विरोध आहे.पण आई मात्र मला प्रोत्साहन देते.तिने आपले  सगळे दागिने विकून मला मदत करायचं एकदा बोलूनपण दाखवलं होतं."



श्रीधरच्या आईचं आणि बाबांचं कधी पटत नव्हतं.तसं पाहिलंत तर त्यांचा त्यावेळच्या युगातला प्रेमविवाह होता.
श्रीधर हा त्यांचा एकूलता मुलगा.त्याच्या जन्मानंतर त्यांचा संबंध विकोपाला गेला.श्रीधर आपल्या आजी-आजोबांकडे वाढला.तो वयात आल्यावर आपल्या आईवडीलांमधले बखेडे त्याला उघड दिसायचे.कंटाळला होता.अधुनमधून मला भेटल्यावर त्यांच्या कंपलेन्ट्स करायचा.



मी एकदा श्रीधरच्या आईकडे विषय काढला होता.तिचं श्रीधरवर खूपच प्रेम होतं.कुणा आईचं आपल्या मुलावर प्रेम नसणार?तिला वाटायचं इकडच्या कटकटीतून सुटून तो परदेशी गेल्यावर सुखी होईल.मला एकदा म्हणाली,
"श्रीधरसाठी मी खूप खस्ता काढला आहे.श्रीधरचं संगोपन नीट व्हावं म्हणून मला खूप दुःखं सोसावी लागली.मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूतीतून त्याची सुटका व्हावी म्हणून मी त्याच्याबद्दल नेहमीच विचारात असायची."



त्या भेटीनंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.श्रीधर अमेरिकेत स्थाईक झाला.एका श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटूंबातल्या मुलीशी त्याचं लग्न होऊन एक मुलगीपण झाली होती.त्याची सासू त्याच्या आईची मैत्रीण होती. श्रीधर एकदा आईला अमेरिकेत घेऊनही गेला होता.जास्त दिवस ती राहिली नाही. 

श्रीधरच्या बाबांच्या आजाराची बातमी ऐकून ती परत आली होती.काही दिवस सोडल्यानंतर श्रीधरचे आणि त्याच्या आईचे संबंध कमी झाले होते.
अधुनमधून तो आपल्या आईला फोन करायचा.बाबांशी त्याचा संवाद तुटला होता.नंतर बाबा गेल्याच्या वार्तेनंतर एकदा तो आपल्या आईला भेटून गेला होता.त्याच्या आईची आर्थीक परिस्थिती बरी होती.तिला पेन्शन मिळायची आणि त्यात तिचं भागायचं.



नंतर तिची प्रक्रुती बरीच खालावली.मी तिला कधीतरी घरी भेटून यायचो.मला म्हणाली होती,
"श्रीधरने माझ्यासाठी एक बाई ठेवली आहे.घरीच रहा म्हणून सांगतो.वृद्धाश्रमात जाऊ नये असं त्याला वाटतं.आठवड्यातून एकदा फोन करून माझी जाग घेतो."



मी कधीही तिला भेटायला गेलो की श्रीधरच्या लहानपणापासूनच्या गोष्टी रंगवून मला सांगायची.श्रीधरची आई एका विख्यात शिक्षण तज्ञाची मुलगी. आणि स्वतः एका शाळेतून व्हाईस प्रिन्सिपल होऊन निवृत्त झाली.तिचा स्वभाव गोष्टीवेल्हाळ असल्याने ती गोष्टी वर्णनकरून सांगायची ते ऐकायला मला मजा यायची.मी घरी गेल्यावर तिने सांगीतलेलं सर्व काही एका वहित लिहून ठेवायचो.हे संदर्भ वापरून एखादी कविता लिहायला मजा येईल असं वाटून मी हे करायचो.कविता लिहिण्याचा प्रयत्नही करायचो.



ती गेली त्यानंतर मी ती सर्व कडवी त्याच वहित एकत्र करून लिहिली.आणि तशीच ती वही माझ्या पुस्तकाच्या संग्रहात मी ठेवून दिली होती.आई गेल्यानंतर बरीच वर्ष श्रीधर काही इकडे आला नाही.अलीकडेच तो आपल्या मुलीला आणि पत्नीला घेऊन परत थोड्या दिवसाठी आला होता.श्रीधरची मुलगी आता सोळा वर्षाची झाली होती.मला तरी ती तिच्या आजीसारखी झालेली वाटली.



परत जाण्यापू्र्वी श्रीधर मला भेटायला आला होता.त्याच्या आईच्या आठवणी निघाल्या होत्या.चटकन मला त्या वहीची आठवण आली.मी ती वही श्रीधरकडे वाचायला म्हणून दिली.घरी गेल्यावर वाचीन असं सांगून ती वही श्रीधर घरी घेऊन गेला.
कविता अशी होती.


पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली

मातेने व्यथा कौतुके सांगीतली
ऐकून ती मी कविता लिहिली


तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी


वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी


शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी


गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले


शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला


मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला


शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी


सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने


म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”


नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी


एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली


परत जाण्यापूर्वी श्रीधर ती वही आपण घेऊन जाऊ का? म्हणून विचारायला आला होता.मी त्याला ती वही दिली.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, June 25, 2012

प्रीति कशी करावी एकमेकावरी




"स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ति
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली"


आज मस्तच हवा पडली आहे.मस्त म्हणण्य़ाचं कारण काल तोबा उकडत होतं.ह्या दिवसातलं हे हवेचं लहरी वागणं माझ्यासारख्यालाही लहरी बनवतं.बाहेर फिरायला जाण्याची मलाही लहर आली.आणि ती माझी लहर फायद्याची ठरली.


त्याचं असं झालं,मी नेहमीप्रमाणे तळ्यावर फिरायला जायचं सोडून द्राक्षाच्या मळ्यात हिंडावं असं ठरवून तिकडे जाण्यासाठी गाडी काढली.आमच्या घरापासून मळा तसा बराच लांब आहे.पण ह्या दिवसात द्राक्षांच्या वेलीवरून सुटून लोंबत रहाणारे द्राक्षाचे घोस बघायला मजा येते.तरी अजून चार ते पाच महिने लागतील ज्यावेळी द्राक्षं पूर्ण पिकून मळेवाले ते घोस खुडायला देतील आणि जमवू तेव्हडे द्राक्षाचे घोस अगदी कमी किंमतीत घरी घेऊन जायला मिळतील.


वाटेत मात्र माझा विचार बदलला.मळा येण्यापूर्वी एका गडद रानातून रस्ता जातो.अजून संध्याकाळ व्हायला वेळ होता.ह्या दिवसात सूर्य जरा वेळानेच अस्ताला जातो. पण पक्षांना मात्र संध्याकाळ होत येत आहे हे कळतं.
रानात एका मोठ्या निलगीरीच्या झाडाखाली मी माझी गाडी पार्क करून पक्षांचा होत असलेला किलीबीलाट ऐकत होतो.मधून एखादा पक्षी आपल्या प्रेयसीला साद घालतोय असं त्याच्या गाण्यावरून वाटायचं.निरनीराळ्या पक्षांची गाणी ऐकायला मजा येत होती.


गम्मत पहा,कवी गीत लिहितो मग संगीतकार त्यावर चाल लावतो आणि त्यानंतर एखादी गायिका किंवा एखादा गायक ते गाणं आपल्या गोड आवाजातून गातात.किती कष्ट पडत असतील हे सर्व करायला?.


कवन,म्हणजे सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना आणि काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे.


कोकीळेसारखा एखादा पक्षी गुंजन  - कर्णमधुर आवाज करण्याची क्रिया- करीत असतो.त्यालाही किती कष्ट होत असतील असं हे गुंजन करायला?

आणि आता तर हे अनेक पक्षी आपआपल्या लहरीनुसार गुंजन करीत आहेत. हा काय चत्मकार आहे?ही समस्या माझ्या मनात सदैव येत असते. आणि गम्मत म्हणजे त्या पक्षांचं शब्दावीना निर्मीलेलं गीत कोण लिहीत असेल बरं.?असाही एक विचार मनात आला.मला कविता सुचली आणि तिथेच गाडीच्या मागच्या ट्रंकवर बसून ती कागदावर लिहून काढावी असं वाटू लागलं.मी काही पंक्ति लिहिण्याचा प्रयत्न केला.नंतर द्राक्षाच्या मळ्याला भेट देऊन घरी आलो.जेवण वगैरे झाल्यावर बिछान्यावर पहूडलो.आणि गीताच्या शेवटच्या पंक्ति झोपण्यापूर्वी आठवल्या त्या तशाच लिहून काढल्या.




गुंजन करण्या कष्ट का विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण असे विहंगाचा कवी
सूर जुळवूनी कोण त्या गाण्या लावी
अपुले कवन सहजपणे विहंग गाई


प्रीति कशी करावी एकमेकावरी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजपणे व्हावी
हीच कल्पना कवनातूनी मिळावी



विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे निघालो होतो द्राक्षाच्या मळयात जायला आणि वेळ घालवला रानात.का तर त्या चार ओळीच्या कवितेची निर्मिती माझ्याकडून व्हायची होती.
एकदा मला प्रो.देसाई म्हणाल्याचं आठवतं.
"कविता लिहावी म्हणून लिहिली जात नाही.कविता होते"
आता पुन्हा तळ्यावर भेटलो की भाऊसाहेबांना ही कविता वाचून दाखवणार.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 20, 2012

स्त्रीचा अवमान टाळणार नाही.




सध्या ऊन्हाळ्याला जोर आला आहे.फारच गरम होतं.नव्वद आणि वरचं फॅरेनेट तपमान जीवाची कालवाकालव करतं.पण सूर्य एकदाचा खाली गेला की मग मात्र मस्तच वाटतं.तशात एखादी गार वार्‍याची झुळूक येऊन गेली तर विचारूच नका.


प्रो.देसाय़ाना सकाळीच फोन करून विचारलं याल का तळ्यावर?.कबूल झाले आणि आम्ही संध्याकाळी तळ्यावर भेटलो.
"माझा एक जवळचा स्नेही गेला.सुटला बिचारा वय खूप झालं होतं."
भेटल्याभेटल्या भाऊसाहेब मला म्हणाले.
"गुणाजी पवार.एका फार्मसीत कामाला होता.नाकासमोर बघून चालणारा माणूस.कुणाच्या आ्ध्यात ना मध्यात पण भारीच तत्वनीष्ट होता.पाच मुलं होती.दोन मुलगे तीन मुली.पण बायको धरून कुणाशीच घरी पटायचं नाही."
मला भाऊसाहेबांनी पुढे सांगून टाकलं.
"नाव गुणाजी पण अंगात चांगले गुण नव्हते असं म्हणायला हरकत नाही."
मी म्हणालो.


"अहो काय सांगू?मोठा मुलगा जेव्हा अमेरिकीत जायला निघाला त्यावेळी तो मला भेटायला आला होता.मला म्हणाला,
"बाबांची कसली नुकसानी होणार आहे मी जाऊन?महिन्याचा माझा पगार त्यांच्या हातात पडणार नाही एव्हडंच.नाहिपेक्षा माझ्याबद्दल त्यांना तेव्हडंच वाटतं."


मला त्या मुलाची कीव आली.मी त्याला म्हणालो,
"हे ही दिवस जातील. तू काळजी करू नकोस."
बिचार्‍याला तेव्हडाच माझ्याकडून दिलासा मिळाला असं वाटलं.
प्रो.देसाई खजील चेहरा करून मला म्हणाले.


"गुणाजीचे रोज घरात वाद व्हायचे.कुणाचीही बाजू ऐकायला ते तयार नसायचे.आपलं तेच खरं.हळू हळू मुलं स्वतःच्या पायावर जगायला शिकल्याबरोबर काही तरी निमित्त काढून त्यांच्या पासून दूर जायला लागली. मोठी मुलगी भावाची मद्त घेऊन अमेरिकेत गेली.तिकडेच तिने आपलं लग्न केलं.भावानेही आपलंही तसंच तिकडे लग्न केलं.एका मुलीने गुजराथ्याशी लग्न करून बडोद्याला रहायला गेली.गुणाजीने धाकट्या मुलीचं लग्न आपल्या पसंतीने एका व्यापार्‍याच्या मुलाशी करून दिलं. ती पण ऑस्ट्रेलियात नवर्‍याबरोबर रहायला गेली.आणखी सगळ्यात धाकटा मुलगा बहिणीच्या मदतीने ऑस्ट्रेलियात स्थाईक झाला.
शेवटी गुणाजी आणि त्याची बायको होत्या त्या जागेत स्थाईक झाली."


हा सगळा गुणाजी पवारांचा इतिहास भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकून मला दिलीप प्रभावळकरांची "श्री.गंगाधर टिपरे" ह्या टीव्ही सिर्यलची आठवण आली.त्यात एक प्रसंग असा होता की टिपरे आजोबा आपल्या मुलासह आणि नातवासह एका वयोवृद्ध गृहास्थाच्या अंतीम यात्रेला त्याच्या घरी गेले असताना त्या गृहस्थाच्या नातवासमोर टिपरे औपचारीक होऊन त्याच्या आजोबांचे गुण गात होते.पण त्या गृहस्थाचा नातुच त्यांना म्हणाला,
"आमचे अजोबा गेल्याने घरात कुणालाही वाईट वाटलं नाही.शेवट पर्यंत सर्वांना भांडावून सोडलं होतं.हट्टीपणा मुळीच गेला नव्हता."
मी हे भाऊसाहेबांना सांगीतल्यावर त्यांना अचंबा वाटला.


"म्हणजे, आपलं तत्व न सोडणारे असे बरेच लोक जगात असतात तर"
घरी जाण्यासाठी उठता उठता प्रो.देसाई मला म्हणाले.

मीसुद्धा घरी जाताना "तत्व माझे सोडणार नाही" ही ओळ माझ्या मनात गुणगुणायला लागलो.आणि झालं एक कविता सुचली.घरी गेल्यावर ती एका कागदावर लिहून काढली आणि नंतर जेवायला बसलो.



तत्व माझे सोडणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 दारु पिऊनही झिंगणार नाही
 झोप घेऊनही पेंगणार नाही
 कसल्या कोणत्या आल्या भावना
 शिस्ती शिवाय मला रहावेना


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 दुःखाची नाही कसली खंत
 परिणामाची नाही मुळीच भ्रांत
 पुरूषगीरी सोडणार नाही
 स्त्रीचा अवमान टाळणार नाही


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 करून करून भागले
 देवपूजेला लागले
 नैवेद्या शिवाय पूजा होणार नाही
 पुजेपूर्वी प्रसाद मागुनही देणार नाही


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 वय झाले तरी आढ्य रहाणार
 आपले तेच खरे म्हणणार
 लाकडे स्मशानात गेली तरी
 वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही


दुसर्‍या दिवशी प्रो.देसायांच्या हातात हा कवितेचा कागद मी दिला.कविता वाचून झाल्यावर ते मला म्हणाले,
"गेलेल्या माणसाच्या मागे त्याच्याबद्दल वाईट काही बोलू नये असं म्हणतात.कारण त्याला आपली बाजू मांडता येत नाही.पण कवितेतून भावना तरी प्रकट करता येतात."




  श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
 shrikrishnas@gmail.com

Saturday, June 16, 2012

अविच्या बाबांची खंत



अरगेड्यांचा छोटा अविनाश,त्याच्या बाल्कनीत उभा होता.खाली रस्त्यावरून त्याने त्याच्या बाबांना येताना पाहिलं.चटकन त्याच्या लक्षात आलं की आज फादर्स डे आहे.आपल्या बाबांना फुलं देऊन त्यांना हॅपी फादर्स डे म्हणावं असं मनात आणून तो मागच्या बागेतून फुलं काढून त्या फुलांचा गुच्छ बनवून बाबांना सरप्राईझ करावं असं मनात आणून खाली जायला निघाला.
नंतर काय रामायण झालं ते मला एकदा अरगडे सांगत होते.मला म्हणाले,
"आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही."
असं सांगून फादर्स डे दिवशी आपल्या मुलाबरोबर झालेला प्रकार त्यांनी मला वर्णन करून सांगीतला.ते आठवून मला कविता सुचली.आज फादर्स डे असल्याने ती कविता आज आठवली,

वाटेत एका अनोळख्याला
 जवळ जवळ आपटलो
 “माफ करा”असे म्हणून मी
 त्याच्या पासून सटकलो


“करा माफ”मला पण
 म्हणत थांबला तो क्षणभर
 औचित्याच्या वागण्याने
 सुखावलो आम्ही दोघे वरवर


आपल्या घरी
 स्थिती  असते निराळी
 लहान थोरासी चटकन
 आपण वागतो फटकून


झाली त्यादिवशी एक गम्मत
 होतो कामात मी दंग
 चिमुकल्या माझ्या मुलाने
 केला माझ्या एकाग्रतेचा भंग


“हो बाजूला”
 म्हणालो मी वैतागून
 गेला तो निघून
 हिरमुसला होऊन
 रात्री पडलो
 असता बिछान्यात
 आला विचार
 माझ्या मनात
 औचित्याच्या भारा खाली
 अमुची रदबदली झाली
 वागलो चांगले अनोळख्याशी
 अशी समजूत करून
 मी घेतली मनाशी


पाहता फुलांच्या पाकळ्या
 पडल्या होत्या दाराशी
 लाल, पिवळी अन निळी
 खुडली होती
 फूले त्याने सकाळी
 आला होता घेऊन ती हातात
 टाकण्या मला आश्चर्यात
 आठवून तो प्रसंग पून्हा
 वाटे मजकडून झाला गून्हा
 जाऊन त्याच्या बिछान्याशी
 जवळ घेतले मी त्या उराशी


पुसता  फुलांच्या पाकळ्या विषयी
 हसला तो मला बिलगूनी
 बोले तो मज भारावूनी
 “घेऊनी ती सर्व फूले
 आलो होतो मी तुमच्याकडे
 कारण आजच आहे “फादर्स डे”


मागूनी त्याची माफी
 पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
 चूक केली मी सकाळी तुझ्याशी


पुसून अश्रू माझे त्याने
 हसून बोलला तो पून्हा एकदा
 करतो प्रेम मी
 तुमच्यावर सदासर्वदा


रहावे ना मला ते ऐकून
 म्हणालो मी ही भारावून


आवडशी तू मला अन
 मुकलो मी तुझ्या
 आश्चर्याच्या आनंदाला
 दिसलास सुंदर तू फुलांमुळे
 होते सुंदर तुझे ते फूल निळे



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 12, 2012

मागे वळून मी पाहिले





"माझेच मरण मला पाहून हंसले."


त्या दिवशी एक गम्मतच झाली.जवळकरांच्या जीममधे मी गेलो होतो.बरीच तरूण मंडळी एकाग्र चित्ताने व्यायाम करताना दिसली.
जवळकरानी मला मुद्दामच त्यांच्या जीममधे बोलावलं होतं.
मागे मी जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा सुधृढ प्रकृती विषयी आमची चर्चा चालली होती.ते मला म्हणाले की,अलीकडे तरूणाना आपल्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल बरीच दिलचस्पी वाढली आहे.हवं तर तुम्ही माझ्या जीममधे येऊन बघा.किती तन्मयतेने लोक व्यायाम करीत असताना तुम्हाला दिसतील.
जवळकरांचे ते शब्द मला जास्त परिणामकारक वाटले,
ते म्हणाले होते,
"जगणं आणि मरणं हे निसर्गाच्या नियमात बसत असतं.पण आयुमर्यादा वाढवायची असेल तर मात्र आपल्या जीवनाची आपणच काळजी घ्यायला हवी.
खरोखरच ते दृश्य बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.आमच्या शाळेत मल्लखांबावर व्यायाम घेण्याची सोय होती.ह्या आधूनीक जीममधली बरीचशी उपकरणं पाहिल्यानंतर एका मल्लखांबामधे किती गोष्टी सामवल्या आहेत ते माझ्या लक्षात आलं.
त्यानंतर मला एक कविता सुचली,

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय  कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता


असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून त्याला गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील


खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम


जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य



 श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 5, 2012

देवबाप्पाचा चिमुकला तलाव.



"हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल"


एखादा, कोणत्या विषायवर अथवा कोणत्या गोष्टीवर भावनाप्रधान होईल हे सांगणं जरा कठीणच आहे.हेमंत माहात्म्याच्या नातवाबद्दल असंच काहिसं झालं.

त्याचं असं झालं,हेमंत माहात्मे काल मला बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
"डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरीरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्‍यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते दुखः प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं."
असं सद्गदीत होऊन हेमंत आपल्या नातवाला वाटणार्‍या चिंतेबद्दल मला सांगत होता.


"रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी निकामी किंवा कुचकामी पिशवी असून ती फेकून देण्यालायक असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.अर्थात पेशंटला वाचवण्यासाठी तो निर्णय त्या डॉक्टरना घ्यावा लागतो हे उघडच आहे म्हणा.
पण ज्या माऊलीचा तो अवयव, ज्यातून तिने निसर्ग उत्पति केलेली असते त्या अवयवाबद्दलच्या तिच्या भावना तिलाच ठाऊक असणार."
असं नातू त्याच्या आजोबांना म्हणाला.


आणि नंतर आपल्या आजोबांना पुढे म्हणाला,
"मी सुद्धा आईच्या शरीराचा एक हिस्सा होतो.आईच्या उदरात नऊ महिने राहून,तिच्या कष्टाला जो मी कारण झालो,त्याबद्दल मलाही अशावेळी विशेष वाटणं स्वाभाविक आहे.पण काय करणार? निसर्गाचे नियम पाळावेच लागतात ना? एखादी गोष्ट कुचकामी झाली,निकामी झाली,हानीदायक झाली,की निसर्गच तिची विल्हेवाट लावतो.पण हे आईला समजावून कसं सांगायचं.?"
डोळ्यातून ओघळणार अश्रू पुशीत तो आपल्या आजोबांना सांगत होता.


"माझा नातू मला नेहमीच लहान वाटाणार.पण ह्या वयातही तो पोक्त विचाराचा आहे.आणि त्याच्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम आहे."
असं म्हणत,
"डॉक्टरांची चूक नाही म्हणा.त्यांच्या संवयीचा परिणाम."
असं आपलं मत देणार्‍या हेमूकडून हे ऐकून त्यांच्या नातवाच्या मनात आलेली भावना कवितेतून जास्त परिणामकारक प्रकट करता येईल असा विचार करून मला ही कविता सुचली होती.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरीर
अमुच्या चिमुकल्या गादीवर
पोषण केलेस अमुचे किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे
सांगू कसे मी तुला ते

रीत असे निसर्गाचीही
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावे तो झडकर
म्हणूनच,
द्या टाकून झाला वापर
असेच म्हणत असेल तो डॉक्टर.


माझी ही कविता मी हेमंतला त्याच्या नातवासमोर वाचून दाखवली तेव्हा दोघानीही मला मिठीत घेतलं.
"माझ्या आईची सर्जरी यशस्वी झाल्यानंतर आणि ती पुर्ण बरी झाल्यावर मी तिला ही तुमची कविता वाचून दाखवणार असं मी म्हणतो."
असं त्याने म्हटल्यावर,माझ्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही की,पुढे येणारी प्रत्येक पिढी किती प्रगल्भ विचाराची होत असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 1, 2012

होकाल( नवरी)




मला वाटतं विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असावी. कोकणातून मुंबईला नोकरीसाठी जाणार्‍या व्यक्तिबद्दल कोकणातल्या इतराना त्यावेळी थोडा कमीपणाच वाटायचा.
स्वतःची शेती असून,त्यात चांगली कमाई होत असताना मुंबईत जाऊन गिरणीत चाकरमान्याचं काम करण्यात काय विशेष आहे? उलट ह्याला दळभद्रीपणाच म्हणावा लागेल अशी समजुतकरून घेऊन कोकणी माणूस त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणे अवहेलनाच करायचा.
जग बदलत चाललं आहे.बदल होत रहावा.त्यातून उर्जितावस्था होत असते हे मानायला त्यावेळचे ते लोक तयार नसायचे.

"सावंताचो बाबलो म्हुम्हंयेक जातासा म्हणे.मेल्याक कसली अवदसा सुचली.हंय़ वाडवडीलांची एव्हडी मिळकत आसा.थंय म्हुम्ह्यंत जावून कबुतरांच्या घुराड्यासारख्या चाळी्तल्या खोलीत दिवस काढतलो.फाट-फाआटे चपाती-भाजीचो डबो घेवून गिरणीत चाकरमानी म्हणून कामावर जातलो.काय म्हणे तर महिन्या अखेर नकद पैसो हातात मिळता.
ह्याका अवलक्षण म्हणुचा नाय तर काय?"

अशी सावंताच्या बाबल्याबद्दल चर्चा, इतर लोक,पूर्वसाच्या किंवा रामेश्वराच्या, देवळाच्या आवारात किंवा वडाच्या चौथुर्‍यावर बसून, शिळोपाच्या गप्पातला विषय म्हणून चर्वीचरण करण्यात मश्गुल व्ह्यायचे.

त्यातलाच एक विषय म्हणून कधी कधी,
"कामतांच्या इंदूक मुंबईत दिला म्हणे.नाबरांचो झील दादरच्या पोस्टात कामाक आसा.हल्लीच तो इंदूक बघून गेलो.पसंत केल्यान.येत्या मे महिन्यात इंदू बोटीन मुंबईक जाताला."
अशीही इंदूची चर्चा व्ह्यायची.


पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
बाई गं!,पडावातून आगबोटीत चढताना जरा जपून चढ.आणि त्यानंतर तिचा बाप तिला मुंबईची तिच्या दृष्टीने लागणारी आवश्यक ती माहिती-उपदेश-द्यायचा.

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन
घो तुझो र्‍हवतां शिमीटाच्या चाळीत
तेका गो कसला घोपान?
असं एक मालवणीत गीत लिहिलं गेलं.
म्हणजेच,
बाळे,पडावातून आगबोटीत बसताना जरा जपून बस.तुझा नवरा वरळीला सिमेंटच्या चाळीत रहातो.वगैरे,वगैरे..)
पण आता वीसाव्या शकताच्या उत्तरार्धात आणि एकवीसाव्या शतकात हीच होकाल मुंबईहून अमेरिकेत जायला निघते.कारण जग सुधारत चाललं आहे.बदल होत राहिला आहे.आणि तो झालाच पाहिजे.

तेव्हा मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल बोटीने प्रवास करण्याऐवजी, पडावातून आगबोटीत बसण्याऐवजी, मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर नव्या परिस्थिती काय म्हणेल,ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला "घो" पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


घो गेलो सकाळी की येतोलो रातच्यान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 28, 2012

बाठा चोखून खपेल का?


रघूनाथला जाऊन आज एक वर्ष झालं.आज त्याची आठवण आली.आंब्याच्या राजाचीपण आठवण आली.हापूस आंबे बाजारात यायला लागले असतील.
रघूनाथ हे जग सोडून जाण्यापूर्वी माझ्या घरी आंबे खायला आला होता.त्याला मी त्यावेळी म्हणालो होतो.


"तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”

ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज आंब्याची पेटी उघडल्यावर रघुनाथची प्रकर्षाने आठवण आली.रेडीओवर मालती पांडे यानी गायलेलं,गदिमाचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?”

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही.ह्या गाण्याचं “विम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, रघुनाथाला मी ते गीत अर्पण करतो.
जणू रघुनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

श्रीकृष्ण सामंत  (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 21, 2012

सरतेशेवटी




सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी


सरतेशेवटी माझी पत्नी सुधार सेंटरवरून गेल्या आठवड्यात घरी परत आली.घरातल्या सर्व कुटूंबियाना,मित्र मंडळीना खूप आनंद झाला.
तिच्या पायाची सूज कमी होण्याची औषधं देऊन,सर्वांगाला,विशेषतः पायाना योगय तो भरपूर व्यायाम देऊन तिला वॉकरवर चालण्याईतपत  तयारीकरून डिसचार्ज देण्यात आला.

घरी आल्यानंतर यापुढे दोन महिने एका केअरटेकर कंपनीचे ओ.टी(ऑक्युपेशन थेरपी),पी.टी.(फिझीकल थेरपी)ची मंडळी आमच्या घरी येऊन तिला जमेल तेव्हढी इंडीपेन्डट करण्याचा प्रयत्न करणार.हा त्यांचा पुढील दोन महिन्याचा प्रोग्राम राहिल.तिच्या वयोमानाकडे लक्ष देऊन,तिच्या शरीराच्या बळाकडे लक्ष देऊन हे सर्व केलं जाणार.
आमच्या मुलांनी(मुलगी,मुलगा,जावई,सून आणि नातवंडं)ह्यांनी घेतलेले परीश्रम आणि इतर मित्र मंडळी आणि नातेवाईकानी दिलेल्या शुभेच्छा ह्यामुळेच हे असं घडू शकलं ह्यात संदेह नाही.

माझी पत्नी घरी आल्याच्या दुसर्‍या दिवशीच्या सकाळी, माझ्या मुलीने घरामागच्या बागेत जाऊन गुलाबाच्या झाडावरचं नुकतच फुललेलं सुगंधीत तांबडं फूल आणून आपल्या आ़ईच्या हातात देऊन तिचं स्वागत केलं.

माझी पत्नी घरी नसताना मला पहाटे पहाटे,आशेची निराशेची,स्वप्न पडायची.माझ्या पत्नीच्या हातातलं तिच्या मुलीने दिलेलं ते गुलाबाचं फूल पाहून माझं एक स्वप्न मला आठवलं आणि त्याबरोबर एक कविता सुचली.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍या मला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग…..

हरवलेले फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना

सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी

क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, May 7, 2012

हिच खरी समस्या असे जीवनाची






सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची


ओठावरती ढंग आणिला हास्याचा
विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा
अचानक हे काय झाले
चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा


केला अहंभाव दूर असताना
ठेविले दूर अंतरातून सजणाला
करूनी यत्न विसरले विषादाला
परी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला


सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Saturday, April 28, 2012

ग्वाही




त्या दिवशी सेंट्रल रेल्वेचा संध्याकाळच्या वेळी काहीतरी घोटाळा झाला होता.प्रथम गाड्या अर्धातास लेट चालत आहेत अशी अनौन्समेंट झाली आणि नंतर काही अनौन्समेंटच होईना.सीएसटी-व्हीटी-स्टेशनात शिरतानाच मी आत गर्दी पाहून अंदाज केला होता की काहीतरी गडबड आहे.


मला माझ्या मेहुणीच्या घरी ठाण्याला जायचं होतं.थोडा वेळ विचार केला आणि जरा जवळच्या बाकावर बसावं म्हणून बसायला गेलो तर माझ्या शेजारी ललित बसला होता हे मी चटकन ओळखलं.त्यानेही मला ओळखलं.


त्याने चटकन उठून मला अलिंगन दिलं.आणि म्हणाला,
"आजचं गाड्यांचं काही खरं नाही.आपण थोडावेळ बाहेर जाऊया आणि गप्पा मारूया."
मी चटकन होकार दिला.आणि समोरच्या केळकरांच्या हॉटेलमधे शिरलो.दोन कप चहा मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या.


ललित त्याच्या लहानपणी आमच्या समोरच्या बिल्डिंगमधे रहायचा.बरेच वेळा तो त्याच्या घरात सापडण्या ऐवजी त्यांच्या शेजारच्या घरात दिसायचा.चंद्रकात आणि शारदा मांढरे हे त्यांचे शेजारी होते.त्यांना एक मुलगी होती नाव मोगरा.तिला ललित मोगराअक्का म्हणायचा.

बर्‍याचश्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.गप्पांच्या ओघात मी त्याला विचारलं,
"तुझे ते मांढरे शेजारी कसे आहेत?"
इतका वेळ मजेत गप्पा मारणारा ललित जरा गप्प झालेला मला दिसला
ललितने मला पटकन उत्तर दिलं नाही.त्याला उत्तर देणं कठीण होत होतं असं मला दिसलं.


पण थोडावेळ थांबून मला म्हणाला,
"मला जे वाटत आहे ते मी ह्या क्षणी सांगत आहे.माझा आशेवर विश्वास आहे.आशा हे एक प्रकारचं इंजीन आहे जे जीवनाची गाडी गतीत ठेवीत असते.ती शरीरातली ज्योत आहे जी माणसाला कार्यरत ठेवीत असते.मला माहित आहे की हे मी माझ्यासाठी सांगत आहे.माझी कहाणी ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी का असं म्हणतो."
ललितची ही प्रस्तावना ऐकून मी जरा संभ्रमात पडलो.मी त्याला म्हणालो,
"माझ्या प्रश्नाने तुला उत्तर द्यायला त्रास होत असेल तर नको सांगू"


"नाही, नाही तसं काही नाही.उलट तुम्ही प्रश्न केला ते बरंच झालं.मला जरा तुमच्याकडे ओघ घालवायला बरं वाटेल."
असं म्हणून पुढे सांगू लागला.


"माझ्या लहानपणी दोन व्यक्ती माझ्या जीवनात आल्या होत्या ज्यांनी मला सदैव प्रेरित केलं.त्याचवेळी मी ताडलं होतं की हे माझे जीवनभरचे मित्र रहातील.चंद्रकांत हे खरे पुरूष होते.ते विमानाचा पायलट होते.घरच्या कंप्युटरवर ते मला बरोबर घेऊन फ्लाईट सीम्युलेशनचे धडे घ्यायचे.त्यांची पत्नी,शारदा ही चांगली वकील होती.त्याशिवाय तिला बागेत काम करून निरनीराळी फुलं लावायचा छंद होता.माझे आईवडील कामात असताना हे माझं शेजारी युगूल मला नेहमी कामात व्यस्त ठेवायचं.


त्यावेळच्या माझ्या त्या जीवनात मला मस्त मजा यायची.पण एकेदिवशी मला मरण काय असतं ते कळलं.
त्याचं असं झालं की,तो शनिवारचा दिवस होता.मी आणि माझे बाबा टीव्हीवर एक चित्रपट पहात होतो.आणि आमच्या दारावरची घंटी वाजली.


दार उघडल्यावर आमच्या समोर एक माणूस उभा राहिलेला दिसला.तो एका वर्तमान पत्राचा रिपोर्टर होता.त्याच्याकडून कळलं की माझे हे शेजारी त्यांच्या एका मित्राबरोबर प्रवासात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात ही दोघं कालवश झाली.ती माझी बालपणातली मजेची आणि आनंदाची वर्षं आता माझ्या जवळ स्मृती म्हणून राहिली आहेत.


पण जसा काळ पुढे जात होता तशी नवी आशा निर्माण होत होती.चंद्रकांत आणि शारदेला एक मुलगी होती, मोगरा.अलीकडेच तिचं लग्न झाल्याचं मला कुणीतरी सांगीतलं.ती जरी दिल्लीला रहात असली तरी आपल्या आईवडीलांच्या दुःखद निधनानंतरही ती आम्हाला भेटायला यायची.अलीकडेच त्यांना एक मुलपण झालं आहे.तिचं नाव त्यांनी कमळ असं ठेवलं होतं.दिसायला खूपच गोड आणि दुडूदुडू धावणार्‍या कमळला बघून खूप मजा यायची.कमळ जसजशी मोठी होत गेली तशी ती एका नव्या पिढीची आशा ठरत होती.


मला एक जुनं गाणं आठवतं.त्याचं शिर्षक होतं "ग्वाही"
आशेचं तो एक रुपकालंकार होता.

ऐकता नवजाताचे रुदन
अथवा
पिंपळ पानाचे स्पंदन
अथवा
विशाल नीळे गगन
नकळत मिळे ग्वाही
अन
समृध्द होई जीवन

जीवनाचं सार ह्यातूनच प्रस्तुत व्हायचं.
माझ्या शेजारांची झालेली दुर्घटना ज्यावेळी माझ्या आठवणीत यायची त्यावेळी,कमळाकडून मला भविष्यातल्या आशेची आठवण करून दिली जायची.
दिवाळीतल्या गोड जिन्नसातल्या करंजीतल्या गोड सारणा सारखी ही कमळ मला वाटायची.


मोगराअक्काने आता आणखी एका बाळाला जन्म दिला आहे.
छोटीशी मुलगी झाली.तिचं नाव तिने आशा ठेवलं आहे.
काय हा जीवनातला जोश म्हणावा.
सूर्य उगवून नव्या दिवसाला जन्म देतो.मला वाटतं जग सुंदर आहे."
असं म्हणून ललित थोडावेळ गप्प राहिला.माझ्या प्रश्नाने त्याला मी जुन्या आठवणीचा उजाळा दिला असं मला वाटलं.कारण तो बराच भावनावश  झालेला मला दिसला.


मी म्हणालो,
"मला माहित आहे तू मांढरे कुटूंबियाना किती मानायचास ते.त्यांची अशी ट्रॅजडी ऐकून त्यावेळी तुला काय दुःख झालं असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.एव्हडे तुझे त्यांचे संबंध होते.पण तू फारच सकारात्मक विचार करून तुझ्या आठवणीना विसर पाडत असावास.सॉरी हं.मी तुला डिस्टर्ब केलं."

"तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.माझा ओघ मी घालवला.अमंळ हलकं वाटतं."
मला ललित म्हणाला.आणखी हातावरच्या घड्याळाकडे पाहू लागला.


तेव्हड्यात हॉटेलात कुणीतरी बोलताना ऐकलं की गाड्या चालू झाल्या.आम्ही लगेचच उठलो आणि स्टेशेनकडे वळलो.मी मात्र ठाण्याला माझ्या मेव्हुणीकडे जाण्याच्या विचार बदला.अगोदरच उशीर झाला होता.मी दादर स्टेशनवर उतरलो आणि वेस्टर्न रेल्वे घेऊन अंधेरीला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, April 24, 2012

त्या मेघासम तू भासते.



राहून सामील सर्वांमद्धे
राहशी तू नामा वेगळी
केवळ माझ्याशीच नसून
राहशी स्वतःशीही आगळी


मान उंचावून नजर उठते
कुणासाठीही झुकत नसते
नासिकेतून श्वसन वाढते
कुणासाठी अडत नसते
काही केल्या जो थांबत नाही
त्या वार्‍यासम तू भासते


केशपाश तुझा लहरत राही
पदरा आड तो छपला जाई
ओठ तुझे हलकेच थरथरती
दाता खाली दबले जाती
कोसळेल वाटूनी जो बरसत नाही
त्या मेघासम तू भासते



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 20, 2012

सिनेस्थेसीया नावाची व्याधी


"फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे."


विश्राम मेढेकर माझा जूना शाळकरी मित्र.मला आठवतं तो लहानपणापासून छान कविता लिहायचा.त्याला शाळेत कवी विश्राम म्हणूनच संभोदायचे.
अलीकडेच मी त्याला दादर स्टेशनवर भेटलो होतो.गर्दीतच त्याने मला हाक मारली.तो चर्चगेटवरून येणार्‍या गाडीतून उतरला होता.मला म्हणाला,
"चल आपण बरेच दिवसानी भेटलो आहो, मामा काण्यांचा बटाटावडा खायला जाऊया.खूप दिवसानी भेटलास जरा लहानपणाच्या गप्पा मारायला मुड आला आहे."

मला कुणी आग्रह केला तर त्याचं मन मला मोडवत नाही.आम्ही एक एक कप गरम चहा आणि बटाटावडा मागवला. बटाट्यावड्याबरोबर लालबूंद सुकी चटणी मिळते ती मला खूप आवडते.मामा काण्यांचा मोठा मुलगा बापूसाहेब काणे माझ्या परिचयाचे आहेत.माझे tifr मधले सहकारी होते.बापूसाहेब सॉफ्टवेअर इंजीनीयर होते आणि मी हार्डवेअर इंजीनीयर होतो.

मी एकदा बापूसाहेब काण्यांना म्हणालो,
"बटाट्यावड्याबरोबर तुम्ही जी सुकी लाल रंगाची चटणी देता ती मला एकदम चटकदार वाटते.बरं,कधीही ती चटणी खाल्ली की तिची टेस्ट तीच असते.ह्याच गुपीत काय आहे.?"
मला बापूसाहेब म्हणाले,

"ते एक सिक्रेट आहे,कोका कोलाचा जसा फार्म्युला सिक्रेट आहे अगदी तसाच.पण तुम्हाला ते सिक्रेट उलगडून सांगतो.तुम्ही काही मला परकी नाही."
माझी गम्मत करीत ते म्हणाले.
बापूसाहेब पुढे म्हणाले,
"कांद्याची भजी देऊन संपल्यावर भांड्यात तळाला भज्याच्या खूप चूर रहातो.तो चूर एकत्र करून त्यात थोडी मिरचीपूड घालून, चवीला थोडं मिठ घालून झाल्यावर मग तो चूर एकजीव करून त्याचा सुकी चटणी म्हणून वापर केला जातो."
काहीही फुटक जाऊ न देण्याच्या आणि युक्त्या करून काटकसरीत धंदा करण्याच्या मराठी माणसाच्या वृत्तीचं कौतूक करावं असं वाटतं.

चहा घेता घेता मी विश्रामला विचारलं,
"अरे,तू लहानपणापासून छान कविता लिहायचास.सध्या त्या़ची हालत काय आहे.?"
मला विश्राम म्हणाला,
"हालत कसली सध्या हालच आहेत."
शाळेत असताना विश्राम आमच्या मराठी गुरूजीना फारच आवडायचा.त्यांना कवितेची एक दोन कडवी लिहून दाखवायचा.एखादी कविता त्यांना आवडली की ते वर्गात त्याला वाचून दाखवायला सांगायचे.आणि बक्षीस म्हणून त्याला नवी करकरीत लायन पेन्सिल द्यायचे.ह्या सर्व जून्या गोष्टींची विश्रामला मी आठवण करून दिली.
त्यावर तो मला म्हणाला,
"आम्हाला शाळेत मराठीचा विषय शिकवायला जे शिक्षक होते ते स्वतः कवी होते.त्यांनी आपला कविता-संग्रह छापला होता. त्यांना नेहमीच वाटायचं की आपल्या विद्यार्थ्यापैकी काहीनी तरी कविता लिहाव्यात.

हाय स्कूलमधे शिकत असताना मराठीच्या विषयाचे शिक्षक कविता कशी लिहावी ह्याची माहिती देत असताना बरीच मुलं ते शिकायला कंटाळा करायची.त्याचं मुख्य कारण असं की प्रचारात नसलेले आणि दुर्बोध असलेले शब्द आणि भाषेचं अवैध व्याक्रण वापरल्याने शब्दांच्या अर्थाला म्यानात टाकून ठेवल्यासारखं झाल्याने आणि त्या शब्दांचा कवितेत वापर करायला जोर आणला गेल्याने अलीकडच्या प्रचारात असलेल्या भाषेत समजायला ती कविता कठीण व्हायची.
कवितेमधे आनंद घेणार्‍या मला, कुसुमाग्रज सर्वांसाठी नाहीत, हे समजू शकतं.पण बर्‍याच लोकांचं मन कविता ह्या शब्दानेच पूर्वग्रहदुषित होत असतं.

परंतु आमच्या ह्या कवी-शिक्षकाचं तसं नव्हतं.ते स्वतःच कवी असल्याने आणि त्यांच्या कविता खूपच लोकप्रिय असल्याने त्यांची, कविता लिहायला शिकवण्याची तर्‍हा, मला इतकी आवडायची की कविता लिहायला आवड नसलेल्यांना स्फुर्ती यायची हे पण मी पाहिलेलं आहे."

विश्रामचं हे ऐकून मी त्याला म्हणालो,
""पाठ्य पुस्तकाच्या पानात छापली जाऊन बंदिस्त रहाण्यात कवितेचं अस्तित्व नसतं.मला वाटतं,कविता ही एखाद्या तुफानातून निर्माण झालेली असंबद्ध लय असते.आणि दुसर्‍या दिवशी पडणार्‍या पहाटेच्या दवबिंदूंच्या सुगंधाने दरवळलेल्या ओल्या झालेल्या माती सारखी असते.अशी ही माती आपल्या अवतिभोवती असते,फक्त आपल्याला ती उकरून पहायला हवी."

माझं म्हणणं विश्रामला पटलं.
मला म्हणाला,
"मला आठवतं मी लहान असताना संगीतातल्या मौजेचा आनंद कधीच घेतला नाही.त्या ऐवजी मी माझ्या आजोळी आमच्या घराच्या मागे असलेल्या रानात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली बसून ती जादूभरी पानांची सळसळ आणि सरसराहट,पिंपळाच्या फोफावलेल्या फांद्यावर वार्‍याने डुलणारी पानं बघून उत्तेजीत व्ह्यायचो.मला रेडिओवरची गाणी कधीच आवडली नाहीत.का ते माहित नाही.हे मी मोठा होई तोपर्यंत कळलं नाही.त्याचं कारण शोधून काढायला मी जास्तीत जास्त प्रयत्न करीत असायचो.पण कविता मात्र लिहीत राहायचो."

"मग त्यात खंड कसा आला.मघाशी तू मला म्हणालास हालत कसली हाल आहेत त्याचं काय कारण?"
मी विश्रामला विचारलं.
मला म्हणाला,
"त्याचं असं झालं की,त्यानंतर माझे आजीआजोबा निर्वतेले.आणि मला माहित झालं की माझ्याकडून एक मुक करार लिहिला गेला असावा.त्या रानातला तो मंत्रमुग्ध करणारा आवाज माझ्याकडून कधीच ऐकला गेला जाणार नव्हता.

एकदा मला आठवतं,त्या रानातल्या संगीतासारखा आवाज माझ्या कानावर आला.इतराना तो आवाज एखादी बाजापेटी वाजवल्यासारखा वाटला असावा.पण माझ्या करीता तो आवाज विस्फोटीत होऊन जीवन आणि चैतन्य उफाळून आल्यासारखं वाटलं.त्यापूर्वी मला वाटत असायचं ते जीवन आणि चैतन्य माझ्या दैवाला मी समर्पीत केलं असावं.

ही काही डामडौल दाखवणारी उपमा नव्हती.खरंच मी माझे डोळे झाकल्यावर,मला सर्वतर्‍हेचे रंग माझ्या नजरेला विनम्रपणे लयीत नाचताना दिसायचे.हे असं काय होतंय ते मला कळेना.

मला सांगण्यात आलं की, सिनेस्थेसीया नावाची व्याधी मला झाली आहे.नसविद्या शास्त्रानुसार,मेंदूतल्या,उत्तेजीत करणार्‍या मार्गात आणि प्रतिसाद देणार्‍या, मार्गात होणारा संभ्रम,असं त्याचं विश्लेषण आहे. पण ज्या कुणाला हा माझ्या सारखा व्याधी झाला असेल त्यांना माहित असावं की संभ्रम मुळीच नसावा.संभ्रम सोडून दुसरं काही तरी असावं.मी ह्या गोष्टीवर माझं ध्यान देत राहिल्यावर मला दिसून आलं की हे काहीतरी दूसरच असावं.

काही आकडे रंगीबेरंगी दिसायचे.विशेषकरून दोन हा आकडा एखाद्या बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चौकानात असून हा आकडा नीळा नीळा दिसायच. काही शब्द लालबूंद किंवा रानातल्या हिरव्यागार वनस्पतीच्या रंगा सारखे दिसायचे.
हे सर्व माझ्या विचाराचे संकेत व्हायचे आणि माझ्या आश्चर्याची भाषा व्हायची.त्यामुळे ह्याचा अर्थ समजून घ्यायला माझ्या जीवनातली ही एक पराकाष्टा समजायला हरकत नाही.

माझ्या वडीलांचा बदलीचा जॉब असल्याने आम्ही निरनीराळ्या शहरात जाऊन रहायचो. मित्रमंडळी,शाळा आणि आजुबाजूचा समाज माझ्यासाठी,जसे एखाद्या गाडीचे गिअर्स एकातून दुसर्‍यात बदलावेत तसं माझं घरचं जीवन आणि माझं वयक्तीक जीवन हेलकावत असायाचं. माझे हे विचार टप्याटप्यानेसुद्धा एकत्र येऊन स्पष्टीकरण देत नव्हते.पण ज्यावेळी माझ्या सभोवतालचं क्षणभंगूर जग आपला आकार घालवून बसायचं तेव्हा काही निश्चीत गोष्टींचं मला आकलन व्हायला लागलं.

दोनचा आकडा नेहमीच नीळा रंगाचा वाटायचा.आणि पांढरा,लालसर आणि करडा रंग वार्‍याची झोत आल्यावरखडबडीत दिसायचे.अगदी माझ्या आजोबांच्या घराच्या मागच्या रानात जसं मला व्ह्यायचं अगदी तसं व्हायचं.
त्यानंतर मी कविता लिहायचं सोडूनच दिलं.माझा सगळा वेळ व्यथेत आणि त्याच्यावर डॉक्टरी उपाय करण्यात जायला लागला.त्यामुळे कविता करण्याच्या मनस्थितीतच मी राहिलो नाही.नाही म्हटल्यास कधी कधी चार ओळी उस्फुर्त सुचायच्या. दिसेल त्या कागदाच्या चिटोर्‍यावर त्या ओळी लिहून ठेवायचो.
खिशातून एक कागदाचं चिटोरं काढून मला म्हणाला,
"आत्ताच बघ,गाडीत बसलो होतो अगदी खिडकीच्या जवळ.
थंडगार हवेच्या झोतीने माझं मन उल्हासित झालं आणि कवितेचं एक कडवं मला सुचलं.दादर येण्यापूर्वा मी कागदावर लिहित राहिलो.तुला वाचून दाखवतो."

फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे
कसं असलं तरी
बहरलेली मी एक भूल आहे
तू मला फुलवून स्वतःच
कां बरं विसरून गेलीस
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस

विश्रामची ही कविता ऐकून माझं मन खूपच गहिवरलं.कवितेतून हा हे कुणाला उद्देशून बोलत आहे हे मला कळेना.आणि तसं त्याला विचारणं मला धजेना.एक मात्र खरं कुणालाही एक लेख लिहून समजवता येणार नाही ते एखादा कवी एकाद्या कडव्यातून सुचवू शकतो हे निश्चीत.
मी मामा काण्यांचं बिल दिलं.आणि विश्रामचा निरोप घेताना त्याला म्हणालो,
"ह्या कवितेवरून तुझी ती सिनेस्थेसीया नावाची व्याधी नक्कीच लुप्त झाली आहे.ह्या कवितेवरून तरी मला तसं वाटतं.तू एक काम कर हे एकच कडवं मला तू वाचून दाखवलंस.पण संपूर्ण कविता लिहिल्यावर मला ती तू इमेलने पाठवून दे."
माझा इमेल ऍड्रेस मी त्याला दिला आणि विश्रामचा निरोप घेतला.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com




Tuesday, April 17, 2012

"मला पुनर्जीवी करू नका"




माझ्या पत्नीला बरं नाही आणि ती सध्या सुधार सेंटरवर ट्रिटमेन्ट घेत आहे हे प्रो.देसायांना कुणीतरी सांगीतलं.गेल्या विक-एन्डला ते माझ्या घरी आले होते.प्रो.नेरूरकरही त्यांच्याबरोबर आले होते.
तिच्या आजाराची सर्व चौकशी करून झाल्यावर ह्या वयावरच्या समस्येविषयी चर्चा करीत असताना भाऊसाहेब मला आपल्या शेजार्‍याची गोष्ट सांगत होते.


त्यासाठीच ते हॉस्पिटलात परत जायला तयार नव्हते.
"यापुढे मी जरका पुन्हा पडलो तर मला तिथे नेऊ नका,नको ती ऍम्ब्युलन्स नको त्या रस्त्यात जातानाच्या घंट्या अन नको त्या शिट्या"
सत्याऐंशी वर्षाचे प्रो.देसायांचे शेजारी,रिटायर्ड प्रोफेसर आणि एकदा बायपास झालेले हे सदगृहस्थ त्यांना सांगत  हो्ते.


"मला पुनर्जीवि करू नका"
असं लिहिलेला एक फलक त्यांनी आपल्या गळ्यात घालून ठेवला आहे.आणि घरातल्या रेफ्रिजरेटरवरपण एक स्टिकर लावला आहे.तसंच आपल्या

डॉक्टरना आणि तिन मुलांना हा त्यांचा विचार सांगून,त्यांना आपल्याशी सहमत व्हायला लावलं आहे.
संपूर्ण समाधानकारक मरण येण्याबाबत कोण कुणाला हमी देऊ शकत नाही हे त्या गृहस्थाना चांगलंच माहित आहे.त्यासाठी तयारी करावी लागते,त्यावर चर्चा करावी लागते आणि कागद पत्रं तयार करून ठेवावी लागतात हे ही त्यांना पक्कं माहित आहे."


प्रो.नेरूरकर म्हणाले,
"मला वाटतं,इतरांनी ह्या, अती गंभीर आणि अगदी वयक्तिक,खासगी, विषयावर कसा निर्णय घ्यावा ह्याची चर्चासुद्धा तितकीच गंभीर आणि खाजगी आहे असं वाटतं.भावनीक आणि साम्पत्तीक किंमत काय असावी ह्याचा अंदाजसुद्धा तेव्हडाच गहन आहे.
असंही मला वाटतं."


मी माझं मत देताना म्हणालो,
"मरण पुढे ढकलण्य़ाच्या विचाराची काही वर्षांपूर्वी  कल्पनासुद्धा करणं कठीण होतं,ते आता आधूनीक औषध-उपचाराना शक्य झालं आहे.पण उत्तरोत्तर प्रकृती कमजोर होण्यात,व्याधी होण्यात,बुद्धिभ्रम होण्यात आणि सरतेशेवटी कसलेही उपाय करून घेण्यास असमर्थता आणण्यात आपण गुंतले जातो.
पण जरका आपण समजून उमजून निर्णय घेतल्यास कदाचीत सुयोग्य परिणाम होण्यात यशस्वी होऊ शकतो."


प्रो.देसाई आपल्या दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती देताना म्हणाले,
"लिलाताईने योग्य विचार करून आपल्या शेवटच्या दिवसांचा ताबा घेतला.कुसूमने ह्याबाबतीत कसलाच विचार न करून आपल्या नातेवाईकांना विश्वासात न घेऊन स्वतःच्या जीवनाच्या समारोपाबद्दल ती गेल्यानंतरही इतराना क्षतीग्रस्त करून ठेवलं होतं."


प्रो.नेरूरकर आपल्या जवळच्या मित्राची माहिती देताना म्हणाले,
"गुरूनाथ ठाकूर ह्या प्रसिद्ध वकीलाला, आपल्या वडीलांच्या अखेरच्या इच्छा अगदी स्पष्ट आहेत अशा समजुतीने, भरवसा बाळगून राहिल्यानंतर त्यांच्या पश्चात निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणीना तोंड द्यायला नाकीनऊ आले.ज्या गृहस्थाने त्यांना जन्म दिला त्याच्यासाठी त्यांची ही अवस्था झाली होती.
तुम्हाला कितीही वाटत असेल की,आय.सी.युमधे न जाता किंवा जीवनाच्या अंतीम काळाची अतीशय सोय करून केलेली आहे म्हणून सर्व काही सुक्षम होईल तर तो गैरसमज म्हटला पाहिजे.जाणकारांचं ह्यावर एकमत आहे."


"तुमच्या अखेरच्या जीवनाच्या निवडीच्या तयारीचा निर्देश, अगोदरच कागद पत्रातून,करून ठेवून तुमच्यासाठी एखाद्याची त्यासाठी नेमणूक करून जाहिर करावं.नाहीतर कदाचीत त्यावेळच्या आलेल्या परिस्थितीत तुम्हाला ते जमेल न जमेल.
त्यातही अगदी सर्व बाजूने विचार करून केलेल्या कागद पत्रात शेवटच्या क्षणी लागणार्‍या गोष्टी अगोदरपासून अपेक्षीत करता येत नसतात."
प्रो.देसाई असं सांगून पुढे म्हणाले,
"आदीपासूनचे निर्देश आवश्यक आहेत पण जीवनाच्या अंतीम क्षणी केले जाणारे निर्देश परिपूर्ण असतीलच असं नाही आणि नसावेतही.
सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जीवन जगण्यासाठी काय आवश्यक असतं.?"



माझा एक मित्र विकी सागर हा आपल्या पत्नीबद्दल एकदा मला सांगत होता ते मला आठवलं.मी म्हणालो,
"प्रिती सागरचे केस खूप लांब होते.पंजाबी लोकात वयस्कर झालं तरी बायका निटनेटक्या रहाण्याच्या प्रयत्नात असतात.प्रितीचं असंच म्हणणं होतं.ती म्हणायची,
"मला मरण समयी विस्कळीत आणि अव्यवस्थीत केशभार ठेवायचा नाही."
तिला झालेल्या ब्रेस्ट कॅनसरमुळे तिचा मरण समय जवळ आला होता.तिची फोर्थ स्टेज आली होती.त्यासाठी तिने आपल्या लहान बहिणीबरोबर ब्युटी-पार्लरमधे जाऊन खांद्यावर रूळतील एव्हडे केस कापून घेतले होते.
तिला ज्यावेळी कळलं की तिच्या कागद-पत्रावर आणखीन एक सही असण्याची जरूरी आहे.तिने आपल्या जवळच्या मैत्रीणीला बोलावून तिची सहीपण घेतली होती.तिच्या कागद-पत्रात कसलेही लूझ-एन्ड्स ठेवायचे नव्हते.तिच्या नवर्‍याची किंवा नातेवाईकांची मधेच अडवणूक व्हायला नको असं तिला वाटत होतं.



तिने आपले दागीने आणि इतर मौल्यवान वस्तु माझ्या ताब्यात दिल्या होत्या.एव्हडंच काय तर तिने आपलं मंगळसूत्रपण काढून ठेवलं होतं.ती म्हणायची,
"देवाला नक्कीच माहित आहे की मी अगदी सुखाने माझं लग्नाचं आयुष्य भोगलं आहे ते!"

अंतीम समय आल्यावर तिने तिला आवडत असणार्‍या रंगाची साडी नेसली होती.ठसठशीत कुंकू लावलं होतं.अंगावर पर्फ्युम लावून घेतलं होतं. आता ह्या सर्व आठवणी आमच्या जवळ राहिल्या आहेत." प्रितीचा नवरा,विकी,हे सर्व सांगत होता.


प्रो.देसाई म्हणाले,
"जीवनाचा शेवट,ह्या विषयावरची चर्चा करणं तसं कठीणच आहे परंतु,त्यावरचे कागद पत्र आणि फॉर्म्स प्राप्त करून घ्यायला सोपं आहे.आणि ते पेपर्स  मोफतही असतात.कुणा वकीलाची गरजही भासत नाही.

परंतु,ही कागद पत्रं रोगविषयक विकट समस्या उत्पन्न झाल्यानंतर येणार्‍या अगणीक प्रश्नांचं भाकीत सांगू शकत नाहीत.त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी आणि आपल्या डॉक्टरशी चर्चा होणं आवश्यक आहेच त्याशिवाय त्यांना निर्णय घेण्यासाठी आपल्याकडून थोडीफार सवलत देणंही महत्वाचं आहे."

प्रो.नेरूरकरानां गुरूनाथ ठाकूरची त्यांच्या वडीलाबाबत कशी पंचाईत झाली ते सांगायचं होतं.
"मी तुम्हाला सांगू का?"
असा प्रश्न करीत सांगू लागले,
"गुरूनाथ ठाकूरांचं असंच झालं.त्यांच्या वडीलाना पार्किनसनची व्यथा होतीच त्याशिवाय हळुहळू वाढत जाणारा बुद्धिभ्रमही झाला होता.ते जास्त दिवस जगणार नाहीत असे दिवस आल्यानंतर त्यांना लाईफ-सपोर्टची गरज नव्हती असं त्यांच्या वडीलानी आपलं मत दिलं होतं.
पण ज्यावेळी त्यांना जेव्हा हृदयाचे अनियमित ठोके पडायला लागले तेव्हा गुरूनाथने डॉक्टरना अतीदक्ष उपाय द्यायला कबुली दिली.
गुरूनाथ म्हणतात,
"असं करण्याने माझ्या वडीलांच्या अंतीम इच्छेचं मी उल्लंघन तर केलं नाही ना? खरंच मला माहित नाही. हृदयाचे अनीयमीत ठोके पडण्याचा संभव आहे हे मला मुळीच माहित नव्हतं."
ते पुढे म्हणतात,
"ती अंतीम स्थिती नव्हती आणी तो लाईफ-सपोर्टही नव्हता.पण आता मात्र ते डबल असंयमी झाले होते.ते त्यांचं दुर्दैवी जीवन झालं होतं.मी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कसलंच सहाय्य करीत नव्हतो."


हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"आणि ह्याचमुळे आमचे शेजारी स्वतःच्या मरणाची जबाबदारी घेत आहेत.विलंब होणारं मरण त्यांना नको होतं.
अशी वीरता दाखवली नाही तर दुर्लभ साधनांचा दुरूपयोग होईल असं त्यांना वाटतं. आणि ह्यासाठीच
"मला पुनर्जीवी करू नका"
असा फलक ते स्वतःच्या गळ्यात घालून ठेवतात.ते जातील तिथे तो फलक त्यांच्याबरोबर असतो.
"मी सुखी जीवन जगलो आहे.आणि मी तसंच पुढल्या जन्मात जगेन."
असं ते म्हणतात.


"आम्ही तुमची पत्नी आजारी आहे म्हणून कसं काय चालंय ह्याची चौकशी करायला आलो आणि बोलता बोलता ह्या प्रसंगाला न शोभणार्‍या विषयाची
चर्चा करून तुम्हाला नाहक मनस्ताप तर दिला नाही ना?"
प्रो.देसाई मला म्हणाले.प्रो.नेरूरकरानीही मान डोलावून आपलं तेच म्हणणं आहे असं मला दर्शवलं.
मी त्यांना म्हणालो,
"सुधार सेंटरवर गेल्यावर मी जे पाहिलं ते ह्या चर्चेपेक्षाही गंभीर आहे.तुम्ही नक्कीच माझ्या ब्लॉगवर जाऊन "अंतरातल्या नाना कळा"
 ह्या मथळ्याखाली मी अकरा लेख क्रमशः लिहिले आहेत ते जरूर वाचा. आणि त्यानंतर "बंद दरवाजा" हाही माझा लेख वाचावा.तुम्हाला आखोदेखा हाल दिसेल."
"जरूर वाचूं"
असं सांगून दोघानीही माझा निरोप घेतला.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 13, 2012

बंद दरवाजा




"केल्याने होते रे!
अन,
पाहिल्याने समजते रे!"


मला नेहमीच वाटत असतं की,
"प्रत्येक दरवाजा जो बंद केला जातो त्याचवेळी दुसरा कुठलातरी दरवाजा उघडला जात असावा",
असा एक वाकप्रचार असायला हवा.


पुनर्सुधार सेंटरवर आल्यानंतर अनेक पेशंटना पाहून माझ्या मनात जो विचार आला तो विचार एक वाकप्रचार म्हणून ह्या वयस्कर झालेल्या आणि अपंग झालेल्या लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा वापरला जावा असं वाटायला लागलं.
तात्पूरत्या उपचारासाठी आलेल्या लोकांविषयी मी म्हणत नाही.उपचारासाठी खूपच वेळ लागणार आहे त्या वृद्धांविषयी मी म्हणत आहे.


जीवनात अनेक दरवाजे कधी कधी मुद्दाम म्हणून तर कधी कधी नकळत भोळेपणाने बंद केले जातात.जीवनातले हे दरवाजे काहींच्या जीवनात वारंवार त्यांच्या तोंडासमोर धाडकन बंद केले जातात.त्यांचेच आईवडील,भाऊबहिणी,मित्रमंडळी त्यांच्याच समोर निर्वतले जात असताना किंवा त्यांच्या आयुष्यात ह्या लोकांचा सहभाग असतानाही असं होत असतं.काहींच्या आयुष्यात, अशा प्रकारची दुर्घटना किंवा मानसिक आघात,हा रोजचाच भाग झालेला असतो.


एकत्रीतपणे रहाणार्‍यांचं आणि दरवाजा बंद करायला उभे असलेल्यांचं एकमत होण्यासाठी क्वचितच हा दरवाजा सताड उघडा ठेवला गेलेला दिसेल.एकत्र कुटूंब स्थीर असणं हे काही लोकांच्या जीवनात क्वचितच होत असतं.बरेच लोक हा प्रकार स्थीर असावा म्हणून फारच उत्सुक्त असतात.


मी, ह्या सेंटरवर असणार्‍यांच्या म्हणण्याचा आढावा घेत असताना,माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटून गेली नाही की,त्यांच्या रूममधे कुटूंबातल्या लोकांचे हवे तेव्हडे फोटो त्या कुटूंबात ते होते त्यांची आठवण म्हणू टांगलेले दिसायचे. आपल्या कुटूंबियाना अलिंगनात घेऊन काढलेल्या फोटोत दिसणारी माणसं त्यांच्या जीवनात कालांतराने आपआपल्या मार्गाने गेलेली असतात.


दरवाजा बंद करण्यासाठी उभ्या असलेल्या हा नातेवाईकांशी गुंथून राहिलेल्या ह्या अभागी लोकांचा दरवाजा उघडा झाल्यावर समोर दिसणारा मार्ग भावूकपणे रहाण्याची कल्पना देतो.पण ह्या दरवाजातून दिसणारा मार्ग नेहमीच तुम्हाला वाटत असाव्यात त्या भावूक कल्पनेंचा नसतो. उलटपक्षी काहीसा,रोष,नाराजी,दुःख,अपराध आणि परित्यक्तता ह्या गोष्टीपण दाखवणारा असतो.ह्या सर्व भावना सामान्यतः प्रदर्शीत करताना ह्या लोकांना मी पाहिलं आहे.


सरतेशेवटी,आपण अशा दरवाज्यापाशी येतो,की जो वृद्धावस्थेशी जुळता मिळता असतो.असला हा दरवाजा  आठवणी सांगत असताना, त्या आठवणीत कटुता आणि मधुरता ह्याचं मिश्रण असतं असं प्रदर्शीत केलं जातं. हास्य-विनोद भरून असलेल्या,जेवणानंतर एखाद्या मधूर पदार्थांच्या थाळीने भरलेल्या,रात्री मागून रात्री झोप आणणारे,प्रेमाचे कडेकोट
बांधून मजबूत झालेल्या, अशा प्रकारच्या आठवणी वृद्धावस्थेत यायला हव्यात. परंतु,ह्या सुधार सेंटरवर मी अवलोकन केलेल्या  वृद्धावस्थेतला आनंदोत्सव दाखवणार्‍या बहारदार आठवणी मुळीच दिसत नाहीत.त्यांच्या आठवणी, वर्षानूवर्षाच्या  मनोव्यथेमुळे लवकर आलेलं वृद्धत्व चित्रीत करणार्‍या असतात.


 ज्या तर्‍हेने ते वयाने वृद्ध होत असतात त्या तर्‍हेने रहाण्या ऐवजी  हे लोक बरेचकरून जास्त वयस्कर भासू लागतात.इतर काही नशिबवान वृद्धांसारखं आनंदाने मश्गुल रहाण्या ऐवजी जीवनातला हा वास्तविक अध्याय आहे असं समजून ते रहात असतात.


प्रत्येक वाईट गोष्टीची चांगली गोष्टपण पीच्छा करीत असते.म्हणूनच एक दरवाजा बंद होत असताना दुसरा उघडला जातो.संधी घेण्यामधे मला विशेष वाटतं.प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळण्यासाठी समसमान संधी मिळायला हवी.


मला वाटतं,खडतर आयुष्य जगत असताना,वृद्धत्व आल्यावरही,मनोव्यथेतून,वेदनेतून,दुखावल्या गेलेल्या परिस्थितीतून जाताना त्यांना जे काही क्लेश झाले असतील त्यातूनही वर येण्याची क्षमता त्यांच्या अंगात असते.आपल्याला कुणीतरी मानावं ह्या मनस्थितीत ते असतात.


एखाद्याला दुःख झालं असताना त्याचा हात हातात घेऊन रहायला एखाद्याला का वाटावं?एखाद्याला दुखापत झाली असताना दुसरा सहज प्रवृति म्हणून त्याला आपल्याजवळ ओढून घेतो,त्याला भिडून बसतो,त्याला मिठीत घेतो.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा, यदा कदाचीत चालताना पडून माझ्या गुडघ्याला खरचटलं गेलं की, माझी आई लगेचच मला जवळ घेऊन माझ्या खरचटलेल्या जागेची पापी घेऊन फुंकर घालून म्हणायची,
"पटकन बरं होवो"
एखाद्याची ही अगदी साधी कृती,छोटसं प्रेम दाखवून जाते आणि होणार्‍या वेदना त्यामुळे निवळून जातात.लोकाना स्पर्श हवा असतो.जरी तसं आजुबाजूला दिसलं नाही तरी त्याची जरूरी असते.एखादा सहज झालेला स्पर्श एखाद्याला जीवनभर सुखी करू शकतो.स्पर्श हा एखाद्या ठिणगी सारखा असून कुणाच्याही जीवनात भडका पेटवून देऊ शकतो. म्हणूच मला स्पर्शाच्या क्षमतेविषयी खास वाटत असतं.



माझी भावना अशी आहे की,प्रत्येक वृद्धाला आपलं कुटूंब असण्याची पात्रता असते.तसंच मला वाटतं की त्याला ह्या वयात स्वतःहून
जगाला सामोरं जावं लागू नये. खरोखरचं प्रेम आणि दया याचा अर्थ काय असतो ते समजायला ते पात्र असतात.शेवटी मला असंही वाटतं की,प्रत्येक वृद्ध, मोठं आणि सुंदर, स्वप्न पहाण्याच्या संधीला पात्र असतो.
उरलेलं आयुष्य जगताना,आशा आणि अनुभव समजून घ्यायला पात्र असतो.


ह्या सुधार सेंटरवर, माझ्या पत्नीच्या कारणाने मी आल्याने,आणि ते केंद्र ह्या लोकांना देत असलेल्या सेवेचा विचार करून मला वाटायला लागलं आहे की,हे केंद्र ह्या वृद्धांसाठी एक संकेतदीप झाला आहे.कारण प्रत्येक दरवाजा बंद झाल्यावर हा दुसरा दरवाजा अशा लोकांसाठी उघडला जातो.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

   

Monday, April 9, 2012

अंतरातल्या नाना कळा...११





"जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील"


आज सकाळीच मी सुधार सेंटरवर आलो.आज पत्नीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मिटिंग घेतली जाणार होती.मुलांनी आपल्या दुपारच्या सुट्टीत मिटिंगसाठी सेंटरवर यायचं ठरवलं होतं.आम्ही दोघं आणि आमची मुलं आणि सेंटरकडून सोशल वर्कर,फि.थे.चा एक्सपर्ट आणि नर्सिंगची हेड असे सर्व जमलो होतो.


सोशल वर्कर बाईने पत्नीच्या देखभालीची माहिती दिली.आणि तिच्याकडून मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल सांगीतलं.ह्या बाबतीत ती बाई पत्नीवर खूश होती आणि तिला लवकर आराम मिळो अशी शुभेच्छा तिने दिली.


नर्सिंगच्या बाईने पत्नीला दिल्या जात असलेल्या औषधपाण्याची कल्पना दिली आणि शरीराच्या जरूरीच्या मोजमापाची-ब्लडशुगर,ब्लडप्रेशर वगैरे-समाधानकारक होत असलेली माहिती दिली.


फि.थे.च्या व्यक्तीने पत्नीच्या निरनीराळ्या अवयाच्या -हात पाय,कंबर वगैरेत व्यायामातून होत जाणारी प्रगति आणि त्यांचं मोजमाप किती समाधानकारक आहे ते सांगीतलं.


सुधार सेंटरचे हे लोक अशा निर्णयाला आले की असंच चाललं तर एप्रिलच्या अखेरीपर्यंत पत्नी वॉकर घेऊन स्वतंत्र पणे आपल्या पायावर चालेल.आम्हा सर्वांना हे ऐकून उमेद आली आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपआपल्या परिने काम करायचं ठरवलं.


मला राहून राहून ह्या मिटिंग नंतर प्रो.देसाय़ांची आठवण आली ते म्हणायचे,

"प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते..मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते."


मिटींग संपल्यावर माझी मुलं आपल्या कामाला गेली.जाताना त्यांनी आपल्या आईला भरपूर भरवसा दिला.
प्रेमाने अलिंगन दिलं.तिच्या डोळ्यात टपकणारे अश्रू आपल्या बोटांनी फुसले.
मी फक्त एव्हडंच म्हणालो,
"हे ही दिवस जातील"
तेव्हड्यात कुणीतरी शिंकलं.
माझी पत्नी लगेचच म्हणाली,
"ब्लेस यू"
असे वाकप्रचार वापरायची तिला आता इथे राहून सवय झाली होती.
माझी पत्नी व्हिलचेअर ढकलत आणि मी तिच्याबरोबर तिला सहाय्य देत तिच्याच सात नंबरच्या रूममधे आलो.
नर्सिस आणि त्यांच्या मदतनीसने येऊन पत्नीला तिच्या बिछान्यावर पडायला मदत केली.दोन तीन तासाची विश्रांती देऊन परत तिला उठवायला हा स्टाफ येतो.तिने सतत झोपून राहू नये हा त्यांचा उद्देश असतो.


ती लगेचच झोपी गेली.सकाळचा व्यायाम आणि दुपारच्या मिटिंगमुळे तिच्या जीवाला श्रम झाल्यासारखं वाटणं सहाजिक होतं.मीही तिच्या बेड जवळच खूर्चीवर बसलो होतो.मलाही थोडीशी डुलकी लागली.


मी लिहिलेल्या जून्या कवितेची कडवं माझ्या मनात एका मागून एक येऊ लागली.ही कविता थोड्याफार प्रमाणात ह्या प्रसंगाला लागू होत आहे असं मला वाटत राहिलं.

जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील

हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा
हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा
काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी
जीवन भासे यात्रा अन देवी तू मंदिरातील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील


हर एक फुल महकते आठव तुझी देऊन
तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून
हे तुळशी वृंदावन की प्रीतिचे ठिकाण
तू जवळ अथवा दूर असूनी आहेस काबील
जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील


हर एक शय्या झगमगे प्रीतिच्या किरणानी
ही झगमग पाहूनी नको आशा अधूरी जीवनी
जीवन यात्रेत असते सहयात्रीची जरूरी
यात्रा एकाकी करील माझे जीवन मुष्कील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील



यानंतर अधुनमधून



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishna@gmail.com

Wednesday, April 4, 2012

अंतरातल्या नाना कळा...१०



"सांजवेळी आली आठव सजणीची
हिच खरी समस्या असे जीवनाची"


१४ मार्च २०१२.
आज सुधार सेंटरवर येऊन एक आठवडा संपला. आज दुसर्‍या आठवड्याचा गुरवारचा दिवस.काल बुधवारी मी पत्नीकडे गेलो नव्हतो.माझी मुलं माझीही काळजी करायला लागली होती.दगदग होऊन मलाच जर का काही झालं तर त्यांची आणखी जबाबदारी वाढायची.फुर्ती,स्पुर्ती जरी माझ्या अंगात ह्या वयावर असली तरी वय साथ देईल असं नाही.म्हणून मलाही त्यांनी विश्रांती घ्यायला लावली.आणि मी ज्या दिवशी सुधार सेंटर जात नसायचो त्या दिवशी मुलं आळीपाळीने आपल्या आईला भेटून यायची.आणि मला संपर्कात ठेवायची.मला अजून चालायला काठी वगैरे लागत नाही.पण काठी हे झालं शरीराच्या गरजेचं.पण मनालाही काठीचा आधार लागत असावा. मला न समजणारी मनाला लागणारी काठीच जणू माझ्या मुलांनी मला द्यायला सुरवात केली.
हे लक्षात येऊन माझ्या एका कवितेतल्या ओळी मला आठ्वल्या,


थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे


एक दिवसाची सुट्टी घेऊन मी ज्यावेळी माझ्या पत्नीला भेटायला जातो आणि तिला सांगतो आज सबंध दिवसभर मी तुला संगत देणार ते ऐकून ती खूपच खूश असते.मला ते जाणवतं.माझ्या पत्नीची दुसर्‍या कुणाकडूनही सेवा करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.हा आजार येण्यापूर्वी गेली कित्येक वर्षं मी तिच्या बरोबर सावली सारखा राहिलो आहे.जिने आपल्याला ह्या जगात गेली त्रेपन्न वर्षं सहवास दिला,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना मला जीवनात दुसरी कसलीही मजा आनंद देऊ शकणार नाही.


जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.


खरं म्हणजे ह्या सुधार सेंटरवर माझ्याकडून तिची कसलीच शारीरिक सेवा होत नाही.सर्वच्या सर्व सेंटरवरच्या नर्सिस आणि इतर लोक करीत असतात.पण का कुणास ठाउक  मी तिच्या सहवासात राहिल्याने नकळत तिच्या मनाला माझ्याकडून धीर दिला जातो हा पण सेवेतला एक प्रकार आहे असं माझ्या मनात येऊन मला बरं वाटतं.


आज  मी तिच्या नकळत फि.थे.लॅबमधे जाऊन तिच्या व्यायामाचं निरक्षण करीत होतो.आज तिच्या पॅर्ललबारवरच्या चालीची प्रगती मला चांगली दिसली.तिचा व्यायाम घेणारेही आशापूर्ण होते.व्हिलचेअरवर तिला बसवून स्वतः तीने चेअर कशी चालवायची ह्याबद्दल मी तिला मदत करीत होतो.तिला उमेदही येत होती.


ज्या खडतर परिस्थितीतून माझी पत्नी जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात केले जाणारे उपाय उपयुक्त होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार.जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्‍या परिवर्तनाने जो भारदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुर्भाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.


येत्या सोमवारी म्हणजे १९ मार्चला सुधार सेंटरच्या लोकांशी आम्हा जवळच्या कुटूंबियाबरोबर माझ्या पत्नीच्या प्रगतिचा आढावा घेण्यासाठी मिटिंग आहे.पुढल्या आठवड्यात तिला वॉकर देऊन चालायची सवय करणार आहेत.


आज विकएन्ड असल्याने मी,माझे जावई आणि माझी मुलगी संध्याकाळी सुधार सेंटरवर पत्नीला आमची कंपनी देणार आहो.माझा मुलगा आणि माझी सुन सकाळपासूनच तिच्या जवळ आहे्त.तिला घराची आठवण येते आणि सेंटरवर अधुनमधून कंटाळा येतो.पण काय करणार? अंधारी रात्र संपल्यावरच दिवसाचा उजेड दिसणार.


दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे

झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे


क्रमशः



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 31, 2012

अंतरातल्या नाना कळा...९




"स्वर आले दूरूनी
जुळल्या सगळ्या आठवणी"


एक दिवस म्हणजे ह्या आठवड्याच्या सोमवारी मी माझ्या पत्नीला भेटायला गेलो नाही.सुधार सेंटरच्या सांगण्याप्रमाणे तिला स्वतंत्रपणे राहून ती स्वतःच प्रोत्साहित होण्यासाठी मी तिच्यापासून दूर राहिलो.


आज मंगळवारचा दिवस उजाडला.सकाळीच माझ्या मुलीने कामावर जाताना मला सुधार सेंटरवर सोडलं.माझ्या मुलीला आणि मला पाहून माझी पत्नी खूप आनंदी झालेली दिसली.कालच्या सकाळी फि.थे.च्या लोकांनी तिला अन्य व्यायाम देऊन पॅर्ललबारवर काही पावलं चालवली.असं करताना तिच्या पायाचे स्नायु तिला साथ देत आहेत.आजची तिची प्रगति पाहून माझ्या आशा वाढल्या आहेत.
सकाळी भरपूर व्यायाम झाल्याने थकून,दुपारचं तिचं जेवण झाल्यावर, ती तिच्या बिछान्यावर झोपली आहे असं पाहून कॉरिडॉरमधे व्हिलचेअरवर बसून येरझर्‍या घालणार्‍या पेशंटना हलो-हाय करीत मी फिरत होतो.


यु.सी.बर्कलीमधे प्रोफेसर म्हणून काम करीत असलेल्या एका तरूण पेशंटची मला माहिती मिळाली.त्याच्या मेंदूवर वाढत गेलेल्या टुम्यरची सर्जरी एक वर्षापूर्वी केली गेली होती.परंतु,दुर्दैवाने त्याला नंतर स्ट्रोक आला आणि सुधार केंद्रावर सुधारण्यासाठी त्याला पाठवलं आहे.बिचार्‍याचे हात पाय थरथरत असतात.बोलणंही नीट होत नाही.ह्या सुधार सेंटरवर गेल्या एक वर्षापासून त्याच्यावर फि.थे.आणि स्पिच थेरपीचे उपाय करून अलीकडे तो वॉकर घेऊन चालण्याच्या परिस्थितीत येत आहे.ह्या तरूण प्रोफेसरचं उभं आयुष्य अपंगावस्थेत जाणार आहे हे पाहून मी सद्गदित झालो.


जीवन किती बिनभरवश्याचं असतं ह्याचा विचार येऊन माझं मन चलबिचल झालं.ह्या वातावरणात सध्या माझा वेळ जात असल्याने एक एका पेशंटकडे बघून ही चलबिचल प्रकर्षाने जाणवते.ह्या सेंटरवरचा सगळाच स्टाफ,सर्व पेशंटना आदराने वागवणारा,दयाशील,कामात कुचराई न करणारा,समर्पित होणारा असा आहे.नव्हे तर त्यांना तसली शिकवणूकच आहे.इकडच्या संस्कृतितच ते भिनलेलं आहे.सकाळीच ह्या सेंटरवर आल्या आल्या भेटेल तो ओळख नसलेलाही,
हलो-हाय,
हाव आर यू डुईंग टूडे,
हाव यु डुइंग,
हॅव अ गुड डे,
मे आय हेल्प यु,
अशा तर्‍हेचे उद्गार,योग्य काळवेळ बघून, सहजतेने काढत असतात.
"वचने किम दरिद्रता"
ह्या संस्कृत वचनाचं जणू बाळकडू घेतलेले हे लोक असावेत असं मनात येतं.ह्यांच्यात राहून आमच्यासारख्याना पण ह्या चांगल्या सवई लावून घ्याव्यात असं वाटतं.


फेरफटका मारून झाल्यावर पत्नीच्या खोलीत मी आलो.अजूनही ती झोपली होती.तिच्या चेहर्‍यावर उमेदीची छटा दिसत होती.मला माझ्या कवितेतल्या चार ओळी आठवल्या,


दिवस ते गेले कुठे
 सांग ना! दिवस गेले कुठे
 नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा
 तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा
कठीण समयी निर्वाह केला कसा
 सांग ना! निर्वाह केला कसा



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 27, 2012

अंतरातल्या नाना कळा...८



करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे


आज शनिवार,सुट्टीचा दिवस. आज पुन्हा माझ्या पत्नीला पहायला नातेवाईक, सुधार सेंटरवर आले होते.त्यात विशेष करून आमची चारही नातवंड आली होती.मोठा नातू-मुलीचा मुलगा- सहा फूट चार इंच उंच, गोरा पान, राजबिंड,इंजीनियर झाल्यावर त्याच विषयात पीएचडी करीत आहे.नात -मुलीची मुलगी-युसी.बर्कलीमधे कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.दुसरी नात-मुलाची मोठी मुलगी-ग्रॅज्युएट झाली आणि आता मेडिसीनसाठी सिलेक्ट झाली आहे.आणि तिसरी नात-मुलाची मुलगी-सहावीत शिकत आहे.ह्या सर्व नातवंडानी आल्या आल्या आजीला पाहून तिला गराडाच घातला.आजीला मिठ्या मारून तिच्या पाप्या घेऊन,सर्वात धाकट्या नातीने स्वतःच्या हाताने चितारलेले,गेटवेल सून,ग्रिटींग तिला देऊन तिचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला.आजीच्या चेहर्‍यावरून ते दिसत होतं.असलं हे औषध बाजारात मुळीच विकत मिळणार नाही.


रोजच्या प्रमाणे,पत्नीची थेरपी चालूच आहे.पॅर्ललबार ह्या फि.थे.च्या एका उपकरणात उभं राहून पावलं टाकण्याच्या मुख्य व्यायामात थोडी थोडी प्रगती दिसत आहे.हा थेरपीचा दुसरा आठवडा चालू झाला आहे.तिसर्‍या आठवड्यात तिच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.मला आणि मुलांना १९ मार्चला बोलावून मिटींग घेतली जाणार आहे.


पेशंटकडे रोज एव्हडा वेळ न घालवण्याचा मला सल्ला दिला आहे.पेशंटची सर्व देखभाल होत असल्याने,पेशंटच्या सुधारासाठी प्रेरणा मिळण्याची जरूरी असल्याने त्याला नातेवाईकापासून एकाकी ठेवल्याने उद्देश साध्य होतो असं सांगण्यात आलं.त्यामुळे अलीकडे आम्ही सर्व अधुनमधून  तिला भेटायला जात आहोत.


माझ्या मनाला हा सल्ला कसासाच वाटला पण नीट विचार केल्यावर सल्ल्यातली सत्यता नाकारता येणार नाही अशी मनाची खात्री झाल्याने आठवड्यातून एकदा आणि विकेंडला एकदा असं मी माझ्या पत्नीच्या सानिध्यात रहायचं ठरवलं.माझ्या पत्नीनेही मला धीर देऊन तसं करायला समत्ती दिली.हे मला जास्त प्रोत्साहक वाटलं.


आज सोमवारचा दिवस होता.आज मी सुधार सेंटरवर गेलो नाही.घरीच वेळ घालवला.रात्री झोपायच्या वेळी तिची फारच आठवण येत होती.जुन्या आठवणीने मनात काहूर केलं होतं.समुद्ररूपी संसाराच्या पुन्हा आठवणी येऊ लागल्या.वय होत चालेलं असताना मन भयभयीत होतं.समुद्रातही असंच होत होतं.


हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.त्रेपन्न वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे छत्तीस महिन्यांची सोबत, म्हणजेच जवळ जवळ  एकोणीस हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला  विचारतो,
"उद्या कसं होणार?"
आणि ती पण कधी कधी  मला सहाजिकच म्हणते
"उद्या कसं होणार?"


तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्या होता.आणि हाच आज उद्याचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्या होतच रहाणार आहेत. तेव्हां,
आता कशाला उद्याची बात?



स्वप्न विरल्यावर जागा झालो.वास्तवीकतेत आलो.उद्याची बात करायची जबाबदारी आली आहे ह्याची जाणीव झाली.
ही व्याधी होण्याआधी होती ती परिस्थिती परत आल्यावर रोजच घरी व्यायाम तिला करावा लागणार आहे आणि मला तिच्या जवळ बसून तिचा व्यायाम घ्यावा लागणार आहे.हे नक्कीच झालं आहे.
माझ्याच एका जुन्या कवितेची मला आठवण आली.


निरोगी मौज

पडूं आजारी
मौज हिच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे


क्रमशः


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com