Sunday, October 30, 2011

दावूनी बोट त्याला,म्हणती हसून लोक.

"अश्रूनी भरलेले डोळे पुशीत मी ज्यावेळी घरी यायची तेव्हा माझी आई नेहमीच माझा धीर उत्क्षेपक करायची."


जे.पी रोडवर स्वदेश हॉटेल समोर माझी आणि वंदनाची गाठ पडली.तिला पाहून मी एकदम चकीत झालो.माझा अचंबीत चेहरा पाहून वंदनापण थोडी लाजलेली मी पाहिली.
रस्त्यात गप्पा मारण्यापेक्षा आपण स्वदेशमधे कॉफी पिऊया असं मी तिला म्हणालो.


वंदनानेच मला ओळखलं.एरव्ही मी तिला ओळखलं नसतं.तसं पाहिलंत तर खूप वर्षानी मी तिला भेटलो होतो. माझ्या मनात तिची छबी होती ती म्हणजे जाड काचेचा गोल चष्मा आणि एकदम सुदाम्याची प्रकृती असलेली वंदना.पण आता वयात आलेली तरूण वंदना अगदीच निराळी दिसत होती.चष्मा जाऊन आता तिने कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला सुरवात केली असावी आणि अंगानेपण थोडी भरली होती.


कॉफीचा पहिला घोट घेऊन झाल्यावर मी वंदनाला म्हणालो,
"काही फुलं कशी उशीरा उगवतात तशीच काही मुलं उशीरा मोठी होतात.उशीरा सुंदर दिसतात."
वंदना आता सुंदर दिसते हा माझा शेरा ऐकून वंदना खूपच खजील झाली.


मला म्हणाली,
"तळ्यात पोहत असलेल्या बगळ्यांच्या पिल्लांच्या कळपात असलेलं,काळसर दिसणारं बदक खरं तर राजहंस असतं.जरा मोठं झालं की ते त्या कळपातून सहजच उडून जातं.
माझ्या आईचं मला सर्वांत आवडणारं सांगणं म्हणजे,ती मला म्हणायची की,
"तू मुळीचच पुस्तकी किडा नाहीस."
माझ्या मनात हा विचार आल्यावर माझी मलाच गंमत वाटते.मी अगदीच हाडळकुळी होते.मी इतकी हाडकुळी होते की मला माझे डॉक्टर म्हणायचे की,
"तुझ्यात काही तरी,कमी आहे."
असेल काहीतरी कमी.माझे जाड भिंगाचे दोन चष्मे होते.माझ्या चेहर्‍याला ते खूप मोठे दिसायचे.अगदी गोल आकाराचेही होते."

मी म्हणालो,
"अगदी लहानपणी मी तुला पाहिल्याचं मला आठवतं.साधारण पहिलीत असशील."


माझं हे ऐकून वंदनाला आपल्या लहानपणची आठवण आली असावी.कॉफीचा घोट घेण्यासाठी उचललेला कप पुन्हा बशीत ठेऊन हसत,हसत मला म्हणाली,
"मला आठवतं, मी पहिलीत असताना,तुम्ही मला पाहिलं असतंत तर,मी आमच्या शाळेच्या खेळाच्या मैदानात असताना घाबरून एव्हडी पळत रहायची की,अगदी दुष्ट विचाराची दोन मुलं माझा खूप पाठलाग करायची. सरतेशेवटी ती दोन दुष्ट मुलं मला पकडायची,कारण माझ्या पायात असलेल्या त्या छोट्याश्या काळ्या बकलच्या बुटात मला जमेल तेव्हडं, जोरात पळायचा मी प्रयत्न करायची.पण ती दोघं मला ढकलून द्यायची आणि
पाडायची.

एक चांगली जोराची धडक मिळाल्याने मी जमीनीवर उलथी-पालथी व्हायची आणि माझ्या आईला आवडणारा हिरवा,लाल,काळा कुठलाही फ्रॉक त्यादिवशी घालून गेलेली मी,खरचटलेला गुडघा आणि गुडघ्याजवळच फाटलेला फ्रॉक घेऊन,लंगडत,लंगडत घरी यायची.

हाडकुळी आणि डोळ्यावर, चेहर्‍यावर उठून दिसणारा, मोठा चष्मा असलेली ती मी सहासी पण हास्यास्पद दिसायची.माझ्यात आलेला माझा स्वतःचा जोश मलाच सांगायचा की,माझा कुणीही पाडाव करू शकणार नाही.खरं म्हणजे ह्या जोशावर माझ्या आईचा हक्क असायला हवा.
अश्रूनी भरलेले डोळे पुशीत मी ज्यावेळी घरी यायची तेव्हा माझी आई नेहमीच माझा धीर उत्क्षेपक करायची.

अशाच वेळी मी आणि माझी आई एकमेकाजवळ बसून त्या राजहंसाची गोष्ट वाचायचो.माझा तर्क आहे की ह्यासाठीच हे एकशे एकावं कारण असेल मी माझ्या आईवर प्रेम करण्याचं.

पाचवीत असताना मी गावातून शहरात शाळा शिकायला गेली.अजूनही मी विचित्र आणि हाडकुळी दिसायची,अजूनही माझ्या डोळ्यावर जाड काचांचा चष्मा असायचा आणि त्यात भर म्हणून आता मी माझे दात पुढे येऊ नयेत म्हणून तारा लावायची.डोळ्यावरच्या चष्मामुळे आणि दातावरच्या तारेमुळे मी विचित्र दिसते असं माझ्या वर्गाची बाई मला म्हणायची.
मागे वळून पाहिल्यावर मला माझ्या दिसण्याचं हसू येतं.मला वाटतं त्या लोकांचं म्हणणं अगदी योग्य होतं.

एकंदरीत काय? माझी आईच खरंतर बरोबर होती.ज्या गोष्टींमुळे माझा पाणउतारा व्ह्यायचा त्या गोष्टींकडे बघीतल्यावर आता मला गंमत वाटते,आणि माझं मलाच हसू येतं.माझ्या डोळ्यावरचा चष्मा माझ्या चेहर्‍यासाठी मोठा होता किंवा माझा हाडकुळेपणा कुणाच्या डोळ्यात खुपायचा,पण मी कशाला पर्वा करायची त्याबद्दल.?

माझा तर्क आहे की,असेन मी त्यावेळी दिसत हास्यास्पद, असेनही मी हाडकूळी,माझी समज आहे की,अजुनही मी तशीच आहे.पण माझी मी आहे.आणि सध्या मी जशी आहे तशी आहे हे पण ठीक आहे.मी माझा स्वतःचा स्वीकार केला नाही तर कुणीही मला स्वीकारणार नाही."

वंदनाची सत्य परिस्थिती ऐकून मला ही तिचा थोडा गहिवर आला.
मी तिला म्हणालो,
"एखादी व्यक्ती आतून कशी आहे हे महत्वाचं आहे.चवथीत असताना तो फाल्तू जाड काचेचा गोल चष्मा तुझ्या डोळ्यावर होता तो इतका महत्वाचा नव्हता.
मला वाटतं,कुणालाही राजहंस असण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचा स्वीकार त्याने केला पाहिजे.पण काही कारणास्तव कुणी राजहंस नसलं, तरी,ते काळंबेरं बदकाचं पिल्लूसुद्धा तितकच गोजिरवाणं असतं,असं मला वाटतं."


असं म्हणून झाल्यावर वंदनाला काय वाटत असेल हे पहाण्यासाठी तिच्या चेहर्‍याकडे लक्ष देण्याऐवजी,मी वेटरला पैसे देण्याचा बहाणा करून कॉफीच्या बिलाकडे पहात होतो.
कॉन्टॅक्ट लेन्स असलेले तिचे डोळे कोणत्याही कारणानी ओले झाल्याचं मला पाहायचं नव्हतं.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 27, 2011

“मला माहित नाही!”


“प्रेम म्हणजे काय असतं हे समजण्याची जरूरी नसण्याची अनुमति माझ्याच मला मी दिली आहे.असं करण्याने प्रेमाचाच सुगावा मला लागलेला आहे.”

मला आठवतं,फार पूर्वी पासून मनोहरशी बोलताना त्याला एखादा प्रश्न केला की बरेच वेळा तो त्याला काही माहित असलं तर ते सांगून टाकायचा.
मला त्यावेळी वाटायचं की मनोहर खरोखरंच साधा सरळ माणूस आहे..कारण असं सांगून टाकण्याने हा माणूस पुढच्या प्रकरणापासून नामानिराळा व्हायच्या प्रयत्नात नसतो हे उघड दिसायचं.

पण अलीकडे,अलीकडे मी पाहिलंय मनोहर,
“मला माहित नाही”
असं कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याच्या प्रयत्नात असायचा.
आपण माहिती दिली म्हणून आपलं नाव उगाचच येऊ नये म्हणून तो तसं करीत असावा असा मी कयास काढला होता.

हल्लीच एकदा मी मनोहरला म्हणालो,
“असा तू पूर्वी नव्हतास.तुला माहित असलेलं सर्व काही निःसंकोच सांगून टाकायचास.आता
“मला माहित नाही”
हे प्रकरण काय आहे.?सांगशील का मला.”
मनोहरची आणि माझी दोस्ती तशीच होती म्हणून मी त्याला सरळ सरळ असा प्रश्न करायला धजलो.

“मला माहित नाही”
असं म्हणायला शिकलं पाहिजे असं अलीकडे मला वाटायला लागलंय.
बराच काळ मी असं समजून होतो की,जीवनात सर्व काही अगोदरच माहित असायला हवं. हे माझं नियुक्त कर्म आहे.आणि काही शिकायची जरूरी नाही.मी कुणाचीही मदत घ्यायला आणि मी अज्ञानी असल्याबद्दल कबूल करायला कांकूं करायचो.माझं ड्राईव्हिंग लायसन्ससुद्धा मी बराच मोठा होईतो घेतलं नाही,कारण अगोदरपासून ड्राईव्हिंग करायला न येणं असं वाटण्याच्या अनुभवाचीच मी घृणा करायचो.
म्हणून मी ड्राईव्हिंग करायचं शिकतच नव्हतो.

जसे दिवस निघून गेले तसं,
“माझं वय जितकं होत जाईल तितकं मी समजून चुकणार आहे की तसं मला कमीच माहित असतं”
ह्या रुढोक्तितल्या अर्थात मी जगत आहे.असं मला वाटायला लागलं आहे.

मला कळत नाही की, काही लोकांची जीवनं इतकी समृद्ध असतात आणि काही लोकांना जीवन जगण्यासाठी एव्हडे कष्ट घ्यावे लागतात.
मला कळत नाही की,लोकं त्यांना हव्या असलेल्या लोकांच्या प्रेमात का पडतात.
मला कळत नाही की,शांती आणि न्यायासाठी केल्याजाणार्‍या प्रगतीला एव्हडा असाध्य प्रयास का पडावा.
मला कळत नाही की,आपल्या रोजच्या जीवनाला सततच्या परिश्रमाव्यतिरिक्त दुसरा काही अर्थ किंवा स्वरूप आहे का.
मला कळत नाही की,ज्याची प्रेम म्हणून सुरवात होते ते भग्न का होतं.
मला कळत नाही की आपण एकमेकाला आणि स्वतःलापण दुखावून का घेत असतो.

हे सर्व जे मला कळत नाही त्याचा विचार येऊन मी मला बेचैन करून घ्यायला लागलो.अजूनही कधी कधी मला वाटतं की,मागे मी जसा बहाणा करायचो की जीवन काय आहे याचा अर्थ मला माहित आहे,कल्पना करत होतो की,ज्या गोष्टी आहेत त्या तशा का आहेत त्याची मला समज आहे.
ते चालूच ठेवावं.
अजूनही माझ्या विचारसरणीतून माझी धडपड होत असते की,आपल्याला माहित नसणं म्हणजेच ती आपली असफलता असणं.

परंतु,”माहित नसण्याच्या” देणगीचा सुगावासुद्धा मला आता लागला आहे.सर्वच उत्तरं माझ्या जवळ नसण्यातल्या स्वातंत्र्यातली मजा मला कळायला लागली आहे.आता मी दुनियेकडे नव्या दृष्टीने-कुतूहल करून,अचंबा ठेवून आणि मी आश्चर्याचा अपेक्षीत आहे असं भासवून पहात असतो.

प्रेम म्हणजे काय असतं हे समजण्याची जरूरी नसण्याची अनुमति माझ्याच मला मी दिली आहे.असं करण्याने प्रेमाचाच सुगावा मला लागलेला आहे.ज्या गोष्टी घडतात त्या तशा का घडतात हे मला ठाऊक नसण्याबद्दल कबुली देऊन,माझ्या लक्षात आलं आहे की,माझ्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात मी जास्त हजर असतो.

पूर्वी जेव्हा जेव्हा मला नसमजलेल्या गोष्टीबद्दल उत्तर द्यावं लागायचं तेव्हा तेव्हा मी माझ्या उत्तरातल्या वाक्याला अर्थ येण्यासाठी “चमत्कार” ह्या शब्दाचा वापर करून रिक्त जागा भरून काढायचो.
असं करताना मी त्याकडे तात्पुरतं उत्तर म्हणून-
“नक्कीच सध्या हा चमत्कारच आहे पण एक दिवस मला समज येईल.”
अशी समजूत करून घ्यायचो.

त्यावेळी कधी कधी “चमत्कार” शब्दाचा, उत्तर देताना, त्या वाक्यात वापर करून, त्या शब्दात मला अधीक अधीक गहिरं सत्य दिसायचं आणि ती जबरदस्त देणगी वाटायची.
पण आता,
“माहित नसण्याशी”
मी अधीक अधीक कृतज्ञ व्ह्यायला लागलो आहे.आणि हे सर्व माहित नसण्याने शक्य झालं आहे.”

हे सर्व मनोहरकडून ऐकून माझ्या मनात आलं की,हा गृहस्थ खरोखरच उपजतच साधा सरळ माणूस आहे.कारण
“मला माहित नाही”
ह्या त्याच्या अलीकडच्या उत्तर देण्याच्या प्रयत्ना बाबत मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर
“मला माहित नाही”
असं देऊन तो मला टाळू शकला असता.पण त्याने तसं केलं नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 24, 2011

दोन वाळूचे कणही सारखे नसतात.

“आज मला वाटतं, एखादा, अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा, अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.”

फॉल चालू झाल्यावर इतक्या लवकर इतकी जोरात थंडी पडत नाही हा माझा अनुभव होता.अजून पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला जायला काहीच हरक नसावी असं मला वाटत होतं.आज सकाळीच खिडकीच्याबाहेर डोकावून पाहिल्यावर काहीच दिसत नव्हतं.एव्हडं की शेजारच्या परसातलं सफरचंदाचं झाड अजिबात दिसत नव्हतं.धुकंच एव्हडं पडलं होतं त्यामुळेच हे झालं होतं.

तेव्हड्यात प्रो.देसायांचा फोन आला.
“आज संध्याकाळी तुम्ही आमच्याच घरी या.खूपच थंडी आहे त्यामुळे संध्याकाळी तळ्यावर जाण्याचं टाळलेलं बरं.”

मी संध्याकाळी भाऊसाहेबांच्या घरी गेलो.प्रो.देसायांबरोबर आणखी दोन गृहस्थ गप्पा मारीत असताना दिसले. त्यापैकी एका गृहस्थाची आणि माझी ओळख होती.दुसर्‍यांशी माझ्याशी ओळख करून दिली गेली.

भाऊसाहेब मी येताच म्हणाले,
“तुमचीच आम्ही वाट पहात बसलो होतो.तोपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या.”

मी म्हणालो,
“आज गप्पाचा खास काय विषय आहे.?”

“त्याचीच प्रस्तावना करण्यासाठी मी तुमची वाट पहात होतो.ऐकातर.”
असं म्हणून भाऊसाहेब सांगू लागले,
“माझ्या लहानपणी असं सांगीतलेलं मी ऐकलंय की,आकाशातून पडणारे दोन बर्फाचे पापुद्रे सारखेच नसतात. त्यासाठी समुद्रावर जाऊन मुठभर वाळूतल्या कणात साम्य आहे काय, हे पहाण्याचा प्रयत्न मी केला.ते मुठभर वाळूचे कण वेगवेगळे होते.काही काळे आणि तूटलेले तर काही गोल आणि पूर्ण होते.काही चपटे आणि उन्हाने भुरे झाले होते.पण कितीही प्रयत्न करून एकसारखे दोन कण मला मुळीच पहाता आले नाहीत.मला वाटतं, सामान्यतेतच खरी जादू आहे.त्यात विशिष्टता असते,अद्वितयता असते.

प्रत्येक वस्तू विशिष्ट असते,अद्वितीय असते त्याचबरोबर पूर्णपणे सारखी असते.हे पहाण्यासाठी जगाकडे दोन-चार निराळ्या दृष्टीकोनातून बघण्याची जरूरी आहे.उदा.म्हणून सांगायचं झाल्यास,जगातला कोणताही पदार्थ घेतल्यास तो तीन साध्या गोष्टीने बनलेला असतो-प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेकट्रॉन्स.ह्या तीन गोष्टी एकत्र येऊन एकमेकात त्या वेष्टित होतात,त्यांची चवड होते आणि मग सर्व काही होतं.अगदी शब्दशः प्रत्येक गोष्ट,अन्य गोष्टीने बनते.

हे लक्षात ठेवूनच,बरेच वेळा ह्या क्लिष्ट गोष्टीत असलेली गुढता आणि स्पष्टता समजून घ्यायला मला आधार मिळतो.सरतेशेवटी, तेच नियम आणि तिच नियंत्रण ठेवणारी ताकद, इतर गोष्टी बनवायला अणुचा वापर करते. सहाजीकच मीही स्वतः ह्या अणूंचाच बनलेलो आहे.”

हे प्रो.देसायांचं तत्वज्ञान ऐकून मी म्हणालो,
“ह्यामुळेच मला वाटतं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे,प्रत्येक वादाला पर्याय आहे,प्रत्येक “कां?” ला स्पष्टीकरण आहे.हे खरं आहे की असे अनेक प्रश्न आहेत की त्यांना माझ्याजवळ उत्तर नाही,पण त्याचा अर्थ ते प्रश्न अस्तित्वातच नाहीत असं नाही.एव्हडंच की त्यांची उत्तर अजून शोधून काढायची आहेत.
उलटपक्षी,मला असंही वाटतं की,प्रत्येक गोष्ट स्वतः पुरती असते.आपल्याला काय वाटतं?”

माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून भाऊसाहेब म्हणाले,
“विशिष्टता आणि अद्वितयता हा दुहेरी सिद्धान्त मनात बाळगून राहिल्याने माझ्या जीवनाने मला नम्र आणि कृतकृत्य बनवलं.कसं ते सांगतो.
एखाद्या झाडाखाली मिळेल ते एखादं पान उचलून पाहिल्यावर त्यात जगातलं आतलं जग,जगावरचं जग माझ्या हातात आहे असं मला वाटतं.ज्या झाडावरून ते पान पडलं त्या झाडाकडे पाहिल्यावर,माझ्यातला आणि त्या झाडातला फरक म्हणजे,अणुची संख्या,त्यांचं क्रमस्थान आणि घनत्व ह्याने झालेली आमच्या दोघांची, म्हणजेच त्या झाडाची आणि माझी, घडण अगदी सरळपणे स्पष्ट होते.

झाड हे झाडासारखंच असणार.पण मी, उठून भोवताली जाऊ शकतो.मला बोलता येतं,पोहता येतं,प्रेम आणि द्वेष करता येतो आणि कसल्याही गोष्टीत भाग घेता येतो ह्यामुळेच मी माणूस आहे हे समजलं जातं. माझ्या भोवतालचं जग माझ्यात बदल घडविण्याऐवजी जगालाच मी हवं तसं बदलू शकतो हे माझ्यातलं सामर्थ्य काय कमी आहे? ह्याचा विचार येऊन मग वाटतं, अणूच्या संम्मिलनाने झालेली माझी ही घडण आहे. मला मिळालेल्या ह्या पर्यायाने माझं मलाच धन्य वाटायला लागतं.

गेली अनेक वर्षं मला लोक विचारतात माझ्या श्रद्धेबाबत.पण आज मला त्याचं उत्तर गवसलं आहे.आज मला वाटतं,एखादा अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.ह्या सुंदर,गहन आणि अखंड जगाबाबत मला विशेष वाटतं.
सर्व गोष्टींचं अस्तित्व आणि सर्व गोष्टीत असलेले आपलं अस्तित्व ह्याबद्दल मला विशेष वाटतं.”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“खरंच भाऊसाहेब,आजची संध्याकाळ मजेत गेली.काही तरी मी नवीन शिकलो असं मला वाटतं.त्या दोघा गृहस्थानी मला दुजोरा दिला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 21, 2011

खळगे खणण्यातली मजा.



“माझ्या अहंमन्यतेला झुगारून द्यायला मला थोडा वेळ द्यावा लागला.”

श्रीधरची कोकणात खूप इस्टेट आहे.अलीकडे त्याने आपलं वाडवडीलांचं जूनं घर,जूनं घर कसलं? वाडाच होता, मोडून नवीन टुमदार बंगली बाधली होती.आणि तीसुद्धा शेताजवळच.हल्ली त्यालाच फार्म-हाऊस म्हणतात असा माझा समज होता.

मागे मी श्रीधरला भेटलो होतो त्यावेळी मी त्याला म्हणालो होतो,
“मी तुझं फार्म-हाऊस बघायला यायचं म्हणतोय.”
मला कोकणातला पावसाळा भारी आवडतो हे श्रीधरला माहित होतं.मी मागे बोलल्याची मला आठवण करून देत श्रीधरने ह्या पावसाळ्यात नक्की येण्याचं आमंत्रण दिलं.

एक आठवड्यासाठी मी श्रीधरच्या फार्म-हाऊसवर पावसाळ्याच्या दिवसात कोकणात गेलो होतो.पाऊस दाबून पडत होता.सर्व भोवताल हिरवं गार झालं होतं.कोकणात अजूनही थंडी पडते.आणि पावसात सर्व थंड झाल्यावर कोकणात खूपच मजा येते.धो,धो पाऊस पडत असल्याने घराच्या बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.त्यामुळे घरी बसून गप्पा मारण्यापलीकडे काहीच उरलं नव्हतं.

श्रीधर शेतकी इंजीनीयरींग कॉलेज मधून ग्रॅड्युएट झाला असल्याने त्याला आपल्या फार्म-हाऊसवर खूप सुधारणा करयाला वाव मिळाला होता.आपल्या वडीलांच्या वेळच्या गप्पा गोष्टी सांगत असताना त्याला त्याच्या लहानपणी,शेतात काम करीत असताना वडलांकडून मिळत गेलेली शिस्तीची वागणूक आठवून गमती सांगत होता.

मला म्हणला,
“जमीनीत खळगा करायला मला विशेष आवडतं.मला आठवतं माझ्या लहानपणी माझे बाबा जे मला करायला सांगायचे ते करायला मी क्वचितच नाकारायचो.पण कधी नाकारायचा प्रसंग आलाच,बहुदा असा प्रसंग आम्ही आमच्या शेतात काम करताना यायचा, तर माझे बाबा मला सांगायचे,
“हे मी सांगीतलेलं काम तुला करायचं नसेल तर,कुदळ आण आणि मी सांगेन तिथे खळगा खण.”
त्यांच्या सांगण्यात गंमत कसलीच नसायची.ते गंभीर होऊनच मला सांगायचे.त्यामुळे मी लगेचच ते काम घ्यायचो.

माझ्या लहानपणी,खळगा खणणं,ही मला मोठी शिक्षा वाटायची.दुपारच्या समयात,जमीनीत सापडण्यासारखं काहीही नसताना,खळगा खणणं म्हणजे एखाद्या गुलामासारखं,खण,खण खळगा खणून मी माझ्या हातापायाला चिकट माती लावून घ्यायचो.अर्थात,दहा वर्षाच्या वयाचं माझं ते मन जरा जास्तच वाईट वाटून घ्यायचं.पण त्यातलं खरं तथ्य म्हणजे,खळगा खणणं हे एक निर्थक,पण गंमत देणारं काम आहे असंही मला वाटायचं.

त्यानंतर जीवनात मी बरेच खळगे खणले आहेत.शेतात म्हणाल तर रोजच खळगे खणावे लागायचे.त्रास म्हणून नव्हे,शिक्षा म्हणून नव्हे तर तो एक रोजच्या कामातला भाग होता.माझं पूर्ण जीवन,ज्यांचं जीवनात खळगे खणायचंच काम होतं,अशा लोकांच्या बरोबरीने काम करण्यात गेलं.योग्य शब्दात सांगायचं झाल्यास,ते शारीरीक परिश्रम असायचे.पण शेवटी मतितार्थ एकच त्यांची रोजगारी म्हणजे त्यांचे हात असायचे.

नंतर माझ्या बाबांनी मला शाळेत शिकायला घातलं.मी कॉलेजातही चांगले गुण मिळवित होतो.
त्यानंतर बरेच दिवस मी अशी समजूत करून घेतली होती की,हाताने रोजगारी करणारे,पण मनाने काम न करणारे हे काही कारणास्तव कमी दर्जाच्याचे आहेत.सहाजीकच त्या हाताने काम करणार्‍यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे असं मला वाटायचं.पण नशिबाने मी माझी ही समजूत चुकीची आहे हे शेतकी कॉलेजात शिकायला गेल्यावर लक्षात आणू शकलो.

आमची शेतीवाडी भरपूर असल्याने,शेती व्यवसायात येत असलेल्या आधूनिक बाबी शिकायला मला माझ्या बाबांनी पुण्याच्या शेतकी कॉलेजात घातलं.त्या शिक्षणक्रमात मला हाताने काम करणं अगदी आवश्यक होतं. महत्वाचं म्हणजे,ज्यांनी आपल्या जीवनाची घडण हात वापरून केली अशा लोकांशी माझी भेटाभेट व्ह्यायला लागली.

घरच्या समृद्ध परिस्थितीमुळे मला बर्‍याचश्या गोष्टी सहज मिळत गेल्या असल्यातरी,कॉलेजातल्या वर्कशॉपमधे माझ्या हातांचं कसब अपूरं पडायला लागलं.साधं उदाहरण म्हणून सांगतो.आमचे मास्तर वेल्डींग कसं करायचं ते आम्हाला शिकवत होते.ज्यावेळी प्रथमच मी वेल्डींग करायला गेलो तेव्हा ती वेल्डींग करायची सोल्डरची कांडी, ज्या टेबलावर वेल्डींगचा जॉब ठेवला होता,त्या टेबलाला कशी चिकटून राहू नये हे शिकण्यात माझा अर्धा वेळ जायचा.

माझ्या स्वाभिमानाला तेव्हा तडा गेली जेव्हा वेल्ड केलेले आमचे जॉब मास्तरांकडे गुणदोष तपासून गुण मिळण्यासाठी गेले तेव्हा.
वेल्ड केलेले धातूचे दोन तुकडे मास्तर निरखून पहात असताना,माझा वेल्डींगचा भाग हा काहीसा नुसता थापलेला सोल्डर दिसत होता.दोन धातूचे तुकडे जेमतेम एकमेकाशी धरून होते.परंतु,माझ्या इतर वर्ग मित्रांचं काम फारच उच्च दर्ज्याचं होतं.सोल्डर नीट वितळून दोन धातूंच्या तुकड्याशी संलग्न झाल्यासारखं दिसत होतं.

आणि ह्याचवेळी माझ्या लक्षात आलं की,दोन प्रकारचं बुद्धिचातूर्य,दोन प्रकारची प्रतिभा असते.काही लोक आपल्या बुद्धिमुळे चतूर असतात तर काही आपल्या हातामुळे असतात.काही माझ्याशी सहमत होणार नाहीत पण एका पेक्षा दुसरं वरचढ नसतं.कारण दोघांना एकमेकाची जरूरी भासत असते.

काही चतूर लोकांकडून घर बांधणीची योजना करून घेता येईल पण ते घर बांधायला चतूर हातांच्या लोकांशिवाय ते शक्य होणार नाही.माझ्या अहंमन्यतेला झुगारून द्यायला मला थोडा वेळ द्यावा लागला.मला समजून आलं की एका एव्हडंच दुसरं चातूर्य महत्वाचं आहे,नव्हेतर दोन्ही सारखीच महत्वाची आहेत.
खळगे खणण्यात काय महत्व असतं आणि काय मजा असते ते तेव्हा मला कळलं.”

मी श्रीधरला म्हणालो,
“तुझा बंगला आणि त्याच्या भोवतालचा परिसर पाहून, चतूर हात आणि चतूर डोकं कसं वापरलं जातं हे, कळायला मला वेळ लागला नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 18, 2011

अनंतराव (अंत्या) अंतरकर.

“पण अंत्याच्या बाबतीत,साईटवर “लाईक पोल्स ऍट्रॅक ऍन्ड डीसलाईक पोल्स ऑल्सो ऍट्रॅक” असं काहीसं आहे.”

आज मला अनंतराव अंतरकरांची बर्‍याच वर्षानी आठवण आली.अनंतरावाना अंत्या म्हणून जास्त ओळखलं जातं.
अनंतराव मुळ कोकणातले.माडा-पोफळीच्या बागा,कलमी आंब्यांची बनं,भात-शेतीचे कुणगे ही त्यांच्या वाडवडीलांची मिळकत,त्यातून खच्चून येणारं उत्पन्न उदर्निर्वाहासाठी खर्चूनही भरपूर बचत होतेच.तशांत अंत्या लग्नाच्या भानगडीत अजीबात पडले नाहीत.त्यामुळे संसाराचा खर्च निश्चितच वाचला.थोडे स्वतःच्या कनवटीचे पैसे घालून एक साईट त्यांनी तयार केली.
एका सदगृहस्थाच्या सुचनेवरून मी ह्या साईटवर माझे पोस्ट लिहायला लागलो.
माझे त्या साईटवर तीनशे लेख लिहून झाल्यावर अंत्याची आठवण येऊन तीनशेवा लेख लिहाला.त्याची आठवण आली.लेखाचं शिर्षक होतं,

“अंत्या म्हणजे शब्द-चुंबक.”
मंडळी,आज आम्हाला ह्या साईटवर येऊन बराच काळ निघून गेला.ह्या अवधीत आमचा हा 300 वा लेख आहे. आम्हाला वाटलं आज आपण ह्या तिनशेव्या लेखामधून अंत्याचे आभार मानावे.त्याच्याच कृपेने आम्हाला एव्हडं लेखन करता आलं.साईटवर लेखन स्वातंत्र्य,शुद्ध/अशुद्ध लेखन स्वातंत्र्य,लेखनातल्या विचाराचं स्वातंत्र्य, प्रतीक्रियेचं स्वातंत्र्य, प्रती-प्रतीक्रियेचं स्वातंत्र्य, एव्हडं स्वातंत्र्य आम्हाला स्वतःच्या ब्लॉग शिवाय कुठेच मिळालं नसतं.नव्हेतर ही साईट हा आमचा स्वतःचाच ब्लॉग असं समजून आता पर्यंत आम्ही लिहीत आलो.

अंत्या हा विषय घेऊन हा लेख लिहावा असं आमच्या मनात आलं आणि सुचत गेलं ते लिहिलं.त्यात काही आम्ही पाप केलं असं आम्हाला मुळीच वाटत नाही.अंत्याला पण आम्हाला वाटतं तसंच वाटो ही अपेक्षा.
अंत्या ह्या व्यक्तीचा आम्ही विचार केला.आणि आम्हाला जे सुचलं ते आम्ही खाली लिहीत आहो.
ह्या साईटवर अंत्या ह्या शब्दात चुंबकत्व आहे.असं मला दिसून आलंय.
“लाईक पोल्स रिपेल ऍन्ड अनलाईक पोल्स ऍट्रॅक”
अशी लोहचुबंकाची थेअरी आहे.
पण अंत्याच्या बाबतीत,
साईटवर “लाईक पोल्स ऍट्रॅक ऍन्ड डीसलाईक पोल्स ऑल्सो ऍट्रॅक” असं काहीसं आहे.
म्हणून म्हणतो अंत्या म्हणजेच शब्द्चुंबक म्हटलं पाहिजे.
आता मी काय साईटवर अवलोकन केलं आहे ते सांगतो.
साईटवर अंत्याचा लेख आणि त्याचं नाव दिसलं की वाचकांची हीss झुंबड लागते.वाचायला आणि लिहायला.
कशासाठी बरं?
अशासाठी, की अंत्या ह्या शब्दात एक प्रकारचं चुंबकत्व साईटवर निर्माण झालं आहे.
अंत्याचा लेख असल्यास वाचण्यासाठी.
अंत्याच्या लेखावर एखादा प्रतिसाद असला तर आणखी प्रतिसाद देण्यासाठी.
नसला तर पहिलाच प्रतिसाद देण्यासाठी.
अंत्याने वेळ काढून कुणाच्यातरी लेखनावर आपला प्रतिसाद दिला तर लेखकाला खूप धन्य वाटतं.(सहाजीक आहे)
ताबडतोब अंत्याला तिथेच आभाराचे प्रती-प्रतीसाद दिले जातात.
साईटवर अंत्याने जर काही नियम आणले की,
“अंत्या तुमच्याशी मी अगदी सहमत आहे”
हे लिहायला पण चूरस लागते.
अंत्यावर दिलेली प्रतीक्रिया वाचून काहींची +१ ची प्रोग्रार्म्ड चीप तयार असते.आणि पटकन डाऊन-लोड केली जाते.
अंत्याला हाणायला-अर्थात प्रेमाने-काही ठरावीक लोक अंत्याशी आपला अगदी गाढा संबंध आहे-कदाचीत असेल ही- अशा अविर्भावात संधी सोडत नाहीत.
तसंच अंत्याने यदाकदाचीत कुणाची “**मत” केली तर अळीमिळीगुपचीळी करून बसणारे आहेत.
अंत्याबद्दल मी किती किती लिहू? आणि काय काय लिहू? मला दिसलं ते मी लिहीलं.

मी मात्र शपथ घेऊन सांगतो अंत्याशी मी असा कधीही वागलो नाही.निदान असं मनात ठेवून वागलो नाही.मग तुम्ही माझ्याशी सहमत व्हा किंवा नका होऊं.पण एक मात्र सांगू इच्छितो की,
“हम गर्वसे कहते हैं के हम अंत्याकेसाथ चापलूसी कभी नही किई.!”
म्हणजे इतर अंत्याचे चापलूस आहेत् असं मी म्हणतो असं मुळीच गैरसमज करून घेऊ नका बरं का!
जिथे अंत्याची स्तुती करायला हवी तिथे मी “अजाबात” काटकसर केली नाही.अंत्याचे नृत्यावरचे लेख वाचून मी पूरा थक्क झालो.(आम्हाला नृत्यातला काही गंध नाही हा विषय वेगळा)पण म्हणून काय झालं?नृत्याचा विषय क्लिष्ट न करता सर्व नृत्य-प्रकाराची माहिती करून देणं हे काही सोपं नाही.आणि ते सुद्धा पॉप्युलर नृत्यांची उदाहरण्ं देऊन असं करणं काही खायचं काम नाही.परंतु,कधी कधी मला अंत्याची काही टिका पटली नाही तर मी अंत्याला सरळ सरळ सांगायला कचरलो नाही.आणि कदाचीत माझ्या सारखे काही लोक कचरलेही नसतील.तसंच कधी कधी आडून मी अंत्याला बाण मारले आहेत.हे कबूल करतो.आणि माझं आडून बाण मारणं पाहून काहीनी अंत्याला चिथवायला- गमंतीत- कमी केलेलं नाही.
.”अंत्या ये आपके उपर सीधा हल्लाबोल है”
असंही सांगून पाहिलंय.पण अंत्याने ते कधीही सिरयस्ली घेतलं नाही.कारण अंत्याच्या मला दोन पर्सन्यालिटी दिसतात.

एक पर्सन्यालीटी अशी की अंत्याने सिरयस्ली-म्हणजे समजलं ना?- लिहायला सुरवात केली,(अंत्याने बोलायला सुरवात केली तर कसं बोलतो त्याचा मला अनुभव नाही)की, मराठी बाराखडीतल्या ठरावीक बाराखड्या,उदा.भ..ची बाराखडी, ग..ची, म..ची, च..ची, र..ची आणि अशाच काही बाराखड्या अनमान न करता वापरायला कमी केलेलं नाही.कोकणीत ज्याला उघडपणे “गाळी” म्हणतात त्याचा वापर अचूक आणि यथार्थ करण्यात आपलं स्कील दाखवलं आहे.यात वाद नाही.कारण अंत्या त्यात वाकीब आहे असा माझा (कदाचीत गैर) समज आहे.मी काही वेळां अंत्याच्या काही लेखनात तसं वाचलं आहे म्हणून सांगतो.
पण अंत्याची दुसरी पर्सन्यालीटी की जेव्हा अंत्यावर “इल्लीशी” टिका होऊन सुद्धा मोठ्या मनाने अंत्या,
“नाही रे,त्यांचं माझ्यावर प्रेम आहे” किंवा,
“बरं बुवा!” (म्हणजे जाऊं दे ना आता)
अशी प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. प्रेमाने का होईना टिकेतली हवाच काढून घेण्याची अंत्याची दुसरी पर्सन्यालीटी वाखाण्यासारखी आहे.अगदी कोकणातल्या फणासा सारखं.आतून रसाळ गोड. अंत्या, माझ्या कोकणातला आहे हा मला एक अंत्याबद्दल “ऍडेड पॉइंट” वाटत असतो.

हे मी सर्व तुम्हाला सांगत आहे ते एव्हड्यासाठीच की अंत्या हा शब्द्च ह्या साईटवर चुंबकासारखा (लोहचुंबक लोह खेचून घेतो तसा)आहे.आणि अंत्याचं शब्द्चुंबकाचं क्षेत्र(जसं लोहचुंबकक्षेत्र असतं तसं) सर्व साईटभर पसरलं आहे.आणि का पसरूं नये हो?
पदरची कनवट रिकामी करून (इती वर्तमान पत्राचा रिपोर्टर) साईट चालवणं म्हणजे काय खायचं काम आहे काय? आणि ते सुद्धा ऐन उमेदीत.(हे पण वर्तमान पत्रावरून).
अंत्याला मी माझ्या मुलासारखा समजतो.माझा मुलगाच अंत्यापेक्षा दहा वर्षानी मोठा आहे. कोकणात आईला प्रेमाने “म्हातारी” आणि वडलांना किंवा वयस्कराना “म्हातारा” असं त्यांचीच मुलं मोठी झाली की म्हणतात.अंत्या मला तसंच संबोधतो.कुणी म्हणेल हा अंत्याचा फटकळपणा आहे.मी तसं नाही मानत.अंत्या आपल्या आईला “आमची म्हातारी” च म्हणतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल.हे कोकणी संस्कार आहेत बरं का!.

मंडळी,तुम्ही म्हणाल की मला आज अंत्याचा एव्हडा पुळका का आला? कुणी म्हणेल मी आज ” घुटूं ” घेऊन लिहायचं ठरवलंय का?कुणी कशाला हो? मनात आलं तर अंत्या स्वतःही असं म्हणायला सोडणार नाही.पण खरं सांगू,
तसं काही नाही मंडळी.आम्ही फक्त “घुटूं” ह्या शब्दाची मस्करी करण्यात एनजॉय करतो. “घुटूं” ची चव आम्ही कधीच घेतली नाही.एनजॉय करायची गोष्ट अलायदाच म्हणावी लागेल.”घुटूं” घेणं म्हणजे काय पाप नाही म्हणा.

आज हा आमचा साईटवरचा तिनशेवा लेखनाचा प्रकार आहे. हा लेख आम्ही अंत्याला अर्पण करायचं ठरवलं आहे.साईटच्या लेखनपट्टीवर आज आमचं तीसरं शतक पूरं झालं.तुम्ही म्हणाल की ही स्वतःची आत्मप्रौढी चालली आहे.पण तशातला काही भाग नाही, मंडळी. आमच्या गतआठवणी कृतकृत्य झाल्याची समाधानी देत आहेत.

एका सदगृहस्थाच्या सुचनेवरून मी साईटचा सदस्य होऊन एव्हडा काळ गेला.त्यांची या ठिकाणी त्यांची आठवण न करून कसं चालेल? आणि त्यानंतर अंत्यानी आम्हाला सुवर्ण संधी देऊन आपली साईट अक्षरशः आम्हाला मोकळी केली जशी इतरांना ही मोकळी केली असेल.म्हणून आम्ही तिनशे लेखनांची निर्मिती करू शकलो.त्यांचे ही आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.आमचा एकही लेख त्यांनी ह्या साईटवर प्रसिद्ध करायला मज्जाव केला नाही.आमचा स्वतःचाच ब्लॉग कसा आम्ही साईटचा वापर केला. खरंच मजा आली.
मंडळी तुम्ही मायाबाप वाचक म्हणून इथपर्यंत आम्हाला सहन करून घेतलंत ही ही एक केव्हडी मेहरबानी आहे तुमची.
आमचं लेखन स्वांतसुखाय असतं असं काहीनां वाटत असेल पण,-तसं ते आम्हाला स्वतःला वाटत नाही. आम्ही म्हटलं जरा हा लेख “हटके” लिहावा एव्हडंच.

आम्ही मनात येईल ते लिहित राहिलो.मराठी शुद्धलेखन आणि साहित्य समजण्यात जर अर्ध आयुष्य घालवलं तर मग लिहायला कधी सुरवात करायची.?
मात्र मराठीची प्रगती,शुद्ध/अशुद्ध लेखन वगैरे सारख्या मोठ्या विचारात आम्ही आम्हाला गुरफटून घ्यायला गेलो नाही. अहो,आपली भाषा ही आपल्या आईसारखीच आहे नव्हे काय?आपली आई नेहमी शुद्धच असते,तशीच भाषाही असते.असं आम्हाला वाटतं.जे सुचतं ते लिहावं,ज्यांना आवडेल ते वाचणार,प्रतीसाद द्यावासा वाटला तर ते देणार.प्रतीसादाच्या संख्येवरून लेखनाची प्रतिभा ओळखली जाते असं आम्ही समजत नाही.लेख पारदर्शक असतील तर वाचून मजा येते असं आम्हाला वाटतं.प्रतिक्रियेची गरज नसावी.रोज रोज,
“लेख फार छान लिहिला आहे” अशी काय ती प्रतिक्रिया द्यायची?”.
असं आमचे वाचक लिहितात.आणि ते खरंही आहे.

पण एक खरं आहे.अंत्यानी शुद्धलेखनावर कसलाच अटकाव आणला नाही म्हणून आमच्यासारख्याचं फावलं. अहो दीर्घ चा दि र्‍हस्वं काय किंवा दीर्घ काय? काय फरक पडतो? सांगा.निदान लिहीताना आम्हाला काही फरक वाटत नाही.ज्याना वाटत असेल त्यांना आम्ही काही करू शकत नाही.कवट काय आणि कवठ काय संदर्भाशी संबंध येतो ना?बामण काय आणि ब्राम्हण काय?ज्याला जसं वाटतं तसं तो उच्चार करतो. साईटवर अनेक विद्वान लेखक आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे.

अहो,बहिणाबाई,तुकाराम कुठल्या विद्यापीठात गेले होते.?म्हणजे त्यांची नावं घेऊन आमची आम्ही बरोबरी करतो असा उगाच गैरसमज करून घेऊ नका.आम्ही त्यांच्या पुढे यकःश्चीत आहोत.पण मंडळी,सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की लेखन हा एक निर्मितीचा प्रकार आहे.ते विचार कुणालाही सुचूं शकतात.निसर्गाकडे नेम आहेत नियम नाहित.म्हणूनच निसर्ग फोफावत असतो.माझ्याच दोन ओळी आठवल्या,निसर्गाचंच बघा ना,

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊन सर्वां उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मनातल्या तुझ्या आठवांची

अनंतराव अंतरकरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी इथेच आवरतं घेतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 15, 2011

गाण्यातून बोलगाणं



“मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं आठवलं.”

काही वर्षापूर्वी मी एका साईटवर माझे लेख, कविता, अनुवाद लिहायचो.त्याची आज आठवण आली.ह्या साईटवर लिहिण्यासाठी मला एका सदगृहस्थाने सुचीत केलं होतं.ह्या साईटची खासियत म्हणजे,त्या साईटवरच्या लेखांच्या संख्येपेक्षा प्रतिसादांची (?) संख्या जास्त असायची.बर्‍याच लोकांच्या खर्‍याखुर्‍या प्रतिक्रिया असायच्या.पण गंमत म्हणजे त्यात, कुणाच्याही लेखनावार नेहमीच प्रतिक्रिया देणारा, एक कंपू होता.
“आला लेख की हाण.
आली कविता की हाण
झाला अनुवाद की हाण”
हा त्या कंपूचा मनसुबा असायचा.आणि मग प्रतिक्रियेची झोड व्हायची. आपसात एकमेकावरच्या प्रतिक्रियेवर आणि त्यानी दिलेल्या प्रतिक्रियेवर हाणा हाणी व्हायची.लेखन करणारा लेखक पण त्यांच्या प्रतिक्रियेवर आपल्या प्रतिक्रिया द्यायचा.असं चालायचं.

एकदा मी एका हिंदी गाण्याचा अनुवाद करून अशी कविता लिहिली,

आज दिसेना द्रव ही नयनी

अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसे ना कुणी एखादा
अशीच परतूनी जाईल बहूदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

आज दिसले नाही अश्रु
आज दिसेना द्रव ही नयनी
आज ही अशीच रिक्त रजनी
होऊनी रिक्त जाईल बहुदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

अंधारलेली ही रात्र कुणा
प्राप्त होऊनी दूर करेना
आज दूरावा न झाल्याने
उद्या फिरूनी ती येईल ना
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

झालं.ही कविता वाचून बरेच प्रतिसाद आले..त्यात त्या कंपूमधल्यांचेही प्रतिसाद आले.काहीनी अनुवाद करण्याच्या प्रक्रियेवरच टिका केली.त्या साईटवर, एकही लेख अथवा कविता न लिहिलेल्या आणि फक्त प्रतिक्रिया देण्याचा प्रपंच करणार्‍या,एका वाचकाने अनुवाद कसा करावा आणि करू नये कविता कशी लिहावी आणि लिहू नये ह्यावर भरपूर माहिती(?) दिली. ऐकून गंमत वाटली.

मग काय करावं?
मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं आठवलं आणि त्यात काहीसा फरक करून आपली प्रतिक्रिया द्यावी असं वाटलं.अर्थात,
श्री.पाडगांवकरांची क्षमा मागून.

जशी गाय जवळ आली की वासरूं लुचूं लागतं
तसं
आपण विचार करूं लागलो की,
आपल्याला अनुवाद सुचूं लागतो.
अनुवाद आपण साईटवर लिहूं शकतो
अनुवाद आपण आपल्या ब्लॉगवर लिहूं शकतो.
साईटवर लिहिलं म्हणून कुणी मोठं नसतं
ब्लॉगवर लिहिलं म्हणून कुणी छोटं नसतं

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत
आपण तो रेखाटला पाहिजे.

अनुवाद असा असला पाहिजे,
म्हणून आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
अनुवाद तसा असला पाहिजे,
म्हणूनही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
कुठलीही कविता आपल्याला वाचता ये्ते
त्याचा अनुवाद आपल्याला केव्हाही करता येतो
एकटं एकटं चालताना विचार करता येतो
कागद पेन्सिल घेऊन विचार करता येतो.
जेव्हा आपला मुड लागतो
अनुवाद आपणच सुचूं लागतो

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत
आपण तो रेखाटला पाहिजे

तुमचं आणि आमचं मन जुळतं
तेव्हा दोघानाही अनुवाद कळतो
माझा अनुवाद मग तुम्ही वाचूं लागता
आणि माझ्याच आनंदात तुम्ही वाटेकरी होता.

कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा
कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा
अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं
अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं

फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही
द्वेष करून अनुवादाला शापता येत नाही
अनुवाद चमचम चांदीचा
हिरव्या हिरव्या फांदीचा
तो झुळझूळ वार्‍याचा
ट्विंकल ट्विंकल तार्‍याचा

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत
आपण तो रेखाटला पाहिजे

गाण्यातून बोलगाणं सुचलं हे काय कमी झालं?
प्रति्क्रिया देणार्‍यांचं होवो भलं
अन
प्रतिक्रिया न देणार्‍यांचं पण होवो भलं
असं मी माझ्या मनात म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 12, 2011

माझ्या बाबांचे ते शब्द.

“मला माहित होतं की,मी लिहिलेलं जरी लोकांना आवडलं नाही तरी काहीही फरक पडत नाही.मी लिहितच रहाणार.”

सुधा लहानपणापासून लठ्ठ असलेली मी पाहिली आहे.जे ती खाईल त्याची बरेच प्रमाणात जरबी व्हायची. सुधाच्या बाबांनी ही व्याधी डॉक्टरना दाखवली होती.
“अतिशय कमी प्रमाणात हा रोग लोकांना असतो.त्यांच्या शरीराचा चयापचय बिघडल्यामुळे असं होत असतं.”
सुधाचे डॉक्टर तिला म्हणाले.
सुधा तिच्या डॉक्टरांकडून उपाय करीत असायचीच पण त्याला यश यायला खूप अवधी लागणार हे तिला डॉक्टरानी सांगीतलं होतं.

तिच्या बाबांना हा तिचा लठ्ठपणा पाहून चलबिचल व्ह्यायला व्हायचं.तिचा दोष नसताना ते तिच्यावर रागवायचे.शाब्दीक मारा करायचे.त्याचं सुधाला खूपच वाईट वाटायचं.मला ती भेटली असताना बरेच वेळा आपल्या बाबांच्या ह्या वागण्याची तक्रार करून सांगायची.मला तिची कीव यायची.

आता सुधा मोठी झाली आहे.दिसायला आहे तशीच आहे.पण एक चांगली लेखिका आहे हे मला माहित होतं.तिच्या कवितेचा संग्रह छापून प्रसिद्ध होणार आहे हे मला तिच्याकडूनच कळलं.त्या सोहळ्या दिवशी मी तिच्याकडे गेलो होतो.सर्व कार्यक्रम निवांत होऊन गेल्यावर मी सुधाशी गप्पा मारीत बसलो होतो.

“तुला लेखन करायचं कविता लिहायची हे कसं सुचलं?”
मी सुधाला विचारलं.

मला म्हणाली,
“माझे बाबा मला म्हणायचे,
“तू आळशी आहेस,लठ्ठ आहेस आणि मुर्ख आहेस.”
माझ्या बाबांच्या ह्या शब्दांशी मी संघर्ष करायचं ठरवलं.मी आठ वर्षांची असताना माझ्याच खोलीत बसून, माझ्या जाडजूड बोटांमधे पेन धरून एका वहित मनात येईल ती कविता आणि मनात येईल ती लहानशी गोष्ट गीरबटून काढायची.
कागदावरचे हे गीरबटलेले शब्द,माझ्याबरोबर माझ्या बिछान्यात लोळायचे.ते शब्द माझी ढाल,माझं संरक्षण होऊन मला रात्र निभावून न्यायला मदत करायचे.

पण रोज दुसर्‍यादिवशी सकाळी माझ्या बाबांचे ते शब्द मला गदगदून बिछान्यातून उठवायचे. आळशी,लठ्ठ,मुर्ख हे शब्द माझं डोकं भणावून सोडायचे आणि माझे डोळे उघडल्यावर मला ते खरंच वाटायचं.मी खडबडून जागी होऊन बिछान्यातून उठायचे आणि तशीच त्या कागदावर आदल्या रात्री लिहिलं सर्व खोडून टाकून द्यायचे.

ह्या शाब्दीक माराचा नेहमीचा नेम, मी किशोर वयातून प्रोढवयात येईपर्यंत, चालायचा.माझ्या मनाला, माझ्या आत्म्याला आणि माझ्या दूरदृष्टीला त्या शब्दांनी एक आकार दिला होता.मी ज्यावेळी आरशात पहायची त्यावेळी खरोखरच मी आळशी,लठ्ठ आणि मुर्ख मुलगी आहे असं माझे बाबा म्हणायचे ते आरशात भासायचं.

आणि असं असूनसुद्धा प्रत्येक रात्री मी काहीतरी लिहायचे.जणू माझं जीवनच त्यावर अवलंबून आहे असं समजून लिहायचे.वेळोवेळी मी माझे ते लिहिलेले शब्द वाचून काढायचे.मला ते मी लिहिलेले शब्द बरे वाटायचे.पण ज्या क्षणी मी लिहिलेले ते शब्द माझ्या डोक्यात शिरायचे त्या क्षणी माझ्या बाबांचे शब्द त्यांचा पाठालाग करून त्यांना माझ्या मेंदुतून हुसकावून काढायचे.

आणि असं असूनसुद्धा प्रत्येक रात्री मी लिहिलेले शब्द वाचून मला आराम वाटायचा.जणू माझ्या भावनाना, पेनातून आलेले कागदावर खरडलेले शब्द, एकदम साफ फुसून टाकयची क्रिया करायचे.माझा आत्मसंदेह, जणू एखाद्या ब्लॅन्केट सारखा मला भासायचा.मी त्यात गुंडाळून घ्यायची,विशेष करून मला नवी मैत्रीण भेटली असताना,एखादी नवी संधी माझ्याजवळ आली असताना.

तरीपण मी माझं लेखन पुसून टाकायची.कारण त्यामुळे,मी मलाच सांगायची,मला कुणीही मी कशी वाईट आहे ते सांगायचा धीर करणार नाही.
फक्त माझे बाबाच मला असं म्हणू शकतात,ज्याना कसलातरी शारीरीक व्याधी झाला होता हे मला मी एकतीस वर्षाची झाल्यावर कळल्यानंतर, ह्याची शक्यता कमी झाली.मला मी जिथे रहायची तिथे एकदा फोन आला की माझे बाबा ह्या जगात आता नाहीत.

त्यांचे ते शब्द त्यांच्या मागे राहिले.परंतु,त्यानंतर मला कळलं की ते शब्द मला आता लागू पडणार नाहीत. जसं मी पूर्वी रात्रीचं करत आले तसंच मी केलं.मी बसून लिहायला लागले.वह्यांच्या वह्या भरभरून मी,माझ्या बाबांबद्दल,माझ्या जीवनाबद्दल आणि माझ्या श्रद्धेबद्दल लिहित राहिले.

पण ह्यावेळेला मी सकाळी उठून ते शब्द परत वाचू लागले.ते मी पुसून टाकले नाहीत.माझ्या लक्षात आलं की,असं करणं,त्यांना पूसून टाकणं, अनाड्यासारखं आणि निंदनीय होईल.

जशी वर्षं निघून गेली तशी माझं मला दिसायला लागलं की,मी किती सफल लेखक आहे ते.मी ठरवलं की माझे लेख आणि कविता मी छापायला द्यायच्या.जेणेकरून मला दाखवून द्यायचं होतं की मी माझ्या बाबांच्या शब्दांच्या व्यतिरिक्त,कशी आहे ते. आणि त्यासाठी मी माझ्या वयक्तिक भावना कागदावर लिहून,ज्या कुणाला वाचायची कदर असेल तो ते वाचो, असं ठरवून टाकलं.
मला माहित होतं की,मी लिहिलेलं जरी लोकांना आवडलं नाही तरी काहीही फरक पडत नाही.मी लिहितच रहाणार.

मला आता असं वाटतं की,माझ्या बाबांचे ते शब्द मागे राहिले.ते शब्द लुप्त झाले.आणि मी जी आळशी, लठ्ठ आणि मूर्ख मुलगी होते तिला डोकं आहे,आत्मा आहे आणि सुंदरता आहे ती पण तिची स्वतःची अशी माझी खात्री झाली.”

“तुझा लठ्ठपणा आणि तुझ्या बाबांचे ते शब्द,तुला एक सफल लेखिका बनायला कारणीभूत झालं हे पाहून,
“जे काही होत असतं ते बर्‍यासाठीच होत असतं.”
असं म्हणणं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं.तुला कसं वाटतं?”
सर्व ऐकून झाल्यावर मी शेवटी सुधाला म्हणालो.

“मी तुमच्याशी ह्यापेक्षा जास्त सहमत होऊच शकणार नाही”
सुधाने चेहरा आनंदी करून मला उत्तर दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 9, 2011

मी नेहमीच वर्तमानकाळात जगतो.



“जीवनाच्या अखेरीला मला मागे वळून पाहून माहित करून घ्यायचं आहे की मी माझा वर्तमानकाळ जगत असताना वेळेचा अपव्यय मुळीच केला नाही.”

अरूणचं लग्न होऊन दोन वर्षं झाली.अलीकडे त्याचा बिझीनेसपण उत्तम चालला होता.औषधं विकण्याचा त्याचा व्यवसाय होता.शहरात जागोजागी जाऊन फार्मसीमधे तो औषधं घेऊन जायचा.त्याची डीलिव्हरी करायचा.

गेल्या वर्षापासून त्याला मोटरसायकल घ्यायची जरूरी भासत होती.पण हा प्रश्न तो त्याच्या आईकडे आणि बायकोकडे काढत नव्हता.ट्रॅफिकमधे हे वाहन फार धोकादायक आहे हे त्या दोघांनी त्याला ठसकावून सांगीतलं होतं.शेवटी कसंतरी त्या दोघांना समजावून सांगून त्याने नवीन मोटरसायकल घेतली होती.घेऊन सहामहिने झाले असतील.एकदा एका रिक्षेला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची स्पीड कमी पडली आणि समोरून येणार्‍या टेम्पोशी त्याची टक्कर झाली.

मला हे कळल्यावर मी आणि त्याचा मोठा मामा त्याला हॉस्पिटलात बघायला गेलो होतो.अरूणचं नशिब बलवत्तर असल्याने तो बालबाल वाचला.

दोन महिन्यानंतर अरूणला घरी आणलं होतं.कुबड्या लावून तो चालत होता.मी त्याच्या घरी गेलो होतो. त्याचा मामाही अगोदरच आला होता.

“मी माझ्या आयुष्यात असली धोक्याची वहानं कधीच वापरली नाहीत.तशात मोटरसायकलला मुळीच संरक्षण नाही.आणि त्याउप्पर ती तोल संभाळून चालवावी लागते हे आणखी एक रीस्क.
अरूणने सांगूनसवरून असं करायला नको होतं.”
असं मी अरूणच्या मामाला म्हणालो.

हे ऐकून अरूणचा मामा जोरदार हसला.बहुतेक त्याला माझं म्हणणं हास्यास्पद वाटलं असावं.म्हणूनच तो मला म्हणाला,
“माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो.मी माझ्या मनात समजत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त मरणकाळाचा अनुभव घेतला आहे.माझ्या मनात आलेल्या अनुभवायच्या विचारापलीकडे मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. मी वेदना जेव्हड्या म्हणून सोसल्या आहेत त्यांचं परिमाण काढता येणार नाही.अगदी जगण्यासाठी लढाई देताना शरीराची कल्पनेपलीकडे हानी होत असतानासुद्धा.

अगदी जवळचे स्वतःची जगण्यासाठी लढाई देत असताना, त्याना माझ्याकडून होईल ती मदत मी करीत असताना त्यांच्या जवळ राहूनसुद्धा ते हिरावून घेतले जाणार आहेत ह्याचा मनस्तापही सोसला आहे.अजीब तर्‍हा सांगायची झाल्यास मी मरणाची खंत न करायचं शिकलो,आणि जगण्याचीच जमेल तेव्हडी प्रशंसा करीत राहिलो.

मला आठवतं मी वीसएक वर्षांचा असेन.माझीच मोटरसायकल मी चालवताना मला अपघात झाला. हॉस्पिटलात गेल्या गेल्याच मेल्याचं जाहीर व्हावं अशा परिस्थितीत मी होतो.अतीदक्षाता कक्षात मी बारा दिवस होतो.माझं शरीर खिळखीळं झालं होतं.दोनदा मी जवळ जवळ मरायच्यास्थितीत होतो.मला न्यायला मृत्यूला सोपं झालं होतं.पण दोन्ही वेळेला ते माझ्यावर अवलंबून होतं.दोन्ही वेळेला मी मृत्यूला झुंझ दिली.मृत्यूला मी घाबरत होतो म्हणून नव्हे तर जीवनावर मी प्रेम करीत होतो म्हणून.

नंतर,माझी आई जेव्हा मरणाच्या पंथाला लागली होती,तेव्हा मी तिची काळजी घेत होतो.जेव्हा तिची जायची वेळ आली तेव्हा ती प्रक्रिया माझ्या परिचयाची होती.मी स्वतः ते भोगलं होतं.मला आठवतं अगदी शेवटी मी तिच्या डोक्यावरच्या केसावरून हात फिरवीत होतो.तिला खूप आराम वाटत होता. नंतर,थोड्याचवेळात ती गेली.

दुसरा प्रसंग आठवतो तो माझ्या एका मुलाच्या बाबतीत.ती दोन वर्षं तो एका दुर्धर रोगाने पछाडला होता. त्याच्या शेवटच्या दिवसात मीच त्याची देखभाल करीत होतो.आम्ही दोघे एकमेकाचे साथीदार होतो.बरेच वेळा आम्ही जीवन-मृत्यूबद्दल आणि त्यापलीकडचं ह्याबद्दल बोलायचो.आणि त्याची जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा मी त्याच्या नजरेत नजर घालून होतो.तो तीस वर्षाचा होता.तो गेल्यावर मी संपूर्ण कोसळलो.

मृत्यूला ज्यावेळी मी सामोरा गेलो त्यावेळी मी बरच काही शिकलो.जीवन हे सहजची स्वीकृती आहे असं समजू नये.
जीवन क्षणिक असतं,संवेदनशील असतं आणि क्षीण असतं.
दोन आठवडे अतीदक्षता कक्षेत राहून झाल्यावर मला ज्यावेळी स्वच्छ आणि शुद्ध हवेचा श्वास घेता आला ते मी कधीच विसरणार नाही.
व्हिल-चेअरवरून मला जेव्हा एका नर्सने बाहेर स्वच्छ हवेत आणलं,तेव्हाचा आनंद माझ्या मनात कायमचा आहे.त्यानंतर मी नेहमीच मनात ठरवलं की,शुद्ध हवेची चव मी कधीच विसरता कमा नये.

मला कष्ट घ्यायला आवडतं.भविष्याबद्दल मी सावध असतो.भूतकाळ मी नेहमीच विचारात घेतो. परंतु,वर्तमानकाळ मी जगतो.शुद्ध हवेत मी रस घेतो,सकाळीच माझ्या प्रेमळ लोकांबरोबर मी कॉफीचा आस्वाद घेतो,मागच्या परसात उडत रहाणार्‍या फुलपाखरांची मी मजा लुटतो,लहान मुलांच्या समुहात मी वेळ घालवतो, माझ्या धाकट्या भावाच्या विनोदावर मी हसून आनंद घेतो.

माझं मोठ्यात मोठं आव्हान म्हणजे योग्य दृष्टीकोन ठेवणं.स्वतः मौज लुटल्याशिवाय माझं जीवन मी असंतसं जाऊ देत नाही.जीवनातल्या महत्वाच्या घटना आणि साधे सरळ क्षण ह्यांचा तालमेल असायला हवा असं मला नेहमीच वाटतं. माझ्या जीवनाच्या अखेरीला मला मागे वळून पाहून माहित करून घ्यायचं आहे की मी माझा वर्तमानकाळ जगत असताना वेळेचा अपव्यय मुळीच केला नाही.”

अरूणच्या मामाने आपली कथा सांगीतल्यावर मी माझ्या मनात म्हणालो,
“जसा मामा तसा भाचा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 6, 2011

जीवनभरची शिकवणूक म्हणजेच आनंदमय जीवन.



“असं दिसतं की,मोठ्यांचा दुप्पटीपणा आणि दांभिकपणा लहान मुलांना अगदी स्पटिकाप्रमाणे स्पष्ट दिसतो.”

रंजना माझ्याकडे दळव्यांची नाटकाची पुस्तकं वाचण्यासाठी घेऊन जायला आली होती.आमच्या थोडया गप्पा झाल्या.
मी रंजनाला म्हणालो,
“जीवन जगताना जगात शिकण्याचे खूप मार्ग आहेत.पुस्तकं वाचून खूपच ज्ञान मिळतं.तसंच अनुभवातूनसुद्धा भरपूर ज्ञान मिळतं.असं माझ्या ध्यानात आलं आहे.तुझं काय म्हणणं?”

मला रंजना म्हणाली,
“माझ्या मनात असेच विचार येतात.अनुभवातून मिळणारी शिकवणूक जर का आपण योग्य तर्‍हेने वापरली तर जीवन नक्कीच आनंदमय जातं.
प्रत्येक जीवंत प्राण्याकडून मला शिकवणूक मिळते.मात्र ते जे काय शिकवत असतात ते पहायला माझे डोळे उघडे हवेत आणि ऐकायला कानही उघडे हवेत.हृदयही उघडं हवं,कारण ही शिकवणूक ध्यानीमनी नसलेल्या उगम स्थानातून येऊ शकते.
हे मला हळू हळू समजायला लागलं.इतराना जसं कळतं तसच मला जीवनातल्या घटनानी ह्या शिकवणूकीच्या शक्यतेसाठी जागं केलं.”

“तुझ्या आईची तू खूप सेवा केली आहेस.मला त्याची आठवण येऊन तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.”
मी रंजनाला म्हणालो.

“मला माझ्या आईने विनाशर्त प्रेम कसं करावं हे शिकवलं.”
रंजना मला सांगायला लागली.
“माझी आई अंथरूणाला खिळली होती.माझ्या आईची सेवा करण्यासाठी,तिची काळजी घेण्यासाठी,ह्या ऐहिक जीवनातल्या सर्व आसक्तीना मला तिलांजली द्यावी लागली होती.तिचा हात माझ्या हातात घेऊन,त्या लोकांच्या जगात, ज्यांना सध्याच्या जगाचा बोध घेऊन,पुढच्या जगात जाण्याच्या तयारीला लागावं लागलं होतं,त्या जगात निर्भिडपणे तिच्या बरोबर मला चालत रहावं लागलं होतं.

तिच्या दुःखांची,वेदनांची मी साक्षी आहे.आणि होय तिच्या सुखांची पण मी साक्षी आहे.माझ्या आईवर तिच्या अंतिम काळात मी विनाशर्थ प्रेम करण्याचं शिकत असताना मला,धांवायचं मनात असताना खंबीर उभं रहावं लागलं.रडावं असं मनात आलं असताना,चेहरा हसरा ठेवावा लागला.
लोटांगण घालावं असं मनात असताना तिला मिठीत घ्यावं लागलं.

मी एक शिकले की पुरेपूर प्रेमामुळेच मी काहीही करायला समर्थ झाले.सवय झाल्याने,धावायचं,रडायचं किंवा लोटांगण घालायचं माझ्या मनात यायचं बंद झालं.तिच्या आजारात एक साक्षी म्हणून रहाण्याची मी संधी पहात होते.ही साक्षच मला,एकात्मकता,आपलेपण म्हणजे काय ते शिकवू शकली. विनाशर्थ प्रेमातली सुंदरता मला कळली होती.

मला माझ्या आईकडून शिकवणूक मिळाल्या नंतर,आईपणाच्या अनुभवातून शिकवणूक मिळाली.माझा मुलगा माझा मोठा शिक्षक होता.
त्याच्याकडून सर्व स्पष्ट कळायला लागलं.त्याच्याकडून मी शिकले की,जर का मी त्याला म्हणाले इतरांशी मी सहमत आहे तर मला सहमत रहावं लागायचं.आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे आणि उत्साही राहून.मी जर म्हणाले अमूक एक गोष्ट बरी नाही तर ती मी करता कामा नये हेही मला लक्षात ठेवावं लागायचं.मी म्हणाले की,मी विनाशर्थ प्रेम करणारी आहे तर कुणाचीही आलोचना करायची झाल्यास मला ती प्रेमाने करावी लागायची. सजा देण्याऐवजी माफ करावं लागायचं.असं दिसतं की,मोठ्यांचा दुप्पटीपणा आणि दांभिकपणा लहान मुलांना अगदी स्पटिकाप्रमाणे स्पष्ट दिसतो.

मुक्या प्राण्यांकडून मी ईमानदारी,निष्ठा आणि अज्ञानता काय असते ते शिकले.बाहेरून आल्यावर मी घराच्या प्रवेश दारात दिसल्यावर मोठ मोठयाने भूंकणार्‍या,माझ्या जवळ येऊन प्रेमाने चाटायला पहाणार्‍या आमच्या मोत्याला साखळीला बांधून ठेवण्यात काही जणाना काय मिळतं कुणास ठाऊक.
पांढर्‍या शुभ्र मोत्याच्या इवलुश्या जीभेने दिलेल्या मुक्याच्या स्पर्शाने,मला जाणवणारी त्यातली निर्दोषता आणि गोडवा,मला व्याकुळ व्हायला भाग पाडतो.मी त्याला जवळ ओढून त्याला स्पर्श केल्याने,त्याच्याशी लाडीक बोलल्याने,त्याला इतकं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की ह्या कृतीला जवाब नाही.

मला असं वाटायला लागलं आहे की,माझ्या मनात जे काही निर्माण होतं ते मी कार्यान्वित करू शकते. त्याच बरोबर मी हेही शिकले आहे की,ज्यावर माझा विश्वास आहे त्याचं मी परीक्षण करू शकते. तसंच,माझे विचार इतर जे वाटून घेत नाही नाहीत त्यांच्या त्या वृत्तीचा मी स्विकार करू शकते.

मला माहित झालं आहे कधी कधी संदिग्धतेतसुद्धा मला माझं अस्तित्व टिकून ठेवलं पाहिजे.
माझ्यापेक्षा ज्याना जास्त ज्ञान आहे ते ज्ञान त्यांच्याकडून मला मिळत असताना मला ते बक्षीस म्हणूनच मिळत आहे असं समजलं पाहिजे.मी हेही शिकले आहे की,कुणाकडेही असलेली प्रतिभा ही एक सकारात्मक शक्ती असते आणि इच्छुक प्राप्तकरत्याला ती शक्ती समर्पण करायची झाल्यास ती सहजच करता येते.”

“ह्यावर मी तुला काय म्हणू?”
असं म्हणून मी रंजनाकडे तिचा प्रतिसाद काय येतो तो पहात होतो.ती बोलण्यापूर्वीच मी तिला म्हणालो,
“तुला जीवनातल्या अनुभवातून मिळालेली ही शिकवणूक मला काहीतरी ज्ञान देऊन गेली.”
हसत हसत रंजना पुस्तकं पिशवीत भरून जायला निघाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 3, 2011

एकमेकातला दुवा जाणण्याची असमर्थता.

“आपण माणसं एकमेकाशी दुव्याने सांधलेले आहो.हा एकमेकामधला दुवा माणूसकीची खरी व्याख्या करतो.”

आता उन्हाळा संपला.फॉल चालू झाला.मागल्या परसातल्या झाडावरची उन्हामुळे रंगीत झालेली सफरचंद, पीच,प्लम्स खाली पडायला लागली आहेत.
हळू हळू ह्या झाडांची पानं झडायला सुरवात होणार.शेवटी पडझडीने उघडी बोडकी झालेली ही झाडं,फॉल आणि कडक थंडीला सामोरी जाणार आहेत.

“पण आणखी पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला यायला हरकत नाही.”
असं फोन करून मला प्रो.देसाय़ांनी,
“आज तुमची तळ्यावर वाट बघतो”
असं सांगून इशाराही दिला.
आज काहीतरी खास मला सांगायचं आहे हे त्या इशार्‍यातून मी ताडलं.
संध्याकाळी मी तळ्यावर जायला निघालो.माझ्या अगोदर भाऊसाहेब तळ्यावर नेहमीच्या बाकावर येऊन बसले आहेत हे मी लांबूनच पाहिलं.मात्र कसलंतरी पत्र हातात घेऊन उलट सुलट करून वाचत होत हे मी त्यांच्या जवळ आल्यावर पाहिलं.

मला आपल्याजवळ बसायला सांगून प्रो.देसाई मला म्हणाले,
“त्या दिवशी मला पोस्टमनने एक पत्र आणून दिलं.ह्या दिवसात जिथे इमेल,सेल फोन ह्या सारख्या साधनातून खबर मिळू शकते,संवाद साधता येतो तिथे,अशा तर्‍हेचं चक्क पोस्टातून येणारं पत्र म्हणजे,एक अमुल्य खजिनाच समजलं पाहिजे,की जो नीट जपून ठेवून पुन्हा पुन्हा वाचायला मिळावा.

मी तर आता निवृत्त शिक्षक आहे.आणि हे पत्र मला माझ्याच एका विद्यार्थ्याने पाठवलं होतं.तोच आता जवळ जवळ पन्नासएक वर्षाचा झाला असावा.तो आता कुठे तरी मद्रास जवळच्या खेड्यात रहातो.

तो माझा विद्यार्थी असताना माझ्या एका मित्राच्या दुकानात मी त्याला पार्ट टाईम म्हणून नोकरी द्यायला शिफारस केली होती.आणि तो तिथे काम करायचा.काही दिवसानी त्या दुकानातून चोरी केल्याचा त्याच्यावर आळ आला. त्यामुळे त्याची नोकरीही गेली होती.

त्या घटनेचा पश्चाताप झाल्याचं ते पत्र होतं.आपण चोरी केल्याबद्द्ल आपल्याला पश्चात होत असून इतकी वर्षं बाळगलेल्या त्या पापाचं ओझं हलकं करण्यासाठी आपण लिहित आहे अश्या अर्थाचा त्यात मजकूर आहे.

मला आठवतं,त्यावेळी त्याने केलेल्या प्रकाराबद्दल मी तेव्हाच खूप त्याच्यावर नाराज होतो.त्याने केलेल्या अविवेकपूर्ण कामाचं मी पूर्वानुमान करू शकलो नसतो. ह्याचंही मला त्यावेळी शर्मिंद झाल्यासारखं वाटलं होतं. कदाचीत त्यावेळी मी अशी समजूत करून घेतली असावी की तो बच्चा होता, म्हणून त्याने तो मुर्खपणा केला होता.मी त्यालाही आणि त्या घटनेलाही केव्हाच विसरून गेलो होतो.

परंतु,तो कधी विसरलेला दिसत नाही.
जगात तेच तेच करणारे लोक क्वचित असतात.पण त्यातून सुधारणा करणारे अनेक असतात.शिवाय,बरेच वेळा तेच तेच करण्यासारख्या घटना ज्या कराव्यासारख्या वाटतात,त्याच घटना सरतेशेवटी आपल्याला सुधारत असतात.

एक सतरा वर्षाचा मुलगा,आपल्या शिक्षकाच्या मित्राच्या दुकानातून चोरी करतो,तो आता पन्नास वर्षाचा वयस्कर झाल्यावर,एक यशस्वी इंजिनीयर झाल्यावर,निष्टावान नवरा आणि दोन मुलींचा बाप झाल्यावर,हीत आणि अनहीत समजायला लागल्यावर, हा माणूस पत्ता हुडकून आपल्या शिक्षकाला पत्र लिहितो.

क्षमा मागण्याची त्याला जरूरी भासते म्हणून तो त्याने केलेली चूक ही त्याच्या जीवनाचा मानदंड आहे असं समजून तो तसा वागल्याने,जीवनात कठीण कठीण समस्या सोडवताना योग्य मार्ग निवडण्याकडे आपलं लक्ष केंद्रीभूत करतो.
“त्या घटनेची आठवण मनात आणून”
तो लिहितो,
“मी जेव्हा माझी स्वतःची सत्यनिष्ठ विकली आणि ती सुध्दा एका फाल्तु गोष्टीसाठी,हे आठवून मी स्वतःला उच्चतम पातळीवर न्यायच्या प्रयत्नात असतो.”

त्याचं हे पत्र,त्याच्यावर झालेल्या प्रभावाची, आठवणीची, चारित्र्याची आणि संपर्क ठेवण्यास लागणार्‍या क्षमतेची जबानीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

ह्यावरून माझ्या डोक्यात एक विचार आला की,ते अदृश्य दुवे,जे आपल्याला आठवणीच्या सहाय्याने एकमेकाशी बांधून ठेवतात,त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीवही नसते.मला आणि माझ्या त्या विद्यार्थ्याला तो दुवा अजून संपर्कात ठेवत आहे.गेली एकत्तीस वर्षं,हा दुव्याचा गुंता,यश अपयश, सुख दुःख, लोक आणि जागा,ह्यांचा एकमेकांच्या वेगवेगळ्या जीवनातल्या येणार्‍या अनुभवासहीत एक संपर्क सांधून ठेवू शकतो ह्याचं मी भाकीतही करू शकलो नसतो.

तो माझा विद्यार्थी आता कोणत्या पातळीवर जीवन जगत आहे हे मला समजलं जावं ह्याचं त्याला महत्व वाटत असणार.त्याला ह्या गोष्टीची प्रचिती असणं ही माझ्यासाठी पण गर्वाची बाब आहे.त्याचं ते पत्र हे मला त्याने दिले्लं खरोखरीचं बक्षीस आहे.

आपण माणसं एकमेकाशी दुव्याने सांधलेले आहो.हा एकमेकामधला दुवा माणूसकीची खरी व्याख्या करतो.
एकमेकांच्या वयक्तिक कथेचे वाटेकरी असण्याची जरूरी,एकमेकावर करावं लागणार्‍या आणि करून घेतलेल्या प्रेमाची जरूरी,एकमेकातला मतलब आणि एकमेक एकमेकाला आठवले जावे याची जरूरी आणि शेवटी एकमेकाला माफ करणं आणि माफ करून घेणं याची जरूरी हीच खरी माणूसकीची व्याख्या होऊ शकेल.”

भाऊसाहेबांनी मला ते पत्र वाचूं दिलं.त्यांनी अगोदरच केलेल्या त्या पत्राच्या खुलाशाने पत्र वाचता वाचता माझे डोळे भरून आले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com