Monday, November 29, 2010

शुभेच्छा पत्र.

“ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

पोस्टमनने घरात ढीगभर पत्रं आणून टाकली आणि त्यात तुम्हाला एखादं शुभेच्छेचं पत्र असेल तर एका क्षणात तुमचा दिवस आनंदाचा जातो किंवा तुमची लहरपण बदलते.
समजा तुमच्या जीवनातला एखादा दिवस अगदी गचाळ असेल,किंवा तुम्ही नशिबवान असाल तर तो दिवस कदाचीत तुम्हाला आनंद देणाराही असेल, आणि अशावेळी तुम्हाला कुणाचंतरी शुभेच्छेचं पत्र आलं असेल,तर आतुन तुम्हाला नक्कीच बरं वाटतं.
त्यादिवशी माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला त्याच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ मी एक शुभेच्छा पत्र त्याला पाठवायचं या उद्देशाने माझ्या एका मित्राच्या दुकानात कार्ड विकत घ्यायला गेलो होतो.मित्र दुकानात नव्हता.त्यांचा विशीतल्या वयाचा मुलगा काऊंटरवर बसला होता.

मला म्हणाला,
“नवल आहे.हल्ली शुभेच्छा संदेश इमेलवरून पाठवतात.त्यामुळे आमच्याकडे असली कार्ड घ्यायला येणारी गिर्‍हाईकं बरीच कमी झाली आहेत.”

मी त्याला म्हणालो,
“मी त्यातला नाही.शुभेच्छाच द्यायच्या झाल्यास प्रत्यक्ष त्या व्यक्तिच्या घरी जाऊन देण्यात जी मजा आहे ती आगळीच असते.पण सर्वांच्याच घरी जाणं शक्य होत नाही.अशावेळेला निदान शुभेच्छा पत्र आपल्याकडून त्या व्यक्तिला मिळावं अशा विचाराचा मी आहे.”

हे ऐकून तो मला म्हणाला,
“माझ्या लहानपणी मला कुणाची पत्रं येत नसायची.पण माझ्या जन्मदिवशी मला कुणाचं शुभेच्छेचं पत्र आल्यास, किंवा त्यादिवशी माझ्या आजीचं कोकणातून बंद लिफाफा यायचा आणि त्यात थोडे पैसे असायचे अशावेळी मला मी ढगात पोहल्यासारखं वाटायचं.”
आणि पुढे म्हणाला,
“अलीकडे लोक ईमेलने शुभेच्छा पाठवतात.पण मला वाटतं,पुर्वीच्या रीतिप्रमाणे लिफाफ्यावर पोस्टाचा स्टॅम्प असलेलं शुभेच्छा पत्र मिळणं हेच खरं आहे.”

माझ्यापेक्षा लहान असून माझी आणि ह्या मुलाची मत मिळती जुळती आहेत हे पाहून मला विशेष वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“एखाद्याची तुम्ही किती कदर करता ते अशा पत्रातून दाखवता येतं.मला वाटतं त्यामानाने ईमेलचा तेव्हडा परिणाम होत नसावा.लोक त्यांचं अशा तर्‍हेचे पत्र इतकं व्यक्तिगत करतात,की त्यांना स्वतःला विशेष समजूनच ते असं पत्र पाठवतात.ज्या व्यक्तिला ते शुभेच्छा पत्र पाठवलं जातं त्याच्या पत्रात मजकूर लिहून त्या पत्र वाचणार्‍या व्यक्तिला तो मजकूर, आपल्या मनात त्याला विशेष मानुन, लिहिला गेलाय हे भासवायचा त्यांचा खास उद्देश असतो.”

मला म्हणाला,
“खरं म्हणजे माझ्या वडीलांचं ह्या शुभेच्छा कार्डाचं दुकान आहे.पण प्रामाणिकपणे सांगतो की,शुभेच्छा पत्र पाठविण्याच्या माझ्या विचाराशी ह्याचा कसलाच संबंध नाही.
कधी कधी मी माझ्या वडीलांच्या दुकानात असताना,पाहिलंय,कार्ड विकत घ्यायला आलेली गिर्‍हाईकं कार्डावरचा मजकूर वाचून कधी डोळ्यात पाणी आणतात,कधी चेहर्‍यावर हंसू आणतात. आणि हे असं होणं, सर्व त्या मजकूरावर आणि वाचणार्‍याच्या भावनावर अवलंबून असतं.आणि दुसरं म्हणजे,मला माहित आहे की,लवकरच ते कार्ड ज्याला पाठवलं जाणार आहे तोही तसाच डोळे ओले करणार असतो किंवा हंसणार असतो.आणखी एक
म्हणजे, ते शुभेच्छा कार्ड काय म्हणतं हे विशेष जरूरीचं नसून कुणी पाठवलं आणि का पाठवलं हे विशेष असतं.मला असंही वाटतं की शुभेच्छा कार्ड निवडून काढत असताना ती व्यक्तिसुद्धा आनंदी हो्त असते.हे सर्व होत असताना ती व्यक्ति आपल्या जीवनातल्या सर्व कटकटीबद्दल थोडावेळ विसर पडू देऊन, त्या ऐवजी ज्यांना ते पत्र पाठवणार असतात त्या व्यक्ति आपली काळजी घेणार्‍या असतात हे लक्षात आणून त्यांच्यावर त्याचं लक्ष केंद्रीभूतकरीत असतात.

मी लहान असल्यापासून माझ्या आईने असली मला आलेली सर्व कार्ड जमवून ठेवण्यासाठी एक खोकाच तयार केला आहे.एखादा असाच वाईट दिवस आल्यास मी हा खोका पहातो.आणि माझ्या लक्षात येतं की माझ्यावर प्रेम करणारे आणि माझी काळजी घेणारेकिती व्यक्ति जगात आहेत.

मला ज्यावेळी मुलं होतील तेव्हा मी नक्कीच माझ्या मुलांना हे उदाहरण दाखवून देणार आहे.अर्थात मी माझा हा खोकाही त्यांना देणार आहे.त्यामुळे कदाचीत माझ्या जीवनाकडे त्यांचं लक्ष जाईल आणि मी कोण आणि माझ्यावर प्रेम करणारे कोण ह्याबद्दल त्यांना माहिती मिळेल.”

नवीन घेतलेल्या कार्डाचे पैसे देत मी त्याला म्हणालो,
“मला असं वाटतं,ह्या व्यस्त जगात प्रत्येकजण थकला भागलेला असतो.अशानी आपले काही क्षण वापरून एखादं योग्य शुभेच्छा कार्ड निवडून आपण ज्यांवर प्रेम करतो त्यांना पाठवल्यावर त्यांनाही कळून चुकेल की आपल्या मनात ते किती खास म्हणून टिकून आहेत.
ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 26, 2010

जेव्हा गळाला मासा लागतो

“कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे.”

वेंगुर्ल्याहून आजगांवला जाताना वाटेत मोचेमाड हे गांव लागतं.मोचेमाड येई पर्यंत लहान लहान दोन घाट्या जढून जाव्या लागतात. जवळच्या घाटीच्या सपाटीवर पोहोचल्यावर, त्या डोंगराच्या शिखरावरून खाली पाहिल्यावर, असंख्य नारळांच्या झाडा खाली, छ्पून गेलेलं मोचेमाड गांव दिसतं.पण त्याहीपेक्षा डोळ्यांना सुख देणारं दुसरं विलोभनिय दृष्य म्हणजे मोचेमाडची नदी.
जवळच समुद्र असल्याने ही नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते.पण त्यापूर्वी नदीतलं गांवाजवळचं पाणी अगदी गोड असतं.नदीत मासे मुबलक आहेत.समुद्राच्या दिशेने गांवाजवळून गेलेली नदी नंतर गोड-खारट पाण्याची होते.थोडंसं खाडी सारखं वातावरण असतं.त्यामुळे ह्या ठिकाणी मिळणारी मासळी जास्त चवदार असते.नदीतला मासा आणि समुद्रातला मासा यांच्या चवीत जमिन-अस्मानाचा फरक असतो.पण खाडीतला मासा अत्यंत चवदार असतो.
गुंजूले,शेतकं,सुळे ही मासळी लोक उड्यामारून घेतात.त्याशिवाय करड्या रंगाची कोलंबी-सुंगटं-चढ्या भावाने विकली जातात.कारण ती दुर्मिळ असतात.

मी वेंगुर्ल्याला शिकत असताना, माझ्या वर्गातला एक मित्र पास्कल गोन्सालवीस, मला सुट्टीत मोचमाडला घेऊन जायचा.तिथे त्याचं घर होतं. वाडवडीलापासून गोन्सालवीस कुटूंब मोचेमाडला स्थाईक झालं होतं.
पास्कलच्या आजोबापासूनचं नदीच्या किनार्‍यावर त्यांचं मासे विकण्याचं दुकान आहे.ताजे मासे दुकानात मिळायचेच पण त्याशिवाय दुकानाच्या अर्ध्या भागात तळलेल्या आणि शिजवलेल्या मास्यांचं होटेल होतं.मला पास्कल ह्या दुकानात नेहमी घेऊन जायचा.भरपूर मासे खायला द्यायचा.मला तळलेले मासे जास्त आवडायचे.इकडे लोक तळलेली कोलंबी चहा पितानासुद्धा खातात.

नदीच्या किनार्‍याजवळच बरीच दुकानं असल्याने,मासे पकडायला जाण्यासाठी लहान लहान होड्या सुंभाने,खांबाला बांधून नदीच्या पाण्यात तरंगत ठेवल्या जायच्या. पाण्यात निर्माण होणार्‍या लहान लहान लाटांवर वरखाली होताना ह्या होड्याना पाहून मला गरगरायचं.त्यामुळे मला होडीत बसणं कठीणच व्हायचं.

म्हणून पास्कल मला नदीच्या जवळ असलेल्या एखाद्या मोठया खडकावर बसून गळाने मासे पकडण्याच्या कामगीरीवर न्यायचा.वाटेत आम्ही मास्यांविषयीच गोष्टी करायचो.कुठचे मासे गळाला चावतात,कुठच्या जागी चावतात,मास्यांना लुभवण्यासाठी लहान लहान किडे,अगदी छोटे मासे,अगदी लहान सुंगटं एका पिशवीत जमवून ठेवून बरोबर ती पिशवी कशी ठेवावी लागते. गळाला खुपसून ठेवण्यासाठी ती लुभवणी असतात.

गळ,गळाचा हूक,ऐंशीची दोरी,आणि वेताची लवचीक काठी एव्हडा लवाजमा बरोबर घेऊन जावं लागतं.
अलीकडे पास्कल मुंबईला, त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला, मोचेमाडहून आला होता.त्याच लग्नात त्याची माझी भेट झाली.
मी त्याला माझ्या घरी चहाला बोलावलं होतं.पुर्वीच्या आठवणी निघाल्या.गप्पांना जोर आला.

मला पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी जास्त सृजनशील असतो.त्याचं कारण अगदी सोपं आहे.गळ पाण्यात टाकून मासा लागण्याची वाट पहात असताना विचार करायला भरपूर वेळ असतो.”

मी पास्कलला म्हणालो,
“रोग आणि त्याच्यावर उपाय,तसंच जागीतीक संघर्ष सोडवण्यासाठी योजले जाणारे उपाय,गळाला मासा लागण्याच्या प्रतिक्षेच्यावेळी केले गेले आहेत.असं मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं.कदाचीत ही अतीशयोक्ति असेलही.”

मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“फीश टॅन्क ऐवजी थिंक टॅन्क म्हणायला हरकत नाही.”
आणि पुढे म्हणाला,
“कुणीसं म्हटल्याचं आठवतं की, गळाला मासा लागायची वाट बघत असताना,व्यस्त राहिल्याने,डोक्यात आलेले सर्व विचार कागदावर टिपून ठेवायला वेळ मिळाला असता तर खूप शोध लावता आले असते.कारण एकदा का गळाला ओढ लागली की मनं बदलून जायची.गळाच्या काठीला किती ओढ असायची यावर लागलेल्या मास्याचा आकार-विकार समजून घेण्यात,अन्य विचारावर स्थिरावलेलं मन, सर्व काही विसरून जाऊन मास्याकडे केंद्रीभूत
व्ह्यायचं.

पास्कलच्या हाटलात तळलेली कोलंबी भरपूर विकली जायची आणि आताही जाते.थाळीतून दिलेली कोलंबी डझनावर मोजली जायची.एक डझन हवी,दोन डझन हवी अशी ऑर्डर मिळायची.

पास्कलच्या हाटेलात मास्यावर ताव मारताना पास्कलबरोबर माझ्या गोष्टी व्हायच्या.मला ते आठवलं.ते सांगीतल्यावर पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी,जास्त आशावादी असतो.बराच वेळ पाण्यात टाकून राहिलेला गळ मधेच कधीतरी वर काढून घ्यायचो.कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे. तसं काही तरी झालं असावं ते तपासून पहाण्यासाठी गळ पाण्याच्या वर काढायचो.त्यामुळे पहिल्यांदा गळाला लागलेला मासा आणि दुसर्‍यांदा लागणारा मासा ह्याच्या मधल्या समयात गळ पाण्याबाहेर काढून
तपासण्याचा आणि लागलीच गळ पाण्यात टाकण्याचा एक उद्दोग करावा लागायचा. आठ,आठ तासात एकदाही गळाला मासा न लागणं हे थोडं जिकीरीचं काम वाटायचं.तरीपण आम्ही आशा सोडत नसायचो.कधी कधी आम्ही सूर्योदय पाहिल्यापासून सुर्यास्त पाही पर्यंत पाण्यात गळ टाकून बसतो.जमतील तेव्हडे मासे टोकरीत टाकतो. दिवसभरात पक्षी उडताना दिसतात,मोचेमाडच्या नदीतून खपाटे,गलबतं माल वहातुक करताना दिसतात. त्यामुळे दवडल्या गेलेल्या वेळात कमी मासे मिळाले तरी दिवस अगदीच गचाळ गेला असं वाटत नाही.

गळाला मासे लागणं, हे जणू कसलीच वचनबद्धता न ठेवता स्वर्गाला पोहचल्या सारखं वाटणं.गळाला थोपटलं गेलं, झटका मिळाला,खेचाखेची झाली की समजावं खरा क्षण आला.ऐंसाची लांबच लांब दोरी,लवचीक काठी आणि कमनशिबी गळाला लावलेलं सुंगट, ही सर्व सामुग्री जणू कर्ज फेडीचं धन आहे असं वाटतं.पाण्यातून खेचून आलेला मासा बसल्या जागी आणल्यावर थोडासा विराम घेता येतो.तत्क्षणी काहीतरी प्रचंड झाल्याची ती जागरूकता असते.
पेनिसिलीनचा शोध नसेल,चंद्रावरचं पहिलं पाऊल नसेल पण काहीसं खरंच महान झाल्यासारखं वाटतं.निसर्ग माउलीच्या डोळ्यात धुळ फेकून विनासायास तिच्या कडून बक्षिस मिळालं असं मनात येतं.दोरीच्या शेवटी गळाला लागलेला ऐवज पाहून आपल्या चातुर्याची साक्ष मिळाली असं वाटतं.

पण तो ऐवज,म्हणजे तो तडफडणारा मासा, जरका,मनात भरण्यासारखा नसला किंवा त्याची जास्त तडफड पाहून दया आल्यास पुन्हा पाण्यात सोडून दिला जातो,कदाचीत इतर मास्यांना आपली कर्म कथा सांगायला त्याला मोकळीक दिली गेली असं समजलं तरी चालेल.

हल्ली,हल्ली तर ज्याच्या त्याच्या हाटलात,एका बोर्डावर,आपल्या गळाला लागलेला मोठ्यात मोठा मासा दाखवून फोटो काढला जाऊन,आपल्या कडून विशेष कामगीरी झाल्याचं प्रदर्शन म्हणून चिटकवलं जातं.नदीच्या किनार्‍यावर बसून निरनीराळे कोळी निरनीराळे मासे हातात धरून फोटो काढतात.
प्रत्येक फोटोत कोळ्याच्या चेहर्‍यावरचं हास्य बोलकं असतं.”

उठता उठता मला पास्कल म्हणाला,
“वेळ काढून तू नक्की चार दिवस रहायला मोचेमाडला ये.
तुझ्या जून्या आठवणींची उजळणी होईलच शिवाय आता मोचेमाड किती सुधारलंय ते तुला दिसून येईल.”

“लवकरच येईन “
असं पास्कल मी सांगीतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 23, 2010

आता मिलन होईल कसे

(अनुवादीत)

जा विसरूनी तू मला
आता मिलन होईल कसे
फुल तुटले डहाळी वरूनी
फुलणार कसे ते फिरूनी

चांदण्या पहातील चंद्रमाकडे
लहरी येतील किनार्‍याकडे
पहात राहू आपण एकमेकांकडे
नयनी आंसवे आणूनी म्हणू…
जा विसरूनी तू मला
आता मिलन होईल कसे
फुल तुटले डहाळी वरूनी
फुलणार कसे ते फिरूनी

शहनाईच्या गुंजारवात
सजणी जाईल सजूनी
मेंदी हाताला लावूनी
जाईल सजणाच्या घरी
पहात राहू आपण एकमेकांकडे
नयनी आंसवे आणूनी म्हणू…
जा विसरूनी तू मला
आता मिलन होईल कसे
फुल तुटले डहाळी वरूनी
फुलणार कसे ते फिरूनी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Saturday, November 20, 2010

स्वयंपाक घरातला दिवा पेटताच असु दे.

“शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला विसरला नाही.”

सुलभा आणि तिचा नवरा शरद तुंगारे माझ्या मागून येत होते.मला कळलं जेव्हा शरदने माझ्या पाठीवर थाप मारून मला सावध केलं तेव्हा.त्यांचं घर अगदी जवळ होतं.आमच्या घरी चलाच म्हणून सुलभाने हट्ट धरला.
“नेहमी पुढच्या खेपेला येईन म्हणून आश्वासनं देता.आज मी तुमचं ऐकणार नाही.आणि तुम्हाला आवडतं ते बांगड्याचं तिखलं केलं आहे.आज रात्री जेवताना तुमची कंपनी आम्हाला द्या.”
असं सुलाभा आग्रहाने म्हणाली.आणि शरदने अनुमोदन दिलं.

माझा विक-पॉईन्ट -बांगड्याचं तिखलं-सुलभाला माहित होता.शिवाय खरंच मी तिला नेहमी तिच्या घरी येईन असं आश्वासन देत असे.तिचं घर जवळून दिसत होतं.आज मला कोणतंच निमित्त सांगायला नव्हतं.इतका आग्रह होत आहे तर जावं असं मी मनात आणलं आणि होकार दिला.मी मान उंचावून तिच्या फ्लॅटकडे पाहिलं.आणि बरेच दिवस मला विचारायचं होतं ते लक्षात ठेवून आज सुलभाला विचारूया असं मनात पक्कं करून काय विचारायचं ह्याची मनात उजळणी करीत तिच्या बिल्डिंगच्या पायर्‍या चढत चढत वर जात होतो.
वर गेल्यावर थोडा गरम चहा झाल्यावर,जेवणापुर्वी जरा गप्पा करायला बसलो.

“काय गं सुलभा,मी तुझ्या बिल्डिंग खालून जात असताना नेहमी पाहिलंय की मध्य रात्र झाली तरी तुझ्या स्वयंपाकघराचा दिवा पेटतच असतो.
बसमधून जातानाही वाकून पाहिल्यावर नेहमी दिवा दिसतोच.याच्या मागे काय खास कारण आहे?”
मी सुलभाला विचारलं.

मला सुलभा म्हणाली,
“माझ्या स्वयंपाक घरातला दिवा मी नेहमी पेटताच ठेवते.तो पेटताच ठेवायला मला विशेष वाटतं.माझ्या आईबाबांच्या घरात त्यांच्या स्वयंपाक घरातल्या छतावरचा दिवा अशीच शोभा आणायचा.”

“दिवा शोभा आणायचा हे खरं आहे पण आणखी काहीतरी त्याच्या मागे कारण असावं असं मला वाटतं.काय आहे ते तू मला सांगत नाहीस.त्याबद्दल मला कुतूहल आहे.”
मी सुलभाला म्हणालो.

हंसत,हंसत सुलभा म्हणाली,
“सांगते ऐका,
माझ्या लहानपणी मी माझ्या आईबाबांकडे वाढत असताना,त्यांच्या घरातला दिवा असाच पेटता रहायचा,ह्याचं कारण मला माझ्या आईने समजावून सांगीतलं होतं.ती म्हणायची,
“तुम्हा मुलांसाठी ती एक खूण असायची.आणि त्यातून एक इशारा असायचा की,बाहेर जीवन जगताना कुठलीही चूक जरी झाली तरी ती चूक एव्हडी गंभीर नसावी की त्याचा विचार करून कितीही रात्र झाली तरी तुम्ही घरी यायचं टाळावं.”
आम्ही चार भावंडं होतो.दोन भाऊ आणि दोन बहिणी.मागे पुढे शिकत होतो.माझे दोन्ही भाऊ कॉलेजात असताना मी शाळेत शिकायची.माझी बहिणही माझ्याबरोबर शाळेत शिकायची.”

“खरं आहे.शिक्षण घेत असतानाच्या त्या वयात,कधी कधी बारीक-सारीक कारणावरून मित्र-मंडळीशी तणाव होण्याचा संभव असतो.अशावेळी आपल्या हातून एखादा अतिप्रसंग झाल्यास,बेजबादारपणा होऊ शकतो.तुझी आई अशा प्रसंगाबद्दल काळजीत रहात असावी.”
मी सुलभाला म्हणालो.

“माझी आई अगदी देवभोळी होती.आपली मुलं बेजबाबदारपणे बाहेर वागावीत ह्यावर तिचा कदापीही विश्वास नव्हता. त्याबाबतीत ती भोळी होती.”
सुलभा सांगू लागली.पुढे म्हणाली,

“परंतु,काही कारणास्तव त्यांच्याकडून चूक झाली,अपराध झाला तरी प्रामाणिकपणे त्याची कबुली देऊन ती नेहमीच घरी येणारच असं तिला वाटायचं. प्रत्येक अपराधावर काही तरी निष्पत्ति असतेच.पण त्याचा अंतिम निर्णय माझी आई घ्यायची.तो निर्णय आमच्या नशिबावर सोडून द्यायची नाही.मार्ग चुकलेल्या आम्हा मुलाना घरातला दिवा हा एखाद्या संकेत-दीपा सारखा होता. आमचं घर हे सुरक्षित स्थान आहे हे तो दिवा भासवायचा.
माझे दोन्ही भाऊ शाळा शिकत असताना आणि कॉलेजात जाण्यापूर्वी माझ्या आईकडून त्यांना कधीतरी उशिरा-रात्रीचे उपदेश किंवा व्याख्यानं ऐकायला मिळायची.पण मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने माझ्या आईवर,आम्ही कॉलेजात जाई पर्यंत, क्वचीतच तणाव आणला.”

“मला माहित आहे.तुझी आई मला नेहमी म्हणायची,
“माझ्या दोन्ही मुली गुणी आहेत.मला त्यांची काळजी नाही.”
आणि मी तिची समजूत घालून म्हणायचो,
“मुली नेहमीच गुणी असतात.निसर्गाची त्यांना देणगी आहे.
पुढे त्यांना “आई” व्हायचं असतं.सहनशिलता,समजूतदारपणा,त्याग,प्रेम अशा तर्‍हेचे असतील नसतील त्या सर्व गुणांचा भडिमार निसर्गाने स्त्रीवर केला आहे.”आईचे” गुण घेऊन एखादा पुरूष वागला तर त्याच्याकडून कसलाही प्रमाद होणार नाही.”

सुलभा थोडी ओशाळलेली दिसली.पण झालेल्या चूकीचं समर्थन न करता मला म्हणाली,
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण स्त्री झाली तरी ती माणूस आहे.तिच्याही हातून चुका होणं स्वाभाविक आहे.
मी त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होते.तणाव न आणण्याचा हा शिरस्ता माझ्याकडून मोडला गेला.
तो दीवाळीचा पहिला दिवस होता.मी लाजेने मान खाली घालून,पण एकवार त्या स्वय़ंपाक घरातल्या दिव्याकडे नजर टाकून,घरात आले.मला घरात येताना पाहून माझ्या आईच्या तेव्हाच लक्षात आलं की काहीतरी घोटाळा झाला आहे.मी घाबरी-घुबरी झालेली आईकडे कसला तरी कबुली जबाब देण्याच्या तयारी होते.
मी आईला म्हणाले,
“आई,तू माझा नक्कीच तिटकार करणार आहेस.”
माझा गळा दाटून आला.पण त्याही परिस्थितीत मी म्हणाले,
“मला दिवस गेलेत “
हे ऐकल्याबरोबर माझ्या आईने आपले दोन्ही हात उघडे करून मला आपल्या मिठीत घेतलं.आणि त्यापरिस्थितीत माझा रोखून धरलेला हुंदका मी तिच्या खांद्यावर मोकळा केला.तिने माझ्या पाठीवर हात फिरवला.आणि माझ्या कानात हळूच पुटपूटली,
“मी तुझा कधीच तिटकार करणार नाही.मी तुझ्यावर प्रेम करते.सर्व काही ठिक होणार.”

असं म्हणून माझ्या आईने त्या संकेत-दीपाचा प्रकाश मला दाखवला.आणि मला शेवटी जाण आली.
दिव्याचा प्रकाश दिसणं म्हणजेच,बिनशर्त प्रेम असणं.ते आपल्या मुलांसाठी असणं.कारण जेव्हा जीवन कष्टप्राय होतं तेव्हा ते प्रेम संरक्षणाची शेवटची फळी असते.त्याचाच अर्थ आपल्या मुलांचा उघडपणे स्वीकार करणं,जास्त करून, अशावेळी की ती स्वतःचाच स्वीकार करायला तयार नसतात. त्याचाच अर्थ, समजून घेणं,आणि सहानभूति ठेवणं.खरं तर, प्रेम करणं, जेव्हा ते करणं सोपं असतं, तेव्हा नसून जेव्हा ते महान कठीण असतं तेव्हा करणं
योग्य असतं.”

अशा तर्‍हेचं हे प्रेम, मी स्वतः आई होई तोपर्य़ंत माझ्या पूर्ण ध्यानात आलं नाही.
माझी मुलं आता एक एकरा वर्षाचं आणि एक नऊ वर्षाचं आहे.मुलं आता संदेहास्पद किशोरावस्थेत पदार्पण करीत आहेत.
कॉलेज मधला माझ्या मित्राशी, शरद तुंगारेशी माझा प्रेम विवाह झाला होता.
मुलांना जरी समजण्यात येत नसलं तरी मी स्वय़ंपाक घरातल्या दिव्याची गोष्ट त्यांना समजावून सांगीतली आहे.
मला जरी वाटत असलं की, त्यांना मान खाली घालून घरात येण्याची पाळी येणार नाही तरी, मी त्यांना आश्वासन दिलं आहे की,
“काही जरी झालं तरी घर हे असं स्थान आहे की तिथे प्रेम मिळतं. जीवनात गडद अंधार आला तरी मी स्वय़ंपाक घरातला दिवा का पेटता ठेवते ते त्यांनी समजून असावं”

सुलभाकडून हे ऐकून मला तिची खूप किंव आली.
मी तिला म्हणालो,
“सुलभा,माझं कुतूहल तू छान समजावून सांगीतलंस.कित्येक दिवस ते माझ्या मनात होतं.आता तू केलेल्या बांगड्याच्या तिखल्याचं तेव्हडं कुतूहल जेवल्यानंतरच समजावलं जाईल. खरं ना?”
शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला मात्र विसरला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 17, 2010

स्थीर गती आणि माझे बाबा.

“ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.”

मंगला आपल्या वडीलांवर खूप प्रेम करायची.अलीकडे बरेच दिवस वार्धक्याने ते आजारी होऊन दवाखान्यात होते. एकदा मी त्यांना दवाखान्यात भेटून आलो होतो.पण त्यांचं निधन झालं हे ऐकल्यावर मी मंगलाला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.
माझ्याशी बोलताना मंगला आपल्या बाबांच्या आठवणी काढून मुसमुसून रडत होती.

मला म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की आपल्या आईवडीलांच उदाहरण किंवा त्यांचा अनुभव हा एक चिरस्थायित्वाचा धागा असून तो पिढ्यांन पिढ्यांना एकमेकात गुंतून ठेवीत असतो.माझ्या बाबांच्या बाबतीत ते मला खरं वाटतं.
माझ्या लहानपणी मी पेटी वाजवायला शिकायची.आणि त्यावेळी माझे बाबा मी वाजवताना ऐकायचे.
“मला वाटतं तू जरा जास्त गतीत वाजवत आहेस”
मला माझे बाबा मी पेटी वाजवीत असताना नेहमीच म्हणायचे.

कदाचीत त्यांचं खरंही असेल.संगीत शिकताना नवीन नवीन गाणी वाजवताना,माझी बोटं जेव्हडी जोरात फिरायची त्या गतीत रोजच प्रगति केल्याने मी ह्र्दयस्पर्शी गाण्यांतलं स्वरमाधुर्य घालवून बसायचे.हे मला माहित असायचं. तरी असं असतानाही जास्त करून माझ्या वडीलांचे ते शब्द मला झोंबायचे.त्यावेळी मनात यायचं की,
“बाबा तुम्ही तुमचं पहा ना तुम्हाला काय करायचंय?”

मी म्हणालो,
“मला आठवतं,मी तुझ्या घरी आलो असताना,तुझी चौकशी केल्यावर तुझे बाबा म्हणायचे,
“मंगला माझ्यावर रागावून बाहेर गेली आहे.तिचा राग तिच्या नाकाच्या शेंड्यावर असतो.”
मी विचारायचो,
“असं काय तुम्ही तिला बोललात?”
मला तुझे बाबा म्हणायचे,
“असंच काहीतरी तिच्या पेटीवाजवण्याच्या बाबतीत बोललो असेन.आणि तिला राग आला असावा.”

माझं हे ऐकून मंगला म्हणाली,
“अशावेळी नेहमीच मी पेटी बंद करून,दहा वर्षाची मी राग नाकाच्या शेंड्यावर ठेऊन,बाहेर निघून जायची.त्यावेळी हे माझ्या लक्षात येत नव्हतं की,माझे बाबा, मला दाखवत असायचे की ते, नीटपणे माझी पेटी ऐकायचे.संगीताची तितकीशी पर्वा नकरणार्‍या त्यांना,स्वरमाधुर्य,आणि भाव ह्याबद्दल तितकच माहित होतं पण संगीताची लय आणि गती मात्र त्यांना काहीशी कळत असावी.”

माझ्या बाबांनी केलेली टीप्पणी,मला सैरभैर करायची.त्यामुळे मी माझ्या जीवश्च-कंटश्च मित्रा पासून, मला उत्तेजन देणार्‍या माझ्या प्रेमळ माणसापासून,ज्यांचे हात, मला उचलून लोंबकळत्या पिवळ्या पिकलेल्या आंब्याला, झुकलेल्या फांदी पासून, उचकून काढण्यासाठी मदत करायचे, किचनमधे खुर्चीवर चढून राघवदास लाडवाचा डबा काढण्याच्या प्रयत्नात माझे हात डब्यापर्यंत पोहचत नाही हे पाहून, मलाच वर उचलून लाडवाच्या डब्याला घेण्यासाठी मदत करायचे,त्या हातापासून,माझ्या बाबांपासून मी दूर जाऊ लागले होते.खरं म्हणजे ह्या माझ्या सर्व धडाडीत माझे बाबा नेहमीच माझ्या मागे असायचे.”

मी हे ऐकून मंगलाला म्हणालो,
“तुझे बाबा खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचे.त्यांच्या बोलण्यात वाक्यागणीक तुझं नांव यायचं.”

“मला आता त्याचा अतिशय पश्चाताप होतोय.बाबांचं प्रेम मला लहानपणा पासून माहिती असायला हवं होतं”
असं सांगून मंगला म्हणाली,
“माझ्या किशोरीवयात,जर का मला माहित असतं की,जेव्हा चापचापून चेहर्‍यावर मेक-अप करीत असताना माझे बाबा पहातील म्हणून मी दरवाजा बंद करून माझ्या खोलीत असायचे हे चूक आहे,माझ्या तरूणपणात,जर का मला माहित असतं की,बाहेर गावी नोकरी करीत असताना,एकटेपणा वाटत असताना,माझ्या बाबांच्या सल्ल्याची मला जरूरी आहे हे त्यांना सांगायला मी विसरून जायची हे चूक आहे.मी तरूण आईची भुमिका करीत असताना,माझ्याच मनमाने मी माझ्या मुलांचं संगोपन करायची,अशावेळी निवृत्त झालेल्या आजोबांकडून ज्ञानसंपन्न उपदेश मिळवून घ्यायची जर का मला दुरदृष्टी असती तर,जेव्हा माझी वाढ होत होती अशावेळी लहान मुलगी आणि तिचे आश्रय देणारे,सहायता देणारे बाबा यांच्या मधली जवळीक, खास दूवा, फिरून परत येत नाही,हे जर मला माहित असतं तर मी माझी ही वागणूक जरा हळूवारपणे घेतली असती.”

मी म्हणालो,
“तुझे बाबा,शांत स्वभावाचे होते.त्यांचे विचार स्थीर असायचे.त्यांना होणारे कष्ट ते तोंडावर दाखवत नसायचे.”

“तुमचं माझ्या बाबांबद्दलचं अवलोकन अगदी बरोबर आहे”
असं म्हणत मंगला पुढे म्हणाली,
“आम्ही मुलं वाढत असताना,आमच्याकडून जर का त्याना दुःखदायी वागणूक मिळाली असली तरी माझे बाबा ते दाखवत नव्हते.जसं माझं पेटीवादन होत असताना त्यांच्याकडून होणार्‍या उपदेशाच्यावेळी त्यांची स्वतःची गती स्थीर असायची.

जेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्यांचा अंत जवळ आला आहे हे अन्य प्रकारे भासवलं,तेव्हा माझ्या बाबांनी आमच्या आईला प्रश्न केला,
“मुलींना आता मी काय सांगू?”
त्यांच्या ह्या प्रश्नातच त्यांच्या क्षमतेचं गुपीत छपून होतं,आपल्या कुटूंबाचा प्रथामीक विचार करताना,ते स्वतःचा राग,मनाला लागलेले घाव,आणि त्यांची बेचैनी, विसरून गेले होते.”

“काही गोष्टी आपल्या हातात नसतात.पण आपल्या प्रेमळ माणसाच्या आठवणी येत असतात.चांगल्या आठवणींची उजळणी करून जीवन जगायचं असतं”
मी मंगलला म्हणालो.

“मी माझ्या बाबांना खरंच दूरावून बसले.”
मला मंगला सांगू लागली,
“पण कधी कधी दिवसाच्या अखेरीस,नाकं पुसून काढताना,कुल्हे धूताना,दुध ग्लासात ओतताना,पडलेल्या गोष्टी जमीनीवरून पुसताना,घरभर पसरलेले खेळ जमा करून ठेवताना,अशा काही संध्याकाळच्या वेळी,जेव्हा मी, ती आराम खूर्ची आणि वर्तमान पत्रं पहाण्या ऐवजी ते वर्षाच्या अंतरातले लहान दोन जीव,चीडचीड करताना, रडताना, माझ्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट करताना पाहून लागट शब्द माझ्या मनात आणते आणि मला माझ्या बाबांची आठवण येते.
मग मात्र मी माझ्या त्या दोन पिल्लांना छाती जवळ घेऊन गोंजारते.”

मी उठता उठता मंगलला म्हणालो,
ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.”

“अगदी माझ्या मनातलं बोललात”
दरवाजा उघडताना आणि मला निरोप देताना मंगला मला म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 12, 2010

माझी खास खोली.

धाके कॉलनीतल्या जुन्या इमारती आता पाडून नवीन टॉवर्स यायला लागले आहेत.बरेच लोक पैसे घेऊन दुसर्‍या ठिकाणी जातात,तर काही नव्या टॉवर्समधे आणखी जागा घेऊन रहायला तयार होतात.प्रत्येकाच्या आर्थीक परिस्थितीवर आणि त्यांच्या इच्छेवर हे अवलंबून असतं.

आमचे शेजारी, तावडे कुटूंब, टॉवरमधे रहायला गेले.त्यांनी तेराव्या मजल्यावर दोन फ्लॅट्स घेतले.त्यांच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभं राहिल्यावर जुहूची चौपाटी स्पष्ट दिसते.वारा पण मस्त येतो.संबध फ्लॅटमधे वारा खेळत असतो.काही वेळा अतिवार्‍यामुळे खिडक्या बंद कराव्या लागतात.

सुलू तावडेला आपला नवीन फ्लॅट खूप आवडतो.मला काल तिने तिच्या घरी बोलावलं होतं.
मी तिला विचारलं,
“ह्या नव्या जागेत तुला विशॆष असं काय आवडतं.”

मला म्हणाली,
“काय आवडत नाही ते विचारा.आम्हाला प्रत्येकाला इकडे स्वतंत्र खोली असून,प्रत्येक खोलीला स्वतंत्र बाथरूम जोडलेली आहे.मला माझी खोली आणि त्याहीपेक्षा माझी बाथरूम आवडते.”

“कां असं काय तुझ्या बाथरूममधे आहे की ती तुला एव्हडी आवडावी?
मी सहाजीक कुतूहलाने सुलूला प्रश्न केला.

“मला पहिल्यापासून वाटायचं आपणच वापरू असं आपलं एक स्वतंत्र बाथरूम असावं.एकदाची गंमत तुम्हाला सांगते.ह्या बाथरूमच्याच संबंधाने.”
असं म्हणून एक थंडगार लिंबाच्या सरबताचा ग्लास माझ्या हातात देत म्हणाली,
“मी एकदा, माझे काही दृढविश्वास आहेत, त्यावर विचार करीत होते, आणि माझ्या लक्षात आलं की,हा विचार करीत असताना, मी माझ्या बाथरूम मधे थपकट मारून बसले होते.आणि लगेचच माझ्या लक्षात आलं की,प्रत्येकाला स्वतःची अशी एक खोली,एखादी स्वतंत्र जागा किंवा कुठेतरी शांत बसावं असं क्षेत्र असावं.त्यात बसून रहावं.आणि कुणीही कटकट करायला येऊ नये. आणि आपल्याच विचारत मग्न होऊन जावं”

मी सुलूला म्हणालो,
“खरं आहे तुझं म्हणणं, पण हे थोडसं चमत्कारीक वाटतं.”

मला म्हणाली,
पण माझ्या बाजूने खरं सांगायचं झालं तर,कुणापासूनही दूर रहायचं झालं तर माझी बाथरूमच उपयोगी आहे असं मला वाटतं.
अगदीच लंगडं कारण आहे ना! तेच मला सर्व प्रथम वाटलं.नंतर माझ्या लक्षात आलं की,जेव्हडी मी माझ्या बाथरूममधे वेळ घालवते तेव्हडा माझ्या बेडरूममधे घालवीत नाही.माझी बेडरूम मला एखादी होटेल रूम सारखी वाटते. शिवाय माझी बाथरूम मला वाटत होतं त्यापेक्षा मस्त आहे असं वाटतं. उदा.त्यात दोन सिंक्स आहेत.एक सिंक माझ्या प्रत्यक्ष वापरात असते आणि दुसरं,मला माझी चेहरापट्टी वगैरे करयाला उपयोगी होत असतं.अलीकडे बरेच दिवस मी असाच वापर करते.
ही एक प्रकारची मला संवय झाली आहे.शिवाय ह्या संवयीमूळे मला बरंही वाटायला लागलं आहे.
बर्‍याच लोकांची अशी एखादी जागा असतेच जिथे ते त्यांचा वेळ दवडतात.एका अर्थी ती एक संरक्षीत जागा असते.”

जरा डोळ्यासमोर चित्र आणलं की, आपल्या जॉबवरून आल्यावर, घरात पाय ठेवल्यावर,तुमची अशी जी जागा असते त्यात जाऊन सर्व शरीर झोकून द्यावं.आणि लगेचच तुम्हाला अगदी आरामात आहे असं वाटावं.आपली अशीच एक खोली असावी जी आपल्याला हवी तशी सुशोभित करता यावी.जसा तुमच्याच हाताच्या मागच्या भागावर काय आहे हे फक्त तुम्हालाच माहित असतं तसंच तुमच्या अशा ह्या खोलीची इंच,इंच जागा तुम्हालाच माहित असते. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला समर्थ समजता आणि तुमचा तिथे पूरा काबू असतो. मला नक्कीच माहित आहे की माझी जर अशी स्वतंत्र खोली नसती तर मी स्वतःला,रोज घरी आल्यावर, अत्यंत कमजोर व्यक्ति समजले असते.

मला खोटं सांगायचं नाही,बाथरूम ही माझी खास खोली आहे हे सांगायला जरा अजीब वाटतं खरं.पण काय करणार?हे आहे हे असं आहे.मला जे खासगी वातावरण हवं आहे ते मला तिथे मिळतं.त्यासाठी मला भारी प्रयास करावा लागत नाही.आणि हे नेहमीच मला अतिरिक्त आहे असं वाटतं.”

हे सुलूने सगळं सांगीतल्यावर,
“बघू तुझी बाथरूम कशी आहे ती?”
असं म्हणायला मी धाडस केलं नाही.कारण ती तिची खासगी जागा आहे असं ती मला म्हणून गेली होती.

“प्रत्येकाला आपल्यात सुधारणा करायला पात्रता असावी लागते.प्रत्येकाला आनंद मिळायला,जरी तो काही क्षणाचा असला तरी,आपली अशी खोली असायला आपण पात्र आहे असं वाटलं पाहिजे.”
असं म्हणून रिकामा झालेला लिंबाच्या रसाचा ग्लास मी तिच्या हातात दिला.

“मला माहित होतं तुम्ही नुसतेच माझ्या विचाराशी सहमत होणार नाही, तर माझ्या विचाराची प्रशंसा पण करणार.म्हणूनच मी तुम्हाला आज घरी बोलावलं.”
मी उठता उठता मला सुलू म्हणाली.

श्रीकॄष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 9, 2010

झब्बू

“हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.” इती गणपत.

दीवाळी आली आणि सर्व जवळचे नातेवाईक जमल्यावर, घरात धमाल येते.पत्त्याचा डाव निश्चितच मांडला जातो.”
मी गणपतला सांगत होतो.

गणपत माझा मित्र.दीवाळीच्या फराळाला मी त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं.घरात पत्याचा डाव जोरात रंगलेला पाहून त्यालाही कुतूहल झालं.

मी त्याला पुढे म्हणालो,
“माझ्या लहानपणाची मला आठवण आली. दीवाळीसारख्या सणाला घरी मित्रमंडळी जमली की पत्यांच्या खेळाला उत यायचा.आमचा दिवाणखाना मोठा असल्याने बरीच मंडळी जमल्यानंतर गोल चक्राकारात बसून खेळायचो. सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे “झब्बू”.या खेळात मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व भाग घ्यायची.जेव्हडे मेंबर्स जास्त तेव्हडा खेळ जास्त रंगायचा.
पत्त्याचा बावन्न पानाचा सेट असल्याने,बावन्न आकड्याला, खेळणार्‍यांच्या आंकड्याने भागून पानं वाटताना जो भागाकार येईल तेव्हडी पानं प्रत्येकाला एकाच वेळी दिली जायची.उरलेली पानं पत्ते पिसणारा घ्यायचा.उद्देश असा की एक एक पान प्रत्येकाला वाटल्यास रंगाने हात व्ह्ययचा, तो होऊं नये आणि लगेचच झब्बू दिला जावा.

ह्या खेळात असं आहे की, नशीबाने येणारी पानं,पुढचा, कोणत्या पानावर देत असलेला झब्बू,आणि मागचा, कोणत्या पानावर घेत असलेला झब्बू हे लक्षात ठेवण्याचं कसब असणं म्हणजे लवकर आपली सुटका करून घेण्याच्या चलाखीवर आपण अवलंबून असणं.नाहीपेक्षां शेवटी “गाढव” होण्याची पाळी येते.

नंतर कुणीतरी गाढव होऊन झाल्यावर,आणि खेळाचा तो डाव संपल्यावर,
“कसा काय गाढव झालास?”
असा साधा प्रश्न गंमत म्हणून एखादा विचारायचा.
“त्याचं असं झालं,तसं झालं.”
अशी चरवीचरणाची चर्चा,गाढव झालेल्याने,सांगायला सुरवात केल्यावर लगेचच कुणीतरी,
“आपल्याला काय करायचं आहे”
असं म्हणून गाढव झालेल्याचं हंसं करण्यात इतरांची चढाओढ लागायची.

हंसं झालेला मात्र पुढल्या खेपेला गाढव झाल्यावर,
“कसा काय गाढव झालास?”
ह्या प्रश्नाला निक्षून उत्तर देत नसायचा.

माझं हे ऐकून गणपत म्हणाला,
माझ्या लहानपणी मी,माझे वडील,आई आणि माझी धाकटी आणि मोठी बहिण पत्ते खेळायचो.धो,धो,पाऊस पडायला लागला आणि बाहेर कुठेही जाण्याचा सुमार नसला की आम्ही हटकून पत्ते खेळायला बसायचो.

कोकणात पाऊस बेसुमार पडायचा.बाहेरच्या पडवीत बसून पत्ते खेळायला मजा यायची.मधुनच पावसाची वावझड आल्यावर अंगावर पाण्याचे तुषार पडायचे.अशावेळेला सोलापूरची जाडी चादर अंगावर लपेटून मी बसायचो.
गाढव व्हायला मला मुळीच आवडायचं नाही.माझी धाकटी बहिण गाढव झाली तर ती पुढचा डाव खेळायलाच तयार व्ह्यायची नाही.मग माझे वडील म्हणायचे,
“पत्तेच तुमचं ऐकतात.”
दुसर्‍या डावातल्या वाटपात कुणाला तरी जड पान्ं आल्यास-राजे,एक्के,गुलाम वगैर-आणि कुणी कुरकुर केल्यास माझे वडील म्हणायचे,
“कुरकुर करूं नकोस,पत्यांना ऐकूं येतं. कुरकुर कराणारा पत्यांना आवडत नाही.”

रमी खेळताना माझ्या वडीलांचं असंच व्हायचं.ढीगातून प्रत्येक पत्ता उचलताना,डोळे मिटून,ओठात पुटपुटून, स्वतःवर पूर्ण विश्वास आहे असं भासवून, पत्ता कसाही असो,आपल्या मनासारखा आला असं सांगून टाकीत.

“हा मस्तच पत्ता मला मिळाला.मला ह्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे”
असं मोठ्याने बोलून दाखवीत.
त्यांची रमी झाली नाही तर,
“हरकत नाही.थोडक्यात चुकली.”
असं खिलाडू वृत्तिने म्हणत.
आणि त्यांची रमी झाली तर,अगदी घमेंडीने म्हणत,
“पाहिलत का मला माहितच होतं.”
पण अशावेळी माझी आई हे ऐकून,डोळे गरगर फिरवून म्हणायची,
“पुरे झाली,स्वतःचीच स्तुती”

तिस वर्षं झाली.आता मला नक्की माहित झालं आहे की पत्ते माझं ऐकत नाहीत.आणि कुणाचाही ह्या म्हणण्यावर विश्वास नसणार हे ही मला माहित आहे.माझे बाबा,गणीताचे शिक्षक असल्याने त्यांचा भरवंसा आंकडेशास्त्रावर होता, ओठाने पुटपुटलेल्या प्रार्थनेवर नक्कीच नव्हता.
आणि मी वकील असल्याने,पत्त्यांना कान असतात ह्यावर केस घालायला कोर्टात जाणार नव्हतो.पण सरतेशेवटी माझ्या बाबांचंच खरं होतं.
ते म्हणायचे,
“सकारात्मक दृष्टी ठेवून,भीतिला आनंदात रुपांतरीत करावं आणि निराशेला विजयात रुपांतरीत करावं.
तक्रारी असणं म्हणजेच प्रारंभालाच हार मागणं.पण सकारात्मक वृत्ति यशाच्या खात्रीला बळावते.

मंदिरं आणि किल्ले बांधले जातात,परोपकारता निधीबद्ध असते,विजय मिळवले जातात,संघर्ष मिटवले जातात, जीवन जगलं जातं,आणि पत्ते खेळले जातात,पण व्यवस्थितपणे केलं तर, भीति, नबाळगता,धास्ति नठेवता,निराश न होता,पण अपेक्षा बाळगून,आनंदी राहून आणि यशावर दृढनिष्ठा ठेवून राहता आलं तरच.”

अलीकडेच मी माझ्या नव्वद वर्षांच्या आजोबांना दवाखान्यात भेटायला गेलो होतो.ते हृदयाच्या झटक्यातून सुधारत होते.माझा हात त्यानी हातात घेऊन दुखेपर्यंत आवळला.
“कसं वाटतं?”
हात आवळत असतानाच मला विचारलं.
“आई गं”
मी ओरडलो.
माझ्या अजोबा आपला चपटा,हाडकुळा दंड दाखवीत म्हणाले,
“इतका काही वाईट नाही.”
ते हार मानणारे नव्हते.ती काही त्यांची मरणशय्या आहे असं ते मानीत नव्हते.

आता मी माझ्या मुलांबरोबर पत्ते खेळतो.आमची एक खास खेळासाठी म्हणून खोली आहे.तिथलं वातावरण नेहेमी जोशपूर्ण असतं.चारही बाजूला खेळणी पसरलेली असतात.माझा नऊ वर्षाचा नेहमी खेळाच्या टेबलावर विराजमान झालेला असतो.आणि सहा वर्षाची,पत्ते हातात घेऊन पिसत रहाते.खेळ सुरू झाल्यावर खोलीतलं तंग वातावरण कमी-जास्त गंभीर होत असतं.एखादा जवळ जवळ जिंकायला आलेला-बहुतेक वेळा तसंच होतं-असताना माझी मुलं ईर्षा आलेली,असूया आलेली,उर्मट झालेली आणि दुखावणारी होतात.हरली की रडतात, अंगावर धावून येतात. जिंकली की रागारागाने बघतात.अगदी मुलांसारखीच वागतात.अशावेळी मी माझे बाबा होतो.माझी पत्नी माझ्या आईसारखेच डोळे वटारते.अशावेळी मी माझ्या बाबांचा विचार पुढे ढकलतो,
“तक्रारी होऊ नका,आणि जे पत्ते मिळालेत त्यावर समाधान रहा.सर्व खेळ मजेसाठी आहे हे लक्षात असू द्या.पत्ते तुमचं ऐकणार”

हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.”
गणपतचं हे सर्व बोलणं इतर खेळणारे ऐकत होते.

“तुझा हा संदेश ह्या खेळणार्‍यांपर्यंत पोहोचला जावो”
असं म्हणत माझ्या पत्नीने फराळाचं ताट गणपतच्या समोर ठेवलं.आणि म्हणाली,
“दीवाळीच्या शुभेच्छा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 6, 2010

हास्यप्रदेची क्षमता.

“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं”

प्रो.देसाई मला, आपल्या लहानपणाची आठवण येऊन, एक किस्सा सांगत होते.
“एकदा मला आठवतं,मी नऊएक वर्षांचा असेन,मी घरातून बाहेर मागच्या अंगणात धांवत धांवत जात होतो. संध्याकाळची वेळ होती.किचनमधे माझी आई अंधारात निवांत बसून होती.तिचा तो दुःखी चेहरा पाहून मला खूपच वाईट वाटलं.सकाळपासून संबंध दिवसभर माझी आई हंसताना मी पाहिली नव्हती.नंतर मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी गेला आठवडाभर तिला हंसताना पाहिलं नव्हतं.आणखी मागे जाऊन विचार केल्यावर माझ्या लक्षांत यायचं टाळलं गेलं नाही की गेला महिनाभर माझ्या आईला मी खुसखुसून हंसताना पाहिलंच नाही.”

प्रो.देसाय़ांच्या आईचा आज जन्मदिवस होता.तिला आवडणारे बेसनाचे लाडू मला द्यायला म्हणून आले होते. आईच्या आठवणीने भाऊसाहेब नेहमीच भाऊक होतात.दर खेपेला आईचा विषय निघाल्यावर जुन्या आठवणी काढून एखादी घडलेली घटना डोळ्यात पाणी आणून मला सांगतात.

“तुमच्या बरोबर मी बरेच वेळा माझ्या आईच्या जुन्या आठवणी सांगत आलो आहे.आज तर तिचा जन्मदिवस आहे.अगदी अगत्याने मी तिच्याबद्दल हे सांगत आहे.”
असं मला म्हणाले.

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुम्ही सांगा आणि मी ऐकतो.अहो,आपल्या आईबद्दल कुणाला ऐकायला आवडणार नाही.?तुमचा किस्सा ऐकताना मलाही माझ्या आईची आठवण येऊन धन्य वाटतं.”

भाऊसाहेब खूश झाले.मला पुढे सांगू लागले,
“त्यानंतर मी माझ्या मनात ठरवलं की यापुढे आईला हंसवायचं.आणि हे काही सोपं काम नव्हतं.लहानपणी मी तसा गप्पच वृत्तिचा मुलगा होतो. थट्टा-मस्करी करण्याची माझी प्रकृति नव्हती.इतकं असूनही कधी कधी मी विनोद करायचो,पण ते विनोद म्हणजे, कुणा एखाद्या जाड्या मुलाला पोटात गॅस झाल्यामुळे खालून कसा सोडायचा आणि ते प्रात्यक्षीक करून दाखवायचं,किंवा शेंबड्या मुलाची नक्कल करून दाखवायचो.

मला आठवतं त्यावेळी असलेच विनोद मी माझ्या आईला करून दाखवले.ऐकून तिने तिचे डोळे फिरवले नाहीत किंवा मोठे करून माझ्याकडे पाहिलंही नाही.ती नुसती गालातल्या गालात हंसली.तिचं ते हंसूं पाहून मी समजलो की माझ्या मनात काय आहे ते तिला कळलं असावं,पण,का कळेना, तिला खुसखुसून हंसायचं नव्हतं.
असेल कदाचीत, त्यावेळी तिला वाटत असावं,की ती हंसूच शकत नसावी.पण शेवटी हंसली, पण कोणत्या विनोदावर माझी आई नंतर हंसली ते मला आठवत नाही.

मी मोठा झाल्यावर मला एकदा माझी आई म्हणाली की तिला ती घटना आठवते.कठीण काळातून बाहेर यायला तिला माझ्या त्या हंसवण्याची चांगलीच मदत झाली.किती प्रमाणात तिला फायदा झाला हे,नऊ वर्षाच्या, मला समजलं नाही पण एक मात्र खरं की आम्ही दोघं मनाने खंबीर झालो.”
भाऊसाहेबांच्या ह्या हंसण्य़ा-हंसवण्याच्या किश्यावरून माझ्या मनात आलं ते आपण सांगावं म्हणून मी त्यांना म्हणालो,
“तुमचे हे ऐकून मला एक आठवण आली.
२६/११ चा ताजमहाल होटेलवर आणि आणखी काही ठिकाणी मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या दिवशी मी मुंबईत होतो. मला आठवतं त्या घटनेनंतर बरेच दिवस मुंबईकरांच्या चेहर्‍यावरचं हंसंच निघून गेलं होतं. नव्हेतर लोक इतके क्षुब्ध झाले होते की चेहर्‍यावर हंसूं आणण्याची वेळच आली नाही असं त्यांना वाटायचं.
पण मला मात्र वाटायचं की,चेहर्‍यावर आणलेलं हंसूं अख्या मुंबई शहराला झालेली जखम हळू हळू भरून काढायला मदत निश्चितच करील.
शहराच्या एका मोठ्या जागी एका पोस्टरवर राक्षसारखे दिसणार्‍या आतंकवाद्यांचं चित्र होतं आणि खाली लिहिलेलं मी वाचलं. ते एकमेकाला म्हणत होते की,
“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं”
अलीकडे माझ्या लक्षात आलंय की,श्रद्धा ही मुळातच हास्यप्रद असते.कृष्णकन्हया गाई सांभाळताना आपल्या संवगड्याने घेऊन खेळायचा त्याच्या संवगड्यात पेंद्या नावाचा विदुषक होता.त्याची टिंगल करून सर्व हंसायचे.
मी एकदा माझ्या एका क्रिश्चन मित्राच्या नातेवाईकाच्या प्रेतयात्रेला गेलो होतो.आपल्या जवळच्या प्रेमळ व्यक्तिच्या जाण्याने दुःखी होऊन जमलेल्या समुदायात एखाद्या क्षणी हास्य असायचं.”

माझं हे ऐकून प्रो.देसाई जरा विचारात पडले.मला काही तरी मूंबईच्या घटनेच्या संदर्भाने व्यापक विचार त्यांना सांगायचा होता.
मला म्हणाले,
“हास्यप्रद श्रद्धेची नजर, जगात होणार्‍या हानीकडे आणि नुकसानीकडे,लागलेली असते आणि त्याकडे पाहून ती श्रद्धा हंसत असते.आपल्याला पण दुःखाला, हानीला आणि आतंकवादालासुद्धा पाहून हंसता येतं.
विदुषक स्वतःला पाडून घेतो,पण नेहमी उठून ऊभा होतो. हीच तर हास्यप्रदेची क्षमता म्हटली पाहिजे.आपण फिरून प्रोत्साहित होत असतो.ती मुंबईची घटना घडून गेल्याच्या दुसर्‍या दिवसापासून मुंबईकर कामाला लागले.कारण त्यांची श्रद्धा होती की हंसत राहूनच पुढचं कार्य साधत गेलं पाहिजे.
म्हणतात ना शो मस्ट गो,तसंच काहीसं.”

मला दिलेल्या बेसनाच्या लाडवातून दोन लाडू काढून एक मला आणि एक त्यांना देऊन त्यांच्या आईचा जन्मदिन आम्ही साजरा केला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 3, 2010

जादूगार डॉ. बावा.

“माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.”

रघूनाथच्या पायाला वरचेवर सुज यायची हे मला अगदी पूर्वी पासून माहित होतं.पण अलीकडे तो त्या सुजेची तक्रार करीत नव्हता.
त्याचं असं झालं,माझ्या बहिणीच्या मुलाला पण असाच व्याधी झाला होता.तिनेपण त्याच्या सुजेवर बरेच उपाय केले होते.संधिवातामुळे असं होतं म्हणून डॉ.मसूरकरानी तिला सांगीतलं होतं.त्या व्याधीबरोबर आता त्याला आयुष्य काढावं लागणार असंही डॉक्टर तिला म्हणाले.फक्त त्याला आराम मिळण्यासाठी काही औषधं आणि उपाय सुचवले होते.
मी माझ्या बहिणीला म्हणालो,
“रघूनाथला मी विचारून बघतो.त्याचे पाय आता बरे झाले आहेत.त्याने कोणता उपाय केला ते कळेल.”

रघूनाथ मला म्हणाला,
मला अगदी लहानपणापासून एक व्याधी होता.माझ्या दोन्ही पायाचे घोटे थोडे कमजोर होते.माझी आजी मला नेहमीच धरधावून सांगायची की,
“त्या घोट्यांना दुखापत करून घेऊ नकोस,तुला संधिवात -आर्थाइटिस सारखं- दुखणं होईल.काळजी घे”

सांध्यांची हालचाल झाल्यावर येणार्‍या हाडातल्या आवाजावर खास असं औषध नाही.आणि काही मुलं बोटं मोडून करीत असलेला आवाज ऐकायलाही गमतीदार वाटतो.
पण माझ्या आजीचं ते म्हणणं माझ्या मनावर नकळत दीर्घकाळ छाप ठेऊन राहिलं.पुढेमागे ही व्याधी वाढण्याची शक्यता झाल्यावर माझ्या आजीचा तो सल्ला इतका पोरकटासारखा धुडकावून लावण्याजोगा न व्हावा एव्हडंच मी मनात म्हणायचो.”

“पण मग तू बरं व्ह्यायला काय उपाय केलास?”
मी आतुरतेने रघूनाथला विचारलं.

“ती पण एक गंमत आहे.आणि योगायोग आहे”
असं सांगून म्हणाला,
“ह्या प्रसंगाला सामोरं यायला माझी ती आतुरतेने वाट पहात राहिलेलो दिल्लीची ट्रिप मला भोंवली.
त्याचं असं झालं,दिल्लीच्या करोलबागच्या बाजारात मी विन्डो-शॉपींग करीत जात असताना अपघाताने एका मातीच्या ढिगार्‍यावर धडपडून माझ्या पायाच्या घोट्यांना दुखावून घेतलं.पाय थोडा सुजला.मी माझ्या वडीलांना फोन करून माहिती दिली.त्यावेळी माझे वडील कोकणात होते.त्यांनी मला सल्ला दिला की मुंबईला परत आल्यावर प्रिन्सेसस्ट्रिटवर पारशी अग्यारी जवळ एक डॉ.बावा म्हणून पारशी माणूस आहे.त्याला तुझा पाय दाखव.पुढे
जाऊन त्यांनी मला त्यांच्याच एका मित्राची गोष्ट सांगीतली.त्याच्या पाठीत खूप दुखायचं.खूप उपाय आणि औषध-पाणी करून झालं.शेवटी तो कुणाच्या तरी सल्ल्यावरून ह्या पारशी डॉक्टरकडे गेला.एक्सरे वगैरे न घेता, त्याने त्याची पाठ हाताने चाचपून पाहिली.आणि नंतर त्याला ओणवं बसायला सांगून त्याच्या पाठीवर आपला उजवा पाय जोराने दाबून मग उठायला सांगीतलं.खरंच चमत्कार म्हणजे त्याची पाठ दुखायची थांबली.
अशीच त्यांनी त्यांच्या आणखी एका मित्राची कथा सांगीतली.
तो ह्या डॉ.बावाकडून कसा बरा झाला ते सांगीतलं.”

“मुंबईसारख्या शहरात राहून अशा उपायावर तुझा विश्वास कसा बसला?”
मी रघूनाथला निक्षून विचारलं.

“मुंबईसारख्या शहरात राहिल्याने,माझ्या सारखा एखादा, आपोआप नैतिकदृष्ट्या छिन्नमनस्कता असलेला असूं शकतो.आणि त्याच्या वृत्तित शास्त्रीयदृष्टीने केलेले उपाय आणि अशास्त्रीयपद्धतिने केले जाणारे उपाय ह्याबद्दल चौकसपणा आल्याने अशा प्रकारच्या उपायांच्या फलश्रुतिबद्द्लचा दावा प्रश्नचिन्हात नेण्याकडे त्याचा कल जाऊ शकतो.असे उपाय इतके संदिग्ध असतात की,
“हे औषध महिनाभर घेतल्यावर तुमचं वजन वीस किलोने कमी होईल”
अशा पद्धतिच्या जाहिराती सारखं होईल.”
रघूनाथ मला म्हणाला.

“पण इतर शहरी डॉक्टरचे उपाय,पायाला बर्फ चोळण्याचा आणि पाय बरा होई तोपर्यंत कुबड्या वापराण्याचाच सल्ला देण्या व्यतिरिक्त काही सांगणार नाहीत.हे माहित असल्याने,त्यापेक्षा डॉ.बावाच्या उपायाला तू स्वीकृति देण्याचा विचार केलास की काय?
मी रघूनाथला आतूरतेने प्रश्न केला.

“अगदी बरोबर”
असं म्हणून तो मला म्हणाला,
“डॉक्टर बावाच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा होता.बहुदा तो चष्मा बाबा आझमच्या काळात घेतलेला असावा. त्याच्या अंगात तलम आणि झीरझीरीत सफेद पैरण होती.पायात जाड पट्ट्याची चप्पल होती.मला, समोर ठेवलेल्या स्टूलावर बसायला सांगून आपण एका वेताच्या खूर्चीवर बसला.माझ्या पायाचा सुजलेला घोटा त्याने क्रमबद्ध पद्धतिने तपासून पाहिला.आणि जाहिर केलं की माझ्या पायचं हाड वगैरे काही मोडलेलं नाही.
त्यानंतर त्याने एका चिनीमातीच्या भांड्यात तीव्र वास येणारी पावडर टाकून,घोटून घोटून त्याची पेस्ट बनवली. भांड्यात ती पेस्ट मांजराच्या विष्टेसारखी दिसत होती.ती पेस्ट आपल्या बोटांनी काढून एका केळीच्या पानाच्या तुकड्यावर एखाद्या निष्णात अनुभवी माणसासारखी लावली. आणि ते पान माझ्या पायाच्या घोट्यावर ठेऊन चापचापून धरून बॅन्डेज केलं. आणि अशीच दोन तिन वासमारणारी केळीच्या पानामधे ती पेस्ट घालून तयार
केलेल्या पुरचूंड्या मला देऊन,चार चार तासांनी प्रत्येक पुरचूंडी गरम करून अशीच पायाला चपापून लावायची माहिती दिली.
डॉ.बावाने केलेल्या मदतिबद्दल मी त्याचे थॅन्क्स मानले.त्याना दोनशे रुपये- त्याने दिलेल्या ट्रिटमेंटचे म्हणून- दिले.”

मी हे ऐकून माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि त्याला म्हणालो,
“किती दिवसात गूण आला?”

“पुढे ऐकतर खरं.”
माझ्या कपाळावर आलेल्या आठ्यांकडे बघून रघूनाथ हंसत म्हणाला,
“त्याच्या दवाखान्यातून अक्षरशः लंगडत,लंगडत माझं घर गाठलं.खरंच सांगायचं तर, ह्या घटनेमुळे माझ्या मनात झालेला गोंधळ आणि मनाला लागलेला धक्का बराचसा जबरदस्त होता.शहरी डॉक्टरकडून उपाय करून घेणार्‍या मला ह्या घरगुती उपाय करणार्‍या डॉक्टरला प्रश्नावर प्रश्न करून- उपाय करून घेण्यापूर्वी- त्याच्याकडून उत्तरं घेता आली असती.पण मात्र,
“शहरात रहाणार्‍या ह्या अर्धवटांना घरगुती उपायाचं महत्व काय माहित असणार?”
अशी त्याच्या मनातल्या मनात आलेली शंका,उघडपणे नविचारतां,मारक्या नजरेने माझ्याकडे बघून,ती निर्देश करून घेण्याची मला माझ्यावर पाळी आणावी लागली असती.किंवा,
“माझ्या दवाखान्यातून खाली उतर”
असं रागाच्या भरात त्याने मला सांगीतलं असतं, तर ते ऐकून घ्यावं लागलं असतं.

पण अहो चम्तकार ऐका.मी सकाळी माझ्या बिछान्यातून उठल्यावर,माझं लंगडणं सोडाच,मला दुखायचंही बंद झालं.डॉ.बावाने लावलेलं बॅन्डेज पायावरून दूर केल्यावर माझ्या घोट्यावरची सुजसुद्धा पशार झाली.त्याने दिलेल्या पुरचूंड्याचा दुसर्‍या दिवशी त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे उपाय केल्यावर,तिसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर बॉलिवूडचं नृत्य करण्या इतपत माझी तयारी झाली होती.”

मी रघूनाथला म्हणालो,
हेच दुखणं शहरी डॉक्टरकडून उपाय करून बरं करायला तुझे तिन आठवडे गेले असते, डॉ.बावाच्या उपायाने तू तिन दिवसात बरा झालास.”

“आज तागायत मी निष्टापूर्वक डॉ.बावावर विश्वास ठेवायला लागलो.त्यानंतर मी अनेकदा त्याच्याकडे उपाय करण्यासाठी म्हणून गेलो असेन.
माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.”

नचूकता,मी रघूनाथकडून त्या डॉ.बावाचा पत्ता घ्यायला विसरलो नाही हे उघडच आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com