Tuesday, December 30, 2008

उदात्त आशयामागचं गुढ

“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”

“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”

मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.

चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर न चुकता विचारायचे,

“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती. आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं. परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता. आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,

निरोगी मौज

पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे

ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं

”सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.

ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.

“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, December 28, 2008

पायी प्रवासातली मजा.

“मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं”

श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं.
केळकर म्हणाले,
“इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे मी कामावर वेळेवर पोहोचायचो.रोज कुणी ना कुणी दयाळु होऊन उदार होऊन मला घ्यायचा.माझ्या मनात रोज एव्हडं यायचं की आज पण कालच्या सारखा चमत्कार होईल ना?
रोज ज्यांच्यावर लिफ्टसाठी मी अवलंबून असायचो त्याना त्यांच्या जीवनात कमी का चिंता आहेत,आणि असं असूनही एखादा तरी मला लिफ्ट द्दायचाच अगदी उदार होऊन.किती लोकानी अशी मला लिफ्ट दिली असेल याची मी काही यादी ठेवली नाही. परंतु मी त्याच्या येण्यावर निर्भर होतो.
ह्या घटनेवरून मी माझी एक समजूत करून घेतली आहे.ती अशी. दयाळु असणं म्हणजे श्वास घेतल्यासारखं आहे.श्वास जसा एक तर तो बाहेर टाकायचा किंवा आत घ्यायचा. एखाद्दा अनोळख्याकडून भेटीची याचना करताना एक प्रकारे मन उघडं असावं लागतं.एखाद्दाकडून अत्यंत दयाळुपणा अंगिकारताना त्या अगोदर थोडी मानसिक तयारी असावी लागते. मी ही क्रिया आदान-प्रदान केल्या सारखी समजतो.ज्या क्षणी अनोळखी त्याच्या मदतीचा,चांगुलपणाचा उपहार देतो तेव्हा ज्याला तो उपहार घ्यायचा असतो तो आपल्याकडून नम्रता, आभार, आश्चर्य, विश्वास, प्रसन्नता, निश्वास,आणि तृप्तीचा उपहार त्याला देतो.

इकडे आल्यावर जेव्हा मी पायी प्रवास करायला सुरवात केली तेव्हा संध्याकाळ होताच मी ज्या गावात गेलो असेन तिकडे एखादं घर बघून दरवाजा खटखटायचो आणि मला एक रात्र तुमच्या बाहेरच्या पडवीत झोपायला मिळेल का हे विचारून घेत असे आणि मी सकाळ होताच निघून जाईन म्हणून त्याचवेळी सांगत असे. मला कुणीही नकार दिला नाही. एकदा सुद्धा.काही तर आत घरात झोपायला सांगायचे. असा क्षण आला असता कधीकधी मी त्यांना थोडावेळ माझ्या आतापर्यंतच्या झालेल्या प्रवासाचे आणि मिळालेल्या अनुभवाच्या गोष्टी सांगायचो. ही मंडळी खूप स्वारस्य घेऊन मला ऐकायची.माझ्या सारखं करायला त्यांच्या क्वचितच मनात येत असेल पण ऐकायला उत्सुकता दाखवायचे.आणि ह्या ऐकण्याच्या बदल्यात मला कधीकधी एखादी स्विट डिश आग्रहाने खायला सांगायचे.
रत्नागिरी शहर सोडल्यानंतर जेव्हा मी दक्षिणेच्या बाजूने जायायला लागलो तेव्हा वाटेत आलेल्या बर्‍याचश्या खेड्यात माझं प्रेमाने स्वागत व्हायचं.
मला वाटतं जेव्हा चमत्काराचा झरा वाहतो त्यावेळा तो दोन्ही बाजूने वाहत असावा.प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे.

एका गावात मी जरा रात्रीच पोहोचलो.खेड्यात वीज वाचवण्यासाठी तिन्हीसांजा झाल्या की जेवण करून मोकळे होतात. शाळकरी मुलं मात्र वीज नसल्यास कंदिलाच्या प्रकाशात रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास उजळणी करीत असतात.मी दरवाजा खटखटल्यावर अशाच एका मुलाने दरवाजा उघडला.
“कोण पाहिजे आपल्याला?”
असं त्याने मला विचारलं.
मी त्याला म्हणालो,
“बाळा, तुझ्या घरात कोणी मोठं माणूस आहे का?”
त्याने आईला हांक मारली.
मी त्यांना म्हणालो,
”फक्त एक रात्रीसाठी मी आपल्या बाहेरच्या पडवीत झोपू का?”
माझी चौकशी केल्यावर त्यानी होकार दिला.
मला म्हणाली,
“आमची सर्वांची जेवणं झाली आहेत.मी तुम्हाला पिठलं भात करून देऊ का ? “
त्यानी जेवण्याचा आग्रहच केला.तसा मी वाटेत एका छोट्याश्या हॉटेलात चहा आणि भाजीपूरी खाल्ली होती.तो उकड्या तांदळाचा गरम गरम भात आणि हिंग मोहरीची फोडणी दिलेलं कढत पिठलं खाऊन मला निवांत झोप लागली.
मे महिन्याचे दिवस जरी गरमीचे असले तरी कोकणात रात्री सुखद थंडी पडते. एका खेड्यात रात्रीचं पोहचल्यावर बाहेर शेतीच्या परड्यात काही मंडळी लाकडांना आगपेटवून शेकोटी घेत बसले होते.मला पाहिल्यावर एक मुलगा उठून माझ्या जवळ आला.
नेहमीचाच प्रश्न
“तुम्हाला कोण पाहिजे?”
मी गंमतीत म्हणालो,
“तूच हवास”
तो जरा हसला.तेव्हड्यात इतर लोक उठून माझ्या जवळ आले.

मी त्यांना म्हणालो,
“तुमच्या शेकोटीची धग घ्यायला मला मिळेल का?”
“अर्थात “
असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या घोळक्यात बसायला जागा दिली.आगीच्या शेकोटीत भाजलेले कणगी,करांदे आणि रताळी मला खायला दिली.आणि त्यांच्यापैकी एकाच्या घराच्या पडवीत मी रात्रीचा मुक्काम केला.

जेव्हा मी गोव्याला पोहोचलो तेव्हा मला बिचवर एक तरूण भेटला.हलो-हाय झाल्यावर आम्ही थोडावेळ वाळूत गप्पा मारीत बसलो.माझ्या पायीप्रवासाच्या स्किमचं त्याला कुतुहल वाटलं.त्याच्या अपार्टमेंटमधे मी माझ्या प्रवासाचे आठ दिवस राहिलो. त्याच्या सर्व कुटुंबियांशी माझा चांगलाच परिचय झाला.
मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात. त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं.खरं पाहिलंत तर जीवंत राहिल्यानेच त्या प्रचंड भेटीच्या प्राप्तीच्या एका टोकाला आपण सर्वजण आहोत हे निश्चीत.तरीपण असहाय,नम्र आणि ऋणग्रस्त आहोत असं दाखवायला आपल्यातले बरेच तयार नसतात.भेटीच आदान-प्रदान करून घ्यायला थोडी संवय व्हावी लागते पण त्यावेळी आपण निराशाजनक असता कामा नये.

कुणी म्हणेल असली उदारता स्विकार करायला सुद्धा एक प्रकारची सहानभूती असावी लागते.उदार राहण्यातली सहानभूती.
तसं पाहिलं तर ह्या माझ्या पायीप्रवासात मला कुठेतरी हॉटेलात किंवा एखाद्दा मोकळ्या पार्कमधे राहता आलं असतं.पण रात्र झाल्यावर कुणाच्या घरी जाऊन राहाण्याचा माझा उद्देश माझ्या प्रवसाची आणि अनुभवाची त्यांना माहिती होते.आणि माझी पण नवीन कुंटुबाची ओळख होते.
मात्र माझ्या ह्या पायीप्रवासाच्या संदर्भात मिळणार्‍या भेटींची अनावश्यक भावदर्शनात गणना करावी लागेल.
ह्या जगात जरी खराब हवामान असलं,मळकट भूतकाळ असला,नर्कात जाणारी युद्ध असली तरी ती सम्मिलीत होऊन आपल्यालाच एक प्रकारची मदत करीत असतात पण जर का आपणच विनम्र राहून त्याना मदत करू दिलीत तर.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, December 26, 2008

मनोमन प्रार्थना.

“कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं.”

जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्ष कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.निवृत्त होण्यापूर्वी तिच्या जागी येणार्‍या एका बाईला ती आपलं काम समजावून सांगत होती.मी बाजूला बसून ऐकत होतो.
लिखिते म्हणाली,
नेहमीची आमची कामं करीत असताना सकाळी प्रथम आल्याआल्या आपल्यासारखीच छोटीमोठी काम करणार्‍या लोकाना भेटून त्याना स्पर्श करून दत्तगुरूंची मुर्ती डोळ्यासमोर आणून त्याची आराधाना करून त्यांच्या आजच्या दिवसाच्या कामाच्या सफलतेची मी कामना करायची.आणि त्यासाठी प्रत्येकाला हुडकून काढावं लागायचं. बेसमेटमधे,बाथरूममधे,कॅन्टीनमधे,जिथे सापडतील तिथे जाव लागल तरी. ज्यावेळी मी त्याना शोधून काढून भेटायची तेव्हा ती नेहमी बिचकायची. आणि नंतर सद्गदीत व्ह्यायची.मला पण तसंच व्ह्यायचं.
बेसमेंटमधे ही माणसं शोधून काढीत असताना,एका नर्सला मी भेटायची.ती आपल्या कामात ह्या बाबतीत आणखी काळजी घ्यायची.तिचं काम असायचं,जेव्हा एखाद्दा पेशंटची ऑपरेशनची तयारी करायची असायची तेव्हा त्याला लागणारी सर्व टूल्स आणि इतर साधनं एके ठिकाणी नीट लावून ठेवायची.त्याची एक चेकलीस्ट बनवावी लागायची आणि सर्वात वरती त्या चेकलीस्टवर पेशंटचं नांव लिहावं लागायचं.अशावेळी ती सुद्धा त्या पेशंटचं नांव घेऊन त्याचं ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी देवाची मनोमन प्रार्थना करायची. असं ही बाई गेले चाळीस वर्ष करत आली आहे.
पुढे लिखिते म्हणली,
“माझी खात्री आहे की ती जे करीत होती ते कुणालाही माहित नसावं.आमच्या सर्वा पेक्षा जुनी काम करणारी ही बाई इतका महत्वाचा जॉब करीत असताना की जे काळजीपूर्वक आणि ठिक-ठिक कराव लागणारं काम करीत असताना प्रार्थना करायला विसरत नव्हती.
हे असं करीत असताना,कदाचीत ती त्या पेशंटना भेटतही नसावी किंवा पुन्हा भेटणारही नसावी.कदाचीत तिला ऑपरेशन कसंझालं हेही माहित नसावं.”
लिखितेला हे उदाहरण पाहून हॉस्पिटलच्या कामात पडद्दाआड किती गोष्टी होत असतात ह्याची साक्ष मिळाली.

एखादं अस अत्यंत जरूरीचं काम सुद्धा पेशंटच्या आणि त्याच्या कुटूंबाच्या नजरे आड होत असावं.ही सर्व काम करणारी मंडळी आपआपली नेमून दिलेली काम करत असणार.पण ह्या कामगारांचं जीवन किती मुल्यवान असतं आणि त्यांच्या कहाण्यापण किती मुल्यवान असाव्यात हे त्यांना समजत नसावं.
त्या बाईने लिखितेने विचारलं की जाता जाता इतर कामगाराना काही उपदेशपर सांगायचं आहे का?
लिखिते म्हणाली,
“काळजीपूर्वक ह्या असल्या केल्याजाणार्‍या मनोमन प्रार्थनांची कदर केली जावी.त्या होऊ द्दाव्यात आणि त्यांना कमी लेखलंजाऊ नये.”
मी मनात म्हणालो,
“कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं.”


श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 24, 2008

मी सरिता तु असशी सागर

चंद्रमाच्या चांदणीची ही जादू
ही वेळ अन अशी ही रात्र
ही लहर प्रीतिची नेई मला
नसे माहित कुठे ते मात्र

नको विचारू काय माझ्या मनी
जोवरी साथ देशी तू मजशी
माझेच ठिकाण नसे माहित मला
तुझ्या तुच प्रीतित मला हरविशी

माझे माझ्याच मनावर नसे भान
का ते समझावया नसे मी पात्र
ही लहर प्रीतिची नेई मला
नसे माहित कुठे ते मात्र

मी सरिता तु असशी सागर
मनमोहन माझ्या सजणा
घाल तुझ्या मनावर आवर
ऐकूनी माझे प्रेमगीत
डुलत रहा ह्या लहरीवर
भिजून गेलो तू मी अन रात्र
ही लहर प्रीतिची नेई मला
नसे माहित कुठे ते मात्र



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 22, 2008

नम्रतेचा अमुल्य धडा.

“शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं.”

माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता.शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला.आणि ह्याचं स्पष्टीकरण करताना त्याला मुंबईत आल्याआल्याच्या आठवणी येऊन त्याचा अनुभवाची मला गंमत सांगू लागला.
मला मोहन म्हणाला,

“काही वर्षापूर्वी मी मुंबई पहाण्यासाठी आलो असताना, शहरातली आणि देशातली धनसंपत्ती पाहिली. आणि तसेच रसत्यावर झोपडीत राहणारे,कमनशिबी भिकारी पण पाहिले.एकदा गेटवेऑफ इंडिया जवळ गेलो असताना समोरच्या एलिफंटाकेव्हझचा डोंगर पहाण्यात गर्क झालो असताना,मागून एक आवाज आला म्हणून वळून पाहिल्यावर,एक वृद्ध बाई हात पुढे करून उभी राहिलीली पाहिली. नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून मी माझ्या खिशात हात घालून जेवढी म्हणून मोड होती ती तिच्या हातात ठेवली.तिचा चेहरापण पाहिला नाही.भिकारी म्हणून तिच्या त्रासाला कंटाळून मी असं केलं.
पण ती आंधळी बाई हंसली आणि मला म्हणाली,
“तुमचे पैसे मला नकोत मला तुमच्याकडून रस्ता ओलांडण्याची मदत हवीय.”
माझ्या क्षणात लक्षात आलं मी काय केलं ते.मी पूर्वग्रहदूषित होऊन दुसर्‍या व्यक्तिची पारख माझ्या मनात आलेल्या कल्पनेशी जुळती घेऊन पाहिलं म्हणून हे झालं.
माझी मलाच घृणा आली.ह्या घटनेमुळे माझ्या मनातला श्रद्धेबद्दलचा महत्वपूर्ण मुद्दा जागृत झाला.मी नम्रतेला किती महत्व देतो त्याला पुष्ठि मिळाली. अगदी क्षणासाठी जरी ती नम्रता मी विसरलो असेनेही.
मी माझ्याविषयी विसरलो असेन ते म्हणजे मी एक खेडूत होतो.मी माझं गाव सोडून मुंबईला आलो त्यावेळी अवघा सतरा वर्षाचा होतो.दोन नव्या बॅगा, माझा भाऊ आणि बहिण,आणि खंबीर मनाची माझी आई असं सर्व गोतावळ माझ्या बरोबर होतं.
ह्या सर्व काळात मी हॉटेलात बश्या धुण्याच्या कामापासून वेटर होऊन गल्ल्यावर बसे पर्यंत कामं केली.नंतर थोडं शिक्षण घेत घेत असेच मामुली कामं करता करता नेटवर्क इंजिनीयर झालो.
माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी असे पुर्वग्रहदुषित प्रकार अनुभवले आहेत.मला आठवतं मी अठरा वर्षाचा असताना हॉटेल मधाला कपबशी उचलणारा पोर्‍या म्हणून कामाला होतो. एका मुलाचा पिता आपल्या मुलाला सांगत होता की शाळा शिकून यशस्वी झाला नाहीस तर माझ्या सारखी कामं करावी लागतील. अशीच वागणूक माझ्या नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळीकडून मला मिळाल्याचं आठवतंय. त्यामुळे ते काय आहे ते मला कळलं होतं.खरं म्हणजे मला आणखीन चांगल माहित असायला हवं होत.
शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगीकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं.
त्या गेटवे वरच्या आंधळ्या बाईने मला मी स्वतःहून माझ्यात प्रेरीत केलेल्या आंधळेपणा पासून माझी मुक्तता केली.तिनेच मला नम्र राहाण्याची आठवण करून दिली.आणि बरोबरीने माझ्या डोळ्याची आणि मनाची कवाडं उघडी ठेवायलाही स्मरण करून दिल.
खरं म्हणजे हे आता सांगताना त्या बाईला रस्ता ओलांडून जायला मी मदत केली याची आठवण येऊन तिने अमुल्य धडा शिकवल्याबद्दल तिच्याजवळ माझी उपकृतता प्रकट करावीशी वाटते.”
एखादी बारीकशी गोष्ट जीवनात आपल्याच वागणुकीला कशी कलाटणी देतं हे मोहन कडून ऐकून गंमत वाटली.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 20, 2008

मनुष्याची प्रतिष्ठा.

“मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपलासर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.”

आज माझी आणि प्रो.देसायांची भेट त्यांच्या घरीच झाली.काल त्यानी मला निरोप पाठवून तळ्यावर भेटण्या ऐवजी,घरीच या असं कळवलं होतं.मी पृच्छा केल्यावर तुम्हाला उद्दां ते इकडे आल्यावरच कळेल असं म्हणाले.मी त्यांच्या घरी गेल्यावर दहा पंधरा पुरूष,स्त्रीया खाली बैठक मारून बसलेल्या दिसल्या.मला प्रथम वाटलं काही तरी गाण्याचा कार्यक्रम असावा.पण आत गेल्यावर तबला,पेटी काही दिसली नाही.दोन खुर्च्या भिंतीजवळ ठेवलेल्या होत्या.एका खुर्चीवर भाऊसाहेब बसले होते. आणि एकावर एक तरूण तरतरीत उंच नीमगोरा गृहस्थ बसलेला दिसला.मला हाताने खुणवून भाऊसाहेबानी खाली बसायला सांगितलं.
त्या तरूण माणसाची ओळख देत प्रो.देसाई म्हणाले,
“हे गंगाधर परब,पीएचडी असून आपल्याच कॉलेजात फेलो म्हणून आले आहेत. मीच त्यांना मुद्दाम इकडे बोलावून एखाद्दा विषयावर बोलायला विनंती केली.आज ते “मनुष्याची प्रतिष्ठा” ह्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.ते आपण ऐकूया.”
असं बोलून झाल्यावर डॉ.परब बोलू लागले,

“मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपला सर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.”

मी जे म्हणतो त्यावर माझा विचारपूर्ण विश्वास आहे म्हणून.आणि त्यात पण मला संदेहही वाटतो.मला संदेह असण्याचं कारण मी अजून तरूण आहे म्हणून. आणि तरूणात अचूकता असते,हे विधान अविवेकपूर्ण आणि अशोभनीय ठरेल. आणि माझ्या ह्या वयावर, मला वाटतं,आपल्या श्रद्धेवरच्या निश्चीततेचं समर्थन करणं आणि तो विचार मजबूत आहे असं म्हणणं बरोबर होणार नाही.
अशी माझी समजूत असणं,हे एका अर्थी बरं आहे.कारण मी संशयवादी आहे.मला वाटतं माणसाचा विश्वास सतर्क्ततापूरक असावा,व तो त्याने जपून जपून सांभाळावा. त्याने त्याची प्रचिती अनुभवाशी पडताळून पहावी,आणि ती श्रद्धा त्याला घृणित, महागडी किंवा जटिल वाटली तर त्या श्रद्धेचा त्याने उघड उघड त्याग करावा.
पूर्वी म्हटल्या प्रमाणे मी तरूण आहे.जास्त शांत आणि कमी बेचैन जग, माझ्या पुढची पिढी जशी मागे वळून बघेल तसंमला मागे वळून दिसणार नाही.जेव्हडी म्हणून माझी आठवण जाईल तेव्हडं आठवल्यास,माझं जग जसं आहे तसं आपण सर्व पहात आलो आहे तसंच आहे.असं जग की जीथे युद्ध खेळली जातात आणी जीथे डोक्यावर सदैव युद्धाचा भयभयीतपणा आहे. असं जग की जे असाधारण गतीने पुढे जात आहे,आणि त्यात असाधारण बदलाव होत आहेत.असं जग की जीथे सर्व घटनेतली असाधारण घटना म्हणजे आपल्यात असलेली अक्षमता, आपल्यात असलेली सामाजीक विकासाची कमतरता,आपलं अज्ञान,आणि अमानुष विध्वंस करण्याची आपल्यात असलेली ताकद आणि ह्या सर्वांची आपल्याला झालेली धक्कादायक अनुभूती.

हे जग जरी जंगलासारखं वाटत नसेल,तरी प्रत्यक्षात एखादं नेहमीच काळंकुट्ट आणि नेहमी भितीदायक जंगल असतं तसं आहे.फार काळ होऊन जाई तो-मला सांगायला खेद वाटतो- आपल्यातले जे काही जगतील त्यांच्या आठवणीत राहील तो स्थिरतेचा काळ, स्विकारलेली मुल्यं,आणि स्विकारलेली शांतता.आणि असं असून हे सर्व होत असताना,ही निर्दयतेची आणि भयाची अवस्था कायम स्वरूपाची असेल आणि हे एव्हडंच मनुष्यप्राणी जास्तीत जास्त गाठू शकेल असं मी मानायच्या तयारीत नाही. जसं आता मी सांगतो तसं त्यावेळीही आग्रहाने सांगेन, की मनुष्यात उच्च पातळी गाठण्याची क्षमता आहे पणह्या क्षमतेचा प्रयत्न तो अत्यंत मंदगतीने आणि अनंत चूका करून नंतर ह्या अंधारातून सीमापार होण्यात ती क्षमता वापरील. कारण माझा मानवजातीवर भरवंसा आहे.

माझा हा भरवंसा काहीसा इतिहासावर आधारित आहे.मनुष्य हाच माझा जास्त आधार आहे.कधीतरी इतराशी व्यवहारीक संबंध येत असताना काही गंमतीदार प्रसंग घडतात.जे काहीसं माझ्या विचाराच्या पलिकडचं होतं.अचानक एखाद्दाला निरखून पहाताना धक्कादायक गोष्ट म्हणजे मी मलाच त्याच्यात पहातो.अर्थात हे क्वचितच होतं.कारण असं हे फक्त अपघाताने किंवा अतिदुःखाच्यावेळी किंवा अत्यानंदाच्यावेळी होत असावं.बहुतांशी माणूस स्वतःहून असा दुसर्‍यासारखा होत नाही.त्या क्षणात मी जर का त्याच्याकडे बघायचं धारिष्ट केलं तर त्याच्यात माझ्याच इच्छा,माझ्याच सुप्त श्रद्धा,मला हवी असलेली प्रेमाची जरूरी, माझं आंतरीक गांभिर्य आणि माझ्या इच्छा-आकांक्षा त्याच्यात पहात असतो.हा क्षण जणू एखाद्दा कोळोख्या खोलीत मी बसलोय आणि एकाएकी डोळे दिपवणारा प्रकाश पडावा आणि सगळी खोली लख्ख प्रकाशात दिसावी तसा वाटतो.
हे सर्व झाल्यावर काही काळ एक प्रकारचं दडपण माझ्या डोळ्यावर येऊन त्या खोलीचा आकार,त्यातली चमकदार विशिष्ठता, आणि सुस्पष्ठ रंग मला दिसतात. त्या क्षणात मनुष्याची प्रतिष्ठा जास्त प्रकर्शाने दिसते.
शेवटी,मला सांगायचं आहे की मी मुलांचा समर्थक आहे.मला मुलं आवडतात. कारण माझा समझ असा आहे की मुलं अजून त्यांची मानवता, शब्दांचा आणि रिति-रिवाजाचा आधार घेवून त्याचं संरक्षण करणं,एकाकी आशंकेत आणि संदेहात राहणं अशा गोष्ठींचा आधार घेऊन लपवायला शिकली नसावीत. ही मानवता त्या मुलांकडे आहे हे पाहून बरं वाटतं कारण ते उघड दृश्य आहे. मानवजातीला ते वरदान आहे.”
डॉ.परबांची बोलण्याची लकब आणि त्यांना जे काय वाटतं ते अस्खलीतपणे सांगण्याचं कसब पाहून आम्ही जमलेले बरेच जण प्रभावीत झालो.ह्या तरूण माणसाला आपलं भवितव्य गाजवता येईल असं मला वाटलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 18, 2008

कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

लोक पुसती प्रीति किती तुजवरती
कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

लोक पुसती प्रीति किती तुजवरती
तुच जीवलग अन प्रेम तुझ्या मैत्रीवरती
जीवश्च तू कंटश्च तू जीवलग मैतर तू
मनी जे वसे ते ओळखिशी तू

तुला भेटूनी भासे माझ्या मनाला
आली जवळीक तुझ्या न माझ्या नात्याला
ह्याहूनी उच्चतम असेल का जीवनी प्रीति
कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

अशीच ही दोस्ती दाखवील अपुल्या करामती
एका थेंबातही समावून घेईल प्रीतिसागराती
क्षमता प्रीतिमधली बहर आणीते कळीला
हीरा बनवी चमकावूनी काळ्या दगडाला
तुही माझ्या भाग्याची आहेस दीपती
कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 16, 2008

अधिक, अधिक आवडणारं जग.

” मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही मानवाला ते सोसावे लागत असतानाही सुखही साध्य होण्याजोगं आहे.”

मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं.त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला आणि जाऊन राहायाला अंमळ बरं वाटतं.मी त्याना येण्यापूर्वी फोन करून कळवतो असं सांगितलं.एक दिवस वेळात वेळ काडून मी त्यांच्याकडे दोन दिवस राहायला गेलो होतो.
गोव्याचे लोक उपजतच प्रेमळ आणि पाहूण्याचं आदरातिथ्य करण्यात अगदी कसबी.मुळात एकच दिवस राहायला जाण्याचा मी बेत केला होता.पण त्यांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून आणखी एक दिवस राहिलो.
त्यांच कुक्कुटाचं फार्म अप्रतीम होतं.तसंच जवळच त्यांच राहाण्याचं टुमदार घर पण सुंदर होतं.
सहाजीकच मी त्यांना ह्या व्यवसायात कसे उद्दुक्त झाला?म्हणून प्रश्न केला त्यावर ते मला म्हणाले,
“काही वर्षापूर्वी मी आणि माझ्या एका मित्राने मिळून गोव्याजवळ एका खेड्यात थोडी जागा घेऊन एक छोटसं कुक्कुट फार्म काढायचं ठरवलं.बरोबरीने जवळ पास एक छोटसं घर असावं म्हणून स्थानीक वस्तीतल्या एका माणसाला घर बांधायचं कंत्राट दिलं.त्यावेळी आम्ही त्याच्या बरोबर खर्चाचा विषय काढला नाही.आम्हाला माहित होतं की तो ईमानदार आहे.अतिशय गरिबीत दिवस काढल्याने शाळेतलं शिक्षण न झाल्याने त्याला जेमतेम वाचायला यायचं.पण तसा तो हुषार होता. अनुभवाचा आधार घेऊन त्याने योजना आखून ते घर बांधलं.घर छान होतं.ईमान ठेऊन बांधलं होतं.अगदी मजबूत घर होतं.जसं आम्हाला हवं होतं तसं.
पण जेव्हा त्याने आम्हाला सर्व खर्चाचं बिल दिलं तेव्हा मला धक्काच बसला.त्याचा एकूण खर्च इतका कमी होता ते पाहून मी त्याला म्हणालो,
“हे बघ,तुला ह्यात कसलाच फायदा दिसत नाही”
त्यावर तो गृहस्थ शांतपणे म्हणाला,
“मला भरपूर फायदा आहे.मला आणखी काहीही नको.”
आणि बिलाच्या बाहेर तो एक पैसाही घ्यायला तयार नव्हता.
आमच्या घराच्या समोर रस्ता ओलांडल्यानंतर तो राहयाचा.त्याचं छोटसं घर होतं. बायको मुलांबरोबर तो राहयचा.लहानसहान कामं करायचा.कधी त्याची तक्रार नसायची.जरी कठीण परिस्थितीतून त्याला जावं लागलं तरी तो नेहमीच सदासुखी दिसायचा.
एक गीतेचं मोठ्या अक्षरातलं पुस्तक त्याच्या जवळ पाहिलं.वाचणं त्याच्या हाताबाहेर होतं.पण एक एक शब्द हळू हळू उच्चारून तो एक एक अध्याय वाचायचा.आणि त्याउप्पर गीतेतल्या निर्देश केलेल्या उपदेशाप्रमाणे रहायचा.मी त्याला विसरूंच शकत नाही.माझ्या पहाण्यातला हा खराच सुखी माणूस होता.

हे बघूनच मला सुचलं की,
बुद्धिमान आणि दोषदर्शी लोक त्याच त्याच सांगितलेल्या गोष्टीचं प्रकटन करीतच असतात की सुखाचा उद्देश्य साध्य होणं महाकठिण असतं.खरंतर अतिबुद्धिमान लोक सुद्धा चुकी करू शकतात.मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही मानवाला ते सोसावे लागत असतानाही सुखही साध्य होण्याजोगं आहे.मला वाटतं सर्व जगातले आपआपल्या प्रांतातले अनेक स्त्री आणि पुरूष सुखी पण असण्याचा संभव आहे.जसा हा माझा समोरचा शेजारी आहे.

आपल्या मानव-जातीला पूर्ण सभ्यता आणायला अजून खूप पल्ला गाठायचा राहिला आहे.आणि माझ्या विश्वास आहे की समजूतदार आणि सामान्य असलेल्या माणसातली भलाई ही त्याच्यात असलेल्या बुराईवर नक्कीच कुरघोडी करील.
मला वाटतं आपण अधीक अधीक सुधारलेल्या जगाची वाटचाल करणार आहो.ज्या जगात युद्धाचा नावनिशा नसेल.ज्या जगात माणूस स्वार्थी आणि आत्मकेंद्रित राहून दुसर्‍याच्या हिताबद्दल दुर्लक्षीत नसेल.आणि ज्या जगात दुसर्‍या बद्दल जातीद्वेषामुळे आणि धर्मावरच्या विश्वासामुळे असहिष्णुता नसेल-जी अज्ञानामुळे होऊ शकते-हे सर्व रीतिरिवाज भुतकाळातच राहतील.
मला असही वाटतं की,अशा गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की,जीवनात आणि हृदयात सहजता असावी,संबंधात सरलता असावी राजकारण नसावं.कठोरपणा आणि नीचपणा हे अक्षम्य पाप आहे असं मनोमनी मानलं जात असावं.
सामंजस्य ही नीरसतेची जननी आहे.प्रसन्न राहण्याची नैतिकता भौतिक गोष्टीतून येत नाही तर ती आनंदी मनातून येते.हे जग स्वारस्य असण्याचं सुंदर ठिकाण आहे. सौहार्दपूर्ण मेहनत करणं हे सुखसमाधानीचं गुपीत आहे.”

त्याचं हे सगळं ऐकून मला वाटलं की किती माणसं आशावादी असतात.गोव्यातल्या एका लहानश्या खेड्यात राहून किती दूरवरचा विचार करतात.कदाचीत हे गृहस्थ गीतेतले अध्याय वाचून आपली वैचारीक पातळी इतकी उंचावून घेऊन माझ्यासारख्या आल्यागेल्या पाहूण्यावर उत्तम प्रकाश पाडू शकतात.

मी त्यांना जाण्यापूर्वी म्हणालो पण,
“आपल्या सहवासात दोन दिवस राहून मी काही तरी अगम्य मिळवून जात आहे असं वाटतं.”
त्यांच्या चेहर्‍यावर मला समाधानीचाच प्रकाश दिसला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, December 14, 2008

जीवनगृहाची घडण.

“मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी.जीवन हे आत्माच आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते.”

डॉ.संजय धारणकरची आणि माझी जूनीच ओळख आहे.कारगीलची लढाई सुरू झाल्यावर त्याने एका फार्मसीटीकल कंपनी मधली नोकरी सोडून सैन्यात भरती करून घेतली.देशप्रेमाच्या भावनेने भारावून जाऊन सैन्यात दाखल होऊन जखमी सैनिकांची सेवा करायची कल्पना त्याच्या मनात आली.जरूर वाटली तर युद्धाच्या जागी जाऊन जखमी रुग्णसैनिक ज्या छावणित उपचारासाठी आणतात त्याठिकाणी पण जाण्याची तयारी त्याने दाखवली होती.हे सर्व मला माहित होतं. पण युद्धावर तो जखमी झाला आणि त्यानंतर त्याला सैन्यातून सुट्टी मिळाली हे मला आत्ताच त्याच्या तोंडून कळलं.
संजयच्या स्वभावाचा कल पहिल्या पासून काही तरी धडाडी करून दाखवण्याकडे झूकत असायचा.आणि त्या दृष्टिने त्याने सैन्यात भरती करून घेतली ह्या बद्दल मला विषेश काही वाटलं नाही.पण युद्धावर जाऊन जीवावर बेतण्या इतक्या परिस्थितीत तो सापडला त्यानंतर त्याचा स्वभाव फारच बदलून गेला असं वाटतं. ह्या खेपेला मला भेटल्यावर जे काही तो बोलू लागला त्यावरून मला असं वाटलं की माणसाचा स्वभाव परिस्थिती प्रमाणे बदलू शकतो.पूर्वीचा संजय धारणकर आता राहिला नव्हता.आध्यात्मिक विचार धारणा माणसाला मरणाच्या दाढेतून वाचल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवते.
“संजय तुझ्यात इतका बदल कशामुळे झाला?”
ह्या माझ्या साध्या प्रश्नाला त्याने जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे.
मला तो म्हणाला,
“कारगीलच्या लढाईत मला शत्रूकडून सुटलेली एक सुसाट गोळी लागली.त्यामुळे मी आपत्तीत सापडलो होतो.मी लष्कराच्या मेडिकल युनिटमधे डॉक्टर म्हणून होतो. त्या घटने नंतर स्वास्थ्यलाभ व्हायला मला बरच कठीण झालं होतं. त्यानंतर माझ्या युवावस्थेची लवचिकता आणि फॉर्मच गेला.माझ्या जीवनात येणार्‍या पुढच्या मार्गात आत्मसन्मानाच्या,कटुतेच्या आणि आत्मदयेच्या अडचणी आल्या.
पहिली अनुभूती आली ती एकलेपणाची.त्यानंतर जास्त जाणीव झाली ती लोक मलाच मदत करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याची.आणि सरतेशेवटी मला जाणीव झाली ती मुलतः मी मलाच सावरण्याची.आणि जरी ती मला माझ्याच प्रयत्नातून सफल करायची होती तरी मला मी कधीच एकटा न राहता माझी उपलब्धी हा इतरांचा ही हिस्सा व्हावा असं वाटायचं. त्यामुळे माझी पुनःप्रतिष्ठा व्हायला मदत झाली.आणि नंतरची माझी मोठी समस्या म्हणजे इतर काय बोलतात आणि करतात याचा नीट अर्थ लावणं.कारण इतरात सामावून घेतल्याशिवाय माझी प्रगती होणं शक्य नव्हतं.
माझ्या तरूण वयात मला शिल्पकार व्हायचं होतं.काही तरी घडवणं माझ्या हातून झालं पाहिजे असं मला त्यावेळी वाटायचं.पण मी माझी ही इच्छा निराळ्या तर्‍हेने उपलब्ध केली. माझ्या एक ध्यानात होतं की घर बनवायचं झालं तर मचाणाशिवाय ते बनू शकत नाही.हे माझं मचाण मी ठरवलं. मी डॉक्टर असल्याने इतरांची सेवा करण्याची माझी जबाबदारी हेच माझं मचाण असं मी ठरवलं .कदाचीत माझा अनुभव कुणाच्या संकटकाळी उपयोगात यावा.
त्या बंदूकीच्या गोळीने माझ्या जीवनात स्थित्यंतर आलं.मी मनाने पोक्त झालो.माझ्या तारुण्यातल्या चंचल स्वभावाला थोडं संतुलन आलं.नाहीतर ही स्वभावातली चंचलता, एकाग्रता आणि उपलब्धता मिळवायला बाधा आणू शकली असती.
आता डॉक्टर म्हणून रुग्णाना पुनःप्रस्थापीत करताना जीवन सदा प्रफुल्लीत राहतं.एका अर्थी मला जी पीडा झाली ते चांगलंच झालं.मी इतरांची सेवा करू शकलो.
माझी झालेली ती जखम आणि त्यापासून होणार्‍या वेदना ह्यामुळे काहीतरी करण्याची धमक माझ्यात आल्याने मी कटुतेला तिलांजली दिली.आणि माझ्या मनात असलेल्या बदला घेण्याच्या विचाराचे हनन केले. ज्याने माझ्यावर गोळी झाडली होती त्या शत्रूपक्षाच्या सैनिकाला जखमी करून ताब्यात घेतलं होतं.तेव्हा मला माहित होतं की ज्याला त्याच्या विद्वेषा बद्दल काहीच वाटत नसलं तरी त्याच्याशी मला बोलता येईल.आणि त्यामुळे मला माझ्या अस्तित्वात मान खाली घालून राहण्यापेक्षा गौरवाने राहता येईल. मला वाटतं ह्याचं कारण मला असलेली कर्तव्याची समझ.अनुभवाने मला दाखवून दिलं होतं की तो माझ्यातला बदल माझ्या चांगल्यासाठीच असावा.

मला वाटतं,मनूष्य आपल्या जीवनात आनंद आणि खेद असतानाही आशा आणि उमेद बाळगून वाढत असतो,आणि तुलनेने दोन्ही गोष्टीची प्रशंसा करतो.
मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी. जीवन हे आत्मा आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते,जेवढी निसर्गाला माहित असावी,की ज्या निसर्गामुळे सुदैवाने आपणच तिची अंतिम प्रतिकृती आहो.मी मानतो की जीवन कसं घडवावं ह्याची आपल्याला जी माहिती मिळाली असते त्याहीपेक्षा जीवनातला अनुभवच हा जीवनाच्या घडणीचा मुख्य पाया आहे.
मौखिक शब्दातून मला अर्थ जाणवतो,कारण तो माझ्या अनुभवाशी अनुरूप असतो आणि मी सत्याकडे जसा पहातो तसा त्याचा निर्देश असतो. एकमेकाशी संपर्क असण्यात माझा विश्वास आहे.तरीपण संकल्पनेतून येणार्‍या बाधा स्विकार करायला माझ्या मनावर दबाव येतो.आणि ह्यातच जीवनातला संघर्ष आणि करुणेचं अस्तित्व असतं.
माझी कमतरता हीच माझ्या जीवनातल्या दर्जाचा मापदंड आहे.तरीपण मी मला नरमाईने नियंत्रीत ठेवतो.कारण कुणालाही त्याला आलेली महत्ता ही परिपक्वता आल्याने येत नाही तर त्याच्या जीवनाचा विकास कसा होतो त्यावरून येते असं मला वाटतं.”
हे सर्व डॉ.संजयचं तत्व ज्ञान ऐकून मी मनात निश्चीत ठरवलं की खरंच, जीवन कळण्यासाठी खडतर प्रसंग येऊन जावा लागतो.
उगिचच कवी बा.भ. बोरकरानी म्हटलंय,
“जीवन यांना कळले हो!
मीपण ह्यांचे सरले हो!”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, December 12, 2008

रामदुलारीला राग का आला?

रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली.
त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा.
भाऊ पुढे म्हणाला,
“बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जरा मंदच होती. जवळ जवळ अंधेरी स्टेशन जवळचा स्टॉप येई पर्यंत तो तिकीट विचारायला मागे आलाच नाही.”
माझ्या भावाला सांताक्रुझला आशा पारेख हॉस्पिटलच्या बस स्टॉपवर उतरून काही कामाला जायचं होतं.माझा भाऊ मानसशास्त्राचा कंसल्टंट आहे. आणि बरेच वेळा तो मराठामंदीरमधे लेक्चर्स द्दायला जातो.

”कंडक्टर घाई घाईत पार्लं सोडल्यावर तिकीट विचारायला मागच्या सीट जवळ आला.मी हात पुढे करून एकदाचं तिकीट काढून घेतलं.हा शेजारी चुळबूळ करणारा माणूस इकडे तिकडे बाहेर बघण्यात दंग झाला होता.वयाने तसा पंचवीस तीशीतला दिसला.बाकी सर्वानी तिकटं काढून झाल्यावर कंडक्टरने नेहमीच्या संवयीत त्याला विचारलं,
“तुमको किधर जाना है रे?जलदी बोलो.”
त्याला जो राग आला तो त्याला सहन झाला नाही.तो उठून कंडक्टरच्या अंगावर धाऊन गेला. आणि संतापून कंडक्टरला म्हणाला,
“क्या तमीझ है क्या? आपको किधर जाना है ऐसा पुछना चाहिये.”
पुढे माझा भाऊ सांगायला लागला,
“एकतर बस मधे गर्दी तोबा होती.आणि तशात मे महिन्याची गरमी.त्या जाड कपड्यात घामाघुम होऊन कंडक्टर वैतागलेला होता आणि हा हिंदी कसं बोलायचं तो शिकवतो हे पाहून संतापलेल्या कंडक्टरने जोरात घंटी मारून बस मधेच थांबवली आणि त्या माणसाला सरळ खाली उतरायला सांगितलं. तोपर्यंत मला हवा तोच बसस्टॉप आला होता.त्या माणसाबरोबर मी ही असे आम्ही दोघे बसमधून उतरलो.मी त्याच्याशी हंसलो आणि तो काहीसं बोलायला जवळ आला पाहून मी त्याला जवळच्या रामभरोसे हॉटेलमधे चहा घेऊं या म्हणून सुचवलं. आम्ही दोघानी चहाच्या कपावर बसमधे झालेल्या घटनेचा थोडा उहापोह केला.त्यावरून मला कळलं ह्या माणसाचं नाव रामदुलारी असून, हा जॉब शोधण्यासाठी एक दोन दिवसापूर्वी मुंबईत आला आहे.ह्याने वारणासीच्या कॉलेज मधून हिंदीत एम.ए केलंय.त्याला त्या कंडक्टरने “एकेरीत” संबोधलेलं आवडलं नाही.मुंबईच्या रीती-रिवाजाला आणि कलोक्युअल भाषेला तो अपरिचीत होता. म्हणून त्याने रागाने त्या कंडक्टरशी असा बनाव केला.मी त्याची समजूत घातली.आम्ही एकमेकाचे पत्ते दिले-घेतले आणि परत भेटू असं म्हणून आपआपल्या मार्गावर गेलो.

बर्‍याच दिवसानी मी एकदा जुहु चौपाटीवर संध्याकाळचा फिरायला गेलो होतो.मला सूर्यास्त बघायला खूप आवडतं.अचानक ह्या रामदुलारीला समोरून येताना पाहिलं.त्यानेच मला पहिलं ओळखलं.थोडे चाललो.आणि मग गप्पा मारण्यासाठी,वाळूवर सुक्या जागेवर बसलो.आता त्याला कुठेतरी जॉब मिळाला होता.आणि तो खूष होता.
रामदुलारी मला म्हणाला,
“आता मी त्यावेळसारखा कुणाशीही बोलीचालीवर रागवत नाही.मला बरेचसे इकडचे रीती-रिवाज समजले आहेत.”
त्याने रागावण्याच्या विषयाला हात घातला आणि माझ्याही मानसशास्त्राच्या अभ्यासाचा जरा मला पुळका येऊन मनात आलं ह्याला काही तरी राग,क्रोधावर थोडं लेक्चर द्दावं.नाहीतरी सूर्यास्ताला थोडा वेळ होता.
मी त्याला म्हणालो,
“हे बघ रामदुलारी,क्रोध जीवनवृतीचा विनाश करतं.क्रोध नातीसंबंध तोडतो.तुला वाटेल की क्रोध केल्याने मनावरचा ताण कमी होतो किंवा तू किती भावूक आहेस हे दाखवतं असं.पण राग केल्याने सर्वदा तुझा फायदा होण्याऐवजी तू नुकसानीतच येतोस. तुझे सहकारी, तुझे जवळचे प्रियजन,आणि मुलं तुझ्या क्रोधापूढे काहीवेळ नतमस्तक होतील पण काही काळ गेल्यावर तुला हवं ते करणार नाहीत.आणि हे अगदी नैसर्गिक आहे की जर कोण कुणाला रागाने भयभयीत करीत असेल तर ते विफल करायला दुसरा मागे पूढे पहाणार नाही.
क्रोधी व्यक्ति आपलाच विनाश करून घेते.रागामुळे संघर्ष किंवा सुटका करून घेण्याची मानसिकतेची प्रतिक्रिया तयार होते.त्यामुळे शरिरावर परिणाम होतो. तू जर रागवायचं सोडून दिलस तर आयुष्यात तुझी प्रभावशाली सुधारणा होईल.
मी पण एकेकाळी रागिष्ट होतो.मी सांगतो त्या ह्या गोष्टीचा मला आणि माझ्या सारख्या इतर रागीष्टाना उपयोग झाला.
मनापासून कबूल करा की रागीष्ट असल्याने फायद्या पेक्षा तोटेच जास्त आहेत.
बर्फा सारखं थंड रहा.राग हा जर का पर्याय ठरवलात तर तुम्ही तुम्हाला बरेच वेळा रागवण्याच्या मनस्थितीत ठेवाल.आणि हा बहूदा बरेच वेळा तुमचा भ्रम ठरेल.
राग काबूत ठेवायला सुरवातीला जरा कठीण जाईल,पण हळू हळू सुधारणा होईल.मी जवळ जवळ रोजच रागीष्ट राहत असे. नंतर एखाद्दा महिन्याला राग येत असे.नंतर कदाचीत वर्षातून एकदोनदा अंगावर येऊन ओरडण्याचा प्रसंग आला असेल.
डोक्यात रागाची तीडीक येईपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करीत राहिलात तर कदाचीत नंतर स्वतःला थांबवू शकणार नाही. त्यामुळे राग येण्याची थोडीशी सुद्धा जाणीव होण्यापूर्वी सतर्क राहिलं पाहिजे,जरी चेहर्‍यावर रागाच्या लालीची छटा आली तरी किंवा शरिरात बेचैनी येण्यापूर्वीही, किंवा कसही.प्रत्येक वेळी राग येण्याची थोडीजरी भावना झाली तर एक दीर्घ उसासा घ्यावा. स्वतःलाच विचारावं राग करण्याची आवश्यक्यता आहे का?
कुणालाही रागीष्ट व्यक्ती आवडत नाही.असे लोक सरफीरे,किंवा भांडखोर म्हणून ओळखले जातात. कायमचे रागिष्ट असतात अशा व्यक्ति विषयी तुम्हाला काय वाटत असेल.?तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहिलेलं आवडेल काय?असाही आपल्या मनाकडे प्रश्न करावा.
क्षणभर सुद्धा तुमच्या मनात आणू नका की तुमची मनोभावना प्रदर्शीत करण्यासाठी तुम्हाला क्रोध दाखवायची जरूरी आहे.सर्वात सफलता असलेले आणि प्रभावोत्पादक लोक क्वचितच क्रोधी असतात.
मोठ्या हुद्दावरचे लोक,सि.ई.ओ,सिनीयर कंसल्टंट,असलेले लोक चर्चा करीत असताना, त्यातले बरेचसे शांत आणि ध्यान केंद्रित करणारे असतात.
ध्यान केंद्रित करणं नक्कीच होय! - क्रोधी होणं नक्कीच नाय!
लोकांकडून आपण आपल्याला जास्तीत जास्त स्विकारलं जावं असं वागावं.कोणही मुद्दाम म्हणून फाल्तूपणा करीत नाही किंवा उदासिनता दाखवीत नाही.बरेचजण त्यांना जमेल तितकं चांगलं करण्याच्या प्रयत्नात असतात.तुझ्या माझ्यात आहे तशी त्यांच्यातही उणीव असू शकते.तेव्हा “काय हा फाल्तू माणूस आहे” असं म्हणण्या ऐवजी ” तो पण माणूस आहे “असं म्हणावं.
समजा एखादी आपल्याकडून चूक झाली तर स्वतःवर राग काढण्यापेक्षा ती चूक स्विकारावी किंवा सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण राग करून आपल्याला कसलीच मदत होत नाही.
काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत ह्याचा स्विकार करावा.”हे काही बरोबर नाही” असं म्हणण्या ऐवजी “असं होऊ शकतं” असं म्हणावं.
क्रोध करण्या ऐवजी कृतज्ञता असावी.नक्कीच तुझा बॉस उदासीन असेल,नक्कीच तुझा जॉब,तुझी पत्नी,तुझी मुलं आणखी चांगली होऊ शकतील.पण “ग्लास अर्ध भरलंय” अशी वृत्ती ठेवल्याने निश्चीतच आपण आपल्याला दुःखी करून घेतो.
एखादी समस्या निर्माण झाली तर त्यावर शोक करीत बसू नये.सुधारायचा प्रयत्न व्हावा.एक लहान पाऊल टाकलं तरी मदत होऊ शकते.
मनातला क्रोध काढून टाकल्याने तू नक्कीच सुखी आणि यशस्वी होशिल.माझ्यावर विश्वास ठेव.

हे माझं सगळं लेक्चर ऐकून घेत रामदुलारी शांत बसला होता.
“खरंच,तुमची ओळख झाल्याने मला काही तरी तुमच्याकडून शिकायला मिळालं”
असं मनापासून बोलून गेला.
सूर्यास्त होऊन काळोख बराच झाला होता.आम्ही जायला निघालो.”
हे माझ्या भावाचं सर्व भाषण ऐकून मी त्याला म्हणालो,
“एका होऊं घातलेल्या सर्फर्‍याला तू माणसात आणलंस.हे एक चांगलं पुण्यकर्म केलंस.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 10, 2008

जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

जीवनी नसे जेव्हा लवलेश प्रीतिचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

अपराध्या मिळते शासन,असे ठाऊक सर्वां
कुणी अपराधी का व्हावा नसे कुणा पर्वा
जीवनी नसे जेव्हा लवलेश माणूसकीचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

लागती अनेक दुषणे परि प्राप्त असे जगणे
निंदेचे अन बदनामीचे वीष पिण्या लागणे
जीवनी नसे जेव्हा लवलेश करूणेचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

बोलत राहिला तो अपुल्या जीवनासाठी
शब्द एकच ऐका म्हणे तो त्याच्यासाठी
जीवनी नसे जेव्हा लवलेश सहानुभूतीचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 8, 2008

दीर्घ आयुष्याची गुरूकील्ली.

“समूहात गाणं म्हणजेच तल्लीन होऊन गाणं.समूहात गाताना इतर वाद्दांची जरूरी भासत नाही.तसंच सर्वांमधे विलीन होऊन गाईल्याने स्वतःला समूहात विलीन झाल्यासारखं वाटतं.”
मी मधे खानोलीला जत्रा पहायला गेलो होतो.जत्रेला खूपच मजा आली.त्यानंतर मी एक आठवडा खानोलीत मुक्काम केला होता.विषेश करून मला खानोलीची समुद्रचौपाटी खूपच आवडते.आणि जास्तकरून घाटीच्या माथ्यावरून फेसाळलेला तो समुद्र पाहून मन प्रसन्न होतं.आठ दिवसाच्या मुक्कामात मी रोज घाटीवर चढून जात असे.रोज कोण ना कोण तरी गावातले प्रतिष्टीत बरोबर फिरायला यायचे किंवा वाटेत भेटायचे.असेच एकदा मला प्रमोद खानोलकर आणि त्यांचे स्नेही विजय खानोलकर भेटले.घाटी चढून जाताना आमच्या गप्पा व्हायच्या.ह्या दोघानी गावात एक भजन मंडळ स्थापलं होतं.आणि त्या भजन मंडळाची आणि संगीताची ते मला माहिती देत होते.
प्रमोद खानोलकर मला म्हणाले,

“आमच्या गावात भजन मंडळ आहे.गावातल्या जस्तीत जास्त लोकांना ह्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने मी आणि माझा हा मित्र कार्याला लागलो.त्यासाठी गाण्याचा अनुभव असण्याची जरूरी नाही हे आम्ही अगोदरच सांगितलं.आमच्या भजन मंडळातले काही लोक तर कधीच पूर्वी गाईले नव्हते.आता आमच्या ह्या मंडळात जवळ जवळ पंधरा वीस लोक सामील झाले.

मला वाटतं,गाण्याचे खूप फायदे आहेत.दीर्घ आयुष्य लाभण्याची ती एक गुरूकील्ली आहे,शरिराला सौष्ठव येतं,स्वभाव संतुलीत राहतो,नवीन मित्र मिळतात,बुद्धिला चालना मिळते,हजरजबाबी व्हायला होतं.कुठेतरी वाचनात आलं की संगीताने,आणि नृत्याने
जीवन आनंदी आणि निरोगी राहतं.
खरं तर,त्यात शारिरीक फायदे पण खूप आहेत.मुळात गाताना फुफ्फुसाचा एव्हडा वापर होतो की दिवसाभर्‍यात तेव्हडा वापर होणार नाही.उच्चस्वरात गाईल्याने गांभिर्यता कमी वाटून,संतुष्ट व्हायला होतं.समुहात गाईल्याने समुहाबद्दल जागरूकता येते.तल्लीन व्हायला होतं.मीपण कमी होऊन आम्हीपण येतं.समानुभूति येते नैतिकता वाढते.
रोज संध्याकाळी आमचा कार्यक्रम असा असतो.भरपूर पाण्याचे तांबे आणून ठेवतो, काही अल्पाहार असतो,भजनाची काही पुस्तकं असतात, काटेकोरपणे वेळेची आठवण ठेवतो आणि सुरवातीला थोडा जोश आणतो.
गाण्याची निवडही काटेकोर असते.शब्दसंपन्न असलेली,स्वर संपन्न असलेली,तालमेल असलेली,गाण्यात प्रकटन असलेली गाणी निवडतो.
आणि ज्यावेळी लोक तालमेल ठेवून लांब सूरात गातात तेव्हाच खरी मजा येते. उच्चसूरात गाणं हेच काही सर्व नसतं. त्याला आणखी दोन पेहलू आहेत.पहिला ताल.सर्वानी मिळून ताल धरला की रोमांचकता येते आणि गाण्याची गति जेव्हा वाढते तेव्हा ते जास्त प्रभावशाली वाटतं.पण दुसरी गोष्ट जपावी लागते ती गाण्यातला भाव.गाण्यातला ताल आणि स्वर यांची सुसंगती सांभाळताना गाण्यातला भाव प्रभावी असावा लागतो.एकाच सूरात गाणं म्हटलं जात असताना आणि वेगवेगळी लय सांभाळताना जर सगळं जुळून आलं तर ब्रम्हानंदच होईल.

अशा तर्‍हेची समुहातली गाणी जर का शाळेत गाईली गेली तर मला वाटतं, लहान मुलांच चारित्र विकसीत करता येईल,आणि त्याही पेक्षा त्यांच्याकडून सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. आम्ही त्या दृष्टीने आमच्या गावातल्या शाळेत हा प्रयोग करून पहाणार आहो.”
हे सगळं ऐकून मला गावात कसे लोक आपला वेळ घालवतात आणि भजनासाठी भजन नसून त्याचा सामाजीक दृष्टीने कसा विचार करतात हे खानोलकरांकडून ऐकून बरं वाटलं.मी त्याना म्हणालो,
“तुमचा संगीता बद्दलचा अभ्यास खूपच खोलवर आहे.मला तुमच्याकडून बरचसं शिकायला मिळालं.तुमच्या नवीन नवीन प्रयोगाला माझ्या शुभेच्छा”



श्रीकृषण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 6, 2008

दोन अनोळख्या मधला एक दूवा

“ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले ” वेळ जात नसेल तर वाचा” आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण “धन्यवाद” असाच होता.”

माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट.
हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिवस इथे राहून आता बरा झाल्यामुळे घरी जायला त्याला परवानगी दिली होती.
त्याच्या घरी त्याचे म्हातारे आईवडिल होते.लग्न झाल्यावर काही दिवसानी ह्या रोगाची त्याला लागण झाली होती.हे लक्षात आल्यावर त्याच्या पत्नीने त्याच्याशी काडीमोड घेतलेला होता.नशिबाने मुलं वगैरे काही नव्हती.
ज्या बसस्टॉपवरून घरी जायला निघाला होता,त्याच बसस्टॉपवर ही मुलगी आणि तिची आई बससाठी उभी होती.हे त्याने पाहिलेलं होतं.त्याच्या डाव्या हाताची सारी बोटं घळून पडल्याने तो हात मुंडा दिसत होता.तेव्हडंच एक वैगुण्य त्याच्या हाताकडे बघितल्यावर दिसलं जात होतं.बस आल्यावर सर्व मिळेल त्या सीटवर बसले.ह्याला पण खिडकी जवळ जागा मिळाली होती. बसमधल्या प्रवाशाकडे जाणून बुजून तो नजरा नजर करीत नव्हता.पण त्याच्या हाताकडे बघून कुणीही त्याच्या बाजूला बसत नव्हतं. त्यामुळे त्याच्या बाजूची सीट प्रवासात रिकामीच होती.त्यामुळे त्याला त्याचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवत होतं.
नंतर तो रुग्ण संजयला म्हणाला,
“काही वेळा नंतर ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले

” वेळ जात नसेल तर वाचा”

आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण

”धन्यवाद”

असाच होता.ती फक्त माझ्याशी हंसली.
ती तिच्या आई जवळ जाऊन बसली असावी.कुठे बसली ते मी पाहिलंच नाही.कारण ते मासिक तिच्याकडून घेतल्या नंतर मी खिडकीच्या बाहेर बघून अश्रू ढाळीत होतो. तिचं ते छोटसं सहानुभूतिचं भावप्रदर्शन बर्‍याच वर्षानी मी अनुभवलं होतं.”
ही सर्व हकिकत त्या रुग्णाने पुन्हा चेकअपसाठी त्या सुश्रुषागृहात गेला होता त्यावेळी संजयला सांगितली.नंतर संजय म्हणाला,
” कुष्टरोगातून पूर्ण बरा झालेल्या ह्या त्यावेळच्या रुग्णाची बर्‍याच वर्षानी माझी गाठ पडली.ते जूने दिवस आठवून आणि ती बसमधली घटना आठवून मला तो रुग्ण म्हणाला,
” दोन अनोळख्या व्यक्ती दूवा साधण्यासाठी प्रयत्न करतात त्या दुव्याचं मला विषेश वाटतं.
त्या मुलीला इतक्या वर्षानी आठवत ही नसेल ती घटना.
मी आपली मनात समजूत करून घेतो की ती आता मोठी झालेली असावी.अशीच इतरांशी दुवा ठेवीत असावी.आणि कदाचित तिच्या मुलांनापण असंच करायला शिकवीत असावी.मला वाटतं त्यावेळी तिच्या आईनेच मला ते मासिक वाचायला म्हणून बक्षीस दिलं असेल.तिने ते मासिक मला का दिलं ह्याचं महत्व मला वाटण्या ऐवजी ते तिने दिलं हेच जास्त महत्वाचं वाटतं.
तिचंच हे उदाहरण घेऊन निरनीराळ्या लोकांशी निरनीराळे दूवे ठेवण्याच्या प्रयत्नात मी असतो.असं मी करतो हे पाहून बर्‍याच लोकाना कळतही नसेल की मी असं का करतो ते.पण मला नक्कीच माहित आहे हे मी करतो ते त्या छोट्या मुली मुळे.
तिने देऊ केललं ते मासिक माझ्या सारख्याला- ज्याला इतर टाळत होते- ते आठवून माझ्या जीवनात त्याचा सतत प्रतिध्वनी येत असतो.माझं पण इतराना केलेलं हे सहानुभूतिचं भावप्रदर्शन त्यांच्या मनावर तसाच परिणाम करीत असावं.आणि त्यावेळच्या त्या छोट्या मुलीला आता जी मोठी बाई झाली असावी तिला मी आठवून एकच म्हणेन “धन्यवाद”.
हे त्याचं सारं ऐकून झाल्यावर संजय त्या रुग्णाला म्हणाला,
“ज्यावेळेला तू ती हकिकत मला सांगितलीस त्यावेळेला ती कोण मुलगी हे मी तुला मुद्दामच सांगितलं नाही.पण आता इतक्या वर्षानी सांगतो.
तिच्याही वडिलाना तुझ्यासारखीच कुष्टरोगाची लागण झाली होती.आणि ज्या दिवशी तुला घरी जायला सांगितलं त्याच दिवशी तिची आई आणि ती छोटी मुलगी आपल्या वडिलाना आमच्या सुश्रुषागृहात दाखल करायला आली होती.तुला त्यानी तिथं पाहिलं असावं.आपल्या वडिलाना सोडून ती दोघं तुझ्याच बसमधे बसून परत जात होती.तुला खिडकीजवळ एकटा बसलेला पाहून तिच्या आईला आणि तिला तिच्या वडिलांना असंच टाळलं जात होतं ह्याची आठवण येऊन तुला ते मासिक तिने आणून दिलं असावं.”
हे माझं सर्व सांगणं ऐकून झाल्यावर तो मान दुसरीकडे वळवून त्या घटनेची आठवण काढून ढळाढळा अश्रू ढाळत होता.
मी त्याला जवळ घेऊन म्हणालो,
“तुला कधीना कधी कळावं असं मला नेहमी वाटायचं.आज योगायोगाने भेटलास म्हणून एकदाचं सांगून टाकलं.त्यावर तो काय बोलला ते मी ऐकलं नाही पण त्याचे ते अबोल शब्द हेच मला सांगत होते,
“धन्यवाद”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 4, 2008

ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.

मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला,
“साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील.”
मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर,गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्या आवाजात मला “जय महारष्ट्र” म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभा ठाकला.
त्याचं ते दुपदरी शरिर बघून मीच त्याला म्हणालो तुम्ही मागेच बसा मी ड्राईव्हरच्या बाजूला पुढच्या सीटवर बसतो.त्याला ती माझी सुचना आवडली.इतका लांबचा प्रवास असल्याने अंमळसं सगळ्यांनाच ऐसपैस बसायला आवडेलच.
प्रवासात जेव्हा गप्पाना रंग चढला तेव्हा ते गृहस्थ मला म्हणाले,
“मला वाटतं जे लोक जे काही करतात त्याबद्दल त्याना आत्मसन्मान वाटला पाहिजे. जरी इतर कुणीही त्याबद्दल गैरसमज करून घेतला किंवा तिरस्कार केला तरीही.
मी व्यवसाईक कुस्तीगार आहे.गेली जवळ जवळ दहा वर्षे.ह्या माझ्या व्यवसायातून माझी गुजराण व्हायची. पण माझ्या कुस्ती खेळण्याच्या व्यवसायाला लेबल चिकटवलं जायचं.फाल्तू खेळ,खतरनाक शौक,बिनडोकी शारिरीक प्रदर्शन अशा पद्धतीची उपनावं लावली जायची.

मी ज्यावेळी शाळेत जायचो,त्यावेळी एकदा माझ्या गुरूजीनी मला सर्वांसमोर तंबी दिली होती की मी जर का अभ्यासात जास्त लक्ष न देता कुस्ती खेळण्यात वेळ घालवला तर,मला पुढे चांगलं उपजीविकेचं काम मिळणार नाही.माझं भवितव्य निराशाजनक होणार.

त्या निराशाजनक काळात मी कुस्ती खेळायचं अजिबात सोडलं नाही.आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती करीत राहिलो. तरीपण बरेच वेळा माझे प्रयत्न विफल व्हायचे.पण माझ्या लक्षात आलं की एखाद्दा गोष्टीत निपूण व्हायचं असेल तर प्रयत्न करीत राहायचं.मग जरी खरचटणं झालं,थोडा मार बसला,एखादा हात पाय मुरगळला,लोकांनी टिंगल केली तरी.
देशात अलीकडे कुस्तीच्या खेळाला समाजातल्या मुख्यधारेत चांगलीच मान्यता मिळाली आहे.पण अजूनही काही प्रतिकूल रुढिबद्द लोक आहेत.कुस्तीला अनुकूल असलेले जे लोक मला माहित आहेत ते सामाजाचे उत्तरदायी नागरीक आहेत.त्यातले बरेच लोक वडील,घरंदाज,जगप्रवास केलेले,आणि सफल ठेकेदार आहेत.त्यांचा पेहराव आणि राहाण्याची स्टाईल ही आमच्या विश्वातली संस्कृती असावी.

तर असा मी चाळीसीतला,पती आणि तीन मुलांचा बाप,एक मोठी जबाबदारीची आणि दायीत्वाची लांबलचक यादी घेऊन असलेला आहे.आणि मला जरी खूप उपाधी असल्या जश्या-सि.ई.ओ. एक्झीक्युटीव्ह प्रोडयुसर,सिनीयर कनस्लटंट,फॉऊन्डेशन चेअरमन,फाल्तु अभिनेता तरी सुद्धा मला ज्याचा खास अभिमान आहे तो म्हणजे “व्यवसायीक कुस्तीगार” म्हणून. ही उपाधी मी जरूरीच्या कागदपत्रावर लिहीतो.जरी मला कुठल्यातरी सुरक्षा नाक्यावर,कस्टम ऑफिसात तपासणीला जावं लागलं तरी.

हे खरं आहे की,कुस्ती खेळणं ही काही लोकांच्या दृष्टीने ग्रेट गोष्ट नसेलही पण मी जे काय करतो त्याचा मला अभिमान आहे.माझ्या आईवडीलानी माझ्या ह्या वेडाबद्दल त्याची कधीही उपयुक्तता विचारली नाही.
माझं हे उदाहरण मी एक दिवस माझ्या मुलांकडे पासऑन करणार आहे.माझा मोठा मुलगा उत्साही कुस्तीगार आहे.तो मजा म्हणून कुस्ती खेळतो आणि ते मला पुरेसं आहे.
कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही.”

आणखी बर्‍याच गप्पा प्रवासात झाल्या.पण त्या कधीतरी पुढच्या वेळी.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 2, 2008

आईची विटंबना.(रामपुरी ते रायफल)

माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली,पण ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला. पण तिने कधीही हातात काठी घेऊन कुणाला मारायला आपल्या घराबाहेर पडली नाही.इतकी क्षमता असून तिने कधीही कुणाच्या घरात जाऊन कसली ही अभिलाषा केली नाही.आल्या- गेलेल्या पाहुण्याला आनंदाने सामाऊन घेतलं.”आवो जावो तुम्हारा घर” अशी वृत्ति ठेवून ती राहिली. इतिहास साक्षी आहे.म्हणून ती आजतागायत जीवंत आहे.बाहेरच्या आगांतूकानी येऊन खूप तिची लुटालूट केली.कुणी तिचे दागिने लुटले,कुणी तिची देवघरं उद्व्हस्त केली.तिच्या गळ्यातला हिरा पळवून नेऊन आपल्या मुकूटात रोवून ठेवला.पण म्हणून ती कधीही दीन झाली नाही.यवनानी शेकडो वर्ष तर फिरंग्यानी दिडशे वर्ष तिच्याच घरात राहून धुमाकूळ घातला, लूट केली.पण तेच आगांतूक आपलं तोंड काळं करून निघून गेले. तिची बाराशे कोटी मुलं आपआपल्या परीने जगताहेत.
तिची होत असलेली भरभराट शेजा‍र्‍यापाजार्‍यांच्या डोळ्यात खूपते.तिची प्रगती खूंटवण्यासाठी ते आपली पराकाष्टा करीत आहेत.पण अशी कुणाची प्रगती खूंटेल का?
ती म्हणते,
“असे खूप आघाद माझ्यावर झाले आहेत.खूप जण जखमा करून गेले आहेत.किती रक्त सांडलं गेलं आहे. वाईट वाटून तुम्ही दुःखी व्हाल.पण हे ही दिवस जातील. आघात करणारेच हरतील.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे हे कुणालाच माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे की झालेल्या चूकातून शहाणं व्हायला हवंय.आणि माझा माझ्या बाराशे कोटी मुलांवर विश्वास आहे.”

मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोक काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती. जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे. किंवा लाठ्या काठ्याने डोकी फोडली जायची.हे चाकू मुंबईत तरी चोरबाजारात मिळायचे.हा चोरबाजार भेंडी बाजाराच्या आसपास भरायचा.ह्या चाकवाना रामपुरी म्हणायचे.रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे.

त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या.त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. त्यावेळच्या पोलिसाकडेपण दंडुके-बॅटन- असायचे.त्यावेळच्या पोलिसांचा ड्रेस गमतीदार असायचा. शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या आणि त्याचा रंग पिवळा जर्द असायचा आणि पेहराव असायचा जांभळ्या रंगाचा बुशकोट आणि खाली शॉर्ट-हाफ प्यॅन्ट-असायची.पायात पठाणी चप्प्ल असायचं.पोलिस गमतीदार जोकर दिसायचा.आम्ही पोलिसाला लहानपणी “जांभळी बाटली पिवळा बूच” असं गमतीने म्हणायचो.पोलीसाच्या कमरेला हे पिवळ्या रंगाचे दंडुके-बॅटन लटकत असायचे.त्याचा वापर त्याला क्वचितच करावा लागायचा.आणि मोठ्या दंग्यात गाड्या भरून पोलीस आले की त्यांच्याकडे लांब काठ्या असायच्या.लाठीमार करून जमावाला पांगवायचे.त्याहून गंभीर जमाव झाल्यास रायफली घेऊन पोलिस यायचे. ह्या रायफलीतून एका वेळी एक गोळी झाडली जायची.बरेच वेळा गोळीबार पोलिस हवेतच करायचे.दंगे काबूत यायचे. त्यामुळे मनुष्य हानी कमीच व्ह्यायची. पोलिसांच्या साहेबाकडे मात्र पिस्तूल असायचं आणि कमरेला एका चामड्याच्या पिस्तुलाच्या आकाराच्या पाऊचमधे ठेवलेलं असायचं.

पिस्तुल प्रत्यक्षात कसं दिसतं ते आम्हाला कधीच पाहायला मिळालं नाही.पण नाही म्हटलं तरी वांद्र्याच्या वांद्राटॉकीझमधे चार आण्याचं तिकिट काढून आम्ही इंग्लिश फिल्म बघायला जायचो. “झोरो इन टाऊन” किंवा “डेथ ऑफ गॅन्गस्टर” असले फायटिंगचे चित्रपट बघायला मजा यायची.त्यात पिस्तुलं म्हणजे काय ते पहायला मिळायचं.तेव्हड्या लहान वयात मोठ्या भावाबरोबर चित्रपट बघायला गेल्यावर इंग्रजी काही कळत नसायचं.मोठा भाऊ हंसायचा त्यावेळी आम्ही हंसायचं.एक मात्र खरं धावत्या घोड्यावर बसून बंदूकीच्या गोळ्या एकमेकावर झाडण्याच्या दृश्याने त्यांची मर्दूमकी बघायला मजा यायची.एक मात्र इंग्रजी शब्द अजून आठवतो” हेंज-जॉफ” म्हणजेच हॅन्डस अप”

जशी मुंबईची वस्ती वाढू लागली तसे गुन्हेगारपण वाढायला लागले.जरा आधूनीक हत्यारं गुंडाना मिळायला लागली. अलीगढ वरून गांवठी पिस्तुलं मिळायला लागली.उत्तरप्रदेशच्या अलिगढमधे गावठी पिस्तुलं बनावायचे बेकायदा कारखाने बरेच होते. ही पिस्तुलं मुंबईत स्मगल व्हायची.कधी कधी मुंबईचे पोलिस अलिगढमधे जाऊन बेकायदा कारखान्यावर छापे टाकायचे.
मुंबईत त्यावेळी नावाजलेली मराठी वर्तमानपत्रं म्हणजे लोकमान्य,नवशक्ति आणि केसरी.लोकसत्ता आणि सकाळ ही वर्तमानपत्रं आत्ता आत्ताची.परदेशातल्या बातम्या सोडाच एखाद दुसरा भोसकून मेल्याची एखादी बातमी दिसायची.अमेरिकन कॉटनबाजाराचे नंबर मात्र एका ठराविक जागेत दिसायचे.त्या नंबरावर काही लोक सट्टाबेटिंग खेळायचे.

मुंबईची वस्ती आणखी वाढायला लागल्यावर,चोर्‍यामार्‍या दंगेधोपे जातीय दंगल वाढायला लागली.आता नवीन अस्त्र म्हणजे गांवठी बॉम्ब फुटायला लागले.नाहीतर बॉम्ब हा प्रकार फक्त लष्कराकडेच असायचा.ह्या गांवठी बॉम्बच्या वापराने एक्का दुक्का मेल्याची बातमी यायची.गांवठी बॉम्ब बनवायचे मुंबईतपण कारखाने निर्माण व्हायचे.धारावीत त्यांचं जास्त प्रमाण असायचं. हे बॉम्ब विझवण्यासाठी मुंबईपोलिसांच स्पेशल खातं असायचं.हळू हळू सर्रास पिस्तुलं मिळायला लागली.अर्थात बेकायदा वापर व्हायचा.आता पेपरात एकदोन ऐवजी चारपाच दुर्घटनाच्या बातम्या यायच्या.हवालदारपण आता थोडे स्मार्ट व्हायला लागले. पुर्वीचा गचाळ पेहराव जाऊन पोलीस आता जांभळी टोपी आणि खाकी कपडे वापरायला लागले.

एके४७,बिके५७,सिके६७ ही पोलीसांच्या कमरेवरच्या बिल्ल्यावरची नंबरांची नांव असायची.”अरे त्या एके४७ला बोलाव.किंवा बिके५७ला हांक मार” अशी भाषा बोलली जात होती.
एके४७ ही मशीनगन असते हे त्यावेळी पोलिसानासुद्धा माहिती नसावी.मशिनगन्स फक्त लष्करात असतात हे ऐकलं होतं.
पण आता गुंड जाऊन अतीरेकी आले.गावठी बॉम्ब जाऊन आरडीएक्सचे बॉम्ब आले.हात ग्रेनेड सर्रास वापरायला लागले. सुईसाईड बॉम्बचं नवीन टेकनीक आलं.आता पुढे रेडिओऍकटीव्ह बॉम्ब येतील.पुढे सेटलाईटवरून लेझर बिम वापरून संहार करण्यात येतील. कदाचीत पोरटेबल न्युकलीयर बॉम्ब येतील.डर्टीबॉम्ब येतील.काय कुणाष्टाऊक कुठे चालला आहे हा जग्नाथाचा रथ?

कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही धरती
जात आहे पुढे पुढे हे गगन
होत आहे काय ह्या जगताला
कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या
कोण आहे हिचा नावाडी
न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र
कुणाचा आहे हा इशारा

हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा
न कळे आहे काय हा तमाशा
रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा
कुणाचा आहे हा इशारा

अजब आहे हा सोहळा
अजब आहे ही कहाणी
नाही कसले ठिकाण
नाही कसले निशाण
न कळे कुणासाठी जात आहे
हा जगन्नाथाचा रथ
कुणाचा आहे हा इशारा

हे शहाणे हजारो झाले भटके
गुपीत त्याचे कुणी न समजे
ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती
कुणाचा आहे हा इशारा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 30, 2008

माझ्या यशाची पहिली चव.

कोकणातल्या पिंगुळी गावात जाऊन एका शाळेला भेट देण्याचं कारण,मी माझ्या मावशीच्या मांडकूली गावात गेलो होतो.तिथे पिंगुळी गावचा विषय- नलिनीने- माझ्या एका मावस बहिणीने काढला.ती मला म्हणाली,
“अरे पिंगुळी गावात वसुंधरा साने नावाची माझ्या वयाची मुलगी माझ्या जवळ फार पूर्वी आली होती.आणि मी तुझी त्यावेळी तिच्याशी ओळख करून दिल्याचं तुला आठवत असेल.ती आता तशी मुलगी राहिली नाही.मुंबईत चांगलं शिक्षण घेऊन तिकडेच नोकरी करण्याचं नाकारून आपल्या गावाची उर्जितावस्था करण्याच्या इराद्दाने,पिंगुळीला आली.बरीच वर्ष ती इकडे आहे आणि तिने शिक्षणाच्या दृष्टीने खूपच कायापालट केला आहे.हवं तर आपण तिला भेटायला जाऊया.तू तिची स्टोरी ऐकून नक्कीच खजील होशील.मला ही तिला बरेच दिवसानी भेटण्याचं निमीत्त मिळेल.
दुसर्‍या दिवशी आम्ही वसुंधराला भेटायला पिंगुळीला गेलो.मांडकूली पासून ते अवघ्या तीन मैलावरच आहे.आम्ही चालत चालत गेलो.आम्हाला पाहून वसुंधरेचा आनंद गगनात मावेना.आमचं आगत-स्वागत वगैरे करुन झाल्यावर आमची तिच्या एकंदर कार्याची चर्चा झाली.
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायात तू स्वतःला कसं झोकून दिलंस?”
मला वसुंधरा म्हणाली,
“जेव्हां जव्हां मी इकडे यायची तेव्हा तेव्हा इथल्या लोकल जनतेचं सांगणं,
“आम्ही खूप प्रयत्न करतो पण मुलंच शिकत नाहीत.”
माझा माझ्या शिक्षणातला अनुभव जमेला धरून मी हे एक चॅलेंज घेतलं की ही सबब खोटी करुन दाखवायची.
मुलं शिकत नाहीत ही सबब मी कधीच स्वीकारू शकत नाही.तुम्हाला मुलांना दोष देता येणार नाही.मुल जर शिकण्यात यशस्वी झालं नाही तर समजावं की त्याच्या सानीध्यात असलेल्या माणसाचं ते अपयश आहे,मुलाचं नाही.
मी ज्यावेळी म्हणते की सर्व मुलं शिकू शकतात आणि हे असं मी मानते हे ऐकल्यावर काही लोकांचा गैरसमज होतो.
कारण मी माझ्या गावातल्या अगदी गरीब लोकांच्या वस्तितल्या मुलांशी जवळून गेली पंचवीस वर्षे काम करीत आलेली आहे.काही लोकाना वाटतं की त्या वातावरणातल्या मुलांमधल्या चांगल्या हुषार मुलांविषयी मी बोलत असते त्या मुलांमधल्या बुद्धिवान मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर ती यशस्वी होतात असं मला म्हणायचं आहे असं वाटून बोलते.तसं होणं हे अगदी खरं आहे.पण मला तसं मुळीच म्हणायचं नाही.
हे पहा,मला अगदी मनापासून वाटतं की सर्व मुलं शिकू शकतात.मी तसं मानते.मी ते पाहिलंय.आणि मी त्याचा अनुभवही घेतलाय.
मी माझं शिक्षण घेताना अगदी कठीण समस्या असलेल्या मुलांबरोबर काम केलं आहे.भावना दुखावलेली मुलं,स्वलीन(autistic)मुलं,थोड्या मंद बुद्धिची मुलं,वागायला कठीण जातील अशी मुलं,थोडक्यात त्या मुलांच्या आईबाबानी संभाळायला त्यानी हात टेकलेली मुलं अशा प्रकारच्या मुलांबरोबर काम केलं आहे.
एक साधी गोष्ट पहा.मी आणि माझे सहकारी ह्या मुलांबरोबर एखादी खाण्याची गोष्ट कशी बनवायची ह्या पासून सुरवात करायचो.आता नानकटाई बनवण्याचंच घ्या.त्याना बेकिंग पावडर आणि मीठ ह्यातला समोर बघून फरक कळत नसायचा.पण एकदा का ती गरम गरम नानकटाई भट्टीतून काढून त्यावर थोडं साजूक तूप आणि मधाचा एक चमचा वाढून त्यानी खाल्ली,का मग ती मुलं नवीन नानकटाई कशी करायची ह्यासाठी प्रेरीत व्ह्यायची.

एकाएकी जी मुलं स्थीर न बसता सारखी चुळबुळ करीत र्‍हायची किंवा नीट एकाग्र होत नसायची ती आता एखादी डीश बनवली तर त्याला लागणार्‍या निरनीराळ्या मूळ पदार्थाचं प्रमाण किती असतं त्याकडे निक्षून बघायची.साध गणीत किंवा स्पेलिंग करायची.कालान्तराने मला आठवतं त्यांचे आईबाबा ही त्यांची प्रगती पाहून आनंदाने रडायची.

नानकटाई,बर कां,खूप चवदारी होती.आणि आता आज मला त्याची चव आठवते. आणि त्याशिवाय त्यानी मला शिकवलेला धडा आठवतो की जरका आपण मोठी माणसं,त्यांच्यासाठी योग्य अशी प्रेरणा त्या मुलासाठी निर्माण केली तर ते मुल शिक्षीत व्ह्यायची आशा करायला हरकत नाही.
सध्या मी आजूबाजूच्या खेड्यातली मुलं शाळेत जावी म्हणून शाळा निर्माण करायच्या खटपटीत असते.शेकडो मुलांबरोबर मी संपर्क ठेवून असते.माझ्या सर्व सहकर्‍याना माहित आहे,की मला अमुक अमुक मुल शिकत नाही ही सबब मुळीच पसंत नाही.मुलांना तुम्ही दोषी ठरवू शकत नाही.माझ्या कारभारात जर का मुल यशस्वी होऊ शकलं नाही तर त्याचा अर्थ त्याच्या भोवतालची मोठी माणसं अपयशी ठरली आहेत.
त्याचं कारण अति कठीण समस्या घेऊन मुलं एकाएकी स्वतःला शिकवायला जाणार नाहीत.मी मानते की मोठ्यानी त्यांना मदत केली पाहिजे.आणि ते प्रत्येक मुलाकडे निरखून पाहून त्यांना कशाने स्फुर्ती मिळते ते पाहून त्यांच्या त्या स्फुर्तीला अगदी नीगरघट्ट होवून चालना देता आली पाहिजे.

माझे वडील हयात नव्हते.माझ्या आईने आम्हा चार मुलांना वाढवलं.मी तर अभ्यासात दुर्लक्ष करीत राहिले.जर का माझी त्या दोन शिक्षकांशी भेट झाली नसती तर मी कुठच्या कुठे वाईट मार्गाला लागले असते.त्यानी मला आवडतील अशी पुस्तकं-साने गुरजींच काही पुस्तकं,काही सुंदर सुंदर कवितांची पुस्तकं देवून माझ्या मनात वाचनाची गोडी आणून दिली नसती तर हा माझ्यातला फरक तुम्हाला दिसलाच नसता.
अशा चांगल्या चांगल्या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन माझ्या पचनी पडलं.आता मी माझ्या ह्या गावातल्या आणि आजुबाजूच्या गावातल्या मुलांसाठी वाहून घेतलं नसतं तर माझी होणार असती ती परस्थिती आज त्या मुलांची झाली असती.ती मुलं आयुष्यातून फुकट गेली असती.

माझ्या यशाची पहिली प्रचिती त्यावेळी झाली की ज्यावेळी त्या गावातल्या मुलानी मला जी गरम गरम नानकटाई आणून दिली आणि त्याची चव इतकी मधूर होती की मी मानते तुमच्या डोळ्यातून अश्रू टपकले असते.
मी वसुंधरेला म्हणालो,
“तुझी ही तपश्चर्या बघून माझ्या डोळ्यातून अश्रू नक्कीच टपकले हे निश्चीत.पण तुझ्या नानकटाईची चव मात्र मी घेतल्या शिवाय इकडून जाणार नाही.”
मला वसुंधरा म्हणाली,
“अरे,नानकटाई अवश्य खा.पण त्या अगोदर कर्ली नदीतून गुंजूल्याच्या गातनी एका कोळ्याने मला आज त्याच्या मुलाचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून खूष होऊन आणून दिल्या आहेत.त्याचं चांगलंच तिखलं करते तू आणि नलिनी जेवूनच जा. मला पण बरं वाटेल.”
मला कुणाच्या आग्रहाला नकार देऊन नाराज करता येत नसल्याने आम्ही दोघं वसुंधरेकडे जेवायला राहिलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 28, 2008

शेवटी कविताच जन्माला आली

संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.भन्नाड वारं सुटलं होतं.
चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती.
हे चित्र मनात आलं जेव्हा,
(हंसर्‍या)मुमुक्षुने एक ओळ दिली.
“खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव”
आणि दुसरी ओळच काय ती लिहायला सांगितलं.
पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार.शेवटी कविताच जन्माला आली.

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव
वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड
सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड

घन घन घटा जमूनी कोसळतील धारा
सजणा बिलगू देईना हा खट्याळ वारा
नको रे चंद्रा! लपू तू ढगा मागे
पडू दे लख्ख चांदणे अमुच्या मार्गे

आवर ग! सरिते आता तुझी खळखळ
होईना सहन अमुच्या बछड्यांची हळह्ळ
दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली
पिल्लाना गोंजारण्याची वेळ आता आली



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 26, 2008

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता. दहा पंधरा घरं असतील एका वाड्यात.घरातली सर्व कामं नोकर चाकर येऊन करायची.पण गाई म्हशीना चरायला न्यायचं,त्याना नदीवर धुवायचं,घरी त्याना आणून गोठ्यात बांधून ठेवायचं,त्यांच्या समोर चारा वाढायचा,उरलेल्या अन्नाचा-पेज,उष्ट अन्न,-आंबवण त्याना खाऊ घालायचं ही कामं गावतल्या महारवाड्यातून काळू महार आणि त्याच्या बायका, मुलं येऊन करायची.
जाता जाता त्याला उरलेलं जेवण देऊन त्याच्या हातावर चवली ठेवायचं माझ्या आजीचं आणि चुलत आजीचं रोजचं काम असायचं.
माझी आई दरखेपेला अशीच आमच्याबरोबर येताना न चूकता आमचे जूने कपडे काळू महाराच्या मुला मुलीना वापरायला द्दायची.त्यांची ही गरिबी बघून मला त्यावेळी खूपच त्यांची दया यायची.काळूचा बाप आणि आजा मरेपर्यंत असलीच काम येऊन करायचे.हे त्यांचं पिढीजात काम असायचं.असं माझे आजोबा सांगायचे.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावर ही सर्व आजोळची वहिवाट पाहून मी त्यात स्वारस्य घेऊन पहायचो. मुंबईला असले व्यवहार होत नसल्याने हे बघायला जरा कौतूक वाटायचं.आणि दुःखही व्ह्यायचं.काळू महाराचा मुलगा-दगडू- मात्र असली कामं करीत नसे.तो शाळेत जाऊन शिकत असल्याने त्याचा अभ्यास करण्यात वेळ जायचा.
शिक्षणामुळे त्याच्या इच्छाशक्तिचा आणि शैलीचा उपयोग उपयुक्त प्रारंभीक सामाजीक क्रियांच्या व्याख्या करण्यात आणि वापर करण्यात झाला. धर्माचा खरा उपयोग अश्या काही लोकाना होतो की ज्याना त्यांच्या मनुष्य म्हणून जन्माला येण्याच्या योग्यतेच्या पलिकडे त्या धर्माची गरज, सहारा घेण्यात आणि दिलासा घेण्यात होते.एकप्रकारची मंत्रमुग्ध सुंदरता दुःखाने भरून वहाणार्‍या खोल नदीतून उफाळून येऊन,ती सुंदरता जणू मानवी जीवनाच्या छपलेल्या झर्‍यांना छूत आणि अछूत यातल्या धार्मिक अभिव्यक्तीला स्पर्श करते.शिक्षीत दगडूला हे आता भासू लागलं होतं.माझी खात्री आहे की,मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.
दगडू महाराचा विचार केल्यावर त्याच्या जीवनाच्या तर्कशास्त्रात माणसा माणसातल्या असमानतेचा असंधिक्त विचार मी करू लागलो.
मला असं वाटतं,ज्यावेळेला माझी आई ह्या समाजातल्या लोकाना बोलावून आमचे सर्वांचे,तसेच आमच्या शेजार्‍यापाजार्‍यांचे वापरलेले कपडे मुद्दाम जमा करून आणून त्यांना द्दायची त्यावेळी त्या महारवाड्यातून त्यांच्या आया बहिणी कच्ची बच्ची सर्व आशाळभूत होऊन यायची. ते देण्यात कुणाला काय तर कुणाला काय दिलं जायचं.पण मग मला आवर्जून वाटायचं,की जरी कपडे देण्याच्या क्रियेत असामनाता राहिली तरी मुळातच त्या अच्छूत गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात असमानता असण्यात कसली प्रामाणिकता आली असावी.

हे सांगण्याचं कारण एका वर्षी माझ्या आईने हे दरवर्षीचं कपडे देण्याचं काम एकदा माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर सोपवलं.ह्या मिळालेल्या संधीतून मला वरील विचार सुचला.ह्या संधीने मला अचंबा होण्यासारखा,आणि नवीन जागृती होण्यासारखा एक मार्ग दिसू लागला.त्यामुळे सामाजीक धारणे बाबत एका महत्वाच्या बाबीवर माझा मजबूत दृढविश्वास बसाला. आणि तो असा की कुणाही व्यक्तीची ईमानदारीने पारख करायची झाल्यास त्याच्या नेत्रातून जगाकडे दृष्टी टाकली पाहिजे.मग ती त्यांची गरीब आजी असो किंवा तरूण बहिण असो,किंवा म्हातारा आजा असो.त्यानंतर ज्या ज्या वेळी मी माझ्या आजोळी येत असे त्या त्या वेळी मी हे कपडे तर घेऊन यायचोच,त्या शिवाय लहान मुलाना खेळणी, शाळेत जाणार्‍याना गंमतीच्या गोष्टी असलेली पुस्तकं आणि वृद्धासाठी त्या वयात लागणारी नेहमीची औषधं आणून द्दायचो.अशा तर्‍हेने मी माझ्या अंतरदृष्टीचं आयोजन करायचो.

आतापावेतो दगडू चांगलाच शिकून मोठा झाला होता.मी त्याला विचारलं,
“तुझे वाडवडील ज्या तर्‍हेने राहायचे आणि आता तू शिक्षण घेऊन तुझी जी प्रगती केलीस त्यानंतर तू तुझ्या जीवनाकडे कसं पहातोस?”
त्यावर तो मला म्हणाला,
“जीवनाकडे मी अशा दृष्टीने पहातो की जे सतत पुनर्रचनेच्या प्रक्रियेत आहे.अशी पुनर्रचना की जीला नेहमीच बदलत्या दृश्यांची आणि परिस्थितीची जरूरी भासावी.पण त्यातून मी अशी आशा करतो की ती परिस्थिती जीवनातल्या येणार्‍या कठिण संबंधातून काही पोषक गोष्टी खेचून घेत असेल.जीवन हे मला अंत नसलेलं आव्हान आहे.असं आव्हान की ज्यावर निसर्गाचे आणि सामाजिक जीवनाचे दबाव लादलेले आहेत.मला असं अनुभवायला आवडेल की ते जगातलं आत्मीक जीवन आहे आणि जे दुनियादारी,हाव आणि संवेदनाशुन्यता ह्या ज्या माणसाच्या मोठ्यात मोठ्या गरजा आणि अभिलाषा आहेत त्यावर त्याचा मोठा दबाव असेल.
काही लोक त्या आत्मीक जीवनाला “निसर्ग” समजतात तर काही “देव” समजतात.”

दगडू महाराचं हे छोटसं भाष्य ऐकून मला इतका आनंद झाला की निदान ह्याच्या पिढीला नव्हेतर ह्याच्या नंतरच्या कुठच्याच महाराच्या पिढीला आमची ती कामं करावी लागणार नाहीत आणि मला जुने कपडेपण कुणाला द्दायला नकोत.त्याला दोन कारणं झाली.एक म्हणजे माझ्या मामानी गाईम्हशीना डेअरीत देऊन टाकून तो गाईम्हशीचा गोठा बंद करून टाकला आणि आता त्याना सेंट्रल डेअरीतून मुबलक दुध मिळायला लागल.आणि दुसरं कारण म्हणजे दगडू पासूनची आणि नंतरची पिढी हळू हळू सुशिक्षीत होऊन त्याना साजेशी कामं करायला लागली. तो त्याच्या पूर्वीच्या पिढीचा आशाळभूतपणा डोळ्यासमोर आल्यावर मला खूप दुःख होतं.पण ही नवीन सुधारणा पाहून मात्र अत्यानंद होतो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 24, 2008

गुरू शिवाय विद्दा कसली?

नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं.
यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती.
मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते. त्यांच्या घरी मी बरेच वेळा जातयेत असे.यशोधराचं आणि माझें दूरचं नातं होतं.रोहिणी त्यावेळी अगदीच लहान होती.मला इतक्या वर्षानी पाहून तिला तिची लहानपणाची आठवण आली.

तिचे वडील आता हयात नाहीत.ती ज्यावळी माझ्या बरोबर बोलायाला म्हणून रंगमंचावरून खाली आली.तेव्हा सहाजीकच तिच्या वडीलांचा विषय निघाला.जुन्या आठवणीना उजाळा आला.मला ती म्हणाली,
“काका तुम्ही माझ्या घरी नक्कीच या.मी इस्ट अंधेरीला गोल्डस्पॉटच्या फॅक्टरीच्या बाजूला उंच इमारत आहे त्या बिल्डिंगच्या एकदम वरच्या मजल्यावर राहते.जेवायलाच या.माझी आई पण तुम्हाला भेटेल.खूप वर्षानी तुम्हाला पाहून तिला खूपच आनंद होईल.”
मी तिचा पत्ता घेतला आणि विकएंडला तिच्या घरी गेलो.
यशोधरेला बघून मला आणि तिला खूपच आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा होई पर्यंत रोहिणीने चार पाच फोन करून घेतले.
रोहीणी मला म्हणाली,
” ह्या व्यवसायात पडल्यावर आपलं जग आपलं राहत नाही.सदाची मी बिझी असते.तुम्ही आज येणार म्हणून मी शक्यतो मला मोकळी ठेवली आहे.माझा सेक्रेटरी आता काय ते संभाळून घेईल.”
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायाची मला विषेश माहिती नाही.पण नृत्याबद्दल माहिती असावी असं मला नेहमी वाटायचं आणि त्याचं मला कुतुहल पण आहे.आणि तुझ्या इतक्या जवळच्या व्यक्तिशिवाय मला वर्णन करून कोण सांगणार?तेव्हा तू मला सगळं समजावून सांग.त्यातल्या खाचा आणि खळगे सुद्धा.

रोहिणी मला म्हणाली,
“माझ्या बाबांचेच उद्गार मी प्रथम तुम्हाला सांगते.
ते नेहमी म्हणायचे,
” आपण सर्व ह्या पृथ्वीवर थोड्याच काळासाठी आहो आणि त्या काळात आपण काहीतरी चांगलं करावं.ते पुढे म्हणायचे मला वाटतं ह्या वास्तविकेत पावित्र्य आहे ते असं की “चांगले व्हा” हेच सांगणं.हे उद्गार माझ्या वडीलानी निर्वतण्यापूर्वी काढले”
माझ्या जीवनात आणि माझ्या कलाकृतीत मला असं दिसून आलं आहे की सत्यनीष्टा आणि चांगुलपणा बरोबरीने असतात. माझी आई म्हणते,
“स्वतःशी प्रथम प्रामाणिक असावं”
माझ्या रियाज करण्याच्या स्टूडियोमधे वास्तविक राहण्याचा मी प्रयास करते.
माझा स्टुडियो ही मला एक पवित्र जागा आहे जिथे स्वतःचं व्यक्तित्व आणि स्वतःच्या भावना प्रदर्शीत करता येतात.जणू माऊंट एव्हरेस्टवर उभं राहून श्वास घेतल्या सारखं वाटतं. ह्या स्टुडियोतल्या उंचीवर एकजीव राहून काहीतरी उद्देश्यपूर्वक करीत असल्यासारखं वाटतं.
मी नर्तकी म्हणून आहे आणि नृत्य-परिक्ष्क म्हणून पण अनुभव घेतला आहे.दोनही पार्ट मला माहित झाले आहेत.नर्तकी नृत्य-प्ररिक्षकाला समर्पीत होते आणि नृत्य-परिक्षक नर्तकीला समर्पीत होतो.आम्ही निष्कारण तयार झालेले भावनांचे कटू थर उतरून ठवतो.
छुपीवृत्ति नाहिशी होते,आणि सत्यनिष्टा आणि नीश्छलता असलेलं आमचं बालवय उभारून येतं.अशा तर्‍हेने एकमेकात आत्मसमर्पीत झाल्यावर काहीही होऊं शकतं.

नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.
एकदा माझी एक नृत्य करणारी विद्दार्थिनी दिसायाला सुंदर आणि शरिरसौष्टव मोहक असलेली असतानाही तिला हावभाव प्रकट करता येत नव्हते.एकदा आम्ही नृत्याची रियाज करीत असताना तिचं पाच मिनीटांच सोलो नृत्य होतं.एकदा करून तिला श्वास लागला.मी तिला परत करायला सांगितलं.ती करण्यात मग्न झाली.ती तिच्याशी प्रामाणिक होती.सरते शेवटी तिने अत्युत्तम नृत्य केलं.

नर्तक म्हणून आम्हाला आमचा सर्व अनुभव रंगमंचावर आणावा लागतो.आम्हाला किती फिरक्या घेता येतात किंवा किती उंच उड्डाण करता येतं,किती उंचीवर पायाची हालचाल करता येतं हे दाखवून प्रेक्षकाला रोमांचीत करायचं नसतं.सतत केलेल्या संवयीने बर्‍याच लोकाना ते करता येईल.आम्हाला आमच्या सत्यनिष्टेशी एकरूप व्हावं लागतं.त्याचा एक हिस्सा व्हावं लागतं. जेव्हा अभिनय वाखाणला जातो तेव्हा नुसते हातवारे मनात ठेवावे लागत नाहीत. तर अभिनयातून एक प्रकारची संवेदना येते,आणि ती संवेदना नृत्यकाराच्या प्रकटनातून येते.
रंगमंचावरच्या उत्तम अभिनयाने श्रोतेगणाना अशा पातळीवर न्यावं लागतं की ते त्यातून स्वतः बद्दल काही तरी शिकतील.हे आपल्या सर्वांसाठी आहे असं त्याना वाटावं.हे सर्व निपूणता प्राप्त करण्यासाठी आहे असं त्याना वाटावं.आणि सर्वांत जास्त ते सत्यनिष्टेशी संबंधीत आहे हे तर नक्कीच वाटावं.
माझी खात्री आहे की स्वतःहून चांगलं असणं म्हणजेच जसं माझे बाबा म्हणायचे, तसं आपण आपल्याशी सत्यनिष्ट असणं. “

नृत्य करणं दिसायला सहज सुलभ वाटतं.पण रोहिणीने जे समजावून सांगितलं ते ऐकून माझ्या मनात आलं की गाण्याबरोबर हातवारे करणं इकडून तिकडे उड्या मारणं हे करत असताना आणखी ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याची माझ्या सारख्या सर्व साधारण माणसाला कल्पना पण करता आली नसती.गुरू शिवाय कसली विद्दा हेच खरं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 22, 2008

“शब्दांवाचून कळले सारे”

मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता.
मी म्हणालो,
“तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय.”
त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले,
“नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत ते त्याने लांबून पाहिलंय.त्याना तो चांगलाच ओळखतो.भाऊसाहेब पण त्याच्यावर खूप प्रेम करतात.प्रोफेसर जेव्हा जवळ आले तेव्हा तो जास्तच चूळबूळ करू लागला.भाऊसाहेब जवळ आल्यावर म्हणाले,
“ह्या मोत्याच्या मागे गंमतीदार इतिहास आहे.सांगा हो ह्याना जे तुम्ही मला सांगितलंत ते ह्या मोत्या बाबत.”
पडत्या फळाची आज्ञा घ्यावी तसंच भाऊसाहेबांच्या विनंतीला मान देऊन ते गृहस्थ सांगू लागले,

“तो ज्या तर्‍हेने आपलं जीवन जगतो ते मी मानतो. आणि त्याच्या सारखं आपण जगावं असा माझ्या मी प्रयत्न करतो. त्याच्या सुखाची पातळी पाहून त्या पातळीवर येण्याचा मी प्रयास करतो.जसं तो जेव्हा जेव्हा त्याच्या प्रत्येक जेवणाकडे किती प्रशंसाकरून आणि संतुष्ट होवून पहातो अगदी तसं. जसं मी फ्रिझमधून प्रत्येक खाणाच्या वस्तु पाहून हे खाऊ का ते खाऊ असा विचार करताना आणि अमुक अमुक वस्तु खायला नाही हे पाहून थोडा नाखूष होतो,तसाच तो जमिनीवर गोल गोल फिरून उत्तेजीत होऊन तेच तेच जेवण तेव्हडाच वाटा आणि तेच नेहमीच्या वेळी रोज मिळणार म्हणून अपेक्षीत असतो.
तो वर्तमानात रहातो हे मी मानतो.
ज्यावेळी माझा दिवस तणावाने भरलेला,गर्दीच्या प्रवासाने कंटाळवाणा झालेला,अगणीत अंतिम निर्णयाने अपेक्षीत झालेला असतो त्यावेळी मी घरात एकटाच असलेल्या मोत्याची आठवण काढतो.त्याचा दिवस कंटाळवाणा आणि थकलेला असावा पण मी घरी आल्यावर तो ह्या सर्व बाबी विसरून माझ्याशी एकरूप होतो.कुणी कुठच्याही जातीचा,धर्माचा आणि कसाही दिसणारा असेना सगळ्याशी मोत्या समान भावनेने वागतो.त्याला कसलाच फरक दिसत नाही.तो कधीच पुर्व-ग्रहीत नसतो.
मोत्या माझ्या घरी येण्यापूर्वी मी रसत्यावरून जाताना कुणाशीही बोलत नसायचो ना कुणाकडे बघत बसायचो,किंवा कुणाशिही ओळख व्हावी याचाही विचार करायचो.मोत्याबरोबर रसत्यावरून जाताना ह्या सगळ्या गोष्टीत आता माझ्यात बदल झाला.आता कुणी माझ्याशी हंसल्यास मी पण हंसतो आणि मोत्या शेपटी हलवीत एखाद्दाकडे थांबला तर मी पण त्याना हलो करून त्याच्या बरोबर थांबतो.

पूर्वी माझ्याकडे कुत्रा नव्हता.एका माझ्या मित्राने माझ्यावर दबाव आणला माझं एकाकी जीवन पाहून त्याला त्याच्या जीवनाची आठवण येऊन तो प्रभावित झाला.आणि हा मोत्या मला त्याने दिला.रात्री रात्रीपर्यंत कामावर राहायचं,विकएंडचा एकटेपणा,किंवा एकदोन फोन ऐकून होय नाय बोलण्यापुरते संवाद करायचे. आणि फोनवर तरी कसली बोलणी? माझ्याबद्दल सारं आणि माझ्या जीवनात काय कमजास्त आहे ते.एकतर मी कामावर असायचो किंवा कामाबद्दल बोलायचो त्यामुळे मला कुणी मित्र वेळ घालवायला बोलवायचेच नाही.
एका रविवारी मला एकाएकी लक्षात आलं,की कुणाशी ही सहजासहजी माझी मैत्री होण्याची चिन्ह कमीच आहेत पण जर का मीहून प्रयत्न केला तर होईल.आणि म्हणून मी मोत्याला माझ्या मित्राकडून आणलं.
एकाएकी जिथे माझ्यावर कुणी अवलंबून नसण्याची प्ररिस्थिती होती तित मोत्यामुळे बदल आला.माझ्या अंगावरचा स्वार्थीपणा पूरा धुऊन निघाला.

बाहेर घेऊन जा,जेवायला घाल,साफ कर.ह्यामुळे माझ्यावर कुणीतरी अवलंबून आहे हे मला आवडायला लागलं.त्याच्या जरूरती मी भागवायचो आणि तो माझ्या.
मोत्याची उत्कृष्ट ईमानदारी मी मानली.माझा दरवाज्याजवळचा हासभास त्याला माझं स्वागत करायला उत्तेजीत करायचं.
आता माझी पत्नी कामावरून परत आल्यावर मी तिचं स्वागत करायला मोत्याकदून शिकलो.”

त्याच हे सर्व वर्णन ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग आता तुमच्या पत्नीला ह्याच्या बरोबर राहायला जमेल का?”
मला म्हणाला,
“ती माझी पत्नी होण्यापूर्वी मी तिला हीच मोत्याची हकिकत सांगितली.आणि तिच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.लगेचच तिने मोत्याला जवळ घेऊन त्याला गोंजारायला लागली.”
असं म्हणून तो माझ्या प्रतिक्रियेची वाट पहात राहिला.
मी गुणगुणलो,
“शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले”
माझी ओळ संपता संपता तो म्हणाला,
“प्रथम तिने ऐकिले अन,मना सारखे घडले”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 20, 2008

प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते

आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचेसि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं.
ते म्हणाले,
“कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-हाय झाल्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत असताना,माझ्या लक्षात आलं की तो ड्राईव्हर साधारण साठएक वर्षाचा असावा.माझ्या मनात आलं की ह्या वयावरही त्या बिचार्‍याला हा साधा जॉबकरून मेहनत करायला किती कष्ट पडत असतील.नंतर चौकशी केल्यावर लक्षात आलं की तो पण एका मोठ्या कंपनीतून चीफ फायनॅन्स मॅनेजर होऊन रिटायर्ड झाला होता.आणि पुन्हा आपल्या अनुभवासाठी त्याला दुसर्‍या कंपन्या मिटिंगसाठी बोलवत राहयचे.तिच तिचमंडळी तेच तेच विषय याला तो कंटाळून त्याला ती कामं नकोशी झाली.आणि हा टॅक्सी चालवायचा जॉब त्याने घेतलाहोता.मी हे ऐकून थोडा स्तिमीतच झालो.मी असं का म्हणून विचारल्यावर मला म्हणाला,
“इतर जगाशी संबंध रहावा,निरनीराळे लोक भेटावे, आणि वेळ निघून जावा यासाठी टॅक्सी चालवण्याची त्याला कल्पना सुचली.जाता जाता त्याने मला फायनॅनशीयल बाबतीत एक उपयुक्त उपदेश पण दिला.मला वाटतं,प्रत्येक माणूस आदर सन्मानाला पात्र असतो.आणि प्रत्येकाकडून नवीन काही शिकायाला मिळतं.
त्यामुळे मी एक निर्धार केला होता की टॅक्सी ड्राईव्हर पासून साध्या चपराश्यापर्यंत त्यांच्या गोष्टी ऐकून घ्याव्या.आणि त्यामुळे प्रत्येकजण मला त्या जागी- मी कधी भेट दिली नसती अशा जागी- येण्याचा अवसर द्दायचा, किंवा मी स्वतःहून कधीच केली नसती अशी गोष्ट करायला मोका द्दायचा.
मी पाहिलंय की बरेचसे लोक माझ्याशी समजूतदारपणे वागतात.जेव्हा मी त्यांच्यात स्वारस्य दाखवतो आणि त्यांना सन्मानाने वागवतो तेव्हा.ते काय म्हणतात ते सारं ऐकून घेतो तेव्हा.सन्मान द्दायचा याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत झालं पाहिजे असं काही नाही.माझ्या कामातही शंका, गैरसमज,आणि चूका व्हायला वाव असायचाच.
प्रत्येक बाबतीत सभ्यता ठेऊन वागायचं आश्वासान देता जरी आलं नाही तरी मला आठवत नाही एखाद्दाच्या संस्थळावर जाऊन त्या लेखावर कटूप्रतिक्रिया देऊन झाल्यावर खरमरीत प्रतिसाद त्यावर आला नसावा. आणि कालांतराने मी अपमानजनक वागल्याचं आठवून मलाच अनुचीत आणि खराब वाटायचं.
काही लोकाना वाटतं ही संस्थळं माणसामाणसातला जीवंत संबंध विलग करतात.पण मला ते पटत नाही. प्रत्यक्षपणे ते एक दुवा ठेवण्याचं माध्यम आहे.
कधी कधी संस्थावळरच्या विचारांची देवाण-घेवाण चिडचीडी झाली की बरेच वेळा इमेलने किंवा फोन करून त्यातील सामुहीक संकेत थोडे विचारपूर्ण करून कटूता कमी करता येते.
निव्वळ शब्दाचं वाचन बरेच वेळा अनर्थाला आमंत्रण देतं.हे चांगलं लक्षात ठेवून राहणं ही संस्थळाच्या वाचनाची क्लुप्र्ती आहे.
संस्थाळावर असो किंवा प्रत्यक्षपणे असो मी ज्यावेळी नव्या लोकाशी परिचय करतो त्यावेळी मी जर का उघड मनाचा, आणि जिज्ञासू राहून वागलो तर मी नवीन गोष्टी नक्कीच शिकतो.
मला वाटतं,दुसर्‍या व्यक्तिला सन्मानाने वागवणं हे अत्यावश्यक आहे-वाटलं तर स्वार्थीपणाचं-म्हटलंत तरी चालेल.
भाऊसाहेबांच्या ह्या नवीन मित्राबरोबर चर्चा करण्यात माझा वेळ मात्र मजेत गेला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 17, 2008

घडता घडता घडेल ते घडेल

माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली. मला त्याने बसला उभ्या राहिलेल्यांच्या रांगेत हाताला ओढून माझ्या बरोबर चल म्हणून घेऊन गेला,तो एकदम त्याच्या स्टूडियोत.
निरनीराळे फोटोझ,फ्रिहॅन्ड स्केचीस,कार्टून्स,म्युझीयम मधे ठेवण्यालायक काही आडव्या फोटो फ्रेम्स,लॅन्डस्केप्स वगैरे बघून मला बरं वाटलं.
एका गिर्‍हाईकाला पटवून झाल्यावर माझ्या बरोबर गप्पा मारायला बसला.लंच टाईम असल्याने शेजारच्या हॉटेल मधून दोन प्लेट्सची ऑर्डर देऊन आला.जुन्या आठवणीना उधाण आलं.माझ्याकडून काही गोष्टी त्याने ऐकल्यावर मी म्हणालो,
“आता तुझा जीवन प्रवास कसा झाला तो सांग”
अरूण सांगू लागला,
“माझ्या पूर्वीच्या कथा ऐकशील तर तू तोंडात बोटच घालशिल.कुठे हा माझा फोटो स्टुडियो आणि कुठे मी सुरवातीला कित्येक वर्षापूर्वी प्रयत्न केलेली आणि असफल झालेली माझी खानावळ.
कोकणात काहीच नाही जमलं तर खानावळ घालण्याचा प्रयत्न अगदीच असफल होईल असं नाही.म्हणजे मी तो धंदा काही असातसा समजत नाही.पण अन्नछत्र उघडण्याचं एक पुण्यकर्म करतो हे वाटत असताना अगदी नव्याने प्रयोग करण्यात खूप काही भांडवलाची जरूरी भासत नाही.
असाच विचार करून मी वेंगुर्ल्या जवळ उभ्यादांड्यावर एक छोटीशी खानावळ उघडली.सुनील गांवसकरचं हे मुळगांव हे तुला माहित असेलच.चिं.त्र्य. खानोलकरची पण अशीच एक खानावळ होती.आणि त्या धंद्यात त्यांच लक्ष लागत नव्हत.पण पोट्यापाण्याची सोय म्हणून करीत होते.
खानोलकरांच उदाहरण देण्याचा मतितार्थ असा की कुठे खानवळीचा धंदा आणि कुठे शेवटी महान नाटककार कथाकार म्हणून नावाजायला येणं.माझं थोडंफार तसंच झालं.त्या अयशस्वी प्रयत्नातून पुढे जे.जे स्कूल ऑफ आर्टसमधे शिकून इथे आता हा स्टुडियोच्या धंद्यात गुरफटणं.”तरट्यात”काय लिहून ठेवलेलं असतं हे कळत नाही तेच बरं.
मी म्हणालो,
“तुझ्या त्या खानावळीचं काय झालं ते सांग”
अरूण म्हणाला,
“तेच सांगायचं आहे.सहा ताटं,तीन फूलपात्र असली तरी बारा लोकांची जेवायची सोय करायला कठीण वाटण्याचं काहीच कारण नाही.चहाचे कप,किंवा पितळेच्या वाट्या पाणी पिण्यासाठी,आणि केळीची पानं किंवा फणसाच्या पानाच्या पत्रावळी ताटं म्हणून वापारता येतात.एकदा एका मित्राच्या घरी पार्टी होती म्हणून चिकन तयार करण्यापूर्वी चिकन कापायला एकच सूरी होती तरी मी कात्री वापरून काम पार पाडलं होतं.मी तसा ह्या बाबतीत सुधारणावादी आहे.ही माझी वृत्ति उत्तेजन देणारी, साहसी,आव्हान देणारी आणि सृजनशील बनायला अवसर देते.
योजना आखून,निर्धारीत मार्ग पत्करून अडकून रहाण्यापेक्षा अशा तर्‍हेने काम करताना गंमतीदार गोष्टी घडायला मोका मिळतो.पदार्थ बनविण्याच्या सुची प्रमाणेच डीश बनवली पाहिजे असं नाही.मी नेहमीच एखाद्दा पदार्थात तूप आणि लसूण सुचीपेक्षा जास्तच वापरायचो.एकच दुष्परीणाम म्हणजे थोडं वजन वाढतं.

मी कुणाकडून खानावळ कशी चालवायची याचे धडे घेतले नव्हते.घडता घडता घडेल ते घडेल हीच वृत्ती ठेवली.खानावळ चालवण्याच्या स्वैर कल्पनेने मी भारावलो होतो.त्यात मी अपयशी होईन असं मला कदापी वाटलं नव्हतं.खानावळ चालू केल्यावर तसं होईल असा मला भासायला लागलं.पण त्याला उशिर झाला होता.
आणि अर्थात पैसे कमविण्याचा मुद्दा माझ्या यादीत अगदी शेवटचा होता.त्यामुळे काही तरी अद्भुत करून पाहाण्याकडे लक्ष केंद्रीत करायला मला स्वातंत्र्य मिळालं. कुठलीही गोष्ट कशी असावी ह्याचं माझ्याकडे कसलंच अनुमान नव्हतं.गाडा मी पुढे रेटीत गेलो आणि ना ना तर्‍हेच्या संभावनांचा शोध लावला,बरोबर खूप चूका पण केल्या.खरंच ह्यामुळे शिकायला मोठी संधी चालून आली.एखादी गोष्ट यशस्वी झालीच तर ठीक आहे. झालीच आहे.आणि नाहीच झाली तर मात्र मला का नाही झाली ह्याचा विचार करावा लागायचा आणि यशस्वी व्हायला नंतर कुठला दुसरा मार्ग हुडकून काढावा लागायचा.

चुका होतानाच शोध लागतात.कलिंगड खाताना चिमूट भर मीठ चोळ तेच कलिंगड किती गोड लागतं हे लक्षात येईल.विश्वास ठेव माझ्यावर.एकदा करून बघ.साखरेच्या चिमूटा ऐवजी मी चुकून मीठाची चिमूट कलिंगडाला लावली होती.
माझ्या खानावळीत वेटर म्हणून शिकलेली पोरं मी ठेवली नाहीत.ते इतकं मला महत्वाचं वाटलं नाही.जोपर्यंत गिर्‍हाईकाला काय हवंय हे ओळखणं,त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणं, आणि गिर्‍हाईकाचं समाधान होईल अशी त्याना ट्रिटमेंट देणं हे झाल्यावर वेटरला युनीफॉर्म असला पाहिजे ह्याची मी कधीच पर्वा केली नाही.त्यांचे कपडे स्वच्छ असले म्हणजे झालं.
खरं म्हणजे विचित्रताच प्रत्येकाला विपुलता आणते.

काही लोक मला म्हणाले खानावळीचा माझा धंदा अपयशी ठरला.का तर मला दिवाळखोरी करावी लागली.खरं तर मी एव्हडा धनवान-पैशाच्या दृष्टीने नव्हे- होतो की दुसरा एखादा यशस्वी खानावळवाला एव्हडं स्वपनातही आणू शकणार नाही.
माझ्या सुधारणावादावरच्या विश्वासाला माझी खानवळ बंद करून पुष्टी मिळाली.खानावळ सरळ बंद करून मी चालू पडलो.मी कसलेच प्लॅन केले नाहीत.मागे सगळं टाकून मुंबईला आलो.चित्रकला शिकलो आणि हा स्टुडियो घातला.
मला वाटतं कोणतीही गोष्ट करायला एकच मार्ग नसावा.जो मार्ग माझ्या कामाला येतो तो आता आहे तोच.पण हा उद्दा बदलू शकतो.”
अरूण ढवळ्याचं हे सर्व ऐकून त्याचं एक म्हणणं पटलं की “कुणाच्या तरट्यात काय लिहून ठेवलंय कुणाष्टाऊक”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 15, 2008

“किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!”

मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला. त्याच्या घराजवळ आणखी काही छोटी छोटी बंगलेवजा घरं होती.प्रत्येकाच्या घरामागे परसात असून भरपूर झाडी होती.त्यामुळे पालघर थोडं खेड तर थोडं शहर वाटायचं.
पावलुच्या घरी जाता जाता त्याचा सर्व आजूबाजूचा परिसर मला खूपच छान वाटला.
मी त्याला म्हणालो,
“आजूबाजूचं सृष्टीसौंदर्य बघून ते तसं ठेवल्या बद्दल लोकांच कौतूक करावसं वाटतं.”
त्यावर पावलु मला हंसून म्हणाला,
“ही जी पहाट तुला दिसते आहे त्याच्यापूर्वी रात्र होती.”
आणि पुढे थोडासा दम घेऊन म्हणाला,
“मी येण्यापूर्वी इथे खूपच बेशिस्त होती.जो तो आपलं घर मात्र साफ ठेवायचा आणि घरातला कचरा आपल्याच घराच्या समोर बाहेर फेकून द्दायचा.
आमच्या बाल्कनीत उभं राहून बिल्डिंगच्या सभोवती मी ज्यावेळी बघत असायचो त्यावेळी मला कसं मनात अगदी समाधान वाटत असायचं.आणि ज्यावेळेला मी माझी दृष्टी आणखी चारीबाजूला फिरवायचो तेव्हा असं दिसाचं की ज्याला आपण सर्व साधारण कचरा समजतो अशा वस्तू म्हणजे,फेकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या,रबराच्या वस्तू,जूनी वर्तमानपत्र,लाकडाचे तुकडे,जूने कपडे ह्या सर्व वस्तू कारण नसताना साठा करून घरी वाढवत असतो.आणि मग कधी तरी बाहेर फेकून देतो.प्रत्येक वस्तू कधी ना कधी उपयोगात येत असते,आणि त्याचा तसा उपयोग जर आपण करू शकलो तर? हे ह्या समजूतीचं कारण असावं.आणि म्हणून आपण त्याची सांठवण करून ठेवतो.वस्तू पुन्हा वापरात आणण्याच्या समजूतीवर मी जास्त भिस्त बाळगून होतो.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात लोक आपल्या मागच्या परड्यात किंवा समोरच्या अंगणात पडत असलेली झाडांची पानं,फुलं वगैरे घराच्या समोर ढिग करून ठेवतात मग म्युनिसीपालीटीची गाडी येऊन घेऊन जाईल ह्या इराद्दाने,तसं करतात.
माझ्या ह्या कचर्‍याबद्दलच्या-पुन्हा वापरात आणण्याच्या- समजूतीचा प्रेमाप्रित्यर्थ मी एक नवी योजना आखली.जे जे त्यांच्या घरासमोर पालापाचोळा टाकत असत त्या जागी लाकडाचे तळ नसलेले लांब लचक खोके तयार करून “ह्यात तुमचा पालापाचोळा टाका” अशी पाटी लिहून ठेवली.जसजसा त्यात कचरा वाढत चालला तसतसं मी त्यात पावसाळी गटारातलं पाणी शिंपडू लागलो.त्या साठी आणखी काही होतकरू कच्चेबच्चे मला मदत करण्यात उपयोगात आणले.आजू बाजूची गटारातली माती त्या पाल्यापचोळ्यावर टाकून त्याची उपयुक्त माती तयार करून जागोजागी सजावटी बाग तयार केली.रंगीबेरंगी रानटी फुलांच तो बगिचाच झाला.

टाकून दिलेली वस्तू पुन्हा वापरत आणणं ही गोष्ट मी क्षुल्लक ही समजत नाही किंवा विलक्षण ही समजत नाही.जो कचरा आपण तयार करतो तो बहुदा आपण अति गर्दीच्या जागी जिथे गरिब लोकांची वस्ति असते तेथे नेऊन टाकतो.
खरंच कुठचीच वस्तू फेकून देण्यालायाक नसते.थोडी मेहनत घेतली तर प्रत्येक वस्तू पुन्हा वापरात आणता येते. उदाहरणार्थ,आंघोळीचं पाणी बागेला वापरता येतं.फुलं,भाजी तयार करता येते.
मला वाटतं चूका आणि कमजोरी मधूनच काही तरी शिकायचं असतं.नक्कीच त्याचं परिवर्तन चांगल्या गोष्टीत होतं.

आमच्या पपीचंच घे.ह्या कुत्रीला मी ज्यावेळी न्याहाळून बघतो त्यावेळी ती माझ्या जीवनातली एक आनंददायी बाब म्हणून पहातो.पण खरं तर ही पपी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिली होती.अगदी लहान असलेल्या त्या पिल्लाला डोळे उघडायला सुद्धा येत नव्हते.ती आता झकास पपी झाली आहे.तिला पाहिल्यावर कसल्या संकटातून तिला जावं लागलं याची आठवण येऊन माझं मन खिन्न होतं.
कधी कधी वाटतं,होईन कदाचित मी पण एकदा असाच पुन्हा वापरण्या साठी उपयोगी.आणि माझ्यातलं गुप्त धन हूडकून काढायला कुणाचं तरी मन धजावेल. जसं मी पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रत्येक वस्तूकडे पहातो अगदी तसं.जसं त्या रानटीफुलांच्या छोट्या छोट्या बगिच्याकडे पाहून एखादा बाजूने जाणारा म्हणेल,
“किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!”

हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“खरंच,मी जर तुझ्या घरी प्रत्यक्ष पाहायला आलो नसतो तर नुसतं वर्णन करून समजून घेण्यासारखं हे प्रकरण नव्हतं. रिसायकलींग हा प्रकार मी ऐकला आहे.म्युनीसिपालीटी प्लास्टीक,रबर,लाकडाचे तुकडे जूने कपडे यांची विल्हेवाट लावेल पण पाल्या पाचोळ्याचा विनीयोग तू खरंच मोठया कल्पकतेने केलास म्हणूनच मी प्रथमच ज्यावळी हे फुलांचे ताटवे आणि बगीचे प्रत्येक घरसमोर पाहिले तेव्हा मनात म्हणालो कुणाची तरी मनापासून आणि तू म्हणतोस तशी प्रेमाप्रित्यर्थ केलेली मेहनत असायलाच हवी.”
पावलु फर्नांडीस मिश्कील हंसत म्हणाला,
“म्हणूच मी तुला पालघरला ये म्हणून मागे लागलो होतो.हे बघून तू ऍप्रिशीयेट करणार हे मला ठाऊक होतं.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 13, 2008

दयाशील आणि परोपकारी हृदय

नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं.
नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत झालं असावं ह्याची मला खात्री झाली.
ती मला म्हणाली,
माझ्या मुलामुळे माझा दृढविश्वास वाढला. निस्वार्थी होवून कुणालाही देण्यात मी विश्वास मानू लागले आहे.
आठ वर्षापूर्वी माझा मुलगा दिलीप हृदय विस्तारल्याने आजारी झाला होता.डॉक्टरी भाषेत सांगायचं झाल्यास- दुःखी आईला त्याचा अर्थ तेव्हडाच महत्वहीन म्हणा-”कार्डीओमायोपथी”.
बरेच महिने दिलीप लाईफ सपोर्टवर होता.आम्हावर- तो हळू हळू निष्प्रभ होत असताना- त्याच्या जवळ उभं राहून त्याला पहाण्याची एक प्रकारची सक्ति झाली होती.आणि त्याचवेळी त्याचे मित्र निरनीराळे खेळ खेळताना,आपआपल्या मित्रांबरोबर हातात हात घालून फिरताना,स्वतःच्याच बिछान्यावर झोपताना पाहून, माझ्या मुलाला मात्र हॉस्पिटलच्या बिछान्यावर झोपून जवळच हृदय चालू परिस्थितीत ठेवणार्‍या मशिनला जोडलेल्या परिस्थितीत मला पहावं लागत होतं.
आईच्या भुमिकेतून माझं रडून झाल्यावर,नंतरची प्रतिक्रिया म्हणजे क्रोध,आणि नंतर मी देवाकडे सौदा करण्याच्या प्रयत्नात.
“देवा! मी खूप आयुष्य भोगलं रे! पण त्याला अजून खूप काही करायचं आहे.”
तसंच माझ्या अवतिभोवती जे लोक जमले होते ते कुणाचं तरी हृदय मिळावं म्हणून प्रार्थना करित होते.पण माझा मलाच खूपच राग आला होता आणि मी थोडी चक्रावलीपण होते.कारण मला माहित होतं तसं घडायला हवं असेल तर कुणाच्या तरी बाळाला मरण प्राप्त व्हायला हवं.मग अशा परिस्थितीत त्यासाठी कुणी प्रार्थना करावी?

मला अजून चक्क आठवतं सकाळी आम्हाला फोन आला की एक हृदय मिळण्याजोगं आहे.जेव्हा आम्ही दिलीपच्या हॉस्पिटलच्या खोलीत असताना त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करताना पाहून कडूआनंदाचा खर्‍या अर्थाने अनुभव घेत होतो तेव्हा दिलीपचे वडील आणि मी नकळत सहमत झालो होतो, एकामुद्दावर. आणि तो मुद्दा म्हणजे अगदी त्या क्षणाला आम्ही त्याच्याजवळ एव्हडे उमेदीने आणि इतके प्रेमाने उभे असताना,अगदी त्याचवेळी दुसरं एखादं कुटूंब कुठेतरी कुणाला अलविदा म्हणत असणार.
आम्ही एकमेकाचा हात घट्ट हातात घेऊन रडलो. आम्ही त्या कुटूंबासाठी देवाची प्रार्थना केली,आणि निस्वार्थी राहून त्यांनी दिलेल्या ह्या भेटी बद्दल त्यांचे आभार मानले.
दहा दिवसानंतर दिलीपला बर्‍याच महिन्यानी घरी आलेला पाहून आम्ही विस्मयीत झालो आणि आमच्याच डोळ्यावर आमचा विश्वास बसेना.
हॉस्पिटलातच तो चवदा वर्षाचा झाला होता.आणि इतक्या कोवळ्या वयात त्याला पुनर्जन्म मिळाला होता.पुढल्या दोन वर्षात त्याला शाळेत जायला लागलं मित्रांबरोबर खेळायला मिळालं.त्याच्या बरोबर आम्हा सर्वांना हिंडायला मिळालं.
दिलीपने आपल्या करकरीत नव्या हृदयाचा उपयोग रोज देवाची प्रार्थना करण्यात,वयस्कर गरजूना मदत करण्यात आणि हंसण्यात खिदळण्यात केला.

दिलीपचं नवं हृदय तो सोळा वर्षाचा असताना बंद पडलं.दुर्दैवी घटना नक्कीच,पण आम्ही ह्या घटनेला अद्भुत चमत्कार म्हणून पाहू लागलो.कारण आम्हाला अमुल्य अशी दोन वर्ष त्याच्यासंगतीत राहायला मिळाली.आणि त्या दुसर्‍याने त्याच्या हृदयाची भेट दिली नसती तर हे शक्यच नव्हतं.

आमच्या जवळ दिलीपचे बरेच फोटो आहेत. त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत आणि अत्यंत संतोषजनक परिस्थितीची जाणीव आहे की तो त्याच्या आयुष्याच्या उत्तेजित घटना आणि प्रमुख टप्पे अनुभवू शकला.
जेव्हा तो गेला ते आम्हाला खूपच कठिण गेलं. परतफेड करण्याच्या दिलीपच्या वृत्तीची जाणीव लक्षात ठेवून त्याचे डोळे ज्या कुणाला जग पहायचं होतं त्याला दिले गेले.एखादा ज्याला आपल्याला प्रेम करणार्‍या कुटूंबाचे चेहरे पहाण्याची उत्सुकता असेल अशाला दिले गेले.
मला वाटतं एक-ना-एक दिवस मी असा चेहरा पाहीन की तो कुणाच्या मुलाचा किंवा मुलीचा असावा आणि ते दिलीपचे काळेभोर डोळे मला टवकारून पहातील-निस्वार्थी राहून दुसर्‍याला देण्याची साक्ष म्हणून.”
नंदाचं हे सगळं कथनाक ऐकून माझं डोकंच सून्न झालं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 11, 2008

“हलो” ह्या शब्दातली क्षमता.

आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले.
नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं.
नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं,
“हा माझा मित्र सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केली असून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं.”हलो” ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाहीतरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणारच मग तुम्हाला घेऊनच बोलूया.”
मला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
मी म्हणालो,
“सुरेश ऐकू या तर खरं तुझा काय अनुभव सांगतोस ते”
सुरेश सांगू लागला,
” मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वासाच्या मार्गात येतात.

मी जिथे काम करतो तिथे शेकडो लोक काम करतात.मी नक्की सांगू शकणार नाही की मी त्या सर्वांना ओळखतो म्हणून. पण बर्‍याच लोकाना ओळखतो हे नक्कीच. मला वाटतं बहुतेक सर्व मला ओळखत असावेत.आणि त्यामुळेच मी म्हणेन की हेच कारण आहे की मला जिथे वाटेल तिथे मी जाऊ शकतो कारण तसंच विश्व मी माझ्या भोवती केलं आहे. आणि ते एकदम साध्या सिधान्तावर आधारीत आहे.आणि तो सिधान्त असा की प्रत्येक स्वतंत्र व्यक्ति ओळख करून घेण्यास पात्र असते.
मी जेव्हा दहा वर्षाचा होतो आणि माझ्या आईच्या हातात हात घालून एकदा रसत्यावरून जात होतो. माझी आई करमरकरांशी बोलायला थांबली.माझं लक्ष दुसरीकडेच होतं.समोरच्या “स्टॉप” साईनच्या “ओ” कडे बघण्यात मी गर्क होतो.मी त्या गृहस्थाना पूर्वी पाहिलं होतं.म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.
“बरंय”असं त्यांना आईने सांगून झाल्यावर आम्ही पुढे निघाल्यावर मला आई जे म्हणाली ते अजून पर्यंत माझ्या डोक्यात बसलेलं आहे.
ती म्हणाली,
” आता जे केलंस ते शेवटचं समजून जा.कुणाशी ही मी थांबून बोलत असताना तू निदान तुझं तोंड उघडून थोडं तरी बोलायला हवं.कारण एखादं कुत्र्याचं पिल्लू ही तुला रसत्यात पाहून आपली शेपटी हलवतं.”
हे तिचं उदाहरण दिसायला अगदी साधं वाटतं.पण माझ्या दृष्टीने ते एक दिशा दाखवणारी पाटी आहे, आणि माझ्या “स्व” त्वाचा पाया आहे.
स्वतःला आरशात न्याहाळून आपण कोण आहे हे पहावं आणि आपलं आचरण काय आहे हे ही लक्षात आणावं.माझ्या लक्षात आलं की माझं आचरण दहा वयावरच मजबूत झालं होतं. मला दिसून आलं की जेव्हा मी कुणाशीही बोलत असतो तेव्हा ते पण माझ्याशी बोलतात.आणि त्यामुळे मला ही बरं वाटतं.
ही काही माझी नुसती समजूत नाही,तर ते एक माझ्या आयुष्यातलं वळण झालं आहे.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिला वाटत असतं की त्याचं तिथे असणं हे दुसर्‍याच्या लक्षात आलं पाहिजे.भले ती व्यक्ती कितीही नम्र वृत्तिची का असेना किंवा ती किती महत्वाची का असेना प्रत्येकाला तसं वाटत असतं.

कामावर असताना मी माझ्या बॉसच्या बॉसशी पण हलो करतो आणि कसं काय चालंय म्हणून विचारतो. आणि कॅन्टीन मधल्या लोकांशी पण बोलतो आणि चपर्‍याशी पण बोलतो त्यांची मुलंबाळं कशी आहेत म्हणून पण विचारतो.माझ्या कंपनीच्या डायरेक्टरशी असंच हलो-हाय करण्याच्या संवयीमुळे एकदा त्यांच्या बरोबर मिटिंग घेण्याचं धारिष्ट पण मला झालं.आम्ही दोघं खूप बोललो.एकदा तर मी त्यांना विचारलं, त्यांना काय वाटतं की ह्या कंपनीत मी किती वर्ष अजून राहू शकतो?त्यानी मला चक्क सांगितलं की तुला जितकी वर्ष राहयचं आहे तितकी वर्ष तू राहू शकतोस नव्हे तर माझी जागा मिळे पर्यंत राहू शकतोस.
आता मी ह्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे.पण माझी लोकांशी बोलण्याची संवय काही मी अव्हेरली नाही.मी अजून माझ्या आईचे ते शब्द आठवतो.
मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वाच्या मार्गात येतात.
तुम्हाला कसं वाटतं?”
असा शेवटी प्रश्न मला त्याने केला.
मी म्हणालो,
“खरंच साधं हलो म्हणून ओळख केल्यावर त्याचे दूरवर किती फायदे असतात हे तूं तुझ्या अनुभवातून छानच पटवून दिलं आहेस.इतका खोलवर विचार मी तरी केला नव्हता.”हलो” ह्या शब्दातली क्षमता मला समजली”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 9, 2008

कार्यरत राहिल्याने हिम्म्त येते.

स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं.
“तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?”
ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली,
“माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं. एकाएकी आमच्या सभोवतालचं सर्व विश्वच संभवतःच धोक्याचं झालं होतं.एका रात्रीत आमचं विश्व खेळाच्या मैदानाकडेही खतरनाक जागा आहे अशा दृष्टीने पाहू लागलं.
मला वाढताना माझ्यात बरेचसे प्रतिबंध अणि नियमावलीत बसून वाढावं लागलं.कारण तसं करणं हे माझ्या संरक्षणासाठी होतं असं गृहित धरलं जात होतं.मला एकटिला शाळेतून घरी येता येत नव्हतं.माझ्या मैत्रिणी मात्र बिनदास्त येत असायच्या.
मला शाळेच्या सहलीवर जाता येत नव्हतं.कारण मला काहीतरी झालं तर.?
जशी मी मोठी होत गेले तशी माझी ह्या भितीची यादी मोठी व्हायला लागली.दीर्घ आयुष्यासासाठी माझं सारं जीवनच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी केल्याच पाहिजेत अशा दोन समजूतीत वाटल्या गेल्या होत्या. मला माहित होतं की माझी आई मी सुरक्षीत रहावी म्हणून हे करीत होती.माझ्या भावाच्या जाण्यानंतर मी घरातली एकटीच होती म्हणून हे आई करीत होती ह्याची मला जाणीव होती.आणि मला काहीतरी झालं तर?असा तिच्या मनात प्रश्न यायचा.
त्यामुळेच आता मी स्वाभाविक चिंता करणारी झाली. मला कॅन्सर झाला तर,माझी पर्स हरवली तर,मी कुठच्या गाडी खाली आले तर,माझा जॉब गेला तर,म्हणजेच संकटं लहान मोठी, खरी, काल्पनीक आली तर?
गमंत म्हणजे ही गोष्ट माझ्या जीवनाकडे बघून तुमच्या मुळीच लक्षात येणार नाही.कारण जी गोष्ट मला चिंतेत टाकते किंवा ज्या गोष्टीमुळे मी भितीग्रस्त होते त्याच गोष्टी करण्यात माझ्यावर मी जोर करते.
खरं तर मी माझाच एक नियम बनवला आहे.जर एखादी गोष्ट मला भितीग्रस्त करीत असेल तर मी एकदा करून बघते.माझ्या आईने काळजी केल्या असत्या अशा मी बर्‍याच गोष्टी केल्या आहेत.
आणखी एका गोष्टी बद्दल मी सहसा बोलत नाही.तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे.मी चवदा वर्षाची असताना माझी आई गेली.तिला गाडी खाली अपघात झाला.माझ्या आईचं जाणं आणि माझ्या भावाचं त्या अगोदर जाणं ह्याने मला लटकच करून टाकलं असतं.पण मी माझी आई गेल्यावर एक निश्चय केला होता.एकतर मी उरलेल्या आयुष्यात “सुरक्षीत” रहाण्यात दक्ष राहावं नाहीतर साहसपूर्वक सामना करून संतुष्ट,उत्तेजीत,आणि होय, भयग्रस्त जीवन जगावं.
माझ्या आई बद्दल असं लिहून मी तिच्याशी प्रातारणा करते असं माझ्या मनाला खातं.पण तिच खरी माझ्या जीवनाचा मार्ग दाती होती.आणि सरते शेवटी माझी खात्री आहे की तिला माझा गर्वच वाटला असता.
हिम्मत ही काही माणसाची नैसर्गिक विशेषता नाही.मला वाटतं त्या हिम्मतीसाठी आपल्याला प्रयत्न करायाला हवेत.जणू स्नायु विकसीत करतो तसंच. जेव्हा जेव्हा म्हणून काही गोष्टी करताना मी भयभयीत होते,किंवा मला त्या गोष्टी बेचैन करतात त्यामधूनच माझ्या लक्षात येतं की मला जमणार नाही, ह्या माझ्या समजूती पेक्षा मी काही जास्त करू शकते ही समजूत जास्त महात्वाची वाटायची.
जरी मी माझ्या आईचा सतर्क रहाण्याचा स्वभाव आई कडून घेतला असला, तरी एक माझ्या लक्षात आलं की भय असणं ही खरीच चांगली गोष्ट आहे.जर का आपण तिच्याशी सामना करू शकलो तर?.आणि ह्यावर विश्वास ठेवल्याने माझं विश्व कमी भितीग्रस्त झालं आहे.
मी स्मिताला म्हणालो,
“तुझ्याकडून मी एक शिकलो की तुझ्या मनाला जे योग्य वाटलं ते करण्यासाठी भावनाशील न होता जास्र्त व्यवहारीक काय आहे ह्याच्याकडे तू जास्त लक्ष दिलंस,म्हणून आता तू तुझं विश्व कमी भितीग्रस्त करू शकलीस.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com