Friday, July 29, 2011

सोमवारांची विशिष्टता


“सोमवारचे दिवस तसं पाहिलं तर फाल्तु दिवस म्हटले पाहिजेत.”

दर वर्षी प्रत्येक कोजागीरी पौर्णिमेला आम्ही वसंताच्या घरी जात असतो.मला आठवतं ह्यावेळची कोजागीरी शनिवारी आली होती.त्यामुळे रविवाचा दिवस आराम करायला सापडला होता.
वसंता आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना कोजागीरी साजरी करायाला गेली कित्येक वर्ष आग्रहाने आमंत्रण देत आला आहे.

कोजागीरी दिवशी आम्ही सर्व थोडावेळ चांदण्यात मजा करायला जुहू चौपाटीवर जातो.पहाट होण्यापूर्वी वसंताच्या घरी येतो.आल्या आल्या वसंताकडे मसाले दुध आणि बरोबर काहीतरी खायला असतं.पहा्टेची वेळ, गप्पा गोष्टी आणि पत्ते खेळण्यात घालवतो.नंतर ज्याला झोप येईल तो आपलं अंथरूण धरतो.ह्या वेळी दुसरा दिवस रविवार असल्याने सर्व जण आरामात उठलो होतो.दुपारी चमचमीत जेवण होतं.मासे होतेच तसंच खाटकाचं खटखट्णं पण होतं.वसंताची आई सुकं मटण आणि कलेजी मस्त करते.

मग काय घुटूं आलंच.घेणारे जेवण्यापूर्वी मनसोक्त पितात.आदल्या दिवसाचं कोजागीरीचं रात्रीचं जागरण आणि रविवारचं खाणं आणि पिणं झाल्यावर निद्रादेवी काही पाठ सोडत नाही.जाग येईल तसे लोक उठून मग रविवारची रात्र येईपर्यंत आपआपल्या घरी जायला निघतात.दुसर्‍या दिवशी सोमवार येतो.कामावर गेलं पाहिजे.ह्यावेळच्या कोजागीरीला असंच झालं.

वसंता कोजागीरी कित्येक वर्ष करीत आला आहे.आणि आम्हीपण त्याच्याकडे नियमीतपणे जात येत राहिलो आहो.
सहाजीकच आता वय होत राहिल्यावर पूर्वी सारखं जमायला, शरीर साथ देत नाही.मला वाटतं,वसंताच्या चर्चेच्या विषयाचं तेच कारण असावं.सर्व जण निघून गेल्यावर वसंता माझ्याशी गप्पा मारीत बसला होता.

मला म्हणाला,
“सोमवार ह्या दिवसाबद्दल मला विशेष वाटतं.खरं म्हणजे सर्व सोमवार निरूपयोगी आहेत.आणि कामावर गेल्यावर तो सोमवारचा दिवस असा तसाच जातो.

मला वाटतं,आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या दिवशी भरपूर झोपा काढून झाल्यावर भरपूर काम करायला लावणारा नंतरचा दिवस म्हणजे सोमवार. ह्या दिवशी काही लोक लंच टाईमच्या वेळी सुद्धा झोपा काढीत असतात.

मला नेहमीच वाटतं की,सोमवारचे दिवस हे नव्या आठवड्याच्या सुरवातीला तयारीत रहाण्यासाठीचे,त्या आठवड्याच्या इतर दिवसांची सुरवात म्हणूनचे दिवस असतात.पण तसं पाहिलं तर,सोमवार धरून, इतर सर्व दिवस तसेच असतात.

सर्व सोमवारचे दिवस हे साफसफाईसाठी राखून ठेवायला हवेत.ते साफसाफाईसाठी एव्हड्यासाठीच की आदल्या रविवारी बरीच मजा केली जाते.
पार्ट्या असतात.पार्ट्या आल्या म्हणजे,खाणं-पिणं आलं.केर कचरा आला.पिणं आल्याने काही यथेच्छ पिणार्‍यांना झोपेसाठी एक जादा दिवस असायला हवा.त्या दिवशी कुणी त्यांना कटकट केलेली आवडत नसते.

सोमवारचे दिवस तसं पाहिलं तर फाल्तु दिवस म्हटले पाहिजेत.कारण कामावर आल्यावर बर्‍याच जणाना पहिला अर्धा दिवस चिडचिडेपणात जातो आणि निरर्थक वाटत असतो.
लोक चिडचिडे असतात एव्हड्यासाठीच की,आदल्या आठवड्याचे सरते दोन दिवस,शनिवार,रविवार,मजा करण्यात आणि झोपा काढण्यात घालवल्यानंतर,येतो तो सोमवार. शिवाय सगळं शरीर म्हणत असतं आणखी काही वेळ तरी अंथरूणात पडून रहावं.

सोमवारचे दिवस बोअरींग असतात आणि कामावर आल्या आल्या लक्ष केंद्रीत करायला जमत नाही.कारण ज्याला त्याला अंथरूणात थोडं तरी झोपायला हवं होतं असं वाटत असतं.आणखी थोडा वेळ घरच्या लोकांबरोबर घालवायला मिळाला असता तर बरं वाटलं असतं.

मला वाटत नाही,शनिवार,रविवार हे आदल्या आठवड्याचे सरते दोन दिवस गेल्यानंतर,पुढच्या आठवड्यात सोमवारपासून रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी पा्च म्हणजे आठ तासाचं हे वेळेचं कोष्टक कुणालाही मान्य व्हावं.कामावर लक्ष केंद्रीत व्ह्यायला,आणि डोक्यावर जेव्हडा म्हणून ताण जमत असतो तो उतरवण्यासाठी, घरी शांत जीवन जगायला मिळायला हवं.
मला वाटतं,सगळी गोळा बेरीज केल्यास आपले सोमवारचे दिवस आपल्यासाठीच असायला हवेत.”

वसंताचं हे सोमवार पुराण ऐकून झाल्यावर, दुसर्‍या दिवशी, सोमवारी सकाळी, कामावर जावं लागणार म्हणून वसंता वैतागला होता.हे कळायला मला वेळ लागला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 26, 2011

मज्जा.


“मला पण मजा करायला आवडतं.मला मौज-मस्ती करायला आवडतं.माझ्या कल्पनाविलासाला कुणी तरी गुदगुदल्या केल्या तर मला आवडतं.मला नेहमीच वाटतं की प्रत्येकाला काही करण्यात मजा येत असते.”

श्रीधर, मिलिटरीत उमेदवाराना ट्रेनिंग देण्याचं काम करतो.त्यासाठी त्याला देशाच्या निरनीराळ्या भागात जावं लागतं.त्याची बदली झाली की तिथे त्याला साधारण सहाएक महिने रहावं लागतं.ट्रेनिंग देणं,ते करून घेणं,त्यावर लेखी परिक्षा घेणं आणि नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं ही त्याची ठोस कामं असतात.बरेच वेळा सगळेच उमेदवार उत्तीर्ण होतात.
हे सर्व मला श्रीधरने मागे एकदा सांगीतलं होतं.

अलीकडेच, मी त्याल भेटलो त्यावेळी मला म्हणाला,
“वरचेवर बदल्या होत असल्याने,मुल होईपर्यंत, माझ्या सतत होणार्‍या बदल्यांबद्दल काही वाटलं नाही.पण किशोरच्या जन्मानंतर आणि तो शाळकरी झाल्यानंतर जरा समस्या यायला लागल्या.मिलिटरीची स्कूल्स पण चांगली असतात.काही वर्षं किशोर आमच्याबरोबर राहिला.नंतर त्याला त्याच्या काकाजवळ नाशिकला स्थिरकाळ ठेवला होता.आता तो शाळ संपवून कॉलेजमधे जाणार आहे.”

किशोरचं कॉलेज चालू होण्यापूर्वी त्याला घेऊन ही तिघं मंडळी युरोपला ट्रिपवर जाणार होती हे मला कळलं होतं.ती सर्व जाऊन आली असं कळल्यावर मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी कुलाब्याला गेलो होतो.श्रीधर आणि त्याची बायको घरी नव्हती.एकटाच किशोर होता.किशोर बापासारखाच गप्पीष्ट आहे.आई वडील येईपर्यंत तो मला युरोपच्या ट्रीपच्या गप्पा सांगण्यात गर्क झाला होता.युरोपमधे कुठे कुठे गेल्याचं
सांगीतल्यावर तिकडचे लोक मजा कशी करतात ते तो मला रंगवून सांगत होता.

“मुळात हे युरोपमधले सर्व देश सांपत्तिक परिस्थितीने चांगले आहेत.लोकवस्ती बेताचीच.कारण घरात मुलं जास्ती नाहीत.पैसे उरतात. उरलेल्या पैशात मजा करायची हेच त्यांचं मुख्य ध्येय.मात्र मजेसाठी सुट्टी घेण्यापूर्वी कामावर असताना मरमरेस्तोपर्यंत लोक कामं करतात.त्यामुळे देशाची सतत प्रगतीच होत असते.”
किशोर मला म्हणाला.

“तुला कुठल्यां गोष्टींची खास मजा वाटली ते तर सांग.”
मी किशोरला म्हणालो.
“तसं जाईन तिथे मजा होती.पण मला खास मजा वाटली ती फ्रान्समधे नॉरमॅन्डीला.तिथल्या एका खेळात मी भाग घेतला होता.”
किशोर मला सांगायला अगदी आतूर झाला होता.

पुढे म्हणाला,
“तिस मजल्यावरून खाली पडत आहो अशी कल्पना करा.वारा तुमच्यावरून आणि खालून तुम्हाला चापकाचे फटके देत आहे आणि भेडसावून टाकीत आहे.तुम्ही किंचाळता, तेव्हडंच तुमच्या कानावर पडत आहे.आणि तुम्ही सतत खाली कोसळत आहात.तुमची खाली कोसळण्याची क्रिया शंभर वर्षं तरी टिकणार आहे असं तुम्हाला वाटत असतं.ह्या कोसळण्याच्या तणावामुळे तुमच्या मेंदूत, तयार झालेल्या केमिकल्समुळे, एका मागून एक स्पंदनं निर्माण होत आहेत.तोंडावर घामाच्या धारा वहात आहेत.तुमचं हृदय ढोल पिटल्यासारखा आवाज करीत आहे.मेलेल्या बेडकासारखे तुमचे हात आणि पाय पसरले आहेत. जवळ येत राहिलेली जमीन, तुमच्या शरीराचा चक्काचूर होणार आहे म्हणून तुम्हाला धोक्याची खूण देत आहे.खाली खाली येणं जरा मंद झालं आहे.अगदी दहा फुटावर येऊन लागलीच तुम्ही बंदूकीच्या गोळी सारखे उंच हवेत प्रवेश करता.अशी ही आवर्तनं होत राहून शेवटी जमीनीपासून शंभर फुटावर येऊन तुम्ही पूर्णपणे थांबता.ह्यालाच बंजी जम्पींग म्हणतात.ह्यालाच मज्जा म्हणतात.
ही मजा मला फारच आवडली.”

मी किशोरला म्हणालो,
“मला पण मजा करायला आवडतं.मला मौज-मस्ती करायला आवडतं.माझ्या कल्पनाविलासाला कुणी तरी गुदगुदल्या केल्या तर मला आवडतं.मला नेहमीच वाटतं की प्रत्येकाला काही करण्यात मजा येत असते. नुसतं पुस्तक वाचन असो,चित्र काढणं असो.शेवटी मजा म्हणजे तरी काय?”
मी किशोरला प्रश्न केला.

तो म्हणाला,
“समजा मला क्रिकेट खेळण्यात मजा येत असेल, तर कुणाला शॉपींग करण्यात मजा येत असेल.शेवटी आपल्याला कशात स्वारस्य आहे ह्यावर मजा अवलंबून आहे.आणि ते सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.मजा करताना माझ्या मेंदूत केमिकल्सचा ओघ निर्माण होतो ते मला आवडतं,कुणाला बुद्धिबळ खेळण्यात मजा येत असेल तर कुणाला कंप्युटरवर खेळ खेळायला मजा येत असेल.

मजा म्हणजेच भ्यायला वाटून घेणं,जसं बंजी-जम्प करताना वाटतं तसं.किंवा आराम मिळणार्‍या स्वातंत्र्यात मौज आणणं.मला आठवतं,क्रिकेट खेळायला प्रथमच मी बॅट हातात घेतली तेव्हा माझ्या नसानसातून मजा वहात आहे असं मला वाटलं होतं.पण ते फक्त मलाच वाटलं.”
“मज्जा म्हणजे काय वाटतं तुम्हाला?”
किशोरने मला प्रश्न केला.

मी किशोरला म्हणालो,
“मजा कशाला म्हणावं? हे कळल्यानंतर मजा म्हणजे काय ते कुणालाही सांगता येईल.
ज्याला जे आवडतं तेच करायला मुख्य कारण होतं ती मजा.मजा मनात प्रसन्नता निर्माण करते.प्रसन्नतेने सुख निर्माण होतं.सुखावल्याने मेंदूला संदेश दिला जातो,
“खरंच,कधीतरी हेच मला पुन्हा करायला हवं.”
मजा असते तेव्हा जीवन कारणास्तव असतं.मजा नसेल तर कुणीही दुःखाच्या आणि नाराजीच्या समुद्रात हरवलेल्या शंखासारखा असतो.मजा नाही तर मुद्दा नाही,हेतू नाही.मजेशिवाय जीवनाचा खरा अर्थ न समजण्यासारखं आहे.मजा म्हणजेच सुखावलेल्या भावना,सनसनाटी आणि अर्थात मजेची जाणीव.
म्हणूनच तू म्हणतोस तसं तिकडचे लोक मजा करण्यात स्वारस्य घेतात.त्यासाठी काही लोक नवे नवे खेळ तयार करतात.काही ठिकाणी शिकार करण्यात मजा येते.हा पण मजेचा एक खेळ असतो.पण हा जरा श्रीमंती खेळ आहे.आणि काहीसा निष्टूर असा खेळ आहे.काही युरोपीयन देशात कोल्हे आणि लांडगे ह्यांची पैदास वाढली की त्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून आणि मजा म्हणून त्या मुक्या प्राण्य़ांची शिकार करण्याचा खेळ खेळतात.हा मला वाटतं मजेचा निघृण प्रकार आहे.पण ते शिकार करण्यात मजा वाटणारे लोक म्हणतील,
“तुम्हाला त्यात मजा वाटत नसेल तर आम्हाला पर्वा नाही.आम्हाला मजा वाटते.”
ह्या म्हणण्यात त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही.”

किशोर म्हणाला,
“शिकारीवरून मला आठवतं.मी कुठेतरी वाचलंय,
जेव्हा कुणी स्वारस्य घेऊन काही गोष्ट करतो तेव्हा मजा आलेली असते.सनसनाटी करायला अंगात जेव्हा जोश येतो त्यावेळी त्यांना आनंद होतो आणि मजेची जाणीव होते.माणसं जेव्हा गुहेत रहायची तेव्हापासून त्यांना मजा काय ते माहित झालं असावं.प्रथम शिकार करताना माणसाला मजेची जाणीव झाली असणार. मला एखादी समस्या सोडवायची असली तरी मजा येते.आता हे तुम्हाला मी सांगतोय तेव्हाही मला मजा येते.मनात राग आला असताना किंवा मन निराश झालं असताना,काही आवडेल असं केलं तरी मजा येते.

“मजा कुठे असते त्याबद्दल मी तुला माझा विचार सांगतो.”
मी किशोरला सांगत होतो.
“मेंदुच्या आत आणि बाहेर मजा असते.मेंदुला आव्हान द्यायला लोकाना मजा येते.एखाद्या गोष्टीत स्वारस्य असलं आणि ती समस्या सोडवायची पाळी आली की ती मजा म्हणून स्विकारली की आनंद होतो.मजा मेंदुच्या बाहेरपण असू शकते.मग ते क्रिकेट खेळण्यासाठी मैदानवर गेल्यामुळे असो,किंवा घरातल्या कोचावर बसून व्हिडियो गेम खेळण्यातली असो.मजा टिव्हीमधली असो नाहीतर बाहेर मैदानात फुटबॉल खेळण्यात असो.मजा अवती-भोवतीअसते. सर्व ठिकाणी असते.काहीना मजेपासून सुटकार मिळत नाही. आपण सृजनशील असल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं रुपांतर मजेमधे करू शकतो.”

मजा कशी असते?
मजाही मजेसारखी असते.मजा म्हणजे आनंद वाटणं.मजा म्हणजे सहानुभुतीयुक्त वाटणं आणि स्नेह असण्याचा भाव मनात येणं.मजा सहजपणे निर्माण करता येते.मात्र कुणावर लादता येत नाही.ह्यात मजा आहे की नाही हे माझ्या मीच ठरवलं पाहिजे.मजा म्हणजे सुख,कुतूहल.मजा वाटल्याशिवाय कोण एखाद्या गोष्टीकडे आकर्षिला जाणार नाही.लोकांच्या समुहात असताना,समुहात असण्याचा आनंद वाटावा हीच मजा. क्रिकेट खेळताना,फुटबॉल खेळताना,हॉकी खेळताना, नाचताना मनात खळबळ माजली की ती मजा समजावी. मला एखाद्या गोष्टीत मजा वाटायला लागली असताना दुसरा त्या गोष्टीचा कसा विचार करतो ह्याची मला पर्वा वाटत नाही.”

“बंजी-जम्पबद्दल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे.”
किशोरला ह्या जम्पची त्याच्या मनावर चांगलीच छाप बसली होती.म्हणून तो सांगत होता,
“म्हणून जेव्हा तुम्ही तिस मजल्यावरून बंजी-जम्प घेता त्यावेळी तुम्हाला माहित असतं की तुम्ही मरणार नाही,तुमचा चक्काचूर होणार नाही, तुमच्या अंगातलं रक्त इतस्ततः फेकलं जाणार नाही. तुम्ही वाचणार आहात.त्यानंतर तुम्ही सुखाने जगणार आहात.तुम्हाला तिसाव्या मजल्यावर सुरक्षीतपणे खेचून आणलं जाणार आहे.आणि लिफ्टमधून तुम्हाला तळमजल्यावर आणलं जाणार आहे.तेसुद्धा धडधाकट परिस्थितीत. तुमच्या अंगातले स्त्राव तुमच्या अंगातच असणार आहेत. तुमचं हृदय हळूवारपणे शांत होणार आहे.तुम्ही बंजी-जम्प घेतली ती इतराना मुर्खासारखं केलं असं वाटणार असेल.पण तुम्ही मात्र कारणास्तवच केलं आहे-एकच कारण मजेसाठी.”

तेव्हड्यात बेल वाजली.किशोरचे दोन मित्र त्याला भेटायला आले होते.मी उठता उठता किशोरला म्हणालो,
“तू,तुझ्या ह्या मित्रांना बंजी-जम्पबद्दल जरूर सांग.त्यांनाही ऐकायला मजा येईल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 23, 2011

तुमचं वय तेव्हडं आहे जे त्यावेळी तुम्हाला वाटतं.



“नेहमीच्या जीवनात मी ऐकत आले आहे की,
“वयानुसार वाग”
पण मला म्हणायचं आहे,
“का म्हणून”?”

काल रेखाच्या आजीचा जन्म-दिवस होता म्हणून तिला शुभेच्छा द्यायला रेखाच्या घरी गेलो होतो.दरवाजा आजीनेच उघडला.लगेचच नतमस्तक होऊन तिला पाया पडलो.रेखाच्या आजीने काल एकाऐंशी वर्षात पदार्पण केलं.हे घेण्यासारखं आहे.एव्हडं वय होऊन आजी एकदम फिट्ट होती.दरवाजा उघडायला आली. गुढघे दुखत नव्हते,डोळ्याला चष्मा नव्हता,हातात काठी घेऊनपण फिरत नसायची.एखाद्याच्याच नशीबात असं जीवन जगायला मिळतं.

रेखा ज्यावेळी मला चहा आणि शिरा घेऊन माझ्याजवळ गप्पा मारायला बसली तेव्हा मी तिच्या आजीबद्दलचं माझं हे अवलोकन तिला सांगीतलं.
“तू पण तुझं वय झाल्यावर तुझ्या आजी सारखी प्रकृती ठेव.”
मी रेखाला म्हणालो.
माझं हे ऐकून जरा गालातल्या गालात हसत रेखा मला म्हणाली,
“माझी आजी माझा वारसा आहे.आजी हेच माझं लक्ष आहे.ते कसं ते मी तुम्हाला सांगते.
वय तुमचं पंचाऐंशी झाल्यावर तुम्ही कुठे असाल ह्याचा जरा विचार करा.एखाद्या वृद्धाश्रमात व्हीलचेअरवर बसून नाकपुड्यात ऑक्सिजनच्या नळ्या घालून,नाकावरचा चष्मा नाकावरून खाली सरकत आहे,कानात श्रवण यंत्र असून त्याची बॅट्री संपूष्टात आली आहे,मरून एक आठवडा झाला असावा अशी तुमच्या अंगाला दुर्गंधी येत आहे.
नाही.मी तशी नसणार.

माझं आत्ताचं वय फक्त सत्तावीस आहे.पण मी ह्याबद्दल नेहमीच विचार करीत असते.आणि मनात म्हणते,
“तुमचं वय तेव्हडं आहे जे त्यावेळी तुम्हाला वाटतं.”
असं मनात वाटून आणि त्याप्रमाणे वागून तुम्ही स्वतःला सशक्त आणि तरूण ठेवू शकता.

त्याचं कारण सांगते.मी ज्यावेळी अठरा वर्षाची होते तेव्हा माझ्या मावशीबरोबर एका स्मृतीभ्रष्ट झालेल्या रुग्णांच्या आश्रमात गेले होते.माझी मावशी गेली कित्येक वर्षे ह्या आश्रमात सेवा करते.मी माझ्या मावशीला म्हणाले की,
“मी एक महिनातरी तुझ्याबरोबर ह्या ठिकाणी येत जाईन”
माझ्या मावशीला हे ऐकून आश्चर्य वाटलं.पण मी तिला माझं कारण समजावून सांगीतलं.

साठ वर्षापासून शंभर वर्षापर्यंतच्या आश्रमातल्या रुग्णांची सेवा करण्याचं मी ठरवलं होतं.माझ्या एक गोष्ट निक्षून लक्षात आली की ह्या बिचार्‍या सर्व रुग्णांना पहिला फटका बसतो तो त्यांचा संयतपणा जातो, त्यांचं नियंत्रण जातं.ते सर्व शाळकरी मुलांसारखे वागतात.त्यांना जगात काय चालंय ह्याची कदरच नसते.दुसर्‍या गोष्टीने माझं ध्यान वेधून घेतलं ते म्हणजे,ते सदासुखी दिसतात. जगात काय चाललंय ह्याकडे त्यांचं ध्यानच नसतं.

नंतर मी जशी मोठी होत गेले तसं ह्याच रुग्णांचा विचार करायची.अर्थात असा भयानक रोग मला व्हावा असं मी कधीच मनात आणलं नाही म्हणा.परंतु,त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटायला लागलं. आपल्यावर कसलंच नियंत्रण असू नये.मला ठाऊक होतं की आपल्यात चांगला निर्धार असला पाहिजे.पण त्याच वेळी येणारा रोजचा दिवस परिपूर्ण जगला पाहिजे.जे काही डोळ्यांना दिसतं त्याची दाद दिली गेली पाहिजे.लहान गोष्टीसुद्धा अध्याह्र्त धरून चालता येणार नाही.कारण उद्या त्या असतीलच असं नाही.आपणही उद्या असू असं नाही.

माझ्या मुलींना मी गावाला घेऊन गेले की घरातल्या अंगणात मी त्यांच्या बरोबर माती थापून खेळते.मी लहानच आहे असं समजून वागते.
पायांच्या बोटात माती गेली तरी मला चालते. तोंड दुखेपर्यंत मी हसते.जेवणापूर्वी मला आईसक्रीम खायाला आवडतं.किंवा कधी कधी जेवण म्हणून मला आईसक्रीम चालतं.
नेहमीच्या जीवनात मी ऐकत आले आहे की,
“वयानुसार वाग”
पण मला म्हणायचं आहे,
“का म्हणून”?

माझी ऐंशी वर्षाची आजी दर गुरवारी देवळात किर्तन ऐकायला जाते.किर्तनकार बुवांबरोबर गाते पण.दिसते मात्र जणू पासष्ट वर्षाचीच आहे.इतकं तरूण दिसण्याचं गुपीत काय म्हणून विचारलं तर सांगते,
“साठवर्षावर एकही दिवस मला झाला आहे असं मी मानीत नाही”

मला असं माझ्या आजीसारखं रहायचं आहे.माझ्या मुलींनापण मला हेच शिकवायचं आहे.रोजच्या कटकटीने आणि तणावाने तुम्हाला उदास वाटायला लागतं.उदास वाटण्यातून संताप आणि द्वेष निर्माण होतो.नंतर द्वेष आगीसारखा फैलावतो. उलटपक्षी हसावं आणि जग तुमच्याबरोबर हसतं.ह्यापेक्षा आणखी सत्य नसावं.

मला आठवतं,लहानपणी आम्ही काश्मिरला गेलो होतो.थंडीचे दिवस होते.बर्फ पहायचं आणि बर्फात खेळायचं ह्या उद्देशानेच थंडीच्या दिवसात गेलो होतो.त्यातला एक खेळ मला आठवतो .बर्फाचे गोळे करायचे आणि ते गोळे बर्फात घरंगळत नेल्यावर गोळे आकाराने मोठे होत जायचे.त्यालाच
स्नो-बॉल-इफेक्ट म्हणतात.माणसातला चांगूलपणा आणि दयाळूपणा हा बर्फाच्या गोळ्यासारखाच असतो. तसाच तो वाढत जातो.

तसंच,जितकं तरूण वाटावं तितकं रोज वाटून राहिल्यास बर्फाच्या गोळ्यासारखं वाटत रहाणार.माझ्या मित्र-मैत्रीणी मला नेहमीच सांगतात,
“तू आमच्यात असलीस की मजा येते.”
ज्या गोष्टीत गंमत असते ते पाहून हसून खेळून मी रहाते. माझ्या वयासारखंच का मला रहायला हवं? कंटाळवाणी जीवन जगायला जीवन पुरवतीला येत नाही.म्हणून ह्यापुढेही जीवनातला हरएक दिवस परिपूर्णत्वेने रहाते.काळजी नकरता प्रत्येक दिवस मजेने घालवते.

जीवनातले दिवस जस जसे जात रहातील तस तसे मी फुलपाखरांच्या मागे धावणार,भिरमुटे पकडणार, पुस्तकातली चित्रं रंगवणार,आणि माझ्या नवर्‍याबरोबर कालच लग्न झालं आहे असं वागणार.मला जेव्हडं वय वाटतं तेव्हडंच मी वाटून घेणार.मी अठरा वर्षाचीच आहे असं मला वाटतं.”

“विचाराने तरी आजीची नात शोभतेस.प्रत्यक्ष आजीच्या वयावर आल्यावर आम्ही कुठे तुला पहायला असणार?”
माझ्या हातातला रिकामा कप देत रेखाला मी म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 20, 2011

जयंत आणि जुगार.



“जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच हरतो.जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच जिंकतो.जीवनात मी नेहमीच जुगार खेळतो.”

एक दिवस मी रिधम-हाऊसकडून फुटपाथ घेत उत्तरेच्या दिशेने फाऊन्टकडे चालत जात होतो.सेन्ट्रल बॅन्केच्या हेडऑफीसकडून पुढे पुढे जात जात क्रॉस-मैदानाच्या पूर्वेकडच्या फुटपाथवरून चालत जात असताना पारसी जिमखान्याच्या क्लबच्या बिल्डिन्गमधून जयंतला बाहेर येताना पाहिलं.ह्या भागात बरेचसे क्लब्स आहेत.प्रतिष्टीत लोक,श्रीमंत लोक आणि नट-नट्या टाईमपास करायला ह्या क्लबात येतात हे मला माहित होतं.पण जयंतला पाहून मला जरा आश्चर्य वाटलं.जयंत तसा घरचा श्रीमंत आहे.कोकणात त्याची वडीलोपार्जीत शेती आहे,बागायती आहे.आणि त्याशिवाय नारळ, सुपारीचा आणि आंब्याच्या सिझनमधे आंब्याचा, व्यापार जोरात चालतो.क्रॉफर्ड मार्केट जवळ त्याचं ऑफिस आहे.

जयंतने वय झालं तरी लग्न काही केलं नाही.एकटा जीव सदाशीव हे जीवन बरं वाटतं असं मला नेहमीच म्हणतो. त्याला पारसी क्लबमधून बाहेर पडताना पाहून माझ्या मनात चटकन विचार आला की,सडेफटीन्ग आयुष्य असल्यानंतर आणि दाढे खाली मांस असल्यावर अशा तर्‍हेचं जीवन जगायला काहीच वाटत नसावं. तसं जयंताचं जीवन गुलहौशी आहे हे मला पूर्वेच माहित होतं.पण पारसी क्लबमधून बाहेर पडताना मी त्याला योगायोगानेच प्रथम पाहिलं.

मला त्याने पाहिलं नव्हतं.आपल्या गाडीत बसण्यासाठी तो भरभर चालत असताना पाहून माझं एक मन म्हणालं जाऊ देत त्याला.पण मनात दुसरा विचार आला आणि मी त्याला हाक मारली.मागे वळून पाहून माझ्यासाठी जयंत गाडीचा दरवाजा उघडून थांबला.

“का रे?आज तुझा ड्रॉईव्हर नाही.तुच गाडी चालवतोस?”
त्याच्या जवळ आल्यावर मी त्याला प्रश्न केला.

“हो मी क्लबात खेळायला आलो की स्वतःच गाडी घेऊन येतो.”
मला त्याने उत्तर दिलं.आणि वर म्हणाला,
“चल बस, बरेच दिवसानी भेटला आहेस.माझ्या ऑफीसमधे जाऊया.चहाच्या कपावर गप्पा मारूया.तुला वेळ असल्यास आणि तुला हरकत नसल्यास.”
जयंत बराचसा औपचारीक झालेला दिसला.आणि मलाही कुणाचा आग्रह मोडण्याची सवय नसल्याने मी गाडीचा दरवाजा उघडून त्याच्या बाजूला जाऊन बसलो.

गाडी चालवीत असताना,आपणच विषय काढून मला म्हणाला,
“मला पारसी क्लबातून बाहेर येताना तू पाहिलं असणार. क्लबात आल्यावर लोकांची ओळख होते. बिझीनेसच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं.”
ह्यावर मला काहीतरी म्हणायचं होतं.तेव्हड्यात त्याचं ऑफीस आलं.
गाडी पार्क करायला गुरख्याकडे चावी देऊन मला एलिव्हेटरमधून वर त्याच्या ऑफीसात घेऊन गेला.
मुंबईत बारा महिने तेरा काळ उकाड्याचं थैमान असतं.त्याच्या एअर-कंडीशन्ड कॅबिनमधे गेल्यावर हूश्श वाटलं.

दोन कप चहाची ऑर्डर देऊन झाल्यावर मला म्हणाला,
“काय म्हणतोस?कसं काय चालंय?”
मी जयंतला विचारलं,
“क्लबात खेळता म्हणजे पत्ते खेळता ना?म्हणजे एकप्रकारचा जुगारच ना रे?”
“एकप्रकारचा कसला एकच प्रकारचा. हो,जुगार म्हणालास तरी चालेल.गमंत म्हणून खेळायचं झालं.
मला अलीकडे जुगार खेळण्याबद्दल विशेष वाटतं.
त्यात प्राक्तनाचा भाग असतो.त्यात अंगातल्या कौशल्याचा भाग असतो.त्यात जीवन आहे.त्यात मरण आहे.मला पोकर,रुलेट,ब्लॅकजॅक आणि क्रॅप्स ह्या पत्यातल्या खेळांची थोडी माहिती आहे. जुगार खेळण्याबद्दल मला पूर्वी विशेष वाटत नव्हतं,पुढेही वाटेल असं नाही मात्र आत्ता विशेष वाटतं.

माझं मत आहे की जुगार खेळण्यावर कोणत्याही वयावर,कोणत्याही राज्यात,आणि कोणत्याही देशात बंदी असता कामानये.माझं मत आहे की जरका मी योग्य वयावर जुगार खेळायला पसंती देऊ शकतो तर मी जुगार खेळायलाही योग्य आहे.पैज मारल्याने व्यक्तित्व विकसीत करता येतं.
त्यातून मला माझ्याचबद्दल धडे मिळतात. त्यातून जबाबदारीचे,संभाव्यतेचे आणि परिसीमेचे धडे मिळतात.

मी म्हणालो,
“जयंता,मी जरा धारीष्ट करून, तुला पत्याविषयी विचारलं.आमचं जीवन कसलं रे? पत्ते खेळायचे म्हणजे आम्हाला पाच,तिन दोन आणि झब्बू खेळायचं माहित आहे.पैसे लावून खेळल्यावर तो जुगारच म्हटलं पाहिजे.
मला वाटत नाही की,जुगार हा दोषरहित आहे.मला वाटतं त्यात फसवा-फसवी आहे,त्यात प्रातारणा करता येते.जुगाराच्या खेळात सत्यता असते, असत्यताही असते.कुणी ज्यावेळी सट्टा लावतो,अंदाज लावतो त्यावेळी तो खेळाच्या आधीन होतो आणि त्याचं कधीही समाधान होत नाही.पण जरका यश मिळालं तर तो नेहमीच जोखीम पत्करतो आणि जोखीम घेतल्यावर तो यशस्वीही होतो. बरोबर आहे ना?”

मला जयंत म्हणाला,
“तुझं अगदी बरोबर आहे.जुगार ही एक प्रकारची जोखीम आहे.लहानपणी मी शाळेत जोखीम घेताना त्याचा विनियोग करायचो,तसंच शाळेत असताना मी नेहमीच जोखीम घ्यायचो.रोज मी कसला पेहराव करायचो,काय बोलायचो,काय विचारायचो,कसा विचारायचो हे सर्व जोखीम घेतल्यासारखंच होतं.मला सांग,त्यामुळे मी लोकांना आवडत नव्हतो का?ते मला मुर्ख समजायचे का?मी मला स्वतःला मूर्ख दिसेन असं करायचो का?

मी नेहमीच म्हणत असतो की,कधीच जुगार न खेळण्यापेक्षा जुगार खेळून हरणं पत्करतं.
माझ्या सामाजीक जीवनाशी मी जुगार खेळतो.माझ्या प्रणयी जीवनाशी मी जुगार खेळतो आणि माझ्या पैशाशी जुगार खेळतो.नेहमीच जिंकायला मी उत्सुक असतो पण हरायलाही माझी तयारी असते.सी-सॉचा खेळ जसा दोघे मिळून आपण खेळतो तसा जुगार खेळताना एकट्याने खेळू नये असं मला वाटतं.मी जुगार खेळत असताना माझ्या मागे कुणीतरी निरखणारा असावा.जुगारात पैज लावताना एकाग्रता लागते. कुणीतरी मागून एक पाऊल मागे घ्यायला आणि थोडा उसासा घ्यायला,सुस्कारा घ्यायला सांगणारा हवा.”

हे ऐकून मी जयंताला म्हणालो,
“प्रत्येकाने जुगार खेळावा असं जरी तुझं मत असलं तरी प्रत्येकाने जुगार खेळलाच पाहिजे असं मी म्हणत नाही.जीवनात कधीकधी सांभाळून पावलं टाकायाला हवीत.
पण मी कुठे तरी वाचयलंय की,पत्याच्या खेळातून काही गोष्टी जीवनात शिकायला मिळतात.”

“तुझं अगदी बरोबर आहे.कसं ते मी तुला सांगतो”
असं म्हणत जयंत मला सांगू लागला,
“पत्यांच्या खेळासंबंधाने बोलायचं झाल्यास,जेव्हा माझ्याकडे उत्तम पानं आहेत असं मला वाटतं आणि समोरच्याकडे त्याहून उच्च पानं असावीत असं वाटल्यास डाव गुंडाळलेला बरा.ब्लॅकजॅक खेळात “डबल-डाऊन” करण्यापेक्षा (ह्या खेळात आपली बारी आली असताना एक पत्ता जास्त मागून घेऊन खेळ पुढे चालू ठेवता येतो)कधीकधी शरणांगती पत्करलेली बरी.पण कधीकधी तसं वाटलं तरी “डबल-डाऊन” करावं.अलबत जिंकण्याची आशा करावी. कारण,सामना केलेलाच बरा.जरका चुकीची पैज मारून शिकता आलं नाही तर खरं जिंकणं कसं असतं हे समजणार नाही.अशा वेळी तणाव कसा सांभाळायचा,चेत कसा येतो हे कसं समजायचं आणि जुगाराची आवश्यकता काय असते हे कसं समजायचं, हे कळणार नाही.
जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच हरतो.जेव्हा मी जुगार खेळतो तेव्हा नेहमीच जिंकतो.जीवनात मी नेहमीच जुगार खेळतो.”

जयंताबरोबर थोडावेळ का होईना,चर्चा करून काही तरी शिकायला मिळालं.बाहेर खूप काळोख झाला होता.जयंताचा गुरखा ऑफीस बंद करायला आला होता.जयंत मला म्हणाला,
“तू अंधेरीला रहातोस ना?मी मुंबईसेन्ट्रलला रहातो.तुला मरीनलाईन्सला सोडतो.पुढच्या खेपेला माझ्या घरीच ये.मी तुला फोन करीन.”
स्टेशन आल्यावर जयंताला बाय,बाय करून त्याच्या गाडीतून खाली उतरलो.उलट्या दिशेने चर्चगेटला गेलो.नशीबाने तीच गाडी अंधेरी लोकल झाली.अंधेरी येईपर्यंत मी जयंताशी झालेल्या चर्चेची उजळणी करीत होतो.पण त्याचं शेवटचं वाक्य एकसारखं मनात यायचं,
“जीवनात मी नेहमीच जुगार खेळतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 17, 2011

आईचं जेवण.

“आईबरोबर वेळ घालवणं,खरंच मजेचं असतं आणि जरूरीचंपण असतं.त्या आठवणी हृदयात जपून ठेवणं म्हणजेच त्या आठवणी जीवनभर आपल्याजवळ ठेवणं असं होईल.”

मला आठवतं तो शुक्रवारचा दिवस होता.मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी राजकोटला गेलो होतो.आठ दिवस हाटेलमधे राहून रेस्टॉरंटचं जेवण जेवून कंटाळलो होतो.
बघुया,बाजार गल्लीत एखादं मास्यांचं जेवण,मालवणी किंवा गोवा पद्धतिचं नसलं तरी, बनवणारी खानावळ दिसते का म्हणून धारीष्ट करून खाली उतरलो.शंभर टक्के अशक्य होतं.पण मला कुणीतरी सांगीतलं होतं की नदीतले मासे बाजारात विकायला येतात.काही गुजराथी समाज मासे खातात. मास्यांच्या बाजारातच गेलो.

पाठमोरी उभी असलेली आणि मासे विकत घेणारी एक मुलगी मला दिसली.एका बाजूने तिला पाहिल्यावर ही वीणाच असेल काय?असं मनात आलं.तिच्या मागे उभा राहून हलक्या आवाजात वीणा असं म्हणालो.त्या मुलीने चटकन मागे वळून पाहिलं.काय योगायोग? माझं अनमान अगदी खरं ठरलं.

“अय्यो,काका?तू हांगां खंय?”
असं चक्क गोव्याच्या कोकणीत मला वीणाने आश्चर्यकरून प्रश्न केला.
“तू खंय हांगा ता माका आदी सांग”
माझ्या मोडक्या तोडक्या गोव्याच्या कोकणीत मी वीणाला विचारलं.

“म्हणजे काय? गेली पाच वर्ष मी गुजराथेत वास्तव्य करून आहे.सध्या राजकोटमधे पोस्टींग झालं आहे माझं.”
वीणा मला म्हणाली.

“मी बरेच दिवसानी राजकोटला कामानिमीत्त आलो आहे. इकडचं जेवण जेवून कंटाळलो.कुतूहल म्हणून मासेबाजारात मासे बघायला आलो.आणि खरंतर तुझी भेट व्हायची होती. त्यामुळे मला ही बुद्धी सुचली म्हणावं लागेल.”
मी वीणाच्या पिशवीत ताजे मासे घेतलेले पाहून जरा खूश होऊन म्हणालो.

“चला तर माझ्या घरी.इकडचं गोड जेवण जेवून गाठ कंटाळलेल्या दोन जीवाना आंबट-तिखट मास्यांचं जेवण जेवायला पर्वणी आली आहे.आज रात्रीचं मी केलेलं मास्यांचं डिनर घेत गप्पा मारूया.”
वीणा मला म्हणाली.

“आंधळा मागतो— ” तसंच मला झालं.

“.अगदी गोव्याचे बांगडे नसले तरी बांगड्या सारखे नदीतले मासे मला सापडले आहेत.शिवाय कोलंबी घेतली आहे.ती तर कुठेही मिळते म्हणा. बांगड्यांची शाक आणि धणे घालून कोलंबीचं सुकं करते.इकडचा तांदूळ पण चवदार असतो.त्याचा भात करते आणि सोलाची कढी.”
वीणाने माझ्या चेहर्‍याकडे पाहून माझी सम्मती गृहीत धरून मला सांगीतलं.

मासे नीट करता कराता मला वीणा सांगू लागली,
“आईबरोबर वेळ घालवणं,खरंच मजेचं असतं आणि जरूरीचंपण असतं.त्या आठवणी हृदयात जपून ठेवणं म्हणजेच त्या आठवणी जीवनभर आपल्याजवळ ठेवणं असं होईल. माझ्या लहानपणी मला माझ्या आईने केलेलं जेवण अप्रतिम वाटायचं. गुजराथी टाईपचं जेवण आणि आमचं गोवा टाईप जेवण ह्यातला फरक मला लहानपणी नक्कीच माहित नव्हता. मी नेहमीच धरून चालायचे की माझ्या आईने केलेलं जेवण हेच माझ्यासाठी उत्तम जेवण आहे.

पण इकडे गुजराथला नोकरी निमीत्त आल्याने आणि बरेच दिवस इथे वास्तव्य झाल्याने माझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही की गुजराथी जेवणापेक्षा गोव्याचं जेवण मी जास्त जेवले आहे.

शाळा संपून घरी आल्यावर माझी आई माझ्यासाठी अगदी साधं पण चवदार जेवण करायची.शेवग्याची शेंग घालून तुरीच्या डाळीची आमटी,वालीची भाजी,उकड्या तांदळाचा भात आणि एखादा लहानसा पेडवा किंवा गुंजूला सारखा खोबर्‍याच्या तेलात तळलेला मासा असायचा.भूक एव्हडी लागायची की जेवण केव्हा फस्त केलं हे कळायचंच नाही. माझ्या आईने केलेल्या काही डिशीस साध्या पण पक्क्या गोव्या पद्धतिच्या असायच्या.आईने केलेली माझी आवडती डिश म्हणजे बांगड्याची शाक.त्यावेळी,ती मला आवर्जून सांगायची,
“अगं,बाहेर गावी कुठे गेलीस तर तुझ्या तुला कराता यावी म्हणून शिकून घे.”

पण त्यावेळी मी शिकण्यापेक्षा खाण्याकडे जास्त आकर्षित होते.आणि ती चूक मला आता जाणवते.मागल्या खेपेला मी आईला भेटायला गेले असताना शाक कशी करायची ते लिहून आणलं.पण इथे राजकोटला बांगडे कुठे मिळतात?. जवळच्या नदीतले ताजे मासे संध्याकाळच्या वेळी बाजारात विकायला येतात.नदीतल्या मास्यांना गोडे मासे म्हणतात.समुद्रातले मासे चवीला खारट असतात.त्यामुळे ते जास्त चवदार वाटतात.पण काय करणार दुधाची तहान ताकावर भागवून घेतल्यासारखं होतं झालं.”

“गरजवंताना अक्कल नसते” असं काहीसं म्हणतात.गोव्याचे खार्‍या पाण्यातले बांगडे कुठे? आणि हे गोडे मास कुठे? ह्यात वाद नाही.
मी वीणाला म्हणालो.

“गोव्याहून येतान मी तीरफळं,आणि लाल संकेश्वरी मिरची न विसरता घेऊन आले आहे.ह्या दोन गोष्टी नसल्या तर बांगड्याच्या शाकेत मजा येत नाही.तीरफळाचा वास आणि मिरचीचा तिखटपणा आणि लाल रंग काही औरच असतो. आईची दूसरी डीश म्हणजे भरपूर धणे घालून केलेलं कोलंबी बटाट्याचं सुकं किंवा मुडदूशाचं सूकं.ही डीश भाकरी बरोबर खायला जाम मजा यायची. आणि कदाचीत उरलं तर दुसर्‍या दिवशी खायला मस्त वाटायचं.मला आवडणारी माझ्या आईची तिसरी डीश म्हणजे एल्लापे.

माझे बाबा बरेच वेळा कामा निमीत्त कर्नाटकात जायचे.तिकडे त्यांना एका मित्राच्या घरी ही डीश खायला मिळाली.गरम गरम चहाबरोबर एल्लापे खायला खूपच मजा येते असं बाबा सांगायचे.त्यांनी ही डीश आईकडून करवून घेतली एल्लापे तयार करायचं एक खास बिडाचं पात्र असतं आता नॉनस्टीक पात्र पण मिळतं.एल्लाप्याच्या आकाराचे त्या भांड्यात गोल कप्पे असतात.तादुळ,चण्याची डाळ आणि उडदाची डाळ भिजवून भरडून त्या्ची पेस्ट करतात.
आणि मग त्यात गुळ,वेलची,काजू किंवा शेंगदाणे घालून,थोडं दूध घालून पिठीचा गोळा करून लहान लहान आकाराचे गोल गोळे, कप्प्यात थोडं तेल टाकून, ठेवतात. मंद चुलीवर एल्लापे संथ भाजले जातात.कप्यात खालून जास्त भाजलेले हे एल्लापे खायला खरपूस लागतात.काही लोक तिखट एल्लापे पण करतात.पण मला गोड आवडतात.

त्यावेळी मी माझ्या आईबरोबर असताना, जेवण स्वतः करण्याबाबतची एव्हडी कदर केली नाही.पण आता इथे गेली पाच वर्ष एकटीच रहात असल्याने आईच्या जेवणाची किंमत पावलो पावली कळायला लागली.इकडे मला स्वतःसाठी एकटीलाच जेवण करावं लागतं.आज काय जेवण करणार? आज काय खाणार?असे प्रश्न पडतात.

सुरवातीला गुजराथी जेवणाच्या थाळ्या मागवून जेवायचे.पण ते गोडूस जेवण जेवून खरोखरच कंटाळा यायला लागला. चमचमीत आंबट-तिखट खाणारी मी.मागच्या खेपेला गोव्याला गेले होते तेव्हा आईकडून मला आवडणार्‍या डीशीस शिकून घेतल्या आणि रेसपी लिहून आणल्या.घरी जेवण करून मग जेवायला आता मजा येते.अगदी आई करते तशीच माझ्या जेवणाला चव येत नसेलही.पण माझी गाठ मात्र कंटाळत नाही.”
असं सांगत सांगत वीणा स्वयंपाक करीत होती.मासे जेव्हा तिने फोडणीला टाकले तेव्हा त्याचा वास माझ्या नाकात गेल्यानंतर मला रहावेना.

मी वीणाला म्हणालो,
“असे हे फोडणीचे आवाज आणि त्याचा वास रात्रीच्या अश्यावेळी गोव्याला घरोघरी अनुभवायला मिळतात. राजकोटमधे मी आहे हे क्षणभर विसरूनच गेलो आहे.”
थोड्याच वेळात “पाट पाणी” घेतलं आणि आम्ही जेवायला बसलो.

जेवता जेवता वीणा मला म्हणाली,
“मी तशी वयाने जरी मोठी झाली असली तरी मला माझ्या आईचं जेवण जेवण्याची इच्छा होत असते.इकडे काम भरपूर असल्याने वरचेवर मला गोव्याच्या ट्रिप्स मारता येत नाहीत. म्हणून ह्यावेळेला गेले होते तेव्हा तिच्या हातचं जेवण भरपूर जेवून आले. आईच्या जेवण्याचा त्याग मी कदापी करू शकणार नाही.तिच्या जेवणात मी एकरूप झाली आहे,आणि माझी आई जे जेवण तयार करते तसलं जेवण जेवून मी मला घडवणार आहे.”

जेवण झाल्यावर आणि गप्पा संपल्यावर जाता जाता मी वीणाला म्हणालो,
“वीणा,तुझं आजचं हे जेवण जेवून आज तरी तू मला घडवलं आहेस.मी तृप्त झालो आहे.तुझे थॅन्क्स मानावे तेव्हडे थोडेच.”

माझं हे ऐकून वीणाला खूप आनंद झाला.
मला म्हणाली,
“तुमच्या चेहर्‍यात मला माझी आई दिसते.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 14, 2011

मी नेहमीच काळजीत असते.तुम्ही का नाही?



“गोव्यातली मंदीरं,बिच,ऐतिहासीक चर्चं,प्रसिद्ध खानावळी ह्यांना भेट द्यायची.मजा करायची.अगदी शब्दशः काळजी करायला वेळ आणि भानच ठेवायचं नाही.”

“आमच्या घरात मी मोठी होत असताना,मला एक शिकवलं जात होतं.ते म्हणजे काळजी करीत कसं रहावं.मला खात्री नाही पण मला वाटतं हे माझ्या आजीकडून आईकडे आणि नंतर माझ्याकडे आलं असावं.पण एक नक्की पुढे पुढे मी त्यावर विश्वास ठेवायला लागले आणि मनात म्हणायची,मी एखाद्या गोष्टीची काळजी करीत राहिले की,असं केल्याने,सकारात्मक गोष्ट साध्य होण्याची, आपल्यात क्षमता येते.”
चित्रा मला आपलं मत सांगत होती.चित्राला चार वर्षाची मुलगी आहे.

मला हे चित्राचं म्हणणं ऐकून गंमत वाटली.मी म्हणालो,
“पटकन मनात येतील अशी काळजीची कोणती उदाहरणं तू मला सांगू शकतेस?”

“अगदी सोपं आहे”
असं म्हणून चित्रा सांगू लागली,

“उकळत्या चहाचं भांडं चिमट्यात धरून गाळणीतून चहा कपात ओतत असताना चिमटा सरकला तर?गरम चहा अंगावर ओतून भाजायला झालं तर?

मोठ्या बहिणीची दोन वर्षाची मुलगी अंगणात खेळत असताना तोल जाऊन पडली आणि तिचा हात मोडला तर?

माझ्या थोरल्या भावाचा मुलगा मोटर-सायकल नुकताच चालवायला शिकला आहे.भर वेगात ती चालवत असताना त्याला अपघात झाला तर?

असे एक ना हजार विचार मनात येऊन मी काळजीत असायची.अशी काळजी करीत राहिल्याने जे होणार आहे असं वाटत रहातं,ते होऊ नये म्हणून काळजी करीत रहावं. असं मला वाटायचं.

आता ह्याची दुसरी बाजू म्हणजे नेहमी आनंदात रहाणं.पण हे काही खरं नाही. आनंदात रहाणं टाळालायला हवं.कारण आनंदी असणं बरं नाही.समजा तुम्हाला काही गोष्टीची मजा वाटून आनंद झाला,किंवा तुम्ही एखाद्या घटनेत चटकन सुखावला किंवा थोडसं सुखावला तर मी म्हणेन निश्चिंत रहा, हा आनंद जास्त काळ टिकणार नाही.सकाळ येईपर्यंत निवळून जाणार.”

मी चित्राला म्हणालो,
“एकाच वेळी आनंदात आणि काळजीत राहण्याच्या ह्या दोन अवस्था,तुझ्या मनाची फसवा-फसवी करतील असं मला वाटत नाही.कसं ते सांगतो.
तुला आनंदी रहाण्याची सुरवातच करता येणार नाही, कारण त्यानंतर शेवटच्या क्षणाला चिंतेत राहून सर्व काही सकारात्मक होईल अशी तू अपेक्षा करणंही बरोबर होणार नाही.

दुसर्‍या बाजूने पाहिलं तर तू चिंतेत रहायला सुरवात करणं,मग आनंदात रहाणं, आणि त्यानंतर चिंतेत रहाणं आणि त्यामुळे तुझं सकारात्मक होईल ह्याची अपेक्षा करणं. असल्या ह्या जुळवाजुळवीला इथे जागा नाही.काळजी करीत रहाणं का तर सकारात्मक होईल म्हणून आणि आनंदात रहाणं,मला वाटतं, तसंच काही तरी सकारात्मक होईल ह्याची अपेक्षा असल्यामुळे.”

“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.माझे डोळे एका नर्सने उघडले.”
चित्रा मला म्हणाली.आणि पुढे सांगू लागली.
“ह्या मुलीला जन्म देण्यापूर्वी मला खूपच कष्टातून जावं लागलं.
एक वर्षतर,मी आणि रमेश-मुलीचे बाबा- ना ना प्रयत्न करून पाहिले.डॉक्टरी सल्ले, देव-देवस्की काही विचारू नका.सर्व प्रयत्न असफल झाले.ह्या घटनेसाठी मी काळजी, काळजी आणि काळजी करीत होते असं म्हटलं तर अगदीच नम्रपणे बोलल्यासारखं होईल.पण सकारात्मक होण्याची चिन्हं काही दिसेनात.

मला आठवतं,असंच एक दिवशी डॉक्टरांच्या क्लिनीकमधे गेल्यावर,पुन्हा असफल निर्णय मिळाल्याचं पाहून,त्या अनुभवी नर्सने मला एका बाजूला बोलावून सांगीतलं,
“ही गोष्ट सफल व्हायला हवी असेल तर तुम्ही काळजी करायचं सोडून द्या”
“फक्त सफलता मिळेपर्यंत ना?”
अधीर होऊन मी तिला लागलीच म्हणाले.
“माझ्या अनुभवातून मी सांगते.जर का तुम्ही चिंतामुक्त होऊन आनंदात राहिला नाहीत तर तुम्हाला कधीच शक्य होणार नाही.(सफलता मिळणार नाही.)”
मला त्या नर्सने निक्षून सांगीतलं.

अर्थात,हे तिचं ऐकून त्यावेळी माझ्या मनात एकच विचार आला,हे सर्व मी दुसर्‍या एखाद्याला,म्हणजे त्या नर्सला सुद्धा,फक्त माझी आजी आणि आई सोडून,माझा काळजी करण्याचा उद्देश कसा समजावून सांगू ?
“की,काळजी करूनच माझ्या सारख्यांना सफलता मिळत असते.”
खरं पाहिलंत तर,मला त्या नर्सच्या डोळ्यात माझ्याबद्दल कळकळ दिसली.
माझ्या मनातले विचार तिला सांगायला मी धजले नाही.
म्हणून मी,मान हलवून होकार दिला.
“थोडा बदल म्हणून बाहेर कुठेतरी जाऊन मजा करायची काळजी करायचीच नाही.” असं मी माझ्या मनात आणलं.

मी आणि रमेशने कामावरून सुट्टी घेतली.सुट्टी म्हणायचा माझा अर्थ,सुट्टी घेऊन गोव्याला जायचं ठरवलं.सर्व गोवं आणि आजुबाजूचा परिसर पहाण्यात मजा करायची. गोव्यातली मंदीरं,बिच,ऐतिहासीक चर्चं,प्रसिद्ध खानावळी ह्यांना भेट द्यायची. अगदी शब्दशःकाळजी करायला वेळ आणि भान ठेवायचंच नाही.योगायोग म्हणा किंवा दुसरं काही म्हणा मी सफल झाले.

नंतर मला ही मुलगी झाली.आता ती चार वर्षाची आहे. जेव्हा ती नाराज होत असते तेव्हा मी तिला सांगत असते,
“चिंता करून कसलीही चांगली गोष्ट साध्य होत नाही.चिंता करून चांगली गोष्ट जन्मालाही येत नाही.विश्वास ठेव माझ्यावर.तू तर नक्कीच आलेली नाहीस.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 11, 2011

ते दोन भले मोठे वटवृक्ष



“गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या फांद्यावर चढलो नाही,पण एक मला माहित आहे की त्या फांद्यावर चढून जाऊन जे मी धडे शिकलो ते माझ्याजवळ जीवनभर रहाणार आहेत.”

मला आठवतं मी ज्याज्या वेळी माझ्या आजोळी जायचो त्यावेळी ह्या दोन वडाच्या झाडांना भेट दिल्याशिवाय रहायचो नाही.पण मी हायस्कूलमधे गेल्यावर भेट देणं जरा कमी झालं.त्याअगोदर,म्हणजे हायस्कूलला जाण्यापुर्वी माझ्या आजोळीच मी शिकत होतो.माझ्या आजोबांनी माझ्या आईला सांगीतलं होतं की माझ्या इतर मामेभावंडाबरोबर मला आजोळीच शिकायला ठेवावं.

ह्या वडाच्या झाडांना जवळ जवळ मी रोजच भेट द्यायचो. केवळ पायवाटेनेच जाता येईल अशा मार्गाने जात राहिल्यावर बरीच अशी झुडपं लागायची. त्यानंतर दोन मोठे वड एकमेकासमोर वाढलेले दिसायचे.ह्या वडांच्या सभोवती ना ना तर्‍हेची झाडं आणि झुडपं दिसायची.त्यात,केवड्याची अस्ताव्यस्त वाढलेली झाडं होती.करवंदाची दाट झुडपं होती. मधूनच उंचच उंच जांभळाची झाडं दिसायची.बेवारशी फणसाची झाडं पण दिसायची.मे महिन्यात ह्या फणसाच्या झाडाना खूप फणस लागायचे. गोर-गरीब झाडावर चढून फणस काढून घरी खायला घेऊन जायचे.कारण ती झाडं कुणाच्याच मालकीची नव्हती.

पण मला आणि माझ्या मामेभावंडाना त्या फळझाडात आणि त्यावरच्या फळात स्वारस्य नसायचं.नाही म्हटलं तर, केवड्याच्या झुडपातून नुकतीच वर आलेली केवड्याची फुलं आम्ही आमच्या घरी आई, आजी, माम्यांना डोक्यात माळायला घेऊन जायचो.केवड्याची फुलं आणलेली पाहून आम्हाला आमची आजी नेहमी म्हणायची,
“बाबारे तुमचं उतू जाणारं प्रेम पुरे झालं,आमचं कौतूक पुरे झालं.केवड्याच्या झुडपात फणेरी पिवळा नाग असतो.तो चावला तर सगळंच संपलं.त्याचं विष उतरवून घ्यायला मांगल्याकडे -मांत्रीकाकडे-जावं लागेल.ते व्याप नकोत.”
आमच्या आजीचं बोलणं आम्ही तेव्हड्यापूरतं ऐकून घ्यायचो.
आम्ही केवड्याच्या झुडपात नागाला कधीच पाहिला नव्हता.

ही आमची ह्या जागी यायची पळवाट होती,आमचं स्वातंत्र्य होतं, ती त्या दोन भल्या मोठ्या वडाच्या झांडांसाठी.वर चढून बसण्याची हौस होती.उत्तमरित्या झाडावर चढून जाण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी,अभिमान वाटण्यासाठी, सगळ्य़ा शेजारच्या मुलांमधे आम्हीच प्रथम हुडकून काढलेली ही दोन वडाची झाडं असल्याने,त्याबद्दल आम्हाला विशेष वाटायचं.

त्यावेळी हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.पण आजोळी शिकायला राहिलेल्या माझ्या जीवनात ह्या झाडांनी मला जे शिकवलं ते आणखी कुणीही शिकवू शकलं नाही हे मला आता समजायला लागलं आहे.
शाळा संपल्यानंतर रोज मी माझ्या भावंडांबरोबर ह्या वडाच्या झाडाकडे यायचो.
मला आठवतं,मी आणि माझी भावंडं रोज कुठे जातो ह्याबद्दल एक आठवड्यानंतर आमच्या शेजारातल्या सर्व मुलांना कुतूहलतेचा विषय झाला होता. आम्ही हे छपवूं शकलो नाही. काही दिवसानी आजुबाजूची सर्व मुलं आमच्या पाठोपाठ यायला लागली.वडांच्या लोंबत्या पारंब्यावर झोके घ्यायला लागली.असं कित्येक दिवस होत होतं.

माझ्यासाठी मात्र ही जागा “फक्त स्वपनात दिसणारी जागा” असं वाटू लागलं. कित्येक दिवसानंतर मुलांची गर्दी कमी व्हायला लागली.वडाच्या पारंब्या मोकळ्या दिसायला लागल्या. एकदा मी माझ्या एका मामेभावाला विचारलं,
“ही सर्व मुलं गेली कुठे?
त्याने मला जे उत्तर दिलं ते मी केव्हाही विसरणार नाही.
तो पायवाटेवरची धुळ पायाने उडवीत मला म्हणाला,
“ती मुलं आता मोठी झाली आहेत.हायस्कूलमधे जायला लागली आहेत.”

हे त्याचं ऐकून त्याचवेळी मी मनात ठरवलं,मला मोठं व्ह्यायचं नाही आणि मला हायस्कूललाही जायचं नाही.असं करायला माझ्या हाती काहीच नव्हतं हे त्यावेळी माझ्या डोक्यातही आलं नाही.

इतर मुलं ज्यावेळी पारंब्यावर झोके घ्यायची त्यावेळी मी आणि माझी मामेभावंडं वडावर चढून बसायचो.पारंब्यावर झोके घेण्यात आम्हाला स्वारस्य नव्हतं.इतर मुलं जे म्हणायची पण कधीच आचरणात आणायची नाहीत ते मी एक दिवस करायचं ठरवलं.वडाच्या झाडाच्या सर्वात उंच फांदीवर चढायचं मी ठरवलं.माझ्या भावांना हा माझा विचार रुचला नव्हता. तेव्हा एक दिवस दिवाळीच्या सुट्टीत हळूच एक दिवस छूः होऊन त्या वडांच्या झाडांच्या जागी गेलो.हे मला कुणा दुसर्‍यासाठी करायचं नव्हतं.मला स्वतःसाठी करायचं होतं.मी माझ्याच मला आव्हान देत होतो.

एका झाडावर मी उंच चढत गेलो.एकदा फक्त माझा भाऊच इथपर्यंत चढला होता त्या उंच फांदीवर मी पोहोचलो.त्याहूनही उंच जाण्याचं मी ठरवलं. जेव्हडा वर चढत गेलो तेव्हड्या फांद्या विरळ व्ह्यायला लागल्या आणि वरवरच्या फांद्यावर जायला कठीण व्ह्ययला लागलं.

मला आठवतं वरून खाली जमीनीकडे पाहून मी किती उंच गेलो ते अजमावलं,आणि वर पाहून आणखी किती वर जायचं राहिलं तेही अजमावलं.त्या दिवशी मी माझं लक्ष्य गाठू शकेन हे एव्हडंच शिकलो नाही, तर मी आणखी काही शिकलो,जे मला त्यावेळी स्पष्ट झालं नाही पण नंतर जीवनात स्वतःहून उघड झालं.

त्या दिवशीच्या त्या वडाच्या फांद्याकडे मागे वळून मी पहातो आणि त्यानंतर त्याची तुलना माझ्या आताच्या जीवनाकडे करतो.जीवनात मी मागे पाहिलं तर इथपर्यंत आल्याचं दिसून येतं,पण भविष्यात पाहिलं तर अजून मला जायचं आहे हे निक्षून लक्षात येतं.

आता पायवाटीचा रस्ता मोटार जाण्यासाठी रस्ता झाला आहे.मी पण वयाने मोठा झाल्याने गाडी घेऊन त्या दोन वडाच्या झाडांकडे जाऊ शकतो.मी त्या दोन्ही झाडांकडे बघतो,तेव्हा त्या उंचच उंच फांद्या अजूनही दिसतात.काही पारंब्या वाढल्या आहेत.काही जमीनीला स्पर्श करायला लागल्या आहेत. जोरदार वारा आल्यावर वडाच्या झाडाच्या पानातून तसाच सळसळीत आवाज येत असतो.तो स्वातंत्र्य देणारा सुटका करणारा आवाज.

मी गाडीमधून उतरून रस्त्यावरची धूळ पायाने उडवतो आणि माझ्या लक्षात येतं की,माझ्या बालपणी मी जो व्हायला नको होतो असं वाटायचं, तो झालो आहे. माझ्यात वाढ झाली आहे. इथे आल्यावर जरी मला वाटत रहातं की अनेक गोष्टी बदलल्या आहेत,तरी त्या तशा बदललेल्या नाहीत.

ती दोन वडाची झाडं माझ्या ऐतीहासीक स्मृती माझ्यासाठी तशाच धरून आहेत. कारण माझ्या बालपणाच्या आठवणी त्यांच्या फांद्याशी बांधून ठेवल्या आहेत.आणि आता माझ्यात एव्हडी वाढ झाली आहे की ती वडाची झाडं आता मला तेव्हडी मोठी वाटत नाहीत.गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या फांद्यावर चढलो नाही,पण एक मला माहित आहे की त्या फांद्यावर चढून जाऊन जे मी धडे शिकलो ते माझ्याजवळ जीवनभर रहाणार आहेत.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 8, 2011

बाथरूम गवई.



“नेहमीच हसणं-खिदळणं,विनोदी वृत्तीत रहाणं अशा वातावरणातल्या आमच्या घरात मी वाढलो असल्याने,अगदी लहानपणापासून बाथरूममधे मी गायला शिकलो.”

मला केव्हाही कोकणात जायचं असेल तर मी रेल्वेच्या तिकीट खिडकी जवळ तिकीट काढण्यासाठी रांगेत जाऊन उभा रहात नाही.त्याचं सर्व श्रेय गुरूनाथला द्यावं लागेल.गुरूनाथ मुळचा कोकणातला.त्याचं कोकणात भलं मोठं घर आहे.वाडवडीलांनी घर बांधलं असावं.
माझी आणि गुरूनाथची आमच्या समाईक मित्रातर्फे ओळख झाली.गुरूनाथ रेल्वेत काम करतो.रेल्वेच्या तिकीट खिडकीवर तिकीट देणार्‍या स्टाफवर तो सुपरवाईझर आहे.
मला कोकण रेल्वेतून कोकणात जायचं असेल तेव्हा,फक्त गुरूनाथला फोन करून कळवतो.अमुक अमुक तिकीटं, अमुक अमुक दिवशी जाण्याची.
गुरूनाथ तिकीटं घरपोच करतो.कधीकधी तो स्वतःही माझ्या घरी तिकीटं घेऊन येतो.

ह्यावेळी मी त्याला म्हणालो,
“गुरूनाथ,मीच तुझ्या घरी येऊन तिकीटं घेऊन जातो.”
रविवारचा दिवस होता.गुरूनाथच्या बायकोनेच दरवाजा उघडला.मला म्हणाली,
“गुरूनाथ शॉवर घेतोय,तोवर तुम्ही हे मासिक वाचत बसा.तुम्ही येणार आहात ते मला त्याने सांगीतलं होतं.”
गुरूनाथची बायको गलातल्यागालात हसत होती.मला पण हसू आवरत नव्हतं आणि त्याचं कौतूकही वाटत होतं.
मला म्हणाली,
“ह्या तिन्ही भावाना-गुरूनाथला आणि त्याच्या दोन भावाना-शॉवर खाली गायची सवय आहे.बाथरूम गवई आहेत ते तिघे.”
मी तिला म्हणालो,
“मला माहित नव्हतं,गुरूनाथ इतका गोड गातो ते.”
बाथरूममधून मला त्याचं गाणं स्पष्ट ऐकायला येत होतं.बाबुजींच गीतरामायणातलं,

“दैवजात दुःखे भरता दोश ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”

हे गाणं आळवून आळवून गात होता.नंतर टुवालाने केस फुसत फुसत माझ्या जवळ हलो करायला आला आणि मला म्हणाला,
“मी तुमच्या घरी तिकीटं घेऊन आलो असतो.तुम्ही इकडे यायचा का त्रास घेतला?”
मी तसंच त्याला म्हणालो,
“मी आलो नसतो तर तुझ्या गळ्यातून गायलेलं हे गोड गाणं मला ऐकायला कसं मिळालं असतं.?”
छान गातोस.आमच्या घरात तुझ्या गाण्याचा कार्यक्रम करायला हवा.”

मला गुरूनाथ म्हणाला,
“बाथरूममधे आंघोळकरताना गाणं म्हणण्याच्या सवयीबद्दल मला विशेष वाटतं.कुणी कबूल होवो न होवो,पण जीवनात एकदातरी आंघोळ करताना गाणं म्हटल्याचं कुणालाही नाकारता येणार नाही.
गायक,अभिनेते,लायब्ररीयनस,हिशोबनीस,आई,बाबा कुणाचेही हेच झालं आहे.
म्हणून मला प्रश्न पडतो की,लोकं का गातात?-मी म्हणत नाही, गाणं अगदी गानपटू सारखं नसेलही.पण गायलं जातं हे नक्कीच.
पण तेच जर का एखाद्याला कुणासमोर किंवा स्टेजवर गाणं म्हणायला सांगीतल्यास पोटात कालवाकालव होत असते. माझंही तसंच आहे.”

मी गुरूनाथला म्हणालो,
मला वाटतं,बाथरूममधे गाण्याचं, मुख्य कारण एकलेपण असावं. शॉवर खाली आंघोळ करीत असताना सगळ्य़ा जगाशी संपर्क तुटलेला असतो.
बाथरूमच्या चार भिंतीत किंवा आतलं बाहेर न दिसणार्‍या काचेच्या बाथरूममधे असल्याने, घरातल्या जीवनाचा, कामावरच्या जीवनाचा,सतत ताण असलेल्या जीवनाचा,संपर्क तुटलेला असतो.
ह्या अशा एकलेपणाच्या सभोवतालामुळे,स्वातंत्र्याची हमी मिळते,आपण काहीही करू शकतो,आपल्याला कुणी पहात नाही,कुणी निर्णयाला येत नाही किंवा कोण घड्याळ लावून बसलेला नसतो.अशा सभोवतालच्या वातावरणात,गाणं गायची इच्छा असणं आणि प्रत्यक्ष गाणं गाण्याची क्रिया करणं ह्यामधे कोणही आलेला नसतो.”
माझं म्हणणं गुरूनाथला एकदम पटलं.

मला म्हणाला,
माझीच गोष्ट तुम्हाला सांगतो.कोकणात आमचं केव्हडं मोठं घर आहे ते तुम्ही पाहिलं आहे.
नेहमीच हसणं-खिदळणं,विनोदी वृत्तीत रहाणं अशा वातावरणातल्या आमच्या घरात मी वाढलो असल्याने,अगदी लहानपणापासून बाथरूममधे मी गायला शिकलो.पण जसा मी मोठा होत गेलो तसा काही गोष्टी माझ्या दृष्टोप्तत्तीस आल्या.माझा मोठा भाऊ,जो माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठा आहे,माझ्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका,खूपच लाजाळू स्वभावाचा आहे.तरीसुद्धा तो बाथरूममधे गायचा.आणि हे तो हायस्कूलमधे जाईपर्यंत करायचा.त्यानंतर मी त्याला गाताना पाहिलं नाही,माझ्यावर विश्वास ठेवा,आमच्या घरातल्या एका बाथरूममधून, जी मी माझ्या दोन भावांत मिळून वापरायचो,काहीही बाहेर ऐकायला यायचं.पाणी सोडलेल्या नळाचा बाहेर आवाज यायचा.बाबूजींच्या-सुधीर फडक्यांच्या-मधूर गाण्याच्या पुनारावृत्ती ऐकायला यायच्या.परंतु,माझ्या ह्या मोठ्या लाजाळू भावाची आम्हा लहान भावांशी इतर बाबतीत दूवा ठेवण्याच्या जरूरीमधे,बाथरूममधे गाण्याची जरूरी हळू हळू कमी कमी होत गेली.

माझा तर्क आहे की ह्याचं कारण,शरीरात वाढ करणारी द्र्व्य किंवा यौवन किंवा तुम्हाला काय म्हणयचं आहे ते म्हणा,पण माझा नक्की कयास आहे की माझ्यात आणि माझ्या भावात असणारं अंतर वाढायला लागलं होतं. मला मनोमनी असं वाटायचं की,ज्या काही कठीण समस्यांतून तो जात होता, अशावेळी अशा समस्यातून सुटका करून घेण्यासाठी,बाथरूममधे गाऊन सुटका करून घ्यायला हिच योग्य वेळ असावी.
कदाचीत मी तसा विचार करणं उचीत नसावं.कारण माझा मोठा भाऊ हायस्कूलच्या पहिल्या वर्षाला निराळा वागायचा. मला तो बरेच वेळा दिसायचा नाही.आपल्या खोलीत तो स्वतःला बंद करून बसायचा.एखाद्या अंधार-कोठडीत बसल्यासारखा.किंवा आपल्या मित्रांबरोबर,जे माझी आणि माझ्या धाकट्या भावाची कधीच पर्वा करीत नसायचे,वेळ घालवायचा.जेवणाच्या टेबलावरपण तो कधीही कुठच्याही प्रश्नाला एक दोन शब्दात उत्तर द्यायचा.”

मधेच थांबवीत मी गुरूनाथला म्हणालो,
“पण तू म्हणतोस तसा तुझा भाऊ आता दिसत नाही.एकदम गुलहौशी वृत्तीचा वाटला”

मला गुरूनाथ म्हणाला,
“मला सांगायला आनंद होतो की,माझ्या भावाची हायस्कूल मधली नाट्यभरी वर्षं जशी पुढे पुढे जात होती,तसा त्याच्या स्वभावात बदलाव येत राहिला.मला खात्रीने आठवत नाही की,ती काय घटना होती ज्याने तो पुन्हा शॉवर खाली गायला लागला.पण तो गायला मात्र लागला.त्याची वृत्ति बदलली.मला माहित असलेला आणि प्रेमळ असलेला माझा बेफिकीर वृत्तीचा भाऊ मला परत मिळाला.आम्ही एकमेकाशी बोलायला लागलो, एकमेकाला समजून घेऊ लागलो आणि मला वाटतं आमचा एकमेकातला दुवा पुन्हा सांधला गेला.त्याच्या मित्र-परिवारातसुद्धा बदलाव आला आणि त्यांच्याबरोबर वाढणार्‍या मित्रांना तो भेटायला लागला.

मी असं मुळीच म्हणणार नाही की माझा भाऊ,सगळ्यात दयाळू,सर्वांपेक्षा हुशार,बुद्धिमान किंवा सगळ्य़ापेक्षा ताकदवान होता,किंवा कसं काहीही.पण मला मात्र तो अनेक हिरो मधला एक वाटत होता.मला माहित आहे की तो माझ्यावर प्रेम करतो,आणि माझा कैवार घ्यायला तो वाटेल ते करील.मला माहित आहे की शालेय जीवन असं नाही की तुम्ही सहजपणे त्यातून पार होऊ शकाल.पण माझ्यावर विश्वास ठेवा,शॉवर खाली आंघोळ करीत गाणं,ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.”

“मी पण पूर्वी गायचो.पण आता तुझं हे ऐकून न चुकता शॉवर घेताना गाईन.”
असं मी गुरूनथला म्हणालो.नंतर मी आणि गुरूनाथ जोरजोरात हसलो.तेव्हड्यात त्याच्या बायकोने माझी तिकीटं आणून मला दिली.त्यांचे आभार मानून मी त्यांची रजा घेतली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 5, 2011

झोके झोपाळ्यावरचे.

“झोक्यावर झोके घेत राहिल्याने सर्व समस्या सुटल्या जातात असं मला वाटतं.”
मालती मला सांगत होती.

मालती,धाके कॉलनीतल्या नव्याने बांधलेल्या एका टॉवरमधे रहायला गेली होती.पूर्वी ती चारबंगल्याला एका चाळीत रहायची.ह्या टॉवरवर सोळ्याव्या मजल्यावर तिचा फ्लॅट होता.सगळ्य़ा घरात जुहूवरून सारखा वारा यायचा.
“बरेच वेळा आमहाला खिडक्या बंद करून ठेवाव्या लागतात.वारा नकोसा होतो.पावसाळ्यात तर खिडक्या बंदच ठेवाव्या लागतात.पावसाची वावझड एव्हडी असते की जमिनीवरची कारपेट्स भिजून जातात.”
मी मालतीच्या घरी गेलो होतो.तेव्हा ती आपली जागा आणि आतल्या खोल्या आणि सुविधा काय आहेत ते समजावून सांगत होती.
एका खोलीला मोठी उघडी बाल्कनी होती.कोरीव लाकडाचा ऐसपैस झोपाळा बाल्कनीच्या मधेच होता.नंतर त्याच झोपाळ्यावर बसून आम्ही गप्पा मारीत होतो.

मला मालती म्हणाली,
“कोकणात आमच्या घराच्या मागच्यादारी पोरसात एका उंचच उंच आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरखंडाचा झोपाळा बांधलेला होता.दोन दोरखंडामधे बसण्याचा पाट ठेवून त्यावर एक उशी ठेवून आम्ही झोके घ्यायचो. त्यावेळी सी.डी. वॉकमन सारख्या गोष्टी नव्हत्या.आमच्या आम्हीच गाणी म्हणायचो.रात्रीच्यावेळी कुणालाही त्रास न होईल एव्हड्या आवाजात गायचो.”

मधेच मालती उठून गेली.येताना दोन कप कॉफी घेऊन आली.एक कप मला देत म्हणाली,
“ह्या इकडच्या झोपाळ्य़ावर मी बसले की मला माझं कोकणातलं घर आणि मागचं पोरस आठवतं.जास्त करून झोपाळा आठवतो जो आता नाही.पण डोळे मिटून ह्या झोपाळ्यावर झोके घेत राहिले की मन कोकणात जातं.”

मी मालतीला म्हणालो,
“सर्वां नसे जाण त्या बालपणाची
नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची
नसे तेव्हडी सुलभ असे महाकठीण
बालपणाच्या प्रीतिला विसरण्याची”

ह्या मी लिहिलेल्या एका कवितेच्या चार ओळी मला,तुझ्या ह्या बालपणातल्या आठवणी ऐकून,आठवल्या. सांग, सांग मला ऐकायला बरं वाटतं.

मालती खुश होऊन मला सांगू लागली,
“त्या झोपाळ्यावर बसल्यावर मला असं वाटायचं की मी काहीही करू शकेन.माझ्या कोणत्याही स्वप्नात,मी कोणही असू शकेन,कुठेही असू शकेन असं वाटायचं.समुद्रावरून येणार्‍या वार्‍याच्या झुळकेचा माझ्या चेहर्‍याला स्पर्श झाल्यावर असं वाटायचं की मी कुठेही पक्षासारखी उडून जाऊ शकेन.रात्रीचे आकाशातले चकमकणारे तारे बघून मला जगायला उमेद यायची.मी स्वतंत्र असायची.मला हवं ते करायला मी मोकळी असायची,माझं मला ऐकायला मी मोकळी असायची,माझं मला गायला मी मोकळी असायची थोडक्यात माझी मी असायची.

खरंतर,ह्याच झोपाळ्यावर बसून मी काही करू शकत होती.ह्या झोपाळ्यावर बसल्याने,जग बुडती होणार असं मनात यायला कारणीभूत होणार्‍या सगळ्या समस्यापासून माझी सुटका व्हायची.माझ्या थोरल्या भावाशी काल झालेलं भांडण एकाएकी,तितकं काही वाईट होतं असं वाटायचं बंद झालं.मला आठवतं आदल्याच दिवशी मला त्याने बाथरूममधे एक तास कोंडून ठेवलं होतं.पण मी काही माझ्या मनाला लावून घेतलं नव्हतं.मला आठवतं, माझी एक मैत्रीण माझ्यावर खूप रागावली होती.खरं म्हणजे मी तसं काहीच केलं नव्हतं.झोपाळ्यावर बसल्यावर हे सर्व मला विसरायला जायचं.

झोपाळ्यावरच्या दोरखंडाच्या दोर्‍या झोपाळा वापरून वापरून झाडाच्या फांदीवर घासून कोरम झाल्या होत्या.वर पाहिल्यावर एक एक दोरखंडाचं सूत तुटताना दिसायचं.नंतर मी वर पाहायचच बंद केलं.ज्या दिवशी झोपाळा तुटला त्याच्याच आदल्या दिवशी मी त्यावर तासनतास बसले होते.गाणी म्हणत होते,उंच झोके घेत होते,मोठे श्वास घेत होते.

मला आठतं त्याच दिवशी मी मलाच म्हणाली होती की,निष्कारण भांडण करणार्‍या मैत्रीणीशी माझी मैत्री नसली तरी चालेल.त्याच दिवशी जीवनाचा दृष्टीकोन काय हवा ते कळलं.शाळेत सकाळीच शारीरीक कवाईतेचं शिक्षण देतात,ते जरी कंटाळवाणं असलं तरी,जरूरीचं आहे.मला शहाणं व्हायला पाहिजे,चांगलं वागलं पाहिजे,ऐकलं पाहिजे.ह्याच झोपाळ्यावर झोके घेत, मला शाळेत चांगले गुण मिळवले पाहिजेत हे, मी ठरवलं होतं.आणि तसंच झालं.
शाळेचं शिक्षण संपल्यानंतर शाळा सोडून जाताना मित्र-मैत्रीणींचा निरोप घेताना एव्हडं जड झालं नव्हतं, जेव्हडं मला माझा झोपाळा निकामी झाल्याचं पाहून वाटलं होतं.”

मी हे सर्व मालती कडून ऐकून तिला म्हणालो,
“मालती, तू फारच भावनाप्रधान आहेस.काही काही लहानपणातल्या स्मृती मनात एव्हड्या घर करून असतात की,त्याची आठवण आल्यावर सैरभैर व्हायला होतं.आणि कुणालातरी सांगून टाकल्यावर मन हलकं होतं.”

माझं हे ऐकून मालती थोडी सावरल्यासारखी झाली.मला म्हणाली,
“मी पुढचा विचार करून म्हणते,जगातल्या प्रत्येकाने-गोंधळलेल्या ख्यातिप्राप्त व्यक्तिनी,खोटारड्या राजकरण्यानी, साहसी लोकानी,एकतरी झोपाळा खरेदी करावा. त्यामुळे ते कदाचीत शांतीपूर्ण जीवन जगतील.कारण मी खात्रीपूर्वक सांगते झोपाळ्यावरचे झोके सर्व समस्यांचं उकलन करतात.प्रश्न एव्हडाच आहे की कोण किती वेळ झोके घेत रहातो?.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com