Wednesday, December 30, 2009

माझ्या गळाला लागला मासा.

“मासा एव्हडा मोठा होता की त्या वयात मला आजोबांची मदत घेतल्याशिवाय ती भयंकर कामगीरी पार पाडता आली नसती.”

ह्यावेळी मी आजगावला- माझ्या आजोळी- जाताना बस वगैरे न घेता पायीच जायचं ठरवलं.वेंगुर्ल्याहून निघालो होतो.उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पहाटेच निघालो होतो.मधली लहान लहान खेडी पार करून जाता जाता उभादांडा नावाचं गाव लागतं.ह्याच उभ्यादांड्याला आपल्या सुनील गावसकरचं घर आहे.ह्या गावात मुख्य रस्त्याच्या आजुबाजूला घरं आहेत आणि बरीचशी घरं कौलारू आहेत.रस्त्यावर भरदुपारी संध्याकाळ झाल्याचं वातावरण दिसतं.आणि त्याचं मुख्य कारण कोकणातली वनराई. पाहू तिकडे माडाची,पोफळीची उंचच उंच झाडं आणि पोफळीवर किंवा तरूण माडाच्या झाडावर ज्याला कवाथा म्हणतात त्यावर पानवेली निक्षून दिसतात.

आणखी एक दोन खेडी चालून गेल्यावर घाटी लागते.घाटी चढून जाताना मजा येते.जसं जसं घाटी वर चढत जावं तसं तसं रस्त्याच्या कडेवर येऊन पाहिल्यास खालच्या पातळीवरची गावं दिसतात.आणि भर दिवसा घराघरातून धुराचे लोट आलेले दिसतात.लाकडं जाळून चुलीवर जेवण केलं जात असल्याने प्रत्येक घराच्या कौलावर धुरांडी लावलेली असतात त्यामुळे सर्व गावातून धुराचा लोट आलेला दिसतो.
घाटीच्या अगदी माथ्यावर आल्यावर खाली वाकून पाहिल्यावर मोचेमाडची नदी दिसते.”संथ वाहते कुष्णामाई “ह्या गाण्याची आठवण येते.मोचेमाडची नदी थोड्या अंतरावर वेगुर्ल्याच्या समुद्राला मिळून जात असल्याने पाणी संथ होत जातं.लहान लहान होड्या खपाटे,आणि साधारण आकाराची गलबतं एव्हड्या उंचीवरून पाहिल्यावर नदीवरून किती वाहातूक होते याची कल्पना येते.वेंगुर्ल्याच्या बंदरावर किंवा मांडवीवर ही मालवाहू गलबतं मुंबईला जाणारा माल घेऊन जातात.त्यात आजुबाजूच्या गावातला भाजीपाला,केरसुण्या,सुपं,रवळ्यासारख्या वस्तु,ऊस आणि सुकाबाजार म्हणजेच सुके मासे भरलेल्या टोपल्या असतात.काही वेळा हा माल वेंगुर्ल्याहून ट्रकने बेळगाव कोल्हापूर सारख्या शहरात पण जातो.

घाटीला उतार लागल्यावर चालायला जरा बरं वाटतं.सकाळच्यावेळी तर नदीवरून येणारा थंड वारा खूपच आल्हादायक वाटतो.
ह्यावेळी मी मोचेमाड गावात मुक्काम करायचं ठरवलं.एक रात्र काढून मग दुसर्‍या दिवशी पुढचा प्रवास करायचं ठरवलं. माझ्या लहानपणी माझ्याबरोबर शिकणारा डिसोझा ह्याचं हे मुळ गाव.शिक्षणासाठी तो वेंगुर्ल्याला राहायला यायचा. सुट्टीत आपल्या गावी मोचेमाडला जायचा.
मी त्याच्या बरोबर बरेच वेळा सुट्टीत राहायला गेलो होतो.
त्याचा पत्ता शोधत कोळीवाड्यात गेलो.आता गावात फारच सुधारणा झाली होती.पूर्वीच्या त्याच्या घराचं नवीन घरात रुपांतर झालं होतं.
एका घराच्या खळ्यात एक मोठ्या पोटाचा,डोक्याला टक्कल आलेला भरपूर मिशा आणि कल्ले असलेला माणूस दिसला.
“रॉड्रीक्स डिसोझा कुठे राहातात हो?”
असा मी त्याला प्रश्न केला.
“हांवच रॉड्रीक्स “
असं म्हणून माझ्याकडे बघून तो हंसला.
मी पण हंसलो.पण मी म्हणत होतो तो माझा शाळकरी मित्र हाच ह्याची मला खात्री नव्हती.मी पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वीच तो म्हणाला,
“अरे बामणा मी तुला ओळखलं.”
त्याने मला आत बोलावून घेतलं.
“ते कसं?”
मी त्याला आत शिरता शिरता विचारलं.
“अरे बामणा तुझ्या उजव्या गालवरची खळी माझ्या चांगली लक्षात आहे रे.”
डिसोझा मला शाळेत बामणा म्हणून हाक मारायचा हे माझ्या चटकन लक्षात यायला वेळ लागला नाही.
“तुझ्याकडे मी आज मुककाम करणार आहे.”
असं मी त्याला सांगून टाकलं.
“आणखी एक दिवस राहा.आता दिवस संपायला आला आहे. परवा तू जा तुझ्या आजोळला”
मला अगदी आग्रह करून डिसोझा म्हणाला.

दुसर्‍या दिवशी आम्ही दोघं नदीवर गेलो होतो.नदीच्या किनार्‍यावर एका झाडाखाली बसून गप्पा गोष्टी करीत होतो.
मित्र मंडळी,सखे-सोयरे ह्यांचामधे मिळून मिसळून राहिल्याने माणसाला काही ना काहीतरी फायदा होत असतो.त्याच्या कोळीवाड्यात झालेल्या स्थित्यंतराला बघून मी विषय काढला होता.कारण फार पूर्वी हा कोळीवाडा अगदी डबघाईला आलेला होता.
सरकारी मदत घेऊन आणि समाजातल्या मंडळीच्या सहकार्याने आम्ही आमची प्रगती करून घेतली.असं मला डिसोझा म्हणाला.

मी डिसोझाला म्हणालो,
“मैत्रीमधून आणि सख्ख्यामधून आपण जीवनात जमल्यास काहीही प्राप्त करूं शकतो ह्या म्हणण्यावर माझा विश्वास आहे.समाजात होणारा विकास किंवा शास्त्रीय आणि इंजीनियरींगच्या ज्ञानात होणारी उन्नति हे एकट्या दुकट्याच्या हातातलं काम नव्हतं.
सहयोग हे जीवनातलं मूळ तत्व आहे.मदतीशिवाय काही ही गाठणं शक्य होणार नाही.आणि हे माझं म्हणणं जीवनातल्या सर्व पैलुना लागू पडतं,अगदी जरी नदीतून एखादा मासा गळाला लागल्या पासून ते क्रिकेटमधे विजय मिळवण्यापर्यंत खरं आहे असं मला वाटतं.”
नदीवर काही लोक गळ टाकून मासे पकडत होते ते दृष्य बघून मला ते उदाहरण द्यावसं वाटलं.

डिसोझा जरासा विचार करताना दिसला.मला म्हणाला,
“तू ह्या मासा आणि गळाचं उदाहरण देऊन माझी जुनी आठवण जागृत केलीस.
माझे आजोबा अगदी माझ्या लहान वयापासून माझे मित्र कसे मला होते.आम्ही एकमेक जीवनातल्या अनेक क्षणाचे हिस्सेदार आहोत.
माझ्या सांठवणीतल्या अनेक बहुमुल्य क्षणामधला एक क्षण म्हणजे जेव्हा आम्ही नदीत एकदा गळ टाकून मासे पकडत होतो तो क्षण.
त्यापूर्वी मी कधी गळाला मासा लावून पकडलेला अनुभवला नव्हता.नव्हेतर नदीतल्या पाण्यातून मोठमोठाले मासे काढून किनार्‍यावर तडफडता पाहून मी भयभीत व्हायचो.
बहुदा त्यावेळी मी सातएक वर्षाचा असेन.तसा प्रकृतिने किरकोळ होतो.आणि तेव्हडा चतुरही नव्हतो.”
मी म्हणालो,
“सुट्टीत मी तुझ्याबरोबर इकडे आल्यावर मला आठवतं आपण सर्व तुझ्या आजोबाबरोबर नदीवर गळ टाकायला यायचो.मला असं मासे पकडणं आवडायचं.”

“त्यादिवशी नदीच्या काठावर मी आणि माझे आजोबा एका तासाच्यावर ताटकळत बसून मासा गळाला लागण्याची वाट पहात होतो.”
आपली एक आठवण डिसोझा मला सांगत होता.
“काही होत नव्हतं.पाणी संथ वहात होतं.आजूबाजूची झाडं आणि हवाही स्थिर होती.जणू समयसुद्धा स्थिर झाला आहे आणि कशाचीही हालचाल बंद पडली असं वाटत होतं.
नाही म्हटलं तर मात्र त्या चिखलामधे उडणार्‍या मोठ्या माशांची आणि मुर्कुटांचा गोंगाट कानाकडे होत होता.मधूनच एकटा दुकटा पक्षी मोठ्या झाडाच्या फांदीवरून आवज करताना ऐकू येत होतं.
माझे आजोबा डुलकी काढायला लागले असावेत पण मला खात्री नव्हती कारण मला स्वतःलाही थोडी डोळ्यावर झापड येत होती.
एक डुलकी येण्याच्या बेतात असताना एकदम माझ्या गळाला जोरात ओढ येऊन झटका बसल्यासारखं झालं.आणि गळाची काठी माझ्या हातून जवळ जवळ सुटली.ती काठी पाण्यात पडून वाहून जाण्यापुर्वी माझ्या आजोबांनी चपळतेने ती पकडली.
अजूनही मला कळायला अवघड होतंय की त्यावेळी आजोबा कसे जागे झाले आणि एखाद्या सहा इंद्रियबोध असलेल्या मांजरासारखं प्रतिक्रिया देऊ शकले.त्यांनी तो गळ माझ्या हातात दिला आणि मी तो पाण्यातून बाहेर खेचू लागलो.पण तसं करताना आजोबांची मला मदत घ्यावी लागली.गळाला मोठा मासा लागला होता.आणि त्या माश्याला किनार्‍यावर आणायला पण मला आजोबांची मदत घ्यावी लागली.मासा एव्हडा मोठा होता की त्या वयात मला आजोबांची मदत घेतल्याशिवाय ती भयंकर कामगीरी पार पाडता आली नसती.”

“तुझ्या एका चांगल्या आठवणीतून तू माझ्या म्हणण्याला दुजारा दिलास.”
असं मी डिसोझाला म्हणालो.
“मी तुला आणखी अनेक उदाहरणं देऊन सांगेन आपण दोघं जे म्हणतोय त्यात तथ्य आहे.कसं ते सांगतो”
आणि मी त्याला म्हणालो,
“चंद्रावर माणूस पाठवायला एका माणसाची कामगीरी नव्हती.क्रिकेटचा कॅप्टन एकटा मॅच जिंकू शकत नाही.मुलं स्वतःला शिकवूं शकत नाहीत.चंद्रावर माणूस पाठवायला कित्येक वर्षाची मेहनत आणि अनेक लोकांची मेहनत कारणीभूत होती.कॅप्टनला त्याच्या इतर दहा जणाची मद्त लागते तेव्हा तो मॅच जिंकतो.मेहनत घेणार्‍या शिक्षकांशिवाय मुलं शाळा शिकून बाहेर पडत नाहीत.
ह्या जगात एकट्याला काहीही साध्य होऊ शकणार नाही.जेव्हा लोकाना कळतं की स्वार्था ऐवजी निस्वार्थता असायला हवी,अहंवादी प्रवृति ठेवण्यापेक्षा सुजन असायला हवं असं झाल्यावर अशक्य शक्य करून दाखवता येईल.असाध्य रोग साध्य होईल.कठीण कर्म सोपं केलं जाईल.”

“असेच आपण लहानपणी नदीच्या किनार्‍यावर येऊन कुठचा तरी विषय घेऊन चर्चा करायचो.आणि माझे आजोबा आपला अनुभव सांगून आपली चर्चा वाढवायचे.तुला आठवत असेल.खूप दिवसानी मी तुझ्या बरोबर अशी चर्चा केली. नाहीतर आमचं रोजचं चालूच असतं.”
डिसोझा जुनी आठवण काढून आणि आजोबांची आठवण काढून डोळे फुशीत म्हणाला.
“बघुया,पुन्हा असा भेटण्याचा योग आला तर भेटूया”
असं म्हणत आम्ही दोघं डिसोझाच्या घरी जेवायला गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 28, 2009

सूड

“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.”

ऍम्सटरडम मधून निघालेली फ्लाईट डिट्रॉइट्ला उतरण्यापुर्वी ते विमान पेटवून लोकांना मारण्याचा कट असफल झाला.ही आजची ताजी आणि बहुचर्चीत बातमी प्रो.देसायांच्या नजरेतून सुटली नव्हती.
तेवीस वर्षाच्या सुशिक्षीत (?) व्यक्तीने असं करून कुणाचा सूड साध्य करण्याचा प्रयत्न केला होता कुणास ठाऊक.

मला ज्यावेळी आज संध्याकाळी प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा प्रथम हा विषय काढून बोलल्याशिवाय त्यांना रहावलं नाही.
भाऊसाहेब म्हणाले,
“कुणी तरी म्हटलंय की खारट पाणी पाहिल्यावर तहानेलेल्या माणसाच्या तहानेवर जेव्हडा परिणाम होईल तेव्हडाच सूडवृतीचा परिणाम मनोभावनेवर होईल.”
हे ज्या कुणी म्हटलंय ते मला अगदी पटतं.सूडाने फक्त जे अमुल्य आहे त्याचा र्‍हास होईल.मग तो पैसा असो,मालमत्ता असो,किंवा आणखीन काही महत्वाचं असो.सूडाचा परिणाम नेहमीच काहीतरी नाश होण्यातच होतो.
मला वाटतं,लोकांच्या ह्या सूडवृत्तीचा हा इरादा जरा अतीच झाला आहे.लोकांकडे इतका शस्त्रांचा साठा असणं हे काही खरं नाही. त्यामुळेच गॅन्ग-वॉर चालू होतं.आणि त्याची परिणीती मग भयंकर हानीत होते.

मला माझ्या लहानपणीचं आठवतं.माझ्यात आणि माझ्या एका मित्रात वाकडेपण आलं. एकदा मी त्याला जोरात ढकललं.त्याचं डोकं भिंतीवर आपटलं.आणि तो खाली पडला तो उठेना.नंतर कळलं त्याला चक्कर आली.मला त्यावेळी वाटलं की माझ्या हातून त्याची हत्याच झाली.
मला त्यावेळी वाटलं होतं की माझे आणखी काही मित्र माझा द्वेष करतील.तो पण माझा द्वेष करील असं ही वाटलं होतं.नंतर त्याने मला माफ केलं ती गोष्ट वेगळी.आणखी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्यावेळी माझ्या लक्षातही आलं नाही की मी त्याचा सूड का घेतला ते.

मला वाटतं लोकं विसरा आणि माफ करा अशा वृत्तीत राहिले तर जीवन सुखकर होईल.
युद्ध करण्याची खुमखूमी एव्हड्यानेच येते की दुसर्‍याचा देश आपण जिंकावा असं एखाद्या देशाला वाटतं.प्रथम लोकांनी शांत राहून विचार करावा की आपण असं करायला का उद्युक्त होतो.सूड नुसतंच नुकसानी करीत नाही तर त्याचा फैलाव ही होतो.एकमेकावर सूड घेतल्याने आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचाही सूड घेतला जातो. जीवन उध्वस्त होतं,घरं उध्वस्त होतात.
मला वाटतं जगाचे कधीतरी डोळे उघडतील.सूडामुळेच नुकसानी होते हे लोकांच्या लक्षात येईल.आणि जगात शांतता नांदेल.पण ते होण्यापूर्वी किती अमुल्य गोष्टींचा र्‍हास करावा लागेल कुणास ठाऊक.”

प्रो.देसाई जरा भावनावश झालेले मी पाहिले.म्हणून मी त्यांना एव्हडंच म्हणालो,
“भाऊसाहेब,काही गोष्टी का घडतात हेच कळत नाही.पण एक मात्र नक्की.
“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.”
हे जे कुणी म्हटलंय ते मात्र मला अशावेळी अगदी पटतंय.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 26, 2009

पहिला तारा पहाण्याचा प्रसंग प्रत्येक रात्रीचा.

“जरी माझं जीवन आनंदायी होतं तरी त्या आनंदावर माझा आवर असायचा.पण एखाद्या तृप्त जीवानात वाटावं तशी माझ्या जीवनात मी दिलचस्पी घेत नव्हतो.”

मला आठवतं त्या दिवशी मी दिल्लीहून दुपारची फ्लाईट घेऊन घरी आलो होतो.आदल्या दिवशीच्या मोठ्या मिटींगमुळे जरा थकवा आला होता.घरी आल्यावर फ्रेश होऊन थोडी विश्रांती घ्यायचं मनात होतं.
पण लिखीत निराळंच होतं.घरी आल्यावर कळलं की मि.महात्म्यांना जोरदार हार्ट ऍटॅक येऊन ते लागलीच निर्वतले. महात्मे आमच्या कॉलनीत राहायचे.

आल्या आल्या तसाच त्यांच्या घरी गेलो.महात्मे शेअरबाजारात ब्रोकर होते.कदाचीत शेअरमधे मंदी आल्याने त्यांची नुकसानी झाली असावी. त्याचा परिणाम असावा.त्यांचा मोठा मुलगा कमलाकर त्यावेळी कॉलेजमधे शिकायचा. वडीलांच्या पश्चात आता त्याच्यावर सर्व जबाबदारी आली होती.
महात्म्यांची आर्थीक परिस्थिती तशी चांगली होती.त्यानंतर कमलाकरने कॉलेज पुर्ण करून त्याच्या वडीलांच्या मित्राच्या शेअर बाजारातल्या फर्ममधे काम पत्करलं होतं.आणि आता कमलाकर स्वतः शेअर ब्रोकर झाला होता.
अशाच एका कंपनीच्या शेअर संबंधाने मी त्याला त्याच्या घरी भेटायला गेलो होतो.मला पाहून त्याला खूपच आनंद झाला.
मला म्हणाला,
“काका,तुम्हाला पाहिल्यावर माझे मला लहानपणाचे दिवस आठवले. आता पर्यंत पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं. पण माझ्या लहानपणाच्या संवयी आठवायला काहीतरी कारणं लागतात.तुम्हाला बघून त्या आठावणी काढून मन मोकळं करावंसं वाटायला लागलं”
मी कमलाकरला विचारलं,
“कुठल्या संवयी?”

मला म्हणाला,
“आकाशात तार्‍यांकडे बघून जे काही मनात असेल ते पुरं होऊ दे असं त्या तार्‍याकडून मागून घेण्यावर त्यावेळी मी विश्वास ठेवायचो.
मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी माझ्या झोपायच्या खोलीतून खिडकीमधून प्रत्येक रात्री जो पहिला दिसेल त्या तार्‍याकडे मनातली इच्छा पुर्ण होण्यासाठी मागावं हा माझा रोजचा रिवाजच झाला होता.”
मी कमलाकरला म्हणालो,
“हे बघ,किशोर वयातली ही एक प्रकारची कसोटी म्हणा किंवा किशोर वयातली कटुअनुभवाची अनुभूती म्हणा ह्या संवयीची त्यासाठी मदत होत असते.
आपल्या पेक्षा भव्य असलेल्या गोष्टीशी आपलं काय नातं आहे हे पहाण्यासाठी ह्या संवयीतून आपला नेहमीचा प्रयत्न होत असतो.जरी मनातल्या मागण्यांची पुर्तता तार्‍यांकडून होत नसली तरी काही दृष्टीने तसं करणं काहींना बरं वाटतं.”

“काका,मी कॉलेजमधे गेल्यावर ह्या रिवाजाला जरा खंड पडला आणि त्याचं मुख्य कारण कॉलेजच्या जवळच्या ज्या इमारतीत मी रहात होतो त्यातली माझी खोली खिडकी पासून जरा दूरच होती.पण ज्यावेळी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या घरी परत यायचो त्यावेळी वेळात वेळ काढून माझ्या जीवनात जे काय घडायाचं त्यावर विचार करायचो. आणि काही तरी नव्या गोष्टीसाठी तार्‍याकडे मागणी करायचो.”
कमलाकर सांगू लागला.
“एकदा एका वर्षी दिवाळीच्या सुट्टीत मी घरी आलो होतो.माझे बाबा त्या सुट्टीत निर्वतले होते.त्यांचा शेअर ब्रोकरचा व्यवसाय होता.त्या दिवाळीत मार्केटमधे खूपच मंदी आली होती.शेअरचे भाव खूपच खाली आल्याने माझ्या बाबांची बरीच आर्थिक हानी झाली होती.त्याचा त्यांच्या मनावर धक्का बसून हार्ट-ऍटॅकने ते गेले.हा मानसीक धक्का,अतीव दुःख,उदासिनता ह्यामुळे माझं डोकं नेहमी सुन्न व्हायचं. एकदा रात्री मी खिडकीतून बाहेर आकाशाकडे डोकावून पाहिलं पण तार्‍याकडे काही मागायची इच्छा होई ना.नव्हे तर तसं करणं बरोबर वाटे ना.माझा ह्या माझ्या संवयीवर असलेला
विश्वास उडाला होता अशातला हा प्रकार नव्हता.परंतु, मी तार्‍याकडून मिळणार्‍या आशा-अपेक्षांवर मन केंद्रीत न करता ही दुःखद घटना सहजपणे हाताळण्याचा प्रयत्न करीत होतो.”

“त्याचं काय आहे”
मी कमलाकरला म्हणालो,
“जशी वर्ष निघून जातात.आणि नंतर हळू हळू विचाराने पोक्त झाल्याने,शिक्षणामुळे,आणि जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळीच्या सहाय्याने जीवन सुखकर होत जातं.आणि ह्या किशोरावस्थेतली तार्‍याकडून इच्छा मागून घेण्याची संवयी लोप पावत जातात. कदाचीत मी असंही म्हणेन की त्या संवयीला घट्ट गुंडाळून बाजूला ठेवून दिलं जातं.”

“काका,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे”
असं म्हणून तो पुढे म्हणाला,
“अधून मधून मी वर आकाशाकडे बघत असे आणि थोड्या सहाय्याची मागणी करीत असे.पण बरेच वेळा माझ्याच मला मी तसं न करण्याची तंबी द्यायचो आणि त्यामुळे मझ्याकडून तार्‍याकडे काही तरी मागण्याचा बालीश प्रयत्न होत नसायचा.
जरी माझं जीवन आनंदायी होतं तरी त्या आनंदावर माझा आवर असायचा.पण एखाद्या तृप्त जीवानात वाटावं तशी माझ्या जीवनात मी दिलचस्पी घेत नव्हतो.”
“पण आता तुझं लग्न ठरलंय असं मी ऐकलंय.मग केव्हा लग्न करतोयस?”
असा मी कमलाकरला प्रश्न केला.

“अलीकडेच मी एक मुलगी पाहायला गेलो होतो.आणि ती मला पसंत पडली.मी सुद्धा तीला पसंत होतो.एक दिवस तीच्याबरोबर फिरायला जाऊन नंतर मी तीला तीच्या घरी सोडायला पण गेलो. तीला तीच्या घरात सोडून आल्यावर नेहमी वाटावं त्यापेक्षा त्यावेळी जरा निराळंच वाटलं.चालत चालत घरी येत असताना मी वर मान करून सहज आकाशाकडे पाहिलं.आणि कोणतंही मनात अनमान न आणता पहिल्या दिसलेल्या तार्‍याकडे मागणी केली.
आणि ती फळाला आली.माझं आणि तीचं आता लग्न ठरलंय.वयक्तीक दृष्टीकोनातून पाहिल्यास आता पर्यंत मला मी एव्हडा परिपूर्ण झालो असं जाणवलं नव्हतं.”
हे कमलाकरचं ऐकून मी जरा माझ्या गालातल्या गालात हंसलो.

“काका,तुम्ही हंसला, त्यावरून माझी खात्री झाली आहे की तुम्ही ह्या माझ्या म्हणण्यावर नक्कीच काही तरी स्पष्टीकरण म्हणा किंवा सफाई म्हणा देणार हे उघडंच आहे.”
कमलाकरने माझ्या मनातलं ओळखलं.
मी म्हणालो,
“तुझं बोलणं ऐकून लगेचच माझ्या मनात प्रश्न आला की तुझ्या बाबतीत हा ठरावीक समयाचा प्रताप होता का? की तो समय येई पर्यंत तुझ्या जीवनात ती मुलगी येण्याचं तू तुला आवरून ठेवलं हो्तंस?.तुमचं दोघांचं जन्मोजन्मीचं नातं असल्याने तीला भेटेपर्यंत वाटेत आलेल्या सर्व अडचणी निघून गेल्या असाव्यात का? हे काही खरं असेल असं मला वाटलं नाही.
नंतर माझ्या मनात आलं की कदाचीत ही तुम्हा दोघातली रहस्यमय प्रकिया आहे असं तर नाही ना?का एकमेकाचं होण्यासाठी निर्माण झालेली ती ओढ तर नाही ना?
हे जरा मला जास्त संयुक्तीक वाटलं.”

मला कमलाकर म्हणाला,
“काका,तुमचं हे ऐकून मला काय वाटतं ते खरं सांगू का, मी माझ्याच मनात म्हणतोय की तार्‍याकडे माझ्या इच्छापुर्तीची मागणी करण्याच्या माझ्या संवयीचा चमत्कारपूर्ण त्याग होण्यासाठी, माझ्या विचारात परीवर्तन होण्याचा हा प्रकार असावा. “

“जाउं देत रे,सकाळ झाली म्हणजे झालं.कुणाच्या कोंबड्याच्या आंरवण्याने सकाळ झाली ह्याला महत्व नाही.तुझं लवकरच लग्न होणार आहे हीच खरी आनंदाची गोष्ट आहे.ह्यावेळी मला दोन कवितेच्या ओळी उस्फुर्त सुचल्या.त्या ऐक.”
असं म्हणून मी म्हणालो,

“प्रकाश नीळ्या नीळ्या नभाचा
झगमगाट लुकलुकणार्‍या तार्‍याचा
पहिला तारा पहाण्याचा
प्रसंग प्रत्येक रात्रीचा
मागणी इच्छा पुर्तीची
होईल का ती खात्रीची”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 24, 2009

कवटाळीले मी सार्‍या दुःखाना

(अनुवादीत)

घे मज जवळी हे जीवना
कवटाळीले मी सार्‍या दुःखाना
करूनी बहाणा
लपवीत जमाना
केले घर माझ्याच नयनातील पापण्याना
दे मज सहारा हे जीवना

चिमुकली परछाई लोचनी आणताना
करूनी बहाणा
लपवीत जमाना
भरीले मन पिऊनी दोन आंसावाना
दे मज किनारा हे जीवना

घे मज जवळी हे जीवना
कवटाळीले मी सार्‍या दुःखाना

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 22, 2009

रंगात छपलेलं सौन्दर्य.

“ही अगाध चित्रकारी माझ्या मनात येणार्‍या उमेदीबद्दलची माझी समझ ताजी करते आणि त्यावर असलेली माझी श्रद्धा पुनःनिर्माण करते.”

ते पावसाचे दिवस होते.मी वर्दे यांच्या घरी गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती.त्यांच्या घराच्या समोरच्या पटांगणात आम्ही खूर्च्या टाकून बसलो होतो.आकाशात ढग जमले होते.पण पाऊस येण्याची शक्यता बरीच कमी होती.काळे कुट्ट ढग पाहून आणि गार हवेची झुळूक मधून मधून अंगावरून गेल्यावर थोडातरी पाऊस पडून जावा असं मनात येत होतं.
तेव्हड्यात दोन मोठ्या ढगामधे अंतर येऊन त्या भेगेमधून संध्याकाळच्या सूर्याची सोनेरी किरणं दिसायला लागली होती.माझ्या मनात आलं अशाच वेळी सुंदर इंद्रधनुष्य तयार व्हावं.आणि तसंच झालं.ते सप्तरंगी इंद्रधनुष्य पहात असताना वर्दे यांची मुलगी, सूंदरी-कुंदा-आमच्यासाठी चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली.रिकाम्या कपांच्या खणखण आवाजाने मला तीची चाहूल लागली.कुंदाला मीच सुंदरी म्हणायचो.खरोखरच ती लहानपणापासून सूंदर दिसायची. गोरा गव्हाळी रंग,लाल चुटूक ओठ, काळे भोर डोळे, कारण डोळ्यातला पांढरा भाग कमीच होता.सरळ नाक आणि गोड वरच्या पट्टीतला आवाज. अशी कुंदा त्यावेळी दिसायची.म्हणूनच मी तीला सुंदरी म्हणायचो.आता ती अर्थात मोठी झाली होती.पण सर्व सौन्दर्य टिकवून होती.
चहाचा कप माझ्या हातात देता देता आणि दुसरा कप आपल्या हातात घेऊन चहाचा घोट घेता घेता दुसर्‍या खूर्चीवर बसली.आणि मला म्हणाली,
“बोला”

मी कुंदाला म्हणालो,
“ते इंद्रधनुष्य बघ.विश्वकर्म्याची काय ही कलाकृती.?”
कुंदाला मी न जाणता काहीसं सक्रिय व्हायला कारणच दिलं.
मला म्हणाली,
“काका,रंगातलं सौन्दर्य मला विशेष आवडतं.
मग तो आ-वासून प्रेरणा देणारा छानदार जांभळट पर्वतांच्या रांगांच्या मागे दिसणारा आभाळातल्या गुलाबी आणि नारंगी रंगाच्या अस्थाला जाणार्‍या सूर्याच्या झगमगत्या छटा सारखा असो वा पांढर्‍या शुभ्र कागदावरचा काळ्या अक्षरातला उतारा असो.”

मी कुंदाला म्हणालो,
“काही लोकांचे ह्या जगातले निरनीराळे भेदभाव,मग ते माणसा माणसातले असो,रंगारंगातले असो किंवा सौन्दर्यातले असो जेव्हा आपल्या समजूतींची छेडछाड करतात तेव्हा, त्याचं मला विशेष कुतूहल वाटतं.रंगाचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास,एखादा लालभडक तिखट पदार्थ आपल्या ओठातून शिरकाव करून जीभेवर विराजमान होतो तेव्हा तोंडात पाण्याचा पूर येतो. नाकपुड्या फुगतात जेव्हा हिरव्या गार गवताजवळ गेल्यावर मातीचा सुगंध नाकपुड्या हुंगतात तेव्हा.जेव्हा काळे-करडे कभिन्न ढग उंच आभाळात लोंबताना दिसतात,तेव्हा उदासिनतेत डुबून गेल्यासारखं वाटतं आणि केव्हां एकदा उत्कंठा आणणारं,उत्साह आणणारं नारंगी रंगाचं वातावरण येईल असं वाटतं.किती हे रंग वातावरण निर्माण करतात?”

हे ऐकून कुंदा मला म्हणाली,
“असं असूनही कुठलाच रंग नाडी-स्पंदन वाढवीत नाही, जीभेला स्थिर करीत नाही,उदरात मंथन करीत नाही,भावना प्रज्वलीत करीत नाही जेव्हडं काळ्या आणि गोर्‍या रंगातलं वैषम्य करूं शकतं.”
“असं तू का म्हणतेस?”
मी कुंदाला प्रश्न केला.

“त्याचं असं झालं,”
ती म्हणाली,
“लहानपणी मी माझ्या आईवडीलांबरोबर एका जत्रेला गेली होती. असेन मी कदाचीत दोन-तीन वर्षाची.त्याठिकाणी माझ्या आईवडीलांची दुसर्‍या एका जोडप्याशी ओळख झाली.त्यांच्या बरोबर एक काळसावळी मुलगी होती.असेल चारएक वर्षाची.मी एकटीच जत्रेतल्या त्या उंच रंगीबेरंगी चक्राची राईड घ्यायला घाबरत होती.ती मुलगी माझ्याबरोबर मला साथ द्यायला जणू माझी मोठी बहिण होऊन पुढे आली.तीचं नाव मला आठवतं, केतकी.
ती माझ्या संरक्षणासाठी आपला हात हळूवारपणे माझ्या गळ्यात टाकून मला जवळ ओढून बसली होती.आम्ही दोन मुली मांजरांची दोन गुबगुबीत पिल्लांसारखी दिसत असावी.आमचा उत्साह माझ्या बाबांनी त्यांच्या कॅमेर्‍यात टिपला होता.आम्ही दोन मुली निरागस चेहर्‍याच्या,निष्कपट मनाच्या त्या फोटोत दिसत असाव्यात.”

मी म्हणालो,
“हो,तो मी तुझा फोटो पाहिला होता.मी तुझ्या बाबानां म्हणालो ही होतो,
“नातं ना गोतं पण अगदी मागच्या पुढच्या बहिणी सारख्याच दिसतात.”
पण त्या फोटोची तुला आज आठवण का आली?”

“कारण सांगते,मी ज्यावेळी अकरा वर्षाची झाली तेव्हा मला आठवतं आमच्या शाळेतल्या बाईंनी एक सुंदर नाचाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
आम्ही सर्व मुली त्यात हिरीरीने भाग घेतला होता.पण काही मुली निष्कारण भांडण उकरून माझ्याशी न बोलत्या झाल्या होत्या.मला आठवत्तं एक दोनदां काही मुलीनी कट रचून मला वर्गात कोंडून ठेवलं होतं. त्या फोटोतल्या मुलीची आठवण आली की माझ्या जीवनातले काही प्रसंग मला आठवतात.मघाशी तुम्ही जे भेदभावाचं काहीसं म्हणालात ना त्या भेदभावाने मला त्या फोटोची आणि इतर प्रसंगाची आठवण आली.”

मी म्हणालो,
“हे बघ कुंदा,तू काहीशी सुंदर चेहर्‍याची गव्हाळ रंगाची असल्याने बर्‍याच जणाकडे आकर्षित होत असावीस. ते तर त्यांच्यात असूया आणण्याचं कारण नसेल ना?”
“कदाचीत तुमचं म्हणणं बरोबर असेल.
कारण नंतर वरच्या शाळेत गेल्यावर पण मला अश्याच प्रकारचा अनुभव आला.”
असं सांगून कुंदा पुढे म्हणाली,
“निरनीराळ्या स्वभावांच्या मुलींशी माझी मैत्री असताना सुद्धा आणि मी नेहमीच त्यांच्याशी प्रेमळ वागणूक ठेवली असताना सुद्धा माझ्या वर्गातल्या एका मुलीने मला टाकून बोलायचा प्रयत्न केला.एकदा तीने माझ्याशी धक्काबूक्की केली.माझी पुस्तकं लपवली आणि असाच हा कटू अनुभव एकदा आमच्या शाळेच्या ड्रॉइंग टीचरनी पाहिला.आणि त्यापासून त्या मुलीवर अप्रत्यक्ष वचक आला. चकचकीत वाटणार्‍या माझ्या जगात मला फिका फिका प्रकाश दिसायला लागला.आणि अशीच एक दिवस मी मन कंपीत करणार्‍या एका फोटोअल्बमवर धडपडले. त्यात तो दोन लहान मुलींचा फोटो दिसला. तोच तो फोटो जो माझ्या बाबानी त्या जत्रेत काढला होता.”

जेव्हा मला माणसाच्या मनातली मनोहरता संपली असं वाटतं त्यावेळी हा फोटो माझा नैतिक होकायंत्र आहे असं मी समजते. ज्यावेळी त्या फोटोकडे मी पहाते त्यावेळी माझ्या संरक्षणासाठी तीने टाकलेला माझ्या गळ्यातला तो तीचा हात आणि मला चिकटून बसलेली ती मुलगी फोटोत पाहून मलाआकाशातल्या इंद्रधनुष्याची आठवण येऊन मी मंत्रमुग्ध होते.ती माझ्यापेक्षा जरा काळसावळी असली तरी आमच्या दोघातल्या प्रेमाच्या रंगाच्या छट्या त्या इंद्रधनुष्यासारख्याच वाटतात.
ही अगाध चित्रकारी माझ्या मनात येणार्‍या उमेदीबद्दलची समझ ताजी करते आणि त्यावर असलेली माझी श्रद्धा पुनःनिर्माण करते.”

मी म्हणालो,
“पण सर्वात महत्वपूर्ण म्हणजे खरोखरच ही चित्रकारी, ते रंग किती सुंदर असू शकतात ह्याची जाणीव करून देते.तुला नाही का वाटत?”
“काका,अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात.”
असं कुंदा म्हणाली.
आणि आम्ही दोघं परत आकाशाकडे पहायला लागलो.पण ते सप्तरंगी इंद्रधनुष्य केव्हांच फुसलं गेलं होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com

Sunday, December 20, 2009

लाल गुलमोहराचं झाड.

“मला वाटतं प्रतीक्षेतली मनोहरता वेगळीच असते.चंद्राच्या प्रकाशाची चंदेरी झगमग नुकतीच क्षीतीजावरून इंच इंच वाढत असताना फक्त स्वर्गातून त्याचा महिमा पाहणं शक्य असावं अशी ती प्रतीक्षा अशावेळी वाटते.”

करमकराना फक्त एकच मुलगा होता.पराग.
त्याचं त्यांनी वेळेवर लग्न करून दिलं.परागची पत्नी सुंदर दिसायला होती.पराग ही राजबिंडा दिसायचा.त्यांचं लग्न होऊन बारा वर्ष झाली होती.तरीपण त्यांना मुल नव्हतं.सगळेच काळजीत होते.त्यातल्या त्यात करमकर आजीआजोबा.
जवळ जवळ सर्व प्रयत्न करून,डॉक्टरी उपाय करून सुद्धा निराशे शिवाय काही पदरी पडलं नाही.
करमरकर आजोबा एकदा मला म्हणाले होते,
“बर्‍याच गोष्टी विधीलिखीत असतात.प्रयत्न करणं आपलं काम.”
मी त्यांना म्हणाल्याचं आठवतं,
“प्रत्येक आजी आजोबांना आपल्याला एखादं नातवंड असावं हे वाटणं अगदी स्वाभावीक आहे.कुणाच्या नशीबात काय आहे हे कुणास ठाऊक.? पण कधीही काहीही होऊ शकतं अशी आशा ठेऊन रहायला काही कष्ट पडत नाहीत.”
“तुमच्या तोंडात साखर पडो”
मला करमरकर आजी म्हणाल्या होत्या.

आणि अगदी तसंच झालं.जवळ जवळ परागच्या लग्नाला बारा वर्ष उलटून गेल्यानंतर मुल होण्याची आशा निर्माण झाली होती. करमरकर आजी आजोबांना जगावंसं वाटण्याची घटना घडली.
आज करमकरांच्या प्रतीक्षेला सोळा वर्ष पुरी झाल्याने तीच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला आम्हाला त्यांनी बोलावलं होतं.
करमकर आजी आजोबा आता खूपच थकले होते.पण नातीच्या वाढदिवशी ते खूप उमेदीत होते.
सोळा वर्षापूर्वी नात झाल्याचं कळल्यावर जेव्ह्डा आनंद ह्या दोघांवर दिसत होता तेव्हडाच आनंद आज मला दिसला.

मी दोघांनाही उद्देशून म्हणालो,
“तुम्हाला आज प्रतीक्षेच्या जन्माची आठवण येत असेल नाही का?”
करमरकर आजोबांची स्मृती वयाच्या मानाने तल्लख दिसली.
मला म्हणाले,
“हो मला अजून तो दिवस आठवतो.
बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधली वेटिंगरूम अगदी शांत होती.
पण माझी छाती धडधडत होती.आम्हाला पहिलं नातवंड होणार होतं.आणि ते सुद्धा खूप वर्षानी.मी तिकडच्या खिडकीच्या बाहेर गुलमोहर झाडावरच्या लाल रंगाच्या फुलावरती कावळे चोंच मारून काही तरी काढून खात होते ते बघण्यात दंग होतो.संध्याकाळची वेळ होती. सूर्याची उन्हं खाली उतरत होती. परागची आई बेचैन झालेली आणि थोडी काळजीत तर थोडी देवाच्या प्रार्थनेत गुंग झालेली मला दिसली. सर्व वातावरण प्रतीक्षेने व्यापलं होतं.
एकदम बाळंत-खोलीतलं दार उघडलं.नर्स बाहेर आली.तीच्या डोळ्यातली चमक आणि तोंडावरचं हंसू मला अजून आठवतं.ती म्हणाली,
“या, आजी आजोबा तुम्हाला नात झाली.तीला जाऊन भेटा.”
आमची प्रतीक्षा अगदी टोकाला पोहोचली होती.आम्ही दोघं त्या नर्स बरोबर डिलिव्हरी-रूममधे गेलो.बाळाची आईचा चेहरा आनंदी दिसला. कपड्यात गुंडाळलेल्या त्या एव्हड्याश्या जीवाला आपल्या दोन हाताच्या घडीत घेऊन तीच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन आम्हाला पाहून पराग हळूच बोलला,
“माझी प्रतीक्षा.”
एव्हडा उत्तम क्षण दुसरा कुठला नसावा.
आणि पुढे आम्ही तीला प्रतीक्षा म्हणायला लागलो.तीच्या आईलापण ते नाव आवडलं.”
मी म्हणालो,
“मला वाटतं प्रतीक्षेतली मनोहरता वेगळीच असते.चंद्राच्या प्रकाशाची चंदेरी झगमग नुकतीच क्षीतीजावरून इंच इंच वाढत असताना फक्त स्वर्गातून त्याचा महिमा पाहणं शक्य असावं अशी ती प्रतीक्षा अशावेळी वाटते.”

करमरकर म्हणाले,
“दूर गावात शिकत असलेलं आपलं मूल सुट्टीत घरी आल्यावर कसं वाटावं,एखादा जीवश्च-कंटश्च मित्राबरोबर पुनर्भेट झाल्यावर कसं वाटावं, आपल्याला अतीशय आवडणार्‍या जागेत परत आल्यावर कसं वाटावं, आपल्याला अतीप्रीय असलेल्या व्यक्तीची उबदार मिठी मिळाल्यावर कसं वाटावं तसं ह्या प्रतीक्षेचं असतं.
आणि तुम्ही म्हणता तसं, त्या हळू हळू वाढत जाणार्‍या चंद्रप्रकाशा सारखी ही अपेक्षा वाढता वाढता नव्या उमेदीला जन्म देते.”

आजींच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मला ही त्यांना अधिक आनंदी करण्यासाठी स्फुर्ती आली.
“ती उमेद की जेव्हा प्रवासातून सुरक्षीतपणे आल्यावर मिळणारी आपल्या माणासाची जवळीक,ती उमेद की ज्यातून आपल्याला आपल्या जवळच्यांच्या गळ्यात गळा घालायला मिळणारी संधी.
आणि कदाचीत,अवास्तवीक राहून ही आपल्या मनात आलेली कल्पना खरी व्हावी म्हणून केलेली उमेद.”

“पण बरेच वेळा आपण ज्या गोष्टीचं स्वप्नं करतो ते आपल्या अपेक्षे प्रमाणे होईल असं नसावं.”
आजीनीं परागचं लग्न झाल्यावर बारा वर्ष त्याला मुल होण्याच्या अपेक्षेत दिवस कसे गेले हे नकळतच सांगीतलं.
त्या पुढे म्हणाल्या,
कधी कधी अपेक्षाभंग होणं,मनाला लागणं,नाराज करणार्‍या घटना होणं हे चालूच असतं.कधी कधी आपल्या योजना उलट्या सुलट्या होणं हे ही चालूच असतं.जसं लांब राहून मग घरी परत येण्याच्या योजना मनासारख्या होत नाहीत.मैत्रीत बदलाव येतो. कधी कधी इच्छेलेली भेट घडत नाही.”

करमकर आजोबांना झालेल्या जुन्या गोष्टी विसरून जाऊन आता सकारात्मक विचार करावा हे आजींना आणि मला सुचवण्यासाठी आपला मुद्दा सांगण्याची उमेद आली.
ते म्हणाले,
“परागच्या आईचं जरी खरं असलं तरी, कधी कधी नवीन घटना अपेक्षेची जागा घेतात.कदापी अपेक्षीत नसलेलं,किंवा योजनेत नसलेलं, किंवा स्वप्नात नसलेलं घडून येतं.
आपल्याकडे असलेल्या बुद्धिचातुर्यातून,असलेल्या दृष्टीकोनातून,धैर्यातून काही घटना उघडल्या जातात आणि आपला दृष्टीक्षेप नव्या शक्यतेत रुपांतरीत होतो.”
मी ही म्हणालो,
“आणि असं घडल्यावर आपण नव्या प्रतीक्षा करूं लागतो.आणि असं करीत असताना आपलं हे नव्या अपेक्षांचं गलबत आपल्याला जीवनाच्या समुद्रात तरंगत ठेवतं.आणि असं तरंगत असताना आपण करीत असलेल्या फक्त त्या सानंद अपेक्षाच आपल्या जवळ नसतात तर कदाचीत त्यातून आपल्या स्वप्नात ही नसलेल्या,कल्पनाही न केलेल्या अपेक्षा परिपुर्ण होण्याची शक्यता असते.
आणि त्याचं जीतंजागतं उदाहरण म्हणजे तुमची प्रतीक्षा.”
प्रतीक्षेचं नाव घेताच ती आमच्या जवळ वाढदिवसाच्या केकच्या डिशीस घेऊन आली आणि आम्हा तीघांना नमस्कार करून गेली.
आम्ही तीघानीही तीला,
“दीर्घायुषी हो”
असा आशिर्वाद दिला हे उघडंच आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, December 18, 2009

पहिल्या नजरेतलं प्रेम.

“ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टा्कावं, आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं,त्या क्षमतेला काय म्हणावं.?”

सुशा,उषा आणि निशा अशा ह्या तीन बहिणी.प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा आणि विचार निरनीराळे.सुशा योग्य वयात लग्न करून संसाराला लागली.
आपल्या संसारात ती सूखी होती.उषा तशी दिसायला चांगली.बॉलीवूडमधे कोरसमधे मिळणार्‍या कामात समाधान असायची. एखाद्या सिनेमात हिरॉईनकडे जादा एक्सपोझर मिळाला तर तीला धन्य वाटायचं.कदाचीत मागे पुढे हिरोईनचा लागला लग्गा तर लागला अशा प्रयत्नात असायची.आता आता तीला टी.व्ही.सीरियलमधे थोडी कामं मिळायला लागल्याने चेहर्‍याला जरा एक्सपोझर जास्त मिळतो म्हणून समाधान होती. तीचं टी.व्ही.वरच्या एका कॅमेरामन बरोबर लग्न ठरलंय म्हणून मागे एकदा मला निशा भेटली होती तेव्हा तीने मला सांगीतलं होतं ते आठवलं.

निशा पण उषापेक्षा दिसायला एक पायरी उत्तम वाटायची.पण निशाचं फॅड म्हणजे तीला लग्न करायचंच नव्हतं.लग्न करून आपलं स्वातंत्र्य हिरावून बसतो असा तीचा समज होता.निशाला मागण्या बर्‍याच यायच्या.आता पर्यंत किती मुलगे सांगून आले त्याचा ती गणती ठेवायची.
मी तीला एकदा न-विचारलेला उपदेश दिला-म्हणजे ज्याला अनसॉलिसीटेड ऍडव्हाईझ म्हणतात-तो उपदेश दिला.
मी निशाला म्हणालो होतो,
“तरूण वयात काही व्यक्तींची जरा हटकून मतं असतात.जसं लग्न न करण्याच्या तुझ्या मता सारखं.अर्थात हा प्रत्येक व्यक्तीचा खासगी प्रश्न असतो यात वाद नाही.पण वडीलधार्‍या मंडळीच्या अनुभवावरून म्हण किंवा आणखी काही म्हण,वय निघून गेल्यावर मग लग्न होणं जरा कठीण होतं आणि लग्न वेळेवर न केल्याने त्यातून येणार्‍या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं.आणि विशेष करून आपल्या समाजात स्त्रीवर्गाला तो दाह जास्त सहन करावा लागतो.तू बहूश्रूत आहेस तुला,
“जास्त सांगणे न लगे.”"

त्यावेळी मला निशा म्हणाल्याचं आठवतं,
“काका,मी तुमच्या मताशी सहमत आहे.पण आता परिस्थिती बदलली आहे.स्त्रीया सुशिक्षीत झाल्या आहेत. आपल्या पायावर उभ्या राहू शकतात.
स्वतःची देखभाल स्वतः करू शकतात.लग्न झाल्यावर,मग मुलं होणं ओघाने आलं.त्या मुलांचं संगोपन.त्यांच्या जबाबदार्‍या.अर्ध आयुष्य त्यात निघून जातं.तुम्ही म्हणाल त्यातच मजा असते,तेच तर जीवन असतं वगैरे वगैरे.पण खरं सांगू मला त्यात स्वारस्य नाही.”

निशाच्या बोलण्याचा कल पाहून माझं बोलणं आवरतं घेत मी तीला एव्हडंच म्हणालो होतो,
“पसंत अपनी अपनी और ख्याल अपना अपना.”
पण निशा, ह्या वयात कधी कधी,
“पहिल्या नजरेतलं प्रेम होतं.”
आणि मग,
“आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं, की ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टा्कावं,आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं, त्या क्षमतेला काय म्हणावं?.
पहिल्या नजरा-नजरेतल्या प्रेमाबद्दल जरा उपहास केला जातो.आणि नंतर सुखी संसार करणारी जोडपी अगदी हंसून सांगायला धजतात की ते आमचं
“पहिल्या नजरेतलं प्रेम होतं.”

पण खरं सांगायचं तर निशाच्या मनात जे विचार आले ते विचार त्यावेळी माझ्या मनात नव्हते.जीवनाच्या नंतर नंतरच्या टप्प्यात एक वेळ अशी येते की कुणी तरी आपल्याबरोबर असावं ज्याला हिंदीत “हमसफर” म्हणतात,तसं वाटायला लागतं.अशावेळी एखादीचा नवरा किंवा एखाद्याची बायको “हमसफर” असते.ते नाही झालं तर आपलीच मुलं बरोबर असूं शकतात किंवा नातवंड बरोबर असूं शकतात.म्हणूनच लग्न करणं हे अनेक कारणामधे हे एक कारण असू शकतं. आणि म्हणूनच हा सगळा व्याप पुढच्या दृष्टीने फायद्याचा असतो. आता हे सगळ्यांच्या बाबतीत खरं होईल असं नाही.पण त्या आशेवर माणूस जगतो.

हे सगळं सांगण्याचं कारण,ह्यावेळी खूप वर्षानी मी निशाला तिच्या घरी भेटायला गेलो होतो.त्यावेळी मला जरा धक्काच बसला.निशा त्याच घरात रहाते जिथे तीचे आईवडील राहायचे ते मला माहित होतं.कारण आपल्या मुलीने -निशाने-लग्न केलेलं नाही तेव्हा पुढे मागे त्यांच्या पश्चात त्यांच्या जागेत तीने रहावं अशी त्या दोघांची इच्छा होती तसं एकदा मला दोघानीही बोलून दाखवलं होतं.
ह्यावेळी मी तीच्या दरवाज्याची बेल दाबली त्यावेळी एका दहा-बारा वर्षाच्या मुलीने दरवाजा उघडला.सूदर हंसली.आणि का कुणास ठाऊक,
“कोण हवंय तुम्हाला?”
असा प्रश्न मला विचारण्या ऐवजी,
“आई कुणीतरी तुला भेटायला आलंय.”
असं मोठ्याने ओरडून सांगून,
“मी जाते गं!.रात्री उशीर होईल.”
असं म्हणून दरवाज्यात माझ्या मागे दोन तीच्याच वयाच्या मुली उभ्या होत्या त्यांच्याबरोबर ती गेली.
“माधुरी,कोण गं आलंय?”
असा प्रश्न करीत ते पहाण्यासाठी निशा दरवाज्याजवळ आली तेव्हा मला ओळखायला तीला वेळ लागला नाही.आत शिरता शिरताच मी तीला प्रश्न केला,
“आई! म्हणून तुला हांक मारली त्या मुलीने,तुझं लग्न केव्हा झालं?,तू तर लग्न करण्याच्या विरोधात होतीस.मग विचार कसा बदललास? आणि तुझी मुलगी हंसली तेव्हा मला माधुरी दिक्षीत सारखीच हंसताना भासली.”
गप्प सगळं ऐकून घेत निशाने मला हाताने खूणावीत बसायला सांगीतलं.आणि म्हणाली,
“हे सर्व प्रश्न तुमच्याकडून मला अपेक्षीत होते.आणि बर्‍याच वर्षापूर्वीचं तुमचं आणि माझं ह्या लग्नाच्या विषयावर बोलणं झालं होतं त्याची आठवूण येऊन ते दिवस आठवले.”
खरं सांगू का त्यावेळी तुम्ही म्हणालेल्या ह्या पहिल्या नजरेतल्या प्रेमावर माझा नंतर विश्वास बसला.मला वाटायचं की मी नुकत्याच भेटलेल्या कुणालाही माझं सर्वस्व द्यायला प्रवृत्त व्हावं.मला वाटतं हे प्रेम वास्तवीक प्रेम असतं.असल्याच प्रकारच्या प्रेमाने त्यावेळी माझ्या जीवनात चांगला बदल आणला.”
माझं कुतूहल वाढवीत निशा कोड्यात बोलत होती.

“काही वर्षापूर्वी मी एकाच्या प्रेमात पडले.
माधुरीच्या.
एका तीन वर्षाच्या मुलीच्या.
तीने केलेलं एकच स्मित-हास्य तुमच्या चेहर्‍यावर हसूं आणील असं होतं.तीच्या एका मधूर हास्याने एखाद्याचं रिक्त मन भरून येईल असं मला त्यावेळी वाटलं.
मी ज्या दिवशी माधूरीला भेटले त्यादिवशी मला आठवतं कमालीचा उष्मा होता.जवळ जवळ चाळीस डीग्री तपमान. आणि बाहेर हवा पण कमालीची चीडचीडी होती.नुकतीच मी माझ्या कामावरून घराकडे आली होती.अगदी आमच्या घराच्या पायर्‍या समोर कुरकुर आवाज करणार्‍या झोपाळ्यावर बसून एक मुलगी आपले नाजूक पाय जमीनीवरच्या मातीत खूपसून मागे पुढे झोका घेत बसली होती.संध्याकाळची वेळ असली तरी उकाडा होत होता.मी घामाघूम झाली होती. आणि जीव नकोसा झाला होता.मी त्या मुलीच्या जवळ गेली तेव्हा तीने वर पाहिलं.तीचे ते काळेभोर डोळे सूर्याच्या उन्हाकडे पाहून किलकीले झाले होते.तशातही ती माझ्याकडे बघून खुदकन हंसली.मी तीच्याजवळ त्या झोपाळ्यावर बसले आणि तीला झोका देऊ लागले.ती मला आणखी चिकटून बसली.नंतर मी तीला माझ्या मांडीवर घेतलं.झोक्याने जरा थंड हवा अंगावरून गेल्याने मला अंमळ बरं वाटलं.तीने दिलेलं ते हास्य पाहून मला तीची किंव आली.कारण ते तीचं हंसं मला उपेक्षित वाटलं.तीच्या नकळत ते उपेक्षित हंसं मला बरंच काही सागून गेलं.मी शिकले की कसं का असेना कधी कधी प्रेम आपली जागा शोधून काढतं.

मला तीच्याकडून कळलं की तीची आई वर आमच्या घरात काम करीत आहे.आमच्या कामाला येणार्‍या बाईला सहाएक मुलं असावीत.
ही सगळ्यात धाकटी असं मला कळलं.हीला मी आमच्या बाईने घरी घेऊन आलेली पुर्वा कधी पाहिली नव्हती.
अगदी गरीब कुटूंबातलं हे शेंडे फळ इतरांबरोबर जगण्याच्या प्रक्रियेत जगत होतं.एका खांद्यावर फाटलेला आणि तीच्या शरिरापेक्षा मोठा असलेला तो झगा तीच्या दुसर्‍या खांद्यावरून खाली घसरत राहायचा आणि तो ती वर करण्याच्या प्रयत्नात असायची.पण काही कारणाने ती माझ्याशी लगट करताना माझ्यावर एव्हडी विश्वासलेली दिसली की पैसा आणि उपभोग्य वस्तूंच्या गराड्यात सांपडलेलं हे जग तीच्या कडून मिळणार्‍या प्रेमाला विसरलं आहे असं मला त्यावेळी भासलं. त्यावेळी मला दिसलेल्या एका साध्या उपेक्षितेकडून मिळालेल्या त्या नाचणार्‍या प्रसन्नेतेचा नादवृंद माझ्या
शिवाय आणि कुणीही ऐकू शकलं नसेल.
पहिल्या नजरा-नजरेतल्या प्रेमावर माझा भरवंसा त्यावेळी वाढला. त्या प्रेमाबरोबरच माझा तो घामाने डबडबलेला चेहरा आणि ती तीन वर्षाची मला चिकटून बसलेली मुलगी माझ्या नजरेतून नीसटली नाही.”

“मग ही मुलगी तुझ्याकडे कशी राहायला आली.?
माझा स्वाभावीक प्रश्न होता.
निशा म्हणाली,
“थोडे दिवस मी जाऊ दिले.माधुरी तिच्या आई बरोबर वरचेवर आमच्याकडे यायची.आमचं एकमेकावरचं प्रेम लक्षात घेऊन मी तीच्या आईला सांगायचं धारीष्ट केलं.
“राहूदेत ह्या मुलीला माझ्याकडे. मी तीला वाढवीन,चांगलं शिकवीन.ती तुझीच मुलगी आहे.फक्त माझ्याकडे राहते असं समज.”
तीच्या आईला “आंधळा मागतो एक ….” असंच झालं.
सात आठ वर्षं कशी निघून गेली ते कळलंच नाही.ती शिकायला पण हुशार आहे.आता तर ती मला माझ्या मैत्रीणी सारखीच वाटते.”

हे सगळं ऐकून मी निशाला म्हणालो,
“खरंच प्रेमाला उपमा नाही.असं म्हणतात ते खोटं नाही.प्रेम आंधळं असतं हे ही चुकीचं नाही.पण प्रेमाचे अनेक प्रकार आहेत.आणि स्त्री ही खरीच प्रेमपुजारी आहे.आई,बायको,बहिण,मैत्रीण आणि अशा अनेक प्रकारची त्या पुजार्‍याची तीची रुपं आहेत.आणि त्यात श्रेष्टतम रूप म्हणजे स्त्रीचं आईचं रूप.ते अनकंडीशनल रूप आहे.निसर्गाने स्त्री-जन्म देऊन आपल्यातली कमाल दाखवली आहे.
मघाशी तुला तुझी माधुरी,
“आई कुणीतरी तुला भेटायला आलंय.”
असं म्हणून निघून गेली ते ऐकून माझा तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.
निशा आपल्या पदराने आपले डोळे पुसत होती.ते अश्रू होते आनंदाचे.आणि माझ्या डोळ्यातले पण.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 16, 2009

छ्न छन छ्नन छन छ्न छ्न

(अनुवादीत.)

छ्न छन
छ्नन छन छ्न छ्न
गीत मनी तरी का यावे
सन सन हवा सन सन
वार्‍याने तरी का लहरावे

ऐकीले असेल का ते वार्‍याने
कुणा तरी वरीलेस तुझ्या मनाने

छ्न छन
छ्नन छन छ्न छन
गीत मनी तरी का यावे

कंगन
खणण खण खण खण
कंगन तरी का खणखणावे
पैंजण
झनन झन झन झन
पैंजण तरी का झुणझुणावे

झुणझूण अपुल्या प्रीतिचे असावे
गीत हे प्रेमाचे म्हणोनी स्विकारावे

छ्न छन
छ्नन छन छ्न छ्न
गीत मनी तरी का यावे

नेई मेघ माझा लहरता पदर
म्हणे मेघ कर असेल ते सादर
स्वप्ने तुझी आहेत माझ्या पदरी
पदरात लिहीते नाव तुझे
धडधड मनातली आहे माझ्या पदरी
धडधडीत वसते प्रेम तुझे

धडधड अशीच क्षीण होत जाई
पैंजण बांधून वारा वहात राही
नयनी स्वपने फिरू लागली
श्वासात घंघरू गुणगुणू लागली

छ्न छन
छ्नन छन छ्न छ्न
गीत मनी तरी का यावे
सन सन हवा सन सन
वार्‍याने तरी का लहरावे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 14, 2009

“पुन्हा कधीतरी नक्कीच भेटूंया!”

“आपल्या कडून झालेली प्रत्येक क्रिया आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द पुढे काय करू शकेल किंवा काय करणार आहे हे ज्या उमेदीतून निर्माण होणार आहे ती उमेद अगोदरच माहित असणं म्हणजेच खूश असणं,म्हणजेच प्रसन्न असणं.”

अगदी लहानपणापासून म्हणजेच सहा सात वर्षाची असल्या पासून सुधा, शाळा संपून घरी आल्यावर संध्याकाळी आपल्या मैत्री्णीना जमवून “टीचर,टीचर ” खेळायची. टीचर स्वतः सुधा व्हायची.आणि इतर मैत्रीणी तीच्या विद्यार्थीनी असायच्या.सुधा टीचर सारखं दिसण्यासाठी आपल्य शाळेतल्या खर्‍या टीचरची कॉपी करून मग तो पार्ट संध्याकाळी आपल्या लुटूपुटूच्या वर्गात करायची.आणि त्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीच्या साड्या त्या वयात सुद्धा स्वतः नेसायची. एव्हड्या लहानपणी साडी नेसायचं कसब सुधाने केवळ संवयीने आत्मसात केलं होतं.

सुधा कानडे नंतर खूप शिकली.पण तीचा कल शिक्षीका होण्याकडेच होता.बी.ए. झाली इंग्रजी घेऊन एम.ए झाली.नंतर लहान मुलांच्या मनोविज्ञानावर प्रबंध लिहून डॉक्टरेट पण घेतलं.आणि अंधेरीच्या एका शाळेत प्रवेश करून नंतर असिस्टंट प्रिन्सीपॉल होऊन रिटायर्ड झाली.एव्हडी तीच्याबद्दलची माहिती मला होतीच.पण काल मी आणि माझा पुतण्या त्याच्याच गाडीतून लोखंडवाला कॉम्पलेक्समधे त्याच्याच घरी जाण्याच्या वाटेवर असताना धाके कॉलनी जवळ सुधाला रस्त्यावरून आमच्या उलट्या दिशेने जाताना त्यांने पाहिलं.गाडी बाजूला पार्क करून मला म्हणाला,
“सुधाबाईंची जरा दखल घेऊन येतो.खूप दिवसानी मला त्या दिसल्या आहेत.”

मला माहित नव्ह्तं की सुधा माझ्या पुतण्याला पण शिकवत होती. मी गाडीत बसलो आहे ते त्याने सुधाला सांगीतल्यावर ती त्या गाडीपर्यंत आली.आणि आपल्या घरी यायचा मला आग्रह करू लागली. जवळच्याच बिल्डींगमधे तीचं घर होतं.मला पण कुणाचं मन मोडायला आवडत नसल्याने,
“पुन्हा कधीतरी नक्कीच येईन”
असं म्हणायला जरा माझ्या जीवावर आलं.आणि सुधाचा आग्रहही मनस्वी होता.त्या बिल्डींगला पाचच मजले होते. बिल्डींगच्या पाचव्या मजल्यापर्यंत चढत गेलो. बिल्डींगला पाच पेक्षा जास्त मजले असल्यास कायद्याने लिफ्टची जरूरी लागते असं असल्याने ह्या बिल्डींगवर पाचव्या मजल्यापर्यंत चढत जाणं भाग होतं.मी वरपर्यंत एका दमात मजले चढून गेल्याचं पाहून सुधा जरा खजील झाली.
“तुम्ही तिकडे हायकींग वगैरे करता त्यामुळे इथे हे मजले चढणं तुम्हाला सोपं गेलं असेल”
असं म्हणून सुधाने मला थॅन्क्स वजा शाबासकी दिली.

तिच्या पाचव्या मजल्यावर हवा मस्त येत होती.जुहूच्या समुद्रावरून सुटलेले गार वारे आणि तिच्या फ्लॅटमधे असलेल्या क्रॉस व्हेन्टीलेशनमुळे चौपाटीवर बसल्याची मजा येत होती.
“पाचव्या मजल्यावर यायचे कष्ट पडले तरी एकदा आल्यावर हे हवेचं सुख सर्व क्षीण घालवून टाकतं.”
असं म्हणून मी सुधाला तीने म्हटलेल्या थॅन्क्सचे प्रत्युत्तर म्हणून,
“नो, इट्स माय प्लेझर “
असं म्हटल्यासाखंच केलं.
थोडा वेळ बसून झाल्यावर माझ्या पुतण्याने,
“तुम्ही गप्पा मारीत बसा.मी तास-दीडतासात तुम्हाला न्यायला येतो”
असं सांगून आम्हाला गप्पा मारण्याची संधी देऊन तो गेला.

सुधा रिटायर्ड झाल्यावर आता अंधेरीतल्या एका झोपडपट्टीत असलेल्या गरीब मुला-मुलींच्या शाळेत शिकवायला जाते.तीचा मुलगा अवी अमेरिकेला गेला आणि तिकडेच लग्न करून स्थाईक झाला. असं मला सुधा म्हणाली.सुधाचे पती चार वर्षापुर्वी हार्ट ऍटेक येऊन निर्वतले ही वाईट बातमी मला तीने सांगीतली.आता ती एकटी असल्याने सहाजीकच वेळ जावा म्हणून आणि शिकवण्याची हौस म्हणून ती त्या शाळेत जाते.
मी तीला तीच्या लहाणपणातल्या “टीचर टीचर” खेळाची आठवण करून देत म्हणालो,
“सुधा, मला वाटतं काही व्यक्ती टीचर व्यवसाय म्हणून घेतात.काही ना टीचींग करायची आवड असते.पण तू मात्र “बॉर्न टीचर” आहेस.”
तीच्या लहानपणाच्या संवयी अजून माझ्या आठवणीत आहेत हे ऐकून सुधा थोडी लाजली आणि मला म्हणाली,
“काका,त्याचं काय आहे,माणसाला आपल्या कामात स्वारस्य वाटलं पाहिजे आणि तसं वाटायला त्याचं त्या कामावर प्रेम पाहिजे.तुम्हाला कसं वाटतं?”
मी म्हणालो,
“यात काहीच वावगं नाही.पण तुझ्या शिक्षीकेच्या पेशात नासमज मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना समज आणण्याच्या प्रयत्नात स्वतःला मोठ्या शिस्तीत ठेवायला मनावर दबाव आणावा लागतो.तो दबाव सकाळी उठण्यापासून ते शाळा सुटे पर्यंत असतो.”

“मी तुम्हाला माझा विचार सांगते”
असं म्हणून सुधा पुढे म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की आपलं मन सकाळीच प्रसन्न असतं.नसेल तर असलेलं बरं.जर ती प्रसन्नता सक्काळी पाच वाजता आली तर मी अंथरूणातच पडून राहण्याच्या प्रयत्नात असेन.मी एका शाळेत शिक्षीकेचं काम करते.पाचवीच्या वर्गात भाषा शकवते. आमचा दिवस सकाळी सातला चालू होऊन संध्याकाळी पाचला संपतो.सर्वच दिवशी सकाळची वेळ आरामात असते अशातला भाग नाही.आपण सूर्योदय होण्यापूर्वीच अंथरूणातून उठवले जाऊन सकाळची नित्यकर्मं करण्यात ढकले जातो.पण प्रसन्नता येते ती सहज म्हणून येत नाही ती आलीच पाहिजे म्हणून येते.”

“तू काय लहान मुलांच्या मनोभावनेचा अभ्यासच केला आहेस तेव्हा तुला समजायला सगळं सोपं जात असेल.”
असं म्हणून मी सुधाकडून आणखी काय माहिती मिळते ते बघत होतो.

मला म्हणाली,
“मी नेहमीच विचारात असते की माझ्या विद्यार्थ्यांची सकाळ कशी जात असेल.माझे विद्यार्थी/विद्यार्थीनी आणि त्यांचे आईवडील त्यांच्या मुलानी सकाळी शाळेत सात वाजता हजर रहाण्यासाठी ती नुसताच सकाळच्या झोपेचाच त्याग करतात असं नसून त्याहूनही अधीक काही करीत असावेत.

नुसतच नित्याचं काम करण्यासाठी सगळे मिळून आपण एव्हडा लांब दिवस वापरतो कां? सकाळची वेळ माझ्या विद्यार्थ्याना कठिण जात असेल तर ते माझ्या दृष्टीने ठिक आहे. त्याशिवाय शाळाही त्यांना कठिण वाटत असेल तरीही माझ्या दृष्टीने ते ठिक आहे.पण हेच जर सर्व काही असेल -म्हणजे सकाळ पासून रात्रीपर्यंतचे हे एव्हडे परिश्रम -तर मग मात्र त्यांनी अंथरूणातच असलेलं बरं.”
मी म्हणालो,
“ही मुलं आपल्याकडून प्रेमाची,सद्भाभावनेची आतुरतेने अपेक्षा करीत असतात.”
“अगदी बरोबर”
असं म्हणत सुधा म्हणाली,
“माझ्या विद्यार्थ्यांना सकाळच्या पाचच्या अंथरूणातल्या त्या प्रसन्नतेपेक्षाही खोल आणि बहुमुल्य प्रसन्नता सकाळी वाटली पाहिजे.सकाळी उठल्यावर कालच्यापेक्षा आज त्यांच्यात जरा जास्त सुधारणा झाली आहे असं त्यांना वाटलं पाहिजे.”

“त्यांची सकाळची वेळ कशी असावी,हे आपल्या हातात नसतं.कुणाचा काय प्रॉब्लेम तर कुणाचा काय? खरं ना?
एखादी सकाळीच उठून दिवसभर स्वतःशीच बडबड करायला मागत असेल,दुसरा एखादा पुस्तकातल्या धड्यातल्या प्रत्येक शब्द समजून घेण्यासाठी सकाळी धड्पडून उठत असेल”
मी सुधाला म्हणालो.

“काही मुलांचे चेहरेच सांगतात की त्यांच्यावर दिवसभरातली किती संकटे आहेत ती. मला त्यांना सल्ल्ला द्यावासा वाटतो की त्यांनी त्यांना रोज सकाळी नवीन व्यक्ती म्हणून पहावं”
हे सांगून सुधा म्हणाली,
“काका, मी तुम्हाला एका विद्यार्थीनीचं उदाहरण देऊन सांगते.
पुष्पा नावाच्या माझ्या एका विद्यार्थीनीच्या सकाळ कशा असतात ते मला माहित नाहीत.गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मला कळलं की ती जरा विशेष विद्यार्थीनी आहे.गेली दोन वर्षे ती पाचवीतच आहे.माझ्या वर्गात येऊन तीने मला अगदी थकवलं असं म्ह्टलं तर अ्तीशयोक्ती होणार नाही..मला आठवतं एके दिवशी सकाळी ती माझ्याकडे अगदी फुरगंटतच आली.
सकाळी तीच्या मैत्रीणी बरोबर तीचा काहीतरी वाद झाला. सर्व दिवसच फुकट गेला असं तीला सकाळीच वाटायला लागलं.मी तीला आमच्या शिक्षकांच्या खोलीत बोलावलं.थोडसं चिडचीडूनच मी तीला सांगीतलं,
“रोज सकाळी माझ्या खोलीत येऊन तू “नमस्ते टीचर” असं मला म्हणून जा.आताच इथून बाहेर जा आणि लगेच आत येऊन तसं म्हण.काही शब्द न उच्चारता ती बाहेर गेली आणि आत येताना म्हणाली “नमस्ते टीचर”.आणि गेलं वर्षेभर ती मला असं म्हणते.
तीच्या त्या रोजच्या फसव्या हंश्याने, “नमस्ते टीचर” म्हणण्याने माझी फसगत झाली असेल.पण माझी खात्री झाली झाली होती की आदल्या दिवसाचं संकटाचं ओझं उतरून रोज पुष्पा माझ्या खोलीत सकाळी येऊन कुणी तरी नवीन व्यक्ती म्हणून यायची. काराण मला वाटतं प्रसन्नतासकाळीच येते.”
मी सुधाला म्हणालो,
“आदल्या दिवशी झालेलं कठिण पांडित्य घेऊन आपण रोज सकाळी उठतो. ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनात येत असलेली वास्तविकता बरेच वेळां अपरिहार्य असते असं मला वाटतं.”

“पण म्हणून त्यासाठी आपल्याला बेचैन व्ह्यायचं कारण नाही. खूश असणं,किंवा प्रसन्न असणं, म्हणजे काही मस्तीखोर असणं नव्हे,किंवा भोळसट असणं नव्हे.उलटपक्षी खूश असणं म्हणजेच उद्देशपूर्वक उन्नती करण्याच्या इराद्यात असणं.”
आपल्या कडून झालेली प्रत्येक क्रिया आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द पुढे काय करू शकेल किंवा काय करणार आहे हे ज्या उमेदीतून निर्माण होणार आहे ती उमेद अगोदरच माहित असणं म्हणजेच खूश असणं म्हणजेच प्रसन्न असणं.”

असं म्हणून सुधा दरवाजा उघडायला गेली.सुधाचं हे प्रसन्नतेवरचं भाष्य ऐकत असताना दारावरची बेल वाजलेली मी ऐकलीच नाही.
माझा पुतण्या मला नेण्यासाठी आलेला पाहून एक तास केव्हा संपला आणि सुधाशी बोलण्यात वेळ केव्हा निघून गेला हे मला कळलंच नाही.
ऊठता उठता मी सुधाला म्हणालो,
“तू खाली गाडी जवळ मला बोलवायला आली होतीस तेव्हा माझ्या मनात तुला सांगायचं आलं होतं की पुन्हा केव्हा तरी भेटूया.पण तसं मी तुला सांगीतलं नाही ते मी माझ्या मनातच ठेवलं.तुझ्याकडून एव्हडं ऐकल्यावर खूपच बरं वाटलं.पण आता जाता जाता मला तुला नक्कीच सांगावसं वाटतं
“पुन्हा कधी तरी नक्कीच भेटूंया”
असं म्हणून आम्ही-मी आणि माझा पुतण्या- पाच मजले भरकन खाली उतरत गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 12, 2009

इंद्रधनुष्याचा पाठलाग.

“माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”

वसुंधरा नाडकर्णी एक चांगली पत्रकार आहे हे मला माहित होतं.एका स्थानीक वर्तमानात ती रिपोर्टर म्हणून सुद्धा काम करायची.अलीकडे ती पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.पर्यावरण हा सध्या बहूतचर्चीत विषय झाला आहे.काही श्रीमंत देश स्वतःच्या जरूरी साठी आणि उर्जा मिळवण्यासाठी पृथ्वीवर भरपूर प्रदुषण करून आपली उर्जीतावस्था करून घेऊन श्रीमंत झाले आहेत आणि यापुढे प्रदुषण कमी केलं नाही तरी पृथ्वीवर हाः हाः कार होईल म्हणून विकसीत होऊ घातलेल्या देशांवर प्रदुषण न करण्याचा दबाब आणीत आहेत.
जगात ह्या विषयावर अनेक चर्चासत्रं चालू आहेत.माझा मित्र आणि मी अशाच एका चर्चासत्रात गेलो होतो.माझ्या मित्राने माझी वसुंधरेशी ओळख करून दिली होती.

त्यानंतर मी एकदा मुंबईहून दिल्लीला जात असताना माझी आणि तीची विमानात गाठ पडली.
“तू पर्यावरणाच्या विषयात का पडलीस?”
असा मी तीला प्रश्न केला.
माझा प्रश्न ऐकून ती थोडी हंसली. मला ही थोडं नवल वाटलं आणि ते तीच्या ध्यानात ही आलं. मला म्हणाली,
“मी का हंसले ते मी तुम्हाला नंतर सांगीन.पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देते”.
वसूंधरा म्हणाली,
“मला खूप लेखन करायचं आहे.एक दोन कादंबर्‍या लिहिण्याचे विषय मनात घोळत असतात.पण मुलतः मला पत्रकारीकता आवडते.म्हणून शास्त्रीय विषयावर लिहीते आणि त्यावर रिपोर्टींग पण करते.पर्यावरण आणि प्रदुषण हे विषय सध्या शिखरावर आहेत.त्याचाही अभ्यास करीत आहे.आणि जमेल तसं एका कादंबरीचं तात्पूरतं,कच्चं लेखन करून ठेवीत आहे.ह्या विमानाच्या प्रवासात मला असं कच्चं लेखन करायला खूप संधी मिळते.”
“म्हणजे मी आज तुझा वेळ खाणार आहे त्यामुळे तू मला शिव्या देत असणार ना?”
असा हंसत हंसत मी तीला प्रश्न केला.
“नाही,नाही तसं काही नाही.तुमच्याबरोबर चर्चा करून माझा फायदाच होणार आहे.”
“ते कसं?”
असा कुतूहलाने मी वसुंधरेला प्रश्न केला.
“त्याचं असं आहे तुम्ही “कां” प्रश्न करून मला माझ्या बालपणाची नव्हेतर माझा आता पर्यंतच्या जीवनाची झटक्यात आठवण करून दिलीत.आणि मघाशी मी त्याचाच विचार करून हंसले होते.”

असं तीने म्हटल्यावर मी मनात म्हणालो नाहीतरी ही़च्या बद्दल बरीच माहिती माझ्या मित्राने मला सांगीतली होती.आता काही गोष्टी प्रत्यक्ष तीच्याच तोंडून ऐकायला संधी मिळाली आहे.

“माझ्या मैत्रीणी मला म्हणत,तीन,चार वर्षाचं वय म्हणजे “कां” म्हणायचं वय.ह्याच वयात माझी मुलगी मला विचारायची,
“आकाश निळं कां आहे? पाण्याला रंग कां नाही?
आणि असेच काही शास्त्राला लागून असलेले प्रश्न मला विचारायची जे मला संभ्रमात टाकीत असत.तीने प्रश्न विचारल्याबरोबर मी ताबडतोब माझ्या लॅपटॉपकडे धांव घ्यायची आणि गुगलवर जाऊन माहिती काढायची.आणि तीला सांगायची.
निदान असे प्रयत्न तरी माझ्याकडून व्हायचे.एकदा तीने मला प्रश्न केला,
“आई,”
असं म्हणून ती वर आकाशाकडे आपले सुंदर गोल डोळे टवकारून पहात मला म्हणाली,
“हे इंद्रधनुष्य आपण कसं पकडू शकतो?”
मी वसुंधरेला मधेच अडवीत म्हणालो,
“तू तीला सांगीतलं असशील की सूर्य प्रकाश पावसाच्या थेंबातून कसा शिरकाव करून बाहेर पडतो,आणि तसं झाल्यावर त्या प्रकाशाचं सात रंगात कसं रुपांतर होतं वगैरे.”
मला ती म्हणाली,
“मुळीच नाही. खरं तर तीला इंद्रधनुष्य कसं तयार होतं हे विचारायचं नव्हतं.ते पकडायचं कसं? हे विचारायचं होतं. कारण ते तीला पकडता येत नव्हतं.
माझ्या मनात यायचं की तीला मी सांगावं का? की माझे बाबा, कुठचीही अशक्यप्राय असलेली गोष्ट साध्य करून दाखवायचे ते?
पण तेव्हड्यात माझ्या विचारात गुंगून गेलेल्या मतीला माझ्या नवर्‍याच्या घोघर्‍या आणि विश्वासपूर्वक आवाजाने खंड आणला.त्याने तीला सांगीतलं,
“तुला खरोखरच वेगाने धावावं लागणार.इतकं वेगाने की तू जणू त्या इंद्रधनुष्यावर आदळतेस की काय असं वाटलं पाहिजे मगच ते तुला पकडता येईल.”
“मी खूप जोरात धावते” माझी मुलगी त्याला म्हणाली.
“हो छकुले,तुझं खरं आहे.”
मी म्हणाले,
“पण तू धावण्यात थोडी मागे पडतेस.”

मी विचार केला तीची निराशा का करावी? कधी ना कधी ती मोठी झाल्यावर देवाच्या पर्‍या असतात त्या हट्ट न करणार्‍या लहान मुलांच्या स्वपनात येतात आणि तू देवाला आवडतेस म्हणून निरोप देऊन जातात. हे आम्ही तीला सांगीतलेलं किती खरं होतं ते कळणारच आहे मग त्यावेळीच इंद्र्धनुष्य पकडण्याबद्दल खरं सांगायचं का?

परंतु, माझ्या हे ही लक्षात आलं की, ती काय,मी काय आणि माझा नवरा काय जीवनात इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत असतो.माझ्या पाचवीच्या वर्गातली माझी शिक्षीका जेव्हा मला म्हणाली होती की मी चांगलं अक्षर काढून लिहू शकत नाही तेव्हा मी तीला खोटं ठरवायचं ठरवलं होतं.आणि शेवटी मी त्यात यशस्वी झाले.त्यानंतर मी पत्रकारितेत डीग्री घेतली.काही वर्ष पत्रकार म्हणून काम केलं.एक दोन पुस्तकं लिहीली.संपादक झाले.एका मासिकाचं संपादन केलं.आणि आता स्वतंत्र सायन्स रायटर पण आहे.”
“तुझा नवरा काय करतो?”
असा मी तीला प्रश्न केला.
वसुंधरा म्हणाली,
“माझ्या नवर्‍याला कुठेही नोकरी करायला आवडत नाही.
जेव्हा माझ्या नवर्‍याला रेडीमेड कपड्याचं नवीन दुकान घालून धंदा करायचा होता तेव्हा मी सातव्या महिन्यावर गरोदर होते.त्यावेळी आम्ही दोन इंद्रधनुष्यांचा पाठलाग केला होता.अगोदरच आम्ही रहात्या अपार्टमेंटचा हाप्ता भरत होतो आणि आता धंद्याच्या लोन वर दुसरा हाप्ता भरायला लागलो.माझ्या नवर्‍याला दोन वर्ष मिळकत नव्हती.अशा परिस्थितीत मी माझ्या नवजात मुलीला वाढवत होते.तीचे कपडे बदलायचं,पाळणा ओढून तीला झोपवायचं,आणि तीला पाजायचं.ही कामं करण्यात माझा वेळ खर्ची जायचा.आणि हे करीत असताना रकानेच्या रकाने लेखन करायचं,आणि
संसाराला मदत करायची.हे करीत असताना माझ्या पाचव्या वर्गातल्या शिक्षीकेने मी जे करू शकणार नाही म्हणून मला सांगीतलं होतं तेच मी करीत होते.”

“मग आता तू काय करतेस?”
असं मी विचारल्यावर ती म्हणाली,
“अजून सुद्धा मला सृजनात्मक लेखन कसं करायचं त्यावर क्लासीस घ्यायचे आहेत.माझा इंद्रधनुष्य पकडण्यासाठी पाठलाग चालूच आहे. पंधरा वर्षापूर्वी मी कॉलेज सोडलं.ऑलजीब्रा,जॉमेट्री आणि इतर विषय विसरून गेले आहे.तरीपण मी त्या इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत आहे. कारण मला कादंबर्‍या लिहायच्या आहेत.मी पाठलाग करीत आहे कारण माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”

वसुंधरा आणि मी आणखी अनेक विषयावर बोलत होतो ते प्रवास संपेपर्यंत.शेवटी दिल्लीला उतरल्यावर,
“पुन्हा असेच कधी तरी भेटूं”
असं म्हणत आम्ही आमच्या मार्गाला लागलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 10, 2009

मी आणि माझी आई.

“मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”

वासंती बाहेरून दरवाजावर ठोकत आहे आणि आतून कुणीही तिला दरवाजा उघडून आत घेत नाही हे वासंतीच्या बाबतीत पाहिलेलं दृश्य अजून मला आठवतं.त्यावेळी वासंती अगदी लहान होती.असेल चार पाच वर्षाची.मी त्यावेळी तिला जवळ घेऊन आमच्या घरी न्यायचा प्रयत्न करायचो पण ती माझं ऐकत नसायची.

वासंतीची आई भारी शिस्तीची होती.तीला आपल्या मुलांनी लहान असताना सुद्धा जबाबदारीने वागवलेलं आवडायचं. पण वासंती त्या शिरस्त्यात बसत नव्हती.आणि त्यामुळे हे असले प्रकार वरचेवर व्हायचे.

खूप वर्षानी वासंती आमच्या घरी आली होती.गप्पा करताना हा दरवाजाचा विषय निघाला.
मला म्हणाली,
“मला आठवतं ती एक घटना सांगते.त्यावेळी मी तीन,चार वर्षाची असेन.मला पक्कं आठवतं,मी लाल रंगाचा झगा घातला होता. छातीवर गुबगुबीत सस्याचं विणलेलं चित्र होतं.मी घरात येण्यासाठी दरवाजाच्या बाहेरून दरवाजावर ठोठावत होते. बाहेर काळोख पडला होता.ते थंडीचे दिवस होते.माझी आई मला दरवाजा उघडून आत घेत नव्हती.
“नीट वागायचं कबूल आहेस का?”
आई आतून मला विचारायची.
मी मनात म्हणायची,
“नाही कबूल होणार.”
पण मला घरात यायचं होतं.मी दमली होती. बाहेर थंडी होती.बाहेर काळोख ही झाला होता.मला भिती वाटत होती कसलीही कबूली देऊन तीने मला आत घ्यावं अशा प्रयत्नात मी होती.
मी वासंतीला विचारलं,
“ती असं का करायची?”
“आता लक्षात नाही ती तसं का करीत होती.मी जरा हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची होती.कदाचीत माझ्या स्वभावाचा आईला वैताग आला असावा.मी नक्कीच तशी होती.कदाचीत माझ्या आईने तुम्हाला तसं सांगितलं ही असेल.मी टीनएजेर होई तो तशीच होती.हाताबाहेर गेलेली म्हणा हवं तर.”
वासंतीने तीच्या स्वभावानुसार खरं ते सांगून टाकलं.

“तुझी आई कडक स्वभावाची होती.मला आठवतं,मी तीला एकदा म्हणालो होतो की मुलं लहान असताना हट्टी असतात. मोठी झाल्यावर सुधारतात.पण मग ती मला तुझ्या धाकट्या बहिणीचं उदाहरण देऊन सांगायची की काही मुलं जात्याच तशी असतात.तुझ्या धाकट्या बहिणीची ती फार स्तुती करायची.”

माझं हे ऐकून वासंती म्हणाली,
“माझी आई माझ्यात बदलाव व्हावा म्हणून प्रयत्नात असायची, माझ्या धाकट्या बहिणी सारखी मी व्हावी म्हणून प्रयत्नात असायची. माझी धाकटी बहिण माझ्या आईची का्र्बन कॉपी होती. जबाबदार,प्रामाणिक, चांगल्या आचरणाची, सच्ची.
माहित आहे का माझी आई मला नेहमी काय म्हणायची?
“तू कधीच इतरांसारखी होणार नाहीस”
“अरेरे, हे काही मला माहित नव्हतं का?” मी मनात म्हणायची.

मी वासंतीला म्हणालो,
“तुला हे जर माहित होतं तर तू अशी का वागायचीस?”

“आईचं खरं होतं.हो,मी काहीतरी विकृत गोष्टी करायची आणि वर खोटं बोलायची.मी माझ्या आईकडून न मिळणार्‍या संमत्तीची धसकी घेतली होती शिवाय मी तीच्या मर्जीत बसत नाही हे समजून इतकी भयभीत व्हायची की ती काही म्हणाली तरी मी तीला होय म्हणायची.
मी कुणालाही दोष देत नाही.माझ्या आतापर्यंतच्या जीवनाचं मुल्य-मापन करीत असताना मी मलाच म्हणते की मी जे करते ते असं कां करते? “

वासंतीचे हे प्रामाणिक उद्गार ऐकून मला वाईट वाटलं.मी म्हणालो,
“तू तुझ्या आईला ह्या बाबत कधी विचारलंस का?
डोळे ओले करीत वासंती म्हणाली,
“ह्या पुढे माझी आई मला कधीच मदत करू शकणार नाही.कारण आता ती ह्या जगात नाही.
“मी भाग्यवान आहे”
असं ती मला म्हणायची. आणि वर म्हणायची,
“कुणी भाग्यवान व्हावं अशी आशा करणार्‍याच्या पलीकडे मी भाग्यवान आहे.”
आणि तरीसुद्धा मी गोंधळ घालायची.त्या गोंधळाचा तीला कंटाळा यायचाच आणि माझा ही तीला कंटाळा यायचा.”
मी वासंतीला विचारलं,
“आता तुला कसं वाटतंय?”
ती म्हणाली,
“आता मी परत घराच्या बाहेर अडकली आहे.फक्त ते अडकणं जरा अलंकृत आहे.मी जर का खरीच अडकली असेन तर माझ्या आईच्या जीवनात अडकली आहे असं म्हटलं पाहिजे.तशीच चार,पाच वर्षाची मला मी वाटते.बरीच दशकं मी दरवाजा ठोठावीत आहे असं सारखं वाटतं.आणि तीने मला आत घेतल्या सारखं केलं आहे असं ही वाट्तं.पण मला वाटतं माझं उरलंसुरलं जीवन मी दरवाज्याच्या बाहेरच काढणार आहे.माझ्या मला मी समजले आहे की मी आवेशजनक बाई आहे आणि मी विचार न करता काहीही करते.मी नेहमीचीच तशी आहे.”

वासंतीला धीर देण्याच्या उद्देशाने मी तीला म्हणालो,
“कदाचीत असं असणंच बरं.घरात घेणं म्हणजे शर्तीने घेतल्यासारखं वाटतं.”
मला म्हणाली,
“माझ्यात माझ्या धाकट्या बहिणीचा एकही गुण नाही.त्यातला थोडासा अंशही माझ्यात नाही.आणि भविष्यातही तो गुण माझ्यात नसणार.अखेर मी असंच म्हणेन की मी तशी नाही ते ठीक आहे.मी तसं होण्याचा प्रयत्न केला आणि करीतही राहीन पण आता माझा तो प्रयत्न दरवाजाच्या बाहेर राहून माझ्या आईच्या शर्तीची भिती असलेला नसेल.
मला माहित आहे की माझी आई माझ्यावर प्रेम करायची.पण मला हे ही माहित आहे की ती प्रेम करायची कारण तीला दुसरा उपाय नव्हता. बोलून चालून ती माझी आई होती.
मी तीला आवडत नव्हते असं काही नाही.माझी ती जन्मदात्री होती. माझं व्यक्तीमत्व असंच होतं. त्यामुळे जर का माझं तिच्याशी नातं नसतं तर खचीतच मी तीला न-आवडणार्‍यापैकी असते.खरंच तीने कधीच प्रेम केलं नसतं.
मी जशी मोठी व्हायला लागले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की जे कोण आहेत ते जसे आहेत तसेच असतात.माझी आई पण.मी पण.”
आम्ही दोघं मैत्रीत न रहाण्याचं कारण आमच्यात पराकोटीची भिन्नता होती. मला तीने मदतीचा हात बरेच वेळा पुढे केला होता. माझं तीच्यावर प्रेम होतं.तरी पण मी तीला खूप ताप दिला आहे. आणि मी मलाच त्यासाठी दुषणं देते.आता माझ्या मनात सर्व ठीक ठाक वाटण्यासाठी एव्हडंच मी म्हणू शकते.”

“ते जाऊ देत.आता तुझी आई नाही.तुझी तू स्वतंत्र आहेस.दोन मुलं पण तुला आहेत,मग त्यांच्याशी तुझं कसं चालंय?”
मी जरा काचरतच वासंतीला विचारलं.

“आता मी माझ्याच घरात रहाते.त्यामुळे दरवाजाच्या बाहेर राहायची आता माझ्यावर पाळी नाही.माझ्या घरात माझ्यावर सर्व प्रेम करतात. मी त्यांना हवी हवीशी वाटते.मी गोंधळ करते पण प्रेमळ हातानी माझं स्वागत होतं.गोंधळ झाला तरी तो सुधारला जाऊं शकतो असं मला आश्वासन दिलं जातं.
माझी मुलं दरवाजाच्या बाहेर कधी ही नसणार.मी त्यांना समझ दिली आहे आणि मी वचनबद्ध आहे. ती माझी आज्ञा मोडू शकतात. माझ्या वस्तु मोडू शकतात माझं मन मोडूं शकतात.ती हट्टी असूं शकतात.पण त्यांना घरात येण्यासाठी जोरजोरात दरवाजावर ठोकायला लागणार नाही. मी माझ्या मला कुठेतरी कोंडून ठेवीन पण माझ्या मुलांना दरवाजा कधीच बंद नसणार.”

“वासंती तू जरी तुला हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची आहेस असं म्हटलीस तरी तू स्वपनाळू पण आहेस.नाहीपेक्षा जुन्या गोष्टी आठवून तू तुला एव्हडं अंतर्भूत करून घेतलं नसतस.”
असं मी वासंतीला म्हणालो.तीला हे मी म्हटलेलं फारच मनस्वी वाटलं.अगदी गंभीर होऊन मला म्हणाली,

“त्या मुलीची पडछाया मला दिसते.माझ्या आईच्या दरवाजावर त्या तीच्या चिमुकल्या मुठी आपटताना दिसतात ती मुसमुसून रडत आहे.ओरडत आहे.श्वास लागल्यासारखी ती हुंदके देत आहे.चिमुकली तीची छाती वरखाली होत आहे.तीचे काळेभोर डोळे आंसवानी थबथबले आहेत.ते अश्रू तीच्या त्या झग्याला ओले करीत आहेत.ती खूपच दुःखी झाली आहे. असं दृष्य माझ्या डोळ्यासमोर येतं.मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”

मी वासंतीचा हात माझ्या हातात घेऊन त्यावर थोपटीत म्हणालो,
“जीवन म्हणजे एक कथानक असतं.प्रत्येकाची कथा वेगळी वेगळी.
“दोन घडीचा डाव ह्याला जीवन ऐसे नाव”
असं कुणीसं म्हटलंय ते अगदी खरं आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 7, 2009

दिवस ते गेले कुठे

कुणाच्या तरी आयुष्यात कधीकधी असे ही दिवस येतात की प्रश्नावर प्रश्न विचारून सुद्धा एक ही उत्तर मिळत नाही.कारण उत्तर देण्यासारखं जीवनात काही ही राहिलेलं नसतं.

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे
नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा
तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा
घरटे ते जळले कसे
सांग ना! घरटे जळले कसे

निष्ठा माझी विसरलास कसा
सांग ना! निष्ठा विसरलास कसा
छपली आहे तुझजवळी माझ्या मनाची दशा
कंपीत हृदयामधे दिसेल कशी मनातली आशा
कठीण समयी निर्वाह केला कसा
सांग ना! निर्वाह केला कसा

प्रीतिची प्रथा तू सोडलीस कशी
सांग ना! प्रथा सोडलीस कशी
राहिले आता मी अन माझी बाग उजाडलेली
संपले मनोरथ अन माझी यष्टी मरगळलेली
दिपावर झेपवून पतंग जळला कसा
सांग ना! पतंग जळला कसा

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 5, 2009

माझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटल आहे.

“जगात अलीकडे मनुष्य जीवनाचा जो विध्वंस चालला आहे ते पाहून मनात येतं की हा जीवनाचा रथ कुठच्या दिशेला चालला आहे.? शे-पाचशे लोकांचा मृत्यु ही रोजचीच बाब झाली आहे. जग अगदी लहान होत चालल्याने जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातली बातमी जणू आपल्या गावातल्या बातमी सारखी वाटू लागली आहे.
ही मनुष्य जीवनाची हानी मग ती कुठच्याही धर्माची असो,किंवा कुठच्याही लष्कराची असो, माणसाला निसर्गाने दिलेल्या बुद्धिमत्तेचा दुरूपयोग म्हणून तर ही मनुष्य हानी होत नसेल ना?”

तळ्यावर आज प्रो.देसाई आणि प्रि.वैद्याना एकत्र आलेले पाहून त्यांच्याही बुद्धिला थोडीशी चालना मिळावी म्हणून आणि माझ्या प्रमाणे त्यांनाही ह्या विषयावर काय वाटतं हे समजण्यासाठी म्हणून बोलायला सुरवात केली.

प्रो.देसाई म्हणाले,
“मला नेहमीच वाटतं की माणसाचं मन सर्वसाधारणपणे चांगलंच असतं.माणसाचं मन जन्मतःच संवेदनशील असतं.स्वतःला कुणी स्वीकृत करावं व स्वतः दुसर्‍यांना स्वीकृत करावं ह्या साठी त्याचं मन उतावीळ असतं.अगदी साध्यासुध्या आनंदाला आणि जीवन जगण्याला मोका मिळावा म्हणून त्याचं मन भुकेलेलं असतं.
कुणाची हत्या करायला वा स्वतःची हत्या व्हावी म्हणून ते मन कधीही इच्छा करीत नाही. काही प्राप्त परिस्थितीत जरी दुष्टवृत्तीने त्याच्यावर काबू आणला तरी ते मन परीपूर्ण दुष्टवृत्तीचं होत नाही. थोडा फार चांगुलपणाचा अंश त्याच्यात असतोच. आणि तो चागुलपणाचा अंश कितीही अप्रभावी झाला तरी तो त्या चांगुलपणाची पुनःस्थापना करण्याच्या प्रयत्नात असतो.”

प्रो.देसायांचं हे म्हणणं ऐकून प्रि.वैद्य थोडेसे विचारात पडलेले दिसले.
“तुम्हाला काय वाटतं वैद्यसाहेब ?”
असा मी त्यांना सरळ प्रश्न केला.
ते म्हणाले,
“मला माझ्या जीवनात आनंद वाटतो कारण मी आजुबाजूच्या लोकांत आणि त्यांच्या विकासात निरंतर स्वारस्य घेऊ इच्छितो.असं स्वारस्य घेण्याने त्यांच्या बद्दलच्या ज्ञानाची माझ्या ज्ञानात भर पडते आणि त्यामुळे मनुष्याच्या अंगात असलेल्या चांगुलपणावर विश्वास वाढतो.
माणुसकीत माझा भरवसा आहे.पण मी भावूक होऊन भरवसा ठेवीत नाही.मला माहित आहे की अनिश्चीतता, भयभीती, आणि भुकेच्या वातावरणात माणूस अगदी ठेंगणा झालेला दिसतो आणि नकळत तो असा बनला गेला असण्याचा संभव आहे.”

माझंही मत द्यावं म्हणून मी त्यांचं ऐकून म्हणालो,
“एखाद्या दगडाखाली उगवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोपट्याची धडपड कशी असते अगदी तसंच माणसाचं झालं आहे.ती शीळा बाजूला केल्यावरच ते रोपटं सहजपणे प्रकाशात फोफावून येतं.आणि फोफावून वर येणं ही त्या रोपट्याची स्वाभाविक क्षमता असते.फक्त मृत्युच त्याला अंत आणू शकतो. माझीपण आपल्यासारखी ह्या बाबतीत माणूसकीवर श्रद्धा आहे. त्याशिवाय आणखी कुठच्याही श्रद्धेची मला जरूरी भासत नाही.”

प्रो.देसाई काही बोलत नाहीत असं पाहून प्रि.वैद्य आपला मुद्दा पुढे सरकवीत म्हणाले,
“ह्या धरतीवरच्या एकूण आश्चर्यात,आणि जीवजंतूच्या आयुष्यात मी ध्यान-मग्न झालो आहे.त्यामुळे स्वर्ग आणि देवदूताबद्दल मी विचारच करीत नाही. माझ्या स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत विचार करायला ही वेळ मला भरपूर आहे.दुसर्‍या कसल्याही जीवनापेक्षा माणूस म्हणून मला जन्माला आल्याने सार्थक झाल्यासारखं वाटतं.”

प्रो.देसायाना बोलकं करावं ह्या उद्देशाने मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,मनुष्याच्या जीवनातला आशय तरी काय असावा”?
“माणसाच्या हृदयात असलेली एव्हडी अगाध श्रद्धा आणि प्रकाशाकडे झेप घेण्याची त्याची क्षमता पाहून मानवाच्या भविष्यात आशा आणि विश्वास ठेवण्यासाठी ह्या धरतीवरचा माझ्या जीवनातला आशय आणि कारण मला कळलं आहे. माणसाची व्यावहारिक बुद्धि कधी ना कधी हे नक्कीच सिद्ध करू शकेल की परस्परातली सहायता आणि सहयोग ह्या दोन गोष्टी सर्वांच्या सुरक्षतेसाठी आणि सुखासाठी विवेकपूर्ण बनल्या गेल्या आहेत.”
प्रो.देसाई असं म्हणून माझ्याकडे हंसत हंसत मलाच म्हणाले,
“सांगा अशावेळी तुम्ही काय कराल?
मला बोलू देण्यापुर्वी प्रि.वैद्य,
“मी सांगतो”
असं सांगून मला हाताने खुणावीत म्हणाले,
“अशा तर्‍हेच्या श्रद्धेचा विनीयोग जर का मनुष्य स्वतंत्र राहून आपली उन्नती करून घेण्यात करील तर अशा परिस्थितिला चांगलं रूप आणण्यात माझ्या सारख्या एकट्यालाही सदैव सतर्कता ठेवून आणि उद्देश्यपूर्ण क्षमता आणून ते करता आले तर तेव्हडाच हातभार लागेल.अशी परिस्थिति मला वाटतं,सुरक्षितता आणि मित्रत्वाच्या आवश्यकतेवर पायाभूत असते.काही गोष्टी माझ्या मनापासून मला आशाजनक वाटतात जशा सगळ्या जगातल्या अन्न उत्पादनाचा नीट विनीयोग केला तर ह्या धरतीवरच्या सर्व माणसाना पुरण्याइतकं अन्न आपल्या जवळ शिल्लक राहिल.आपलं औषधीय शास्त्रासंबंधाचं ज्ञान एव्हडं परीपूर्ण आहे की सगळ्या मानवजातीचं आरोग्य सुधारता येईल. आपल्याकडे असलेलं संसाधन आणि शिक्षणातलं ज्ञान ह्यांचा नीट प्रबंध केला तर जागतीक तुलनेत मनुष्यजातीच्या बुद्धिमत्तेची पातळी उंचावता येईल.ह्या जगातल्या काही देशाजवळ अगोदरच असलेल्या अशा तर्‍हेच्या फायद्याचा संपूर्ण जगाच्या तुलनेत कसा प्रबंध करायचा एव्हडंच शोधून काढावं लागेल.”

“आता तुम्ही बोला”
असं मला म्हणून प्रि.वैद्य मिष्कील हंसले.प्रो.देसाई पण मला म्हणाले,
“तुमचं सांगून झाल्यावर हा विषय समाप्त करू या.कारण आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत मला गेलं पाहिजे.”
मी माझं मत दिलं.
माझी रोपट्यापासून दगड दूर करून ठेवण्याची उपमा आचरणात आणली पाहिजे.एकमेकात असलेल्या आणि एकमेकावर असलेल्या माणसाच्या विश्वासाच्या आधारे हे करणं शक्य आहे.अर्थात सर्वांजवळ एकाच वेळी ही श्रद्धा असेल असं नाही.पण जास्तीत जास्त लोकांत अशी श्रद्धा बळावयाला हवी.
पाच पन्नास वर्षापूर्वी कुणीही जागतीक अन्नाचा साठा,जागतीक आरोग्याची जरूरी,जागतीक शिक्षण असल्या गोष्टींचा विचारही केला नसता. आजबरेच लोक ह्याचा विचार करायला लागले आहेत.
आजच्या ह्या अन्धाधुंध विध्वंसाच्या काळात माझ्या मनात येणारा प्रश्न असा की,
बुद्धिमंताजवळ ह्यावर कृती करायला वेळ राहिला आहे काय?
कारण मला वाटतं हा, मृत्यु आणि अज्ञान किंवा जीवन आणि बुद्धिमत्ता ह्यातला संघर्ष आहे.
माझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटल आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 3, 2009

विष प्राशन केले तीने दवा समजूनी

अनुवाद.( होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा….)

विसरली ती मला विवश होऊनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

असाव्या कथील्या अनेक कथा अंतराने
न वाहता प्राशीली आसवे लोचनाने
जाळीली मम प्रेमपत्रे बंद कक्ष करूनी
उच्चारीले अनेक शब्द जिव्हेवर आणूनी

विसरली ती मला विवश होऊनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी
मनातील स्वप्ने दुभंगलेली पाहूनी
चित्र माझे भिन्तीवरचे हटवूनी
मी तळमळत आहे असे पाहूनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

आठवूनी मजला मनोकामना उसळली
दिखाव्याच्या हंसण्याने दुःख्खे नाही छपली
नाव घेता माझे लोचने पाण्याने भिजली
सखीच्या खांद्यावरची मान नसेल उठवली
नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी

कचपाश मोकळे पाठीवर सोडूनी
सांवट दुःखाची चेहर्‍यावर आणूनी
वीज डोळ्यामधली फेकीली चमकूनी
गालावरची लाली गेली काही सांगूनी
नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी

विसरली ती मला विवश होऊनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 1, 2009

प्रतीरोध-क्षमता ही हृष्ट-पुष्ट होण्यापलिकडची बाब आहे.

"एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला.
"ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव."


मला कंटाळा आला की कोकणात निरनीराळ्या गावात जाऊन रहायला आवडतं.मग थोडे दिवस राहायचं झालं तर निदान तीथे एखादं हॉटेल असण्याची जरूरी आहे.पण सर्व ठिकाणी हॉटेलं असतील असं नाही.कुणा कडून माहिती काढून कोण कुठे रहातं ह्याचा उद्योग सहाजीकच निघण्यापूर्वी करावा लागतो.मग ओळख काढून त्यांच्या घरी रहायला मजा येते.

सावंतवाडी जवळच्या एका गावात जायचा योग आला. एकदा मुंबईहून एस.टीने प्रवास करताना सावंतवाडी येण्यापूर्वी ह्या गावात एस.टी थांबली होती.गाडीला काहीतरी काम निघाल्याने प्रवाशाना एक तास पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरून विश्रांती घ्यायला कंड्कटरने मुभा दिली होती.गावाचा परिसर मला खूपच आल्हादायक वाटला.भरपूर झाडी आणि बाजूने नदी वहाते.कोणाची ओळख काढून इथेच मुक्काम करावा असं वाटलं.जवळच्या हॉटेलात चहा आणि भजी घेऊन टेबलावर पडलेला ताजा पेपर वाचत होतो. त्यात स्थानीक कार्यक्रमाबाबत एक जाहिरात होती. कविसंमेलनाची ती जाहिरात होती. संमेलन दुसर्‍या दिवशी होतं.मी पण थोड्या कविता लिहिण्याच्या प्रयत्नात असतो.त्यामुळे ह्या कार्यक्रमात स्वारस्य घ्यावं असं वाटलं.फारतर सावंतवाडीत मुक्काम करावा लागेल एव्हडंच.

सावंतवाडीहून,आणि गोव्याहून काही होतकरूं कवीसंमेलनात भाग घ्यायला येणार होते.एक दोन स्त्रीयाही होत्या.सर्वांची नावं छापली होती.एका स्त्रीचं नाव ओळखीचं वाटलं. कवयित्री साधना तिरोडकर.हॉटेलात मालकाकडे चौकशी केल्यावर कळलं की नदीकिनारी एका मोठया वाड्यात लहान लहान घरं आहेत,तीथे ती रहाते.आमची एस.टी. बिघडल्याने सावंतवाडीहून मेकॅनीक आल्यावर गाडी दुरूस्त होईल असं कळल्यावर हॉटेल मालकाच्या एका मुलाला घेऊन मला जी साधना वाटते ती तीच का म्हणून तीच्या घरी जायचं ठरवलं.आणि योगायोग असा की साधना माझ्या ओळखीची निघाली.
पूर्वी माझ्या कॉलेजात ती पण होती.मला पाहिल्यावर सहाजीकच तीने मला घरी रहाण्याचा आग्रह केला.
"तू कॉलेजात असताना कविता करायचीस ते मला ठाऊक होतं.तुझं नाव त्या हॉटेलातल्या पेपरात वाचलं नसतं तर केवळ तुला पाहून मी काही ओळखलं नसतं."

माझं बोलणं संपल्यावर साधना थोडी हंसली.
"तुझ्या हंसण्यावरून मात्र मी तुला ओळखलं असतं"
असं मी पुढे म्हणाल्यावर साधना मला म्हणाली,
"तू हंसला नसतास तरी मी तुला ओळखलं असतं.तुझं ते कोकणी हेल काढून-हेळे काढून बालणं माझ्या पक्कं लक्षात होतं.बाकी तुझा चेहरा आहे तसाच आहे फक्त टक्कल पडलं आहे.खरं तर तुझे केस त्यावेळी कुरळे कुरळे होते"

"ते जाऊं दे"
साधना माझी आणखी काही तरी फिरकी घेईल त्यापूर्वीच मी विषय बदलून तीला म्हणालो,
"पण तू ह्या खेड्यात केव्हा पासून राहायला आलीस.?
"संमेलन उद्या आहे.आज रात्री आपण भरपूर गप्पा मारूया."
असं म्हणून साधनाने मला रहायचा आग्रह केला.
जेवण झाल्यावर रात्री गप्पा झाल्या.
"तुझीच प्रथम हकीकत सांग"
असं मी साधनाला म्हणालो.

"इतराप्रमाणे मी पण अगदी कठीण काळ पाहिला आहे."
साधना मला म्हणाली.
"आजारपण,विश्वासघात,जवळच्यांचा मृत्यु वगैरे वगैरे.ज्या ज्या वेळी मी अशा कठीण काळातून जात असे त्यावेळी मनात म्हणायचे प्रत्येक व्यक्ती ह्या असल्या एक ना दोन प्रसंगातून जात असावी. आणि मी बरेचवेळा प्रतिरोध-क्षमतेचा म्हणजे ज्याला resilience म्हणतात त्याचा विचार करायची.सुखी जीवनासाठी प्रत्येकात थोडीतरी प्रतिरोध-क्षमता असायाला हवी."

मी म्हणालो,
"अलीकडे आपण ह्या क्षमतेचा जास्त विचार करीत नाही.त्याऐवजी पुस्तकातून किंवा टीव्हीच्या कार्यक्रमातून "अतिरिक्त विचार करा" किंवा "झालं गेलं विसरून जा" असा विचार दाखवला जातो ते पहातो."
"अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं"
असं म्हणून साधना म्हणाली,
"ह्या विचारातून परंपरागत पद्धतीने मनाला लागलेले घाव भरून काढण्याचे उपचार असले तरी अलीकडे माझ्या लक्षात आलंय की जे काही घाव होतात ते समयाचा आधार घेऊन माझ्यातून एखाद्या गाळणीतून गाळून घेतल्यासारखं केल्यावर मग मी जगाला कसं तोंड देऊ शकेन त्यातला फरक मला उघडपणे दाखवून देतात.
माझ्या तीशीतल्या वयात मी ह्या गोष्टींचा विचार करून निराश व्हायचे.आणि त्यामुळे मला तोंडावर हंसू आणणं पण कठीण व्हायचं.कधी कधी सकाळ होता होता जीव नकोसा व्हायचा.माझी निराशा त्यावेळी खूपच वाढली होती."

"मला आठवतं मी तुझ्या घरी एकदा आलो होतो.तेव्हा तू आजारी आहेस असं कळलं.आणि तू घरी नव्हतीस."
असं मी तीला म्हणालो.
"अखेर माझी बरेच महिन्यासाठी एका इस्पीतळात रवानगी झाली होती.मला फारच डिप्रेशन आलं होतं.पण माझं नशीब जोरदार होतं.मी लवकर बरी झाले होते.ते इस्पीतळातले अठरा महिने महाकठीण होते.मी माझ्या मुलांपासून, नव‍र्‍यापासून आणि माझ्या इतर मैत्रीणीपासून दूर राहिले होते.ह्या झालेल्या नुकसानीची मला खूपच खंत लागली होती.परत हृष्ट-पुष्ट व्हायला ज्याची जरूरी आहे ती गोष्ट, ज्याला काही लोक प्रतीरोध-क्षमता म्हणतात ती आणणं मला महाकठीण झालं होतं.
पण त्यानंतर माझ्या जीवनचक्राच्या धारेवरून केंद्रभागी येण्यात माझ्यात बदल झाला होता.
माझं संकंट निवळलं होतं पण माझी नुकसानी खूप झाली होती. माझ्या प्रौढ जीवनात मी पत्नी,आई आणि शेजारी म्हणून माझं जीवन जगले होते.आता माझी मुलं जवळ नाहीत.माझे पती निर्वतले. त्यामुळे मी एकटीच झाले होते.दुसरं जीवन जगण्याची मला जरूरी भासूं लागली.
"मग तू शहर सोडून इकडे रहाण्याचा विचार कसा केलास?"
असा मी साधनाला प्रश्न केला.

ती म्हणाली,
"एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला.
"ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव."
तेव्हाच माझ्या लक्षात आलं की प्रतीरोध-क्षमतेची अन्य रूपं असतात.मी बराच विचार करून ह्या गावात येऊन राहायचं ठरवलं.खरं तर माझं सासर तिरोड्याचं.पण माझी एक मावशी इथे रहाते तीची सोबत मिळेल म्हणून मी ह्या गावात रहाण्याचा विचार केला.माझ्या नवर्‍याच्या विम्याच्या आलेल्या पैशामधून एक जूनं घर इथे मी विकत घेतलं.मला इकडे फारसं कोणी ओळखत नव्हतं.मला लहानपणापासून बाग-काम करायचा नाद होता.घराच्या पुढे आणि मागे परसात मी सूंदर फुलांची झाडं लावली.घरातल्या खोल्यांची रंगरंगोटी करून घेतली.एक सर्वसाधारण बाई एक सर्वसाधारण जीवन जगते आहे असा विचार करून इकडे रहात आहे."

मला साधनाची एकंदर परिस्थिती ऐकून गहिवर आला.तीला बरं वाटावं म्हणून मी म्हणालो,
"जसं तळ-शिळेतून गाळून निघालेलं पाणी खोल झर्‍याला मिळून मग तो झरा एकाद्या जलाशयाला जाऊन मिळतो तसंच तू तुझं दुःख आणि तुझी खंत तुझ्यातून गाळून तुझ्या स्वतःच्या जलाशयात तीला जाऊं दिलंस."

विषय बदलण्यासाठी मी साधनाला पुढे म्हणालो,
"तुझ्या कविता लिहिण्याच्या नादाचं पुढे काय झालं ते सांग."
परत जरा हंसून साधना मला म्हणाली,
"मला आठवतं मी अगदी तरूण वयात दोन चार कवितेच्या ओळी लिहायची.लिहून झाल्यावर त्या ओळी वाचून माझाच मला आनंद व्हायचा.मधे दहाएक वर्षाचा खंड पडला.आता मी स्वतंत्रपणे कविता लिहून अलीकडे एक संग्रहपण छापून घेतला आहे.माझी प्रत्येक कविता म्हणजे निराशेतून आणि आनंदातून मार्ग काढून घेण्याचा एक प्रयत्न असतो.माझी प्रत्येक कविता म्हणजे नवीन मोका असतो तो आठवण करून देतो की ती कविता एक प्रतीरोध-क्षमतेचं नवीन रूपच आहे."

"मग तुझी एखादी कविता मल वाचून दाखवंच"
असा मी तिला आग्रह केला.
"माझ्या तानुचा-माझ्या मुलीचा- आज वाढदिवस आहे.लहानपणी ती एकदा पाय घसरून पडली होती.तीचा एक हात दुखावला गेला होता.आणि तो बरा होता होता परत ती त्याच हाताला दुमडून पडली आणि परत तिला प्लास्टर लावावं लागलं होतं.हे तिला सर्व नवीनच होतं.
तिन आठवडे हात प्लास्टरमधे असणार हे तानुलीला खरंच वाटत नव्हतं.सतत कुणालाही मदत करणारी तानु,एका जाग्यावर निमुट न बसाणारी तानु,सतत बागेत फुलांबरोबर स्वगत करणारी तानु,आज हिरमुसली होवून बसलेली पाहून मला एक कविता सुचली.ती मी तुला वाचून दाखावते"
असं म्हणून साधना वाचायला लागली,
"कवितेचं शिर्षक आहे"

"छळकुटा देव"

किती छळसी रे तू देवा
का करिसी तानुलीचा हेवा?
करिते ती सर्वांची सेवा
का पाडीसी तिला पुन्हा पुन्हा
कसली शिक्षा
अन कसला गुन्हा


बागेत बागडणारी
ती तानुली
फुलाना खुडणारी
ती तानुली
पक्षा संगे गाणारी
ती तानुली
फुल-पांखरासवे पळणारी
ती तानुली
बसे होवूनी हिरमुसली
घरी दिवसभरी


समजून घे रे देवा
पाडू नको तिला पुन्हा पुन्हा
करी झटकन उपाय
तिच्या दुखापतीला


ऋणी होवू आम्ही
तुझ्या ह्या मेहरबानीला
पुन्हा आणिल ती घरी चैतन्याला
आनंदी होवू आम्ही फिरूनी
बघुनी तिच्या मधुर हास्याला


"किती सुंदर विचार आहे.मला तुझी कविता खूपच आवडली.तुझा कवितासंग्रह पण मी वाचून काढणार आहे.उद्या नाहीतरी तू तुझ्या तुला आवडणार्‍या कविता संमेलनात वाचणार आहेस."
असं मी साधनाला म्हणालो.
"रात्र खूप झाली आहे.आता आपण झोपूया."
असं साधनाने सांगीतल्यावर आम्ही झोपायला गेलो.
दुसर्‍या दिवसाच्या कवीसंमेलनाच्या उमेदीत मी केव्हा झोपलो ते कळलंच नाही.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com