Wednesday, December 29, 2010

वारा फोफावला.

“पण वार्‍याकडून जे बळ मला मिळतं त्याचा मी अख्या जगासाठीही सौदा केला नसता. वारा हा माझा उपचार आहे असं मी नेहमीच समजतो.”

मला वारा खूपच आवडतो.माझ्या सर्व चेहर्‍यावरून वारा चाटून गेला,माझ्या केसातून पिंजारत गेला की त्याचा तो स्पर्श मला आवडतो.उन्हाळ्याच्या दिवसात वारा तर हवा हवा असा वाटतो.उन्हाळ्यात वार्‍याची झुळूक येऊन झाडांची पानं सळसळली की मन कसं प्रसन्न होतं.घराच्या मागच्या परसात,आराम खुर्ची टाकून बसल्यानंतर समुद्राकडून येणारा थंडगार,खारट वारा जेव्हा अंगावरून जातो तेव्हा खूपच आल्हादायक वाटतं.
मला वारा आवडतो कारण तो एव्हडा माझ्या जवळ येतो की जणू माझ्या अंतःकरणाला शिवतो.पण मला माहित आहे की तो मला कसलीच इजा करणार नाही.त्याच्या मनात कसलाच वाईट इरादा नसतो.एव्हडंच कधीतरी जरा जास्त प्रखर वाटतो.

बाकी इतर सर्व गोष्टी असतात तसा वारा काही दोषहीन नसतो.तो नेहमीच असेल असं नाही.पण एक नक्कीच परत कधीतरी तो येतो,आणि मागच्यावेळी जसा माझ्या मनाला प्रसन्नता देऊन गेला तसाच देऊन जातो.जिथे मी जाईन तिथे मी वार्‍यावर आणि आजुबाजूच्या वातावरणावर केंद्रीभूत असतो. मला कुठे न्यायचं ते वार्‍याला नक्कीच माहीत असतं.

वार्‍याने मला अशा अशा ठिकाणी नेलं आहे की त्या जागांचं अस्तित्व मला त्याने तिथे नेई पर्यंत माहीत नसायचं. त्याचं एकच कारण मी वार्‍यावर विश्वास ठेवीत गेलो.मला एखादा दिवस बरा जात नाही असं वाटलं की मग मी आमच्या परसात आराम खूर्ची घेऊन बसतो,डोळे मिटतो आणि वार्‍याचा स्पर्श जाणवून घेतो,जणू मला तो आपल्या जवळ घट्ट धरून ठेवतो असं भासतं.मला वारा चांगल्या ठिकाणी घेऊन जातो.जिथे वारा जातो तिथे मी जर गेलो नसतो तर त्या जागा मला माहीतही झाल्या नसत्या.माझ्या मनातून येणार्‍या आवाजा ऐवजी निसर्गातून येणारा आवाज मला वारा ऐकवतो.
मला वार्‍यानेच शिकवलंय की,माझ्या काहीही समस्या असल्या तरी त्या वार्‍यासारख्याच उधळून जाणार.पण त्या वार्‍यासारख्याच परत येणार.त्या परत आल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या हे मी जाणू शकतो.आणि त्या निभावून नेऊ शकतो.

माझ्या आजोबांनी मला प्रथम दाखवलं की वारा छान असतो.त्यांना कदाचीत माहीतही नसेल पण वार्‍यावर प्रेम कसं करायचं ते त्यांनीच मला शिकवलं.समुद्रावर गेल्यावर बरेच वेळा वारा प्रचंड असतो.अगदी नको कसा होतो.कारण तो सतत आपल्या चेहर्‍यावर आपटत असतो.पण माझ्या आजोबांने दाखवलं की वार्‍याबरोबर समजुतदारपणे राहून त्याचा स्पर्श कसा जाणवून घ्यायचा.

एकदा मी माझ्या आजोबांबरोबर आमच्या घरामागच्या परसात बसलो होतो.माझी धाकटी बहीण व्हायलीनवर एक सुंदर धून वाजवीत होती.ती धून माझ्या आजोबांना खूप आवडायची.धून ऐकत असताना त्यांचं लक्ष आजुबाजूच्या उंच झाडावर गेलं.एक हलकीशी झुळूक त्यांचा विरळ सफेद केसावरून जाऊन त्यांचे केस विसकटले गेले.मी त्यांना पहात होतो.त्यांनी डोळे मिटले होते.आणि वार्‍याच्या झुळकेच्या विरूद्ध दिशेने त्यांनी त्यांची मान हलवली.
मला माहीत झालं की वार्‍याने त्या धूनीतल्या स्वरांकडे त्यांचं ध्यान केंद्रीभूत केलं होतं.

कोकणात गेल्यावर मला माझे आजोबा नेहमीच वेंगुर्ल्याच्या समुद्रावर न्यायचे.आमच्या घरापासून समुद्र दोनएक मैलावर आहे.मला आजोबा चालत न्यायचे.आजोबांची सारवट गाडी होती.दोन बैलांना जुंपून मागे तीन,चार माणसाना बसायला सोय असलेली अशी सुशोभित बंदिस्त पेटी असायची.मला त्या सारवट मधून जायला आवडायचं. पण निसर्ग सौन्दर्य पाहायचं असेल तर पायी चालण्यासारखी मजा नाही असं मला माझे आजोबा सांगायचे.
मांडवी पर्यंत चालत गेल्यानंतर,खाडीवरून येणारा वारा आणि पुढे थोडी चढ चढून गेल्यावर अरबी समुद्राचा वारा ह्यातला फरक मला ते समजाऊन सांगायचे.खाडीवरून येणारा वारा खारट नसायचा.शिवाय खाडीच्या पात्रात जमलेल्या गाळामुळे म्हणा किंवा खाडीतल्या गोड-खारट मास्यांमुळे म्हणा वार्‍याला एक प्रकारचा वास यायचा. मासा कुजल्यानंतर त्याला जो वास येतो त्याला कुबट वास म्हणतात.तसाच काहीसा हा वास असायचा.माझे
आजोबा हे मला समजाऊन सांगायचे.

वेंगुर्ल्याच्या बंदरावर जाई तो पर्यंत आजुबाजूचं निसर्ग सौन्दर्य पाहून मन उल्हासीत व्हायचं.एका बाजूला फेसाळ पाण्याचा,उफाळलेला,वार्‍याने फोफावलेला,अरबी समुद्र आणि रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला उंचच उंच झाडांनी भरलेला हिरवा गर्द डोंगर पाहिल्यावर एखाद्या चित्रकाराने कॅन्व्हासवर सुंदर चित्र चितारलं असतं. माझे आजोबा जेव्हा मला प्रत्यक्ष बंदरावर घेऊन जायचे त्यावेळेला बंदराच्या धक्याला पाण्याबरोबर आपटून येणारा वारा प्रचंड
थंड लागायचा.अंगात कुडकुडी भरायची.मी चला,चला,म्हणून त्यांच्या मागे लागल्यावर,
“ती होडी एव्हडी जवळ येई पर्यंत थांबू या” किंवा
“ते पक्षी तिथून परत फिरल्यावर निघू या”
अशा शर्ती देऊन मला थांबायला सांगायचे.खरं तर त्या वार्‍याचा आनंद ते लुटायचे.

त्यानंतर आणखी वार्‍याचा निराळा अनुभव घ्यायला मला आजोबा बंदराजवळच्या टेकडीवर न्यायचे.ही टेकडी नक्कीच पाच-सातशे फूट उंच असावी.टेकडीवर चढायला पायर्‍या आहेत.ब्रिटिशांपासून त्या केलेल्या आहेत. टेकडीच्या वरती एक गेस्ट-हाऊस होतं.त्या गेस्ट हाऊस मधून गोव्याच्या दिशेने समुद्रात बांधलेल्या लाईट-हाउसीस दिसायच्या.समुद्रात धूकं असलं तर जवळचीच एखादी बत्ती दिसायची.पण कडक उन्हात दूरवर चार पाच बत्त्या
दिसायच्या.पण ह्या बत्त्यांची मजा पहाण्यासाठी माझे आजोबा येत नसावेत. त्यांना त्या टेकडीवरून येणा्र्‍या वार्‍याची झुळकीत स्वारस्य होतं.मोठ-मोठाले पाच दहा सर्क्युलेटींग पंखे लावल्यावर कसा वारा येईल तसा तो वारा गेस्ट-हाऊसच्या दिशेने यायचा.
ह्या गेस्ट-हाऊसमधे येऊन पुलं. लेख लिहायचे,असं त्यांनीच कुठेतरी या संबंधाने लिहिलेलं मी वाचलं आहे.

आता बाहेर गावी ड्रायव्हिंग करीत असताना,मी बरेच वळा एक हात बाहेर काढून वार्‍याचा स्पर्श जाणवीत असतो. वारा माझ्या हाताच्या बोटातून जाऊन माझ्या तळहातावर जाणवतो.माझ्या केसावर फुंकर मारल्यासारखी जाणवते.वेडपटासारखा माझा हात मी वार्‍यात हलवीत असतो कदाचीत थोडासा वारा पकडून खिशात भरता यावा असं वाटतं.
मला आठवतं,असाच एकदा मी कलकत्याला गेलो असताना हावडा-ब्रिजच्या खालून जाणार्‍या हुगळी नदीच्या काठावर उभा होतो.वारा इतका वहात होता की तो मलाच आपल्या हाताने कवटाळून जवळ घेत होता असं वाटत होतं.मला सांगत होता सर्व काही ठीक होणार.मला सांगत होता की कशाचीच काळजी करू नयेस.मनावर कसलाच ताण आणू नयेस.इतका अविश्वसनीय दिलासा वाटत होता की मी फक्त दीर्घ श्वास घेण्यापलीकडे काहीच करीत
नव्हतो.

वारा माझ्या जीवनात नसता तर मी काही वेगळाच झालो असतो असं मला सांगता येणार नाही.पण वार्‍याकडून जे बळ मला मिळतं त्याचा मी अख्या जगासाठीही सौदा केला नसता.
वारा हा माझा उपचार आहे असं मी नेहमीच समजतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, December 26, 2010

फणस

“फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….”

कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्‍या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच
चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल्य रस माझ्या मनगटावर घरंगळत गेला तरी पूर्ण गर खाऊन झाल्यावरही उरलेली बाठी चोखून चोखून खाण्याचा मोह मला आवरत नसतो हेही कारण असावं.ताजी,ताजी काळीभोर करवंदं तोंडात टाकल्यावर ज्या पद्धतिने फुटतात,जणू छोटे बारूदच फुटावेत तसे,नंतर त्या करवंदाचा आंबट गोड रस तोंड भरून गिळायला मिळत असल्याने ते कारण असावं.फळ म्हटल्याने त्याच्या उच्चारातून मला
एखादा अतिसुंदर बुडबुडा फोडण्यासारखा आहे असंच काहीसं वाटतं.

माझ्या जीवनात फळाला अग्रता आहे.फळ माझा उच्चतम मित्र आहे असं मी समजतो:क्षमाशील,विश्वसनीय आणि मस्त,मस्त.
कोकणात अनेक तर्‍हेची फळं मिळतात.आणि त्यात निरनीराळे प्रकारही असतात.
फळांचा राजा आंबा-हापूस,पायरी,फणस,अननस,बोंडू-काजूचंफळ-आवळे, फाल्गं, करवंदं, जांभळं, चिकू, जांम, जाफ्रं,पेरू,गाभोळी चिंचा,कलिंगडं,रामफळं,सिताफळं,बोरं,पपई,केळी-हिरव्या सालीची,वेलची केळी,सोन केळी…आणखी कितीतरी फळं असावीत.

फणस फोडून त्यातून गरे काढणं म्हणजे एक दिव्य असतं.प्रथम हाताला खोबर्‍याचं तेल फासावं लागतं.त्याने फणसाच्या फळातून येणारा चिकट चीक हाताला लागू नये हा उद्देश असतो.फोडलेल्या फणासाच्या भेशी बाजूला करून त्यातून गरे बाजूला करून चारखण टाकून द्यावं लागतं.काटेरी चारखणात गर्‍याभोवती बेचव पाती गर्‍याला घट्ट धरून असतात.त्या पाती वेगळ्या कराव्या लागतात.त्याचवेळी फणसाचा चीक हाताला चिकटण्याचा संभव असतो
म्हणून खोबर्‍याच्या तेलाने हात माखून ठेवावे लागतात.त्यामुळे हाताला चीक चिकटत नाही.
रसाळ फणसाचं आणि काप्या फणसाचं अशी वेगळी झाडं असतात.मला रसाळ फणसाचे गरे आवडतात.मात्र काप्या फणासाचे गरे रसाळ गर्‍यासारखे गीळगीळीत नसतात.काप्या गर्‍याबरोबर खोबर्‍याची कातळी खाण्यासारखी मजा नाही.निराळीच चव येते.

काप्या गर्‍यामधल्या बिया-घोट्या-वेगळ्या करता येतात.पण रसाळ गर्‍यातली घोटी वेगळी करायची झाल्यास,गरा घोटीसकट तोंडात टाकून तोंडातच गर वेगळा करून घोटी ओठातून बूळकरून बाहेर काढावी लागते.दोन्ही प्रकारच्या गर्‍यांच्या घोट्या उकडून,भाजून किवा डाळीच्या आमटीतून शिजवून किंवा घोट्यांची भाजी करून खाता येते.

मला आठवतं मी सातएक वर्षाचा असेन.उन्हाळ्याचे ते दिवस होते.माझ्या आईने रसाळ आणि काप्या फणसाचे गरे एका मोठ्या परातीत पसरून ठेवले होते आणि ती परात जेवणाच्या टेबलावर ठेवली होती.येता जाता आम्ही गरे खावेत असं तिला वाटत असावं.मी एकदा एक रसाळ गरा खाताना, गर तोंडात ठेऊन घोटी तोंडातून बूळकरून बाहेर काढताना, माझा एक सातवर्षेय दांत,मुळापासून सुटला असावा.कारण,तोंडात काहीतरी घट्ट घट्ट लागत आहे असा मला भास व्ह्ययला लागला.आणि खरंच माझा एक दांत सुटलेला मला दिसला.माझा बालपणातला पहिलाच दांत मी गमावून बसलो होतो.

बालपणाचा दांत पडणं म्हणजेच आपण किशोर वयात पदार्पण करीत आहो हे माझ्या लक्षात आलं.ती बाहेर आलेली घोटी आणि माझा दांत मी माझ्या हातात नीट सांभाळून ठेवला.एका कुंडीत माती घेऊन त्यात मी घोटी दांतासकट पुरली.माझ्या गुरूजींनी शिकवलेल्या माहिती प्रमाणे ती घोटी, कुंडीत फणसाचं रोप होऊन, उगवून आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार नव्हती.पाण्याचा पुरवठाही, सुरवातीला रोप येण्यासाठी,कमी लागत असावा.माझ्या निजायच्या खोलीतल्या खिडकीवर मी ती कुंडी ठेऊन रोज पाणी घालून रुजवीत असताना एक दिवशी आमच्या घरातल्या मनीमाऊने बाहेरून खिडकीत आणि खिडकीतून घरात प्रवेश करण्याच्या धडपडीत त्या कुंडीला धक्का देऊन खाली पाडली.त्या बरोबर माझ्या आईचा स्वतःचा हातात धरायचा आरसा,जो तिला तिच्या आईने दिला होता तो,पण तडकवून टाकला.माझी आई रोज त्या आरशात बघून आपल्या कपाळाला कुंकू लावायची.आईला खूप वाईट वाटलं.माझी आई समजुतदार होती.
“होऊन गेलं त्यावर आता रडण्यात काय हाशील?”असं ती मला म्हणाली.
तरी तिला झालेलं दुःख तिच्या चेहर्‍यावरून लपत नव्हतं.स्वतःचं फणसाचं झाड रुजवून आणण्याच्या माझ्या स्वपनालाही तडा गेली.

माझे ओले झालेले डोळे शर्टाच्या बाहीला पुसून मी ते सर्व झाडून काढलं आणि असं करीत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली.मी ठरवलं की फणसाचं रोप होऊन येणार्‍या माझ्या झाडाला आमच्या मागच्या परसात, विहीरी जवळ जागा करावी.आरसा फुटल्याने झालेल्या नुकसानीबद्दल माझ्या आईचं दुःख मी सहन करून विहीरी जवळीची खड्ड्यासाठी खणून ठेवलेली जागा पाहून आईची बोलणीपण खाऊन घेतली.हे सगळं मी माझ्या मित्राला-फळाला- सहाय्य देण्यासाठी करीत होतो.नाहीतरी मित्र एकमेकासाठी त्याग करतातच म्हणा.

काही महिन्यानंतर त्या जागी एक हिरवं अणकुचीदार रोप त्या जमीनीतून रुजलं आणि बाहेर दिसायला लागलं.मी आणि माझ्या आईने त्या रोपाला वाढवायला खूप मेहनत घेतली.शेळी-बकरीने खाऊ नये म्हणून त्या रोपा सभोवती नारळाच्या झाडाच्या झापाचं कूंपण घालून त्याला आडोसा दिला.
नियमीतपणे खत-पाणी घालीत राहिलो.हळू,हळू आमच्या परसातल्या विहीरी जवळ एक मोठं फणसाचं झाड उभारून आलं.

फणस हे असं एक फळ आहे की ती निसर्गाची उपयुक्त निर्मिती आहे असं मला वाटतं.तसं पाहिलंत तर हे फळ खाऊन कुणाचं वजन वाढत नाही.
आदळ-आपट होऊनसुद्धा हे फळ आपला स्वाद कमी करीत नाही.कोणत्याही परिस्थितीत ते सहकार्य देतं.मग त्याची फणस-पोळी तयार करा किंवा आणखी काही गोष्टीसाठी त्याचा वापर करा.त्याचं सहकार्य असतंच.अनैसर्गीक फळ-शर्करा किंवा अनैसर्गीक चरबी खाण्यापेक्षा कुठच्याही फळाकडून हे दाखवलं जातं की शुद्धता आणि निर्मळता जमिनीतून उगवूं शकते.

आज हे फणसाचं झाड आम्हाला एवहडे फणस देतं की आम्ही त्याचा साठा घरात करून झाल्यावर उरलेले फणस बाजारात विकतो.फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 23, 2010

अनवहाणी चालणं

मला आठवतात ते दिवस.

“गै वयनी,कालचां काय शिळांपाक्यां असलां तर वाढ गे!”

माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या अंगणाच्या बाहेरून दगडूमहाराचा( दगडूमहार ह्याच नांवाने तो ओळखला जात असल्याने तसं नाईलाजाने म्हणावं लागतं.) हा आवाज ऐकल्यावर माझी आजी मांगरात जाऊन अंगावरचं लुगडं सोडून मांगरातून जुनं लुगडं-त्याला कोकणात बोंदार म्हणायचे-नेसून यायची.ते झाल्यानंतरच दगडूमहाराच्या करटीत-नारळ फोडून नारळातलं खोबरं काढून झाल्यावर उरलेले कडक आवरणाचे दोन भाग. त्यातल्या अर्ध्या भागाला करटी म्हणायचे-आम्ही लहान मुलांनी खाऊन झाल्यावर उरलेली पेज आणि फणसाची भाजी,त्याच्या करटीत वरून टाकायची.करटीत टाकलेली पेज पिऊन झाल्यावर फणसाची भाजी त्या करटीत टाकायची.टाकायची म्हणण्याचा उद्देश खरंच वरून वाढायची.दगडूमहाराला कसलाच स्पर्श होऊ नये हा उद्देश असायचा.चुकून स्पर्श झाल्यास “आफड” झाली असं म्हणून आंघोळ करावी लागायची.दगडूमहार निघून गेल्यावर आजी “बोंदार” बदलून घरातलं लुगडं नेसायची.आणि घरात यायची.

त्यावेळी आमच्या त्या लहान वयात,अवलोकनापलीकडे,आमच्या डोक्यात, हे बरं की वाईट,स्पृश्य-अस्पृश्यता,हा माणसा माणसातला वागण्यातला फरक,ह्याला माणूसकी म्हणायचं काय? असले विचार येत नसायचे.आता भुतकाळात मागे वळून पाहिल्यावर त्याची आठवण येऊनही लाज वाटते.

त्याचं असं झालं,दगडूमहाराचा पणतू,रघू, मला भेटायला घरी आला होता.मी थोडे दिवस आजोळी रहायला गेलो होतो.मी आल्याचं त्याला कुणीतरी सांगीतलं.हा रघू, चांगला शिकून आता गावातल्या शाळेत हेडमास्तर म्हणून काम करतो.त्याला त्याचे पंजोबा-दगडूमहार-निटसा आठवत नव्हता.
इकडची,तिकडची चर्चा झाल्यावर मी रघूला म्हणालो,
“मला माझ्या एका कुतूहलाचं तू उत्तर द्यावंस.गावातले बरेच लोक अजून अनवहाणी चालतात, ह्याचं कारण काय असावं?.गरीबी हे एक कारण असू शकतं. बायका तर वहाणं घालतच नाहीत आणि बरेचसे पुरूषही अनवहाणी चालतात.”

मी त्याच्या वडलांची ह्याबाबतीत चौकशी केल्यावर आपल्या वडलांबद्दल तो सांगायला लागला,
“जितकं जमेल तितकं माझ्या वडलांना अनवहाणी चालायला आवडायचं.असं केल्याने त्यांचा त्यांच्या चालण्याच्या क्रियेत ताबा आहे आणि त्याशिवाय हे त्यांना आरामदायक आहे असं वाटत असायचं.लहानपणी त्यांनी कधीच वाहाणा वापरल्या नाहीत.
“लहानपणी शाळेत जातानासुद्धा.पायात वहाणा घातल्यावर माझ्या मनावर थोडा ताण यायचा,आणि जखडल्यासारखं वाटायचं.त्यामुळे इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करायला जरा कठीण व्ह्यायचं.”असं ते म्हणायचे.
वहाणा बहिषकृत करायला हव्या होत्या अशातला काही भाग नाही. फक्त त्यांना वाटायचं त्याची जरूरी नव्हती.”

“गावात हे सर्व चालतं.कुणी एव्हडं लक्ष देत नाहीत.पण शहरात वहाणांची फार जरूरी असते.वाहाणांशिवाय चालणं अप्रशस्त समजलं जातंच,त्याशिवाय गर्दीत कुणाचा जड बुटांचा पाय कुणाच्या अनवहाणी पायावर पडला तर पायाची कळ मस्तकात गेल्याशिवाय रहाणार नाही.”
मी रघूला म्हणालो.

मला रघू म्हणाला,
“मी मास्तर झाल्यानंतर पायात वहाणा घालायला लागलो.
त्या अगोदर इतका अनवहाणी चालत असल्याने,उन्हाने तापलेल्या रस्त्यावर किंवा टोकदार दगडावरून चालल्यावर मला कसल्याच वेदना होत नव्हत्या. काही शहरी लोक हे अनवहाणी चालणं काहीतरी विलक्षण आहे असं समजतात,पण मला फायद्याचं वाटतं. लहानपणाचं मला आठवतं,एकदा शेकोटी करून वापर झाल्यावर विझत असलेल्या लाकडाच्या तुकड्यावरून मी चालत जात आहे हे लक्षात आलं असताना,मी पटकन उडी मारून दूर झालो आणि पायाला लागलेली जळती राख धुऊन टाकली.माझ्या तळव्यांना काही झालं नव्हतं.कारण माझे तळवे तेव्हडं सहन करण्याच्या स्थितीत होते.”

रघू थोडासा,विचार करण्यासाठी गप्प झाला असं मला वाटलं.पण नंतर म्हणाला,
“माझ्या वडीलाना वहाणा आवडत नसायच्या त्याचं कारण कदाचीत नदीत कमरेपर्य़ंत पाण्यात दिवसभर उभं राहून गळाला लागणार्‍या मास्यांची वाट पहाण्यात त्यांचा बराचसा वेळ जात असल्याने,त्यांना वहाणांची जरूरी भासत नसावी.”
पुढे सांगू लागला,
“किंवा कदाचीत आमच्या हाडामासांत ते मुरलेलं असेल.मला आठवतं,माझी आजी तर अगदी लहानपणापासून नदीच्या किनार्‍यावरून किंवा रानातून चालायची अर्थात अनवहाणी.मी ऐकलंय की माझ्या आजोबांनी आयुष्यात कधी वहाणा वापरल्या नाहीत.शेवटी,शवटी त्यांना कापर्‍यावाताचा रोग झाला होता.ते म्हणायचे वहाणा घालून चालण्याने तोल सांभाळला न गेल्याने पडायची शक्यता असल्याने,ते अनवहाणीच चालायचे.तसंच इकडे अजून गावातल्या बायका चप्पल पायत घालून चालणं अप्रशस्त आहे असं समजतात.”

मला हे रघूने दिलेलं,स्पष्टीकरण जरी पटलं नाही तरी मला गावातल्या लोकांच्या रीति-रिवाजाचा आदर करावा असं मनात आलं.अनवहाणी चालल्याने तळव्यांना होणारे अपाय वगैर सांगण्यात काही हाशील नव्हतं.

मी रघूला म्हणालो,
“जर का वैकल्पिक असतं तर नक्कीच बरेचसे पैसे वाचले असते.वहाणांचा शोध लागण्यापूर्वी लोक अनवहाणीच चालायचे.अनवहाणी असताना त्यांना अवतिभवतिचा चांगलाच बोध रहायचा.मी कुठेतरी वाचलंय की,पळत असतानासुद्धा काहींना वहाणा घालायला आवडत नाही.कदाचीत हे ऐकून विचित्र वाटत असेल पण असं सिद्ध केलं आहे की जर का तुम्ही अनवहाणी धावत असाल तर ते तसंच करीत रहा.अनवहाणी चालल्याने,आणि धावल्याने
तुमच्या पायाच्या पोटर्‍या मजबूत होतात आणि खोटा कमी झिजल्या जातात.”
दुर्भाग्याने,बरेचसे लोक अनवहाणी चालू शकत नाहीत कारण त्यांच्या पायाच्या नाजूक तळव्याना आरामदायी वाटत नसावं.पण तुझी ही कथा ऐकल्यावर मला वाटतं अनवहाणी चालण्याचं स्वातंत्र्य असावं.”
असं म्हणून मी हा विषय बदलला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफ्रनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 20, 2010

पहाट.

“पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”

सकाळीच बाहेर फेरफटका मारायची माझी जूनीच संवय आहे.मग मी कुठेही फिरतीवर असलो किंवा कुणाकडे बाहेर गावी रहायला गेलो असलो तरी सकाळी उठून जवळ असलेल्या कुठच्याही मोकळ्या जागी फिरून यायचो.मग कोकणात असलो तर,बाजूच्या शेतीवाडीत फिरायचो,समुद्राजवळ असलो तर चौपाटीवर जायचो,छोटासा डोंगर असला तर घाटी जढून जायचो.जवळ नदी असेल तर नदीच्या किनार्‍या किनार्‍याने फिरत जायचो.
शहरात असल्यानंतर मात्र अशी निवड करायला मिळत नसायची.

एकदा मी दिल्लीत असताना वसंत विहार कॉलनीत रहायला होतो.कॉलनीत अतीशय सुंदर पार्क होता.खूप लोक सकाळी फिरायला यायचे.गॉल्फचं मैदान पण होतं.मैदानाच्या कडे कडेने फिरत राहिल्यास दोन अडीच मैलाचा एका फेरीत फेरफटका व्हायचा.

सांगायची गोष्ट म्हणजे,संध्याची आणि माझी ह्या पार्कमधे गाठ होईल हे ध्यानीमनी नव्हतं.संध्या कुडतरकर-आता संध्या परब-ही मुळची कोकणातली.
तिचे पती परब हे सैन्यात चांगल्या हुद्यावर होते.वसंत-विहारमधे त्यांना सुंदर बंगला रहायला मिळाला होता. नाईकीचे सफेद कॅनव्हास शूझ,आणि जॉगींगला जायचा स्वेट ड्रेस घालून माझ्या मागून पळत पळत येत संध्या मला मागे टाकून गेली.मी पुढे चालत गेल्यावर एका बाकावर थोडीशी विश्रांती घेत बसलेली दिसली.मी तिला ओळखल्यावर माझ्याशी हंसली.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.चौकशा झाल्या.आणि बोलता बोलता संध्या लहानपणाची आठवण काढून मनाने कोकणात गेली.
“गेले ते दिवस”
मला म्हणाली.

“दिवस जातात पण आठवणी येतात.आठवणी जात नाहीत.
सांग तुझ्या आठवणी.मी पण थोडा तुझ्याबरोबर मनाने कोकणात जाईन.”
मी संध्याला म्हणालो.

मला म्हणाली,
“उन्हाळ्याची सुट्टी चालू झाल्यावर माझ्या धाकट्या बहिणीबरोबर मी माझ्या आजीआजोबांच्या घरी त्यांना भेटायला कोकणात जायचे. डोंगराच्या पायथ्याशी त्यांचं घर होतं.घर बरंच मोठं होतं.घराच्या भोवती सुंदर बगीचा होता.माझी आजी बगीचा फुलवण्यात तरबेज होती.अगदी दगडातून ती फुलझाड रुजवायची असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.हळूवारपणे झाडांच्या रोपांची निगा ठेवणारी तिची कसबी बोटं पाहून त्याबद्दलचं माझं
नवल कधीच विसरलं जाणार नाही.”

“तुझे आजी आणि आजोबा खूपच मेहनती होते.आजोबा शेतात कामं करायचे.आजी गडी-नोकर असले तरी घरी सतत कामात असायची.काय सुंदर तिने बाग केली होती?.मला पुजेला फुलं हवी असली की मी हटकून त्यांच्या बागेतली फुलं घेऊन जायचो.”
मी म्हणालो.
माझं म्हणणं ऐकून, संध्याची कोकणातली ओढ जास्त तीव्र झालेली दिसली.

“गम्मत सांगते तुम्हाला.”
असं म्हणत सांगू लागली.
“मी सकाळीच त्यांच्या घरी गेल्यावर, माझ्या आजीआजोबांशी सकाळची खास प्रथा असायची, त्यात सहभागी व्ह्यायची. सूर्योदय होण्यापूर्वी आम्ही उठायचो.गरम गरम चहा व्ह्यायचा.एकमेकाजवळ बसून चहा प्यायचो.आता मला आठवण येते,कशी माझी आजी रोज सकाळी उठून माझ्या खोलीत हळूच यायची,अलगत माझ्या खांद्यावर हात लावून मला उठवायची.मी लगेचच उठून तिच्या बरोबर स्वयंपाक घरात जायची.चहाचं आद्ण ठेवलेल्या
चुलीवरचं झांकण वाफेने हलत रहायचं.चहाचा घमघमाट सुटल्यावर आजी त्यात दूध घालून एका कपात ओतून मला गरम चहा आणून द्यायची.मी तर त्या क्षणाची वाटच पहात असायची.
चहा घेऊन झाल्यावर मागच्या पडवीत झोपाळ्यावर जाऊन बसायचो.आजी-नातीची इकडची तिकडची बोलणी होत असताना पक्षांची चीवचीव ऐकायला यायची आणि डोंगराच्या माथ्यावरून सकाळच्या सूर्याचा उदय दिसायला लागायचा.आजुबाजूचे लोक पाणी गरम करण्यासाठी हंडे चुल्यावर ठेऊन काटकोळ्या जाळून पाणी गरम करायचे त्या जळणार्‍या लाकडांच्या धुराचा वास मला अजून आठवतो. थंड हवेची झुळूक माझ्या नाकाच्या शेंड्याना
लागून नाकात पाणी यायचं आजी आपल्या पदराने माझं नाक पुसायची.थंड हवेमुळे कानाच्या पाळ्याही लाल लाल व्हायच्या.सूर्य वर वर जायला लागल्यावर किरणं माझ्या गालावर येऊन स्पर्श करायची.जणू सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठीच त्यांचा स्पर्श व्हायचा.पहाटेला कवेत घेऊन झाल्यावर आम्ही बागेत जाऊन झारीने रोपांना अलगद पाणी घालायचो.मला हा सकाळचा प्रहर खूप आवडायचा.सूर्योदय,सकाळचा दव, ह्या गोष्टीच्या आठवणी माझ्या अंतरात अगदी जवळच्या झाल्या होत्या.माझी आजी मला तिचा सूर्यप्रकाश म्हणायची.आता आठवणी येऊन कसंसं होतं.”

“पण चांगलं झालं.त्यामुळे दिल्लीतल्या एव्हड्या थंडीतसुद्धा सकाळी उठायची संवय होऊन बाहेर फिरायला यायला तुला मजा येत असणार.”
मी संध्याला म्हणालो.

“अगदी माझ्या मनातलं सांगीतलंत.”
असं सांगत संध्या म्हणाली,
“ह्या सकाळच्या पहाटा ज्या एकेकाळी निवांत वाटून,त्यांचा अनुभव माझ्या ह्रुदयाशी निगडीत रहायचा,त्या आता माझ्या जीवनाचं इंधन झाल्या आहेत.
उजाडलेला माझा पूरा दिवस कसा जावा हे त्या दिवसाच्या सकाळवरून मी आता ठरवायला लागली आहे.सकाळी पाचला उठल्यावर,माझ्या मनाची, हृदयाची,आणि शरीराची,सहनशिलतेसाठी आणि शिस्तीसाठी मी तयारी करते. अंथरूणातून उठल्यावर,बुटांची लेस बांधून,माझी चालण्याची सीमा गाठण्याच्या प्रयत्नात असते.ह्या गॉल्फच्या मैदानाला दोन तरी वळसे घालते.मधेच धावते थोडी विश्रांती घेते,परत पळते.असे निदान साडेचार मैल
धावण्याचा माझा व्यायाम होतो.सकाळचा फेरफटका,सकाळच्या चहा ऐवजी, व्ह्यायला लागला आहे.जसा फेरफटका वाढतो तसं माझ्या शरीरातलं ऍडर्निल वाढतं.ते वाढल्याने माझा आत्मविश्वास वाढतो,माझी ध्येयं मी गाठूं शकते.”

“ह्या प्रौढवयात तू तुझी प्रकृति कशी ठेवली आहेस ते तुझ्या ह्या व्यायामामुळे मला दिसतंच आहे.दोन किशोर वयातल्या मुलांची तू आई आहेस असं मला मुळीच वाटत नाही.खरंतर तुझ्या वयातल्या इतर स्त्रीयांकडे बघून मला तुझी ही प्रकृती पाहून नवलच वाटतं.”
संध्या तिच्या तब्यतीच्या शेलाटीपणाचं गुपीत मला सांगेल ह्या अंदाजाने मी तिला तसं म्हणालो.

संध्याला हा विषयच हवा होता असं वाटतं.
अगदी खूशीत येऊन,माझ्या मांडीवर थाप मारीत आवंढा गिळत मला म्हणाली,
“तुमचं हे अवलोकन मुंबई सारख्या शहरी वातावरणात जास्त बरोबर आहे.इतके सुंदर पार्क कुठे असतात शहरात?. हा दिल्लीचा शहराचा बाहेरचा भाग आहे.आणि सैन्यातले बरेच लोक इथे रहातात.अपवादाने एखादी स्थुल स्त्री तुम्हाला इकडे दिसेल.स्थुल स्त्रीयांच्या घोळक्यात एखादी सडपातळ स्त्री उठून दिसते.तसंच एखाद्या सडपातळ स्त्रीयांच्या घोळक्यात एखादी स्थुल स्त्री उठून दिसते.”

मी संध्याला म्हणालो,
“म्हणजे,सडपातळ प्रकृतिच्या स्रीयांच्या घोळक्यात स्थुल स्त्रीला नक्कीच कसंसं वाटत असणार.आणि स्थुल स्त्रीयांच्या घोळक्यात सडपातळ प्रकृतिच्या स्त्रीला कसचं! कसचं! वाटत असणार.”
माझा विनोद संध्याला आवडला असं दिसलं.

मला म्हणाली,
“प्रकृती कशी ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.चर्चा म्हणून बोलायला आपल्यावर कुणाचं बंधंन नाही.झी मराठी किंवा आणखी काही टीव्ही चॅनलवरच्या मालिका तुम्ही पहा.जास्त करून पोक्त स्रीया स्थुल दिसतात.प्रथमच पाहिलेल्यांना पहाताना तितकं वाटत नाही.पण ज्यांना पूर्वी तरूण असताना पाहिलं आहे त्यांना आत्ता पाहून त्यांच्या पूर्वीच्या इमेजला धक्का बसतो.”
“ही अशी परिस्थिती यायला कारण उघड आहे.”खाणं भरपूर पण व्यायाम इल्ला!”
असं संध्याला मी सांगून,तिची प्रतिक्रिया पहात होतो.

मला लगेच म्हणाली,
“मी मात्र भरपूर खाते आणि हा असा भरपूर व्यायाम करते.आणि मा्झ्या खाण्यात चरबीचा अंश अगदीच कमी असतो.त्यामुळे माझं वजन पटकन वाढत नाही.”

मी संध्याला बॅन्केचं उदाहरण देत म्हणालो,
“खाणं-अर्थात हेल्धी खाणं- आणि नंतर व्यायाम करणं हे बॅन्केत आपल्या खात्यात पैसे भरणं आणि पैसे काढून घेणं-विथड्रॉ करणं-सारखं आहे.फक्त फरक एव्हडाच बॅन्केतल्या खात्यातले पैसे वाढले-सेव्हिंग झाले-की आपली पत वाढते.आणि खाल्ल्यानंतर व्यायाम न केल्याने आपली पोत आणि पोट वाढतं.शरीराचा घेर वाढतो.माझ्या पहाण्यात आलं आहे की हे फक्त स्त्रीयांपुरतं मर्यादीत नाही पुरूषांची पण अशीच परिस्थिती झाली आहे.कदाचीत आणखी गंभीर म्हटलं तरी चालेल.अर्थात मध्यम वर्गात हे जास्त दिसून येतं.
पण ते जाऊदे.तू पहाटेबद्दल जे सांगत होतीस ते काय?”

“पहाटेला मी दोन हात पसरून कवेत घेते.जीवनातल्या चांगल्या,वाईट आणि घृणित गोष्टींशी दोन हात करायच्या तयारीत असते.भविष्यात काहीही वाढून ठेवलं असलं तरी योग्य मनस्थिती ठेवल्याने माझी मी उन्नति करू शकते, ह्याची मला आठवण दिली जाते.भीति दूर करून,पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”
असं सांगून संध्या मला म्हणाली,
“चला आमच्या घरी.माझा पहिला चहा व्ह्यायचा आहे.मला तुमची कंपनी द्या”

मलाही चहाची तलफ आली होती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, December 17, 2010

दैना आणि गरीबीमधे सामावलेलं सुख आणि आशा.

“सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.”

त्याला बरीच वर्ष होऊन गेली असतील.मला आठवतं,मी नव्या मुंबईहून अंधेरीला येत होतो.ती बस डायरेक्ट अंधेरीला जाणारी नव्हती.वांद्रा स्टेशनच्या पूर्वेला जाऊन संपत होती.नंतर वांद्र्याहून ट्रेनने मी अंधेरीला जाणार होतो.माहिमच्या धारावीच्या खाडीजवळ आल्यावर एकाएकी बसचा टायर पंक्चर झाल्याने आम्हाला बसमधून खाली उतरून, येणार्‍या बसमधे जागा मिळेल तसं ती घेऊन पुढचा मार्ग गाठायचा होता.आमच्या बसचा कंडक्टर प्रत्येकाला ह्या बाबत मदत करीत होता.

संध्याकाळची वेळ असल्याने येणार्‍या बसीस भरून येत होत्या.काही थांबतही नव्हत्या.मी इतरांबरोबर,येणार्‍या बसच्या आत,चढायचा बराच प्रयत्न करून थकलो.
माहिमच्या खाडीवरून अरबीसमुद्रावरून गार वारा येत होता.त्यामुळे मे महिन्याचे दिवस असूनही उष्मा भासत नव्हता.तेव्हडंच एक सुख मिळत होतं. रस्त्यापलीकडच्या झोपडपट्टीकडे माझं लक्ष गेलं.दोन पावलं पुढे चालत गेलो.

जरा हे दृष्य,तुम्हाला जमत असेल तर, डोळ्यासमोर आणावं.
कचरा-कुड्याचे ढिगाचे ढिग अगदी क्षितीजा पर्यंत पोहोचणारे दिसत आहेत.त्याच्या पासून येणार्‍या दुर्गंधीची कल्पना करा.
आणि अशा ह्या वातावरणात लोक रहात आहेत अशी कल्पना करा.

असं दृष्य डोळ्यासमोर आणणं महा कठीण आहे ना? मला तशी कल्पना करायला काही कठीण होत नव्हतं.कारण अशाच ढिगार्‍या समोर मी उभा होतो.तिथल्या लोकांशी बोलत होतो.कल्पनेच्या पलिकडची तिरस्कारपूर्ण गरीबीची, पोटातून पेटके येऊन ओकारी येईल अशी, दुर्गंधी घेत होतो.
धारावी जवळच्या झोपडपट्टीला भेट देऊन इथल्या जगाबद्दलचा माझा दृष्टीकोन थोडा रुंदावण्याच्या प्रयत्नात मी होतो.

त्या दिवसाची धक्कादायक गोष्ट म्हणजे ते दृष्य नव्हतं,जे स्वतःहून घृणास्पद होतं,पण ती दुर्गंधी होती.जमलं असतं तर एखाद्या बाटलीत ती दुर्गंधी कोंडून ठेवून,रोज घरी त्याचा वास घेण्यासाठी,तो वास आनंद देईल म्हणून नव्हे तर, ज्यातून माझ्या मनावर परिणाम व्हावा की,किती अन्यायकारक परिस्थितित जबरदस्तीने आपल्याच भावाबंधाना ह्या पृथ्वीवर रहावं लागत आहे.
त्या ढिगार्‍याची दुर्गंधी कचरा,उष्टनाष्ट,घाम आणि भीति पासून होती.गरीबी काय आहे ते ही दुर्गंधी नाकात घेतल्या शिवाय ते कळण्यासारखं नव्हतं.

धारावीच्या ह्या दुर्गंधाच्या जागी,घोंघणार्‍या माशा हडकुळ्या गाई,बैलाच्या अंगावर बसून राज्य करीत होत्या.काळे आणि गोरे डुक्कर आणि डुक्करीणी आपली पसाभर पोरं घेऊन उकीरडे हुंगत जात होती.अर्धवट जीवंत असलेले अंगाला लूत आलेले कुत्रे आणि कुत्र्याची पिल्लं, मेल्यासारखी चिखलात, कचर्‍यात,आणि माणसांच्या विष्टेत पडून होती.बायका,मुलं आणि रांगणार्‍या वयातली मुलं,मोडक्या तुडक्या टीनच्या पत्र्याच्या,आणि कार्डबोर्डच्या तुकड्याचा आडोसा घेऊन,येणार्‍या सावलीत घर समजून आसरा घेत होती.जरा मोठ्या वयाची मुलं,मुली घाण पाण्याच्या वहाणार्‍या ओढ्याच्या एका बाजूपासून दुसर्‍या बाजूला पाणी तुडवीत चालत जात होती.

खरं म्हणजे हे त्या मुलांचं शिक्षणाचं वय असावं.पण बसस्टॉप जवळ किंवा रस्त्यावर येणार्‍याकडे हात पसरून भीक मागत होती.कुणी एखादा पोलीस हवालदार पकडून नेईल म्हणून भित्र्य़ा नजरेने इकडे तिकडे नजर लावून होती.ही भीति, त्यांची वास्तविकता झाल्याने, उरलेल्या आयुष्यात त्यांच्या मानगुटीवर बसलेली असणार.

मला वाटतं,ही मंडळी बाहेरून कितीही अस्वच्छ,घाणेरडी दिसली तरी,पांढरपेशा माणसा सारखी ती तितकीच महत्वाची आणि प्रेम करण्यालायक होती. जरी पांढरपेशी माणसं स्वच्छ,शिकली-सवरलेली आणि निगा राखलेली असली तरी सर्वांना शेवटी देवाचीच लेकरं समजली जातात.माझ्या नजरेत तरी ही निष्पाप भुकेलेली मुलं,तेव्हडीच महत्वाची वाटतात जेव्हडा एखादा राजकारणी माणूस किंवा एखादा प्रसिद्धिला भुकेलेला प्रतिष्टीत माणूस दिसावा तशीच दिसतात.

ह्या लोकांकडून बरच काही शिकण्यासारखं आहे.त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य,आणि आनंद पाहून,तुम्ही कुठून आलात आणि तुमच्याकडे काय आहे,ह्यापेक्षा जीवन हे आणखी काहीतरी आहे हे नक्कीच लक्षात येतं.पांढरपेशांची मुलं पाळणा घरात जेव्हडी सुखी असतील त्यापेक्षा ही मुलं असावीत.कारण ही मुलं अगदी लहानपणापासून शिकत असतात की,जीवनात हानीकारक,दुःखदायी गोष्टी होत असतात,पण तुम्हाला मार्ग काढून जीवन जगलं पाहिजे. फेकून दिलेल्या फुलासारखं साध्या खुशी मधून आनंद मिळवायला हवा.जे जीवन देत आहे ते घेऊन त्यातून आनंद कसा मिळेल ह्याचं कारण शोधत राहिलं पाहिजे.सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.
घरी गेल्यावर मला एक कविता सुचली.लगेचच मी ती लिहून काढली.

झोपडी

होती ती एकच झोपडी
नजर कुणाची त्यावर पडली
होते त्यावर एक मोडके छ्प्पर
त्यामधून दिसे आतले लक्तर

निकामी एका आगगाडीच्या फाट्यात
कुणीतरी बांधली ही झोपडी थाटात
नजरेला त्याच्या वाटे तो महाल
झोपडी जरी समजून तुम्ही पहाल

जर असता तो महालाचा राजा
त्यजीला असता न करता गाजावाजा
ओतले त्याने त्याचे त्यात सर्वस्व
कसा सहन करील कुणाचे वर्चस्व

होती पहात वाट आत त्याची राणी
सोसूनी दैना टिपे डोळ्यातले पाणी
गरीबी,दुःख, हानी असे त्यांच्या जीवनी
निःशब्द राहूनी सांगे झोपडी कहाणी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Tuesday, December 14, 2010

अन्न पदार्थाच्या जादूची किमया.

“मला त्यात नवल काहीच वाटत नाही”
चहाचा कप पुढे करीत सुधाकर म्हणाला.

गेल्या आठवड्यात माझ्या मित्राला, सुधाकर करमरकरला, भेटायला मी पुण्याला गेलो होतो.गाडी जरा उशिरा पोहचली.मला पाहून सुधाकर म्हणाला,
“चल असेच आपण बाहेर पडूं.माझ्या एका नातेवाईकाचं लग्न आहे.तिकडेच आपण जेवायला जाऊं.”
“अरे मी तिकडे आगांतूक दिसणार.मला काही आमंत्रण नाही. तुच जा बाबा! मी इकडे आराम करतो.”
असं मी त्याला लागलीच म्हणालो.पण सुधाकर ऐकेना.मला घेऊन गेला त्या लग्नाला.

गणपतराव खडसे,,माझे एक जुने सहकारी,मला त्या लग्नात भेटायचे होते.हा योगायोग असावा.कारण मीही त्यांना बर्‍याच वर्षानी भेटत होतो.ते ह्या लग्नाला सातार्‍याहून आले होते.
लग्न झालं.जेवणं वगैरे झाली.गणपतराव दुसर्‍या दिवशीच्या गाडीने सातार्‍याला परत जाणार होते.कुठे तरी होटेलमधे रहाण्या ऐवजी सुधाकरनेच त्यांना आपल्या घरी झोपायला बोलवलं.बरेच दिवसानी आम्ही तिघे भेटलो होतो.जरा गप्पागोष्टी होतील हा उद्देशही होता.

गप्पांचा विषय निघाला जेवाणावरूनच.खडसे पहिल्यापासून भोजन-भक्त आहेत हे मला माहित होतं.आत्ताच जेवलेल्या लग्नाच्या जेवणावरून विषय निघाला.त्या जेवणात केलेली बासुंदी छान झालेली होती.खडस्यांनाही बासुंदी आवडली होती.

“खूप दिवसानी अशी बासुंदी खाल्ल्ली.मजा आली.”
मी म्हणालो.

मला बासुंदी खाऊन आनंद झालेला पाहून खडसे मला म्हणाले,
“जर समजा बालपणाचा विचार केला किंवा जीवनातला सर्वात आनंदाच्या क्षणाचा विचार केला तर तुमच्या काय लक्षात येतं?
कुटूंबिय,मित्र-मंडळी, हास्य-कल्लोळ,प्रेम,आणि कदाचीत,जर का तूम्ही माझ्यासारखे असाल तर एखादा अन्न-पदार्थ लक्षात येईल.जसा तो तुम्हाला आता लक्षात आला आणि तुम्ही आनंदी झाला”

सुधाकरकडे मी माझा डोळा मिचकवला.खडसे रंगात आले आहेत हा संकेत त्याला द्यायचा होता.

खडसे पुढे सांगू लागले,
“माझ्या डोक्यातली असतील नसतील ती स्मरणं,पुरण पोळी,श्रीखंड,बासुंदी,उकडलेल्या बट्याट्याची भाजी,काही उत्तम मास्यांचे पदार्थ,ह्यांच्याशी तर्क-संगती करतील.किंवा ही स्मरणं,अनेक खाद्यपदार्थ, पिढ्यान-पिढ्या प्रचलित होऊन,लोकांमधल्या वयांच्या अंतरांचे पूल सांधून,मग त्यामधे काहीही साम्य नसलं तरी,फक्त एखाद्या करंजीवरचं प्रेम दाखवायला आणि तिचा आस्वाद घ्यायला मदत करतील.”

मी म्हणालो,
मला खात्रीपूर्वक वाटतं की,अन्नाची, माणसाच्या अस्तित्वासाठी,जरूरी आहेच,नव्हेतर जीवनाला त्याची जरूरी एव्हडी आहे की,ते जीवन जोशपूर्ण ढंगाने उपभोगून,आपल्या मनात असलेला स्वाद त्यात टाकून,इतरांबरोबर त्याचा आनंद घेता यायला पाहिजे.”

आणि नंतर सुधाकरला उद्देशून खडसे म्हणाले,
“तुम्हाला माझं म्हणणं कसं वाटतं?तुम्ही कशावर विश्वास ठेवता?”
सुधाकर जरा डोकं खाजवून विचार करायला लागला.आणि मग हंसत खडस्यांना म्हणाला,
“तुम्ही प्रथमच मला असं विचारल्यावर माझ्या मनात प्रश्न आला की मी कशावर विश्वास ठेवीत असेन बरं? विचार करणं जरा कठीण व्हायला लागलं.माझ्या मनातल्या खरोखरच्या दृढविश्वासाच्या गुढार्थाचं प्रकटन करणं जरा कठीणच झालं.मी राजकारण्या सारखा,काहीसा नकारात्मक, होऊ लागलो आणि नंतर मला वाटायला लागलं की,ज्या गोष्टीमुळे मला आनंद मिळतो,ज्यामुळे मी जोशपूर्ण रहात आहे असं वाटतं त्या अनेक गोष्टीच्या यादीमधे अन्नाचा क्रमांक पहिला लागतो.हे तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर आहे.”

सुधाकरलाही भोजनाचे प्रकार आवडतात हे ऐकून खडसे जरा खूश झालेले दिसले.आम्हाला दोघांना उद्देशून म्हणाले,
“कल्पना करा की एखाद्या वाटीतलं एक चमचा भरून श्रीखंड तुम्ही तुमच्या जिभेवर उतरवलंत.त्यात एखादा चारोळीचा दाणा,एखादा निमपिवळा बेदाणा,केशराचं न विरघळलेलं एखादं तूस आणि थंडगार झालेलं, साखरेच्या गोडीने माखलेलं ते चमचाभर श्रीखंड तुमच्या जिभेवर वितळायला लागलं की तुमचे डोळे क्षणभर मिटून स्वर्गीय सुख देत असतील नाही काय?.मला अन्नपदार्थबद्द्ल जे वाटतं त्यात तुम्ही भागीदार व्हावं म्हणून मी असं म्हणत आहे.”

मी खडस्यांना म्हणालो,
“तुमच्या सहवासात आल्यापासून मी पाहिलं आहे की,तुम्ही कुठचाही अन्न पदार्थ मस्त एन्जॉय करता.ही आवड तुम्हाला अगदी लहानपणापासून आहे का?”

“मी अगदी माझ्या जन्मापासून अन्नाला आसक्त होतो. अन्नाच्या पोषकतेच्या दृष्टीने नव्हे तर,त्याबद्दलच्या सर्व गोष्टीनी मला अन्नाचा लोभ वाढला.कदाचीत माझ्या आईच्या पाककृतीच्या प्रेमामुळे त्याचा संबंध येत असेल.किंवा कदाचीत इतक्या लोकांना अन्नाचं प्रलोभन असतं हे पाहून मला श्वासाचा सुटकारा टाकायला जमलं असेल.”
खडस्यांनी सांगून टाकलं.पुढे सांगू लागले,

“माझी मुंज झाली तेव्हा भोजनाचा थाट होता,मी पदवीधर झाल्यावर माझ्या मित्रांसह आम्ही पार्टी केली त्यात भोजन होतं,माझ्या लग्नप्रसंगी भोजन होतं,ह्याचं कारण काय असावं?ह्या सर्व घटना होत असताना, भोजन केल्याने, समारंभात रंग येतो,एक प्रकारचा कंप येतो. गप्पा-गोष्टी चालल्या असताना,हास्य-कल्लोळ होत असताना खाण्याच्या सानिध्यात मजा निराळीच असते.अगदी दूरवर विचार केला तर एखाद्याच्या तेराव्याला पण भोजन
समारंभ ह्यासाठीच केला जातो.”

मला हे खडस्यांचं म्हणणं एकदम पटलं.
मी म्हणालो,
“अन्न पदार्थांचा चारही बाजूनी विचार करायला मला आवडतं. एखाद्या पदार्थाचा तो आश्वस्त करणारा परिमल, त्याची ती चव,स्वाद आणि मिलावट एकत्रीत ठेवण्याची विशिष्ठ क्षमता,अन्नात ज्या पद्धतिने अनेक लोकांना एकत्रीत करण्याची ताकद असते ती ताकद,हे सर्व प्रकार पाहून, आनंद घेऊ देण्याचं अन्नाचं सामर्थ्य पाहून मीही चकित होत असतो.
अन्न आनंदाने फस्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. उत्तरेकडच्या लोकांना “सर्सूका साग आणि मकैकी रोटी” आवडते.दक्षिणेकडचे “इडली डोसा आणि वडा सांभारावर” ताव मारतात.पूर्वेकडचे “मास्यांवर”तुटून पडतात.आणि पश्चिमेकडचा “मराठी माणूस” श्रीखंड-पूरी,आणि झुणका-भाकर तल्लिन होऊन चापतात.
निवडून खाणारे लोक,चवदार पदार्थ कोणता ते बरोबर मेनूकार्डातून शोधून खातात.”

मला मधेच अडवीत गणपतराव खडसे म्हणाले,
“माझ्या बाबतीत बोलाल तर अन्नपदार्थाना माझा जीव कसा पकडीत ठेवायचा हे माहित झालेलं आहे म्हणूनच माझ्या मलाच काय आवडतं,आणि कशामुळे आवडतं हे माहित झालेलं आहे.

ही भोजनं एव्हड्यासाठीच के्ली जातात की,जेव्हा शब्द अपूरे पडतात, तेव्हा भोजन हे दिलासा देण्याचा संकेत म्हणून वापरला जातो.आनंद असो वा दुःख, सर्व काही साईड डिशने सामावून जातं.लग्न जुळो किंवा मोडो एखाद्या आईस्क्रिम डिशने भागून जातं असं मला वाटतं.

जरी बर्‍याच जणांचं,कदाचीत म्हणणं असेल,की भोजनातून सर्व काही साध्य होत असतं, तरी पण मला वाटतं,त्या भोजनाची तयारी,पाककृती आणि परंपरा ह्यातून खरा प्रबल एकत्रीकरणाचा प्रभाव होत असतो.

आणि ह्या सर्व गोष्टी आईवडीलांकडून,मित्रमंडळीकडून किंवा वयस्करांकडून शिकवल्या जातात,पण त्या एखाद्या पाककला कृतिच्या पुस्तकातून शिकल्या जात नाहीत.सल्ला, पदार्थ करण्याची ढब आणि पाककृति एका पिढी कडून दुसर्‍या पिढीकडे सोपवली जाते.तांदळाच्या खिरीपासून ते सत्यनारायणाच्या नैवेद्या पर्यंतची पाककला, माझी स्मरण शक्ति जागृत करते.”

सुधाकरला ही जेवणाच्या विषयावरची चर्चा आवडल्या सारखी दिसली.म्हणाला,
“रोजचा रात्रीचा प्रश्न!.आज रात्रीच्या जेवणांत काय आहे? हा रोजचाच प्रश्न माझं डोकं रोज खातो.माझ्या आईने केलेलं रात्रीचं जेवण सहजपणे मी नवरंगी वासावरून हेरू शकतो. माझ्या आईने केलेलं माझं सर्वात मनपसंत जेवण म्हणजे, डाळीची आमटी,भात आणि बटाट्याच्या कचर्‍या. कोणत्याही वेळेला कुटूंबातल्या कुणालाही राजमान्य वाटणारं हे जेवण.मी गावाबाहेर कुठेही असलो तरी असलं जेवण मला इतर कसल्याही आठवणी पेक्षा माझ्या
घराची याद देतं.

अंड्याचं आमलेट निरनीराळ्या प्रकारे बनवता येतं.पण ते बरेच वेळा “योग्य” प्रकारे बनवलं जात नाही.अंड्याचा रस घोटून घोटून फेसाळला गेला पाहिजे.आणि ते फेसाळणं माझ्या पोटाच्या लहरीवर अवलंबून असतं.टोस्ट,अरे वा! टोस्ट.तूपाने माखलेला,स्वादाने मखमखलेला आणि ब्रेकफास्ट साठी सॅन्डविच म्हणून वापरात आणता येणारा असा असावा.सॅन्ड्विचसाठीच म्हणूनच असावा.वैकल्पिक नसावा.
अन्नपदार्थ कसा चैनी खातर असावा हे लक्षात आणून मी माझी अन्न पदार्थाची व्याख्या तयार करायला सिद्ध होतो.”

मला, मालवणी जेवणातल्या मास्यांच्या पदार्थाची आणि खास कोकणी पदार्थांची आठवण आली.मी म्हणालो,
“माझ्या मते दरएक दिवशी जेवणातला एखादा पदार्थ विशिष्ठतेचा असावा.उदा.काही लोक जेवायला बसतात.पोट फूटेपर्यंत खाण्याचा त्यांचा मानस नसतो.किंवा जास्त खाऊन श्वास कोंडून घ्यायचा त्यांचा उद्देश नसतो.शेवग्याच्या शेंगा घालून केलेला झुणका खाताना,एक एक शिजलेली शेंग सोलून त्याच्या आतला गर, स्वादिष्ट समजून,समोरचे खालचे दांत आणि वरचे दात ह्यांच्या पकडीत धरून सरसरून बाहेर ओढून झाल्यावर,ताटाच्या शेजारी शेंगांच्या सालींचा ढिग करून ठेवण्याचा लज्जतदार प्रकार खाण्याच्या कलेचा भाग म्हणून त्यात सामाविष्ट केला जातो.किंवा करली नांवाचा मासा-अतीशय कांटेरी- तळल्यावर त्याच्या प्रत्येक तुकड्यातले कांटे विलग करून गोड लागणारा गर तेव्हडा तोंडात उतरवून अणकुचीदार कांटे तेव्हडेच निराळे करण्याची कला वेगळीच असते.तसंच काटोकाट भरलेलं ताकाचं ग्लास,सगळं जेवण संपल्यानंतर,डाव्या हाताने,उष्ट्या उजव्या हाताच्या उफरट्या भागावर, डाव्या हातातल्या ग्लासाला टेकू देऊन गट,गट आवाज काढून ताक पिऊन झाल्यावर,शेवटचा ग्लासात उरलेला ताकाचा अंश न विरघळलेल्या मिठाची चव घेता घेता मोठा ढेकर देताना दिलेली,स्वादिष्ट जेवण केल्याच्या कृतज्ञतेच्या पावतीतून, पत्नीला खूष करण्याची कला जगावेगळी नसते.

पोटभरून खाल्याबद्दल नव्हे,तर प्रत्येक खाण्याच्या कलेचा अंतरभाव त्या जेवणाच्या थाळीशी निगडीत असतो.
मला वाटतं अन्न हे आनंद घेण्यासाठी खायचं असतं,प्रेमाने खाण्यासाठी असतं,कुणाशी तरी नातं जुळवण्यासाठी असतं. मग ते स्वयंपाक घरात असो,ताट-पाट ठेवल्यावर ताटात वाढलेलं असो,ते नेहमीच कुणाचे तरी आभार मानण्यासाठी, कुणी तरी त्या क्षणाचा आदरास पात्र आहे असं दाखवण्यासाठी असतं.
प्रत्येक अन्न पदार्थ,त्यात असलेली मधुर आणि रसाळ चव,दिलासा देणारा विश्वास आणि असाधारण विशेषता प्रस्तुत करीत असतो.मात्र हडकुळा स्वयंपाकी, मुळीच विश्वास ठेवण्या लायक नसतो हे लक्षात असुद्या,अन्नात एव्हडी जादूची किमया आहे की,ते अन्न, प्रेरणा देणं,सान्तवन करणं आणि उत्तेजित करण्याचं काम करतं. शिवाय शारिरीक आणि आत्मिक दृष्ट्या समाधानी देतं.
हे अन्न,स्वादाची उत्सुकता वाढवून, जिभेचे चोचले संभाळून अनेकाना एकत्रीत करतं.”

रात्र बरीच झाली होती.डोळ्यावर झोपेची झापड यायला लागली होती.खडस्यांना सकाळीच उठून सातारची गाडी पकडायची होती.त्यांनीच चर्चा आवरती घेण्याच्या उद्देशाने सांगून टाकलं,
“मला मनोमनी वाटतं की,राजकारणातले विरोधी पक्ष, एकमेकाशी भांडणारे शेजारी देशातले लोक,विरोधी धर्माचे लोक जर का,गरमगरम किंवा थंडगार, आत्मा संतुष्ट करणारे,जिभेला चटक लावून देणारे,पदार्थ ताटात घेऊन हाताने भुरका मारून,त्यावर ताव मारतील,ढेकर देतील,असं हे क्षणभर का करीनात,तर लगेचच त्यांच्या लक्षात येईल की,सर्व माणसांमधे काहीच नाही तर निदान भोजनावर ताव मारताना भुरके मारून ढेकर देण्यात साम्य
जरूर आहे.”

सकाळी खडसे निघून गेल्यावर मी सुधाकरला म्हणालो,
“खडसे पक्के भोजन-प्रेमी आहेत.आमच्या ऑफिसात पार्ट्या तेच आयोजीत करायचे.”

“मला त्यात नवल काहीच वाटत नाही”
चहाचा कप पुढे करीत सुधाकर म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 11, 2010

माझ्या आजीची गोधडी.

काल शुक्रवार होता.ऑफिसमधून जरा लवकरच निघालो होतो.अंधेरी स्टेशनवरून येताना धाके कॉलनी बसस्टॉपवर उतरल्यावर,सातबंगल्याच्या चौपाटीवरून येणारा समुद्राचा गार वारा नकोसा झाला होता.लगबगीत आमच्या बिल्डिंगमधे शिरण्याच्या प्रयत्नात असताना,शेजार्‍यांच्या फ्लॅटच्या समोर असलेल्या बागेतल्या एका झाडात एक रंगीबेरंगी चादरवजा कपडा अडकेलेला दिसला.कुणातरी वरच्या शेजार्‍यांचा वाळत घातलेला कपडा असेल म्हणून
तो कपडा झाडावरून काढून घडी करून वर नेत असताना कपड्याच्या मागच्या भागावर लाल धाग्यात कोरलेलं नाव वाचलं.”सुनंदा” असं होतं.वर चढत चढत सुनंदाच्या घरची बेल वाजवली.दरवाजा सुनंदानेच उघडला.
“या,या,काका आत या.”
असं म्हणून, लगेचच म्हणाली,
“अरे वा! माझ्या आजीची गोधडी तुमच्या हातात कशी.?बहुदा,वार्‍याने खाली पडली असावी.आमच्या बाईला, वेंधळीला, मी स्वतः गोधडी धुवून तिला बाहेर बाल्कनीत वाळत घालायला सांगितलं होतं.नवीन आणलेले चाप लाव म्हणूनही सांगितलं होतं.”
मी सुनंदाला म्हणालो,
“मग मला काहीतरी बक्षिस देशील की नाही?”

“या या तुम्ही आत तर या.आज माझ्या आजीचा जन्म दिवस आहे.म्हणूनच मी ती गोधडी धुवायला काढली होती. ती जर हरवली असती.किंवा कुणी घेऊन गेलं असतं तर मला प्रचंड दुःख झालं असतं.माझीच चूक म्हणा.
मला आमच्या अय्यर प्रोफेसरांचं नेहमीचं वाक्य आठवतं.आणि ते मद्रासी हेल काढून म्हणायचे,
“स्मॉल,स्मॉल थिंग्स…व्हेरी इंपॉर्टन्ट थिंग्स….बिग थिंग्स नॉट सो इंपॉर्टन्ट”
ती गोधडी मी स्वतः वाळत घालून चाप लावायला हवे होते.धुण्याचा एव्हडा व्याप केल्यावर वाळत घालायचे कसले एव्हडे श्रम?चुकलंच माझं.”

“एव्हडं का मनाला लावून घेतेस?”
मी सुनंदाला प्रश्न केला.

“तुम्ही जर का मला विचाराल,
“ह्या जगात तुला कशावर विश्वास आहे?”
तर मी लगेचच सांगेन,
“ह्या माझ्या गोधडीवर”
सुनंदा सांगू लागली.पुढे म्हणाली,
“माझी गोधडी तशी जूनी आहे,मळकट दिसते,इकडे तिकडे लक्तरं गेल्या सारखी दिसते शिवाय आता ती माझं पूर्ण अंग लपेटू शकत नाही.पण जगातल्या कुठेच्याही गोधड्यापेक्षा मला माझी ही गोधडी अत्यंत प्रिय आहे.
तुम्ही माझी गोधडी पाहून म्हणाल,
“त्यात काय विशेष आहे?,अशी जूनी गोधडी का आवडावी?”
मला खरंच माहित नाही.मला ह्याच काय उत्तर द्यावं हेच कळत नाही.
मात्र मला एव्हडंच माहित आहे की,माझ्या जवळ ती असल्यापासून त्या पासून दूर जावंस कधीच वाटत नाही.ज्या ज्या वेळी मी ही गोधडी अंगावर घेते त्यावेळी त्यातली उब,त्यातून येणारा सुगंधी वास,आणि तिच्यापासून मिळणारा आनंद मला मिळत असतो.ही गोधडी मला एकप्रकारचं आ़श्वासन देत असते.”

माझं सुनंदाच्या गोधडीबद्दलचं कुतूहल वाढत गेलं.
मी म्हणालो,
“सुनंदा तुझ्या आजीने दिलेल्या या गोधडीबद्दल मला आणखी ऐकायचं आहे.”

“थांबा मी तुमच्यासाठी चहा टाकते.आणि आजीचीच आठवण म्हणून तिने मला शिकवलेला एक पदार्थ चाखायला देते.आज तिचा जन्म दिवस असल्याने तिची आठवण म्हणून मी तो पदार्थ आज केला आहे.”
असं म्हणून माझ्या जवळ खूर्ची घेऊन बसून मला सांगायला लागली.
“ही गोधडी माझ्या अंगावर मी पांघरल्यावर माझ्या जीवाला कसलीच बाधा होणार नाही असा मला एक भरवसा येतो.
माझ्या आजीने मला ही गोधडी दिली होती.माझी आजी तिच्या लहानपणा पासून ही गोधडी वापरायची.
माझी आजी मला सांगायची,
“मला ही गोधडी कुणी दिली ते आठवत नाही.शाळेत मी सर्वांशी चांगली वागायची.पण काही मुली माझा तिटकार करायची.पण कुणाशीही मैत्री करायचं मी सोडत नसायची.माझा तिटकार करण्यार्‍या मुलींमुळे मला कसं वाटायचं ते मी उघड सांगायला कचरायची नाही. माझ्या अंगात काही उणं असेल ते ही सांगायला मला काहिच वाटत नसायचं.”
माझ्या आजीचं हे ऐकून मला तिचा खूप आदर वाटायचा.
मी लहान असताना,रात्रीची झोपल्यावर माझ्या अंगावर माझी आजी ही गोधडी न चुकता पांघरायची.सुरवातीला मी ह्या गोधडीचा उपयोग मला उब मिळण्यासाठी म्हणून करायची.पण नंतर नंतर ह्या मळकट,जून्या गोधडीबद्दल मला खूप आपलेपणा वाटायला लागला.
आता ज्यावेळी ही गोधडी माझ्या सानिध्यात असते,तेव्हा मला लहानपणाच्या आठवणी येतात.आमचं घर खूपच लहान होतं.काहीसं अस्वच्छ असायचं. माझ्या आजुबाजूला माझी भावंडं-सख्खी,चुलत-वावरायची.पडवीत एका मोठ्या जाजमावर उशा टाकून आम्ही जवळ जवळ झोपायचो.कधी कधी लोळायलापण जागा नसायची.लहान असताना मला त्याबद्दल वाईट वाटायचं,आणि रागही यायचा.पण त्या आठवणी आता मला दिलासा देतात.ही
लहानशी गोधडी तर माझ्या आठवणीना उजाळा देते.

ही जूनी,मळकट गोधडी माझ्या जवळ असे पर्यंत माझं जूनं घर,माझं एकत्र कुटूंब, यांच्याबद्दल उजाळा देत रहाणार.
माझी भावंडं आता कामामुळे एकमेकापासून दूर रहायला गेली आहेत.फार क्वचितच आमची भेट होत असेल.आणि त्यांचा दुरावा मला भासत असतो. त्या सर्वांना भेटणं कदाचीत आता शक्य होणार नाही.म्हणूनच मी माझ्या सर्व आशा-आकांक्षा ह्या गोधडीत राखून ठेवते. माझ्या आजोबांचे मोजकेच पण महत्वाचे बोल,माझ्या आईचं व्यक्तिमत्व,माझ्या वडीलांचं वरचस्वी व्यक्तिमत्व,माझ्या धाकट्या बहिणीचे डोळे,माझ्याकडे टवकारून पहाताना, त्यांना दिसणारं,तिचं विश्व आणि अगदी नचुकता माझी जीवश्च-कंटश्च आजी तिच्या सर्व आठवणी ह्यात सामावलेल्या आहेत.

ह्या सर्व कारणांसाठी माझ्या आजीची ही लहानशी मळकट गोधडी रोज रात्री झोपताना जवळ घेतल्याने सर्व आठवणी उजळतातच शिवाय एक संरक्षणाचं मिथ्या कवच माझ्यावर आहे असं समजून मला अगदी गाढ झोप लागते.”

पाणावलेले डोळे पुसत पुसत सुनंदा उठली.आणि आतून दोन कप चहा घेऊन आली.आणि त्याबरोबर शेंगदाण्याचे दोन लाडू एका डीशमधे घेऊन आली.
मला म्हणाली,
“माझी आजी शेंगदाण्याचे लाडू चिकीच्या गुळात वळायची.त्यात सुक्या खोबर्‍याचे तुकडे घालायची.थोडी खमंग वास यायला वेलची टाकायची.तिचे लाडू खायला अप्रतिम वाटायचे.हे मी केले असल्याने कसे झाले आहेत कुणास ठाऊक”
असं म्हणून मला तिने दोन्ही लाडू खायचा आग्रह केला आणि एका डब्यात चार-पाच लाडू घालून,डबा माझ्या जवळ दिला.आणि म्हणाली,
“डब्यातले लाडू काकींसाठी आहेत.आणि तुम्हाला बक्षीस म्हणून आहेत.कसे वाटले तुम्हाला लाडू?”

मी उठता उठता म्हणालो,
“अप्रतिम”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 7, 2010

समुद्राच्या लाटांवरचं आरूढ होणं.

“आतापर्यंत पाहिलेला तिचा चेहरा ह्यावेळी मला निराळाच दिसला.त्यावरचं समाधान,तृप्ति,आणि आनंद विरळाच होता.”

मी पूर्वी मे महिन्यात आठ दिवसांची व्हेकेशन घेऊन वरचेवर गोव्यात जायचो.गोव्याच्या बिचीसमधे मला पोहायला आवडायचं.दरखेपेला निरनीराळ्या बिचवर माझी व्हेकेशन मी घालवीत असे.त्यातल्यात्यात मिरामार बिच,कोळवा बिच किंवा डोना-पावला बिच हे माझे आवडते बिच.

हल्लीच मी बरेच दिवसानी मिरामार बिचवर एका हाटेलात रहायला गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती.बिचवर मस्त वारा आणि थंड हवा खायला मजा

येत होती.काही वेळ चालल्यावर वाळूत एका जागी बसावं असं वाटलं.म्हणून त्या जागी जावून बसलो.एकाएकी जूनी आठवण येऊन,जसं सिनेमात फ्लॅश-बॅक दाखवतात तसं, माझ्या मनात यायला लागलं.
मला त्याच्या नांवाची आठवण येईना.पण बराच डोक्याला त्रास दिल्यावर माईकल डिसोझा आठवला.

मला हा माईकल नेहमीच बिचवर पोहताना दिसायचा.हळू हळू माझी त्याची ओळख झाली.आणि त्या व्हेकेशनच्या आठ दिवसात,विशेषतः संध्याकाळी, पोहून झाल्यावर माईकलच्या रूम मधे जाऊन फेणीच्या आस्वादाबरोबर गप्पा व्हायच्या.(माईकल फेणी घ्यायचा आणि मी गरम कॉफी.)
नंतर देसायाच्या घरी रात्रीचं जेवण घ्यायचो.
पूर्वी मी कामथांच्या हाटेलात जेवायचो.देसायांकडे घरगुती जेवण मिळतं हे मला माईकलकडून कळलं.मस्त मास्यांचं जेवण असायचं.

माईकल डिसोझा लहान असल्या पासून इकडे लोकांना समुद्रात पोहायला शिकवायचा.ह्या फंदात तू कसा पडलास म्हणून मी माईकलला एकदा विचारलं. माईकल फेणीची चव घेत घेत खूशीत येऊन मला म्हणाला,
“मला आतापर्यंत असा प्रश्न कुणीच केला नाही.
प्रत्येकाला वाटतं की,काहीतरी करण्यात आपण मग्न असावं.काही तरी हरवावं आणि ते गवसण्यासाठी आपण वेळ घालवावा.आपणाला आनंदी रहाण्यासाठी आपल्या जवळ काहीतरी असावं जरी ते “काहीतरी” काहीही नसल्यासारखं असलं तरी.

माझ्यासाठी ते “काहीतरी” समुद्रातून मिळतं.हे समुद्रातलं “काहीतरी” स्वाभाविक दृष्टीने लाटा निर्माण करतं—काहीवेळा ह्या लाटा मोठ्ठ्या असतात आणि काहीवेळा अगदी माझ्या पावलावर आरूढ होतील एव्हड्या लहान असतात.जेव्हा मी समुद्रात पोहायाला जातो तेव्हा ह्या लाटा मला समुद्राच्या प्रचंड क्षमतेत हात घालायला संधी देतात.एकावेळी एकच लाट पूरे होते.”

मला हे माईकलचं ऐकून जरा कुतूहल वाटलं.मी त्याला विचारलं,
“म्हणजे तुझा व्यवसाय पोहायला शिकवायचाच आहे काय?
ह्यातून तुला काय मिळतं?”

माईकल जरा खसखसून हंसला.मला म्हणाला,
“पैसे म्हणाल तर,जे काय मला मिळतं त्यात मी समाधान असतो.
मला आठवतं,माझा सुरवातीचा जॉब,समुद्रात पोहायला शिकवण्याचा होता.मी ह्याच गोव्याच्या समुद्रावर पोहायला शिकलो.ह्या गोव्याच्या बिचवर एका प्रसिद्ध होटेल मधे नव्याने समुद्रात पोहायला येणार्‍या पर्यटकाना शिकवायचं मला काम मिळालं होतं.बरेचसे परदेशातले पर्यटक समुद्रात पोहण्यात तरबेज असतात,पण सगळ्यांना पोहायला येईल असं नाही.बर्‍याच वेळा स्त्रीवर्ग ह्यातला असतो.तसंच स्थानीक पर्यटक विशेषकरून उत्तर भारतातून येणारे
पर्यटक ह्यातले असतात.आणि गोव्याच्या सुंदर बीचवर ,दुधाळलेल्या लाटापाहून कुणाला समुद्रात उडी मारावी असं वाटणार नाही?
ज्या बिचवर प्रथमतः मी लाटांवर आरूढ होण्याची कला शिकलो,त्याच ठिकाणी मी हा जॉब करण्याचं कारण मला, ज्या लोकांना लाटांवर आरूढ होऊन मजा करण्यात आनंद घेण्याची उत्कंठा असेल त्या लोकांना,शिकवण्याची असूया होती.”

मी माईकलला विचारलं,
“तुला हेच काम करून कंटाळा येत नाही काय?”

“ह्या माझ्या समुद्रात पोहण्या्च्या वेडेपणाला वाटलं तर,आवेश म्हणा,चट म्हणा,छंद म्हणा किंवा मनोरंजन म्हणा.
कसंही असलं तरी जेव्हा माझं जीवन तापदायक होतं तेव्हा पोहण्यातून मी ते सूरात लावण्याच्या प्रयत्नात असतो. मला समुद्र ही अशी जागा वाटते की,अगदी आत्ताच झालेल्या घटना, ज्या लागलीच निवळून जातात, त्या प्रतिबिंबीत होतात.पुन्हा अशा घटनाना सामोरं जायला मला ही जागा प्रेरित करते.समुद्रात पोहण्याने मी माझ्या जीवनातल्या कटकटीतून अंतिम सुटका करून घ्यायला प्रवृत्त होतो.”

काहीवेळा मी माझ्या मलाच प्रश्न करतो की,समुद्राच्या लाटांवर एकदाही आरूढ झालो नसतो,बहुदा आठावड्यातून तिनदां होतो,तर माझ्या जीवनात काय अर्थ राहिला असता.
मी प्रेरणा विरहीत राहिलो असतो का?का माझं वजन मी वाढवून घेतलं असतं?जीवन अगदीच कसं निराळं झालं असतं? अशी निरनीराळी दृष्य डोळ्यासमोर आल्यावर, माझ्या नक्कीच एक ध्यानात येतं की,मी लाटांवर आरूढ न होता सुखीच झालो नसतो.
माझ्या जीवनातलं प्रभावाचं अधिरोहण,जो मी आता आहे आणि ज्यावर मी भरवसा ठेवतो ते, समुद्रातल्या लाटांवरचं आरूढ होणं हेच आहे.”

“लाटांवर आरूढ होणं म्हणजे यतार्थतः तुला काय म्हणायचं आहे?.मी पण समुद्रात पोहतो.लाट फुटल्यावर फेसाळलेल्या पाण्यात मला पोहायला मजा येते.”
मी माईकलला म्हणालो.

मला माईकल म्हणाला,
“लाट फुटण्यापूर्वी लाटेवर सर्व शरीर झोकून दिल्यावर,एखाद्या घोड्यावर आरूढ झाल्यावर कसं वाटतं अगदी तसं लाटेवर असताना वाटतं.ह्याला मी लाटेवर आरूढ होणं म्हणतो.घोडा जसा आरूढ झाल्यावर सपाटून पळायला सुरवात करतो अगदी तसं ह्या न फुटलेल्या लाटेवर आरूढ झाल्यावर,ती लाट तुम्हाला आपल्या अंगावर घेऊन जोरात पुढे किनार्‍याजवळ पळत असते.आणि सरतेशेवटी ती लाट फुटते.त्या फेसाळ लाटेत पोहण्यात तुम्हाला मजा
येत असणार.पण न फुटलेल्या लाटेवर आरूढ होऊन तुम्ही एकदा पहा.”

असं म्हणून माईकल विचारात पडल्यासारखा वाटला.आणि लगेचच उठून आणखी एक फेणीची बाटली उघडून रंगात येऊन मला म्हणाला,
“मला एका घटनेची आठवण येते.ती मी तुम्हाला सांगतो.
फेणी घेता घेता तो प्रसंग सांगायला रंगत येणार म्हणून मी ही दुसरी बाटली उघडली.
मला तो प्रसंग आठवतो.
मला एका चवदा वर्षाच्या मंदमतिच्या मुलीला लाटावर आरूढ होण्याचं काम शिकवायची पाळी आली होती.आणि ती घटना मी केव्हाच विसरणार नाही.
तिन आठवडे सतत ती मुलगी सकाळ संध्याकाळ शिकायला यायची.समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन पोहण्यात तिला किती जबरदस्त आनंद होत होता ते ती नित्य सांगायची.

ते उन्हाळ्याचे दिवस होते.लहानश्या लाटेवरसुद्धा तरंगत रहाता रहाता एक दिवशी अशी एक लाट तिला मिळाली की,एव्हड्या दिवसाचा पोहण्याचा अनुभव घेत असताना एका मोठ्या लाटेवर ती स्वतःहून आरूढ होऊन बराच वेळ तरंगत राहिली.तो अनुभव तिला खास वाटला.
आणि एका, त्याहून मोठ्या लाटेवर, मी तिला जवळ जवळ ढकलीच होती.दर खेपेला येणार्‍या लाटेवर आरूढ होतानाचा तिचा चेहरा दिसायचा तसाच ह्यावेळी मला दिसला.पण त्यावर तरंगून झाल्यावर,लाटेबरोबर खाली वाळूत येईपर्यंत ती मुळीच घाबरली नाही.आणि लाटेचा जोर संपल्यावर मागे वळून माझ्याकडे पहात राहिली.आतापर्यंत पाहिलेला तिचा चेहरा ह्यावेळी मला निराळाच दिसला.त्यावरचं समाधान,तृप्ति,आणि आनंद विरळाच होता.

मला इतर काम करून कुठेही जास्त पैसे मिळाले असते.पण मी हे काम करण्याचा स्वेच्छाकर्मी झालो.त्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.मी एकटाच इथे रहात आहे.सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा मला हे काम करावं लागतं.आणि ते फक्त पावसाळा सोडून.असं मी काम करीतच आहे.मला शक्य होईतोपर्यंत हे काम मी करणार आहे. दुसरं कसलंच काम मला एव्हडा आनंद देऊ शकणार नाही.

माझं हे भर उन्हाळ्यातलं पोहायला शिकवणं, माझ्या काही ओळखीच्या लोकांना, यातना देणारं वाटतं.ह्यात माझे जवळचे नातेवाईक आणि मित्रगण सामिल आहेत.पण मला विचारालं तर मी सांगेन की,सुमद्रातल्या उंच,उंच लाटावर आरूढ होऊन पोहणं,मला सांगून जातं,मला शिकवून जातं की,खरा आनंद,हवा असल्यास तो आपल्याजवळ किती संपत्ती आहे ह्याचा हिशोब करून मिळणार नाही.खरा आनंद आपल्या घरात,जिथे वातावरणाला,काबूत
ठेवण्यासाठी,निरनीराळी अवधानं वापरली जातात,सुरक्षता पाहिली जाते,त्याकडे काणाडोळा करून किंवा समाधानी मानून मिळणार नाही.
समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन पोहण्यामुळे,माझ्या आकांक्षाना खरोखरच एकप्रकारचा भडकावा आणून,मला, माणसाने निर्माण केलेल्या,अनैसर्गिक वातावरणापासून दूर राहून निसर्गाची आणि समुद्राची प्राकृतिक स्थिती अजमावून पहाण्याची संधी मिळते.”

जास्त बोलत राहिलो आणि प्रश्न विचारत राहिलो तर माईकल आणखी एक बाटली उघडल्या शिवाय रहाणार नाही. आणि नंतर देसायांकडे मस्त मास्यांचं जेवण घ्यायला जायला मी जरी चांगल्या स्थितीत असलो तरी माईकल नक्कीच असणार नाही ह्याचा विचार येऊन मीच प्रश्न करण्याचं आवरतं घेतलं आणि त्याला म्हणालो,
“पोटात कावळे कांव कांव करायला लागले.चल आपण देसायांकडे जेवायला जाऊया.ह्या विषयावर पुढल्या खेपेला बोलूया.”
असं म्हणून आम्ही दोघे उठलो.

माझा फ्लॅश-बॅक एरव्ही संपला नसता.
“साब माल मस्त है! आताय क्या?”
हे शब्द माझ्या कानावर पडल्यावर मी जागा झालो.एव्हडा काळोख झाला हे ध्यानातही आलं नाही.
पूर्वीचे गोव्याचे बिच आता राहिले नाहीत हे चटकन माझ्या मनात आलं.

“हांव गोयचोच आसां”
असं त्याला म्हणत मी चालू पडलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, December 5, 2010

आठव माझा येईल तुला जेव्हा

(अनुवादीत)

भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
प्रश्न एकच करतील तुला तेव्हा
आठव माझा येईल तुला जेव्हा

जेव्हा जेव्हा बागेत तू जाशिल
रुदन करताना फुलांना पहाशिल
अपुल्या प्रीतिची पाहुनी दुर्दशा
दव-बिंदूना हंसताना पहाशिल
कांटा फुलाचा कैवारी होईल
आठव माझा जेव्हा तुला येईल
प्रश्न एकच तेव्हा तुला करतील
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ

जमान्या पासून लाख लपविशी
प्रीत अपुली छपविशील कशी
असे नाजुक कांचेसम प्रीत
तोडू जेव्हा अपुली शपथ
कांच तेव्हा खुपसली जाईल
आठव माझा जेव्हा तुला येईल
प्रश्न एकच तेव्हा तुला करतील
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 2, 2010

स्पर्श.

“जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.”

आज प्रो.देसाई बरेच उदास दिसले.माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी ताडलंय, की अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना तळ्यावर भेटतो तेव्हा ते बराच वेळ माझ्याशी बोलत नाहीत.

आता इकडे शरद ऋतू चालू झाला आहे.झाडांची पानं रंगीबेरंगी व्ह्यायला लागली आहेत.प्रत्येक झाडांच्या पानांचा एक एक रंग पाहून निसर्गाच्या कुंचल्याची आणि त्याच्या रंग मिश्रणाच्या तबकडीची वाहवा करावी तेव्हडी थोडीच आहे असं वाटतं.

लवकरच ही रंगीबेरंगी पानं,येणार्‍या वार्‍याच्या झुळकीबरोबर,देठापासून तुटून खाली पडणार आहेत.सर्व झाडांच्या फांद्या नंग्या-बोडक्या होणार आहेत.थंडी जशी वाढत जाईल तशी वातावरणात एक प्रकारचा कूंदपणा येणार आहे.
खुपच थंडी पडली की मग आम्ही तळ्यावर फिरायला येत नाही.ह्या वयात तेव्हडी थंडी सोसत नाही.बरेच वेळा मग आम्ही दोघं घरीच भेटतो.

मीच भाऊसाहेबांशी विषय काढून त्यांना बोलकं केलं .
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, इकडचा शरद ऋतू, निसर्गाला उदास करतो. झाडांची हिरवीगार पानं गेल्यानंतर झाडांकडे बघवत नाही.पक्षीपण दूर कुठेतरी निघून जातात. सर्व वातावरण सुनंसुनं दिसतं.म्हणून मी निसर्गच उदास झाला असं म्हणतो. आपणही काहीसे ह्या दिवसात उदासच असतो.बाहेरची कामं थप्प होतात. कुठे जावंसं वाटत नाही.”

“खरं आहे तुमचं म्हणणं”
असं बोलून प्रो.देसायांनी आपलं मौन सोडलं.
आणि म्हणाले,
“मी बोललो नाही,कारण मी बराच वेळ ह्या शरद ऋतूवर विचार करीत होतो.माझ्या मनात एक कल्पना आली.आता पर्यंत ही झाडांची पानं हिरवी गार होती.वार्‍याच्या स्पर्शावर ती हलायची. आता हळू हळू वार्‍याचा वेगही वाढणार आहे. तो वार्‍याचा स्पर्श त्या पानाना सहन होणार नाही.ती पानं रंगीबेरंगी होत होत काही दिवसानी पडणार आहेत. म्हणूनच ह्या मोसमाला फॉल असं म्हणतात.तुम्हाला आठवत असेल कदाचीत,पण मला आठवतं मी लहानपणी कोकणात रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावरची पानं वार्‍याच्या स्पर्शाने सळसळली की घाबरायचो.तसं इथे पिंपळाचं झाड माझ्या पहाण्यात नाही. कदाचीत पिंपळाला इकडची थंडी सोसवली नसती.पण आता ह्या ऋतुत वारा एव्हडा सोसाट्याने वहाणार आहे की,पिंपळाचं झाड असतं तर वार्‍याच्या स्पर्शाने प्रचंड सळसळ ऐकायला मिळाली असती.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मला आठवतं,कोकणात आमच्या अगदी लहानपणी आमची आजी ,रात्री आम्ही लवकर झोपावं म्हणून आम्हाला थोपटत असताना पिंपळाच्या झाडाच्या पानांच्या सळसळीकडे आमचं लक्ष वेधून त्या शांत वातावरणातल्या गांभिर्याची भीति घालून म्हणायची,
“मुंजा पिंपळाचं झाड हलवतोय.लवकर झोपला नाहीत तर
तो घरात येईल.”
खरं सांगायचं तर,त्या भीतिपेक्षा आजीच्या थोपटण्याच्या हाताच्या स्पर्शाने आम्हाल झोप यायची.”

“का कुणास ठाऊक,ह्या स्पर्शावरून माझ्या डोक्यात एक विचार सुचला.”
प्रोफेसर जरा मुड मधे येऊन मला सांगायला लागले.
“एखादं लहान मुल रडत असलं तर त्याला नुसता स्पर्श केल्यावर ते ताबडतोब रडायचं थांबतं.एखादी व्यक्ति अगदी शेवटच्या प्रवासात असताना, केलेला स्पर्श तिला किती सांन्तवन दे्तो?,किती दिलासा देतो?,एखाद्याशी नवीन नातं जुळवत असताना केलेला स्पर्श ते नातं अधिक खंबीर व्हायला किती उपयोगी होतं? हे मी अनुभवलं आहे.ह्या स्पर्शाची क्षमता मी जाणली आहे.

कुणालाही आपला हात पुढे करणं किंवा आलिंगन देणं आणि हलो किंवा गुडबाय म्हणणं ह्यावर माझा विश्वास आहे. एखादा जीवश्च-कंटश्च मित्र सोफ्यावर जवळ बसून एकमेकाशी बोलत असताना त्याच्या खांद्याभोवती हात टाकून बसायला मला बरं वाटतं.रस्त्यावरून चालत असताना कुणी चुकून मला धक्का दिला तर “हरकत” नाही म्हणायला मला बरं वाटतं.”

मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“मला नेहमीच असं वाटतं की स्पर्शाने आपण शाबूत रहातो.
मला असं नेहमीच वाटत असतं की दुसर्‍याशी स्पर्श झाल्याने ती व्यक्ति आपल्याशी व्यक्तिगत दुवा सांधते,आणि आपण त्या व्यक्तिबरोबर व्यक्तिगत दुवा सांधतो,मानवतेशी दुवा सांधला जातो.

मी पाहिलंय की,स्पर्शाने आपात स्थितीत काम करणार्‍या व्यक्तिना परिहार मिळतो.साधं हस्तांदोलन केल्याने एकमेकाशी विरोध करणार्‍या राजकारण्यात समझोत्याच्या सजीवतेची ठिणगी पडून अनेक वर्षाचे तंटे-बखेडे समाप्त होतात.”

माझं हे स्पर्शाबद्दलच मत ऐकून गप्प बसतील तर ते प्रो.देसाई कसे होतील.
मला म्हणाले,
“तुम्ही सांगता ते मला पटतंय.
मी पाहिलंय की स्पर्शाने माझ्याच स्वाभाविक बुद्धिमत्तेचा आणि माझ्या मेंदुतल्या तर्कसंगत हिशोबाचा दुवा सांधला जातो.माझ्या नजरेतून चुकलेलं नाही की,स्पर्शाने माझ्याच संवेदना जागृत होतात. ज्या मी पुर्णपणे हिरावून बसलो असं वाटून घेत असे.
माझी खात्री झाली आहे की,स्पर्शामुळे प्रत्येकात सुधारणा होते, प्रत्येकाच्या संबंधात सुधारणा होते,आणि सरतेशेवटी प्रत्येकाच्या भोवतालच्या जगात सुधारणा होते.
माझी खात्री झाली आहे की प्रत्येकाला जर का सकारात्मक स्पर्शाची जाणिव झाली तर,युद्धाची,जाती-भेदाची, मुलांवर होणार्‍या अत्याचाराची,स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराची आणि दुसर्‍यावर दोष ठेवण्याच्या संवयीची समाप्ती होईल.

स्पर्शाचा विचार केल्यावर माझ्या लक्षात येतं की,स्पर्श माणसाला त्याच्या मनात चांगलं वाटावं,वाईट वाटून घेऊ नये, अशी आठवण करून देतो. आत्मीयतेची भीति मनात असल्याने स्पर्श अनाथ असल्यासारखा आपल्या जीवनात भासतो.माझी खात्री आहे की “तू” आणि “मी” चं “आम्ही” त परिवर्तन करण्यात स्पर्शात ताकद आहे.”

विषय निघाला शरद ऋतूचा.वार्‍याच्या स्पर्शाचा.पिंपळाच्या पानांच्या सळसळीचा.असं होत होत स्पर्शावर चर्चा वाढत गेली.

काळोख बराच होत आला होता.बोलत बसलो तर हा विषय संपायला बराच वेळ जाईल.म्हणून मी आवरतं घेत म्हणालो,
“शेवटी मी एव्हडंच सांगीन की,जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.
माझा स्पर्शावर भरवंसा आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 29, 2010

शुभेच्छा पत्र.

“ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

पोस्टमनने घरात ढीगभर पत्रं आणून टाकली आणि त्यात तुम्हाला एखादं शुभेच्छेचं पत्र असेल तर एका क्षणात तुमचा दिवस आनंदाचा जातो किंवा तुमची लहरपण बदलते.
समजा तुमच्या जीवनातला एखादा दिवस अगदी गचाळ असेल,किंवा तुम्ही नशिबवान असाल तर तो दिवस कदाचीत तुम्हाला आनंद देणाराही असेल, आणि अशावेळी तुम्हाला कुणाचंतरी शुभेच्छेचं पत्र आलं असेल,तर आतुन तुम्हाला नक्कीच बरं वाटतं.
त्यादिवशी माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला त्याच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ मी एक शुभेच्छा पत्र त्याला पाठवायचं या उद्देशाने माझ्या एका मित्राच्या दुकानात कार्ड विकत घ्यायला गेलो होतो.मित्र दुकानात नव्हता.त्यांचा विशीतल्या वयाचा मुलगा काऊंटरवर बसला होता.

मला म्हणाला,
“नवल आहे.हल्ली शुभेच्छा संदेश इमेलवरून पाठवतात.त्यामुळे आमच्याकडे असली कार्ड घ्यायला येणारी गिर्‍हाईकं बरीच कमी झाली आहेत.”

मी त्याला म्हणालो,
“मी त्यातला नाही.शुभेच्छाच द्यायच्या झाल्यास प्रत्यक्ष त्या व्यक्तिच्या घरी जाऊन देण्यात जी मजा आहे ती आगळीच असते.पण सर्वांच्याच घरी जाणं शक्य होत नाही.अशावेळेला निदान शुभेच्छा पत्र आपल्याकडून त्या व्यक्तिला मिळावं अशा विचाराचा मी आहे.”

हे ऐकून तो मला म्हणाला,
“माझ्या लहानपणी मला कुणाची पत्रं येत नसायची.पण माझ्या जन्मदिवशी मला कुणाचं शुभेच्छेचं पत्र आल्यास, किंवा त्यादिवशी माझ्या आजीचं कोकणातून बंद लिफाफा यायचा आणि त्यात थोडे पैसे असायचे अशावेळी मला मी ढगात पोहल्यासारखं वाटायचं.”
आणि पुढे म्हणाला,
“अलीकडे लोक ईमेलने शुभेच्छा पाठवतात.पण मला वाटतं,पुर्वीच्या रीतिप्रमाणे लिफाफ्यावर पोस्टाचा स्टॅम्प असलेलं शुभेच्छा पत्र मिळणं हेच खरं आहे.”

माझ्यापेक्षा लहान असून माझी आणि ह्या मुलाची मत मिळती जुळती आहेत हे पाहून मला विशेष वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“एखाद्याची तुम्ही किती कदर करता ते अशा पत्रातून दाखवता येतं.मला वाटतं त्यामानाने ईमेलचा तेव्हडा परिणाम होत नसावा.लोक त्यांचं अशा तर्‍हेचे पत्र इतकं व्यक्तिगत करतात,की त्यांना स्वतःला विशेष समजूनच ते असं पत्र पाठवतात.ज्या व्यक्तिला ते शुभेच्छा पत्र पाठवलं जातं त्याच्या पत्रात मजकूर लिहून त्या पत्र वाचणार्‍या व्यक्तिला तो मजकूर, आपल्या मनात त्याला विशेष मानुन, लिहिला गेलाय हे भासवायचा त्यांचा खास उद्देश असतो.”

मला म्हणाला,
“खरं म्हणजे माझ्या वडीलांचं ह्या शुभेच्छा कार्डाचं दुकान आहे.पण प्रामाणिकपणे सांगतो की,शुभेच्छा पत्र पाठविण्याच्या माझ्या विचाराशी ह्याचा कसलाच संबंध नाही.
कधी कधी मी माझ्या वडीलांच्या दुकानात असताना,पाहिलंय,कार्ड विकत घ्यायला आलेली गिर्‍हाईकं कार्डावरचा मजकूर वाचून कधी डोळ्यात पाणी आणतात,कधी चेहर्‍यावर हंसू आणतात. आणि हे असं होणं, सर्व त्या मजकूरावर आणि वाचणार्‍याच्या भावनावर अवलंबून असतं.आणि दुसरं म्हणजे,मला माहित आहे की,लवकरच ते कार्ड ज्याला पाठवलं जाणार आहे तोही तसाच डोळे ओले करणार असतो किंवा हंसणार असतो.आणखी एक
म्हणजे, ते शुभेच्छा कार्ड काय म्हणतं हे विशेष जरूरीचं नसून कुणी पाठवलं आणि का पाठवलं हे विशेष असतं.मला असंही वाटतं की शुभेच्छा कार्ड निवडून काढत असताना ती व्यक्तिसुद्धा आनंदी हो्त असते.हे सर्व होत असताना ती व्यक्ति आपल्या जीवनातल्या सर्व कटकटीबद्दल थोडावेळ विसर पडू देऊन, त्या ऐवजी ज्यांना ते पत्र पाठवणार असतात त्या व्यक्ति आपली काळजी घेणार्‍या असतात हे लक्षात आणून त्यांच्यावर त्याचं लक्ष केंद्रीभूतकरीत असतात.

मी लहान असल्यापासून माझ्या आईने असली मला आलेली सर्व कार्ड जमवून ठेवण्यासाठी एक खोकाच तयार केला आहे.एखादा असाच वाईट दिवस आल्यास मी हा खोका पहातो.आणि माझ्या लक्षात येतं की माझ्यावर प्रेम करणारे आणि माझी काळजी घेणारेकिती व्यक्ति जगात आहेत.

मला ज्यावेळी मुलं होतील तेव्हा मी नक्कीच माझ्या मुलांना हे उदाहरण दाखवून देणार आहे.अर्थात मी माझा हा खोकाही त्यांना देणार आहे.त्यामुळे कदाचीत माझ्या जीवनाकडे त्यांचं लक्ष जाईल आणि मी कोण आणि माझ्यावर प्रेम करणारे कोण ह्याबद्दल त्यांना माहिती मिळेल.”

नवीन घेतलेल्या कार्डाचे पैसे देत मी त्याला म्हणालो,
“मला असं वाटतं,ह्या व्यस्त जगात प्रत्येकजण थकला भागलेला असतो.अशानी आपले काही क्षण वापरून एखादं योग्य शुभेच्छा कार्ड निवडून आपण ज्यांवर प्रेम करतो त्यांना पाठवल्यावर त्यांनाही कळून चुकेल की आपल्या मनात ते किती खास म्हणून टिकून आहेत.
ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 26, 2010

जेव्हा गळाला मासा लागतो

“कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे.”

वेंगुर्ल्याहून आजगांवला जाताना वाटेत मोचेमाड हे गांव लागतं.मोचेमाड येई पर्यंत लहान लहान दोन घाट्या जढून जाव्या लागतात. जवळच्या घाटीच्या सपाटीवर पोहोचल्यावर, त्या डोंगराच्या शिखरावरून खाली पाहिल्यावर, असंख्य नारळांच्या झाडा खाली, छ्पून गेलेलं मोचेमाड गांव दिसतं.पण त्याहीपेक्षा डोळ्यांना सुख देणारं दुसरं विलोभनिय दृष्य म्हणजे मोचेमाडची नदी.
जवळच समुद्र असल्याने ही नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते.पण त्यापूर्वी नदीतलं गांवाजवळचं पाणी अगदी गोड असतं.नदीत मासे मुबलक आहेत.समुद्राच्या दिशेने गांवाजवळून गेलेली नदी नंतर गोड-खारट पाण्याची होते.थोडंसं खाडी सारखं वातावरण असतं.त्यामुळे ह्या ठिकाणी मिळणारी मासळी जास्त चवदार असते.नदीतला मासा आणि समुद्रातला मासा यांच्या चवीत जमिन-अस्मानाचा फरक असतो.पण खाडीतला मासा अत्यंत चवदार असतो.
गुंजूले,शेतकं,सुळे ही मासळी लोक उड्यामारून घेतात.त्याशिवाय करड्या रंगाची कोलंबी-सुंगटं-चढ्या भावाने विकली जातात.कारण ती दुर्मिळ असतात.

मी वेंगुर्ल्याला शिकत असताना, माझ्या वर्गातला एक मित्र पास्कल गोन्सालवीस, मला सुट्टीत मोचमाडला घेऊन जायचा.तिथे त्याचं घर होतं. वाडवडीलापासून गोन्सालवीस कुटूंब मोचेमाडला स्थाईक झालं होतं.
पास्कलच्या आजोबापासूनचं नदीच्या किनार्‍यावर त्यांचं मासे विकण्याचं दुकान आहे.ताजे मासे दुकानात मिळायचेच पण त्याशिवाय दुकानाच्या अर्ध्या भागात तळलेल्या आणि शिजवलेल्या मास्यांचं होटेल होतं.मला पास्कल ह्या दुकानात नेहमी घेऊन जायचा.भरपूर मासे खायला द्यायचा.मला तळलेले मासे जास्त आवडायचे.इकडे लोक तळलेली कोलंबी चहा पितानासुद्धा खातात.

नदीच्या किनार्‍याजवळच बरीच दुकानं असल्याने,मासे पकडायला जाण्यासाठी लहान लहान होड्या सुंभाने,खांबाला बांधून नदीच्या पाण्यात तरंगत ठेवल्या जायच्या. पाण्यात निर्माण होणार्‍या लहान लहान लाटांवर वरखाली होताना ह्या होड्याना पाहून मला गरगरायचं.त्यामुळे मला होडीत बसणं कठीणच व्हायचं.

म्हणून पास्कल मला नदीच्या जवळ असलेल्या एखाद्या मोठया खडकावर बसून गळाने मासे पकडण्याच्या कामगीरीवर न्यायचा.वाटेत आम्ही मास्यांविषयीच गोष्टी करायचो.कुठचे मासे गळाला चावतात,कुठच्या जागी चावतात,मास्यांना लुभवण्यासाठी लहान लहान किडे,अगदी छोटे मासे,अगदी लहान सुंगटं एका पिशवीत जमवून ठेवून बरोबर ती पिशवी कशी ठेवावी लागते. गळाला खुपसून ठेवण्यासाठी ती लुभवणी असतात.

गळ,गळाचा हूक,ऐंशीची दोरी,आणि वेताची लवचीक काठी एव्हडा लवाजमा बरोबर घेऊन जावं लागतं.
अलीकडे पास्कल मुंबईला, त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला, मोचेमाडहून आला होता.त्याच लग्नात त्याची माझी भेट झाली.
मी त्याला माझ्या घरी चहाला बोलावलं होतं.पुर्वीच्या आठवणी निघाल्या.गप्पांना जोर आला.

मला पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी जास्त सृजनशील असतो.त्याचं कारण अगदी सोपं आहे.गळ पाण्यात टाकून मासा लागण्याची वाट पहात असताना विचार करायला भरपूर वेळ असतो.”

मी पास्कलला म्हणालो,
“रोग आणि त्याच्यावर उपाय,तसंच जागीतीक संघर्ष सोडवण्यासाठी योजले जाणारे उपाय,गळाला मासा लागण्याच्या प्रतिक्षेच्यावेळी केले गेले आहेत.असं मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं.कदाचीत ही अतीशयोक्ति असेलही.”

मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“फीश टॅन्क ऐवजी थिंक टॅन्क म्हणायला हरकत नाही.”
आणि पुढे म्हणाला,
“कुणीसं म्हटल्याचं आठवतं की, गळाला मासा लागायची वाट बघत असताना,व्यस्त राहिल्याने,डोक्यात आलेले सर्व विचार कागदावर टिपून ठेवायला वेळ मिळाला असता तर खूप शोध लावता आले असते.कारण एकदा का गळाला ओढ लागली की मनं बदलून जायची.गळाच्या काठीला किती ओढ असायची यावर लागलेल्या मास्याचा आकार-विकार समजून घेण्यात,अन्य विचारावर स्थिरावलेलं मन, सर्व काही विसरून जाऊन मास्याकडे केंद्रीभूत
व्ह्यायचं.

पास्कलच्या हाटलात तळलेली कोलंबी भरपूर विकली जायची आणि आताही जाते.थाळीतून दिलेली कोलंबी डझनावर मोजली जायची.एक डझन हवी,दोन डझन हवी अशी ऑर्डर मिळायची.

पास्कलच्या हाटेलात मास्यावर ताव मारताना पास्कलबरोबर माझ्या गोष्टी व्हायच्या.मला ते आठवलं.ते सांगीतल्यावर पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी,जास्त आशावादी असतो.बराच वेळ पाण्यात टाकून राहिलेला गळ मधेच कधीतरी वर काढून घ्यायचो.कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे. तसं काही तरी झालं असावं ते तपासून पहाण्यासाठी गळ पाण्याच्या वर काढायचो.त्यामुळे पहिल्यांदा गळाला लागलेला मासा आणि दुसर्‍यांदा लागणारा मासा ह्याच्या मधल्या समयात गळ पाण्याबाहेर काढून
तपासण्याचा आणि लागलीच गळ पाण्यात टाकण्याचा एक उद्दोग करावा लागायचा. आठ,आठ तासात एकदाही गळाला मासा न लागणं हे थोडं जिकीरीचं काम वाटायचं.तरीपण आम्ही आशा सोडत नसायचो.कधी कधी आम्ही सूर्योदय पाहिल्यापासून सुर्यास्त पाही पर्यंत पाण्यात गळ टाकून बसतो.जमतील तेव्हडे मासे टोकरीत टाकतो. दिवसभरात पक्षी उडताना दिसतात,मोचेमाडच्या नदीतून खपाटे,गलबतं माल वहातुक करताना दिसतात. त्यामुळे दवडल्या गेलेल्या वेळात कमी मासे मिळाले तरी दिवस अगदीच गचाळ गेला असं वाटत नाही.

गळाला मासे लागणं, हे जणू कसलीच वचनबद्धता न ठेवता स्वर्गाला पोहचल्या सारखं वाटणं.गळाला थोपटलं गेलं, झटका मिळाला,खेचाखेची झाली की समजावं खरा क्षण आला.ऐंसाची लांबच लांब दोरी,लवचीक काठी आणि कमनशिबी गळाला लावलेलं सुंगट, ही सर्व सामुग्री जणू कर्ज फेडीचं धन आहे असं वाटतं.पाण्यातून खेचून आलेला मासा बसल्या जागी आणल्यावर थोडासा विराम घेता येतो.तत्क्षणी काहीतरी प्रचंड झाल्याची ती जागरूकता असते.
पेनिसिलीनचा शोध नसेल,चंद्रावरचं पहिलं पाऊल नसेल पण काहीसं खरंच महान झाल्यासारखं वाटतं.निसर्ग माउलीच्या डोळ्यात धुळ फेकून विनासायास तिच्या कडून बक्षिस मिळालं असं मनात येतं.दोरीच्या शेवटी गळाला लागलेला ऐवज पाहून आपल्या चातुर्याची साक्ष मिळाली असं वाटतं.

पण तो ऐवज,म्हणजे तो तडफडणारा मासा, जरका,मनात भरण्यासारखा नसला किंवा त्याची जास्त तडफड पाहून दया आल्यास पुन्हा पाण्यात सोडून दिला जातो,कदाचीत इतर मास्यांना आपली कर्म कथा सांगायला त्याला मोकळीक दिली गेली असं समजलं तरी चालेल.

हल्ली,हल्ली तर ज्याच्या त्याच्या हाटलात,एका बोर्डावर,आपल्या गळाला लागलेला मोठ्यात मोठा मासा दाखवून फोटो काढला जाऊन,आपल्या कडून विशेष कामगीरी झाल्याचं प्रदर्शन म्हणून चिटकवलं जातं.नदीच्या किनार्‍यावर बसून निरनीराळे कोळी निरनीराळे मासे हातात धरून फोटो काढतात.
प्रत्येक फोटोत कोळ्याच्या चेहर्‍यावरचं हास्य बोलकं असतं.”

उठता उठता मला पास्कल म्हणाला,
“वेळ काढून तू नक्की चार दिवस रहायला मोचेमाडला ये.
तुझ्या जून्या आठवणींची उजळणी होईलच शिवाय आता मोचेमाड किती सुधारलंय ते तुला दिसून येईल.”

“लवकरच येईन “
असं पास्कल मी सांगीतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 23, 2010

आता मिलन होईल कसे

(अनुवादीत)

जा विसरूनी तू मला
आता मिलन होईल कसे
फुल तुटले डहाळी वरूनी
फुलणार कसे ते फिरूनी

चांदण्या पहातील चंद्रमाकडे
लहरी येतील किनार्‍याकडे
पहात राहू आपण एकमेकांकडे
नयनी आंसवे आणूनी म्हणू…
जा विसरूनी तू मला
आता मिलन होईल कसे
फुल तुटले डहाळी वरूनी
फुलणार कसे ते फिरूनी

शहनाईच्या गुंजारवात
सजणी जाईल सजूनी
मेंदी हाताला लावूनी
जाईल सजणाच्या घरी
पहात राहू आपण एकमेकांकडे
नयनी आंसवे आणूनी म्हणू…
जा विसरूनी तू मला
आता मिलन होईल कसे
फुल तुटले डहाळी वरूनी
फुलणार कसे ते फिरूनी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Saturday, November 20, 2010

स्वयंपाक घरातला दिवा पेटताच असु दे.

“शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला विसरला नाही.”

सुलभा आणि तिचा नवरा शरद तुंगारे माझ्या मागून येत होते.मला कळलं जेव्हा शरदने माझ्या पाठीवर थाप मारून मला सावध केलं तेव्हा.त्यांचं घर अगदी जवळ होतं.आमच्या घरी चलाच म्हणून सुलभाने हट्ट धरला.
“नेहमी पुढच्या खेपेला येईन म्हणून आश्वासनं देता.आज मी तुमचं ऐकणार नाही.आणि तुम्हाला आवडतं ते बांगड्याचं तिखलं केलं आहे.आज रात्री जेवताना तुमची कंपनी आम्हाला द्या.”
असं सुलाभा आग्रहाने म्हणाली.आणि शरदने अनुमोदन दिलं.

माझा विक-पॉईन्ट -बांगड्याचं तिखलं-सुलभाला माहित होता.शिवाय खरंच मी तिला नेहमी तिच्या घरी येईन असं आश्वासन देत असे.तिचं घर जवळून दिसत होतं.आज मला कोणतंच निमित्त सांगायला नव्हतं.इतका आग्रह होत आहे तर जावं असं मी मनात आणलं आणि होकार दिला.मी मान उंचावून तिच्या फ्लॅटकडे पाहिलं.आणि बरेच दिवस मला विचारायचं होतं ते लक्षात ठेवून आज सुलभाला विचारूया असं मनात पक्कं करून काय विचारायचं ह्याची मनात उजळणी करीत तिच्या बिल्डिंगच्या पायर्‍या चढत चढत वर जात होतो.
वर गेल्यावर थोडा गरम चहा झाल्यावर,जेवणापुर्वी जरा गप्पा करायला बसलो.

“काय गं सुलभा,मी तुझ्या बिल्डिंग खालून जात असताना नेहमी पाहिलंय की मध्य रात्र झाली तरी तुझ्या स्वयंपाकघराचा दिवा पेटतच असतो.
बसमधून जातानाही वाकून पाहिल्यावर नेहमी दिवा दिसतोच.याच्या मागे काय खास कारण आहे?”
मी सुलभाला विचारलं.

मला सुलभा म्हणाली,
“माझ्या स्वयंपाक घरातला दिवा मी नेहमी पेटताच ठेवते.तो पेटताच ठेवायला मला विशेष वाटतं.माझ्या आईबाबांच्या घरात त्यांच्या स्वयंपाक घरातल्या छतावरचा दिवा अशीच शोभा आणायचा.”

“दिवा शोभा आणायचा हे खरं आहे पण आणखी काहीतरी त्याच्या मागे कारण असावं असं मला वाटतं.काय आहे ते तू मला सांगत नाहीस.त्याबद्दल मला कुतूहल आहे.”
मी सुलभाला म्हणालो.

हंसत,हंसत सुलभा म्हणाली,
“सांगते ऐका,
माझ्या लहानपणी मी माझ्या आईबाबांकडे वाढत असताना,त्यांच्या घरातला दिवा असाच पेटता रहायचा,ह्याचं कारण मला माझ्या आईने समजावून सांगीतलं होतं.ती म्हणायची,
“तुम्हा मुलांसाठी ती एक खूण असायची.आणि त्यातून एक इशारा असायचा की,बाहेर जीवन जगताना कुठलीही चूक जरी झाली तरी ती चूक एव्हडी गंभीर नसावी की त्याचा विचार करून कितीही रात्र झाली तरी तुम्ही घरी यायचं टाळावं.”
आम्ही चार भावंडं होतो.दोन भाऊ आणि दोन बहिणी.मागे पुढे शिकत होतो.माझे दोन्ही भाऊ कॉलेजात असताना मी शाळेत शिकायची.माझी बहिणही माझ्याबरोबर शाळेत शिकायची.”

“खरं आहे.शिक्षण घेत असतानाच्या त्या वयात,कधी कधी बारीक-सारीक कारणावरून मित्र-मंडळीशी तणाव होण्याचा संभव असतो.अशावेळी आपल्या हातून एखादा अतिप्रसंग झाल्यास,बेजबादारपणा होऊ शकतो.तुझी आई अशा प्रसंगाबद्दल काळजीत रहात असावी.”
मी सुलभाला म्हणालो.

“माझी आई अगदी देवभोळी होती.आपली मुलं बेजबाबदारपणे बाहेर वागावीत ह्यावर तिचा कदापीही विश्वास नव्हता. त्याबाबतीत ती भोळी होती.”
सुलभा सांगू लागली.पुढे म्हणाली,

“परंतु,काही कारणास्तव त्यांच्याकडून चूक झाली,अपराध झाला तरी प्रामाणिकपणे त्याची कबुली देऊन ती नेहमीच घरी येणारच असं तिला वाटायचं. प्रत्येक अपराधावर काही तरी निष्पत्ति असतेच.पण त्याचा अंतिम निर्णय माझी आई घ्यायची.तो निर्णय आमच्या नशिबावर सोडून द्यायची नाही.मार्ग चुकलेल्या आम्हा मुलाना घरातला दिवा हा एखाद्या संकेत-दीपा सारखा होता. आमचं घर हे सुरक्षित स्थान आहे हे तो दिवा भासवायचा.
माझे दोन्ही भाऊ शाळा शिकत असताना आणि कॉलेजात जाण्यापूर्वी माझ्या आईकडून त्यांना कधीतरी उशिरा-रात्रीचे उपदेश किंवा व्याख्यानं ऐकायला मिळायची.पण मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने माझ्या आईवर,आम्ही कॉलेजात जाई पर्यंत, क्वचीतच तणाव आणला.”

“मला माहित आहे.तुझी आई मला नेहमी म्हणायची,
“माझ्या दोन्ही मुली गुणी आहेत.मला त्यांची काळजी नाही.”
आणि मी तिची समजूत घालून म्हणायचो,
“मुली नेहमीच गुणी असतात.निसर्गाची त्यांना देणगी आहे.
पुढे त्यांना “आई” व्हायचं असतं.सहनशिलता,समजूतदारपणा,त्याग,प्रेम अशा तर्‍हेचे असतील नसतील त्या सर्व गुणांचा भडिमार निसर्गाने स्त्रीवर केला आहे.”आईचे” गुण घेऊन एखादा पुरूष वागला तर त्याच्याकडून कसलाही प्रमाद होणार नाही.”

सुलभा थोडी ओशाळलेली दिसली.पण झालेल्या चूकीचं समर्थन न करता मला म्हणाली,
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण स्त्री झाली तरी ती माणूस आहे.तिच्याही हातून चुका होणं स्वाभाविक आहे.
मी त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होते.तणाव न आणण्याचा हा शिरस्ता माझ्याकडून मोडला गेला.
तो दीवाळीचा पहिला दिवस होता.मी लाजेने मान खाली घालून,पण एकवार त्या स्वय़ंपाक घरातल्या दिव्याकडे नजर टाकून,घरात आले.मला घरात येताना पाहून माझ्या आईच्या तेव्हाच लक्षात आलं की काहीतरी घोटाळा झाला आहे.मी घाबरी-घुबरी झालेली आईकडे कसला तरी कबुली जबाब देण्याच्या तयारी होते.
मी आईला म्हणाले,
“आई,तू माझा नक्कीच तिटकार करणार आहेस.”
माझा गळा दाटून आला.पण त्याही परिस्थितीत मी म्हणाले,
“मला दिवस गेलेत “
हे ऐकल्याबरोबर माझ्या आईने आपले दोन्ही हात उघडे करून मला आपल्या मिठीत घेतलं.आणि त्यापरिस्थितीत माझा रोखून धरलेला हुंदका मी तिच्या खांद्यावर मोकळा केला.तिने माझ्या पाठीवर हात फिरवला.आणि माझ्या कानात हळूच पुटपूटली,
“मी तुझा कधीच तिटकार करणार नाही.मी तुझ्यावर प्रेम करते.सर्व काही ठिक होणार.”

असं म्हणून माझ्या आईने त्या संकेत-दीपाचा प्रकाश मला दाखवला.आणि मला शेवटी जाण आली.
दिव्याचा प्रकाश दिसणं म्हणजेच,बिनशर्त प्रेम असणं.ते आपल्या मुलांसाठी असणं.कारण जेव्हा जीवन कष्टप्राय होतं तेव्हा ते प्रेम संरक्षणाची शेवटची फळी असते.त्याचाच अर्थ आपल्या मुलांचा उघडपणे स्वीकार करणं,जास्त करून, अशावेळी की ती स्वतःचाच स्वीकार करायला तयार नसतात. त्याचाच अर्थ, समजून घेणं,आणि सहानभूति ठेवणं.खरं तर, प्रेम करणं, जेव्हा ते करणं सोपं असतं, तेव्हा नसून जेव्हा ते महान कठीण असतं तेव्हा करणं
योग्य असतं.”

अशा तर्‍हेचं हे प्रेम, मी स्वतः आई होई तोपर्य़ंत माझ्या पूर्ण ध्यानात आलं नाही.
माझी मुलं आता एक एकरा वर्षाचं आणि एक नऊ वर्षाचं आहे.मुलं आता संदेहास्पद किशोरावस्थेत पदार्पण करीत आहेत.
कॉलेज मधला माझ्या मित्राशी, शरद तुंगारेशी माझा प्रेम विवाह झाला होता.
मुलांना जरी समजण्यात येत नसलं तरी मी स्वय़ंपाक घरातल्या दिव्याची गोष्ट त्यांना समजावून सांगीतली आहे.
मला जरी वाटत असलं की, त्यांना मान खाली घालून घरात येण्याची पाळी येणार नाही तरी, मी त्यांना आश्वासन दिलं आहे की,
“काही जरी झालं तरी घर हे असं स्थान आहे की तिथे प्रेम मिळतं. जीवनात गडद अंधार आला तरी मी स्वय़ंपाक घरातला दिवा का पेटता ठेवते ते त्यांनी समजून असावं”

सुलभाकडून हे ऐकून मला तिची खूप किंव आली.
मी तिला म्हणालो,
“सुलभा,माझं कुतूहल तू छान समजावून सांगीतलंस.कित्येक दिवस ते माझ्या मनात होतं.आता तू केलेल्या बांगड्याच्या तिखल्याचं तेव्हडं कुतूहल जेवल्यानंतरच समजावलं जाईल. खरं ना?”
शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला मात्र विसरला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 17, 2010

स्थीर गती आणि माझे बाबा.

“ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.”

मंगला आपल्या वडीलांवर खूप प्रेम करायची.अलीकडे बरेच दिवस वार्धक्याने ते आजारी होऊन दवाखान्यात होते. एकदा मी त्यांना दवाखान्यात भेटून आलो होतो.पण त्यांचं निधन झालं हे ऐकल्यावर मी मंगलाला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.
माझ्याशी बोलताना मंगला आपल्या बाबांच्या आठवणी काढून मुसमुसून रडत होती.

मला म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की आपल्या आईवडीलांच उदाहरण किंवा त्यांचा अनुभव हा एक चिरस्थायित्वाचा धागा असून तो पिढ्यांन पिढ्यांना एकमेकात गुंतून ठेवीत असतो.माझ्या बाबांच्या बाबतीत ते मला खरं वाटतं.
माझ्या लहानपणी मी पेटी वाजवायला शिकायची.आणि त्यावेळी माझे बाबा मी वाजवताना ऐकायचे.
“मला वाटतं तू जरा जास्त गतीत वाजवत आहेस”
मला माझे बाबा मी पेटी वाजवीत असताना नेहमीच म्हणायचे.

कदाचीत त्यांचं खरंही असेल.संगीत शिकताना नवीन नवीन गाणी वाजवताना,माझी बोटं जेव्हडी जोरात फिरायची त्या गतीत रोजच प्रगति केल्याने मी ह्र्दयस्पर्शी गाण्यांतलं स्वरमाधुर्य घालवून बसायचे.हे मला माहित असायचं. तरी असं असतानाही जास्त करून माझ्या वडीलांचे ते शब्द मला झोंबायचे.त्यावेळी मनात यायचं की,
“बाबा तुम्ही तुमचं पहा ना तुम्हाला काय करायचंय?”

मी म्हणालो,
“मला आठवतं,मी तुझ्या घरी आलो असताना,तुझी चौकशी केल्यावर तुझे बाबा म्हणायचे,
“मंगला माझ्यावर रागावून बाहेर गेली आहे.तिचा राग तिच्या नाकाच्या शेंड्यावर असतो.”
मी विचारायचो,
“असं काय तुम्ही तिला बोललात?”
मला तुझे बाबा म्हणायचे,
“असंच काहीतरी तिच्या पेटीवाजवण्याच्या बाबतीत बोललो असेन.आणि तिला राग आला असावा.”

माझं हे ऐकून मंगला म्हणाली,
“अशावेळी नेहमीच मी पेटी बंद करून,दहा वर्षाची मी राग नाकाच्या शेंड्यावर ठेऊन,बाहेर निघून जायची.त्यावेळी हे माझ्या लक्षात येत नव्हतं की,माझे बाबा, मला दाखवत असायचे की ते, नीटपणे माझी पेटी ऐकायचे.संगीताची तितकीशी पर्वा नकरणार्‍या त्यांना,स्वरमाधुर्य,आणि भाव ह्याबद्दल तितकच माहित होतं पण संगीताची लय आणि गती मात्र त्यांना काहीशी कळत असावी.”

माझ्या बाबांनी केलेली टीप्पणी,मला सैरभैर करायची.त्यामुळे मी माझ्या जीवश्च-कंटश्च मित्रा पासून, मला उत्तेजन देणार्‍या माझ्या प्रेमळ माणसापासून,ज्यांचे हात, मला उचलून लोंबकळत्या पिवळ्या पिकलेल्या आंब्याला, झुकलेल्या फांदी पासून, उचकून काढण्यासाठी मदत करायचे, किचनमधे खुर्चीवर चढून राघवदास लाडवाचा डबा काढण्याच्या प्रयत्नात माझे हात डब्यापर्यंत पोहचत नाही हे पाहून, मलाच वर उचलून लाडवाच्या डब्याला घेण्यासाठी मदत करायचे,त्या हातापासून,माझ्या बाबांपासून मी दूर जाऊ लागले होते.खरं म्हणजे ह्या माझ्या सर्व धडाडीत माझे बाबा नेहमीच माझ्या मागे असायचे.”

मी हे ऐकून मंगलाला म्हणालो,
“तुझे बाबा खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचे.त्यांच्या बोलण्यात वाक्यागणीक तुझं नांव यायचं.”

“मला आता त्याचा अतिशय पश्चाताप होतोय.बाबांचं प्रेम मला लहानपणा पासून माहिती असायला हवं होतं”
असं सांगून मंगला म्हणाली,
“माझ्या किशोरीवयात,जर का मला माहित असतं की,जेव्हा चापचापून चेहर्‍यावर मेक-अप करीत असताना माझे बाबा पहातील म्हणून मी दरवाजा बंद करून माझ्या खोलीत असायचे हे चूक आहे,माझ्या तरूणपणात,जर का मला माहित असतं की,बाहेर गावी नोकरी करीत असताना,एकटेपणा वाटत असताना,माझ्या बाबांच्या सल्ल्याची मला जरूरी आहे हे त्यांना सांगायला मी विसरून जायची हे चूक आहे.मी तरूण आईची भुमिका करीत असताना,माझ्याच मनमाने मी माझ्या मुलांचं संगोपन करायची,अशावेळी निवृत्त झालेल्या आजोबांकडून ज्ञानसंपन्न उपदेश मिळवून घ्यायची जर का मला दुरदृष्टी असती तर,जेव्हा माझी वाढ होत होती अशावेळी लहान मुलगी आणि तिचे आश्रय देणारे,सहायता देणारे बाबा यांच्या मधली जवळीक, खास दूवा, फिरून परत येत नाही,हे जर मला माहित असतं तर मी माझी ही वागणूक जरा हळूवारपणे घेतली असती.”

मी म्हणालो,
“तुझे बाबा,शांत स्वभावाचे होते.त्यांचे विचार स्थीर असायचे.त्यांना होणारे कष्ट ते तोंडावर दाखवत नसायचे.”

“तुमचं माझ्या बाबांबद्दलचं अवलोकन अगदी बरोबर आहे”
असं म्हणत मंगला पुढे म्हणाली,
“आम्ही मुलं वाढत असताना,आमच्याकडून जर का त्याना दुःखदायी वागणूक मिळाली असली तरी माझे बाबा ते दाखवत नव्हते.जसं माझं पेटीवादन होत असताना त्यांच्याकडून होणार्‍या उपदेशाच्यावेळी त्यांची स्वतःची गती स्थीर असायची.

जेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्यांचा अंत जवळ आला आहे हे अन्य प्रकारे भासवलं,तेव्हा माझ्या बाबांनी आमच्या आईला प्रश्न केला,
“मुलींना आता मी काय सांगू?”
त्यांच्या ह्या प्रश्नातच त्यांच्या क्षमतेचं गुपीत छपून होतं,आपल्या कुटूंबाचा प्रथामीक विचार करताना,ते स्वतःचा राग,मनाला लागलेले घाव,आणि त्यांची बेचैनी, विसरून गेले होते.”

“काही गोष्टी आपल्या हातात नसतात.पण आपल्या प्रेमळ माणसाच्या आठवणी येत असतात.चांगल्या आठवणींची उजळणी करून जीवन जगायचं असतं”
मी मंगलला म्हणालो.

“मी माझ्या बाबांना खरंच दूरावून बसले.”
मला मंगला सांगू लागली,
“पण कधी कधी दिवसाच्या अखेरीस,नाकं पुसून काढताना,कुल्हे धूताना,दुध ग्लासात ओतताना,पडलेल्या गोष्टी जमीनीवरून पुसताना,घरभर पसरलेले खेळ जमा करून ठेवताना,अशा काही संध्याकाळच्या वेळी,जेव्हा मी, ती आराम खूर्ची आणि वर्तमान पत्रं पहाण्या ऐवजी ते वर्षाच्या अंतरातले लहान दोन जीव,चीडचीड करताना, रडताना, माझ्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट करताना पाहून लागट शब्द माझ्या मनात आणते आणि मला माझ्या बाबांची आठवण येते.
मग मात्र मी माझ्या त्या दोन पिल्लांना छाती जवळ घेऊन गोंजारते.”

मी उठता उठता मंगलला म्हणालो,
ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.”

“अगदी माझ्या मनातलं बोललात”
दरवाजा उघडताना आणि मला निरोप देताना मंगला मला म्हणाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 12, 2010

माझी खास खोली.

धाके कॉलनीतल्या जुन्या इमारती आता पाडून नवीन टॉवर्स यायला लागले आहेत.बरेच लोक पैसे घेऊन दुसर्‍या ठिकाणी जातात,तर काही नव्या टॉवर्समधे आणखी जागा घेऊन रहायला तयार होतात.प्रत्येकाच्या आर्थीक परिस्थितीवर आणि त्यांच्या इच्छेवर हे अवलंबून असतं.

आमचे शेजारी, तावडे कुटूंब, टॉवरमधे रहायला गेले.त्यांनी तेराव्या मजल्यावर दोन फ्लॅट्स घेतले.त्यांच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभं राहिल्यावर जुहूची चौपाटी स्पष्ट दिसते.वारा पण मस्त येतो.संबध फ्लॅटमधे वारा खेळत असतो.काही वेळा अतिवार्‍यामुळे खिडक्या बंद कराव्या लागतात.

सुलू तावडेला आपला नवीन फ्लॅट खूप आवडतो.मला काल तिने तिच्या घरी बोलावलं होतं.
मी तिला विचारलं,
“ह्या नव्या जागेत तुला विशॆष असं काय आवडतं.”

मला म्हणाली,
“काय आवडत नाही ते विचारा.आम्हाला प्रत्येकाला इकडे स्वतंत्र खोली असून,प्रत्येक खोलीला स्वतंत्र बाथरूम जोडलेली आहे.मला माझी खोली आणि त्याहीपेक्षा माझी बाथरूम आवडते.”

“कां असं काय तुझ्या बाथरूममधे आहे की ती तुला एव्हडी आवडावी?
मी सहाजीक कुतूहलाने सुलूला प्रश्न केला.

“मला पहिल्यापासून वाटायचं आपणच वापरू असं आपलं एक स्वतंत्र बाथरूम असावं.एकदाची गंमत तुम्हाला सांगते.ह्या बाथरूमच्याच संबंधाने.”
असं म्हणून एक थंडगार लिंबाच्या सरबताचा ग्लास माझ्या हातात देत म्हणाली,
“मी एकदा, माझे काही दृढविश्वास आहेत, त्यावर विचार करीत होते, आणि माझ्या लक्षात आलं की,हा विचार करीत असताना, मी माझ्या बाथरूम मधे थपकट मारून बसले होते.आणि लगेचच माझ्या लक्षात आलं की,प्रत्येकाला स्वतःची अशी एक खोली,एखादी स्वतंत्र जागा किंवा कुठेतरी शांत बसावं असं क्षेत्र असावं.त्यात बसून रहावं.आणि कुणीही कटकट करायला येऊ नये. आणि आपल्याच विचारत मग्न होऊन जावं”

मी सुलूला म्हणालो,
“खरं आहे तुझं म्हणणं, पण हे थोडसं चमत्कारीक वाटतं.”

मला म्हणाली,
पण माझ्या बाजूने खरं सांगायचं झालं तर,कुणापासूनही दूर रहायचं झालं तर माझी बाथरूमच उपयोगी आहे असं मला वाटतं.
अगदीच लंगडं कारण आहे ना! तेच मला सर्व प्रथम वाटलं.नंतर माझ्या लक्षात आलं की,जेव्हडी मी माझ्या बाथरूममधे वेळ घालवते तेव्हडा माझ्या बेडरूममधे घालवीत नाही.माझी बेडरूम मला एखादी होटेल रूम सारखी वाटते. शिवाय माझी बाथरूम मला वाटत होतं त्यापेक्षा मस्त आहे असं वाटतं. उदा.त्यात दोन सिंक्स आहेत.एक सिंक माझ्या प्रत्यक्ष वापरात असते आणि दुसरं,मला माझी चेहरापट्टी वगैरे करयाला उपयोगी होत असतं.अलीकडे बरेच दिवस मी असाच वापर करते.
ही एक प्रकारची मला संवय झाली आहे.शिवाय ह्या संवयीमूळे मला बरंही वाटायला लागलं आहे.
बर्‍याच लोकांची अशी एखादी जागा असतेच जिथे ते त्यांचा वेळ दवडतात.एका अर्थी ती एक संरक्षीत जागा असते.”

जरा डोळ्यासमोर चित्र आणलं की, आपल्या जॉबवरून आल्यावर, घरात पाय ठेवल्यावर,तुमची अशी जी जागा असते त्यात जाऊन सर्व शरीर झोकून द्यावं.आणि लगेचच तुम्हाला अगदी आरामात आहे असं वाटावं.आपली अशीच एक खोली असावी जी आपल्याला हवी तशी सुशोभित करता यावी.जसा तुमच्याच हाताच्या मागच्या भागावर काय आहे हे फक्त तुम्हालाच माहित असतं तसंच तुमच्या अशा ह्या खोलीची इंच,इंच जागा तुम्हालाच माहित असते. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला समर्थ समजता आणि तुमचा तिथे पूरा काबू असतो. मला नक्कीच माहित आहे की माझी जर अशी स्वतंत्र खोली नसती तर मी स्वतःला,रोज घरी आल्यावर, अत्यंत कमजोर व्यक्ति समजले असते.

मला खोटं सांगायचं नाही,बाथरूम ही माझी खास खोली आहे हे सांगायला जरा अजीब वाटतं खरं.पण काय करणार?हे आहे हे असं आहे.मला जे खासगी वातावरण हवं आहे ते मला तिथे मिळतं.त्यासाठी मला भारी प्रयास करावा लागत नाही.आणि हे नेहमीच मला अतिरिक्त आहे असं वाटतं.”

हे सुलूने सगळं सांगीतल्यावर,
“बघू तुझी बाथरूम कशी आहे ती?”
असं म्हणायला मी धाडस केलं नाही.कारण ती तिची खासगी जागा आहे असं ती मला म्हणून गेली होती.

“प्रत्येकाला आपल्यात सुधारणा करायला पात्रता असावी लागते.प्रत्येकाला आनंद मिळायला,जरी तो काही क्षणाचा असला तरी,आपली अशी खोली असायला आपण पात्र आहे असं वाटलं पाहिजे.”
असं म्हणून रिकामा झालेला लिंबाच्या रसाचा ग्लास मी तिच्या हातात दिला.

“मला माहित होतं तुम्ही नुसतेच माझ्या विचाराशी सहमत होणार नाही, तर माझ्या विचाराची प्रशंसा पण करणार.म्हणूनच मी तुम्हाला आज घरी बोलावलं.”
मी उठता उठता मला सुलू म्हणाली.

श्रीकॄष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 9, 2010

झब्बू

“हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.” इती गणपत.

दीवाळी आली आणि सर्व जवळचे नातेवाईक जमल्यावर, घरात धमाल येते.पत्त्याचा डाव निश्चितच मांडला जातो.”
मी गणपतला सांगत होतो.

गणपत माझा मित्र.दीवाळीच्या फराळाला मी त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं.घरात पत्याचा डाव जोरात रंगलेला पाहून त्यालाही कुतूहल झालं.

मी त्याला पुढे म्हणालो,
“माझ्या लहानपणाची मला आठवण आली. दीवाळीसारख्या सणाला घरी मित्रमंडळी जमली की पत्यांच्या खेळाला उत यायचा.आमचा दिवाणखाना मोठा असल्याने बरीच मंडळी जमल्यानंतर गोल चक्राकारात बसून खेळायचो. सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे “झब्बू”.या खेळात मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व भाग घ्यायची.जेव्हडे मेंबर्स जास्त तेव्हडा खेळ जास्त रंगायचा.
पत्त्याचा बावन्न पानाचा सेट असल्याने,बावन्न आकड्याला, खेळणार्‍यांच्या आंकड्याने भागून पानं वाटताना जो भागाकार येईल तेव्हडी पानं प्रत्येकाला एकाच वेळी दिली जायची.उरलेली पानं पत्ते पिसणारा घ्यायचा.उद्देश असा की एक एक पान प्रत्येकाला वाटल्यास रंगाने हात व्ह्ययचा, तो होऊं नये आणि लगेचच झब्बू दिला जावा.

ह्या खेळात असं आहे की, नशीबाने येणारी पानं,पुढचा, कोणत्या पानावर देत असलेला झब्बू,आणि मागचा, कोणत्या पानावर घेत असलेला झब्बू हे लक्षात ठेवण्याचं कसब असणं म्हणजे लवकर आपली सुटका करून घेण्याच्या चलाखीवर आपण अवलंबून असणं.नाहीपेक्षां शेवटी “गाढव” होण्याची पाळी येते.

नंतर कुणीतरी गाढव होऊन झाल्यावर,आणि खेळाचा तो डाव संपल्यावर,
“कसा काय गाढव झालास?”
असा साधा प्रश्न गंमत म्हणून एखादा विचारायचा.
“त्याचं असं झालं,तसं झालं.”
अशी चरवीचरणाची चर्चा,गाढव झालेल्याने,सांगायला सुरवात केल्यावर लगेचच कुणीतरी,
“आपल्याला काय करायचं आहे”
असं म्हणून गाढव झालेल्याचं हंसं करण्यात इतरांची चढाओढ लागायची.

हंसं झालेला मात्र पुढल्या खेपेला गाढव झाल्यावर,
“कसा काय गाढव झालास?”
ह्या प्रश्नाला निक्षून उत्तर देत नसायचा.

माझं हे ऐकून गणपत म्हणाला,
माझ्या लहानपणी मी,माझे वडील,आई आणि माझी धाकटी आणि मोठी बहिण पत्ते खेळायचो.धो,धो,पाऊस पडायला लागला आणि बाहेर कुठेही जाण्याचा सुमार नसला की आम्ही हटकून पत्ते खेळायला बसायचो.

कोकणात पाऊस बेसुमार पडायचा.बाहेरच्या पडवीत बसून पत्ते खेळायला मजा यायची.मधुनच पावसाची वावझड आल्यावर अंगावर पाण्याचे तुषार पडायचे.अशावेळेला सोलापूरची जाडी चादर अंगावर लपेटून मी बसायचो.
गाढव व्हायला मला मुळीच आवडायचं नाही.माझी धाकटी बहिण गाढव झाली तर ती पुढचा डाव खेळायलाच तयार व्ह्यायची नाही.मग माझे वडील म्हणायचे,
“पत्तेच तुमचं ऐकतात.”
दुसर्‍या डावातल्या वाटपात कुणाला तरी जड पान्ं आल्यास-राजे,एक्के,गुलाम वगैर-आणि कुणी कुरकुर केल्यास माझे वडील म्हणायचे,
“कुरकुर करूं नकोस,पत्यांना ऐकूं येतं. कुरकुर कराणारा पत्यांना आवडत नाही.”

रमी खेळताना माझ्या वडीलांचं असंच व्हायचं.ढीगातून प्रत्येक पत्ता उचलताना,डोळे मिटून,ओठात पुटपुटून, स्वतःवर पूर्ण विश्वास आहे असं भासवून, पत्ता कसाही असो,आपल्या मनासारखा आला असं सांगून टाकीत.

“हा मस्तच पत्ता मला मिळाला.मला ह्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे”
असं मोठ्याने बोलून दाखवीत.
त्यांची रमी झाली नाही तर,
“हरकत नाही.थोडक्यात चुकली.”
असं खिलाडू वृत्तिने म्हणत.
आणि त्यांची रमी झाली तर,अगदी घमेंडीने म्हणत,
“पाहिलत का मला माहितच होतं.”
पण अशावेळी माझी आई हे ऐकून,डोळे गरगर फिरवून म्हणायची,
“पुरे झाली,स्वतःचीच स्तुती”

तिस वर्षं झाली.आता मला नक्की माहित झालं आहे की पत्ते माझं ऐकत नाहीत.आणि कुणाचाही ह्या म्हणण्यावर विश्वास नसणार हे ही मला माहित आहे.माझे बाबा,गणीताचे शिक्षक असल्याने त्यांचा भरवंसा आंकडेशास्त्रावर होता, ओठाने पुटपुटलेल्या प्रार्थनेवर नक्कीच नव्हता.
आणि मी वकील असल्याने,पत्त्यांना कान असतात ह्यावर केस घालायला कोर्टात जाणार नव्हतो.पण सरतेशेवटी माझ्या बाबांचंच खरं होतं.
ते म्हणायचे,
“सकारात्मक दृष्टी ठेवून,भीतिला आनंदात रुपांतरीत करावं आणि निराशेला विजयात रुपांतरीत करावं.
तक्रारी असणं म्हणजेच प्रारंभालाच हार मागणं.पण सकारात्मक वृत्ति यशाच्या खात्रीला बळावते.

मंदिरं आणि किल्ले बांधले जातात,परोपकारता निधीबद्ध असते,विजय मिळवले जातात,संघर्ष मिटवले जातात, जीवन जगलं जातं,आणि पत्ते खेळले जातात,पण व्यवस्थितपणे केलं तर, भीति, नबाळगता,धास्ति नठेवता,निराश न होता,पण अपेक्षा बाळगून,आनंदी राहून आणि यशावर दृढनिष्ठा ठेवून राहता आलं तरच.”

अलीकडेच मी माझ्या नव्वद वर्षांच्या आजोबांना दवाखान्यात भेटायला गेलो होतो.ते हृदयाच्या झटक्यातून सुधारत होते.माझा हात त्यानी हातात घेऊन दुखेपर्यंत आवळला.
“कसं वाटतं?”
हात आवळत असतानाच मला विचारलं.
“आई गं”
मी ओरडलो.
माझ्या अजोबा आपला चपटा,हाडकुळा दंड दाखवीत म्हणाले,
“इतका काही वाईट नाही.”
ते हार मानणारे नव्हते.ती काही त्यांची मरणशय्या आहे असं ते मानीत नव्हते.

आता मी माझ्या मुलांबरोबर पत्ते खेळतो.आमची एक खास खेळासाठी म्हणून खोली आहे.तिथलं वातावरण नेहेमी जोशपूर्ण असतं.चारही बाजूला खेळणी पसरलेली असतात.माझा नऊ वर्षाचा नेहमी खेळाच्या टेबलावर विराजमान झालेला असतो.आणि सहा वर्षाची,पत्ते हातात घेऊन पिसत रहाते.खेळ सुरू झाल्यावर खोलीतलं तंग वातावरण कमी-जास्त गंभीर होत असतं.एखादा जवळ जवळ जिंकायला आलेला-बहुतेक वेळा तसंच होतं-असताना माझी मुलं ईर्षा आलेली,असूया आलेली,उर्मट झालेली आणि दुखावणारी होतात.हरली की रडतात, अंगावर धावून येतात. जिंकली की रागारागाने बघतात.अगदी मुलांसारखीच वागतात.अशावेळी मी माझे बाबा होतो.माझी पत्नी माझ्या आईसारखेच डोळे वटारते.अशावेळी मी माझ्या बाबांचा विचार पुढे ढकलतो,
“तक्रारी होऊ नका,आणि जे पत्ते मिळालेत त्यावर समाधान रहा.सर्व खेळ मजेसाठी आहे हे लक्षात असू द्या.पत्ते तुमचं ऐकणार”

हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.”
गणपतचं हे सर्व बोलणं इतर खेळणारे ऐकत होते.

“तुझा हा संदेश ह्या खेळणार्‍यांपर्यंत पोहोचला जावो”
असं म्हणत माझ्या पत्नीने फराळाचं ताट गणपतच्या समोर ठेवलं.आणि म्हणाली,
“दीवाळीच्या शुभेच्छा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 6, 2010

हास्यप्रदेची क्षमता.

“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं”

प्रो.देसाई मला, आपल्या लहानपणाची आठवण येऊन, एक किस्सा सांगत होते.
“एकदा मला आठवतं,मी नऊएक वर्षांचा असेन,मी घरातून बाहेर मागच्या अंगणात धांवत धांवत जात होतो. संध्याकाळची वेळ होती.किचनमधे माझी आई अंधारात निवांत बसून होती.तिचा तो दुःखी चेहरा पाहून मला खूपच वाईट वाटलं.सकाळपासून संबंध दिवसभर माझी आई हंसताना मी पाहिली नव्हती.नंतर मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी गेला आठवडाभर तिला हंसताना पाहिलं नव्हतं.आणखी मागे जाऊन विचार केल्यावर माझ्या लक्षांत यायचं टाळलं गेलं नाही की गेला महिनाभर माझ्या आईला मी खुसखुसून हंसताना पाहिलंच नाही.”

प्रो.देसाय़ांच्या आईचा आज जन्मदिवस होता.तिला आवडणारे बेसनाचे लाडू मला द्यायला म्हणून आले होते. आईच्या आठवणीने भाऊसाहेब नेहमीच भाऊक होतात.दर खेपेला आईचा विषय निघाल्यावर जुन्या आठवणी काढून एखादी घडलेली घटना डोळ्यात पाणी आणून मला सांगतात.

“तुमच्या बरोबर मी बरेच वेळा माझ्या आईच्या जुन्या आठवणी सांगत आलो आहे.आज तर तिचा जन्मदिवस आहे.अगदी अगत्याने मी तिच्याबद्दल हे सांगत आहे.”
असं मला म्हणाले.

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुम्ही सांगा आणि मी ऐकतो.अहो,आपल्या आईबद्दल कुणाला ऐकायला आवडणार नाही.?तुमचा किस्सा ऐकताना मलाही माझ्या आईची आठवण येऊन धन्य वाटतं.”

भाऊसाहेब खूश झाले.मला पुढे सांगू लागले,
“त्यानंतर मी माझ्या मनात ठरवलं की यापुढे आईला हंसवायचं.आणि हे काही सोपं काम नव्हतं.लहानपणी मी तसा गप्पच वृत्तिचा मुलगा होतो. थट्टा-मस्करी करण्याची माझी प्रकृति नव्हती.इतकं असूनही कधी कधी मी विनोद करायचो,पण ते विनोद म्हणजे, कुणा एखाद्या जाड्या मुलाला पोटात गॅस झाल्यामुळे खालून कसा सोडायचा आणि ते प्रात्यक्षीक करून दाखवायचं,किंवा शेंबड्या मुलाची नक्कल करून दाखवायचो.

मला आठवतं त्यावेळी असलेच विनोद मी माझ्या आईला करून दाखवले.ऐकून तिने तिचे डोळे फिरवले नाहीत किंवा मोठे करून माझ्याकडे पाहिलंही नाही.ती नुसती गालातल्या गालात हंसली.तिचं ते हंसूं पाहून मी समजलो की माझ्या मनात काय आहे ते तिला कळलं असावं,पण,का कळेना, तिला खुसखुसून हंसायचं नव्हतं.
असेल कदाचीत, त्यावेळी तिला वाटत असावं,की ती हंसूच शकत नसावी.पण शेवटी हंसली, पण कोणत्या विनोदावर माझी आई नंतर हंसली ते मला आठवत नाही.

मी मोठा झाल्यावर मला एकदा माझी आई म्हणाली की तिला ती घटना आठवते.कठीण काळातून बाहेर यायला तिला माझ्या त्या हंसवण्याची चांगलीच मदत झाली.किती प्रमाणात तिला फायदा झाला हे,नऊ वर्षाच्या, मला समजलं नाही पण एक मात्र खरं की आम्ही दोघं मनाने खंबीर झालो.”
भाऊसाहेबांच्या ह्या हंसण्य़ा-हंसवण्याच्या किश्यावरून माझ्या मनात आलं ते आपण सांगावं म्हणून मी त्यांना म्हणालो,
“तुमचे हे ऐकून मला एक आठवण आली.
२६/११ चा ताजमहाल होटेलवर आणि आणखी काही ठिकाणी मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या दिवशी मी मुंबईत होतो. मला आठवतं त्या घटनेनंतर बरेच दिवस मुंबईकरांच्या चेहर्‍यावरचं हंसंच निघून गेलं होतं. नव्हेतर लोक इतके क्षुब्ध झाले होते की चेहर्‍यावर हंसूं आणण्याची वेळच आली नाही असं त्यांना वाटायचं.
पण मला मात्र वाटायचं की,चेहर्‍यावर आणलेलं हंसूं अख्या मुंबई शहराला झालेली जखम हळू हळू भरून काढायला मदत निश्चितच करील.
शहराच्या एका मोठ्या जागी एका पोस्टरवर राक्षसारखे दिसणार्‍या आतंकवाद्यांचं चित्र होतं आणि खाली लिहिलेलं मी वाचलं. ते एकमेकाला म्हणत होते की,
“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं”
अलीकडे माझ्या लक्षात आलंय की,श्रद्धा ही मुळातच हास्यप्रद असते.कृष्णकन्हया गाई सांभाळताना आपल्या संवगड्याने घेऊन खेळायचा त्याच्या संवगड्यात पेंद्या नावाचा विदुषक होता.त्याची टिंगल करून सर्व हंसायचे.
मी एकदा माझ्या एका क्रिश्चन मित्राच्या नातेवाईकाच्या प्रेतयात्रेला गेलो होतो.आपल्या जवळच्या प्रेमळ व्यक्तिच्या जाण्याने दुःखी होऊन जमलेल्या समुदायात एखाद्या क्षणी हास्य असायचं.”

माझं हे ऐकून प्रो.देसाई जरा विचारात पडले.मला काही तरी मूंबईच्या घटनेच्या संदर्भाने व्यापक विचार त्यांना सांगायचा होता.
मला म्हणाले,
“हास्यप्रद श्रद्धेची नजर, जगात होणार्‍या हानीकडे आणि नुकसानीकडे,लागलेली असते आणि त्याकडे पाहून ती श्रद्धा हंसत असते.आपल्याला पण दुःखाला, हानीला आणि आतंकवादालासुद्धा पाहून हंसता येतं.
विदुषक स्वतःला पाडून घेतो,पण नेहमी उठून ऊभा होतो. हीच तर हास्यप्रदेची क्षमता म्हटली पाहिजे.आपण फिरून प्रोत्साहित होत असतो.ती मुंबईची घटना घडून गेल्याच्या दुसर्‍या दिवसापासून मुंबईकर कामाला लागले.कारण त्यांची श्रद्धा होती की हंसत राहूनच पुढचं कार्य साधत गेलं पाहिजे.
म्हणतात ना शो मस्ट गो,तसंच काहीसं.”

मला दिलेल्या बेसनाच्या लाडवातून दोन लाडू काढून एक मला आणि एक त्यांना देऊन त्यांच्या आईचा जन्मदिन आम्ही साजरा केला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 3, 2010

जादूगार डॉ. बावा.

“माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.”

रघूनाथच्या पायाला वरचेवर सुज यायची हे मला अगदी पूर्वी पासून माहित होतं.पण अलीकडे तो त्या सुजेची तक्रार करीत नव्हता.
त्याचं असं झालं,माझ्या बहिणीच्या मुलाला पण असाच व्याधी झाला होता.तिनेपण त्याच्या सुजेवर बरेच उपाय केले होते.संधिवातामुळे असं होतं म्हणून डॉ.मसूरकरानी तिला सांगीतलं होतं.त्या व्याधीबरोबर आता त्याला आयुष्य काढावं लागणार असंही डॉक्टर तिला म्हणाले.फक्त त्याला आराम मिळण्यासाठी काही औषधं आणि उपाय सुचवले होते.
मी माझ्या बहिणीला म्हणालो,
“रघूनाथला मी विचारून बघतो.त्याचे पाय आता बरे झाले आहेत.त्याने कोणता उपाय केला ते कळेल.”

रघूनाथ मला म्हणाला,
मला अगदी लहानपणापासून एक व्याधी होता.माझ्या दोन्ही पायाचे घोटे थोडे कमजोर होते.माझी आजी मला नेहमीच धरधावून सांगायची की,
“त्या घोट्यांना दुखापत करून घेऊ नकोस,तुला संधिवात -आर्थाइटिस सारखं- दुखणं होईल.काळजी घे”

सांध्यांची हालचाल झाल्यावर येणार्‍या हाडातल्या आवाजावर खास असं औषध नाही.आणि काही मुलं बोटं मोडून करीत असलेला आवाज ऐकायलाही गमतीदार वाटतो.
पण माझ्या आजीचं ते म्हणणं माझ्या मनावर नकळत दीर्घकाळ छाप ठेऊन राहिलं.पुढेमागे ही व्याधी वाढण्याची शक्यता झाल्यावर माझ्या आजीचा तो सल्ला इतका पोरकटासारखा धुडकावून लावण्याजोगा न व्हावा एव्हडंच मी मनात म्हणायचो.”

“पण मग तू बरं व्ह्यायला काय उपाय केलास?”
मी आतुरतेने रघूनाथला विचारलं.

“ती पण एक गंमत आहे.आणि योगायोग आहे”
असं सांगून म्हणाला,
“ह्या प्रसंगाला सामोरं यायला माझी ती आतुरतेने वाट पहात राहिलेलो दिल्लीची ट्रिप मला भोंवली.
त्याचं असं झालं,दिल्लीच्या करोलबागच्या बाजारात मी विन्डो-शॉपींग करीत जात असताना अपघाताने एका मातीच्या ढिगार्‍यावर धडपडून माझ्या पायाच्या घोट्यांना दुखावून घेतलं.पाय थोडा सुजला.मी माझ्या वडीलांना फोन करून माहिती दिली.त्यावेळी माझे वडील कोकणात होते.त्यांनी मला सल्ला दिला की मुंबईला परत आल्यावर प्रिन्सेसस्ट्रिटवर पारशी अग्यारी जवळ एक डॉ.बावा म्हणून पारशी माणूस आहे.त्याला तुझा पाय दाखव.पुढे
जाऊन त्यांनी मला त्यांच्याच एका मित्राची गोष्ट सांगीतली.त्याच्या पाठीत खूप दुखायचं.खूप उपाय आणि औषध-पाणी करून झालं.शेवटी तो कुणाच्या तरी सल्ल्यावरून ह्या पारशी डॉक्टरकडे गेला.एक्सरे वगैरे न घेता, त्याने त्याची पाठ हाताने चाचपून पाहिली.आणि नंतर त्याला ओणवं बसायला सांगून त्याच्या पाठीवर आपला उजवा पाय जोराने दाबून मग उठायला सांगीतलं.खरंच चमत्कार म्हणजे त्याची पाठ दुखायची थांबली.
अशीच त्यांनी त्यांच्या आणखी एका मित्राची कथा सांगीतली.
तो ह्या डॉ.बावाकडून कसा बरा झाला ते सांगीतलं.”

“मुंबईसारख्या शहरात राहून अशा उपायावर तुझा विश्वास कसा बसला?”
मी रघूनाथला निक्षून विचारलं.

“मुंबईसारख्या शहरात राहिल्याने,माझ्या सारखा एखादा, आपोआप नैतिकदृष्ट्या छिन्नमनस्कता असलेला असूं शकतो.आणि त्याच्या वृत्तित शास्त्रीयदृष्टीने केलेले उपाय आणि अशास्त्रीयपद्धतिने केले जाणारे उपाय ह्याबद्दल चौकसपणा आल्याने अशा प्रकारच्या उपायांच्या फलश्रुतिबद्द्लचा दावा प्रश्नचिन्हात नेण्याकडे त्याचा कल जाऊ शकतो.असे उपाय इतके संदिग्ध असतात की,
“हे औषध महिनाभर घेतल्यावर तुमचं वजन वीस किलोने कमी होईल”
अशा पद्धतिच्या जाहिराती सारखं होईल.”
रघूनाथ मला म्हणाला.

“पण इतर शहरी डॉक्टरचे उपाय,पायाला बर्फ चोळण्याचा आणि पाय बरा होई तोपर्यंत कुबड्या वापराण्याचाच सल्ला देण्या व्यतिरिक्त काही सांगणार नाहीत.हे माहित असल्याने,त्यापेक्षा डॉ.बावाच्या उपायाला तू स्वीकृति देण्याचा विचार केलास की काय?
मी रघूनाथला आतूरतेने प्रश्न केला.

“अगदी बरोबर”
असं म्हणून तो मला म्हणाला,
“डॉक्टर बावाच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा होता.बहुदा तो चष्मा बाबा आझमच्या काळात घेतलेला असावा. त्याच्या अंगात तलम आणि झीरझीरीत सफेद पैरण होती.पायात जाड पट्ट्याची चप्पल होती.मला, समोर ठेवलेल्या स्टूलावर बसायला सांगून आपण एका वेताच्या खूर्चीवर बसला.माझ्या पायाचा सुजलेला घोटा त्याने क्रमबद्ध पद्धतिने तपासून पाहिला.आणि जाहिर केलं की माझ्या पायचं हाड वगैरे काही मोडलेलं नाही.
त्यानंतर त्याने एका चिनीमातीच्या भांड्यात तीव्र वास येणारी पावडर टाकून,घोटून घोटून त्याची पेस्ट बनवली. भांड्यात ती पेस्ट मांजराच्या विष्टेसारखी दिसत होती.ती पेस्ट आपल्या बोटांनी काढून एका केळीच्या पानाच्या तुकड्यावर एखाद्या निष्णात अनुभवी माणसासारखी लावली. आणि ते पान माझ्या पायाच्या घोट्यावर ठेऊन चापचापून धरून बॅन्डेज केलं. आणि अशीच दोन तिन वासमारणारी केळीच्या पानामधे ती पेस्ट घालून तयार
केलेल्या पुरचूंड्या मला देऊन,चार चार तासांनी प्रत्येक पुरचूंडी गरम करून अशीच पायाला चपापून लावायची माहिती दिली.
डॉ.बावाने केलेल्या मदतिबद्दल मी त्याचे थॅन्क्स मानले.त्याना दोनशे रुपये- त्याने दिलेल्या ट्रिटमेंटचे म्हणून- दिले.”

मी हे ऐकून माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि त्याला म्हणालो,
“किती दिवसात गूण आला?”

“पुढे ऐकतर खरं.”
माझ्या कपाळावर आलेल्या आठ्यांकडे बघून रघूनाथ हंसत म्हणाला,
“त्याच्या दवाखान्यातून अक्षरशः लंगडत,लंगडत माझं घर गाठलं.खरंच सांगायचं तर, ह्या घटनेमुळे माझ्या मनात झालेला गोंधळ आणि मनाला लागलेला धक्का बराचसा जबरदस्त होता.शहरी डॉक्टरकडून उपाय करून घेणार्‍या मला ह्या घरगुती उपाय करणार्‍या डॉक्टरला प्रश्नावर प्रश्न करून- उपाय करून घेण्यापूर्वी- त्याच्याकडून उत्तरं घेता आली असती.पण मात्र,
“शहरात रहाणार्‍या ह्या अर्धवटांना घरगुती उपायाचं महत्व काय माहित असणार?”
अशी त्याच्या मनातल्या मनात आलेली शंका,उघडपणे नविचारतां,मारक्या नजरेने माझ्याकडे बघून,ती निर्देश करून घेण्याची मला माझ्यावर पाळी आणावी लागली असती.किंवा,
“माझ्या दवाखान्यातून खाली उतर”
असं रागाच्या भरात त्याने मला सांगीतलं असतं, तर ते ऐकून घ्यावं लागलं असतं.

पण अहो चम्तकार ऐका.मी सकाळी माझ्या बिछान्यातून उठल्यावर,माझं लंगडणं सोडाच,मला दुखायचंही बंद झालं.डॉ.बावाने लावलेलं बॅन्डेज पायावरून दूर केल्यावर माझ्या घोट्यावरची सुजसुद्धा पशार झाली.त्याने दिलेल्या पुरचूंड्याचा दुसर्‍या दिवशी त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे उपाय केल्यावर,तिसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर बॉलिवूडचं नृत्य करण्या इतपत माझी तयारी झाली होती.”

मी रघूनाथला म्हणालो,
हेच दुखणं शहरी डॉक्टरकडून उपाय करून बरं करायला तुझे तिन आठवडे गेले असते, डॉ.बावाच्या उपायाने तू तिन दिवसात बरा झालास.”

“आज तागायत मी निष्टापूर्वक डॉ.बावावर विश्वास ठेवायला लागलो.त्यानंतर मी अनेकदा त्याच्याकडे उपाय करण्यासाठी म्हणून गेलो असेन.
माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.”

नचूकता,मी रघूनाथकडून त्या डॉ.बावाचा पत्ता घ्यायला विसरलो नाही हे उघडच आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 31, 2010

मला पुस्तकातला किडा म्हटलं तरी चालेल.

“ज्ञान मिळवण्यातली खरी मजा ही की,ते तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेऊ शकणार नाही.”

मधूकर ह्यावेळी बारावीत पहिल्या दहात आला असं मला माझा मित्र रमेश पराडकर यांनी फोन करून आपल्या मुलाबद्दल सांगीतलं,तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो.
त्याचे बरेच मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमले होते.त्याच्या कामगीरीची स्तुती करीत होते.मला ते बघून मधूकरबद्दल अभिमान वाटला.
सर्व सोहळा संपल्यावर मधूकर,त्याचे वडील आणि मी,गप्पा मारीत बसलो होतो.

मी मधूकरला म्हणालो,
“तुझे बाबा मला नेहमी म्हणायचे,की तुला सर्वजण पुस्तकातला किडा म्हणून चिडवत असतात.आणि त्याची तुला कधीही खंत नसायची.तू आता दाखवून दिलंस की, खणखणीत यश मिळवण्या्साठी किती परिश्रम घ्यावे लागतात. पुस्तकाचा किडा झाल्याशिवाय हे कसं शक्य होईल.”

मधूकर चेहरा आनंदीत करून अभिमानाने मला म्हणाला,
“हो! मी म्हणतो पुस्तकीकिडा.सर्व साधारणपणे पुस्तकातल्या किड्याबद्दल गैरसमज असा असतो की,त्यांच्या डोळ्यावर जाड ढापणं असतात,कंबरेला पट्टा असतो,दिलीप प्रभावळकरच्या भुमिकेतल्या बावळटासारखे दिसणारे ते असतात.आणि ते शिकत असताना काय करतात तर,पुढच्या वर्गाचा अभ्यास करतात,टीव्हीवर नेहमी डिस्कव्हरी चॅनल पहात असतात,मुलींनकडे वळून पण पाहत नसतात,आणि त्यांच्या जवळ नेहमीच पॉकेट कॅलक्युलेटर असतो.
काहींच्या बाबतीत हे खरंही असेल.आणि जे स्वतःची असली छबी अभिमानाने प्रदर्शीत करतात ते करो बाबडे!.”

मला त्याचं हे म्हणणं ऐकून वाईट वाटलं.मी त्याला म्हणालो,
“मला विचारशील तर तुमच्या सारखी हुशार मुलं,प्रत्यक्षात मात्र मनाला लावून घेत नाहीत.गुप्तता बाळगतात.आणि सांगायचं झाल्यास,वेळात वेळ काढून अभ्यास करण्याची तुमच्यात गुप्त क्षमता असते,तुम्ही वर्ग संपल्यानंतर गुरूजींना प्रश्न विचा्रता,तुम्हाला किती गुण मिळाले ते कुणाला सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि प्रत्यक्षात छुप्या पद्धतिने एकप्रकारे अभ्यास करण्यात मजा घेत असता. तुमचं हे वागणं कुणाला रुचलं जाणार नाही अशा लोकांत तुम्ही पुस्तकीकिडा असल्याचं प्रकट करून दाखवता.वयक्तिक दृष्ट्या मला त्यात काही गैर वाटत नाही.”

माझं म्हणणं ऐकून मधूकरचा चेहरा आनंदाने प्रफूल्लीत झाला.मला म्हणाला,
“मलाच मी प्रश्न विचारण्यात सदैव दंग असतो.माझी दृष्टी कमजोर असल्याने मी सदैव चष्मा वापरतो, पुढच्या वर्गात जाण्याची तयारी करीत असतो कारण माझ्या आईबाबानां तेव्हडाच शिक्षणाचा खर्च कमी यावा म्हणून,कॅलक्युलेटर वापरतो कारण मी काही आयीनस्टाईन नाही,अभ्यासात दंग असतो की लवकरात लवकर मी पदवीधर व्हावा म्हणून. त्याशिवाय वेळोवेळी पुस्तकं वाचत असतो कारण माझं ज्ञान वाढत असतं,रोज नवीन नवीन शिकायला मिळाल्याने ते शाळेत किंवा जीवनात नवीन उद्भवणार्‍या प्रश्नापासून सूटकारा देत असतं.

भरपूर परिश्रम घेऊन जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं असं मला नेहमीच वाटत असतं.
जॉब असो,खेळ असो किंवा आणखी कुठचाही उपक्रम असो त्यांना सामना करताना चांगला दर्जा ठेवून काम करावं असं मला वाटत असतं. पार्ट्यांना जाऊन वेळ दवडण्यापेक्षा मला ह्यात स्वारस्य आहे.”

“पुस्तकं वाचत रहावं की पार्ट्यांना जावं यात काय निवडावं ह्याचं विवरण करावं असं तुला वाटणं सहाजीक आहे.
आलेला प्रत्येक हताश करणारा क्षण,एक,एक पावलाने तुला तुझ्या ध्येयाकडे नेत असतो असं मला वाटतं.
वाचलेलं प्रत्येक पुस्तक,क्रिकेट खेळातल्या कौशल्यापेक्षा, तुझी प्रगति करीत असतं,जर तू गावस्कर किंवा तेंडूलकर नसालस तर.”
मी मधूकरला म्हणालो.

“जास्त करून,हे सर्व संपादन करण्यात अटकाव आणायला माझा मीच कारणीभूत होण्याचा संभव आहे.
कुणीतरी म्हटलंय ते मला आठवतं की,
“ज्ञान मिळवण्यातली खरी मजा ही की,ते तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेऊ शकणार नाही.”
मधूकर मला म्हणाला.

“म्हणूच तुला कुणी पुस्तकातला किडा म्हटलं तरी चालण्यासारखं आहे.”
उठता उठाता मी मधूकरला शुभेच्छा देत म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com