Sunday, June 29, 2008

ठाम मताचे आमचे बंडूतात्या.

तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं.
मला एकदा म्हणाले,
"ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही."
मी त्यांना म्हणालो,
"बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?"
अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात.
जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण
"मला तितका काय गंध नाही"
असं म्हणता म्हणता तात्या, त्या विषयावर आपलं ठाम मत द्दायला विसरत नसत.
वकिलांच्या घोळक्यात सामावून घेण्यासाठी त्यानी एकदा काळा कोट शिवून घेतला होता.आणि तो कोट घालून ते चक्क कोर्टात जात असत.इतर वकिल तात्याना ओळखत असल्यामुळे ते त्याना काही म्हणत नसत.
"काळा कोट घातला तर कायद्दाने त्यात ऑबजेक्षन कसलं?"
असं मला एकदा त्यानी मी पृच्छा केल्यावर सांगितलं.

वकिल लोकांच्या घोळक्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकून संध्याकाळी दाजीकाका,भाऊसाहेब देसाई,शिर्के फौजादार वगैरेंच्या घोळक्यात त्यांच्या बरोबर तळ्यावर जावून बसत.आणि ऐकलेल्या कोर्टातल्या केसीस समजावून सांगत.
इंग्रजीचा गंधही नसलेले बंडूतात्या हातात नेहमी टाईम्स ऑफ इंडिया घेवून फिरत.
एकदा अशीच गम्मत झाली.ह्या तळ्यावरच्या घोळक्याला बंडूतात्या म्हणाले,
"आज टाईम्सने जळजळीत अग्रलेख लिहिला आहे"
दाजीकाकाना हे तात्या सांगतात ह्याचा राग आला.ते त्याना म्हणाले,
"अर,तात्या तुला इंग्रजीचा गंध नाही.ए बी सी अक्षराची " ** " वर का खाली ते तुला माहित नाही.आणि तो अग्रलेख
जळजळीत लिहिला आहे असं म्हणतोस कुणावर इंप्रेशन मारतोस रे?
वकिलाचा कोट घातलास म्हणून काय वकिल झाला नाहिस.ते मारतात त्या गप्पा ऐकतोस आणि आम्हाला येवून सांगतोस. आम्ही का टाईम्स वाचत नाही असं तुला वाटतं का?"
हे दाजीकाकाचे उद्गार ऐकून बंडूतात्याने पळच काढला.

वर म्हटल्या प्रमाणे बंडूतात्याची खाशियत म्हणजे
"ह्या विषयात मला गंध नाही"
असे म्हणून सुद्धा त्या विषयावर आपल्या टिकेने कुणालाही डिवचणं सोडत नाहीत.
साहित्यात टिका मग ती कविता असो की लेख असो.
संगीतात टिका मग ती चालीवर असो की गाण्यावर असो.

अलीकडे एक गम्मतच झाली.गावात कुस्तीचे फड होते.बाहेरून किंगकॉंग नावाचा एक मल्ल आला होता.
कीडकीडीत असून सुद्धा तात्या त्याच्या बरोबर कुस्ती करणार म्हणून हट्टाला पेटले.
एक फटक्यात किंगकॉंगने तात्यांची पाठलावून चित केलं.
हार न मानता ते किंगकॉगला म्हणाले,
"पाठ लावलीस पोट कुठे लावलेस.?"
किंगकॉगने दुसऱ्या क्षणी, फटक्यात पोट लावलं.
हार न मानता परत ते किंगकॉंगला म्हणाले
"पोट लावलंस पाठ कुठे लावलीस?"
किंगकॉंगने हवं तेच केलं
पण कीडकीडीत पेहलवान-बंडूतात्या- हार मानायला तयार नसल्याने काय करणार?
कारण एकाच वेळी पोट आणि पाठ लावल्याशिवाय मी हार मानणार नाही असं त्यांच ठाम मत होतं.
एकाच वेळी पाठ आणि पोट लावणं शक्य नाही त्यापेक्षा तुच जिंकलास असं समजून
किंगकॉंगने ही त्याची अट ऐकून कुस्ती खेळायलाच माघार घेतली.
सारांश,
आमच्या ठाम मत असलेल्या बंडूतात्यांचं हे असंच आहे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 28, 2008

का लपवूनी ठेविसी तुझे गुपित

पाहिले जेव्हा मी तुला
मन माझे गेले हरवूनी
धडधडून तेव्हा सागे ते मला
प्रीती जडली लपुनी छपुनी
ओठ ही सांगती मला
मन माझे गेले गुंतूनी

हकीकत माझी कशी तुला सांगू
आहे कोण मी ते कुठवर लपवू

का लपवूनी ठेविसी तुझे गुपित
प्रयत्न करूनी झाले सर्व मला माहित
जागो जागी आणुनी शब्द जिव्हेवर
सांगतील सर्वां अपुल्या प्रीतिचे गुणगान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 26, 2008

आतला आवाज

“मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.”
अशोक त्या दिवशी माझ्या घरी मुद्दाम म्हणून आला होता.त्याचे वडिल अलीकडेच निर्वतले होते.त्यांचे काही फोटो आणि त्यांनी जाण्यापुर्वी माझ्यासाठी काही पुस्तकं वाचायला म्हणून ठेवली होती.ती तो घेवून आला होता.त्याच्या वडिलांची चौकशी केल्यावर तो म्हणाला.

“हाताच्या बोटावर मोजले जातील एव्हड्याच तुमच्यासारख्या काही लोकाना माझ्या ह्या गोष्टी बद्दल माहित असावं.माझ्या वडिलाना असा एक असाध्य रोग झाला होता की त्यांचे सर्व स्न्यायु तो रोग हळुहळु आत्मसात करीत होता की ज्यामुळे ते नंतर नंतर चालू पण शकत नव्हते.
ती घटना एक आयुष्याला वेळण देणारी होती.

त्या घटनेमुळे मला कुठचच कायम स्वरुपाचं निर्णय घेण्यासारखं उदाहरण शिकवून जात नव्हतं.उलट त्या सर्व घटनने मी पुरा गोंधळून गेलो की कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये.
आणि ही माझी सर्व हकिकत माझ्या वडिलांच्या निर्वतण्याच्या घटनेकडे जास्त केंद्रित नसून माझ्या आई बद्दल आहे.मला माझ्या आतल्या आवाजावर खूप विश्वास आहे. माझे वडिल त्या आजाराने पछाडले असताना देव माझ्या आईची सत्व परिक्षा घेत होता असं मी म्हणेन.किंबहूना मी म्हणेन आजाऱ्यापेक्षा सुश्रुषा करणाऱ्याचीच नेहमी त्रेधा होत असते. स्वतःच्या जीवाची देखभाल करून झाल्यावर त्या आजाऱ्याची पण देखभाल करणं म्हणजे एकाच व्यक्तिला दोन व्यक्तिचं काम करण्यासारखं आहे.आणि ते सुद्धा किती दिवस करावं लागेल हे माहित नसताना.

वडिल आजारी पडून घरी असल्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागायची.रोज कामावरून घरी आल्यावर तिला जेवण शिजवावं लागायचं.माझ्या वडिलाना तिला भरवूं लागायचं कारण स्वतःहून जेवण्याची त्यांची क्षमताच गेली होती.रात्री रात्री माझी आई जागरणं करायची कारण झोपेतही कदाचित ते घुसमटतील असं तिला वाटायचं.सकाळी उठून घरची कामं करून कामावर जायचं असलं तरी ती त्यांना आराम मिळावा याची पराकाष्टा करायची.
अखेरच्या दिवसात आपल्याला हॉस्पिटलमधे दिवस काढावे लागू नयेत ह्या वडिलांच्या एकच इच्छेकरता माझी आई तसे घडुनये म्हणून तिच्या मनातल्या भिती शी दोन हात करीत होती.

माझे वडिल खूप स्वाभिमानी होते.त्यांच्या त्या झुरत झुरत जाण्याच्या अखेरच्या दिवसात कुणी भेटायला येवू नये असं त्याना मनोमनी वाटत होतं.पण माझी आई त्यांच्या मनाविरुद्ध जावून त्यांच्या जुन्या मित्रांना बोलावून त्यांना माझ्या वडिलांचा अखेरचा निरोप घेण्याची संधी दिल्यावाचून राहिली नाही.आणि माझ्या वडिलानी जरी उघड उघड कबूल केलं नाही तरी प्रेत्यक मित्राची झालेली भेट त्याना खूप आनंद देवून गेली.
माझ्या आईने माझ्या वडिलांसाठी घेतलेली मेहनत पाहून माझ्या लक्षात आलं की तिने कंबर कसून एकट्या आधारावर त्यांची सेवा करून तिला जमेल तेव्हडं त्यांना जगूं देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता माझी आई आरामात आहे.आता ती माझी काळजी घ्यायला लागली आहे.माझी आणि माझ्या वडिलांची ते आजारी असताना काळजी घ्यायची तशीच.निर्वतण्यापुर्वी माझ्या वडिलानी तिला सुचवलं होतं की त्यांच्या पश्चात ती माझी वडिलधारी म्हणून असणार.जरी ती माझे वडिल नसली ती जास्तित जास्त त्यांच्या सारखी वाटते.मधून मधून मला ती तशी गमतीत आठवण करून देते.मला जमेल तेव्हडी मी माझ्या आईला मदत करीत असतो.ती मला नेहमीच म्हणते की मला पाहून तिला माझ्या वडिलांची आठवण येत असते.

मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.”
त्याचं हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
“किती सत्य हा बोलतो. ह्या जगात किती लोकना कस कसले प्रॉबलेम असतात.”

श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 24, 2008

परि तुज सम आहेस तूच

लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच


वहा रे! ते नजर फेकणे
वहा रे! ते नखरेल चालणे
कसा सावरू सांग माझे भूलणे

हा केशभार की काळे घन समजू
हे नयन तुझे की लख्ख बिजली समजू
कुणा कुणाला देशिल असली सजा
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच

तुही सुंदर ऋतु ही सुंदर असे
माझे मन माझ्या काबूत नसे
शांत परिसर करितो माझी दुर्दशा
पिण्या वाचून चढली मला नशा
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच


अबोल झालीस तू जर सजणे
टाळिन माझे मीच मरणे
आहेस जरी तू परी वा सुंदरी
कशास ठेविसी अशी मगरूरी
दाखविशील का किंचीत जरूरी
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 22, 2008

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.”

बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे.
त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती.
आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे. पास्क्ल,मेरी आणि त्यांची दोन मुलं टिम आणि ज्युली मिळून हा परिवार वहिनीच्या घराच्या जवळ शेजार म्हणून त्यांचा जाण्यायेण्याच्या वहिवाटीत होता.
टिम आणि ज्युली मोठी झाली आणि त्यांची लग्नं पण झाली होती.टिम इंग्लंडला कायमचा राहायला गेला होता.नोकरीच्या निमीत्ताने प्रथम तो तिकडे गेला आणि तिकडेच एका मुलीशी ओळख होवून तिच्याशी लग्न करून राहत होता.त्याला एक लहान मुल पण होतं. कधी तरी पास्क्ल आणि मेरीला त्यांच्या आईवडिलाना भेटायला म्हणून येत असायचा.हल्ली खूप वर्ष तो आला नाही म्हणून मला पास्कल ह्यावेळी भेटला त्यावेळी सांगत होता.
ज्युली प्रथम पासूनच चर्चच्या सेवेत राहून आता ती एक चांगली नन झाली होती आणि मुंबईला कुठल्याश्या चर्च मधे राहत होती.ती मात्र वरचेवर आईवडिलाना भेटायला येत असते.

ह्यावेळच्या माझ्या गोव्याच्या भेटीत पास्कलकडे एक पाच सहा वर्षाचा मुलगा मी पाहिला.
“हा कोण? “
म्हणून मी सहजच मेरीला विचारल्यावर मला म्हणाली “आमचा नातू” मला जरा नवलच वाटलं कारण त्यांच्या दोनही मुलाना मुल झालं असतं तर एव्हडं मोठ मुल नसतं.माझ्या तोंडावर आश्चर्य झाल्याचा भाव बघून मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“ती एक आमच्या आयुष्यातल्या होणाऱ्या घटनेतली एक अशीच घटना आहे.”
आणि मग ती दोघं बसून मला सांगू लागली,
“तू इकडे बरेच दिवस आला नाहिस.आम्ही लुकसला चार वर्षापुर्वी आमच्या घरी आणून ठेवला.त्यावेळी तो अर्थात दोन वर्षाचा होता.त्याचे आईवडिल सुद्धा मासे मारिचा धंदा करायचे.त्या वर्षी गोव्याला खूप पाऊस लागला होता.आणि तशांत एक मोठं वादळ येवून बऱ्याच लोकांच्या होड्या मासे मारायला गेले असताना समुद्रात बुडाल्या होत्या.त्यात लुकसची आई आणि वडिल सापडले.खूप शोध करून सुद्धा ते मिळाले नाहीत
हे लहान मुल पोरकं झालं आमच्याकडे ठेवून ते नेहमी समुद्रात जात.रोज संध्याकाळी घरी परतल्यावर आपल्या घरी ह्याला घेवून जात.त्यानंतर ती संध्याकाळ कधी आलीच नाही.
आईवडिलांची वाट पाहून त्यादिवशी लूक खूप रडू लागला.त्यांची आठवण काढून त्याने घर डोक्यावर घेतलं.हात पाय आपटत जमिनीवर लोळायला लागला.
मेरी म्हणाली,
“मला तो सीन अजून आठवतो.मी त्याला घट्ट जवळ घेतलं त्यामुळे त्याला हातपाय आपटायची संधी दिली नाही.अर्ध्या एक तासाने तो माझ्या जवळच रडून रडून थकून झोपला.मी पास्कलला एका थाळीतून भात आणि माश्याची करी आणायला सांगितली.ज्यावेळी तो उठला त्यावेळी माझ्याकडे बघून परत हुंदके देत देत रडायला लागला.मी ती थाळी जवळ आणल्यावर लूक रडायचा थांबला आणि चमच्याने हळू हळू जेवू लागला.
पोट फुटेल एव्हडा तो जेवला.आणखी मागून मागून जेवला.
ती रात्र पौर्णिमेची होती.आम्ही दोघं त्याला घेवून समुद्रावर गेलो.चंद्राकडे बघून हातवारे करून मला दाखवू लागला.

मी म्हणाले,
“काय आहे ते? चंद्र आहे तो चंद्र”.
जणू चंद्राला हात लावायच्या प्रयत्नात असल्या सारखं हात वर करीत होता.परत त्याने रडायला सुरवात केली.हळू हळू परत आम्ही घरी आलो. त्याला आंघोळ घालताना परत रडायला लागला.मी त्याला आंघोळ घलता घालता त्याच्या बरोबर पाण्याशी खेळायला लागले.आंघोळ संपेपर्यंत खोलीत पाणीच पाणी झालं आणि तो खुदखुदून हंसत राहिला.मी त्याच्या अंगाला पावडर लावली आणि तो पर्यंत पास्कलने बाजारात जावून त्याच्यासाठी नवे कपडे आणले ते चढवले.नंतर तो आणि मी मिळून एक चित्राचं पुस्तक घेवून पहात होतो. तो त्या पुस्तकाची पानं परतायला लागला.शेवटी एका पिवळ्या वाघाकडे बघून “वाघ,वाघ”असं पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी पास्कल पोलिसाला घेवून आला आणि त्याचा रीतसर आम्हाला ताबा मिळावा यासाठी त्याचे कागद पत्र तयार करू लागला.पोलिसाना पाहून लूकस माझे हात त्याच्या कंबरेशी घट्ट गुंडाळून मला बिलगून बसला.हे पहिले दिवस असे गेले.त्यानंतर तो बापुर्डा आणि लाजवट राहू लागला.थोड्याश्या कारणावर रडायचा आणि गप्प एका कोपऱ्यात जावून बसायचा.जेवण दिल्यावर मोठ्या कष्टाने खायचा.
आईवडिल दिसत नाहित ह्या शॉकनेच जणू तो बापुर्वाणा व्हायचा.मला त्याच्या त्या परिस्थितिला बघून खूप रडू यायचं.
आता तू पहातोस त्याला तो सहावर्षाचा स्मार्ट,आनंदी पहिल्या वर्गात शिकत असलेला मुलगा दिसतो.त्याच्या चेहऱ्यावर सदाचं हंसू असतं आणि वर्गात चांगला शिस्तीत वागतो असं त्याची टिचर सांगते.अभ्यास लक्ष देवून करतो.आमच्या घरी येणारे त्याला बघून म्हणतात खूपच सुखावलेला दिसतो.
मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मनात येतं,आणि आश्चर्य वाटतं की हे असं त्यावेळचं आईविना पोरकं मुल असं कसंबदललं.त्यासाठी काही डॉक्टरी उपचार,मानसशास्त्रज्ञ किंवा काही औषोध उपचार करावे लागले नाहित.आम्हाला आशा गोष्टीवर त्याच्यासाठी काडीचा पण पैसा खर्च करावा लागला नाही.
फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती.
प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

Saturday, June 21, 2008

करिन मी तुजवर प्रीति

छोट्या छोट्या रात्री
होत जातात लांब लांब
धावत पळत जाणाऱ्या झोपेला
सांगू कसे मी जरा थांब थांब

मनात माझ्या बेचैनी
प्रतिक्षा माझ्या नयनी
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति

भोळा खूळा अशी माझी महती
नको विचारू मज इच्छा कोणती
घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत
वाटे मला मी वसतो स्वर्गात

फुलासम खुलुनी मन देई सुगंध
स्पर्षूनी तुझ्या कायेला होई ते धुंद
निष्काम होवूनी सोडिल ते दोस्ति
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति

झेप घेई मन आकाशी पक्षि होवूनी
स्वप्नी शोधे मंझिल घिरट्या घेवूनी
स्वप्ने स्वप्नेच असली जरी
होतात ती खरी कधितरी

डोळे राहूनी उघडे पाहू लागती स्वप्ने
करिती प्रतिक्षा होईल का कुणीतरी अपुले
हताश होवूनी नजरेत दिसेल सुस्ति
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 19, 2008

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

“ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात”

आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले,
“ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.”
तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो,
“वृंदा, मला एक तू सांग त्या दिवशी माझं आणि प्रो.देसायांच “दुःखात सुद्धा आनंदाची छटा असूं शकते” ह्या विषयावर चर्चा झाली होती.त्यावर प्रो.देसाई मला म्हणाले की,
” वृंदाने मला एक कल्पित गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली होती.ती मला जशास तशी आता आठवत नाही.पण पुढल्या आठवड्यात ती आमच्या घरी येणार आहे तिलाच तुम्ही ह्या विषयावर बोलायला सांगा.ती तुम्हाला ती गोष्टही सांगिल आणि ह्या विषयावर आनंदाने आणि विस्ताराने बोलेल.”

त्याचा संदर्भ देवून मी वृंदाला म्हणालो,
“तुम्ही दोघेही प्रोफेसर असल्याने तुमची विचार करण्याची पातळी थोडी वरची आहे तेव्हा मला जरा विस्तारानेच सांग”
हे ऐकून वृंदा म्हणाली,
“दुःखाला उंची माहित नसते ना खोली.ती एक प्रकारची अंतरातली योग्य भावना आहे.योग्य हा शब्द त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने घेतला गेला पाहिजे.
कदाचित कुणी म्हणेल की,
“दुःखाची भावना असणं योग्य आहे असं म्हणणं म्हणजे शुद्ध मानसिक हतबलता असावी.”
पण ज्या काहीना दुःखाचा अनुभव आला आहे त्यानाच त्या भावनेच्या योग्य-अयोग्यतेचं महत्व समजणार. जवळचं माणूस गेल्याने नाजूक मनस्थिती असताना धक्का बसवू देणारं दुःख, हे योग्य दुःख आहे असं म्हटलं पाहिजे.
वृंदा पुढे म्हणते,
“अलीकडेच एक विख्यात व्यक्ति जे म्हणाली ते ऐकल्यावर माझ्या म्हणण्याला थोडी पुष्टी येते.ते त्या व्यक्तिचं म्हणणं खोलवर जावून विचारात घ्यायला हवं.”
ती व्यक्ती म्हणते,
” मी आता आपल्या मनाला कसं वाटून घ्यायचं ते शिकलो.जे काही वाटत असेल तसंच वाटून घ्यायचं. मग त्याच्या मागे कसल्याही भावना असल्यातरी. एव्हडंच की त्याला विरोध करायचा नाही. जे लोक सांगतात की ज्याना भावना वशच करीत नाही ते असं सांगून स्वतःशीच प्रामाणिक राहून बोलत नाहीत.”

भावनेशी जागृत असणं,म्हणजेच त्या वेळी वाटणाऱ्या भावनेशी जीवंत असणं,आणि ती भावना समजावून घेणं. दुःख,मानसिक धक्का किंवा दुःखावेग हे पण भावनेचेच प्रकार आहेत. ते प्रकार मनात आहेत असा भास होत असतो,ते मनात राहतात आणि मनातून निघूनही जातात.
एका विशीष्ट प्रकारे मनाला लावून घेणं- केवळ तसं लावून घेणं हे इतराना बरं वाटावं म्हणून जर असेल- तर अशा प्रकारच्या वागण्याने माझ्या मनावर खूप मोठा पगडा येतो. म्हणून मला जसं वाटतं तसंच वाटून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.त्यामुळे माझ्या आणि इतरांच्या विचार-स्वातंत्र्याचा परिणाम माणसाच्या भावनेविषयी विचार केल्यावर तो परिणाम कसा असू शकतो ह्याच नीट आकलन व्हायला मदत होते.
असं एकदा का असल्या पगड्या पासून निराळं राहण्याचं स्वातंत्र्य घेतलं की आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो, आणि दुःख होत असताना त्या दुःखाचीच ही दुसरी बाजू असावी असं वाटतं. हे गणीत असंच काहिसं जुळतं.”
हे त्या व्यक्तिचं म्हणणं सांगून झाल्यावर वृंदा पुढे म्हणाली,
अशीच आणखीन एक दुसरी व्यक्ति, तिच्यावर आलेल्या प्रसंगाची चर्चा करीत असताना त्या प्रसंगामुळे झालेल्या दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला मिळाल्यावर म्हणते,
“दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला असुंच शकत नाही.कारण दुःख ही न थांबणारी क्रिया आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो ती व्यक्ति निर्वतल्याने, झालेल्या दुःखाला खंड आणूच शकत नाही कारण त्या व्यक्तिवर आपण सतत प्रेम करीत असतो-त्या व्यक्तिवर प्रेम करण्याची आपली क्रिया-सतत चालूच असते.”
हे सांगून झाल्यावर वृंदा म्हणते,
” ह्या ही व्यक्तीचं म्हणणं ऐकून माझ्याच म्हणण्याला परत दुजोरा मिळाल्या सारखं वाटतं.
आपल्या भावना सहन करताना त्या कितीही क्लेशदायी अथवा आनंददायी असल्या तरी त्या भावनां जागृत ठेवून आपल्यावर आणि इतरांवर विश्वास ठेवून राहण्याचं स्वातंत्र्य घेता आलं पाहिजे.
तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि वाईटही वाटेल की माझ्या मुलाच्या आकस्मिक निधनाने मी पुर्ण एकाकी पडले.मानसिक उपाय करणाऱ्याना मला
उपाय द्यायचे होते,आणि माझ्या मित्रमंडळीना मी ती घटना निमूट स्विकारून आगे बढो असा सल्ला द्यायचा होता.
माझ्या बॉसला तर मी रोजच्या कामाच्याच दृष्टीने दुषपरिणाम न होता काम करीत रहावं असं अपेक्षीत होतं.खरं तर मी पुर्ण वेडी झाली होते.मी मनाने पुर्ण खचली होते.

अशा परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीने मला एका मानसिक उपचार करणाऱ्या आश्रमात नेलं.खरं म्हणजे मला त्या मैत्रिणीने आमंत्रण दिलं नव्हतं.मीच तिची मदत मागितली होती.त्या आश्रमातल्या विद्वान व्यक्तिने
मला खूपच चांगला सल्ला दिला.
तो मला म्हणाला,
“ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता,त्यांचा सन्मान करणं जरूरीचं आहे.त्यांच स्मरण करणं जरूरीचं आहे.त्यांच्याशी संवादात राहणं जरूरी आहे.त्याने तुमच्याशी जवळीक करणं जरूरीचं आहे.”
ह्या शब्दानी माझ्या उभ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.माझं आयुष्य वाचवलं गेलं.मी पुढचा मार्ग काटू शकले.मी माझ्या मुलाला स्मरणात आणू शकले.त्या स्मरणाचा सन्मान करू शकले.
सखोल विचार करण्याचा,अर्थपुर्ण विचार करण्याचा,
भासवून घेण्याचा,मार्ग मला मिळाला.मी खूपच उपकृत झाले.
प्रेम आणि आनंदाबरोबर दुःख सुद्धा आपल्याला जवळ आणतं. न भिता, धरसोडपणा न करता, भावनेशी जागृत राहणं म्हणजेच आपलं आपण होणं.आपल्या अंगातून ह्या योग्य भावना वाहू देणं म्हणजेच ह्या क्षणाला आपण आपलं अस्थित्व जाणणं. ह्या अस्थित्वाच्या सत्याशी प्रातारणा न केल्याने माझी मी म्हणून जगू शकले.
माझ्या मनात विचार येवू लागला आहे की ह्या एकवीसाव्या शतकातलं दुःखाचं आणि अघटीत घटनेचं सांवट जे सर्वांवर आलं आहे ते एखाद्या बाटलीत लोकांच्या भावना जबरदस्तीने इतकी वर्ष दाबून कोंबून ठेवलेल्याचा परिणाम असावा.
मला एका प्रख्यात लेखकाच्या काल्पनीक गोष्टीची आठवण येते.
ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात.दुःखातही तिला आनंद मिळतो,असा ह्या गोष्टीतला आशय आहे.

समाधानाची गोष्ट अशी की जेव्हा आपण दुःखी मनस्थितीत असतो,त्यावेळी सुंदरता आणि आनंदही आपल्या बरोबर असतो तसंच दुःख आणि पिडा ह्यांचही अस्थित्व आपल्या बरोबर असतं. असं समजून राहिल्याने, अशा गोष्टी मनात जागृत ठेवल्यामुळे अंतिम शांतीकडे जावून पोहचण्याचं हे एक पाऊल होणार आहे असं वाटूं लागतं.
हा जागृतीचा मार्ग कधीच संपणारा नसतो.खरोखरीचं दुःख आणि पिडा होते त्याचं खरेपण प्रामाणिकपणे सांभाळून ठेवल्यास,त्या पासून मनाला झालेली जखम लवकर बरी व्ह्यायला पुर्णपणे मनाच्या स्वाधिन व्हायची जरूरी असते आणि तसं केल्याने खरा अर्थ समजण्यासाठी आपलं मन आपल्याला वरच्या पातळीवर आणून ठेवतं.”
हे सर्व एकून मी वृंदाला म्हणालो,
“वृंदा खरंच तू ग्रेट आहेस.तुझं हे चिंतन ऐकून मला पण ह्या वयात काही तरी शिकल्या सारखं वाटलं. प्रो.देसाई ज्या अर्थी मला तुझा विचार ऐकायला शिफारस करतात त्याच वेळी मी समजून गेलो होतो,इथे काही तरी”ग्यानबाची मेख आहे”
“कसचं कसचं”
म्हणत वृंदा गालातल्या गालात हंसली,आणि आम्ही घरी जाययला निघालो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 17, 2008

जखम मनाची ताजी असता

नयन माझे अश्रुनी भरले
सांगशी तू मला हंसण्या
जीवन माझे नैराशाने भरले
सांगशी तू मला ते विसरण्या

दिवस माझे कठिण झाले
काय करू मी आता
मन माझे उचंबळून आले
दाह सहन करता करता
जखम मनाची ताजी असता
दुषणे देतोस कसा आता

कसे बरे जीवनामधे
प्रीति करीती लोक
नावे ठेवूनी सच्छिलतेला
हेवा करीती लोक
विझूनी गेली आग असता
जाळ लाविती लोक

कधी जेव्हा स्वप्ने पाहिली
मिळाली मृगजळे मला
कधी जेव्हा गर्दी पाहिली
मिळाला एकांत मला
चोहोबाजूला धूरच धूरच
वणवा शोधिशी कसा

जखम मनाची ताजी असता
दुषणे देतोस कसा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 16, 2008

तू जवळी रहा आयुष्यभर

तू दे मज साथ जीवनभर
तू जवळी रहा आयुष्यभर

दाखविन मी माझे रंग
तुही दाखवी तुझे ढंग
मग कसली असेल उमंग
अन
कसला होईल अपेक्षाभंग
दिसेल तेव्हा वेगळा आगळा
तुझा नी माझा संगम

आहेस तू सकाळचे किरण
बांधले करकचूनी त्यासी
तुझे न माझे भोळे मन
दूर असूनी नसशी दूर
किती जवळ आहो आपण
तू दे मज साथ जीवनभर
तू जवळी रहा आयुष्यभर

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 14, 2008

फादरस डे

कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे.

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
“माफ करा”असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

“करा माफ”मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर

आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी एक गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या एकाग्रतेचा भंग

“हो बाजूला”
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
मी घेतली मनाशी

पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेऊन ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जाऊन त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता फुलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
“घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो मी तुमच्याकडे
कारण आजच आहे “फादर्स डे”

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून

आवडशी तू मला अन
मुकलो मी तुझ्या
आश्चर्याच्या आनंदाला
दिसलास सुंदर तू फुलांमुळे
होते सुंदर तुझे ते फूल निळे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

दुसऱ्याच्या भावनेची कदर

“म्हणूनच माझा आता पुर्ण विश्वास बसला आहे की दुसऱ्याच्या भावनेची कदर असणं म्हणजेच जसं शंकरने स्वर्गात जाण्यापेक्षा सोन्याशी संबंध ठेवून नरकात जाणं पत्करलं तसं”

काल संध्याकाळी माझा आणि प्रो.देसायांचा विषय त्यांच्या शिक्षक म्हणून कॉलेजात झालेल्या एका घटनेवर चर्चा असा होता.
मी त्यांना सहज म्हणालो,
“भाऊसाहेब तुमचा प्रोफेसर म्हणून इतकी वर्ष कॉलेजात शिकवीत असताना एखादा खास अनुभव आठवून आता मला सांगण्या सारखा एखादा विषय आहे का?”
त्यावर प्रोफेसर देसाई थोडा विचार करून म्हणाले,
“मी दुसऱ्याच्या भावना लक्षात घेवून त्या समजून घेण्याची कदर करतो.ही कदर माझ्या मनात दुसऱ्याला अगदी जवळून न्याहाळून आणि त्याच्याशी जवळीक ठेवून करण्यात माझा विश्वास वाढवते.
मी लेखक आहे तसाच मी शिक्षक पण आहे.माझा सगळा वेळ, प्रश्न समजून घेवून त्याचा दुवा दुसऱ्याशी कसा जुळेल ह्या विचारात जातो.आपल्यात आणि इतरात जो भावनेचा दुवा निर्माण होतो,त्याची निकड दुसऱ्याला समजून घेण्यात असते.
आपल्या विचाराची कल्पकता,दुसऱ्याशी जवळीक ठेवण्याची इच्छा,हे सर्व साधताना आपल्या मर्यादा उलटून जावून,नजर ताजी करून स्वतःकडे आणि जगाकडे नव्या आणि पर्यायी भिंगातून पहाण्याची संवय असावी लागते.”
एव्हडं ऐकल्यावर मी मुद्दामच त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब एखादं उदाहरण देवून सागितलत तर मला जरा कळायला सोपं होईल.”
थोडं गालातल्या गालात हसून मला म्हणाले,
“मला माहित होतं तुम्ही असं काही मला सांगणार म्हणून.दुसऱ्याच्या भावना हे दोन शब्द माझ्या मनात आले की मला नेहमी शंकर आणि त्याचा मित्र-पांडू महाराचा मुलगा- सोन्या यांची आठवण येते.आमच्या गावात- कोकणात- सुखवस्तु पांढरपेश्या लोकांच्या वस्तिला लागून महारवाडा होता. शंकर,सोन्याला आपला जीवश्चकंटश्च मित्र समजायचा.
सोन्याशी मैत्री ठेवायची की नाही असं शंकरच्या मनात यायचं.कारण अशा लोकांशी दोस्ती ठेवणं म्हणजे मेल्यावर नरकात जायला होतं असं त्याच्या कानावर यायचं.
शंकर म्हणायचा,
“माझ्या सुखदुःखात,माझ्या अडीअडचणीत,नाचण्या गाण्यात,बोलण्या फिरण्यात खांद्याला खांदा लावून काम करण्यात सोन्या आणि मी एक्मेकाला धरून असतो.सोन्या पण एक माणूस आहे तो काही जनावर नाही,मग मी त्याच्याशी संबध ठेवल्याने नरकात गेलो तरी बेहत्तर.शंकर धर्म झिडकारत नव्हता.स्वतःच्या पावित्र्या बद्दलची फाल्तु घंमेंड आणि हट्टी वृत्तीला-स्थितप्रज्ञनतेला- झिडकारत होता.
माझ्या प्रोफेसरशीपच्या सुरवातीच्या करियरमधे हा शंकर-सोन्याचा प्रसंग मला प्रकर्षाने आठवला होता.
कॉलेजमधे एक वाद निर्माण झाला होता.त्या वादात मी कॉलेजच्या विरोधात होतो.
त्यावेळी मला एक आश्चर्य वाटलं की माझी बाजू घेणारे माझेच दोन विद्यार्थी होते.खरं तर दुसऱ्या एका प्रश्नावर ह्या दोन्ही विद्यार्थ्याबरोबर माझा वाद झाला होता.परंतु ह्या वादात ते माझी बाजू घेतल्या शिवाय राहिले नाहित.त्यापैकी एकजण एकदा मला भेटला त्यावेळी माझी बाजू घेतल्याबद्दल मी त्याचे आभार मानले.
त्यावर तो विद्यार्थी मला म्हणाला,
“सर,आपल्याला वाटतं तेव्हडे आम्ही हट्टी नाही.पुर्वी जरी आपल्यात वाद झाला तरी ह्या कॉलेजच्या वादात आपली बाजू स्तुत्य आहे.सर,आपणच आम्हाला शंकर-सोन्याची गोष्ट वर्गात सांगत आला आहात. सोन्यासाठी शंकर एकटाच नरकात जायला तयार आहे अशातला भाग नाही.आम्ही पण आहो.”
नंतर भाऊसाहेब मला म्हणाले,
” कितीही एकमेकाच्या विचारात भिन्नता असली तरी एकमेकाच्या भावनेबद्दलची माणसाला अनोखी ओढ असण्याच्या क्षमतेचा अनुभव पाहून माझा ह्या भावनेची कदर करण्याच्या वृतीवर जास्त विश्वास बसतो.
दुसऱ्याच्या भावनेची कदर करण्याची वृत्ती नसल्यावर, एकमेकाशी संवाद होवूच शकत नाही. अशावेळी वाटतं,दुसऱ्याच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे,ह्याचं आपल्याला असलेलं कुतुहल,आणि ते जाणून घेण्यासाठी त्याचाच बुटात आपला पाय घालून पहाण्याची आपली क्षमता,असल्यावर अशा कल्पकतेतून त्याची आपल्याला जाण निर्माण करता येते.
असं नसेल तर प्रामाणिक दुवा जुळणारच नाही.आणि आपण सतत दुरावलेलेच राहणार.
म्हणूनच माझा आता पुर्ण विश्वास बसला आहे की दुसऱ्याच्या भावनेची कदर असणं म्हणजेच जसं शंकरने स्वर्गात जाण्यापेक्षा सोन्याशी संबंध ठेवून नरकात जाणं पत्करलं तसं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 11, 2008

आमची पन्नासावी लग्नगांठ

“एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.”

“गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो” असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
पन्नास वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.पन्नास वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.
इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.

एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
”मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून.”
परंतु पक्व प्रेम म्हणतं,”
मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो.”
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.

१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं. किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
काय हा विपर्यास!

“माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का”

ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की पन्नास वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी “माझा होशिल का” हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.

निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने पन्नास वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.

“आला खुषीत समिंदर
त्याला नाही धीर
होडीला बघतो ग धरू
ग!सजणी होडीला देई ना ठरू”

ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.
प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.
ते वसंत ऋतुचे दिवस होते.
“जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे.”
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.
” भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी “

बिचारी गेली सतरा वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
“मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?”
असं ती मला म्हणते.
“पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने “आशा” नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया”
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.

हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला विचारतो,
“उद्दया कसं होणार?”
आणि ती पण कधी कधी मला सहाजिकच म्हणते
“उद्दया कसं होणार?”

तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां,
“आता कशाला उद्दयाची बात
बघ उडून चालली रात
आता कशाला कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात
आता कशाला उद्दयाची बात”
तेव्हां सर्वांच्या शुभेच्छावर आता आमचा उद्या आहे.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

हे काय तू करीशी

स्वप्नी मला बोलाविशी
हे काय तू करीशी
प्रीतिची नीज माझी चोरिशी
हे काय तू करीशी

नजर लावून मला बघशी
वीज मजवरी टाकूनी
आग पाण्याला लावीशी
हे काय तू करीशी

शोधूनी हवे तर पाहशी
मजसम न मिळे तुला
जा! मला का बनवीशी
हे काय तू करीशी

नीज नयनी माझ्या असता
नको शिडकूं पाणी
नीजलेल्या उर्च्छूखलतेला का जागवीशी
हे काय तू करीशी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 8, 2008

खुषी न मिळता मिळते रुसणे

तुझ्या प्रीतित मन माझे का तडपते
फुलासम असे तुझा चेहरा
हृदय मात्र तुझे पाषाणा सम शोभते

कळ्या न मिळता मिळती कांटे
खुषी न मिळता मिळते रुसणे

तोडूनी सारे संबंध मोडूनी सारी नाती
होवून वेडा रमलो मी
करूनी तुझ्यावर प्रीति

अमृत न मिळता विष मिळे
काय मी अपेक्षिले अन काय दैवे योजिले

मोकळ्या तुझ्या केशभारी
गेलो मी गुरफटूनी
मुष्किल झाले जगणे मुष्किल झाले मरणे
खुषी न मिळता मिळते रुसणे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

लोकशाहीत कायद्याचं महत्व

“हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल.”

“लोकशाहीत कायद्याचे महत्व” अशा शिर्षकाचं एक पुस्तक घेवून प्रो.देसाई आज तळ्यावर आले होते.त्यांचं ते पुस्तक अजून पुर्ण वाचून झालं नव्हतं.
मी त्याना म्हणालो.
“भाऊसाहेब,पुस्तकाच्या शिर्षकावरून मला दिसतंय सध्या जे जगात “हम करे सो कायदा” चाललं आहे त्यावर तुम्ही कुठेतरी अपसेट झालेले दिसताय.”
माझं हे बोलणं ऐकून ते म्हणाले,
“अगदी बरोबर.हे सगळे जगातले लोकशाही देश आहेत त्या देशात एक तर त्या त्या देशातले लोक तरी, नाहीतर त्या देशाचं सरकार, कायदा मोडून आपलं म्हणणं सिद्ध करायला सरसावतात.हे काही खरं नाही.”
हे ऐकून मी विचारलं,
“मग भाऊसाहेब काय खरं आहे ते तर थोडक्यात सांगा.”
प्रो.देसायाना माझ्याकडून ट्रिगरच हवी होती.
मला म्हणाले,

“हे बघा,अमूक अमूक गोष्टीवर माझा विश्वास असावा हे काही माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही.देवाचं अस्थित्व आहे ह्यावर माझा विश्वास असणं किंवा नसणं किंवा कदाचित तुमच्या समजुती नुसार अस्थित्व नसणं, हे पण माझा विश्वास असणं,नसणं ह्याच्या व्यतिरीक्त आहे असं म्हटलं पाहिजे.
ह्या खोलीच्या चार भिंतींच अस्थित्व आहे हे माझा त्यावर विश्वास असण्या नसण्यावर अवलंबून नाही.
ह्या भिंती जिथे आहेत त्या जागी मी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मी नक्कीच आपटून टक्कर देणार आणि मी कितीही पोटतिडकीने त्यांच अस्थित्व नाही असं म्हणालो तरी त्यांच अस्थित्व नाकारू शकत नाही.

उलटपक्षी,माझं असं मत झालं आहे की काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यावर माझा विश्वास असुनही त्यात फरक होऊ शकतो.काही गोष्टीचं अस्थित्व असतं जोपर्यंत त्याच्या अस्थित्वावर आपल्या मनात विश्वास असतो तोपर्यंत.ह्या माझ्या म्हणण्याला उदाहरण म्हणून साम्य दाखवायला कायद्याच्या अस्थित्वाबद्दल बोलता येईल. कायदा अस्थित्वात असतो जो पर्यंत आपण सर्व मानतो की हो! कायदा आहे. आणि तो असला पाहिजे असं आपण निश्चयाने म्हणतो तोपर्यंत.
तो कायदा अस्थित्वात असतो जोपर्यंत आपण तो तसा असला पाहिजे याचा आग्रह करतो तो पर्यंत.आणि सर्वच- किंबहूना त्याच्या अस्थित्वावर विश्वास नसणारेसुद्धा- तो अस्थित्वात आहे असं समजून वागतात हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.ज्या क्षणी आपल्यातले बरेच, आग्रह धरून म्हणतील की कायदा आपल्यावर नाही, किंवा कायदा आपलं काहीही करू शकत नाही, त्या क्षणी कायद्याचं अस्थित्व संपतं. जणू एखादा साबणाचा बुडबुडा हवेत तरंगत जातो आणि मग अदृश्य होतो तसं.
कायद्याच्या अस्थित्वाचं महत्व समजूनच मी कायदा मानतो.आपल्या समाजात त्याचं अस्थित्व असणं ही आपल्या समाजाची फारच मोठी कमाई आहे.समाजात त्यामुळे शिस्त येते.
कायदा आपलं रक्षण करतो.मत-भिन्नता असली तरी कायद्यामुळे समाज चालतो.जगायला भिती वाटत नाही.कठीण परिस्थितीत किंवा आपल्या अस्थित्वाला शह निर्माण झाला असता आपण कधी कधी समजून चालतो की कायदा आपलं संरक्षण करण्या ऐवजी आपल्याला धोका आणतोय.बऱ्याच वेळेला समाजात असे प्रसंग येतात.आणि कायदा मोडण्यापर्यंत आपली मजल जाते.पण ज्यांचा कायद्याच्या अस्थित्वावर विश्वास आहे ते कदापिही विचलीत होणार नाहित.

जो कोण कायदा मोडून दुसऱ्यावर अत्याचार करायला पहातो,तो यशस्वी होईल म्हणून, त्याला शह देण्यासाठी आपण कायदा मोडून चालणार नाही.कारण कायद्याच्या अस्थित्वावरच समाज शेवट पर्यंत टिकून राहणार आहे हे निश्चीत.”
माझ्या म्हणण्याला उत्तर देवून झाल्यावर प्रो.म्हणाले,
“हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल.”
नंतर आम्ही घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 6, 2008

दोष होता केला मी तो चुकून

विसरू कसा तुला
नसे मी तेव्हडा गैरविश्वासू
तक्रार कशी करू आता
असली तरी नाहीस देत भासू

होतो गेलो मी समजून
भेटीतून गेलो प्रीत मिळवून
एक तुझ्या शिवाय दुःखातून
नाही गेलो काहीही मिळवून

नाजूक मनाला गेलीस तू तोडून
सहज गतीने गेलीस तू खेळून
दोष होता केला मी तो चुकून
काय मिळवू मी दुषण तुला देवून

देशिल का तुझे दुखणे मला
मिळेल शांती सर्वदा त्यातून
कमनशिब माझे असे समजून
जाईन मी एकदाचे तुला विसरून

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 5, 2008

गाते बुलबुल दिवाणी

पुर्वेकडूनी येते लहरत हवा
खुलविते मना गाऊनी गाणे
कानामधे कुणी तरी गुणगुणे
तो आला
तो वसंत आला वसंत आला
घेऊनी फुलांचा बहर खुलवी जीवाला

आम्र वनातूनी मधूर सुरांचा नाद
घेऊनी फांदी वरी गुंजन करी कोकिळा
सुमधुर फुलांच्या सुवासातून लहर
हवेची घेऊ लागे किंचीतसा हिंदोळा

मना लोभवी शीतल संध्याराणी
रंगुनी गेली ऋतुमधे मोहक वनराणी
उमंग आली दिवसामधे
गाते बुलबुल दिवाणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 4, 2008

आभार,आभार तुझे रे! संगीता

मानू कशी कृतज्ञता त्या संगीताची
जे देई मला झडकरी स्फुर्ति गाण्याची

जगू कसा मी त्या संगीताविना
प्रश्न पुसितो ठेवूनी प्रामाणिकपणा

कसले जीवन जगावे गाण्याविना
कसले जीवन जगावे नृत्याविना
कसले कोण आपण अपुल्याविना

उपकृत होवूनी म्हणतो आता
आभार,आभार तुझे रे! संगीता

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 3, 2008

“इलो रे,इलो!” कोकणातला पाऊस.

“शीरा मारां! ही काय पडण्याची रीत झाली?”
कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण.
”नेमिची येई मग पावसाळा”
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच.
“घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम” होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं.
“इलो रे! इलो”
हे दोन शब्द ज्याच्या त्याच्या तोंडातून बोलले जायचे.ऐकून बरं वाटायचं.
कुणीतरी एखाद्दया व्यक्तिला संभोधून बोलावं तसं पावसाला बोलायचे.त्याच्या विषयी अनुद्नार काढण्यापासून ते त्याचं स्वागताचं संभाषण करण्यापर्यंत सर्वांची मजल जायची.तो पाऊस बिचारा सर्व ऐकून घ्यायचा.मालवणीत एक म्हण आहे,
“पावसान झोडल्यान आणि नवऱ्यान मारल्यान तर कोणाकडे जावून सांगतलय?”
आणि तसंच पावसाच्या बाबतीत व्हायचं.तो त्याला हवं तेच करायचा.
कोकणातले लाल मातीचे रस्ते,एप्रिल,मे मधे वाऱ्याच्या वावटळी येवून जी काय रस्त्यावरून धूळ उडून जायची ती जायची. पण उरलेली धूळ काय कमी असायची. एकदा का पावसाच्या सरी वर सरी यायला लागल्या की पावसाने लाल रस्ते धुवून निघायचे आणि रस्त्याच्या बाजूच्या गटारातून लाल पाणी धो,धो वहात कुठे जायचं कुणास ठावूक.पण मुंबईतल्या इराण्याने “पाणीकम चहाचे” भरून भरून लाखो कप जणू गटारात ओतून टाकल्या सारखं वाटायचं.
आम्ही लहान असताना त्यावेळी आमच्या घराच्या पडवीत बसून रस्त्यावरून जाणायेणाऱ्या लोकांचे स्वगत किंवा बरोबरच्याशी होणारे संवाद ऐकण्यात मजा लूटायचो.
“इलो रे,इलो!
हो आता पिच्छो पाडल्या शिवाय रव्हचो नाय!
आता धुम्शाण खूप झालां बाबा!
वषाड पडो! नुकसान केल्या शिवाय हो आता सोडूचो नाय!
केंव्हा एकदा त्वांड घेवोन जाय्त असां झालां!
असोच मधून मधून उघाडी ठेवून रव्ह.ह्या वेळेक तरी आमच्यावर उपकार कर!
शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?
गेले आठ दिवस जांवचां, नांव म्हणून काढणां नांय!
गेले आठ दिवस नुसतां झोडपून काढल्यान!
येतानां गर्जून येतां,आणि जातानां पण गर्जून जातां!”

हे पावसाळ्याच्या दिवसात निरनिराळ्या दिवशी आणि दिवसाच्या निरनिराळ्या वेळचे उद्गार ऐकायला यायचे. डोक्यावर ताज्या भाजीचं ओझं किंवा विकून झाल्यावर रिकाम्या झालेल्या टोपल्या घेवून परत जाताना विक्रेकर बायका आणि पुरूष त्यांच्या मनात आलेला सर्व शीण त्या बिचाऱ्या पावसावर असले शेरे देवून कमी करून घ्यायचे.
कुणी तरी म्हटलंय ना,
“माळावर बोंब मारायला पाटलाची परमीशन कशाला?”
तसंच,
“पावसावर टीका करायला कोणाची कोण परवानगी घेत नसतो.?
पाऊस येण्यापुर्वी एक दोन महिने अगोदर,लोकं आपआपली घरं शाखारून घ्यायची.मंगळौरी घरांची कौलं असलेले घरमालक कामगाराना घरावर चढवून कचरा साफ करून घ्यायचे. पावसाचं कौलावरून येणारं पाणी पन्हळातून खाली जमिनीवर आणल्या जाणाऱ्या ह्या पन्हळांना पण साफ करून घ्यावं लागायचं. पण दुसऱ्या प्रकारच्या कौलाना मात्र संपुर्ण काढून साफ करून मग नीट ओळीत लावावं लागायचं.त्याला घर शाखारून घेणं म्हणायचे.
त्याशिवाय झोपडी वजा घरं असायची त्यांच्या वर माडाच्या झाडांच्या पानाच्या-झावळ्यांच्या-विणून केलेल्या झापांना शाखारून घ्यावं लागायचं.ह्या दिवसात हे काम करणाऱ्या कामगाराना पोटा पुरता मोबद्ला मिळून पोट भरायाचा मार्ग मोकळा व्हायचा.तो कामगार पावसाचे अन्य तर्हेने आभार मानायचा.

कोकणात पावसाच्या दिवसात सर्व आसमंत गार गार होवून जायचं.कावळे,चिमण्या,कबूतरं वगैरे पक्षी बिचारे झाडांच्या फांद्दयांचा आडोसा घेवून निमुट दिवस काढायचे.जरा उघाडी मिळाली की कावळे कुणी उष्ट्या हाताने काही अन्न बाहेर फेकलं असल्यास तेव्हडंच गीळून दिवस काढायचे.कावळ्या कडून एक शिकण्या सारखं आहे की उष्टं अन्न खाताना आपल्या भाईबंधाना कांव कांव करून बोलावून घेवून ते अन्न सर्व मिळून खायचे.हे माणसाने आप्पलपोटेपणा कसा नसावा हे शिकण्यासारखं आहे.
कोकणातल्या शहरातून जरा खेड्यांत गेल्यास पावसाळ्यात येणाऱ्या मजेची नुसती आठवण मन बेचैन करून टाकतं.शेतकरी भर पावसात डोक्यावर इरली घेवून शेतात काम करायचे.ही इरली पण बांबुच्या पट्ट्याची बनवतात. मुस्लीम बायका चेहरा उघडा ठेवून बुरखा कसा घेतात तसाच बांबुच्या पट्ट्यांचा बनवलेला हा बुरखा पुढून उघडा असतो आणि डोक्यावरून ते पाठीवर खालपर्यंत जाईल असा अर्थात हा बुरख्या पेक्षा जाड असूनही पावसात काम करताना भिजून न जाण्यासाठी अंगावर घेवून शेतकरी शेतात काम करीत असतात.
ह्या इरल्यामुळे दोन हात मोकळे राहिल्याने वाकून जमिनीवर काम करतां येतं.भात लावणीच्या दिवसात प्रत्येक कुणग्यात-चौकोनी आकाराच्या पट्ट्यात- एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत एका ओळीत बसून, रोपं पेरत-trans plant- करत,कामाचा शीण कमी होण्यासाठी मिळून गाणं गात, इंच इंच पुढे सरकतानाचं दृष्य पाहून शेतकरी घेत असलेली मेहनत पाहून ह्यावेळी असं मनात यतं ते गाणं,
“आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम स्मरू नाम
मुखी राम हरी रे”
मुंबईहून कॉलेजच्या सुट्टीत कोकणात घरी आल्यावर मावशीच्या खेड्यात जावून तिच्या झोपडीवजा घराच्या वरच्या माडीवर जावून अशा पावसाच्या
दिवसात खिडकीत बसून बाहेर दिसणारी हिरवी गार शेतं बघून मन प्रसन्न व्हायचं.
अशावेळी न सांगता मावशी भरपूर साखर घातलेला कप भरून चहा आणि थाळी भरून खमंग कांद्दयाची भजी घेवून यायची.अशा पावसातच हे कॉम्बीनेशन एनजॉय करता यायचं. एकदा असाच सुट्टीत आलो असताना मला आठवतं मी बसलो होतो. पुढल्या खिडकीत बसून श्रीहरी असंच बाहेरचं पावसाळी वातारण पाहून मुरलीवर, मंगेश पाडगांवकरांचं,

“लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे”

हे गाणं सुंदर सुरात वाजवत होता.आणि खाली वाकून वाकून पहात होता.मी सहज वाकून खाली पाहिल्यावर साधना, एरव्ही मुंबईत कॉलेजात स्लीव्हलेस टॉप आणि खाली जीन अशा ड्रेस मधे वावरणारी,आज आजीचं नऊवारी पातळ आणि लांब बाह्यांचा ब्लाऊझ घालून हातात दोन घागरी घेवून विहीरीवर पाणी आणायला जात असलेली दिसली.साधना श्रीधरची शेजारीण. ती पण अशीच कॉलेजच्या सुट्टीत आजीकडे थोडे दिवस राहायला आली होती.तिला उद्देशूनच ते गाणं होतं हे समजायला मला वेळ लागला नाही.माझ्याकडे पाठकरून श्रीहरी बसल्याने त्याला मी पण खाली पहात होतो ते दिसत नव्हतं. विहीरीतून दोन घागरी पाणी भरून, डोक्यावर चूंबळ ठेवून त्यावर एक घागर, आणि दुसरी घागर कंबरेवर घेवून लचकत मुरडत येताना पाहून श्रीधरने आपलं गाणं बदलं होतं.

“पाण्या निघाली सुंदरी
मन ठेविले दो घागरी
चाले मोकळ्या पदरी
परी लक्ष तेथे “
ह्या गाण्याचे सूर आतां मुरलीवर वाजवायला लागला.
माझ्याच वयाचा माझा मावस भाऊ-श्रीहरी- तो पण कॉलेजच्या सुट्टीत आपल्या आईला भेटायला नेहमी सारखा आला होता.ह्या वेळी त्याची प्रेयसी-गर्ल फ्रेन्ड- साधना पण तिच्या आजीकडे सुट्टीत कोकणच्या पावसाची मजा एन्जॉय करायला आली होती.जुलै महिन्यात कोकणातल्या पावसाला कहर यायचा.वर्षातून बाकीचे दिवस कोरड्या रहाणाऱ्या नद्या ह्या दिवसात तुडूंब भरून वहायच्या.विहीरी पण एरव्ही पाणी अगदी तळाला गेलेल्या, जुलै महिन्यात काठोकाठ भरायच्या.
मी हा त्यांचा रोमान्स पाहून एन्जॉय करीत होतो.
का कुणास ठाऊक त्याचं माझ्याकडे लक्ष का गेलं ते.तो जरासा लाजला.ते पाहून मी पण एक जुनं गाणं आठवून गुणगुणलो

” नको वाजवूं श्रीहरी मुरली रे
तुझ्या मुरलीने भूक तहान हरली
नको वाजवूं, नको वाजवूं
श्रीहरी मुरली”
हे ऐकून,माझ्या जवळ येवून म्हणाला,
“वा! सर्व भजी आणि चहा फस्त केलास आणि
म्हणतोस भूक तहान हरली”
आणि नंतर आम्ही दोघे खूप जोरा जोरात हंसलो.
काही वर्षानी श्रीहरी आणि साधनाचं लग्नं पण झालं आणि आता त्याना शाळेत जाणारी दोन मुलं पण आहेत.
जुलैभर कहर करून झाल्यावर ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला हा पाऊस जरा उघडीप घेतो.कदाचीत ती निसर्गाचीच जरूरी असावी.भातशेती पण एव्हांतोपरी अंग धरते.आणि मधूनच उघडीप मिळून उन मिळाल्याने कोवळे दुधाळ भाताचे दाणे पोसले जातात.

भर पावसात मात्र सुकी मासळीच खावी लागते.सुकी कोलंबी-सुंगटं- सुके बांगडे पाऊस येण्यापुर्वी साठवण करून ठेवलेले असतात त्याचा वापर होतो.शिवाय भर उन्हात एप्रील मे मधे सांडगे,पापड,कुरडुया उन्हात वाळवून तयार केलेला साठा अशावेळी उपयोगी येतो.तसेच वाळवून ठेवलेल्या फणसपोळया आणि आंब्याची साठं उपयोगी पडतात.

नद्यांचे पूर जरा कमी झाल्याने जाळी टाकून मासे मिळण्याची वेळ येते.पावसात सुळे,गुंजूले.शेतकं,काळूंद्री नावाचे मध्यम आकाराचे मासे मुबलक मिळतात.मग घरोघरी सुळ्याची खोबऱ्याच्या रसातली आमटी,आणि गुंजुल्याचं जागच्याजागी-घट्ट-तिरफळं घालून केलेलं तिखलं,लालबुंद कोकमाचं सार-सोलकडी- आणि साप्पाटून भात मिळाल्यावर काय विचारतां?
कोकणातला पावसाळा ह्या सर्व कारणाने चांगलाच लक्षात राहतो.
” नेमिची येई मग पावसाळा”
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 1, 2008

विनम्रता

आज प्रो.देसाई ज्यावेळेला तळ्यावर आले त्यावेळी मी एक पुस्तक वाचण्यात गर्क झालो होतो.ते माझ्या जवळ येवून केव्हा उभे राहिले आहेत ते मला कळलंच नाही.
मला म्हणाले,
“कसल्या विषयात एव्हडे मग्न झाला आहात?”
मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.”
प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा?”
मी म्हणालो,
“विषय तसा साधा आहे.पण तुम्ही नक्कीच तुमचा विचार जास्त विस्तारून सांगाल.”
विषय आहे “The Presumption of Decency “
हे ऐकून प्रोफेसर मला म्हणाले,
“मी ह्या डीसेन्सी-म्हणजेच विनम्र राहून दुसऱ्याचा सन्मान करणं- ह्या बद्दल मला काय वाटतं ते तुम्हाला थोडक्यात सागतो.”
मी पुस्तक बंदच केलं. आणि भाऊसाहेब कसलं लेक्चर देतात याची प्रतिक्षा करीत म्हटलं,
“बोला आता तुमचंच ऐकुया”

मला सागू लागले
” जशी एखादी व्यक्ति वेळेचा आणि साधनाचा विचार करून पाऊल टाकते तशा प्रकारचा विचार करणारा मी मला समजतो. एखादा साधा गुन्हा झालेला पण मला क्षणभर का होईना आत्मघातकी वाटतो आणि माझा मीच वैतागतो.
एखादा टॅक्सीवाला नियमितपणे वेग सांभाळून कायद्याचे बंधन पाळून टॅक्सी चालवित असतो ती त्याची विनम्रता असते. माझ्या घाई साठी वेगाचा नियम तोडतो त्यावेळी त्याने केलेली ही घटना सुद्धा माझी मलाच लज्जास्पद करते. त्याने जाणून बुजून केलेल्या चुकीचा, दंड म्हणून त्याला देऊ घातलेली टिप मी पंधरा पर्सेंन्टने कमी केली तरी पुढची माझी सगळी वेळ हा टॅक्सी ड्रायव्हर देशातल्या कुठच्या प्रांतातून आला,ह्याला टॅक्सी घ्यायला कुठच्या बॅंकेने पैसे दिले असतील असल्या गोष्टीचा विचार करून माझा मीच जरा घुश्यात राहतो.
एखादा बातमी-पत्राचा संपादक मी पाठवलेल्या टिपणाचा उलटा अर्थ लावून ते परत पाठवून देतो तेव्हा, त्याचा मला व्यक्तिशः खूप राग येतो,एखाद्या रेस्टॉरंटने माझं बुकींग आयत्या वेळेला नाकरणं,किंवा राजकारणी माणसाने मी विरोध केलेली पॉलीसीच खंबीरपणे आचारणात आणण्याचा प्रयत्न करणं, ह्याचा ही मला खूप राग येतो. पण हे असले आचरण पाहून विनम्रता नजरे समोर ठेवून प्रसंग टाळता येतात.
आमच्यासारखी शैक्षणिक जगात वावरणारी व्यक्ति काही प्रमाणात उद्धट असणं स्वाभाविक आहे. त्याशिवाय माझं व्यक्तिमत्व काहीसं तसंच असून, मीच बरोबर आहे आणि दुसरा कुणीतरी चूक करत असतो असं माझ्या मनात आणून माझ्या मनाचं समाधान करून घेतो हे मी रास्त करतो असं मी मानत असतो.
कुणाकडून कुणाला चुकीचं मार्गदर्शन झालं असेल असं समजून राहणं ही एक बाजू झाली पण ते झालं याचं कारण ते वाईट प्रवृत्तीचे आहेत म्हणून असं झालं, असं समजणं दुसरी गोष्ट झाली.उगीचच त्रागा करणाऱ्यांचा, किंवा अगदी दारूण स्थितित असलेल्यांचा, कुणी मुद्दाम द्वेष करीत नसतो.खरं म्हणजे द्वेष करण्याजोगी व्यक्ति ती, की जी एकतर दुष्ट प्रवृत्तीची असते किंवा तिच्या जवळ मुळीच विनम्रता नसते. तसं पाहिलं तर द्वेषकरण्याची प्रवृत्ती ही एक भावनिक स्थिति आहे, आणि ती सहजगत्या टाळता येते. स्वतःहून कुणाचा द्वेष करणं खरंच तापदायक असतं. त्या वृत्तिमुळे आपल्या सद्सद्विवेक विचारावर पगडा येतो,आणि त्यामुळे एखादी व्यक्ति मनात डूक धरून दुसऱ्या व्यक्तिला कष्ट देण्यात प्रवृत्त होत असेल तर, त्यापासून काहीही चांगलं होत तर नाहिच नाही.

विनम्रता असणं हा व्यक्तिवरचा एक चांगला संस्कार आहे.आणि ही विनम्रताच, एखाद्याला त्याचा जेव्हा द्वेष करण्याकडे कल होतो तेव्हा त्याला गोंधळात जाण्यापासून परावृत्त करते. मन घट्ट करून एखाद्याने समजूत करून घेतली की आपल्या सभोवतालचे लोक आपल्या सारखेच विनम्र आणि सभ्य आहेत,आपल्या सारखेच प्रयत्न करून सन्मानाने गोंधळातून स्वतःला सोडवून घेणारे आहेत,अशी समजूत करून घेतल्यावर अशा लोकांना दुषणं देणं म्हणजे आपल्या आपणच स्वतःला अविचारी वृत्तिचे महात्मे समजून घेणं.

आपण विनम्र आहो असं समजून वागणं म्हणजे सर्व काही झालं असं नाही.उलट त्या वागण्यात सत्यता असली पाहिजे.त्यात सत्यता नसेल तर एखादी व्यक्ति विनम्र असूनही बेजबाबदार लोकांवर सतत चिडचिडेपणा करीत राहणार.उलटपक्षी योग्य मार्ग तो की जो माणसा-माणसातली हतबलता लक्षात घेवून मोठ्या मनाने निर्णय घेण्याकरीता सफलता आणतो.
सभोवतालचं जग विचाराने अपरिपक्व असलं म्हणून ते भयंकर आहे अशी समजूत करून चालणं योग्य होणार नाही. त्यांचं वागणं चुकीचं असलं म्हणून काही ते दुष्ट विचाराचं आहेत असं मानणं हे खरं नाही.
दुसरे विनम्र असतीलच अशी समजूत करून घेवून मी नेहमीच यशस्वी होईन असं ही नाही.पण मला यशस्वी होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली गेली पाहिजे.इतरांसारखा मी पण बराचसा दोषी असू शकेन. पण विनम्र होण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे.आणि मी विश्वास धरला पाहिजे की इतरही माझ्या सारखेच प्रयत्नशील असावेत.”
हे सर्व ऐके पर्यंत तळ्यावर काळोख झाला होता.भाऊसाहेब चर्चेच्या ओघात घरी जायला उशिर होतोय हे विसरूनच गेले.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com