Tuesday, April 30, 2013

नाचावं पावसात ओलं चिंब होऊनी



"कसली वाट बघता? जा आणि नाचा"
हे सुधाताईचे शब्द आज मला आठवले.
मे महिना उजाडत आहे.लवकरच पावसाळा चालू होईल.तो मागच्या पावसाळ्यातला तो

एक दिवस मला आठवला.हवामान खात्याने त्या दिवशी संध्याकाळी जोराचा पाऊस

येणार आहे असं भाकीत केलं होतं.मी ऑफिसात जाताना न विसरता सकाळीच छत्री

घेऊन गेलो होतो.

संध्याकाळी खरोखरच जोराचा पाऊस येणार असं वातावरण झालं होतं.अंधेरी स्टेशनवर

उतरून सातबंगल्याच्या बसच्या रांगेत मी उभा राहाण्यासाठी तयारी करीत होतं.ती

लांबच लांब रांग पाहून चालत गेल्यास लवकर पोहोचूं असं मनात आलं.घरी पोहोचेपर्यंत

पाऊस नक्कीच पडणार नाही असं वाटून पायीच चालायला लागलो.नवरंग सिनेमापर्यंत

पोहचेन न पोहचेन तो पर्यंत जो काही पाऊस चालू झाला त्याची कल्पनाच करवेना.

नवरंगच्या पुढे पाठारे वाडीत सुधा पाठारे रहायची. तिच्या घरी जाऊन थोडा वेळ काढावा

म्हणून तिच्या वाडीत वळलो.तोपर्यंत जोरदार पावसाला सुरवात झाली होती.

आडवा-तिडवा वारा आणि पावसाची झोड यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं.
मी तर भिजलो होतोच आणि माझी छत्री ओली चिंब झाली होती.सुधाने दरवाजा उघडून

माझी छत्री माझ्या हातातून काढून घेऊन बाथरूममधे गळत ठेवली आणि मला हातात

टॉवेल देऊन अंग पुसून घायला सांगीतलं.गरम गरम चहा करते तोवर बाहेरच्या

हॉलमधे बसा असं सांगून ती चहा करायला आत गेली.
तिच्या फ्लॅटमधल्या बाल्कनीत जाऊन जोरदार पावसात भिजण्यापासून मी कसा वाचलो

त्या पावसाच्या सरीकडे पहात बसलो होतो.
स्टुलावर एक उघडी वही पाहिली. सुधा काहीतरी त्यात लिहित असावी.

"येणारं तुफान निवळून जाण्याची वाट पहाण्यासाठी जीवन नसतं.पावसात चिंब होऊन

नाचण्यासाठीच जीवन असतं."
ह्या एव्हड्याच ओळी तिने नुकत्याच लिहिलेल्या असाव्या असं मला वाटलं.
पण दुसर्‍या पानावर तिने लिहलं होतं,

"भल्या मोठ्या खिडकीच्या गजामधून बाहेर निरखीत रहावं,निरखून पहात असताना,

नुकत्याच येणार्‍या पावसाच्या सरीमुळे सर्व परिसरात पाणीच पाणी होऊन आजुबाजूला

डबकी तयार होऊन त्यात डुंबावं,अशा तर्‍हेच्या आठवणीनीं माझ्या जीवनातले उत्तम

क्षण जागृत झाल्यावर, मला कसंसच होतं."
माझ्या हातात चहाचा कप देत मला म्हणाली,
"बाळपणातल्या आठवणी यायला लागल्या, म्हटलं काहीतरी वहित उतरून काढावं

म्हणून लिहित बसले होते.तुमची बेल ऐकून  दरवाजा उघडण्यासाठी उठले."

"अरेरे! मी तुला व्यत्यय केला ना?"
मी सुधाला म्हणालो.

सुधाची दोन्ही मुलं आणि नातवंडं परदेशात असतात.ती ह्या जागेत एकटीच रहाते.दोन

वर्षापूर्वी सुधाचा नवरा अचानक वारला.एका मुलाकडे जाऊन रहावं अशा विचाराने ती

त्यांच्या होकाराची वाट बघत होती.
इकडचं सगळं सोडून जायला तिला जीवावर आलं होतं.पण तिची मुलं, तिने इकडे एकटं

रहावं हा विचार पसंत करीत नव्हती.

मला सुधा म्हणाली,
"सतत येणार्‍या ह्या विचाराने मन बरेच वेळा उदास होत असतं.पण मुलांकडे जाऊन

रहाणं अपरिहार्य होतं.आता इथं रहाणं ठीक आहे पण पुढे जास्त वय झाल्यावर एकट्या

मी नातेवाईकांना आणि शेजार्‍यांना किती कष्ट द्यावेत.त्यापेक्षा आपल्या मुलांकडेच

जाऊन रहाणं बरं असं माझं मन मला सांगत रहातं."

निलेशने म्हणजे सुधाच्या नवर्‍याने आपल्या पश्चात एकटी राहून नयेस असं तिला

निक्षून सांगीतलं होतं.त्याचीही तिला आठवण व्हायची.
एकटी बसली असताना सतत येणार्‍या ह्या विचारांना पावसाच्या जोरदार सरीने

पावसाबद्दल विचार करण्याची तिला चालना दिली.

मला सुधाताई म्हणाली,
"काहींना वाटत असतं की,पावसाच्या आगमनाने सर्व दिवसाचं वातावरण उदास होऊन

जातं. किंवा काहींना वाटतं आजचा दिवस खरोखरच वाईट दिवस आहे.तर काहींना वाटतं
आज घरात स्वस्थ पडून रहावं आणि काहीच करू नये.

खरंच, पावसाचे दिवस म्हणजे नुसतं ढगाळ आकाश आणि उदास वाटणारं वातावरण

असण्य़ाचा प्रकार नव्हे. याऊलट जसे, सूर्याचं लख्ख उन पडलं असतानाचे, दिवस

असतात तसे चक्क  घराबाहेर पडून कल्पनाशक्तिला आनंददायक प्रवृत्तित आणण्याचा

प्रयत्न केल्याचं सूख असतं.घरात बसून नकोत्या गोष्टींचा विचार करून स्वतःच्याच

मनाला यातना देण्यापेक्षा त्या वातावरणाचा उपयोग हा एक उत्तम दिवस आहे असं

समजून रहायला काय हरकत आहे.?"

सुधाचा हा विचार ऐकून मला पण माझ्या लहानपणाची आठवण आली.
मी सुधाला म्हणालो,
"लहानपणी आम्ही असं पावसाळी वातावरण पाहून घराबाहेर पडून पावसात चक्क

नाचायला जायचो.माझी बरोबरीची सर्व मित्र मंडळी मला साथ द्यायची.
मला नेहमीच वाटायचं की,पावसात नाचल्याने,उदास,दुःखी तापदायक दिवसाना विसरून

जाऊन,मजेदार,उत्तेजित आनंदायी दिवस बनवण्य़ाचे प्रयत्न होतात.असे उदास

यातनादायक दिवस उगवल्यास आणि बाहेर पाऊस पडत असल्यास, सरळ पावसात

जाऊन नाचावं,ओलं चिंब व्हावं.कसल्याच गोष्टी मनाला शिवणार नाहीत. सर्व काही

पावसाने धुऊन गेल्यासारखं होतं. असं वाटायचं."

"आत्ता तर तुम्ही येण्यापूर्वी माझ्या मनात पावसाबद्दल असाच काहीसा विचार आला.
बाहेर पाऊस पडतोय त्याचा आवाज ऐकून मनाला आराम मिळतो.एखादी उबदार गोधडी

अंगाभोवती लपेटून खिडकीतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघत बसावं.मनात काही

कमतरता आल्यास पावासाच्या वातावरणात त्या आपोआप कमी केल्या जातात.मनात

असलेल्या सर्व समस्या मनातून धुऊन गटारतल्या पाण्यासारख्या वाहून नेल्या जातात.

मन एव्हडं प्रफुल्लीत होतं की मनोदशा एकदम आनंदीत होते.
पाऊस म्हणजे विस्मयकार, पाऊस म्हणजे दिलासा,पाऊस म्हणजे मज्जा."
सुधाने आपला विचार सांगीतला.

पाऊस जरा काढल्यावर मी सुधाचा निरोप घेऊन घरी गेलो.जेवून झाल्यावर त्या

पावसाळी वातावरणात पांघरूण घेऊन कधी झोपायला जातो असं झालं.सुधाताईचे

पावसाबद्दलचे विचार मनात घोळत होते.झोप केव्हा आली ते कळलंच नाही.पहाटेच्या

स्वपनात सुधाताई मला सांगत होती,
"जेव्हा पावसात जाऊन नाचावं असं वाटतं तेव्हा सरळ पावसात जाऊन नाचावं.
माझ्या मनाचा खास विश्वास आहे की जर का जीवनात समस्या उध्भवल्या तर थेट

पावसात जाऊन नाचावं.असं कधी नाचलोच नाही असं नाचावं.मी खात्रीपूर्वक सांगते

तुम्हाला वाटणार्‍या सर्व चिंता दूर होतील आणि खूप बरं वाटेल.कोणी काही म्हणो,

लाजकरून घेऊ नका,नको होय म्हणू नका.मनाचा धीर करा,सहास केल्यासारखं मनात

आणा,सहजच नाचल्यासारखं वाटून घ्या.कसली वाट बघता?जा आणि नाचा."

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 17, 2013

सुर्व्या आला, तळपून गेला




"मी नेहमी सूर्याच्या बाजूने असतो.माझी बहीण मात्र देवाची बाजू घेते.पण देवाच्या अस्तित्वाची मला काही खात्री नाही."
प्रो.देसायांचा नातू त्यांना समजावून सांगत होता.
"फेसबूक-गुगलच्या जमान्यामधे, सायन्सची आणि टेक्नॉलॉजीची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून, नवीन डोळ्यानी जगाकडे पहाण्याची वृत्ती वाढत आहे."
प्रो.देसायानीं आपला स्वतःचा विचार माझ्या समोर मांडला.
मी प्रो.देसायाना म्हणालो,
"भाऊसाहेब,हल्लीची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत.सायन्समधे होणार्‍या प्रगतीमुळे
ही मुलं,
"बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल"
असं म्हणायला कचरत नाहीत.पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हणणार्‍यांना मूर्ख समजलं गेलं.कारण आकाशात पाहिल्यावर आपल्या जागेवरून सूर्याचं स्थान हललेलं दिसतं. प्रत्यक्ष परिस्थिती सायन्समुळेच सिद्ध करता आली.आणि ते समजून घ्यायला बराच अवधी जावा लागला.आता सायन्स समजून घ्यायला फार वेळ लागत नाही.नव्हेतर ते समजून न घेता आपलंच खरं आहे आणि तसं नसेल तर ते खोटं आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा असा अट्टाहास करणार्‍यांचा हट्ट पुरवायला ह्या फेसबूक-गुगल वापरणार्‍यांना
वेळही नाही आणि गरजही भासत नाही.
तुमच्या नातवाच्या म्हणण्यात मला जास्त स्वारस्य वाटतं.सांगा तर पुढे तो काय म्हणाला."

प्रो.देसाई आपल्या नातवांचा विचार सांगू लागले
 "माझा नातू म्हणतो,सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे. माझी एक खात्री आहे की,उद्या सूर्य उगवणार आहे आणि ह्या धरतीवर आपल्या उन्हाची धग,आणि प्रकाश देणार आहे जो ते तो गेली अब्जानी वर्ष करीत आला आहे.
आपल्या अस्तित्वाचं श्रेय माझी बहीण मात्र देवाला देते.एखादी अदभूत बुद्धिमान शक्ती ह्या पृथ्वीतलावर असून तीच काही करून माझ्या अस्तित्वाला जबाबदार आहे हे तीचं म्हणणं मला काही पटत नाही.एक मात्र मला सहजच दिसून येतं की,माझं सर्वकाही, खाणं-पिणं श्वास घेणं ह्याला सूर्य जबाबदार आहे.

ह्या जगात मला ज्या ज्या गोष्टींची जरूरी आहे त्या सर्व तापमान,प्रकाश आणि उर्जा ह्या मधून सूर्याकडून पुरवल्या जातात.दुसर्‍या दिवशी पहाटे उठल्यावर,खात्रीने पूर्वेला उगवणार्‍या सूर्याचं दर्शन मला होणार ह्या कल्पनेने मी भारावून जातो.उद्याच्या माझ्या आशा-आकांक्षा आणि ह्या धरतीचं भवितव्य ह्याला सूर्यच कारण आहे हे मी जाणून असतो.ज्या पृथ्वीतलावर मी उभा आहे त्याचं श्रेय मी सहजा़सहजी सूर्याला देत नसलो तरी भूगर्भशास्त्र सारख्या गोष्टी सूर्यामुळेच आहेत हे अगदी उघड आहे.पृथ्वीच्या भूगर्भामधला, ज्वालामुखी नैसर्गीक प्रक्रियेमुळे व्युत्पन्न होत असला तरी पृथ्वीच्या बाह्यांगावर जे डोंगर-कडे आहेत ते पृथ्वीवर होणार्‍या,हवामान,पाऊस आणि तापमान ह्यांच्या कालचक्रामुळेच झीजून गेले आहेत.
पृथ्वीतलावरची जमीन,वनस्पति आणि प्राणी ह्यांचं अस्तित्व,वाढ आणि प्रकाश-संश्लेषण
व्ह्यायला सूर्यच कारण आहे.तसंच त्यांचं जनन,मरण ही प्रकियापण सूर्यामुळेच आहे हे निश्चित आहे.

माणसाला मृत्युनंतर पुनर्जीवन मिळतं ह्या सारखे दिलासा देणारे शब्द, शेकडो वर्षापासून अफवांचा अविरत बनाव करून त्याची पुनरावृत्ति करून वापरात आणले गेले आहेत.ह्या घटनेचं अगदी प्राथमीक स्पष्टीकरण अगदी अधुरं आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाय असा चमत्कार इतिहासात घडलेला आहे ह्या बद्दलचा उत्तम आणि खास असा पुरावा आढळत नाही.

मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दुःख आणि वेदना सोसत असतानाही नवीन दिवस उजाडणार हे नक्की आहे आणि हे सदैव होत रहाणार आहे.एखाद्या दिवसाचा प्रसंग कितीही कठीण असला तरी तो आपल्याला धैर्याने सोसला पाहिजे.सूर्य रोज उगवून आपल्याला धग,प्रकाश आणि जीवन देतो.रोज गाडीत टाकलेले पेट्रोल जे आपण जाळतो ते सुद्धा हजारो वर्षापासून असलेल्या सूर्याच्या उन्हाने वनस्पती उगवून, मरून,कुजून तेलाचं इंधन करायला उपयोगात आलं आहे.

घर तयार करायला लागणारं लाकूड,अंगावर वापरायला लागणारे कपडे, निर्माण करायला सूर्यच कारणीभूत आहे.जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे अन्न,पाणी आणि आश्रय शेवटी सूर्यामुळेच पुरवल्या जातात.मी सूर्याची पूजा करतो अशातला प्रकार नाही मात्र मी त्याची कदर करतो.प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मला त्याचा फायदा होतो कारण सूर्याकडूनच पृथ्वीवर प्रभाव होतो. माझ्या दृष्टीने देवाचं अस्तित्व हे परिस्तितिजन्य असायला आणि जाणीव व्हायला इतकं सोपं नाही.आणि म्हणूनच मी शक्की आहे.

ह्या सर्वांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हा असा आहे.काही कारणाने शोध घेऊन जर का आपण सिद्ध करू शकलो की देवाचं अस्तित्वच नाही तरी त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात कोणता फरक पडणार आहे?.खास फरक पडणार नाही.पण समजा सूर्याचं अस्तित्वच एकाएकी लोप पावलं, तर मात्र जीवनासकट सगळंच संपलं.माझ्यासाठी देवाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाची निर्णायक समिती अजून विचार करीत राहिल.पण सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे.तो नेहमी दिसणार ह्याची मला खात्री आहे.सूर्य मला जीवन देतो आणि भविष्य देतो आणि म्हणून मी सूर्याला मानतो."

एव्हडं सांगून झाल्यावर देसाई माझ्याकडे बघून माझी प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घ्यायच्या प्रयत्नात होते.ते मी ओळखून त्यांना एव्हडंच म्हणालो.
"मानलं,बुवा"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 11, 2013

ते निलगिरीचं झाड.







त्याचं काय झालं,काल झाड कापण्यासाठी म्हणून,मग ते झाड कितीही उंच असो वा
कापायला कठीण असो,सर्व अवजारानी आणि उपकरणानी परिपूर्ण असलेला असा एक
टुक आमच्या समोरच्या घरासमोर येऊन थांबला होता.
रस्त्याच्या पलीकडे एक ऊंच निलगिरीचं झाड आहे ते कापणार आहेत हे समजल्यावर
मला खूपच दुःख झालं.आमच्या समोरच ते झाड गेली पंधरा वर्ष मी पहात आहे.अंदाजे
शंभर वर्षापूर्वीचं ते झाड असावं असा माझा समज आहे.

मोठमोठे जुने वृक्ष जगातून भराभर नामशेष होत आहेत. जैव-विविधतेवर आणि
पर्यावरणावर ह्याचा नक्कीच दुष्परिणाम होत आहे हे निश्चित आहे.जुने वृक्ष नामशेष
झाल्याने पर्यावरणाला जबर धक्का बसणार आहे. अशा तर्‍हेचे वृक्ष, पक्षांना त्यांच्या
घरट्यांसाठी किंवा अन्य आश्रयासाठी पर्यावरणाची मौलिक भुमिका पार पाडत असतात.
शिवाय ही झाडं अन्नाचा पुरवठा करण्याचं काम करतात,परागकण वहनाचं काम,
करतात,कार्बनचा भरपूर साठा करतात तसंच स्थानीक जलविज्ञानासाठी महत्वाची
भुमिका साकारतात.नैसर्गिकरीत्या मेलेल्या वृक्षाचा, लाकुडफाट्यासाठी, उपयोगात
आणता येतो.

हा एव्हडा मोठा निलगिरीचा वृक्ष फक्त दोन माणसानी अर्ध्या तासात तोडून भुईसपाट
केला.एव्हडंच नाही तर ह्या ट्रकाला जोडून असलेल्या एका मशीनमधे ह्या झाडाचे
तोडलेले तुकडे टाकून भुगा करून दुसर्‍या एका मोठ्या बोगीमधे जमा करून ते लोक
चालते झाले. त्या जागी एव्हडा मोठा वृक्ष होता, शेकडो वर्ष तो ह्या जागी होता असं
कुणाला सांगीतल्यास विश्वास बसणार नाही.

आता वसंत ऋतुत ह्या झाडावर येणारे,गोड गाणी म्हणणारे असंख्य पक्षी त्या झाडाच्या
शोधात असणार.निलगिरीचा सुवास देणारी,झाडाखाली पडलेली फुलं आणि पानं,
मिळणार नाहीत.झाडाखाली पडणारी सावली भोवतालचा परिसर थंड ठेवीत असे ते आता
होणार नाही.ह्या सर्व गोष्टींचा विचार मनात येऊन मन उदास झालं.पहाटे एक कविता
सुचली.

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

सावलीत झाडाच्या बसलो असता
मान उंचावून वरती पहाता
पर्णपत्री फुले आणि शाखा
आनंद देती डोळे विस्फारता

नव्या दिवशी थंड पहाटे
आठव आली वसंत ऋतूची
चाहुल लागली त्या पाहुण्यांची
दूर दूरचा प्रवास करूनी
शोधीती जागा घालण्या घरटे

उगवला दिनकर दिवस उजाडे
कळ्या उमलूनी होती फुले
मकरंद शोषण्या भ्रमर फिरे
कुठला वृक्ष अन कुठली फुले

संध्याछाया पसरू लागली
गगन होई लाल तांबडे
विहंग,भ्रमर अन फुलपाखरे
उसंत घेण्या जाती अन्य वृक्षाकडे

सावलीत झाडाच्या बसलो असता
धगी पासूनी अवसर मिळे
कसली सावली अन कसली धग
बदल जाहला त्या वातावरणे

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

वार्धक्य आणि पोप बेनेडिक्ट





जीवन फार सुंदर आहे.खरंच,जीवन सुंदर आहे का?

त्याचं असं झालं,इकडे वसंत ऋतु यायला अजून थोडा अवसर असला तरी,आजचा
हवामान खात्याच्या अंदाज ऐकून तळ्यावर जाऊन फेर फटका मारावा थोडावेळ तिथेच
बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघावी,इतपत हवामान आल्हादायक आहे हे निश्चीत
आहे असं समजून मी भाऊसाहेबांना सकाळीच फोन करून संध्याकाळी तळ्यावर
भेटण्याचं नक्की केलं.

सुरवातीली ते थोडे कुरकूरले.मला म्हणाले,
“माझ्यासाठी सध्या इथली हवा थोडी थंडच आहे म्हणा.
“Age became” (वय झालं)”
बोलून झाल्यावर थोडे मिष्कील हसले सुद्धा.

प्रो.देसायांचा हा जोक मला त्यांनी पूर्वी सांगीतला होता.
नानु शहा,भाऊसाहेबांचा कॉलेजमधे असतानाचा सहकारी, इंग्रजी बोलताना त्याच्या
मातृभाषेतलं,गुजराथीतलं,बोलणं इंग्रजीत भाषांतर करून बोलायचा.
तो ज्यावेळी शाळेत होता त्यावेळी सकारने सर्व शाळातून इंग्रजी शिक्षणाला “चलेजाव”
केलं होतं.त्या कमनशीबी बॅचमधे हा सापडला होता.
परंतु “बॅंक”ला “बेंक” म्हणायचं, “हॉल”ला “होल” म्हणायचं “सजेशन”ला “सजेसन”
म्हणायचं “कॉफी”ला “कोफी” आणि “स्नॅक”ला “स्नेक” म्हणायचं,हे काही इंग्रजीत
शिकण्याच्या संबंधाने नव्हतं.त्या भाषेत तशा उच्चाराचे अक्षरच नाही.
हे मला प्रो.देसायानी समाजावून सांगीतलं होतं
त्यामुळे नानु शहा,
“चला कॉफी आणि स्नॅक खायाला जाऊया हे सांगताना
“चला कोफी आणि स्नेक खायाला जाऊया” असं म्हणून हसं निर्माण करायचा.
एकदा तर एका मित्राला,
“आपली मेहुणी तरूण आहे आणि घरी रिकामीच असते काही काम वगैरे करीत
नाही.तिच्यासाठी नवरा शोध”असं सांगण्यासाठी,
“माय सिस्टर-इन-लो इज यंग ऍन्ड एमटी” असं म्हणून त्या मित्राला बुचकाळ्यात
टाकून गेला.त्याच्या मित्रानेच आम्हाला हा जोक सांगीतला असं प्रोफेसर आम्हाला
म्हणाले होते.इंग्रजीचं अज्ञान आणि मातृभाषेतले उच्चार ह्या दोन गोष्टींची गफलत
झाल्याने त्याचं असं होत होतं,असं सांगून प्रो.देसाई स्पष्टीकरण करीत असत.

मी तळ्यावर गेल्यावर बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघत असताना हे सर्व आठवून
मी माझा वेळ घालवीत होतो.एकदाचे भाऊसाहेब येताना दिसले.जवळ येऊन बाकावर
माझ्या शेजारी बसले.
प्रो.देसाई काही बोलत नाहीत हे पाहून मीच गप्पा मारण्यासाठी विषय काढला.
“जीवन सुंदर आहे असं म्हणतात.खरंतर,आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात जीवन सूंदर
असावं असं मला वाटतं.भाऊसाहेब तुम्हाला कसं वाटतं.?”

माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून प्रो.देसाई मला म्हणाले,
“तुम्ही म्हणत आहात ते मला पटतं.अगदी कुकुल्या वयात,भुक लागली की
रडायचं,कुठंतरी दुखलं-मुखलं की रडायचं,आई जवळ हवी असल्यास रडायचं,सु:सु:
झाल्यावर रडायचं असं ह्या आयुष्याच्या टप्प्यात रडूनच सर्व काही सांगीतलं जातं.हसणं
क्वचितच होतं.आयुष्याच्या ह्या टप्प्यातलं ते जीवन सुंदर आहे असं कोण म्हणेल.?
नंतर जवळ जवळ अठराएक वर्षापर्यंत वय वाढत असताना,
“अजून तू लहान आहेस”
असं सारखं मोठ्यांकडून ऐकून घेत घेत हा आयुष्याचा टप्पा निघून जातो.जीवन सूंदर
आहे का? असं वाटण्याचा प्रश्नच मनात येत नाही.”

एव्हडं बोलून भाऊसाहेब थोडे गप्प झाले.ती संधी साधून त्यांच्याच विचाराचा धागा पुढे
ओढत मी म्हणालो,
“मला वाटतं अठरा वर्षानंतर जवळ जवळ पस्तीस,छत्तीस वयापर्य़ंत,आयुष्य हिरवं गार
असतं.टवटवीत असतं.कोपर मारीन तिथे पाणी काढीन अशी अंगात जीद्द असते.करू ती
पूर्व दिशा असा समज असतो.एव्हरेस्ट चढून जाईन तो थीटा वाटतो,महासागराचा तळ
पाहिन तो उथळ वाटतो.आकाशात झेप घेईन अशी धमक असते.निळ्या आकाशात
विहंगाचं मुक्त विहार पाहून त्याचा हेवा वाटतो.प्रणयराधनेत रस घ्यावासा वाटतो,
त्यातूनच विश्वाचं रहस्य उलघडलं जातं.मागचा पुढचा विचार करायला वेळ नसतो
नव्हेतर असला विचार करायाला मनातच येत नाही.”

प्रो.देसायांचा चेहरा, माझं हे म्हणणं ऐकून,आनंदी झालेला दिसला.
मला म्हणाले,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.हा आयुष्याचा टप्पा ओलांडून पुढे
जाताना,जीवनाचा मार्ग उताराला लागतो.ह्या उताराचा कल कुणाचा जास्त असेल तर
कुणाचा कल कमी असेल.त्यामुळे मनाचं सौन्दर्य जरी टिकून राहिलं तरी शरीराचं
सौन्दर्य उतरणीला लागतं.
डोळ्यावर चाळीशी येते.केस पिकू लागतात.त्वचेतला तजेलदारपणा कमी होऊ
लागतो.दाढा दुखू लागतात.एक ना हजार गोष्टी होत रहातात.कामाधामात काही कमतरता
दिसल्यास,नानु शहा म्हणतो तसं,
“Age became”चा आधार घ्यावा लागतो.

पण एक मात्र निश्चित ह्या उताराचा कल कमी करायचा झाल्यास, किंवा दुसर्‍या शब्दात
सांगायचं झाल्यास,आयुर्मर्‍यादा वाढवायची झाल्यास,जरूर तेव्हडा नियमीत
व्यायाम,बेताचा आहार,व्यसनापासून दोन हात लांब,सकारात्मक विचार,ह्या गोष्टींचा
पाठपुरावा केल्यास म्हणजेच,पचेल ते खाणं,सुचेल ते सांगणं,रुचेल ते बोलणं,आणि
सर्वांना आवडेल असं आचारण ठेवणं,हे करावं लागतं.”

हे सांगून झाल्यावर प्रो.देसाई मी ह्यावर काहीतरी बोलणार अशी अपेक्षा करीत होते.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, अशा वागण्याने वयोमर्यादा वाढते,त्यामुळे वार्धक्य कुणालाही चुकवीता
येणार नाही.हा आयुष्यातला टप्पा खरोखरच तापदायक असतो.
वार्धक्यातल्या असहनीय वेदना औषधं घेऊनही सहन होत नाहीत.परावलंबी व्हायला
होतं.डॉक्टर नव्हेच तर कुणी मित्र किंवा तत्सम कुणी मदत करून ह्या वेदनातून
सोडवील अशी अपेक्षाही फोल ठरते.आणि शेवटी मृत्यु हाच अगदी जवळचा मित्र
वाटतो.तो निश्चितच ह्या वेदनातून सुटका करायला कारणीभूत होतो.खरं आहे ना?”

“अगदी खरं आहे.अर्थात ह्याला अपवाद हे असतातच.तुम्हाला आमचे शेजारी प्रो.
सुखटणकर मला काय म्हणाले ते मी सांगतो.

“मला निवृत्त होऊन आता दहा वर्षं झाली.ख्रि़श्चनांचा धर्मगुरू पोप बेनेडिक्ट निवृत्त
होणार म्हणून त्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच.
चाळीसाव्या वयावरची शरीर शक्ती अजून माझ्यात आहे. पण बटाट्याची पाच पौंडाची
पिशवी उचलताना माझ्या लक्षात येतं की माझ्यात काहीतरी बदल झाला आहे.अगदी
अलीकडे नातवंडांबरोबर क्रिकेट खेळायचो,आता खेळण्यासाठी माझ्यापेक्षा वयाने मोठे
असलेल्यांच्या मी शोधात असतो.
प्रोफेसर असताना कॉलेजमधे लेक्चर देताना एकाच वेळी अनेक विचार करायची
माझ्यात पात्रता होती पण हल्ली एक गोष्ट घेऊन विचार करायला आव्हान वाटतं.माझ्या
जीवनात क्षमतेला विशेष स्थान होतं,आता आयुर्वृद्धि होत असताना क्षमता लोप
पावायला लागलेली दिसते.माझं मन आणि शरीर तणाव-मुक्त व्हायला लागलं आहे.
माझ्या लक्षात यायला लागलं आहे की माझा मृत्यु दूर क्षितिजावर आहे हे खरं
नाही.उलट त्याची नियोजीत भेट होणार आहे असं वाटतं.

आपली स्वतःची ओळख ही आपण स्वतःकडे कसं पहातो यावर अवलंबून आहे.आपली
क्षमता,भूमिका,मान्यता,आवश्यकता आणि दृढविश्वास यावर हे अवलंबून आहे मग तो
धर्मगुरू पोप असो वा मी असो.जरी आम्हा दोघां मधल्या ओळखीच्या घटकात
जमीन-अस्मानाचा फरक असला तरी दोघांची द्विधा परिस्थिती सारखीच आहे.
आम्हा दोघांहीमधे जरी एकाही अर्थपूर्ण गोष्टीत बदल झाला तरी त्यामधे असलेली
झलक नक्कीच बदलते. जसं डाळीच्या आमटीमधे लागणार्‍या चीजवस्तुत विशेष बदल
झाला तर त्याचं आंबट वरण व्हायला वेळ लागणार नाही.

माझ्यात काय किंवा धर्मगुरू पोप याच्यामधे काय, दोघांच्याही अर्थपूर्ण क्षमतेमधे
कमतरता आल्यास आम्हा दोघांच्या व्यक्तीमत्वात फरक होणं उघड आहे.
“कोणत्याही व्यक्तीच्या मौलिक गुणात फरक पडणं शक्य नाही.”
असं जरी मोठ्या पंडीतानी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतलं तरी त्यात फरक पडणं
अपेक्षीत आहे.जीवन खरोखरच इतकं साधसुधं असू शकतं का?
मी म्हणेन, आपण जे असतो ते आपल्या करणीवर आणि मानण्यावर असतो.

धर्मगुरू पोप यांच्या निवृत्तीवरून मी काय शिकायचं ही अगदी साधी गोष्ट आहे.
जी व्यक्ती अतिशय शक्तिशाली स्वेच्छाचारी पदावर आरूढ असूनही केवळ वार्धक्यामुळे
त्या पदावर कार्यशील राहू शकत नाही,मग माझ्यासारख्याला एखाद्या व्यक्तीने,
आपणहून उठून मला बसायला बसमधे जागा करून दिली तर ती शालीनतापूर्वक मी
स्वीकारायला हवी.”

प्रो.सुखटणकरांकडून हे सर्व ऐकून मलाही माझ्या वयाचा विचार करणं क्रमप्राप्त झालं.
म्हणूनच मी तुम्हाला थंडी सोसवत नाही असं सकाळी फोनवर म्हणालो होतो. पण एक
मात्र नक्की,माणूस खूपच पराधीन आहे.”

एव्हडं बोलून,
झाल्यावर घरी जाण्यासाठी आम्ही उठलो.काळोखही बराच झाला होता.
बाकावरून उठताना भाऊसाहेबांनी माझ्या हाताचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न केला.
माझे थॅन्क्स मानुन वर पुटपुटले
“आलिया भोगासी”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

लेकीची मिठी





लेकीची मिठी
माझ्या पत्नीचा आज शहात्तरावा जन्मदिन.गेल्या वर्षी ह्याच महिन्यात ती आजारी होऊन हॉस्पिटलात होती आणि नंतर दोन महिने नर्सिंग-होममधे होती.
वर्ष कधी निघून गेलं हे कळलंच नाही.तिच्या ह्या आजारामुळे आयुष्यातले बरेच नवे अनुभव पहायला मिळाले.
आज दिवस उजाडताच तिच्या लेकीने तिला कडकडून मिठी दिली आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ते दृश्य पाहून माझे डोळे ओलावले.माझ्या पत्नीच्या मनात काय आले असावे ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली.

आईचा सांगावा,

(पाहूनी तुझी ती प्रमेळ मिठी)

त्वरेने भरले माझे ऊर भारी
विचार आला माझ्या अंतरी
असावी तुजसम मुलगी एकतरी

केलीस सेवा अखंड दिवसभरी
कर्तव्याला जागलीस तू सत्वरी
कुठली आई अन कुठली मुलगी
विस्मित झाले मी क्षणभरी

पुन्हा वि़चार आला माझ्या अंतरी
आता तुच माझी आई खरी
शुभेच्छा ज्यांनी दिल्या मला
आहे मी त्यांची सदैव आभारी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com