Saturday, April 30, 2011

जा विसरूनी ते आठव या क्षणी

अनुवाद

आठव माझे आहेत तुज जवळी
परतवून दे मला माझ्या आठवणी
आठव माझी कोर्‍या कागदावरची
लिपटलेली त्यात ती काळोखी रात्र
श्रावणातले ओले दिवस आठव मात्र
जा विसरूनी ते आठव या क्षणी
अन परतवून दे माझ्या आठवणी

ग्रिष्मातली पानांची ती पडझड
पडत्या पानांची ती सळसळ
वहात्या झर्‍याची ती खळखळ
कानी माझ्या अजूनी घुमती
आठव माझे आहेत तुज जवळी
जा विसरूनी ते आठव या क्षणी
अन परतवून दे माझ्या आठवणी

पडझडणार्‍या त्या पानांची
गदगदणारी ती हिरवी फांदी
अजुनही करते गदगद
मोडून टाक तिला आधी
आठव माझे आहेत तुज जवळी
जा विसरूनी ते आठव या क्षणी
अन परतवून दे माझ्या आठवणी

पडक्या सडक्या त्या छताखाली
चिंब भिजलो होतो आपण दोघे
अर्धे वाळलेले अन अर्धे ओले
वाळून परतून आल्यावरीही
मन माझे होते तरीही ओले
नको वाळवू पुन्हा माझ्या मनाला
आठव माझे आहेत तुज जवळी
जा विसरूनी ते आठव या क्षणी
अन परतवून दे माझ्या आठवणी

हसणे तुझे त्या चांद्ण्या रात्री
आठव गालवरची तुझी ती खळी
ती अळीमिळी आणि गुपचीळी
खोटी खोटी तुझी दांभिक बोलणी
आठव माझे आहेत तुज जवळी
जा विसरूनी ते आठव या क्षणी
अन परतवून दे माझ्या आठवणी

करण्या दफन त्या आठवणींचे
देशील का मज एकच अनुमती
घेईन मग मी चीरशांती
त्या दफनामध्ये कायमचे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 27, 2011

हिच खरी समस्या असे जीवनाची

अनुवाद

सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची

ओठावरती ढंग आणिला हास्याचा
विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा
अचानक हे काय झाले
चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा

केला अहंभाव दूर तो असताना
करूनी यत्न त्या विषादाला
ठेवीले दूर मी हृदयातून
परी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला

सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, April 24, 2011

कोकणातली फुलं.

“फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”

अरूणला फुलांविषयी विशेष वाटतं हे मला माहित होतं.त्यादिवशी असाच फुलांवरून विषय निघाला.त्याला मी म्हणालो तुला फुलं आणि फुलांचे प्रकार पहायचे असतील ह्या वेळी तू माझ्या बरोबर कोकणात ये.अरूणने कोकण कधीच पाहिलं नव्हतं.मुंबईला जन्माला आला आणि मोठा झाला.
“आमची -सिकेपी लोकांची-वसाहत फारफारतर ठाण्यापर्यंत पसरली आहे.एकवीरा आमची देवी. माणिकप्रभू आमचे गुरू.कोकणातून येणारे आंबे आणि फळफळावळ जी मुंबईत येते त्यावरून कोकणाचा संबंध येतो.”
अरूण मला म्हणाला.

“पण फुलांसाठी तुला मे महिन्यात कोकणात यावं लागेल.आंबे गरे आणि इतर फळं तुला त्यावेळी तिथे मिळतीलच,पण अनेक तर्‍हेची फूलं पहायला निश्चीतच मिळतील.”
मी असं म्हणाल्यावर माझ्याबरोबर ह्या मे महिन्यात अरूण कोकणात यायला कबूल झाला.

अशी निरनीराळ्या जातीची फूलं अरूणने पहिल्यांदाच पाहिली.वेंगुर्ल्याच्या बाजारात नेऊन मी त्याला विकायला आलेल्या फुलांच्या जाती दाखवल्या.
पुस्सट लाल रंगाची आणि भडक लाल रंगाची आबोली,पांढरी आणि सफेद रंगाची शेवंती,
सुरंगीचे वळेसार,नाग चाफा-सफेद पाकळ्या आणि मधे पिवळं जर्द फूल,नाग चाफयाला तर एव्हडा सुगंधी वास की नको त्या ठिकाणाहून माश्या गोळा होवून फुलाभोवती भूंग्या सारख्या गुजन करीत रहायच्या.खरं म्हणजे त्यांच्या फुलाभोवतीच फिरण्याने त्यांच्या पंखाचा आवाज गुंजन कसं वाटायचं.तिच स्थिती सुरंगीच्या वळेसाराची.कोकणात फुलांच्या वेणीला वळेसार असं म्हणतात.वळेसार आणि वेणी यांच्या बनावटीत थोडा फरक असतो.

चाफ्याचा आणखी किती जाती-पांढरा चाफा,सोन चाफा,हिरवा चाफा,पिवळा चाफा,कवठी चाफा,
त्यानंतरआणखी फूलं म्हणजे ओवळं,सुरंगी,लालआबोली,मोगरा,जाई,जूई,तगडीची फुलं-ही फुलं थेट जाई-जुई सारखी दिसतात पण ह्यांना कसलाही सुवास नसतो.मुंबईत ही फुलं खूप स्वस्त असतात म्हणून फुलवाले जाईच्या वेणीमधे तगडीचीच फुलं जास्त ओवून जाईची वेणी म्हणून विकतात आणि फसणारे फसतात.प्राज्क्ताची फुलं,रात्रराणी,कृष्णकमळ,साध कमळ कण्हेरीची फुलं,नीशीगंधाची फुलं,घाणेरीची फुलं-ह्या फुलांना खूप मोहक वास येतो.जास्वंदीची फूलं-ही फुलं जास्त करून देवाला वाहतात,ह्यांना सुगंध मुळीच नसतो पण दिसायला रंगाने लालबूंद आणि छान दिसतात.
दुसरी कोकणातच दिसणारी फुलांची जात म्हणजे ओवळं.
ओवळ्याची फूलं वेली वरून जमिनीवर पडतात आणि ती वेचावी लागतात.ओंजळभर फूलं हातात घेऊन वास घेतल्यास Elizabeth perfume सुद्धा मागे पडेल. केवड्याच्या फूलाची तर एव्हडी महती आहे की म्हणतात ह्या फूलाच्या झुडपात सापाचे वास्तव्य असतं.ते त्या फुलाच्या
वासामुळे की अन्य काही कारणामुळे आहे हे मात्र कळलं नाही.गुलाबाच्या असंख्य जाती आहेत पण अरूणला मी लालगुलाब,पिवळा गुलाब,सफेद गुलाब,काळा गुलाब दाखवू शकलो.
मी अरूणला म्हणालो,
“ही फुलं मला आढळलेली आणि मला माहित असलेली आहेत.यापेक्षा खूप जातीची फुलं कोकणात असतील.”

हे सगळं पाहून झाल्यावर मला अरूण म्हणाला,
“मला फुलांविषयी विशेष वाटतं.मला वाटतं फुलांचा उपयोग एकमेकाशी दुवा साधायला चांगलं साधन आहे. देवांना तर आपण त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करीत असतो.गणपतीला लाल रंगाचं फूल,कृष्णाला,लक्ष्मीला कमळाचं फूल आवडतं.
फुलांच्या रंगावरून ते कशाचं प्रतीक आहे हे दाखवता येतं.
गुलाबाचं फूल आनंद आणि मनोहरता दाखवतं, पांढरं-सफेद फूल दिलासा देतं.
फूलं देण्या-घेण्याने आनंद तर मिळतोच शिवाय व्यक्तीची वृत्ति दिसून येते.व्हॅलेंनटाईन दिवशी तरूण-तरूणीच नव्हे तर कुणीही कुणाला फूलं देत-घेत असतं.अशावेळी फूलं देऊन एकमेकावरचं प्रेम दाखवता येतं.”

मी अरूणचं हे ऐकून भुतकाळात गेलो.मी त्याला म्हणालो,
“फुलांमधून आठवणी जागवल्या जातात.मला आठवतं आमच्या लहानपणी आमचे आजोबा आमच्या गावात आले की आम्हाला शेवंतीचे रोप आणून द्यायचे.लागलीच आम्ही ते आमच्या बागेत लावायचो.आता आमचे आजोबा हयात नाहीत पण पिवळी जर्द आणि पांढरी शुभ्र शेवंती बहराला आल्यावर आम्हाला आमच्या आजोबांची निक्षून आठवणी येतात.

आमच्या आजीला जाई-जुई खूप आवडायच्या.माझ्या आजोळी तिने घराच्या पुढच्या पडवीत आणि मागच्या अंगणात जाई-जुईचे वेल लावले होते.आता आमची आजी नाही.पण आजोळाला गेल्यावर पडवीत बसल्यावर वार्‍याच्या झोतीबरोबर जेव्हा त्या फुलांचा वास नाकात शिरतो तेव्हा त्या वासाबरोबरआजी डोळ्यासमोर येऊन जाते.

मला वाटतं फूल प्रत्येकाच्या व्यक्तीत्वाला प्रेरीत करतं.मला असं वाटण्याचं कारण सर्व फूलं वेगळी वेगळी असतात.त्यांचा सुवास,बनावट,आकार,विस्तार आणि रंग हे त्यांचं वैशिष्ट असतं आणि त्यात खूबी असती.एव्हडच नाहीतर सारख्याच जातीची फूलंसुद्धा थोडी वेगळी असतात. गुलबहाराची फुलं पाहिलीत तर त्यात विभिन्नता जाणवते.ह्या फुलात रंग आणि छटा वेगळ्या असतात तसंच,पाकळ्यांचा आकार आणि पाकळ्यांची संख्या वेगळ्या असतात वगैरे. निरनीराळी फूलं एकाच ठिकाणी उगवली तरी नव्या वातावरणात ती सामावून जातात.”

मला अरूण म्हणाला,
“माझ्या मनात येतं,माणसं जरका ह्या दृष्टीने फुलांसारखी असती तर जग किती चांगलं झालं असतं.
ज्या घराच्या समोर उत्तम फुलांचा, रंगीबेरंगी फुलांचा बगीचादिसला की चटकन घरमालकाच्या व्यक्तित्वाचं लक्षण दिसतं.बगीचा नीट आणि अनोखा दिसला की समजावं माळीच तसा असणार. बगीच्यात जरका झगझगीत रंगाची फूलं दिसली आणि असाधारण रोपं असली की समजावं त्या बगीच्याचा मालक गमतीदार आणि धाडसी असावा.
थोडक्यात,माझ्या दृष्टीने फुलं माणसाच्या जीवनात विशिष्ट स्थान ठेवून असतात.म्हणूनच फुलांचा आणि बगीच्याची कदर केली पाहिजे.फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”

मी अरूणला म्हणालो,
“मी लहानपणापासून कोकणातली ही फुलं पहात गेलो आहे.पण तुझं फुलांबद्दलचं तत्वज्ञान ऐकून ह्या सर्व फुलांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे.आता मी मिळेल त्या फुलाकडे नुसतं त्याचा वास घेऊन रहाणार नाही,प्रत्येक फूल काय संदेश देईल का हे कुतूहलाने पाहिन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 21, 2011

कार्यरत करणारी सकाळ.

“तसंच जीवनात उतावळेपणाने न वागता, आहे तसंच जीवन उपभोगायला, हे आंघोळीचे क्षण, मदत करतात.आणि पुन्हा उद्या उजाडल्यावर मला प्रयत्नात राहून ती यादी संपूष्टात आणता येतेच ते अलायदा.”

पद्मा एका फायनान्स कंपनीत व्हिपी आहे.मला थोडी गुंतवणूक करायची होती.म्हटलं पद्माच्या ओळखीचा फायदा घ्यावा.म्हणून तिच्या नरिमनपॉइन्ट्वरच्या ऑफिसात तिला भेटायला गेलो होतो.पद्मा तिच्या कॅबिनमधे नव्हती.तिचा पिये म्हणाला,
“तुम्ही त्यांची अपॉइन्टमेन्ट घेऊनच या”
तशीच मी पुढल्या आठवड्यातल्या गुरवारची अपॉइन्टमेन्ट घेतली.त्या गुरवारी माझी वाट पहात पद्मा बसली होती.मला पाहिल्यावर तिला फारच आनंद झाला.खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो.

इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यात वेळ गेला.मुद्याचं बोलण्यापूर्वी तिच्या बॉसचं तिला बोलावणं आलं.उठताना मला म्हणाली,
“ह्या रवीवारी माझ्या घरीच या.मी तुमची वाट पाहिन.शिवाय माझ्या बाबांना तुम्हाला भेटून खूप बरं वाटेल.”
बरं म्हणून मी ऊठलो.

त्या रवीवारी तिच्या घरी मी लवकरच गेलो.ती पेडर रोडवर रहाते.बेल वाजवल्यावर तिच्या बाबांनीच दरवाजा उघडला.मला पाहून ते खूश झाले.
“सकाळीच मी तुम्हाला उठवलं नाही ना?पद्माचीपण झोपमोड केली की काय?”
मी तिच्या बाबांना म्हणालो.

“अहो कसली झोपमोड?पद्मा केव्हाचीच उठलेली असते.मग रवीवार असो की आणखी कोणता दिवस असो.उठल्याबरोबर ती प्रथम आंघोळीला जाणार.”
पद्माच्या बाबांनी मला रोखठोख सांगीतलं.
तेव्हड्यात पद्मा तीन कप चहाची ट्रे घेऊन आली.

माझ्याजवळ चहाचा कप पूढे करीत पद्मा मला म्हणाली,
“माझे बाबा सांगतायेत ते अगदी खरं आहे.मी सकाळी उठून आंघोळ केल्याशिवाय दुसर्‍या कसल्याच कामाला लागत नाही.ही सवय मी माझ्या आजीकडून घेतली आहे.”
असं म्हणून पुढे सांगू लागली,
“आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणाबद्दल मला विशेष वाटतं.
दिवस उजाडल्यावर काही लोकाना सकाळीच एक कप कॉफी प्यायला किंवा ताजं वर्तमानपत्र वाचायला हवं असतं.मला मात्र सकाळीच आंघोळीची जरूरी वाटते.उगवलेल्या दिवसासाठी सुचणार्‍या विचारातले काही उत्तम विचार मला ह्या नेहमीच्याच,साध्यासुध्या आंघोळीच्यावेळीच सुचतात.नित्य-दिन -कामं करायची यादी मी ह्याचवेळी करते.दूरवरच्या कामाची आंखणी मी ह्याचवेळी करते.उदा.ह्या आठवड्यात मिटिंग कुठच्या शहरात आहे?तिकडे जाण्याच्या तिकीटाची व्यवस्था वगैरे.”

“पण हे सगळं तुझ्या लक्षात कसं रहातं?”
मी तिला विचारलं.
मला म्हणाली,
“पण ह्या आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणाची एक कटकट म्हणजे,टॉवेल गुंडाळून मी बाथरूमच्या बाहेर आले, की ते क्षण आणि त्यावेळचे विचार संपुष्टात येतात.जसे रात्री झोपण्यापूर्वीचे झटकन विसरून जाणारे विचार येतात अगदी तसे.जरका मी कागद आणि पेन घेऊन बाथरूमात गेले नाही आणि विचार टिपले नाहीत तर शेवटी ते विचार मी विसरून जाते,कधीकधी काहीसे अंधूकसे हे विचार आतल्या मनात आठवण म्हणून रहातात एव्हडंच.दिनचर्या चालू झाल्यावर मी माझे नित्य-कार्यक्रम संपवीन किंवा कसं हे जवळ जवळ माझ्या मनातल्या हेतू ऐवजी माझ्या नशिबावरच अवलंबून असतं.

परंतु,माझे प्रयत्न निरर्थक जात नाहीत.आंघोळीमुळे माझ्ं शरीर साफ होतं एव्हडंच नाही तर माझा उत्साहपण ताजा-तवाना होतो.मी सकाळी उठते आणि माझ्या डोक्यातली पुस्सट झोप साफ करते.नित्य-कर्माच्या तयार केलेल्या यादी पलिकडे जाऊन त्या दिवसाचं माझं लक्ष्य गाठण्यासाठी मला हवी ती शांतता मला इथेच मिळू शकते.त्या खास दिवसाविषयी विचार करून मग तो दिवस कसा घालवावा याचा विचार करायची मुभा मला इथेच मिळते.

एखाद्या ग्रिटिंग-कार्डावर लिहिलेल्या मजकूरासारखा लहान लहान गोष्टींचा विचार करून माझंच मला मी समजावून घेते.-आयुष्यात समतोल वृत्तिने रहावं,लहान मुलांच्या नजरेतून जगाकडे पहावं,कुंडीतल्या कुठच्या रोपाना फुलं येऊ घातली आहेत,वगैरे.”

माझी मुलं ज्यावेळी लहान होती त्यावेळी मी गृहिणी म्हणून घरातच असायची.शेजार मला नवाच होता.काही मैत्रिणी मिळवल्या आणि काही कामं काढून दिवस हेतुःपूरस्सर संपवायची. आता दहा वर्षानंतर ते दिवस मला आठवतात आणि त्या दिवसाना मुकल्यासारखं वाटतं.पण ते दिवस कष्टाचे-हालाचे होते हे मला माहित होतं.निसुक होऊन बिछान्याला पाठ टेकवायची,थकवा यायचा,आणि वाटायचं ह्यालाच म्हणावं का जीवन?.आणि दुसरा दिवस उजाडल्यावर-बहूदा कुणाकडून तरी “आई!” अशी- हांक ऐकायला यायची.बाथरूमकडे धाव घ्यायची.आणि मनात पहिला विचार यायचा,
“होय!,हा नवीन दिवस उजाडला आहे,सर्व काही ठिक होणार आहे.आजचं साहस काय होणार आहे ते मात्र माहित नाही.”

आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणाबद्दल मला विशेष वाटतं,कारण ते क्षण त्यानंतर मला ताजी-तवानी करून,माझ्या क्षमतेच्या आणि हेतूंच्या तजवीजीला लागण्यासाठी मदत करतात. आंघोळीचे क्षण मला, नम्र रहाण्याचं,आई म्हणून आणि पत्नी म्हणून संतोषी रहाण्याचं,माझी अडखळलेली कामं पुर्णत्वाला आणण्याच्या क्षमतेचं आणि संवेदनाशील असताना आजुबाजूला असलेल्या वयस्करांना आठवणीत ठेवण्याचं प्रोत्साहन देतात.

जरी कदाचीत,माझ्या रोजच्या ज्या काही योजना असतात त्या साध्य करायाला किंवा त्यात प्रगती करायला मला जमलं नाही तरी मामुली दिसणारे हे नित्याचे आंघोळीचे क्षण मला मनःशांती आणि चिंतन करायला लाभदायक ठरतात.त्यामुळे माझ्या जीवनाची आणि त्यात सामावून गेलेल्या इतरांची कदर करायला मला क्षमता देतात.
तसंच जीवनात उतावळेपणाने न वागता आहे तसंच जीवन उपभोगायला, हे आंघोळीचे क्षण, मदत करतात.आणि पुन्हा उद्या उजाडल्यावर मला प्रयत्नात राहून ती यादी संपूष्टात आणता येतेच ते अलायदा.”

मी पद्माशी अशाच गप्पा मारीत बसलो तर माझं मुळ काम पूर्ण होणार नाही असं माझ्या मनात येईतोपर्यंत पद्माच म्हणाली,
“मी माझं हे आंघोळीचं पूराण सांगत बसली तर त्यादिवसासारखं व्हायचं.तुमचे कागद मला द्या.मी वाचून झाल्यावर त्यावर निर्णय घेऊन तुम्हाला सांगते.”

“नक्कीच उद्याच्या तुझ्या आंघोळीच्यावेळी येणार्‍या क्षणात माझा विषय तुझ्या यादीत आण म्हणजे झालं.”
असं हसत हसत म्हणत मी उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 18, 2011

रंगतदार नरेन्द्र डोंगर.

“आलास तर धावत्या भेटीवर येऊ नकोस.संध्याकाळच्यावेळी आपण डोंगरावरून वेंगुर्ल्याचा समुद्र आणि लाईट-हाऊस एकदा तरी पाहूया.तशात जर गोव्याकडून आलेली बोट दिसली तर खरंच मजा येईल.”
इंदू उठता उठता मला म्हणाली.

माझ्या मावसबहिणीने-इंदूने-फार पूर्वी सावंतवाडीला नरेन्द्र डोंगर्‍याच्या पायथ्याशी एक छोटसं घर बांधून घेतलं होतं.आता त्याला बरीच वर्षं होऊन गेली.
खरंतर वाडवडीलांच्या जुन्या घराचा कायापालट तिने करून घेतला होता असं म्हटलं तर जास्त उचित होईल.इंदू तिच्या लहानपणापासून ह्या घरात वाढली. लग्न झाल्यावर ती काही काळ घराला मुकली होती.आईवडीलांची एकच एक मुलगी असल्याने त्यांच्या पश्चात तिलाच हे घर मिळालं.जीवनाच्या संध्या-छायेत असताना ह्या घरात रहायचं तिने ठरवलं होतं.
मला भेटायला शहरातआली होती तेव्हा तिच्या नव्या घराच्या नव्या आणि जून्या आठवणी मला सांगत होती. त्याची आठवण आज मला झाली.

मला इंदू म्हणाली,
“आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेरून दिसतो तोच नरेन्द्र डोंगर.लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटातून तत्प रस उफाळून वर पृष्ठ भागावर येऊन नंतर कालांतराने तो रस थंड होऊन त्याजागी हे असेच अनेक डोंगर पृथ्वीवर निर्माण झाले आहेत. नरेन्द्र डोंगर हा त्यातलाच एक आहे.”
चिरायु झालेले हे डोंगर म्हणजे प्रेमाचं प्रतिक असतं. असं इंदू म्हणते.

“कोकणातल्या पावसच्या दिवसात डोंगराच्या माथ्याला जेव्हा काळेकुट्ट ढग चिकटलेले दिसतात . तेव्हा आणि डोंगराचे सर्व उभारलेले भाग जेव्हा ढगाच्या आत खूपसल्यासारखे दिसतात,तेव्हा ते धुरकटलेलं सर्व वातावरण पाहून मलाच मी हरवून जाते.”
इंदू मला सांगत होती.आणि पुढे म्हणाली,
“मान्सूनचा वारा सोसाट्याने वहात असल्याने,बारकाईने, ऐकण्याकडे लक्ष दिल्यास,डोंगरावरच्या सर्व झाडी मधून येणार्‍या वार्‍य़ाचं एक विलक्षण संगीत ऐकायला मिळाल्याचा आनंद होतो.
हे झालं पावसातलं वातावरण.कोकणात पडणार्‍या भरपूर पावसामुळे,नरेंद्र डोंगर कधीच बोडका दिसत नाही. ह्या डोंगरावर निरनीराळ्या वृक्षजाती आहेत.काही औषधी झाडा-पालाही मिळतो.डोंगर सदाचा हिरवागार असतो. काही लोक डोंगरावर शिकारीला जातात.बिबटा वाघ,गवा रेडा,रानडूकर असले प्राणी लोकांनी पाहिले आहेत.अर्थात निरनीराळ्या जातीचे साप,खारी,तसेच चित्र-विचीत्र रंगाचे पक्षीपण पाहायला मिळतात.
जसे ऋतू बदलतात तसे डोंगरावरचे रंगही बदलतात.पावसातल्या हिरव्या गार रंगानंतर,थंडीत काळसर भूरा होत होत बैंगनी दिसायला लागतो आणि भर उन्हाळ्यात पाण्याच्या आभावी काही ठिकाणी पिवळसर सुका रंग दिसतो.हे रंग विशेषकरून संध्याकाळच्यावेळी सूर्यास्त होत असताना निक्षून दिसतात.
त्याचं मुख्य कारण डोंगराच्या पलीकडून अस्ताला जाणार्‍या सूर्याच्या रंगीबेरंगी किरणांची ही किमया असावी.

गावातल्या मोती तलावाच्या पश्चिमेला हा डोंगर आहे.मोती तलावाच्या सभोवती सावंतवाडी शहर वसलेलं आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्यावेळी डोंगर चढून वर गेल्यावर सूर्यास्ताच्यावेळी वेंगुर्ल्याचा समुद्र स्पष्ट दिसतो.काहीवेळा मुंबईहून आलेली बोट सकाळी उशीरा आल्याने,गोव्याला जाऊन परत मुंबईला जाण्यासाठी वेंगुर्ला बंदरावर मुंबईला जाणार्‍या प्रवाश्यांना घेऊन जायला ही बोट पुन्हा येते तेव्हा
बंदराच्या बाहेर नांगरलेल्या त्या बोटीला पाहून खूपच मजा येते.बोटीच्या धूरकांड्यातून वर येणारा धूर, वार्‍याच्या लयीवर वाकडा-तिकडा होत असताना दिसतो. काळोख होत असल्याने दोन्ही दिशेला दूरवर रोवलेले लाईट-हाऊसचे खांबे लुकलुकताना पाहून डोळे दिपतात.
संध्याकाळच्यावेळी सावंतवाडी शहराचं विलोभनीय दृश्य ह्या नरेन्द्र डोंगरावरून पहायला मिळतं.”

हे सर्व मला सांगत असताना इंदू थोडी भावनावश होत असल्याचं मला दिसलं.
मी म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“तो डोंगर माझा आहे.देवाने मला सांगीतलंय की,मी जरका त्याला साजेसा रंगवला तर तो मला मिळू शकतो.”
अर्थात,हे कुठच्याही डोंगराच्या संबंधाने केलेलं कवी-मनातलं विधान आहे.तुला तसं काहीसं नरेन्द्र डोंगराच्या बाबतीत वाटतं का?”

ऐकून इंदू म्हणाली,
“हीच कल्पना नरेद्र डोंगराच्याबद्दल मी माझ्या डोक्यात ठेवते.तो डोंगर माझा स्वतःचा होऊन सदाचाच माझ्या मनात रहावा असा माझा इरादा असतो.
जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा मी खिडकीतून नरेन्द्र डोंगराकडे पहात असते. माझ्या मनाला थोडा दिलासा मिळतो.माझ्या मुलांना काही समस्या निर्माण झाल्यास,नरेन्द्र डोंगराच्या पडलेल्या सावलीत मी लांबवर एकटक पहात असते.काहीतरी धीर देणारे विचार मला सुचतात. माझ्या ऐन्शी वर्ष वयाच्या आईला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मी नरेन्द्र डोंगराशी बोलले होते.माझ्या नवर्‍याला जेव्हा त्याच्या धंद्यात अडचणी यायला लागतात, तेव्हामाझ्या सान्तवनासाठी आमच्या घराच्या मागे येणार्‍या डोंगराच्या संध्याकाळच्या सावल्या माझ्या मनाला स्थिरता आणतात असं मला वाटत असतं.

माझ्या मनाचा एकच निश्चय झाला आहे की नरेन्द्र डोंगराचा विसर पाडून घ्यायला मला शक्यच होणार नाही नव्हेतर तसं व्ह्यायला मला अश्रू ढाळून डोळे सुजवून घ्यावे लागतील.

का कुणास ठाऊक,इतरांचं मला काही माहित नाही, पण मी मात्र, हा डोंगर त्याच्या संध्याकाळच्या रंगीबेरंगी छटामधे कसलीतरी जादू धरून असतो हे पक्क मानते.अगदी जसं जीवनात होतं तसं.
बरेच दिवसापूर्वी एकदा आम्ही सूर्यास्ताच्यावेळी डोंगर चढून वर गेलो होतो.डोंगरावर जागोजागी वारली लोक झोपड्या बांधून गेली कित्येक वर्ष राहत आहेत.तेव्हा आम्ही पाहिलं की,काही स्थाईक लोक सूर्यास्तावेळी आपली कामं क्षणभर थांबवून,सूर्याची लुप्त होणारी किरणं डोंगराला प्रज्वलीत करतात,त्यावेळी हळू हळू येणार्‍या सावलीतून सर्व डोंगर काळोखाच्या छायेत जात असताना मनात प्रार्थना करीत असतात.तो क्षण ते निरखून न्याहळत असतात.मला कुणी सांगीतलं की हिमालयात पण असाच एक रिवाज आहे.आम्ही पण संध्याकाळी आमच्या घरात सूर्यास्तावेळी हा क्षण साजरा करतो.
काही क्षणच,दूरवरच्या डोंगरावरच्या लोकांशी जोडले जाऊन त्या अविनाशी रंगीबेरंगी सूर्यकिरणांच्या देखाव्याशी आम्ही जोडले जात असतो.ह्या क्षणभर टिकणार्‍या वरदानचं आम्ही आदर करतो. आम्ही डोंगरावर गेलोच नसतो तर हा रिवाज आमच्या लक्षात आलाच नसता.

आता संध्याकाळी स्वयंपाक करीत असताना,सूर्यास्त होत असताना,स्वयंपाक घरातल्या खिडकीतून त्या क्षणाशी एकरूप व्हायला मला बरेच वेळा संधी सापडते.लहानपणी ह्याच घरात मी वाढले असल्याने,माझ्या आईबरोबर तिला मदत करायला संध्याकाळच्यावेळी स्वंपाकघरात वावरण्याचा मला बरेचवेळा योग आला होता.उजाडलेल्या दिवसाच्या लयबद्धतेत दिवसाच्या अंत होण्याच्या लयीमधे माझं लहानपणापासून निर्माण झालेलं हे खास गठबंधन असावं.
सूर्यास्ताबरोबरचे माझे जिव्हाळ्याचे संबंध माझ्या जीवनाशी अजूनपर्यंत निगडित राहिलेले आहेत.

नरेन्द्र डोंगरातून मिळणारी शक्ती आणि सुंदरता मी रोज माझ्या संग्रहात ठेवण्याच्या प्रयत्नात असते.उद्याचं कुणी सांगावं.सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या त्या रंगीत क्षणांच्या छटा माझ्या जीवनावर सकाळपासून रात्र होईतोपर्यंत पडतात,त्या समजून घेण्याच्या आणि त्यांची प्रशंसा करण्याच्या मी प्रयत्नात असते.

ह्या डोंगरात असलेल्या क्षमतेमधून मी शक्ती आणि परिश्रम ह्याबद्दल शिकेन ह्यावर माझा भरवसा आहे.तसंच, माझ्या उरलेल्या जीवनात जरूरीचं यथादर्शन तो मला देईल अशी मी आशा करीत असते.सदासर्वकाळ सूर्यास्त आणि नरेन्द्र डोंगर ह्यांच्या मी प्रेमात पडलेली रहावी अशी मी इच्छा करीत असते.”

मी इंदूला म्हणालो,
“माझी मावशी असताना मी बरेच वेळा तुझ्या ह्या सावंतवाडीच्या घरात राहून गेलोय. आमच्या लहानपणी संध्याकाळच्यावेळी मावशी मिणमिणत्या दिव्यात नरेन्द्र डोंगरावरच्या श्वापदांच्या,गोष्टी रंगवून,रंगवून सांगायची.
त्यामुळे नरेन्द्र डोंगराबद्दल मला तरी निराळीच भीती वाटायची.
तुझ्याकडून आता हे ऐकून मलाही ह्या डोंगराबद्दल प्रेम वाटायला लागलंय.वेळात वेळ काढून मी नक्कीच सावंतवाडीला येईन.तुझ्या दृष्टीकोनातून
डोंगराकडे पहायला मला निश्चितच आनंद होईल.”

“आलास तर धावत्या भेटीवर येऊ नकोस.संध्याकाळच्यावेळी आपण डोंगरावरून वेंगुर्ल्याचा समुद्र आणि लाईट-हाऊस एकदा तरी पाहूया.तशात जर गोव्याकडून आलेली बोट दिसली तर खरंच मजा येईल.”
इंदू उठता उठता मला म्हणाली.
मी त्यानंतर वेळातवेळ काढून सावंतवाडीला गेलो होतो. इंदूबरोबर नरेन्द्र डोंगर चढून गेलो होतो.आणि वेंगुर्ल्याचं बंदर तसंच गोव्यावरून येणारी बोट पाहिली होती.खुश झालेला इंदूचा चेहरा अजून मला आठवतो.

आता इंदू राहिली नाही.त्यानंतर मी पण बरीच वर्षं सावंतवाडीला गेलोच नाही.नरेन्द्र डोंगराचा आता कायापालट कसा झाला असेल कुणास ठाऊक.बदल होत असतात.आणि बदल झालेच पाहिजेत.नरेन्द्र डोंगरावर चढून ती गोव्याहून आलेली बोट इंदूबरोबर जाऊन पहायला एकदाच माझ्या भाग्यात होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Friday, April 15, 2011

निःशब्द राहूनी सांगे झोपडी कहाणी.

होती ती एकच झोपडी
नजर कुणाची त्यावर पडली
होते त्यावर एक मोडके छ्प्पर
त्यामधून दिसे आतले लक्तर

उजाड आगगाडीच्या फाट्यात
त्याने बांधली झोपडी थाटात
नजरेला त्याच्या वाटे तो महाल
ती झोपडी असेच तुम्ही म्हणाल

जर असता तो त्या महालाचा राजा
त्यजीला असता न करता गाजावाजा
पण
ओतले त्याने त्याचे त्यात सर्वस्व
कसा सहन करील कुणाचे वर्चस्व

होती पहात वाट त्याची राणी
सोसूनी दैना टिपे डोळ्यातले पाणी
गरीबी,दुःख, हानी असे त्यांच्या जीवनी
निःशब्द राहूनी सांगे झोपडी कहाणी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 12, 2011

नाचातला आनंद.

“मी लग्नकार्यात नेहमीच नृत्य करतो.तुम्ही नृत्य करता का? मला वाटतं तुम्हीही करावं.मला तरी असं वाटतं.”

परवा माझ्या एका नातेवाईकाच्या नातीच्या लग्नाला मी गेलो होतो.लग्नकार्य मस्त झालं होतं. बाकी सर्व कार्यक्रम नेहमीचे झाले तरी जेवणं झाल्यावर नाचाचा कार्यक्रम होता.सर्वांनी मिळून येऊन नाचायचं होतं.
पंजाबी लोकांच्या लग्नकार्यात नाचाचा अविभाज्य भाग असतो.हे मला ठाऊक होतं.पण आता आपल्या मराठी लोकांच्या लग्नात नाच असणं हे मला जरा नवीनच होतं.

मला फारच आग्रह झाल्याने मी पण थोडा नाचलो.पण मला दमायला झालं.स्टेजवरून खाली येऊन एका सोफ्यावर आराम करीत होतो.स्टेजवर फार जोरजोरात आनंदात येऊन नाचणारे एक गृहस्थ माझ्या जवळ येऊन बसले.बरेच थकलेले दिसत होते.

मला म्हणाले,
“मी लग्नकार्यात नेहमीच नृत्य करतो.तुम्ही नृत्य करता का?
मला वाटतं तुम्हीही करावं.मला तरी असं वाटतं.”
मी म्हणालो,
“अहो,मी प्रथमच आज नाचलो.जरा दमायला झालं म्हणून आराम करायला खाली येऊन बसलो.”
मग आमच्या गप्पा चालू झाल्या.

ते गृहस्थ मला म्हणाले,
“जीवनसंबंधाने आणि प्रेमसंबंधाने, लग्नकार्य हा एक, आनंद करण्याचा आणि समारोहात भाग घेण्याचा उत्तम प्रसंग आहे.
हा समारोह होत असताना,वरातीचा सोहळा चालूच असतो,सोहळ्याच्या मागोमाग स्वागत-समारोह होत असतो,भोजन-समारोहा मागोमाग नृत्याचा कार्यक्रम चालू होतो.
नृत्य चालू झालं म्हणजेच,खरा समारोह चालू होत असता असता समाप्तीला येतो, ती वेळ आली असं समजायला हरकत नाही.तसं पाहिलत तर हा लग्न-सोहळा म्हणजे सबकुछ नृत्याचा सोहळा असं मला नेहमीच वाटत असतं.मी नेहमीच लग्नाच्या सोहळ्यात नाच करतो.”

“मी तुम्हाला नाचाताना पाहिलं.तुमची एनर्जी पाहून मला तुमचं कौतूक वाटलं.”
मी त्यांना म्हणालो.
माझं त्यांच्या विषयीचं मी सांगीतलेलं मत ऐकून गृहस्थ खूष झालेले दिसले.समोर आलेल्या वेटरच्या ट्रेमधून एक ग्लास सरबत मला देत एक आपण घेत मला म्हणाले,
“मी तुम्हाला ह्या नाचाविषयी माझा अनुभव सांगतो”
सरबत घटकन पिऊन झाल्यावर मला म्हणाले,
“गेल्या महिन्यात मला अशाच एका लग्न-सोहळ्या्चं आमंत्रण आलं होतं.मला नाचायची संधी मिळाली होती.आणि मी प्रचंड खूश झालो होतो.रुढीनुसार लग्न सोहळा संपता संपता छायाचित्र टिपण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर लगेचच,जेवणाचा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम संपायला येता येता गान-वादनाचा ऑर्केस्ट्रा वाजायला सुरवात झाली.काही लोक नाचायच्या तयारीने स्टेजवर यायला लागले.काही स्टेजवर येऊन इकडे तिकडे घुटमळायला लागले.काही पेयांच्या काउंटरकडे जाऊन ग्लासं भरून भरून प्यायच्या तयारीला लागले.थोडा अवधी निघून जाईतोपर्यंत स्टेज गच्च भरून गेलं होतं.सर्व खुशामतीत आलेले दिसत होते.नाच-गाणं चालू झालं होतं.

बराचवेळ नाचल्यानंतर मला खूपच दमायला झालं.स्टेजवरून खाली उतरल्यावर आजुबाजूला पाहिल्यावर बरेच लोक बघ्या सारखे बसून होते असं माझ्या लक्षात आलं. आपआपसात कुजबूज करून स्टेजवर चाललेल्या नृत्याच्या कार्यक्रमावर कुत्सीत टिका करीत होते नाकं मुरडीत होते. फाल्तुगीरी आहे असं पुटपूटत होते.काही एकाकी झालेले दिसत होते,कंटाळलेले दिसत होते.

अश्या लोकात गप्पा करायला मला जरा कठीण व्ह्यायला लागलं.मला तर नाचून नाचून मजा आली होती.मी अगदी थकून गेलो होते.आणि का न तसं व्हावं? तसं पाहिलंत तर सर्वचजण समारोहाचा आनंद घ्यायला आले होते.वधु-वरांना आशिर्वाद द्यायला आले होते.वधु-वराच्या प्रेमाच्या आणि वचनबद्धतेच्या शुभ-समयाला त्यांच्या आनंदात भागीदार व्हायला आले होते.

ह्या बघ्यांकडे बघून माझ्या मनात आलं की,ते नेहमीच निरुत्साही असावेत.फार असुरक्षित असावेत.किंवा कदाचीत त्यांना नाच करायला कुणीही सोबती मिळत नसावा.तसं पाहिलंत तर जीवनात असे बरेच प्रसंग येतात की आपल्याला वाटत असतं की,जीवनात उत्साह वाटण्यासारखं काहीच नसतं,काहीना काही गोष्टी करायला असुरक्षित वाटत असतं,एकटं एकटं राहिल्याविना गत्यंतर नाही,वगैरे वगैरे.

पण ही कारणं समारंभासारख्या ठिकाणी न नाचण्यासाठी होऊ नयेत असं मला वाटतं.नृत्य करणं म्हणजे जीवनातल्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करणं.
तसंच नृत्य म्हणजे बर्‍याच गोष्टींचं प्रकटन करणं.जश्या-चांगुलपणा, वाईटपणा, वेदना, परमानंद, रोजच्या आनंदी घटना वगैरे.

पण जे त्या नृत्यात भाग घ्यायला कबूल नव्हते,ज्याना कंटाळा आला होता,ज्याना त्या सोहळ्याचा आनंद लुटावासा वाटत नव्हतं,त्या सर्वांनी जीवनातल्या ह्या अगदी साध्या गंमतीच्या प्रकटनापासून स्वतःला दूरावून घेतलं होतं असं मला त्यावेळी वाटलं.सरतेशेवटी मी म्हणेन की,नृत्य करायला कोणच एव्हडा उदास असू शकत नाही.”

त्यांचं हे ऐकून मला काहीतरी बोलावं असं वाटलं.
मी म्हणालो,
“मला असं वाटतं,आपल्या जीवनात आपण सर्व कधी कधी कद्रु-वृत्तिचे होत असतो.त्यामुळे जीवनातल्या उन्मुक्त नृत्याचा आणि मजेचा आनंद आपल्याला दिसत नाही.एव्हडंच नव्हे तर काही लोक आमच्यासारख्याकडूनसुद्धा त्यातला आनंद उपभोगायच्या मनस्थितीत नसतात.”

“मला हेच म्हणायचं होतं.”
असं म्हणून मला ते सांगू लागले,
“तसं असलं तरी मी मात्र माझ्या तत्वांना चिकटून असतो.भले दुसर्‍या कुणालाही माझ्या नाचण्यात किंवा माझ्या आनंदात विघ्न-संतोषी व्हायचं असलं तरी चालेल.कुणी न्याहाळत नसलं तरी मला नाचायला आवडतं.मग तो नाच लग्नकार्यातला असो,जीवनातला नाच असो, आनंद करतानाचा नाच असो, किंवा मजा करतानाचा नाच असो.मला नाचायला आवडतं.”

परत वेटरकडून एक ग्लास सरबत घेऊन, घटकन पिऊन झाल्यावर स्टेजवर चालू असलेल्या नाचात ते गृहस्थ सामील व्हायला उठले.
मी मनात म्हणालो,
“ऐसाभी कोई होता है”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 9, 2011

आला खुशीत समिंदर.

“ज्यांनी समुद्र त्यांच्या जन्मात कधीच पाहिला नव्हता, ते समुद्राला प्रथमच पाहून आपआपसात बोलत होते,
” ऐसे कितने गंगामय्याके पानी ये एक सागरके लिये पुरा होगा.”

माझा मित्र गिरीश पै याने गोव्याला एका बिचवर एक टुमदार घर बांधलं आहे.मला तो ते त्याचं घर बांधत असताना येऊन बघून जा म्हणून कित्येकदा सांगायचा.

“त्यावेळी नाही आलास.पण आता निदान त्या घरात गृहप्रवेश करताना तरी तू येऊन जावंस.गृहप्रवेश हा एक सोपास्कार आहे.गेले दोन तीन महिने मी माझ्या घरात रहात आहे. समुद्राकडे पाहून माझ्या मनात आलेले विचार तुला सांगावेत ही माझी मनोमन इच्छा आहे.”
असं मला आवर्जून म्हणाला.
ह्यावेळी वेळात वेळ काढून मी त्याच्या गोव्याच्या घरात रहायला गेलो होतो.

मला समुद्राचं किती वेड आहे ते गिरीशला पूर्वी पासून माहित होतं.कोकणातला समुद्र,मुंबईचा समुद्र आणि गोव्यातला समुद्र ही व्हेकेशनमधे रहाण्याची माझी ठिकाणं असायची हेही त्याला माहित होतं.गिरीशलाही माझ्यासारखं समुद्राचं वेड आहे.म्हणूनच त्याने गोव्याला घर बांधलं.

मला म्हणाला,
“मला नेहमीच वाटत असतं की समुद्राचा आणि माणसाचा गुतागुंतीचा लागाबांधा असावा. पुढे असंही वाटतं की समुद्राशी आणि आपल्या नित्य जीवनाशी हा लागाबांधा शारीरिक आणि आध्यात्मिक असा असावा.माझ्या जीवनात हा समुद्राशी असलेला लागाबांधा ठळकपणे उघडकीला आलेला आहे असं मला वाटतं.समुद्रापासून दूर रहायला मी कधीच राजी होत नाही.म्हणून मी इथे घर बांधलं.”

मी गिरीशला म्हणालो,
“माझ्या वाचनातून माझ्या लक्षात आलं आहे की,जीवनाची उत्पत्ति समुद्रातून झाली आहे. जीवनाच्या उभयरोधी रसायनाच्या पाहिल्या पेशींचं पोषण होण्याच्या दृष्टीने समुद्र हा अगदी समर्पक माध्यम असावं.त्या पेशींचं अनुकरण माणसाच्या प्रत्येक पेशीतल्या द्रवपदार्थात फैलावलेलं असतं.
माझं शरीर, माझ्या अतिसंवेदनशील काळात,समुद्राची प्रतिलिपी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ति होऊ नये. माझ्या आईच्या उदरात मी विकसित होत असताना तिच्या गर्भाशयातल्या लवणयुक्त द्रवात मी बुडून गेलेलो असतानाच्या वेळेपासून ते डोळ्यातल्या अश्रूने माझे डोळे साफ-स्वच्छ करेपर्यंत, माझ्या वेदना दूर करेपर्यंत आणि माझा आत्मा प्रकट होई पर्यंत,मी माझ्याबरोबर समुद्राला घेऊन असतो.”

समुद्राबद्दलचं माझं हे मत ऐकून गिरीश भारावल्यासारखा दिसला.आपला अनुभव सांगताना मला म्हणाला,
“पालन-पोषणाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास,समुद्र सुखदायी मुळीच नाही.तो भीतीदायक असतो, असतो,रहस्यमय असतो,शांत असतो,मानून घेणारा असतो,तरीपण भु-भागावरच्या जीवनाला प्रतिकूल असूनही तो मला मात्र आधार वाटतो. रोज माझ्या घरातल्या खिडकीतून मी त्याला न्याहाळत असतो.
कोळ्यांच्या अनेक होड्या रात्रभर दूरवर पाण्यात राहून,सकाळीच जेव्हा टोपल्या भरभरून अनेक तर्‍हेचे मासे कोळी घेऊन येतात ते पाहून माझं मलाच हसू येत असतं.समुद्र आपल्या पोटातून काढलेलं अन्न, आनंदाने इतर जीव-जंतुना पुरवीत असतो.त्याचबरोबर ते मेलेले असंख्य मासे पाहून माझ्या मनात खेदही होतो.समुद्रात पोहत असताना अनेक प्रचंड लाटावर आरूढ होऊन भीत-भीत माझ्या मला मी पाण्यावर झोकून दिलेलं आहे ते मला आठवतं. समुद्राचं ते भयंकर रूप मी न्याहाळल्ं आहे.परंतु,समुद्राविना माझं जीवन अपूरं आहे.एक प्रकारची आध्यात्मिक क्षमता मी समुद्राकडून मिळवली आहे.माझ्या अगोदर पिढ्यानपिढ्यानी हे अनुभवलं आहे.”

“मी पण समुद्रावर खूप लोकांचं लेखन वाचलेलं आहे.”
असं म्हणून मी गिरीशला पुढे सांगीतलं,
“आतापर्यंतच्या अभिलिखित इतिहासावरून आणि निरनीराळ्या संस्कृतीतून आढळत आलेल्या समुद्राच्या रहस्यमयतेमुळे आणि प्रधानलक्षणामुळे, समुद्रानेच, अनेक लोकप्रिय कथालेखनात आणि आध्यात्मिक शिकवणूकीत, आपलं स्वतःचं स्थान अढळ करून ठेवलं आहे.”

“हे तुमचं वाचन झालं.पण मी माझं प्रत्यक्ष अनुभवलेलं सांगतो”
असं सांगत गिरीश मला म्हणाला,
“मला वाटतं,समुद्राकडे लोक आजही जेव्हडे आकर्षित होत आहेत तेव्हडेच अनादिकालापासून आकर्षित होत असावेत.मी रोज माझ्या घरातून पहात असतो की देशातल्या सर्व भागातून लोक समुद्र-दर्शन घ्यायला येत असतात.एव्हडा मोठा पाण्याचा साठा पाहून अचंबीत होत असतात. त्यांच्या गावातल्या नदीच्या पाण्याच्या किती पटीने हे समुद्रातलं पाणी असेल अशी स्वतःच्याच मनात पृच्छा करीत असतात.एकदा मला आठवतं उत्तर-प्रदेशमधून आलेलं एक कुटूंब, ज्यांनी समुद्र त्यांच्या जन्मात कधीच पाहिला नव्हता, ते समुद्राला प्रथमच पाहून आपआपसात बोलत होते,
“ऐसे कितने गंगामय्याके पानी ये एक सागरके लिये पुरा होगा.”

समुद्राला पाहून माणूस आपल्या स्वतःला समुद्राचा एक भाग आहे असं समजून रहातो.
मला वाटतं,ते समुद्र पहायला येतात कारण गुंतागुंतीच्या लागाबांध्याने ते समुद्राशी एकरूप असतात.आणि मला हेही वाटतं की समुद्राद्वारा आपण सर्व गुंतागुंतीने एकमेकाशी लागाबांधा ठेवून आहोत.

शास्त्रीयदृष्ट्या,मी समुद्राकडे पहात असताना, आध्यात्मिक दृष्ट्या मी मानवी समुदायाकडे पहात असतो आणि त्यावर भरवसा ठेवतो.समुद्राकडे असलेला आपला लागाबांधा आणि आपआपसातला आपला लागाबांधा, निरंतर प्रजाति म्हणून रहाण्यातलं आपलं यश ह्याचं, हे प्रतिक आहे असं मला वाटत असलं तर त्यात काही गैर होईल असं वाटत नाही.

मी माझ्या घराच्या खिडकीतून रोज समुद्राकडे पहात असताना,समुद्राशी,पृथ्वीशी आणि एकमेकाशी असलेल्या ह्या लागाबांध्याचा विचार माझ्या मनात आणून हे कुणालातरी समजावून सांगत रहावं असं मला वाटत असतं.”

मी गिरीशला हसत हसत म्हणालो,
“म्हणजे आज तू मला हे सर्व सांगून सुखावला असशील हे निश्चित आहे तर.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 6, 2011

वाट चुकलेली.

त्यादिवशी मी आणि स्वाती “नेचर” वर एक टीव्ही कार्यक्रम बघत होतो.जपानी लोक जवळच्या समुद्रात देवमास्यांची शिकार करतात.असंख्य देवमासे पकडून त्यांच्या मासाचं जेवणात वापर करतात.देवमास्याची डीश “डेलीकसी” म्हणू जास्त किंमतीत विकतात.पर्यावरणवादी लोक, जपानी लोकांनी असं करू नये म्हणून,समुद्रात त्यांच्या शिकार करण्याच्या जागी जाऊन त्यांना विरोध करीत असतात.काहीवेळा एकमेकाच्या बोटी भर समुद्रात एकमेकावर आदळतात.त्यात हानीही होते.असा तो कार्यक्रम होता.

हे सर्व दृश्य टेव्हीवर पाहून झाल्यावर,स्वाती मला म्हणाली,
“ह्या देवमास्यावरून मला माझ्या लहानपणाची आठवण आली. पण ते सांगण्यापूर्वी अलीकडेच मी देवमास्यावर एक बातमी वाचली ती सांगते.ती अशी की एक चाळीस फूट लांबीचा देवमासा समुद्रात पोहत असताना चुकून असं वळण घेतो की तो समुद्राच्या जवळच्या खाडीत येऊन थांबतो.ही घटना वाचून, देवमासा वाट चुकू शकतो हे पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.

खरंतर लहानपणी वाट चुकण्याच्या माझ्या संवयीचं मी इतकं मनाला लावून घेतलं नव्हतं.
तो मासा खाडीच्या किनार्‍याला चिपकून थांबला होता.गावातल्या वर्तमानपत्रात बातमी आल्याने देवमासा पहायला खूप गर्दी जमली होती.काही लोकानी त्या मास्याचं नामकरणसुद्धा केलं होतं.त्याला त्याचं नाव त्यांनी “कुबड्या” असं दिलं होतं.कारण एव्हड्या लांब मास्याच्या पाठीवर एक कुबड होतं.
समुद्रातल्या सस्तन मास्यांवर संशोधन करणारे शहरातले शास्त्रज्ञ मुद्दाम गावात येऊन त्याची पहाणी करीत होते.तो मासा एक “बाई” होती आणि ती गरोदरपण होती. त्यांच्याबरोबर येताना त्या शास्त्रज्ञानी रेकॉर्ड केलेली देवमास्याची गाणी (आवाज) आणली होती.पाण्याखाली कर्णा ठेवून गाणी मोठ्याने वाजवली जात होती.कदाचीत तो मासा ती गाणी ऐकून तिथून वळण घेऊन परत समुद्रात जाईल असा त्यांचा कयास होता.एका क्षणाला त्या गाण्यांचा आवाज त्या देवमास्याला एव्हडा कर्कश वाटला असावा की त्या मास्याने आपली शेपटी पाण्याबाहेर उंच उभारून पाण्यावर आपटून सर्व बघ्यांना घाबरवून सोडलं होतं.
जणू तो देवमासा सांगत असावा की,
“मला जरा शांतता द्या”
नंतर त्याची तयारी झाल्याबरोबर त्याने पुलटी मारली आणि तो देवमासा भर्कन समुद्राच्या दिशेने वेगाने निघून गेला.

ह्या देवमास्यासारखं मला माझ्या लहानपणी आमच्या शेजारात असंच चुकायला व्हायचं.मी ज्यावेळी सहा वर्षाची होते तेव्हा आमच्या घरातून शाळेत जायला बाहेर पडले असताना त्या एक मैलाच्या वाटेत मी चुकायची.तशी माझ्या शाळेकडची वाट एव्हडी काही खिचकट नव्हती. भाजी-बाजार आणि मासळी-बाजार संपून गेल्यावर उतार यायचा.उतार संपल्यावर एक तळं दिसायचं.तळ्याच्या डावीकडे आणि पुढे उजवीकडे वळण घेतल्यावर माझी शाळा यायची.

पण वाटेत खूप बघण्यासारख्या गोष्टी असायच्या.तळ्यात डुबकत असलेल्या कोळ्यांच्या रंगीबेरंगी होड्या दिसायच्या.होड्यांच्या शीडावर विचीत्र अक्षरात लिहिलेली होड्यांच्या मालकांची नावं वाचायला मजा यायची.
एखाद वेळेला मी नादात डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळली असावी.आणि पुढे उलटं केलं असावं.कारण एकाएकी अनोळखी घरं दिसायला लागली होती.आणि असं माझं बरेच वेळा व्हायचं. कुठे जाऊन आल्यावर परत त्याच ठिकाणी जाताना वाट चुकली जायची.

इतर लोक त्या वयातल्या माझ्या वाटचुकण्याच्या संवयीकडे पाहून माझ्यात काहीतरी समस्या आहे असं वाटून घ्यायचे.
मला नकाशा जवळ ठेव किंवा कुणाला तरी बरोबर घेऊन जावं असा उपदेश द्यायचे.कालांतराने चुकलेली वाट सुधारणं मला यक्श्चीत वाटायचं.विचार केला तर त्या सहा वर्षाच्या वयात मला माहित होतं की कुणाच्यातरी घरी जाऊन त्यांना विचारल्यावर मला चुकीच्या मार्गावरून माझ्याच मार्गावर जायला त्यांच्याकडून मदत होऊ शकते.

माझे हितचिंतक एक विसरायचे की वाट चुकणं हा मला मिळालेला एक उपहार होता.वाट चूकणं हा आश्चर्य दिसण्यासाठीचा एक प्रारंभ असतो.
काही चमत्कार जन्माला येत असताना ते पाहिल्याची साक्ष असण्याची जरूरी असते असं मला वाटतं.काळ दुभंगत असताना लक्ष देण्यासाठी मला दिलेलं आमंत्रण असायचं.

कुणाचाही दरवाजा खटखटून,एखादा नकाशा जवळ ठेवून किंवा एखाद्या सहकार देणार्‍या अनोळख्याला योग्य दिशा विचारता येतात आणि योग्य वाटेने जाता येतं ह्याची मला खात्री असायची.
खरा अर्थ मी असा काढला आहे की,जीवनात वाट चुकण्यापेक्षाही आणखी काही गंभीर गोष्टी होऊ शकतात.म्हणून,जीवानात मार्गनिर्देशन करण्याऐवजी आलोकन करावं असं मला मनोमन वाटतं.”

“देवमास्यावरून स्वाती मला काहीतरी नवीन सांगून गेली हे मात्र नक्की.”असं मी माझ्या मनात म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, April 3, 2011

शांततेतून सुसंयोग.


“अश्या रात्रीच्या वेळी दरवाजाच्या आड कुणीतरी उभं आहे असे काल्पनीक सांगाडे डोळ्यासमोर येऊ शकतात.”

आज हवा फारच छान होती.तशी थोडी थंडी होती पण उन्हात बसल्यावर थंडी जाणवायची नाही.तळ्यावर जाऊन शांत बसून विचार करायला उत्तम चान्स आहे असं मनात आणून घरातून निघण्यापूर्वी प्रो.देसायाना फोन करून पहावं असं मला वाटलं.

फोनवर त्यांची पत्नी आली आणि म्हणाली,
“आत्ताच ते फिरायला म्हणून बाहेर पडले आहेत.बहुतेक तळ्यावरच जातील.”

मी तसाच निघालो.तळ्याजवळ आल्यावर आमच्या नेहमीच्या बाकावर भाऊसाहेब काहीतरी वाचत असल्याचं दिसलं.किशोर कदमच्या कविता वाचत होते.मला पण किशोरच्या कविता आवडतात.विशेषकरून त्यांनी पावसावर लिहिलेल्या कविता परत परत वाचाव्या असं वाटतं. आईवरही त्यांची सुंदर कविता आहे.

“तुमचं वाचून झाल्यावर मला वाचायला द्या”
मी प्रोफेसरना म्हणालो.
“तुमच्यासाठीच हे पुस्तक आणलं आहे.तुम्ही येईपर्यंत वाचत होतो.”
असं मला ते म्हणाले.

“किती शांत आहे सगळीकडे.मला अशी शांतता खूप आवडते”
असं मी माझ्या मनातलं त्यांना सांगीतलं.कुणास ठाऊक, माझं असं बोलून झाल्यावर, भाऊसाहेब विचारात पडल्यासारखे वाटले.

“मला पण शांतता आवडते.पण माझ्या मनातली शांतता वेगळीच आहे.मला त्या शांततेबद्दल विशेष वाटतं.पण ती क्लेशकारी,चिन्ताजनक,अनुपयुक्त शांतता नव्हे.कुठचंही भाषण ऐकण्यासाठी केलेली,आज्ञाकारी, शांतता तर नव्हेच नव्हे.निसर्गात निर्माण झालेली शांतता, जेव्हा पाळ्या-पाचोळाची कुरकर ऐकू येते,रात्रकिड्यांचा आवाज ऐकू येतो तीही शांतता अजिबात नाही.

शांतता जी निर्मळ शांतिप्रिय असते,ज्यावेळी सुनसान खामोशी असते आणि त्याबरोबर सुटकार येतो,चिंतन करता येतं,ज्यात श्रद्धा असते अशी शांतता मला भावते.

जेव्हा अशी निखालस शांतता असते,तेव्हा “आतला आवाज” अंततः आणि उपहासपूर्ण श्राव्य असतो.आणि त्यापुढेही जाऊन म्हणावसं वाटतं की हे चिंतन जे आपल्या मस्तकात भरलं जातं ते प्रत्यक्ष आपलं स्वतःचच असतं.हा विचार मनात येऊन हायसं वाटतं.”

प्रोफेसर देसाई मला काहीतरी शांततेबद्दल सुनावणार आहेत हे मी त्यावेळीच जाणलं.आपल्या हातातलं किशोर कदमचं पुस्तक माझ्याकडे देत म्हणाले,
“माझ्या लहानपणातल्या आठवणी मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो.
खरं म्हणजे आमच्या कुटूंबात मी अगदी शेवटाला झोपी जाणारा असायचो.अगदी पहाटेला कोंबडा आरवेपर्यंत जागा राहून शांततेची परिसीमा असलेली, म्हणजेच ज्याला रात्र म्हणावी, तिचा पूरंपूर आनंद उपभोगायचो.शांततेने घेरला गेल्यामुळे माझ्या चिंतनाच्या प्रक्रियेसोबत, मग ती कोणताही आडवा-तिडवा मार्ग घेत असली तरी,राहिल्याने तिचा माझ्यावर दबाव यायचा.

बिछान्यावर अंग टेकल्याटेकल्या, दिसव उगवल्यानंतर प्रथमच उद्भवलेल्या घटनांच्या आठवणींची जंत्री सामोरी यायची.शाळासोबत्यांबरोबर झालेली चर्चा,बाचाबाची आणि त्यातून उद्भवलेले विचार,मी गणीतात आणि पदार्थविज्ञानात प्राविण्य मिळवल्याबद्दल माझ्या आईकडून झालेली माझी प्रशंसा.नंतर कदाचीत,माझ्या भवितव्याबद्दल होऊ घातलेली माझी सुरवात,उद्याबद्दल,कदाचीत लवकरच येणारी माझी कॉलेजातली वर्षं,जीवनातल्या मध्य भागात येऊ घातलेला संकटकाळ,किंवा माझा निवृत्तीचा विचार की मी कोकणातल्या आमच्या घरात राहून घालवायचा,का प्रवासी होऊन देशभर प्रवास करून काळ बितवायचा.असे विचार यायचे.

अश्या ह्या चिंतनात रात्रीचे एक दोन तास निघून गेल्यावर माझ्याच जीवनाबद्दल सर्वसाधारण विचार यायचे-जीवनाचं जास्त सुलभीकरण करण्यापासून काळजी घेत असतानाही डोळ्यासमोर उद्भवणार्‍या त्याच जीवनाच्या प्रतिमेबद्दलचं कुतूहल वाढायचं.

ह्या शांततेच्या काळात मी जीवनाचा खरा अर्थ काय असावा हे समजण्यासाठी माझ्याच विचारांशी सामना देत असायचो. तरीसुद्धा असल्या विचाराने माझ्या “आतल्या आवाजाचा” थरकाप व्ह्यायचा.मी चकरावून जायचो.
पण असं होण्यात खरी गोम अशी की माझ्या ह्या सतत बदलणार्‍या शांततेबरोबरच्या नात्याचा,सतत बदलणार्‍या विचारांच्या नात्यातून उगम व्हायचा.”

हे ऐकून मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“विचाराबद्दल म्हणता म्हणून माझ्या डोक्यात काय विचार आला ते सांगतो.
विचार करणं हे शक्तिशाली असतं.पण जर का काळजी घेतली नाही तर,सहजच आपण स्वतःचाच घबराट करून घेऊ शकतो. निष्कारण काळजी लागते,मन विचार करण्यापासून अलग होऊ शकतं.अश्या रात्रीच्या वेळी दरवाजाच्या आड कुणीतरी उभं आहे असे काल्पनीक सांगाडे डोळ्यासमोर येऊ शकतात. पण असं झालं तरी हे गंमतीदायक आहे असं निश्चीतच वाटतं. म्हणूनच,गुढ आणि भयानक रितीने कुणालाही अचंबीत व्हायला वेळ लागणार नाही. कुणाला कसं वाटावं, हे केवळ विचार केल्याने प्रभावित होत असावं.केवळ सक्रियतेने विचार केल्यामुळे एखाद्याच्या विचाराना स्पष्ट आणि निश्चित पूरावा मिळण्याचा संभव आहे”.

“वाः! तुमचा विचार मला आवडला.”
असं म्हणून प्रोफेसर मला म्हणाले,
“मला विचाराल तर,जास्त करून ह्या शांततेचा विचार हा एक उपचार आहे असं मी समजतो- त्या वयात माझ्या चंचल मनाला,माझा जीवनाबद्दलचा जो समज होता त्याला स्पष्टीकरण देऊ केलं जायचं.ही शांतता एक आव्हान आहे असं मला वाटायचं.हे आव्हान,माझ्या विचारावर, मी दुर्लक्ष करू नये म्हणून, दबाव आणायचं.मी माघार घेऊ नये म्हणून मला त्याचा सामना करायला दबाव आणत असावं असं मला वाटायचं.

जरी त्या काळात मी एकाकी असलो,अवती-भवती काही नसलं तरी त्या शांततेला मला घाबरून चाललं नसतं.उलटपक्षी,त्या शांततेकडे मी विचार करण्यासाठी मिळालेली संधी असं समजायचो-विचारासाठी आणि चिंतनासाठी.
असं करत असताना ही शांती आनंददायक वाटायची. निश्चितच,मी माझं मन गुंतवायला बघायचो. त्यातच मला शांती मिळायची.आणि असं होता होता शांत झोपून जायची वेळ आलेली असायची.”

“माझंही असं कित्येकदा झालं असणार.अनेक रात्री मी पहाटेची झोप येईपर्यंत विचार करीत असणार. पण तुम्ही ज्या पद्धतिने रात्रीच्या त्या तुमच्या शांततेचा विचार करायचा हे वाखाणण्या सारखं आहे.”
असं मी प्रो.देसायाना म्हणालो.

“कसचं कसचं”
असं म्हणत रात्र होत आली आपण आता निघूया असं बाकावरून उठून मला प्रोफसरानी दर्शवलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com