Friday, December 30, 2011

व्यसनमुक्ती.





"मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात. अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात."

अनंत नाडकर्ण्याला माझ्या दारात बेल वाजवून उभा ठाकलेला पाहून मी खरंच अचंबीत झालो.ही गॉन केस असं मी तत्पूर्वी समजत होतो.


त्याचं असं झालं,एका नावाजलेल्या बॅन्केत चांगल्या वरच्या पोझीशनवर असलेल्या अनंताला एका एकी अवदसा सुचली.
वडील दारूच्या व्यसनाने जर्जर होऊन सर्व नाशाला कारणीभूत झाले असल्याने,चार बहिणीत एकटा भाऊ असलेल्या अनंताने दारूला कदापी शिवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.मग हे कसं काय झालं? असा माझ्या मनात नेहमीच विचार यायचा.


एकदा मी अंधेरी स्टेशनजवळच्या सातबंगल्यासाठी जाणार्‍या बसस्टॉपवर रांगेत उभा होतो.अचानक एक भिकारी दिसणारा माणूस माझ्याजवळ येऊन पैसे मागायला लागला.हात पुढे करून माझ्या नावाने मला संबोधून त्याने हात पुढे केला.तो अनंत नाडकर्णी आहे ह्यावर माझा विश्वासच बसेना.
रांगेतून बाहेर येऊन मी त्या व्यक्तिला समोरच्या इराण्याच्या हॉटेलात घेऊन गेलो.


"अरे अनंता! काय ही तुझी दशा झाली आहे?मी स्वप्नातसुद्धा तुला असा दिसशील असा विचार केला नसता."
अनंताला मी माझा चेहरा टाकून विचारलं.


"काय सांगू?माझे भोग.प्रमोशनवर, लोन सॅन्कशन डिपार्टमेंटमधे, गेलो.प्रथम लोन सॅन्कशन झाल्यावर लोक मला मर्जीने चिरीमिरी द्यायचे.मग बाटली देऊ लागले.अतोनात पैसा आणि बाटली ह्यामुळे मला अवदसा सुचली."
अनंता दोन समोसे तोंडात बोकून आणि गटागट चहा पिऊन झाल्यावर मला सांगू लागला.त्याला भुकेलेला पाहून मी त्याच्यासाठी एक ब्रुनमस्का पाव आणि एक कप चहा मागवला.


तृत्प झाल्याचा चेहरा करून अनंता मला पुढे सांगू लागला,
"एक दिवस मला रंगे हात पकडलं.आणि माझी नोकरी गेली.काही वर्षानी माझी बायकोपण मला सोडचिठ्ठी देऊन गेली.तिची काहीच चूक नसावी.
कारण तोपर्यंत मी दारुच्या आधीन झालो होतो.माझी रहाती जागा गेली.माझ्या बहिणींकडे मी जाऊन रहाण्याचा प्रयत्न केला पण मायेपोटी बहिणी कबूल झाल्या तरी त्यांच नवरे आधार देईनात.त्यांचीही काही चूक नाही.थोडे दिवस कोकणात जाऊन राहिलो.पण मिळकत शुन्य झाल्याने भीक मागून तरी राहूया म्हणून शहरात आलो."


मी खरोखरच सद्गदित झालो.एका दानशूर फॉऊंडेशनमधे माझा एक मित्र काम करीत होता.अनंतातर्फे त्याला एक चिठ्ठी लिहून त्याच्याकडे अनंताला जायला सांगीतलं.दुर्धर व्यसनी लोकाना चांगल्या मार्गावर येण्यासाठी हे फॉऊंडेशन मदत करतं असं माझा मित्र मला म्हणाल्याचं आठवलं.
अनंताजवळ थोडे पैसे दिले आणि निरोप घेताना मी त्याला म्हणालो,
"ही चिठ्ठी फेकून देऊन पैसे पुन्हा दारू पिण्यात खर्च करावे की, मी म्हणतो तसं करावं ह्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे.तेव्हा तू काय ते ठरव."

अनंताने आपलं भवितव्य काय ठरवलं ह पाच वर्षानंतर माझ्या घरी अनंता बेल दाबून आला त्या दिवशी मला कळलं.


मला अनंता सांगत होता,
"मला दारूचं व्यसन होतं.पण मी एक नशिबवान आहे की ज्याला ह्या व्यसनातून निवृत्ति मिळाली.आता पाचएक वर्षं झाली असतील पण ते मी विसरलेलो नाही.मला आठवतंय की त्या निराशजनक मनस्थितीत आणि विद्वेषपूर्ण व्यथेत राहून माझं मला कळत नव्हतं की मला काय झालंय.
हताश होऊन मदतीची याचना करण्याचे ते दिवस मला आठवतात.मदतीची शक्यता नाही असं पाहून माझ्या मनातच्या आतला विषाद आणि बाहेरून केली जाणारी अवज्ञा मला आठवते.


माझ्या भयानक छुप्या आशंका,जगायचं आणि मरायचं भय मनात असतानाही, ज्याला समजून घेता येत नाही त्या बाह्य जगाच्या मेदाला आणि अहंकाराला मी सामोरा गेलो.काहीवेळा जगण्यात एव्हडं भय वाटायचं की दोनदा मी मरण पत्करण्याचं ठरवलं होतं. त्रस्त मन आणि मनातल्या यातना सहन करण्यापेक्षा आत्मबलिदानातून सुटकारा बरा असं वाटायचं.


त्यात मी अयशस्वी झालो ह्याचं आता बरं वाटतं.पण त्यावेळेला माझा कशातही विश्वास नव्हता.माझ्या स्वतःत नव्हता तसाच माझ्या बाहेरच्या जगात नव्हता.मला स्वतःलाच मी यातनेच्या चार भिंतीत कोंडून ठेवलं होतं आणि माझंच मला वाटायचं की मी पूर्णतया परित्यक्त झालो आहे.


पण मी तेव्हडाकाही परित्यक्त नव्हतो तसं पाहिलं तर खरंतर कोणही तसा नसतो.मला दिसायचं की माझ्या मीच दुःख भोगत होतो.पण आता आता मला वाटायला लागलंय की मी एकटा कधीच नव्हतो,कोणही तसा नसावा.मला असंही वाटायचं की,मी जेव्हडं सहन करीन तेव्हडं मला पेलूं दिलं

नाही.पण त्या यातनांची मला जरूरी होती असं वाटतं. माझ्या बाबतीत एव्हड्या यातना मी सहन केल्या असाव्या की त्यामुळे माझ्या भोवतीच्या भिंती तुटून पडल्या,माझा मेद,माझा अहंकार गाडण्यासाठी,जी काही मदत मला मिळत होती ती स्वीकारण्यासाठी हे सर्व होत होतं असं मला वाटतं.


माझ्या यातना एव्हड्या खोलवर पोहचल्या होत्या की माझा विश्वास बसायला लागला.त्यावर विश्वास बसायला लागला की एखादी मोठी शक्ती मला मदत करू शकेल.ह्यावर विश्वास बसत गेल्याने मला मदत होईल याची माझ्या मनात आशा बळायला लागली.


डॉक्टरातर्फे मला मदत मिळायला लागली.माझ्या सारख्याला आणि इतर माझ्या सारख्याना मदत करण्याच्या त्यांचा व्यवसायच होता.माझ्या गहिर्‍या विवरातून बर्‍याच व्यक्तिकडून मला मदत,दया आणि समजून घेण्यात आलं.लोक दयाशील असतात हे मी शिकलो.लोकं आणि त्यांच्यातला चांगुलपणा कसा असतो ते मी शिकलो.


मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात.अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात.बरेच असे लापरवा्ईचे,खोचक शब्द आणि प्रत्यक्ष वागणं ह्यामुळे जीवन खूपच खडतर होतं.माझ्या लक्षात आलं की हे सर्व मी समजून घेतलं तर चिडण्यातून आणि मनाला दुःख होण्यातून मी एव्हडी प्रतिक्रिया द्यायला अनुकूल होणार नाही.आणि मी जर का कठिण वागणुक मिळाल्याने त्याची प्रतिक्रिया देताना समजून घेऊन आणि आस्था बाळगून रहाण्याचा प्रयत्न केला तर कदाचीत मिळणार्‍या वागणुकीत बदल आणण्यात सहाय्य मिळवीन.माझ्याच यातनानी हे समजायला मदत केली.


मी म्हणत नाही की,प्रत्येकाला अशा यातना व्हाव्यात.एक मात्र मला नक्की वाटतं की,यातना होणं बरं आणि कदाचीत त्या येणं आवश्यकही आहे. जर आणि फक्त जर का त्या यातना स्वीकार करण्याने समजून घेण्याची आवश्यक प्रक्रिया होत असेल तर.आणि तिचा उपयोग स्वतःसाठी आणि त्यातून जाणार्‍या इतरांसाठी होत असेल तर.


आपण सर्व काहीनाकाही यातनातून जात असतोच नाही काय? हे तथ्य माझ्यात एक प्रकारचं आपलेपण निर्माण करतं आणि त्यातून इतरानाही मला जमेल तशी मदत करायला प्रोत्साहन देतं.

ह्या विश्वासातूनच मी ह्यात असलेल्या इतर व्यसनाधीन लोकांत वावरून ते व्यसन विरहीत व्हावेत म्हणून काम करण्यात माझ्याच अनुभवातून मी अनुरूप झालो आहे असं समजतो.त्यासाठी कुणाला सुंदर असलं पाहिजे,प्रतिभावान असलं पाहिजे,शक्तिमान असलं पाहिजे अशातला भाग नाही.
तसंच मला हेही वाटतं की हे असं करून त्या मोठ्या शक्तिबरोबर चालण्याचा मला लाभ होत आहे.त्याच फॉऊंडेशन मधे मी नोकरीला असतो.आता माझं अगदी बरं चाललं आहे."


असं म्हणून अनंताने खाली झोपून मला अगदी साष्टांग नमस्कार घातला.त्याने ते इतक्या पटकन केलं की मी त्याला अडवू शकलो नाही.

अनंता उठून उभा राहिल्यावर मी त्याला म्हणालो,
"जे झालं ते गंगेला मिळालं.जे होतं ते नेहमी बर्‍यासाठीच होत असतं असं बुजूर्ग म्हणतात.कारण आयुष्यात उनपाऊस येतच असतो."



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, December 27, 2011

पुष्टावलेला तो उंच ऊस




माझ्या त्या (अजून आणखी एक इडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.
 मुळ कवितेतल्या पहिल्या ओळीत
 "कोसळणारा तो धुंद पाऊस"
 ह्यातला "पाऊस" ह्या शब्दावरून "ऊस"हा शब्द आठवला. आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं,चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा

रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या मनात ओघा ओघाने आलं.आणि कविता लिहिली गेली.


ऊसाच्या रानात काम करणार्‍या शेतकर्‍याच्या परिचयाचे वरील बरेचसे शब्द कवितेत मी वापरले आहेत. माझ्या मामीचं माहेर घाटावर आहे.माझ्या लहानपणी मी तिच्याबरोबर तिच्या माहेरी जायचो.कोल्हापूर जवळ गडहिंग्लज हे ते गांव.मामीचे ऊसाचे मळेच्या मळे आहेत.मामीची आई मुद्दाम एखाद्या गड्याबरोबर आम्हाला पाठवून शेतातला उच्चतम ऊस उपटून आम्हाला त्याचे करवे काढून खायाला देण्याची त्या गड्याला ताकीद-कम-आज्ञा करायची.कविततले बरेचसे शब्द त्या गड्याच्या तोंडचेच आहेत.आणि ते शब्द ऊसाचं पिक काढणार्‍या सर्वसाधारण शेतकर्‍याच्या तोंडचेच आहेत.


ऊस जरी रसाने भरलेला असला तरी त्याचा गोडवा त्याला उपटण्यापूर्वी-उचकण्यापूर्वी - जागीच चीर काढून रस चाखला जाऊन कळायचा. त्या ऊसाला चीर काढणार्‍या आयुधाला "आर" म्हणायचे.रस जर गोड वाटला तर तो ऊस पुष्टावला आहे असं म्हणतात.ऊसाच्या रसात साखर असल्याने साखरेचा चिकटपणा त्याला येतो.चिकट झालेले हात नंतर आम्ही थंड पाण्याने धुवायचो.ऊस उपटताना तो हळूवार उपटावा लागायचा कारण जवळ जवळ अंतरावर पेरणी झाल्याने बाजूच्या ऊसाला बाधा होता नये ह्याची काळजी घ्यावी लागायची. आरीच्या आघाताबरोबर रस थेंब थेंब थेंब थेंब पडायचा.मुळ कवितेतल्या बर्‍याचश्या ओळी मला ऊसाच्या संबंधाने कविता करण्यात उपयोगी वाटल्या.


पुष्टावलेला तो उंच ऊस
 मला म्हणतो आता नको खाऊस
 ओली चिंब झाली झाडे
 कपडे ही ओले चिंब झाले
 तुझं ते हळुवार खेचणं
 माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
 आणि हळुच चीर काढणं
 आणि माझा रस थेंब थेंब पडणं
 नेहमीच हात चिकट चिकट होणं
 प्रत्येक उसाला टक लावून बघणं
 आणि एकाला ऊचकणं
 तुझं उचकणं आणि आमचं पडणं
 झालय आता संवयीचं शेताला
 कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com

Saturday, December 24, 2011

कट्ट्या-बट्टुया.




"तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच."
मी माझ्या पत्नीला म्हणालो.


केशव, माझा मित्र,वांद्रा स्टेशन जवळच असलेल्या एका चाळीत रहातो.मी कधी कामाला वांद्र्याला उतरलो की हटकून केशवला भेटून येतो.
असाच काल मी केशवकडे गेलो  होतो.आमच्या राजकारणावर,महागाईवर,हवामानावर गप्पा चालल्या होत्या,तेव्हड्यात केशवचा सहा वर्षाचा मुलगा

रडत रडत केशवजवळ येऊन म्हणाला,
"शेजारचा बंटी माझ्याशी बोलत नाही.तुम्ही त्याला तसं नको करू म्हणून सांगा.


केशव लागलीच त्याला म्हणाला,
"त्याला सॉरी म्हणून सांग"
"ते मी केव्हाच सांगीतलं,पण तो ऐकायला तयार नाही."
मुलाने उत्तर दिलं.
"मग थोडावेळ त्याच्याकडे जाऊ नकोस.इथेच बस तो सर्व विसरून गेल्यावर तुझ्याशी तो बोलायला येईल."
केशवने मुलाची समजूत घातली.
आणि माझ्याकडे बघून केशव  हसला.


मी केशवला म्हणालो,
"अरे लहान मुलांत हे नेहमीच होतं.त्यांची कट्टी-बट्टी असते.मला माझं लहानपण आठवतं.आम्ही आते,मामे,चुलत भावंड नेहमी भांडायचो आणि मग

कट्टी घ्यायचो.वेळ निघून गेल्यावर सर्वकाही विसरून बट्टी म्हणून परत खेळायला सुरवात करायचो."


"कट्टी-बट्टी वरून मला एक गोष्ट आठवली"
केशव मला म्हणाला.
माझा किस्सा सांगतो असं म्हणून मला सांगू लागला,
"मोठी मंडळी पण अशीच कट्टी-बट्टी करतात.पण त्यांची बट्टी व्हायला फारच कष्ट पडतात.मोठ्यांची मनं लहानांसारखी मऊ नसतात.
त्याचं काय झालं एकदा मी ऑफिसात काम करत बसलो होतो.बरेच फोन येत होते.त्यात एक फोन माझ्या पत्नीकडून आला.मला ती फोनवर हुंदके

देत रडत सांगत होती.


तिचा मनस्ताप सुस्पष्ट होता.तिची सख्खी बहिण काही केल्या तिच्याशी बोलायला तयार नव्हती.माझ्या पत्नीने तिला पाठवलेल्या माफीच्या पत्रांची

तिच्या बहिणीने ती न उघडताच तिला ती परत केली होती.वाटेत कुठे जवळपास एकमेकाच्या नजरेला नजरा झाल्या तर तिची बहिण मान खाली

घालून पुढे जायची.


माझ्या स्वतःच्या बहिणीबरोबर असंच काहीसं झालं.माझे भावोजी-माझ्या बहिणीचा नवरा-जाऊन सहा वर्षं झाली.तिचा स्वतःचा मुलगा तिथपासून

आपल्या आईबरोबर एक चकार शब्द बोललेला नाही.नव्हेतर आम्हा कुणाही नातेवाईकांशी एक शब्द बोलला नाही.


तात्पर्य: माझी पत्नी काय किंवा माझी बहिण काय दोघंही ह्या दुखदायी समस्येचं मुळ कारण समजूच शकल्या नाहीत. गैरसमज निर्माण झाले.राईचा

पर्वत केला गेला.एकमेकात दरी निर्माण झाली.कित्येक वर्षाच्या प्रेमावर आणि विश्वासावर अविस्मरणीय आठवणीवर आणि नाजुक परिस्थितीत

घेतल्या गेलेल्या काळजीवर पाणी पडलं.


मी फोनवरच माझ्या पत्नीला विचारलं,
"एकदा तरी तिला कट्टीची बट्टी असं म्हणालीस का?"
"कसली कट्टी आणि बट्टी?"
रागानेच मला माझ्या पत्नीने उलट प्रश्न केला.


"तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच."
मी माझ्या पत्नीला म्हणालो.


तिला ह्यातलं काही माहितच नव्हतं.मी माझ्या पत्नीला त्यामागचं मूलतत्व काय असतं ते समजावून सांगत होतो.
"कुणी कुणाचं मन मोडलं,कुणी पहात नाही असं वाटून एकाने दुसर्‍याच्या ताटातला आवडीचा पदार्थ पटकन खाल्ला आणि लक्षात आल्यावर जर कुणी कट्टी घेतली,म्हणजेच बोलणं बंद केलं तर माझी चूक झाली,मला माफ कर,मी असं करायला नको होतं, असं म्हणताना माझी तुझी बट्टी असं म्हणायचं.असं हे लहान मुलं करतात.
असं किती वेळा कट्टीची बट्टी करायची ही दोघांमधे ठरलेली संख्या असायची.त्यानंतर मात्र नंतर करायचं ते म्हणजे जशास-तसं.


हे जशास-तसं म्हणजे,लहानपणी आपण जमीनीवर चौकोन काढून दगडाची खापरी टाकून एका पायावर लंगडत उडी मारून खेळ खेळायचो ते

करताना चुकलं तर पुन्हा खेळण्यासाठी जशास-तसं खेळायचो ते जशास-तसं नव्हे.
हे जशास-तसं म्हणजे,ज्याची खोड काढली गेली त्याला खोडकाढणार्‍यांने तसाच आवडीचा पदार्थ आपल्या ताटातून मुद्दामून खायला द्यायचा किंवा

काहीतरी लागट बोलून घ्यायचं.


माझी पत्नी मला म्हणाली,
"हे कट्टीबट्टी आणि जशासतसं माझ्या बहिणीबरोबर चालेल असं वाटत नाही."


पण मी माझ्या पत्नीशी सहमत नव्हतो.माझी खात्री आहे की,जरी कुणाची कळ न काढायचं प्रयत्न केला गेला तरी आपण हाडामासाची माणसं

काहीतरी चुका करतोच.आपण दुसर्‍याला,आपण ज्यांच्यावर अतीशय प्रेम करतो त्यांना,लागट असं बोलतो,आपण खोटं बोलतो,फसवतो आणि

कसलातरी घातही आपणाकडून होतो.
असं झाल्यावर कुणीही चिडून ओरडावं.उलट लागट बोलावं.पण कुणी माफी मागितली तर अस्वीकार करू नये.
कुणाशीही समझोता करणार नाही असं समज करून घेऊ नये.झिडकारू नये,टाळाटाळ करू नये,परित्याग करू नये.


सर्व कट्ट्या-बट्ट्यांचा आणि जशासतशाचा स्वीकार करून एकमेकासमोर बसून, कष्ट घेऊन, मोडलेलं दुरूस्त करावं.
अहमपणा गिळून टाकावा,दोन्ही हात दोन्ही बाजूला फैलावावेत आणि मनात जरा मऊपणा आणून,फारच लांबलं न जाण्याची खबरदारी घ्यावी.
कुणी जर का चुकलं माझं असं म्हणाल्यास माझंही चुकलं म्हणायला वेळ लावू नये.लाथा झाडाव्यात,श्वास कोंडून धरावा,मोठा गळा काढून ओरडून

घ्यावं,असं हे दुसर्‍याला समजेतोवर करावं पण शेवटी माफ करावं.


मला वाटतं,माफ करण्याची क्रिया माणसाकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.जेव्हा कुणी दुसर्‍याची माफी स्वीकारतं,वास्तवीक तुमच्यावर अन्याय

होऊनसुद्धा, तेव्हा उत्तमता आणि सभ्यता जी माणसाच्या मनात घर करून असते ती शांतीला आणि सद्भावनेला प्रोत्साहित करते.ज्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो.


तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगीतलं की,
"तू सर्वार्थाने झालेल्या गैरकृत्याच्या कट्ट्या-बट्ट्या मागे घेण्याची तयारी दाखवावी.आणि असं करूनही जर का तुझी बहिण तुझी माफी स्वीकारीत

नसेल तर तिने तुझ्याशी सर्व तर्‍हेनं जशास तसं करावं. पण हा निर्थक हट्ट सोडून द्यावा.
मोठ्या मुष्किल काळानंतर शेवटी त्या दोघांचा समझोता झाला एकदाचा."


तेव्हड्यात बंटी आणि केशवचा मुलगा हातात हात घालून आमच्या दोघां जवळ येऊन उभे राहिले.
मला हसू आवरेना,मी केशवला म्हणालो,
"लहान मुलांना कट्टी-बट्टी माहित आहे पण जशास-तसं माहित नाही हे बरं झालं नाहीतर तुझ्या पत्नीला पुन्हा एकदा फोनवर हे प्रकरण आणावं

लागलं असतं."




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 21, 2011

केल्यावीणा होणे नाही.




"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं,म्हणजे इतर निदान जगतील तरी."


अरूण मुळ कोकणातला.त्याच्या वडीलांची आणि माझी चांगलीच ओळख होती.कोकणातल्या एका खेडेगावात गरीब परिस्थितीत राहून हे कुटूंब आपली गुजराण करायचं.सुरवातीला अरूणचे वडील एका किराण्या व्यापार्‍याकडे कारकूनाचं काम करायचे.पेढीत बसून खरडे घाशी झाल्यानंतर त्यांना बाहेरची कामं पण करावी लागायची.ही कामं करायला त्यांना एक जुनी सायकल दिली होती.



अरूणला भावंडं बरीच होती.त्यामुळे एकटे कमवणारे अरूणचे वडील संसार सांभाळायला मेटाकुटीला यायचे.हे सर्व मला आठवलं जेव्हा माझी आणि अरूणची अलीकडे अर्नाळ्याजवळच्या एका गावात अचानक गाठ पडली.


त्याचं असं झालं,मी अर्नाळ्याजवळच्या एका गावात माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो.त्याच्या घरी गाण्याचा कार्यक्रम होता.दुसर्‍या दिवशी मी त्याच्याकडेच रहायला होतो.सकाळीच उठून आम्ही गावात जरा फेरफटका मारायला म्हणून निघालो होतो.
जाताना एक घर पाहिलं.घराच्या बाहेर अंगणात सुंदर फुलझाडांची बाग दिसली.निरनीराळी फुलं जरा जवळून पहावी म्हणून बागेच्या जवळ गेलो. घराच्या आत पडवीत बसलेले एक गृहस्थ आमच्याशी बोलायला म्हणून आमच्या जवळ आले.कसं कुणास ठाऊक मला त्यांनी ओळखलं.


मला म्हणाले,
"तुम्ही हसला त्यावेळी तुमच्या उजव्या गालावरच्या खळीकडे पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.
तुमच्यासारखे एक गृहस्थ आमच्या घरी यायचे.माझ्या बाबांची आणि त्यांची चांगलीच ओळख होती.
दुसरं कारण म्हणजे तुम्ही आता माझ्याशी चार शब्द बोलत होता तेव्हा तुमच्या बोललेल्या वाक्यात एक हेल येते. कोकणात त्याला हेळे काढून बोलणं म्हणातात तसं भासलं.तुम्ही कोकणातले आहात हे मी पक्क जाणलं.मी पण कोकणातलाच."


माझ्याही लक्षात आलं जेव्हा त्याने आपण अरूण म्हणून ओळख करून दिली.दुसर्‍या दिवशी मी त्याच्या घरी गेलो होतो.
जुन्या आठवणी निघाल्या.त्याचे आईबाबा केव्हाच गेले.अरूण एका नातेवाईकाच्या ओळखीने मुंबईत आला.दादरच्या किर्तीकर मार्केटमधे अरूणने एक दुकानाचा गाळा घेऊन, कोकणातले निरनीराळे मसाले,कुळथाची पीठी,थालीपीठाचं पीठ,आमसोलं,चिंचेचे गोळे,रातांब्याच्या बियांची मुठली असे जिन्नस प्रथम विकायचा.नंतर धंद्यात जम बसल्यावर आणखी गोष्टी दुकानात ठेवून विकायला लागला.
त्यातून थोडे पैसे कमवून लोन घेऊन त्याने अर्नाळ्याजवळच्या गावात हे घर घेतलं.
मला त्याची ही प्रगती बघून त्याचं खरोखरच कौतूक करावं असं वाटलं.
जुन्या आठवणी काढून डोळे ओले करून मला सांगत होता.


मला म्हणाला,
"अगदी साधं जीवन जगण्याच्या माझ्या प्रयत्नात मला ते जगणं सोपं जातं.आमच्या कुटूंबा्ची ती परंपरा आहे.माझ्या लहानपणी माझ्या आईवडीलांनी काढलेले ते गरिबीतले दिवस,जगायला आवश्यक लागणार्‍या गोष्टीही हिरावून घेतल्या जाव्या,ती परिस्थिती त्यांनी सहन करावी आणि कुटूंबातल्या सर्वांनी त्यागीवृत्तिने जीवन कंठावं अशा ह्या घटनांची चर्चा त्यांच्या तोंडून मी माझ्या लहानपणी ऐकल्या आहेत.


माझ्या वडीलांना नशिबाने एक काम मिळालं होतं.तिथे जाण्यासाठी चार मैल चालून जावं लागायचं.एस.टीचे पैसे वाचवण्यासाठी चालून जावं लागायचं.माझी आई तिच्या चहाच्या पेल्यात साखर घालायची नाही. उकळत्या पाण्यात चहा न घालता नुसती चमचाभर साखर घालून ते साखर पाणी चहा समजून आम्हाला प्यायला द्यायची.मासे मटण कधीतरी आणायचो.ठिगळ लावून शिवलेले कपडे माझी बहिण शाळेत जाताना घालायची. आणि मी ऐकलंय की माझी आजी रोज शेगडीत कोळसे मोजून घालायची.
तो काळ असा होता की जास्त करून घरीच रहायचं.जे काय आहे त्यावर जगायला शिकायचं आणि जे आहे ते असण्याबद्दल उपकृत रहायचं.



थोडे फार दिवस सुधारत आहेत असं वाटता वाटता वाढत्या महागाईला जेरीला येऊन पुन्हा कष्टाचे दिवस यायचे.आणखी त्याग करायची वेळ यायची. माझ्या वडीलानी एकच धोतर आणि एकच शर्ट कामावर जाताना वापरायचा.रात्री वरून उघडं आणि खाली पंचा नेसून झोपायचं.रात्री धोतर आणि शर्ट धुवून काढायचे.सकाळी सुकल्यावर ते घालायचे.त्यांच्याकडे एकच कोट होता.अशी बरीच वर्ष त्यांनी काढली.आई अजूनही तिच्या चहाच्या कपात साखर घालायची नाही.हळुहळु आम्ही सर्व शाकाहारी झालो.बहिणीच्या शाळेतल्या मैत्रीणीने जुने झालेले तिचे कपडे तिला दिल्याने ती ते कपडे घालून शाळेत जायची.माझंही तसंच व्हायचं.घरात एक सायकल होती पण तिचे टायर्स खराब झाले होते.त्यामुळे मी कुठेही बाहेर न जाता घरीच रहायचो.
ह्या गरिबीच्या दिवसानी आम्हाला खूप शिकवलं.आणि अद्यापपावेतो ते मला शिकवीत आहेत.



माझ्या आईने सफेद जाजमावर लिहून त्याचे फलक करून आमच्या बाहेरच्या खोलीत टांगले होते.जीवन जगण्यासाठी ते तिचं चिंतन होतं.

आहे त्याचा वापर करावा.

जमे तोपर्यंत वापर करावा.

केल्यावीणा होणे नाही

नाहीतर

नसल्यास काम चालवून घ्यावे.

असे आम्ही जगत होतो.आज मी एक लहानसं घर घेतलं आहे.मागे छोटसं अंगण आहे.त्यात थोडा भाजीपाला तयार करतो.कुठेही चालत जाण्याचाच प्रयत्न करतो.नाहीतर बस घेतो.बर्‍याचश्या गोष्टी जमतील तेव्हड्या परत परत वापरतो.


ह्या देशात असे अनेक लोक आहेत की जे पैशाच्या विवंचना करीत बसत नाहीत.अर्थात सगळेच काही नाहीत.
ह्या देशात गरिबी आणि नैराश्य दावणीला धरून आहे.माझ्या घरात आमचं ब्रीदवाक्य म्हणजे,
"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं म्हणजे इतर निदान जगतील तरी."
माझ्या आईची शिकवणूक अजून माझ्या निवडीला मार्ग दाखवते.


मला वाटतं माझ्या ह्या प्रयत्नाने दुर्लभ गोष्टी इतराना तरी मिळतील.जे माझ्या जवळ नशिबाने आहे त्यातून इतराना नक्कीच फरक पडेल.मी करीत असलेले लहानसे प्रयत्न दुसर्‍या कुणात मोठा फरक पाडील."


मला हे सर्व ऐकून अरूणबद्दल खूप आदर वाटला.सच्चाईने जगण्यातली मजा औरच असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

   

Sunday, December 18, 2011

"का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?"



"माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती."


मला आठवतं,मी वासंतीची भरपूर समजूत घालण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता.
"मलाच असं का व्हावं?जगात एव्हड्या स्त्रीया आहेत कितीतरी आपल्या प्रकृतिकडे नीट लक्ष देत नसाव्या.तरीपण त्या असल्या दुर्दैवी घटनातून सुटतात.त्यांना असं व्हावं असं मी म्हणत नाही.पण मीच एकटी अभागी का व्हावी?"
एक ना दोन असे अनेक प्रश्न मला वासंतीने त्यावेळी केले होते.
"पराधिन आहे पूत्र मानवाचा" पासून
"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" पर्यंत आणि
"या प्रश्नला उत्तर नव्हते राणी केविलवाणी"
इथपर्यंत काही गीतातल्या ओळी मी वासंतीला उदाहरण म्हणून सांगीतल्या होत्या.


शेवटी व्ह्यायचं तेच झालं.वासंतीच्या उजव्याबाजूला शस्त्रक्रिया करावी लागली.त्यावर आता बरीच वर्ष होऊन गेली.वासंती आता थोडी सावरली.जुन्या गोष्टी काढून आम्ही गप्पा मारीत होतो.
मला वासंती म्हणाली,
"जेव्हा मी तेराएक वर्षाची होते तेव्हा मार्लिन मन्रो ही एक जगातली प्रसिद्ध नटी होती.स्वेटर-गर्ल म्हणून ती ओळखेली जायची.नव्हेतर तो एक प्रकोप म्हटला तरी अतिशयोक्ती होणार नाही.विशाल उरोजाची स्त्री म्हणजे पुरषांच्या डोळ्यात भरणारी गोष्ट होती.निदान मी जेव्हा मोठी होत होते तेव्हा असा समज होता.स्त्रीयांचा त्यावेळी समज होता की त्यांचा उरोज हा एक हुकमतीचा भाग होता,त्याशिवाय तो एक सौन्दर्याचा मानदंड होता.

अशा गोष्टीने प्रभावित होणार्‍या माझ्यासारख्या एका तरूण मुलीला कुणीही असं सांगण्याची पर्वाही केली नाही की,सौन्दर्‍याचं माप चोळीच्या आकारावर मापता येत नाही.


मला झालेल्या स्तनाच्या कर्क रोगाने ते शिकवलं आणि आणखी काही शिकवलं.हा रोग प्रत्येक स्त्रीच्या हृदयाचा एव्हडा भावनिक विध्वंस करतो की,एखाद्या करामती स्त्रीचं हातातलं सोन्याचं कांकण जसं तिला प्रिय असतं तसंच हे प्रत्येक स्त्रीला प्रिय असतं.माझ्या एका बाजूच्या उरोजाच्या हानिशी मला समझोता करून घ्यावा लागला होता. प्रतिवर्तनाचा विचार केल्यास,माझ्या तरूण वयात सिनेमातल्या नट्यांवर जेव्हा माझं मन ग्रस्त झालं होतं तेव्हा स्त्रीच्या भुषणाचं प्रधानलक्ष नेहमीच माझा समोर हजर होतं असं मला त्यावेळी नेहमीच वाटायचं.

माझे आजोबा माझ्या आजीच्या पस्तिसाव्या वर्षीच गेले.जाताना सहा मुलांच्या जोपासनेची जबाबदारी तिच्यावर ते ठेवून गेले.तिने खूप कष्ट काढले.
जेवणाचे डबे पोहचविण्यापासून,कपडे शिवण्यापासून ते मानाने पैसे मिळतील असं कसलही काम करून उदर्निवाह केला.तिचं जीवन कष्टाचं आणि कधीकधी भयावह असायचं.परंतु,गरीब परिस्थितीवर तिने काबू आणला आणि हे केवळ तिच्या दृढ संकल्पनामुळे होऊ शकलं.


माझी आणि माझ्या धाकट्या बहिणीचीसुद्धा तिने काळजी घेतली.घरातली कामं करीत असताना मला तिने बर्‍याच कलाकुसरी शिकवल्या.अगदी आजतागायत मी तिची ऋणी आहे.माझी आजी सकाळी उठल्यानंतर तिच्या अनेक कामाच्या शिरस्त्यात आंघोळ करून झाल्यावर प्रथम कपडे चढवताना तिच्या छोट्याशा कपाटातून चोळी काढून ती अंगावर चढवण्याचं अवघड काम असायचं.तिच्या उरोजाचा कसलाच दिखावा होत नव्हता.
तिच्या बुटूकल्या आणि काहीशा गुबगुबीत शरीरावर त्या वक्राकार आकारामुळे स्त्रीसुलभता उठून दिसायची.


एक्याऐशी वर्षावर माझी आजी गेली.माझं आयुष्य भकास झालं.ही रिक्तता सुस्पष्ट व्ह्यायला मला जरा कठीण होत होतं.अगदीच अलीकडे जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या आजीचं आचरण तिला खास बनवू शकलं तेव्हा स्पष्टता जाणवली.


सहजसुंदरतेने माझी आजी जगली.कुणा विषयी वाईट उद्गार तिने कधीही काढले नाहीत.कधी कुणाच्या कुटाळक्या केल्या नाहीत.अनावश्यक असं काहीही बोलली नाही.तिच्या सभोवतालची हवा सुगंधाने दरवळायची.माझ्या नकळत मला ते भासायचं.लोकांवर असाधारण वजन आणायला अमुकच कारण तिला लागायचं नाही.उरोजही कारण नसायचं आणि सोन्याचं कांकणही नसायचं.ते सर्व काही सारं काही असायचं.


मला पन्नासावं वर्षं लागलं त्यावेळी माझ्या स्त्री भूषणाची कसोटी मला कळली.मला स्तनाचा कॅन्सर झाल्याचं कळलं.
मी धीटपणाचा आवा आणू शकले.धैर्‍याच्या शब्दांचा बुरखा मी परिधान केला.पण मनोमनी खोलात जाऊन मी आश्चर्य करू लागले की करामती करणारी स्त्री सोन्याच्या कांकणाशिवाय गुजारा कशी करू शकणार.?


सरतेशेवटी माझ्यात आलेल्या क्षमतेचा मी शोध लावला.माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती.


जी कोणी ह्या सारखा मानसिक आघात सोसत होती ती सर्व मला मिळणार्‍या स्वास्थलाभातून शिकून पुढे जात होती.मागे वळून पाहिलं तर बर्‍याच दृष्टीने तो एक अपूर्व अनुभव होता.माझ्या लक्षात आलं की स्त्रीत सोन्याच्या कांकणापेक्षा आणखी काही असतं.माझं स्त्रीत्व माझ्या स्त्री संबंधी पूर्वजांचं आणि जिने मला शिकवलं,वाढवलं आणि प्रेम केलं ह्यांच्या संम्मिश्रणाचं आहे.जीवनात मिळालेल्या अनुभवाला शब्दातून आणि प्रत्यक्ष क्रियेतून इतराना भरभरून वाटण्याच्या सम्मतितून स्त्रीमधे क्षमता अंतर्भूत झालेली असते.आणि ह्यावर माझा विश्वास आहे.माझ्या आजीने मला असं सांगीतलं आहे."


मला हे वासंतीचं ऐकून तिची किव आली.वेळ-काळामधे उपचारात्मक क्षमता असते हे अगदी खरं.वासंतीने आता स्वतःला सावरलं आहे.मी तिची जमेल तेव्हडी स्तुति केली.त्याने तिला खूप समाधान झालं.
मी मनात म्हणालो,
"पण राणीला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?"



श्रकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 15, 2011

निचे मुंडी नाणी धुंडी



निचे मुंडी नाणी धुंडी.

"मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?"


विनयला रस्त्यातून चालताना पाहिलं की तो नेहमीच मान खाली घालून चालताना दिसतो.अर्थात अधून मधून लांबवर पहाण्यासाठी मान उंचावून पहात असतो.कुणी ओळखीचा येताना दिसला की वेळीच मान वर करून त्याच्याशी संपर्क साधतो.
रस्त्यातून चालत जाताना प्रत्येकाची स्टाईल असते म्हणा.
कोण ताठ मानेने चालतो,कोण सारखा इकडे तिकडे बघत चालतो,कोण चेहरा हसरा ठेवून चालत असतो तर कोण दूर्मुखलेला चेहरा ठेवून चालत असतो.
विजय बरोबर चालत असताना तो मान खाली घालून चालत असतो आणि मी सरळ मान ठेवून चालत असतो.बरेच वेळा विजयबरोबर चालत असताना मी पाहिलंय, एखाद वेळी तो मधेच थांबून मातीतली एखादी चकचकीत दिसणारी वस्तू उचलून निरखून पहातो.तसंच वाटलं तर तोंडाने त्यावर फुंकून किंवा  हाताने साफ करून पहातो ते एखादं नाणं असेल तर सरळ खिशात ठेवून देतो.


एकदा असाच मी त्याच्याबरोबर जात होतो.रस्यात पार्क केलेल्या मोटारीला पास करून चालताना विनय गाडीच्या बंद दरवाज्याजवळ थांबला आणि एक पन्नास पैशाचं नाणं उचलून खिशात टाकून माझ्याकडे बघून हसला.
मला म्हणाला,
"बहुतेक मोटर मालकाचं चावीचा घोस काढताना त्याच खिशातल्या सुट्ट्या पैशातलं हे नाणं पडलं असावं."


माझ्या चेहर्‍याकडे बघून त्याला काय वाटलं देव जाणे.मला लागलीच सुदेश हॉटेलकडे बोट दाखवून म्हणाला, 
"चला आपण एक एक कप चहा मारूया"
मला उगाचच वाटलं की आताच मिळालेल्या पन्नास पैशात भर टाकून मला विनय चहा पाजायच्या विचार आहे की काय? पण त्याच्या मनात काही निराळच होतं.


मला म्हणाला,
"तुमच्या चेहर्‍याकडे बघून मला वाटलं की तुम्ही मला नक्कीच त्या पन्नास पैशाच्या नाण्याबद्दल विचारणार.तुमच्याशी निवांत बसून माझ्या ह्या सवयीची पार्श्वभुमी लगेचच सांगावी म्हणून म्हटलं चहाच्या कपावर बोलावं." 


चहा बशीत ओतून फुंकर मारून सुर्र आवाज काढून प्याल्यानंतर मला म्हणाला,
"एखाद्या दुकानाच्या दारात उभं राहून समोरच भरलेल्या आठवड्याच्या बाजाराच्या दिशेने पाहू लागल्यास ठिकठिकाणी एकच वयस्कर व्यक्ति मान खाली वाकवून काहीतरी हरवलंय ते शोधतोय असं वाटेल.हातात एक खाकी रंगाची पिशवी,पायात जुन्या वहाणा घालून पाय घासत घासत जाण्याची चाल,अधूनमधून थांबल्यासारखं करून काहीतरी मिळालं या आशाने ती व्यक्ती जमिनीकडे नीट न्याहाळून पहाताना दिसते.माझं नातं सांगायचं झाल्यास तो माझा दूरचा मामा म्हटलं तरी चालेल.सर्व त्याला मामाच म्हणायचे."


विनयने आपली जुनी आठवण मला सांगायला सुरवात केली.पुढे म्हणाला,
"इतक्या लांबून ह्या व्यक्तीकडे पाहिल्यावर,ह्या विचित्र दिसणार्‍या म्हातार्‍याने,माझा वयक्तिक विश्वास प्रेरित केला आहे अशी कल्पना करणही कठीण आहे. 
मी स्वतः त्याला मामाआजोबा म्हणतो.बाकी लोक काहीही म्हणोत.आमच्या गावात आठवड्याचा बाजार भरतो.आजुबाजूच्या गावातली मंडळी ह्या बाजाराला येतात तसंच विक्रेकरही आपला माल घेऊन या बाजाराला येतात.ऐन दुपारी तर फारच गर्दी ह्या बाजारात असते.


एकदा झालेल्या घटनेची मला आठवण आली.मी माझ्या ह्या मामाआजोबाला माझ्या स्कुटरच्या मागे बसवून ह्या बाजाराला आलो होतो.माझ्या स्कुटरचं मागचं चाक म्हणजे त्या चाकाचा टायर अलीकडे कमी हवा आहे असा दिसायचा.म्हणून बाजारातल्या एका टायरच्या दुकानात स्कुटर दुरस्त करायला म्हणून दिली.दुकानदाराने स्कुटर ठाकठीक व्ह्यायला एक तास तरी लागेल म्हणून सांगीतलं.


मी मामाआजोबाकडे पाहिलं.
"काही हरकत नाही."
असं सांगून नुकताच भरत असलेल्या बाजाराकडे बोट दाखवून आपण तिकडे जाऊया असं तो मला म्हणाला.मी त्याच्या बरोबर रस्ता ओलांडून तो म्हणाला तिकडे जायला निघालो.


शनिवारची सकाळची वेळ होती.अजून बाजारात विशेष गर्दी झाली नव्हती.समोरच एका चहाच्या दुकानात आम्ही दोघे गेलो आणि मी मामाला म्हणालो,
"आत जाऊन मी दोन प्लेट बाटाटेवडे आणि दोन चहाची ऑर्डर देतो."
दुकानात प्रवेश करून मी मागे वळून पाहिल्यावर माझा मामाआजोबा मला दिसेना.बाजार भरला होता त्या जागी भरभर जाऊन काही हरवलंय ते शोधत आहे अशा पोझमधे मला दिसला.
मी भरभर त्याच्या जवळ गेलो तेव्हा मला म्हणाला,
"सकाळ सकाळचा पहिला लाभ"
मातीत मळलेली गुळगुळीत झालेली पावली,म्हणजेच पंचवीस पैश्याचं नाणं मला दाखवत होता.पुढचा एक तास स्कुटर तयार होईपर्यंत आपण नाणी शोधूया असं मला म्हणाला.


"घाई घाईत काही लोकांच्या खिशातून अशी ही नाणी खाली पडतात.काही लोक पडलेलं नाणं उचलून घ्यायची मेहनतपण घेत नाहीत.एकाच खिशात नाणी आणि चाव्याचा घोस ठेवल्यावर चाव्या काढताना एखादं नाणं पडतं, असं हटकून घडतं.कसं का असेना त्यांची नुकसानी म्हणजे आपला फायदाच म्हणावा लागेल."
असं मला समजावून सांगत होता.


मी मामाआजोबाचा तर्काआधार घेऊन त्याच्या म्हणण्याशी सहमत झालो नसलो तरी असा एक तास घालवण्यासाठी राजी नव्हतोच.दोन चार नाणी मिळण्यासाठी मी त्याच्याशी,त्याचं मन राखण्यासाठी काहीसा कबुल झालो होतो.आणि ह्यातूनच आमच्या ह्या प्रथेला सुरवात झाली हे नक्कीच.
त्यानंतर आम्ही दोघे बरोबर असताना कुठेही गर्दीच्या ठिकाणी काही वेळासाठी अडकलो गेलो असलो की अशी खाली पडलेली नाणी शोधून काढण्यासाठी वेळ घालवत असायचो. 


त्यानंतर केव्हातरी मी आमच्या ह्या रिवाजाचं मोठं चित्र डोळ्यासमोर आणून पहात होतो.माझा मामाआजोबा जरी अगदीच श्रीमंत नसला तरी एरव्ही तो करत असलेल्या कष्टातून एव्हडी मिळकत कमवायचा की त्याच्या कुटूंबाला तो सुखात ठेवायचा.त्याला रस्त्यातली ही पडलेली नाणी जमा करायाची जरूरी भासत नसायची.
मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?त्यासाठी मी माझ्या मुल-सिद्धांतासाठी माझं तत्व-ज्ञान विचारात आणून मला त्याचं उत्तर मिळतं का पहात होतो आणि ते मिळालं.


एक म्हणजे,
सतत कार्यरत रहावं.फाल्तु वेळ दवडण्यापेक्षा उठावं आणि फिरावं.आमच्या घराण्यात हृदय विकाराची उदाहरणं आहेत.जितकं म्हणून मी कमी बसून राहिन तितकं माझ्या टिक-टिकणार्‍या घड्याळाला बरं आहे. 

दुसरं म्हणजे,
संधी सापडण्यासाठी डोळे उघडून शोधात असावं.एका पावलीने मी गरीब रहाण्यापेक्षा एका पावलीने मी श्रीमंत राहिन.पण तसं करायला मी जर लक्ष दिलं नाही तर ते श्रीमंत होणे नलगे.

तिसरं म्हणजे,
काहीतरी उद्देश ठेवून रहावं.मग तो उद्देश कितीही साधा असू द्यात.आपलं मन त्यात व्यग्र करावं.वचनबद्ध असल्याशिवाय यश प्राप्ती कशी व्हायची?

आणि शेवटी,
अनुमान काढायला घाई करू नये.
हे म्हणायला एक कारण झालं.खरंच,तो इतराना अनोळखी दिसणारा बाजारात मान खाली घालून फिरणारा म्हातारा, दिसला जरी विचित्र तरी त्याच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे त्यानेच ती शंभर रुपयाची नोट दुसर्‍या जागेतून हुडकून काढली जी मी खात्रीपूर्वक सांगत होतो की माझ्या जीनमधल्या पुढच्या खिशात सापडणार म्हणून.मी असं सांगून वाद घालत होतो.पण माझं अनुमान चुकलं होतं.


मला वाटतं अशी ही बरीचशी हरवलेली नाणी इतस्तः पडलेली असणार.आपल्या प्रत्येक जणाची त्यावर मालकी असावी,पण ती नाणी आपली होण्यासाठी आपण त्यांच्या शोधात असलं पाहिजे."

विनयचं  हे सगळं ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"तुझे हे विचार मी आज जर ऐकले नसते तर तुझ्या ह्या सवयीचा मी भलताच अर्थ काढून बसलो असतो.
निचे मुंडी पाताळ धुंडी असं म्हणण्या ऐवजी
तुझ्या बाबतीत,
निचे मुंडी नाणी धुंडी असं म्हटलं तर गैर होणार नाही."

वेटरला बिल घेऊन येताना पाहून विनयने चहाचं बिल देऊन झाल्यावर ते गाडीजवळ मिळालेले पन्नास पैसे त्या वेटरला टीप म्हणून दिले.आणि कुतूहलाने माझ्या चेहर्‍याजवळ टक लावून पहात होता. 




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com 
   

Monday, December 12, 2011

त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.


त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.

"एकदा मी आजीला विचारलं होतं,
"एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?"

माझे पाय वळू नयेत म्हणून आम्ही दोघे एका प्रंचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसलो.बसलो असतानाही प्रवीण आपल्या आजोबांच्या आठवणी
काढून काढून सांगत होता.
मला म्हणाला,
"पहाटेच माझ्या आजोबाबरोबर रानात फिरायला जायला मला आवडायचं.आम्ही जायचो ते रान म्हणजे काहीतरी अलौकिक शाश्वत अशी ही जागा आहे असं वाटायचं.उन्हाळ्याच्या दिवसात माझे आजोबा ह्या ठिकाणी असलेल्या तळ्यातून गोडे मासे गळाला लावून पकडायचे.जांभळीच्या झाडावरून जून टपोरी जांभळं,झाडावर गड्याला चढवून त्याच्याकडे सुंभाने बांधलेली टोपली देऊन त्या टोपलीत जमवलेली ती फळं टोपली भरल्यावर फांदीवरून घरंगळत टोपली खाली आल्यावर एका गोणपाटाच्या पिशवीत रसबाळ जांभळं निवडून घरी आणायचे आणि त्या जांभळांचा रस काढून आम्हा सर्वाना तो ताजा रस प्यायला द्यायचे.
"हा रस जो पितो त्याला मधुमेह होणार नाही."
असं नविसरता सांगून टाकायचे.आणि स्वतः पेलाभर रस प्यायचे.आजीलापण एक कप रस प्यायला द्यायचे.हा रस पिल्यामुळे असेल किंवा कसं पण माझ्या आजी आजोबांना शेवटपर्यंत मधुमेह झाला नाही.आजोबाना गोड आवडायचं नाही.पण रोज दुपारी चहात दोन चमचे साखर टाकून चहा प्यायचे मात्र.
 
मॅट्रिकची परिक्षा पास झाल्यावर मी गावातल्या शाळेत थोडे दिवस शिक्षक म्हणून काम करायचो.माझ्या आजोबांबरोबर ह्या रानात आल्यावर मात्र ह्या दिवसात मी शाळेच्या वेळापत्रकाला नजुमानता रहायचो.
माझ्या ह्या शिक्षकाच्या व्यवसायात आता मी जेव्हडा विचार करीत नसेन त्यापेक्षा कितीतरी जास्त त्या पहाटेच्या वेळी आजोबांबरोबर असताना मी विचार केला असेन.

अलीकडे मी जेव्हा ह्या रानात फिरायला येतो तेव्हा माझ्या मनात विचार येतात,
मी जो काही आता झालो आहे ते पाहून माझ्या आजोबानी माझ्याबद्दल अभिमान वाटून घेतला असता का?
त्यांना जे दुःख झालं ते दुःख त्यांना होणार होतं हे माहित होतं का? जेव्हा माझी आजी ह्या पावसाळ्यात त्यांची वर भेट घ्यायला गेली.
मरण येईतोपर्यंत आपण रहात्या घरातच रहाणार असं वचन आजोबांना दिलेल्या आजीला ते शक्य झालं नाही,ते शक्य होणार नाही हे त्यांना माहित होतं का?

आता जे राहिलं आहे ते रान त्यांचीच आठवण आहे.रानात नव्या पायवाटा काढणं,पक्षांची घरटी शाबूत आहेत ते पहाणं,नसल्यास त्याची जुजबी डागडूजी करणं,तळ्यात मास्यांची पैदास वाढवणं,जांभळांचा वापर करणं हा सगळा माझ्या आजोबांचा वारसा होता.आजीचा घर संभाळण्याचा वारसा होता.त्यात घराची साफसफाई,न्हाणीघरं,संडास स्वच्छ करून घेणं,आल्यागेल्या पाहूण्य़ांची बडदास्त ठेवणं अशी सर्व कामं असायची.

रानातल्या माडाच्या झाडावरून गड्यांकडून  नारळ उतरवून घेऊन त्या नारळांची रास पडवी जवळच्या एका खोलीत जमा करून दुसर्‍या आठवड्याला गण्या आणि बारक्याला निरोप देऊन त्यांच्याकडून सुळक्यावर नारळ सोलून घेऊन नारळ निराळे आणि सोडणं निराळी करून सोडणांची रास पडवी समोरच्या अंगणात सुकायला ठेवून वर्षभर ही सुकी सोडणं इंधन म्हणून वापरायची हाही वारसा माझ्या आजोबांकडूनच आला.

तुरीचं पिक आल्यावर भागेली गोणपाटाच्या गोण्यातून तु्र आणून आजी़च्या हवाली करायचे.गोण्यातल्या तूरी पडवीत ओतून घेऊन पायलीच्या मापाने तूरी ्भा भागेल्यासमोरच मापून घ्यायची. पहिल्या पायलीच्या मापाला "लाभ" असं संभोदायची.नंतरचा मापाचा आकडा दोन तीन वगैरे,

एकदा मी आजीला विचारलं होतं,
"एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?"
आजीला कारण माहित नव्हतं.पण नंतर आजोबांकडून कळलं की शेतातून आलेलं पीक हे आपला लाभ करून देतं.त्याची सुरवात एक आकड्या ऐवजी लाभ ह्या शब्दाने करावी असा रिवाज आहे.

रानातल्या पडक्या विहिरीची गोष्ट मला आजोबांनी,मी मोठा आणि समजदार झाल्यावर सांगीतली.त्यापूर्वी मी कधीही त्यांना विचारलं,
"ह्या तुडंब भरलेल्या विहिरचं पाणी आपण पिण्यासाठी का वापरत नाही.?"
तेव्हा ते म्हणायचे,
"त्या विहिरीतलं पाणी अशुद्ध आहे.ते पिण्यालायक नाही."
"पण मग आपण गाईगुराना ते पाणी प्यायला कसं देतो?"
ह्या माझ्या दुसर्‍या प्रश्नाला ते नेहमीच म्हणायचे,
"तू मोठा झाल्यावर तुला कळेल"
आणि एक दिवस त्यांनी त्या विहीरीचा विषय काढून मला सांगून टाकलं.
"मुणगेकरांच्या शालूने जीवाल कंटाळून ह्या विहिरीत जीव दिला होता.तिला तिचा नवरा चांगलं वागवत नव्हता.दोन दिवसानी तिचं प्रेत मिळालं.ते सुद्धा वर तरंगत होतं ते एका वाटाड्याने पाहिलं.त्यानंतर ह्या विहिरीचं पाणी कुणी पियीनात."

नंतर मला कळलं की शालूचा नवरा काही दिवसानी गुप्तरोगाच्या व्याधीने मेला.

आता जांभळांचा रस मी माझ्या नातवंडाना देतो.पण जेव्हा ती शहरातून सुट्टीत घरी येतात तेव्हा.त्यांना रानात फिरायला नेतो.माझ्या आजोबांच्या गोष्टी मी त्यांना सांगतो.
मला वाटतं,कोकणातले हे बदलणारे ऋतू निरनीराळ्या फळांना उत्पन्न करण्यात जे प्रतिवर्तन दाखवतात तेच माझ्या आजीआजोबांच्या जीवनात मला दिसून आलं आहे.
माझ्या आजीची सेवा करण्यात माझ्या आईने दाखवलेल्या 
संवेदना आणि तिच्या मनातली दया हे जणू त्या रानातून उन्हाळ्याच्या दिवसात दुपारचं उन झाडांच्या फांद्यातून खाली जमिनीवर झिरपतं आणि रानाची जोपासना करतं तसंच काहीसं होतं.

माझा मामा ऐन तारुण्यात प्रेमभंगाच्या धक्क्याने जेव्हा कालवश झाला ते जणू रानाला कडक उन्हाळ्यात जागोजागी लागणार्‍या आगी सारखंच होतं.आता जेव्हा भर पावसात मी रानात येऊन जातो तेव्हा तेव्हा रानातला शुकशूकाट जणू माझी आजी गेल्यानंतर घरातली सर्व मजाच निघून गेली त्यावेळी जसं वाटावं तसं हे वातावरण भासतं.पहाट संपता संपता सकाळच्या वेळी इथे आल्यावर तसं भासतं मात्र.तळ्यातले मासे बघून माझ्या आजोबांची आठवण आल्याशिवय रहात नाही.

मला वाटतं ह्या रानातलं माझं माझ्या आजोबांबरोबर पहाटेचं फिरणं मला जीवनात परिपूर्ण करूं शकलं.
माझ्या आजोबांनीच मला,शहरातलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.कामं करीत असताना विचार येत रहातात,पहाटे 
माझ्या आजोबाबरोबर रानात पहाटे फिरताना यायचे अगदी तसे."

संध्याकाळ बरीच झाली होती.घरी जाईपर्यंत कीर्र काळोख होणार म्हणून प्रवीण चार सेलचा टॉर्च घेऊन आला होता.
रानातून पायवाटेवरून चालताना मी पुढे आणि प्रवीण माझ्या मागे राहून प्रकाशाची झोत टाकत मला मार्ग दाखवत होता.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com



 
   

Friday, December 9, 2011

झाडा संगत चालणं.


झाडा संगत चालणं.

"मला आता समजून आलंय,माझे आजोबा जीवनाच्या महासागरातून स्वतःचा कसा बचाव करीत राहिले.माझी खात्री आहे की त्यांच्या जवळचा तो रानातल्या वातावरणाचा खजिनाच अंधारातली प्रकाश ज्योत होती."

प्रवीणचे आजोबा फॉरेस्ट ऑफीसर होते.त्यांची कारकीर्द रानात,जंगलात रहाण्यात गेली.प्रवीण अगदी लहानपणापासून आपल्या आजोबांच्या सहवासात होता.त्यामुळे त्याच्यावर जे आजोबांकडून संस्कार झाले होते ते जास्त करून निसर्गसृष्टी संबंधानेच होते.आता निवृत्त होऊन प्रवीण कोकणातल्या एका खेड्यात कायमचा रहायला गेला होता.त्या खेड्यातल्या निसर्गसृष्टीवर तो जास्त आकर्षित होता.खेड्याच्या भोवतालची डोंगरांची रांग आणि भरपूर पाऊस पडत असल्याने डोंगरावरची रानं त्याला खूपच भावली होती.

मी त्याच्या घरी गेलो असताना मला त्याने आग्रहाने आपल्याबरोबर रानात फिरयाला नेलं.रानातून पायवाटा काढत चालत असताना मला प्रवीण सांगत होता,
"मी आता कधी रानात फिरत असतो तेव्हा माझ्या आजोबांबद्दलच्या आठवणी अगदी आजच्या आजच्या वाटतात.गोचिड जशी कुत्र्याच्या अंगावर चिकटून असते तसंच मी माझ्या आजोबांबरोबर माझ्या लहानपणापासून असायचो.माझ्या आजोबांनी काहीतरी त्यांच्याजवळ राखून ठेवलंय ते मी प्रयत्नपूर्वक हळूहळू जमा करावं असा विचार मनात येऊन तसं करीत होतो.फिरताना आम्ही बोलत असायचो.शब्दाशब्दामधे जे बोललं जायचं आणि ज्याचा विचार व्हायचा त्यातलं गहन असलेलं असं काहीतरी  मी निवडून ठेवीत असायचो.रानातला वातावरणातला खजिना त्यांच्याजवळ असायचा आणि त्यामुळे त्याचं मन शांत असायचं.

मला माझे आजोबा सांगायचे,
"माझ्या जीवनातल्या नोकरीच्या काळात,जेव्हा मी रानात रहायचो,तेव्हा मी माझ्यावरच जबरी आणून घरातला अंधार टाळण्यासाठी बाहेर रानात फिरायला जायचो.हेतू हाच होता की रानातल्या झाडांच्या आकर्षणाने मी पुढे पुढे जात रहावं. 

रानातल्या अनेक प्रचंड वृक्षांचा सन्नाटा जणू झोपलेल्या मुलाच्या अंगावर पांघरूण घातल्यासारखा वाटायचा.त्या शांत वातावरणाने मनात धीर यायचा.हृदय मंद होऊन अंगातल्या नसा वेदनाशामक व्हायच्या.

त्या वातावरणात मला एकप्रकारचं बळ यायचं.मनात यायचं की कुणालाही, जाऊदे,आसो म्हणावं.माफ करावं.समर्पण करावं आणि शेवटी माझा मी खरा कुणासाठी सावली होण्यापेक्षा प्रकाश व्हावं.त्याचं कारण असं की, मला जाणीव झाली होती की जीवन हे एक नुसतंच परिश्रम नसून,झर्‍यासारखी निवांत वहाणारी लय असावी,पूर्ण असावं,सुंदर असावं.हे सर्व 
माझ्यात भिनल्यासारखं झालं.आणि रानातून बाहेर पडल्यावर रानातलं वातावरण हा एक खजिना समजून माझ्याच जवळ मी ठेवला होता. त्यामुळे काही गोंधळ झाला असताना तो खजिना माझ्या जवळ आहे ह्याबद्दल मी जागृत असायचो शिवाय माझ्या अंगातली प्रत्येक पेशी खजिना असल्याच्या आनंदाने गुंजन करयाची. 

मला माहित होतं की हे वातावरण माझ्यासाठीच एकमात्र नव्हतं.झाडांमधे एव्हडी क्षमता असते की कुणलाही त्याचा प्रताप मिळू शकतो."

नंतर आपल्या आजोबाबरोबर रानात फिरताना आठवणीत असलेल्या गोष्टी सांगताना प्रवीण मला म्हणाला,
"आम्ही रानात फिरफिर फिरायचो.नेहमीच मी त्यांच्या मागे 
पाठलाग केल्यासारखा असायचो.काहीवेळा झाडावरच्या फांद्या फांद्यामधे जाळी बांधून त्यात लटकणारे कोळी माझ्या केसात अडकून रहायचे.
माझे आजोबा नावानीशी प्रत्येक झाड ओळखायचे.
मला वाटतं ती माहिती त्यांना सुसंबद्धतीत आणि पूजनीय वाटायची.

मला आठवतं,एकदा माझ्या आजोबांनी,रानटी झाडावरून झरकन पळत जाणारी इवलिशी खार मला दाखवली.ती झाडावर चढत असताना तिच्याकडे निरक्षून पहात होतो.शेवटी तिचा माग संपून ती दिसेनाशी होईपर्यंत आमची मान आम्ही वर करूनच होतो.
ही आठवण त्या क्षणापासून आतापर्यंत माझ्या मनात चिकटून आहे.माझ्या अंतर्मनात दडून बसली आहे.

माझे आजोबा मला सांगायचे की त्यांच्या सोळा वर्षापासून ते असे रानात भटकत असायचे.जरूरी वाटली तर ते दिवसभर श्रम घेऊन पायवाटा बनवायचे.त्यामुळे कुणालाही रानातून सहजपणे चालता यावं.त्यानी स्वतःहून अनेक झाडं आणि त्यांचे रोप लावले आहेत.ती झाडं आता वृक्ष झाले आहेत.
त्यांच्या पेक्षाही प्रचंड असलेल्या कसल्यातरी गोष्टीचे ते एक अंश म्हणून आहेत असं ते स्वतःला मानायचे.हाच रानातला खजिना ते स्वतः जवळ बाळगायचे.माझ्या आजोबांनी खूप मोठी दाढी वाढवलेली होती.दाढी करण्यात वाया जाणारा वेळ त्यांनी वाचवला असं ते म्हणायचे.

मला आता समजून आलंय,माझे आजोबा जीवनाच्या महासागरातून स्वतःचा कसा बचाव करीत राहिले.माझी खात्री आहे की त्यांच्या जवळचा तो रानातल्या वातावरणाचा खजिनाच अंधारातली प्रकाश ज्योत होती.आणि ते प्रकाशात असताना अंधाराची आठवण आपल्या जवळ बाळगून असायचे.ह्या विरोधाभासात प्रकाश आणि अंधार ह्या दोन्ही गोष्टींच्या परिमाणाबद्दल त्यांच्या मनात असहमति असायची.पण त्या दोनही गोष्टींचा मेळ बसवून ते त्यातून बोध घ्यायचे.पण तो बोध क्षणभराचा असायचा.खरंच ते रानातल्या झाडासारखेच असायचे.त्यांच्या मनातला संदेश माझ्या कानात कुजबुजल्या सारखा व्ह्यायचा.फक्त मला निःशब्द राहून गोंगाट न होऊ देता तो संदेश ऐकण्याचं काम करावं लागायचं.

मला ते नेहमी म्हणायचे,
"रानातल्या झाडावरच्या जाळ्यातल्या प्रत्येक कोळ्याबरोबर मी समझोता केला आहे.त्याचबरोबर सतत निर्माण होत राहिलेल्या निसर्ग सृष्टी्वर माझी श्रद्धा आहे.रानातला एक वाघ व्यतीत झाला तरी एक जीवन नवनिर्माण होतं.एक नदी गायब झाली तरी नव्या सागराला जन्माला यावं लागतं."

प्रवीण हे सर्व सांगत असताना आम्ही त्या रानातून किती मैल चाललो ह्याचं भानच राहिलं नाही.मला एव्हडं चालायची सवय नसल्याने.माझे पाय वळू नयेत म्हणून आम्ही दोघे एका प्रंचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसलो.बसलो असतानाही प्रवीण आपल्या आजोबांच्या आठवणी काढून काढून सांगत होता.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

 
      

Tuesday, December 6, 2011

विजयचं शहाणं खूळ



“कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.”

जेव्हा पहावं तेव्हा विजय आणि त्याचं कुटूंब देशात कुठेतरी सहलीवर गेले आहेत असं ऐकायला यायचं.मुलांना सुटी नसेल तर विजय एकटा कुठेतरी सहलीवर जाऊन यायचा.मात्र सुट्टी लागल्यावर सर्व कुटूंब सहलीवर जायचं.त्या त्या जागी सर्व ऋतूत कसं वाटतं हेही पहायला त्याचं कुतूहल कमी पडत नसायचं.कोकणातला पावसाळा,काश्मिरमधला बर्फ पडण्याचा मोसम, चेरापूंजीला अतोनात पाऊस पडत असताना,हिमाचल प्रदेशात फळफळावळचा सिझन असताना असं हे साधून तो सहली काढायचा.

एकदा मी विजयला मुद्दाम विचारलं,
“अशा ह्या सहली काढणं म्हणजे एक प्रकारचं खूळच आहे असं मला वाटलं तर ते गैर होईल का?”
माझं हे ऐकून विजयला राग येईल असं मला वाटलं होतं.उलटपक्षी त्याचा चेहरा आनंदलेला दिसला.

मला म्हणाला,
“मला हा असा प्रश्न तुम्हीच विचाराल ह्याची मला खात्री होती.कारण इतक्या लांबून ज्याज्या वेळी तुम्ही माझ्या घरी यायचा तेव्ह तेव्हा दाराला मोठं कुलूप बघून कोण वैतागणार नाही?. आणि शेजार्‍याकडे चौकशी केल्यावर विजय सहलीवर गेला आहे ऐकल्यावर नक्कीच वैताग येणार.
हो! माझं हे सहलीवर जाणं हे एक खूळच आहे.पण कुठचीही गोष्ट कारणाशिवाय नसते.ह्या खूळालाही एक कारण आहे.”

विजयच्या वडीलांनी अर्ली-रिटायर्डमेंट घेतली होती.आणि ते शहरातला ब्लॉक विकून गावात रहायला गेले होते हे मला माहित होतं.विजय त्यावेळी लहान होता.त्यांनी विजयच्या आजीआजोबांच्या शेतीवाडी जवळच एक टुमदार घर घेतलं होतं.आणि ते तिथेच कायमचे रहायला गेले होते.विजयच्या लहानपणचं जीवन हेच तो कारण सांगणार ह्याचा मला अंदाज होता.

मला विजय म्हणाला,
“मुक्काम-पोस्ट बदलणं म्हणजे कुणालाही वैतागल्यासारखं होणं स्वाभाविक आहे.जास्त करून दहाएक वर्षाच्या वयावर.
शहरातला रहाता ब्लॉक सोडून देऊन कुठच्या कुठे रहायला जायचं म्हणजे महाकठिण म्हणावं लागेल.मला आठवतं ज्या टॅक्सीतून आम्ही जात होतो,त्या रात्रीच्यावेळी आजुबाजूने पास होणार्‍या गाड्यांच्या आवाजाने आणि खड्डे ,खळगे संभाळीत जाताना गाडीला मिळणार्‍या हेलकाव्याने,त्या टॅक्सीत झोप येण्याऐवजी,आजुबाजूच्या शेतातल्या बेडकांच्या डरांव,डरांव आवाजाने आणि किड्यामकोड्यांच्या किर्र ओरडण्याने माझ्या डोक्यात त्यावेळी त्या आवाजांचे प्रतिध्वनी ऐकायला येत होते.

शेवटी मला दिलेल्या चार भिंतीच्या एका खोलीत मी मलाच जखडून घेतलं होतं.मी अगदी भयभीत आणि बेचैन झालो होतो.ह्या नव्या जागेतलं माझं भवितव्य काय असावं हे माझं मलाच कोडं झालं होतं.

जसजसे दिवस जात होते तसतसं माझ्याच मनात कुतूहल निर्माण होत गेलं.घराला बाल्कनी नव्हती.घराभोवती फेन्सिंग नव्हतं.रस्त्यावरून बसीस जाताना दिसत नव्हत्या.लोकांचा गलबलाट नव्हता.टीव्हीचं कोकाटणं नव्हतं.सगळं कसं शांत शांत होतं.सकाळीच गाईचं हंबरणं,कोंबड्यांच्या बांग, पक्षांची किलबिलाट,कुक्कुट-कोंबड्याचं अंतराअंतराने ओरडणं ह्याच गोष्टी कानावर यायच्या. हे ऐकून मन प्रसन्न व्हायचं हे मात्र निश्चित.

माझ्या अवतिभोवतीचा परिसर पहायची मला उत्सुकता होती. आम्ही आलो हे ऐकताच माझा मामा आमच्या घरी आला होता.माझ्या आजीआजोबांचं घर जवळच होतं.त्याच्या बरोबर मी त्यांच्या शेतावर गेलो.पायवाटेच्या दोन्ही बाजूला सूंदर हिरवी गार भाताची रोपं दिसली.एका कुणग्यात माझी आजी काम करताना मला दिसली.तिने मला पाहिल्यावर हातातलं सर्व टाकून माझ्याकडे लगबगीने आली.खूप दिवसानी माझ्या आजीला पाहून मला जो आनंद झाला तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

माझा हात तिच्या हातात घेऊन मी आणि माझी आजी आम्ही दोघं रानातून जायला निघालो. वाटेत एक नैसर्गिक झरा वहाताना पाहिला.त्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मी आणि माझी आजी पुढे पुढे जात राहिलो.त्या झर्‍याचं ते सर्व पाणी एका लहानश्या तलावात जमत होतं. आजीने मला तळ्याच्या काठी बसवलं आणि त्यात पोहणारे लहान मोठे मासे दाखवले.असं करत करत मी आणि माझी आजी त्यांच्या घरी आलो.सर्व परिसरात जोमात येऊन बहरलेली वनस्पती मला दाखवायची माझ्या आजीला इच्छा होती असं वाटलं.

शहर सोडून ह्या गावात आल्याबद्दल आता मला मुळीच वैताग वाटत नव्हता.जवळ जवळ ह्या वातावरणात मी आधीन झालो होतो,आहारी गेलो होतो.

शहरात ह्यापूर्वी असा अनुभव मला कधीच आला नव्हता.माझ्या अवतिभोवती अपक्षय आणि पुनर्जीवन होत असताना मला दिसत होतं.
कधीच अंत न होणारं कालचक्र,जन्म,जीवन,अंत आणि पुन्हा पुनर्जीवन ह्याचं दृष्य पहायला मिळत होतं.निसर्ग हेच माझं आश्रयस्थान झालं होतं.

जीवनातले तणाव आणि मागणी यापासून मी सहजच सुटका करून घेत होतो.आणि त्याचबरोबर मनाला विस्कळीत करणार्‍या विचाराना अडथळा आणीत होतो.हा निसर्गाशी जुळणारा माझा बंध माझ्या अख्या बालपणात वृद्धिंगत होत होता.उन्हाळ्याच्या दिवसात रानात हुदडणं,झर्‍याच्या पाण्यात पोहणं आणि झाडावर चढणं ह्यात दिवस जात होते.

आता ह्या वयावर निसर्गाचं देणं काय असतं त्याची प्रशंसा करणं खरोखरच जास्त सोपं जात आहे.आता माझ्या कुटूंबाबरोबर मी देशात जमेल तिथे सृष्टीसौन्दर्य पहायला अक्षरशः धावळपळ करीत असतो.धावपळ येवढ्यासाठीच की जसं वय होत जातं तसा प्रवास आणि दगदग जमत नाही.हे होण्यापूर्वीच इच्छा पूरी करून घेणं बरं असं उगाचच मनात येत असतं.

आम्ही देशातल्या सर्व राज्यात एकापाठून एक सहली काढीत आहो.कुठे प्राचिन गुहा दिसल्या की त्यात सरपटत जाऊन पहाणं,कुठे मोठे तलाव दिसले की त्यात मासेमारीचा छंद पुरवून घेणं, डोंगरावरून वाट फुटेल तिथे वरवर चालत जाणं,जाताना अपरिचीत दिसणारी वनस्पती,पक्षी न्याहळून पहाणं,समुद्र चौपाटीवर जाऊन सूर्योदय तसंच सूर्यास्त पाहून घेणं,हे करायला देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर जाणं, असं हे आमचं सारखंच चालू आहे.निसर्ग माझ्या जीवनात माझ्या स्वास्थ्याचं,माझ्या सुखासमाधानीचं गुणसंवर्घन करीत असतो,मला मार्गदर्शन करतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला प्रेरणा देतो असं मला वाटतं.

मी म्हणतो त्याचा अनुभव घेतल्याशिवाय जाणीव होणार नाही.सध्या आपण अतिवेगवान दुनियेत वावरत असतो.ह्या कटकटीच्या आणि खडतर जीवनात माणसं एव्हडी गुंतून गेली आहेत की, निसर्गरम्य जीवन असतं ह्याचा त्यांना विसर पडत चालला आहे.लोकांचं लक्ष विचलित झालं आहे असं मला वाटतं.कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.

माझ्या बालपणाच्या जीवनातल्या अनुभवावरून मी म्हणेन,आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे, निसर्ग सौन्दर्याच्या कल्पना मनात आणून शोधमोहीम काढून त्यात पूर्णपणे तल्लिन होऊन गेलं पाहिजे.निसर्गाच्याच उपचारात्मक स्वरूपात आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं.”

विजयचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मला त्याच्या खूळाची कल्पना आली.मला कुणाच्यातरी कवितेच्या दोन ओळी आठवल्या.
मी त्याला म्हणालोही,
“तुझे नाही इथले काही, अदृष्टातून आले कूळ
आदीम अंतीम सत्याला की जसे लगडते शहाणे खूळ!”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


विजयचं शहाणं खूळ


“कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.”

जेव्हा पहावं तेव्हा विजय आणि त्याचं कुटूंब देशात कुठेतरी सहलीवर गेले आहेत असं ऐकायला यायचं.मुलांना सुटी नसेल तर विजय एकटा कुठेतरी सहलीवर जाऊन यायचा.मात्र सुट्टी लागल्यावर सर्व कुटूंब सहलीवर जायचं.त्या त्या जागी सर्व ऋतूत कसं वाटतं हेही पहायला त्याचं कुतूहल कमी पडत नसायचं.कोकणातला पावसाळा,काश्मिरमधला बर्फ पडण्याचा मोसम, चेरापूंजीला अतोनात पाऊस पडत असताना,हिमाचल प्रदेशात फळफळावळचा सिझन असताना असं हे साधून तो सहली काढायचा.

एकदा मी विजयला मुद्दाम विचारलं,
“अशा ह्या सहली काढणं म्हणजे एक प्रकारचं खूळच आहे असं मला वाटलं तर ते गैर होईल का?”
माझं हे ऐकून विजयला राग येईल असं मला वाटलं होतं.उलटपक्षी त्याचा चेहरा आनंदलेला दिसला.

मला म्हणाला,
“मला हा असा प्रश्न तुम्हीच विचाराल ह्याची मला खात्री होती.कारण इतक्या लांबून ज्याज्या वेळी तुम्ही माझ्या घरी यायचा तेव्ह तेव्हा दाराला मोठं कुलूप बघून कोण वैतागणार नाही?. आणि शेजार्‍याकडे चौकशी केल्यावर विजय सहलीवर गेला आहे ऐकल्यावर नक्कीच वैताग येणार.
हो! माझं हे सहलीवर जाणं हे एक खूळच आहे.पण कुठचीही गोष्ट कारणाशिवाय नसते.ह्या खूळालाही एक कारण आहे.”

विजयच्या वडीलांनी अर्ली-रिटायर्डमेंट घेतली होती.आणि ते शहरातला ब्लॉक विकून गावात रहायला गेले होते हे मला माहित होतं.विजय त्यावेळी लहान होता.त्यांनी विजयच्या आजीआजोबांच्या शेतीवाडी जवळच एक टुमदार घर घेतलं होतं.आणि ते तिथेच कायमचे रहायला गेले होते.विजयच्या लहानपणचं जीवन हेच तो कारण सांगणार ह्याचा मला अंदाज होता.

मला विजय म्हणाला,
“मुक्काम-पोस्ट बदलणं म्हणजे कुणालाही वैतागल्यासारखं होणं स्वाभाविक आहे.जास्त करून दहाएक वर्षाच्या वयावर.
शहरातला रहाता ब्लॉक सोडून देऊन कुठच्या कुठे रहायला जायचं म्हणजे महाकठिण म्हणावं लागेल.मला आठवतं ज्या टॅक्सीतून आम्ही जात होतो,त्या रात्रीच्यावेळी आजुबाजूने पास होणार्‍या गाड्यांच्या आवाजाने आणि खड्डे ,खळगे संभाळीत जाताना गाडीला मिळणार्‍या हेलकाव्याने,त्या टॅक्सीत झोप येण्याऐवजी,आजुबाजूच्या शेतातल्या बेडकांच्या डरांव,डरांव आवाजाने आणि किड्यामकोड्यांच्या किर्र ओरडण्याने माझ्या डोक्यात त्यावेळी त्या आवाजांचे प्रतिध्वनी ऐकायला येत होते.

शेवटी मला दिलेल्या चार भिंतीच्या एका खोलीत मी मलाच जखडून घेतलं होतं.मी अगदी भयभीत आणि बेचैन झालो होतो.ह्या नव्या जागेतलं माझं भवितव्य काय असावं हे माझं मलाच कोडं झालं होतं.

जसजसे दिवस जात होते तसतसं माझ्याच मनात कुतूहल निर्माण होत गेलं.घराला बाल्कनी नव्हती.घराभोवती फेन्सिंग नव्हतं.रस्त्यावरून बसीस जाताना दिसत नव्हत्या.लोकांचा गलबलाट नव्हता.टीव्हीचं कोकाटणं नव्हतं.सगळं कसं शांत शांत होतं.सकाळीच गाईचं हंबरणं,कोंबड्यांच्या बांग, पक्षांची किलबिलाट,कुक्कुट-कोंबड्याचं अंतराअंतराने ओरडणं ह्याच गोष्टी कानावर यायच्या. हे ऐकून मन प्रसन्न व्हायचं हे मात्र निश्चित.

माझ्या अवतिभोवतीचा परिसर पहायची मला उत्सुकता होती. आम्ही आलो हे ऐकताच माझा मामा आमच्या घरी आला होता.माझ्या आजीआजोबांचं घर जवळच होतं.त्याच्या बरोबर मी त्यांच्या शेतावर गेलो.पायवाटेच्या दोन्ही बाजूला सूंदर हिरवी गार भाताची रोपं दिसली.एका कुणग्यात माझी आजी काम करताना मला दिसली.तिने मला पाहिल्यावर हातातलं सर्व टाकून माझ्याकडे लगबगीने आली.खूप दिवसानी माझ्या आजीला पाहून मला जो आनंद झाला तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

माझा हात तिच्या हातात घेऊन मी आणि माझी आजी आम्ही दोघं रानातून जायला निघालो. वाटेत एक नैसर्गिक झरा वहाताना पाहिला.त्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मी आणि माझी आजी पुढे पुढे जात राहिलो.त्या झर्‍याचं ते सर्व पाणी एका लहानश्या तलावात जमत होतं. आजीने मला तळ्याच्या काठी बसवलं आणि त्यात पोहणारे लहान मोठे मासे दाखवले.असं करत करत मी आणि माझी आजी त्यांच्या घरी आलो.सर्व परिसरात जोमात येऊन बहरलेली वनस्पती मला दाखवायची माझ्या आजीला इच्छा होती असं वाटलं.

शहर सोडून ह्या गावात आल्याबद्दल आता मला मुळीच वैताग वाटत नव्हता.जवळ जवळ ह्या वातावरणात मी आधीन झालो होतो,आहारी गेलो होतो.

शहरात ह्यापूर्वी असा अनुभव मला कधीच आला नव्हता.माझ्या अवतिभोवती अपक्षय आणि पुनर्जीवन होत असताना मला दिसत होतं.
कधीच अंत न होणारं कालचक्र,जन्म,जीवन,अंत आणि पुन्हा पुनर्जीवन ह्याचं दृष्य पहायला मिळत होतं.निसर्ग हेच माझं आश्रयस्थान झालं होतं.

जीवनातले तणाव आणि मागणी यापासून मी सहजच सुटका करून घेत होतो.आणि त्याचबरोबर मनाला विस्कळीत करणार्‍या विचाराना अडथळा आणीत होतो.हा निसर्गाशी जुळणारा माझा बंध माझ्या अख्या बालपणात वृद्धिंगत होत होता.उन्हाळ्याच्या दिवसात रानात हुदडणं,झर्‍याच्या पाण्यात पोहणं आणि झाडावर चढणं ह्यात दिवस जात होते.

आता ह्या वयावर निसर्गाचं देणं काय असतं त्याची प्रशंसा करणं खरोखरच जास्त सोपं जात आहे.आता माझ्या कुटूंबाबरोबर मी देशात जमेल तिथे सृष्टीसौन्दर्य पहायला अक्षरशः धावळपळ करीत असतो.धावपळ येवढ्यासाठीच की जसं वय होत जातं तसा प्रवास आणि दगदग जमत नाही.हे होण्यापूर्वीच इच्छा पूरी करून घेणं बरं असं उगाचच मनात येत असतं.

आम्ही देशातल्या सर्व राज्यात एकापाठून एक सहली काढीत आहो.कुठे प्राचिन गुहा दिसल्या की त्यात सरपटत जाऊन पहाणं,कुठे मोठे तलाव दिसले की त्यात मासेमारीचा छंद पुरवून घेणं, डोंगरावरून वाट फुटेल तिथे वरवर चालत जाणं,जाताना अपरिचीत दिसणारी वनस्पती,पक्षी न्याहळून पहाणं,समुद्र चौपाटीवर जाऊन सूर्योदय तसंच सूर्यास्त पाहून घेणं,हे करायला देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर जाणं, असं हे आमचं सारखंच चालू आहे.निसर्ग माझ्या जीवनात माझ्या स्वास्थ्याचं,माझ्या सुखासमाधानीचं गुणसंवर्घन करीत असतो,मला मार्गदर्शन करतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला प्रेरणा देतो असं मला वाटतं.

मी म्हणतो त्याचा अनुभव घेतल्याशिवाय जाणीव होणार नाही.सध्या आपण अतिवेगवान दुनियेत वावरत असतो.ह्या कटकटीच्या आणि खडतर जीवनात माणसं एव्हडी गुंतून गेली आहेत की, निसर्गरम्य जीवन असतं ह्याचा त्यांना विसर पडत चालला आहे.लोकांचं लक्ष विचलित झालं आहे असं मला वाटतं.कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.

माझ्या बालपणाच्या जीवनातल्या अनुभवावरून मी म्हणेन,आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे, निसर्ग सौन्दर्याच्या कल्पना मनात आणून शोधमोहीम काढून त्यात पूर्णपणे तल्लिन होऊन गेलं पाहिजे.निसर्गाच्याच उपचारात्मक स्वरूपात आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं.”

विजयचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मला त्याच्या खूळाची कल्पना आली.मला कुणाच्यातरी कवितेच्या दोन ओळी आठवल्या.
मी त्याला म्हणालोही,
“तुझे नाही इथले काही, अदृष्टातून आले कूळ
आदीम अंतीम सत्याला की जसे लगडते शहाणे खूळ!”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Posted: Wed, 07 Dec 2011 01:58:36 +0000

“कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.”

जेव्हा पहावं तेव्हा विजय आणि त्याचं कुटूंब देशात कुठेतरी सहलीवर गेले आहेत असं ऐकायला यायचं.मुलांना सुटी नसेल तर विजय एकटा कुठेतरी सहलीवर जाऊन यायचा.मात्र सुट्टी लागल्यावर सर्व कुटूंब सहलीवर जायचं.त्या त्या जागी सर्व ऋतूत कसं वाटतं हेही पहायला त्याचं कुतूहल कमी पडत नसायचं.कोकणातला पावसाळा,काश्मिरमधला बर्फ पडण्याचा मोसम, चेरापूंजीला अतोनात पाऊस पडत असताना,हिमाचल प्रदेशात फळफळावळचा सिझन असताना असं हे साधून तो सहली काढायचा.

एकदा मी विजयला मुद्दाम विचारलं,
“अशा ह्या सहली काढणं म्हणजे एक प्रकारचं खूळच आहे असं मला वाटलं तर ते गैर होईल का?”
माझं हे ऐकून विजयला राग येईल असं मला वाटलं होतं.उलटपक्षी त्याचा चेहरा आनंदलेला दिसला.

मला म्हणाला,
“मला हा असा प्रश्न तुम्हीच विचाराल ह्याची मला खात्री होती.कारण इतक्या लांबून ज्याज्या वेळी तुम्ही माझ्या घरी यायचा तेव्ह तेव्हा दाराला मोठं कुलूप बघून कोण वैतागणार नाही?. आणि शेजार्‍याकडे चौकशी केल्यावर विजय सहलीवर गेला आहे ऐकल्यावर नक्कीच वैताग येणार.
हो! माझं हे सहलीवर जाणं हे एक खूळच आहे.पण कुठचीही गोष्ट कारणाशिवाय नसते.ह्या खूळालाही एक कारण आहे.”

विजयच्या वडीलांनी अर्ली-रिटायर्डमेंट घेतली होती.आणि ते शहरातला ब्लॉक विकून गावात रहायला गेले होते हे मला माहित होतं.विजय त्यावेळी लहान होता.त्यांनी विजयच्या आजीआजोबांच्या शेतीवाडी जवळच एक टुमदार घर घेतलं होतं.आणि ते तिथेच कायमचे रहायला गेले होते.विजयच्या लहानपणचं जीवन हेच तो कारण सांगणार ह्याचा मला अंदाज होता.

मला विजय म्हणाला,
“मुक्काम-पोस्ट बदलणं म्हणजे कुणालाही वैतागल्यासारखं होणं स्वाभाविक आहे.जास्त करून दहाएक वर्षाच्या वयावर.
शहरातला रहाता ब्लॉक सोडून देऊन कुठच्या कुठे रहायला जायचं म्हणजे महाकठिण म्हणावं लागेल.मला आठवतं ज्या टॅक्सीतून आम्ही जात होतो,त्या रात्रीच्यावेळी आजुबाजूने पास होणार्‍या गाड्यांच्या आवाजाने आणि खड्डे ,खळगे संभाळीत जाताना गाडीला मिळणार्‍या हेलकाव्याने,त्या टॅक्सीत झोप येण्याऐवजी,आजुबाजूच्या शेतातल्या बेडकांच्या डरांव,डरांव आवाजाने आणि किड्यामकोड्यांच्या किर्र ओरडण्याने माझ्या डोक्यात त्यावेळी त्या आवाजांचे प्रतिध्वनी ऐकायला येत होते.

शेवटी मला दिलेल्या चार भिंतीच्या एका खोलीत मी मलाच जखडून घेतलं होतं.मी अगदी भयभीत आणि बेचैन झालो होतो.ह्या नव्या जागेतलं माझं भवितव्य काय असावं हे माझं मलाच कोडं झालं होतं.

जसजसे दिवस जात होते तसतसं माझ्याच मनात कुतूहल निर्माण होत गेलं.घराला बाल्कनी नव्हती.घराभोवती फेन्सिंग नव्हतं.रस्त्यावरून बसीस जाताना दिसत नव्हत्या.लोकांचा गलबलाट नव्हता.टीव्हीचं कोकाटणं नव्हतं.सगळं कसं शांत शांत होतं.सकाळीच गाईचं हंबरणं,कोंबड्यांच्या बांग, पक्षांची किलबिलाट,कुक्कुट-कोंबड्याचं अंतराअंतराने ओरडणं ह्याच गोष्टी कानावर यायच्या. हे ऐकून मन प्रसन्न व्हायचं हे मात्र निश्चित.

माझ्या अवतिभोवतीचा परिसर पहायची मला उत्सुकता होती. आम्ही आलो हे ऐकताच माझा मामा आमच्या घरी आला होता.माझ्या आजीआजोबांचं घर जवळच होतं.त्याच्या बरोबर मी त्यांच्या शेतावर गेलो.पायवाटेच्या दोन्ही बाजूला सूंदर हिरवी गार भाताची रोपं दिसली.एका कुणग्यात माझी आजी काम करताना मला दिसली.तिने मला पाहिल्यावर हातातलं सर्व टाकून माझ्याकडे लगबगीने आली.खूप दिवसानी माझ्या आजीला पाहून मला जो आनंद झाला तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

माझा हात तिच्या हातात घेऊन मी आणि माझी आजी आम्ही दोघं रानातून जायला निघालो. वाटेत एक नैसर्गिक झरा वहाताना पाहिला.त्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मी आणि माझी आजी पुढे पुढे जात राहिलो.त्या झर्‍याचं ते सर्व पाणी एका लहानश्या तलावात जमत होतं. आजीने मला तळ्याच्या काठी बसवलं आणि त्यात पोहणारे लहान मोठे मासे दाखवले.असं करत करत मी आणि माझी आजी त्यांच्या घरी आलो.सर्व परिसरात जोमात येऊन बहरलेली वनस्पती मला दाखवायची माझ्या आजीला इच्छा होती असं वाटलं.

शहर सोडून ह्या गावात आल्याबद्दल आता मला मुळीच वैताग वाटत नव्हता.जवळ जवळ ह्या वातावरणात मी आधीन झालो होतो,आहारी गेलो होतो.

शहरात ह्यापूर्वी असा अनुभव मला कधीच आला नव्हता.माझ्या अवतिभोवती अपक्षय आणि पुनर्जीवन होत असताना मला दिसत होतं.
कधीच अंत न होणारं कालचक्र,जन्म,जीवन,अंत आणि पुन्हा पुनर्जीवन ह्याचं दृष्य पहायला मिळत होतं.निसर्ग हेच माझं आश्रयस्थान झालं होतं.

जीवनातले तणाव आणि मागणी यापासून मी सहजच सुटका करून घेत होतो.आणि त्याचबरोबर मनाला विस्कळीत करणार्‍या विचाराना अडथळा आणीत होतो.हा निसर्गाशी जुळणारा माझा बंध माझ्या अख्या बालपणात वृद्धिंगत होत होता.उन्हाळ्याच्या दिवसात रानात हुदडणं,झर्‍याच्या पाण्यात पोहणं आणि झाडावर चढणं ह्यात दिवस जात होते.

आता ह्या वयावर निसर्गाचं देणं काय असतं त्याची प्रशंसा करणं खरोखरच जास्त सोपं जात आहे.आता माझ्या कुटूंबाबरोबर मी देशात जमेल तिथे सृष्टीसौन्दर्य पहायला अक्षरशः धावळपळ करीत असतो.धावपळ येवढ्यासाठीच की जसं वय होत जातं तसा प्रवास आणि दगदग जमत नाही.हे होण्यापूर्वीच इच्छा पूरी करून घेणं बरं असं उगाचच मनात येत असतं.

आम्ही देशातल्या सर्व राज्यात एकापाठून एक सहली काढीत आहो.कुठे प्राचिन गुहा दिसल्या की त्यात सरपटत जाऊन पहाणं,कुठे मोठे तलाव दिसले की त्यात मासेमारीचा छंद पुरवून घेणं, डोंगरावरून वाट फुटेल तिथे वरवर चालत जाणं,जाताना अपरिचीत दिसणारी वनस्पती,पक्षी न्याहळून पहाणं,समुद्र चौपाटीवर जाऊन सूर्योदय तसंच सूर्यास्त पाहून घेणं,हे करायला देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर जाणं, असं हे आमचं सारखंच चालू आहे.निसर्ग माझ्या जीवनात माझ्या स्वास्थ्याचं,माझ्या सुखासमाधानीचं गुणसंवर्घन करीत असतो,मला मार्गदर्शन करतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला प्रेरणा देतो असं मला वाटतं.

मी म्हणतो त्याचा अनुभव घेतल्याशिवाय जाणीव होणार नाही.सध्या आपण अतिवेगवान दुनियेत वावरत असतो.ह्या कटकटीच्या आणि खडतर जीवनात माणसं एव्हडी गुंतून गेली आहेत की, निसर्गरम्य जीवन असतं ह्याचा त्यांना विसर पडत चालला आहे.लोकांचं लक्ष विचलित झालं आहे असं मला वाटतं.कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.

माझ्या बालपणाच्या जीवनातल्या अनुभवावरून मी म्हणेन,आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे, निसर्ग सौन्दर्याच्या कल्पना मनात आणून शोधमोहीम काढून त्यात पूर्णपणे तल्लिन होऊन गेलं पाहिजे.निसर्गाच्याच उपचारात्मक स्वरूपात आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं.”

विजयचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मला त्याच्या खूळाची कल्पना आली.मला कुणाच्यातरी कवितेच्या दोन ओळी आठवल्या.
मी त्याला म्हणालोही,
“तुझे नाही इथले काही, अदृष्टातून आले कूळ
आदीम अंतीम सत्याला की जसे लगडते शहाणे खूळ!”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 3, 2011

जीवनातलं परिवर्तन.


“जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं.परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.”

पद्मजा,गिरीजा आणि तनुजा ह्या पटवर्धनांच्या तीन मुली.
पटवर्धनानी त्यांना उत्तम शिक्षण दिलं.मोठ्या दोन मुलींची लग्नपण करून दिली.आणि एकाएकी ऐन उमेदीत असताना पटवर्धनाना मोठा हृदयाचा धक्का येऊन त्यातच त्यांचं निधन झालं.

पटवर्धनांच्या पत्नीला हा धक्का सहन झाला नाही.तिने अंथरूण धरलं.तनुजाने आपल्या लग्नाचा विचार सोडून दिला.आईची सेवा करण्यासाठी तिने आपलं उर्वरित आयुष्य खर्ची घालायचा पक्का निर्णय घेतला.

मी पटवर्धनांकडे अधुनमधून जातयेत असायचो.तनुजाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी तिला बरेच वेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

“आईची सेवा दुसर्‍या कुणाकडून करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.जिने आपल्याला या जगात आणलं,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना माझ्या जीवनात दुसरी कसलीही मजा मला आनंद देऊ शकणार नाही.”
असं मला तनुजाने एकदा सांगीतलं होतं.मी पण तिच्या ह्या म्हणण्यावर खूप विचार केला होता.

मी तनुजाला एकदा म्हटल्याचं आठवतं,
“जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.”

सेवा करीत असताना जेव्हा जीवनात परिवर्तन येत असतं त्याचा अनुभव कसा वाटतो ते मला सांगावं असं मनात आल्याने ह्यावेळेला मी तिला भेटायला गेलो होतो त्यावेळेला तनुजा मला सांगत होती.

“येत रहाणार्‍या परिवर्तनाचा स्विकार करणं आणि ते अंगीकारणं ह्याची आपल्या अंगात क्षमता असणं हा एक आपल्या जवळ असलेला खजिना आहे असं मला वाटतं.

गाडी काढून गावोगाव फिरायला जाणं,पालक बनणं,जॉब बदलणं,घर बदलणं त्यापुढे जाऊन जीवनाचा दृष्टीकोन बदलणं,जीवन आरामदायी आहे आणि सुरक्षीत आहे मग धडपड कशाला हवी?,आहे त्यात स्थिर होऊन रहाणं ह्या असल्या गोष्टी काहींना सुखकर वाटतात.

माझ्या लहानपणी मला व्यवस्थितपणे रहाण्याची आणि कुठच्याही गोष्टीची ठोस माहिती असावी ह्या गोष्टींची तीव्र इच्छा असायची.बर्‍याच मुलांना ती असते.माझ्या तीन बहिणींनी आणि मी जीवन कधीच कंटाळवाणी करून घेतलं नाही.असं करण्याचा एक भाग म्हणजे माझी आई.ती सतत बिछान्यावर झोपून असते.आश्चर्य म्हणजे माझी आई मला प्रेरणा आहे.वातावरण आनंदाचं असो वा दुःखाचं, माझ्या आईचं कोलाहलाचं जीवन असल्याने तिचं ते जीवन कोणत्याही परिवर्तनाभोवती फिरायला अक्षम आहे.तिच्या आजारावर दिलं जाणारं औषधच मात्र तिच्या प्रखर किंवा निम्न विचाराना परावृत्त करणारं ठरतंय.ह्या औषधापायी तिला,खूपच शांत रहायला,खूपच बेचैन व्ह्यायला,खूपच थकून जायला,खूपच जागरूत रहायला,खूपच भावुक व्हायला, खूपच संयमशील रहायला अटकाव येतोय. खरोखरंच,औषधामुळे तिचं अस्तित्वच नाकारलं जात आहे.

माझ्या पूर्‍या जीवनात माझ्या आईला मी संघर्ष करताना पाहिलं आहे.आत्ता तिच्या सहासष्ट वर्षावरच्या उतार वयात तिच्या डोळ्यात रिक्तता आणि खिन्नता दिसून येते.ती मला सांगते की तिच्या अतिमहत्वपूर्ण भावना म्हणजे,रटाळ जीवनाशी चिकटून रहाणं,कुणाशीही मैत्री करण्यात पुढाकार न घेण्याची वृत्ती ठेवणं नवीन काही शिकायलापण हिरीरी नसणं.तिला आठवतं,उत्साहपूर्ण रहाण्याचं,धुंदफुंद रहाण्याचं तरूण वयातलं आत्यंतिक धडपडणं,ती औषधं घेत राहिल्याने संपूष्टात आलं.तिचं आयुष्य आता स्थिर झालं आहे आणि अंगातली ठिणगी विझून गेली आहे.तिच्या जीवनात परिवर्तन असावं अशी जरी तिची तीव्र इच्छा असली तरी तिच तिची मोठी भीती झाली आहे.

ज्या खडतर परिस्थितीतून माझी आई जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात मी हतबल होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार. जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्‍या परिवर्तनाने जो भरदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुरभाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.

हे तितकच खरं आहे की,परिवर्तनातून मिळणारे धडे शिकायला जरा कठीण असतात.जीवनात पुढे पुढे सरकण्यासाठी तो धोका पत्करायला माझी तयारी आहे.कारण त्याच्या बदल्यात मिळणारं इनाम विस्मयकारक असतं.ह्या परिवर्तनामुळेच माझं काही चुकलं असेल तर ते मान्य करायला मला धीर येतो.कुणाला मी दुखवलं असेन किंवा कोण, कोणत्या दृष्टीकोनातून बोलत असेल ते समजून घेण्यात मी असफल झाली असेन अशावेळीही माझी चुक कबुल करायला मला धीर येतो.जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं. परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.

परिवर्तनातल्या गोष्टी अज्ञात असल्याने काही प्रमाणात परिवर्तनाची भीती वाटते. पूर्वानुमान काढण्याच्या क्रियेला हे परिवर्तन बाधा आणते.पण माझ्या आईच्या नीरसता आणि निश्चलता ह्या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या आईच्या परिस्थितीची मला आठवण येते.

आईला लागणार्‍या कष्टांची आठवण येते.त्यामुळे मी परिवर्तनातल्या अज्ञात गोष्टींना जास्त संमत्ती देते.कारण परिवर्तनातल्या अज्ञात परिस्थितीत चाणाक्ष राहिल्यास उपचार,आशा आणि नवजीवन मिळण्यासाठी येणार्‍या संधीच्या गुंत्याला उकलता येतं.माझ्या आईने मला हेच शिकवलं आहे.”

तनुजाने तिच्या आईची इतकी वर्षं सेवा करीत असताना घेतलेल्या अनेक अनुभवातून जीवनातलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातली अज्ञानता ह्याची तुलना आणि जीवन जगत असताना पूर्वानुमान काढून जगण्यात वाटणारी मजा ह्या मधला फरक फारच सुंदर शब्दात सांगीतला.मी तिची पाठ
थोपटली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 30, 2011

साक्षात्कार दिलीपचा.


“मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

दिलीप गव्हाणकर दिल्लीलाच जन्मला.त्याचे वडील वसंत गव्हाणकर सुप्रिमकोर्टात वकिली करायचे.दिलीपही त्यांच्या मागोमाग वकिली करायला लागला.दिल्लीची प्रतिष्टीत मंडळी रहायची त्या वसंत विहारमधे गव्हाणकरांचा बंगला होता.

मी ऑफिसच्या कामाला दिल्लीला गेलो की गव्हाणकरांच्या घरी भेट देऊन यायचो.मुंबईला येण्यासाठी रात्री दहाची फ्लाईट असायची तेव्हा संध्याकाळचाच गव्हाणकरांकडे येऊन गप्पा मारीत बसायचो.

दिलीप अतीशय देवभोळा,इश्वरभक्त होता.घरात सर्व सणवार आणि धार्मिक कार्यक्रम केले जायचे. एव्हडं की दिलीप आपलं जानवं दरवर्षी बदलायचा.
भटजीना आणून धार्मिक सोपास्कार करून आपलं जानवं बदलायचा.मी त्याला एकदा म्हणालो होतो,
“माझं जानवं कुठच्या खुंटीला मी गुंडाळून ठेवलंय ते आठवत पण नाही”
हसला आणि मला म्हणाला होता,
“माझ्या लहानपणी माझ्या आजोबांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.दर शनिवारी मी शनिमाहात्म्यसुद्धा वाचतो.त्यांना दिलेलं वचन आहे.मला त्यामुळे मनःशांती मिळते.”

मला आठवतं त्यानंतर एकदा माझी आणि दिलीपची ह्याच विषयावर थोडी चर्चा झाली होती. आपला अनुभव तो मला समजावून सांगत होता.

मला म्हणाला होता,
“मी नेहमी मानतो की निसर्गच आपला दुवा विधात्याशी सांधत असावा.प्रत्येकाला त्या अचाट शक्तीशी दुवा सांधायला मोका मिळत असतो असंही मला वाटत असतं.

आम्ही पहिल्यापासून दिल्लीलाच रहायचो.मला माझी एक जूनी गोष्ट आठवते.मी सोळाएक वर्षांचा असेन.प्रथमच माझ्या वडीलानी मला आजीआजोबांकडे गोव्याला जाण्यासाठी विमानात बसवून दिलं होतं.त्यापूर्वी मी बरेच वेळा माझ्या आईबाबांबरोबर आजीआजोबांकडे गोव्याला गेलो
होतो.ह्यावेळी दोन आठवडे मी आजीआजोबांबरोबर राहिलो.प्रत्येक दिवस मजेत गेला.रोज आम्ही समुद्र चौपाटीवर जायचो.

ह्यावेळेला समुद्र पाहून मी अचंबीत झालो.समुद्र मी कधीच पाहिला नव्हता असं नाही. क्षीतिजापलीकडे पाणी पसरलं होतं.मोठमोठ्या लाटावरून सूर्याचं प्रतिबिंब परावर्तीत होत होतं. अवतिभवती सर्वच प्रसन्न वातावरण होतं.समुद्राला ओहटी आली असल्याने,दूरवर उंचच उंच खडकं दिसत होती.

एकेठिकाणी ती खडकांची रांग जणू आकाशाला भिडते की काय असं वाटत होतं.पायाखालची वाळू बरीच गरम झाली होती.फुटलेल्या लाटेच्या थंड फेसाळ पाण्यात अशावेळी पाय बुडवून पहायला मजा यायची.थंड वार्‍याच्या झुळकीबरोबर सर्व अंगात शिरशीरी यायची.

त्याच मुक्कामात एक दिवस मी माझ्या आजोबांबरोबर चौपाटीवर आलो होतो.मला आठवतं,त्या संध्याकाळी मी एव्हडा उत्तेजीत झालो नव्हतो.किंवा त्या संध्याकाळी मला एव्हडं रोमांचक वाटत नव्हतं.पण काही कारणास्तव मला विशेष शक्ती आल्यासारखं,अगदी मोकळं मोकळं वाटत होतं.

विधात्याशी दुवा सांधल्यासारखं वाटत होतं.अंगात नम्रपणा आला होता आणि त्याचबरोबर तिथे असल्याचं महत्वही वाटत होतं.काहीतरी विस्मयकारक वाटण्यासाठी आणि निसर्गाच्या शक्तीनेच हे विश्व निर्माण झाल्याची प्रचिती मिळत होती.

मी कुठच्या धर्माचा आहे किंवा मी कुठच्या देवाला मानतो हे विचारण्यासाठी ती वेळ नव्हती. मलाच स्वतःला त्याबद्दलची खात्री नव्हती.ती खात्री नसण्यात मला आनंद होत होता.त्या निसर्ग रम्य वातावरणात माझ्या अंगात एव्हडी शक्ती कशी आली,एव्हडा निश्चिंत मी कसा झालो होतो, खर्‍या जगापासून मी एव्हडा अलिप्त कसा झालो होतो हे अनुभवूनच तो विस्मय प्रेरणापद वाटत होता.

मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.”

ही दिलीपची माझ्याशी झालेली चर्चा आणि त्या चर्चेची आठवण मला आज आली कारण मला कुणीतरी सांगीतलं की दिलीप गेला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 27, 2011

श्रद्धा आणि चंगळ



"मनात दुसर्‍याबद्दल चिंता करणं म्हणजेच स्वतःला शांती मिळवण्याचा उत्तम मार्ग शोधणं"

काल प्रो.देसाई माझ्या घरी आले होते.बाहेर थंडी खूपच होती.ह्या वयात प्रकृती सांभाळणं आवश्यक असतं.कडक उन्हात थंडी तेव्हडी भासत नाही. म्हणून ते लवकरच आले होते.एकदा संध्याकाळ झाली की मग बाहेर जाववंत नाही.
भाऊसाहेब थोडावेळ बसल्यावर,चहाचा कप त्यांना देत मीच त्यानां म्हणालो,
"श्रद्धा असणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हे नेहमीच काही लोकांच्या मनात गोंधळ आणित रहातं. निश्चितता आणि तितकाच तीव्र संशयवाद ह्यामधे

त्या लोकांचं जीवन जास्तीत जास्त विदीर्ण होत जात असतं."


माझं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"काहीवेळा त्यांच्या त्यांनाच सिद्ध न होणार्‍या संकल्पना पटवून घेण्याच्या त्यांच्यात असलेल्या क्षमतेमुळे त्यांना काहीशी शांती मिळाल्यासारखं

वाटतं हे मात्र खरं असतं.
परंतु,ही सहायता तूटपुंजी असते.


नैराश्य आणि वाटतं ते सर्वकाही खोटं आहे, ह्या दोघामधला दूवा अगदीच तकलादू असतो.त्यांच्या बाहेरच्या जगात ह्या मतभिन्नतेचं प्रतीबिंब त्यांना दिसून येतं.विशेष करून ते जेव्हा एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जात असतात तेव्हा.एक टोक म्हणजे गूढवादी जगाचा विचार करण्याचा आणि कधीकधी फक्त चंगळ करण्याचा हव्यास हे दुसरं टोक."


मी त्यांना म्हणालो,
"भाउसाहेब,काही लोक,त्यांच्या मनात जी श्रद्धा असते ती विकसीत करण्याच्या प्रयत्नात असतात.कुणीतरी म्हटलंय ना,
"श्रद्धेवर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करणं"
तसं काहीसं त्यांचं होतं.खरी श्रद्धा त्यांना भ्रांतिजनक असते.
त्यांच्या मनात श्रद्धेमधून निघणार्‍या सुंदर,प्रेरणात्मक अर्थाची अल्प झलक,हळुहळु कंटाळा करण्यात किंवा खेद करण्यात क्षीण होत जाते.ते अगदी

निराश झालेले दिसतात."


थोडासा विचार करून रिकामा चहाचा कप समोरच्या स्टुलावर ठेवून गंभिर चेहरा करीत भाऊसाहेब म्हणाले,
"काहींच्या खर्‍या आत्मविषयक समस्या भोवतालच्या जगामुळे नसतात तर त्या त्यांच्याच आत्मकेन्द्रिततेमुळे असतात आणि हे पाहून खरोखरच

धक्का बसतो.स्वतःला तृप्ती वाटली म्हणजे झालं अशा तर्‍हेची वृत्ती उराशी बाळगून जवळच्या लोकांना दुखावलं जातं हे त्यांना कळत नाही.

अनुभवासारखा गुरू नाही ह्या रुढोक्तिने काही लोक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात शिकून जातात.काही लोकाना तर अनुभव हाच गुरू असतो.आणि काही

लोक ते मार खाऊन शिकतात."


"भाऊसाहेब,माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतो."
असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई हसले आणि मला म्हणाले,
"विचारा.संध्याकाळ होण्यापूर्वी चर्चा संपवूया.एकदा थंडी वाजायला लागली की विचार-शक्ति खुंटते."


मी म्हणालो,
"चंगळ करण्याच्या वृत्तीतून काही लोक जीवनातली काही वर्ष हरवून बसतात.व्यसनाधीन होतात.प्रथम त्यात ते मजा म्हणून मश्गुल होतात. हे

करणं म्हणजे पश्चातापाची पूर्वखूण हे वेळीच न ओळखल्याने, नैराश्य आणि एकटेपण येतं.पहिलं कारण असतं आणि दुसरा त्याचा परिणाम असतो. जणू ते दुष्ट चक्रच असतं.काही लोकांची एव्हडी मजल जाते की एकतर त्यांनी त्यातून बाहेर पडावं नाहीतर मरण पत्करावं असं त्यांच्या मनात सारखं येत रहातं."


"श्रद्धा आणि अनुभव ह्याच्या कात्रीत ही मंडळी सापडलेली असतात."
असं सांगून प्रो.देसाई म्हणाले,
"परंतु,लोकांत शिकण्याची क्षमता असते.त्यांचा स्वतःचा विवेक त्यांच्यात नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर शेवटी ज्यांना असा विवेक आहे

त्यांच्याकडून शिकण्यासाठी ते आपले दरवाजे उघडे ठेवतात.काही लोक दुसर्‍या मोक्याची वाट पहातात.हे फाल्तु उघड सत्य आहे असं मानणारे नंतर

लक्षात आणतात की खरंतर त्यात तथ्य आहे.
कुणीतरी म्हटलंय खरं,
"घेण्यापेक्षा कुणालातरी देणं बरं"
श्रद्धेपेक्षा काही लोक हे अनुभवाने शिकतात.


हे सुंदर,विरोधाभासयुक्त सत्य म्हणजेच दुसर्‍याचं कुशल मनात आणल्याने त्यांचाच खर्‍या समाधानीचा मार्ग खुला होतो हे शेवटी त्यांच्या ध्यानात

येतं.
अशा तर्‍हेने आदर्श रहाणं जरी सातत्याने त्यांना जमलं नसलं तरी माझी खात्री आहे की,

"सगळ्या जगात आनंद समाविष्ट झालेला असतो तो केवळ
इतरांचं भलं इच्छिल्याने झालेला असतो
तसंच,
सगळ्या जगातले क्लेश हे फक्त स्वतःलाच आनंद मिळण्याच्या प्रयत्नाने झालेले असतात."
ह्या श्रद्धेवर त्यांचा विश्वास नक्कीच असेल."

प्रो.देसायाना आणखी एखादा प्रश्न विचारण्याचं मनात आलं होतं.तेव्हड्यात त्यांचा नातु आलेला पाहिला.
"आजोबा,आई म्हणाली तुम्ही संध्याकाळी चालत घरी यायला निघाला तर तुम्हाला थंडी नक्कीच वाजणार.म्हणून मला तिने गाडी घेऊन जाऊन

तुम्हाला घेऊन यायला सांगीतलं.माझ्या मागेच लागली.सॉरी,तुमच्या चर्चेत मी खंड आणला."


"नाही रे,आमची चर्चा संपली होती तू अगदी वेळेवर आलास"
असं मी त्याला सांगीतल्यावर आजोबा आणि नातू दोघेही घरी जायला निघाले.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 24, 2011

माझ्याच स्वप्नांचा सन्मान.


“विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

ए.एम.चौगुले माझ्याबरोबरच माझ्या ऑफिसात कामाला होता.तो सिव्हिल इंजिनीयर होता.पण त्याला कागदावर नकाशे काढायला खूपच आवडायचं.
तो आमच्या ड्राफ्टिंग खात्यात वरच्या पातळीवर काम करायचा.मला नेहमीच म्हणायचा “तू आमच्या घरी ये”. डोंगरीला तो रहायाचा. डोंगरीला मी पूर्वी एकदा काही कामाला गेलो होतो.
खूपच झोपड्यानी भरलेला हा भाग आहे.पण अधून मधून पांढरपेशांची स्वच्छ घरं पण आहेत. चौगुलेला आमच्या ऑफिसने कुलाब्याला जागा देऊ केली होती.पण त्याला आपल्याच गोतावळ्यात रहायला आवडायचं.म्हणून त्याने ती ऑफर नाकारली.त्याचं कारण त्याने मला सांगीतलं होतं.
तो मला म्हणाला होता,
“मी कुलाब्याच्या जागेत सुखी होईन पण माझ्या कुटूंबातल्या मंडळीना डोंगरीची जागा सोडून जाववत नाही.”

चौगुल्याचा मुलगा चांगला शिकला होता.आणि तो संधी मिळताच युरोपमधे रहायला गेला. चौगुल्याने एक दोन वेळा मुलाकडे जाण्यासाठी ट्रीप्स काढल्या होत्या.त्याची एकूलती एक नात युरोपात शिकून थोड्या दिवसासाठी ह्यावेळेला तिच्या आजोबाकडे रहायला आली होती.तिला त्याने एक पार्टी द्यायचं ठरवलं होतं.त्यासाठी मला त्याने घरी बोलावलं होतं.माझं इंप्रेशन होतं ते चूकीचं ठरलं.चौगुल्याचं घर फारच सुंदर होतं.आजूबाजूला स्वच्छ परिसर होता.आणि ह्याच्या घरात चांगली टापटीप होती.

अबदूल महंमद चौगुले माझ्या कोकणातला.धर्माने मुस्लिम असला तरी त्याच्या घरचे नेहमीचे संस्कार सगळेच कोकण्यातल्या स्थानिक संस्काराप्रमाणेच होते.मुख्य म्हणजे तो अस्खलित मराठी बोलायचा.घरातली सगळीच मंडळी मराठीतच बोलायची.जरूरी वाटल्यास उर्दूत बोलायची पण ती कोकणी मिश्रीत उर्दू असायची.ऐकायला मजा यायची.

आपल्या नातीला माझी ओळख करून देताना कोकणी मिश्रीत उर्दूतच बोलला.ती जन्मापासून युरोपमधे राहिली असली तरी संस्कार इकडचेच होते.
माझ्याशी ती मराठीतच बोलत होती.

इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगल्या होत्या.मुस्लिम असून सुद्धा आपण आपले संस्कार तिकडे कसे जोपासून असते हे सांगण्यासाठी मला म्हणाली,
“स्वप्नं पहाणं मला आवडतं.जास्त करून, पडलेलं स्वप्नं खरं करण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायला मला आवडतं.मनाने धीट असल्यावर चुका केल्या गेल्या तरी काही हरकत नाही अशी समजूत करून घ्यायला मला विशेष वाटतं.स्वप्नांशिवाय आणि खुळ्या चुका केल्याशिवाय काही साध्य होत नसतं आणि काही शिकलंही जात नसतं असं मला नेहमीच वाटत असतं.

अगदी माझ्या लहानपणापासून माझ्याबद्दल आणि सभोवतालच्या विश्वाबद्दल माझी मोठी मोठी स्वप्नं असायची. मला ज्यात आनंद होईल त्या गोष्टी मी करणार आणि त्या केल्याने मी काहीतरी साधलं ह्याबद्दल मला आनंदही होणार हे मला माहित असायचं.ही स्वप्नं कधीकधी अगदी मामुली असायची आणि कधीकधी खिचकट असायची.

सनातनी मुस्लीम घराण्यात माझा जन्म झाल्याने मी नेहमीच विचारात असायची की ह्यातली काही स्वप्नं खरोखरच मी साध्य कशी करून शकेन?
आणि अलीकडेच मला जाणीव व्ह्यायला लागली की ह्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत.

मला आठवतं त्यावेळी आमच्या कॉलेजची ट्रीप आल्प्स पर्वतावर गेली होती.माझ्या अंगावर बुरखा होता.पण त्यामुळे मला त्या वातावरणातला मस्त अनुभव मिळायला त्याची काही आडकाठी आली नाही.आणि आजुबाजूचे कुणीही मी माझ्या अंगावर काय घेतलं आहे ह्याची पर्वाही करीत नव्हते.त्या बुरख्यावर जोपर्यंत मी माझ्या रक्षणासाठी लागणारा पोषाक वापरत असायची तोपर्यंत त्यात कसलीच बाधा येत नव्हती.

एकदा मी बन्जी-जंपिंगसाठी टर्की ह्या देशात गेली होती.जमीनीपासून पंचावन्न मिटर उंचावर असलेल्या एका धातूच्या कमानीवर उभी राहून,ती कमान वार्‍याच्या प्रत्येक झोतीबरोबर डुलत असताना आणि माझ्या पायाला बांधलेला साखळीदंड मला ओढून धरत असताना,खाली पाहिल्यावर माझी ही उडी म्हणजे माझ्याकडून होणारा महामूर्खपणा होत तर नाही ना असा विचार सारखा माझ्या मनात येत होता.

त्या थंड धातूच्या कमानीवर माझे अनवाणी पाय जोराने दाबून ठेवून भरपूर क्षमता माझ्या स्नायुत आणण्याचा माझा प्रयत्न म्हणजे माझ्या उडी घेण्याच्या सहासापासून मी दूर रहावं असं वाटून घ्यावं,असा हा माझा समज हा माझा आणखी महामूर्खपणा होता.परंतु,शेवटी मी उडी घेतली.ते सहास फारच आनंदीत करणारं,मग्न करणारं होतं.

असलं हे साहस मी पुन्हा करण्यासाठी माझ्यात तेव्हडं धैर्य मी आणू शकेन का कुणास ठाऊक. पण माझ्यातलं एक लहानसं खुळं स्वप्न मी परिपूर्ण करू शकले हे मात्र खरं.असली स्वप्न माझ्या अंगामासात असल्याने त्यासाठी मी नक्कीच खुश आहे.

माझ्या वयक्तिक जीवनात मी असल्या खूप चुका केल्या आहेत.पण प्रत्येक चुकीतून मी माझ्याचबद्दल शिकले.आणि माणूस म्हणून मी असं शिकत शिकत वाढत आहे.सर्वात महत्वाचं असं मी शिकले ते म्हणजे कुणाबद्दल मत बनवु नये.कुणीही परिपूर्ण नसतो.किंवा मी असं म्हणेन विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.”

आपल्या नातीचं चिंतन ऐकून चौगुले आनंदून गेला होता.
मला म्हणाला,
“मला माझ्या नातीचा अभिमान वाटतो.”

मलाही रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“मी ह्याबद्दल तुझ्याशी जास्त सहमत होऊच शकत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 20, 2011

हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.


“आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही.कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.”

मागच्या आठवड्यात विकएन्डला मेरी आणि तिचा नवरा पास्कल माझ्या घरी आला होता.खरं पाहिलंत तर ती दोघं वेसाव्याला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेली होती.पास्कलचं वेसाव्याला त्याच्या वाडवडीलांचं एक टुमदार घर होतं.वेसाव्या गावात बरीच सुधारणा होत असताना ह्यांचंघर आड येत असल्याने प्लानमधे ते पाडून टाकण्याची गरज भासली होती.त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळणार होती.पास्कलच्या इतर भावंडात ती रक्कम वाटून घेऊन त्याच्या वाट्याला आलेल्या पैशातून त्याने वसईला एक टुमदार घर घेतलं होतं.आणि त्याला बरेच दिवस होऊन गेले होते.मला पास्कल आणि मेरी वसईला एकदिवस तरी येऊन जा म्हणून आमंत्रण द्यायला आले होते.

मेरी वेसाव्याला असताना नोकरी करायची.मुळात ती हुशार असल्याने बरीच शिकली आहे.कधी कधी कविता करते.काही मासिकात लहान मुलांवर लेख लिहिते.माझी तिची त्यामुळेच एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी भेट झाली होती.
वसईहून नोकरी करण्यासाठी मुंबई शहरात येणं कठीण होणार आहे हे तिला वेसाव्याहून सोडून जातानाच माहित होतं.म्हणून तिने नोकरी सोडून देण्याचा विचार अगोदरच करून ठेवला होता.

एकट्या नवर्‍याच्या जीवावर घर संसार चालवावा लागणार त्यामुळे प्राप्त परिस्थितीत काटकसरीत रहाणं आवश्यक होणार आहे हे ती जाणून होती.काही मंडळी आपलं ज्ञान,आपलं शिक्षण आणि आपले संस्कार हीच आपली संपत्ती आहे. जीवन जगण्यासाठी कमीतकमी आवश्यक गोष्टी मिळाल्यावर त्यात समाधान मानून रहाणं आपल्याच हिताचं आहे असं मानतात.मेरी त्यातलीच होती.

मला ही तिची वृत्ति अगोदर पासूनच माहित होती.तशात पास्कल सारखा गुणी नवरा मिळाल्याने मेरी जास्तच सुखी होती.
“वेळातवेळ काढून मी वसईला नक्कीच येईन.पण सध्या तुमचं कसं काय चाललं आहे?तुझं होमवर्कर म्हणून कसं काय चाललं आहे?”
असं मी मेरीला विचारलं.

मला ती म्हणाली,
“आपलं जीवन सामान्य असावं असं मला नेहमी वाटत असतं.नशिबाने,माझं कुटूंब आणि माझी मित्रमंडळी मला जेव्हडा आनंद व्हावा तेव्हडा देत आहेत.मी खरंच नशिबवान आहे की,माझ्या नवर्‍याची मिळकत एव्हडीच आहे की आमच्या कुटूंबाला पुरते.वसईजवळ आमचं एक घर आहे. माझ्या दोन मुलांच्या स्वतंत्र खोल्या आहेत.आमच्या घराच्या मागून दिसणारा देखावा मन लोभण्यासारखा आहे.
मागच्या परसात उंच झाडं आहेत.आमच्या घराच्या छप्परावर त्यांची सावली पडून घर नेहमीच थंड रहातं. आवाढव्य निसर्गात मला रहायला आवडतं.

घरी जेवणखाण भरपूर असतं.आमचं सर्व जेवण आम्ही घरीच करतो.कारण तसं करणं आम्हाला परवडतं.शिवाय बाहेरून आणलेला शेकडो रुपयांचा पिझा किंबा तत्सम खायच्या गोष्टी माझ्या मुलांना खायला जरूरीचं आहे असं मला वाटत नाही.त्यातून खूपच अन्न खाल्लं जातं आणि खूपच पैसे लागतात.

जेव्हडं जमेल तेव्हडं कपड्याची खरेदी करताना मी, सेल लागला असेल तरच करते.प्रसिद्ध ब्रॅन्डचे कपडे खरदी करून नाहक पैसे घालवून बसायला मला आवडत नाही आणि परवडतही नाही.आमच्यासारखीच मिळकत असलेले आमचे शेजारीसुद्धा नाहक खरेदी करण्यात पैसे उडवीत नाहीत.मोठ्या मुलाचे कपडे नीट असतील आणि विरलेले नसतील तर ते धाकट्या मुलाला वापरतात.असं करणं व्यवहारिक आहे असं मला वाटतं.

माझ्या जवळ आहे ते वापरायला मला आवडतं.टीव्हीवरच्या आणि अन्य ठिकाणाहून, जाहिरातीतून येणार्‍या उपदेशावर मी भुलून जात नाही.एका स्थानिक फर्निचर बनवणार्‍याकडून आम्ही आम्हाला जरूरीचे सोफे बनवून घेतले.आमच्या मुलांना त्यावर उड्या मारून खेळण्या इतके ते मजबूत आहेत.
आमच्याकडे एक लहानसा टीव्ही आहे.त्याच्यासाठी एक पेटी बनवून त्यात तो पेटी बंद करून ठेवला आहे.त्यातून येणारा कलकलाट जो आम्हाला जरूरीचा वाटतो तेव्हडाच ऐकून घेण्यासाठी ही योजना आहे.

आमच्या जवळ एक जुनी गाडी आहे.मुलांच्या शाळेतल्या सुट्टीत ती गाडी आम्ही गावोगावी जाण्यास वापरली आहे.आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही. कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.
शिवाय आणखी खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत.आम्ही घरात प्रत्येकाचा जन्म-दिवस साजरा करतो.केक घरातच बनवतो.स्वतःच्या हाताने बनवलेली ग्रिटींग्स लोकाना देतो.मुलाना बरोबर घेऊन प्राणी दाखवण्यासाठी झूमधे घेऊन जातो.म्युझीयम्सपण त्यांना दाखवतो.नातेवाईकांकडे भेटीला जातो.अशावेळी बाहेर गावच्या दिखाव्याच्या होटेलमधे आम्ही रहात नाही.ह्यातच आम्हाला मजा येते.

आमच्या बाहेरच्या जगात डोकावून पाहिल्यावर,माझ्या नजरेतून अनेक गोष्टी सुटलेल्या नाहीत. आकाराच्या बाहेर प्रत्येक गोष्ट फुग्यासारखी फुगलेली दिसते.गाड्या जरूरी पेक्षा मोठ्या मिळतात.जरूरीपेक्षा जास्त खोल्यांची घरं बांधली जात आहेत.शॉपिंग-मॉल्स प्रचंड राजवाड्यासारखे बांधले जात आहेत.
जरूरीपेक्षा जास्त पाण्याचा विजेचा,गॅसचा,पेट्रोलचा,अन्नाचा वापर करणं म्हणजे एक प्रकारचा हावरटपणा दिसून येतो.
मला वाटतं,जरूरीपेक्षा मोठं करणं म्हणजेच अतिरेक करणं.आणि सर्वच काही मोठं व्हायला लागल्यास,खरं सृष्टीसौंदर्यच बिघडवून टाकलं जात आहे.

प्रत्येकानी जर का हात रोखून जीवन जगलं तर मला वाटतं,कदाचीत ज्यांच्या जवळ खरंच काही कमी आहे त्यांना जास्त मिळू शकेल.
आमची दोन जूनी कपाटं आहेत.मधूनच ती कधी उघडून पाहिली तर खूपच कोंबून ठेवलेल्या गोष्टी त्यात दिसतात. ते पाहून मला नेहमीच वाटतं की,निरूपयोगी गोष्टींचा दुरूपयोग होत आहे. जीवन तृप्त आहे असं मानल्यावर अशा गोष्टी पाहून त्या अनावश्यक आहेत असं असताना माझ्या मला मी अशिष्ट आहे असं वाटतं.एखाद्या शर्यतीत भाग घेऊन ती अनुचित मार्गाने जिंकल्यासारखं वाटतं.भरपूर पैसे असल्यानंतर थोडं विक्षित्प वागणं चालून जातं.पण मुळात जे जवळ आहे त्याने प्रत्येकजण तृप्त असेलच असं नाही.

सुखकर जीवन जगण्यासाठी माझ्या जवळ अगदी हवं तेव्हडंच आहे.आणि मला वाटतं,हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.
हे सर्व मी तुम्हाला सांगीतलं तरी तुम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी येऊन तळलेलं पापलेट आणि पापलेटाची तिखट आमटी गरम गरम भाताबरोबर जेवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. त्यासाठी आम्ही दोघं मधेच उतरून खास तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहो.”

“तुझ्याबद्दल मला खूप आदर आहे.तुझ्या शिक्षणाचं आणि तुझ्या संस्काराचं तू उत्तम चीज केल्याशिवाय रहाणार नाही हा तुझ्यावर माझा विश्वास आहे.तुझं घर आणि तुझा संसार बघून मला निश्चितच आनंद होईल.मी नक्कीच तुझ्याकडे येतो.”
असं मी मेरीला सांगीतल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद लक्षणीय होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 17, 2011

आणखी आणखी मिळवण्याची आशा.


“हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे. अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.”

रमाकांतचं पूरं आयुष्य कोकणात गेलं आणि तेसुद्धा आपल्या आजोळच्या घरात गेलं.रमाकांत प्रथमच मुंबईला आला होता.यायची पाळी आली नसती तर तो मुळीच आला नसता.
“ज्यांना आणखी आणखी मिळवण्याची हौस असेल त्यानी जावं वाटलं तर मुंबईला.”
मी ज्या ज्या वेळी कोकणात रमाकांतला भेटायला जायचो त्या त्या वेळी हे त्याचे उद्गार माझ्या कानावर आले आहेत.

“काय रे बाबा?आणखी आणखी मिळवण्याचे तुझे दिवस आता राहिले नाहीत मग तू का बरं मुंबईला आलास?”
असं मी रमाकांतला विचारण्यापूर्वीच उमेशने,त्याच्या मुलाने,सर्व हकीकत सांगायला सुरवात केली.

“बाबांचं आता वय झालं आहे.त्यांना मुंबईचा प्रवास जमत नाही.पण काय करणार उपाय करण्यासाठी इकडे यावंच लागलं.”
मी उमेशच्या घरी रमाकांतला भेटायला गेलो होतो तेव्हा मला उमेश असं म्हणाला.

उतार वयात प्रकृती केव्हा ढांसळेल ते सांगता येत नाही.जीवन प्रवासात आयुष्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे साधरण वय वर्ष अठरा ते अठ्ठावीस.
अठरा वर्षाच्या अगोदरच्या काळात अन-अनुभवी म्हणून ऐकून घ्यावा लागतो तो काळ आणि अठ्ठावीस नंतर तेव्हडा दांडगटपणा करता येत नाही तो काळ.तीशी,चाळीशी,पन्नाशी आणि पुढे आयुष्याचा आलेख हळू हळू उतरणीला लागलेला असतो.
रमाकांत आता सत्तरीला आलेला होता.

“एकाएकी सकाळी उठल्यावर बाबांना लघवीच होईना.ओटीपोटात कळा यायला लागल्या.लगेचच गावातल्या पंडीत डॉक्टरना बोलवलं.”
उमेश मला सांगत होता.
पुढे म्हणाला,
“पंडीतानी काही गोळ्या दिल्या आणि बेळगावला ताबडतोब घेऊन जा म्हणून सल्ला दिला.टॅक्सी करून बाबांना बेळगावला घेऊन गेलो.तिकडच्या डॉक्टरानी बाबांच्या ब्लॅडर मधे कॅथीटर घालून ब्लॅडर रिकामा केला.त्यांना खूप बरं वाटलं पण म्हणाले आता त्यांना मुबईला घेऊन जा.प्रोस्ट्रेट ग्लॅन्डला सुज आली आहे.तिकडे उपाय होतील. म्हणून तसेच आम्ही त्यांना घेऊन मुंबईला आलो.”

“मग इकडे काय निदान निघालं?”
मी उमेशला कुतूहलाने विचारलं.

“ग्लॅन्डला सूज आल्याने तसं झालं.ह्या वयात तसं होतं.ग्लॅन्डचे फोटो काढून कदाचीत बायप्सी करून निर्णयाला आलं पाहिजे.कॅन्सरपण असू शकतो.”
असं इकडचे डॉक्टर म्हणाले.”

चेहर्‍यावर समाधानीची छटा आणून उमेश सांगत होता.
“कोकणात आयुष्य गेल्याने रमाकांतची विल-पॉवर जबरी असणार.”
मी उमेशला म्हणालो.

“अगदी बरोबर. सर्व टेस्ट्स झाल्यावर,तसं काही नाही असं डॉक्टरनी सांगीतलं.फक्त रेस्ट घ्यायाला सांगून औषधं घेण्याची लिस्ट दिली आहे.औषधानी सूज कमी झाल्यावर बरं वाटणार असं डॉक्टर पुढे म्हणाले.बाबा परत कोकणात जातो म्हणून माझ्या मागे लागले आहेत.त्यांना इथे करमत नाही.”
आपल्या बाबांच्या चेहर्‍याकडे बघत उमेशने सांगून टाकलं.

उमेश आणि माझ्यामधे चाललेला हा संवाद ऐकून रमाकांत काहीतरी सांगायला उत्सुक्त झालेला दिसला.
मला म्हणाला,
“मी हा पहिल्यांदाच मुंबईला येतोय.कोकणातलं आयुष्य तुला माहित आहे.इथे मला अवघडल्यासारखं होतं.आमचे आजी आजोबा अशा वयात कुठे मुंबईला येऊन उपचार करायचे?
हरी हरी म्हणत दिवस काढण्याचं हे वय.आहे ते सहन करून दिवस काढण्याचं हे वय.एव्हडा उपाय करण्यासाठी पैसा कुणाकडे होता.आणि उपायही त्यावेळी नव्हते.निवांत अंथरूण धरून रहायचे.आणि त्यातच अंत व्हायचा.
माझे लहानपणातले दिवस मला आठवतात.”

असं म्हणून रमाकांत खुशीत येऊन मला सांगायला लागला,
“पैसे सतत जवळ असण्यात किती फायदेमन्द असतं हे मला माहित होतं.हवेत त्यावेळी मला पैसे मिळायचे. एव्हडंच की मला मागावे लागायचे.पण बरेच वेळा या न त्या कारणाने मी पैसे कमवित असायचो.मी माझ्या आजोळी वाढलो.गावात मला हवं हवं ते मिळायचं.

माझ्या आजोबांच्या घराजवळून गावातला मुख्य रस्ता जायचा.रस्त्याच्या एका दिशेने वाटलं तर मला डोंगरावर चढून घनदाट झाडांच्या रानातून वर पर्यंत जाता यायचं, तसंच वाटलं तर रस्त्याच्या दुसर्‍या मार्गाने समुद्र-चौपाटीवरपण जायला यायचं.संध्याकाळच्या वेळी डोंगरावर चढून गेल्यावर एका विशिष्ट जागेवरून खाली वसलेलं गाव दिसायचं.काळोख होण्यापूर्वी घराघरातून छपरामधून नीळसर धुराचे लोट दिसायचे आणि काळोख झाल्यावर मिणमिणत्या दिव्यातून घरं आढळून यायची.मंगळोरी कौलाच्या घराच्या छपरातून विशिष्ट तर्‍हेच्या कौलामधून धुराचा लोट एखाद्या बोटीच्या नळकांड्यातून येणार्‍या धुरासारखा भास व्हायचा.

घराच्या मागच्या बाजूला आजोबांचं जवळ जवळ चारपाच एकराचं शेत होतं.घराच्या मागच्याच बाजूला मोठा मांगर होता.चारपाच गाई,चारपाच म्हशी, रेडे,शेताचे बैल मांगरात बांधून ठेवलेले असायचे.आम्ही त्याला गाई-गुरांचा गोठा म्हणायचो.गुरांचं शेण आणि मुत जमाकरून दोनतीन मोठ्या खड्यात साचवलं जायचं.त्याला आम्ही गायर्‍या म्हणायचो.शेताला ह्याचा खत म्हणून वापर व्हायचा.

मी पाचएक वर्षांच्या असेन.सर्वांबरोबर अगदी पहाटे उठून आजीबरोबर गोठ्यात जायचो. गड्यांच्या मदतीने आजी दोन चार चरव्या दूध काढून झाल्यावर सर्व गुरांना शेतात सोडून देण्यासाठी गुराख्यांच्या ताब्यात द्यायची. आजोबा बैलांची गाडी जुंपवून त्यात गवताच्या जुड्या भरून शेतात घेऊन जायचे.मी बैलगाडीत माझ्या आजोबांच्या जवळ त्यांच्या मांडीवर बसून बैलांना हाकायचो.गवताचा आणि सरकीच्या पेन्डीचा वास गाडीत बसल्याबरोबर माझ्या नाकात भरायचा.सकाळच्यापारी थंडगार पण झोंबणारा वारा माझ्या अंगावरून गेल्यावर अंगात शिरशीरी यायची.

शेताच्या जवळ शेणाने सारवलेल्या एका ओसरीजवळ आजोबा बैलगाडी थांबवून ठेवायचे.बैलांना इतर गुरांबरोबर जायला सोडून द्यायचे.ओसरीत गवताच्या जुड्या आणि पेन्ड रचून ठेवायचे.हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे.अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.
गाई-गुरांबरोबर आणि शेतीच्या वातावरणाबरोबर मिळत राहिलेला अनुभव मी नेहमीच माझ्या उराशी बाळगून होतो.इतक्या वर्षाच्या माझ्या आजोळच्या वास्तव्यात माझ्या सर्व नातेवाईकांच्या सहवासात मी असायचो.

माझे आईबाबा,बहिणी,आजीआजोबा,पंजी पंजोबा,मामा, मावश्या,चुलत भावंडं शिवाय माझ्यासारखेच माझे खुळे मित्र ते पण तोपर्यंत नातेवाईक म्हणून जमा झाले होते. गावात एकमेकाला सहाय्य होण्याची व्यवस्था स्थापन झाली होती.उन्हाळ्याच्या दिवसात एक आठवड्यासाठी सर्व गोतावळा आमच्या आजीआजोबांच्या घरात एकत्र जमून, धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी, मजा करायचो.साध्या जीवनशैलीची शिकवणूक मी ह्यातूनच शिकलो.

सर्व परिसर शांत असायचा.टीव्ही नाही,रेडिओ नाही.रात्रीचे दिवे म्हणजे घासलेटवर चालणारे कंदील.संध्याकाळ झाली की पडवीत सर्व दिवे आणून साफ पुसून ठेवून,नसल्यास घासलेट भरून मंद पेटवून ठेवले जायचे.नंतर पुर्ण काळोख झाल्यावर एक एक कंदील वेगवेगळ्या खोलीत नेऊन वात मोठी करून ठेवले जायचे.

सर्व वयस्कर मंडळी घरात झोपायची.आम्ही सर्व बाहेर उघड्या पडवीत अंथरूणं घालून झोपायचो. पौर्णिमेदिवशी लख्ख चांदण्यात झोपायला मजा यायची.चंद्रप्रकाश पाहून दिवस उजाडला असं समजून मधूनच एखादा कावळा काव काव करायचा.एखाद दुसर्‍या घुबडाचा ओरडण्याचा आवाज ऐकायला यायचा.बाहेरच्या वातावरणात एव्हडी शांत झोप लागायची की सकाळ कधी झाली हे कळायचंच नाही.

बाहेर मोठ्या फणसाच्या झाडाखाली एका मोठ्या हंड्यात गरम पाणी तापवलं जायचं.शेजारीच असलेल्या, नारळाच्या झापानी बांधलेल्या,आडोशाच्या खोलीत बायका आंघोळ करायच्या.आम्ही सर्व विहीरीत कळशी टाकून रहाटाच्या सहाय्याने पाणी काढून माडाच्या झाडाखाली ठेवलेल्या पाथरीवर आंघोळ करायचो.सर्वांचे धुवायचे कपडे एका मोठ्या ढोणीमधे साचवून धुतले जायचे. विहीरी जवळच ही ढोणी असायची.दोन मोठ्या पिंपळाच्या झाडामधे सूंभाची दोरी बांधून त्यावर धुऊन आलेले कपडे सुकण्यासाठी टांगले जायचे.

मला वाटतं,अगदी साधेपण हे उत्तम असतं.कॉन्क्रीटच्या जंगलात राहून जिथे शेकडो दुकानं असतात,हात पुढे करून बोटाला लागेल ती वस्तु निवडून खरेदी करता येते,तिथे जीवनातल्या लहान लहान गोष्टींचा विसर पडून सुखी जीवनाला गमावून बसलं जातं.मोठमोठाले शॉपिंग मॉल आणि तत्सम सुविधा न मिळाल्याने जीवन कसं जगायचं ह्याचा विसर पडला जातो.

एकंदरीत काय?आताचं आमचं हे वय म्हणजेच व्याधीना तोंड देत जगणं.कोकणात संध्याकाळच्या वेळी समुद्र-चौपाटीवर गेलं असताना सूर्यास्ताचा समय आनंद देऊन जातो.सूर्य अस्ताला जातानाचा देखावा अवर्णनीय असतो.सूर्यास्तावरून मला एक आठवलं,कुणीतरी म्हटलंय,
“सूर्याकडून एक शिकावं.संध्याकाळ झाली की निमुट अस्ताला जावं.”
अगदी तसंच मला वाटायला लागलं आहे.आता आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे.पण अस्ताला जाणं आपल्या हातात थोडंच आहे?”

रमाकांत जे काही सांगत होता ते मी निमुट ऐकून घेत होतो.गत जीवनाच्या जुन्या आठवणी काढून तो रममाण होत असताना डॉक्टरांच्या औषधाला पुष्टी म्हणून,आपल्या बालपणाच्या आठवणी काढून,त्या मला सांगून,तो सुखी होत असेल आणि हा उपाय रमाकांतला बरं होण्यात मदत होत असेल तर ऐकायला काय हरकत असावी असं मी माझ्या मनात म्हणत होतो.?

शेवटी मी त्याल एव्हडंच म्हणालो,
“थोडक्यात मी म्हणेन जे काही आहे त्यात समाधानी मानून न रहाता आणखी आणखी मिळवण्याच्या आशेने कुठेतरी निराशा पदरी आणून रहाणं कितपत योग्य होईल.?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 14, 2011

रोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.

“ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”

अनीलची आणि माझी अलीकडेच ओळख झाली होती.त्यासाठी त्याची माझी ओळख दुसर्‍याकुणी करून दिली नव्हती.अनीलेने स्वतःच मला रस्त्यात गाठून माझ्याशी ओळख करून घेतली होती.त्यानंतर कधीही तो मला भेटला की माझ्या नावा-गावानीशी आठवण लक्षात ठेवून बोलायचा.त्याच्याबरोबर रस्त्यावरून चालायचं म्हणजे दर पल्ल्यामागे त्याला कोणतरी ओळखीचा भेटायचा.

“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा? कुतूहल म्हणून मी तुला विचारतो”
असं मी अनीलला एकदा म्हणालो.
मला अनीलने मजेदार माहिती दिली.
तो म्हणाला,
“रोज नेहमी एखाद्या नव्या व्यक्तिशी माझी भेट व्हावी असं मला वाटत असतं.जर का लोक वेळ काढून रोज कुणातरी एका नव्या व्यक्तिला हलो म्हणतील तर मला वाटतं, मनात असलेल्या प्रतिकूल भावना नष्ट होतील. खरं म्हणजे हा धडा माझा मीच शिकलो आहे.

पूर्वी एकदा मी असाच माझ्या इतर मित्रांबरोबर शहरात येऊन गेलो होतो.शहरात आतंकवाद्यांचा हल्ला होण्यापूर्वी,शहरातले लोक, वस्ताद,दादागिरी करणारे,शिष्ट आणि उद्धट वृत्तिचे असतात असा समज दिला जात असायचा.तेव्हा थांबून कुणाशी गपशप करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीपण ह्यावेळेला मी आणि माझा मित्र मनात थोडा धीर आणून फुटपाथवर चालणार्‍या एका दोघाना एखादी गोष्ट कुठे मिळेल म्हणून सहज विचारण्याचा प्रयत्न करून पाहिला.

दोन चार लोक आपसूप येऊन सांगू पहात होते.आम्ही शहरात नवखे दिसल्याने,स्नेहपूर्ण वागणूक आम्हाला मिळत होती.माझ्या लगेचच लक्षात आलं की,आपला वेळ काढून गर्दीत दिसणार्‍या कुणाशीही बोलणं म्हणजेच विश्व पाहिल्यासारखं वाटणं.

मला आठवतं, माझ्या लहानपणी शाळेत हा प्रयोग मी करून पाहिला होता.माझ्या मनातली योजना अशी होती की,रोज एका अनोळख्याशी संवाद साधायचाच,हे शक्य होईल ह्याबद्दल मी थोडा साशंकच होतो.मी अनुमान काढलं होतं की लोक संवाद साधण्यासाठी अंमळ व्यस्तच असतात.माझं अनुमान खरं ठरलं.माझा प्रयोग असफल झाला.

पण ज्यावेळी मी कॉलेजमधे शिकायला शहरात आलो होतो त्यावेळी ही माझी भन्नाड कल्पना आचरणात आणण्याचं ठरवलं.ज्या परिसरात मी रहात होतो तिथे हा प्रयोग करून पहाण्याचं मी ठरवलं.फार फार तर काय होणार होतं की मी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना एखाद्याकडून मी उपेक्षित झालो असतो. परंतु,तसं झालं नाही.कारण ते लोक पूर्वीसारखे गर्दीतला एक चेहरा असं वागत नव्हते.

माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात रोज मी एका नव्या व्यक्तिशी संवाद साधत होतो.त्याचं नाव विचारत होतो, तो शहरात कुठल्या गावाहून आला म्हणून विचारत होतो शिवाय त्याच्याबद्दल कमीतकमी दोन निरुद्देश वास्तव विचारत होतो.ही सर्व माहिती मी माझ्या मनाच्या कप्प्यात आठवण म्हणून ठेवीत होतो.पुन्हा कधी जर का त्याची भेट झाली तर मैत्रीपूर्ण ओळख राखून ठेवण्याचा तो प्रयत्न होता.

कॉलेजमधले माझ्या बरोबरीचे मित्र हा माझा प्रयत्न,ही माझी धारणा, म्हणजे एक विनोद आहे असं समजत होते.पण मला तसं वाटत नव्हतं.ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की,
“आजचा माझा दिवस मस्त गेला”
हे त्यांच्या मनात आणण्यासाठीचा तो मार्ग होता.

कुणी म्हणू शकलं असतं की माझा हा प्रयत्न अगदीच असंगत होता,त्यातून काहीही मिळत नव्हतं, परंतु, मला मात्र त्यापलीकडे जाऊन वाटत होतं.माझ्याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून,नुसता संवाद साधण्यात, मी पुढाकार घेत आहे असं दिसलं जात होतं.हे आणखी वाढवून घेऊन आणि त्याच व्यक्तिची पुन्हा ओळख ठेवून मी आदर दाखवीत आहे असं दिसत होतं.दुसर्‍याला आदर दाखवून मी त्या व्यक्तिबरोबर सहिष्णुता दाखवतो असं दिसत होतं.”

अनीलचं हे सर्व ऐकून मला त्याचं खूपच कौतूक करावसं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तुझ्या एव्हड्या ओळखी कशा?”
हा एक साधा प्रश्न मी तुला विचारला खरा.पण त्या ओळखी होण्यामागे तुझी भन्नाड कल्पना आणि त्यानंतर तू घेत गेलेली भन्नाड मेहनत ह्याचंच हे फळ आहे हे तू मला सवित्सर समाजावून सांगीतलंस म्हणूनच कळलं.

मला ह्यातून एक लक्षात आलं की,तुझ्या ह्या प्रयत्नामुळे,
पुढाकार दाखवून,आदर प्रदर्शित करून,सहिष्णुता बाळगून हे विश्व शांतीने रहाण्याजोगं आहे असं दाखवता येतं.आपण जरका रोज एका नव्या माणसाला भेटलो आणि त्याची ओळख ठेवून राहिलो तर आपण आपल्यातच वेगळेपणा करीत नसून ह्या जगातही तसा एक चेहरा एकावेळी पहाण्याचा वेगळेपणा होत नाही हेही सिद्ध होतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com