Saturday, February 26, 2011

कपभर कॉफी.


“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,रोजच्या जीवनातल्या कटकटी संभाळताना एखादा कॉफी-ब्रेक खूपच उपयोगी होतो.”

मला कॉफी विषयी जरा विशेष वाटतं.जरी मी अगदी फटकळ होऊन असं सांगत असलो तरी त्यात बरचसं तथ्य आहे. कॉफीचा एक कप.
मला आठवतं की,ती संध्याकाळची वेळ होती.गार वारा वहात होता.घराच्या बाहेर खुर्च्या टाकून बसावं आणि गप्पा माराव्यात असं माझ्या चुलत बहिणीने-साधनाने- सुचवलं.

कोकणात दिवाळीच्या दिवसात मी तिच्या घरी गेलो होतो.
तिची आणखीन भावंडं पण येणार आहेत,एक तिचा भाऊ लंडनहून येणार आहे,आईवडीलांचं आता वय झालं आहे,सगळे मिळून एकत्र येऊन ह्या वर्षी दिवाळी साजरी करूया असा विचार झाला आहे असं मला साधनाने-फोन करून सांगीतलं होतं म्हणून मी कोकणात त्यांना कंपनी देण्यासाठी गेलो होतो.
त्या दिवाळीला थंडी फार छान पडली होती.लंडनहून आलेला,प्रकाश आणि त्याची मंडळी तर फारच खुश होती. प्रकाशाच्या लहान मुलांना कुणीतरी तिकडे सांगीतलं होतं की भारतात नेहमीच गरमी, उष्मा असतो.

प्रकाश मला म्हणा्ल्याचं आठवतं,
“मी माझ्या मुलांना खात्रीपूर्वक सांगीतलं होतं की प्रचंड उष्मा होतो तो मुंबई सारख्या शहरात.कोकणात त्यामानाने थंड असतं.पण ह्यावेळची थंडी अप्रतिमच आहे.ती सर्व खुशीत आहेत.”

आम्ही बाहेर जाऊन बसल्यावर,साधनाच्या मुलीने-मृणालने-सुचवलं की मी गरम गरम कॉफी प्यायला घेऊन येते.मृणाल दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजच्या होस्टेला रामराम ठोकून आठ दिवस रहायला आली होती.
प्रकाशची पत्नी आणि मुलं दुधाशिवाय डार्क कॉफी पितात.त्यांना कॉफीमधे साखर मुळीच आवडत नाही.जितकी कडू कॉफी असेल तितकं छान.कधी कधी त्यांना कोल्ड कॉफी आवडते.प्रकाश मात्र पुर्वीच्या सवयी प्रमाणे दुध आणि साखर घालूनच कॉफी पितो.
साधनाला दुध कमी,साखर कमी अशी कॉफी आवडते.मृणालला कॉलेजमधल्या सवयीने दुधाशिवाय पण साखर घातलेली कॉफी आवडते.मला मात्र मी सागीतलं की, भरपूर दुध घालून आणि त्यात वेलचीची पुड घालून केलेली, सत्यनारायणाच्या पुजेला करतात तशी कॉफी आवडते.आमच्या सर्वांच्या ह्या आवडी निवडी नीट लक्षात ठेऊन मुणालने कॉफी तयार केली होती.
सहाजीकच कॉफी पिता,पिता कॉफीवरच गप्पा चालू झाल्या.

प्रकाशने सुरवात केली.तो म्हणाला,
“सकाळ होताच तो कॉफीचा पहिला प्याला घेतल्यावर माझी सकाळ उदयाला येते.तो सुमधूर कॉफीचा सुवास आणि त्यातली गोड साखर ह्या दोन्ही गोष्टी मला अंथरूण सोडायला प्रवृत्त करतात.
खरंतर नुसत्याच कॉफीच्या चवीपेक्षा काहीतरी अर्थपूर्ण घटना होऊ घातल्या आहेत असं वाटायला लागतं.
जरा खुळ्यासारखं वाटत असेल पण कॉफी घेतल्यानंतर माझे दरवाजे,खिडक्या उघडल्या आहेत,भिंती कोसळल्या आहेत ज्यामुळे मी कोणताही निर्णय घेण्यास प्रवृत्त झालो आहे आणि श्वास घ्यायला मोकळा झालो आहे असं मला वाटतं.
एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या आजारात त्याला कंपनी द्यायला होस्पिटलमधे जागरण करून आल्यावर,ऑफीसात न संपलेलं कामं घरी आणून पूर्ण करायला रात्रभर जागरण केल्यावर,दोन दिवसात कोणत्याही कारणाने हप्ता भरलाच पाहिजे अशी घराच्या हप्त्याची नोटीस बॅन्केकडून आल्यावर,दोन तासाची गाढ झोप द्यायला कॉफीचा एक कप उपयोगात आणता येतो.जीवनात येणार्‍या अडचणींना तोंड द्यायला कॉफी मला तरून जायला मदत करते.”

साधनाने आपलं कॉफीबद्दलचं मत दिलं.ती म्हणाली,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,रोजच्या जीवनातल्या कटकटी संभाळताना एखादा कॉफी-ब्रेक खूपच उपयोगी होतो.भाराभर कामं उरकताना थोडा विराम घेऊन चवदार कॉफीचा एक कप खूपच कामाला येतो.जीवनातल्या वास्तविकतेपासून दोन मिनीटांचा विरंगुळा मिळतो.ती कॉफीची सूंदर चव जीभेवर एकरूप झाल्यावर नेहमीच्या प्रश्नापासून लक्ष दुसरीकडेच केंद्रीत करतं.
मला आठवतं माझी आई त्यावेळी काही दिवस हॉस्पिटलात होती. तासनतास तिच्या बिछान्याजवळ किंवा बाहेर लॉउन्जमधे मी आणि माझे बाबा वेळ घालवत असायचो.त्या जागेवर बसल्यावर सततच्या काळजीत रहायचो.मला आठवतं मधेच कधीतरी माझे बाबा कॉफी घ्यायला जाऊया म्हणून सुचना करायचे.कॅन्टीनमधे गेल्यावर,सर्व काळज्या दूर झाल्यासारख्या क्षणभर वाटायच्या.थोडावेळ तरी नको वाटणार्‍या शांततेपासून आणि अनिश्चित वातावरणापासून निकास राहिल्या सारखं वाटायचं.”

त्यानंतर मृणालने आपला कॉफीबद्दलचा अनुभव सांगीतला,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,सकाळ उजाडल्यावर सर्व काही व्यवस्थीत व्ह्यायला एक एक कॉफीच्या कपावर थोडीशी इकडची-तिकडची बातचीत करून होस्टेलमधल्या माझ्या इतर मैत्रीणींशी संपर्क ठेवायला सोपं होतं. अंथरूणातून लवकर उठायला सकाळच्या कॉफीच्या कपाची आठवण प्रोत्साहन देते.कुठल्याच अडचणीविना एकमेकाची कामं करायला उत्साह देते.

कॉफी ही एक प्रकारचा उपहार म्हणायला हवा.मला एक गोष्ट आठवते ती सांगते.
होस्टेलमधल्या माझ्या एका मैत्रीणीच्या आईचं निधन झालं होतं.माझी मैत्रीण घरी जाऊन परत आल्यावर तिच्याकडे बोलायला आमच्या जवळ शब्द नव्हते.आमच्याजवळ फक्त तिला जवळ प्रेमाने कवटाळून घ्यायला,खांद्यावर मान टेकून रडायला आणि तिला आधार द्यायला होतं.शिवाय आमच्याजवळ द्यायला कॉफीने भरलेला कप होता.पहिले काही दिवस ती सकाळी उठून वर्गात जाण्यापूर्वी आम्ही तिला कॉफी प्यायला घेऊन जायचो.आम्हाला तिच्याबद्दल किती अगत्य आहे हे त्या कपातून प्रदर्शित व्हायचं.”

मी माझं मत दिलं,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं,कारण सकाळी एक कप भरून कॉफी घेतल्यावर त्या सबंध दिवसात येणारी, ताण देणारी कामं मी विसरून जातो.कॉफी घेतल्यावर मला वाटत रहातं की मी कोणतही काम सफलतेने पूरं करीन.
कॉफीच्या एका कपाने स्वस्थचित्ताने रहायला मदत मिळते,जरूरीचा परावर्तक वेळ मिळतो.एव्हडंच काय तर माझ्या इमेल,माझे फोन मी थोडावेळ दुर्लक्षीत करू शकतो.लोकांना कॉफी पित बसल्याने निवांत बसता येतं.
जर का तुम्हाला कॉफी आवडत नसेल तर चहा घ्या दुसरं काही तरी घ्या पण कामाच्या कटकटीतून स्वतःच्या मनाला विरंगुळा द्या.कॉफी पिण्यासारखं वेळ काढण्यात तुम्हाला जे काय आवडतं,त्याच्यासाठी दिवसातून थोडातरी वेळ काढा.”

आमचं हे कॉफी आख्यान होता होता बाहेर बरंच गार वाटू लागलं.आणि जास्त करून प्रकाशच्या मुलांना थंड वाटायला लागलं हे विशेष.
मला प्रकाशचा मुलगा म्हणाला,
“ही इकडची थंडी जरा मजेदार वाटली.कारण तिकडे थंडीबरोबर पाऊस पडायला सुरवात होते आणि असं बराच वेळ बाहेर बसायला मिळत नाही.”
आम्ही प्रत्येकजण आपआपला रिकामा कॉफीचा कप घेत घरात आलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 23, 2011

कुस्ती.


ठाण्याला मुकुंदराव सामंत एका शाळेत हेडमास्तर होते.माझ्या पत्नीकडून त्यांचं माझ्याशी नातं होतं.मुकुंदरावांच्या सहवासात आल्यावर मला एक समजलं की त्यांना शरीर-सौष्टव असणं आणि कुस्तीच्या खेळाबाबत विशेष वाटायचं.ते स्वतः उठून रोज सकाळी व्यायाम शाळेत जाऊन नियमीत व्यायाम करून यायचे.

त्या व्यायाम शाळेतच त्यांचा एक विद्यार्थी येत असायाचा.
मला वाटतं त्याच्याकडूनच मुकुंदरावाना कुस्तीबद्दल विशेष वाटायला कारण झालं असावं.कारण हा त्यांचा विद्यार्थी-माणीकराव-कुस्तीच्या फडात त्यांना घेऊन जायचा.
मला एकदा मुकुंदरावानी फोन केला आणि ठाण्यात नौपाड्यात जंगी कुस्तीचे खेळ होणार आहेत ते बघण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.
मला जरी कुस्तीबद्दल एव्हडं आकर्षंण नसलं तरी मुकुंदरावांचा शब्द मोडवत नव्हता.आणि मुकुंदराव पण कसे ह्याकडे आकर्षित झाले हे पण एक कुतूहल मला होतं.

आता हा मुकुंदरावांचा विद्यार्थी, माणिकराव, बेळगावात एक मोठी कुस्तीची शाळा काढून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे असं कळलं.तसंच कर्नाटकात चुरशीच्या कुस्तीचे मेळावे भरवून मोठा व्यवसाय चालवीत आहे असंही कळलं.

अलीकडे मी बेळगावला गेलो होतो.बेळगावला माझ्या पत्नीचं माहेर आहे.माणिकरावाबद्दल मी माझ्या मेव्हण्याकडे चौकशी केली.त्याने त्याच्याशी माझी गाठ घालून द्यायचं ठरवलं.
हा माणिकराव बेळगावच्या कॅम्प-एरीयात छोटसं घर बांधून रहात आहे असं मला माझ्या मेव्हण्याने सांगीतलं.

त्याच्या घरी गेल्यावर मला त्याने ओळखलं.पण मी मात्र त्याचा विद्यार्थी वयातला चेहरा डोक्यात ठेवल्याने त्याला ओळखूं शकलो नाही.
उंच भरदार छातीचा,अंगात मलमलचा झब्बा घातलेला,खाली सफेद लुंगी घातलेला काळा वड्डर दिसणारा माणिकराव माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्या मांडीवर जोरात थाप मारून हंसला.

“मुकुंदराव हेडमास्तर आता खूपच थकले आहेत.अलीकडेच मी त्यांना ठाण्याला भेटून आलो”

असं मला म्हणाला.
“तुम्हाला आवडणार नाही अशा गोष्टी लोकं कधीकधी करायला सांगतात.असं झाल्यावर त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका.तुमच्या जे काही डोक्यात येतं त्याकडे लक्ष केंद्रीत करा.तुमच्या भविष्यात वापरायला त्या कल्पनांचा उपयोग करा.”
असं सामंतसर म्हणायचे,ह्याची मी त्याला आठवण करून दिली.

“मी त्यांचा हा उपदेश पक्का लक्षात ठेवून माझ्या आयुष्याची आंखणी केली”
असं सांगून मला माणिकराव म्हणाला,
“मला वाटतं,तुमच्या अंतःकरणात जे काही आहे त्याचाच मागोवा घ्यावा.ते शाश्वत असे तोपर्यंत त्याचा जीवनात उपयोग करून घेऊन त्यात आनंद मानावा.तुम्हाला जे भावतं त्यासाठी जावं.शिवाय ज्यात तुम्ही प्रवीण आहात आणि जे करून तुम्हाला आनंद मिळतो तेच करण्यासाठी तुमच्या जीवनातला उद्देश असूं द्यावा कारण जीवन एकदाच मिळतं. लोक कदाचीत म्हणतील की,तुम्ही करता ते मुर्खपणाचं आहे,पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करावं,तुमच्या मनाला लावून घेऊ नये.मगच तुमचा उद्देश साध्य होऊन तुम्हाला जिंकल्याचं सामाधान मिळेल.

“ज्या गोष्टी करण्यात तुम्ही निपूण आहात आणि त्या गोष्टी तुमच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी होत असतील तर जरूर करा.”
असं ही सामंतसर म्हणायचे.
असं सांगून माणिकराव मला म्हणाला,
“मी त्यांच्याकडूनच शिकलो की,ज्या गोष्टींची तुम्ही उपेक्षा करता,ज्या गोष्टी करायला नको होत्या असं ज्यावेळी तुम्हाला वाटत असतं,त्या न केल्याने तुमचं जीवन नक्कीच सुखकर होईल,रोमांचक होईल.
एखादी न आवडणारी गोष्ट करणं भाग आहे असं असेल तर गोष्ट निराळी.दुसरे लोक आनंदी होतील ह्यापेक्षा तुम्ही आनंदी व्हाल असंच करा.उलट केलंत तर पस्तावायला होईल.
पहिली योजना जमली नाही तर पर्यायी योजना असावी.”

“तुझ्या कुस्तीच्या व्यवसायावरून ते उघडंच आहे”
मी म्हणालो.

मला माणिकराव म्हणाला,
“असा विचार मी माझ्या मनात विकसीत करण्याचं कारण मला शरीर-सौष्टव ठेवण्याबद्दल लहानपणापासून आवडायचं. त्यासाठी शाळा संपल्यावर मी व्यायाम शाळेत जायचो.सामंतसर मला तिथेच भेटायचे.मला त्यांच्या घरी बोलवायचे. आणि उपदेश द्यायचे.शाळेनंतरचं ते माझं दुसरं जीवन झालं होतं.पुढे जमलं तर कुस्त्या खेळण्याचा माझा मानस होता. आणि पुढे जमलं तर त्यातून करीअर करायचाही विचार होता.शाळेचा अभ्यासक्रम संपल्यावर कॉलेजमधे पण मी तो नाद चालू ठेवला म्हणजे जवळ जवळ सात आठ वर्षं तरी मी कुस्त्या खेळत राहिलो.रोजच मी माझ्यात सुधारणा करीत होतो.माझा उद्देश असा होता की मला कुणीतरी प्रायोजित करून माझा तो व्यवसाय व्हावा आणि माझ्याच मजेसाठी म्हणून त्याचा मी उपयोग करावा.कुस्तीचा प्रकार ह्यातलाच आहे इकडे तर मजा इकडे तर व्यवसाय.काही लोक हे मानत् नाहीत.त्यातून व्यवसाय करता येईल हे ही मानत नाहीत पण देशभर हा व्यवसाय झाला आहे.सकारात्मक विचार ठेवल्यावर सरतेशेवटी त्याचं फलस्वरूप दिसून येतं.
अनेक गोष्टीत मला भरवसा आहे त्यातली ही एक महत्वाची गोष्ट आहे.
सामंतसर मला नेहमीच सांगायचे,
“तुम्ही करत रहा लोक तुम्हाला समर्थन देतील.तुमचा उद्देश साध्य व्हायला कष्ट घ्या,त्या उद्देशाच्या मागे लागा जणू तो तुमच्या जीवनात काही मिळवून देण्यासाठी आहे असं समजून वागा.”
मला अगदी तंतोतंत त्यांचं म्हणणं पटतं.”

“सामंतसर काही आता बेळगावला प्रकृति कारणाने,येऊ शकणार नाहीत.पण मी त्यांना भेटल्यावर तुझा हा व्यवसाय आणि तुझी ही प्रगती,मी त्यांना वर्णन करून सांगेन.त्यांना नक्कीच आनंद होईल.”
असं मी माणिकरावाला सांगून उठता उठता त्याने सामंतसरांसाठी भेट म्हणून माझ्याजवळ लाकडातून कोरलेली एका मल्लाची प्रतिकृती देण्यासाठी म्हणून दिली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, February 20, 2011

खरी होवोत स्वपनांची साठवण

अनुवाद.

ही चिंब-चिंब झालेली अंधारी रात्र
ही मस्त मस्त फुललेली रमणीयता
असे असुनही का चांदणीची उदासिनता
हळूवार उगवता हा चंद्रमा प्यारा
झोप येईना पाहूनी ह्या ऋतुचा इशारा

ठुमकत ठुमकत येई हवेची लहर
अशाच वेळी का होई उद्विग्न अंतर
कळ्या फुलांवर येई अचेतन आद्रता
कुणी जाणावी जीवनातील कमतरता

उजळ दिवशी जे न मिळे स्वप्न
ते शोधीत राही माझे अंतर
झगमगत्या रात्री गेली मी डूबून
शोधू कशी मी मला त्यानंतर

अशाच वेळी नसे का कुणी
हंसे सुंदरसे नकळत देऊनी
चुकून काढील माझी आठवण
खरी होवोत स्वपनांची साठवण

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com

Thursday, February 17, 2011

माझ्या आजीची ती वही

"फ्लाईट टू न्युयॉर्क इज रेडी फॉर बोर्डींग"
अशी घोषणा झाली.आणि सुलभा गेटकडे जायला निघाली.


अमेरिकेला परत जाताना सुलभाला मी नेहमीच एअरपोर्टवर पोहोचवायला जायचो.ते दिवस निराळे होते. व्हिझीटरला अगदी चेक-इन काऊंटर पर्यंत जायला मुभा होती.भारतात आल्यावर मुंबईत तिचं वास्तव्य असायचं.पण कोकणात एक आठवडा तरी जाऊन सुलभा आपल्या लाडक्या आजीच्या सहवासात रहायची.

ह्यवेळची तिची भेट धावती होती.तिच्या आजीला भेटायला म्हेणून ती लगबगीने आली होती.पण तिची तिच्या आजीशी भेट काही झाली नाही.ह्यावेळी ती परत जाताना आम्ही एअर पोर्टवर गेलो तेव्हा तिची फ्लाईट दोन तास लेट होती असं कळलं.मला सुलभा घरी परत जायला सांगत होती.पण आपण गप्पा मारूया वेळ निघून जाईल असं मी तिला म्हणालो.
बघतो तर ती बरीच चुळबूळ करायला लागली.
मी तिला म्हणालो,
"तू तुझं तिकीट घरी विसरून आलीस का? का तुझा पासपोर्ट तुझ्या बरोबर नाही.?"
मला म्हणाली,
"दोन्ही गोष्टी माझ्या जवळ आहेत.पण एक अतिशय महत्वाची गोष्ट मी घरी विसरून आले.पासपोर्ट आणि तिकीटापेक्षाही ती मला जास्त महत्वाची आहे.ती न घेता मी जाऊच शकत नाही.तुम्हाला थोडी तसदी देते.आपल्या टीव्हीवर एक पिशवी मी विसरून आली आहे.शेवटच्या क्षणी मी माझ्याजवळ घ्यायला विसरले.मला सामानाच्या बॅगेत ती पिशवी ठेवायची नव्हती.
जाऊन येऊन तुम्हाला अर्धा तास लागेल.माझ्यासाठी प्लीज."

मी लागलीच उठत म्हणालो,
"अग,त्यात प्लीज कसलं.तुला एव्हडं महत्व त्या पिशवीचं असेल तर मी घेऊन येतोच."
असं म्हणून मी गेलो.आणि परत येऊन ती पिशवी तिच्या हातात दिली.पिशवीत असं काय आहे ह्याचं मला कुतूहल होतं.
पिशवी उघडून तिने त्यातून एक वही काढली.आणि माझ्याकडे बघत तिने आपले डोळे पाणावले.

आजीच्या जुन्या वहीबद्दल सुलभा मला पूर्वी बोलली होती.
पहिल्या वेळी अमेरिकेला जाताना ही वही तिने आजीकडे मागतली होती.पण आजीने तिला दिली नव्हती.आणि का देत नाही हे तिने सुलभाला समजावून सांगीतलं होतं. हेही मला सुलभाने एकदा सांगीतलं होतं.
त्या वहीला पिशवीतून काढताना आणि माझ्याकडे पाहाताना तिला आजीची आठवण येऊन तिने डोळे पाणावले असावेत हे मी तेव्हाच ताडलं.

मला सुलभा म्हणाली,
"माझी आजी मला किती आवडायची ते तुम्हाला ठाऊक आहेच.ह्या वहीबद्दल मी तुम्हाला विस्ताराने सांगते. फ्लाईटची वेळ होई पर्यंत आपला वेळ जाईल."

माझं त्या वहीबद्दलचं कुतूहल स्पष्ट व्हायला संधी आहे असं पाहून मी तिला म्हणालो,
"तुझी कल्पना छान आहे.सांग"

मला म्हणाली,
"सुरवातील ती एक जुन्या पद्धतीची पण एकदम नवी वही होती.आणि आता त्याच वहीचं रूपांतर एक जाडजूड पुस्तकात झालं आहे.आणि त्याचं एकच कारण त्यात आता बर्‍याच पदार्थ करण्याच्या पद्धतीचं वर्णन लिहून ठेवलं गेलं आहे.
पातळ आणि नवं कसं दिसणारं त्या वहीचं रूप पार बदलून गेलं आहे.काही पानं फाटली आहेत.काही लिखाण पुस्सट झालं आहे.आणि काही पानं निसटून पडणार आहेत अशा स्थितीत आहेत.
माझी आजी पानांना गोंद लावून लावून चिकटवून ठेवण्यात भारी काळजी घेत असायची,आणि त्यात सुद्धा ती क्रमवार राहातील ह्याचीही काळजी घेत असायची.
दिवसेनदिवस वहीची जाडी वाढत होती आणि जास्त जुनी दिसायला लागली होती.

ह्या जुन्यापुराण्या वहीतून वाचत रहायला मला आवडतं.त्याचा अर्थ मी काही मोठी जेवण करणारी आहे अशातला प्रकार नाही,पण एका मागून एक पानं परतल्यावर माझ्या आजीच्या कार्यपद्धतीचा मला शोध लावता येतो.दोन पानं चिकटून ठेवायला माझी आजी खूपच गोंद वापरायची.तो चिकटवलेला कागद जसा सुकून जायचा तसा तो आवाज करायचा,कुरकुरा बनायचा.

जेव्हा मी ते पान परतायची तेव्हा तो आवाज शांतीचा भंग करून,माझ्या आजीने ह्या पदार्थाची पद्धत जेव्हा लिहून ठेवली होती, त्याकडे माझं ध्यान ओढून न्यायचा.त्या पानाला एक प्रकारचा खास तेलकट वास यायचा.माझ्या आजीने स्वयंपाक करताना वापरल्या गेलेल्या तेलाचा तो वास असायचा.
बर्‍याचश्या पानावर एखाद्या जागी तेल पडून त्या जागेपूरती पारदर्शकता आलेली असायची.माझ्या आजीच्या हाताला लागलेल्या तेलाचा तो परिणाम असावा.

त्यावेळी मी आणि माझी आजी ही वही वाचायचो पण माझ्या आजीचे मात्र आपल्या बोटांचे ठसे त्यावर राहून जायचे.आजी आपलं प्रेम प्रत्येक पदार्थात ओतायची.जेव्हा मी ही वही वाचायची तेव्हा आतल्या पदार्थाच्या पद्धती पेक्षा मी आजीच्या बोटांच्या ठशांकडे माझं लक्ष केंद्रीत करायची.
माझ्या आजीच्या परिश्रमाची आणि प्रेमाची मला आठवण यायची.

त्या वहीत ती लिहायची,
"लोलीला जास्त मसालेदार आवडतं."
"सुलूला-म्हणजे माझ्या आईला-वाटतं ह्यात जास्त मीठ आहे."
असे कुठच्या कुठच्या पानावर कडेला तिचे शेरे असायचे.
"असं का लिहायचीस?"
असं मी माझ्या आजीला एकदा विचारलं.मला म्हणाली,
"आता तुझ्या लक्षात आलं असेल तुम्हा मुलांचे खाण्याचे चोचले संभाळायला किती श्रम पडायचे ते. खरं ना?"
मी हसले.कारण माझी आजी कधीही आणि कशाचीही तक्रार करत नसायची.

माझ्या ध्यानात यायचं की तेच तेच पदार्थ ती बनवायची,ते उतोरोत्तर चांगले चवदार लागायचे,आणि त्याचं कारण ह्या तिच्या पानाच्या कडेवर लिहिलेल्या टिपा कारणीभूत असायच्या.

प्रत्येक पदार्थ नव्याने केल्यावर चांगला का व्हायचा ह्याबद्दल माझी आजी कधीच वाच्यता करायची नाही आणि माझीही क्वचीतच ह्याबद्दल तिच्याकडे पृच्छा व्हायची. कारण ती तिची गोपनीय कार्यपद्धती होती.आम्हाला काय आवडायचं हे तिला माहित होतं आणि ती ते आचरणात आणायची.

मी ही वही अमेरिकेत घेऊन जाऊ काय म्हणजे मला वरचेवर त्या वहीतून वाचता येईल म्हणून मी तिला एकदा विचारलं.
त्यावर माझी आजी हसली.आणि म्हणाली,
"वेडी मुलगी! तिकडे तर तू जेवणच करत नाहीस.तुझ्या आजीकडे वही राहू दे.मला आणखी काही त्यात लिहिता येईल.आणि तू परत आल्यावर तुझ्यासाठी परत एखादा पदार्थ शिजवता येईल."

खरंतर मला माहित होतं, माझ्यासाठी ती अगदी जूना पदार्थ बनवण्याचा विचार करणार.
"तुरीच्या डाळीची आंमटी,उकड्या तांदळाचा भात आणि तोंडी लावायला सुका बांगडा चुलीवर भाजलेला आणि त्यावर थोडं खोबर्‍याचं तेल."

हे तिच्या वहीत तिसर्‍या पानावर लिहिलेलं आहे.त्या पानावर जास्तीत जास्त तेल लागलेलं आहे आणि तिच्या बोटाच्या खूणा आहेत.
"एव्हडीच तुरडाळ,एव्हडीच सुकी मिरची फोडणीला,एव्हडंच मीठ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेगडीच्या खाली एव्हडाच जाळ ठेवायचा म्हणजे डाळ मंद प्रमाणात शिजली जाते.सुका बांगडा,त्याचं खारेपण जाणार नाही अशा पद्धतीने, नीट धुऊन तो चुलीवर भाजायचा.आणि मग त्याचे लहान तुकडे करून एका थाळीत ठेऊन खोबर्‍याचं तेल त्या तुकड्यावर टाकायचं उलटून पालटून ते तुकडे टाकलेल्या खोबर्‍याच्या तेलात भिजवायचे. उकड्या तांदळाचा भात बेठा करायचा नाही.जरूर तेव्हडं पाणी घालून तांदूळ शिजवायचा. शिजवलेला भात चांगला शिजला के नाही हे थोडा भात हातात घेऊन मुरडून पहायचा.उकडा तांदूळ पचायला कठीण असतो म्हणून चांगला शिजवायची नीट काळजी घ्यायची "
आणि वहीतल्या पानाच्या कडेवर,
"लोलीची आवडती डाळ,उकड्या तांदळाचा भात आणि सुका बांगडा."
असा शेरा असायचा.

मला आजी नेहमी म्हणायची,
"कुठच्याही शिजवल्या जाणार्‍या पदार्थात,किती मीठ घालायचं,किती साखर घालायची,नव्हेतर त्या पदार्थातले असतील तेव्हडे घटक किती प्रमाणात घालायचे ते आपल्या हातात असतं.पण नंतर शिजवताना खाली योग्य जाळ नसेल तर काहीही उपयोग नाही.दुर्लक्ष केल्यास एकतर पदार्थ कच्चा शिजवला जातो नाहीतर करपवला जातो.पण जर का योग्य जाळाकडे लक्ष देऊन,शिजवण्याच्या वेळेकडे लक्ष देऊन तो पदार्थ शिजवल्यास अवश्य
चवदार होतो."

अलीकडेच आजीला सोडून अमेरिकेत जातानाचं ते शेवटचं जेवण मला आठवतं.मी भकाभका जेवत होते.का कुणास ठाऊक परत अमेरिकेहून आल्यावर माझी आजी मला हे जेवण करून घालण्याच्या परिस्थितीत असेल का असा मला उगाचच संभ्रम झाला होता.

तिने केलेला उकड्या तांदळाचा भात,तुरीच्या डाळीची आमटी आणि सुका बांगडा चुलीवर भाजलेला.आणि त्यावर थोडं खोबर्‍याचं तेल.हे माझं पक्वान्न मी जेवत होते.
माझी आजी मी जेवताना माझ्या समोर टेबलावर बसली होती.मी तिच्याकडे बघत् होते आणि ती माझ्याकडे हसून बघत होती.माझ्या मनात आलेले दुष्ट विचार मी द्डवण्याच्या प्रयत्नात होते ते तिला बिचारीला काय ठाऊक?

ते विचार मनातून काढण्यासाठी मी माझ्या आजीला म्हणाले,
"उकड्या तांदळाचा भात,डाळीची आमटी मला तिकडे अमेरिकेत करता येईल.पण सुका बांगडा तिकडे मिळेल का माहित नाही आणि मिळाला तरी तो चुलीवर भाजता येणार नाही.कारण घरात धूर झाला तर फायर-अलार्म होणार.आणि तिन मिनटात फायर-ब्रिगेड घरासमोर येणार.तोपर्यंत खोबर्‍याचं तेल बांगड्यावर टाकायला वेळ कुठचा मिळतो."
हे माझं ऐकून माझी आजी मोठमोठ्याने हसली.तिचं ते हसणं अजून माझ्या डोळ्यासमोर आहे.बिचारीचं ते शेवटचंच हसणं ठरलं.

त्यानंतर मला अमेरिकेत येऊन दोन महिने झाले असतील नसतील.आणि माझ्या मनात आलं होतं तसंच झालं.मला फोन आला,
"आजीचं काही खरं नाही.तू तिला भेटून गेलेली बरी."
मी निघाले पण माझी आणि आजीची काही भेट झाली नाही.परत येताना मात्र मी तिची ती वही माझ्याजवळ घ्यायची असं ठरवलं."
असं म्हणून सुलभा पुन्हा डोळे पुसायला लागली.

मी सुलभाचा हात हातात घेत तिला समजूत घालताना म्हणालो,
"तुझी आजी ह्यापुढे वहीच्या रूपाने तरी तुझ्या सानिध्यात असणार हे काय कमी झालं?"
तेव्हड्यात,
"फ्लाईट टू न्युयॉर्क इज रेडी फॉर बोर्डींग"
अशी घोषणा झाली.आणि सुलभा गेटकडे जायला निघाली.पण ह्यावेळी डोळे पुसत जात होती त्याचं कारण मी तिला दुरावत होतो म्हणून.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 14, 2011

खरी होवोत स्वपनांची साठवण

अनुवाद.

ही चिंब-चिंब झालेली अंधारी रात्र
ही मस्त मस्त फुललेली रमणीयता
असे असुनही का चांदणीची उदासिनता
हळूवार उगवता हा चंद्रमा प्यारा
झोप येईना पाहूनी ह्या ऋतुचा इशारा

ठुमकत ठुमकत येई हवेची लहर
अशाच वेळी का होई उद्विग्न अंतर
कळ्या फुलांवर येई अचेतन आद्रता
कुणी जाणावी जीवनातील कमतरता

उजळ दिवशी जे न मिळे स्वप्न
ते शोधीत राही माझे अंतर
झगमगत्या रात्री गेली मी डूबून
शोधू कशी मी मला त्यानंतर

अशाच वेळी नसे का कुणी
हंसे सुंदरसे नकळत देऊनी
चुकून काढील माझी आठवण
खरी होवोत स्वपनांची साठवण

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com

Friday, February 11, 2011

शरदची सायकल.

“माझी खात्री आहे की जे तुम्हाला आवडतं त्याचा तुम्हाला अभिमान असायला हवा. हे कधीतरी,काही कारणाने आणि कशाही प्रकारे तुम्हाला करायला हवं, हा मुद्दा तुम्हाला एकदातरी पटल्याशिवाय रहाणार नाही.”

शरदला त्याच्या अगदी लहानपणापासून मी ओळखतो.त्याला काही वस्तू नव्याने त्याच्या घरात आणायची झाल्यास, एकतर तो माझा सल्ला घेईल किंवा ती वस्तू खरेदी करायला मला घेऊन जाईल.
त्याच्या पंधरा वर्षाच्या मुलाला नवीन सायकल विकत घ्यायच्यावेळी मात्र शरदने माझा सल्लाही घेतला नाही किंवा मला खरेदी करताना घेऊनही गेला नाही.
ज्यावेळी मी त्याच्या घरात नवीन सायकल पाहिली,त्यावेळी मला त्याचं कुतूहल वाटलं.
“वाः छान सायकल आहे “
असं मी म्हणताच,

शरद मला म्हणाला,
“त्यादिवशी सकाळीच ऑफिसमधे जाण्यापूर्वी माझ्या मुलांने त्याच्यासाठी सायकल आणण्याचा मला गळ घातला. त्याच्या पूर्वी त्याच्या आईकडून त्याने बरेच वेळा मला सायकलबद्दल सांगितलं जाईल ह्याचा प्रयत्न करून पाहिला होता. का कुणास ठाऊक त्यादिवशी मी त्याला नवी सायकल घ्यावी असं मनात आणलं.आणि घेऊन आलो. तुम्हाला सांगायचं राहून गेलं.पण नंतर मनात म्हटलं की सायकल ह्या विषयाबद्दल मी जरा भावूक असल्याने प्रथम सायकल घेऊन टाकावी आणि मग त्यावर तुमच्याशी चर्चा करावी.”

कोकणात असताना शरद नेहमीच सायकल बरोबर घेऊन असायचा हे मला आठवलं.त्याचं सायकलवर खूप प्रेम होतं. प्रत्येक आठवड्याला रविवारी सगळी सायकल खोलून तो तिची डागडूजी करायचा.सायकलची चेन काढून ती घासलेट तेलात बुडवून ठेवून मग स्वच्छ धुवून परत बसावायचा.ब्रेक तपासायचा.सर्व फिरत्या भागात वंगण घालायचा. नवीन घंटा सायकलच्या दुकानात आली की लागलीच विकत घेऊन सायकलच्या हॅन्डलवर बसावायचा.

हे आठवून मी शरदला म्हणालो,
“सायकलीबद्दल तुझ्या भावना माझ्या चांगल्या लक्षात आहेत.तुझ्या आईनंतर तू तुझ्या सायकलवर प्रेम करायचास.
खरं ना?”
मला म्हणाला,
“अगदी खरं.
ज्यावर तुम्ही प्रेम करता,त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायाला हवा असं मला नेहमीच वाटत असतं.कारण काही गोष्टी करायला मला आवडतात.पण काही लोकाना ज्यावर प्रेम असतं त्याच्याबद्दल मुळीच अभिमान नसतो.
तसंच ज्यावर तुम्ही प्रेम करता त्याबद्दल तुम्हाला अभिमान नसेल तर तुम्ही त्यावर प्रेम करता हे कसं कळायचं.? तुम्ही सदोदित प्रेम करता हे तरी कसं कळायचं? आणि तुमच्या तुम्हाला तरी तुम्ही कसं ओळखायचं.?

मला आठवतं,माझ्या लहानपणी मी एकदा पेपरात सायकलची जाहिरात पाहिली सायकल शिकत असताना,अपघात न करता, कशी चालवायची त्याबद्दल सवित्सर माहिती दिली होती.मला ते वाचायला खूप मजा आली.त्यात लिहिलं होतं, मला आठवतं ते सांगतो.

नव्याने सायकल चालवताना पुढे बघून चालवावी.खाली मुळीच बघू नये.त्याने तोल जाण्याचा बराच संभव असतो.
सुरवातीला खूप वेगाने किंवा अगदी कमी वेगाने सायकल चालवू नये.ताबा गेल्याने सायकलवरून पडण्याचा जास्त संभव असतो.

ब्रेक लावण्याची आवश्यकता वाटल्यास नेहमी मागचा ब्रेक लावावा.नुसताच पुढचा ब्रेक लावल्यास सायकलवरून उलटून पडण्याचा संभव असतो.

सायकलच्या दोन्ही चाकात तट्ट हवा भरावी.हवा कमी भरल्यास, विशेषकरून पुढच्या चाकात,पुढचं चाक हलवताना तोल जाण्याचा संभव असतो.

सायकल नव्याने शिकताना गवताळ भागात किंवा भुसभूशीत जमीनीत सायकल चालवू नये.चालवायला खूपच कठीण होऊन शिकण्याचा उत्साह जातो.

सायकलची सीट उंचीसाठी जुळवून घेताना,सायकलवर बसल्यावर जमीनीला पाय टेकू शकतील एव्हड्या उंचीवर जुळवावी.तसंच सायकलवर बसल्यावर चालवताना दोन्ही गुढगे समोरच्या हॅन्डलला लागणार नाहीत अशा उंचीवर जुळवावी.

हे सर्व वाचून मला सायकल शिकायला हुरूप आला.
नंतर मी एकदा माझ्या बाबांना माझ्यासाठी सायकल घ्यायला गळ घातला.एक दिवशी संध्याकाळी माझे बाबा कामावरून घरी परत येताना एक सायकल घेऊन आले.
अर्थात मला किती आनंद झाला हे अवर्णनीय आहे.

मला खरंतर सायकल चालवायला मुळीच आवडत नसायचं. माझ्या मित्रांना, सायकल शिकताना पडून, ढोपरांना जखमां झालेल्या मी पाहिल्या होत्या.म्हणून मी सायकल चालवायला नापसंत करायचो.
पण काही कारणास्तव मी ती जाहिरात वाचून माझं सायकल चालवण्या विषयीचं मत बदलं.

माझ्या बाबांनी मला न पडता सायकल चालवायला शिकवलं.
माझा विश्वास बळावला.त्या दिवसात कोकणात आमच्या गावात मोटार गाड्यांची आणि ट्रक्स वगैरेंची एव्हडी वरदळ नसल्याने मला मनसोक्त सायकल चालवायला रस्ता मिळायचा.कोकणातल्या रस्त्यांना चढ-उतार फारच असल्याने उतारावरून सायकल चालवत खाली यायला मजा यायची.
आमच्या गावाच्या बाहेर एक छोटीसी घाटी होती. तिकडे जाण्याचं मी बरेच दिवस धारिष्ट केलं नव्हतं.
एकदा एक पण करून गेलो.घाटी चढून गेल्यावर एकाएकी उतार आल्याचं मला कळलंच नाही.
सायकलच्या ब्रेकचा आधार घेत मी तो उतार असा जोरात उतरलो की,थंड गार वारा माझ्या केसाना पिंजारत होता ते मी कधीच विसरणार नाही.

ह्या अनुभवावरून मी एक नक्कीच शिकलो की,न घाबरता,अंगात बळ आणून ज्यावर आपण प्रेम करतो ते करीत असताना स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा असतो.
ते करण्यापासून डगमगायचं नाही.ह्याच घटनेने मला एक शिकवलं की,ज्यावर आपण प्रेम करतो त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटायला हवा.

त्यानंतर मी आमच्या गावात मोकळेपणाने सायकल चालवायचो.मला माझा मोकळेपणा जाणवायचा.जोरात वहाणार्‍या वार्‍याने माझे केस पिंजून जायचे ते मला खूप आवडायचं.आणि हे सर्व करायला माझ्या मी मला थांबवलं तरच,नाहीपेक्षा कूणीही मला रोखू शकत नव्हतं.

त्यावेळी माझ्या वयाच्या बर्‍याच मुलांना माझ्या सारखंच सायकल चालवायला, मी जसा प्रेम करायचो तसं, प्रेम करायला आवडायचं.”

शरदचं सायकल-प्रेम ऐकून मला त्याला काहीतरी सांगावं असं मनात येऊन मी त्याला म्हणालो,
“थोडक्यात सांगायचं तर सायकल चालवणं तेव्हा तुझ्या हाडामासात भिनलं होतं.तुला तर शक्य नव्हतं, पण खरोखरच कुणी ज्यावर प्रेम करतो ते सोडायला कुणाला तरी शक्य आहे का? मला म्हणायचं आहे की त्यातून येणारी मजा,तो एक प्रकारचा खेळ होता हे माहित असूनही कुणालाही त्यावरचं प्रेम करणं सोडून द्यायला शक्य आहे का?. आणि तुला तर तो मजेचा खेळ होता.”

“आणि म्हणूनच माझ्या मुलाला मी, त्याने मला सांगताच, नवी सायकल घेऊन आलो.”
असं सांगून शरद मला म्हणाला,
“मला जे करायला आवडेल ते दुसर्‍याला आवडेलच असं नाही.
म्हणूनच मला जे खरंच आवडतं त्याबद्दल मला अभिमान वाटतो.
माझी खात्री आहे की जे माझ्या मुलाला आवडतं त्याचा त्याला अभिमान वाटायला हवा. पुढे कधीतरी,काही कारणाने आणि कशाही प्रकारे त्याला हा मुद्दा एकदातरी पटल्याशिवाय रहाणार नाही.”

तेव्हड्यात शरदचा मुलाग आला.मी शरदला म्हणालो,
“तुझ्या बाबांनी तुला न पडता सायकल कशी चालवायची ते शिकवलं तसंच तुझ्या मुलाला आता तू शिकव.”
हे ऐकून शरद आणि त्याचा मुलगा दोघेही एकाच वेळी मोठ्यांदा ह्सले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 8, 2011

का प्रीत ह्यालाच म्हणावे

अनुवादीत.

जरी तू जवळी असशी
अथवा तू दूर रहाशी
माझ्या नयनी तुजला
मी सदैव ठेवीते संभाळूनी
कुणी सांगेल का एव्हडे
का प्रीत ह्यालाच म्हणावे

इवलीशी कथा असे प्रीतिची
कष्ट न घेई कुणी सांगण्याची
थोडा यत्न होई तुझा लाजण्याचा
अन यत्न होई माझा लाजण्याचा

मिलनाचा समय पुरेसा नसे
अन रात्र विरहाची वाढत जातसे
सारे विश्व जेव्हा निद्रेत असे
समय चांदण्या मोजण्यात जातसे

कुणी सांगेल का एव्हडे
का प्रीत ह्यालाच म्हणावे



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 5, 2011

कांदेपोहे.

.

“तुझे पोहे तर मस्त झाले आहेतच शिवाय तू म्हणतोस ते ऐकून मजा आली.”

आज खूप दिवसानी सुरेश खोटेच्या घरी गेलो होतो.सध्या सुरेश एकटाच घरी असतो.त्याची पत्नी आणि मुलं कोकणात गणपती सणाला गेली आहेत. सुरेशला रजा मिळणं जरा कठीण झाल्याने तो ह्यावेळी कोकणात गेला नाही.

रविवारची सकाळ होती.पेपर वाचून झाल्यावर मनात आलं की सुरेशचं घर ठोठावून त्याची खबर घ्यावी.
दार उघडल्यावर सुरेश एकदम मस्त मनस्थितीत दिसला.माझं स्वागत करून झाल्यावर मला म्हणाला,
“आज झकास कांदेपोहे केले आहेत.गरम गरम चहा बरोबर तुम्ही कंपनी द्या.”
आंधळा मागतो….त्यापैकी झालं.मी सुरेशला म्हणालो,
“तुझ्याकडे कधीही आलं तर कांदेपोह्याची थाळी पुढे केली जातेच.हे गुढ काय आहे?”

मला सुरेश म्हणाला,
“मला रोज सकाळी उठल्यावर गरम गरम कांदेपोहे खायला आवडतं.मला वाटतं,ही गोष्टी कुणाला जरी अगदी मामूली वाटली किंवा नगण्य वाटली तरी ह्या लहान लहान गोष्टीच जीवन सुखकर करतात.माझ्या जीवनात तरी सकाळीच कांदेपोह्याची थाळी, त्यात पोह्यावर शिवरलेलं खवसलेलं ताज्या नारळाचं खोबरं-चून- ,आणि थोडी कोथिंबीर शिवरली आहे अशी थाळी समोर येणं महत्वाचं आहे,बरोबर अर्थात गरम गरम चहाचा प्याला हवा.”
मला हे सुरेशचं म्हणणं ऐकून जरा गम्मत वाटली.
मी म्हणालो,
“म्हणजे ह्याचा अर्थ सकाळीच तुला दुसरं कसलं खाणं आवडत नाही की काय?”

“मला तरी कांदेपोह्याशिवाय जगात काही महत्वाचं आहे असं वाटत नाही.”
असं म्हणून सुरेश पुढे सांगू लागला,
“कांदेपोह्याशिवाय जीवनालाच काही अर्थ आहे असं वाटत नाही.जीवनालाच अर्थ राहिला नाही असं वाटत असताना,शिक्षण घेऊन सुशिक्षीत होणं,प्रेमात पडणं,कुणाच्या मदतीला धावणं हे सर्व अर्थहीन वाटतं.

माझ्या जीवनात एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा झाल्यास प्रथम मी कांदेपोहे खाईन आणि मग निर्णय घेईन. त्यामुळे,जीवनातले मोठे स्तर लाभकर होतील असं मला वाटत असतं.माझ्याकडे सर्व साधनं असल्यावर कॉलेजमधे जाऊन शिक्षण घेण्यात मला काही विशेष वाटत नव्हतं.प्रेमात पडणं म्हणजे काही विशेष आहे असं मला वाटत नसायचं कारण जरका कुणाला जगाचंच प्रेम वाटत नसेल तर कुणाशी प्रेमाचा भागीदार कसं व्हायचं.?
एखाद्याला मदतीची जरूरी आहे हे माहित असताना त्याला मदत करणं काही उपयोग नाही, कारण जरका त्यालाच जगाकडून काही नको असल्यास त्याला मदत करून काय उपयोग.?
लहान लहान गोष्टीच मोठ्या गोष्टीना मोठं करतात.”

मी सुरेशला म्हणालो,
“मला असं नेहमीच वाटतं की जगात असलेल्या हजारो गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.मी जे काही करीत असतो ती जगातली सर्वात महत्वाची गोष्ट असते,मात्र जोपर्यंत मी ती गोष्ट करीत असतो तोपर्यंत.अमूक एकच गोष्ट महत्वाची आहे असं मी कधीच समजत नाही.”

माझं हे ऐकून सुरेशच्या चेहर्‍यावर हसू दिसलं.
मला चहाचा कप पुढे करत म्हणाला,
“अमुक अमूक गोष्टीपेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट कमी किंवा जास्त महत्वाची नसते. एखादी गोष्ट जास्त वेळ टिकते किंवा त्यांचा परिणाम जास्तवेळ टिकत असावा एव्हडंच.
त्यासाठीच मी म्हणतो कांदेपोह्याची थाळी सकाळी,दुपारी किंवा संध्याकाळीका असेना ती तेव्हडी जगात माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे.

मला कुठेतरी वाचल्याचं आठवतं की,
“भरपूर घट्नानी भरलेलं जीवन हे खरं उत्तम जीवन.”
जीवनातून खरा मिळणारा अर्थ मी मिळवतो त्या घटनांची व्युत्पत्ति प्रत्येक घटना मी अनुभवतो त्यातून येत असते.
माझ्या जीवनात मोठ्या समजून ज्या योजना मी ठरवतो त्याचा उपयोग चांगल्या घटनांची संधी मिळावी म्हणून त्या योजना असतात.
मी कॉलेजमधे गेलो ते जाणुनबुजून मनात मानवजातीच्या कल्याणासाठी माझं शिक्षण उपयोगी पडावं म्हणून काही नाही,उलट माझ्या वयस्कर जीवनात निदान मला कांदेपोहे खायाला मिळावेत हाच उद्देश ठेऊन गेलो होतो.”

सुरेश आणखी पोहे खाण्याचा आग्रह करीत होता.मला त्याचे कांदेपोहे आणि त्याबद्दलचा त्याचा युक्तिवाद आवडला.
मी म्हणालो,
“तुझे पोहे तर मस्त झाले आहेतच शिवाय तू म्हणतोस ते ऐकून मजा आली.
मी विश्वास करतो की प्रत्येकाच्या जीवनात घटना होत असतात.पण तू म्हणतोस तसं, मला मात्र माझं जीवन भरपूर घटनांनी भरलेलं असावं असं वाटतं.मला वाटतं तू म्हणतोस तसं,प्रत्येकजण कांदेपोह्याच्या थाळी सारख्या प्रावस्थेमधून जात असतो.मला वाटतं हे आयुष्यभर टिकून असतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 2, 2011

प्रीत झाल्याविना रहाणार नाही

अनुवाद

तो: भेटशील जर अशीच तू मला
प्रीत झाल्याविना रहाणार नाही

ती: नको बोलू असे बोल लाडक्या
चित्त हरविल्याविना रहाणार नाही

तो: पाठलाग माझा तू का करीशी
नजरेतील फुले मार्गात का शिंपीशी

ती: सांगू कसे हीही एक चाल आहे
एकदा तरी प्रकट होणार आहे

तो: केलीस तू जादूगिरी अशी
चर्येवरूनी नजर सुटेना कशी

ती: अशा नजरेने तू जर पहाशील मला
लाली छपल्याविना रहाणार नाही

तो: प्रीतीपथ मला अजाण आहे
काय करावे ह्याने बेचैन आहे

ती: पाहूनी तुझीच ही बेचैनी
अंतरात मीही बेचैन आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com