Friday, November 27, 2009

पदकमली आपल्या लागेल रहावे

अनुवाद.(शर्म आती है मगर....)


लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे


रोष करूनी जगले ते जीवन कसले
दोष अनेक घेतले अन दोष दिले
यापुढे मात्र नसेल काहीही सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे


प्रीतिची साथ आहे अमुच्या मनी
दुःखाची व्यथा आहे अमुच्या जीवनी
यापुढे आपणा न लागो दुःख सहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 25, 2009

अजून स्वीट-डीश यायची आहे

“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”



अलीकडे तळ्य़ावर लवकर काळोख पडतो.आणि त्यासाठी लवकर निघालं की चमचमीत उन्ह्यात निघावं लागतं.म्हणून मी जरा उशीराच निघालो.मला वाटलं होतं की प्रो.देसाई माझ्या अगोदर येऊन बसले असतील.पण कसलं काय.?
काळोख व्हायला लागल्यावर उठून जायला निघालो.चार पावलं गेल्यावर,
“काका,काका”
अशी हांक ऐकायला आली.मागे वळून पाहिल्यावर तो प्रो.देसायांचा नातू विजय, नक्कीच असणार ह्याची खात्री झाली.आणि त्याच्याबरोबर एकजण होता.जरा थांबलो.
“कुठे चालला काका? जरा बसा”
असं म्हणत त्याने आपल्या मित्राची ओळख करून देत म्हटलं,
“हा माझा मित्र,संजय पोतदार.तो त्याच्या आजोबांची गोष्ट सांगत होता.मी त्याला म्हटलं तुम्हाला पण ऐकायला आवडेल.”
“हो मला ऐकायला नक्कीच आवडेल.बसूया पाहिजे तर “
मी असं म्हटलं आणि आम्ही परत त्या बाकावर येऊन बसलो.
संजय मला म्हणाला,
“काका माझी गोष्ट नक्कीच तुम्हाला स्वारस्यमय वाटेल.कारण ती नुसतीच गोष्ट नसून त्यात माझ्या मनातली व्यथा पण आहे”



प्रो.देसायांचा नातु बरेच वेळां आपल्या आजोबाबद्दल मला सांगत असतो.तक्रार म्हणून नव्हे तर दोघांच्या विचारसरणीत असलेला फरक दाखवण्यासाठी चर्चा करण्यासाठी सांगत असतो.तसाच काही तरी संजयचा सांगण्याचा प्रकार असेल असं गृहीत धरून मी संजयाला म्हणालो,
“बाबारे,प्रो,देसायांना मी चांगलाच ओळखतो.तुझ्या आजोबांशी माझा काही परिचय नाही.त्यामुळे तू जे काय सांगशील ते एकतर्फी होईल.म्हणजेच मी काही माझं मत देऊ शकणार नाही.बरोबर ना?”



“काका,तुम्ही मला मत देण्यासाठी किंवा माझ्यात आणि माझ्या आजोबात असलेल्या विचारसरणीत फरक वगैरे आहे हे सांगण्यासाठी हे मी सांगत नाही.”
असं संजय मला म्हणाला.
“उलट माझे आजोबा मला आपल्या मित्रासारखे वागवतात.जसा जमाना बदलतो तसं माणसाने बदललं पाहिजे अशा विचाराचे माझे आजोबा आहेत.”
असं त्याने मला पुढे जावून सांगीतलं.
“असं असेल तर मला तुझी गोष्ट आणि व्यथा ऐकाला जरूर स्वारस्य आहे”
असं मी संजयला प्रोत्साहन देत सांगीतलं.विजयच्या चेहर्‍यावर मला छुपं स्मित दिसलं.



“माझी आई आणि माझे आजोबा एकमेकाशी पत्रव्यवहार करण्यात खूप उत्सुक्त असायचे.अलीकडे मी आजोबांच्या कपाटात त्या पत्रांची थप्पी पाहिली होती. आजोबांची परवानगी घेऊनच मी त्यांच्या कडून पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता दाखवली होती.माझ्या आजोबानी मला हंसत हंसत मान्यता दिली.”
संजय सांगू लागला.
“ह्या अनेक पत्रातून एक पत्र मी जरा वेगळं करून ठेवलं होतं.ते मला नीट वाचावं असं वाटलं.
गावातल्या एका म्हातार्‍या आजीची गोष्ट त्यात होती.आजोबा आईला लिहीतात.
“आपल्या इथे गावात एक पार्वतीआजी म्हणून बाई होती ते तुला ठाऊक असेलेच. होती म्हणण्याचं माझं कारण आता ती नाही.दोन दिवसापूर्वी ती निर्वतली.तिची खासियत अशी की तीला गावात कुणीही कुणाच्याही घरात कसला समारंभ असला की जेवायला बोलवायचे.आणि ती आजी पण अगदी आनंदाने जायची.तीची एक जगावेगळी संवय होती की तीच्याबरोबर एक चांदीचा चमचा न विसरता ती घेऊन जायची.सहाजीकच जेवण संपल्यावर एखादी स्विट- डीश असायची.तीचा आस्वाद घ्यायला आजीला खूप आवडायचं.आणि ते सुद्धा तिच्याच चांदीच्या चमच्यातून.
“जेवण पूर्ण संपलं नाही.अजून स्वीट-डीश यायची आहे.”
असं यजमानानी म्हटल्यावर आजी आपला चमचा सर्सावून बाहेर काढून ठेवायची.सुग्रास जेवण झाल्यावर काहीतरी आणखी चांगली गोष्ट चाखायची आहे हा त्याचा अर्थ असायचा.”
पुढे आजोबा आईला लिहीतात,
“त्या आजीने आपली शेवटची इच्छा आपल्या मुलांना आणि नातवंडाना सांगून ठेवली होती.ती ही की,
“माझ्या बरोबर हा माझा चांदीचा चमचा माझ्या अंतीमकार्याला न्या.माझ्याबरोबर त्याला जावूदे.”
पत्र वाचून झाल्यावर त्यावेळी माझ्या मनात विचार आला की प्रत्येकाने अशा कल्पनेला चिकटून राहिलं पाहिजे की शेवटी काही तरी चांगलं होत असतं.जसं जेवणार नंतर स्वीट-डीश.”



संजयचं एव्हडं ऐकून झाल्यावर मी मनात म्हटलं खरंच स्वारस्य घेण्यासारखं हा काही तरी सांगत आहे.थोडा काळोख झाला तरी हरकत नाही. ह्या दोघाना माझ्या घरापर्यंत सोबत घेऊन जाईन.



पुढे संजय म्हणाला,
“नेहमी मी मला स्वतःला निराश किंवा असा-तसाच आहे असं समजतो. सकाळी उठल्यावर मी नेहमीच आशा करीत असतो की ज्या काही अडचणी, रुकावटी मी माझ्या मार्गात पेरल्या आहेत त्यातून मुक्त होईन.तसं माझं जीवन छान आहे.मी एका प्रेमळ कुटूंबातला आहे. मला चांगली नोकरी आहे. तसंच माझं भवितव्य पण उज्वल आहे.”



“मग तू कशाबद्दल एव्हडं दुःख करतो्स?”
मी थोडा उतावीळ होऊन संजयला विचारलं.
“मी माझ्या पायावर आहे.पण माझी विशिष्ठता जरा विशेष आहे.हे, मी म्हणत नाही किंवा मी ठरवलेलं नाही.मला तसं सांगीतलं गेलंय. शिवाय मला सांगीतलं गेलंय की बर्‍याचश्या माझ्या आयुष्यात पाहिलं तर ते खरं आहे.पण माझ्या ह्या विशिष्ठतेमुळे मला मित्र जोडता येत नाहीत.जास्तकरून मी माझ्या जीवनात एकटाच असतो.आणि सगळ्यांत घृणा करण्यासारखी गोष्ट म्हणजे मला एकलकोंडं रहायला मुळीच आवडत नाही.
माणसाला परस्पर संबंध ठेवायला नेहमीच आवडत असतं.आपण कुणाला तरी हवं हवं असं वाटलं पाहिजे.कुणी तरी आपल्याशी प्रेमळ असायला हवं असं त्याला वाटत असतं.आपण कुणाच्यातरी जरूरीत असलेलं असावं असं वाटत असतं. मला सुद्धा तसंच वाटतं.”



विजयला रहावेना तो म्हणाला,
“अरे संजय पण त्या स्वीट-डीशचं आणि चांदीच्या चमच्याचा संबध कुठे येतो.?”
माझ्याही मनात तोच प्रश्न आला होता.
तेव्हा संजय म्हणाला,
“जरा ऐकायला विक्षिप्त वाटेल पण माझ्या आयुष्यात ती स्वीट-डीश आणि चांदीचा चमचा अंतर्भूत झाला आहे.त्याचं कारण माझं व्यक्तीमत्व तसं वजनदार आहे. खरंतर मला स्पष्ट शबदात सांगायचं झालं तर मी शरीराने स्थुल आहे,लठ्ठ आहे. आणि हे तुम्ही पहाताच आहां.पण त्या शब्दांची मी घृणा करतो.ते शब्द उच्चारल्यावर किंवा कानावर पडल्यावर मला कसंसच होतं.आणि त्याहूनही जास्त जेव्हा मला कुणी तसं संबोधून हांक मारतं तेव्हा तर नक्कीच कसंस वाटतं.”
मला संजयची किंव आली मी त्याला म्हणालो,
“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”



“मी लठ्ठ आहे ही कल्पना माझ्या मनाच्या आड येत नाही.पण ज्यावेळी इतर जेव्हा माझ्या लठ्ठपणाची काळजी दाखवण्याचा अविर्भाव करतात ते मला नको असतं.जसा आहे तसाच त्या माझ्या शरीराचा मी स्विकार करीत असतो.पण एक मला नक्की वाटतं की इतरानी पण मी जसा आहे तसा मला स्विकारलं पाहिजे.”
संजय सद्गदीत होऊन म्हणाला.



“लठ्ठ आणि सुखी” ह्या वाकप्रचाराचा अविष्कार कुणीच माझ्या वयातल्यानी स्विकारला नव्हता.कारण माझ्या ह्या जगात मला असं दिसून येतं की सुखी असणं आणि स्विकारलं जाणं हे त्या लोकानी बनविलेल्या सांचात फिट्ट बसलं गेलं पाहिजे.त्या सांच्यातली मी अचूक व्यक्ती असं समजलं गेलं पाहिजे.पण मी मात्र त्या सांच्यात फिट बसत नाही.हे असं, आपल्या हृदयापासून किंवा मनापासून सांगून काय उपयोग नाही,काही खरं नाही.दुसर्‍या कशाचाच विचार न करता फक्त तुमच्याच बद्दल तुम्ही विचार करणं हे जरा कमी लेखलं जातं.”



संजयची समजूत घालण्याच्या विचाराने मी त्याला म्हणालो,
“हे बघ संजय,ज्या गोष्टीवर आपला दृढविश्वास आहे त्यावर विचार करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.आपल्यासाठी जर का दुसरे विचार करीत असतील तर मग ते त्यांना करू देत. तसं करणं हे त्यांना सोपं नाही काय?
तुझ्यात दोष आहे माझ्यात दोष आहे,ज्या जगात आपण रहातो त्या जगात दोष आहे.”



तळ्यावर कळोख खूपच झाला होता.उठता उठता संजय जे म्हणाला ते ऐकून मी खूपच सद्गदीत झालो.
” काका,तरी पण मी तो चांदीचा चमचा हातात घट्ट धरून आहे.पार्वतीआजी जशी स्वीट-डीशची वाट बघत असायची,तशीच माझ्या हातात ती चांदीची धातु पकडून मी एव्हडीच वाट बघत आहे की त्यानंतर काहीतरी चांगलं घडेल.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 23, 2009

काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अनुवाद. (आँखें खुली थीँ आये थे वो भी नज़र मुझे…)

डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

स्मृती हृदयामधे अन ओळख निजरेमधे
दिपकाचा प्रकाश असे स्मृतीच्या मार्गामधे
सोडून गेला तो ह्याच वळणावर मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अंधकाराशी आता माझी प्रीति जडली
नजरेला आता प्रतीक्षेची संवय जडली
न्याहाळू दे वाट तुझी जीवनभर मला

डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 21, 2009

माझी दोन मतीमंद भावंडं.

“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे उघडपणे आणि निडर होऊन.”

आमच्या बिल्डींगच्या मागे जी बिल्डींग होती त्याच्या दुसर्‍या मजल्यावर भांगले कुटूंब रहात होतं.श्री.भांगले दक्षिण मुंबईतल्या एका कॉलेजात प्रोफेसर होते.गणीत विषय शिकवायचे.
त्यांना तीन मुलं होती.मोठा उमेश लहानपणापासूनच वडलांसारखा फार हुशार होता. मात्र भांगल्यांचं एक दुःख होतं की त्यांची नंतरची दोन्ही मुलं एक मुलगा आणि एक मुलगी जन्मताच मतीमंद होती.
जशी मुलं मोठी होऊ लागली तशी भांगल्यांना घरात जास्त वेळ देण्याची आवशक्यता भासू लागली.म्हणून त्यांनी कॉलेजमधला आपला जॉब सोडून घरीच शाळकरी मुलांना शिकवायला क्लासीस काढले होते.गणीत आणि विज्ञान ते शिकवायचे.

नंतर नंतर शिकणार्‍या मुलांची संख्या वाढू लागली ते पाहून जवळच्या एका बिल्डींगचा एक मजलाच भाड्याने घेऊन ते तिकडे शिकवायला लागले. परत तिथे ही त्यांनी आणखी शिक्षक ठेवून निरनीराळे विषय शिकवायचे वर्ग काढले. भांगल्यांचं जोरात चाललं होतं.नंतर माझा आणि त्यांचा बरीच वर्ष संपर्क कमी झाला होता.
अलीकडे त्या बिल्डींगच्या खालून जाताना वर मान करून पाहिल्यावर भांगले क्लासीस ऐवजी दुसराच बोर्ड मी पाहिला.वर जाऊन चौकशी केल्यावर कळलं भांगले आता लोखंडवाला कॉप्लेक्स मधे राहायला गेले होते आणि त्यांनी क्लासीस दुसर्‍यांना चालवायला दिले होते.

मी एक दिवस त्यांचा पत्ता काढीत लोखंडवाला कॉप्लेक्स मधे गेलो होतो.बेल दाबल्यावर त्यांचा मोठा मुलगा उमेशच दार उघडायला आला.त्याने मला ओळखलं, मी मात्र तो उमेश असेल असा अंदाज केला.बहुतेक त्याचं एव्हाना लग्न झालं असावं. दोन लहान मुलं आत खेळताना दिसली.मला उमेशने आत बसायला सांगितलं. चौकशी केल्यावर मला कळलं की त्याचे आईवडील निर्वतले होते.त्याची बहिण आणि भाऊ गुजराथ जवळ एका गावात राहात् होते.ते तिकडे मतीमंद मुलांच्या एका संस्थेत कामाला असतात.त्या दोघानी तिकडेच धंदे शिक्षण घेऊन तिकडेच रहात होते.उमेश मधून मधून त्याच्याकडे जाऊन येऊन त्यांच्या चौकशीत असतो.

गप्पा मारताना मी उमेशला म्हणालो,
“जरी प्रत्येक माणसाचा अनुभव निरनीराळा असला तरी मला वाटतं प्रत्येक माणसाच्या अनुभवाचा आशय जास्त करून एक सारखाच असतो. जीवनात प्रत्येकजण रोज कष्ट काढीत असतो,संघर्ष करीत असतो.आणि जीवनात सर्वजण एकलेपणाच्या वेदना कधी ना कधी सहन करीत असतात. तसं पाहिलं तर प्रत्येकजण जर का मोका मिळाला तर आपला चांगुलपणा दाखवायला उत्सुक्त असतो.”

भांगले कुटूंबाला मी बरीच वर्ष ओळखत असल्याने त्याची कहाणी ऐकून मी माझा प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने असं म्हणालो.

हे ऐकून उमेश म्हणाला,
“परंतु, माझा समज आहे की माणूस जेव्हा दुसर्‍याला दयाळु्पणा दाखवतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या मनाला लागलेले घाव भरून काढण्याच्या तो प्रयत्नात असतो.”

उमेशच्या आईवडीलांची झालेली हानी आणि दोन भावंडांची त्याच्यावर पडलेली जबाबदारी ह्याच्या संदर्भाने त्याने असं म्हटलं असावं असं मी गृहित धरलं.

उमेश मला पुढे म्हणाला,
“आम्ही तीन भावडं आहो.पण दुर्दैवाने माझी बहिण आणि भाऊ दोघंही मतीमंद होऊन जन्माला आली.ही एक आमच्या कुटूंबातली आनुवंशीक कमतरता आहे.ती त्यांच्या नशिबी आली असावी. जीवनातल्या प्रत्येक विकासात्मक पातळीवर त्यांचा विकास होण्यात त्यांना विलंब लागायचा.आणि म्हणूनच रोजच्या शारिरीक गरजा भागवण्यासाठी त्यांना कुणाची ना कुणाची गरज भासायची.त्या दोघानीही आपल्या आपणच आश्चर्यजनक सामाजीक कुशलता आणि वयक्तिक पसंती स्वतःसाठी म्हणून विकसीत केली.चटका लावण्यासारख्या विनोदी वृत्तीत राहून मलाच त्यांनी जीवनातल्या माणूसकीबद्दल दुसर्‍या कुठल्याही सूत्राकडून मिळण्याअगोदर उदाहरणं घालून दिली. त्यांची ती उदाहरणं अपरिपक्व आणि छाननी न केलेली असली तरी जास्त माणूसकीला धरून होती.
मला वाटतं आपल्यातले बरेच जण रोजच्याच वयक्तीत बेबनावामूळे स्वतःच स्वतःला इतरापासून विलग करतात..माझ्या ह्या दोन्ही भावंडानी मला दाखवून दिलं की, आपलं कुटूंब स्पष्टरुपाने इतरांपेक्षा जरा भिन्न आहे.आम्ही निर्णय घ्यायला कमजोर आहोत.आणि त्यांना वाटायचं की मी एकदम कुणाची हजेरी घेऊ नये.उद्धट दिसेल असं बोलूं नये.”

उमेश किती विचारी झाला आहे हे बघून मला त्याच्या परिस्थितीची किंव आली. वडलांच्या सतत छायेत राहिलेला मी त्याला लहानपणी पाहिलं होतं. त्याच्या अपंग भावंडाविषयी त्याचे आदराचे उद्गार ऐकून मला त्याच्या वडलांची आठवण आली. त्यानी आपली कॉलेजातली करियर सोडून मुलांसाठी कष्टप्रय जीवन काढलं हे त्यांचे संस्कार ह्या मुलात उतरल्याचं मला जाणवलं.
मी त्याला म्हणालो,
“कष्ट करून जीवन जगणं हा मनुष्याच्या जीवनाच्या अनुभवातला एक मुख्य मुद्दा आहे.आणि काही प्रमाणात आपणा सर्वांना हा मुद्दा जाणवतही असावा.ही सर्वसाधारण व्यथा आपण सर्व समजू शकतो.
हे जर माझं म्हणणं खरं असेल -आणि मला ते खरं असावं असं ही वाटतं-मग त्याचा अर्थ असा होईल की मी सर्वांशी चांगली वागणूक ठेवून राहिलं पाहिजे कारण एकमेकाकडून आपण त्या चांगल्या वागणूकीचीच अपेक्षा करीत असतो.”
“हे आपलं म्हणणं एक मौल्यवान नियम म्हणून उचित दिसेल.”
असा शेरा मारून उमेश म्हणाला,
“म्हणजेच मला म्हणायचं आहे की, एकमेकाचं मन जर दुखावलं जात असेल-अर्थात मला ठाऊक आहे की मी दुखवला गेलो की मला कसं वाटतं ते- तर मग चांगली वागणूक ठेवणं हेच जास्त स्वाभाविक आहे.आपल्याच वयक्तिक व्यथा आपल्याला जगात पुढे येण्यापासून दूर ठेवतात.त्यामुळेच आपण आपल्यालाच सगळ्या जगापासून लांब ठेल्यासारखं राहून स्वतःला बंदिस्त करून ठेवतो.

माझ्या दोन्ही भावंडाकडे मात्र लोकांना आकृष्ट करून घेण्याचं कौशल्य होतं.माझा भाऊ आणि बहिण अनोळख्याच्या प्रतिरोधाचा पडदाफाश करताना अगदी भोळेपणा आणून त्या अनोळख्याच्या कष्टी दिसत असलेल्या मनाशी बोलण्याच्या प्रयत्नात असतात.हंसून,खरंच स्वारस्य आहे असं दाखवून, स्वतःचीच ओळख करून देऊन,निडर राहून त्यांच्याशी दोस्ती करण्याच्या प्रयत्नात असताना मी त्यांना पाहिलं आहे.त्यांनी मला दाखवून दिलं आहे की अगदी मुलतः आपण सर्व दयाळूपणाच्या मुल्यालाच प्रतिसाद देत असतो.”

“किती रे मोठ्या विद्वान अनुभवी माणसासरखा बोलतोस.मला हे तुझं बोलणं ऐकून एक विचार सुचतो”
असं म्हणत मी त्याला पुढे म्हणालो,
“एकदा मला असं वाटतं की दुसर्‍याशी संबंध ठेवायला जेव्हा आपण मागेपुढे करतो तेव्हा त्याचं मुख्य कारण कदाचीत दुसर्‍याने जर का आपल्याला अव्हेरलं तर आपण मूर्ख भासले जावू ह्या भितीपोटी असावं.पण मला कधी कधी असंही वाटतं की आपण सर्वांशी स्नेहशील राहाण्याची संधी मिळण्याची वाट पहात असतो कारण आपल्याला वाटत असतं की त्यामुळे आपला चांगुलपणा दिसून येईल.”
आपल्या भावंडांची आठवण काढून उमेश मला म्हणाला,
”कुणाला आवडणार नाहीत असं त्यांच्याच मनात येऊन ते कष्टी झाल्याचे मी माझ्या दोन्ही भावंडाना कधीही पाहिलं नाही.काही तरी आनंदाचं घडेल अशी मनोवृत्ती ठेवून ते वागतात.आणि त्यांचा हा यत्न क्वचीतच असफल झालेला मी पाहिला आहे.

जे लोक त्यांच्याशी बोलूं इच्छीत नसण्याच्या प्रयत्नात असावेत अशा लोकांकडून दयाळुपणाची परतफेड व्हावी पण ती परतफेड उपहास होण्यात किंवा अस्विकरण होण्यात येणारी जोखिम न घेता व्हावी अशा प्रयत्नात माझी भावंडं असायची.आणि ती सुद्धा अशा माणूसकी असलेल्या जगात जिथे दयाळुपणाच्या लेन-देनबद्दलच्या उपयुक्ततेला जोर दिला जात नसायचा.तसं पाहिलंत तर लोक पण प्रतिसाद द्यायचे.एखादी अनोळखी व्यक्ती त्यांच्या मैत्रीत असा्वी असं समजणं हे योग्य आहे असं त्यांना नेहमीच वाटतं.”

मी उमेशला म्हणालो,
”मला वाटतं स्वतःला वाटणार्‍या वास्तविकतेबद्दल निर्धारक रहाणं आणि निष्कर्षाला येणं ही एक प्रकिया आहे.अशी प्रकिया की रोजच्या रोज तिचा बोध होण्यासाठी आपली धडपड असते,कधी कधी ही प्रक्रिया दाह दायी असते,कधी कधी ही प्रक्रिया एकमेकाशी संबन्धीत असताना कसं सहानुभूतिपूर्वक असावं हे शिकवून जाते.
अवतीभवती असलेल्या एव्हड्या क्लेषदायी लोकांच्या गराड्यात,आणि ह्या कोलाहल असलेल्या जगात दयाशिलतेला आणि स्नेहभावाला महत्व असणं अस्थायी नाही. खरं तर आजुबाजुच्या लोकांपासून दूर रहाणं म्हणजे आपण नुकसानीत जाणं असं म्हणावं लागेल.”

आपल्या भावंडांची आठवण येऊन उमेश डोळ्यात पाणी आणून म्हणाला,
“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम असण्याचा संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे, उघडपणे आणि निडर होऊन..”

“तुमच्या आईवडीलांचे चांगले संस्कार तुम्हा भावंडावर झाले आहेत हे उघडच आहे”
असं म्हणून मी उमेशला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटली.







श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 18, 2009

मला निस्तब्धता का आवडते.

“माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.”

माझ्या अनुभवानुसार मला गोव्याचे लोक बरेचसे देवभोळे वाटतात.इकडे असलेल्या चर्चाच्या आणि मंदिरांच्या संख्येवरून त्याची कल्पना येते.
मग किरीस्तांव लोकांची निरनीराळी चर्च असोत,किंवा हिंदू लोकांची देवळं असोत. वर्षभरात बरेच उत्सव असतात.देवांच्या मंदिराबरोबर देवींची पण बरीच मंदिरं आहेत. किरीस्तांवांचा नाताळ हा मोठा सण.शिवाय लहान मोठे उत्सव असतातच. मुंबईत वांद्र्याला जसा मथमाऊलीचा उत्सव असतो तसा इथे गोव्यालापण मेरीचा उत्सव असतो.
गणपतीच्या,दत्ताच्या,शंकराच्या,पुर्वसाच्या मंदिराबरोबर शांतादुर्गाच्या, मंगेशी, म्हाळसादेवीच्या मंदिरापर्यंत अनेक मंदिराना भेट द्यायला अनेक लोक उत्सुक्त असतात.
मी गोव्याला आल्यावर ह्या सर्व मंदिराना भेट दिल्याशिवाय रहात नाही.त्या शिवाय मी चर्चाना पण भेट देतो.विशेषकरून खेडेगावातली चर्चं खूपच शांत वातावरणात भासतात.

ह्यावेळी माझा एक मित्र गिरीश बोरकर ह्याला भेटायला त्याच्या घरी खूप दिवसानी गेलो होतो. पेडण्याजवळ एका छोट्या खेड्यात तो रहात आहे.पूर्वी पेडण्याहून ह्या खेड्यात पायी चालत जावं लागायचं. पण आता रस्ते झाल्याने रिक्षेने पण जाता येतं.एकदा ह्या गावात पोहोचल्यावर गजबजाट,गोंगाट म्हणजे काय असतो ते विसरायला होतं.पायवाटेवरून चालत जाताना पायाखालची सुकलेली पानं चिरडली गेल्यामुळे होणारा आवाज पण कधी कधी गोंगाट वाटावा एव्ह्डी शांतता इथे भासते.
गिरीशच्या घरी दोन दिवस राहिल्यानंतर ह्या शांततेविषयी बोलल्याशिवाय मला रहावलं नाही. मी गिरीशला गप्पा मारताना म्हणालो,
“इकडची शांताता बघून माझी खात्री झाली आहे की इकडचे लोक बहिरे नक्कीच नसणार.कारण शहरात राहून गोंगाट कानावर पडून बरेच लोक काही प्रमाणात बहिरे झाल्याचं माझ्या एका कान-नाक-गळा स्पेशालीस्ट डॉक्टर मित्राने मला आंकडेवारी देऊन दाखवलं आहे.
त्यामुळे तू इथे रहातोस,म्हणून सुखी आहेस.कारण त्या गोंगाटातून सुटलास बाबा!”

गिरीशला माझ्या बोलण्याचा अर्थ कळला.पण त्याच्या डोक्यात काही निराळाच विचार आला असावा.मी म्हणतो त्या शांततेच्या पलिकडे जाऊन त्याला काही तरी सांगायचं मनात आलं.
मला म्हणाला,
“मला निस्तब्धता आवडते.
याचा अर्थ जिथे मुळीच कसलाच आवाज नाही ती निस्तब्धता नव्हे.
ती निस्तब्धता की जी मला माझ्या आजुबाजूच्या जगावर लक्ष न ठेवता मी माझ्या आतल्या आवाजाकडे जास्त ध्यान देऊ शकतो.”
मी ह्यावर त्याला म्हणालो,
“तुझं काय?,तुझा इथे पूरा जन्मच गेला आहे.त्यामुळे तुझ्या ह्याबाबतीत अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.मी तुला त्याबद्दल दोष देत नाही.शहरातलेआम्ही इथल्या ह्या शांततेच तृप्त असणार.”

गिरीश अगदी मनापासून हंसला आणि म्हणाला,
“मी अगदी लहान असताना माझी खेळायची जागा म्हणजे आमच्या गणपतीच्या मंदिराचं बाहेरचं पटांगण. रस्त्याच्या पलीकडे आमच्या गावातली मोठी शाळा होती. त्या गणपती मंदिरात माझे वडिल पुजारी होते.आणि आम्ही देवळाच्या आवारातच रहात होतो.
मला अजून आठवतं माझी लहानशी तिनचाकी सायकल होती.आणि मी मंदिराच्या पटांगणाबाहेर जाणार्‍या डांबरी रस्त्यावर चालवीत असायचो.तेव्हारस्त्यावर गाड्यांची तेवढी वरदळ नसायची.
माझी लपायची जागा मला अजून आठवते.गणपतीच्या गाभार्‍याच्या मागे एक लहानशी अडगळीची खोली होती. त्या खोलीवर एक माळा होता.कोळयाची जाळी आणि सरपटणार्‍या पाली शिवाय त्यावर काहीच नसायचं. माळ्यावर एक छोटीशी खिडकी होती.खिडकीला नक्षीकाम केलेले लाकडाचे लहानसेच गज होते.सकाळीच सूर्योदयानंतर कोवळी किरणं त्यातून आत यायची त्यावेळीच काय तो प्रकाश यायचा.कोळ्याची जाळी चमकूनदिसायची. मी ह्या खोलीत एकांतात बसून असायचो. त्या खोलीतली ती थंड निस्तब्धता मला अजून आठवते.त्या खोलीत बसल्यावर जीवन जगत आहे असं वाटायचं.”

मी म्हणालो,
“माझ्या अनुभवानुसार आपलं जग अगदी कर्णकटू झालं आहे असं मला वाटतं.हे जग पूर्ण गोंगाटाने भरलं आहे.समाजातून येणारा गोंगाट आहे, गाड्यांचा, बस्सीचा, टीव्हीचा,लाऊड स्पिकर्सचा,इकडे तिकडे खेळणार्‍या लहान मुलांचा,धर्माच्या नावाखाली केलेल्या आरडा-ओरडीचा मग त्यात तो मशीदीतून असेल किंवा मंदिरातून येणारा घंटानादाचा असेल.मी जिथे वाढलो त्या वातावरणातल्या समाजातून येणारा हा गोंगाट मला एकवेळी मी जीवन कसं जगायचं ह्याचा आदेश द्यायचा. त्यानेच नियम निर्माण केले होते.ह्या समाजाच्या ताबेदार लोकांच्या आवाजात मी वाढलो होतो.म्हणून इकडे आल्यावर इथल्या शांततेचं महत्व चांगलंच माझ्या लक्षात आलं.तुझी गोष्ट मात्र निराळी आहे.पण ह्या निस्तब्धतेबद्दल तू जे काय म्हणतोस ते तुझ्याकडून ऐकावं असं वाटतं.”

“मला आठवतं त्यावेळी मी पंचवीसएक वर्षाचा असेन.माझे बाबा म्रुत्युपंथाला लागले होते.त्या दिवसात मला त्या अडगळीच्या खोलीतल्या निस्तब्धते मधली क्षमता पुन्हा लक्षात आली.मी त्यांच्या बिछान्याजवळ बसून अगणीत रात्री काढल्या होत्या.त्यांच्या तोंडून येणारा आवाज निर्मळ होता,.मला जीवनात खंबीर राहायला त्यांनी शिकवलं,लहान मोठा गोंगाट कसा ओळखायचा ते दाखवलं त्यामुळे त्याकडे कसं दुर्लक्ष करायचा ते त्यांच्याकडून शिकलो.त्यांच्या मृत्युमुळे गोंगाट हा प्रकारच माझ्यापासून दूर केला गेला.आणि असा परिसर निर्माण झाला की निस्तब्धता फुलली आणि फोफावली.”
एव्हडं सांगून झाल्यावर गिरीश जरा गंभिर होऊन मला म्हणाला,
“माझ्यावर तुझा विश्वास बसणार नाही.कदाचीत तू मला हे ऐकून मनात हंसशील.
माझ्या वडलांची गैरहजेरी मला खूप जाणवायला लागली.आणि त्या निस्तब्धतेत- कदाचीत मी पाच वयाच्या असल्यानंतर पहिल्याच वेळी- मी माझा आतला आवाज ऐकला. माझी मुल्यं काय असावीत ते त्या आतल्या आवाजाने मला सांगितलं. माझ्या कमतरता दाखवून माझं अंगातलं बळ त्या आतल्या आवाजाने प्रज्वलीत केलं.मी कोण आहे ते माझ्या आतल्या आवाजाने मला दाखवून दिलं.मी जीवन कसं जगायचं ह्याची स्पष्ट कल्पना दिली.त्या निस्तब्धतेत मी माझा खरा आवाज ओळखू शकलो.आणि असं झाल्यावर गोंगाट हा प्रकारच नाहिसा झाला.”
गिरीशच्या मनातलं हे चिंतन ऐकून मला कुठेतरी वाचल्याचं आठवलं.
मी त्याला म्हणालो,
“मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं,आपल्या प्रत्येकाच्या देहात एक “व्यक्ती” असावी. त्या व्यक्तीचा आतला आवाज ऐकण्याची प्रत्येकाला जरूरी भासत असावी.हा विश्वातला गोंगाट मनुष्याची हत्या करीत आहे.मनुष्याच्या आतल्या आवाजाची दमछाक करीत आहे.आणि मानवतेच्या सामर्थ्याला सीमित करीत आहे.ज्या विपत्ति विरुद्ध मनुष्य प्रयास करीत आहे त्या प्रयासाला हा गोंगाट अविरत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.”
“अगदी माझ्या मनातलं तू सांगितलंस.”
असं म्हणून गिरीश सांगू लागला,
“माझ्या बाबांच्या मृत्युनंतर कित्येक वर्षं रोज मी ह्या,निस्तब्धतेकडे ध्यान देण्याच्या प्रयत्नात असतो.
आमच्या घराच्या मागे माडा-पोफळीच्या बनात मी माझ्या मुलीचा हात हातात घेऊन फेरफकटा मारीत असताना ही निस्तब्धता मला गवसते.माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.माझं जीवन त्यानी कसं सुधारलं ते मी तिला सांगतो.
तू जर इथे कायम राहायला आलास तर ही निस्तब्धता काय आहे ते तुलाही कळेल.”
मी गिरीशला एव्हडंच म्हणालो,
“शहरातल्या गोंगाटापेक्षा इकडची शांतता मला नक्कीच आवडेल.”



श्रीकृष्ण सामंत.

Monday, November 16, 2009

हा तर आहे तराना प्रीतिचा

(अनुवादीत. एक प्यार का नगमा है…..)



खरंतर प्रत्येकाचं जीवन हे एक कथाच असते.सागरातून येणार्‍या लाटेसारखा जीवन एक प्रवाह असतो.दोन पळ जीवनातून थोडं आयुष्य चोरी केल्यासारखं असतं.येणं आणि नंतर जाणं हा जीवनाचा आशय असतो.



हा तर आहे तराना प्रीतिचा
अन प्रवाह चंचल लहरीचा
काय म्हणू मी जीवनाला
आलेख तर हा अपुल्या कथेचा

मिळवूनी हरवते हरवूनी मिळते
जीवनाचा आशय येण जाणे असते
दोन पळ जीवनाची एक चोरी वाटते
नेत्रात सिंधु वसते आशेचे पाणी दिसते

तू प्रवाह नदीचा मी तुझा किनारा
सहारा तू माझा अन मी तुझा सहारा
नेत्रात सिंधु वसते आशेचे पाणी दिसते
दोन पळ जीवनाची तर एक चोरी वाटते

तूफान येईल आणि येऊन ही जाईल
मेघ येईल क्षणभर आच्छादून जाईल
सांवट येऊन जाते निशाणी कायम रहाते
दोन पळ जीवनाची तर एक चोरी वाटते

जो देई मनाला दिलासा तो आयुध हाती घेई
प्राण जाण्यापूर्वी तो आक्रंद करीत राही
खुशीची अभिलाषा रहाते अश्रूंची धार वाहते
सांवट येऊन जाते निशानी कायम रहाते





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 14, 2009

जर,तर,पण,परंतु.

“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”

आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी म्हणालो,
भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं.
ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं आहे?.आशावाद्याची बाजू घेतल्यास, “काहीही होणं शक्य आहे” ह्या म्हणण्याला चिकटून रहावं लागणार.”

“तुमचं म्हणणं “काहीही होणं शक्य आहे” ह्याबद्दल विचार केल्यास, एक दिवस समजा असं समजून घेतलं की,उंदीर पण अकाशात उडू शकतो. तर तसं आशावादी रहायला हरकत नाही.ते तुमच्या दृष्टीने ठीक आहे.कारण विकासाच्या किंवा उन्नतिच्या तत्वानुसार हे ही कधी तरी शक्य आहे.ते तत्व तुमच्या विचाराशी सहमत आहे.”
एव्हडं म्हणून भाऊसाहेब आवंढा गिळत पुढे म्हणाले,
“परंतु,समजा जर का जगातल्या सर्व संशोधकानी समज करून घेतली असती की काही गोष्टी अशक्य आहेत तर मात्र हे विश्व आपण हरवून बसलो असतो.आणि मनुष्याची प्रगती कधीच झाली नसती. माझं हे शक्यतेबद्दलचं तत्व, कुणीसं म्हटलंय त्यातून अभिव्यक्त होतं.

“ऐक कुणी म्हणे हे अनिवार्य आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे करू नये
ऐक कुणी म्हणे हे अशक्य,असंभव आहे. बाळा!
अन कुणी म्हणे हे होणे नलगे
ऐकशील का माझं बाळा!
काही ही अघडीत नाही
घडणे क्रमप्राप्त आहे.
क्रमप्राप्त आहे. बाळा!”

हे ऐकून मी म्हणालो,
“मनुष्याला कल्पनाशक्ती असते.हे त्याला मिळालेलं उत्तम साधन आहे.
त्यामुळे जीवनातल्या वास्तविकतेतल्या परिसीमेचं हे साधन उन्मूलन करून टाकतं. ह्या कल्पनाशक्तीच्या स्वप्नलोकात संभावनेला पुरेपुर अस्तित्व असतं. आणि तिथे संदेह लुप्त झालेला असतो. ही जादूनगरी सोडली तर मात्र वास्तविकतेची सीमा ह्या स्वप्नलोकात शिरकाव करते आणि ती सीमा स्वप्न-भरारीला अवरोध करते. तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो भाऊसाहेब?”

माझ्या प्रश्नाला उत्तर देताना विचार करून प्रो.देसाई म्हणाले,
“मला वाटतं वास्तविकतेला उगाच किंमत दिली जाते.जर सर्व गोष्टी प्रतिभाशाली व्यक्तीना सीमित असत्या तर e=mc2 हे आपल्याला कधी कळलंच नसतं.स्वतःचे उद्देश साध्य करताना दुसर्‍याच्या परिसीमा पाहून चालत नाही.स्वतःवर स्वतःचा विश्वास हवा. परिसीमा मिथ्या आहेत.आभाळ पण अनंत असतं.”

“म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की ग्लास अर्ध भरलेलं असत्तं?”
मी त्यांना उलट पश्न केला.

“नव्हे,नव्हे,माझ्या ह्या विचारवरून कुणाला वाटेल की माझी समजूत आहे की ग्लास अर्ध भरलेलं आहे.खरं तर प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात.मस्तक असतं तिथे शेपूट असतं,”इन फॉर यान्ग” असं चीनी भाषेत म्हणतात तसं.”
असं उत्तर त्यांनी मला दिलं.

“मग भाऊसाहेब,मला असं वाटतं काही ही शक्य आहे.आणि ते होण्यासाठी एखाद्याने आपले सर्व परिश्रम सर्व काळ वापरलायला हवेत.ढिलाईला वाव नसावा. अवसर घेऊन चालणार नाही.माझं हे म्हणणं कुणाला भयभीत केल्यासारखं दिसेल. पण माझं भाकित आहे की सरतेशेवटी परिश्रम आणि मिळणारं फळ यात संतुलन होत असतंच.” मी म्हणालो.

“मला वाटतं,आपल्या करणीचं आपल्याकडेच उत्तरदायित्व असावं, आणि दोषारोपण करणं म्हणजे आपल्याच अयोग्यतेचं लटकं कारण दाखवणं.”
असं म्हणून झाल्यावर प्रो.देसायानी एक छान उदाहरण दिलं.
ते म्हणाले,
“माझं ग्लासाबद्दलचं उदाहरण हे वयक्तिक दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
मुंगी होऊन मी जर ह्या बदनाम ग्लासाजवळून जाताना वर दृष्टीकरून पाहिलं तर मला ग्लास अर्ध भरलेलं दिसणार.पण मी जर का एखादा तहानेलेला दैत्य होऊन वरून ग्लासाकडे पाहिल्यास नक्कीच ग्लास अर्ध रिकामं दिसणार.”

ह्या विषयावर आणखी बोलण्यासारखं काही राहिलं नाही हे माझ्या लक्षात येताच मी समारोप करताना प्रो.देसायांना म्हणालो,
“ह्या प्रश्नाला माझ्या कडून उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 12, 2009

अज्ञात असण्यातली क्षमता.

“एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”

मी आमच्या बिल्डींग मधून खाली उतरत जात होतो.आणि अरूण-आमचा शेजारी-वर येत होता.मी घाईत असल्याने त्याच्याशी फक्त हंसलो.का कुणास ठाऊक दोन पायर्‍या वर जाऊन मागे वळून अरूण मला म्हणाला,
“काका,तुमचं काम झाल्यावर घरी परत येताना माझ्या घरी या.मी तुम्हाला गरम गरम कॉफी करून ठेवतो.तुमच्याशी काही चर्चा करायची आज मला हूक्की आली आहे.”
इतकं काय माझ्याशी हा बोलणार आहे असा मी विचार करीत खाली उतरताना त्याला म्हणालो,
“माझं बॅन्केत काम आहे.अर्धा तास लागेल.त्यानंतर मी येतो.”
“नक्की वाट बघतो”
असं म्हणून अरूण वर गेला.

मी त्याच्या घरी गेल्यावर माझ्या हातात कॉफीचा कप देत अरूण मला म्हणाला,
“तुम्ही मघाशी माझ्याशी नुसते हंसला,त्या हंसण्याने मला माझ्या जुन्या आठवणी भरकन डोक्यात आल्या.तेव्हा तुम्हाला लागलीच सांगून टाकलं की आपण चर्चा करूंया”

विषयाची प्रस्तावना करीत अरूण सांगू लागला,
“जे मला माहित नाही,म्हणजेच जे मला ज्ञात नाही त्याच्या क्षमतेवर माझा दृढविश्वास आहे.
माझं उभं जीवन मी प्रकाशाच्या वेगाच्या उपयोगतेबद्दल ज्ञात न रहाता काढलं आहे. माझ्या विज्ञानाच्या प्राध्यापकाने त्याशिवाय आणखी काही शिकवलं असेलही त्याच्या उपयोगतेशिवाय मी जगलो आहे.
अर्थात त्यांच्या वर्गात मला मिळत गेलेले गुण हीच त्यांनी शिकवलेलं मला ज्ञात नसल्याची स्पष्ट साक्ष आहे.
ज्या गोष्टी मनुष्याला तत्वतः अज्ञात असतात त्या गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.”

हे ऐकून मी अरूणला म्हणालो,
“अशा अनेक मोठ्या अज्ञात गोष्टी आहेत जशा,
ईश्वराचं अस्तित्व असणं किंवा नसणं,
मनुष्याच्या अस्तित्वाची अर्थ न समजणं,
जीवनात दुःखाची भुमिका काय?,
असल्या गोष्टीबद्दल तुला काही तरी म्हणायचं आहे काय?”
असा मी सरळ प्रश्न अरूणला केला.

“नाही मुळीच नाही.अगदी लहान लहान अज्ञात गोष्टीबद्दल मी म्हणत आहे.
एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.”
असं म्हणाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग हे आजच का तुला आठवलं.? आणि ते सुद्धा आत्ताच?”

“त्याचं काय झालं,”
अरूण सांगू लागला,
“मघाशी जिन्यात तुम्ही माझ्याशी फक्त हंसला.त्याने मला एक जूनी आठवण आली.
एकदा सकाळी भाजी बाजारात गेलो असताना भाजी विकणार्‍या बाईशी मी हंसलो आणि तीपण माझ्याकडे बघून हंसली. त्या हंसण्याचा तिच्यावर दिवसाच्या शेवटी काय परिणाम झाला हे मला माहित नाही.मला आशा होती काही तरी व्हावं.मला आशा होती की ते आमचं हंसणं तिने दुसर्‍या गिर्‍हाईकाला पारित केलं असावं, पासऑन केलं असावं.आणि कदाचीत त्याने ते एखाद्या वयस्कर माणसाला रस्ता ओलांडून जाण्यात मदत करणार्‍या तिसर्‍याला, ती मदत करताना पाहून त्याच्याशी हंसून पारित केलं असावं. आणि बिल्डींगचा जिना वर चढून जाताना त्या वयस्कर माणसाने आपल्या शेजार्‍याला पाहून त्याच्याशी हंसून सांगितलं असावं,
” ये कधी तरी कॉफी प्यायला.”
आणि नंतर कधीतरी कॉफीच्या कपावर जीवनातल्या सुखदुःखावर त्यांचं बोलणंही झालं असावं.हंसण्याच्या दूरवरच्या परिणामा विषयी मी त्यावेळी एव्हडा ज्ञात नव्हतो.”

मी म्हणालो,
“अरूण, तुझ्या कल्पना-शक्तीची ही उंच भरारी असावी काय?की कदाचीत तुला शक्तिशाली होण्याची तीव्र अभिलाषा तर नसावी?.मला काहीच कळत नाही.की कदाचीत ज्ञात नसल्याच्या क्षमतेतलं हे रहस्य तर नसावं.तुझ्या अंगात जी काही दयाशीलता आहे ती नकळत पारित करण्याची हळहळ तर नसेल ना?”

अरूण म्हणाला,
“हे असं व्हायला मला बराच काळ घालवावा लागला.ज्ञात नसलेल्या गोष्टीतली क्षमता कळायला मला बरीच वर्ष घालवावी लागली.तत्पुर्वी आरामातलं आयुष्य घालवणं,रोज जेवणाची थाळी माझ्या पुढ्यात येणं,कधी ही कसल्याही गोष्टीपासून वंचीत न होणं,खरोखरचं उपाशी न रहाणं,किंवा कधीही कष्टप्रद न होणं.अशी माझी परिस्थिती होती.

जसं वय होत गेलं तसं जीवन मला कळलं.हे असं सर्वांना होत असावं.मित्र दुरावले जावे,कुटूंबात हानी व्हावी,मला आणि माझ्या प्रियजनाना कठीण प्रसंग यावेत आणि जावेत.
प्रौढ वयात असताना सर्वसाधारण माणूस भोगतो तसे आनंदाचे आणि विपत्तीचे दिवस मी भोगले आहेत.आणि त्यानंतरच ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेचा मी विचार करू लागलो.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे,मला मुल झालं.ह्या जगात मुलाला जन्म देण्याने जीवनात सर्व तर्‍हेचा बदलाव आणला जातो. हे प्रत्येक पालकाला माहितआहे.
परंतु,ज्यावर मी अंतःकरणापासून आणि परिपूर्ण प्रेम करतो त्याच्यासाठी आशावादी राहून आणि प्रयत्न करून कसं झालं तरी माझ्या मुलासाठी हे जग अधिकांश चांगलं ठेवताना ह्या ज्ञात नसण्यात असलेल्या क्षमतेने माझे डोळे उघडले.”

मी म्हणालो,
“ज्ञात नसणं हे काही इतकं महत्वाचं नाही.ज्ञात नसतानाही अगदी अल्पशी दयाशिलता पारित करण्यात,अगदी छोटीशी खूशी पारित करण्यात त्याच्यात असलेल्या क्षमतेचं अस्तित्व पाहून मला गंमत वाटते.”
“अगदी बरोबर”
अरूण एकदम खूश होऊन म्हणाला,
“म्हणूनच मी तुमच्याशी लगेचच चर्चा करायचं ठरवलं.
आता मला असं वाटायला लागलं आहे की,आशा ठेवण्यात असलेली जादू आणि त्याचं रहस्य,आणि जी आशा मला पूर्ण ज्ञात नसतानाही ती बाळगण्यात मी नेहमी प्रवृत्त असल्याने हे जीवन आज तरी थोडसं चांगलं वाटायला लागलं आहे.”

कॉफीचा रिकामा कप त्याच्या हातात देत मी हंसत हंसत अरूणला म्हणालो,
“हरएक दिवशी एक गोड स्मित,एक दयेचा शब्द,एक हात हलवून केलेला प्रेमाचा इशारा त्यात भर घालत असतो.आणि ह्या लहानश्या गोष्टीचे परिणाम ज्ञात नसतानाही तुझ्या नकळत हे जग तुझ्यासाठी सुंदर करण्यात तू कारणीभूत होत आहेस.”

अरूणचा चेहरा प्रफुल्लीत व्हायला मी एक अज्ञात गोष्ट करण्यात कारणीभूत झालो हे त्याला कळायला वेळ लागला नाही.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 10, 2009

आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो

“सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”



सुरेशची आणि माझी फार जूनी दोस्ती आहे.अलिकडे तो निवृत्त होऊन ठाण्या जवळच्या एका खेड्यात रहायला गेला आहे.मी मात्र मुंबईलाच चिकटून आहे.मला तो आपला पत्ता देऊन गेला होता.ह्या आठवड्यात मला तसा विरंगुळा होता,म्हणून त्याला भेटायला त्याच्याकडे जायचं ठरवलं.त्याला फोन करून कळवलं.तो मला न्यायला बसस्टॅन्डवर आला होता.संध्याकाळी बाहेर अंगणात ज्यावेळी आम्ही गप्पा करायला बसलो त्यावेळी असाच काही तरी विषय निघाला.

“अलीकडे सूर्य लौकर मावळतो.त्यामुळे अंधार लवकर पडतो.”असं मी सुरेशला म्हणालो.

“अगदी ज्यावेळी मनुष्य आंकडे मोजायला शिकला अगदी त्यावेळे पासून पृथ्वीवरच्या सर्वांना शिकवलं जात होतं की दिवस २४ तासाचा असतो.हे काही खरं नाही.प्रत्येक दिवस २३.९३४ तासाचा असतो आणि दिवसाचे २४ तास धरल्याने जो जास्त वेळ धरला जातो तो लिप इयरमधे जुळवला जातो.आणि म्हणून फेब्रुवारीचा एक दिवस-म्हणजेच २४ तास फरक केला जातो.”
मला सुरेश माहिती देत होता.

“मला माहित आहे की मी चवथी पाचवीत असताने हे शिकलो होतो.”
असं म्हणून, सुरेशलाच आणखी माहिती द्यावी म्हणून मी त्याला पुढे सांगितलं.
“आपल्याला सांगितलं जातं प्रत्येक १२ तासात-अर्थात दीड तासाचा जास्त कमीचा फेरफार धरून- सूर्य उगवतो आणि मावळतो.हे पण जरा स्तोम आहे.सूर्य कधीच वर किंवा खाली जात नाही.पृथ्वीच्या गरगर फिरण्याने हा भ्रम निर्माण होतो.अगदी सेकंदाच्या अंशाच्या भागामधे सूर्य कुठे तरी ह्या पृथ्वीवर उगवत असतो किंवा मावळत असतो.”

“हो अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.रात्रीच्या काळोखात मी बसलो असताना मला शांत बसून विचार येतो की कुठेतरी पृथ्वीच्या पाठीवर काही लोक स्वच्छ सूर्यप्रकाशात असतील तर मी इकडे झोप येण्याच्या प्रतिक्षीत असतो.आणि हे पाहून मी थोडा उद्विग्नही होतो.”
सुरेश अगदी वैतागून सांगत होता.
आणि पुढे म्हणाला,
“मी ज्या खेड्यात सध्या राहत आहे ते आत्ता काळ्या पडद्याखाली पहूडलं जाणार आहे तर ह्याच वेळी चीनमधे लोक खेळात कुदत आहेत. अमेरिकेतल्या कुठल्यातरी शहरात गाडीच्या अपघातात एखादी कमनशिबी स्त्री मृत्यु पावली आहे तर तिचा आत्मा दुसर्‍या कुणाच्या शरिरात शिरून कुणाला तरी जन्माला आणीत आहे.मला फार पूर्वी ऐकल्याचं आठवतं की वाईट गोष्ट होत असताना सरतेशेवटी त्यातून चांगली गोष्ट बाहेर येते.”

सुरेश असले विचार सांगण्यात पहिल्यापासून वाकबगार होता.त्याचाअसल्या तत्वज्ञानावर दृढविश्वास होता.
आपल्या म्हणण्याला दुजारा देण्यासाठी सुरेश मला म्हणाला,
“तू मला हंसशील,पण खरं सांगू माझा ह्यावर पूर्ण विश्वास आहे.वानगी दाखल तुला सांगतो,
माझी आई सांगायची की ती लहान असताना तिचा एक काका लांबलेल्या आजाराने निर्वतला.तिला त्यावेळी खूपच वाईट वाटलं होतं.
पण त्यातून एक चांगलं झालं की तिची कॉलेज शिक्षण घेण्याची जी प्रबळ इच्छा होती ती पूरी झाली.तिच्या काकाने तिच्या नावावर पैसे ठेवले होते ते त्यांच्या मृत्यु नंतर तिला मिळाले.आणि तिचे काका गेले नसते तर आईला शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्या नोकरीवर काम मिळालं तिथे माझ्या बाबांची भेट झाली नसती.मी पण शिक्षणासाठी मुंबईत आलो नसतो आणि आता ह्या खेड्यात निवृत्तीत दिवस घालवू शकलो नसतो.”
सुरेशची विचारसरणी अगदीच काही चुकीची नव्हती.
मी म्हणालो,
“मला माहित आहे की आपल्या कुटूंबात ही स्थित्यंतरं झाली नसती तर आपलं जीवन आता आहे तसं झालं नसतं.सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”

बाहेर खूपच काळोख झाला होता.लहान लहान मुर्कुटं अंगाला चावत होती.सुरेशच मला म्हणाला,
“चल आपण आत घरात जाऊया.पण हा माझा विचार संपवण्यासाठी जाता जाता मी तुला एक सांगतो.
अगदी शेवटची गोष्ट मी आठवणीत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो ती ही की दिवसाच्या २३.९३४ तासाच्या प्रत्येक मिनीटाच्या प्रत्येक सेकंदाला सूर्य मावळत असतो आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.”
घरात येता येता मी माझ्याच मनात म्हणालो,
“चला आज मस्त जेऊन झोपूया.उद्या आपल्यासाठी सूर्य नक्कीच उगवणार आहे.”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 8, 2009

“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.

“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.”



वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे.
मी वासंतीला म्हणालो,
“तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.”
“अगदी बरोबर” वासंती म्हणाली.
“मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत आहे.आजीकडून शिकण्याचे आता आमचे दिवस संपले.कारण आता ती अगदीच थकली आहे.त्या मानाने माझी पणजी सुदृढ आहे.माझ्या आजीला मनोभ्रम झाला आहे.मनोभ्रम ही अशी व्याधी आहे की अशा रोग्याशी संबंध ठेवताना डोळ्यातून पाणी येतं.”

मी वासंतीला म्हणालो,
“कोकणात ह्या रोगाला “बाळं लागलं ” असं म्हणतात.ह्या रोगाचा अगदी परिपूर्ण अर्थ त्यात आहे.तरूणपण वगळल्यास बाळपण आणि म्हातारपण एकमेकाला पुरक आहेत.शारिरीक तुलना तर अगदीच सारखी आहे.दोन्ही वेळी कुणाचा तरी त्यांना आधार लागतो. अन्नपाण्याच्या गरजा पण तशाच सीमित असतात.”

“आणखी किती साम्य सांगावं.एकाचा मेंदु अपरिपक्व असतो तर दुसर्‍याचा अपरिपक्व होतो.एकूण परिणाम एकच.”
असं म्हणून वासंती खूप उदास झाली.
आणि पुढे म्हणाली,
“लहान बाळाबद्दल निदान आपल्याला माहित असतं की हळू हळू त्याला विचार शक्ति येत रहाणार.पण आजीच्या वयात तिचे विचार ऐकून खूप दुःख होतं.अगदी लहान बाळाला समजूत घालावी तशी तिला समजूत घालावी लागते.”
“केव्हा पासून हे तुझ्या आजीला असं व्हायला लागलं?”
मी वासंतीला विचारलं.

“मला वाटतं मी त्यावेळी पंचवीसएक वर्षाची होते.माझ्या आजीला मनोभ्रंश झाला होता.तिला आम्ही एका सुश्रुषा आश्रमात ठेवलं होतं.आम्ही आळीपाळीने जाऊन तिची दखल घ्यायचो.कधी कधी आम्ही तिला घरून जेवण घेऊन जायचो.तिला आवडणारे पदार्थ आश्रमात मिळतीलच असं नव्हतं.घरी ते पदार्थ केल्यावर तिला वगळून खायला आम्हाला जीवावरच यायचं.असे बरेच दिवस होऊन गेले.
तुम्हाला एकदाची गंमत सांगते,
एकदा दुपारचं जेवण देऊन ती जेवत असताना मी तिच्याच सोबत रहाणार्‍या दुसर्‍या एका आजीशी हंसले.तिचं प्रफुल्लित आणि मोहक हंसू चमकून दिसलं तिला पण माझ्या आजी सारखाच व्याधी होता.
मी त्या आजीला विचारलं की तिला तिथे रहायला आवडतं का?.
आणि ती म्हणाली,
“हो,मला राणीच्या बागेत रहायला आवडतं.ही फारच सुंदर जागा आहे.”
नंतर त्या आजीनेच मला प्रश्न केले,
“माझं लग्न झालं आहे का?”
“मला किती मुलं आहेत?”
“माझ्याकडे पाळीव मांजर आहे का?”
“मी कधी कॉलेजला गेली का?”
“मी ताजमहाल पाहिला का?”
ह्या सर्व प्रश्नाना मी,
”नाही”
असंच उत्तर दिलं.
नंतर मला तिने जो प्रश्न विचारला तो जास्त अर्थ धरून होता.
“मी अजून उडी मारू शकते का?” असं तिने मला विचारलं.
मी उत्तरले,
“अर्थात मी उडी मारू शकते”
“मग अशीच उडी मारीत रहा.कारण एक दिवस तू ते करू शकणार नाहीस.”
असं तिने मला उत्तर दिलं.

तो त्या आजीचा पोरकट प्रश्न मला बरंच काही सांगून गेला.कारण त्या प्रश्नात शारिरीक उडी मारण्या व्यतिरिक्त गंभीर अर्थ होता.
उडी मारण्याच्या प्रश्नाशी जी संदिग्धता होती ती जीवन,ताकद,धैर्य, लवचिकता, स्वप्न, प्रेम,आरोग्य,आशा,भविष्य आणि स्वतंत्रतेशी संबंधीत होती असावी.उडी ह्या शब्दाचा संकेतार्थ शारिरीक आणि मानसिक आरोग्याशी वैधता ठेवून होता.”

मी वासंतीला म्हणालो,
“आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे आणि मला वाटतं आपल्या उड्या आपण चालू ठेवायला हव्यात.विज्ञानात दाखवलं जातं की जे कुणी व्यायाम घेतात आणि दीर्घायुष्यी असतात त्यांना मनोभ्रम होण्याची शक्यता कमी असते.व्यायामामूळे “इंडॉर्फीन” नावाचा जो द्रव निर्माण होतो तो आपल्याला संतुष्ट ठेवीत असतो.आता हे झालं शारिरीक उड्याबद्दल.
आनंदी प्रवृती ठेवल्याने सकारात्मक दृष्टीकोन राहतो.आणि असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने भविष्य उज्वल होतं. ह्या विश्वात जर का कुणी सकारात्मक कार्य-शक्ती ठेवील तर त्याची प्रतीफळं परिपूर्ण मिळतील.
एकूण काय,कसल्याही उड्यांशिवाय जीवन निराशजनक दिसतं.”
माझं हे विश्लेषण ऐकून वासंतीने त्याचा संदर्भ आपल्या आजीशी लावला.

ती म्हणाली,
”माझी आजी भौतिक-भोगी होती.तिच्याजवळ किंमतीचे दागिने, कपडे,आणि अवधानं होती.कुठीचीच गोष्ट ती त्याज्य करीत नव्हती. तिच्या जवळ शेकडो लोकरीच्या लड्या होत्या,काचेची बरीच तोरणं होती,चांदीच्या फोटो फ्रेम्स होत्या,हे सर्व विकत घेतलेल्याच्या पावत्या होत्या.आणि हे सर्व धूळ खात पडलेलं होतं. आजीने कधी उड्या मारण्याचा प्रयत्नच केला नसावा. बैठक मारून ह्या वस्तु-संग्रहाचं ती कौतूक करण्यात घालवायची.आणि आता मात्र तिला अशा उड्या मारायला बराच उशिर झाला होता.”

प्रत्येकाच्या लाईफ-स्टाईलबद्दल मी प्रथम म्हणालो होतो त्याचा संदर्भ देऊन वासंती म्हणाली,
“माझी पणजीचं मात्र तसं नव्हतं.तिने मोठा दुर्दैवी समझोता आपल्या आयुष्याशी केला होता.तिच्या लहान वयातच माझे पणजोबा निर्वतले. तिला एक अधू मुलगा होता.पण ती आयुष्यात सकारात्मक राहिली. वेळ आल्यास धोका पत्करला.आणि उड्या ही घेतल्या. परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तिला तसं करावं लागलं. चांगल्या परिस्थितीसाठी तिने येणार्‍या संधीला उडी मारून आत्मसाथ केलं.आणि आता ९७ वर्षावर तिची बुद्धि इतरांपेक्षाही तल्लख आहे.त्यावेळी तिने डोळे मिटून उड्या मारल्या आणि आता डोळे उघडे ठेवूनही आशेने भरभरून उड्या मारते.”

“तुझी पणजी अप्रत्यक्षपणे काय सांगते माहित आहे काय?”
असा प्रश्न करून तिच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता मीच म्हणालो,
ती म्हणते,
“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी,रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन, विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.परत सुरवात करताना ही उड्या मारा.उड्या हे तारूण्याचं गौप्य आहे.उडी जीवनाची सुधा आहे,आणि भावी आयुष्याची आशा आहे. मला वाटतं आपण सर्वानी उड्या मारीत असावं मग त्या शारिरीक असो किंवा मानसिक असो.”
वासंतीला हे ऐकून खूपच बरं वाटलं.तिचा चेहराच सांगत होता.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 6, 2009

आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

(अनुवाद. आज तुमसे दूर हो कर…)

मला वाटतं माणूस हताश परिस्थितीत निर्जीव गोष्टीना सजीव समजून त्यांची स्वतःशी न्यायसंगत सिद्ध करायला प्रवृत्त होतो.
देव,दैवावर दुषणे टाकतो.
गायक मुकेशने हे गाणं छान गायलं आहे.



जशी झालीस तू दूर दूर माझ्यापासून
तशीच रडली प्रीत माझी मुसमुसून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

काही तुझे प्रतिबंध काही माझ्या सीमा
वैरी झाले जर दैव कुणा काय आहे तमा
देवा,कुणा काय आहे तमा
ह्या दैवावर अधिकार कुणी का बसले घेऊन
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून

अभिलाषा विलग ठेवी सौख्य ठेवी दूर
जीवित रहाण्या इतुकेच जीवन करी मजबूर
देवा,जीवन करी मजबूर
मुष्किल झाले प्रतीक्षेमुळे जीवन देण्या सोडून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 4, 2009

तांब्याचा पैसा.

“आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही.कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.”

आज बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर आले होते.त्यांना मध्यंतरी बरं नव्हतं. त्यांची गैरहजेरी मला जाणवायची.प्रि.वैद्य मधून मधून तळ्यावर भेटल्यावर त्यांची जागा ते भरून काढायचे.
मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“बरेच दिवस माझ्या मनात राहून गेलं होतं,आणि तुम्हाला तुमचं त्याबद्दलचं मत विचारायचं राहिलं होतं, ते म्हणजे नशिब अजमावण्याच्या माणसाच्या निरनीरळ्या तर्‍हांबद्दल.

आपण इकडे नेहमीच पाहतो जेव्हा लोक पार्कमधे येतात किंवा काही रम्य ठिकाणी फिरायला जातात,तेव्हा त्यांना जर का कुठे पाण्याच्या फवार्‍याचं कुंड दिसलं तर ते खिशातलं नाणं काढून-बहुदा तांब्याचं नाणं-मनात काही बडबडून त्या कुंडात टाकतात. का तर म्हणे,नशिब जागृत होतं.तुम्ही असं कधी आयुष्यात केलं आहे का भाऊसाहेब?”

प्रो.देसाई थोडे मिष्कील हंसून मला म्हणाले,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळतो त्यवेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.असा तांब्याचा पैसा दिसला तर मी तो कुठनही उचलतो. त्याच्यावर चिखल असला,त्याच्यावर कसला चिकट पदार्थ टाकलेला असला किंवा त्याच्यावर रात्री दारू पिऊन कुणीतरी टाकलेल्या बाटलीतल्या सांडलेल्या दारूचा वास असला तरी मला चालतो.मला त्याबद्दल काहीही वाटत नाही.मी त्यात कुणाची चोरी करतो असं समजत नाही. शिवाय मी स्वतः खेदजनक होऊनही तो पैसा उचलत नाही उलटपक्षी मी स्वतःला असं करण्यात धीट समजतो.”

“म्हणजे याचा अर्थ पूर्वी तुम्ही असं करीत नव्हता.कदाचीत त्यावेळी तुमचा त्यावर विश्वास नव्हता असं मी समजूं का?”
असा मी त्यांना प्रश्न केला.

“तसं म्हटलंत तरी चालेल.” प्रो.देसाई सांगू लागले.
“मी लहान असताना असं काही करीत नव्हतो.ज्यावेळी मी वीस वर्षाचा तरूण होतो त्यावेळी नक्कीच नाही.त्यावेळी मी ऐटबाज सूट चढवून दक्षिण मुंबईतल्या फोर्ट विभागात मोठया दिमाखाने रस्त्यावरून जाताना इतक्या खालच्या पातळीवर येऊन आणि ते सुद्धा इतकं खाली वाकून एखादा पैसा दिसला म्हणून उचलायचं लांछन मुळीच करीत नव्हतो. तेव्हा मला दुनिया मोत्याच्या तोलाची वाटायची.
एका तांब्याच्या पैशाची कुणाला त्या वयात कदर असावी.?ज्या वयात अवतीभोवतीची हवाच अशी असायची की तिच्यात कला आणि प्रसिद्धीचे मनसूबे, नशिब उजाडल्याचे झरोके,आणि मदमस्त सुगंधाने भरभरून आसमंतात फैलावलेली कुंद हवेची दरवळ यायची.”

मी म्हणालो,
“म्हणजे तरूणपणात असल्या गोष्टी करणं हास्यास्पद दिसतं असंच तुम्हाला म्हणायचं आहे असं वाटतं.”
“अगदी बरोबर,मला पुढे तेच सांगायचं होतं.
कुणी सर्वकाळ तरूण राहत नाही.अर्थात तरूण असताना कुणी हास्यास्पद आणि मामूली गोष्टी करतोच म्हणा जशा,चतुर्भुज होणं,मुलं होणं,उपनगरात एखादा फ्लॅट घेणं वगैरे.
एके काळी कुणीतरी तरूण वयात भडकदार कुंचल्याने रेखाटलेलं जसं एखादं रेखाचित्र दिसावं तसं दिसणारं ते तुमचे व्यक्तिचित्र नंतर हळूहळू तुम्ही जूळवून जळवून शिवलेल्या रंगीबेरंगी गोधडी सारखं दिसणारं, कुठे भडक रंगाचं तर कुठे विरलेल्या कपड्याचं जणू चित्रसंग्रह असलेलं तुमचं व्यक्तिचित्र दिसायला लागतं.”
भाऊसाहेबांनी आपल्या खुमासदार शैलीत वर्णन करून सांगितलं.

“म्हणजे उघड उघड तुम्हाला म्हणायचं आहे की वय होता होता व्यक्तिचित्रं बदललं की एखादा आपला दृढनिश्चयही बदलतो की काय?”
मी भाऊसाहेबांकडून जास्त स्पष्टीकरण मिळण्यासाठी त्यांना प्रश्न केला.
मला म्हणाले,
“जीवनातल्या एका टप्प्यात आकाशात पहाण्यासाठी तुम्ही तुमचं शीर उंचावता आणि तारे पाहून त्याकडे बोट दाखवून तुमच्या चिल्लापिल्लाना सुधारलेला माणूस बनवण्याच्या प्रयत्नात असता.
आणि तुम्हाला आवडो वा न आवडो तुमच्या त्या वयात तुमचा काही वेळ तुम्ही खाली जमिनीकडे पहाण्यात पण घालवता.आणि गंमत् म्हणजे ह्या ह्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटत नाहीत.

कुणी सांडलेलं दुध,कुणाची वांती,नेल पॉलीश,डोक्यातल्या पिना,फाटलेलं एखादं वर्तमानपत्र वगैरे वगैरे.”

“त्याचा अर्थ ह्या वयातही तांब्याचं नाणं तुमच्या नजरेतून सुटतं.किंवा दिसलं तरी ते उचलून घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही नसतां.असं मी समजूं का?”
असा सरळ सरळ प्रश्न मी केला.

थोडासा विचार केल्यासारखं करून देसाई म्हणाले,
“ही पण आयुष्यातली पायरी चढून गेल्यानंतर हळू हळू तुमच्या विचारसरणीत फरक पडतो.
सरते शेवटी जेव्हा तुमचं शरिरच अंथरूणातून उठायला मज्जाव करतं.तुम्ही तरूण किंवा वयस्कर नोकर ठेवण्याच्या प्रयत्नात असता. पटत नाही म्हणून तुमचा जूना डॉक्टर बदलता,ज्योतिषाकडेही जाऊन येता आणि एकदिवशी काही कारण नसताना सकाळी उठून बाहेर रस्त्यावर येता.

रस्त्यावरून चालताना पाला पाचोळा आणि त्यावर पडलेला कचरा दिसत असतो. आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही. कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.

त्यानंतर मात्र तुम्हाला विचारांची गणना करण्यासारखं विशेष काही नसतं.एखाद दिवशी तुम्ही मोठ्या उत्साहाने अंथरूणातून उठता,एखाद दिवस तुमचा पाळलेला पपी ओरडून ओरडून बाहेर नेण्याचा इशारा करतो.
अजूनही तुम्ही आकाशाकडे बघून मदतीची आकांक्षा ठेवता,आणि खाली जमिनीकडेही बारकाईने बघून जीवनात,आशा,आणि प्रेमाच्या अपेक्षेत असता. अपेक्षीत असलेल्या घटनांचक्राबद्दल सांत्वन करून घेण्याच्या मनस्थितीबद्दल तुम्ही शिकत असता,तसंच, अनपेक्षीत ठिकाणी गेल्याने त्यातून मिळणार्‍या आनंदाशीही उत्सुक्त असता. मिळेल तेव्हडं नशिब उजळून यावं ह्याची तुम्हाला जरूरी भासते. आणि म्हणून एखादा तांब्याचा पैसा दिसला की तुम्ही तो उचलता.तुमच्या खिशात ठेवता.आणि मनात एखादी प्रार्थनाही करता. म्हणून मी तुम्हाला सुरवातीला म्हणालो की,
“अलिकडे अलिकडे ज्यावेळी मला तांब्याचा पैसा मिळातो त्यावेळी मी माझं तकदीर चांगलं आहे असं समजतो.”
उठतां,उठतां मी प्रो.देसायाना म्हणालो,
“आज वेळ खूप मजेत गेला.भाऊसाहेब आपण बरेच दिवसानी तळ्यावर फिरायला आला.पण पहिल्याच दिवशी आपल्याकडून “तांब्याच्या पैशाबद्दल” माझी शंका दूर केलीत.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 2, 2009

केला मी तर प्रारंभ पिण्या

(अनुवाद. मैने पिना सिख लिया….)

माझा मित्र वसंत फार पुर्वी पासून पितोय.वहिनीचं खूप प्रेशर आलं की मग काही दिवस प्यायचं सोडून देतो.आणि त्याचं हे असंच चालंय.परत कधीतरी प्यायला सुरवात करतो.बिचारी वहिनी मात्र ही त्याची संवय पाहून हिरमुसली होते.मला तिची किंव येते.त्या पलिकडे मी तरी काय करणार?अलीकडे त्याला कंटाळून वहिनी माहेरी जाऊन राहिली आहे.
योगायोग म्हणजे काल,
”मैने पिना सिख लिया…”
हे गाणं मी रेडियोवर ऐकलं.ताबडतोब त्याचा अनुवाद करून वसंताकडे गेलो.त्याला ही कविता वाचून दाखवली.आणि म्हणालो,
“तुम्हा लोकांचं हे असं चालतं.आणि दोष मात्र दुसर्‍याला देता.”

“शुद्धीवर नसल्यावर हे लोक खरं तेच सांगतात”
असं मी कुठेतरी वाचलं होतं.
कविता ऐकून झाल्यावर वसंता फक्त हंसला.मी समजायचं ते समजलो.



पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

लाखो मधली एक छबी
नयनी माझ्या येऊनी बसली
एक कळी जशी सहज फुलली
भ्रमराला ती कशी घाबरली

फुलले एक फुल प्रीतिचे
मिळाले सूर एक गीताचे
दैव आणीते रंग नवे
सूर सुटता गीत सरे

मध्य भोवरा तूच सोडीला
मम प्रीतिचा अनुबंध तोडीला
प्रेमावरी कुणी प्रहार केला
देवा,देवा
कठीण झाले आम्हा जगायला

मदिरे कडूनी साथ मिळवूनी
शिकलो आम्ही तुजविण जगण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

म्हणती इतर का पितोस बरे
म्हणते मन का जगतोस बरे
जगण्यात नसे मला अभिलाषा
मरण्यात दिसेना एकही दिशा

जीवन झाले व्यथा इथे
सांग तयाला उपाय कुठे
प्रीत आठवूनी पिणे धरीले
शुद्ध हरपूनी दुखणे कसले

लक्ष आमुचे आम्ही शो्धिले
दैव आम्हावरी का बरे रुसले
सजणी मजला गेली सोडूनी
हृदय तुटले ठोकर खाऊनी

अशाच नशेच्या ह्या धाग्याने
शिकलो आता हृदय शिवण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com