Thursday, March 31, 2011

वाचन ज्ञानेंद्रियाद्वारे.



“इतक्या वर्षानी आता सुद्धा पुस्तकाचा वास मला विशिष्ट आनंदाचा प्रत्यय आणून देतो.”

बरेच दिवसानी रमेश माझ्या घरी आला होता.कॉलनीत आजुबाजूच्या परिसरात काय काय सुधारणा होत राहिल्या आहेत ह्याची चर्चा होत असताना मला रमेशने एक चांगली बातमी सांगीतली.
मला म्हणाला,
“कॉर्नरवरच्या नव्या बिल्डिंगमधे दुसर्‍या मजल्यावर एक नवीन लाइब्रेरी येणार आहे.त्याचं पुढल्या रविवारी उद्घाटन आहे.”
रमेशला वाचनाचं लहानपणापासून खूपच वेड आहे.त्याच्या घरात एक खोली तर पुस्तकानी भरून गेलेली आहे.नवीन दिसलेलं आणि त्यात स्वारस्य असलेलं पुस्तक दिसलं तर तो लागलीच विकत घेतो.आणि वेळ मिळेल तसा वाचूनही टाकतो.रमेश कुठेही दिसला तरी त्याच्या हातात एखादं पुस्तक असतंच.
लाइब्रेरीच्या उद्घाटना दिवशी आम्ही त्याठिकाणी गेलो होतो.तिथल्यातिथे वाचनासाठी ऐसपैस जागा होती.सर्व रॅक्स नीट रांगेत लावल्या होत्या.आईलमधे भरपूर जागा होती.निरनीराळ्या विषयावर पुस्तकं होती.हे सर्व बघून रमेश खूपच खूश दिसला.
मला म्हणाला,
“माझी सोय झाली.”

घरी आल्यावर आमची पुस्तकाच्या वाचनाविषयी चर्चा झाली मला रमेश म्हणाला,
“पुस्तकाच्या वासाबद्दल मला विशेष वाटतं.एखाद्या पुस्तकाची स्वच्छ,करकरीत पानं,त्यावर येत असलेला शाईचा वास,किंवा एखादा,वाचावा वाचावा वाटणारा,बाहेरून आकर्षक दिसणारा जिज्ञासा वाढवणारा,भरपूर ज्ञान देणारा जूना गौरव ग्रंथ ज्याची पानं वाचून वाचून पिवळट झालेली आहेत,अश्या पुस्तकाचा वास मला आवडतो.”
मला हे रमेशचं जगावेगळं पुस्तकाच्या वासाबद्दलचं सांगणं ऐकून गंमत वाटली.

मी म्हणालो,
“तू सतत पुस्तकं वाचत असल्याने तुझ्या डोक्यात हा पुस्तकाचा वास भरलेला दिसतोय.मी असा विचार करतोय ह्याचं कारण कोकणात आंब्याचे दिवस आले की प्रत्येकाच्या घरात आंब्याची “आडी” घातलेली असते.सुरवातीला आंबे कच्चे असतात.आंबे पिकायला लागले की “आडीतून” घमघमाट यायला सुरवात होते.लाइब्रेरीत गेल्यावर तुला असाच पुस्तकाचा घमघमाट येतो की काय?”

माझं हे ऐकून रमेश हसला.
मला म्हणाला,
“त्याला एक इतिहास आहे.त्यासाठी माझ्या लहानपणी तुम्हाला घेऊन जावं लागेल.
पुस्तकाच्या वासाबद्दल तोपर्यंत विचार केला नव्हता.जेव्हा लहानपणी मी माझ्या एका मित्राबरोबर एका लायब्ररीत काही पुस्तकं वाचायला घरी न्यावीत म्हणून बरीच पुस्तक चाळत बसलो होतो.वाचण्यासारखी बरीचशी पुस्तकं जवळच्या टेबलावर ठेवून माझा मित्र ज्या आईलमधे गेला होता तिकडे जाऊन कुतूहलाने मी त्याच्याकडे पहात होतो.

माझ्या मित्राला इतिहास हा विषय जास्त आवडत असल्याने त्या पुस्तकाच्या सेक्शनमधे तो पुस्तकं चाळत बसला होता.त्याने सुद्धा बरीचशी वाचायला आवडणारी पुस्तकं बाजूला करून माझ्याच टेबलावर जमाकरून ठेवली होती.तो प्रत्येक पूस्तक बाहेरून न्याहाळून झाल्यावर नंतर पहिलं पान उघडून त्यातली समरी वाचून आवडल्यास ते पुस्तक निवडत होता.पुस्तकाचा ढिग करून झाल्यावर मी आणि तो टेबलाजवळ येऊन बसलो होतो.मी त्याच्याकडे लक्ष देऊन पहात होतो.प्रत्येक पुस्तक मधेच उघडून तो ते त्याच्या नाकाकडे नेऊन दीर्घ श्वास घेतल्यावर त्याचा वास घेत होता.
नंतर संध्याकाळी आम्ही दोघे घरी आणलेल्या पुस्तकातून वाचायला कुठचं पुस्तक प्रथम घ्यावं ह्याचा विचार करीत बसलो असताना मला माझ्या मित्राला विचारल्याशिवाय रहावलं नाही.
कधी कधी वाचायला पुस्तकं चाळत असताना,मी त्या पुस्तकाचं डिझाईन,अक्षरांचा आकार आणि पुस्तकाचं कव्हर ह्या बाबत थोडा चोखंदळ असतो.पण पुस्तकाचा वास? त्याचा वास कसा येतो ह्याबद्दल कुणाला पर्वा असावी?
मी म्हणालो,
“तू प्रत्येक पुस्तकाचा वास का घेत होतास?”
तो मला म्हणाला,
“पुस्तक हे एखाद्या ग्लासातल्या वाईन सारखं असतं.पाचही इन्दीय-शक्तीचा वापर करण्याची त्यात प्रक्रिया असते.वाईनने भरलेलं ग्लास नाकाजवळ आणल्यावर येणारा तो कोरडा सुगंध, दिसणारा बरगंडी रंग,फेसातून येणारा कूरकूरा आवाज,थंडगार स्पर्श,जीभेवरून अलगद, टाळ्यापर्यंत जाताना लागणारी चव कशी वाटते,अगदी तसंच.”
पण त्याने मला एक मात्र निक्षून सांगीतलं की पुस्तकाची चव मात्र त्याने कधीही घेतलेली नाही.

एक एक पुस्तक घेऊन त्याने मला तसं करायला सांगीतलं.
मी डोळे मिटून घेतले आणि प्रत्येक पुस्तक उचलून दीर्घ श्वास घेऊन पाहिला.माझ्या जे लक्षात आलं त्याने माझी कुतूहलता वाढली.
प्रथम एका पुस्तकाला उघड उघड जुनकट वास आला.एका पुस्तकाला ताज्या हवेचा वास आला. आणि एकाला एखाद्या खर्चीक पेपराचा वास आला.प्रत्येक पुस्तकाला निरनीराळा वास असला तरी,त्यात लिहिलेलं ज्ञान समजून घेण्यासाठी माझी आतुरता वाढत होती.काहीतरी नवीन ज्ञान मिळेल याची आठवण येऊन भावना उद्दीत्प झाल्या होत्या,स्वच्छ हवेचा झरोका येऊन गेला होता. वाचनाची प्रचंड आतुरता असलेल्या मला पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे जाणारा दरवाजा होता.आणि तो त्या पुस्तकाचा वास त्या मार्गातला एक भाग होता.”

हे सर्व ऐकून मी रमेशला विचारलं,
“अजूनही तू तेच करीत असतोस काय?”
“हो मला ते केल्याशिवाय रहावंत नाही.”
असं सांगून रमेश म्हणाला,
“इतक्या वर्षानी आता सुद्धा पुस्तकाचा वास मला विशिष्ट आनंदाचा प्रत्यय आणून देतो.प्रत्येक वेळी मी वाचलेल्या पुस्तकाचा पुढचा चॅप्टर वाचायला बसलो,एखाद्या बूकडेपोमधून नवीन पुस्तक विकत घ्यायला गेलो,किंवा एखाद्या लाइब्रेरीतून पुस्तक आणायला गेलो की त्या साध्याच पण महत्वाच्या प्रबोधनाची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

आताशा मी पुस्तकाचं नुसतं बाहेरचं कव्हर आणि त्याचं डिझाईन बघत नाही,पानांचा गुळगूळीत स्पर्श घेत नाही,शाईचा वास घेत नाही,पानावरून पोहत जाणार्‍या शब्दांचं बोलणं ऐकत नाही, तर माझ्या नाकात आता पानापानावरचा ज्ञानाचा सुगंध पण शिरल्याशिवाय रहात नाही.”
मला हा रमेशचा ज्ञानेंद्रिया द्वारे वाचन करण्याचा प्रकार ऐकून खूपच गंमत वाटली.

मी त्याला शेवटी म्हणालो,
“तुझं हे सर्व ऐकल्यावर मला जो विचार सुचला तो तुला सांगतो.
पुस्तक नुसतं त्यात लिहिलेल्या आतल्या ज्ञानाची वाचकाबरोबर भागीदारी करीत नाही तर पुस्तक त्या वाचकांना वाचनाच्या प्रवासात असताना त्यांच्या ज्ञानेंद्रियातूनही मार्ग दाखवतं.खरं ना?”

चेहरा अगदी खुलवून मला रमेश म्हणाला,
“वा! ज्ञानेश्वरांना गीता एका वाक्यात कळली असं म्हणतात तसंच काहीसं तुम्ही माझा अनुभव एका वाक्यात मलाच सांगीतला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 28, 2011

पावसा़चा खेळ आणि पावसातला खेळ.

“मला पावसात खेळायला आवडतं,नाचायला आवडतं.” इति सुनंदा.

मी सुनंदाच्या घरी तिला भेटायला गेलो होतो.बाहेर खूप पाऊस पडत होता.
“अशावेळी गरम गरम भजी आणि मस्त गरम चहा घ्यायला मजा येते.”
मी सुनंदाला माझ्या मनातलं भीडभाड न ठेवता सांगीतलं.
ती उठून आत जायला लागली असं पाहून मी म्हणालो,
“अगं,मी तुझी गंमत केली.”

मला अडवीत म्हणाली.
“हाततिच्च्या,त्यात काय विशेष.मी आत्ता तयारीला लागते.”
असं म्हणत,
“तोपर्यंत हा पेपर चाळा”
असं म्हणून पेपर माझ्या हातात देत देत सुनंदा चहा ठेवायला आत गेली.

“मला पावसात खेळायला आवडतं,नाचायला आवडतं.”
असं तिच्याच हस्ताक्षरातलं,एक वाक्य एका कोर्‍या कागदावर लिहिलेलं पेपराच्या आतल्या घडीत राहून गेलेलं मी वाचलं.
ती बाहेर आल्यावर मी सुनंदाला विचारलं,
“काय पावसावर काही आठवणी लिहिते आहेस की काय?”

“तुम्हाला कसं कळलं?” इति सुनंदा.
“ह्या कागदावर मी वाचलं.”
तिचाच कागद तिला दाखवत मी म्हणालो.

“बाहेर पाऊस पडत होता.लहानपणीच्या आठवणी येऊ लागल्या काहीतरी खरडावं म्हणून सुरवात केली होती. तेव्हड्यात तुमची बेल वाजली.”
मला सुनंदा म्हणाली.
“अरेरे,माझ्यामुळे तुझ्या विचारात खंड आला.सुचलेले विचार लिहित असताना लिंक तुटली की मग तेच वि़चार येतील असं सांगता येत नाही.निदान माझं तर असं होतं.”
मी तिला म्हणालो.

“तुम्हाला कोकणातला पाऊस आवडतो तुम्ही मला खूपदा सांगीतलं आहे.तुमच्याशी पावसावर बोलून मला आणखी विचार सुचतील हे निश्चित.आपण दोघं बोलतोच आहो तर तुमचा अनुभव सांगा.तरच गरम भजी मिळतील.”
सुनंदाने अट घातली.

बरं बुवा!”
असं म्हणून मी सुनंदाला सांगायला लागलो,
“मला कोकणातला पाऊस आवडतो असं मी बरेचदा म्हटलं आहे.ज्यानी त्या पावसाचा अनुभव घेतला आहे त्यांना माझं म्हणणं नक्कीच पटणार.
कोकणातल्या पावसाच्या किती अवस्था असतील म्हणून सांगू.

आपल्या आगमनाची चुणूक देणारा पाऊस,
मे महिन्यातला खूप उकाडा सहन करून लोक आकाशाकाकडे पाहून हवालदिल होतात होतात तोच अचानक वळवाचे वारे वाहून,कोकणातल्या तांबड्या मातीला (आता तांबडी माती औषधालाही मिळणार नाही) सर्व आसमंतात भिरकावून देऊन,
“मी येतोय”
असा संकेत देणारा पाऊस थोडासा पडून जातो.आणि नंतर तो कुठे दडी मारून बसतो कोण जाणे?
कोकणातल्या शेतकर्‍याला माहित असतं की तो वळवाचा पाऊस आहे. खरा पाऊस अजून सुरू व्हायचा आहे.आता शेतीच्या कामाला सुरवात करायला हवी असं शेतकरी मनात म्हणतो.
कदाचीत
“मी येत आहे”
शेतकर्‍यालाच तो पाऊस असं सांगून जात असावा.

हल्ली तर पाऊस गेला असं समजून, शेतीचं ज्ञान नसलेले आमच्या सारखे,पाऊस केव्हा चालू होणार असा विचार करीत,
“ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम!”
असं अनमान काढून आपलं समाधान करून घेत असतात.
मी म्हणतो त्या पूर्वीच्या दिवसात कॅलेंडर उघडून पाहिलं गेलं असतं तर,सात जून यायला किती दिवस आहेत ते मोजून पहावेत. अगदी सात जूनला पाऊस नक्कीच कोसळायचा.

आलोच म्हणून सांगणारा पाऊस,
सहा जूनच्या रात्री,किंवा सात जूनच्या पुर्‍या दिवसात कधीतरी,गार,गार हवा वाहायला लागली की समजावं,
आकाशाकडे मान वर करून पाहिल्यावर, सूर्यनारायणाचं दर्शन होत नसेल तर समजावं,
काळ्याकूट्ट ढगांची, समुद्राकडून येत असल्याची, रीघ दिसली की ती पाहून समजावं,
आणि अचानक,
“कडाड-कुडूंब”
होऊन वीजा चमकायला लागल्या की नक्की खात्रीने समजावं,
“मी आलो”
म्हणून माळरानापासून ते नांगरलेल्या शेतीच्या कुणग्यापर्यंत,समुद्राच्या चौपाटीपासून ते डोंगरावरच्या उंचच उंच झाडापर्यंत बोंब मारत येणारा पर्जन्य,
“मी आलोच “
म्हणून सांगत आहे.
“इलो रे! इलो आतां बघूंक नको”
असं कोकणी माणूस मनात काही न ठेवता जगाला ओरडून सांगतो.
“कोण इलो,केव्हा इलो”
हे ज्याला त्याला माहित असतं.

इतक्या वर्षाचा कोकणी माणसाचा अनुभव आहे तो जाणार कुठे?
पावसाला सुरवात होणार आहे ह्या कल्पनेने आनंदाने तूडूंब भरून गेलेलं त्याचं काळीज त्याला गप्प बसू देत नाही.
मंगळोरी कौलांची आणि नळ्यांच्या कौलांची घरावरची छप्परं,मे महिन्यातच “छप्पर साफसफाई आणि परतवणी” झाल्याने, तयारीत असल्याने वरून कोसळणार्‍या पावसाचं पाणी पावळ्यातून जमीनीवर सोडून द्यायला उत्सुक्त असतात.पन्हळी दुथडी भरून वाहत असतात. तांबड्या मातीचं तांबडं पाणी रस्त्याच्या कडेने खोदलेल्या गटारातून भरून भरून वाहत असतं.
मुंबईच्या इराण्याच्या दुकानातला,
“दुध-कम (तांबडा) चाय और एक मस्का ब्रुन”
ऑर्डर करणारा मुंबईकर ह्या दिवसात कोकणात येत असायचा तेव्हा इराण्याच्या कपातला तांबडा चहा मनात आणून हेच म्हणत असावा की,
“इराण्याचं चहाचं दुकान फुटून गटारातून तांबडा चहाच वहात आहे”
पण आता हे दिवस राहिले नाहीत.कोकणात सगळीकडे डांबरी रस्ते झाल्याने,इराण्याची दुकानं जशी मुंबईत बंद झाली तसं पावसाचं तांबडं पाणी कोकणात बंद झालं.

“भट (पाऊस) हात पाय पसरी”
अश्या परिस्थितीला आलेला पाऊस,
जूनचा शेवटचा अर्धा महिना आणि सुरवातीचा जुलैचा अर्धा महिना पाऊस पडत नाही असा एकही दिवस जात नाही.काही वेळा अपवादाने होत असेल ते विरळं.
शेतकरी एकदम खूश असतो.पेरणी झालेली असते.मधेच कधी उघडीप यावी असं वाटत असतं. पण सूर्याचं दर्शन कमीच.भाताची रोपं डोकं वर काढून बघत असतात.कोकणी शेतकरी आनंदाने मश्गूल असतो.कुणग्यात पाणी तुंबायला सुरवात होते.भात शेतीला त्याचीच जरूरी असते.
जुलै ओसरत जात असताना पाऊस पण तसाच ओसरत जातो.निसर्गाचीच ती योजना असावी.

चिरी-चिरी पडत रहाणारा पाऊस,
ऑगस्टमधे मात्र पाऊस चिरी-चिरी पडत रहातो.शेती नकरणारा माणूस म्हणतो,
“खूप झालं आता जा बाबा”
असं म्हणवून घेणारा पाऊसही खरंच पुढे पुढे कमी होत जातो.
कोकणात ह्या अडीच-तीन महिन्याच्या पावसाने सगळं वातावरण कसं थंडगार झालेलं असतं. मुंबईकराच्या भाषेत,
“कूल,जस्ट लाईक एसी”

ऑगस्ट-सप्टेंबर येता येता कोकणात बाप्पाच्या येण्याच्या तयारीला लागलेला कोकणी माणूस समजून जातो.हे वर्षाराजे आता जाण्याच्या मार्गावर आहेत.
अधून मधून सरी पडत असतात.गणपतीबाप्पाना कधी कधी भिजत यावं लागतं.
आणि शेवटी कधी कधी बाप्पा जाण्यापूर्वी किंवा बाप्पाबरोबर तर कधी कधी बाप्पा गेल्यानंतर,
“चाललो,परत पुढच्यावर्षी नक्कीच”
असं सांगणारा पाऊस खरोखरच बरेच वेळा वीजा चमकवून गडगडाट करून,
“बरं चाललो”
म्हणून नोटीस देऊन जातो.
कोकणातल्या पावसाच्या अशा ढोबळ अवस्था दिसून यायच्या.
असं हे पूर्वी थोड्या फरकात इकडे तिकडे होऊन पाऊस यायचा आणि जायचा.
पावसाचे खेळ मी तुला सांगीतले.आता तू पावसातले खेळ काय ते सांग.”

असं मी म्हणाल्यावर सुनंदा म्हणाली,
“थांबा,मी सांगत असताना तुम्ही चहा आणि भजी खा”
असं म्हणून आत जाऊन दोन प्लेट भरून गरम भजी घेऊन आली.सुनंदाची बाई भजी तळत होती.

नंतर सुनंदा मला म्हणाली,
“मी माझ्या लहानपणी आमच्या घराच्या पडवीत झोपाळ्यावर बसून सहजसुंदरतेने पडणार्‍या पावसाकडे टक लावून पहात असायची.अशावेळी पावसात धावत जाऊन चपळतेने नृत्य करण्यार्‍या नर्तकीसारखं मोकळे हात करून चक्राकार नाचून,मधेच वरती आकाशाकडे पहात पर्जन्यवृष्टीची कमाल पाहून आनंदात डुबून जावं असं मला वाटायचं.
मी कसल्याही कामात गर्क झाले असले तरी माझ्यासाठी पाऊस योग्य वेळीच पडायचा.मला पावसात खेळायला आवडत असल्याने बहुदा पाऊस मी बाहेर असताना पडला तर बरं वाटायचं.

काही लोकाना पाऊस आकाशातून कोसळणं म्हणजे त्यांच्या मार्गात आलेली अडचण किंवा कटकट वाटत असते. त्यांच्या दृष्टीने तो पाऊस म्हणजे अयोग्य वेळी आलेली बला वाटत असते. आणि त्यांना काळे कभिन्न ढग आकाशात जमलेले पाहून धसकी वाटत असते.माझ्या जीवनात मी पावसाकडे पहाते ते त्या पावसामागे छपलेल्या ह्या धरतीच्या संबंधाने असलेला त्याचा मतलबाकडे.
पाऊस पडत असताना सर्व काही जादूमय वाटतं.स्वर्गातून पाऊस कोसळत असताना एखादं इंद्रधन्युष्य दिसल्यास मुलाना तसंच मोठ्यानासुद्धा विस्मयकारक वाटतं.
पावसात खेळणं हे थोडसं सांकेतिक वाटतं.आपल्या मनात आलेल्या भावना जशा- मर्मभेदी दुःख, एकाकीपणा, प्रेम,वेदना आणि स्वातंत्र्य.

कल्पना करा की तुम्ही एका फुलांच्या बगीच्यात आहात.हवेतला गारवा आणि त्यात असलेले थोडेसे तुषार तुम्हाला जाणवतात,बरोबरीनी तुमच्या चेहर्‍यावर त्यांचा शिडकावा होतो.एकदम थोडा पाऊस आल्यावर आकाशाकडे पहाता,तिथे उभे असताना सूर्य धुसर होऊन काळे ढग नजरेला दिसतात.

अशावेळी काय जाणवतं?कदाचीत मोकळं झाल्यासारखं वाटतं,कदाचीत निस्सहाय वाटतं.
दुसर्‍या सीनमधे समजा तुम्ही रात्रीची गाडी चालवत आहात,गाडीत एकटेच आहात आणि प्रचंड गडगडाट होऊन वीजा चमकायला लागतात.पावसाची लक्षणं उघड होतात.जमीन सरकत असल्याचं वाटून तुम्ही गाडी काळजीपूर्वक चालवता.वीजांचा झगमगाट वाढायला लागतो.हे असलं वातावरण डोळ्यासमोर दुःख-वेदना आणि भीती उभी करते.
ह्या उदाहरणावरून दिसून येतं की, पावसात गेल्याने भावना उज्वलित होतात किंवा पावसात खेळल्याने निराळंच वाटू लागतं.आनंदात डुबून गेल्या सारखं वाटतं.”
मला सुनंदाचे, तिच्या डोक्यातून आलेले, पावसात खेळण्याचे विचार ऐकून खूपच मजा आली.

तेव्हड्यात तिची बाई दोन कप गरम चहा घेऊन आली.
“आणखी भजी हवीत का?”
असं सुनंदाने विचारताच चहाचा कप ओठाला लावित हाताने नको म्हणून खूणवीत मी सुनंदाला म्हणालो,
कुणीतरी म्हटलंय,
“जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा मला एकटेपणाचं काहीच वाटत नाही.मी आकाशाबरोबर रडत असतो.”

पावसाचं आणि माणसाच्या भावनांचं नातं किती जुळलंय ते दिसतं.
पावसाने तुमच्या जीवनात जान आल्यासारखं वाटतं तसंच पावसाने ह्या विलक्षण जगातल्या त्रुटिंची वास्तवता दाखवली जाते.
हा पाऊस कुणाला समस्या निर्माण करील तर कुणाच्या समस्या सोडवील.कोणत्याही परिस्थितीत पाऊस माणसाचा आणि धरतीचा दुवा सांधतो.आणि हेच कारण तुला पावसात खेळायला आणि मला पावसाचे खेळ पहायला उद्युक्त करतं.
पुढच्या खेपेला येईन तेव्हा, तुझ्या त्या एक वाक्य लिहून झालेल्या उरलेल्या कोर्‍या कागदावर,तू पावसाबद्दल आणखी लिहिलेलं मला वाचायला आवडेल .”
असं म्हणून मी सुनंदाचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, March 25, 2011

आळसावलेला रविवार.

“रविवार हा दिवस पूर्‍या आठवड्याचा जमलेला गंज खरवडून काढणारा दिवस असतो”

प्रमिलेच्या वडीलांचा मला फोन आला होता,
“प्रमिला एक आठवड्यासाठी माझ्याकडे कोकणात येणार आहे.तिच्या बरोबर गो.नि.दांडेकरांची “शितू” ही कादंबरी वाचण्यासाठी पाठवून द्या.”

ह्या कादंबरीत गोनीदानी कोकणाचं नयनरम्य दृष्य डोळासमोर उभं केलेलं आहे.मी ही कादंबरी पूर्वीच वाचली होती आणि ती कादंबरी माझ्याजवळ आहे असं मी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना बोललो होतो ते आठवून मला त्यांनी असा निरोप दिला होता.

प्रमिला अलीकडेच एका सॉफ्ट्वेअर कंपनीत कामाला लागली होती.चर्चगेटच्या वुमेन्स-हास्टेलमधे ती रहायला होती.ती सोमवारी कोकणात जाणार असल्याने मला तिच्याकडे रविवारी जाणं भाग होतं.रविवारी ती नक्कीच घरी असणार असा विचार मनात आणून मी तिच्याकडे सकाळीच दहाच्या दरम्यान ती कादंबरी घेऊन गेलो होतो.

हास्टेलच्या तळमजल्यावर असलेल्या वेटिंग-रूममधे मी तिची वाट बघत बसलो होतो. रखवालदारला मी आल्याचा तिला निरोप द्यायला सांगीतलं.तिची रूम-मेट खाली येऊन मला म्हणाली,
“प्रमिला दुपारचे बारा,साडेबारा वाजल्याशिवाय उठेल असं वाटत नाही.तुम्ही दुपारी एकच्या दरम्यान या.ती उठल्यावर मी तिला तुम्ही आल्याचं सांगीन.”

इतक्या उशिरापर्यंत काहीना झोप कशी लागते असा मी मनात विचार करत बाहेर पडलो.मरीन-ड्राइव्हच्या चौपाटीवर एका बाकावर बसून समुद्राची हवा खावी असा विचार करून तिकडेच गेलो.
एकच्या दरम्यान परत आल्यावर मला पाहून रखवालदाराने प्रमिलेला फोन केला.तशीच ती लगबगीने खाली आली.

“सॉरी,सॉरी तुम्ही आज येणार ते मी विसरूनच गेले.तुमची तत्परता माहित असूनही माझ्याकडून असं का झालं ते मी तुम्हाला थोडा वेळ असेल तर सांगते”
असं म्हणून मला म्हणाली,
“रविवारचा पहाटेचा एक वाजला होता. हसून, हसून पोट दुखायला लागलं होतं.आणि मी अंग टेकावं म्हणून माझ्या बिछान्यावर येऊन लेटली. गाढ झोपी गेल्यानंतर केवळ दोन मिनीटांची झोप लागली असावी असं वाटता वाटता माझ्या खिडकीतून सूर्याची चमकदार किरणं माझ्या डोळ्यावर पडून मला जाग आली.मस्त झोप झाली असं मी माझ्या मनात म्हणत असताना वाटत होतं की,आणखी थोडावेळ झोपावं.
अहो आश्चर्य!.घड्याळात रविवारच्या दुपारचे साडेबारा वाजले होते.
महमूदचा पडोसन सिनेमा पाहून “आळसावलेल्या रविवारच्या” दुपारी मी उठले होते.हा रविवार मला अगदी आरामात काढायचा होता.एकदा का “आळसावलेला रविवार” नीट गेला की माझा पुढचा पुरा कामाचा आठवडा सुख-शांतीत जातो,असं मला वाटत असतं.आणि तुम्ही येणार ते विसरूनच गेले.”

मी प्रमिलेला म्हणालो,
“कोकणातलं मला माहित आहे.एरव्ही तुम्ही घरातले एकमेकाना न भेटणारे आपआपल्या कामात दंग असलेले असताना रविवारी मात्र पूर्ण आराम घ्यायचे.तुझे बाबा मला तुमच्या घरातलं रविवारचं महत्व अगदी चघळून चघळून सांगायचे.”

मला प्रमिला म्हणाली,
“मला माझं लहानपण आठवतं.आमच्या चार भावंडात मी मोठी.त्यामुळे नेहमीच समजलं जायचं की सगळी जबाबदारी माझीच असते.मला जबाबदारीचं पद दिलं तरी हरकत नसायची. पण मला कधीच अवसर मिळायचा नाही हे नक्कीच.
शाळेतले वर्ग चालू असताना शिकण्यात वेळ जायचाच,आणि मधल्यावेळात आमच्या वर्ग शिक्षीकेला मदत करण्यात,निबंधाच्या सर्व वह्यात बाईनी दिलेल्या मार्कांची बेरीज करण्यात, “आजचा सुविचार” फळ्यावर लिहिण्यात वेळ जायचाच त्याशिवाय आजीचा बिछाना सारखा कर,तिला काही वाचून दाखव हे नित्य-नियमात असायचं.

बर्‍याच जणाना घरी गेल्यावर “माझा वेळ” म्हणून असतो.पण माझ्या जीवनात तसं काहीच नसायचं.घरी आल्यावर माझा बराचसा वेळ भावंडांची देखभाल कर,घराची साफसफाई कर, आणि कधी कधी जेवण करायलाही हातभार लाव असं असायचं.आठवड्याच्या अखेरीला रेस मधला घोडा धावून आल्यावर जसा दमतो तसं माझं व्हायचं.

खरं तर आमच्या कुटूंबात सर्वांचं तेच व्हायचं.माझी भावंडंपण माझ्या सारखीच कामात व्यस्त असायची आणि माझे आईबाबा आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असायचे.त्यामुळे रविवार हा आमचा सर्वांचा विश्रांतीचा दिवस मानला जायचा.मग मी आणि माझे बाबा जुन्या फिल्म्स
आणून त्या बघायचो,आई आणि इतर भावंडं त्याना आवडेल तशी करमणूक करून घ्यायचे. जेवण मात्र जरा विशेष व्हायचं.एकत्र बसून आम्ही जेवायचो.अगदी अजून पर्यंत ती रुढी कायम आहे.”

आता शहरात आल्यानंतरही माझ्यासाठी काही विशेष फरक झाला नाही.रविवार म्हणजे आराम हे अजूनही माझ्या समजुतीत आहे.माझा मात्र रविवारचा दिवस इकडे जास्त करून बिछान्यात लोळण्यात जातो.टाप-टीपपणा असणं,नेसलेल्या कपड्यांबद्दल जागृती असणं, असल्या गोष्टींना फाटा देऊन कोण काय म्हणेल ह्याची परवा नकरण्याचा माझा शिरस्ता असतो. आठवतो तेव्हडा आमच्या लहानपणापासूनच्या रुढीचा पुरंपूरा मी फायदा घेत असते.”

“तू ज्या कपड्यात खाली मला भेटायला आलीस त्यावरून तुझा शिरस्ता लक्षात यायला मला वेळ लागला नाही.”
मी हसत हसत प्रमिलेला म्हणालो.

प्रमिलापण माझ्या बरोबर हसली.पण त्या शिरस्त्याची सफाई सांगताना मला म्हणाली,
“पूर्वी आमच्या घरी,रविवार म्हणजे कुटूंबातल्या सगळ्यांचं एकत्रीत येणं असायचं.हे असं आठवड्याच्या इतर दिवशी कधीच व्ह्यायचं नाही.आता मला शहरात आल्यापासून रविवार म्हणजे “माझा वेळ” असं समजण्यात रुपांतर झालं आहे.रविवारी जर का मला आराम करायला मिळाला नाही तर पुढच्या आठवड्याचा माझा व्यस्त कार्यक्रम माझ्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन माझ्यावर मात करील.

मी जर नुसती कल्पना केली की मी ह्या “आळसावलेल्या रविवार” शिवाय असेन तर, मला दिसून येईल की झोपेचं खोबरं झालेली,मनावर प्रचंड तणाव असलेली, चीडचीडी, करवातलेली मुलगी होईन.”

उठता उठता मी प्रमिलेला म्हणालो,
“कुणीतरी म्हटलंय,
“रविवार हा दिवस पूर्‍या आठवड्याचा जमलेला गंज खरवडून काढणारा दिवस असतो”
रविवारी दुपारी साडेबाराला उठण्याने डोळ्यावर चढलेला पापुद्रा दूर करायला तुला मदत होत असावी.”

“वरील उक्तिशी मी जास्त सहमत न होऊन कसं चालेल?”
असं म्हणून प्रमिलेने मी दिलेलं पुस्तक आपल्या जवळ घेऊन मला निरोप दिला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 22, 2011

तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून



  • अनुवाद

    जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामिल
    जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल

    हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा
    हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा
    काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी
    जीवन भासे यात्रा अन देवी तू मंदिरातील
    जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल

    हर एक फुल महकते आठव तुझी देऊन
    तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून
    हे तुळशी वृंदावन की प्रीतिचे ठिकाण
    तू जवळ अथवा दूर असूनी आहेस काबिल
    जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामिल

    हर एक शय्या झगमगे प्रीतिच्या किरणानी
    ही झगमग पाहूनी नको आशा अधूरी जीवनी
    जीवन यात्रेत असते सहयात्रीची जरूरी
    यात्रा एकाकी करील माझे जीवन मुष्कील
    जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com


Saturday, March 19, 2011

(कटकटीला) जाऊ देणे


संजयचं वय पस्तीसएक असेल.एका मल्टी-नॅशनल कंपनीत एका जबाबदारीच्या जागेवर तो काम करीत असतो.
मला त्या दिवशी म्हणाला,
“हे मल्टी-नॅशनल कंपनी प्रकरण माझा एकदा जीव घेणार आहे.पगार भरपूर देतात पण घाण्याच्या बैलासारखं काम करून घेतात.दिवस नाही,रात्र नाही,घर नाही दार नाही,सेल फोन कानावर आणि लॅपटॉप मांडीवर घेऊन बसावं लागतं.कधी कधी लॅपटॉपवर घरी काम करीत असताना माझा दोन वर्षाचा मुलगा माझ्या मांडीवर बसायला मागतो पण मला त्याची समजूत घालावी लागते.बिचारा नाराज होऊन गेल्यावर माझ्या काळजात कळ येते.”

मला संजयची खूपच कीव आली.
मी म्हणालो,
“तुझं म्हणणं मला एकदम पटतं.अशावेळे कुठेतरी दूर जाऊन काही दिवस रहावं असं वाटत असतं.”

“पण कुठे म्हणून जाणार?.जावं तिथे ही गर्दी.तेच वातावारण,त्याच कामाच्या चर्चा.”
अगदी वैतागून संजय मला म्हणाला.

“मला वाटतं जीवनात कटकटी जास्त वाढायला लागल्या की कुणालाही वाटत असतं की अशा ठिकाणी जाऊन बसावं की सर्व कटकटी जाऊ द्याव्यात.
अशावेळी आयुष्यात थोडी मंदगती आली तरी येऊ द्यावी.”
मी संजयला सहानुभूती देत म्हणालो.
“अगदी,हुबेहूब तुझ्या कामासारखं माझं काम नव्हतं.कदाचीत त्यावेळी मल्टी-नॅशनल नव्हत्या.पण माझं काम संशोधनाचं होतं.अमुकच झालं पाहिजे असा कुणाचा माझ्यावर ताण नव्हता.पण स्वतःचा स्वतःवर कामाचा ताण होता.”

“मग अशावेळी तुम्ही काय करायचा?”
संजयने लागलीच मला प्रश्न केला.
मी म्हणालो,
“अशावेळी निवांत जाऊन रहाण्याची माझी जागा म्हणजे माझ्या आजोबांच्या कोकणातल्या शेतीवरच्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ बांधलेला मांगर.”
“सांगा,सांगा निदान तुमचं ऐकून माझा कामाचा ताण कमी होईल.”
उतावीळ होऊन संजय मला म्हणाला.

मी म्हणालो,
“ऐकतर,ह्या मांगराच्या जवळच एक छोटसं तळं होतं.तळ्याच्या सभोवती मोठमोठी जंगली झाडं होती.लांबच लांब पारंब्या लोम्बत असलेलं एक वडाचं झाड होतं.माझ्या आजोबांनी लावलेली नवीन आंब्यांची कलमं आणि माडाचे कवाथे होते.उंचच उंच पोफळीची आणि माडाची झाडं होती.वारा आला की ह्या झाडांची पानं हलायची.जास्त करून पिंपळाच्या पानांचा सळसळाट जाणवायचा.तळ्याच्या जवळ आजोबांनी एक सिमेंटचा बाक बसायला म्हणून ठेवला होता.त्या बाकावर बसून तळ्यातल्या पाण्याकडे बघत असताना सर्व कसं शांत वाटायचं.मोटार-गाड्यांचा आवाज नाही,टीव्हीचे मोठे आवाज
नाहीत,फोनच्या घंटीचा खणखणाट नाही.

निरनीराळ्या पक्षांचे आवाज,मधूनच कोकिळेची कुहू,कुहू,लांबून येणारा मधूनच घुबडाचा आवाज,हेलिकॉप्टर सारखे दिसणारे लहान लहान भिरमुटे आजुबाजूला उडताना दिसायचे, कधीतरी एखादा रंगीत सरडा सुक्या पाचोळ्यातून झरकन पळत जाऊन जवळच्या झाडाच्या बुंद्यावर चढून बसायचा आणि तळ्यातल्या पाण्यात जरा निरखून पाहिल्यावर एखादा मासा हवेसाठी पाण्यावर उंच उडी घेऊन नंतर त्याने पाण्यात डुबकी मारल्यावर त्याच्याकडून केला जाणारा आवाज हे सर्व पाहून,ऐकून आणि अनुभवून मला त्या वातावरणात चिंब भिजल्या सारखं वाटायचं.

कधीकधी इतकं शांत वातावरण असायचं की तळ्यातल्या पाण्यात डोकावून पाहिल्यावर माझं प्रतिबिंब दिसायचं.सभोवतालच्या झाडांचं प्रतिबिंब दिसायचं.मात्र मधेच एखादं वार्‍यावर तरंगत येणारं सुकलेलं पान पाण्यात पडून शांततेचा भंग करायचं.शांत पाण्यात इवल्याश्या पानाने तरंग उत्पन्न होऊन हे असं व्ह्यायचं हे उघडच आहे.”

“मग अशा जागी तुम्ही सुट्टी घेऊन जात असाल”
अगदी कुतूहलाने संजयने प्रश्न केला.

“अलबत, पंधरा दिवसाची चक्क व्हेकेशन घेऊन मी जायचो.”
असं सांगून पुढे संजयला म्हणालो,
“मला तरी त्यावेळी त्याजागी माझं आयुष्य क्षणभर स्तब्ध झाल्यासारखं भासायचं.त्या शेतावर मला कसलीच कटकट वाटत नसायची.
माझं जीवन क्षणभर स्तब्ध झाल्याचं भासून मला बरं वाटायचं.त्या शेतावर मला कुणाचाही उपद्रव होण्याचा संभव नव्हता. मेंदू शांत असायचा.
माझं ब्लड-प्रेशर खाली जायचं आणि माझ्या मनावरचा ताण नाहीसा व्ह्यायचा.वास्तवापासून दूर राहिल्याने मस्त वाटायचं.हे ठिकाण सहजासहजी सोडून जायला आता मला वेळ नाही असं मी माझं मन वळविण्याच्या प्रयत्नात असायचो. माझ्या आजोबांच्या शेतावर माझा कायाकल्प झाल्यासारखं मला वाटायचं.जीवनात नेहमीच व्यस्त रहाण्यापलीकडे आणखी काहीतरी आहे असं वाटायचं.”

संजय मला म्हणाला,
“मी अनेकाना त्यांच्या मनावर इतका तणाव असलेले पाहिलेत की कशात काही अर्थ नाही अशा अवस्थेला ते आलेले असातात.कधी कधी इतपर्यंत कळायला लागतं की,काही लोकाना वाटत असतं की,ह्यातून दूर जाऊन एखादी अशी जागा पहावी की सर्व काही जाऊ दे असं वाटायला लागावं.”

मी म्हणालो,
“बरेच वेळा संशोधनाचं काम करीत असताना मी बांधला-जखडला गेलेलो आहे असं मला वाटत रहायचं.माझा तणाव मला कधीच सोडून जाणार नाही असं मला वाटत असायचं.इतरांसारखा स्वपनांच्या मागे मी लागलेला असायचो.आणि मी त्यात विलंब केला तर इतर मला टाकून पुढे जातील ह्याची भीती मला वाटत असायची.पण मग माझ्या मलाच आठवण करून द्यावी लागायची की,आजोबांच्या शेतावर जावं.”

संजयला हे ऐकून डोक्यात कल्पना आली. मला म्हणाला,
“मला वाटतं की,बर्‍याच लोकाना, शब्दांत सांगता न येण्यासारखं, सूख कुठे मिळेल ती जागा ठाऊक असते.पहिलं पाऊल टाकून त्या जागी जायला त्यांना जरा कठीण होत असावं,पण एकदा त्याजागी गेल्यावर सूखच तुमची वाट पहात असतं.हवी हवी असलेली विश्रांती शरीराला मिळण्यासाठी तुम्ही पात्र झालेले असता.मलासुद्धा तुम्ही पाहिलेल्या जागेसारखी एखादी जागा शोधून काढावी लागेल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, March 16, 2011

सुखासाठी घरगुती उपाय


Posted: Thu, 17 Mar 2011 02:28:24 +0000

“माझ्या लक्षात आलं की तुम्ही कुठच्याही भाषेत बोलत असाल,तुम्ही कुठच्याही प्रांततले असाल पण हास्याचं भाषांतर सहजपणे होत असतं.”

मला आठवतं एकदा बाळ्या डोंगरे वर्गात हसतो म्हणून आमच्या संस्कृतच्या गुरूजीनी त्याला त्यांचा तास संपेपर्यंत बाकावर उभं रहायची शिक्षा दिली होती.
“मी तुम्हाला नळ-दमयंतीची कथा संस्कृतमधून मराठीत भाषांतर करून सांगत असताना,तू माझ्या वर्गात सतत हसत असतोस त्यामुळे माझं लक्ष केंद्रीत होत नाही.”
असं सागून त्याला एकदा वर्गाच्या बाहेर जा म्हणून सांगीतलं होतं.
ह्यावेळेला त्याला बाकावर उभं रहाण्याची शिक्षा दिली होती.
आमचे संस्कृतचे गुरूजी आमच्या शाळेत नवीन आले होते.त्यामुळे बाळ्याची संवय त्यांना नवीनच होती.
बाळ्या बाकावर उभारून शिक्षा भोगत असताना सुद्धा हसतो म्हणून गुरूजीना त्याचा आणखी राग येत होता.त्याला ते खूप बोलले होते.
“तुला स्वतःची लाज कशी नाही.?इतका कोडगा कसा तू?
असंही बाळ्याला त्यांनी विचारलं होतं.पण बाळ्या हसतच होता.तो गुरूजीना कसलीच प्रतिक्रिया देत नव्हता.

खरं म्हणजे बाळ्याचा चेहराच हसरा होता.आणि त्याचं मुख्य कारण त्याचे वरचे समोरचे दात जरा पुढे होते. त्यामुळे दात दिसून तो हसल्या सारखा वाटायचा.बाळ्या स्वभावाने अगदीच गरीब होता.बिचार्‍याने आमच्या संस्कृत गुरूजींचं एव्हडं बोलणं खाऊन मनाला लावून घेतलं नाही.
नंतर एकदा गुरूजीनी त्याची माफी मागीतली.
“तू हे मला सांगायचं नाही काय?”
असं सांगून गुरूजीने त्याच्यावरच जबाबदारी टाकली.
नंतर कळलं आमच्या गणीताच्या शिक्षकानी बाळ्याची खरी हकीकत संस्कृत शिक्षकाना सांगीतली होती.

हे सगळं सांगण्याचं कारण,त्यादिवशी माझी आणि संजयची हसण्याच्या सवयीवर चर्चा झाली.संजय मात्र खरंच वाक्या- गणीक,शब्दा-गणीक हसत असतो.ती त्याची स्टाईल आहे.
म्हणून मी बाळ्या डोंगर्‍याची गोष्ट संजयला सांगीतली.
मला संजय म्हणाला,
“हास्याला काय म्हणून समजावं? ह्याची अनुभूती वर्णनाच्या पलीकडची आहे.हास्यामुळे पोटात दुखायला लागतं,डोळे पाण्याने भरतात,आणि बरेच वेळा काहीसं डोकंसुद्धा दुखायला लागतं.गालातल्या गालात हसणं, खदखदा हसणं, खीदीखीदी हसणं,फिदीफिदी हसणं आणखी असे अनेक हसण्याचे प्रकार असतील.
ह्या हसण्याच्या प्रकारामुळे होणारे अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे,बघ्यानी,नव्या मित्रानी दिलेली विचीत्र नजरफेक.मला वाटतं हास्य व्यसनकारी आहे.त्याने व्यसनी झालेल्याचं जीवन प्रचंडप्रमाणात बदलण्याचा संभव असतो,असं माझं मत झालं आहे.

मी दुःखी असो,आनंदात असो,उदास असो वा वेडपट झालो असलो तरी त्याची अंतिम परिणीती हास्यात होते. कदाचीत माझ्या भावना अती झाल्याने त्यांचं हास्यात विमोचन होत असावं.किंवा कदाचीत ओल्या जखमेला मलम-पट्टी लावण्य़ाची माझी ही स्वतःची पद्धत असेल.
तुम्हाला, माझ्या हास्याशी परिचय करून द्यायचा झाल्यास मला मी पहिलीत शिकत होतो त्या काळात तुम्हाला घेऊन जावं लागेल.

आमच्या बाई आम्हाला शिकवण्यात गुंग झाल्या असताना मधेच मला एकदम सूं सूं करण्याची तीव्र इच्छा झाली.तसा मी जरा लाजवटच होतो.माझा हात वर करून बाईंचं लक्ष माझ्याकडे वेधण्याचा मी प्रयत्न केला.बाईंचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही.किंवा त्या कदाचीत गोष्ट सांगण्यात इतक्या मग्न झाल्या असाव्यात की तात्पुर्त त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं असावं.पण व्हायचं ते होऊन गेलं.पुढच्याच बाकावर बसलो असल्याने माझ्या डोळ्यातल्या आसवांचा झरा आणि जमिनीवर आलेल्या पाण्याच्या पुराला पाहून त्या माझ्याकडे आकर्षित झाल्या.सहाजीकच माझे कपडे ओले झाले. अपमानीत झालेल्या मला शाळेच्या ऑफीसमधे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला.माझ्या आईला बोलावून घेण्यात आलं. माझ्या आईचं लक्ष जेव्हा माझ्यावर गेलं तेव्हा तिलापण हसूं आवरेना.त्याचवेळेला मला तिने सहजच विचारलं,
“कसा गेला तुझा वर्गात वेळ? तुझ्या कपड्यात तुला पाहून सगळ्यांना तू आवडला असशील नाही काय?”
माझ्या आईचे हे शब्द ऐकून मी ओक्साबोक्सी रडण्यापेक्षा हसायलाच लागलो.माझं “ढोपर खरचटलं” होतं त्यावरची ही मलमपट्टीच होती.रडून दुःखी होण्यापेक्षा मी हसून माझा उरलेला दिवस उज्वलीत केला.

असाच दुसरा प्रसंग माझ्या आठवणीत पक्का राहिला आहे तो म्हणजे जेव्हा मी माझ्या पहिल्याच जॉबला सुरवात करतानाचा.ह्याही वेळी माझ्या हसण्याच्या सवयीने मला माझी शोभा होण्यापासून वाचवलं.सकाळपासून मान वर नकरता काम करीत होतो.
ज्या दुकानात मी काम करीत होतो त्यात गिर्‍हाकाची बरीच वर्दळ असायची.संध्याकाळ झाली होती आणि एक बाई दुकानाच्या मालकाकडे काहीतरी चौकशी करीत होती.मालकाला तिची भाषा समजत नव्हती.मालकाला कुणीतरी सांगीतलं की तिची भाषा मला समजते.मी काम करीत होतो तिथून मला बोलवण्यात आलं.मला मालक म्हणाला,
“ही बाई काय बोलते ते भाषांतर करून मला सांग.”
मला कानडी भाषा अर्धवट येत होती.मी तिला कानडीत विचारायचा प्रयत्न केला.त्या बाईने आपल्या कपाळावर आलेली केसाची बट बोटाने गरगर फिरवून मागे सारली.नंतर आपली मान जराशी तिरपी करून मला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.ती तेलगू भाषेत बोलत होती असं मला वाटलं.आम्ही दोघंही काही क्षण गोंधळलेलो होतो हे निश्चीत.लगेचच आमच्यासकट मालक आणि दुकानतले सर्व जण हसायला लागले.त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की तुम्ही कुठच्याही भाषेत बोलत असाल,तुम्ही कुठच्याही प्रांततले असाल पण हास्याचं भाषांतर सहजपणे होत असतं.

मला वाटतं हसू संसर्गजन्य असतं,उपचारात्मक असतं,आणि सूचक असतं.मला वाटतं हसण्यामुळे लोक जवळ येतात. दुकानातल्या त्या तेलगू बोलण्यार्‍या बाईचं उदाहरण आहे.हास्याने समस्या सुटायला मदत होते.निदान जीवनातले ताण कमी होतात.मला वाटतं हास्यातून तुम्ही थोडक्या शब्दात बोलता.आपण चालण्यापूर्वी,बोलण्यापूर्वी प्रथम हसायला शिकतो.म्हणून हसण्यावर माझा भरवसा आहे.जखमेवरची ती एक मलमपट्टी आहे.संघर्ष होत असताना हास्य मित्राची भुमिका घेते.सरतेशेवटी सुखासाठी हास्य एक घरगुती उपाय आहे.”

मी संजयला म्हणालो,
“मला हे जर माहित असतं तर मी माझ्या संस्कृत गुरूजीशी बाळ्याची खरी माहिती सांगण्यासाठी अर्धमागाधीत किंवा पाली भाषेत बोललो असतो.तुझ्या कानडी आणि तेलगू घटने सारखं झालं असतं आणि वर्गात तरी मी सर्वांना हसवलं असतं.”
माझं हे ऐकून संजय मात्र त्याच्या स्टाईलमधे हसला.हे काही कमी नव्हतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 13, 2011

जीवन एक देणगी.



  • अगदी खूश होऊन भाऊसाहेब हिंदीत म्हणाले,
    “नेकी और पुछ,पुछ?”

    नाहीतरी आता वसंत ऋतूला सुरवात व्हायला लागली आहे.बरेच दिवस थंडीला कंटाळून बाहेर फेरफटका टाकायला मिळाला नव्हता.संध्याकाळच्या वेळी एखादा स्वेटर चढवून,सोसण्या एव्हडी थंडी असल्याने,तळ्यावर जायची तलफ आली.
    प्रो.देसायाना फोन करून विचारलं.
    “आज पासून तळ्यावर भेटायचं का?”
    अगदी खूश होऊन भाऊसाहेब हिंदीत म्हणाले,
    “नेकी और पुछ,पुछ?”
    हे ऐकल्यावर माझ्या मनात आलं की आज प्रो.देसायांकडून काहीतरी खास ऐकायला मिळणार.आणि तसंच झालं.

    मला भेटल्यावर म्हणाले,
    “मी नेहमीच म्हणत असतो की जीवन ही एक देणगी आहे.जीवनातला येणारा प्रत्येक दिवस,तुम्हाला एक चांगलं पाऊल पूढे टाकण्याची संधी देत असतो.कुठेतरी वाचल्य़ाचं आठवतंय,
    “नकारात्मक दृष्टी ठेऊन रहाणारा तो, की जो येणार्‍या संधीत अडचणी निर्माण करतो आणि सकारात्मक दृष्टीने पहाणारा तो, की जो अडचणीतून संधी निर्माण करतो.”

    मी म्हणालो,
    मला आठवतं माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की,
    “चेहर्‍यावर हसूं ठेवीत शाळेत गेलास आणि एखाद्या पेन्सिलची जरूरी भासल्यास कुठूनही सापडते.एखादी लहानशी गोष्ट सुद्धा तुझ्या चेहर्‍यावर हसूं आणू शकते.मित्रांच्या घोळक्यात केलेला एखादा विनोद किंवा चेहर्‍यावर चांगला भाव प्रदर्शित करून तुझा दिवस प्रफुल्लित होऊ शकतो.”

    “अगदी बरोबर आहे तुमच्या आजोबांचं म्हणणं”
    असं सांगून प्रो.म्हणाले,
    “मला वाटतं ह्या असल्या प्रशंसात्मक,आशाजनक,सकारात्मक प्रवृत्तिमुळे काही ही होऊ शकतं.कारण खरंच काहीही होऊ शकत असतं.तुम्ही कुणाच्या प्रेमात पडू शकता,नवीन मित्र मिळवू शकता,नव्हेतर जग बदलू शकता.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे ते कुणाला ठाऊक आहे?.तेव्हा काहीतरी चांगलं होणार याच्या तयारीत राहिलं पाहिजे.ही खुशी-मजा संसर्गजन्य आहे असं म्हटलं तरी चालेल.उजाडलेल्या नव्या दिवसाचा परिपूर्ण उपयोग करून घेणं ही त्या दिवसाची सुरवात होऊ शकते.तुमच्या आनंदाची भागीदारी कुणाशी केली गेली तर.दुःख आणि उदासीन रहाण्यापासून जगाला वाचवलं गेलं तर काय हरकत आहे?.मानतो मी की हे माझं बोलणं थोडं नाटकी दिसतं,पण त्यात फरक करता येतो.सुरवातीलाच हसतमुख राहिल्याने जगाला दैदिप्यमान करता येतं.”

    “मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगतो”
    असं सांगून मी प्रोफेसराना म्हणालो,
    “मला आठवतं काही वर्षापूर्वी मी माझ्या आजोबांबरोबर रहायला गेलो होतो.माझे आजोबा जातीचे शिकारी होते. छेर्‍याची सिंगल-बार बंदूक घेऊन ते कवड्याची शिकार करायचे.त्यांचा नेम ऊज्जू होता.उडत्या कवड्याला सुद्धा मारायचे.झाडावर बसलेल्या कवड्याला उडून जाण्यासाठी मला टाळ्या मारायला सांगायचे.आणि कवडा फांदीवरून उडाल्यावर, नेम धरून शिकार करायचे.रानात रानडुक्कराची टोळी आली म्हणून गावातले लोक सांगायला
    आल्यावर शिकार करायला त्यांच्या जवळ डबल-बाराची बंदूक होती ती खांद्यावर घेऊन बाहेर पडायचे.मला शिकार करण्यात गोडी वाटावी म्हणून मुद्दाम मला घेऊन जायचे.

    एकदा मला आठवतं त्यांच्या लहानश्या खोलीत मी गेलो होतो.काही कारणाने मी बराचसा उदासीन झालो होतो. समोर एक सोफा होता त्यावर लवंडलो होतो.त्यांच्या खोलीत भिंतीवर लटकवून ठेवलेलं सांबराचं लांब शिंगाचं मुंडकं, खोलीच्या मध्यावर पसरवून ठेवलेलं बिबट्या वाघाचं कातडं, खिडक्यांच्या गजापासून लटकवून ठेवलेले चित्र विचित्र पक्षांच्या भुसा भरून ठेवलेल्या कृति,मधेच भिंतीवर टांगून ठेवलेली डबल बाराची बंदूक ह्या सर्वांकडे कौतूकाने पहात होतो.ते सर्व पाहून माझं कुतूहल जागृत झालं.मला उदासीन झालेला पाहून त्यांना काहीतरी वाटलं असावं.पण मला काही बोलले नाही.काम करत राहिले.

    एकाएकी,नकळत हुबेहूब दिसणारा आणि अनुभूति देणारा एक उंदीर माझ्या अंगावर येऊन पडला.मी किचाळलो.
    कामात व्यग्र असलेले माझे आजोबा,लाल चेहरा करून,हसत हसत जोरात ओरडले,
    “अरे तो नकली उंदीर आहे.”
    असं म्हणून आणखी हसत राहिले.मला पण माझं हसूं आवरत नव्हतं.माझी उदासिनता पार निघून गेली होती.”

    मी पुढचं सांगण्यापूर्वीच प्रोफेसर मला म्हणाले,
    “ह्यातच सकारात्मक रहाण्याची क्षमता असते.”
    आणि पुढे सांगू लागले,
    “आपल्याकडून जमलं तर हीच सोनेरी किरणं जगाला उजळून टाकता येतात.ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी प्रत्येक क्षणाला कृतज्ञ रहावं.कारण कृतज्ञता,संतुष्टता आणते आणि त्यामुळे सकारत्मक व्ह्यायला होतं.
    कुणीतरी म्हटलंय,
    “जे तुमच्या जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.त्यामुळे जास्त मिळण्यात सांगता होते.पण जर का जे नाही त्याकडे लक्ष केंद्रीत केलं तर संतुष्ट होण्याइतकं कधीच मिळणार नाही. विचार केल्यावर ह्यात काही तथ्य आहे असं मला वाटतं.तुम्ही आनंदात असाल तर जग तुमच्याशी आनंदात राहिल.जीवनात ह्याचीच जरूरी असते.”

    मी प्रोफेसराना म्हणालो,
    “थोडक्यात,तुमचं म्हणणं आहे की आनंदी रहा.आनंदात रहा आणि संपूर्ण जीवन जगा.आयुष्य एकदाच मिळतं.बरोबर ना?
    चला तर आता काळोख होत आलाच आहे.आपण निघूया आणि उरलेलं आयुष्य संपूर्ण जगूया. कारण जीवन ही एक देणगी आहे.”

    श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrkrishnas@gmail.com


Thursday, March 10, 2011

गीत माझे ऐकशील जेव्हा

(अनुवाद.)

असा कसा विसरशिल तू मला
गीत माझे ऐकशील जेव्हा
संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा

चांदण्या रात्री बहरलेल्या बागेत
गुजगोष्टी प्रीतिच्या केल्या अनेक
त्या घटनांची जेव्हा येईल आठव
प्रीति सुमनांना तुझ्या अंतरी साठव

हातात हात घेऊन चालत होतो
निशीगंधाचे फुल दिले मी तुला
अशी कशी विसरशिल ती संध्याछाया
गीत माझे ऐकशील जेव्हा
संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा

गाठी भेटी मधूनी मिळतसे विरंगुळा
एक काळ येऊनी गेला वेगळा
असा कसा विसरशिल तो सगळा
गीत माझे ऐकशील जेव्हा
संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 7, 2011

ढगातला खेळ आणि माझे आजोबा.

“मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.”

वसंत ऋतुचं आगमन होणार आहे ह्याची चाहूल लागायला लागली आहे.थंडी अंमळ कमी होऊ लागली आहे.मागच्या बागेत तर्‍हेतर्‍हेचे पक्षी येत आहेत.गोड गाणी गाऊन,आवाज करून वसंताच्या आगमनाची आठवण करून देत आहेत. अशावेळी चौपाटीवर जाऊन शांत समुद्राच्या वातावरणात थोडा वेळ घालवावा म्हणून माझ्या नातीने मला सुचना केली.

समुद्र म्हणजे मला तरी जीव की प्राण आहे.तासनतास समुद्रावरच्या वाळूत बसून उंच उंच लाटांकडे पहात रहावं.कुठची लाट किती जोरात फुटणार आहे त्याचं मनात भाकीत करून जास्त फेस आणून फुटलेली लाट जास्त मोठी असते असं मनाशी समजावं.पश्चिमेकडचाच समुद्र दिसत असल्याने, सूर्योदय पहाण्याचा योग येत नाही.पण सूर्यास्त काही कमी सूंदर नसतो.सूर्याकडे उघड्या डोळ्यानी बघवतं अशा स्थितीत सूर्यबिंब खूपच अल्हादायक वाटतं.आणि हे बिंब खाली खाली समुद्रात बुडायला जात असताना आपला रंग इतका बदलतं की दुपारचा हा रखरखीत दिसणारा सूर्य मावळतीला इतका सुंदर असेल अशी कल्पनाही करवत नाही.सूर्य रखरखीत आहे तसाच आहे पण हे वेळेचे, वातावरणाचे आणि हवेच्या जाड-पातळ असण्याच्या स्थितीचे खेळ आहेत हे लक्षात आलं तरी,

“मानसीचा चित्रकार तो
मावळतीचे सूर्यफूल ते,सूर्यफूल ते करतो”

ह्या कवितेच्या ओळी आठवून निसर्गाचं कौतूक करावं तेव्हडं थोडच असं वाटल्याशिवाय रहात नाही.

पण हा झाला खेळ सूर्यफूलाचा.त्यापूर्वी होणारा ढगांचा खेळ खेळायला मला तितकच आवडतं.
माझ्या नातीला हा सूर्यास्ताचा देखावा आवडतोच त्याशिवाय माझ्या सारखाच ढगांचा खेळ खेळायलाही आवडतो. आणि हा ढगांचा खेळ मला माझ्या आजोबांनी शिकवला.आणि मी आता तो ढगातला खेळ माझ्या नातीला शिकवण्याच्या प्रक्रियेत असतो.

माझे आजोबा मला आणि माझ्या भावाला घेऊन वेंगुर्ल्याच्या चौपाटीवर जायचे.चौपाटीवर जायला आमच्या घरून एक तास तरी लागायाचा तेव्हा,
तसंच, खानोलीची घाटी चढून वर गेल्यावर फेसाळ समुद्र दिसायचा.घाटीच्या अगदी उंचीवर पोहोचायला वीस मिनीटं तरी लागायची तेव्हा,
आणि तसंच, आमचा हात धरून शाळेत जायला दहा मिनीटं लागायची तेव्हा,
आमचे आजोबा आमच्याबरोबर ढगांचा खेळ खेळायचे.

धूर सोडणारं आगगाडीचं इंजिन, एखादी मोठी घूस किंवा मोठा कासव पाहायला त्या आकाशातल्या कापसाच्या धुरात मला मुळीच कठीण जात नसायचं.पण माझे अजोबा,वरच्या श्रेणीचा आकार पहायचे.आणि आम्हाला वर्णन करून सांगायचे.
“तो तिचा हात आहे.तिच्या हातात एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू आहे.दिसलं त्या पिल्लाचं शेपूट?”
असा वर आम्हाला प्रश्न करायचे.

असंच एकदा माझी आजी,आजोबा आणि आम्ही दोघे भाऊ, वेंगुल्याहून गोव्याला जात होतो.आमची बस एका माळरानात आल्यावर बंद पडली. आजुबाजूला सगळं उजाड रान होतं.बसच्या ड्राइव्हरने आम्हाला सांगीतलं की दुसरी बस येई तोपर्यंत आम्हाला बाहेर उघड्यावर किंवा बसमधे बसून रहावं लागणार.आजी बसमधे बसली आणि आम्ही आणि आमचे आजोबा बाहेर एका खडकावर जाऊन बसलो.

माझ्या आजोबांनी आकाशात एका ढगात एक मोठा राक्षस पाहिला.त्या राक्षसाचं आमचे आजोबा वर्णन करून सांगत होते.हळू तो राक्षस मोठा होत गेला.त्याचे केस पिंजारायला लागले.पंधरा एक मिनीटात तो राक्षस नाहिसा झाला.फक्त अवघ्या पंधरा मिनीटा नंतर तो आकाशाचा भाग होता तसा मुळीच दिसेना.

पुढे जीवनात माझ्या लक्षात आलं की हे आपलं जीवनसुद्धा आकाशातल्या ढगांच्या रचनेसारखं आहे.माझ्या ध्यानात यायचं की माझा दिवसाचा नित्यक्रम काही वेळेसाठी मुळीच बदलायचा नाही.पण माझे विचार त्या क्रमाच्या पुढच्या भागाबद्दल त्या त्या दिवशी किंवा त्या त्या क्षणाला बदलत रहायचे.

मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.
जेव्हा आकाश पूर्ण ढगाळलेलं असायचं आणि ढगांच्या विचित्र काळसर छटा दिसायच्या त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की जीवन असंच काळकूट्ट आणि घृणित असतं.म्हणून त्यातून लहान-सहान गोष्टी पाहून,चेहर्‍यावर हसू आणायला हवं.सरतेशेवटी सूर्याची किरणं येऊन स्वच्छ प्रकाश दिसून माझा दिवस जोशपूर्ण होणार आहे असं नक्कीच वाटायचं.

ज्या आकाशाला कधीही स्पर्श करता येणार नाही ते सदासर्वकाळ त्याच जागी असणार.अगदी साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते ती म्हणजेच त्या आकाशाकडे पाहून आनंद मिळू शकतो नव्हेतर मिळवता आला पाहिजे.
जीवनातल्या साध्या,सध्या गोष्टी दुर्लक्षीत होतात.वाटत असलेल्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे वस्तुनिष्टपणे न पहाता एक पाऊल मागे घ्यावं असं मला वाटतं.आणि आकाशाकडे पाहून एखादं फुलपाखरूं,एखादा ससा किंवा एखादी, कुत्र्याचं पिल्लू हातात घेतलेली, मुलगी पहावी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Friday, March 4, 2011

मिष्टान्न आणि मालवणी जेवण.

वसंता शनिवारीच माझ्या घरी येऊन माझ्याकडून खात्री करून गेला की,उद्या रविवारी दुपारी आपण दादरच्या कानविंदेच्या दुर्गाश्रमात जाऊन मालवणी जेवणाचा कार्यक्रम करायचा.मी पण अलीकडे दुर्गाश्रमात गेलो नव्हतो. कानविंद्याची आणि माझी जूनी ओळख.अगदी कोकणात शाळेत शिकत असताना पासूनची आमची मैत्री होती.व्हायचं काय की,मी दुर्गाश्रमात जेवल्यावर माझ्याकडून कानविंदे पैसे घेत नसायचा.मला ते जरा अवघड व्हायचं.म्हणून मी दुर्गाश्रामात जायचं टाळायचो.त्यामुळे परिणाम असा व्हायचा की मला मालवणी जेवण चुकायचं.कधीतरी मालवणी जेवणाची तलफ आली तर मी गिरगावातल्या खोताच्या वाडीतल्या खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला जायचो.

दुर्गाश्रमात काशीनाथ म्हणून एक वयस्कर वाढपी होता.तो पण आमच्या गावचा.मी जेवायला गेल्यावर तो माझी चांगलीच खिदमत ठेवायचा.मला गाववाला म्हणूनच संबोधायचा.मला जरा करपलेला तळलेला मास्याचा तुकडा आवडायचा.पापलेटच्या आमटीतला मास्याच्या शेपटीकडचा तुकडा आवडायचा.बांगड्याच्या तिखल्यातल्या तुकड्याचं पण असंच असायचं.गरम गरम वाफ येणार्‍या भातावर मास्यांची आमटी कालवून जेवायला मला आवडायचं. सोलकडी बरोबर शेवटचा भात जेवताना मात्र मला थंड झालेला भात आवडायचा.अशा बारीक-सारीक गोष्टी कडे तो माझी खिदमत करताना लक्ष द्यायचा.आणि वर,
“काशीनाथा रे! तेंका काय होयां होयां तां बघ रे!”
असं ओरडून गल्ल्यावर बसून ड्रॉवर मधल्या पितळेच्या कपात असलेल्या चिल्लरीचा आवाज करीत कानविंदे त्याला सांगायचा.इतकी बडदास करून झाल्यावर जेवण मोफत जेवायला मला कसंसंच व्हायचं.एक दोनदा मी कानविंद्याला समजावून पण सांगीतलं.
“अहो,कानविंदे हा तुमचा धंदा आहे.धंद्यात मित्र वगैरे कोणी नसतं.”
“तां तुम्ही माका सांगू नका.धंदो काय तो माका ठावक आसा. तुमच्या जेवणाचे पैसे घेओन मी काय बंगलो बांधतलंय नाय”
असं टिपीकल मालवणी शब्दात आणि हेळ्यात बोलून मलाच गप्प करायचा.

वसंताबरोबर जाण्यात माझा हाही एक उद्देश होता.पैसे मी देओ नाही तर वसंता देओ कानविंदे वसंताकडून पैसे स्वीकार करायचा.
ह्यावेळच्या जेवणात काशीनाथने आमची विशेष बडदास्त ठेवली होती.त्याला माहित होतं की मला मास्यांत सर्वात बांगडे जास्त आवडतात.
“आज सगळा बांगड्याचा जेवण आसां”
काशीनाथ मला पहाताच म्हणाला.
“बांगड्याचा तिखलां,बांगड्याची शाक,बांगड्याची आमटी आणि तळलेलो बांगड्याचो तुकडो.आणि सोलाची कडी.”
काशीनाथने आपलं मनातलं मेनुकार्ड वाचून दाखवलं.
खरंतर वसंता अट्टल गोड खाणारा.
“आमका सगळां होयां”
असं वसंताने नबोलता हाताच्या भाषेत काशीनाथला सांगीतलं.

मी आणि वसंता पोटभर जेवलो.बाहेर भय्याकडून दोन मसालापानं तोंडात कोंबून टॅक्सीत जाऊन बसलो.
“जुहू चलो”
असं वसंता ड्राईव्हरला म्हणाला.जुहूला जाण्यात वसंताच्या मनात काय होतं ते मला जुहूला बास्किन-रॉबीन्सच्या जवळ टॅक्सी थांबवल्यावर लक्षात आलं.
“अरे आपण आत्ताच मास्यांचं जेवण जेवलो आता आइस्क्रीम?”
असा मी त्याला प्रश्न केल्यावर,टॅक्सीचे पैसे देता देता मला म्हणाला,
“नंतर सगळं सांगतो.”

चॉकलेट आइस्क्रीमच्या मोठ्या डीश ऑर्डर करून झाल्यावर मला म्हणाला,
“कुठेही मला जेवण झाल्यानंतर दिल्यागेलेल्या शेवटच्या गोड डीशबद्दल-dessert बद्दल- विशेष वाटतं.दुर्गाश्रामात आइस्क्रीमची अपेक्षा करणं वेडेपणाचं होईल.पण मग मी इथे जुहूला येण्याचा विचार केला.”
नंतर मला म्हणाला,
“माझ्या समोर ठेवलेल्या एक पौंड रंगीबेरंगी चॉकलेटचीप आइसक्रीमचा अर्धा भाग मी फस्त केल्यावरही माझी अनावर होणारी, गोड खाण्याची, तीव्र इच्छा अपूरी राहून उरलेल्या आइस्क्रीमचा फडसा पाडायला प्रचंड उत्सुक असते.माझे गोड खाऊ दात कानात खुखूसायला लागले आणि जीभ लोभस होऊन चळवळ करीत गोड बोलायला लागली की,मग घरात नसलं तर मला बाहेर जाऊन काहीतरी गोड खायाला जाण्याविना गत्यंतरच नसतं.”

“ही तुझी लहानपणापासूनची सवय मला माहित आहे.”
मी वसंताला म्हणालो.

“हो! ही माझी लहानपणापासूनची सवय असल्याने ते ऐकून तुमच्या मनात माझ्या स्थुल प्रकृतीची छाप येऊन जाणं स्वाभाविक आहे.पण मी तसा स्थुल नव्हतो आणि नाही. ह्याचं श्रेय मी माझ्या शरीराच्या चयापचयाला देतो.त्या तसल्या नको असलेल्या आणि येण्याचा संभव असलेल्या, दिवसाचा विचार करायलापण मी धजत नाही की ज्या दिवशी गोड डीश माझ्या खाण्याच्या यादीतून अन्यायपूर्ण मज्जावीत केली जाईल.”

“ती पाळी तुला येण्याचा संभव बराच कमी आहे.त्याचं कारण तू नियमीत व्यायाम घेत असतोस.अर्थात जसं वय होत जातं तसं खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं.किती खातोस त्यापेक्षा काय खातोस हे महत्वाचं ठरत असतं.आणि गोड खाणं बर्‍याच वेळेला काबूत ठेवावं लागतं असं म्हणतात.”
मी वसंताला म्हणालो.

“तू तर गोड खातोस ते षौक म्हणून खातोस.तुझ्याकडून मला ऐकायचं आहे तुझं गोडपूराण.”
त्याचे विचार ऐकण्यासाठी मी वसंताला ट्रिगर दिली.

लगेचच मला म्हणाला,
“मला वाटतं गोड पक्वान्न हे ह्या पृथ्वीतलावरचं एक महत्वाचं अन्न आहे.मला तर,नेहमीच गोड पक्वान्नाच्या थाळीला पाहून आलेला हृदय-धक्का कुठल्याही गोष्टीपेक्षा अमुल्य वाटतो. माझ्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडून,मस्तपैकी थंडगार रस-मलाई ते चॉकलेटी रंगाचे साखरेचा रस शोषून गबदूल झालेले गुलाब-जाम, जे लहानश्या गोल चमच्यात काढून घेताना चमच्याला लागलेला पाघळून खाली भांड्यात पडणारा साखरेचा रस पाहून माझ्या जीभेच्या चवीच्या कोंबाना-बड्सना- इतकं भंडावून सोडतो की जे लोक माझं हे वर्णन ऐकून माझ्या गोडखाऊ वेडाशी सहभागी होत नसतील त्यांना समजावून सांगणं जरा जिकीरीचं आहे असं मला वाटतं.

माझ्या समोर आणून ठेवलेली गोड पक्वान्नाची थाळी आणि त्यातलं गोड पक्वान्न,ज्यांच्या दृष्टीने ते भरपूर वाढलं आहे असं वाटतं, त्यांना,मला अधाशासारखा एका मिनीटात त्याचा फडशा पाडताना पाहून, बरेच वेळा माझ्या गोड मिष्टांन्न खाण्याच्या परिमाणाचा त्यांचा अंदाज साफ चुकलेला असतो असं मला वाटतं.आकाश-मंडळातलं काळं भुयार-ब्लॅक होल-जसं भिंगरणार्‍या असंख्य तार्‍यांना गिळंकृत करून आसमंतात शून्यता आणतं अगदी तसंच माझं पोट रिक्त रहातं. हे माझं अपूर्व लक्षण माझ्या मनावर एव्हडा भार आणतं की,माझ्यावर, आणखी हवं,हवं असं वाटून घायचा तर्क करावा अशी जबरी होते.
माझे मिष्ट दात कधीच समाधान नसतात.अगदी स्पष्ट सांगायचं तर,मला वाटत नाही की मी कधीही मिष्टान्न खाऊन तृप्त झालो आहे अशा निर्णयाला येईन.

मला वाटतं एखादी व्यक्ति सर्व प्रकारच्या व्यापक आमोद-प्रमोदाचा षौक करते,जसं केशर घालून पिवळं जर्द झालेलं फ्रिझमधलं श्रीखंड,बेदाणा, चारोळ्या,पिस्ते घालून घोटून,घोटून केलेली थंडगार बासूंदी,बदाम.पिस्ते असलेलं कसाटा आइस्क्रीम,असल्या गोष्टी पाहून त्या व्यक्तिला वेळेचं आणि ह्या भौतिक जगात आपण रहात असून जीवनाशी निगडीत असलेल्या सर्व समस्यांशी संबंध ठेवून आहोत ह्याचं भान रहात नसावं.”

मला वसंताचं हे गोडपूराण ऐकून एक मुद्दा सुचला.
मी म्हणालो,
“तुझं हे गोडपूराण ऐकून माझ्या मनात असा विचार आला की एखाद्या अशाच गोड पक्वान्नाचा अधाशासारखा स्वाद घेत असताना एखाद्या व्यक्तिला जीवनातल्या समस्यांना सामोरं गेल्यामुळे,जर का खरोखरंच दुःखी आणि उदास वाटत असेल तर त्याला गंभीर स्वरूपाच्या मदतीची जरूरी आहे असं मला वाटतं. ग्लोबल वॉरमिंग,भांडवलशाहीतली आर्थिक मंदी असल्या प्रश्नापासून विरंगुळा मिळायला हा षौक उपयोगी आहे असं मला वाटतं.”

माझं हे ऐकून वसंता बराच खूश झालेला दिसला.मला म्हणाला,
“भरपूर साजूक तूप घालून आणि थोडं दूध घालून,वेलची घातलेला मधूनच मनुका दाढेखाली येतील असा चपचपीत तूपाचा गोड शिरा, दुधात पाव कुसकरून थोडी वेलची आणि साखर घालून वर तांबसर रंग येईपर्यंत अवनमधे चारशे डीग्री तपमानाला ठेवून बेककरून केलेलं खरपूस पावाचं पुडींग,गरम गरम पिवळ्या धमक जिलेब्या आणि रूट-बिअर सिरप वर टाकून केलेलं थंडगार बटर-स्कॉच आइस्क्रीम हे माझे चार फूड-ग्रूप आहेत.दुसरं काही नसलं तरी ह्या अन्नावर मी तग धरून जीवंत रहिन.प्रत्येक रात्री जेवण झाल्यावर गंभीर निर्णय घेताना ह्यातल्या कुठल्या अन्नाचा मी षौक करावा ह्याचा मला विचार करावा लागत असतो.”

बराच वेळ झाला होता.बोलण्याच्या नादात वसंता आणखी एखादी आइस्क्रीमची डिश ऑर्डर करील ह्याची मला भीती वाटत होती आणि तसं होऊ नये म्हणून समारोप करताना मी त्याला म्हणालो,

“वसंता, रोज रात्री तुला असे षौक करून तन्मय व्ह्यायला आवडतं हे उघडच आहे. गोड पक्वान्न हा नुसताच तुझा षौक नाही.संपूर्ण मानवतेला तेव्हड्या काही गोड नसणार्‍या समस्यांपासून क्षणभराची उसंत असण्याची जरूरी असताना हा षौक कामाला येईल असं मला वाटतं.म्हणूनच एखाद्या गोडपक्वान्नाची लज्जत घेतली तर बरं असं तुला वाटत असावं.सतत गोडपक्वान्न खाऊन दिवसातल्या सर्व समस्या सुटतील अशातला प्रकार नाही पण ते गोडपक्वान्न निदान मधुर परमानंद तरी देईल हे खचित असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही.”

घरी परत जाताना मी विचार करू लागलो की एव्हडा गोडखाऊ वसंता, कानविंद्यांच्या दुर्गाश्रमात तिखट,आंबट मास्यांचं जेवण चापून जेवत होता याचा अर्थ हा चवदार मालवणी जेवणाचा असर तर नसावा?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 1, 2011

एक झोका अन प्रणयाचा एक मोका.


“दिनेश हॉस्पिटलमधून आला”
असं शारदा म्हणाली. आम्ही दोघंही बाल्कनीत त्याला पाहायला उठलो.

शारदेचं लग्न एका डॉक्टर बरोबर झालं.ती त्याच्या बरोबर सौदीअरेबियात गेली.तिला भारत सोडून जायला बरं वाटत होतं.त्याची काही कारणं असली तरी शरदपासून दूर जाणार आहे ह्यात तिला आनंद होत होता.
दिनेश डॉक्टर म्हणून सौदीअरेबियातल्या एका मोठ्या हॉस्पिटलात नोकरी करण्यासाठी गेला होता.भरगच्च पगाराची नोकरी होती.सुरवातीला शारदा तिकडे रहायला खूश होती.पण जस जसे दिवस जायला लागले तस तसे तिला घरी एकटेपण जाणवायला लागलं.दिनेश दिवसभर कामावर असल्याने त्याचा वेळ जात होता.

शारदा, नंतर एकटीच खरेदी करायला बाहेर पडायची.पण बाहेर प्रचंड उष्मा आणि बायकांना बुरखा घातल्या शिवाय बाहेर फिरता येत नव्हतं हे तिला फारच जाचायला लागलं.भारतात परत जाऊन आपण एखादं लहानसं हॉस्पिटल काढावं असा प्रस्ताव तिने दिनेश समोर ठेवला.दिनेशला ते मान्य झालं.दिनेश आणि शारदा तशी घरची बरीच श्रीमंत होती.त्यामुळे त्यांना ते सहजच जमून आलं.

कोकणात असताना शारदाचं आणि शरदचं चांगलंच जमलं होतं.आम्ही म्हणायचो की ती शरदशीच लग्न करून संसार करणार.
“लग्न वरती ठरत असतात.आपल्या हातात काही नाही.”
असं दिनेशशी लग्न झाल्यावर एकदा शारदा मला म्हणाल्याचं आठवतं.शरदच्या संबंधाने ती म्हणत होती ते मला कळायला वेळ लागला नाही.शरदचं मात्र लग्न झालंच नाही.शारदेला हे माहित होतं.तिच्या लग्नालाही तो आला होता. नंतर कधीतरी तिला तो घरी भेटून जायचा.

असंच एकदा मी शारदेकडे तिला भेटायला गेलो होतो. तेव्हा शरद गेल्याची वाईट बातमी मला तिने सांगीतली होती. तिच्या घराच्या बाहेरच्या खोलीत एक झोपाळा होता. त्यावर आम्ही दोघं बसलो होतो.जुन्या आठवणी काढून ती माझ्याशी गप्पा मारत बसली होती.
“खूप दिवसानी मी झोपाळ्यावर बसलो आहे.लहानपणी झुल्यावर बसून खूप उंच उंच झोके घेतले ते आठवायला लागलं आहे.”
असं मी तिला म्हणताच मला म्हणाली,
“झोपाळ्यावर झोके घेतल्याचं कुणाला आठवत नसावं?.तुम्ही लहान असताना एखाद्या झोक्यावर कदाचीत तुमच्या बाबांनी किंवा आईने तुम्हाला झोके दिले असतील,मोठ्या बहिणीने किंवा तुमच्या भावाने तुम्हाला झोपाळ्यावर बसवून उंच झोके दिले असतील किंवा कदाचीत स्वतः तुमच्या तुम्ही झोके घेतले असतील.सुरवातीला एकट्याने झोके घेताना तुम्ही थोडे घाबरूनही गेला असाल किंवा नसालही.
“फार उंच झोके घेऊं नकोस”
उंच झोके घेताना पडायला होईल आणि लागेल म्हणून तुमच्या आईने तुम्हाला सांगीतलेही असेल.”
शारदेला पण तिच्या लहानपणची आठवण येऊन मला ती झुल्याबद्दल सांगत होती.

“कसंही झालं तरी झोके घेत असताना परतीच्या झोक्याने तुमच्या तोंडावरून जाणार्‍या वार्‍याने होणारा आनंद,तसंच, असं होत असताना विस्कळीत होऊन उडणारे तुमच्या डोक्यावरचे केस भुरभूरताना होणारा आनंद विरळाच म्हणायला हवा.झोका उंच उंच आकाशात जाण्यासाठी झोपाळ्याला दिला गेलेला बळाचा वापर कसा होत होता हेही त्यावेळी तुमच्या नक्कीच लक्षात येत असावं.”
मला पण झुला किती आवडायचा ते माझ्या कल्पनेतून मी शारदेला सांगत होतो.
आणि पुढे तिला म्हणालो,
“खेळाची मैदानं,पार्कस,झाडाच्या मोठ्या फांद्या,वडाच्या पारंब्या ह्या झोका घेण्याच्या अशाच काहीश्या जागा असल्याने तुमच्या बाळपणापासून तुम्ही त्याचा आनंद घेत वाढत असता.तुम्ही त्यातून वाढत असता म्हणजेच तुम्ही त्यातून बाहेरही पडत असता.तुम्ही बाहेर पडत असता कारण तुम्ही मोठे होत असता आणि तसं तुमच्या मनातही म्हणत असता.”

“पण हे म्हणणं काही खरं नाही.”
मला मधेच अडवीत शारदा मला म्हणाली.आणि पुढे सांगू लागली,
“झोके घेणं म्हणजेच जीवनातली अगदी साध्यातली साधी मजा करणं.झोके घेण्याच्या आनंदातून परागंदा व्हायला काहीच कारण असूं नये.
माझ्यासाठी मात्र माझ्या कुमारी-वयातल्या साठून राहिलेल्या स्मृती, झोपाळ्याशी निगडित आहेत.माझ्या मनात असलेला माझा प्रियकर-शरद- ज्याच्याशी मी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रणय केला त्या झोपाळ्याला संबोधून आमचा प्रणय होत होता.शरदच्या घराच्या मागच्या पोरसात असलेल्या झोपाळ्या जवळ आम्ही कित्येक वेळा भेटत असूं.कधी कधी आमच्याबरोबर आमच्या आणखी मित्र-मैत्रीणी असायच्या.काहीवेळा आम्ही फक्त दोघंच असायचो.”

नकळत झोपाळ्याचा विषय काढला गेल्याने, शरद गेल्याचं मनात आणून,लहानपणीच्या आठवणी येऊन शारदा बोलत आहे हे मी तेव्हाच ताडलं.
“आम्ही जसे मोठे होत गेलो तसे जीवन आणि प्रेम ह्यावर आमचं दोघाचं खोलवर बोलणं ह्या ठिकाणी व्ह्यायचं.
कधी कधी शाळेतल्या अगदी अर्थशून्य गोष्टीवर आमची चर्चा व्हायची.”
मला शारदा सांगत होती.
“जास्तीत जास्त उंच झोका घेण्यापासूनच्या स्पर्धेपासून,झुल्यानेच आम्हाला हवं तसं हिंदोळत ठेवावं अश्या दोलायमान मनस्थितीपर्यंत आम्ही असायचो.
त्यावेळी झुला,माझ्या बालिश आनंदापलीकडे, माझ्या अंतराचा एक भाग झाला होता.

माझ्या प्रणयाच्या सुरवातीचा,मध्य आणि अखेरच्या अवस्थेचं प्रतीक म्हणजे हा झुलाच होय.आमचा प्रणय त्या झुल्यासारखाच होता असं तुम्ही म्हणाल, असा मी तर्क केला, तरी ते तुमचं म्हणणं मला ऐकायला आवडेल.”

“मला पण तुझ्याकडून आणखी ऐकायला आवडेल.”
असं मी म्हणताच शारदा म्हणाली,
“जसं झुल्याला ढकलतात तसं सुरवातीला आमच्या प्रणयाचं झालं.प्रणयातला खरा आनंद मिळायला ढकलण्यासाठी काहीसं बळ लागलं.पण एकदा त्याची सुरवात झाल्यावर नंतर रुकावट आली नाही.शब्दशः आणि रुपकात्मकतेने नंतर आमच्या उंच भरार्‍या होत होत्या.आम्हाला दोघांना मिळून मजा येत होती आणि आम्ही तरूण-प्रीतीच्या प्रचलतेचे शोध घेत होतो.अखेरीस थोडसं मंदगतीत येऊन नंतर एकाएकी झुल्यावरून उड्याच घ्याव्या लागल्या. शाळेची पुन्हा सुरवात होणार असल्याने हे सगळं थांबवावं लागणार आहे हे आम्हाला माहित झालं होतं.आम्ही गती थोडी मंद करू शकलो
होतो.पण जमिनीवर पाय घासल्याशिवाय ते शक्य नव्हतं.पण नंतर अर्धवट मंदगती झाली असतानाच उडी घेतली. आम्हाला माहित होण्याअगोदरच सर्व संपत आलं होतं, शिवाय त्याला काही इलाज नाही हे ही आम्हाला माहित होतं.
आमची उन्हाळी-सुट्टी संपली होती.पण आमची प्रीत मात्र हिंदोळ्यावर योग्य वेळ साधून बसून होती.”

शारदेचं लग्न होऊन इतकी वर्ष होऊन गेली तरी शरदबद्दलच्या भावना आणि त्याच्या आठवणी शारदेच्या मनात जागृत होत्या.पण आता तो कायमचाच गेल्याने त्या जास्तच उफाळून वर येणं अगदी स्वाभाविक होतं.

“माझ्या मनातलं शेवटचं सांगते”
असं म्हणत मला शारदा म्हणाली,
“त्यानंतर जरी मी आणि तो झुला,दिव्व्या मधून तरून गेलो होतो तरी कुणीही मला त्याचा आनंद उपभोगायला यापूढेही वंचित करू शकणार नाही हे मला माहित होतं.शक्य आहे की,तुम्हाला वाटत असेल त्यापेक्षा मला त्याचं प्रतिनिधित्व जास्त भावतं.
माझ्यासाठी तो झुला माझ्या बालपणाच्या स्मृतिंचं प्रतिनिधित्व करतोच शिवाय माझ्या युवावस्थेत ते थोडं जास्तच करतो.”

मला खरोखरच शारदेची कीव आली मी तिला म्हणालो,
“भूतकाळात गेल्यावर,तू त्या स्मृतिंची निवड केल्यास हा हिंदोळा त्या आठवणींकडे तुला केव्हाही घेऊन जाणारच.मला वाटतं की तुझ्या झुल्यासाठी आणि त्यावर झोके घेण्यासाठी तू कधीही तुला वयस्कर झालीस असं मुळीच वाटून घेऊ नकोस.”

एव्हड्यात खाली गाडीचा हॉर्न वाजल्याचं आम्ही दोघांनी ऐकलं.
“दिनेश हॉस्पिटलमधून आला”
असं शारदा म्हणाली. आम्ही दोघंही बाल्कनीत त्याला पाहायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com