Thursday, April 29, 2010

भोळा कोकणी शेतकरी.

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”

त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ. कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.

एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.

“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.

दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.

खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”

मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”

“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही. आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.

“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.

“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”

भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”

“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”

असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”

“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”

चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”

“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो. शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”

चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला नकोच.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 26, 2010

सुखावलेल्या स्मृति.

“अलीकडे मी जेव्हा,जेव्हा तुझ्याकडे यायचो त्यावेळी तुझ्या आजीशी बोलताना माझ्या लक्षात यायचं की दिवसे दिवस ती असंबंध बोलायची.”
मी सुरेखाला म्हणालो.
“एकदा तर तिने माझ्यासाठी दरवाजा उघडून चक्क विचारलं,
“तुम्ही कोण?”
त्याच वेळी मी समजलो तुझ्या आजीला अल्झाईमर सारखं काहीतरी झालं आहे.”

मला हे सुरेखाला सांगावं लागलं जेव्हा ती मला म्हणाली,
“माझी आजी जसजशी वयस्कर व्हायला लागली तसं मला वाटायला लागलं की तिच्या मनात खोड-रबराने बस्तान माणलं आहे आणि तो खोड-रबर हळुहळू तिचं स्मरण खोडायला लागला आहे.माझी आजी माझ्या आजोबांना, मुलांना आणि आपल्या नातवंडांना आठवूं शकत नव्हती.”

“अल्झाईमर ह्या रोगाला, म्हातार्‍या वयात लागलेलं “बाळं” असं कोकणात म्हणतात.ह्या रोगाने अगदी जर्जरलेली व्यक्ति लहान मुला सारखी-बाळा सारखी- वागते.”
सुरेखाला “बाळं” कशाला म्हणतात हे मी समजावून सांगत होतो.
“ह्या वयात हा रोग होण्याची अनेक कारणं असू शकतात असं शोध घेणारे म्हणतात.आणि हा रोग उतार वयात जास्त होतो.६५ आणि ७४ ह्या वयात जास्त होतो.त्याचं प्रमाण ३ टक्के आहे.७५ पेक्षा जास्त वयात प्रमाण १९ टक्क्यावर जातं.आणि ८५ हून जास्त वय असलेल्याना ४७ टक्के धोका असतो.”

सुरेखा आपल्या आठवणी जागृत करून मला म्हणाली,
“मला आजीकडे पाहून दुःखं व्ह्यायचं.मी तिला भेटल्यावर एव्हडाच प्रयत्न करायची की मी तुझी नात म्हणून तिला सांगायची.पण ती पटकन विसरून जायची.पण तिच्या चेहर्‍यावरचं हास्य मोहक असायचं.अगदी लहान मुल हंसल्यासारखं तिचं हसूं असायचं.माझं नाव सांगीतलं की ते परत परत म्हणायची आणि मान हलवून लक्षात आहे असं भासवायची.”

“अगदी बरोबर”
असं सांगून मी तिला म्हणालो,
“लक्षात राहत नाही.दुवा जोडता येत नाही.विचारलेला प्रश्न कदाचीत कळत नसल्याने संदर्भासहीत उत्तर देता येत नाही. शरीराला लागणार्‍या क्रिया-प्रातर्विधी,जेवण,आंघोळ- केल्या की नाही हे लक्षात रहात नाही.सगळे वागण्याचे प्रकार अगदी लहान बाळा सारखे असतात.”

सुरेखाला आपल्या आजीची आठवण येऊन खूपच वाईट वाटत होतं.
मला म्हणाली,
“नशिब म्हणायचं की माझी प्रेमळ आजी माझ्यावर तिची छाप ठेवून गेली.कदाचीत आपल्या नातीची छाप तिच्यावर पडण्या अगोदर ती देवाघरी गेली असावी.माझी आजी साधी होती पण ती चौकस होती. ती कुणी सांगीतलं तर सहजासहजी विश्वास ठेवायची.
आणि कुणाचं वाईट ऐकलं की सहानुभूती दाखवायची.”

सुरेखाला धीर द्यावा म्हणून मी तिला म्हणालो,
“गतकालाला एकटच सोडून द्यावं.कारण आता तो अस्तित्वातच नसतो.तरीसुद्धा चांगल्या स्मृति आपण जोपासून ठेवायला हव्यात.
ज्या गोष्टी आपण आपल्या स्मृतित कोरून ठेवल्या असतात आणि ज्या स्मृति आपण विसरून जायला हव्यात त्या दोन्हीही आपल्या मनात मागमूस ठेवून असतात.कधीकधी,जून्या आठवणी असण्यात परमानंद असतो.जून्या अनुभवांचे लहान लहान तुकडे जुळवून एखादं कोडं तयार केलं जाणं त्यालाच स्मरण म्हटलं पाहिजे.जशी ज्योत प्रकाशाचा गाभा असतो तसंच स्मरण हे आत्म्याचं आहे.ज्योतीविना प्रकाश तळपायचा कसा?”

हे ऐकून सुरेखा बरीच आनंदी दिसली.मला म्हणाली,
“मी दहा वर्षाची होईतो मी माझ्या आजीच्या सहवासात होती.तिच्या सहवासात राहून आनंददायी आठवणी ती माझ्याजवळ ठेवून गेली. माझ्या

आईबाबांइतकीच ती माझ्या जवळची होती.कुणालाही स्मरणशक्ति उजळण्यात आनंद होत असतो.माझी आजी सकाळीच उठून ताजं ताजं जोंधळ्याचं पीठ काढण्यासाठी जात्यावर बसून ओव्या म्हणायची त्या दिवसभरात मी कधी कधी त्यातली एखादी ओवी गायचे, ते ऐकून ती एव्हडी खूश व्हायची की मला जवळ घेऊन परत गायला लावायची.

मला वाटतं,आठवणी खरंच रम्य असतात.
माझी आजी माझ्या परकरातल्या नाड्या ओवायची,ब्लाऊझची तुटलेली बटणं शिवायची.

आठवणी खरंच जीवघेण्या असतात.
मी माझ्या आजीला तिच्या हाताला धरून ओढून ओढून माझ्या दोन वेण्या घालायला मदत मागायची.

मला वाटतं आठवणी स्फूर्तीदायक असतात.
मला आठवतं ती कधी बाजारात गेली तर माझ्यासाठी सोनचाफ्याची फुलं,ओवळीचे आणि बकुळीचे सर,किंवा आबोलीच्या वेण्या आणून मला जवळ बोलावून माझ्या डोक्यात माळायची.

खरंच मला वाटतं आठवणी सप्तरंगी इंद्रधनुष्यासारख्या असतात.
डोळे ओले झाल्यावरच इंद्रधनुष्य दिसायला लागतं.”

“स्मृति किती लक्षवेधक असतात सांगू.”
असं म्हणून, सुखावलेल्या स्मृतिचा आस्वाद घेत घेत सुरेखा स्वतः सुखावल्याचं पाहून मी तिला पुढे म्हणालो,
“स्मृतिशिवाय गतकालाला कुणीही स्पर्श करू शकत नाहीत.मला वाटतं आठवणी वेदनादायक असतात.तरीसुद्धा त्या आपल्याला वाढू देतात.आपण स्मृतिहीन झालो की आपली अवस्था नवजात मुलासारखी होते. मला वाटतं स्मृतिमुळेच आपल्या चेहर्‍यावर भाव दिसतात.मला वाटतं आठवणी असे पर्यंतच आपण आनंदित असणार.”
शेवटी सुरेखा मला म्हणाली,
“माझी आजी गेल्यावर मी खूप रडले.कायम राहायला मी तिला सांगू शकत नव्हते हे मला माहित होतं,पण माझ्या स्मरणात ती कायमची आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 24, 2010

राधिकेची श्रद्धा.

“वा! वा! बहूत अच्छे! होऊन जाऊदे.आज तुझ्या अंगात प्रोफेसरांचं वारं शिरलेलं दिसतंय.ऐकीन तेव्हडं कमी आहे.” मी म्हणालो.

“मिळालेलं रीतसर शिक्षण आणि मिळालेला अनुभव ह्याने मला जरी आधुनीक तर्कशास्त्र समजण्याच्या अवस्थेत आणून ठेवलं असलं तरी ते मला नेहमीच्या जीवनातल्या अनुमानात,निष्कर्षात आणि वास्तवीक निर्णयात चिकटून राहायला सर्व अपूरं वाटतं. त्यामुळे कुठच्याही गोष्टीची श्रद्धा ठेवणं हे तर्कसंगत विचाराला जरूरीचं आणि मनाला दिलासा देण्यासाठी पूरक आहे असं वाटतं.”
राधिका मला आपल्या मनातले विचार सांगताना म्हणाली.

आज प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.पण भाऊसाहेब घरी नव्हते.ते त्यांच्या मुलाकडे त्यांच्या प्रकृतीच्या ऍन्युअल-चेकअपला गेले होते.त्यांच्या प्रायमरी-केअर-फिजीशियनचं (पी.सी.पी.) क्लिनीक त्यांच्या मुलाच्या घराशेजारीच आहे. असं मला त्यांची मुलगी राधिका म्हणाली.
प्रो.देसायांची मुलगीच ती!.एखाद्या विषयावर साधक-बाधक चर्चा करायला मागे पहाणारी कशी असेल.?
नुकतंच मी रेडीयोवर “फेथ” ह्या विषयावर एक भाषण ऐकलं होतं.ते राधिकेने पण ऐकलं होतं.त्याच्या संदर्भात ती मला सांगत होती.

मीच तिला विषय काढून विचारलं होतं,
“खरं म्हणजे श्रद्धेचा अर्थ तरी काय असावा? ह्या प्रश्नाला समर्पक आणि सम्मिलित असं साधं उत्तर नाही.”

“ह्यापेक्षा जास्त मी तुमच्याशी सहमत होऊंच शकणार नाही.”
असं म्हणून राधिका पुढे म्हणाली,
“मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतली माझी शिक्षीका प्रशंसा करण्यालायक होती. तिची जी श्रद्धा होती त्यावर तिचा विश्वास होता.मी ज्या शाळेत संगीत शिकायला जायचे त्या बाईंचं पण तसंच होतं.माझा सुद्धा माझ्या मनात जी श्रद्धा आहे त्यावर पूर्ण भरंवसा आहे.”

मी राधिकेला म्हणालो,
“विश्वास बसावा अशी क्षमता असलेल्या आणखी अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत.उदा.लोकांवरची श्रद्धा.मला नेहमीच वाटत असतं की लोकांमधे वाईटपणा ऐवजी चांगूलपणाच जास्त असतो.आणि म्हणूनच लोकशक्तिवर माझा विश्वास आहे.लोकशाही किंवा लोकशक्ति हा शब्द वापरायला मी थोडासा कचरतो.
कारण अलीकडे त्या शब्दाचा अर्थ थोडा विकृत झाला आहे.पण माझी खात्री आहे की खरा लोकशक्तिचा अर्थ,योग्य समय आल्यावर,स्पष्ट होईलच.
आणि म्हणूनच माझी तरी समयावर श्रद्धा बळावली आहे.”

“घरातली मुलभूत मुल्य,कुटूंब आणि जवळचे ह्यांच्यात आपली श्रद्धा असणं स्वाभावीक आहे.मला हवंय आणि मला जरूरी पण आहे ती आहे प्रेमाची, सुखकर सहचर्याची,आदराच्या स्वीकृतिची. मी कुणाला नेहमी हवी,हवी व्हावं असंही मला वाटत असतं.”
राधिका आपला मुद्दा सांगू लागली.
“ही मुल्य त्यामधून,श्रद्धा साधतात. आणि त्यामुळे जीवनातल्या संघर्षाशी दोन हात करायला मला मजबूती आणतात. आशा-निराशा,आशाभंग आणि आश्वासनं असले प्रकार जीवनात येतच असतात.”

मला आणखीन एक श्रद्धा आठवली.मी म्हणालो,
“स्वतःबद्दलची पण श्रद्धा असते.ह्या श्रद्धेचं रूपांतर अहंकारी आत्मविश्वासात किंवा वयक्तिक मिथ्याभिमानात होता उपयोगी नाही.परंतु,जीवन जगताना कुशल आत्मविश्लेषण केल्याने सुरवातीपासूनच चुका होण्यापासून प्रतिबंध आणला जातो.तरीपण नम्रता बाळगून ठेवायला सततची सतर्कदृष्टी असावी लागते.”

माझं हे ऐकून राधिका थोडी विचारात पडली.तेव्हड्यात आत जाऊन येते असं म्हणून,येताना दोन चहाचे कप घेऊन येत एक माझ्या हातात देत मला म्हणाली,
“मी मला स्वतःला जर का योग्य दृष्टीकोनातून पहात राहिले तर असं जीवन जगणं कठीण होणार नाही.होऊन गेलेले, असलेले,आणि होणार्‍या अब्जावधी लोकांपैकी मी एक आहे.पण मी आणि माझी श्रद्धा काहीतरी उपयुक्त असं,मग ते कितीही सामान्य का असेना, पण अविरत प्रयत्न करून, त्याची जीवानात भर घालण्यात निभावले तरी मी म्हणते फत्ते.
भावी जीवनावर माझा भरंवसा आहे.सध्याची अवस्था असलेल्या जगात जिथे धर्म,सामाजिक धारणा,आर्थीक सिद्धांत, राजकीय उद्देश,आणि वयक्तिक महत्वाकांक्षा,आहेत तिथे श्रद्धा असण्याची असीमित आवश्यक्यता आहे.हे जग असंदिग्ध सौजन्य आणि असाधारण प्रतिभा असलेल्या लोकांनी पावन झालेलं आहे.माझी श्रद्धा आहे की कधी कठीण प्रसंग शिरोबिन्दुला येऊन पोहचल्यास हे लोक नक्कीच नेतृत्व उद्भवायला कारणीभूत होतील.इतिहासाने त्या श्रद्धेचं औचित्य सिद्ध केलेलं आहे.”

“वा! वा! बहूत अच्छे! होऊन जाऊदे.आज तुझ्या अंगात प्रोफेसरांचं वारं शिरलेलं दिसतंय.ऐकीन तेव्हडं कमी आहे.”
असं मी म्हणताच,मला राधिका म्हणाली,

“शेवटी मला सांगायचं आहे की श्रद्धेतच मला श्रद्धा आहे.वादळी वातवरणातली ती एक नांगर आहे.हवेतसे वारे वाहोत, वीजा चमकोत,गडगडाट होवो आणि प्रचंड वृष्टी होवो श्रद्धेवरची श्रद्धा मला नेहमी स्मरणच देत राहील की पुन्हा सूर्य तळपेल,तारे पुन्हा प्रकट होतील,आणि रात्रंदिवसातली वार्‍याची शांत झुळूक पुन्हा एकदा अस्तित्वात येईल.”

चहाचा शेवटचा घोट घेत मी राधिकेला म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“अभेद्य काळोखात सुद्धा माझी श्रद्धा दैदिप्यमान असेल.”

माझ्या हातातला चहाचा रिकामा कप घेत,उठता उठता राधिका म्हणाली,
“ह्याच आदर्शाच्या शोधात मी होते.आणि भविष्यात पण त्याच आदर्शाच्या शोधात मी राहिन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 21, 2010

एलिझाबेथ पर्फ्युम.

“पण तुझ्या प्रत्येक झग्याला “एलिझाबेथ पर्फ्युमचा” सुवास नक्कीच येणार.”

इंदु माझी चुलत बहीण.तिच्या आयुष्याचा बराचसा भाग कोकणात वास्तव्य करण्यात गेला.तशी अधुनमधून ती मुंबईला तिच्या मुलीच्या फ्लॅट्मधे राहायला यायची.ह्यावेळी ती आली हे मला कळल्यावर तिला भेटायला मी गेलो होतो.
दरवाजा उघडताच झगा नेसलेली इंदु मला दिसली.
“अगं,इंदु तू?”
मी विस्मयीत होऊन तिला पहाताक्षणीच प्रश्न केला.तिची आजी नऊवारी लुगडी नेसायची.आणि इंदु सहावारी साड्या नेसायची.हा तिच्यात बदल कसा झाला?माझं कुतूहल वाढलं.
“कारे बाबा,तू काही झग्यातल्या बायका पाहिल्या नाहीस?”
इंदुने धीर करून मला प्रश्न केला.
मी म्हणालो,
“मी ज्यावेळी गोव्यात जातो त्यावेळी तुझ्या वयाच्या किरीस्तांव बायका ह्या पेहरावात पहातो.पण तुझा सहावारी साडीतला इमेज जो माझ्या डोक्यात होता त्याला थोडा धक्का बसला एव्हडंच.”
इंदु मला म्हणाली,
“ह्या बदलावाला एक पार्श्वभूमी आहे.ह्यावेळी माझ्या नाती जेव्हा अमेरिकेहून आल्या तेव्हा त्या माझ्या मागेच लागल्या मला म्हणाल्या,
“ग्रॅन्डमा,इकडच्या हवामानामदे आनि जास्त करून उन्याल्यामदे तुला सिक्सयार्ड सारी नेस्नं कसं जमतं.? आज पासून तू हे झ्यगे नेस.आमची तुला शपत आहे.तुझ्यासाठी जे.सी.पेनी मधून हे झगे विकत आनले आहेत.ममा म्हनाली होती तू ऐकनार नाहीस म्हनून, पन ते काय चालनार नाही.आपन ममाला सरप्र्याईझ देऊंया.”

मग काय करणार बाबा,जमाना बदलत आहे.माझंच खरं आणि दुसर्‍याला काही कळत नाही,अशी वृत्ति ठेवून राहिल्यास आपण मागेच पडणार आणि दुसरे वाट न पहाता पूढेच जाणार.फाजील घमेंड बाळगून चालत नाही. पुढच्या पिढीचं ऐकलं नाही तर एकमेकापासून दूर जाऊ.खरं तर हे झगे आता एकदा वापरायला सुरवात केल्यावर नंतर काहीच वाटत नाही म्हणा.”
इंदुने मला पार्श्वभूमी सांगीतली.आणि थोडीशी विचारत पडली.मी तिच्या डोळयात पाणी बघीतलं.डोळे पुशीत मला म्हणाली,
“मी माझ्या आजीला नऊवारी साडी शिवाय दुसरं काही नेसलेलं पाहिलंच नव्हतं.माझ्या लहानपणापासून मला नेहमीच वाटायचं, एव्हड्या उष्म्याच्या दिवसात ह्या नऊवारी साडीत आजी आरामात रात्री झोपायची तरी कशी? सकाळी ऊठल्यावर माझी आजी तरतरीत कशी दिसायची?”

“हल्लीची नातवंडं फार हुशार आणि खरं ते चटकन सांगणारी आहेत.”
मी इंदुला तिच्या आजीच्या वेळेतला आणि आता ती स्वतः आजी झाल्यानंतरच्या वेळेतला माणसाच्या आचार-विचारातला समज तोच असूनही स्पष्ट सांगण्याच्या हिम्मतीतला फरक एका वाक्यात समजावून देण्याचा प्रयत्न करीत होतो.
इंदुचं आपल्या आजीवर खूप प्रेम होतं.तिची आठवण आल्यावर बरंच काही मला सांगावं असं तिच्या मनात आलं असावं.म्हणून तिने आपले डोळे पुसले असावेत.

मला इंदु म्हणाली,
“अंथरूणात खिळलेली माझी आजी,नाकाला ऑक्सीजनची नळी लावून,एका डोळ्याने अधु झालेली,अलीकडेच हृदयविकाराचा झटका आलेली,दुसरं काही नाही तर अगदी सैल असा झगा घालून,झग्याची काही बटणं थोडीशी उघडी टाकून,काहीश्या नग्नावस्थेत झोपलेली पाहून ते दृश्य त्यावेळी माझ्या कल्पनांच्या पलीकडचंच मला वाटलं होतं”.
मी ह्या दोन नातवंडांची आजी होण्याआधी कोकणात असताना एकदा आजीच्या साड्यांचा विषय मी माझ्या मावशीकडे काढला होता, याची आता मला आठवण आली.”

इंदुच्या आजीच्या नऊवारी साड्या,इंदुच्या जमन्यात “आऊट ऑफ फॅशन” झाल्याने कुणी नेसल्या नाहीत आणि तशाच पडून राहिल्या.तसंच आपल्या सहावारी साड्या,अशाच पडून रहाणार असं काहीसं इंदुच्या मनात येऊन, रिवाज बदलल्यानंतर वस्तू कशा निकामी होतात हे माझ्या ह्या नातवंडांना कळत नसावं असा काही तरी मुद्दा तिला मांडायचा विचार आहे असं मला वाटलं.आणि मी तिला म्हणालो,
“सहावारी साड्या नेसण्याची अजून फॅशन आहे.वाटलं तर दे कुणाला तरी नेसायला.”
माझं हे ऐकून इंदु का हंसली ते मलाच कळलं नाही.

मला म्हणाली,
“तुला वाटतं तसं मुळीच नाही.माझ्या मनात त्यावेळी निराळाच विचार आला होता.माझ्या मावशीने जेव्हा मला माझ्या आजीच्या साड्या दाखवल्या तेव्हा माझ्या पटकन ध्यानात आलं की मी ह्या साड्यांचं काही तरी बनवावं. जुन्या आणि नव्या रंगीबेरंगी साड्या एकमेकावर दोन रकान्यात नीट रचून ठेवल्या होत्या ते पाहून,मी जेव्हा माझ्या मावशीला म्हणाले,
“मला ह्या साड्यांच्या गोधड्या करायच्या आहेत.”
ते ऐकून तिचा चेहरा मला अगदी शंकेखोर दिसला.
माझी मावशी माझा विचार ऐकून म्हणाली,
“ह्या साड्या मौल्यवान आहेत,आठवण म्हणून त्या नेसल्या गेल्या पाहिजेत.त्या काही कापण्यासाठी नाहीत.”

इंदुच्या मावशीचं हे बोलणं ऐकून मी इंदुला म्हणालो,
“तुझ्या मावशीच्या तिच्या आईबद्दलच्या भावना समजण्यासारख्या आहेत.तिचा चेहरा तसा होणं अगदी उघडंच आहे.”

मला इंदुने सरळ सांगून टाकलं,
“माझी आजी गेल्यानंतर,मी त्या साड्यांच्या गोधड्या करण्याचा माझा विचार पुढे दामटला.पण ज्यावेळी माझ्या आजीच्या साड्या कापायची वेळ आली त्यावेळी मला मोह टाळावा असं वाटूं लागलं.
मी त्या साड्या कापून आजीला अनादर दाखवीत आहे असा मला वाटणार्‍या माझ्या मावशीच्या आरोपापेक्षा ती वास्तवीकता,की त्या साड्यांचं तलमी कापड,तसं चैनीचं होतं आणि माझ्या आजीच्या अंगाला इतकं लपेटलेलं असायचं की त्यातून तिची दिसणारी विनयशीलता,व्यक्त करणारं तिचं स्त्रीत्व, ऊन्हापासून संरक्षण करण्याची पात्रता,आणि नेसल्यावर सौन्दर्य खुलून दिसण्यात होणारी भर ह्याची आठवण येऊन मला मोह टाळावा असं वाटलं.”

इतकं मनात वाटून सुद्धा इंदुने साड्या कापल्या की नाही ह्याचं कुतूहल माझ्या मनात वाढू लागलं.अधीर होऊन मी तिला विचारलं,
“मग त्या साड्या कापल्यास की नाही?”

मला इंदु म्हणाली,
” अगणीत वेळा माझ्या आजीने त्या साड्यांच्या घड्या तिच्या हाताने केल्या असाव्यात.आणि माझ्याकडून कातरीने एकदा का कापणं झालं की त्या साड्या आतापर्यंत जशा होत्या तशा रहाणार नाहीत असं एक सारखं मला वाटायला लागलं.
“काही हरकत नाही.काप तू!”
मी माझ्या मलाच आज्ञा देऊन कापायला सुरवात केली. झालं त्यानंतर,कामगीरी सरळ झाली.गोधडी शिऊन झाल्यावर कुणालाही दिसू लागलं, की प्रत्येक तुकड्याच्या-थराच्या- बाजू एकमेकाशी सारख्या दिसत नव्हत्या. अगदी मऊसर फिकट नीळसर आणि भडक लाल रंगाचा साडीचा एक तुकडा सुंदर पिवळ्या,हिरव्या साडीच्या तुकड्याशी थोडासा न जुळल्यासारखा दिसायचा.गोधडीवर केलेली शिवण नियमीत आणि सफाईदार दिसत नव्हती.
परंतु,सगळे तुकडे एकत्र करून तयार झालेली गोधडी,ह्या सर्व त्रुटी दूर करून केवळ मीच करू शकले असं वाटून आपल्याआपणच सूंदर दिसायला लागली.”

मी इंदुला म्हणालो,
” गोधड्या बनवण्याचा केव्हडा तो व्याप.सर्व साड्या धुवायच्या, वाळवायच्या आणि इस्त्री मारून मग त्या कापायच्या.पण एक खरं आहे.येऊ घातलेल्या नातवंडांच्या प्रेमापोटी कुणीही आजी गोधड्या बनवण्याचा हा व्याप घ्यायला तयार असावी. स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोधडीत ते इवलंसं नातवंड स्वस्त झोपलेलं पाहून प्रत्यक्ष आजी झाल्याशिवाय तो ब्रम्हानंद कसा कळायचा? “
इंदु खूपच खूश झालेली दिसली.

मला म्हणाली,
“मी एकही साडी धुतली नाही.त्या साड्यांवरचे डाग आणि साड्यातून येणारा गन्ध, ती कसं जीवन जगली याचं चालतं बोलतं साक्ष देणारं उदाहरण होतं.आणि माझ्या रहाण्याच्या शैलीपासून अगदीच वेगळं होतं.
तिचं आयुष्य आमट्या शिजवण्यात,हळदीने साड्या डागळवण्यात, मोकळ्या पायांनी धुळीने माखलेल्या जमीनीवरून चालण्यात, पुजा-आर्चेच्या कर्मकांडात भाग घेण्यात,दुपारचं झोपून उठल्यावर चहा किंवा कॉफी पिण्यात,आणि जवळीक वाटणार्‍यांना घट्ट छाती जवळ घेऊन अलिंगन देण्यात गेलं.”

इंदु एव्हडी भावूक झालेली मी पहिल्यांदाच पाहिली.मी तिला जोर देण्यासाठी म्हणालो,
“मला खात्री आहे की आपल्या आजीच्या साड्या कापायला आपल्याला पूर्ण हक्क आहे.त्या काही खूंटीवर टांगून धूळ खात ठेवण्यासाठी नसाव्यात. मला वाटतं त्या साड्यापासून आपण जे काही बनवू त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपण निरहंकारी बनलं पाहिजे.
मला असं वाटतं की त्यावरचा प्रत्येक डाग घालवण्याची काही जरूरी नसते.शिवाय साडी कापल्याने त्याचं सौजन्य सांभाळलं जातं.
मला असंही वाटतं की,प्रेम करणं आणि त्या प्रेमाची अमर्याद गहराई प्रकट करण्यासाठी आपल्यात हिम्मत राखून आपण मिळालेला वारसा नव्या आकारात बदलला पाहिजे”

“पण बाबा,आता जमाना बदलला आहे.आता कोण एव्हडी मेहनत घेऊन गोधड्या तयार करतोय?सर्व काही बाजारात विकत मिळतं. माझी ही अमेरिकन नातवंडं माझ्या सहावारी साड्या कापून आपल्या नातवंडांसाठी गोधड्या बनवतील असं तुला वाटतं का?
त्यांना अलिंगन देत,देत एव्हडंच म्हणायचं माहित आहे,
“ग्रॅन्डमा,आय लव्ह यू!”
आणि नंतर,
“मी टू!”
असं मी म्हटल्यानंतर संपलं.”
जरा गंमत म्हणून मी ही हंसत हंसत इंदुला म्हणालो,
“पण तुझ्या प्रत्येक झग्याला तुझ्या नातवंडांच्या अलिंगनाने “एलिझाबेथ पर्फ्युमचा” सुवास नक्कीच येणार.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 19, 2010

कळेना कसे मी नकळत तुला रडवीले

अनुवादीत (न जाने कैसे…..)

कळेना कसे मी नकळत तुला दुखवीले
कळेना कसे मी नकळत तुला रडवीले
अंग आंसवानी तुझे नी माझे भिजवीले
कळेना कसे समयाने न ते सुकवीले
कळेना कसे मी नकळत तुला रडवीले

साद घालूनही तू दूर जाण्याचे ठरवीले
स्पर्शताना तुझ्या श्वासाला श्वास माझे संपले
कळेना कसे मी दूर करू तुझे रुसणे
कळेना कसे मी शब्द ओठावर आणीले
कळेना कसे मी नकळत तुला दुखवीले

संगतीतले ते दिवस जमेल का विसरणे
डाग अंगावरचा शक्य होईल का धुणे
लिपटलेला बाहुपाश शक्य होईल का सोडणे
बंधन अपुले झोक्याकरवी जमेल का तोडणे
कळेना कसे मलाच मी रिझवीले
कळेना कसे मी नकळत तुला रडवीले

स्वपनात माझ्या येऊनी ऐक माझे म्हणणे
श्वास शेवटचा असे तोवरी जमेल का वि़सरणे
कळेना कसे जहाले तुझे न माझे जवळी येणे
कळेना कसे मी नकळत तुला दुखवीले
कळेना कसे मी नकळत तुला रडवीले

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 16, 2010

“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”

“गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत, डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.”

सुधाकर करमरकरचा मुलगा,हर्षद, शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.नंतर शिक्षण पूरं झाल्यावर तिथेच स्थाईक झाला. स्वतःची कंपनी काढून तिथेच बिझीनेस करायला लागला.मुंबईत एखादं घर असावं म्हणून त्याने ठाण्याला घोडबंदर रस्त्यावर,टुमदार बंगले बांधणीच्या स्कीममधे पैसे गुतंवून आपल्यासाठी एक बंगला घेण्याचा बेत केला.
सुधाकर घरचा धनाड्य.त्याचे वडील,काका डॉक्टर होते.आत्या मुंबईला एका कॉलेजात प्राध्यापिका होती.सुधाकर स्वतः शेतकीइंजीनियरींग शिकला, आणि घरची शेतीवाडी पहात आहे.सरस्वती आणि लक्ष्मी करमरकरांच्या घरात स्थानापन्न होती.
हर्षदने अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याचं नुसतं मनात आणलं आणि त्याच्या मनासारखं झालं.

“आपले बाबा एव्हडं शेतीबद्दल शिकले आहेत मग त्यांचा उपयोग आपल्या बंगल्याच्या समोर आणि मागे एखादा सुंदर बाग-बगीचा करून घ्यावा.”
असं हर्षदच्या मनात आलं आणि मला त्याने तिकडून फोनकरून कळवलं. म्हणून मी मुंबईला थोडे दिवसासाठी येऊन बागेच्या तजवीजेला लागलो.”
सुधाकरने मला फोन करून ठाण्याला आपल्याला भेटायला ये म्हणून कळवलं.आणि मी त्याला भेटलो तेव्हा तो मला असं म्हणाला.

“मी निसर्गदृश्य रम्य दिसण्यासाठी सल्लागार म्हणून काम इथेच करावं असं इथे आल्यावर इकडच्या लोकांच्या मनात आलं. मला इकडच्या आणखी बंगल्यांची बगीचे बनवून घेण्याची कामं मिळाली.”
इतर टुमदार बंगले आणि सभोवतालचे बगीचे बघून मी सुधाकरला त्याबद्दल विचारल्यावर मला त्याने असं उत्तर दिलं.

सुधाकर पूढे म्हणाला,
“माझ्या गिर्‍हाईकाना उत्तम बगीचा देऊन त्यांना बगीच्यांची देखभाल ठेवायला कमीत कमी भार पडावा म्हणून बगीचे बनविण्यासाठी मी माझ्याकडून त्यांना मदत करायला लागलो.पण एखादं गिर्‍हाईक मला सांगायचं की असा बगीचा त्यांना हवा की तो तयार झाल्यानंतर त्यात मुळीच काम करण्याची आवश्यक्यता नसावी. हे ऐकल्यावर मला वाटायचं, सगळं सोडून बगीच्यात काम न करण्याची गरज यांना का भासावी.?”

मी सुधाकरला म्हणालो,
“अरे बाबा,आता जमाना पूर्वीचा राहिलेला नाही.पैशाच्या जीवावर आपोआप सर्व मेहनतीची कामं केली जावी अशी पैसेवाले अपेक्षा करतात.झाडांना हाताने पाणी द्यायला नको.आता टाईमर्स सहीत स्प्रिंक्लर्स आले आहेत.बाकी बागेतली कामं,उदा. विड्स, म्हणजे रानटी गवतांचे तृण उपटून काढणं, झाडांच्या जोमाने वाढणार्‍या फांद्या छाटणं,बाग साफ ठेवणं असली कामं करून देणार्‍या कंपन्या शहरात आल्या आहेत.कॉन्ट्र्याक्टवर त्या कंपन्या काम करून देतात.”

माझी ही सर्व माहिती ऐकून सुधाकर हंसायला लागला.
“मी ऍग्रीकलचरीस्ट आहे हे तू विसरलास की काय ?
असा प्रश्न करून मला म्हणाला,
“मी कोकणात शेतीवाडी पहात असलो तरी आधूनीक सुधारणाबद्दल पुस्तकं वाचीत असतो.माझा हर्षद मला त्या विषयांवर तिकडून मासिकं पण पाठवीत असतो.माझा मुद्दा निराळाच आहे.
बगीच्यात काम करणं हे प्रत्येकासाठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.नक्कीच,चांगला शारिरीक व्यायाम होतोच, तसंच कुणालाही बगीच्यात काम करण्याने,बागेची प्रशंसा करण्याची,चकित होण्याची आणि परख करण्याची संधी मिळते असंही मला वाटतं.”
सुधाकरचा बाग बनविण्याच्या तंत्रशास्त्राबद्दल कसलाच मुद्दा नव्हता. त्याला त्या शिवाय आणखी काही तरी सांगायचं आहे,हे कळायला मला वेळ लागला नाही.

मी म्हणालो,
“तुला कोकणातल्या शेतीवाडीचा एव्हडा अनुभव आहे आणि तू निसर्गात एव्हडा एकजीव झाला असावास की तू मला काही तरी निराळंच सांगणार आहेस ह्याची मला खात्री आहे.तू सांग मी ऐकतो.”

सुधाकरला मी असं म्हणाल्यावर जराशीही संधी न दवडता मला म्हणाला,
“उदाहरण म्हणून सांगतो,बागेत एखादं झाड मरण्याच्या पंथाला लागलेलं पाहून मला ते झाड आठवण करून देतं की,मी जीवंत असल्याने किती नशिबवान आहे. माझ्या बगीच्यातून मला ताजी भाजी मिळत असते ही आठवण भाजी खाताना होत असते.
बाहेर आमच्या बागेत काम करीत असताना,माझं मन शांत आणि उल्हासीत रहातं.काही गंमती पण पहायला मिळतात. गवताच्या तृणाच्या बिया, कित्येक महिने नव्हे तर कित्येक वर्षं सुप्त राहूनही जरा जरी वातावरण योग्य झालं की ते तृण उगवून वर येतात. गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.मला पोषण देणार्‍या भाज्या सूर्याच्या उन्हातून अन्न बनवतात.मी जर बागेत काम करायला गेलोच नाही तर ह्या गोष्टी माझ्या ध्यानातही येणार नाहीत.
हे झालंच त्या शिवाय मी तुला एक माझी आठवण सांगतो आमच्या ह्या बगीच्यातच मी काम करताना शिकलो की दुःखा़शी दोन हात करायचे नाहीत.”

आता सुधाकर मुळ मुद्यावर येऊन सांगू लागला,
“त्याचं असं झालं,मी त्यावेळी आठवी/नव्वीत शिकत असेन.माझी आजी न्हाणी घरात पडली आणि त्या अपघातातून ती उठलीच नाही.माझं माझ्या आजीवर अत्यंत प्रेम होतं.प्रेम करण्यासारखीच माझी आजी होती.माझ्या वयाचे माझे मित्र जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा आजीला भेटल्याशिवाय जायचेच नाहीत.
“रे माझ्या नातवा!”
असं म्हणून आमच्यापैकी कुणालाही तिने हांक दिली की,तिच्या तोंडून आलेले हे शब्द आम्हाला धीर द्यायचे.आजीच्या जाण्याने माझ्याबरोबर सर्व मित्रही हळहळले.

तर सांगायचा मुद्दा असा की त्या वयात मला जेव्हडं जमेल तेव्हडं त्या दुःखाला मी तोंड दिलं.आजीच्या जाण्याचं दुःख मला जमेल तेव्हडं मनातून काढण्याचा मी प्रयत्न करीत राहिलो.
त्यानंतर मला आठवतं हा माझा मुलगा ज्याने इथे हा बंगला बांधला आहे त्याच्या जन्मानंतर, मला झालेलं मी लहान असतानाचं ते आजीचं दुःख जे मी विसरण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालो होतो,ते परत माझ्या मनात यायला लागून मला फारच कठीण वाटायला लागलं.मनात म्हणायचो,मी आता मोठा झालो आहे,मुलांच्या जोपासनेची जबाबदारी माझ्यावर आहे, बागेत फोफाऊन आलेली ती रानटी गवताची तृणं उपटून काढायची आहेत,असं म्हणून मी आमच्या बागेत जायचो.

पावसाळा यायला अजून उशीर होता.पाणी नसल्याने जमीन तशी बरीच कोरडी झालेली होती.ते रानटी गवत उपटून काढायला जे श्रम लागायचे ते पावसाच्या आभावी जमीन घट्ट झाल्याने आहेत, हे मनात येऊन मी कष्टी व्ह्यायचो.मान वर करून आकाशाकडे पाहून काळ्या ढगांची अपेक्षा करायचो.
आणि चटकन लक्षात यायचं की हवामानाकडे काळ्याबेर्‍या दृष्टीने बघून उगाचच हवामानाशी मी शत्रुत्व घेत आहे. हवामान जसं आहे तसंच असणार. गरमी,उकाडा देणारं हवामान मला आवडलं जरी नसलं तरी माझ्या हातात काहीच नव्हतं शिवाय परिस्थितीशी जुळतं घेण्यापलीकडे.

“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”
मी माझ्या मलाच म्हणायचो.
नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या “अंतरातल्या हवामानाला”ही मी अस्वस्थ करतोय.मनात आलेल्या दुःखाला प्रतीरोध करीत होतो. कारण ते मला नष्ट वाटायचं,अगदी त्या कोरड्या जमीनीसारखं.पण ते तात्पूरतं होतं,आणि बर्‍याच वर्षानी झालं होतं.मी बागेत उकीरडा बसलो,माझे डोळे ओले झाले,गवताची तृण उपटताना आणखी डोळे पाणवले,आणि शेवटी माझ्या आजीची आठवण काढून मी शोकाकुल झालो.”
सुधाकर अगदी मोकळ्या मनाने आपलं दुःख माझ्याकडे उघड करीत होता.मलाही त्याची कींव आली.

“चल,तू मला तुझा बगीचा दाखव”
असं म्हणून चप्पल घालून आम्ही बंगल्याच्या बाहेर पडलो.
जाता जाता मी सुधाकरला म्हणालो,
“सध्याचा जमाना असा आहे की आराम आणि चैनीचा आपण उदोउदो करतो,खरंतर आपण कामातही व्यस्त असतो. त्यामुळे काही लोकाना बगीच्याची देखभाल कमीतकमी कष्टात व्हावी असं वाटणं सहाजीक आहे.
तरीपण बगीच्याची देखभाल करण्यात आपण कसलाच भाग घेऊ नये आणि नुसतं वरवरचं निसर्गदृश्य रम्य दिसावं अशी भलतीच इच्छा कुणी करूं नये कारण, बागेची राखण करताना आपण,बागेची परख करीत असतो आणि कृतज्ञतेची,मनुष्यत्वाची आणि आनंदाची जोपासना करीत असतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 13, 2010

माळरान.

“अजून जीवनात खूप शिकायचं आहे.आणि त्याचा विचार करायचा आहे.पहाटेच्यावेळी आजोबांबरोबर त्यांच्या माळरानात जाऊन विचार येत होता अगदी तसाच विचार मी म्हणतो.”

“माझ्या आजोबांबरोबर त्यांच्या दूरच्या माळावर पहाटे उठून त्यांच्याबरोबर जायला मला खूप आवडायचं.माळ संपता संपता माळरान लागतं.आणि माळरानाच्या पलीकडे झाडांनी गच्च भरलेल्या डोंगराचा पायथा लागतो.पायथ्याशी पोहचल्यावर डोकं उंच करून वर पाहिल्यावर घनदाट अरण्य असेल असा भास व्हायचा. पण डोंगर चढून खरोखर वर जायला लागल्यावर,करवंदाची झुडपं,गावठी आंब्यांची उंचच उंच झाडं,लांबून काळीभोर दिसणारी पण हातात घेतल्यावर जांभळ्या रंगाची टपोरी जांभळं असलेली उंच जांभळाची झाडं,सळसळत्या पानांची पिंपळाची झाडं,असं दृष्य पाहिल्यावर का वाटू नये की वर घनदाट अरण्य असावं म्हणून?”

अरूण दातार आता जुहूला एका बंगल्यात आपल्या उद्योगपति मुलाबरोबर निवृत्तिचं आयुष्य जगत आहे.कोकणात तो लहानपणापासून शिकला,मोठा झाला आणि शिक्षक म्हणून एका शाळेतून निवृत्त झाला.तो आता लहान-सहान लेख लिहीतो आणि कविता करतो.कोकणातल्या जीवनाचा त्याच्यावर एव्हडा पगडा आहे की कवितेत किंवा लेखात कुठे ना कुठे त्या जीवनाचा उल्लेख आला नाही असं होत नाही.
माझ्याशी गप्पा मारताना मला आपलं लहानपण वर्णन करून सांगत होता.
मला म्हणाला,
“ह्या उन्हाळ्यात तू माझ्याबरोबर नक्कीच ये म्हणजे मी काय म्हणतो त्याची सत्यता तुला कळेल.”

“मी नक्की येईनच पण आता तू मला तुझ्या आठवणी सांग.मला ऐकायला आवडेल”
असं मी म्हणाल्यावर,थोडा रंगात येऊन अरूण मला सांगायला लागला,
“चालून चालून माणसानी बनवलेल्या पायावाटांवर चालताना पाया खाली सुकून पडलेल्या पानांचा पाचोळा जेव्हा चूरचूर आवाज करतो,तेव्हा वाटतं हलक्या पावलांनी चालणं अगदीच अशक्य आहे.चालतानाची चूरचूर ऐकून रंगीबेरंगी सरडे आणि सरपटणारे प्राणी जीव वाचवायला वाट दिसेल तसे पळत रहायचे.कधी कधी जवळच दिसणार्‍या झाडावर सरसर चढून कुठच्या तरी फांदीच्या मागे दडून बसायचे.”

“तो डोंगर,ते माळरान आणि ते घनदाट अरण्य पाहिल्यावर खरोखरंच वाटतं की ही काहीशी अद्भूत आणि अखंड असं वातावरण देणारी जागा असावी.”
मी अरूणला म्हणालो.

“आमच्या बरोबर असणारा आमचा घरगडी कमरेला पट्टा बांधून कमरेच्या उजव्या अंगाला कोयता लटकवीत डोक्यावर रिकामी टोपली घेऊन आमच्या मागोमाग यायचा.जांभळांनी गच्च भरलेल्या एखाद्या जांभळाच्या झाडावर त्याला चढवून आजोबा त्याच्या कडून जांभळाचे भरीव घोस काढून त्याने स्वतः बरोबर नेलेल्या टोपलीत जमा करून झाडाच्या एखाद्या मजबूत फांदीचा रहाटासारखा उपयोग करून,सुंभाच्या दोरखंडाच्या साह्याने जांभळं न फुटता खाली आणून घ्यायचे.”
“मग एव्हडी जांभळं तुम्ही काय करायचा?”
मी त्याला प्रश्न केला.

“घरी नेल्यावर सर्व जांभळं स्वच्छ धूऊन त्याचा रस काढून ग्लास ग्लास भरून आम्हा सर्वांना ते प्यायला द्यायचे.माझ्या आजीला हा जांभळाचा रस खूप आवडायचा.हा रस पिण्यामुळे मधूमेह होत नाही असं ती म्हणायची.”

माझ्या प्रश्नाचं उत्तर देत अरूण पुढे सांगायला लागला,
“अर्थात हे उन्हाळ्याचे दिवस असायचे.आमच्या शाळांना चार महिन्याची सुट्टी असायची.हा उन्हाळ्याचा एक मे महिना आणि पावसाळ्याचे तीन महिने मिळून ही सूट्टी असायची.विद्यार्थ्यांपैकी बरेचजणांची शेती असल्याने पावसाळ्याच्या सुट्टीत शेतीकामासाठी त्यांच्या सूट्टीचा घरच्यामाणसांना उपयोग व्हायचा.
अशाच वेळी आणि अशाच जागी शाळेच्या वेळापत्रकाच्या बंधनाच्या सक्तिपासून आणि शाळकरी जीवनाच्या शाळेतल्या संपर्कापासून दूर रहाण्याचा आम्हाला लाभ व्हायचा.”

मी म्हणालो,
“मग आता तू स्वतःहून माळरानावर जात असशील नां?”
“हो तर,जेव्हा इकडे राहून मला कंटाळा येतो तेव्हा माझा मुलगा स्वतः गाडी चालवत मला इकडे आणून सोडतो.”
असं सांगून अरूण जरा भावनावश झाला.थोडावेळ थांबून मला म्हणाला,
“आता माझ्या आजोबांच्या माळरानावर पहाट असताना तिकडे गेल्यावर जे प्रश्न माझ्या मनात येतात ते पाहून माझ्या ह्या निवृत्त जीवनामुळे हे प्रश्न माझ्या मनात येत राहत असावेत असं मला सारखं वाटत असतं:
मी जो आता आहे ते पाहून माझ्या आजोबाना माझा अभिमान वाटला असता का?
माझ्या आजीचं माळावर रहाण्याचं त्यांना तिने दिलेलं वचन काही दिवसानी ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाळू शकली नाही.हे त्यांना माहित होतं का?
आजीचं आता काही खरं नाही.लवकरच ती त्यांना भेटणार आहे,त्याचा विचार येऊन मला किती दुःख व्हायचं ते त्यांना माहित आहे काय?”

“मग आता पुढे काय”
असं मी विचारल्यावर मला म्हणाला,
“हे माळरान आता त्या दोघांच्या पश्चात आणि नंतर माझ्या पश्चात इथेच रहाणार आहे.ह्या माळरानावर माझ्या आजोबांनी जूनी झालेली झाडं पाडून त्याचं जमलेलं लाकूड जमा करून ठेवण्यासाठी लाकडाची वखार बांधली होती. जरूरी प्रमाणे आंबे,फणस घरात ठेवून उरलेली फळं विकण्यासाठी ठेवायला त्यांनी एक पडवी बांधली होती.गावातले व्यापारी त्या पडवीवरून ती फळ योग्य सौदा करून विकण्यासाठी घेऊन जात असत.

शेतातून आलेली पिकं-तांदूळ,तूरडाळ,कुळीथ-माझी आजी भागेल्यांकडून मोजून घेऊन स्वतः त्यांच्याशी पैशाचा व्यवहार करून निभावून न्यायची.
आंब्या,फणासाचं पीक अतोनात आल्यावर घरातल्या काम करणार्‍या बायांकडून रस काढून घेऊन आंब्या आणि फणसाची साठं-पोळी-उन्हात सुकवून घरात आल्यागेलेल्याला खायला द्यायची.
कच्चे आंबे-कैर्‍या-आणि रेडेलिंब झाडावरून काढून मोठ्या चिनीमातीच्या बरण्यांत लोणच्यासाठी मुरवायला ठेवायची. आता त्या कंबरेपर्यंत उंच बरण्यां धूळ खात पडल्या आहेत.
आजोबांनी मला छेर्‍याची एक डबल-बार बंदुक देली होती.मला माळरानांत नेऊन कवडे मारण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा ते त्यांनी शिकवलं होतं.आता ती बंदूक माडीवर दोन खूंट्याचा आधार घेऊन तिथेच पडून आहे.”

मी अरूणला म्हणालो,
“मला वाटतं,डोंगरातली ही सर्व झाडं बदलत्या ऋतूत जशी बदलत असतात तशीच परिस्थिती तुझ्या आजी, आजोबात, आणि तुझ्या कुटूंबात आली असावी.”

“अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं”
असं म्हणून अरूण सांगू लागला,
“माझ्या आजीच्या उतारवयात तिचा सांभाळ करण्यासाठी माझ्या आईकडे असलेला तिच्याबद्दलचा कळवळा आणि कणव हा जणू भर उन्हाळ्यात दुपारच्यावेळी माळरानातल्या झाडांमधून सूर्याचं ऊन शिरून त्यांचं पोषण करतं, तशातलाच प्रकार होता.माझ्या मामाच्या अचानक निधनानंतर घरात आलेलं वातवरण रानाला आग लागल्यानंतर वाटावं अगदी तसाच अनुभव होता.

आता माझी आजी निर्वतल्यानंतर,थंडीच्या दिवसात पहाटेच्यावेळी डोंगराच्या पायथ्याशी जाऊन उभं राहिल्यावर उघडी-बोडकी फळंविरहीत आंब्या-फणसाची झाडं पाहून भकास वाटावं तसं वातावरण आमच्या घरात झालं आहे.माझ्या लहानपणी काही वेळा इतर संवगड्याच्या नादाला लागून क्रिकेट खेळण्याच्या ओढीमुळे गावातल्या मैदानात खेळायला गेल्यामुळे माझ्या आजोबांबरोबर माळरानात न गेल्याने त्यांच्या सहवासाला मुकावं लागलं ह्याची मला बरेच वेळा खंत होत असते.”

“मला वाटतं,ह्या माळरानातच तुझ्या आजोबांनी तुला पूर्णत्व आणलं. घराच्याबाहेर पाऊल टाकल्यावर जीवन काय आहे ते त्यांच्या कडून तू शिकलास.”
मी अरूणला धीर देत म्हणालो.

मला म्हणाला,
“अजून जीवनात खूप शिकायचं आहे.आणि त्याचा विचार करायचा आहे.पहाटेच्यावेळी आजोबांबरोबर त्यांच्या माळरानात जाऊन विचार येत होता अगदी तसा विचार मी म्हणतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 10, 2010

कां बरं हसावं?

“कुणीतरी म्हटलंय नाही काय,हंसणं संसर्गजन्य असतं म्हणून.”

आज तळ्यावर माझा फारच मजेत वेळ गेला.वसंत ऋतू चालू झाल्याने सूर्यास्त जरा उशीराच व्हायला लागला आहे. आणि पूर्वी सारखा हवेतला गारवा कमी होऊ लागल्याने फक्त एक स्वेटर घालून फिरायला जायला सुलभ झालं आहे. नाहीतर ती कानटोपी आणि थंडीचं जॅकेट घालायला मला तरी वैताग यायचा.
प्रो.देसाई नेहमी म्हणतात त्यांना असं हवामान फार आवडतं.काही तरी करावं, काही तरी वाचावं,जरा बाहेर जास्त वेळ घालवावा असं वाटतं.मलाच काल म्हणाले होते,
“उद्यापासून आपण लवकर फिरायला जाऊया.”
पण खरं तर मीच लवकर येऊन बसलो होतो.माझ्या मागोमाग ते आलेच म्हणा.इकडच्या तिकडच्या गप्पा होत असताना, लांबून भाऊसाहेबांची धाकटी मुलगी-राधिका- आपल्या मैत्रिणीबरोबर आमच्या दिशेने येताना पाहली. आमच्या जवळ आल्यावर आम्ही एकमेकाशी हंसलो.आपल्या मैत्रिणीची तिने ओळख करून दिली.
“ही सरीता सरवटे.माझ्याच ऑफीसात कामाला असते.अधून मधून मासिकात लेख लिहीते.हिचा ब्लॉगपण आहे.त्याचा पत्ता ती तुम्हाला नंतर देईल. हिला कधीही पहा, हिच्या चेहर्‍यावर नेहमी हंसू असतं.”
सरीता हे ऐकून जरा लाजली,पण हंसत होती.

सरीताला हंसताना पाहून मी म्हणालो,
“हास्याबद्दल,आनंदी रहाण्याबद्दल आणि प्रत्येक गोष्टीच्या उजळ बाजू्कडे पहाण्याबद्दल मलाही विशेष वाटतं.”
नाहीतरी मला काहीतरी विषय काढून बोलायचं होतं.आणि प्रो.देसायांची प्रतिक्रिया पाहायची होती.कारण ही मंडळी येईपर्यंत आम्ही कसला खास विषय काढला नव्हता.प्रो.देसाई बोलण्यापूर्वीच सरीता म्हणाली,

“हास्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.माझ्या दिवसाची सुरवात कशीही असो,मी मात्र माझ्याकडून दिवसाची सुरवात हंसून करते.आणि मनात ठरवते की आजचा दिवस खरंच जगण्यासाठी उत्तम आहे.”
आता मात्र भाऊसाहेबाना रहावेना.तिचं बोलणं संपता संपताच लगेच म्हणाले,

“कुणीतरी म्हटलंय नाही काय,हंसणं संसर्गजन्य असतं म्हणून.
कुणी जर का हंसलं की तो आपलं सुखसमाधान प्रदर्शीत करतो एव्हडंच नाही,तर तो त्या आनंदाची देणगी दुसर्‍याला पण देतो.
कुणी जर हंसलं की त्याला विचारलं जातं कां हंसला? आणि विचारणाराच हंसायला लागतो,आणि त्याला कुणी विचारलं का? तर तो पण हंसतो, आणि असंच पुढे होत रहातं.”

“तुम्हाला एक गंमत सांगते.मी एका महिला मंडळाच्या गृहभांडारात जवळ जवळ दोन वर्षं काम करीत होते.त्यावेळी मी काम करीत असताना माझ्या लक्षात आलं होतं की काही गिर्‍हाईकं अजीबात हंसत नसायची.दुकानात शिरतानाच रागीष्ट चेहरा करून आत शिरायची.मला त्यांना विचारावंसं वाटायचं की,
“अहो,,तुम्ही हास्य परत का करीत नाही.असं करायला कितीसं कठीण असतं?.”
सरीताने आपला अनुभव सांगीतला.

“कुणीतरी एखादा चूटका ऐकून दुसर्‍याला सांगीतला की समजावं की त्यादिवशीचा त्याचा दिवस भरला.हजार वर्षाच्या दुष्काळानंतर पावसाची सर येऊन गेल्यावर कसं वाटेल तसं हास्याचं आहे.कोंबडीच्या पिल्लाने रस्ता का ओलांडला? तर बघ्यांना हंसवण्यासाठी असं म्हटल्यासारखं आहे.हास्य हे आत्म्याला आणि मनाला एक औषध आहे”
मी माझ्याकडून सरीताला दुजोरा देत म्हणालो.

“काही झालं तरी हंसल्यानंतर कुणालाही बरं का वाटतं?”
राधिकाने प्रश्न विचारून झाल्यावर, जीभ चावत आपल्या वडलांकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होती.पण मीच तिला उत्तर द्यायचं ठरवलं.

“कधी कधी हंसून झाल्यावर,काही लोक एव्हडे आनंद पावतात की आपण जगाचा राजा आहो असं त्यांना त्यावेळी वाटतं. आणि कुणी दुःखी किंवा उदास असल्यावर जणू सर्व जगाचा भार आपल्या खांद्यावर आहे असं त्यांना वाटतं. आपण आनंदात असलो की जगात सर्व काही ठाकठीक आहे असं आपल्याला वाटतं.जरा का सर्दी झाली की आपल्याला बेचैन होऊन थकल्यासारखं होतं,अगदी जीव नकोसा होतो.कुणी जवळपास असूं नये असं वाटतं.आणि एकाएकी बरं वाटू लागल्यावर,पहिलवानाची शक्ति अंगात आल्यासारखं वाटू लागतं. म्हणूनच हंसणं हे एक मनाचं आणि आत्म्याचं औषध
आहे.असं मी मघाशी म्हणालो.”
माझं हे बोलणं ऐकून भाऊसाहेब गालातल्यागालात हंसत होते.काही तरी गंमतीदार किस्सा सांगतील असं मला वाटत होतं.

“एखाद्या सिनेमात दाखवतात की,तो आपल्या बाल्कनीतून समोरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या मुलीकडे तिला हंसताना बघून प्रेमात पडतो.पणअसं हे होऊ शकतं असा विचार तरी आपल्या मनात येईल काय?
इतर उथळ मनाचे असल्यानेच आपल्यावर लट्टू होतात कारण आपण दिसायला सूंदर आणि आकर्षक दिसते असं एखाद्या मुलीने म्हटलं तर ते काही खरं नसावं.पण तुम्हाला विनोद समजतो आणि तुम्ही हंसता, एव्हडं सुद्धा, लोकांना हंसायला पुरं असतं.
चीडखोर माणासाचा सहवास कुणालाही आवडणार नाही,जीवनाकडे वाईट दृष्टीकोन ठेऊन पहाणारा कुणालाही आवडणार नाही,सतत दुसर्‍यावर टिका करणाराही कुणाला आवडणार नाही.”
प्रोफेसर सांगून गेले. आणि मला मनात वाटलं होतं, तेच खरं ठरलं काही तरी गंमतीदार किस्सा त्यांनी सांगीतला.

“तुम्ही हंसला नाही तर तुम्ही उदास दिसता.हंसणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे.त्याला काही पैसे पडत नाहीत.काही वजन उचलावं लागत नाही,कुठे लांब जावं लागत नाही.फक्त तोंडावर हंसं आणायचं.”
मी माझा विचार सांगीतला.

सरीता म्हणाली,
लहानपणी चेहर्‍यावर हास्य आणणं मला इतकं सोपं नव्हतं.माझे बाबा कडक स्वभावाचे होते.पुरूष सहसहा मर्दानी वृत्तिचा हवा असं त्यांना वाटायचं. दुसर्‍यांना आज्ञा द्यायला त्यांना आवडायचं.काही प्रमाणात मी आणि माझी लहान भावंडं आमच्या घरात छोटे सैनिक कसे राहून त्यांच्या आज्ञा घ्यायचो.आमच्या बाबांना बरं वाटावं म्हणून आम्ही असं करायचो.घरी आल्यावर त्यांना घरात गोंगाट मुळीच आवडायचा नाही.बाबा घरी आल्यावर आम्ही सर्व चूपचाप असायचो.
माझ्या बाबांची समज होती की पुरूषाने हंसायचं नाही.रोज जेवताना जेवणाच्या टेबलावर आम्हाला ते आठवण करून द्यायचे की,
“खरे पुरूष हंसत नाहीत. तुम्ही हंसला तर त्याचा अर्थ तुम्ही कमकुवत आहात.पुरूषाला कठोर असायला हवं.”
ह्या माझ्या बाबांच्या वृत्तिमुळे माझा जीवनाकडे पहाण्यात फरक झाला.आणि सर्वांत मोठं भावंडं म्हणून मला त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं लागलं.त्यांच्या त्या सततच्या सांगण्याने मला वाटायला लागलं की मी मुलगी असले तरी जर का हंसले तर मी माझा कमकुवतपणा दाखवीन.”

“मग मी म्हणते,मजेत वेळ जाईल अशा व्यक्तिबरोबर सहवासात राहिल्यास किंवा,तुमचे चूटके कितीही मुर्खपणाचे असले तरी त्यावर तो हंसतो अशाच्या सहवासात राहिल्यास कसली हरकत असावी.?
हंसा.आनंदात असा.कुणाच्याही अंतरात तुमचं हंसू शिरू द्या.हंसून त्यांच्या डोळ्यात चमक आणू द्या.मला तरी हंसणं आवडतं.”
राधिकेने आपलं मत दिलं.

“राधिके,तू अगदी माझ्या मनातलं सांगीतलंस.मी माझंच उदाहरण सांगते”
असं सांगून सरीता सांगू लागली,
पाच वर्षापूर्वी माझं लग्न झालं.मला आठवतं एक दिवस माझ्या नवर्‍याने मला आमचा फोटो आल्बम पहायची इच्छा दाखवली होती.प्रत्येक फोटो तो निरखून पाहात होता.प्रत्येक पान तो भरभर उलटत होता.प्रथम मला वाटलं की माझ्या जून्या मित्र मंडळींचे फोटो त्याला पहायचे नसावेत.किंवा माझ्या आईबाबांचे आणि भावंडांचे फोटो त्याला पहायचे असावेत.त्याच्या वागण्याकडे बघून मी जरा घाबरलेच.मी त्याला विचारलं,
“काय पहात आहेस? काही गडबड आहे का?”
त्याने मलाच विचारलं,
“तुझ्या चेहर्‍यावर हंसं का नसतं.?”
माझे आल्बममधले फोटो पाहून त्याने समज करून घेतला असावा. माझ्या नवर्‍याने माझा चेहरा हंसरा दिसावा यासाठी हरप्रयत्न करून पाहिलं.मला त्याने विनोदी नाटकांच्या प्रयोगाला नेलं होतं.निरनीराळे सरदारजी चुटके सांगून हंसवायचा प्रयत्न केला होता.हो,मी त्याच्याशी लग्न केलं होतं.
एखादेवेळी सुखी नसतानाही कसं चेहर्‍यावर हंसं ठेवायचं हे मी त्याच्याचकडून शिकले.”

आता जर एखादी वाईट गोष्ट घडली तर चेहर्‍यावरचं हास्य मला खुशीत ठेवतं.
हंसत रहाणं ही एक उपचारात्मक प्रक्रिया असावी.हे असं चेहर्‍यावर हंसं ठेवण्याची संवय करायला मला बराच समय द्यावा लागला. आता मला वाटायला लागलंय की, ह्या महत्वाच्या संवयीला माझ्या जीवनात आणण्यापासून मी बराच काळ दूर राहिले होते.हंसण्याची कृति खरोखरच विस्मयजनक आहे.आता मी दिवसभरात अनोळख्याशी पण हंसते.काही लोकाना हे माझं करणं वेड्पटासारखं वाटत असेल.पण मी उलट जास्तच हंसते.मला वाटतं बरेच वेळा एक तरी हंसू मिळण्याची आपल्याला जरूरी भासते.प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे कारण जीवन अगदीच क्षणभंगूर आहे.”

“अगदी बरोबर आहे.”
मी म्हणालो.
बाहेर आता काळोख व्हायला लागला होता.दुसर्‍या दिवशी राधिकेची मैत्रीण सरीता आपल्या गावाला जाणार होती. आमची हास्यावरची चर्चा आवरती घेणं भाग होतं.
म्हणून मी उठता उठता म्हणालो,
“एखाद्या बॅन्केतल्या कारकूनाशी,एखाद्या वाण्याशी,पत्र टाकून जाणार्‍या पोस्टमनशी हंसायला हवं.कारण कधी कधी आपल्यालाच आठवण करून घ्यावी लागते की सर्व काही आलबेल आहे.मला वाटतं प्रत्येकजण निदान एका हंसूला पात्र असतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 7, 2010

आमचं एकत्र मालवणी भोजन.

“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.”

बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती.
” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा”
असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.”
गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता.
“तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.”
मी गुरूनाथल म्हणालो.
“तुझ्या काही लहानपणाच्या आठवणी मला तुझ्याकडून ऐकायला बरं वाटेल.”

असं मी म्हणाल्यावर गुरू म्हणाला,
“मी मोठा झाल्यानंतर आणि कमाई करायला लागल्यानंतर मला माझ्या बाबांचं लहानपणी मिळणारं जेवण कमी मिळायाला लागलं.मी अगदी लहान असताना माझ्या त्या चिमुकल्या डोळ्यांना आमच्या स्वय़ंपाक घरात आल्यावर माझे बाबा मला “स्वयंपाक घराचे राजा” वाटायचे.
आमच्या पुस्तकाच्या कपाटावर माझ्या आईबाबांनी रुचकर पदार्थ करण्याच्या पद्धतीबद्दल अनेक पुस्तकं रचून ठेवली होती. त्यात बाईचा फोटो असलेलं पदार्थ करण्याचं एक पुस्तक होतं.अगदी लहानपणी मला तो फोटो जेमतेम दिसायचा आणि उगाचच वाटायचं की माझ्या आईबद्दल लिहिलेलं ते पुस्तक असावं.”

“मी पण ती कपाटावरची पुस्तकं पाहिली होती.मला आठवतं मी एकदा तुझ्या बाबांना म्हणालो होतो,
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.”
तेव्हा तुझे बाबा मला म्हणाल्याचं आठवतं,
“अहो ही पुस्तकं गुरूची आई वाचते.तिला वाचनाचा नाद आहे.”

हे ऐकल्यावर गुरूनाथ म्हणाला,
माझ्या बाबांना काहीही आणि सगळंकाही शिजवायला जमायचं.
मास्यांची तिखलीं,मास्यांच्या आमट्या,पापलेटाची किंवा बांगड्याची सुकी शाक,शहाळं घालून भरपूर रसाची गुंजूल्यांची आमटी, हळदीचं पान घालून केलेली पेडव्यांची आमटी,तिरफळं घालून केलेली ताज्या बांगड्याची आमटी, सुंगटं,कुर्ल्या,तिसर्‍याचे प्रकार,तसंच अनेक तळलेल्या मास्यांचे प्रकार करायला यायचे.
तसंच अगदी शाकाहारी-भट्टी- जेवणाचे प्रकार त्यांना करायला यायचे,मग ते श्रीखंड,बासुंदी पासून,निरनीराळ्या खीरी, गवल्याची,रव्याची, साबूदाण्याची, तसंच हळदीच्या पानात गुंडाळून केलेले पातोळे,उकडीचे मोदक,येल्लापे,पर्यंत सर्व यायचं. आपलं तन,मन,धन,ओतून ते स्वयंपाक करायचे.आमची आई त्यांना जेवणाची तयारी करण्यात मदत करायची. शिवाय चपात्या लाटण्याचं तिचं काम असायचं.”

मी गुरूनाथला म्हणालो,
तुझे बाबा स्वतः गिर्‍हाईकांना वाढायला घ्यायचे.अगदी घरातल्या माणसासारखं आग्रह करून, त्यांच्या तब्येत वगैरेची चौकशी करून वाढायचे.
जेवणाचे प्रकार चवदार तर असायचेच त्याशिवाय तुझ्या बाबांच्या वाणीत साखर पेरलेली असल्याने साखर घातलेले पदार्थ आणखी गोड वाटायचे.”
गुरूनाथला त्याच्या बाबांच्या स्वभावाची ही बाजू माझ्याकडून ऐकून बरं वाटलं.
मला म्हणाला,
“बर्‍याच वेळेला काही पदार्थ -विशेष करून मास्यांचे पदार्थ -घरी नेण्यासाठी गिर्‍हाईकं यायची.सकाळी आणि संध्याकाळी ताजा स्वय़ंपाक व्हायचा.
कारण एकवेळच्या बनवलेल्या वस्तू नक्कीच संपून जायच्या.काही वेळा उशीरा आलेल्यांना जेवण संपलं हे ऐकून निराश होऊन जावं लागायचं.”

कोकणातल्या एका गावात हळदणकराची खानावळ होती.”बाबल्या हळदणकराचे रूचीदार पदार्थाचे भोजनालय” म्हणून बाहेर पाटी होती.कालांतराने त्या पाटीवर इतकी मळ जमली होती की कुणालाही त्यावरची अक्षरं वाचायला कठीण जायची.आणि पाटी वाचण्याची जरूरीच कुठे असायची.”बाबल्याची खानावळ लय प्रसिद्ध होती.”बाबल्या” गुरूच्या आजोबांचं नाव असावं. त्याच्या बाबांचं त्यांच्या वडलांवर अत्यंत प्रेम होतं.म्हणून कदाचीत त्यांनी त्यांचं
नाव खानावळीला दिलं असावं.

“तुम्ही लोक रात्री किती वाजता जेवायचा?.कारण मी केव्हा केव्हा रात्री नऊ पर्यंत जेवायला यायचो.मी गुरूनाथला म्हणालो.

“रात्री नऊ वाजता खानावळ बंद झाल्यावर मग आमची जेवणाची वेळ यायाची.मी,माझा धाकटा भाऊ,आणि आईबाबा एकत्र जेवायला बसायचो.
जेवण्यात आम्हाला एव्हडं चैतन्य यायचं की,दोनदां कधी कधी तिनदां मागून घेऊन जेवायचो.आमचं पोट फुटणं हा दुय्यम भाग होता.मुख्य म्हणजे चवदार जेवण असायचं.आम्ही सगळे जेवायला बसलो की एखादा तास सहज निघून जायचा.माझे आईबाबा सकाळपासून खानावळीच्या व्यवस्थेत एव्हडे गर्क असायचे की फक्त रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही एकत्र येऊ शकत होतो.रात्रीची जेवण्याची क्रिया आम्ही लांबवायचो त्यामुळे आमच्या एकमेकाच्या जवळ रहाण्याच्या वेळेत वाढ व्हायची. मी आणि माझा भाऊ जास्त वेळ जेवत बसल्याने आमचं एकमेकाशी बोलणं वाढायचं.”
आम्ही मोठे होऊन आपआपल्या कामा-धंद्याला लागल्याने आणि आमचे आईबाबा वयस्कर होऊन थकत चालल्याने ,आम्ही त्यांना खानावळ बंद करण्य़ाबाबत सुचवलं”
तुम्ही खानावळ बंद केव्हा केली? ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना गुरूनाथ मला सांगू लागला.

“आता कुटूंब म्हणून एकमेकाशी बोलण्यासाठी पूर्वीसारखी ठरावीक वेळ साधण्याची जरूरी कमी कमी भासू लागली.मी माझ्या तयार कपड्याच्या धंद्यात व्यस्त राहायचो आणि माझा भाऊ त्याच्या नारळाच्या व्यवसायात व्यस्त रहायचा. माझ्या आईबाबांना ते घरीच असल्याने भरपूर वेळमिळायचा.परंतु रात्रीचं जेवण एकत्र जेवण्याची आमची प्रथा मात्र कायम राहिली.अलीकडे ह्या प्रथेचं महत्व मला जास्त जाणवायला लागलं.आम्हा दोघा भावांची कुटूंबं,शिवाय आमचे आईबाबा एकत्र येऊन रात्री जेवत असल्याने,आमच्या दिवसभराच्या जीवनातल्या समस्या,त्यातून निर्माण होणारे विनोद आणि चुटके,इतर अडचणीतून मार्ग काढण्याची चर्चा होऊन आमचं जेवणापलीकडे जाऊन पोट भरलं जातं.”

“खरंच तुम्ही मुलं आणि तुमचे आईबाबा नशिबवान आहांत.पैसे घेऊन का होईना,भुकेलेल्या गिर्‍हाईकाचा आत्मा तुझ्या आईबाबांचं जेवण जेऊन शांत होत असावा.नकळत मिळालेल्या समाधानीच्या आणि तृप्तीच्या बदल्यात त्यांच्या शुभेच्छाच ह्याला कारणीभूत असायला हव्यात.”
मी गुरूनाथला शाबासकी देत म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com

Monday, April 5, 2010

न हंसणाराच हास्यास्पद दिसतो.

“मी एक पाहिलंय माझे वडील ज्यावेळी हंसतात तेव्हा ते छान दिसतात.”

स्वप्नील त्याच्या लहानपणी नेहमीच आपल्या वडीलांबद्दल माझ्याकडे तक्रारी करायचा.
“ते रागीष्ट आहेत.बारीक सारीक कारणावरून चिडतात.आई एव्हडं घर संभाळून आमची देखभाल करते त्याचं त्यांना काहीच नसतं.”वगैरे.
आता स्वप्नील दोन मुलांचा बाप झाला आहे.ह्यावेळी मला भेटला तेव्हा आपल्या वडलांची भारी स्तुती करीत होता.

मी त्याला म्हणालो,
“काय रे बाबा,तू मोठा झालास,तुझे बाबा वयस्कर झाले,आणि परिस्थितिही तिच राहिली नाही.तुझ्या मतपरिवर्तनाचं हे कारण असेल का?”
मला स्वप्नील म्हणाला,

“तुम्ही म्हणता ती सर्व प्रमुख कारणं आहेतच,पण त्याशिवाय चेहर्‍यावर हंसू आणणं हे एक मुख्य कारण आहे.ते आमच्या बाबात आल्याने हा फरक जास्त जाणवला.”

“मला वाटतं हंसण्यामुळे नैसर्गीकरित्या माणसाची मानसिक अवस्था उभारून येत असावी.त्याशिवाय हे ही नक्की माहित झालंय की, हंसण्याने माणसाची शारिरीक अवस्था पण सुधारते.तसंच हंसत राहिल्याने शरीरातला उष्मांक जाळता येतो कारण जवळ जवळ शरीरातले चारशे स्नायु हंसण्याच्या क्रियेत एकत्रीत केले जातात. हंसण्यामुळे आपण भयभीति आणि विपत्तिपासून मोकळे रहातो.शिवाय अश्रूनी भरलेले डोळे साफ होऊन बुळबूळीत रहातात.आणि हंसताना झालेल्या कंपनामूळे डोकं,नाक,कानही दोषरहीत रहातात.
काही दिवसापूर्वी कुणीतरी मला विचारलं,
“एखाद्या आचरट प्रश्नावरही मी कां हंसायला लागतो?”
हा प्रश्न विचारणारा अशी व्यक्ति आहे की,तो क्वचितच हंसतो.त्याला वाटत असतं की विश्वसनीयता असणं म्हणजे विवेक आणि प्रतिभा असणं.पण माझं मत ह्याच्या अगदी उलट आहे.”
मी स्वप्नीलला हंसण्याचे अनेक फायदे समजावून सांगण्याच्या प्रयत्नात होतो.तो जसजसा मोठा होऊन जगात वावरूं लागला, तसतसा त्याला अनुभव आल्याच्या कारणाने हंसण्याचे फायदे कळले आहेत हे त्याच्या नंतरच्या बोलण्यावरून मला दिसून आलं.

“माझ्या जीवनात काही वेळा एखादं साधं स्मित उत्तेजनदायक वाटतं.त्यामुळे माझा स्वाभिमान उभारला जातो.कुणा मित्राबरोबर किंवा एखाद्या नातेवाईकाबरोबर बोलत असताना बोलण्याच्या शेवटी निष्कपट हंसू आणि उत्तेजनाचे उद्गार ऐकून माझ्या मनाला बरं वाटतं.
जीवनात सकारात्मक राहिल्याने आपण केलेल्या निवदानाचा तो सुर होऊं शकतो.आपल्या अंगात चांगला जोम -जो असायला हवा- आल्यासारखा वाटतो.आपल्या जीवनात येणार्‍या समस्यांना दोन हात करण्यासाठी सकारात्मक रहाणं आवश्यक आहे.जो हंसत असतो तो त्याच्या व्यक्तिमत्वाची पातळी प्रदर्शीत करीत असतो. अशा व्यक्तिंच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्याची छटा असते.मला वाटतं अशी व्यक्ति एखाद्याचा विश्वास उंचावते आणि ती स्वतःकिती समतोल वृत्तिची आहे हे दाखवून देते.”
स्वप्नील जेव्हां त्याचा अनुभव मला समजावून सांगू लागला,तेव्हाच मी समजलो की तो जे काही सकारात्मक असण्याबद्दल बोलत आहे,आणि हंसण्याचे फायदे सांगत आहे ते केवळ परिस्थितिच्या बदलावामुळे त्याला कळलं आहे.

मला स्वपनील पुढे सांगू लागला,
“काका,तुम्ही ज्यावेळी हंसता त्यावेळी तुमचं गालातल्या गालातलं हंसणं सुद्धा छपत नाही.काय कारण सांगू? तुमच्या उजव्या गालावरची खळी त्याला कारण आहे.पण मी माझ्या वडलाना क्वचितच हंसताना पाहिलंय.ते नेहमी गंभीर राहायचे.बरेच वेळा रागवायचे.अर्थात हे मी लहान असताना व्हायचं.
आता मात्र माझे वडील एक निराळीच व्यक्ति झाली आहे.कसं हंसायचं ते त्यांना कळलं आहे.”

स्वप्नीलचं हे अवलोकन अगदी मार्मीक वाटलं.म्हणून मी त्याला पुढे म्हणालो,
“चेहर्‍यावरचं हंसू निष्कपट असायला हवं,त्यासाठी काही संवय करून घ्यावी लागत नसावी.अगदी जणू लहान मुलं हंसतात तसं हंसणं मी म्हणतो. जेव्हा तुम्ही त्या लहान मुलांना शाबसकी दिल्यावर ती हंसतात तसं.त्यातलं मुख्य गूढ असं आहे की,मनुष्य स्वभावाला दाद दिली गेली पाहिजे. कारण एखाद्याच्या चेहर्‍यावरचं हंसू त्याचा स्वभाव कसा आहे हे सिद्ध करून दाखवतं.”

अलीकेडे त्याच्या वडलात झालेला फरक आठवून त्याला त्याच्या बाबांचा कणव आला असावा.जूनी आठवण काढून मला म्हणाला,
“माझा जन्म खेड्यात झाला.आमचं कुटूंब अगदी लहान होतं.मी,माझे आईवडील आणि माझी एकुलती बहीण.माझी आई घरात राहून आमची देखभाल करायची.माझे वडील जरा मर्दानी स्वभावाचे.नेहमीच स्वतःला चिडचिड्या स्वभावाचे समजायचे.प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांनी कुटूंबाला खूप मदत केली अगदी आम्हा दोघांची लग्न होई तोपर्यंत.ते बरेच वेळा शहरात काम करायचे.आणि तिकडून आम्हाला पैसे पाठवायचे.”

“मग आता तुझ्या बाबत विशेष असा काय फरक झाला आहे?कोण त्याला कारण आहे असं तुला वाटतं?”
मी स्वप्नीलला मुद्दामुनच विचारलं.थोडा विचार करीत मला म्हणाला,
“आता आपल्या नातवंडांबरोबर ते मजा-मस्करी करीत असतात.आमच्या मुलांनीपण आपल्या आजोबांना सुख-समाधानी दिली आहे.जी ह्या वयात लहान मुलांकडून अपेक्षीत असते.त्याशिवाय मी एक पाहिलंय माझे वडील ज्यावेळी हंसतात तेव्हा ते छान दिसतात,आणि आजुबाजूच्या लोकांना त्यांच्या अंगचा प्रेमळपणा दिसून आलेला पाहून माझ्या डोळ्यात आनंदाची भरती येते.”

“म्हणून मला वाटतं,हंसत राहिल्याने आणि विनोदीवृत्ति असल्याने कुणीही हास्यास्पद दिसला जाणार नाही.”
मी आमचं बोलणं आवरीत म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 3, 2010

विनोदीवृत्ति.

“आपलं भविष्य अधांतरी लटकत असतं. आणि आपले प्रियजन आपल्याला सोडून जात असतात.”

कुसूमच्या आजोबांना बुद्धिभ्रम झाला होता.मी ज्याज्यावेळी त्यांना भेटायला जायचो त्यात्यावेळी ते मला नव्या नावाने ओळखायचे. पण त्यांच्या बोलण्यातला संदर्भ वस्तुस्थितिला धरून असायचा. ते गेल्याचं जेव्हा मला कळलं तेव्हा मी कुसूमला भेटायला गेलो होतो. कुसूमचं आपल्या आजोबावर अत्यंत प्रेम होतं.कुसूम माझ्याच ऑफीसात कामाला होती. रिटायर्ड झाल्यावरही आम्ही आमचा स्नेह कायम ठेवला होता.

मला म्हणाली,
“माझे आजोबा गेल्यानंतर प्रत्येक दिवस मला त्यांची काहीनाकाही तरी आठवण देऊन जायचा.गेल्या आठवड्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते.
“प्रत्येकाचा काही ना काही गोष्टीवर विश्वास असतो.” असा माझ्या मनात विचार आला.
मी धुऊन सुकलेल्या कपड्यांच्या घड्या करीत होते,आणि मी गालातल्या गालात हंसले.
कित्येक दिवस अगदी ह्याच गोष्टीबद्दल मी विचार करीत होते.प्रश्न जरा कठीणच वाटत होता.काहीना प्रश्न सुटत असावा. कुणाचा “प्रेमाच्या क्षमतेवर”,तर कुणाचा “समानुभूतिवर” विश्वास असतो..”विनोदवृत्ति असणं ” ह्या गोष्टीबद्दल मला विशेष वाटतं.कारण ती एक सहजसुंदरतेची बचत म्हणावी लागेल.”

मला कुसूमच्या म्हणण्याचा रोख समजत होता.कुसूमचे आजोबा सदा हंसत-खेळत राहाण्याच्या वृत्तिचे होते.त्यांच्या टेबलावर नेहमी कार्टून्सची पुस्तकं,विनोदी नाटकांच्या सीड्या,विनोदी लेखकांची पुस्तकं पहायला मिळायची.त्याची आठवण येऊन मीच कुसूमला म्हणालो,
“आयुष्यात तशी गंभीरताच जास्त असते.खरं तर जीवन औपचारिक आणि भयभीत असतं.अशा परिस्थितित तुझ्या जवळच्या लोकांनी काय पाहिलं असेल तर तुझ्या आजोबांची विनोदवृत्ति.ह्या वृत्तिमुळे ते प्राप्त परिस्थिति काही मामूली करण्याच्या प्रयत्नात नव्हते.उलट ते ती परिस्थिति तेजाळण्याचा प्रयत्न करीत होते.”

आपल्या आजोबाबद्दल अगदी योग्यतेच अवलोकन करून मी सांगतो आहे हे पाहून कुसूमला फारच बरं वाटलं.
मला म्हणाली,
“अलीकडेच माझ्या आजोबांना बुद्धिभ्रमाची बाधा झाली होती.माझ्या मते त्यांना ती फाशीचीच शिक्षा झाल्यासारखं मला वाटत होतं. त्यांना ते कळत नव्हतं.हळू हळू ते शांत आणि गंभीर व्हायला लागले होते.माझे बडबड करणारे, जीवनावर प्रेम करणारे,आजोबा तसे राहिले नव्हते.त्यांचं जग घटलं होतं,त्यांचं शरीर घटत जात होतं.त्यांचं व्यक्तित्व घटत होतं.मी माझी आई,माझे मामा,मावशी कोणी ना कोणी सतत त्यांच्या सहवासात रहात होतो.
तरीपण आजोबा कधीकधी इकडे तिकडे गंमत करायचे.विनोदीवृत्तिचा एक लहानसा तुकडा त्यांच्या जवळ असायचा. जुन्या विनोदी नट-नट्यांच्या आवाजाच्या टेप्स ते लावायला सांगायचे.त्यांना ऐकून ते हंसायचे.
जाण्यापूर्वीच्या दिवशी ते अधीक अधीक झोपेत होते.त्यांना उठवायला जरा कठीण होत होतं.अन्न जवळ जवळ सोडलं होतं.मी त्यांची सेवा करण्यासाठी चौवीस तास घरी रहायचं ठरवलं होतं.मी त्यांच्या झोपण्याच्या खाटीपासून जवळच जमीनीवर चटईवर झोपत होते.रात्रीचे ते कमीच झोपायचे.मी जरा माझी कुस वळवली की त्यांना जाग यायची आणि ते माझ्याशी बोलायला तयार व्हायचे.आम्हा सर्वांना तोपर्यंत लक्षात आलं होतं की त्यांचं काही खरं नाही.”

मी कुसूमला म्हणालो,
“तशी तुम्ही त्यांची त्यांच्या आजारात फारच काळजी घेत होता.मी ज्यावेळी यायचो त्यावेळी एखादी नर्स त्यांच्या औषधपाण्याची सोयकरताना,त्यांना कुशीवर वळवून पाठीमागे उषीचा लोड ठेवताना,त्यांचा अगदी आदर ठेऊन त्यांच्याशी बोलताना पाहिलं आहे.”

“त्यांची देखरेख करायला आम्ही दोन नर्ससीस ठेवल्या होत्या.त्या नर्सीस त्यांची आपल्या वडीलांची काळजी घ्यावी अशी काळजी घ्यायच्या.”
कुसूम मला सांगू लागली, “त्यातल्यात्यात त्यांना आवडणारी नर्स म्हणजे प्रेमाताई.
ते जायच्या दिवशी दुपारच्यावेळी प्रेमाताईची पाळी होती.चेहरा थोडा चिंताग्रस्त करून आजोबा मला म्हणाल्याचं आठवतं,
“मी झोपलो असताना प्रेमाताई आली तर गं?”
त्या माझ्या थकलेल्या परिस्थितित्त मी माझ्या आजोबांचीच नात असल्याने त्यांना म्हणाले,
“काही काळजी करूं नका.मी चटईवर झोपेन माझी कुस वळवीत राहीन म्हणजे तुम्ही जागे रहाल.”

माझं हे ऐकून आजोबा हंसले.पण ते त्यांचं नेहमी सारखं वेड्यासारखं हंसणं नव्हतं.अगदी पोटापासून खळखळून, मोठ्यांदा आवाज काढून केलेलं ते हंसणं नव्हतं.ते त्यांचं शांत हंसणं होतं. त्यांचे खांदे हलले.दांत विचकटून हंसल्या सारखा त्यांचा चेहरा दिसला पण कसलाच आवाज आला नाही.ते हंसत असल्या सारखे भासले.त्यांच्यावर विनोद केलेला त्यांना आवडायचा,त्यामुळे ते तसेच वाटले.त्यानंतर चौवीस तासानी ते गेले.”
कुसूम अगदी डोळ्यात पाणी आणून सर्व सांगत होती.

मी तिला म्हणालो,
“हे जग जुनं आणि कठोर आहे.आपण आपल्या कामाच्या मागे लागतो. मुलांच्या परिक्षा जवळ आलेल्या असतात. अंतीम क्षणाची आपल्याला चिंता असते.आपलं भविष्य अधांतरी लटकत असतं. आणि आपले प्रियजन आपल्याला सोडून जात असतात.”

हे ऐकून कुसूम गहिवरली आणि म्हणाली,
“आजोबा आम्हाला सोडून गेले ते पाहून उदव्हस्त झाल्यासरखं मला वाटलं. पण त्यांचा शेवट आला तरी त्यांच्या विनोदीवृत्तिने आम्हाला सावरलं. आजुबाजूचे सर्व त्यांच्यावर प्रेम करायचे.त्यांच्या विनोदी राहाण्याचं कौतूक करायचे. त्यांच्या विनोदीवृत्तिनेच,त्यांच्या जाण्याने झालेल्या दुःखातून, त्यांच्या गंभीर आजारातून,सरळ छेद घेतला होता.”

शेवटी मी कुसूमला म्हणालो,
“तुझ्या आजोबांच्या जाण्याने दुःखाने हळहळण्या ऐवजी त्यांच्या प्रेमळपणाबद्दल आणि विनोदीवृत्तिबद्दल आनंद व्यक्त करायला तुम्हाला त्यांनी मोका दिला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com