आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.बरेच दिवस तळ्यावर त्यांची भेट झाली नाही तेव्हां म्हटलं बरं तर आहे ना त्याना!।भाऊसाहेब वाचत बसले होते.मला पाहून त्याना बरं वाटलं असावं.
मी म्हणालो,"भाऊसाहेब काय वाचता?विशेष काही तरी विषय असणार।"भाऊसाहेब म्हणाले,"खूप दिवस टी.व्ही वर ग्रीनहाऊस इफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबलवारमींग असे मोठे मोठे शब्द कानावर
येतात.म्ह्टलं काय आहे प्रकरण म्हणून जरा इंटरनेटवर गेलो आणि ह्या विषयावर काही पुस्तकं चाळली.त्यातून रेकमेंड केलेलं हे पुस्तक लायब्ररीतून आणून वाचत होतो.काय म्हणता बसा चहा घ्या."मी म्हणालो,"भाऊसाहेब मी जरा घाईत आहे.तुमची फक्त खबर घ्यायला आलो होतो.तुम्ही हे सगळं वाचून झाल्यावर मला तुमची बॉटम लाईन सांगा.उद्दया आपण तळ्यावर भेटू तेव्हा"असं म्हणून मी काढता पाय घेतला.दुसऱ्या दिवशी आम्ही तळ्यावर भेटल्यावर प्रो.देसायानी स्वतःहूनच विषय काढला.मला म्हणाले," सर्व प्राणीमात्रानवर आपणां माणसाचा आदर असला पाहिजे.मला वाटतं, माणासावर, ह्या पृथ्वीबद्दल आणि
पृथ्वीवरच्या जीवनाबद्दल एक नकळत जबाबदारी आली आहे.खरं सांगू तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावर मला माझं लहानपण आठवलं.जमीन खणतां खणतां मला लहान जीवजंतू खालून येताना पाहून काय हा चमत्कार आहे असं वाटायचं.प्रत्येक जीव, सरपटणारा,वळवळणारा पाहून मला खूप अचंबा वाटायचा. अगणीत तास मी आमच्या पोरसात,काय काय चमत्कार ह्या जमीनीत असावा,याचा शोध करीत बसायचो.काही लोकाना कदाचित माझं हे चमत्कारीक वागणं पाहून तिटकारा येत असावा. हे प्राणी गिळगीळीत कीडे वाटत असतील.पण मला तर हे सगळे प्राणी, ह्या विश्वात निरनिराळ्या आकाराचे आणि प्रकाराचे दिसतात. आणि हे गिळगीळीत किडे जणू लहानात लहान राहून ह्या सर्व लहान मोठ्या प्राण्यांचे प्रतीनिधीत्व करतात असं वाटायचं।जीवन चक्राशी हे अगदी निगडीत वाटायचं. सर्व ऋतूमधे मला आवडणारा वसंत ऋतू."मी म्हणालो,"भाऊसाहेब,तुमच्या लहानपणाच्या आवडीच्या विषयाचीच आता उदोउदो होत आहे असं मला वाटतं जे तुम्ही अलिकडे वरचेवर सगळीकडॆ ऐकतां आहां."प्रो.देसाई मला म्हणाले,"अगदी बरोबर बोलला. वसंत ऋतूच्या अगदी सुरवातीला झाडावरच्या घरट्यांमधून बाहेर पडणारं ते पक्षांच पिल्लू आणि गडद निळ्या अंड्याचं ते घरट्यातून खाली पडणारं कवच, मी कितींदा पाहिलंय.निसर्गाच्या निर्मीतीचक्राची त्याच वेळेला मला जाणीव व्हायची.हा निसर्गाचा निर्मीतीचा दुवा पाहून मी ह्या गोष्टीबद्दल खूपच भारावून गेलो होतो आणि अजून पर्यंत ती जाणीव माझ्या मनात आहे.त्यामुळे ह्या वयात पण ग्रीनहाऊस ईफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबल वारमींग हे शब्द कानावर पडल्याने माझ्या मनातले ते लहानपणातले खोल भारावून गेलेले विचार मला हे पुस्तक वाचायाला जणू आव्हान देत आहेत असं वाटलं.""पण भाऊसाहेब,हे आतांच जगात एव्हडं अवडंबर कसलं चाललं आहे?" असं मी त्याना विचारल्यावर ते म्हणाले,"तुम्ही फारच चांगला प्रश्न विचारलात. अहो,ह्या जीवनचक्राचा आदर करण्याचा लाभ घ्यायला सर्वच मनुष्यप्राणी तयार असलेला दिसत नाही.उलटपक्षी हा निसर्ग आणि हे विश्व सर्वांचं आहे ही भावना न बाळगता, निसर्गातल्या सोयी ह्या आपल्यापुरत्या गरजा समजून काही लोक त्याचा दुरूपयोग करीत आहेत.ह्या यंत्रयुगातल्या क्रांतीने जीवन यांत्रींक करून तो एक कारखाना केला आहे.आणि मनुष्याला आवश्यक असलेली मुबलक नैसर्गीक भिन्नभिन्नता पद्धतशीरपणे वाटेला लावली आहे.एकमेकावर अवलंबून असणाऱ्या जीवंत प्राण्यांच्या आवश्यक्यतेची,स्वतःहून केलेली हानी एव्हड्या टोकाला पोहोचवली गेली आहे,की कुठचाच पृथ्वीचा भाग रक्षीत राहिलेला नाही.वातावरणात एव्हडी विषारी टॉक्झीन्स भरमसाट प्रकाराने आपल्या यंत्रसामुग्री बनविण्याच्या हव्यासाने फेकली गेली आहेत की त्याची आता परिसीमा गाठली गेली आहे.त्यामुळे वातावरण धोकादायक शीगेला पोहचलं आहे.त्यामुळे हा वातावरणातला बदल सर्व तऱ्हेच्या जीवनाचं मुलभूत चक्रच बदलून टाकण्याचा इशारा देत आहे, ताकीद देत आहे.आणि त्यामुळे नवीन नैसर्गीक उत्पतीला वेळच मिळेनासा झाला आहे.मी म्हणालो," भाऊसाहेब हे जे तुम्ही मला सांगता, ह्याचे प्राणीमात्रावर नक्कीच दुष्परीणाम झाले असणार हे उघडंच आहे." कपाळावर आठ्या आणत भाऊसाहेब म्हणाले,"काय सांगू तुम्हाला,कॅन्सर झालेला, एखाद्दया डॉक्टरचाच जवळचा नातेवाईक, स्वतः आपल्या रोगाबद्दल अज्ञानात आहे आणि त्या डॉक्टरला मात्र त्याच्या रोगाची जाणीव असल्यानें त्या रोग्याचं कसं होईल याचा प्रश्न पडला आहे तसं ह्या विषयातल्या जाणकाराना पृथ्वीबद्दल वाटत आहे.तुम्हाला मी एकामागून एक विटंबना सांगतो.धृवावरील सर्व पोलर अस्वलांचं राहण्याचं बर्फ वितळत आहे.समुद्रातील कासवांच्या अंड्यांच्या उत्पतीवर गंडांतर आलं आहे.मोठ्या देवमास्यांच्या ठरावीक खाण्यावर संकट आलं आहे. समुद्रातल्या वनस्पतीचा मुळ रंग धुवून गेला आहे.ही थोडी फार उदाहरणं मी तुम्हाला सांगितली.त्याशिवाय वातावरणातल्या होणाऱ्या बदलाने मानवाच्या संस्कृतीवर आणि त्याच्या रहाणीमानावर दुष्परीणाम होत आहेत,इतके की तो आता जणू वातावरणाचा निर्वासीत झाला आहे.ह्या सर्व संकटावर मात करण्यासाठी फारच कमी प्रयत्न केले जात आहेत इतके की आणखी कांही थोड्याच
अवधीत पृथ्वीचं वातावरण संपुर्ण कायमचं बद्लून जाणार आहे.मला काळजी वाटते की,सर्व प्राणी मग ते आमच्या पोरसात असो की जगात आणि कुठे असो मानवाच्या हव्यासामुळे बळी जावूं नयेत."हे सर्व ऐकून मी प्रोफेसरना म्हणालो,"भाऊसाहेब,तुमची मात्र कमाल आहे.एखाद्दया विषयाच्या तुम्ही मागे लागला की पुरंपुर तो विषय तुम्ही पिंजून काढता। आणि इतराना कौशल्याने समजावून सांगता।रुईया कॉलेजचे प्रोफेसर उगीचच झाला नव्हता."भाऊसाहेबांच्या मिष्कील हंसण्यात माझ्या म्हणण्याला दुजोरा मिळाल्याचे पाहून मला बरं वाटलं
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment