Monday, September 22, 2008

” पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.” …

वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा “वृद्धत्व शाप केव्हा ठरतं.”
ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं.

त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता चार जण हलक्या पावलाने येताना दिसले.बरोबरचे एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत होते.भाऊसाहेब थांबा,थांबा म्हणून मला हाताने खुणावत होते.जवळ आल्यावर त्या तिन गृहस्थांशी माझी त्यानी ओळ्ख करून दिली.
हे प्रो.घारपुरे,हे डॉ.तुळपुळे आणि हे श्री. नेरूरकर.
प्रो.घारपुरे आय.आय.टी खरगपूर मधून अलीकडेच रिटायर्ड झाले.डॉ.तुळपुळे व्ययसाय सोडून आता पंधरा एक वर्ष झाली.आणि नेरूरकर ए.जी.-अकौन्ट्न्ट जनरलच्या- ऑफीस मधे चाळीस वर्ष काम करून रिटायर्ड झाले.
सर्व वृद्ध एकत्र जमल्यावर वृद्धत्वाच्या गोष्टी निघणं स्वाभाविक होतं.
“वृद्धत्व शाप केव्हा ठरतं.”
ह्या विषयावर बोलूया असं भाऊसाहेबानीच सुचवलं.
म्हणाले,
“वृद्ध व्यक्तिचे सर्व साधारण दोन भाग पाडले जातात.जे वृद्ध ६० ते ७० वयोगटात असतात,त्याना तरुण वृद्ध म्हणतात,आणि जे सत्तर पेक्षा अधीक वयाचे असतात त्याना जास्त वृद्ध असं म्हणतात.
ही वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात. त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असतं.
त्यांना आपलं वृद्धत्व वरदान किंवा शाप वाटतं.”
डॉ.तुळपुळे म्हणाले,
“ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.”
मी डॉ.ना म्हणालो,
“अशी का चीड यावी?”
त्यावर प्रो.घारपुरे सांगू लागले,
“मी सांगतो माझाच अनुभव आठवून.
ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.”
मधेच भाऊसाहेब इंटरव्हेन करून म्हणाले,
“कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.”
मी डॉ.तुळपुळयाना म्हणालो,
“हे भाऊसाहेबांच म्हणणं तुम्हाला पटतं का?”
डॉ.तुळपुळे आपल्या व्यवसायाच्या विषयातल्या मानसिक परिस्थितीचा विचार करून म्हणाले,
“ह्या परिस्थितीत वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.”
इतका वेळ गप्प बसून ऐकत असलेले नेरूरकर हाताने खुणावत सांगू लागले,
“अहो,मला तर,
“इतक्या लवकर घरी कसे परत आला “
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना आपल्याला कसा दोष देता येईल?”
मी डॉ.तुळपुळ्याना विचारलं,
“डॉ.साहेब,हे आपल्याच घरातल्या प्रेमळ लोकाना असं कसं मनात येतं?”
डॉ.तुळपुळे जरा विचार करून म्हणाले,
“घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.”
“असं कसं म्हणता तुम्ही डॉक्टर”असं म्हणत,नेरूरकर आपला वॉकर पुढे सरकावून म्हणाले,
“तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.खरं ना?”
प्रो.देसाई आपला विचार सांगू लागले,
“कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्याना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
त्यांनी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.”
प्रो.घारपुरे जणू आपलाच अनुभव सांगण्याच्या अविर्भावात म्हणाले,
“त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
“कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या.”
“घरात शांततेने रहा”
अशा वृद्धाना,
“तोंड बांधून बुक्याचा मार”
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
“परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?” असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?”
डॉ.तुळपुळे पेशंट कडून जमविलेल्या माहितीच्या आधारावर म्हणाले,
“अहो,माझा एक पेशंट होता.त्याला वरचेवर आजारी पडण्याचं कारण विचारताना मी त्याल म्हणालो,
“तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?”
त्यावर मला कळलं,की काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडिलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडिलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.”
हे ऐकून नेरूरकर म्हणाले,
“म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडिल अडचणिचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडिलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडिलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.”
डॉं.तुळपुळे म्हणाले,
“त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.”
प्रो.देसाई बराच वेळ हे सर्व ऐकत होते.ते म्हणाले,
“अहो,मी तुम्हाला पुढे जावून सांगतो,की काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वपनं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.”
हे ऐकून प्रो.घारपुरे म्हणाले,
“अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडिलांशी तुटकपणे वागतात. याचं मरणप्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.”
हे सर्व ऐकून मी डॉ.तुळपुळ्यांना विचारलं,
“सांगा डॉक्टर,हे सगळं ऐकून आणि बघून पुढे वृद्ध होणार्‍या मंडळीनी काय करावं?”
डॉ.तुळपुळे म्हणाले,
“पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
ह्या चर्चेला समारोप करताना प्रो.देसाई म्हणाले,
“अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.”
हे बोलून झाल्यावर भाऊसाहेब माझ्याकडे बघून हंसले.
“समजने वालोको इशारा काफी है”
उठता उठता मी मनात पटपुटलो,
” दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.” …



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

No comments: