Tuesday, July 14, 2009

देवा! मला रोज एक नवी चूक करू दे!

“म्हणजे त्या चुकेतून माझी सुधारणा होईल.कारण चूकच केली नाही तर सुधरायचं कसं?”

“जेव्हा पासून मी माझ्या आईवडीलाना मला एक मुलगी पसंत आहे आणि मी तिच्याशी लग्न करायचा विचार करतोय असं सांगितलं त्यापासून त्यांच्याकडून उपदेशाचा माझ्यावर सतत भडिमार होत राहिला.जास्त करून माझ्या वडीलांकडून उपदेश जास्त येत होता.मी आणि ते एकदा एका रात्री जवळ बसून त्यांनी जे मला सांगितलं ते त्यांनी आपल्या मनात बरेच दिवस ठेवलं होतं.”

मी आणि दिपक एकदा लहानपणाच्या आठवणी काढून गप्पा करीत होतो.एखादी बालवयातली चूक पुढल्या जीवनात कशी त्रास देत असते,त्याबद्दल दिपक मला आपला अनुभव समजावून सांगत होता.

दिपक पुढे म्हणाला,
”मला वडील म्हणाले,
“दिपक,माझी अपेक्षा आहे की तुझ्याकडून त्या चूका होणार नाहीत ज्या माझ्याकडून लग्नाच्या बाबतीत झाल्या.”
त्यांनी मला सांगितलं, की त्यांनी त्यावेळी आणखी शिक्षण घ्यायला हवं होतं.कुटूंबासाठी त्याचा खूपच फायदा झाला असता.आणि म्हणूनच मला त्यांनी खूप शिकायला प्रोत्साहन दिलं.माझ्या आई बरोबर आदर-सन्मानाने वागायला मला ते नेहमीच सांगतात, कारण माझ्या आईला त्यांनी तशी आदराची वागणूक दिली नाही. ह्याचा त्यांना खंत होत असे.
“लक्षात असू दे”
मला म्हणाले,
“मी चूका केल्या तशाच चूका तू करीत नसलास तरी त्याचा अर्थ असा होत नाही की तू चूका करणारच नाहीस.”
माझ्या लक्षात आलं की,आपल्यापेक्षा मी चांगलं व्हावं म्हणून माझे वडील माझ्या चांगल्या भवितव्याकडे लक्ष देऊन असायचे.त्यांनी निवडलेल्या पर्यायाने त्यांच्या चुकल्या गेलेल्या मार्गापासून मला परावृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न होते.
चुका केल्यानेही त्यातून सुधारणा करण्याच्या वृत्तिवर मी भरवंसा ठेवतो.मी आठ/नऊ वर्षाचा असताना माझ्याकडून एक चूक झाली त्याची गंमत सांगतो.

माझे जवळचे नातावाईक काही करणास्तव आमच्या बरोबर राहायचे.त्यांच्या कठीण परिस्थितीत त्यांना माझ्या वडिलानी तात्पुरता आसरा दिला होता.तसं मला आणि माझ्या भावाला चारचौघात राहाण्याची संवय नव्हती.आमच्या बेडरूम मधे एकदा माझी ह्यातली एक लांबच्या नात्याची बहिण दरवाजा ढकलून बंद करून साडी नेसत होती.
मी दरवाजा उघडून आत जाण्याच्या प्रयत्नात असताना मला आत शिरताना पाहून लाजून ती स्वाभाविकच ओरडली.मी फारच भ्यालो.घरातल्या सर्व जाणत्या मंडळीना मी झालेला प्रकार समजावून सांगितला.
मी वयाने आठ/नऊ वर्षाचा निष्कपट मनाचा असल्याने,माझ्या मनात ते पाहिलेलं दृष्य घर करून होतं.
पुढे योगायोगाने माझ्या वर्गात आमचे वर्गशिक्षक न आल्याने त्यांच्या तासाला दुसरे शिक्षक आले होते. त्यांनी आम्हाला वेळ जाण्यासाठी मनात येईल ते चित्र काढायला सांगितलं. माझ्या मनात होतं ते हे एकच चित्र मी काढलं.

झालं, नंतर माझ्या वर्गशिक्षकाना ते चित्र दाखवण्यात आलं आणि माझ्या वडीलाना शाळेत बोलावून घेतलं गेलं.घरी आल्यावर माझ्या वडीलानी मला माझ्याकडूझालेल्या एका मागून एक चुकांचा परमार्ष घेतला.ही झालेली घटना मी कधीही विसरणार नाही.

तशी ती पहिली चूक अगदीच पापरहीत होती. पण माझ्या नंतरच्या आयुष्यात त्याचा प्रभाव होत गेला.
दरवाजा उघडून मी अचानक आत गेलो ही माझी खरी चूक नव्हती.खरी चूक मी दरवाजावर खटखट करून आत जायला हवं होतं. एकदां किंवा दोनदां खटखटून गेलो असतो तर ते दृश्य मला दिसलं ही नसतं आणि माझ्या मनात राहिलंच नसतं.आपल्याच चूकां आपला चेहरा घुरघुरून पहात असतात.फावला वेळ असताना सुखद विचारांच्या तन्मयतेत ह्या चूकांचे विचार आपल्याला नाहक तंग करीत असतात.
मला वाटतं आपण आपल्या चूका आपल्या लाभासाठी उपयोगात आणल्या पाहिजेत.त्यातून शिकलं पाहिजे.त्या आपल्याजवळ आपली ठेव म्हणून असतात.काही चूका अगदी नगण्य असतात.काही चूका झाल्यावर कुणाचा सल्ला घेण्याची आवश्यक्यता असते.पण सगळ्यात घोडचूक म्हणजे तिच चूक परत परत करीत राहाणं.”

हे ऐकून मी दिपकला म्हणालो,
मी देवाला रोज सांगतो.
“देवा! रोज मला एक नवी चूक करायला दे,म्हणजे त्या चुकेतून माझी सुधारणा होईल.कारण चूकच केली नाही तर सुधरायचं कसं?”


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com