Tuesday, April 17, 2012

"मला पुनर्जीवी करू नका"




माझ्या पत्नीला बरं नाही आणि ती सध्या सुधार सेंटरवर ट्रिटमेन्ट घेत आहे हे प्रो.देसायांना कुणीतरी सांगीतलं.गेल्या विक-एन्डला ते माझ्या घरी आले होते.प्रो.नेरूरकरही त्यांच्याबरोबर आले होते.
तिच्या आजाराची सर्व चौकशी करून झाल्यावर ह्या वयावरच्या समस्येविषयी चर्चा करीत असताना भाऊसाहेब मला आपल्या शेजार्‍याची गोष्ट सांगत होते.


त्यासाठीच ते हॉस्पिटलात परत जायला तयार नव्हते.
"यापुढे मी जरका पुन्हा पडलो तर मला तिथे नेऊ नका,नको ती ऍम्ब्युलन्स नको त्या रस्त्यात जातानाच्या घंट्या अन नको त्या शिट्या"
सत्याऐंशी वर्षाचे प्रो.देसायांचे शेजारी,रिटायर्ड प्रोफेसर आणि एकदा बायपास झालेले हे सदगृहस्थ त्यांना सांगत  हो्ते.


"मला पुनर्जीवि करू नका"
असं लिहिलेला एक फलक त्यांनी आपल्या गळ्यात घालून ठेवला आहे.आणि घरातल्या रेफ्रिजरेटरवरपण एक स्टिकर लावला आहे.तसंच आपल्या

डॉक्टरना आणि तिन मुलांना हा त्यांचा विचार सांगून,त्यांना आपल्याशी सहमत व्हायला लावलं आहे.
संपूर्ण समाधानकारक मरण येण्याबाबत कोण कुणाला हमी देऊ शकत नाही हे त्या गृहस्थाना चांगलंच माहित आहे.त्यासाठी तयारी करावी लागते,त्यावर चर्चा करावी लागते आणि कागद पत्रं तयार करून ठेवावी लागतात हे ही त्यांना पक्कं माहित आहे."


प्रो.नेरूरकर म्हणाले,
"मला वाटतं,इतरांनी ह्या, अती गंभीर आणि अगदी वयक्तिक,खासगी, विषयावर कसा निर्णय घ्यावा ह्याची चर्चासुद्धा तितकीच गंभीर आणि खाजगी आहे असं वाटतं.भावनीक आणि साम्पत्तीक किंमत काय असावी ह्याचा अंदाजसुद्धा तेव्हडाच गहन आहे.
असंही मला वाटतं."


मी माझं मत देताना म्हणालो,
"मरण पुढे ढकलण्य़ाच्या विचाराची काही वर्षांपूर्वी  कल्पनासुद्धा करणं कठीण होतं,ते आता आधूनीक औषध-उपचाराना शक्य झालं आहे.पण उत्तरोत्तर प्रकृती कमजोर होण्यात,व्याधी होण्यात,बुद्धिभ्रम होण्यात आणि सरतेशेवटी कसलेही उपाय करून घेण्यास असमर्थता आणण्यात आपण गुंतले जातो.
पण जरका आपण समजून उमजून निर्णय घेतल्यास कदाचीत सुयोग्य परिणाम होण्यात यशस्वी होऊ शकतो."


प्रो.देसाई आपल्या दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती देताना म्हणाले,
"लिलाताईने योग्य विचार करून आपल्या शेवटच्या दिवसांचा ताबा घेतला.कुसूमने ह्याबाबतीत कसलाच विचार न करून आपल्या नातेवाईकांना विश्वासात न घेऊन स्वतःच्या जीवनाच्या समारोपाबद्दल ती गेल्यानंतरही इतराना क्षतीग्रस्त करून ठेवलं होतं."


प्रो.नेरूरकर आपल्या जवळच्या मित्राची माहिती देताना म्हणाले,
"गुरूनाथ ठाकूर ह्या प्रसिद्ध वकीलाला, आपल्या वडीलांच्या अखेरच्या इच्छा अगदी स्पष्ट आहेत अशा समजुतीने, भरवसा बाळगून राहिल्यानंतर त्यांच्या पश्चात निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणीना तोंड द्यायला नाकीनऊ आले.ज्या गृहस्थाने त्यांना जन्म दिला त्याच्यासाठी त्यांची ही अवस्था झाली होती.
तुम्हाला कितीही वाटत असेल की,आय.सी.युमधे न जाता किंवा जीवनाच्या अंतीम काळाची अतीशय सोय करून केलेली आहे म्हणून सर्व काही सुक्षम होईल तर तो गैरसमज म्हटला पाहिजे.जाणकारांचं ह्यावर एकमत आहे."


"तुमच्या अखेरच्या जीवनाच्या निवडीच्या तयारीचा निर्देश, अगोदरच कागद पत्रातून,करून ठेवून तुमच्यासाठी एखाद्याची त्यासाठी नेमणूक करून जाहिर करावं.नाहीतर कदाचीत त्यावेळच्या आलेल्या परिस्थितीत तुम्हाला ते जमेल न जमेल.
त्यातही अगदी सर्व बाजूने विचार करून केलेल्या कागद पत्रात शेवटच्या क्षणी लागणार्‍या गोष्टी अगोदरपासून अपेक्षीत करता येत नसतात."
प्रो.देसाई असं सांगून पुढे म्हणाले,
"आदीपासूनचे निर्देश आवश्यक आहेत पण जीवनाच्या अंतीम क्षणी केले जाणारे निर्देश परिपूर्ण असतीलच असं नाही आणि नसावेतही.
सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जीवन जगण्यासाठी काय आवश्यक असतं.?"



माझा एक मित्र विकी सागर हा आपल्या पत्नीबद्दल एकदा मला सांगत होता ते मला आठवलं.मी म्हणालो,
"प्रिती सागरचे केस खूप लांब होते.पंजाबी लोकात वयस्कर झालं तरी बायका निटनेटक्या रहाण्याच्या प्रयत्नात असतात.प्रितीचं असंच म्हणणं होतं.ती म्हणायची,
"मला मरण समयी विस्कळीत आणि अव्यवस्थीत केशभार ठेवायचा नाही."
तिला झालेल्या ब्रेस्ट कॅनसरमुळे तिचा मरण समय जवळ आला होता.तिची फोर्थ स्टेज आली होती.त्यासाठी तिने आपल्या लहान बहिणीबरोबर ब्युटी-पार्लरमधे जाऊन खांद्यावर रूळतील एव्हडे केस कापून घेतले होते.
तिला ज्यावेळी कळलं की तिच्या कागद-पत्रावर आणखीन एक सही असण्याची जरूरी आहे.तिने आपल्या जवळच्या मैत्रीणीला बोलावून तिची सहीपण घेतली होती.तिच्या कागद-पत्रात कसलेही लूझ-एन्ड्स ठेवायचे नव्हते.तिच्या नवर्‍याची किंवा नातेवाईकांची मधेच अडवणूक व्हायला नको असं तिला वाटत होतं.



तिने आपले दागीने आणि इतर मौल्यवान वस्तु माझ्या ताब्यात दिल्या होत्या.एव्हडंच काय तर तिने आपलं मंगळसूत्रपण काढून ठेवलं होतं.ती म्हणायची,
"देवाला नक्कीच माहित आहे की मी अगदी सुखाने माझं लग्नाचं आयुष्य भोगलं आहे ते!"

अंतीम समय आल्यावर तिने तिला आवडत असणार्‍या रंगाची साडी नेसली होती.ठसठशीत कुंकू लावलं होतं.अंगावर पर्फ्युम लावून घेतलं होतं. आता ह्या सर्व आठवणी आमच्या जवळ राहिल्या आहेत." प्रितीचा नवरा,विकी,हे सर्व सांगत होता.


प्रो.देसाई म्हणाले,
"जीवनाचा शेवट,ह्या विषयावरची चर्चा करणं तसं कठीणच आहे परंतु,त्यावरचे कागद पत्र आणि फॉर्म्स प्राप्त करून घ्यायला सोपं आहे.आणि ते पेपर्स  मोफतही असतात.कुणा वकीलाची गरजही भासत नाही.

परंतु,ही कागद पत्रं रोगविषयक विकट समस्या उत्पन्न झाल्यानंतर येणार्‍या अगणीक प्रश्नांचं भाकीत सांगू शकत नाहीत.त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी आणि आपल्या डॉक्टरशी चर्चा होणं आवश्यक आहेच त्याशिवाय त्यांना निर्णय घेण्यासाठी आपल्याकडून थोडीफार सवलत देणंही महत्वाचं आहे."

प्रो.नेरूरकरानां गुरूनाथ ठाकूरची त्यांच्या वडीलाबाबत कशी पंचाईत झाली ते सांगायचं होतं.
"मी तुम्हाला सांगू का?"
असा प्रश्न करीत सांगू लागले,
"गुरूनाथ ठाकूरांचं असंच झालं.त्यांच्या वडीलाना पार्किनसनची व्यथा होतीच त्याशिवाय हळुहळू वाढत जाणारा बुद्धिभ्रमही झाला होता.ते जास्त दिवस जगणार नाहीत असे दिवस आल्यानंतर त्यांना लाईफ-सपोर्टची गरज नव्हती असं त्यांच्या वडीलानी आपलं मत दिलं होतं.
पण ज्यावेळी त्यांना जेव्हा हृदयाचे अनियमित ठोके पडायला लागले तेव्हा गुरूनाथने डॉक्टरना अतीदक्ष उपाय द्यायला कबुली दिली.
गुरूनाथ म्हणतात,
"असं करण्याने माझ्या वडीलांच्या अंतीम इच्छेचं मी उल्लंघन तर केलं नाही ना? खरंच मला माहित नाही. हृदयाचे अनीयमीत ठोके पडण्याचा संभव आहे हे मला मुळीच माहित नव्हतं."
ते पुढे म्हणतात,
"ती अंतीम स्थिती नव्हती आणी तो लाईफ-सपोर्टही नव्हता.पण आता मात्र ते डबल असंयमी झाले होते.ते त्यांचं दुर्दैवी जीवन झालं होतं.मी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कसलंच सहाय्य करीत नव्हतो."


हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"आणि ह्याचमुळे आमचे शेजारी स्वतःच्या मरणाची जबाबदारी घेत आहेत.विलंब होणारं मरण त्यांना नको होतं.
अशी वीरता दाखवली नाही तर दुर्लभ साधनांचा दुरूपयोग होईल असं त्यांना वाटतं. आणि ह्यासाठीच
"मला पुनर्जीवी करू नका"
असा फलक ते स्वतःच्या गळ्यात घालून ठेवतात.ते जातील तिथे तो फलक त्यांच्याबरोबर असतो.
"मी सुखी जीवन जगलो आहे.आणि मी तसंच पुढल्या जन्मात जगेन."
असं ते म्हणतात.


"आम्ही तुमची पत्नी आजारी आहे म्हणून कसं काय चालंय ह्याची चौकशी करायला आलो आणि बोलता बोलता ह्या प्रसंगाला न शोभणार्‍या विषयाची
चर्चा करून तुम्हाला नाहक मनस्ताप तर दिला नाही ना?"
प्रो.देसाई मला म्हणाले.प्रो.नेरूरकरानीही मान डोलावून आपलं तेच म्हणणं आहे असं मला दर्शवलं.
मी त्यांना म्हणालो,
"सुधार सेंटरवर गेल्यावर मी जे पाहिलं ते ह्या चर्चेपेक्षाही गंभीर आहे.तुम्ही नक्कीच माझ्या ब्लॉगवर जाऊन "अंतरातल्या नाना कळा"
 ह्या मथळ्याखाली मी अकरा लेख क्रमशः लिहिले आहेत ते जरूर वाचा. आणि त्यानंतर "बंद दरवाजा" हाही माझा लेख वाचावा.तुम्हाला आखोदेखा हाल दिसेल."
"जरूर वाचूं"
असं सांगून दोघानीही माझा निरोप घेतला.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com