Friday, April 3, 2009

मी वर्तमानात रहात असतो.

” मी वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो.”

काही व्यक्तींच्या नशीबात सदैव दुःखच असतं.अर्थात नेहमी सुखाचे दिवस मिळणं जरा अपवादात्मक आहे.पण जीवन जगायला सुखदुःखाची कमी अधिक प्रमाणात जरूरी भासते.होऊन गेलेल्या घटना आठवणीत आणून मन रिझवण्यात मजा येते. परंतु,काही घटना मनाला चटका लावून जातात.आणि त्यातही मृत्युशी दोन हात करण्याची पाळी स्वतःवर आल्यावर जवळच्या आपल्या प्रिय व्यक्तिला अशा घटनेतून जाताना पाहून मरणाची ही प्रकिया किती तापदायक असते हे जास्त कळतं.
सुधाकरचं असंच झालं.पण त्यातून तो सावरला.आणि भुतकाळातल्या गोष्टींचा विचार करून किंवा भविष्यातल्या होऊं घातलेल्या गोष्टींचा विचार करून आयुष्य कंठण्यापेक्षा वर्तमानात राहून वेळेचा सदुपयोग करण्याने सरतेशीवटी जी समाधानी मिळते ती विरळीच.
सुधाकर बरोबर माझं ह्या विषयावर जेव्हा चिंतन झालं तेव्हा मला कळून चुकलं की त्यानेपण ह्यातून कसा मार्ग काढला हे आठवणीत ठेवण्यासारखं आहे.
मी सुधाकरला म्हणालो,
“तूं मागे एकदां गंभीर अपघातातून बचावलास हे मला माहित आहे.अगदी मृत्युच्या तोंडातून बाहेर आलास असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.”
मला तो म्हणाला,
“मी जे समजत होतो,त्यापेक्षाही मला मृत्युशी आलेला अनुभव जास्त माहित झाला आहे.कदाचीत मला असा अनुभव हवा असावा हे वाटण्यापेक्षाही तो प्रत्यक्षात जास्त होता.
मला ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्याची प्रत्यक्षात मोज-माप करणं शक्यतेच्या पलिकडचं होतं.शारिरीक नाश काय आहे ते जीवनाच्या बचावासाठी अगदी टोकाची झुंज देत असतानाच्या घटकेपर्यंतची मला माहिती आहे.एव्हडंच नाहीतर माझ्या प्रिय व्यक्तिला मी गमावून बसताना मला झालेला मनस्ताप जाणवतो, ती व्यक्ति झुंज देत असताना त्या व्यक्तिला केलेल्या मदतीच्यावेळी मी त्यांचा अंतकाल येई पर्यंत हजर होतो.”

“पण तुझ्या त्या अपघाताचं काय झालं ते सांग” असं मी सुधाकरला म्हणाल्यावर तो अगदी गंभीर होऊन म्हणाला,
“मी माझ्या विशीत एकदा गंभीर अपघातात सापडलो होतो.हॉस्पिटलात येई पर्यंत कदाचीत मी जीवंतही नसतो.पंधरा दिवस मी इंटेंसीव्ह केअरमधे होतो.मोडलेलं शरिर आणि बाद झालेलं फुफ्फुस अशी माझी अवस्था होती.दोनदा मी मरणाच्या दाढेतून बचावलो.यमदूताला मला घेऊन जाणं सोपं होतं.पण ते जाणं माझ्यावर अवलंबून होतं.मी यमाशी झगडलो ते मरणाच्या भितीने नाही तर मी जीवनावर प्रेम करीत होतो म्हणून.
नंतर जेव्हा माझी आई क्षयाच्या रोगाने पछाडली होती,तेव्हा मी तिची सुशृषा केली.जेव्हा तिची वेळ समीप आली तेव्हा त्या प्रक्रियेशी मी परिचीत होतो.कारण मी स्वतः त्यातून गेलो होतो.अगदी सरतेशेवटी मी तिला डोक्यावर थोपटलं. दिलासा घेत घेत तिने प्राण सोडला.”
“का रे सुधाकर,काही व्यक्तिंच्या जीवनात सुखांपेक्षां दुःखंच फार असतात.”सुख जवापाडे दुःख पर्वता एवहडे ” हे कुणी म्हटलंय ते अक्षरशः तुझ्या बाबतीत खरं आहे नव्हे काय?”
असं मी त्याला म्हणताच,आपल्याच कपाळावर हात मारून मला म्हणाला,
“त्या कमनशीबी लोकांतला मी पण एक आहे. जेव्हा माझा तीस वर्षाचा मुलगा दोन वर्ष किडनीच्या रोगाला झुंज देत होता,तेव्हा मी त्याच्या सुद्धा बरोबर होतो. त्याच्या जीवनाच्या शेवटच्या वर्षी मी त्याची काळजी घेत होतो.आणि आम्ही एकमेकाचे साथी झालो होतो.नेहमीच आम्ही जीवन-मरणा विषयी चर्चा करून त्याच्या पलिकडे काय आहे ह्याचीही चर्चा करीत असूं.आणि त्याची जाण्याची घटका ज्यावेळी जवळ आली त्यावेळी मी त्याच्या नजरेत नजर घालून होतो. अगदी त्याचा शेवटचा श्वास संपेपर्यंत.त्यानंतर मात्र मी अगदी हवालदील झालो.”

पण असं झालं म्हणून आयुष्यात कच न खाता कसा राहिलो ह्याचं वर्णन करून सांगताना सुधाकर म्हणाला,
“मृत्युशी झालेल्या माझ्या मुठभेडने मला एक शिकवलं,जीवनला अध्यारत धरूं नका.जीवन शीघ्रगामी असूं शकतं.तसंच ते नाजूक आणि क्षणभंगूर असतं.आणि खरंच तर लहान लहान गोष्टी खर्‍या मतलबाच्या असतात.आयसीयू मधून जवळ जवळ दोन आठवड्यानंतर बाहेर आल्यावर मला जो पहिला शुद्ध हवेचा श्वास घेता आला तो मी कधीच विसरणार नाही.माझ्या नर्सने मला व्हिलचेअरवरून जेमतेम उघडलेल्या खिडकी जवळ नेलं तेव्हा मी जरा पुढे वाकून स्वच्छ हवेचा पहिला श्वास घेतला.मी आनंदात डुबून गेलो.तत्त-क्षणी मी संकल्प केला की अशा आनंदायी शुद्ध हवेची महक घ्यायला विसरायचं नाही.”

आणि पुढे जाऊन आपला संकल्प सांगत म्हणाला,
“मला खूप काम करावसं नेहमीच वाटतं.भविष्याबद्दल मी नेहमीच विचारात असतो. भूतकाळाचा मनात विचार आणतो. परंतु,वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो.अग्रचिंतक राहणं हे माझं मोठ्ठं आव्हान आहे.माझ्या मी संतुष्ट न रहाता, माझं जीवन मी सहजंच जाऊ देत नाही.आयुष्यात येणारे मोठे महत्वाचे क्षण आणि लहान लहान आनंदाचे क्षण यात तालमेल असावा असं मला वाटतं.जेव्हा माझ्या जीवनाचा अखेरचा क्षण येईल तेव्हा मागे वळून बघून मला एक समाधानी व्ह्यायला हवी की मी माझी वेळ वर्तमानात अपव्ययीत केली नाही.”

खरंच सुधाकरच्या जीवनातून काही तरी शिकण्यासारखं आहे.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: