Thursday, July 5, 2012

बघ उडुनी चालली रात




वामन मला म्हणाला,
"खरंच, जर का माणसाला उद्या काय होणार ते निश्चीतपणे कळलं असतं तर फारच हलकल्लोळ माजला असता.नीट विचार केला तर, निसर्गाने ही उद्याचं नकळण्याची कमतरता माणसाला दिली आहे, ती एक देणगीच म्हणावी लागेल."


"तुझ्याशी मी ह्यापेक्षा आणखी सहमत होऊच शकत नाही"
असं मी वामनला म्हणाल्यावर वामनला बरं वाटलं.


"आपण सगळे, जास्तकरून, दुःखीच झालो असतो असं मला वाटतं.कारण अख्या जीवनात दुःखच जास्त असतं.मग ते राजाचं जीवन असो वा रंकाचं असो.शिवाय अनर्थ घडले असते."
वामन मला असं म्हणाला.


आणि पुढे म्हणाला,
"आपलं भविष्य आपण हमखास बदलु शकलो असतो.नव्हे तर भविष्य ह्या शब्दाला अर्थच राहिला नसता.
"लग्नं स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर होतात"
 ह्या म्हणण्याला अर्थच राहिला नसता.
"ह्या जन्मी पुण्य केलंस तर पुढचा जन्म चांगला मिळेल"
 ह्याही म्हणण्याला अर्थ राहिला नसता.कारण पुण्यावर आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे पाप करण्यापासून दूर राहिले असते.त्यामुळे कदाचीत पापं कमी झाली असती.
"उद्याचं काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक?"
 असं कुणी म्हटलंच नसतं.कारण उद्याचं, परवाचं आणि सर्व पुढचं अगोदरच माहित असतं."
हे वामनचं म्हणणं ऐकल्यावर आज,काल आणि उद्या हे शब्द माझ्या मनात काहूर करू लागले.आणि शेवटी ही कविता सुचली.


कशाला उद्याची बात?

आज, कालचा उद्या असतो
आणि
आज, उद्याचा काल होतो
मग
उद्या जेव्हा आज होईल
आणि
आज त्याचा काल होईल
तेव्हा
त्या उद्याच्या उद्याला
आजचा उद्याच म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्या म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार आहे

म्हणून
"आता कशाला उद्याची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात"
ही कविता तिथल्या तिथे लिहून मी वामनला वाचून दाखवली.वामनला मतीतार्थ कळायला वेळ लागला नाही.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com