Thursday, May 1, 2008

आगे बढो!

खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो” म्ह्टलं तर किती बरं होईल.

हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे.
हे शहरात जास्त होत असतं. त्यामानाने खेड्यात असले प्रकार फारच कमी होतात.एकवेळा मुंबई अशी होती की येव्हड्या मोठ्या शहरातपण त्यामानाने खून खराबे कमीच होत.मग शहराच्या बाहेर आणि खेड्यात तर कधीतरी एखादा खून व्हायचा.आणि वर्तमानपत्रात खेड्यात रकानेचे रकाने भरून येत.
माझे वडिल तेव्हा रत्नागिरी जिल्हयात पोलिस खात्यात चांगल्या हुद्दयावर होते.त्यांच्या मित्राचा एक मुलगा त्यांच्या हाताखाली पोलिस इन्स्पेक्टरचे काम करायचा.गावात कुठेही दरोडा पडला तर ह्या मंडाळीना दरोडखोराच्या मागावर जावं लागायचं.
एका अशाच दरोडेखोराच्या हातापायीत गोळी लागून त्या इन्स्पेकटरचा खून झाला.त्यावळी अकरा वर्षाचा असलेला त्यांचा मुलगा अलिकडेच मी रत्नागिरीत गेलो असताना मला भेटला.मला पाहून त्याला तो काळ आठवला.
मला तो सांगू लागला,
“मध्य रात्री आमच्या दरवाज्यावर कोणी तरी थाप मारली.माझ्या आईने दरवाजा उघडला. माझ्या आईला तो माणूस म्हणाला,
“तुमचे पति दरोडेखोराची गोळी लागून गेले.”
आणि आमच्या घरात भुकंप झाल्या सारखं झालं.
त्यानंतर त्या दरोडेखोराला पकडलं गेलं,आणि त्याला फांशीची शिक्षा झाली.नंतर वरच्या कोर्टात त्याला जन्मठेपीची शिक्षा झाली.आणि अजून तो तुरंगातच आहे.
मी त्या खून्याबद्दल जमेल तेव्हडा विसर पाडून घ्यायचा प्रयत्न करीत राहिलो.एक तर असं राहणं किंवा त्या खून्याचा द्वेष करीत राहून बळी पडावं हे दोनच उपाय होते.
त्याऐवजी हळू हळू मी माझ्या स्मरणातून त्याचं नांवच काढून टाकण्याचा प्रयत्न करीत होतो. कदाचित इकडे तिकडे काही तरी घटना घडून कुठे तरी वर्तमानपत्रात बातमी येवून त्या खून्याला पॅरोलवर सोडला हे समजलं जायचं किंवा एखादा माझा मित्र “अमक्या अमक्याचं असं असं झालं” असं सांगून आठवण करून द्दयायचा.आणि नंतर मला परत त्याचा विसर पाडायला भाग पडायचं.
हे काही सर्व सोपं नव्हतं.सर्वसाधारण ज्याच्या त्याच्या मनात,अशा परिस्थितीत,
”मुलाने आपल्या बापाच्या खूनाचा वचपा घ्यायला हवा”असले विचार येत असत.
“हरामखोराचा घे वचपा” असं म्हणणारे काही असत.
तुम्हाला आता पटणार नाही पण मला ते त्यावेळी वेगळंच दिसत होतं. माझ्या वडीलांसारखा दुसरा कोणी ऑफिसर असाच मारला गेला हे मला कळल्यावर, किंवा कॅलेंडरवर फादर्सडेचा दिवस बघितल्यावर, मला माझ्या वडलांचं स्मरण व्हायचं.
त्यांच्या मृत्यूचा माझ्या मनात विचार यायचा.आणि त्या खून्याचं अस्थित्वच मी माझ्या मनात नाकारत होतो.
आता सुद्धा हे मी तुम्हाला सांगत असताना,त्याचं नाव माझ्या मनात उचल खातं आणि ज्या जागी माझ्या मनात गाडलंय तिथून मला ते नांव मोकळं करण्याचा प्रयत्न करतं. ह्याचाच अर्थ सतत डोक्यात राग ठेवून मला जगण्याची जरूरी नव्हती.

ह्याचाच दुसरा अर्थ इतिहासाच्या त्या घटनेत मला जखडून राहण्याची जरूरी नव्हती.ह्याचाच अर्थ मी माझं जीवन जगत राहून,माझ्या वडलांवर असलेल्या माझ्या प्रेमाचा, मी कधीच विसर पडू देवू नये,किंवा त्याना आपल्या प्राणाची आहूती देताना काय वाटलं असेल ह्याचाही विसर पडू देवू नये, आणि बदला घेण्याच्या विचारही मनात येऊ नये.

विसरून जाण्याचं अंगी असलेल्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.जगात कितीतरी जूनी किलमीशं जुलूम करण्याच्या मनसेने बदला घेण्याच्या इर्षेने आगीचा डोंब अजून उठवतात.
झालेल्या घटना विचारात घेवून बदला घेवून किती लोकाना प्राण गमवावे लागत आहेत.
खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो” म्ह्टलं तर किती बरं होईल.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: