Monday, March 5, 2012

अंतरातील नाना कळा...२



२३ फेब्रुवारी २०१२

"एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का?”

आज सकाळी माझी मुलगी आणि मी, रिजनल मेडिकल सेंटर सॅन होझे,ह्या हॉस्पिटलमधे जिथे माझ्या पत्नीला ऍडमीट केलं आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो.आम्हा दोघांना पाहून ती अतीशय खूश झाली.पायात एव्हडं पाणी का जमावं ह्याचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांची हालचाल चालू झाली.रोजच्या तिला देत असलेल्या गोळ्यांचं लिस्ट कालच मी क्लार्कला दिलं  होतं.त्यातलं कलेस्टरोल-सिमव्हेस्टॅटीन-हे औषध देण्याचं ताबडतोब बंद केलं.ह्या स्टॅटीन गोळ्या कलेस्टरोल शरीरात कमी करण्याच्या प्रयत्नात साईड इफेक्ट म्हणून शरीरातल्या स्नायुवर असर करतात.

माझी मुलगी आज तिच्या जॉबवर गेली नाही.काल माझा मुलगा,मुलगी आणि मी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमधे घेऊन आलो होतो.आज मुलगा संध्याकाळी आपल्या आईला भेटायला येणार असं ठरलं होतं.
मी माझ्या पत्नीजवळ बसून तिला दिलासा देण्यासाठी तिचा हात माझ्या हातात घेऊन बसलो होतो.माझी स्मृति त्रेपन्न वर्ष मागे गेली.

“माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का”

ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की त्रेपन्न वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी “माझा होशिल का” हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.

तेव्हड्यात मुलगी मला सांगायला आली की  डॉक्टर तिच्या अनेक टेस्टस घेणार आहेत.प्रथम अनेक टेस्टससाठी बरच रक्त काढून घेतलं.तिची किडनी कशी चालत आहे हे पडताळण्यासाठी मुख्य काम होतं.मी थोडा फ्रेश होण्यासाठी व्हिझीटर्सना वापरायला परवानगी असलेल्या रेस्टरूममधे जायला निघालो.वाटेत जागो जागी भिंतीवर लहानशा पेट्या फिक्स करून ठेवल्या आहेत.हाताच्या तळव्याने एक पट्टी पुढे ढकलल्यावर तळव्यावर अर्धा चमचा पाण्यासारखा सुगंधीत द्र्व पडतो त्याने दोन्ही हात आणि तळवे फुसून घ्यायचे असतात.निरनीराळ्या दरवाजांच्या हॅन्डल्सला अनेकांचे हात लागत असल्याने आणि विशेषकरून रेस्टरूममधल्या दरवाज्यांच्या हॅन्डला अनेकांचे हात लागत असल्याने हे कीटाणुनाशक द्रव उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न असतो.
रेस्टरूममधून बाहेर आल्यावर पाय थोडेसे मोकळे व्हावेत म्हणून लांबच लांब कॉरिडॉरमधे एक फेरी घालत असताना पुन्हा मन भूतकाळात गेलं.

"गेली त्रेपन्न वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो."
असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लग्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
त्रेपन्न वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.त्रेपन्न वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.

एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
 "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून."
परंतु पक्व प्रेम म्हणतं,
"मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.
ह्या आठवणीच्या स्वप्नात आणखी जाणार आहे असं वाटत असताना,माझ्या मुलीने मला बोलावून घेतलं.न्युरोलॉजीचा डॉक्टर पेशंटला,माझ्या पत्नीला, पहायला आला होता.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com