आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात
मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?
कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?
अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?
गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?
जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?
लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग
मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?
शेवटी काय?
जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment