आज माझी आणि प्रो.देसायांची एका नवीनच विषयावर चर्चा झाली.
मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मला वाटतं,जीवनात आपत्ति आल्याने जीवन थोडं मसालेदार होतं.
मला वाटतं, जर तुम्ही पूरा दिवस मौज-मजेत घालवलात आणि तुम्ही कोणतंही आवहान स्वीकारताना तुम्हाला कसल्याच अडचणी आल्या नाहीत, तुमचं रक्त सळसळलं नाही किंवा तुमची पिसं पिंजारली गेली नाहीत तर जीवन संतोषजनक होणार नाही.
भाऊसाहेब,तुमचं काय म्हणणं आहे?”
प्रो.देसाई म्हणाले,
“आपल्या वयक्तिक जीवनातली आतली आणि बाहेरची आवहानं आपल्या आत्म्याला उभारी आणण्यात आणि वयक्तिक अनुभवाची सीमा वृद्धिंगत करायला मदत करतात.”
मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो.तो ऐकून मग त्यावर तुमचं मत द्या.ही माझ्या लहनपणातली गोष्ट आहे.
मी ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा माझा एक जवळचा मित्र जयदेव कुस्तिच्या आखाड्यात कुस्ति खेळत असताना एकाएकी हृदय बंद पडून गेला.माझ्या जीवनातला हा एक मोठा दुर्दैवी प्रसंग होता.मी अगदी उदास झालो होतो, आणि मनोमनी समजू लागलो होतो की जीवनात काही खरं नाही.तसंच हे जीवन निर्णायक राहून स्वतःला नष्ट करायला तप्तर असतं असा माझा पक्का समज झाला होता.
माझ्या मित्राच्या निधनानंतर माझ्या मनावर आघात करणार्या त्या अनुभवाकडे पहाताना माझ्या मनात जो दृष्टीकोन परिपक्व झाला तो माझ्या जीवनातच बदल करीत असल्याचं मला दिसून आलं.माझ्या जीवनातला रोजचा दिवस जो मी जगत होतो, तो यापुढे जशाचा तसा मी स्वीकृत करायला तयार नव्हतो.कारण मला माहित होतं की जीवन कायमचं नसतं आणि प्रत्येक दिवसाला दाद दिलीच पाहिजे असं नाही.माझा मित्र गेल्यानंतर माझ्या इतर मित्रांशी असलेल्या माझ्या संबंधाचं मी मुल्यांकन करायला लागलो.इतरांशी असलेले माझे दुवे मजबूत व्हायला लागले.आणि त्यामुळे गेलेल्या मित्राचा दुरावा कमी वाटायला लागला.”
भाऊसाहेब म्हणाले,
मित्राच्या नुकसानीच्या राखेतून नव्या मित्रत्वाची मुळं आणि खोडं उगवायला लागतात.आणि ती खोडं नंतर मोठे बुंधे होतात.मित्र असावा ही कल्पना तुम्हाला स्वीकृत करायला वास्तवीकतेने दिलेल्या हादर्यातून शिकायला मिळत असते. जीवनाची क्षणभंगूरता पाहून प्रत्येक दिवसाकडे आशाळभूत होऊन रहावं लागतं.जीवन वावटळी सारखं असतं अगदी अनिश्चित असतं.
जीवन एक नदी आहे.अनुभवाच्या पाण्याने दुथडी भरून वहात असली तरी आपल्या लहरीपणे ती मार्ग बदलीत असते.”
मला प्रो.देसायांचं हे बोलणं एकदम पटलं.आणि मी त्यांना म्हणालो,
“जीवन हा असा मार्ग पत्करीत असताना,कोणती आपत्ति कोणता खुमासदार मसाला जीवनात छिडकवून चव आणील हे सांगता येणार नाही.तरीपण एखादवेळी एखादी आपत्ति कधी कधी खूपच उग्र अथवा सौम्य मसाला छिडकवून जीवनात स्वाद निर्माण करून तोंडाला खरी चटक आणू शकते.
म्हणून म्हणावं लागतं की जीवनात आपत्ति आल्याने जीवन मसालेदार होतं.”
हे ऐकून प्रो.देसाई नुसते हंसले.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com