Thursday, June 2, 2011

लपविलास तू हापूस आंबा.



“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.”

आता मुंबईत लवकरच पाऊस येईल.केरळात पाऊस पडायला लागला.दहा जून पर्यंत पाऊस मुंबईला येईल.बाजारात निरनीराळे प्रकारचे आंबे दिसत असतील. पण पाऊस पडायला लागल्यावर बाजारात हापूस आंबा कमी दिसायला लागणार आणि त्या आंब्याला चवही रहाणार नाही.म्हणून पाऊस पडण्यापूर्वी हापूस आंबा खाऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून शेवटची हापूस आंब्याची पेटी मी अपना बाजारातून विकत घेतली.

एप्रिलपासून मिळणारा हापूस आंबा सुरवातीला कच्चा असतो.तो आडीत घालून पिकवावा लागतो.तेव्हाच तो पिकल्यावर अतीशय गोड लागतो.पण जूनपर्यंत मिळणारा हापूस नक्कीच पिकून तयार असतो.

ह्या वर्षी मला माझा मित्र रघूनाथ ह्याची खूपच आठवण आली.
त्याला हापूस आंबा अतीशय आवडायचा.खरंतर तो हापूस आंब्याव्यतिरीक्त दुसरा आंबा क्वचितच खायचा.जेमतेम पायरी आंब्याला चांगला म्हणायचा पण पायरीचा आमरस मात्र त्याला आवडायचा.तो म्हणायचा,
“आमरस खायचा तर तो पायरीचा आणि कापून खायचा तो हापूस.”

गेल्या वर्षापर्यंत तो माझ्याकडे आंबे खायला यायचा.त्याचं कारण कोकणातून मी हापूस आंब्यांच्या पेट्या मागवायचो.
रत्नागीरीचे-खरं म्हणजे देवगडचे-हापूस आंबे खाण्यालायक असतात.आमच्या वेंगुर्ल्याचे हापूस आंबेसुद्धा खायाला मस्त लागतात.
रघुनाथ आंब्याच्या दिवसात आमच्या घरी आल्यावर मला म्हणायचा,
“हापूस आंब्याची पेटी आणलेली दिसते”
“तुला कसं कळलं रे?”
मी त्याची फिरकी घेत म्हणायचो.

“अरे, हापूस आंब्याचा वास कधी लपवता येत नाही.एव्हडंच काय तर आंब्याचा बाठा चोखून टाकलास तरी त्याचा वास लपायचा नाही.सर्दी झाली असली तरी.”
असं मला लागलीच म्हणायचा.

मी पुढे काही बोलण्यापूर्वी,
“चल घेऊन ये सुरे-सूरी आंबा कापून खाऊया. तुझा देवगडचा हापूस आंबा मी पहिल्यांदाच ह्या वर्षी चाखणार आहे.बाहेर काय रे,आंबे विकणारे, सगळेच आंबे रत्नागीरी हापूस म्हणून सांगत असतात,ते काही खरं नसतं.तुझ्याकडचा असली रत्नागीरी हापूस आंबा असतो यात वाद नाही.

आंब्याची पेटी ठेवली होती तिकडे जायचा आणि त्यातून चांगले पिकलेले दोन तीन आंबे हातात घेऊन प्रत्येक आंबा नाकाजवळ नेऊन वास घेत म्हणायचा,
“माझी जीभ नुसती सरसरून चव घ्यायला आतूर झाली आहे.तू जरी काही म्हणालास तरी मला आंबा नको म्हणायला जमणारच नाही.”
हे सगळं रघुनाथकडून ऐकण्यापूर्वीच मी त्याच्या चेहर्‍याकडे लक्ष देऊन पहात असायचो.हळूच माझ्याकडे बघायचा हळूच खाली बघायचा,आंब्यांचा पिवळा केशरी रंग न्याहाळायचा.मी त्याला म्हणालो होतो,
“अरे लाजू नकोस आणखी दोन तीन आंबे घेऊन जा घरी हवं तर.मी तुझं मन जाणतो.एकदा पाऊस पडला की ह्या हापूस आंब्यांची चव जाणार. तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”

ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज आंब्याची पेटी उघडल्यावर रघुनाथची प्रकर्षाने आठवण आली.रेडीओवर मालती पांडे यानी गायलेलं,गदिमाचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?”

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही.ह्या गाण्याचं “विम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, रघुनाथाला मी ते गीत अर्पण करतो.
जणू रघुनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com