Monday, January 18, 2010

गोरेगांवचे सामंतगुरुजी गेले.

” मधुदादा, अखेर तुम्ही आम्हाला सोडून गेला.”

त्या दिवसात अण्णा आई वेंगुर्ल्याला होते.अर्थात अण्णा अंथरूणात आजारी असल्याने ती दोघं येऊ शकली नाहीत. सुधाकर पण त्यांच्या बरोबर होता.
मी अक्काच्या लग्नाच्या वेळेची आठवण येऊन म्हणतोय.

मला वाट्तं ते १९५१ साल होतं.सुधाकर १५ वर्षाचा होता.मी १८ वर्षाचा होतो.मी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात शिकत होतो. अंधेरीच्या आराम नगर मधे मी एकटाच रहात होतो.पण माझ्या बरोबर माझा मावस भाऊ रमाकांत-आता तो नाही- रहायचा. अंधेरीच्या भवन्स कॉलेज मधे मी जात होतो.

रमाकांत तुमचा मित्र होता.तुमचं अक्काशी लग्न करून द्यायचा त्याचा विचार झाला.अक्का चांगले मार्क्स घेऊन मॅट्रिक पास झाली होती.त्यावेळी ती खूपच सुंदर दिसायची.प्रसिद्ध मराठी नट चंद्रकात याने तीला शारदा नाटकात शारदेची भुमीका दिली होती.चंद्रकांतने नाटकाचं डायरेक्षन केलं होतं.

“मुर्तिमंत भिती उभी मज समोर राहिली”

ह्या शारदा नाटकातल्या गाण्याला तीला बरेचवेळा “वन्स मोअर” मिळायचे. एक दोन वर्ष तीने वेंगुर्ल्याला नोकरी केली.रॅशनींग ऑफीस मधे.

अक्काच्या लग्नाला अण्णा आईने संमत्ती दिली आणि तीने तुम्हाला होकार दिला.
मी,माझा मोठा भाऊ भाई/माई, त्याची मुलं-मंगला ६ वर्षाची,सतीश ४ वर्षाचा आणि निमा(निर्मला) नुकतीच झाली होती. आणि रमाकांत एव्हडीच मंडळी मुलीच्या बाजूची होती.
तुमचे दोन भाऊ-वसंत,प्रभाकर आणि तुमच्या दोन बहिणी आणि तुमचे आई वडील होते.

लग्न गिरगावांत हॉल घेऊन केलं.खूप नातेवाईक मंडळी आली होती.
म्हणजे १९५१ पासून माझी आणि तुमची ओळख.आज २०१० म्हणजे जवळ जवळ गेल्या ५८/५९ वर्षांचा माझा तुमचा परिचय होता.कार्यबाहुल्यामुळे मला जरी दूर रहावं लागलं तरी आठवणी येतच रहायच्या.दोन वर्षापूर्वी अक्काचं निधन झालं.तीच्या जाण्याने तुम्हाला धक्का बसला होता.पण संगीतात वेळ खर्ची करून तुम्ही तुमचा एकटेपणा निभावून नेत होता.

तुमच्या घरात संगीताची सर्वानाच गोडी होती.तुमचे मोठे भाऊ वसंत हे व्ही.शांताराम यांच्या राजकमल कला मंदिरात त्यावेळी म्युझीशियन होते.ते प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई याचे असिस्टंट होते.प्रभाकर पण संगीतात स्वारस्य घ्यायचे.आणि तुम्ही तर उभी हयात संगीताची सेवा करण्यात खर्ची केली. अख्या गोरेगावात सामंत गुरुजी म्हणजेच आमचे मधुदादा.तुमचा आवाजही गोड होता.ऑल इंडिया रेडीओवर तुमचे त्यावेळी संगीताचे कार्यक्रम व्हायचे.तुम्ही गाण्याना चाली पण द्यायचा.मी तुमची गाणी ऐकली आहेत.
किर्तनात तुम्ही पेटी वाजवायचा.मेढेकरबाईंच्या गिरगावातल्या क्लासात तुम्ही संगीताचे गुरूजी होता.तुमचा संगीताचा वारसा विरेनने घेतला.आणि विरेन नक्कीच तुमचा वारसा चालवील.
गेल्या ३०/४० वर्षात तुम्ही गोरेगावांत तुमचा शिष्यगण एव्हडा निर्माण केलेला आहे की बरेचसे तुमचे शिष्य आजोबा होऊन त्यांची नातवंडं पण तुमच्या कडून शिकून गेली असतील. दरवर्षी गुरूपोर्णिमेला तुमचे गोरेगांवात संगीताचे कार्यक्रम व्हायचे.तुमचे शिष्य/शिष्या त्यात भाग घ्यायचे.

तुम्ही गोव्याचे असल्याने तुम्हाला पोर्तुगीझ आणि गोव्याची भाषा यायची.तुम्ही स्वभावाने अतीशय प्रेमळ आणि विनोदी वृत्तीचे होता.तुमचा खास मित्र वसंत सबनीस.तुमच्या विनोदावर सबनीसांच हंसणं हा आमचा खूप पास टाईम व्हायचा.
आज तुम्ही आम्हाला सोडून गेल्याचं ऐकून खुपच दुःख झालं.पण एकच मनाची समाधानी करून घ्यावीशी वाट्ते की वर गेल्यावर तुम्ही अक्काला तरी भेटाल.

विरेन आणि वर्षाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.
(मधूकर सामंत म्हणजेच सामंतगुरूजी ३ जानेवारी २०१० या दिवशी कालवश झाले.ते ८६ वर्षाचे होते.आमचे मधुदादा, माझे मेव्हणे होते.माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान.त्यांच्या मागे त्यांचा मुलगा विरेन आणि त्याची मुलगी स्नेहा आणि त्यांची मुलगी वर्षा आणि तीचा मुलगा मयुरेश अशी दोन नातवंडं आहेत.)

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com