Thursday, July 29, 2010

आत्म-घातकी जोखीम.

“असं पुन्हा होऊ नये म्हणून प्रे.ओबामाच्या सरकारने नियमात बदल आणून धंद्यात जोखीम घेतल्यावर नुकसानी झाल्यास एक कपुर्दाही ह्या अधिकार्‍यांना मिळणार नाही याची योजना करून ठेवली आहे.”

जेव्हा अमेरिकेतल्या भांडवलदारानी आत्म-घातकी जोखीम घेऊन भांडवलशाहीला कडेलोट होण्याच्या परिस्थितीला आणून सोडली, आणि प्रे.ओबामाने तसं न होण्यापासून त्वरीत उपाय योजना करून भांडवलशाही सावरली तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं की अमर्याद आणि अविचारी गुंतवणूकीच्या स्वातंत्र्याला आळा घालणं क्रमप्राप्त आहे.पुर्‍या जगात भांडवलदारानी घेतलेल्या जोखमीचे दुषपरिणाम अनेक देशांना भोगावे लागले.विशेष करून युरोपीयन देशांना चांगलाच फटका बसला.

आज प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन बसले होते.
“अमेरिकन भांडवलशाही आणि आत्म-घातकी जोखीम “
अशा मथळ्याचं पुस्तक अगदी लक्ष केंद्रीत करून वाचत असताना पाहून मलाही त्यांचं जरा कौतूक वाटलं.मी विचारण्यापूर्वीच मला म्हणाले,

“मला हे पुस्तक पुरं नवाचता हातावेगळं करायला जमे ना.म्हणून मी म्हटलं तुम्ही येई पर्यंत जमेल तेव्हडं वाचावं.”
आणि मला पुढे म्हणाले,

“अमेरिकेतल्या मोठ्या गब्बर बॅन्कानी वाटेल तसं घरावर कर्ज काढणार्‍यांना कर्ज देऊन,घराच्या किंमती सदैव वाढतच रहाणार अशा खोट्या आशेवर राहून,पत असो वा नसो ज्याला त्याला कर्ज देऊन, लाखो घरांचा खप करून, त्या कर्जावरही विमा उतरवणार्‍या बॅन्काना ती कर्ज विकून,एक प्रकारचा जुगार खेळून,घरांच्या किंमती उतरण्याचा दाट संभव आहे,घरांच्या किंमती वाढणारा बुडबुडा फुटणार आहे ह्याची जाणीव होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष
करून, पैसे गुंतवणार्‍याना आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या बॅन्काना अक्षरशः रसातळाला आणून सोडलं.”
भाऊसाहेबांचं हे मनोरंजक स्पष्टीकरण ऐकून मलाही जरा आणखी ऐकण्यात स्वारस्य वाटूं लागलं.

मी त्यांना म्हणालो,
“प्रत्येकाच्या अंतर-आत्म्यात एक विश्वास बसावा असं बळ असतं.मनुष्याचा सुरक्षीत मार्ग निवडण्याकडे बहूदा कल असतो. ह्यामुळे आपलं यश आणि अस्तित्व टिकवण्याचा मार्ग जवळ जवळ मोकळा होत असतो.धोका पत्कर्ण्याचा आपण क्वचितच मार्ग पत्करतो.पण हे मात्र खरं की जास्तीत जास्त धोका पत्करल्यावर जास्तीत जास्त फलदायी व्ह्यायला होतं.तुम्ही सांगता त्या मोठ्या बॅन्काच्या अधिकार्‍यानी जास्त फायद्यासाठीच हा मार्ग पत्करला
असावा. असं तुम्हाला नाही का वाटत.?

“तुमचा प्रश्न फार छान आहे”
असं मला म्हणत भाऊसाहेब पुढे सांगू लागले,
“आणि कधी कधी धोक्याचा मोका घेणं म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं.काही धोके तसे जरा क्षुल्लक असतात. उदा.आपला सेल किंवा मोबाईल फोन, किंवा आपला लॅपटॉप घरी विसरणं,ह्या आधुनीक उपकर्णांच्या कटकटीपासून जरा विरंगुळा मिळावा म्हणून घेतलेला धोका तसा लहानच म्हणायला हवा.जरा जीवनात मजा असावी म्हणून हायवेवर जास्त वेगात गाडी चालवण्याचा प्रकार,हा काहीसा जरा मोठा धोका म्हणायला हवा.आणि
असा विचार करत करत नंतर माणूस पैशाच्या हव्यासाने बेफाम होऊन आत्म-घातकी जोखीम घ्यायला प्रवृत्त होतो. बॅन्केच्या अधिकार्‍यांना यासाठीच गब्बर पगाराच्या आणि बोनसाच्या नोकर्‍या असतात.पण हे सर्व करण्यापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे आपल्यालाच आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याला “आपण” होण्याचा मार्ग शोधला पाहिजे.”

“बॅन्केचे आणि मोठमोठ्या भांडवलदारांच्या कंपनीच्या सिईओना धोका किंवा जोखीम घेण्याची सवय झालेली असते.ही जोखीम किंवा हा धोका घ्यायला हे लोक कसे प्रवृत्त होतात? कदाचीत तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकात ह्यावर सवित्सर चर्चा झालेली तुम्हाला आठवत असेल ना?”
मी प्रो.देसायांना सरळ सरळ प्रश्न केला.

प्रो.देसाई मला म्हणाले,
“मला जे आठवतं ते तुम्हाला सांगतो.
जो खरा धोका असतो तो एक क्रमवार प्रतिक्रिया चालू करतो. आणि लगोलग आपल्या लक्षात येतं की, आवेश,प्रेम आणि इच्छाशक्ति ह्यांना घेऊन आपण जे जन्माला आलेले असतो आणि ज्याचा आपण आपल्याबरोबर सांभाळ करीत असतो तेच आपण कधी कधी प्राप्त करण्याचा परिश्रम घेत असतो.कंपनीची धुरा सांभाळण्याच्या पदावर असलेल्याना ह्या गुणांची देणगी असावी.
अगदी खूशीत जीवन जगत असल्याने आपण आपल्याच अंतरात डोकावून ओझरतं दर्शन घेत असतो.हा दर्शन घेण्याचा फक्त सेकंद दोन सेकंदाचा क्षण असला तरी तो क्षण आपल्या अंतरातल्या जोषाच्या,आणि शक्तिच्या वलयाच्या गाभ्याचा शोध घेत असतो. आपल्यातल्या जोखीम घेण्याच्या क्षमेतेच्या समिप जाण्याच्या प्रत्येक दिवसाच्या आपल्या प्रयत्नाविषयी आपण कल्पना करीत असतो.”

हे ऐकून मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“खरंच,ही आपल्यातली कल्पकताच आपल्या ध्येयाकडे आपल्याला ढकलत असते त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशीलतेकडेही ढकलत असते. प्रत्येक व्यक्तिमधे अगाध सामर्थ्याचा,आवेशाचा आणि सृजनात्मकतेचा झरा वाहत असतो त्यामुळे आपण ज्याची तीव्र इच्छा करतो ते आपण प्राप्त करू शकतो.आपल्या अवगुणावर आपण सफलता आणू शकतो.”

“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.”
असं म्हणून थोडा गंभीर चेहरा करून प्रो. म्हणाले,
“पण हे सर्व मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या जीवनभरच्या प्रवासात आपल्यात जो चांगुलपणा आहे तो उद्देशपूर्ण शोधण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.

सगळ्या धोक्यात मोठा धोका म्हणजे पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे जीवन जगणं.ज्यावर आपण प्रेम करतो ते करणं हे जीवनाचं खरं मर्म आहे.
कुणीतरी म्हटलंय की,
“जीवनात त्याला जास्त करून इनाम मिळतं जेव्हा तो करण्या लायक असलेलं काम खूप परिश्रम घेऊन करीत असतो.”

“आणि अगदी ह्याच्या उलट ह्या अमेरिकन भांडवलदारानी पाऊल टाकलं.”
माझ्या मनात आलं ते मी सांगायच्या प्रयत्नात राहून म्हणालो,
“म्हणजेच ह्यातला सत्याचा भाग असा की,तुम्ही जेव्हा अंगात जोष आणता तेव्हा ते काम तुम्ही सुलभतेने करू शकता.डोळे झाकून जेव्हा अपरिचित असलेल्या संभवतेच्या महासागरात आपण झेप घेतो तेव्हाच तो मोठा जोखमीचा भाग ठरतो.
बर्‍याच लोकांच्या हे लक्षात येत नाही की,त्यांच्यात असलेलं उत्कट जीवन जगण्याचं परिमाण किंवा ते जगण्याच्या प्रचंड क्षमतेची उपस्थिती किती असावी.आणि केवळ पैशाच्या हव्यासाने,किंवा अधाशी होण्याने ही अमेरिकन भांडवलदारी आपण काय करतो,ह्यात किती लोकांचं नुकसान होणार आहे,किती लोक रसातळाला जाणार आहेत ह्याची पर्वा नकरता आपलाच फायदा करून घेण्याच्या मागे लागले.कॉन्ट्रॅक प्रमाणे जसा कंपनीला फायदा करून दिला गेल्यास त्याचा मोबदला ह्या अधिकार्‍यांना देण्याचं कंपनीला बंधन असतं, तसंच यदा कदाचीत धंद्यात नुकसान झाल्यास कंपनी बुडाली तरी चालेल आपला फायदा बाजूला करून घेण्यात हे अधिकारी मोकळे असतात.”

“असं पुन्हा होऊ नये म्हणून प्रे.ओबामाच्या सरकारने नियमात बदल आणून धंद्यात जोखीम घेतल्यावर नुकसानी झाल्यास एक कपुर्दाही ह्या अधिकार्‍यांना मिळणार नाही याची योजना करून ठेवली आहे. त्यामुळे यापुढे आत्म-घातकी जोखीम न घेण्याचा त्याने इशाराच त्यांना दिला आहे.”
प्रो.देसायानी मी अपेक्षा करीत होतो तेच सांगून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com